सोनिया पर्व
सोनियाजीं भारताचे सध्य स्तिथीतील महान नेतृत्व. सध्या देश हा संक्रमण काळातून जात आहे देशापुढे बरेच गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत .त्यात धार्मिक उन्माद, जातीयवाद, धार्मिक दंगली,बेरोजगारी ह्या भीषण समस्या तसेच शेजारील राष्ट्रांच्या कुरापती, भ्रष्टाचार, बेजबाबदार राजकारणी ह्या सर्व समस्या बघून एखादा हबकून जाईल .पण ह्या सर्व दलदलीतून भारताला बाहेर काढू शकेल असे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे सोनियांचे.
आज भारतात असा कोणता नेता आहे जो सर्व धर्मियांना नेता म्हणून पसंद पडेल तर याचे उत्तर आहे सोनियाजी. सोनियाजीं ह्या देशातील सर्व धर्मियांना आपलेसे वाटणारे नेतृत्व आहे .दिराचा अपघाती मृत्यू सासूची क्रूर हत्या त्या नंतर नवर्याने मनाविरुद्ध केलेला राजकारण प्रवेश. पती राजकारणात जावा हे त्यांना वाटत नव्हते त्या पती आणि आपली दोन मुले ह्याच्याबरोबर सुखात राहत होत्या .आदर्श गृहिणी ,देशातील सर्वात खंबीर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिराजी ह्यांच्या आदर्श सुनेची भूमिका त्या चोख बजावत असतानाच काळाची चक्रे फिरली इंदिराजींची हत्या झाली आई नि भावाच्या निधनानंतर निराश झालेल्या राजीवजींच्या पाठीशी सोनिया खंबीर उभ्या राहिल्या.
दुसर्या देशातून आपल्या देशात सून म्हणून आलेल्या सोनियाजींना भारतातील जनतेने उदार मनाने स्वीकारले. भारताच्या परंपरेनुसार एकदा लग्न होवून वधू सासरी आली कि ती सासरचीच होवून जाते हेच सोनियाजींच्या बाबत झाले. त्यांनी भारताच्या चालीरीती आत्मसात केल्या मातृभाषा नसतानाही हिंदीतून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे. त्यांच्यावर विदेशी म्हणून हि टीका झाली पण जनतेने टीकाकारांना भिक न घालता सोनियांच्या नेतृत्वाला पसंती दिली.
संजय गांधींच्या विमान अपघातानंतर चार वर्षांत इंदिरा गांधींची भीषण हत्या व इंदिराजींनंतर सात वर्षांत राजीवजींची अमानुष हत्या त्यांच्या कुटुंबाने भोगली व जगाने पहिली. भूकंपात -पुरात किंवा एखाद्या अपघातात आपले नातेवाईक गमावलेले लोक वषार्नुवर्षे या घटना विसरू शकत नाहीत. तर ज्यांच्या घरात एका पाठोपाठ एक असे अकाली गेले असतील त्यांच्या मनाची कल्पना करणे ही अशक्य आहे.
पतीची झालेली क्रूर हत्या तीही इतकी क्रूर कि त्यांना व मुलांना त्यांचे अंत्यदर्शन हि मिळू शकले नाही. एखादी स्त्री अशा आघाताने खचली असती पण राखेतून झेप घेणाऱ्या फीनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांनी भारतीय राजकारणात अशी काही भरारी मारली कि भल्या भल्या नेत्यांचे पाय लटपटले.
टाइम्स मैगजीनने त्यांच्या कर्तुत्वाची दखल घेत २००७ व २००८ साली जगातील १०० प्रभावी महिला मध्ये त्यांना स्थान दिले तर फोर्ब्स ने जगातल्या सर्वात प्रभावशाली अशा ३ महिलांमध्ये त्यांची गणना केली.
इंदिराजी नि राजीवजी ह्यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्ष खचला होता.कॉंग्रेस पक्षाची दुर्दशा झाली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान देणारा धर्मनिरपेक्ष असा कॉंग्रेस पक्ष अस्ताकडे जातो कि काय अशी भीती निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाटू लागली होती. सोनियाजींना राजकारणात रस नव्हता. परंतु आपल्या पतीने व सासूने देशासाठी केलेले बलिदान आणि ते ज्या कॉंग्रेस चे नेतृत्व करत त्याची झालेली दुर्दशा पाहून त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला त्यांचा हा निर्णय म्हणजे मृत प्राय झालेल्या कॉंग्रेसला नवसंजीवनीच ठरली पक्षाने जणू कात् टाकली. कार्यकर्त्यात उत्साह संचारला व कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यात सोनियाजी यशस्वी झाल्या.
सोनियाजी राजकारणात आलेल्या पाहून विरोधकांच्या तोंडचे पाणी खरे तर पळाले होते. पण राजकारणात आपण घाबरलोय असे दाखवून चालत नाही म्हणून घाबरलेल्या विरोधी पक्षाने सोनियाजींची बदनामी करण्याची मोहीम उघडली त्यांचा कॉंग्रेस द्वेष हा व्यक्तीद्वेष कधी झाला हेही त्यांना कळले नाही. सोनियांवर खालच्या पातळीवर उतरून टीका झाली सभ्य असभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या पण हे एका भीतीपोटी होत आहे.जन्मजात सुसंस्कृत पणा अंगी असलेल्या सोनियाजींनी कधी टीकाकारांना भिक घातली नाही सर्व टीकाकारांना गाडून त्यावर कॉंग्रेस चा झेंडा लावून त्यांनी UPA मार्फत कॉंग्रेसची सत्ता आणली.
सोनियाजींनी आपल्या पतीवर 'राजीव' आणि 'राजीव वर्ल्ड' हि दोन पुस्तके लिहिली आहेत.तसेच 'फ़्रीडम्स डॉटर' आणि 'टू एलोन, टू टुगेदर' ह्या पुस्तकांचे संपादन हि केलेले आहे ज्यात पंडितजी आणि इंदिराजी ह्यात १९२२ ते १९६४ पर्यत लिहिल्या गेलेल्या पत्रांचे संकलन केलेले आहे.
इतर पक्षात जे पक्षांतर्गत राजकारण चालते त्याला सध्या सोनियांच्या नेतृत्वाखाली तरी थारा नाही. सध्या पक्षाचा एक छत्तीसगडचा पदाधिकारी म्हणाला कि जर 'सोनिया गांधींनी झाडू हातात घ्यायला सांगितले तर मी तो आनंदाने घेईन आणि छत्तीसगड झाडून काढेन'. यातून त्याचा सोनियाबद्दलचा गांधी परिवाराने देशासाठी जो त्याग केला त्या बाबतचा आदरच दिसून येतो.पण कार्यकर्त्यांना हे चांगलेच माहित आहे कि सोनियाजी असा मूर्खपणाचा आदेश कार्यकर्त्यांना कधीच देणार नाहीत ती त्यांची व गांधी घराण्याची परंपराच नव्हे.
इतर पक्षात अध्यक्षपदासाठी जी साठमारी चाललेली आहे ती बघून विषाद वाटतो.पक्षासाठी त्याग केलेल्यानाही अडगळीत फेकले जातेय. पंतप्रधान पदासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेमच राहिलेला नाही.ह्या काळ्या मनाच्या लोकांच्या पार्श्वभूमीवर सोनियाजींचा शुभ्रपणा उठून दिसतो. पंतप्रधानपद हाताशी आलेले असताना त्यांनी ज्या सहजतेने ते सोडले ते पाहून सारे जग अवाक झाले. हे करण्यासाठी जो लोकविलक्षण त्याग आणि साहस लागते ते सोनियामध्ये आहे हे जगाने तेव्हा पुन्हा एकदा अनुभवले..
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावे एका नव्या विक्रमाची नोंद झालीय. १२७ वर्षांचा इतिहास असलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी सलग १५ वर्ष राहण्याचा विक्रम सोनियांच्या नावावर जमा झालाय.
मार्च १९९८ मध्ये त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतली होती. त्यानंतर सलग १५ वर्ष त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. काँग्रेस पक्ष संघटनेत २००० साली झालेल्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव केला. सध्या अध्यक्षपदाची त्यांची चौथी टर्म सुरु आहे. २०१५ साली सोनिया गांधींचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
हा जो १५ वर्षाचा काळ आहे तो भारताच्या इतिहासात सोनिया पर्व म्हणून ओळखला जाइल.इतिहासाला त्यांच्या कामगिरीची नोंद हि घ्यावीच लागेल.
आज सोनियाजींच्या कुशल नेतृत्वाखाली राहुलजी तयार झाले आहेत देशातील करोडो सर्व धर्मीय लोकांचे पाठबळ, घराण्यातून आलेला जन्मजात सुसंस्कृतपणा आदर्श व्यक्तिमत्व, घराण्यातील त्यागाची परंपरा हे राहुलजी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे भावी पिढीला एक आदर्श नेता मिळणार यात शंकाच नको..
लै सेंटी केलं सचिन भौ तुम्ही
लै सेंटी केलं सचिन भौ तुम्ही !!!
आज सोनियाजींच्या कुशल नेतृत्वाखाली राहुलजी तयार झाले आहेत..... त्यामुळे भावी पिढीला एक आदर्श नेता मिळणार यात शंकाच नको..
काहीच शंका नाही पण मला प्रतंप्रधान पदासाठी अभिषेक बच्चन चा नाव सुचवाव वाटत, तो पण आदर्श आहे त्याच्या कडे पण गांधी सारखाच बच्चन अस एक दैवी आणि भारतात पूजनिय नाव आहे, परत कुशल माय, बापासोबत भारीतली बायको पण आहे, (राहुल भौ जरा मागे राहीले यात)
वर्षभरात रिझल्ट पण दिला म्हनुन productive पण !!!!
परत अभिषेक करेजीयस पण आहे, सलमान ला बी भीत नाही भौ !!!
अभिषेक भौ अकेले शेर ही आगे सब ढेर ही !!!!
फारच प्रभावशाली
फारच प्रभावशाली आणि विचारप्रवण करणारा लेख ...
सचिन्जी खांग्रेसवाले तुम्हाला पुढील निवडणूकीसाठी हाताशी धरणार बघा ...
खालील काहीकाही वाक्ये तर आम्हाला फारच भावली ब्वा ..
मातृभाषा नसतानाही हिंदीतून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे
- आमचीही मातृभाषा नसताना आम्ही हिंदी आणि विंग्रजीतून बोलतो. कधीकधी तर कारणपरत्वे गुजरातीतूनही बोलावे लागते .. तसं पाहता भारतातील अर्धीअधिक जंता मातृभाषेखेरीज एका तरी अन्य भाषेतून बोलते. तेव्हा सगळ्यांचेच कौतुक व्हायला हवे :D>
टाइम्स मैगजीनने त्यांच्या कर्तुत्वाची दखल घेत २००७ व २००८ साली जगातील १०० प्रभावी महिला मध्ये त्यांना स्थान दिले तर फोर्ब्स ने जगातल्या सर्वात प्रभावशाली अशा ३ महिलांमध्ये त्यांची गणना केली.
- प्रभावशाली म्हणजे कर्तुत्ववान नव्हे.
काळ्या मनाच्या लोकांच्या पार्श्वभूमीवर सोनियाजींचा शुभ्रपणा उठून दिसतो
सोनियाजींच्या विदेशीपणाचा एवढा कुशल वापर तर विरोध्कांनाही जमलेला नाही अजून .. =))
सोनियाजींच्या कुशल नेतृत्वाखाली राहुलजी तयार झाले आहेत देशातील करोडो सर्व धर्मीय लोकांचे पाठबळ, घराण्यातून आलेला जन्मजात सुसंस्कृतपणा आदर्श व्यक्तिमत्व, घराण्यातील त्यागाची परंपरा हे राहुलजी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे भावी पिढीला एक आदर्श नेता मिळणार यात शंकाच नको..
=)) =)) =)) राहुलजींची अर्णब बरोबरची मुलखत बघता ते फारच "तयार" आहेत याबद्दल काही शंक्याच नको ...
भाषा
तसं पाहता भारतातील अर्धीअधिक जंता मातृभाषेखेरीज एका तरी अन्य भाषेतून बोलते.
यावरून आठवले. डखाऊला चाललो होतो तेव्हा आमच्या इंग्रजी गाईडच्या ग्रुप मध्ये बहुतांश जन्ता ब्रिटिश, ऑस्ट्रॅलियन, अमेरिकन व आम्ही दोघे इंडीयन अशी होती. सहज युरोपात इंग्रजीचा निरुपयोग यावर चर्चा वळली तेव्हा एका आम्रिकन आजीने हा विनोद१ सांगितला:
जर समोरच्या व्यक्तीला ३ वा अधिक भाषा येत असतील तर ती व्यक्ती आशियायी असायचा संभव सर्वाधिक असतो
जर समोरच्या व्यक्तीला फक्त २च भाषा येत असतील तर ती व्यक्ती युरोपियन असण्याचा संभव सर्वाधिक असतो
मात्र समोरच्या व्यक्तीला फक्त इंग्रजीच येत असेल तर ती व्यक्ती अमेरिकन आहे याची खात्री बाळगा!
१. आता हा विनोद आहे का? (का आहे?) असा प्रश्न असेल तर, "या कथनानंतर ग्रूपमधील सगळे जण ख्यॅ ख्यॅ ख्यॅ हसले मग आम्ही ही हसलो" हे (आणि इतकेच)उत्तर (देण्यास सक्षम) आहे. :P
मातृभाषा नसतानाही हिंदीतून
मातृभाषा नसतानाही हिंदीतून बोलण्याचा त्यांचा प्रयत्न हा कौतुकास्पद आहे
- आमचीही मातृभाषा नसताना आम्ही हिंदी आणि विंग्रजीतून बोलतो. कधीकधी तर कारणपरत्वे गुजरातीतूनही बोलावे लागते .. तसं पाहता भारतातील अर्धीअधिक जंता मातृभाषेखेरीज एका तरी अन्य भाषेतून बोलते. तेव्हा सगळ्यांचेच कौतुक व्हायला हवे
बर्वे साहेब, किमान प्रयत्न तरी केला सोनियांनी.
प्रयत्न केला नसता तर त्याबद्दल सुद्धा टीका झाली असती. की साधी हिंदी बोलण्याचा यत्न सुद्धा केला नाही, सोनियाजींनी.
वाघ म्हंटलं तरी खातो ... अन वाघोबा म्हंटलं तरी खातो - अशी परिस्थिती.
--------
काळ्या मनाच्या लोकांच्या पार्श्वभूमीवर सोनियाजींचा शुभ्रपणा उठून दिसतो
सोनियाजींच्या विदेशीपणाचा एवढा कुशल वापर तर विरोध्कांनाही जमलेला नाही अजून
हे मात्र पटले हो बर्वे साहेब.
माहितीसाठी
टॉम अल्टर अत्यंत उत्तम हिंदी बोलतात.
https://www.youtube.com/watch?v=9GyCb_jqkiU
(पण त्यांच्या रूपामुळे त्यांना रोल तसे मिळतात)
?
(हा 'अशोकपर्व' काय प्रकार आहे, कल्पना नाही, पण...)
...प्रस्तुत लेखातून प्रस्तुत लेखकास अर्थनिष्पत्ती झाली (आणि त्या अर्थनिष्पत्तीचा स्रोत) अशी काही खात्रीलायक माहिती आपणाजवळ उपलब्ध आहे काय?
या प्रश्नाच्या उत्तरावर आपल्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
(अन्यथा, मानायला काय, काहीही मानावे.)
हे हे हे
हे हे हे. पूर्ण लेख वाचणे जमले नाही.
असो.
गांधी मंडळींची अपेक्षित भूमिका यावर इथे मी काही लिहिले आहे. ते नजरेखालून घालावे.