नर्मदे, हर!
स्वतःलाच प्रश्न विचारणं कितपत सोपं असतं? आणि त्यांची उत्तरं आधीच्या लोकांनी, विचारपद्धतीने करून दिलेल्या धारणांपेक्षा वेगळी असतील तर? नवीन ठिकाणी गेल्यावर काही प्रकारची प्रतिक्रिया आपल्याला अपेक्षित असते. एकदम वेगळाच प्रतिसाद आला तर? कालच एका ठिकाणी फिरायला गेल्यावर असाच काहीसा अनुभव आला. खिशातून वॉलेट काढताना पहाताच, "इथे प्रवेशफी नाही. देणगी स्वीकारली जाते." आम्ही आधीच चितपट. मग काऊंटरवरच्या माणसाने हसर्या चेहेर्याने संपूर्ण भागाचा नकाशा दाखवला. पेन्सिलीने खुणा करून "इथे व्यवस्थित चढाव आहे, काळजी घ्या." असं सांगतानाच, "तिथे खाली जाणारच असाल तर या ठिकाणी मात्र नक्की जाऊन या. ब्रुअरीचा मस्त देखावा दिसतो." हा ही सल्ला दिला. (ब्रुअरी आणि परिसरही देखणा आहे, ते फोटो दुसर्या धाग्यात दाखवते.) संपूर्ण परिसर फिरताना "इथे काळजी घेण्यालायक रस्ता, चढाव आहे कुठे?" असा प्रश्न आम्हाला पडला होता. 'सू' होण्याच्या भीतीने म्हणा किंवा कोणालाही दुखापत होऊ नये या काळजीपोटी म्हणा किंवा एकूणच सवय म्हणा, त्या माणसाने थोडा उतार असणार्या भागात काळजी घ्या हे सांगितलं. आमच्या मागून आलेल्या व्हीलचेअरवरच्या बाईंना, "तुम्हाला या ठिकाणी जाता येणार नाही", असं नकाशावर दाखवून त्याबद्दल खेदही व्यक्त केला. एकूण परिसर रम्य आहे, अमेरिका आणि टेक्ससच्या दृष्टीने किंचित ऐतिहासिक महत्त्व आहे तरीही तिथे फारसे लोकं येत नाहीत याची किंचित खंत त्या माणसाच्या चेहेर्यावर होती. "असा रम्य, शांत परिसर शहरात मिळाला तर काय बहार येईल... ", असा माझा विचार सुरू असतानाच एकदम स्पीडब्रेकर लागला.
"तुम्हां पोरांना काय किंमत कळणार आहे या गोष्टींची? हाताला चटके बसल्याशिवाय भाकरीची काय मजा?" वगैरे ड्वायलाक माझ्या पिढीला नवे नाहीत. आणि हे का, तर भाकरी, पापड, वांगं भाजताना चिमटा किंवा काही यंत्रं वापरलं म्हणून! असं कोणी काही सांगितलं की मला एकदम 'हॅवेल्स'ची जाहिरात आठवते. रस्त्यावर रहाणारे माय-लेक, आई भाकर्या भाजत असते, त्यात तिचे पोळणारे हात पाहून पोरगा उठतो. कुठूनतरी वायरचा तुकडा आणून त्याचा चिमटा बनवून आईला देतो. आई अतिशय अभिमानाने, आनंदाने पोराकडे पहाते. सगळ्यांनाच ही जाहिरात आवडते, पण म्हणून कोणी हात न पोळून घेता भाकर्या भाजत असेल की "त्यात खरी मजा नाही" अशी वाक्य पिकल्या मनांमधे येतातच. खरोखर कष्टातून वर येणार्या लोकांचं कौतुक थोडं जास्त व्हावं हे रास्तच आहे. पण कष्ट टाळण्यासाठीच यंत्र निर्माण केलेली आहेत. ती वापरणार्यांना कमी का लेखावं? रायगडावर चढण्यासाठी आता केबल कार आहे. डोंगर चढून येणार्यांना देखावे अधिक सुंदर दिसतात आणि केबल कारमधून येणार्यांना शिवाजीबद्दल आदर कमी असतो असं थोडीच आहे? तरीही डोंगर चढणारे अनेकदा केबल कारवाल्यांना कमी का लेखतात? आणि त्यावर कडी म्हणजे केबल कारवाल्यांनी स्वतःला कमी लेखून घेणं.
मी दोनदा रायगडावर गेले होते, केबल कारमधून. दोन्ही वेळा तीन माणसांकडे मिळून दोन चार-इंची टेलिस्कोप, एक स्लाईड प्रोजेक्टर असं चढणं शक्यच नव्हतं. एकदा आमच्या बरोबर केबल कारमधे दोन मध्यमवयीन स्त्रिया होत्या. दोघीच फिरायला निघाल्या होत्या. त्यांना फार वाईट वाटत होतं, हिरकणी ज्या कड्यावरून उतरली तिथे त्यांना असं यंत्रं वापरून चढावं लागत आहे. रोज लटकून लोकलमधून प्रवास करणं, पन्नाशीला आलेलं वय यामुळे स्वतःला काही सूट देण्यात त्या दोघींना प्रचंड चूक वाटत होती. मला तर त्यांच्या उत्साहाचंच एवढं आश्चर्य वाटत होतं. त्या दोघी दिवसभर प्रवास करून, गडावर भटकून दमल्या तरीही रात्री उशीरापर्यंत आमच्याबरोबर जागून तारे पहात होत्या तेव्हातर मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटलं. काळ बदलला, हिरकणीचा जमाना आता राहिला नाही; तरूणवयात एकेकाळी हौस मारून पै-न-पै जमवलेल्या पिढीतले लोकं जेव्हा असे भटकायला निघतात त्यांचंही कौतुकच करायचं. आणि त्यांच्या वयाच्या लोकांसाठी केबल कार डीझाईन करणार्यांचंही कौतुक करायचं.
आता आयुर्मर्यादा वाढली आहे तसंच अधिकाधिक अनुभव घेता येणंही शक्य आहे. पूर्वी पाच कोसांवर भाषा बदलायची. आता इंटरनेटमुळेतर जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यात रहाणारे लोकंही एकाच प्रकारची स्लँग बोलत आहेत असंही दृष्य दिसतं. विमानाने जगाची फेरी दोन दिवसांत मारता येईल. व्यक्तिशः त्यापेक्षा जमिनीवरून केलेला प्रवास मला जास्त मजेशीर वाटतो. हवा, जमीन, झाड-झाडोरा यांच्यात होणारा बदल आणि त्यानुसार लोकांचा आहार, पेहेराव यांच्यात होणारा बदल दिसत जातो. भाषा माहित असेल तर वाक्प्रचारांमधला अर्थही लक्षात येऊ लागतो. 'केल्याने देशाटन' फायदेशीर असतंच, पण प्रवासात वेगवेगळी, रोचक माणसं भेटली तर 'पंडीतमैत्री, सभेत संचार' याचाही काही प्रमाणात फायदा होतो. पण भारतातून युरोप, आफ्रिका, अमेरिका खंडांमधे जायचं असेल तर जमिनीवरचा प्रवास मला असह्य होईल. प्रवासासाठी प्रवास ही चैन मला परवडणार्यातली नाही, पैशानेही नाही आणि आवडीच्या दृष्टीनेही नाही. पुणे-कोलकाता प्रवास एक दिवस रेल्वेत बसून केला तर स्टेशनांच्या पाट्या बांग्ला लिपीत दिसायला लागल्यानंतर कधी एकदा आपण गाडीबाहेर उतरतो आहोत असं झालं.
चपलांशिवाय सिद्धीविनायक, टिटवाळ्याचा गणपती वगैरे करणार्या लोकांची मानसिकता मला समजत नाही. काशीयात्रा हे दिव्य समजावं असे दिवस आता गेले. अलाहाबादला चिक्कार विमानं जातात. विमानप्रवास परवडत नसेल तर रेल्वेप्रवास काही फार महाग नाही. पण कोणी ध्येयवेडा पुणे-डोंबिवली प्रवास सायकलवरून करून डेक्कन क्वीनच्या वेगाशी स्पर्धा करतो त्याचं मला कौतुक वाटतं. आजच्या जगात आजचं ध्येय आणि साध्य.
सूर्य देव समजणार्या अनेक संस्कृती प्राचीन जगात होत्या. इंका, माया, सिंधु इ. संस्कृतींमधे सूर्याची देव समजून उपासना केली जात असे. सूर्यामुळे आपलं आयुष्य शक्य आहे याची जाणीव त्यांना होती. पृथ्वीवर सजीव असण्याचा चमत्कार दाखवल्यामुळे सूर्याला देव समजण्यामागचा विचार समजायला अगदीच सोपा आहे. सूर्याच्या इंजिनात काय काय आहे, आपल्याला डोळ्यांनी, दुर्बीणींच्या सहाय्याने जे दिसतं त्याची संगती लावणं सोपं काम नाही. पण त्यापुढे थोडे कष्ट होतात ते विचार बदलण्यासाठी. सूर्य हा एक सामान्य आकाराचा तारा आहे, आपल्याप्रमाणे त्यालाही जीवन-मृत्यु सर्व आहे, हे समजल्यानंतरही सूर्य हा देव नाही हे मानणं कितपत सोपं आहे?
सूर्य, किंवा जनक तारा या ऊर्जास्रोतानंतर सजीव आणि मनुष्याच्या उत्क्रांतीमधे महत्त्वाचं आहे ते पाणी. आजही पाण्यासमोर बसलं की सर्वसामान्यांना आनंद होतो, भले ते पाणी खारट असेल, डोळ्यांनाही अशुद्ध दिसत असेल, साचलेलं असेल, पाणी पाहून आनंद न होणार्या मनुष्याकडे विचित्र नजरेनेच पाहिलं जाईल. सर्व प्राचीन संस्कृती नद्यांकाठी वसल्या. काही अपवाद वगळता जगातली मोठी शहरं नद्यांकाठी आहेत, दिल्ली, आग्रा, कोलकाता, लंडन, बर्लिन, पॅरीस, कैरो सगळीच. मुंबई किंवा अटलांटासारख्या शहरांना पाणी आयात करावं लागतं हे तसं नवीन आणि संख्या, प्रमाणात कमीच. पाण्याचा स्रोत असणार्या नद्यांना देवी मानणं, त्यांची उपासना हे ही ओघाने आलंच. त्याचबरोबर नदीला पूर येणार, कधी कोरडा दुष्काळ पडणार आणि मानवी आयुष्य त्यामुळे सैरभैर होणार हे अजूनही इतिहासजमा झालेलं नाही. पण यावर हळुहळू उपाय मिळत आहेत. चीनची यांग्त्से असेल किंवा भारतातली गंगा किंवा टेक्ससमधली इवलिशी कोलोरॅडो, या सगळ्या नद्यांवर धरणं बांधलेली आहेत. (धरणांची आवश्यकता, त्यातून निर्माण होणारे प्रश्न या धाग्याचा मुद्दा नाही.) ठिकठिकाणी छोटी-मोठी धरणं बांधून नद्यांमधलं पाणी आपल्या आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करणं, पूरनियंत्रण करणं, थोडक्यात नद्यांचे प्रवाह आपल्या आवश्यकतेप्रमाणे कमी-जास्त करणं, वळवणं हे ही आपल्याला शक्य झालेलं आहे. नद्यांमुळे एकेकाळी भासणारा चमत्कार आता विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे 'मॉडर्न मार्व्हल' म्हणावा असा झालेला आहे.
तरीही आज आपण चमत्काराशिवाय नमस्कार करणार का?
हे विस्कळीत विचार लिहून काढण्यास कारण मनोबांचा हा प्रतिसाद. त्यात त्यांनी अविनाश बिनीवालेंच्या या लेखाचा उल्लेख केला आहे. साधारण ललित लेखनाच्या अंगाने जाणार्या लेखांत मला बरंच काही सापडलं. बिनीवाले लिहीतात, "... एखाद-दोन अपवाद सोडले तर बहुतेकांनी ती किती अवघड आहे ह्यची रसभरीत (नि अवास्तव?) वर्णनं केली आहेत, परिक्रमेत आम्हीच कसे भाग्यवान् ठरलो हे रंगवून सांगितलं. अनेकांनी वाटेत (वेळोवेळी?) भेटलेल्या साक्षात् नर्मदा / मारुती / अश्वत्थामा वगरे पौराणिक पात्रांची इतकी चमत्कारिक आणि चमत्कृतीपूर्ण (भाबडी) वर्णनं केली की जणू नर्मदा, अश्वत्थामा, मारुती वगरे मंडळी दिवसभर परिक्रमावासीयांची वाट पाहत बसलेली असतात! अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा पुस्तकांमुळे अनेकांना ही आगळीवेगळी नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे, असं वाटायला लागलं. ..." हे वाचून आपल्या पुरोगामित्त्वाचा डंका महाराष्ट्र का बडवतो असा प्रश्नच पडला. पण पुढे काही अंशी बिनीवालेंचा लेख पुरोगामित्त्वाची साक्ष देतो. ते पुढे लिहीतात, "... अनेक लेकुरवाळ्या बायाच नाही तर चाकांच्या खुर्चीवरून आलेल्या दाभाडेबाईही ह्य परिक्रमेत सामील झालेल्या होत्या. रूढार्थानं पंगू असलेल्या दाभाडेबाईंनी मोठय़ाशा जिद्दीनं ही परिक्रमा पूर्ण करून ‘पङ्गु लयते गिरिम्’ हे वचन खरं करून दाखवलं...." एकेकाळी, जेव्हा ना क्रूड तेलाचा शोध लागला होता, ना स्वयंचलित वाहनांचा आणि ना एकूणच यंत्रांचा तेव्हा पायी चालणं आणि 'बाहुबली' असण्याचा खरोखर फायदा होता. पण रूढार्थानं पंगू असणारेही आज नर्मदेला प्रदक्षिणा घालू शकतात, प्रवासासाठी प्रवास करणं ज्यांना शक्य नाही त्यांनाही एवढा वेळ घालवावा लागत नाही. ईशान्य भारतात फिरस्ती करणारे, स्थानिक संस्कृतीची लोकसत्ताच्या माध्यमातूनच आपल्याला माहिती देणारे बिनीवाले लिहीतात "परिक्रमेचे किती किती लाभ मिळाले ह्याचा हिशेब तसा खूप मोठा नि क्लिष्ट आहे, तो कागदावर मांडणं तसं अवघडच आहे! माझ्या दृष्टीनं हे सगळं पुण्यकार्यच होतं!" त्यातून या प्रवासाचं महत्त्व पटावं. बाकी सगळा निरर्थक कर्मठपणाच!
आणि आठवला ग्रँड कॅन्यन! अधिकाधिक लोकांनी तिथे यावं, तिथलं निसर्गसौंदर्य पहावं, त्याची जाहिरात आपल्या मित्रमंडळात करावी, शाळकरी मुलांनी आणि इतर जिज्ञासूंनाही भूगर्भीय घडामोडी, एकूणच जिऑलॉजी संदर्भात माहिती मिळावी, विद्यार्थ्यांनी जिऑलॉजीकडे वळावं या सर्वांसाठी केलेला आटापिटा. हे सगळं आपलंच आहे, आपणच डोळे भरून ग्रँड कॅन्यनचे सूर्योदय आणि सूर्यास्त डोळे भरून पहावेत, कॅमेर्यात साठवून ठेवावेत, त्या प्रचंड दरीच्या समोर बसून उन्हात शेकत जेवत बसावं, ग्रँड कॅन्यन असं छापलेल्या कपातून कॉफी प्यावी, जेणेकरून सगळ्यांसाठीच win-win situation असावी. आपल्याला निसर्गाचा आनंद लुटता येतो, स्थानिकांना रोजगार मिळतो.
एका बाजूने आपण नर्मदेला बांध घालून अडवलं आहे, आवाक्यात आणलं आहे, कालवे काढून शेतापर्यंत नेलेलं आहे. नर्मदेच्या "विक्षिप्त वागण्यातून" येणार्या पूर आणि दुष्काळांना हरवतो आहोत. आणि दुसर्या बाजूने बसमधून नर्मदेला प्रदक्षिणा घालणार्या विद्यार्थ्याला म्हणणार, "हाताला चटके नाही बसले तर भाकरीची चव बरी नाही लागत!" जगाला प्रगतीपथावर नेणार्या न्यूटन, डार्विन, आईनस्टाईनला अॅस्पर्गर सिंड्रोम होता म्हणून कुणाच्याही विक्षिप्त कृतीला प्रगती म्हणता येत नाही.
जी गोष्ट पंधरवड्यात करता येईल, बहुसंख्यांना सहजसाध्य वाटेल ते मुद्दाम कठीण आहे अशी बतावणी करत, त्यासाठी सहा महिने, नाहीतर तीन वर्ष, तीन महिने, तेरा दिवस खर्च करून काय साध्य होतं? झाडावरून पडणारं फळ सगळ्यांना दिसलं तरी त्यातून ज्ञानप्राप्ती होणारा न्यूटन एखादाचा निघतो.
लेख आवडला. सूर्य कोणाकरता
लेख आवडला.
सूर्य कोणाकरता केवळ स्वयंप्रकाशी (तारा), उर्जास्त्रोत असू शकतो तर कोणाकरता जगाचा आत्मा, जगदेकचक्षू अर्थात जगाचा डोळा, सर्वसाक्षी देव. तुम्ही किती व्यवहारी किंवा कवी मनाचे आहात यावर ते अवलंबून आहे. आपण सारे जण जरी भासमय एकाच जगात वावरत असलो तरी अंतरंगात प्रत्येकाचे वेगळे विश्व वसलेले असते.
परिक्रमेची मानसिकता , ज्या व्यक्तीने परिक्रमा केली आहे तीच सांगू शकेल.
परखड लेख आवडला आणि पटला.
व्यक्तिशः मत: साहसाची आवड आणि (अजूनतरी) क्षमता असल्याने पायी परिक्रमा करणे किंवा गड चढून जाणे हेच आवडेल. ज्यांच्याकडे क्षमता किंवा वेळ किंवा आवड नाही किंवा तांत्रिक अडचण आहे ते गाडीने जातील. त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही (निरोगी, धडधाकट असूनही क्षमता नसल्याबद्दल कमीपणा वाटल्यास समजू शकतो).
नमस्कार करायला मी देवळातही (पायी अथवा गाडीने) जात नसल्याने धार्मिक/अध्यात्मिक कारणांसाठी प्रवास ही कल्पना मला फारशी माहित नाही.
अर्थात वर सारिकाजी म्हणाल्या तसं प्रत्येकाचे विचार आणि श्रद्धा वेगळी. ज्यांचे विचार असे आहेत त्यांना लेख आवडेल.
आशियायी पाश्चात्य
लेख आवडला. काहि प्रसंगी पटलाही.
मात्र सर्वत्र असा दृष्टीकोन मला ठेवता येत नाही. कष्ट करून एखादि गोष्ट मिळालेला आनंद अधिक असतो मात्र कमी कष्ट करून युक्तीने त्याच गोष्टी मिळवण्यात हरकत नाहीच. मात्र कमी वेळात - कमी कष्टाने तोच - तितकाच आनंद मिळतो असा दावा किंवा मिळेल अशी अपेक्षा असु नये.
बाकी स्वतः परिक्रमा करणं वगैरे इथे का कोण जाणे आशियायी संस्कृतीचं कंडिशनिंग वाटतं. पुर्वरंगमधे पुल म्हणतात त्याप्रमाणे आशियायी लोकांना संथपणापेक्षा चवीचवीने गोष्टी करायला आवडतात. अनेक आशियायी संस्कृतींमधे धेय्य गाठण्यापेक्षा ते धेय्य गाठण्याचा 'प्रवास' अधिक महत्त्वाचा मानला आहे. शंकराच्या पिंडीवर एकदम हजार बेलाची पाने आणि पात्रभर दुध/पाणी ओतता येतंच की पण तरीही आपली संस्कृती एकेक पानच वहायला लावते नी पाणि थेंब थेंबच पडतं. जपानी चहागृहात बशीबशी चहा मिळतो आनि तो शांतपणे बसुन तासन् तास घ्यायचा असतो. हज यात्रेला विमानानेही जाता यावं पण तो प्रवास अधिक महत्त्वाचा मानला गेला आहे
याउलट पाश्चात्य संस्कृतीमधे धेय्याला अधिक महत्त्व आहे असे वाटते. तिथे काय मिळवता हे महत्त्वाचे, कसे मिळवता याला कमी महत्त्व आहे.
त्यामुळे जवळपास तीन वर्ष, आधुनिक संस्कृतीच्यापासून दूर राहुन होणारा प्रवास आणि गाडीतून 'आटोपलेला' प्रवास यात नर्मदा परिक्रमेला अनुभवणे आणि परिक्रमा करून 'संपवणे' असा आहे असे वाटते.
अर्थात यात चुक-बरोबर असे काहि नाही. प्रत्येकाची प्रकृती आणि 'घडवलेला' पिंड आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
वेगळाच अँगल. आवडला..
वेगळाच अँगल. आवडला..
खरं?
बांध घालून अडवलं आहे हे खरं. आवाक्यात आणलं हे पटत नाही. कालवे तर अजूनही झालेले नाहीत. पूर, दुष्काळ दूर झाले आहेत? समुच्चयानं हे सारं खरं आहे? मला जाणून घ्यायचं आहे. कदाचित, मी एकांगी असेन. ते दुरूस्त करता येईल.
लेख चांगला लिहिला आहेस. काही वाक्यं वाचून, हे अदितीच लिहितीये का असा प्रश्न पडला. चांगल्या अर्थानं.
Einesteain
Einestein ने वेगळ्या संदर्भात एक वाक्य म्हतलेलं आठवतय :-
Things should be made as simple as possible,not simpler.
बादवे आजही कुणी "एखाद्या शिवाजीच्या गडावर मस्त रिसॉर्ट वगैरे सुरु करून त्याला हनीमून स्पॉट बनवलं तर चुकलं कुठे?" असा प्रश्न विचारला की तर्कशुद्ध उत्तर देता येत नाही पण ते सुचवत असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत हे ही मनातून काढता येत नाही.
तुझा लेखही काहिसा तसाच आहे.अत्यंत तर्कशुद्ध पण काहितरी महत्वाचं हरवून बसलेला. अर्थातच ते महत्वाचं आहे तरी काय हे मीही शब्दांत सांगू श्कणार नाही.
माझा प्रतिसाद लेखात उल्लेख करण्याइतका दखलपात्र वाटला हे ऐकून बरे वाटले. आणि पुरोगामी वगैरे त्या साहेबांना म्हटलं जातय तर ते ठिक आहे, पण मग सतत यज्ञ करायचे काय कारण? कुठल्यातरी "गुरुं"च्या मागे तरी जायचं काय कारण? जायचं असेल तर स्वतःच स्वतः जावं ना? अधिक काही लिहिल्यास "आमचे गुरु तसे नाहित हो" हे म्हनायला ते मोकळे. तक्रार तीही आहे आमची. इतरांना अंधश्रद्ध म्हणताना माणसाने स्वतः उगाच कशाला एखाद्या बाबाच्या मागे जा?
पुढील परिच्छेद त्याच पुरोगामी म्हटलेल्या माणसाने लिहिलेले आहेत त्या लेखातः-
नर्मदा परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर होते, आमच्या परिक्रमेची सुरुवातही तशीच झाली, अर्थात् तिचं नियोजन खूप अगोदर म्हणजे सुमारे नऊ-दहा महिने अगोदरच सुरू झालं होतं, कारण ही परिक्रमा एकटे गुरुजी करणार नव्हते तर ते आपल्या इच्छुक साधकांनाही बरोबर घेऊन जाणार होते. अर्थात् मूळच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षात परिक्रमेला आलेल्या भक्तांची संख्या खूपच अधिक होती-तीनशे.
मागच्या शतकातले एक सत्पुरुष वासुदेवानन्दसरस्वती टेम्बेस्वामी ह्यंनी नर्मदेच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी वास केला, चातुर्मासाच्या काळात वास्तव्य केलं आणि संस्कृतात आणि मराठीत प्रचंड ग्रंथलेखनही केलं. टेम्बेस्वामींच्या स्पर्शानं पुनीत झालेल्या नर्मदेच्या तीरावरच्या सर्व ठिकाणी जाऊन त्या स्थानांचं दर्शन घेणं हा ह्या परिक्रमेतला एक महत्त्वाचा कार्यक्रम होता.
टिप्पिकल पुरोगाम्यांच्या भाषेत माझे खवचट प्रश्नः-
सत्पुरुष म्हणजे कोण?
सत्पुरुष म्हणण्यासारखे ह्यांनी काय केले आहे>?
१२ प्रकारचे यज्ञ करायची ह्या अंधश्रद्धाविरोधी माणसाला काय गरज होती? गुमान दोन फेर्या मारल्या की होतोच ना व्यक्तिमत्व विकास.
"वास्तव्याने पुनित" झाले म्हणजे काय झाले?
असे खूप काही होइल. थोडक्यात सांगायचे तर आक्षेप हाच की विनाकारण इतरांना अंधश्रद्ध म्हणताना स्वतः काय करतोय ह्याचे भान ठेवावे. कुणी नास्तिक असण्याबद्दल आक्षेप नाही, कद्धीच नव्हता, पण ते तरी प्रामाणिकपणे असावे व कुणाला हिणवण्याचा उग्र दर्प त्यातून येउ नये.
दु:ख नास्तिकतेबद्दल नाही अन् पुरोगामित्वाबद्दल तर अजिबातच नाही, दांभिकतेबद्द्ल आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
रोड टु समरकंद
फार आवडला हा लेख. बर्याच दिवसांनी अशाप्रकारचे रोखठोक विचाराचे लेखन वाचले. "अॅड्वेन्चर लँड" आणि "डिस्नेलँड" यात नक्कीच फरक आहे; पण म्हणून पहिल्या संवर्गातील गोंद्याने तिकिटाच्या पाळीत उभे राहिलेल्या दुसर्या वर्गातील पोंद्याकडे बघून विकट हास्य करण्यात काही हशील नाही. सर रिचर्ड बर्टनच्या वाळवंटातील साहसी सफरी वाचून त्याचा आनंद घेता येतो, त्या भावल्या म्हणून कुणी आज सहारा तुडवित पार करण्याच्या गोष्टी करण्यात अर्थ नसतो. पूर्वी मक्कामदिनेला जाणार्या इथल्या 'हाजी' ला निरोप देताना अगोदर एक आठवडा घरात रडारड चालू व्हायची (हे मी पाहिले आहे). त्याला सबळ असे कारण म्हणजे मदिनेला गेलेली व्यक्ती अल्लाला प्यारी होणारच, ती धडपणे इकडे जिवंत परतणार नाही, यावर मुस्लिमधर्मीयांचा पक्का विश्वास. त्यामुळे मक्केला चालला म्हणजे 'कायम'चा चालला अशी समजूत. आज थॅन्क्स टु विज्ञान, सकाळी मक्केला गेलेले रहमतमियाँ तिथल्या दर्शनफेर्याच्या बाबी आटोपून दुसर्या दिवशी विमानाने घरी परतून संध्याकाळी अकबर मोहोल्ल्यात कब्र दर्शन अनुभवाची पोतडी आरामात सोडून बसलेले दिसतात (हे देखील पाहिले आहेच). आता मक्केला जाऊन मरतात ते तेथील दर्शनासाठी 'भगदड मच गयी' या कारणामुळे - प्रवासामुळे नव्हे.
अदिती यानी दिलेले भाकरीचे उदाहरण चपखल आहेच. त्या निमित्ताने पु.लं.नी एका मनोगतात उल्लेख केलेला असाच एक संदर्भ आठवला. "पहाटेच्या वेळी एखाद्या आजीने घरी ज्वारी दळतादळता जात्यावर म्हटलेली गाणी मला फार भावतात. पण म्हणून मी आता कुण्या माऊलीने त्यासाठी घरी जात्यावर दळण दळत राहावे असे म्हणणार नाही." ~ ती एक मन प्रसन्न करणारी भावना आहे, अट्टाहास नव्हे. कॉलेज जमान्यात मीदेखील 'रायगड' मित्रांसमवेत तीनचार वेळा चढलो आहे, पण शिर्के कंपनीने ज्यावेळी रोप वे ची सोय केल्याची बातमी वाचली त्यावेळी झालेला आनंद आजही स्पष्ट जाणवतो कारण आता त्या रोप वे मुळेच आई आणि थोरल्या बहिणीला घेऊन त्यांची रायगड पाहाण्याची इच्छा मी पूर्ण करू शकलो. त्यांच्यासमवेत मीही परत त्या सोयीने रायगड सफर केली. त्यावेळी त्या दोघींना रोप वेत बसवून मी 'चालतच रायगड चढणार' म्हणणे मूर्खपणाचे होते.
अरेबियन आफ्रिका आशिया आणि अमेरिकेतील विविध वाळवंटांचा शोध घेण्यासाठी १८ व्या आणि १९ व्या शतकात कित्येक वीरांनी [Explorers म्हणू या] आपले प्राण खर्ची घातले; पण निदान काहीजणांना यशही लाभले, त्यांचे पोवाडे गाईले गेले. पण या सर्वांचा बाप म्हटल्या गेलेल्या 'गोबी' पुढे सर्वांनी हात टेकले होते. जवळपास ३६०० मैल विखुरलेले, तुर्कस्थानाच्या पामीर्स आणि मांचुरिया प्रदेशातील भयावह वाटणार्या वाळवंटात जिथे उंट टिकत नसत तिथे मानवाची काय कथा !
~ असे असूनही जेम्स फ्लेकरच्या "द गोल्डन रोड टु समरकंद" वर विश्वास ठेवून त्या साहसी मोहिमेला निघणारे होतेच. कारण ?
We travel not for trafficking alone;
By hotter winds our fiery hearts are fanned:
For lust of knowing what should not be known
We take the Golden Road to Samarkand.
रशियाचा निकोलाई मिखाइलोविच हा त्यापैकी एक. त्याची जिद्द पाहून रशियन अकादमी ऑफ सायन्सेसने 'गोबी साहसा'ला मान्यता दिली होती आणि अनेक अडचणीचे डोंगर पार करून निकोलाईने तो गोल्डन रोड प्रत्यक्षात पार केलाही. पण आताच्या आधुनिक विज्ञानाने गोबीलाही "Rose Tanks" बनविण्याची क्षमता दाखविल्याने एकेकाळी "डेव्हिल लॅण्ड" वाटणारे वाळवंट मुद्दाम पायीच तुडवित मी पार करतो असे म्हटले तर ते वेडे साहस ठरणार यात संदेह नाही.
एका चांगल्या लेखाबद्दल "३१४" चे अभिनंदन !
अशोक पाटील
दुरुस्ती आणि शंका....
गोबी वाळवंटातून खुश्कीचा/रेशीम मार्ग जातो असे ऐकले होते. तुम्ही म्हणता ते तसले भयंकर कोरडेठाक वाळवंट चिली मध्ये असल्याचे ऐकून आहे.(जगातील सर्वात कोरडी जागा, मागील १०० वर्सहत पावसाचा थेंबही नाही.)
शिवाय दोनेक महिन्यांखाली लोक्सत्तेत का कुठेतरी काही साहसवीरांचा लेख वाचला होता, ते गोबी वाळवंट आधुनिक साहित्याविना पार करून का काहितरी करून आले होते म्हणून.
तुर्कस्थानाच्या पामीर्स
पामीर अफगाणिस्तानच्या पश्चिम उत्तरेस आहे. तुर्कस्थान तिथून लै लांब राहिला; तो अर्ध्याच्यावर युरोपमध्ये आहे,बाल्कन देशांच्याजवळ. एखादेवेळेस पूर्वीच्या सोविएतमधील तुर्कमेनिस्तान असला तर जवळ असेल पामिरच्या.
मांचुरिया प्रदेशातील भयावह वाटणार्या वाळवंटात
हे कुठे आहे जरा सांगाल का? मांचुरिया म्हणजे चीन्-जपान ज्यावर आपला हक्क सांगत भांडत असतात तो भाग असेल तर तिथं कुठं वालवंट आहे ते समजले नाही.
@आदिती:- मीना प्रभूंच एक वाक्य इथेच का कुठेतरी जलावर वाचलं होतं; तीच माझी तक्रार आहे "प्रत्यक्षातला ससासुद्धा टीव्हीवरील वाघापेक्षा काय थरार देउन जातो"
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
निकोलाई
निकोलाईच्या गोबीसाहसावर आधारित एका लेखातील मजकुराच्या आठवणीवर तो तपशील दिला आहे. तुम्ही म्हणता तशी काही वेगळी परिस्थिती असेल तर तो लेख [आहे माझ्या संग्रहात] आत्ता शोधतो आणि परत त्याविषयी खुलासेवार लिहितो.
अशोक पाटील
गोबी
मन ~
सापडला तो लेख. इंग्रजीचा अनुवाद न करता थेट त्यातीलच तो संबंधित मजकूरच इथे देतो :
".....Only one desert remained inscrutable and unconquerable, the GOBI, which covers three thousand six hundred miles and lies between the Pamirs and Manchuria in Eastern Turkestan."
तुम्ही लोकसत्तेच्या लेखाचा उल्लेख केला आहे. तसेही असेल, म्हणजे अगदी आजही "मी गोबी पार करणारच" म्हणणारा एखादा गोप्या असूही शकेल, पण म्हणून २०१२ मध्ये तसले साहस एकप्रकारचा "वेडेपणा" होईल. कारण एकदा अमुक एक ठिकाण एका साहसवीराने "जिंकल्या'नंतर तिथे परत तसेच जाणे त्यारितीच्या साहसाचेच मानले जाईल असे काही नसते.
निकोलाई जाण्याच्या अगोदर गोबीचे वर्णन असे होते : "The legends of centuries and the fearsome accounts from carters and camel drivers about the horrors encountered on the fringes of the desert combined to make experienced travelers shun the GOBI and many truly believed it was a realm of the Devil." ~ हे वर्णन वाचूनच निकोलाईमध्ये जिद्द निर्माण झाली. पण ही 'शन' ची स्थिती आज राहिलेली नसल्याने मग गोबी पार करण्यात साहस कसले ?
"मांचुरिया" बाबतदेखील गोबीसंदर्भात तुम्ही शंका उपस्थित केली आहे, त्याबद्दल :
The Eastern Gobi Desert Steppe extends from the Inner Mongolian Plateau (China), situated at 1,000 to 1,500 m elevation, northward into Mongolia. It is a broad eco-tone. This is comparable to the southwestern section of the Mongolian steppe biogeographic subunit in the Mongolian-Manchurian Desert according to Mackinnon et al.
अशोक पाटील
कारण एकदा अमुक एक ठिकाण एका
खाली प्रतिसादात लिहीलेलं आहेच, पण ते लांबडीत हरवू नये म्हणून पुन्हा एकदा:
त्या काळच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या वेळच्या लोकांनी अमक्या गोष्टी कशा केल्या असतील याचे प्रयोग आजही होतात. अर्थात ते साहस म्हणून करण्यापेक्षा त्या काळाचं संशोधन म्हणून केलेले असतात. व्हायकिंगनी समुद्र कसे ओलांडले होते, कोलंबसची सफर असे प्रयोग झालेले आहेत. टीव्हीवर कार्यक्रम पाहिलेले असल्यामुळे आता तपशील आठवत नाहीत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इस्टर्न टर्केस्तान
पाटीलसाहेब, तुम्ही दिलेला मूळ इंग्रजी संदर्भ बरोबर आहे पण मला वाटतं अनुवादात तुमच्याकडून जरा गल्लत झाली आहे...
इस्टर्न टर्केस्तान म्हणजे तुर्कस्थान नव्हे. तुर्कस्थान हा युरोपाला जोडून असलेला देश आहे आणि तो लेखात वर्ण केलेल्या भूभागापासून (पामीरपासून) खूप दूर आहे...
इस्टर्न टर्केस्तान म्हणजे पश्चिम चीनचा भूभाग ज्याला आता जिन्जियांग (अचूक उच्चार येत नाहिये) प्रांत म्हणतात तो.
पूर्वी म्हणजे दुसर्या महायुद्धापर्यंतच्या काळात टर्केस्तान हा भूभाग मानला जायचा. त्याचा पश्चिम भाग म्हणजे वेस्टर्न टर्केस्तान म्हणजे अजरबैजान, कजाखिस्तान, किर्गिजिस्तान वगैरे प्रांत नंतर सोवियेत युनियनने ढापले आणि इस्टर्न टर्केस्तान म्हणजे पामीर आणि जिनजियांग हे चीनने बळकावले...
चूभूद्याघ्या...
तुर्कस्तान आणि टर्केस्तान
धन्यवाद पि.डां.सर ~ नक्कीच अनुवादाच्यावेळी माझ्याकडून तसे घडले. स्पेलिंगही जवळपास तसेच असल्याने आणि उच्चारही तसाच घडत असल्यामुळे मराठीत तसे नाम टंकले गेले. (त्यामुळे श्री.मन यानाही टर्केस्तान हेच अभिप्रेत असणार हे नक्की). मात्र मूळ प्रतिसाद 'गोबी' साहसाशी निगडित असल्याने त्यावरच लक्ष केन्द्रीत झाले होते.
अशोक पाटील
आपला प्रतिसाद खूपच आवडला आणि
आपला प्रतिसाद खूपच आवडला आणि त्या कवितेच्या ओळी तर ..... जीवघेण्या सुंदर आहेत.
We travel not for trafficking alone;
By hotter winds our fiery hearts are fanned:
For lust of knowing what should not be known
We take the Golden Road to Samarkand.
अप्रतिम! अप्रतिम! अप्रतिम!
लेख अतिशय उत्तम जमला आहे.
लेख अतिशय उत्तम जमला आहे. आवडलाही आहेच. मात्र, सगळाच पटला असंही नाहीये. अर्थात, लेखिकेची मूळ धारणा संपूर्णतः वेगळी आहे त्यामुळे काही ठिकाणी 'मिस्ड द पॉइंट' असं वाटतं. पण अर्थात ते माझ्या धारणेनुसार आहे त्यामुळे काही आक्षेप नाहीच.
मात्र या लेखात तथाकथित धार्मिक / अध्यात्मिक लोक जे स्वतःच कर्मकांडाच्या मागे लागून 'मिस्ड द पॉइंट'चे शिकार होतात त्यांच्यावर केलेली टिप्पणी आवडली.
एखादी गोष्ट कशी एंजॉय करावी हा वैयक्तिक प्रश्न आहे. रायगडाचेच उदाहरण घ्यायचं झालं तर मला व्यक्तिशः गड चढून जायला आवडेल. पण काही कारणामुळे ते जमणारे नसेल तर मी केबलकारनेही जाताना तितकाच आनंद घ्यायचा प्रयत्न करेन. कोणत्याही परिस्थितीत उगाच अट्टाहास करणे टाळेन. मुद्दाम कष्ट केल्यानेच काही विशिष्ट आनंद प्राप्त होतो किंवा ते कष्ट केल्याने दुसर्यांना चार गोष्टी सुनावण्याचा अधिकार प्राप्त होतो हे अजिबात मान्य नाही. एक प्रसिद्ध संतवचन आहे (नक्की कोणाचे ते आठवत नाहीये) त्याचा भावार्थ असा की देह कष्टवल्याने मोक्ष मिळत असेल तर जगातली सगळी गाढवं पहिल्यांदा मोक्षाला प्राप्त होतील. तसंच हे.
मात्र, वैयक्तिक पातळीवर, नर्मदा प्रदक्षिणा किंवा पंढरीची वारी करायची इच्छा आहेच. तो एक अनुभव आहे आणि तो घ्यावा असेही मला वाटते. अर्थात, उद्या मला एस्टीबसने पंढरपूरला जावे लागले तरी पांडुरंगाचे दर्शन तितक्याच तन्मयतेने घेईन. तसेच, नर्मदा प्रदक्षिणेचे. तो एक विलक्षण अनुभव आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यापेक्षा मी वेगळं असं काही करेन आणि ते मला एक्साइट करणारं असेल, म्हणून. नर्मदा प्रदक्षिणा, वारी हे एक प्रवास असतात, स्वतःचे... आत घेऊन जाणारे. बाह्य सगळं केवळ एक निमित्त म्हणून. अर्थात हा वैयक्तिक दृष्टीकोन झाला. जे लोक नर्मदामैय्येवर भक्ती ठेवून प्रदक्षिणा करतात त्यांच्याबद्दलही माझा आक्षेप नाही. जे लोक हे सगळंच नाकारतात त्यांच्याबद्दलही नाही.
अश्या प्रकारचं लेखन अदितीकडून आलंय याचं मला तरी काही आश्चर्य वाटलेलं नाहीये. ललित अंगाने जाणारे चिंतनात्मक असं लेखन / गप्पा झाल्यामुळे असेल कदाचित.
बिपिन कार्यकर्ते
मार्व्हलस सायन्स?
लेख मनापासुन लिहिलाय(असं वाटतयं) त्यामुळे, मतितार्थ पटला नाही तरी भावतो, छान वाटतो कारण त्यामागे असलेली तुमची भावना.
साला आमचचं ते सगळ कसं चांगलं आणि हे पाश्चिमात्य/सुधारलेलं ते कसं वाईट असं म्हणत जगणारी एक आख्खी पिढी ज्याने पाहिलिये त्याला हे सगळ अगदी माझ्याच मनातलं लिहिलय असं वाटेल एवढ नेमकं उतरलय ते.
तुमच्याशी काही अंशी सहमत होताना, ऋषिकेश आणि श्रावण ह्यांचाशीपण मी तेवढाच सहमत आहे, तुमच्या भावना करड्या क्षेत्रातल्या आहेत असं वाटतं, त्याचाशी सहमत होताना त्याचा अतिरेक होणार नाही ह्याची जाणिव असमहत होण्यास कारणीभूत ठरते.
चांगलं-वाइट अस ते काय असतं? वृत्ती चांगली हवी हे महत्वाचं, सुधारणा होउन वृत्ती बदलली नसेल तर सुधारणा त्रासदायकच ठरेल, आणि वृत्ती चांगली असेल तर सुधारणेच्या अनुपस्थितीत देखिल आनंदाने जगणं शक्य आहे असं वाटतं.
केबलकार मधे जाणार्या लोकांच्या मनात फुकटात सुधारणा वापरण्यासाठी गिल्टची भावना असते,"अन्सेल्म म्हणतो - सगळ्यात भारी असा तो देव", मॉर्डन मार्व्हल हे भावनात्मक देवाचेच रुप वाटते आहे, सरळ साधे शास्त्र आहे त्यात काय ते मार्व्हलस्? ग्रँड कॅन्यनप्रमाणे - रोजगार, आनंद हा तर वारीमुळे पण मिळतो, मग तिथे हात जोडले काय आणि ग्रँड कॅन्यन समोर फोटो काढले काय?
विज्ञान असो किंवा नसो, वृत्तीत फरक पडणार नसेल तर कशाचाच उपयोग नाही, तुमच्या ह्या विस्कळित लेखावर माझा हा अति-विस्कळित प्रतिसाद.
लेखाच्या काही बाबींशी सहमत
लेखाच्या काही बाबींशी सहमत काही बाबी न पटणाऱ्या.
आषाढी, कार्तिकीला पायी वारी करणारे, शिर्डीला पायी जाणारे खूप जवळून बघितलेत. त्यातले अगदी काही नातेवाईक, मित्र देखील आहेत. पण मला कोणी विचारलं पायी वारीसाठी येतोस का? तर नम्रपणे नकार देतो. शरीराला त्रास देत परिक्रमा, पायी वारी करणं एका अर्थी हा वेडेपणा झाला, तर दुसरीकडे प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा, आवड म्हणून सोडून देतो. परिक्रमा करेन असं मला तरी वाटत नाही कारण तितकी मानसिक तयारीच झाली नाही, आणि उगीचच शरीराला कष्ट द्यावेसे वाटत नाही. आळंदी, शिर्डीला जायचंच असेल पायी वारी सोडून इतर पर्यायांचा विचार करेन. याच्या अगदी उलट- ट्रेक साठी तंगड्या दुखवायची, वेळप्रसंगी अवघडातले अवघड ट्रेक करायची माझी तयारी आहे. आता हा झाला माझा वेडेपणा किंवा माझी ट्रेकिंगची आवड.
हल्ली मात्र या लोकांचं खरंच कौतुक वाटायला लागलंय हे मात्र नक्की. १५-२० किंवा जास्त दिवसात काही शे किंवा हजार किलोमीटर अंतर कापणं हे सोपं काम नाहीयं. माणूस एवढा चालू शकतो? खाण्यापिण्याचं एखाद्यावेळेस जमवून घेता येतील पण इतर शारीरिक विधी, त्यांचं काय?? घरी पोहचायला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला तर आई काळजी करत असते किंवा घरचं कोणीहि बाहेर गेलं तर काळजी वाटतेच ना? नाही म्हणायला संपर्काची अनेक साधना आहेत पण अडचणीच्या वेळी संपर्क होईल, अशी खात्री देऊ शकतो का आपण?? 'गरजेच्या वेळेला फोन लागत नाही तुझा, चुलीत घाल तो मोबाईल'. अशी वाक्य सर्रास म्हटली जातात. घरातली म्हातारी आजी कुठल्या तरी नातसुनेला सांगत असते, मी बाळंतपणात पाट्यावर मसाला वाटायचे, धुणी धुवायचे, घरातला केर-कचरा, सगळी कामं करायचे. आमची कशी व्यवस्थितपणे झाली बाळंतपण. तुमच्या सारखे पेशल क्लास नव्हते लावले गर्भसंस्काराचे. म्हटलं तर म्हातारी बरोबर पण तोच न्याय नातसुनेला का लावावा? तिला नसेल कामाची सवय, काँप्लिकेशन्स असू शकतात म्हणून नातसूनेच चुकतंय असं म्हणायचं का? शेवटी तंत्रज्ञान, सोयी- सुविधा, नियम, राहणीमान, मान्यता यांच्याहि मर्यादा आहेतच. माणूस छोट्या मोठ्या गोष्टीतला आनंद कधी कधी अचीवमेंट समजायला लागतो. काही प्रमाणात बरोबर असलं तरीही कुठेतरी ते चुकीचंही आहे. शेवटी प्रत्येकाची ध्येय उद्दिष्ट वेगळी आहेत, कदाचित काहीजण झापड लाऊन फॉलो करत असतील तर काही डोळसपणे. दोघांच्याहि बाजू बरोबर असू शकतात फक्त समोरच्याची बाजू समजून घेता येत नाही किंवा घ्यायची तयारी नसते किंवा समजून सुद्धा आपलं तेच खरं करायची वृत्ती कदाचित उफाळून येऊ शकते. ( हीच गोष्ट नातेसंबंधांवर असेल तर त्याला वेगळंच वळण लागायचा पूर्ण स्कोप राहतो ). रायगडावरची 'रोप वे' सर्विस नो डाऊट चांगली आहेच. घरातलं कोणी वृद्ध माणूस असलं तर मी रोप वे वापरेन पण मित्रांसोबत गेलो तर नक्किच रायगड पायी चढून जाण्यात धन्यता मानेन. त्या वेळी कोण मित्र रोप वे ने जाऊ म्हटला तर नक्कीच त्याची टिंगल टवाळी करू.
या सर्व गोष्टींचा आपल्या स्वतःला कितपत त्रास करून घ्यायचा कि कानाडोळा करायचा हे आपण ठरवावं.
लेख आवडला
श्रद्धा असो वा अंधश्रद्धा ( खर तर हा शब्दच्छल आहे) माणसाला जगण्याचे बळ देते. ही गोष्ट नाकारता येत नाही. सोयी उपलब्ध असताना जाणीवपुर्वक गैरसोयीच्या वाटा चोखाळणारे कुठे तरी आंतरिक उर्मीला साद देत असतात. हे खर तर त्यांच कण्डिशनिंग असते याच्याशी मी सहमत आहे. त्यातुन मिळणार्या समाधानाची कल्पना आपल्याला करता येणार नाही. धाडसी उपक्रम म्हणुन याकडे पहायला नक्कीच हरकत नाही. वारीला मिळणारा उदंड प्रतिसाद हे काही केवळ भाविकतेचे लक्षण नव्हे. मिडियाने या इव्हेंट ला दिलेले ग्लॅमर हे त्याचे रहस्य आहे.जाहिरात वाले, राजकारणी याचा उपयोग करुन घेतात. यातील अर्थकारणही विचारात घेतले पाहिजे.
नर्मदेशिवाय निसर्गाची परिक्रमा करणारे देखील एक वेगळाच आनंद घेत असतात. लेख एक वेगळाच विचार करायला लावणारा आहे हे नक्की!
यावरुन मला एक आठवण झाली. गावाच्या शाळेमागे ओढा होता तिथे पावसाळ्यात विशेषतः पहिला पूर आला की मातकट लाल रंगाचे पाणी येई. तिथे एक यडा म्हाद्या होता. त्याला हे पाणी म्हंजे चहा वाटे. तो त्यात भाकरी बुडवून खात असे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
कर्मठपणा आणि जिद्द
लेख अतिशय आवडला. आपण अनेक गोष्टी केवळ जिद्द म्हणून करतो. प्रत्येक वेळी त्याचा काही उपयोग असतोच असं नाही. एव्हरेस्टवर चढून जाणं याचा तसं म्हटलं तर काय फायदा आहे? या लेखात तशा जिद्दीचा, धाडसाचा, नवीन विश्व पादाक्रांत करण्याच्या उर्मीचा गौरव केलेला आहे. ते करतानाच कर्मठपणापायी, निव्वळ पुण्य मिळण्याच्या कल्पनेने काहीतरी करण्यात काय हशील आहे असा प्रश्न विचारला आहे. या दोन्हीमध्ये जो नीरक्षीरविवेक साधला आहे ते या लेखाचं सामर्थ्य आहे.
का कोण जाणे, पण लोकांना कर्मठपणा आवडतो. कुठचेतरी यडपटासारखे का होईना पण नियम स्वतःवर लादून घेणाऱ्यांबद्दल खूप आदर असतो. म्हणून कोणीतरी तीन महिने एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली वगैरे की त्याचं ज्ञान काडीइतकंही वाढलेलं नसलं, तरी लोक त्याच्यापुढे नतमस्तक होतात.
पण त्याचबरोबर समाजातल्या समाजात कित्येक परिक्रमा चालू असतात. दोन लहान पोरं पदरी टाकून नवरा गेल्यावर आपली हौस मारून, घरचं काम आणि नोकरी करून, मुलांची आई आणि बाप होत जिद्दीने शिक्षण देणारी स्त्री अशीच परिक्रमा करत असते. तपश्चर्या करत असते. तिला फळ मिळतं ते कुठलं परलोकातलं नाही. मुलं वस्तीतल्या इतर पोरांसारखी वाया गेली नाही आणि मोठी, सुजाण, मिळवती झाली याचं समाधान, हेच फळ. नतमस्तक व्हावं तर अशा तपश्चर्येपुढे.
शेवटी प्रत्येकाचं समाधान वेगळ्या गोष्टीत असतं हे खरंच. पण काही परिक्रमा कौतुकास्पद असतात, अभिमानास्पद असतात, आणि दुर्लक्षितही असतात. तर काही परिक्रमा हे सगळं कशासाठी असा प्रश्न निर्माण करणाऱ्या असतात. लेखात हा भेद उत्तम रीतीने सांगितला आहे.
विस्कळीत विचार समजून
विस्कळीत विचार समजून घेण्याबद्दल आधी आभार.
मला जेव्हा वाटलं तर मी नर्मदा खोर्यात फिरायला जाईन पण अर्थातच यंत्रतंत्राची मदत घेऊनच! मला त्यात काहीही 'गिल्ट' येणार नाही. पण किंचित वाईट वाटतं ते बहुसंख्य लोकांबद्दल जे पापभीरू, देवभक्त असतात, ज्यांना धार्मिक, अध्यात्मिक कारणांसाठी नर्मदा परिक्रमा करावीशी वाटते पण प्रकृतीमुळे शक्य नाही किंवा इतर काही अडचणींमुळे सहा महिने किंवा ३ वर्ष काढणं शक्य नाही.
ऋ: चवीचवीने रसास्वाद घेण्याचा, गोष्टी करण्याचा इथे संबंध येत नाही. परिक्रमा करण्याला हजार वर्षांचा इतिहास असेल, वाहनं उपलब्ध असण्याला, १०० वर्षांचा आणि भारतात सहज उपलब्ध असण्याला २०-२५ वर्षांचा इतिहास आहे. चवीचवीने आस्वाद घेण्याबद्दल म्हणालास तर वाईन आणि कॉफी ही पेय्य पाश्चात्य चवीचवीनेच पितात.
चार महिने पाऊस पडत असताना बहुसंख्य जनतेला काम असायचं तेव्हा चवीचवीने गोष्टी करण्यातला अर्थ समजू शकतो. आज धरणांमुळेही शेतकरीसुद्धा वर्षभर कामात असतात.
अशोक पाटील: धन्यवाद.
इथे आणखी एक आठवतं ते म्हणजे व्हायकिंग्जच्या काळात असलेली सामुग्री वापरून त्यांच्याप्रमाणे सफरी करण्याचा उद्योग एका युरोपियन गटाने केला होता. काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, आता तपशील आठवत नाहीत. तेव्हाचे लोकं गुहांमधे कसे जगायचे, इंधन-इंजिनांशिवाय समुद्र कसे पार करायचे, वाळवंट कशी तुडवायचे याचा अभ्यास करण्यासाठी लोकं अशा प्रकारच्या मोहिमा उघडतातच. कदाचित अजून शे पाचशे वर्षांनी, एकविसाव्या शतकातले लोकं अंटार्क्टीकावर कसे जायचे याच्या मोहिमा काढल्या जातील. या संशोधक वृत्तीचंही कौतुक वाटतं! काही दिवस आधुनिक संस्कृतीपासून ज्यांना लांब जायचं आहे त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही. पण नर्मदेतून निघालेला ओघळही ओलांडायचा नाही यातल्या कडवेपणातून काय साध्य होतं हे मला समजत नाही. भटक्या माणूस नकाशा घेऊन, किंवा न घेताच, डोंगर दर्यांमधे भटकेल. त्यासाठी नर्मदेचंच खोरं हवं असंही नाही. शनिवार रविवार सह्याद्रीच्या रांगांमधे असे भटके दिसतातच.
श्रावण: आज म्हटलं तर सरदार सरोवर प्रकल्पही अपूर्ण आहे. खोर्यातल्या विस्थापितांचा पुरेसा विचार केला असता तर आज धरण, कालवे पूर्ण करणं अशक्य होतं का? गोदावरी, कृष्णा, कोयनांवर धरणं बांधून कोरडा दुष्काळ, पूर यांच्यावर काही प्रमाणात मात केलेली नाही का?
मनोबा: यज्ञांबद्दलचा तुझा आक्षेप मी समजू शकते. मी स्वतः यज्ञ करणार नाही. पण मला फिरायला जायचं असेल तर चातुर्मासाबद्दल मी थोडी साशंक आहे. कारण तिथे फिरायला वाटाड्या मिळेल का नाही हे माहित नाही. स्थानिकांशी संवाद न साधताच प्रवासाची मजा येत नाही. स्थानिक चातुर्मास पाळतात, तर आपणही पाळावा.
यज्ञाबद्दल मी असा समज करून घेतला की ३०० लोकांसोबत फिरायचं तर लोकशाही बरी. माझ्या ओळखीतले यदृच्छेने कोणतेही ३०० लोकं निवडले तर त्यांतले बहुसंख्य सश्रद्ध निघणार. बिनीवाले स्वतः कितपत सश्रद्ध आहेत हे मला माहित नाही. पण यज्ञ करून आपल्याला त्याचा काही फायदा होईल, असा विश्वास असेल तर त्यात विरोधाभास जरूर आहे. त्यातून, "तिथे जातच आहात (/आहोत) तर अमके विधी करा" असं सांगणार्या घरच्या लोकांना टाळणं सगळ्यांनाच जमतं असंही नाही. अर्थात यज्ञयागांबद्दल लिखाण आणि टेंबेस्वामींबद्दल चार शब्द न लिहीता फक्त मूर्तीपूजा-टाईप भक्तीभाव या गोष्टी मलाही खटकल्याच.
कोणी पुराण, महाभारतकालीन व्यक्ती आपल्याला तिथे भेटतील अशा विश्वासाला अंधविश्वास म्हणू नये काय? "आपला तो विश्वास" याबद्दल माझ्यापेक्षा जास्त चांगलं घाटपांडे काका लिहीतील.
शिवाजीच्या गडांवर अशा गोष्टी चालतच नाहीत का? खरंतर दोन अडल्ट्स, एकमेकांच्या संमतीने, आडोशाआड काय करतात हा तिसर्या माणसाचा प्रश्न असू नये. पण पावित्र्य जपायचंच असेल तर तिथे आडोसे न बांधलेले पुरतात. हनीमून साजरं केलं म्हणून पावित्र्य भंग पावत तर नैसर्गिक विधींनाही अटकाव करणार का? असं असेल तर सगळे गड कडीकुलपातच टाकावे लागतील. नर्मदेच्या पाण्याचा उपयोग नैसर्गिक विधींनंतरही होतोच. जिवंत प्राण्याच्या गरजा आहेत, त्यात काही वावगं नाही, तर मग त्याची रितसर सोय का लावली जात नाही?
ऐतिहासिक बांधकाम असेल तर तो डोंगर इतिहास जपण्यासाठी, नाजूक बांधकाम जतन करण्यासाठी संरक्षित करता येईल. लेखात उल्लेख केलेली ब्रुअरीसुद्धा याच कारणासाठी बंद आहे, आत जाता येत नाही, अगदी बघण्यासाठीही! पण डोंगरावर चढणारी माणसं तिथे हनीमूनसाठीच गेलेली असतात हा अट्टाहास का? पर्यटक डोंगरावर चढून फक्त हनीमून साजरं करतात का? कड्याच्या टोकावर बसून शांततेचा आनंद 'उपभोगणारी' माणसं अस्तित्त्वातच नाहीत का? शाळेतल्या मुलांना इतिहासाचं पुस्तक वर्गात शिकवण्यापेक्षा एखाद्या किल्ल्यावर चढवून शिकवलं तर जास्त योग्य ठरणार नाही का? पण सगळीकडे पावित्र्यभंगाचा बागुलबुवा दाखवून गोष्टी कड्याकुलपात का ठेवाव्यांत?
नर्मदा खोर्यात आजही वैविध्य दाखवणारं प्राणी, पक्षी आणि वृक्षजगत असेल. त्याच्या संवर्धनासाठी तिथे काही होतं का? या सर्वांना माणसांचा कमीतकमी उपद्रव होईल याची काळजी घेऊनही माणसांची सोय बघता येणार नाही का?
बिपिन: असहमतीबद्दल सहमती आहेच.
मी: केबल कार वापरताना फुकटात सुधारणा वापरण्याची टोचणी मला समजत नाही. रोज ट्रेनमधून जाणार्यांना वाहनांचं वेगळं कौतुक, अप्रूप का असावं? आपल्याला हवंय काय हे महत्त्वाचं आहे. एखाद्याला भटकण्यातच आनंद मिळतो, अशा व्यक्तीला रायगडाच्या टोकावर पोहोचून फार आनंद होणार नाही जेवढा गड चढताना, मुद्दाम रस्ता चुकवण्यात, पुन्हा तो शोधण्यात होईल.
विरोचन: भारतात फिरायचा कंटाळा येतो तो याचसाठी, शारीरिक विधींचं काय? उजाडायच्या आत खेड्यापाड्यांतल्या स्त्रियांना उठून आवरावं लागतं, त्यांना हे दु:ख चांगलंच माहित आहे. खेड्यांत कशाला, अगदी मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या बायका चांगलं सांगतील. नर्मदा परिक्रमा करणार्या स्त्रिया खूप कमी असतील ते शारीरिक बळ कमी पडतं म्हणून नाही, तर शारीरिक विधींच्या गैरसोयीचं काय म्हणून!
माफ करा, पण मला हा थोडा सेडीस्टपणा वाटतो. आमच्या वेळेला कुठे होते कॅलक्यूलेटर आणि कंप्यूटर! म्हणूनच तेव्हा विमानं नव्हती, म्हणूनच तेव्हा माणूस चंद्रावर गेलेला नव्हता, म्हणूनच तेव्हा मरियाना गर्तेत कोणतं प्राणीविश्व आहे हे माहित नव्हतं, म्हणूनच तेव्हा बाईला चूल आणि मूल सोडून आयुष्य नव्हतं आणि बाळंतपणात प्रचंड प्रमाणात स्त्रिया आणि बालकं मृत्युमुखी पडत होती. ज्या मुलीला लहानपणापासून कपडे धुणे म्हणजे दोन नळ इकडचे तिकडे करणे आणि चार बटणं दाबणे हे माहित आहे, तिच्याकडून गर्भार-बाळंतपणात कामाची अपेक्षा का? तीच मुलगी अगदी डिलीव्हरीच्या आदल्या दिवसापर्यंत डोकं खाजवत काहीतरी काम करत संगणकासमोर बसलेली असते ... डोक्याची ही कामं कधी आजेसासूच्या विश्वातही नसतात.
माझा मुद्दा हाच आहे. नेहेमीप्रमाणेच आताही जग बदलतं आहे. आपण तीच मूल्य घेऊन का बसतो आहोत? माणसाची शक्ती त्याच्या डोक्यात आहे, शरीर फारच दुबळं आहे. डोक्याला त्रास देण्याऐवजी शरीराला भलभलत्या हालअपेष्टा का कराव्यात? नर्मदेच्या खोर्यात भटकायचं आहे, तब्येत बनवायची आहे, आधुनिक जगातल्या कटकटी, काही काळ का होईना, विसरायच्या आहेत तर मग त्यासाठी नर्मदा न ओलांडणे, यज्ञयाग, भिक्षांदेही, आणि तत्सम कडवेपणा का? आपल्याला नक्की काय हवंय, कडवेपणा का आवडत्या गोष्टी करण्यातला आनंद?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एकतर माझा मुद्दा नीटसा मांदू
एकतर माझा मुद्दा नीटसा मांदू शकलेलो नाहिये बहुतेक. पुन्हा विस्ताराने प्रयत्न करतो
१. पारंपरिक मार्गांच्या ऐवजी अद्ययावत मार्ग वापरण्यात, किंव यंत्रांची मदत घेण्यात अजिबात गैर नाहि. नव्हे बहुतांश प्रसंगी ती घ्यावीच. मात्र ज्यांना पारंपरिक दृष्टीकोन आवडतो, रुचतो त्यांनी अद्ययावत मार्गात 'ती' मजा नाही म्हटलं तर ते अनेकदा मान्य केलं पाहिजे. अद्ययावत मार्ग / यंत्रांचा वापर न करण्यात जसे काहि श्रेष्ठत्त्व नाहि तसे तो करण्यातही फार पुरोगामित्त्व असण्याचा भ्रम बाळगु नये. मायक्रोवेव्ह चा वापर न करता चुलीवर वांगे भाजले जाते तेव्हा सुटणारा गंध, नंतर भरताला येणारी चव वेगळी असतो. त्याची स्तुती कोणी केली म्हणजे मायक्रोवेव्ह वापरणे हे चुकीचे होत नाही. मात्र या गोष्टींची तडजोड मान्य असेल तर मायक्रोवेव्ह वापरुन वेळेची केलेली बचत अधोरेखीत करायला चुलीवर भाजणे कसे वैट्ट आहे किंवा त्यात काय मोठेसे हा प्रश्नही गैर वाटतो. प्रत्येकाच्या प्रकृती व आवडीनुसार त्याला निर्णय घेऊ द्यावेत. ज्याता होणार्या भरीतापेक्षा उदरभरणात रुची आहे त्याने मायक्रोवेव्ह वापरावा ज्याला ते भरीत बनविताना होणारी प्रकीया महत्त्वाची आनि रसभरीत वाटते त्याने चुल वापरावी. दोन्हीही 'योग्य' आहे.
मुसु व अशोकरावांच्या प्रतिसादात जात्यावरच्या धान्याचे उदा आले आहे. आणि ते योग्यच आहे. यंत्रे असताना जात्यावरची गाणी आवडतात म्हणून जात्यावर धान्य दळायला सांगणे गैर वाटले तरी समजा एखादा खरंच जात्यावर दळून ती गाणी म्हणून तो आनंद घेऊ इच्छित असेल तर त्यात प्रतिगामी किंवा चुकीचे काहिच वाटत नाही.
२. दुसरे असे की लेखात असा भाव वाटला की आपल्याकडे या गोष्टीचा बाऊ का केला जातो किंवा आपल्याकडे पाश्चात्यांसारखा आधुनिकतेचे पटकन स्वागत का होत नाही? याचे उत्तर माझ्यामते, वर म्हटल्याप्रमाणे गोष्टी करण्यापेक्षा त्याची प्रोसेस अधिक आवडण्याकडे कल असण्याचे जाणवते. आपल्याकडे गडावर जाणे यापेक्षा तो चढण्याला महत्त्व आहे. पंढरपुरला जाण्यापेक्षा वारी करण्याला महत्त्व आहे. एरवी आधुनिकतेची कास धरणार्या पाश्चात्यांकडेही तु उल्लेख केलेल्यांपैकी वाईन अजुनही तरूणींच्या पायांनी तुडवलेली असल्यास अधिक चवदार लागते म्हणतात
आणि या सगळ्यात (म्हणजे आधुनिक यंत्रे वापरण्यात किंवा न वापरण्यात) योग्य -अयोग्य काहिच नाहि. काहिंच्या पिंडाला घडवणे आवडते काहिंच्या पिंडाला घडवलेले प्रोडक्ट. या दोन्ही प्रकार आवश्यक आहेतच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
द्वैत का?
प्रॉडक्ट आणि प्रोसेस या दोन वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व देण्याबद्दलचा मुद्दा तितकासा पटला नाही. माझ्या मते हे द्वैत अस्तित्वात नाही. त्याचमुळे पाश्चिमात्य व पौर्वात्य वेगवेगळ्या विचारसरणीही अस्तित्वात नाहीत. प्रत्येकच जण प्रॉडक्टलाच महत्त्व देतो कारण शेवटी प्रोसेस हे देखील एक प्रॉडक्टच आहे. किंवा दुसऱ्या अर्थाने एखादं प्रॉडक्ट उपभोगणं हीदेखील एक प्रोसेसच असते.
ध्येय व मार्ग असं द्वैत करण्यापेक्षा उत्तम दर्जाचं ध्येय व कनिष्ठ दर्जाचं ध्येय असा फरक करणं महत्त्वाचं. निसर्गाचा आनंद घेणं, भरपूर मनमोकळं चालणं, जगाच्या इतर बंधनांपासून काही काळ मोकळं होणं ही उत्तम ध्येयं आहेतच. नर्मदा परिक्रमेने ती साध्य होतात, तशीच गढवालमधल्या ट्रेकनेही साध्य होतात. मात्र ट्रेकविषयीच्या वर्णनांत या निखळ आनंदाचा उल्लेख होतो, तर नर्मदा परिक्रमेला एक गूढतेचं, चमत्कृतीचं वलय प्राप्त होतं. 'नर्मदेचा ओहोळ ओलांडायचा नाही' हा नियम पाळल्याने नक्की काय आनंद मिळतो हे कळत नाही. याउलट 'या सुंदर निसर्गरम्य स्थळात मी कचरा करणार नाही' म्हणून प्लास्टिकचा सगळा कचरा आपल्याबरोबर वागवत शहरात पोचल्यावर योग्य ठिकाणी तो टाकण्याचे कष्ट घेण्यामागची भावना मी समजू शकतो.
ह्म्म्म
"प्रोसेस हे देखील एक प्रॉडक्टच आहे" असं म्हटल्यावर "सारं विश्व एकाच बिंदूतुन जन्माला आल्याने, शेवटी सारे एकच आहे" असे म्हटल्यासारखे वाटले
असो आपल्या मुलभुत गृहितकातच दुमत असल्याने वरच्या मनोर्यावर चर्चा करत नाहि.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वांग
माझं मत असं आहे. वांगं चूलीवर भाजून चांगलं लागत असेलही, वासही मस्त पसरत असेल. पण म्हणून प्रत्येक वेळेला वांगं चूलीवरच भाजणार का? हो म्हणणारे मला विचित्र वाटतील.
नर्मदा परिक्रमेच्या आजूबाजूचा परिसर चालत बघण्यासारखा असेलही पण म्हणून संपूर्ण परिक्रमा सलग करायला हवी असे नाही. भारतात असाच पाहण्यासारखा परिसर दुसरीकडे नसेल असेही नाही. तेच गडावर चढण्याबद्दल. गड चढून जाण्यात मजा असतेच, पण म्हणून प्रत्येक वेळेला गड चढूनच गेले पाहिजे असे नाही.
-Nile
मुद्दा क्र १: "रोप वे" बनवला
मुद्दा क्र १: "रोप वे" बनवला आहे आता पायवाटेची गरज नाही तर तिथे वृक्ष लावून टाका असा प्रकार घडत नाही. म्हातारे, अधू (आणि माझ्यासारखे तक्रारखोरही) लोकांनाही नर्मदा परिक्रमा, प्रदक्षिणा करायची असेल तर त्यांच्यासाठी रस्ता सुकर केला म्हणून पायी जाण्याचा रस्ता बंद करण्याची गरज नाही. पण पायी जाणार्यांचेही देहधर्म असणार. त्याची व्यवस्थित सोय लावली तर कदाचित अधिक लोकं अशा गोष्टी करतील. कदाचित संपूर्ण कुटुंबच एखाद्या उन्हाळ्याच्या सुट्टीत परिक्रमेचा काही भाग करतील. लहान मुलांचं भूगोलाचं थोडं शिक्षणही तिथे होईल, साहसाची आवड कदाचित निर्माण होईल...
मुद्दा क्र २: गडावर जाणे यापेक्षा चढण्याला महत्त्व असेल तर तसंच महत्त्व रस्ता बांधण्याला का असू नये? रस्ता बांधून झाल्यानंतर झालेल्या आनंदापेक्षा तो बांधताना आलेली आव्हानं पार पाडण्यात मिळालेला आनंद मोठा वाटू शकतो. पुन्हा ज्याने त्याने आपापली सोय, आवड वगैरे बघावी.
बाऊ कर्मकांडांचा आहे, याबद्दल माझी तक्रार आहे. नर्मदेच्या खोर्यात ज्यांना भटकायचं आहे त्यांनी चिक्कार भटकावं. नर्मदा उजवीकडेच हवी, तिच्यातून निघालेला ओघळही ओलांडायचा नाही, शेजारच्या गावातून पाव-लोणी विकत आणून खायचं नाही वगैरे वगैरे इसवीसनापूर्वी बनवलेले नियम का पाळावेत?
अवांतरः मायक्रोवेव्हमधे भाजलेलं वांगं "मला" आवडत नाही. आगीत भाजलेल्या वांग्याची चव ग्रिल केलेल्या वांग्यालाही नाही. आणि त्यातून विशिष्ट प्रकारच्या (आता कोणती लाकडं ते आठवत नाही) लाकडांवर भाजलेल्या वांग्याला लाकडाची जी चव लागते ती इतर कशालाही येत नाही. पण म्हणून ग्रिल केलेल्या वांग्याचं भरीत हे भरीतच नाही हे सांगण्याचा अधिकार कोणालाही का असावा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भावना?
तुमचा लेख उत्तम आहे, पण तुमचे काही प्रतिसाद बघता, परिक्रमा ह्या विषयाबद्दल तुम्हाला विषेश चीड असल्याचं जाणवतं, हे सगळं भावनेतुन आल्यासारखं वाटतं. हे नियम म्हणजे कायदा आहे का? कि केले कि ते पाळलेच पाहिजेत? कोणि कशाला काय म्हणावं ह्यावर तुमचा आक्षेप वैचारिक वाटत नाही, त्यामुळे तो वयक्तिक वाटतो.
अधिकार मान्य केला कि असतो, तोपर्यंत ते फक्त एक मत असतं.
नाही, मला तुच्छतावादाचा राग
नाही, मला तुच्छतावादाचा राग आहे. आपण काही विशेष केलं आहे, ज्याला मी कडवेपणा म्हणते, त्यामुळे इतरांसाठी कायदे, नियम बनवण्याचा आम्हाला अधिकार आहे, आणि असे नियम न पाळणारे लोकं क्ष्रूद्र आहेत असा भाव असण्याचा मला राग येतो. अर्थात हे नियम, कायदे योग्य आहेत का अयोग्य हे ठरवून गिल्टी न वाटण्याइतपत विचार मला करता येतो. पण अनेकांना इतरांच्या अधिकाराला चॅलेंज देता येतं हे समजत नाही. या लोकांच्या भावना दुखावण्याचा अधिकार इतरांना का असावा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उर्मटपणा
सहमत.
विवेक हा एक गुण नसल्याने किंवा कमी प्रमाणात असल्याने उर्मटपणा निर्माण होतो असे माझे निरीक्षण आहे, पण बहुदा उर्मटाशी उर्मटाप्रमाणे वागल्यास दोघांना बरं वाटतं असंही एक निरीक्षण आहे.
अनेकांना उर्मटांशी उर्मटपण वागता येत नाही हे खरे आहे त्यामुळे त्यांची मने दुखावतात हेही खरे आहे पण दुसरा रास्त पर्याय नाही हेही खरचं.
पण माझं वैयक्तिक मत असं असेल कि ह्या चॅलेंज न करता कुढत बसणार्या लोकांपेक्षा असे उर्मट परवडतात, अर्थात अशा कमकुवत लोकांना वाली हवा हे खरं पण ते कमकुवत आहेत ही जाणिव निर्माण करणंही गरजेचं आहे.
हेच...
हेच. हे असंच लेखात अपेक्षीत होतं. तिथं किंचित अवास्तव विधानं आली म्हणून विचारलं होतं.
सरकारी अनास्था इ.इ. कारणं आणि
सरकारी अनास्था इ.इ. कारणं आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. माणसाने अनेक बाजूंची केलेली उपेक्षा हा विज्ञान-तंत्रज्ञानाचा दोष नाही. माझ्या विचारधारेचा हेतू संपूर्णतः तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. धरण पूर्ण झाल्यावर कालवे कच्छच्या काही भागांपर्यंत गेले की परिक्रमा पूर्ण होण्याचा कालावधी बदलणार का?, अशा प्रकारचा शैक्षणिक प्रश्न मला आहे. पुराणात वर्णन केलेली नर्मदा अशी नाही म्हणून(ही) धरण-कालव्यांना विरोध करणार का?
नर्मदा परिसरात मी कधीही गेले नाही, त्यासंबंधात माझं फारसं वाचनही नाही. आज भारतात उपलब्ध होऊ शकणारं तंत्रज्ञान पहाता परिक्रमेसंदर्भातल्या धारणांचा पुनर्विचार करावा एवढीच इच्छा आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तर
चांगला प्रश्न आहे. जाणकार, बिनीवाल्यांसह, उत्तर देतील.
माझे मत: ती परिक्रमाच अस्तित्त्वात राहिलेली नाही. कारण नर्मदा ती राहिलेली नाही. बाकी शून्य.
मी करत नाही. हिंदुत्त्ववाद्यांची भूमिका जाणून घेणं आवडेल. विशेषतः बिनीवाले यांचीही भूमिका जाणून घ्यायला आवडेल. आणि इथं त्यांनी पुराण नाकारलं तर ते इतरत्रही नाकारतील का हेही पहायला आवडेल. पण हे अवांतर आहे.
वर उत्तर दिलं आहे.
लेख
लेखाची शैली आवडली. दिलेले दाखले चपखल आहेत. वाचकांच्या प्रतिक्रियाही आवडल्या.
माझे काही विचार.
शतकानुशतके जी प्रवासवर्णनं लिहिली गेली , ज्या युद्धांच्या रम्य कथा लिहिल्या गेल्या , संस्कृतींची जी परिवर्तने झाली ती आज वाचताना आपल्याला मजा का येते ? ती वाचनीय का रहातात ? "हे तर काय , इतकं सोप्पं तर आहे, यात काय इतकं ?" अशी आपली प्रतिक्रिया का नसते ? उत्तर सोपं आहे : आपण अशा स्वरूपाचं वाचन करताना त्या काळाचे संदर्भ मनात ठेवून वाचतो. त्या काळची ज्ञानविज्ञानाची प्रगती याचे संदर्भ आपल्याला (सर्वसाधारणपणे) ठाऊक असतात. थोडक्यात, "अमुक अमुक पॅरामीटर्स असे आहेत. आता पहा या खेळाची गंमत." असं मनात ठेवून आपण या अनुभवाना सामोरे जातो. विज्ञान-तंत्रज्ञानाची परिमाणे बदलली तरी माणसाच्या विजिगिषु वृत्तीची, त्याच्यातल्या न शमणार्या कुतुहलाची , साहसाची मूलभूत प्रवृत्ती ही एकच आहे. या आणि अशा गोष्टींमुळेच डीएनए चा शोध कसा लागला , किंवा एव्हरेस्ट् पहिल्यांदा कसा सर केला गेला किंवा नंदनने कुठेतरी वर्णन केलेल्या पहिल्या महायुद्धावरच्या जर्मन सैनिकाने लिहिलेल्या पुस्तकाची वर्णने आजही अत्यंत वाचनीय होतात.
मात्र , पु ल देशपांडे यांनी कुठेसं म्हण्टलंय की " मी लहान असताना जात्यावरच्या ओव्यांच्या अनेक मधुर आठवणी माझ्यापाशी आहेत. त्याबद्दल मी लिहितो सुद्धा. मात्र आजही कुणी घराघरातून जाते काढून दळत बसावे असे मी कुठे सुचवलेले नाही." या लेखातल्या विचारांचा रोख या अशा प्रवृत्तीकडे आहे अशी माझी समजूत आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
उत्तम
लेख आणि त्या अनुषंगाने झालेली चर्चा आवडली. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहितोच, तूर्तास ह्या 'आधी हाताला चटके'च्या मानसिकतेमागची कारणीमीमांसा सांगणारा हा दुवा पहा -
http://en.wikipedia.org/wiki/Hazing#Psychology.2C_purpose.2C_and_role
लेख आवडला.
लेख अणि त्यात व्यक्त केलेले विचार आवडले.
मला वाटतं की जेंव्हा देहाला त्रास सोसून एखादं ध्येय आत्मसात केलं जातं तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद हा जास्त उच्च प्रतीचा असं मानायची माणसाच्या मनाला एक प्रकारची आवड असते. नर्मदा परिक्रमा किंवा पंढरीची वारी धार्मिक भावनेने पुण्य मिळवण्यासाठी करणार्यांची एक मानसिकता असते, निर्जळी उपास करणार्यांचीही एक मानसिकता असते पण त्यातील धार्मिक भाग जरी बाजूला ठेवला तरी निव्वळ मनाच्या आनंदासाठी शेकडो मैलांचे ट्रेक तुडवणार्या आणि योसेमिटीमध्ये जाऊन एल कापितानचा कडा चढणार्या रॉकक्लाईंबर्सचीही मानसिकता थोड्याफार प्रमाणात तशीच असते. घराच्या गच्चीवरून सूर्योदय बघण्यात गैर काही नाही पण तोच सूर्योदय बघण्यासाठी गावाबाहेरचा डोंगर चढून सूर्योदयापूर्वी तिथे पोहोचण्यात एक विशेष आनंद असतोच!
विज्ञानाने माणसाला त्याचं जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक साधनं दिली आणि त्यांचा वापर करण्यात काहीच कमीपणा नाही. अणि त्यांचा वापर न करता जुन्या पद्धतीनेच एखादी गोष्ट केली म्हणजेच ती खरी असं म्हणण्यातही काही अर्थ नाही. फक्त नवीन मार्गाने एखादी गोष्ट करतांना त्या जुन्या गोष्टीमधील गुणवत्ता कमी होत नाही ना, याची काळजी घेणं महत्वाचं!
थोडक्यात चिमटा वापरून हाताला चटके न बसू देता भाकरी बनवणं चांगलंच फक्त ती भाकरी सगळीकडून नीट रसरसून फुगतेय आणि कुठे जळकी/ कच्ची रहात नाहिये याची खात्री करून घेतली की मग आपल्या आईच्या हातच्या भाकरीच्या आठवणीने (नवर्याला)गदगदून जायला होणार नाही!
फक्त नवीन मार्गाने एखादी
हे आवडलं.
"तू दाखव पाहू तुझ्या आईची रेसिपी," असे ड्वायलाक मारून स्वयंपाकघरात काम चालून जातं. बोलणार्याची वाळूही खपते याचा मला चांगलाच अनुभव आहे.
नंदन,
हा मुद्दा मान्य आहे. पण प्रत्येकाचं साध्य एकच असतं का? दुसर्याने जे मिळवलं आहे तेच्च मलाही हवं आहे अशी मानसिकता का तयार होते? एखादी गोष्ट शेजारच्याला चांगली जमते म्हणून आपल्यालाही ते जमलंच पाहिजे, अशी वृत्ती का निर्माण होते? याचा उत्क्रांतीशी काही संबंध असेल का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
ह्या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत असं मला वाटतं. रोजच्या जीवनातील गोष्टींकरता मानसिकता वेगळी असते. साहसाकरता करण्याच्या गोष्टींची मानसिकता वेगळी असते आणि काहीतरी आध्यात्मिक वगैरे मिळवण्याच्या हेतूने काहीतरी करणं याची मानसिकता वेगळी.
रुळलेल्या तंत्रज्ञानाला विशेष विरोध होत नाही. चूलीच्या भाकरीची चव गॅसवर येत नाही असे म्हणणारे दिसले तरी गॅसची शेगडी काढून चूल बसवा म्हणणारे विरळाच. (बाकी चूलीवरच्या भाकरीच्या आठवणीत रमणार्यांना त्या फक्त खाण्याचाच अनुभव आहे असे माझे निरिक्षण आहे.) पण एखादे नविन तंत्रज्ञान रुळताना मात्र त्याला असा विरोध होतो. जीपीएस आलं की स्मरणशक्ती कमी होते म्हणणारे दिसतात, फोन आला की प्रत्यक्ष जीवनात गाठीभेटी कमी झाले म्हणणारे दिसतात, कॅल्क्युलेटर्स आले की पाढे पाठ नाहीत तुमचे म्हणणारे दिसतात इत्यादी.
साहसाच्या गोष्टी करायला अनेकांना आवडतं, मलाही ते आवडतं. मला विचाराल तर रॉक क्लाईबिंग करताना मध्यावर कुठेतरी अडकलात, खाली ही जाता येत नाही, वरही जाता येत नाही अशी स्थिती असेल तर फार भारी वाटतं, असंच मी सांगेन. योसेमीटीचा सरळ वर जाणारा 'हाफ डोम' दोरी शिवाय चढून जाणारा, माझ्याच वयाचा, अलेक्स हॉनल्ड अगदी हिरो वगैरे वाटतो. (इथे पहा: http://www.youtube.com/watch?v=leCAy1v1fnI ) पण तरीसूद्धा मी असं काहीतरी करण्याचा विचारही डोक्यात येत नाही. पण प्रत्येकाला त्याचं 'अड्रेनलीन' वाहण्याकरता काय करावं लागतं हे वैयक्तिक आहे.
अचाट लोकांना काय केल्याने हवं ते थ्रिल मिळतं याच्या शोधात एक जण निघाला आणि त्याने त्यावर डिस्कव्हरीवर डॉक्युमेंटरीही बनवली. अमेरीकेतील भन्नाट रोलर कोस्टर्स, व्हर्टिकल ड्रॉप्स, बंजी जंपीग, शुमाकर बरोबर एफ-१ गाडीतून, रॅली कारमधून अगदी एफ-१६ या अमेरीकाच्या प्रसिद्ध विमानात सुद्धा बसून आला! ती डॉक्युमेंटरी खरंच बघण्यासारखी आहे. बहुतेक त्यातला एक भाग इथे वाचता येईलः http://www.thefreelibrary.com/ADRENALINE+RUSH%3A+The+need+for+speed%3B+O...
त्याशिवाय, वरती नंदनने दिलेल्या दुव्यात म्हणल्याप्रमाणेही अनेकांची धारणा असते, विशेषतः आध्यात्मिक मानसिकता असलेल्यांची. जेवढा स्वतःला त्रास होईल तितकं चांगलं हे गणित आणि असले थ्रिल्स केल्यावर मजा येते हे परस्पर विरुद्ध टोक आहे. नर्मदा परिक्रमा केल्यावर करोड रुपये, सुख चैनीच्या सगळ्या गोष्टी वगैरे मिळतील अशी 'डील' मिळाली तर त्या परिक्रमेला सद्ध्या आहे तेव्हढं महत्त्व राहील असं मला वाटत नाही. (त्यावर रिअॅलीटी शो निघतील किंवा माझ्यासारखे अनेक लोक करोड रुपये मिळवायला जातील हा भाग वेगळा! )
वयाची पन्नाशी साठी झाली आहे, आयुष्यातील पुरेसं जगून झालं आहे, मिळवायचं ते मिळवलं आहे अशा परिस्थितीत नर्मदा परिक्रमेलाच काय भारत भ्रमणाला कोणी गेलं तर एकवेळ समजू शकेल. अर्थात कधी जायचं कशाला जायचं हा वैयक्तिक प्रश्न झाला. खरं तर नर्मदा परिक्रमा इतकी वर्ष झाली लोक करताहेत, त्यातला (पायी चालण्यातला सोडून) इतर खडतरपणा अजून किती शिल्लक असेल असा प्रश्नच आहे.
-Nile
परिक्रमा वगैरे
परिक्रमेवरचे लेखन हा मुळातच एक किंचित भंपक प्रकार आहे. तिथं मारुती भेटतो किंवा नर्मदा भेटते वगैरे गोष्टी तर केवळ अलंकारिक असतात. अश्वत्थामा नर्मदेच्या परिक्रमेत कसा काय भेटतो, हे मला तरी कळलेलं नाही. कारण अस्तंभा (किंवा अस्तंबा) हे परिक्रमेच्या मार्गातच नाही. हां, आता आज काल लोक परिक्रमा करत तळोद्यातही जातात हा भाग वेगळा. त्यांना अश्वत्थामाच काय, पाची पांडवी, शंभर कौरव, त्यांची पिल्लेबाळेही भेटत असावीत. शबरीही भेटावी कुठं तरी. पण परिक्रमेत ते अभिप्रेत नाहीच. परिक्रमेचा अनुभव पूर्ण वैयक्तिक (इनडिव्हिज्युअलिस्ट मंडळींनी येथे समाधानी व्हायला हरकत नाही) असतो. त्याचे सार्वत्रिकीकरण शक्य नसते, आणि म्हणून त्या अनुभवाचे वर्णन करून त्या आधारे तीच परिक्रमा म्हणण्यातही अर्थ नसतो.
नर्मदेची परिक्रमा मी केलेली नाही. नर्मदेची तिच्या प्रवाहाच्या पश्चिमेच्या टप्प्यातील बदलती रुपं मी पाहिली आहेत. नर्मदेच्या किनारी तुला 'असा काही' अध्यात्मिक अनुभव आला का, असं मला बऱ्याच जणांनी विचारलं. जालावरही त्यापैकी एक दोघे आहेत. त्यांना मी दिलेलं उत्तर आजही कायम असतं, 'मला असा अनुभव शब्दांत सांगता येणार नाही.' कारणं दोन - माझ्याकडे ते शब्द नाहीत, आणि तो शब्दांत सांगायचा नसतोही. तो माझा अनुभव आहे. तिथं मला मानसीक शांतता लाभते हे खरं आहे. त्याची कारणं नर्मदेचं सान्निध्य, निसर्ग ही आहेत, त्याचप्रमाणे शहरी गोंगाटाचा अभाव हेही आहे. आणखी एक कारणही संभवतं, मी पूर्ण ईश्वरवादी किंवा निरिश्वरवादी नसल्याने माझ्या मानसीक धारणा किंचित अशा मानसीक शांतता वगैरेच्या मान्यतेच्या कलाच्या आहेत. हे कारण नाकारण्यात काहीच अर्थ नाही. पण हे पूर्णपणे वैयक्तिक आहे. नर्मदेच्या त्याच किनाऱ्यावर आदिवासींच्या जगण्यातील 'वंचना' पाहून एखाद्याला ती शांतता लाभणार नाहीच. एखाद्याला त्यातील 'समृद्धी' दिसून ती शांतता लाभेलही. असे कित्येक साधू तिथं तशीच शांतता मिळवून, किंवा तिची आस धरून राहतात हे सार्वत्रिक सत्य आहे. शांततेचा हा शोधही अनेकदा अशांत असतो, हे भान ज्यांना असते ते साधू बरे. बाकी गेले उडत. अशी शांतता पुस्तकं वगैरे लिहून व्यक्त करणं समजू शकतो. पण तो परिक्रमेविषयीचा सिद्धांत नव्हे, उपपत्तीही नाहीच. तिचे स्थान त्या पुस्तकाच्या आस्वादापुरतेच मर्यादित असते.
शूलपाणीच्या जंगलात* परिक्रमींना लुटतात, असं आजही सांगतात. तसं झाली की म्हणे परित्याग पूर्ण होतो. हा तर सरळसरळ सामाजिक स्थितीच्या संदर्भातील भंपकपणा आहे. लूट ही लूटच आहे. असल्या लुटीवरूनच तर तिथं राहणाऱ्या आदिवासींना लुटारू म्हटले जाऊ लागले (त्यामागेही इतर सामाजिक कारणे आहेतच, पण ते अवांतर होईल). तर, शूलपाणीच्या जंगलातील खडतरपणा हा एरवीही असू शकतोच. त्यामुळं परिक्रमेचं मूल्य कमी होत नसतं, किंवा इतर ठिकाणं परिक्रमेच्या संदर्भात उणी नसतात.
नर्मदेला उजव्या बाजूला ठेवत तिला दृष्टीआड न करता, किंवा सतत दृष्टीसमोर ठेवून, केलेली तिची प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा, असा परिक्रमेचा अर्थ आहे, हे एका परिक्रमीकडूनच ऐकले होते. ते खरे आहे, असे म्हटले तर (आणि मी ते मानतोही) बिनीवाले वगैरेंनी केलेल्या प्रदक्षिणेचा अर्थ प्रदक्षिणा इतकाच राहतो. त्या प्रदक्षिणेला परिक्रमेच्या चौकटीत बसवून काही विश्लेषण करणे हे म्हणजे कंपेअरिंग अॅपल टू ऑरेंज असं आहे. बिनीवाल्यांनी असं लिहिलं असतं की 'तशीच परिक्रमा करण्याची गरज नाही', तर मी समजू शकलो असतो. पण या गृहस्थांनी त्यांच्या 'परिक्रमे'त यज्ञयाग केले आहेत आणि त्याला ते महत्त्व देत त्यांच्या प्रदक्षिणेला परिक्रमा ठरवतात हे वाचून हसू आलं. कारण परिक्रमेत हे असले यज्ञयाग हे केवळ अवांतर आहे. बिनीवालेंच्या 'परिक्रमे'त नर्मदेचं दर्शन होणार नाही, अशी अनेक स्थानं आहेत. त्यामुळं तिला त्या कष्टदायक, खडतर वगैरे 'परिक्रमे'च्या संदर्भात पाहणे चुकीचे आहे. नर्मदेची बिनीवाले स्टाईल प्रदक्षिणा करता येते इतकेच यातून शिल्लक राहते. मग ती आपल्या मोटारीतून केली काय किंवा भाड्याने मोटर ठरवून केली काय! सारखेच.
परिक्रमा किंवा वारी यात त्या-त्या काळच्या माणसाने एक सामाजिक प्रक्रिया घडवली आहे हे समजून घेतले तर परिक्रमेकडे किंवा वारीकडेही अधिक विशुद्ध दृष्टीनं पाहता येतं. अध्यात्म हा वैयक्तिक मामला आहे, तो वैयक्तिकच ठेवावा हे बरं.
*हे नाव शूलपाणीश्वर किंवा शूलपाणेश्वर या मंदिराच्या नावावरून पडलंय. शूलपाणीश्वर हे स्वयंस्वयंभू शिवलिंग. स्वतः 'शंकरानं कुठल्या तरी राक्षसाचा 'वध' केल्यानंतर रक्ताळलेले त्रिशूल स्वच्छ करण्यासाठी नर्मदेत बुडवलं. तेव्हा त्याला चिकटून हे शिवलिंग बाहेर आलं. त्याची स्थापना त्याने तेथेच केली' अशी त्यामागची कथा आहे. शंकरानंच स्थापन केलेलं म्हणून स्वयंस्वयंभू. स्कंद (की स्कंध) पुराणात म्हणे या मंदिराचा अस्त कसा जलसमाधीत होणार याचेही वर्णन आहे. आणि ते बुडून अस्त पावणार हे पुराणातील म्हणणे 'खरे' 'ठरले'. कारण हे मंदिर सरदार सरोवराच्या पाणलोटात बुडाले, मग गुजरातने त्याचे पुनर्वसन गुजरातमध्ये गरुडेश्वराच्या जवळ केले. बहुदा पुराणात पुनर्वसन नाही.
अरे रे!
हे पहा, हे लोक भेटण्याकरता श्रद्धा लागते, विश्वास लागतो. तुम्हा अपूर्ण इश्वरवाद्यांना कशाला भेटतील हे लोक? "श्रद्धावंत कसे बनाल?" हे आमच्या गुर्जींनी लिहलेलं पुस्तक वाचा.
-Nile
!
!
प्रउआ
प्रउआ
शब्दाशब्दाशी सहमत.
शब्दाशब्दाशी सहमत.
बिपिन कार्यकर्ते
बिनीवालेंनी त्यांच्या
बिनीवालेंनी त्यांच्या प्रवासाला काहीही नाव द्यावं, लोकांनी त्यांच्या प्रवासाला काहीही नाव द्यावं. तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न नाही. बिनीवाले तिथे फिरले, स्थानिकांशी गप्पा मारल्या, आणि त्याबद्दल त्यांनी काही लिहीलं तर मला वाचायला जास्त आवडेल. ईशान्येकडच्या राज्यांमधे फिरून त्यांनी लोकप्रभेतच एकेकाळी लिखाण केलं होतं, तसे लेख!
हे असं आणि एवढंच असेल तर मग बाकीचा कडवेपणा निरर्थक समजावा का? नर्मदा ओलांडताना नर्मदा दिसतही रहाणार आणि उजवीकडेही रहाणार. भिक्षांदेही करायला लोकांच्या घरी गेलं तर नर्मदा दिसणार कशी? तांत्रिक तपशीलात मला जायचं नाही.
बाकी शांतता वगैरे म्हणाल तर ती मला माझ्या आजोळीही मिळत असे. ठाण्यापासून दोन-अडीच तासांचा प्रवास आणि घरच्या परसात एखाद्या झाडावर चढून बसायचं. ही अशी शांतता निदान मलातरी फार काळ सहन होणार नाही. थोडा वेळ, दिवस बरं वाटेल आणि नंतर डोक्याला खुराक मिळावा म्हणून मी सरळ शहरात येऊन नेहेमीच्या उद्योगांना लागेन. ज्यांना अशी शांतता फार आवडते असे लोकं शहरांमधून खेड्यांत जातात, नर्मदेच्या खोर्यात जातात नाहीतर सर्वसंगपरित्याग करून एखाद्या ऑप्टीकल टेलिस्कोपच्या ठिकाणी नोकरी धरतात.
निळ्या: तुझा प्रतिसाद आवडला, शेवटचा परिच्छेद विशेषतः!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
वैयक्तिक
प्रतिसादातील काही मुद्यांशी सहमत नाही. पण परिक्रमा हा पूर्णपणे वैयक्तिक विषय असल्याने यावर अधिक चर्चा करण्यात मला अर्थ दिसत नाही. परिक्रमा चालू राहील. कडवी चर्चाही चालूच राहील. माझी त्याला हरकत नाही.
लेख आवडला
अदिती, मी जरा उशीरानेच हा लेख पाहिला आणि आधीच बर्याच लोकांनी मला जे म्हणायचंय ते लिहून झालंय. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण लेख आवडला हे सांगण्याकरता मुद्दाम हा प्रतिसाद टंकतेय.
लेखातले विचार अतिशय मुद्देसूद आणि तर्कशुद्ध आहेत. तसेच ते पटतील असेच मांडले आहेत. तरी जिथून हा लेख लिहायची प्रेरणा मिळालीये ते बघून किंचित असहमती दाखवावीशी वाटते.
नर्मदा परिक्रमा हे प्रकरण एकदाचे आटोपून टाकायचे म्हणून करायचे नसून अनुभवाची पोतडी भरून घेत तो परिसर पादाक्रांत करायचा हा हेतू असावा. त्याला आध्यात्मिक रंग नंतर चढवला गेला असेल असं वाटतं. त्यामुळे ज्याला फक्त नर्मदेलाच एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे त्याने सायकलवर, कारने किंवा बसने कशीही केली तरी काय फरक पडतो? पण ज्याला हा सर्व परिसर सावकाश (पुरेसा वेळ देवून हा अर्थ अपेक्षित) फिरून तेथिल समाजजीवन जाणून घेण्यात तसेच निरनिराळे अनुभव घेण्यात रस आहे त्याने स्वखुशीने पायी परिक्रमा केली तर त्यात विचित्र किंवा विक्षिप्त असं काही वाटत नाही.
तेच रायगडाच्या बाबतीत! गडावरच्या वाटा शोधत, वेगवेगळ्या उंचीवरचे वेगवेगळे बदल लक्षात घेत आणि सुंदर देखाव्यांचा आनंद हळूहळू घेत घेत वर पोहोचण्याचे समाधान वेगळे आणि शिवरायांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या रायगडाला भेट देण्याचे समाधान वेगळे. प्रत्येकाचे तेथे जाण्याचा आनंद आणि कारण भिन्न असतील. जसं तुझं तिथे जाण्याचं कारण तिसरंच होतं आणि त्याकरता रोप-वेची सुविधा न वापरणं शक्यच नव्हतं.
पण अर्थातच माझे आजोबा/पणजोबा शेजारच्या गावात शेतातून चालत जायचे म्हणून मीही आज तसं करणं मूर्खपणाचंच ठरेल
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
अभिनंदन
अदिती >>
तुझे खास अभिनंदन करावेसे वाटते. लेखाला आलेल्या प्रतिक्रिया आणि त्यातून व्यक्त झालेल्या विविध अंगांच्या विचारांना तू जे सविस्तर उत्तर दिले आहेस ते वाचल्यानंतर असे वाटू लागले आहे की तो प्रतिसादही स्वतंत्र लेखाच्या ताकदीचा आहे. क्वाएट अॅन अॅकेडेमिक शॉट रीअली.
बर्याच दिवसांनी एकाच धाग्यावर इतके सकस वाचायला मिळत आहे. नो डाऊट, क्रेडिट गोज टु यू !
अशोक पाटील
डग्लस अॅडम्स म्हणतो
डग्लस अॅडम्स म्हणतो (स्खलनशील स्मृतीकडून थोडेफार बदलून उद्धृत...) :
आपण जन्मल्यापूर्वीपासून ज्या गोष्टी आहेत, त्या बाबा बाबा आदमच्या जमान्यापासून होत्या, वयाच्या पस्तिशीपर्यंत ज्या-ज्या नवीन गोष्टी आल्या त्या उच्च प्रगतीच्या असतात, आपल्या त्या वयानंतर जगात घडणारे सर्व बदल म्हणजे जगबुडीची नांदी असतात...
- - -
लेख आणि चर्चा छानच.
:-)
माझी पस्तिशी शक्यतोवर पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत राहीन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
टाळ्या....
अॅडम्सच्या त्या एका वाक्याला टाळ्या द्याव्याशा वाटल्या.
लै भारी. लेखाच्या संदर्भात नाही पण इतरत्र प्रचंड आवडलं.
(मानसिक पस्तिशीत वयाच्या विशीतच पोचलेला)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
लेख आणि चर्चा आवडली.
लेख आणि चर्चा आवडली.
जी गोष्ट पंधरवड्यात करता
जी गोष्ट पंधरवड्यात करता येईल, बहुसंख्यांना सहजसाध्य वाटेल ते मुद्दाम कठीण आहे अशी बतावणी करत, त्यासाठी सहा महिने, नाहीतर तीन वर्ष, तीन महिने, तेरा दिवस खर्च करून काय साध्य होतं?
बहुसंख्यांना समजतील अशी हजारो पुस्तके बाजारात आयतीच उपलब्ध असताना विद्वत्तेची बतावणी करत ग्रहगोलांच्या गफ्फा हाणून आणि लेख पाडून काय साध्य होत कोणास ठाउक? असे वाक्य याच धर्तीवर म्हणावेसे वाटले.
असेच
लेख अतिशय आवडला. आपण अनेक गोष्टी केवळ जिद्द म्हणून करतो. प्रत्येक वेळी त्याचा काही उपयोग असतोच असं नाही. एव्हरेस्टवर चढून जाणं याचा तसं म्हटलं तर काय फायदा आहे? या लेखात तशा जिद्दीचा, धाडसाचा, नवीन विश्व पादाक्रांत करण्याच्या उर्मीचा गौरव केलेला आहे. ते करतानाच कर्मठपणापायी, निव्वळ पुण्य मिळण्याच्या कल्पनेने काहीतरी करण्यात काय हशील आहे असा प्रश्न विचारला आहे. या दोन्हीमध्ये जो नीरक्षीरविवेक साधला आहे ते या लेखाचं सामर्थ्य आहे.
माझेही मत राजेशसारखेच!
एका शब्दपेक्षा दोन बरे.
छान लेख
मस्त चर्चा.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars