Skip to main content

स्त्री भ्रूण हत्या का होत असाव्यात?

स्त्री भ्रूण हत्या हि भारतातली एक समस्या. जगामध्ये स्त्री भ्रूण हत्या होतात कि नाही ह्याची कल्पना नाही. मात्र भारतात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळते. अशी काय मानसिकता असेल कि वेडगळ कल्पनेपायी लोक आपल्या पोटच्या गोळ्याला निर्दयपणे खुडून टाकत असावेत.

स्त्री भ्रूण हत्येमागे सामाजिक,आर्थिक,धार्मिक कारणे आहेत जसे काही समाजात हुंडा द्यावा लागतो त्यामुळे मुलीचा जन्म हा तिच्या घरच्यांना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणणारा असतो यावर बरेच जन अघोरी उपाय वापरतात तो म्हणजे मुलीला गर्भात असतानाच खुडून टाकायचे अशी मानसिकता का होत असावी? इतर धर्मांमध्ये, देशांमध्ये स्त्री भ्रूण हत्या होतात कि नाही ह्याची कल्पना नाही.

स्त्रियांना भारतीय समाजात नेहमी दुय्यमच वागणूक मिळाली ह्याला इतिहास, पुराणकाळ, आजपर्यंत जितकी युगे झाली ती साक्ष आहेत...आज जरी स्त्रिया सर्व क्षेत्रात यशस्वी होत असल्या तरी पुरुषी मानसिकता बदललेली नाही ह्याचे मूळ कारण आपल्या पुरातन व्यवस्थेतच आहे. इंदिरा गांधी ह्या प्रधानमंत्री ह्या सर्वोच्च पदावर असतानाही त्यांना एका मंदिरात त्या स्त्री असल्याने प्रवेश नाकारला गेला होता असे एकून आहे(चू भू द्यावी घ्यावी. मी असे एकून आहे पण प्रत्यक्ष वाचनात आले नाही. कुणाला माहिती असल्यास द्यावी )मागे माझा एक ओळखीचा गृहस्थ पहिली मुलगी झाली म्हणून तिला पाहायला पहिले ३ महिने गेलाही नव्हता. अशी मानसिकता का होत असावी.

माझ्या मते वरवर जरी सामाजिक, आर्थिक कारणे दिसत असली तरी ह्याचे मूळ हे आपल्या पुरातन विचारधारेत आहे जसे मुलाने अग्नी दिला तर स्वर्गात जाता येते. मुलगा नसेल तर कुलक्षय होतो, मरताना मुलाची मांडी पाहिजे,त्याने अखेरचे पाणी तोंडात घातले पाहिजे.ह्या असल्या खुळ्या कल्पनेपायी नि आपला वंश टिकवा ह्या खुळापायी स्त्री भ्रूण हत्या होत असाव्यात असे मला वाटते.

भारतासारख्या प्राचीन नि सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या देशात स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार व्हावेत हे आपल्याला लांच्छनास्पद आहे ह्यात शंका नाही.

स्त्री भ्रूण हत्येसारखा घृणास्पद प्रकार का होत असावा नि हे असले प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे ह्याबद्दल प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत.

Nile Thu, 24/07/2014 - 20:23

In reply to by 'न'वी बाजू

And how does fuck enhance the point,

When the fuck did I say it does? I don't give a fuck about decent debate with fucknuts. If you got a fucking problem with that, you know what to do.

मेघना भुस्कुटे Thu, 24/07/2014 - 15:39

प्रश्न उपस्थित करायलाच आक्षेप का असावा, हा मुद्दा रास्त आहे.

आपण वादाच्या सोयीकरता क्षणभर असं गृहित धरून चालू की, हेतुपुरस्सर स्त्रीगर्भ पाडून टाकणार्‍या लोकांचं प्रमाण नगण्य आहे आणि त्यामुळे स्त्रीपुरुष गुणोत्तरावर म्हणावा तितका परिणाम होत नाही. या निष्कर्षाधारे आपण गर्भलिंगचिकित्सेला असलेली बंदी मागे घेतली.

त्याने काय होईल?

इतकी वर्षे समजा गुणोत्तरावर काहीही परिणाम नसेल झाला; पण आता होईल की नाही?
बरं, हा परिणाम निरीक्षण करून ठरवावा आणि मग त्याचे फायदे-तोटे पाहून पुढची धोरणं ठरवावीत, इतकं मार्जिन समाज म्हणून आपल्यापाशी आहे की नाही?
स्त्रियांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी गुर्जी म्हणतात तसे धोरणात्मक निर्णय घेण्यात याची परिणती होईल, की 'एवीतेवी मुलगी जन्माला घालणं कटकटीचंच आहे आणि आता तर तिचा जन्म थांबवण्यावर काही बंदीही नाही' म्हटल्यावर धोरणात्मक निर्णय बासनात जातील?

गुर्जी, तुमचा अंदाज काय आहे?

चिंतातुर जंतू Thu, 24/07/2014 - 17:12

>> ज्या समाजात दोन टक्के स्त्रीगर्भ भ्रूणहत्या करून मारले जातात त्या समाजावर असे काय वाईट परिणाम होतील ज्यासाठी ते गर्भपात थांबवण्याची गरज पडावी?

ह्या प्रश्नाचं एक उत्तर इथे सापडलं. हरयाणातल्या सेक्स रेशोमुळे (१००० मुलग्यांसाठी ८५७) केरळातून (सेक्स रेशो : १००० मुलग्यांसाठी १०८४) पैसे देऊन मुली आणल्या जाताहेत आणि त्या भिन्न संस्कृतीतल्या असल्यामुळे तिथे सुखी नाहीत.

चिंतातुर जंतू Thu, 24/07/2014 - 18:43

In reply to by राजेश घासकडवी

>> पंजाब आणि हरयाणात हुंडाबळींची संख्या घटते आहे.

जर मुली विकतच घेतल्या जात असतील, तर असं होऊ शकेलही, पण पैसे देऊन मुलींना विकत घेणं म्हणजे मुलीकडे कमॉडिटी म्हणूनच पाहणं आहे. शिवाय, (मतलब संपलं की?) त्यांना वेश्याव्यवसायात ढकलून कमाई करणं वगैरेही होत असावं असं दिसतंय.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 15:06

In reply to by चिंतातुर जंतू

स्त्रियांची सुरक्षितता जन्माच्यावेळच्या लिंगगुणोत्तरानुसार राज्याराज्यांत बदलताना दिसते. ज्या राज्यात लिंगगुणोत्तर 'चांगलं' (अधिक मुली) तिथे स्त्रियांवरचे हल्ले जास्त दिसतात. त्यामुळे स्त्रियांची संख्या कमी झाल्यावर एक्सेस पुरुष हल्ले करतील, मुली पळवतील या भीतीला पाया दिसत नाही. चित्र खरं तर उलटंच दिसतं आहे. केरळमध्ये लिंगगुणोत्तर १०४८ आहे, तिथे सर्वाधिक हल्ले होताना दिसतात.

संदर्भ -
http://en.wikipedia.org/wiki/Indian_states_and_territories_ranking_by_s…
http://en.wikipedia.org/wiki/Indian_states_and_territories_ranked_by_sa…

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 15:14

In reply to by राजेश घासकडवी

हा मुद्याला बगल देण्याचा प्रकार वाटतो आहे. लिंगगुणोत्तर चांगलं असलं म्हणजेच सर्व काही नाही, पण ते जर चांगलं नसेल तर बाकी कशात काय अर्थ आहे ते समजत नाही. एकदा म्हणायचं लिंगगुणोत्तरातली घट सेक्स सिलेक्टिव्ह अ‍ॅबॉर्शनमुळे नाही, एकदा म्हणायचं लिंगगुणोत्तर वाईट असलं तरी हुंडाबळींची संख्या घटताना दिसतेय आणि एकदा म्हणायचं लिंगगुणोत्तर चांगलं असलं तरी अन्य गुन्हे जास्ती आहेत.

नक्की मुद्दा काय आहे? की आलेख-आलेख खेळणं चालू आहे? शिवाय प्रतिवाद केला की भावनिकतेचं लेबल चिकटवणं तर अतिशय सोपं आहे, पण इथे मुद्यांचा व्हॉलीबॉल खेळला जातोय ते रोचक वाटतं.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 15:31

In reply to by बॅटमॅन

मी माझ्या परीने प्रामाणिकपणे आणि सुसंगत मुद्दे मांडतो आहे. सारांश खालीलप्रमाणे.
१. लिंगगुणोत्तर घटणं हा प्रॉब्लेम आहे का? - लोकांना जितका मोठा तो वाटतो, तितका तो नाही असं माझं मत आहे. त्याचे भविष्यकाळात कदाचित फायदेही असतील (हायपोथेसिस, विदा नाही). हुंडाबळींची संख्या घटणं, हा एक शक्य फायदा आहे - त्यासाठी प्राथमिक, सजेस्टिव्ह विदा दिला. जे लोक 'लिंगगुणोत्तर बिघडलं तर स्त्रियांवर हल्ले होतील' अशी भीती घालतात, त्यांच्यासाठी वरचा आलेख आहे.
२. लिंगगुणोत्तर घटतं त्यात भ्रूणहत्यांचा हातभार नक्की किती? हा प्रश्न मुळात विचारला होता - त्याचं उत्तर देण्याचाही मीच प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आधीचा आलेख होता. सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन्स होत नाहीत असं बिलकुल म्हटलेलं नाही. एकंदरीत जो मोठ्ठा बदल झालेला दिसतो, त्यात सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन्सचा हातभार किती, आणि इतर काही फॅक्टर्स असतील का? याविषयीची चर्चा मी केली आहे.
३. भावनिकतेचं उल्लेख करण्याआधी लोकांनी मला 'हे बरोबर असलं तरी असं मांडणं धोकादायक आहे' असं म्हटलं. त्याला माझ्या परीने उत्तर दिलं.

यात कॉंट्रॅडिक्शन कुठे दिसते आहे?

मुद्देसूदपणे मांडणी करून त्यासाठी विदा देणं याला 'आलेख आलेख खेळणं' का म्हटलं हेही कळलं नाही.

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 16:31

In reply to by राजेश घासकडवी

अंडररिपोर्टिंगची शक्यता कुठे गृहीत धरल्याचे दिसत नाही, शिवाय चिंतातुर जंतूंनी दिलेल्या लेखात केरळी स्त्रियांचं मनोगत पाहता तेही तुमच्या दाव्यास छेद देणारंच आहे. पण 'इतका मोठ्ठा विदा' विरुद्ध '१-२ विदाबिंदू' हे नेहमीचे अर्ग्युमेंट तुम्ही काढण्याअगोदर मी हा मुद्दा मागे घेतो तरीही अंडररिपोर्टिंगचा मुद्दा मात्र आहे तसाच राहील. त्याचं काय करता बोला.

ऋषिकेश Fri, 25/07/2014 - 16:18

In reply to by राजेश घासकडवी

श्री राजेशराव,

सर्वंकष विदा देऊन त्यातून काहितरी निष्कर्ष काढण्याऐवजी आपल्या तर्काला सुसंगत असे विद्याचे सोयीस्कर तुकडे देण्याचा तुम्ही या अख्ख्या चर्चेत केला आहे असे माझे मत/आरोप आहे. त्याला उत्तर म्हणून विरोधी मत मांडणार्‍यांनी विरोधी विदा द्यावा अशी तुमची अपेक्षा असल्यास ती गैर आहे, कारण तुम्ही विदा देणार्‍यानी फक्त अभ्यासक म्हणून विदा द्यावा त्याच्या निष्कर्षाची पर्वा करू नये अशी भुमिका घेत आहात - विरोधक नाहीत. जर तुम्ही "अभ्यासासाठी अभ्यास" इतकीच भुमिका समजता तर निष्कर्ष काहिहि असो सर्व प्रकारचा विदा दिला पाहिजे, नैतर तुम्ही देताय तो विदा म्हणजे: माझ्या भुमिकेसा पुरक विदा मी देईन अश्या "एककल्ली" पद्धतीतून येतो आहे, ज्याला अभ्यासपूर्ण म्हणवत नाही.

असो. प्रत्यक्ष विषयावर काही चर्चा करण्यापेक्षा, आपले मुद्दे सिद्ध करण्यासाठी सर्व बाजूने चाललेला आटापिटा, एवढेच या चर्चेत चालले आहे असे माझे मत झाले आहे. अशा चर्चेचे फलित काय?

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 16:34

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेशशी पूर्ण सहमत. एकांगी विदाबिंदू आणि तर्कदुष्ट विचारपद्धतींमुळे घासकडवींचे निष्कर्ष मान्य करवत नाहीत. विशेषतः लिंगगुणोत्तराकडून चर्चा स्त्रियांवरील हल्ल्यांकडे नेणे हे अवांतर तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे असे की तत्संबंधीच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ जो विदा दिलेला आहे तो अपुरा आहे. अंडररिपोर्टिंग वा तत्सम काही गोष्टींकडे काणाडोळा करून विदा मांडल्यामुळे तो ग्राह्य आहे असे म्हणवत नाही.

अजो१२३ Fri, 25/07/2014 - 17:32

In reply to by बॅटमॅन

एकांगी विदाबिंदू आणि तर्कदुष्ट विचारपद्धतींमुळे घासकडवींचे निष्कर्ष मान्य करवत नाहीत.

घासकडवींच्या निष्कर्षात -
१. विदा एकाच मुद्द्यावर; आणि
२. विद्यात कमतरता असू शकते
असे मत मांडून मग
१. काढलेला निष्कर्ष लेखाच्या संदर्भात लावता येत नाही; आणि
२. विदा व निष्कर्ष हे धाग्याच्या विषयाशी निगडीत नसावेत
असे म्हणताना, किमान त्यांनी जे निरीक्षण केले आहे त्याची विरोधकांची (म्हणजे तुमची)कारणमिमांसा काय असावी / आहे हे सांगावयास हवे.

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 17:51

In reply to by अजो१२३

तर्कदुष्ट विचारपद्धती असे म्हटले आहे त्याचे कारण अंडररिपोर्टिंग इ. ध्यानात घेतलेले नाही. तीच गोष्ट एकांगी विदाबिंदूबद्दलची.

आता राहता राहिला कारणमीमांसेचा मुद्दा. अमुक एका सरणीतलं काही पटण्यासारखं नाही हे सांगितलं तर पर्यायी सरणीचा आग्रह रोचक आहे. काहीही करा पण कशीतरी एक सरणी मांडा या आग्रहाने माझ्या मते काही साध्य होत नाही. तरीही, साधनशुचितेच्या आरोपातून मुक्त होण्यासाठी अगोदरच सांगतो की माझी सरणी ही घासकडवींना कौंटर जाते आहे. लिंगगुणोत्तर आणि स्त्रियांवरील अत्याचार हे व्यस्त प्रमाणात असणे कौंटर इंट्यूटिव्ह आहे. अशा वेळी नुसता विदा दाखवण्याने काही साध्य होत नाही, काहीएक स्पष्टीकरण जरूर असते.

हां आता स्वतःच्या क्लेमला पोषक विदा मिळाल्याने हात झटकण्याचे स्वातंत्र्य आहेच, मात्र त्याला काही अर्थ नाही. असो.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 20:48

In reply to by बॅटमॅन

लिंगगुणोत्तर आणि स्त्रियांवरील अत्याचार हे व्यस्त प्रमाणात असणे कौंटर इंट्यूटिव्ह आहे. अशा वेळी नुसता विदा दाखवण्याने काही साध्य होत नाही, काहीएक स्पष्टीकरण जरूर असते.

काउंटरइंट्युइटिव्ह विदा दिसणं/शोधणं हेच माझ्या मते अभ्यासाचं एक मुख्य ध्येय असतं. मला हा दिसला म्हणून मी मांडला. पण त्याबद्दल स्पष्टीकरण देणं हे ज्यांनी ती इंट्युइशन बाळगली आहे त्यांची जबाबदारी आहे. अशा उत्तरांतून-स्पष्टीकरणातून एखाद्या प्रश्नाचे पैलू दिसून येतात. दुर्दैवाने मी एकट्याने प्रत्येक विदाबिंदूचा प्रत्येक अंगाने विचार करणं म्हणजे पीएचडी थिसिस लिहिण्यासारखं होईल. तेवढा वेळ मला नाही. त्यामुळे 'हा काउंटरइंट्युइटिव्ह विदा का बरं दिसतो आहे?' असा विचार इतर कोणीतरी केला, आणि योग्य युक्तिवाद केला तर माझीही क्षितिजं विस्तारतील.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 21:06

In reply to by ऋषिकेश

एकांगीपणाचा आरोप दुर्दैवी आहे. कारण, बहुतेक प्रश्न हे सरळसोट, एककारणी नसून मल्टिव्हेरिएट असतात हे माझं लाडकं तत्त्व आहे. आकडेवारी जेव्हा 'चांगली' दिसते तेव्हा त्यामागे वाईट कारणं असू शकतात. किंवा त्या उलटही, जेव्हा आकडेवारी 'वाईट' दिसते तेव्हा त्यामागे काही चांगली कारणं दिसू शकतात. हेच मी 'घटत्या सेक्स रेशोमागे काही प्रमाणात घटता फर्टिलिटी रेट असू शकतो' हे दाखवताना केलं होतं.

असो. विदा काय सांगतो आहे यापेक्षा 'घासकडवींची मांडणी करण्याची पद्धत, त्यात दिसणारे पॅटर्न्स, आणि त्यांचा अनिष्टपणा' याकडे चर्चा झुकलेली दिसते आहे. तेव्हा चर्चेतून अंग काढून घेण्याची वेळ आलेली आहे.

मला या चर्चेतून अनेक नव्या इनसाइट्स मिळाल्या. वाचकांपैकी काही जणांसाठी तरी थोड्याफार प्रमाणात हे झालेलं दिसलं. तेवढंच यश मला रगड.

अक्षय पूर्णपात्रे Fri, 25/07/2014 - 18:30

In reply to by राजेश घासकडवी

ज्या राज्यात लिंगगुणोत्तर 'चांगलं' (अधिक मुली) तिथे स्त्रियांवरचे हल्ले जास्त दिसतात. त्यामुळे स्त्रियांची संख्या कमी झाल्यावर एक्सेस पुरुष हल्ले करतील, मुली पळवतील या भीतीला पाया दिसत नाही. चित्र खरं तर उलटंच दिसतं आहे. केरळमध्ये लिंगगुणोत्तर १०४८ आहे, तिथे सर्वाधिक हल्ले होताना दिसतात.

लिंगगुणोत्तर (लिंगु) चांगले असलेल्या राज्यांत स्त्रियांवर होणारे अत्याचार नोंदवण्याचे प्रमाण लिंगु वाईट असणार्‍या राज्यांपेक्षा तुलनेने अधिक असावे.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 21:01

In reply to by अक्षय पूर्णपात्रे

एक्झॅक्टली. शिवाय दुसरी एक शक्यता अशी आहे की जिथे लिंगगुणोत्तर वाईट आहे अशा राज्यांमध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर प्रचंड बंधनं आहेत. या अतिरेकी बंधनांचा परिपाक असा होत असावा की जर स्त्रिया घरातच कोंडलेल्या रहात असतील तर त्यांच्यावर हल्ले होण्याचं प्रमाण कमी असेल. माझं म्हणणं इतकंच आहे की 'लिंगगुणोत्तर घटलं तर स्त्रियांविरुद्धचे अत्याचार वाढतील' असं म्हणणारांसाठी हा विदा खोडून काढण्याची जबाबदारी आहे.

पण माझा मूळ मुद्दा हाच होता. आकडेवारी जेव्हा 'चांगली' दिसते तेव्हा त्यामागे वाईट कारणं असू शकतात. किंवा त्या उलटही, जेव्हा आकडेवारी 'वाईट' दिसते तेव्हा त्यामागे काही चांगली कारणं दिसू शकतात. हेच मी 'घटत्या सेक्स रेशोमागे काही प्रमाणात घटता फर्टिलिटी रेट असू शकतो' हे दाखवताना केलं होतं. बहुतेक प्रश्न हे सरळसोट, एककारणी नसून मल्टिव्हेरिएट असतात हे माझं लाडकं तत्त्व आहे.

धनंजय Sat, 26/07/2014 - 03:26

In reply to by राजेश घासकडवी

बिहार राज्यात स्त्रियांविरुद्ध २०१२ साली १ लाख लोकसंख्येमागे ०.२५ गुन्हा झाला
त्याच्या पुढील-सुरक्षित राज्यात (नागालँडमध्ये) २०१२ साली १ लाख लोकसंख्येमागे १.४७ गुन्हे झाले
पूर्वी बिहार राज्याचा भाग असलेल्या झारखंडात २०१२ साली १ लाख लोकसंख्येमागे १.८३ गुन्हा झाला

बिहार राज्याचे अभिनंदन करण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे, की या आकड्यांमध्ये नोंदण्यांची त्रुटी आहे काय?

http://en.wikipedia.org/wiki/Indian_states_ranking_by_literacy_rate

केरल : सर्वाधिक साक्षरता, सर्वाधिक स्त्री-हिंसा.
बिहार : सर्वात कमी साक्षरता, सर्वात कमी स्त्री-हिंसा
(यादीतील मध्यातल्या राज्यांत सुद्धा काही तरतमभाव दिसतो.)

अधिक साक्षर/सुशिक्षित समाजांत स्त्रियांविरुद्ध हिंसांची नोंदणी अधिक प्रमाणात होत असावी. त्यामुळे माझ्या मते वरील प्रतिसादातील विश्लेषण अनर्थक आहे.

Nile Thu, 24/07/2014 - 23:25

In reply to by राजेश घासकडवी

तुम्ही दिलेल्या दुव्यात त्या कालावधीत हरयाणा आणि पंजाबचा सेक्स रेशोसुद्धा वाढलेला आहे. म्हणजे सेक्स रेशो वाढल्याने हुंडाबळींची संख्या घटते असा निष्कर्ष निघतो ना? :-)

"Interestingly, most states that have less than 1 dowry deathper day for the last five years, have seen their child sex ratios rise. Punjab and Haryana, known as patriarchal societies, have done remarkably well in increasing the child sex ratio and have also seen a reduction in dowry deaths."

जाता जाता, लिंगचिकत्सेबाबतचे कायदे या राज्यात योग्य परिणाम घडवून आणत आहेत असे आता मानायला हरकत नसावी नाही का?

राजेश घासकडवी Thu, 24/07/2014 - 23:41

In reply to by Nile

म्हणजे सेक्स रेशो वाढल्याने हुंडाबळींची संख्या घटते असा निष्कर्ष निघतो ना?

हे तितकं सोपं नाही. एक लक्षात घ्यायला हवं, की सध्याची लग्नाच्या वयाच्या मुलींची चणचण ही वीस वर्षापूर्वीच्या वाईट रेशोमुळे येते. ही चणचण वाढली की हुंडा कमी, त्यातून हुंडाबळी कमी होऊ शकते. याउलट 'स्त्री अपत्य व्हायला हरकत नाही' हा विचार सध्याच्या स्त्रियांच्या चणचणीतून येतो. हुंडाबळींची संख्या घटणं आणि सेक्स रेशो सुधारायला लागणं हे दोन्ही माझ्या मते या सद्यपरिस्थितीतील चणचणीतून निर्माण झालेल्या सुधारित विचारसरणीचे परिणाम असावे. अर्थात हा हायपोथेसिस आहे, आणि सिद्ध करण्यासाठी खूपच विदा गोळा करावा लागेल. पण 'सेक्स रेशो सुधारल्यामुळे हुंडाबळींची संख्या घटते' यापेक्षा सकृद्दर्शनी स्वीकारार्ह वाटतो.

Nile Thu, 24/07/2014 - 23:52

In reply to by राजेश घासकडवी

संपादित

(बहुतेक वरचा प्रतिसाद मी प्रतिसाद देईपर्यंत अपडेट झाला त्यामुळे माझा प्रतिसाद काढून टाकत आहे.)

Nile Thu, 24/07/2014 - 23:54

In reply to by राजेश घासकडवी

ही चणचण वाढली की हुंडा कमी, त्यातून हुंडाबळी कमी होऊ शकते. याउलट 'स्त्री अपत्य व्हायला हरकत नाही' हा विचार सध्याच्या स्त्रियांच्या चणचणीतून येतो. हुंडाबळींची संख्या घटणं आणि सेक्स रेशो सुधारायला लागणं हे दोन्ही माझ्या मते या सद्यपरिस्थितीतील चणचणीतून निर्माण झालेल्या सुधारित विचारसरणीचे परिणाम असावे. अर्थात हा हायपोथेसिस आहे, आणि सिद्ध करण्यासाठी खूपच विदा गोळा करावा लागेल.

असहमत. हायपोथेसिस असल्याने अधिक काही लिहीत नाही.

पण 'सेक्स रेशो सुधारल्यामुळे हुंडाबळींची संख्या घटते' यापेक्षा सकृद्दर्शनी स्वीकारार्ह वाटतो.

ते वाक्य गमतीने लिहले होते, कारण सेक्स रेशो घटल्याने हुंडाबळी कमी झाले हा बादरायण संबंध आहे.

ॲमी Fri, 25/07/2014 - 09:16

In reply to by चिंतातुर जंतू

हरयाणातल्या सेक्स रेशोमुळे (१००० मुलग्यांसाठी ८५७) केरळातून (सेक्स रेशो : १००० मुलग्यांसाठी १०८४) >>
केरळातला सेक्स रेशो अनन्याचरल का आहे?
तिकडे मातृसत्ताक संस्कृती असल्याने पुरूषभ्रूणहत्या होतात का?
राज्य सरकारची काही 'बेटा बचाओ' योजना आहे का?
ते दुसरं मातृसत्ताक राज्य (मेघालय बहुतेक) तिकडे काय परिस्थिती आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/07/2014 - 19:59

In reply to by ॲमी

केरळातला सेक्स रेशो अनन्याचरल का आहे?

एक शक्यता - आरोग्याच्या सोयीसुविधा फार चांगल्या नसतात, पण स्त्री-पुरुष भेदभाव समाजात नसताना मुली जास्त जगतात, मनुष्यांमध्ये स्त्रिया जास्त चिवट असतात. केरळात अशी परिस्थिती असू शकेल. 'बेटा बचाओ'पेक्षा आरोग्यसुविधा सुधारण्याचा जास्त फायदा होऊ शकेल.

शिवाय मल्याळी (किंवा भारतीय) लोकांमध्ये मुळातच, गुणसूत्रांनुसारच बाकी वंशांपेक्षा जास्त मुली जन्माला येत असतील, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम केरळावर उलटा होत असेल, मल्याळी लोक फार जास्त ताण आला तरी संभोग कमी प्रमाणातच करत असतील (युद्धकाळात युरोपमध्ये जास्त मुलगे जन्माला आले.), इ. इ.

Nile Fri, 25/07/2014 - 00:27

अनेक प्रतिसादांमध्ये बिघडेना का सेक्स रेशो आम्हाला जे अपत्य हवं ते निवडण्याचं स्वातंत्र्य हवं असं म्हणणारे लोक मला अमेरीकेतील 'कोल रोलर्स' ची आठवण करून देतात.

मन Fri, 25/07/2014 - 17:42

प्रिय राघा,
ह्या धाग्यावर चक्क अजो तुमच्या बाजूनं बोल्ताहेत म्हटल्यावर तरी आपलं काहीतरी हुकलेलं असावं; आपल्या बेसिक मध्येच गडबड असावी असा आपणास अजून डौट कसा आला नाही ?

अवांतर :-
मी फक्त टिप्पणी पोचवतोय. मूळ टिप्पणी माझी नाही.

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 17:54

In reply to by मन

चक्क गीतेतही अजोंचा उल्लेख आलेला आहे.

न जायते म्रियते वा कदाचित्
नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ||अध्याय क्र. २, श्लोक क्र. २०||

आणि तो अजर-अमर अशा आत्म्याच्या वर्णनासंबंधात आलेला आहे हे तर कित्ती समर्पक!

मेघना भुस्कुटे Fri, 25/07/2014 - 18:48

गुर्जी,

या मुद्द्यावर बरंच उलटसुलट विदायुद्ध (श्रेयाव्हेरः अदिती) झालं आहे. वरचे सगळे तिरके प्रतिसाद आणि उपप्रतिसाद वाचून कुणी कुणाचा नक्की काय प्रतिवाद केला आहे हे कळणं अवघड झालं आहे, म्हणून थेट खाली लिहितेय.

१. प्रश्न डेंजरस आहे, म्हणून तो उपस्थितच करू नये हे चूक आहे.

संपूर्ण मान्य.

२. गुणोत्तर बिघडण्यात स्त्रीभ्रूणहत्यांचाच वाटा असेल असे नाही.

शक्य आहे.

३. बिघडलेले गुणोत्तर स्त्रियांच्या दृष्टीने सोईचे असू शकेल.

हे मात्र काही केल्या माझ्या गळी उतरत नाहीय. कसं काय हो? कसं काय?

जिथे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे, तिथे स्त्रियांवरचे हल्ले जास्त आहेत असं तुम्ही म्हणता. जिथे ते कमी आहे, तिथे हुंडाबळींचं प्रमाण कमी आहे, असं म्हणता. एकतर हल्ले आणि बळी हे एवढेच निकष नसतात, माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचे. तशा तर स्त्रिया सगळ्यांत जास्त बुरख्यात / जनानखान्यात / अंतःपुरात (विथ तृतीयपंथीयांचा पहारा) सुरक्षित असतील. नो हल्ले, नो बळी. म्हणून काय ते सन्मानपूर्वक जगणं म्हणायचं का? किंवा आपल्या थोर्थोर पुरातन काळात हुंडा ही सर्वमान्य पद्धती असताना सगळेच जण विनातक्रार हुंडे देत असल्यामुळे हुंडाबळी नसतीलच. मग ती आदर्श परिस्थिती झाली का? स्त्रियांचं प्रमाण कमी असताना त्यांची सररास विक्रीयोग्य वस्तू म्हणून संभावना होते (विक्री-खरेदी, जोपासना, वापर, संभाळ, सन्मानाचा/मतस्वातंत्र्याचा/निवडीचा अभाव अशा सगळ्याच बाबतींत). तरीही स्त्रिया कमी गुणोत्तरात सुरक्षित, याला तुम्ही का चिकटून आहात?

बरं, जिथे स्त्रियांचं प्रमाण कमी आहे; तिथे त्यांच्यावर होणारे अत्याचार, हल्ले नोंदलेच जात नसण्याची शक्यता आहे हे तुम्हांला दिसत नाही की तुम्ही ते पाहण्याचं हेतुपुरस्सर टाळता आहात?

४. आपल्याला मुलगा हवा की मुलगी हे निवडण्याचा हक्क माणसाला हवा.

साफ पटत नाही. असा हक्क कशासाठी हवा? जन्माला येणारं मूल निरोगी, सुदृढ असावं याहून वेगळी कुणाची का अपेक्षा असावी? अशा प्रकारे केली जाणारी लिंगनिवड मुदलातच असमानतेचा परिणाम आणि असमानतेत परिणती दर्शवत नाही काय? जर तुमचा असमानतेला विरोध असेल, तर अशा लिंगनिवडीला तुम्ही नक्की कोणत्या आधारावर पाठिंबा देऊ इच्छिता? मला खरंच कुतूहल आहे.

राजेश घासकडवी Fri, 25/07/2014 - 21:16

In reply to by मेघना भुस्कुटे

१, २ मान्य केलं हे पुरेसं आहे. ३ विषयी स्वतंत्र कधीतरी लिहीन किंवा खाजगीत चर्चा करू. ४ मी म्हटल्याचं आठवत नाही. ते गब्बरचं मत आहे. 'लिंगगुणोत्तर हा रोग नसून, रोगाचं सिंप्टम आहे. आणि काही वेळा ते रोगामुळे नसून रोग सुधारल्यामुळे येतानाही दिसतं. याचा अर्थ भारतीय समाजात रोग नाही असं बिलकुल नाही. फक्त लिंगगुणोत्तरावर हल्ला करून रोगात सुधारणा होण्यात फार फरक पडणार नाही.' एवढं माझं सारांशात्मक मत मांडून मी या चर्चेतून अंग काढून घेतो आहे. 'काहो घासकडवी, तुम्ही असं कसं म्हणता, असं का म्हणता, असंच का म्हणता...' याचा कंटाळा आला.

गब्बर सिंग Sat, 26/07/2014 - 00:37

In reply to by मेघना भुस्कुटे

४. आपल्याला मुलगा हवा की मुलगी हे निवडण्याचा हक्क माणसाला हवा.

साफ पटत नाही. असा हक्क कशासाठी हवा? जन्माला येणारं मूल निरोगी, सुदृढ असावं याहून वेगळी कुणाची का अपेक्षा असावी? अशा प्रकारे केली जाणारी लिंगनिवड मुदलातच असमानतेचा परिणाम आणि असमानतेत परिणती दर्शवत नाही काय?

अपेक्षा, हक्क, व विकल्प हे एकच समजले की काय तुम्ही.

लिंग निवडण्याचा विकल्प हवा असे विधान मी केलेले आहे. व मी त्याचे समर्थन करतो. सरकारने गर्भलिंग चिकित्सा विरोधक कायदा करून हा विकल्प नष्ट करायचा यत्न केलेला आहे असा माझा आरोप आहे. समाजधुरिणांनी त्याला समाजकल्याणकारक कायदा हे नाव दिलेले आहे. व्यक्तीकल्याण हे विकल्पांच्या निर्मीतीत व असलेल्या विकल्पांचे रक्षण करणे - यामुळे असते. (अगदी समाजकल्याणकारकांचे व कल्याणकारी योजनांचे अध्वर्यू अमर्त्य सेन सुद्धा "डेव्हलपमेंट अ‍ॅज फ्रीडम" या मथळ्याचे पुस्तक लिहितात.). लिंग निवडी चा "हक्क" असणे व "विकल्प" असणे यात प्रचंड अंतर आहे.

----

जन्माला येणारं मूल निरोगी, सुदृढ असावं याहून वेगळी कुणाची अपेक्षा का असावी - हा प्रश्न तुम्ही करत आहात. वादी कोण आहे ? तुम्ही, समाजसुधारक, सरकार ? You or Govt. do not have the locus standi on this question.

डेमॉक्रसी मधे हा प्रश्न चूक आहे ? कारण मातेच्या उदरात काय असावे व काय नसावे ते ठरवण्याचा व वा अपेक्षा बिल्ड करण्याचा अधिकार तिला व पित्यास च आहे. व असावा. (अर्थात तो मातेला जास्त असावा असा ही माझा दावा आहे.)

-------

अशा प्रकारे केली जाणारी लिंगनिवड मुदलातच असमानतेचा परिणाम आणि असमानतेत परिणती दर्शवत नाही काय?

या विधानाबद्दल आपणास माझ्या तर्फे एक मोठ्ठी पार्टी. सिरियसली. Individuals do not want equality. Individuals aspire to have and nurture inequality. असा निष्कर्ष निघतो. व तो माझ्या मुद्द्याचेच समर्थन च करतो. तुम्ही ( व इतर समाजधुरीण ) समानता एन्फोर्स करू इच्छिता (लिंग चिकित्सा विरोधक कायदा करून). पण समानता इन्फोर्स करणे हे लोकांचे विकल्प कमी करणारे असते. Not to mention the cost of enforcement which sometimes falls on wrong people. समानता एन्फोर्स करणे हे समाजकल्याणाच्या डायरेक्ट विरोधक असते.

I know you are going to say - but Gabbar, we are trying to address the very same problem of inequality --- The problem that women are treated unequally by parents.

चिंतातुर जंतू Fri, 25/07/2014 - 19:16

>> ४. आपल्याला मुलगा हवा की मुलगी हे निवडण्याचा हक्क माणसाला हवा.
साफ पटत नाही. असा हक्क कशासाठी हवा? जन्माला येणारं मूल निरोगी, सुदृढ असावं याहून वेगळी कुणाची का अपेक्षा असावी? अशा प्रकारे केली जाणारी लिंगनिवड मुदलातच असमानतेचा परिणाम आणि असमानतेत परिणती दर्शवत नाही काय?

ह्या मुद्द्यातून इतर नैतिक प्रश्नही निर्माण होतात. उदा : गोरं असणं हे आपल्या संस्कृतीत चांगलं मानलं जातं. होणारं मूल १-१०च्या स्केलवर किती गोरं आहे हे गर्भाच्या जनुकीय चाचण्यांनुसार जाणून घेता येऊ लागलं तर मग पुरेसं गोरं नसलेलं मूल गर्भात आढळताच गर्भपात करून घ्यावा का? असंच समलिंगी मूल ओळखता येऊ लागलं तर त्याचा गर्भ पाडून टाकता यावा का, वगैरे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/07/2014 - 19:50

जन्माला येणारं मूल निरोगी, सुदृढ असावं याहून वेगळी कुणाची का अपेक्षा असावी? अशा प्रकारे केली जाणारी लिंगनिवड मुदलातच असमानतेचा परिणाम आणि असमानतेत परिणती दर्शवत नाही काय? -- मेघना भुस्कुटे

ह्या मुद्द्यातून इतर नैतिक प्रश्नही निर्माण होतात. उदा : गोरं असणं हे आपल्या संस्कृतीत चांगलं मानलं जातं. होणारं मूल १-१०च्या स्केलवर किती गोरं आहे हे गर्भाच्या जनुकीय चाचण्यांनुसार जाणून घेता येऊ लागलं तर मग पुरेसं गोरं नसलेलं मूल गर्भात आढळताच गर्भपात करून घ्यावा का? असंच समलिंगी मूल ओळखता येऊ लागलं तर त्याचा गर्भ पाडून टाकता यावा का, वगैरे. -- चिंतातुर जंतू

समजा ... भारतात (किंवा कोणत्याही समाजात) बहुतांश लोकांनी फक्त पुरुष, गोऱ्या, विषमलिंगी अर्भकांना जन्म द्यायचं ठरवलं तर काय 'मजा' येईल. जन्माला येणारी बहुसंख्य बालकं गोरीच असतील. माझ्या या गोष्टीत या बाबीमुळे काही फार फरक पडत नाही. निवडून काढल्यामुळे, हे पुरुष भिन्नलिंगीच बनतील. पण त्यांच्याशी लग्न करायला स्त्रियाच नसतील. त्यामुळे एकतर हे लोक सगळेच पुनरूत्पादन न करता मरतील, म्हणजे समाज नष्ट होईल. पण निवडून भिन्नलैंगिकच ठेवलेले असले तरीही हे लोक समलैंगिक वर्तन करण्यासाठी उद्युक्त होतील. म्हणजे निवड करूनही काही फायदा होणार नाही.

या समाजातही काही स्त्रिया असतील, एका स्त्रीला पाच-सात पुरुषांशी रत व्हावं लागेल. हे असं आयुष्य काही फार बरं नसेलच. पण त्यातही हे पाच-सात किंवा जे काही पुरुष आणि त्यांचे पगारी नोकर या स्त्रीचा संपर्क आणखी जास्त पुरुषांशी होऊ नये म्हणूनही काळजी घेतील. पर्यायाने अधिक जास्त वस्तुकरण.

समाजातल्या या अल्पसंख्य स्त्रिया आणि भिन्नलिंगी बनवलेले पण लैंगिक सुखासाठी नाईलाजाने समलैंगिक बनलेले बहुसंख्य पुरुष या प्रकारामुळे फार काही आनंदात असतील असं नाही. मग पुढे काय होईल हे समजण्यासाठी फ्रेंच राज्यक्रांतीची वर्णनं पुरेशी आहेत... समता , स्वातंत्र्य , बंधुता.

मी Fri, 25/07/2014 - 19:55

साफ पटत नाही. असा हक्क कशासाठी हवा? जन्माला येणारं मूल निरोगी, सुदृढ असावं याहून वेगळी कुणाची का अपेक्षा असावी? अशा प्रकारे केली जाणारी लिंगनिवड मुदलातच असमानतेचा परिणाम आणि असमानतेत परिणती दर्शवत नाही काय? जर तुमचा असमानतेला विरोध असेल, तर अशा लिंगनिवडीला तुम्ही नक्की कोणत्या आधारावर पाठिंबा देऊ इच्छिता? मला खरंच कुतूहल आहे.

"पब्लिक गुड/समाजाचे कल्याण ह्या मानवतावादी विचारासाठी व्यक्तिगत निवड स्वातंत्र्याचा त्याग करावा लागेल" हा विचार करण्याइतपत परिस्थिती वाईट आहे असे विरुद्ध बाजुने बोलणार्‍यांना वाटत नाही असे दिसते, त्याचप्रमाणे माझ्या त्यागाने परिस्थितीत फरक पडेल किंवा माझा त्याग हेच परिस्थिती बदलण्याचे साधन आहे हा युक्तिवाद काहींना सामाजिक परिस्थितीनुसार पटणेही अवघड आहे.

ह्या मुद्द्यातून इतर नैतिक प्रश्नही निर्माण होतात. उदा : गोरं असणं हे आपल्या संस्कृतीत चांगलं मानलं जातं. होणारं मूल १-१०च्या स्केलवर किती गोरं आहे हे गर्भाच्या जनुकीय चाचण्यांनुसार जाणून घेता येऊ लागलं तर मग पुरेसं गोरं नसलेलं मूल गर्भात आढळताच गर्भपात करून घ्यावा का? असंच समलिंगी मूल ओळखता येऊ लागलं तर त्याचा गर्भ पाडून टाकता यावा का, वगैरे

पण गमनासाठी नराला 'अधिक उपयुक्त' असल्याचे सिद्ध करणे गरजेचे असते असे डार्विनचा सिद्धांत सांगतो, त्यामुळे 'अधिक प्रेफरेबल' काय हे फक्त सांस्कृतीक दृष्ट्या ठरत असावे ह्याबद्दल शंका आहे.

मेघना भुस्कुटे Fri, 25/07/2014 - 20:25

In reply to by मी

१. लिंगनिवडीमध्ये नक्की कसलं स्वातंत्र्य आहे आणि ते न मिळण्यात 'त्याग' काय हेच माझ्या समजेच्या पलीकडचं आहे.
२. गोरेपणा हे सांस्कृतिक दृष्टा प्रेफरेबल नसून नैसर्गिक उत्क्रातीच्या तत्त्वानुसार प्रेफरेबल आहे, असं तुम्ही म्हणता आहात काय?

मी Fri, 25/07/2014 - 20:45

In reply to by मेघना भुस्कुटे

१. लिंगनिवडीमध्ये नक्की कसलं स्वातंत्र्य आहे आणि ते न मिळण्यात 'त्याग' काय हेच माझ्या समजेच्या पलीकडचं आहे.

मला मुलगाच व्हावा असं वाटणं हे वैयक्तिक निवड स्वातंत्र्य नाही काय? समाजाच्या भल्यासाठी मी माझी आवड मारुन मुलगी झाली तरी चालेल असं म्हणणं त्या स्वातंत्र्याचा त्याग नाही काय?

२. गोरेपणा हे सांस्कृतिक दृष्टा प्रेफरेबल नसून नैसर्गिक उत्क्रातीच्या तत्त्वानुसार प्रेफरेबल आहे, असं तुम्ही म्हणता आहात काय?

डार्विनच्या लैगिक निवडीचं ते लॉजिक आहे.

Nile Fri, 25/07/2014 - 21:44

या धाग्यातील माझा शेवटचा प्रतिसाद.

स्त्रियांची सुरक्षितता जन्माच्यावेळच्या लिंगगुणोत्तरानुसार राज्याराज्यांत बदलताना दिसते. ज्या राज्यात लिंगगुणोत्तर 'चांगलं' (अधिक मुली) तिथे स्त्रियांवरचे हल्ले जास्त दिसतात. त्यामुळे स्त्रियांची संख्या कमी झाल्यावर एक्सेस पुरुष हल्ले करतील, मुली पळवतील या भीतीला पाया दिसत नाही. चित्र खरं तर उलटंच दिसतं आहे. केरळमध्ये लिंगगुणोत्तर १०४८ आहे, तिथे सर्वाधिक हल्ले होताना दिसतात.

"1. States which fall within 1-12 ranks (worst top third) in at least three of four measures are: Chandighar, Haryana, Madhya Pradesh, Punjab, Rajastan, Uttar Pradesh, Daman & Diu and Delhi."

"Another way of interpreting these observations is tosay that violence against Indian girls/women is not random, but more likely to cluster in certain regions. States with dowry problems also seem to show problems in one or other measures. What is also worth underscoring is that the fact that all states/Union Territories that show the highest levels of problems (Haryana, Chandigarh, Delhi, Daman & Diu, Madhya Pradesh, Punjab, Rajastan and Uttar Pradesh) are located in some of the most affluent North-east and North-central regions of India."

बॅटमॅन Fri, 25/07/2014 - 22:11

In reply to by Nile

निळोबाशी पूर्ण सहमत आहे. मल्टिव्हॅरिएट प्रश्नांचा प्रेफरन्स दाखवूनही हा विदा न पाहता 'चर्चा तुम्ही असंच का आणि तसंच का म्हणता यावर आल्याने अंग काढून घेतो' असे म्हणण्यात प्वाइंट नाही.

धनंजय Sat, 26/07/2014 - 03:14

पुढील दोन मुद्द्यांत काही विरोध असल्याचे काही जणांच्या प्रतिसादांतून जाणवते :
१. जन्माच्या वेळेला स्त्री:पुरुष गुणोत्तर ९४०:१००० पेक्षा अधिक असावे समाजहिताचे आहे.
(पूर्ण लोकसंखेत गुणोत्तर ९७५:१००० किंवा अधिक असणे समाजहिताचे आहे, यातील जन्मानंतरचे बदल हा काहीसा वेगळा मुद्दा आहे.)
२. आपल्या शरिरातील गर्भ पूर्णतेस जाऊ द्यावा की नाही, हे ठरवण्याचा गरोदर स्त्रीचा खाजगी अधिकार आहे.
(जन्मानंतर मूल जगू न द्यावे असा कुठला खाजगी अधिकार नाही. उलट जन्मलेल्या बालकाला जीवनाचा स्वतःहून अधिकार आहे.)

१ वि. २ या दोन गोष्टी पूर्णपणे परस्परबाधक नसाव्यात. पालकांना स्त्री-अपत्य जन्म समान आवडीचा व्हावा अशी सामाजिक परिस्थिती शिक्षणामुळे निर्माण करता येईल, खरे. परंतु कदाचित हा विलंब धोरणाच्या दृष्टीने फार आहे. तसे होईपर्यंत पालकांकरिता स्त्री-अपत्यजन्म आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावा असे धोरण शासन राबवू शकते. ज्या देशांमध्ये बहुतेक लोक आयकर भरतात, तिथे स्त्री-अपत्यांच्या पालकांना आयकरात सूट दिली जाऊ शकते; ज्या देशांमध्ये बहुतेक लोक आयकर भरत नाहीत, त्या देशांत स्त्री-अपत्यांच्या पालकांना शासकीय तिजोरीतून शुल्क दिले जाऊ शकते. या धोरणाला सुद्धा विलंब लागेल, परंतु समाजमानस बदलण्यापेक्षा कमी वेळ लागेल. (सदस्य गब्बर सिंगना सबसिड्या आवडत नसाव्यात, असे वाटते, त्यामुळे बहुधा त्यांच्याकरिता हा मार्ग चालणार नाही.)

जन्माच्या नंतर स्त्री:पुरुष गुणोत्तर घटत असल्यास स्त्री-अपत्याचे कमी रक्षणपोषण होत असल्याचा निर्देश असू शकतो. अथवा हत्यासुद्धा होत असतील. जन्मलेल्या व्यक्तींचे हक्क पालकांच्या खाजगीपणाच्या हक्कापेक्षा वेगळे आणि वरचढ असतात. त्यामुळे बालकाची बुडवून हत्या, उपासमार करून हळू हत्या म्हणा सध्याच्या कायद्यानुसार गुन्हेच आहेत. या गुन्ह्यांचा तपास आणि त्यांच्यावर कारवाई पुरेशी होत नाही, किंवा अन्य गुन्ह्यांपेक्षा अधिक व्हावी, असे धोरण राबवले जाऊ शकते.

लिंगविवक्षित गर्भपात हा गुन्हा ठरवून त्या गुन्ह्याचा तपास करणे आणि त्याविरुद्ध कारवाई करणे अव्यवहार्य असावेसे वाटते. (कारण गर्भ कधी राहिला आणि गर्भपात कधी झाला याची नोंदणी करण्याची सक्ती व्यवहार्य नाही.) भारतात या कायद्याची अंमलबजावणी होत नाही ही वस्तुस्थिती भ्रष्टाचाराच्या माथी मारली, तर अन्य कुठल्या देशात हा कायदा व्यवहारात आलेला दिसतो का?
जन्म झालेले बालक मात्र आजूबाजूच्या लोकांना (आणि फौजदारी यंत्रणेला) उघड दिसते. शिवाय जन्म झालेल्या बालकांची नोंदणी सक्तीचे करणे व्यवहार्य आहे. त्यामुळे बालके मृत्यू पावली, तर ते लक्षात येऊन कारवाई करणे त्या मानाने सहज शक्य आहे.

नितिन थत्ते Sun, 27/07/2014 - 13:25

पर्स्पेक्टिव्ह स्पष्ट करण्यासाठी

१. पारंपरिकरीत्या स्त्री अपत्य नकोसे असल्याचे ज्ञान आणि विदा समाज आणि सरकार यांचेकडे आहे.
२ अनेक समाजगटांमध्ये जन्मलेल्या स्त्री अपत्यांना मारून टाकण्याचे प्रकार होत असतात हेही समाज आणि सरकार यांना ठाऊक आहे.
३. आज अनेक कुटुंबे दुसरे/तिसरे स्त्री अपत्य अनाथालयांना "अधिकृतपणे" सरेंडर करतात.

स्त्री अपत्यांबद्दल इतका नकोसेपणा असताना योग्य ते तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यावर लिंगनिदान करून गर्भपात करण्याचा चॉइस कुटुंबांना दिला तर ती कुटुंबे त्याचा गैरवापरच करतील अशी धारणा समाजाने ठेवली तर ती योग्यच आहे. सदर चॉईस काढून घेण्याचा समाजाचा निर्णय "गैरवापर होईल" अशा काल्पनिक भीतीवर आधारलेला नसून गैरवापर प्रत्यक्ष सुरू झाल्यावर झालेला आहे.

आता राहिला प्रश्न स्त्री अपत्य वाढवण्यासाठी इन्सेन्टिव्ह देण्याचा. त्यासाठी किती बजेट ठेवावे याचा अंदाज कोणी काढू शकते का?

कुटुंबाला दोन पेक्षा जास्त मुले असावीत की नाही हा कुटुंबाच्या चॉईसचा प्रश्न असू शकतो पण तिथे सरकारने तिसरे मूल झाल्यास कुटुंबाच्या सवलती काढून घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. फ्री चॉईस ठेवलेला नाही.

धनंजय Sun, 27/07/2014 - 21:13

In reply to by नितिन थत्ते

आता राहिला प्रश्न स्त्री अपत्य वाढवण्यासाठी इन्सेन्टिव्ह देण्याचा. त्यासाठी किती बजेट ठेवावे याचा अंदाज कोणी काढू शकते का?

या वाक्यावरून असे वाटते, की श्री. नितिन थत्ते यांचे पर्स्पेक्टिव्ह माझ्या वरील प्रतिसादाच्या ("रोचक चर्चा") अनुषंगाने आहे.

हे पर्स्पेक्टिव्ह आहेच (कमीतकमी मुद्दे १-३) : प्रथम वरील तीन मुद्दे माझ्या "रोचक चर्चा" प्रतिसादात माहीत असल्याचा दाखला :

पालकांना स्त्री-अपत्य जन्म समान आवडीचा व्हावा अशी सामाजिक परिस्थिती शिक्षणामुळे निर्माण करता येईल, खरे. (यात "सध्या समान आवडीचा नाही" हे अध्याहृत स्पष्ट आहे.)

जन्माच्या नंतर स्त्री:पुरुष गुणोत्तर घटत असल्यास स्त्री-अपत्याचे कमी रक्षणपोषण होत असल्याचा निर्देश असू शकतो. (यात सध्याच्या आकडेवारीकडे निर्देश आहे.)

हे परिप्रेक्ष्य आहे अशी हमी दिल्यानंतर आता "चॉईस" आणि "गैरवापर" या मुद्द्यांबाबत. मुद्दे १-३चे परिप्रेक्ष्य असल्यास या मुद्द्यांबाबत श्री. नितिन थत्ते यांचे मत आपोआप स्वयंस्पष्ट होत नाही.

स्त्री अपत्यांबाबत नकोसेपणा आणि स्त्री-गर्भाबाबत नकोसेपणा यांच्यात मला स्पष्ट फरक दिसतो : स्त्री अपत्यांबाबत नकोसेपणा वाटल्यामुळे केलेली वर्तणूक खर्‍याखुर्‍या स्त्री-अपत्य-व्यक्तीच्या अधिकारांवर घाला आहे. स्त्री गर्भाबाबत नकोसेपणा हा समाजाच्या भावी सर्वांगीण हितास नुकसान करते. समाजाचे भावी सर्वांगीण हित ही कोण्या एका-एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर पूर्ण समाजाची जबाबदारी आहे.

नकोसा गरोदरपणा थांबवणे म्हणजे संभाव्य नकोशा अपत्याचे दु:ख टाळणे, होय. नकोशा गरोदरपणाचे फळ असलेल्या अपत्यांना होणारे नुकसानाचे वर्णन या विकीपानावर आहेत, त्या पानावरच मूळ संदर्भ बघता येतील.
लोकशिक्षणात "नकोसे जन्म टाळा" असे म्हणण्याऐवजी "हवेसे जन्मच होऊ द्या" असे म्हटलेले दिसते, पण विचार तोच आहे :
"श्रीमंत" देशांत : Wanting Every Child to be a Wanted Child (दुवा)
"गरीब" देशांत : Every child should be wanted (दुवा)
(वरील दुवे एवढ्याकरिता दिले : हा विचार हस्तिदंती मनोर्‍यातील नाही)

स्त्रीलिंगविवक्षित गर्भपात म्हणजे गैरवापर कितपत आहे? की संभाव्य नकोशा स्त्री अपत्यांवरचे बहुतेक-अपरिहार्य जुलूम टाळणे आहे? म्हणून त्यातल्या त्यात बरे आहे? जर नकोशा लिंग-अविवक्षित-अपत्याचे हाल टाळण्याकरिता गरोदरपणी नियोजन योग्य आहे, तर स्त्री-अपत्याचे नुकसान टाळण्याकरिता गर्भाशय-नियोजनाबाबतही त्या दृष्टीने विचार करायला हवा. (हे संभाव्य स्त्री-अपत्य "भावी" असले, तरी "संपूर्ण समाजातील स्त्री:पुरुष गुणोत्तरा"पेक्षा विवक्षित आहे, आणि त्या संभाव्य अपत्याचे पोषण करणारे पालकही विवक्षित आहेत.)

पुढील पिढीत समाजाला पुरेशा स्त्रिया हव्या आहेत, म्हणून कोण्या विवक्षित बाई, श्री. अलाणी फलाणे हिला बळजबरीने नकोसा गर्भ वाढवला मग (मुद्दा क्रमांक ३ प्रमाणे अनाथालयात देणेही चालणार नाही) निकृष्ट पालनपोषणही करवून घेतले तर समाजाचा भावी फायदा तरी ठीक होईल का? नाही होणार.
---
स्त्री अपत्यांची पैदास करायची फारच मोठी गरज तर आहे. स्त्रियांना बळजबरीने गाभण ठेवण्याऐवजी आपखुषीने गाभण होण्यास तयार स्त्रियांचे गोठे स्थापन करावे, त्या स्त्रियांना मोफत खुराक द्यावा. समाजाकरिता ही किंमत म्हणजे भावी फायद्यासाठी गुंतवणूक ठरेल. शिवाय आपखुषीने गाभण झालेल्या, खुराक दिलेल्या मातांना मानसिक शांततेमुळे जन्मानंतर अंगचे दूधही मुबलक स्रवेल. आपल्याला ज्यांच्यामुळे खुराक मिळतो अशा वत्सींचे पालनपोषणही त्या अधिक जिव्हाळ्याने करतील. (उगाच "काय-काय कल्पक युक्त्या सुचतात" म्हणून कोणास कौतूक वाटल्यास हा श्रेयअव्हेर : "लोकसंख्या आणि उपासमार कमी करण्यासाठी एकवर्षीय बालके खाण्याकरिता वापरावीत" हा प्रसिद्ध उपाय बराच जुना आहे.)
---
आपल्या देशाचा पूर्वानुभव आठवून बघूया. लोक चॉईस आहे म्हणून काय करत असे काही लोकांना वाटे? आपल्याला परवडत नाही इतकी अपत्ये जन्माला घालून आपल्या स्वातंत्र्याचा आणि जननेंद्रियांचा गैरवापर करत. म्हणून त्यांच्या जननेंद्रियांवर सक्तीने शस्त्रक्रिया करायच्या पर्वातूनही भारत गेलेला आहे (दुवा). त्याकरिता समांतर मुद्दे १-३ त्या काळी देताही आले असते. तरी त्या लेकुरवाळ्या अपत्यांचा जन्म होण्यापूर्वीच कोणाच्या जननेंद्रियावर (व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध) नियंत्रण करणे हे जुलमी आहे.

जुलुमच नव्हे, तर नैतिकता बाजूला ठेवून धोरण म्हणून बघितले, तरीही अकार्यक्षम होते : भारतातील जननदर १९७६आधीसुद्धा (अन्य देशांसारखाच) घटत होता, परंतु त्यानंतर कित्येक वर्षे प्रतिक्षिप्त प्रक्रिया म्हणून तो वाढला, किंवा आदल्याइतका घटत राहिला नाही. (असे माझ्या १९९०च्या Park and Park. Preventive and Social Medicine पाठ्यपुस्तकात आकडे होते, या क्षणी आकड्यांचा दुवा अंतरजालावर सापडत नाही.)

आज आपण नसबंदी केल्यास कुटुंबांना पैसे देतो - त्यासाठी किती बजेट ठेवावे याचा अंदाज कोणी काढू शकते का? अर्थसंकल्पाकरिता अंदाज काढावाच. परंतु कोणाच्या जननेंद्रियावर आणि गर्भाशयावर बळजबरी करण्यापेक्षा हे स्वस्त पडेल की महाग पडेल हा ताळा अनाठायी आहे.

---

गंमत अशी, की वरील "जननेंद्रिय खाजगी असते" हा मुद्दा परिप्रेक्ष्य नसल्यासारखा वाटू शकतो. अनेक विचारी लोकांनी वर अशा आशयाचे मुद्दे मांडले आहेत. परंतु पुढील विचारधारा मात्र "परिप्रेक्ष्य नाही" आरोपातून सटकतात : (१) खुद्द भारताच्या इतिहासातील सक्तीचे कुटुंबनियोजन आणि त्याचे असाफल्य हा खूपच वेगळा आणि गैरलागू मुद्दा आहे (२) सध्याच्या स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायद्यांचे असाफल्य => हेच कायदे अधिक बळजबरीने लागू करण्यास प्रेरणा.

मला वाटते "परिप्रेक्ष्य आहे/नाही" हे आरोप बाजूला ठेवले पाहिजेत. विचार या दिशेने गेल्यास अधिक उपयोगी : (१) अमुक-तमुक उपाय नैतिक आहे काय? (२) अमुक-तमुक उपाय कार्यक्षम आहे की नाही, याबाबत ऐतिहासिक साधनसामग्री आहे काय? (३) अन्य नैतिक उपाय उपलब्ध आहेत काय? (४) अन्य उपाय कार्यक्षम असल्या-नसल्याबाबत अनुभव उपलब्ध आहे काय? (५) वरील मुद्दे भारताबाहेरच्या देशांचे अनुभव काही प्रमाणात लक्षात घेऊन, आणि भारतातील अनुभव लक्षात घेऊन विचार करावा लागेल.

उदाहरणार्थ लिंग-गुणोत्तराबाबत वेगवेगळ्या धोरणांबाबत साफल्याची आकडेवारी कदाचित अन्य देशांत मिळू शकेल. मात्र जननेंद्रियावर शासकीय नियंत्रण, त्या+पुढच्या पिढ्यांनी त्याची नैतिकता कशी जोखली याबाबत भारतात अनुभव मिळेल. वेगवेगळी धोरणे कितपत सफल होतात? त्या सर्वांची तुलना एकाच गावात झाली, असा अनुभव उपलब्ध नसला, तरी हे वेगवेगळे अनुभव जोडून काही व्यवहार्य विचार करता येईल. अशा तर्‍हेने समाजाचा दीर्घकालीन फायदाही बघता येईल, परंतु कोण्या विवक्षित व्यक्तीकडून बळजबरीने वसुलीही करण्याचे टाळता येईल.

नितिन थत्ते Sun, 27/07/2014 - 22:05

In reply to by धनंजय

बराचसा सहमत आहे.

मुळात पर्स्पेक्टिव्ह मांडले ते स्त्री-भ्रूण हत्या होतच नसणार (किंवा त्या निग्लिजिबल असणार) असा हायपोथेसिस पुढे आला म्हणून मांडले.

रुची Tue, 29/07/2014 - 01:10

या संपूर्ण धाग्यात नैतिकतेचा मुद्दा फक्त चिंतातूर जंतूंनी आणलेला दिसला (माझ्या नजरेतून अजून कोणता प्रतिसाद निसटला असला तर क्षमस्व...पण निवडून (वाचनीय) वाचताना दमछाक झाली. :-)
माझ्या मते नैतिक आणि कायदेशीर नेहेमी एकत्र जातातच असे नाही. मला स्वतःला 'सज्ञान स्त्री-पुरुषांत परस्परसंबंधीने आणि गर्भधारणा टाळण्याचे पर्याय असताना निर्माण झालेल्या गर्भाचा, गर्भपात' अनैतिक वाटतो. ज्या मनुष्यांच्या समाजात जनावरांच्या (पक्षी, मानवासारखे अस्तित्व नसलेल्या जीवांच्या) अनावश्यक छ्ळाबद्दल कायदे आहेत तिथे मनुष्याच्याच गर्भाला केवळ "स्त्रीच्या शरीराचा नको असलेला अनावश्यक भाग" अशी केलेली मांडणी नैतीकदृष्या पटत नाही (पण त्याच्याशी धर्माचा काहीच संबंध नाही) असे वाटणारे असे अनेकजण असावेत. जन्ममृत्यूच्या रेषा इतक्या अस्पष्ट असताना केवळ 'बारा आठवड्यांच्या' सीमारेषेवर नैतिकता ठरविणेही कठीण जाते. पण अशी नैतिक भूमिका असलेल्यांनाही 'कोणत्याही परिस्थितीत गर्भपात' बेकायदेशीर करावा असे वाटत नाही याच्या मुळाशी, सामाजिक मानसिकतेचा विचार करता, त्या कायद्याचा दुरुपयोग स्त्रीयांवर नको असलेली गरोदरपणे लादण्यावर आणि पर्यायाने त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यावर येतील अशी भिती असते. याउलट पुरुष गर्भाचा गर्भपातही निवडीच्या मुद्द्यावर तितकाच 'अनैतिक' असतानाही सामाजिक परिस्थितीचा विचार करता त्याबद्दल कायदा न करताही त्याचा दुरुपयोग होणार नाही अशी शक्यता मोठी असते. नैतिकतेच्या मुद्द्यावर मला स्त्रीभ्रूण आणि पुरुषभ्रूण दोन्ही प्रकारचे गर्भपात अनैतिक वाटतात (ऋषिकेशच्या म्हणण्याप्रमाणे 'हत्या' वाटतात) पण त्यातल्या एका अनैतिकतेबद्दलच कायदा असावासा वाटतो याचे कारण त्यामागे असलेले सामाजिक मानसिकतेचे भान आहे.

Nile Wed, 21/10/2015 - 05:16

स्त्रीभ्रुण हत्येबरोबरच एकंदरीतच असमतोल सेक्स रेशोविषयीच्या एका चांगल्या लेखाचा दुवा येथे देत आहे. चर्चेत भाग घेतलेल्यांनी जरूर वाचावा. पण पुढे कधीतरी संदर्भासाठीही उपयोगी येईल या उद्धेशाने इथे प्रतिसाद देतो आहे. (त्यामुळे जुना धागा वर येईल या बद्दल दिलगीरी.)
Where The Girls Are (And Aren't): #15Girls (NPR)
http://www.npr.org/sections/goatsandsoda/2015/10/20/448407788/where-the…