अंधश्रद्धा पण आधुनिक
काही लोक खरोखरीचे पुरोगामी असतात. काही नसतात. काही दिशा भरकटलेले असतात. म्हणजे त्यांची इच्छा शुद्ध पुरोगामी असायची असते पण त्यांना पुरोगामीत्वाची दुसरी बाजू माहितच नसते. त्यांचे मते 'पारंपारिकतेला बदडणे' हीच काय ती पुरोगामीता. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या पारंपारिक नाहीत, पण प्रतिगामी आहेत. मी इथे त्यांची यादी बनवायचा प्रयत्न करत आहे. सखोल विश्लेषण अर्थातच मी दिलेले नाही.
१. घटना. आपल्याला 'घटनेने' अधिकार दिलेले आहेत असे मानणे. मग एका राजामधे आणि घटनेत फरक काय? राजाच्या बोलण्यात किमान थोडी फ्लेक्सिबिलिटी असू शकते, घटना एकादा लिहिली कि फिक्स. घटना नव्हती तेव्हा बोलण्या-चालण्यावर पूर्ण बंदी होती का? राष्ट्राच्या १२० कोटी लोकांच्या (सरकारचा नव्हे) जीवनात काय योग्य आणि काय अयोग्य हे एका पुस्तकात शोधणे किती योग्य म्हणावे? हे नवे ग्रंथप्रामाण्य नव्हे काय? वेदांचे अर्थ लावणारे ब्राह्मण आणि घटनेचे अर्थ लावणारे वकिल यांत अर्थाअर्थी फरक नसावा.
२. राष्ट्रपिता. एखाद्या व्यक्तिस राष्ट्राचा पिता मानणे. हे नाव बदलावे (राष्ट्रनेता करावे, इ) असे कोणास वाटत नाही का? मागच्या काळी माता, पिता, गुरु यांना इश्वर मानत (कशाला काहीही मानत)तसे आजही कशाला काही म्हणणे, मानणे चालूच आहे.
३. शपथविधी. माणसाने शपथ घेतली म्हणजे तो पुढे नीट वागेल असे मानणे मूर्खपणाचे आहे. कितीतरी मंत्री, शिपाई, पोलिस असे शपथेप्रमाणे प्रत्यक्ष चांगले वागत नाहित हे माहित असूनही त्यांना शपथ दिली जाते.
४. रिबन. एखादा प्रकल्प चालू करताना रिबन का कापावी? कोणी पुरोगामी तिथे आरडाओरडा करताना का दिसत नाही? रिबनचे ते काय मूल्य असे म्हणता येणार नाही. तो समारंभ खर्चिक असतो. कधीकधी तर एवढ्याच कारणासाठी (उद्घाटनासाठी) पूर्णत्वास गेलेला प्रकल्प कितीतरी दिवस तसाच ठेवतात.
५. पदांचा क्रम. सगळ्या लोकांचे समान महत्त्व असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, इ इ असा क्रम लावायची काय गरज आहे. हे पद आणि ही कामे. माझ्या शहरातल्या एका माणसाला महापौर म्हणणे आणि मला साधा पौर म्हणणे अपमानास्पद नाही का?
६. राष्ट्रगीत. देशाला निवडलेल्या एका गीताची काय गरज आहे? सर्वांना तेच गाणे का आवडावे? त्याचा गुणात्मक दर्जा काय? त्याला उभे राहून का ऐकावे? आपल्या देशाच्या लोकांवर, इ प्रेम व्यक्त करणारे अजून कोणते गाणे सरस वाटले तर?
७. राष्ट्रध्वज. एका कापडी डिझाईनला सूल्यूट करणे, सर्वोच्च स्थानी मानणे, खाली न पडू देणे, सर्वात उंच जागीच फडकावणे याला काही तांत्रिक अर्थ नाही. देशाच्या लोकांचा सन्मान कापडी फडक्यात गोळा झालेला नसतो. शिवाय राष्ट्रध्वजाची थिम फार सर्वसुयोग्य आहे का?
८. ब्रीदवाक्य - सत्यमेव जयते हे वाक्य तांत्रिक दृष्ट्या चूक आहे. सत्य आणि असत्य यांचीच लढाई असेल असे नाही आणि असलीच तर सत्यच जिंकते असा अनुभव नाही. हे वाक्य नक्की कोणत्या संघर्षाच्या संदर्भात आहे हे ही नीट कळत नाही. असो. कर्माचे फळ आपल्या हातात नसते हे जसे गीतेत अर्थहिन वाक्य आहे किमान तितकेच हे ब्रीदवाक्य देखिल आहे.
९. राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल, फळ - बाकीच्या पक्षांनी, प्राण्यांनी, फूलांनी, फळांनी कोणाचे घोडे मारलेत? ही निव्वळ विकारण (random) चयने आहेत. तरीही ती श्रेष्ठ मानायची?
१० स्वातंत्र्य, समता, बंधुता - हे लोकगुण आहेत कि शासनगुण हेच कळणे मुळी अवघड आहे (म्हणजे लोकांना सरकार समान मानणार आहे कि लोक एकमेकांना समान मानणार आहेत?). जर हे घटनेप्रमाणे लोकगुण आहेत तर ते पहिल्या 'स्वातंत्र्य' शब्दाच्याच आड येतात. म्हणजे या व्यवस्थेत मला स्त्री पुरुष 'समान' नाहीत असे मानण्याचे 'स्वातंत्र्य' कसे असेल? नक्की काय कसे समान मानायचे आणि कशाचे स्वातंत्र्य आहे कळण्यासाठी नवब्राह्मण वकील लागतातच. घटनेने दिलेले स्वातंत्र्य, आदर्श अंमलबजावणी आहे काय हे पाहिले तर, फारच कमी आहे. जमिन माझी पण तिच्यावर मी घर बांधायचं का फॅक्टरी हे सरकार सांगणार.
११. युनिफॉर्म - काळा डगला घातल्याशिवाय वकिल ओळखताच येत नाहीत असे मानले तरी पदवी स्वीकारताना विचित्र आकाराची टोपी घालणे गरजेचे नसावे. शोक करण्यासाठी पांढरेच कपडे गरजेचे नसावेत.
१२. रविवार - ज्या देशात रविवारी खूप कमी लोक चर्चमधे जातात तिथे रविवारी सुट्टी असणे अनुचित वाटते. दुसरा कोणता वार बरा वाटला असता.
१३. टाय - मुंबईत टाय घालावा असे वातावरण कदाचित वर्षात एखादा दिवसच असेल. तरी भर उन्हाचे किती लोक टाय आणि ब्लेझर घालतात, दुसरीकडे घामाच्या धारा गाळत असतात.
१४. इंग्रजी - जी भाषा खूपच कमी लोकांना येते (आणि त्यांनाही ती सहजतेने येत नाही)अशी साता समुद्रापलिकडील भाषा, लोक आपली भाषा निवडायला स्वतंत्र असूनही, प्रशासकिय व वाणिज्यिक व माध्यमांची व प्रतिष्ठीत भाषा म्हणून वापरली जाते. या गाढवपणावर गाढवपणा म्हणून कधी टिका होत नाही.
१५. न्यायालय. हाय कोर्ट एक निर्णय देते, सुप्रिम कोर्ट त्याच्या विरुद्ध देऊ शकते. वा रे न्याय!
१६. नोटरी. एखादा कागद ज्या प्रकारे नोटराईज केला जातो त्याने त्याच्या विश्वसनीयतेत फरक पडतो.
१७. न्यायदेवता. ही 'आजही' आंधळी आहे. अगदी मूर्तीरुप पाहिली आहे.
१८. बुके. पाच सेकंद हातात ठेवण्यासाठी बुके द्यायचा. स्वागत स्वीकारणारा मग तो लगेच मागे देतो.
१९. फॅशन. मॅचिंग सेट्स ठेवण्याच्या नादात अलमार्या भरून टाकायच्या. मूलतः कपडे घालणे ही कशाची गरज आहे हे इथे विसरायलाच होते. मग जुन्या कपड्यांच्या शैलीला ओंगळ म्हणायचे.
२०. ईश्वर - ईश्वर नाहीच हे छातीठोकपणे सांगणे. मग जगाचे सुसुत्र (आणि संपूर्ण) स्पष्टीकरण देताना काहीच्या काही विधाने करणे. बिग बँग पार्टिकल कसे निर्माण झाले आणि इश्वराने जग कसे निर्माण केले यात काहीच फरक न ठेवणे.
२१. निसर्ग - निसर्ग सम्यक (चांगले वा वाईट हे जाणणारा) नाही असे म्हणणे. हे लोक स्वतःच निसर्गाचा १००% भाग असतात. यातून जो circular reference बनतो तो फार गंमतशीर असतो.
२२. उत्क्रांती - उत्क्रांतीला दिशा असते असे मानणे. उत्क्रांतीतून काहीही शक्य आहे असे मानणे. उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या मर्यादा झाट माहित नसणे.
२३. विज्ञान - विज्ञानाला उद्या सगळे माहित होणार आहे, ते सगळ्या समस्यांमधून मानवतेला बाहेर काढणार आहे असे जणू माहित असणे. विज्ञानाचा आणि समाजशास्त्राचा अव्वाच्या सव्वा संबंध लावणे.
२४. पाश्चिमात्य विद्वान - पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा कोट खराच असतो असे मानणे.
ईश्वर, निसर्ग, उत्क्रांती, विज्ञान आणि मॉस्लो यांच्याबद्दलची विचारसरणी अर्ध्या पुरोगामीत्वाचा मूलाधार आहे. असो>
तसे असेल तर जगण तर्ककर्कश
तसे असेल तर जगण तर्ककर्कश होईल.
नुस्ते इतकेच नव्हे तर निरर्थक होईल. त्याने कै नुकसान होईल की नै हा मुद्दा वेगळाच. पण हा तथाकथित तर्ककर्कशपणा म्हणजे एकप्रकारची वैचारिक हुकुमशाही आहे.
शिवाय जगण्याला अर्थ देणे हा प्रकार भौतेक पूर्णपणे मानवी आहे. त्यामुळे असे जीवन 'अमानवी' होईल ;)
निरुपद्रवी संकेतांवर टीका
निरुपद्रवी संकेतांवर टीका झाल्यास अवश्य विरोध करावा पण जुन्या काळातील उपद्रवी संकेतांवर टीका झाल्यास प्राब्ळम असू नये मग.
नक्कीच. पूर्णतः मान्य.
आत्ता सांगा विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि एकत्र कुटुंबसंस्था या उपद्रवी कि निरुपद्रवी? मागच्या काळाप्रमाणे आणि आजच्या काळाप्रमाणे? मागच्या काळात काय होते म्हणून त्या काळावर कोणकोणेती टिका योग्य आणि कोणकोणती अयोग्य? तसेच आजच्या काळाबद्दल काय?
घटक
आत्ता सांगा विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि एकत्र कुटुंबसंस्था या उपद्रवी कि निरुपद्रवी? मागच्या काळाप्रमाणे आणि आजच्या काळाप्रमाणे?
ह्या संस्था काळाच्या परिस्थितीसाठी(चांगल्या/वाईट) जबाबदार होत्या असे मानता येईल काय? असे मानल्यास त्यांचे उपद्रवमुल्य निश्चित करणे शक्य आहे काय?
मग एका राजामधे आणि घटनेत फरक
मग एका राजामधे आणि घटनेत फरक काय? राजाच्या बोलण्यात किमान थोडी फ्लेक्सिबिलिटी असू शकते, घटना एकादा लिहिली कि फिक्स.
याला घटनेबद्दल अज्ञान म्हणावे का आपले मत रेटण्यासाठी मुद्दाम केलेला काणाडोळा?
असो. अज्ञान असल्यास हे वाचा
राष्ट्रपिता. एखाद्या व्यक्तिस राष्ट्राचा पिता मानणे
एखाद्यास राष्ट्रपिता मानणे आणि हिंदुहृहयसम्राट, स्वातंत्र्यवीर मानणे, लोकमान्य मानणे किंवा 'नेताजी' मानणे यात अर्थाअर्थी काय फरक?
बाकी राष्ट्रपिता म्हणजे अख्ख्या राष्ट्राचा पिता मानणे? असोच! या अर्थाने ही श्रद्धा कोणी बाळगत असेलसे वाटत नाही. ;)
माणसाने शपथ घेतली म्हणजे तो पुढे नीट वागेल असे मानणे मूर्खपणाचे आहे.
+१ सहमत आहे. फक्त "नीट" ऐवजी 'खरे' हा शब्द घालेन.
एखादा प्रकल्प चालू करताना रिबन का कापावी?
नका कापू, काही रिबिन कापतात, काही सत्यनारायण घालतात, काही नारळ फोडतात. या पद्धतीत श्रद्धेपेक्षा 'घोषणेचा' भाग अधिक वाटतो. त्यात मला काही त्याज्यही वाटत नाही नी अनुकरणीयही!
सगळ्या लोकांचे समान महत्त्व असताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, इ इ असा क्रम लावायची काय गरज आहे
.
प्रत्येक पदाचे स्वरूप हे पद ही कामे असेच आहे. मात्र केलेले काम योग्य आहे की नाही हे कसे ठरवायच? कोणी ठरवायच? यासाठी प्रत्येक पदावर लक्ष ठेवायला एक दुसरे पद तयार होते. सर्वोच्च पद (राष्ट्रपती) मात्र नामधारी आहे व त्याला अधिकारच इतके मर्यादित आहेत की दुरूपयोगाची शक्यता कमी आहे.
माझ्या शहरातल्या एका माणसाला महापौर म्हणणे आणि मला साधा पौर म्हणणे अपमानास्पद नाही का?
नाही तुम्हालाही महापौर व्हायची संधी आहे. त्या पदावरील व्यक्ती स्थायी नाही तोवर मला त्यात अपमानास्पद काय वाटायचे?
राष्ट्रगीत. देशाला निवडलेल्या एका गीताची काय गरज आहे?
कोणतीही "गरज" नाही
सर्वांना तेच गाणे का आवडावे? त्याचा गुणात्मक दर्जा काय? त्याला उभे राहून का ऐकावे?
असे कोणतेही बंधन घटनेने घातलेले नाही. उभे राहून ऐकणे ही अंधश्रद्धा आहे (पण मला तरीही ही अंधश्रद्धा जाणतेपणी पाळणे आवडते)
आपल्या देशाच्या लोकांवर, इ प्रेम व्यक्त करणारे अजून कोणते गाणे सरस वाटले तर?
तर त्याही गाण्याला उभे रहा, कोणी काही म्हणणार नाही!
राष्ट्रध्वज
राष्ट्रध्वज ही श्रद्धा नसून प्रतिक(खूण) आहे.
८. ब्रीदवाक्य - सत्यमेव जयते हे वाक्य तांत्रिक दृष्ट्या चूक आहे. सत्य आणि असत्य यांचीच लढाई असेल असे नाही आणि असलीच तर सत्यच जिंकते असा अनुभव नाही. हे वाक्य नक्की कोणत्या संघर्षाच्या संदर्भात आहे हे ही नीट कळत नाही. असो. कर्माचे फळ आपल्या हातात नसते हे जसे गीतेत अर्थहिन वाक्य आहे किमान तितकेच हे ब्रीदवाक्य देखिल आहे.
नै कळ्ळे. यात श्रद्ध कुठे आली?
९. राष्ट्रीय पक्षी, प्राणी, फूल, फळ - बाकीच्या पक्षांनी, प्राण्यांनी, फूलांनी, फळांनी कोणाचे घोडे मारलेत? ही निव्वळ विकारण (random) चयने आहेत. तरीही ती श्रेष्ठ मानायची?
नका मानू. आही जैववैशिष्ट्ये ही त्या त्या देशात विपूलतेने आढळतात किंवा त्या त्या देशातच आढळातात किंवा देशाची ओळखच बनतात (जसे किवी, कांगारू वगैरे). मात्र त्यांना श्रेष्ठत्व कोणी बहाल करते असे वाटत नाही. असल्यास ती श्रद्धा आहे हे नक्कीच!
१० स्वातंत्र्य, समता, बंधुता - हे लोकगुण आहेत कि शासनगुण हेच कळणे मुळी अवघड आहे
याचा नी श्रद्धेचा संबंध कळ्ळा नाही
- काळा डगला घातल्याशिवाय वकिल ओळखताच येत नाहीत असे मानले तरी पदवी स्वीकारताना विचित्र आकाराची टोपी घालणे गरजेचे नसावे. शोक करण्यासाठी पांढरेच कपडे गरजेचे नसावेत.
१२. रविवार - ज्या देशात रविवारी खूप कमी लोक चर्चमधे जातात तिथे रविवारी सुट्टी असणे अनुचित वाटते. दुसरा कोणता वार बरा वाटला असता.
१३. टाय - मुंबईत टाय घालावा असे वातावरण कदाचित वर्षात एखादा दिवसच असेल. तरी भर उन्हाचे किती लोक टाय आणि ब्लेझर घालतात, दुसरीकडे घामाच्या धारा गाळत असतात.
१८. बुके. पाच सेकंद हातात ठेवण्यासाठी बुके द्यायचा. स्वागत स्वीकारणारा मग तो लगेच मागे देतो.
यात पुन्हा श्रद्धा कुठे आली? तुमची तक्रार रास्त असु शकते वा नसते पण श्रद्धा काय्/कोणती?
.
१४. इंग्रजी - जी भाषा खूपच कमी लोकांना येते (आणि त्यांनाही ती सहजतेने येत नाही)अशी साता समुद्रापलिकडील भाषा, लोक आपली भाषा निवडायला स्वतंत्र असूनही, प्रशासकिय व वाणिज्यिक व माध्यमांची व प्रतिष्ठीत भाषा म्हणून वापरली जाते. या गाढवपणावर गाढवपणा म्हणून कधी टिका होत नाही.
यावर टिका होत नाही??? हा हा हा! असो.
१५. न्यायालय. हाय कोर्ट एक निर्णय देते, सुप्रिम कोर्ट त्याच्या विरुद्ध देऊ शकते. वा रे न्याय!
१६. नोटरी. एखादा कागद ज्या प्रकारे नोटराईज केला जातो त्याने त्याच्या विश्वसनीयतेत फरक पडतो.
१७. न्यायदेवता. ही 'आजही' आंधळी आहे. अगदी मूर्तीरुप पाहिली आहे.
तुम्हाला ही पद्धत मान्य नाही असे दिसते. ठिक आहे पण म्हणून इतरांना ही पद्धत योग्य वाटते. बहुसंख्यांनी ही पद्धत ठरवली आहे. यात श्रद्धेचा भाग कुठे आला?
छ्या! दमलो!
आधी तुमची श्रद्धेची व्याख्या सांगा बघु! तिथेच आपले दुमत संभवते बहुदा!
श्रद्धा
याला घटनेबद्दल अज्ञान म्हणावे का आपले मत रेटण्यासाठी मुद्दाम केलेला काणाडोळा?
घटनाराजाचा ६५ वर्षांत एकच शब्द बदलला आहे. तो ही आणिबाणिच्या काळात घुसडला आहे - धर्मनिरपेक्ष. बाकी सारे बदल थातूर मातूर आहेत. त्यात तत्त्व्वात्मक काहीच नाही. ईतका कडक राजा पाहिलाच नाही असे म्हणायचे होते.
राष्ट्रपिता मानणे आणि हिंदुहृहयसम्राट, स्वातंत्र्यवीर मानणे, लोकमान्य मानणे किंवा 'नेताजी'
अजून उदाहरणे दिल्याबद्दल धन्यवाद. लोहपुरुष, साक्षात् दुर्गा, घटनेचे शिल्पकार, बहुजनसम्राट, इ इ उदाहरणे देखिल त्याच पट्टीतली.
राष्ट्रध्वज ही श्रद्धा नसून प्रतिक(खूण) आहे
मग तो 'चूकून' उलटा लागला, इ कि तर टिका का होते? अण्णा आणि केजरीवाल यांच्यावर ध्वजाच्या अवमानाची केस आहे हा जोकच नाही का? त्यांनी अवमान केलाच नाही. मी स्वतः तो कार्यक्रम टिव्हीवर पाहत होतो. काय तर म्हणे रात्री झेंडा लावला. फ्लॅग कोड वाचा एकदा. एकूण किती अंधश्रद्धा आहेत याची कल्पना येईल. प्रतिकाची गरज काय, आणि त्याच्या इतक्या कडक नियमांची तर कायच काय?
आणि एक अर्थहिन वाक्य आपले ब्रीदवाक्य असावे का? सुजाण लोकांनी आपल्या देशाचे हे ब्रीद आहे असे मानणे अंधश्रद्धा नाही तर काय?
यात पुन्हा श्रद्धा कुठे आली? तुमची तक्रार रास्त असु शकते वा नसते पण श्रद्धा काय्/कोणती?
अंधश्रद्धा मूर्खपणाला, ते ही शहाण्याने केलेल्या, म्हणतात. स्वत:ला शहाणे समजणारे, एकमेकांना शहाणे समजणारे लोक जेव्हा मूर्खासारखे वागतात तेव्हा त्यालाच अंधश्रद्धा म्हणायचे असते.
या गाढवपणावर गाढवपणा म्हणून कधी टिका होत नाही.
यावर टिका होत नाही??? हा हा हा! असो.
तुम्ही जसे सत्यनारायण करणारास अंधश्रद्ध मानता, तसेच इंग्रजीत प्रशासन करणार्या अधिकार्यास मानत नसावात असा अंदाज बांधला. टिका शहाण्यांवरही होते, पण मनात गाढव मानणे, मूर्ख मानणे आणि अंधश्रद्ध मानणे वेगळे. टिका वेगळी आणि अंधश्रद्ध मानणे वेगळे.
तुम्हाला ही पद्धत मान्य नाही असे दिसते. ठिक आहे पण म्हणून इतरांना ही पद्धत योग्य वाटते. बहुसंख्यांनी ही पद्धत ठरवली आहे. यात श्रद्धेचा भाग कुठे आला?
बहुसंख्य लोक 'नव्या' अंधश्रद्धा पाळतात, आणि तथाकथित शहाण्यांच्या नजरेतून सुटतात, हेच तर लेखात सांगायचे.
आधी तुमची श्रद्धेची व्याख्या सांगा बघु! तिथेच आपले दुमत संभवते बहुदा!
माणसाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी माहिती हवी असते. काही माहिती तो प्रत्यक्ष घेतो. काही अपवाद सोडले तर अशी सर्व माहिती म्हणजे सत्य. बाकी सर्व अंधश्रद्धा. पण काही विशिष्ट प्रकारच्या अंधश्रद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात शिवाय त्या कधीच खोडल्या गेलेल्या नसतात. त्या अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा.
-१
आभार!
अंधश्रद्धा मूर्खपणाला, ते ही शहाण्याने केलेल्या, म्हणतात. स्वत:ला शहाणे समजणारे, एकमेकांना शहाणे समजणारे लोक जेव्हा मूर्खासारखे वागतात तेव्हा त्यालाच अंधश्रद्धा म्हणायचे असते.
तुम्ही अंधश्रद्धा या शब्दाचा उपयोग गाढवपणा, वेडेपणा, मूर्खपणा वगैरेचा प्रतिशब्द म्हणून करताय असे दिसते. मला हा अर्थ अपेक्षित नाही. श्रद्धा ही श्रद्धा असते. तिचे परिणाम, तर्क व तिचा कार्यकारणभाव हे निराळे व सापेक्ष चर्चाविषय!
माणसाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी माहिती हवी असते. काही माहिती तो प्रत्यक्ष घेतो. काही अपवाद सोडले तर अशी सर्व माहिती म्हणजे सत्य. बाकी सर्व अंधश्रद्धा. पण काही विशिष्ट प्रकारच्या अंधश्रद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात शिवाय त्या कधीच खोडल्या गेलेल्या नसतात. त्या अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा
असो माझ्यासाठी श्रद्धा ही अंधच असते. त्यामुळे मी या दोन्हीत फरक करत नाही. मात्र म्हणून श्रद्धा बाळगणे नेहमीच गैर वा हीनपणाचेही मानत नाही. त्याच वेळी 'अटळ श्रद्धा', 'निश्चल श्रद्धा' मात्र अतर्क्य (प्रसंगी हास्यास्पदही) समजतो.
असो. मी बहुतांश मुद्द्यांवर असहमती नोंदवून रजा घेतो.
यावर प्रतिवाद माझ्या कुवतीच्या आणि उपलब्ध वेळेच्या पलिकडील आहे.
माणसाला जगण्यासाठी, विचार
माणसाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी माहिती हवी असते. काही माहिती तो प्रत्यक्ष घेतो. काही अपवाद सोडले तर अशी सर्व माहिती म्हणजे सत्य. बाकी सर्व अंधश्रद्धा. पण काही विशिष्ट प्रकारच्या अंधश्रद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगल्या असतात शिवाय त्या कधीच खोडल्या गेलेल्या नसतात. त्या अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा
व
असो माझ्यासाठी श्रद्धा ही अंधच असते. त्यामुळे मी या दोन्हीत फरक करत नाही. मात्र म्हणून श्रद्धा बाळगणे नेहमीच गैर वा हीनपणाचेही मानत नाही. त्याच वेळी 'अटळ श्रद्धा', 'निश्चल श्रद्धा' मात्र अतर्क्य (प्रसंगी हास्यास्पदही) समजतो.
मधे तसूभरही फरक नाही.
अभिप्रेत
बाकी राष्ट्रपिता म्हणजे अख्ख्या राष्ट्राचा पिता मानणे? असोच! या अर्थाने ही श्रद्धा कोणी बाळगत असेलसे वाटत नाही.
अगदी हेच. मागच्या काळातही काही विधाने आढळली म्हणजे ती तशास तशी लोकांना अभिप्रेत होती असे नव्हे.
बाजारात तुरी भट भटणीला मारी मधे सोयिस्करपणे
१. पुरुष स्त्रीयांना मारत.
२. तुर फार महाग असे.
३. तुरींचे बाजार असत.
४. तुरी विकत घेणे फार अवघड होते.
५. तुर घरी आणणे अवघड होते.
६. तुरी वरून विवाद होत.
अजून जिचे स्वरुप स्पष्ट नाही तिच्यावरून वादावादी करू नये इतकाच सिमित अर्थ घ्यावा. असले अर्थ काढू नयेत. ऋणं कृत्वा वरूनही तसलेच अर्थ काढू नयेत. सुताहून स्वर्ग गाठू नये. जगत सर्वम् व्यासोच्छिष्टितम् म्हणजे व्यास प्रत्येकाच्या थाळीत थुंकत असे नव्हे. रक्षाबंधन भाऊ तू स्वतःच्या रक्षणास असमर्थ आहेस. ते मीच करेन असे म्हणतो असे नव्हे. ते मी (ही) करतो असे ते आहे.
भाषिक अभिव्यक्तीचा केवळ
भाषिक अभिव्यक्तीचा केवळ शब्दार्थ न बघताना लक्षणार्थ आणि गूढार्थही विचारात घ्यावेत हे म्हणणं सर्वसाधारणपणे बरोबर आहे. असं केलं नाही तर समाजव्यवहार चालणं अशक्य होऊन बसेल. मात्र जेव्हा एखादा विशिष्ट सामाजिक अन्याय दूर करायचा असतो, तेव्हा हे लक्षणार्थ आणि त्यांची सुप्त शक्ती मोठी अडचणीची होऊन बसते. कारण भाषेत दडलेले हे लक्षणार्थ भाषिकांच्या सुप्त मनावर सत्ता गाजवत असतात. त्या विशिष्ट अभिव्यक्तीसोबत तिचा लक्षणार्थ तर येतोच; पण त्या अभिव्यक्तीमध्ये फॉसिलाइज होऊन बसलेली तत्कालीन सामाजिक परिस्थितीही येते. (इथे अभिव्यक्ती: बाजारात तुरी, भट भटणीला मारी. लक्षणार्थः चिंता करण्यासारखी परिस्थिती भविष्यात असताना आधीच चिंताक्रांत होऊन (बहुतांश वेळा) पॅनिकी कृती करणे. अभिव्यक्तीत फॉसिलाइज झालेली तत्कालीन सामाजिक परिस्थिती: पतीने पत्नीला मारणे ही एक सर्वसाधारण आणि आक्षेप न घेण्यासारखी साधीशी गोष्ट आहे.) ज्या समाजघटकांना हा अन्याय दूर करण्यात रस असतो, ते या अभिव्यक्तीला विरोध करून तत्कालीन परिस्थितीचे सद्यकालीन भाषिकांच्या मनात उमटणारे पडसादही नाकारू बघत असतात. (भाषा हे एक शक्तिशाली माध्यम आहे, त्यामुळे तिच्यातल्या तथाकथित / साधार अन्यायांच्या संभाव्य परिणामांचा असा धसका लोकांनी घेणे साहजिकच आहे.) त्यातून अशा प्रकारच्या अभिव्यक्तीला विरोध केला जातो. (उदाहरणार्थ विद्या बाळांनी 'पुरुषार्थ नसणे = बांगड्या भरणे' या वाक्प्रचाराला केलेला विरोध.) तो विरोध यशस्वी होईल किंवा न होईल, ते विरोधकांच्या तारतम्यावर, त्यांना असलेल्या लोकबळावर आणि घटनाक्रमावर अवलंबून आहे. पण असा विरोध मुळातच चूक आहे, असं मात्र म्हणता येत नाही.
याची उलटी उदाहरणंही देता येतील. जुनी माणसे (आज्या आणि आजोबा, वृद्ध शिक्षक इत्यादी) नवीन (वयाने सहसा तरुण) माणसाचे नाव विचारतात आणि 'मेघना' किंवा 'ऋषिकेश' इतकेच उत्तर ऐकल्यावर त्यांच्या कपाळावर आठी पडते. 'वडील नाहीत का तुला?' अशी कठोर किंवा 'मुला/ली, पूर्ण नाव सांगावं...' अशी सौम्य दटावणी करून वडिलांचं आणि कुटुंबाचं नाव विचारून घेतलं जातं. ही कृती काय दर्शवते? आडनावाला आणि पर्यायानं सामाजिक उतरंडीला (किंवा रचनेला म्हणू) दिलेली बगल आम्ही स्वीकारत नाही, आम्हांला नावासोबत या रचनेची माहिती देणारी जुनी पद्धतच हवी आहे... असं सांगणारी भूमिका दर्शवते. ही भूमिका राहील वा संपून जाईल. पण ते काळच ठरवेल. तिला चूक कसं म्हणणार?
तसंच भाषिक अभिव्यक्तीतून दिसणार्या जुन्या सामाजिक रचनेला केल्या जाणार्या विरोधाचंही आहे.
लक्षणार्थ सरलार्थ इ इ
अभिव्यक्तीत फॉसिलाइज झालेली तत्कालीन सामाजिक परिस्थिती: पतीने पत्नीला मारणे ही एक सर्वसाधारण आणि आक्षेप न घेण्यासारखी साधीशी गोष्ट आहे.
आयजीच्या जीवावर बायजी उदारचा खरा अर्थ एकाच्या जीवावर दुसर्याने औदार्य दाखवणे असा आहे. आपण ज्या प्रकारे म्हणींत समाजमन पाहता तेच जर मी पाहायला गेलो तर तर सरळसरळ आई आणि बाई या घरांतल्या स्तीयांकडे क्रयशक्ती असायची असा अर्थ निघतो. पत्नीला पती मारायचे हे मी मान्य करायला तयार आहे. स्त्रीयांना क्रयशक्ती होती हे मान्य करायला आपण तयार असाल का?
आडनावाला आणि पर्यायानं सामाजिक उतरंडीला (किंवा रचनेला म्हणू) दिलेली बगल आम्ही स्वीकारत नाही, आम्हांला नावासोबत या रचनेची माहिती देणारी जुनी पद्धतच हवी आहे.
किती आडनावे आहेत आणि पैकी किती फक्त एकाच जातीला वाहीलेली आहेत याची आपल्याला कल्पना आहे काय? ब्राह्मणांच्या नावाची यादी जोशी आडनावापासून सुरु होते म्हणतात. हेच आडनाव एक क्रूर, हत्या करणार्या, चोरी करणार्या (ब्राह्मण सोडून) इतर एका जातीचे खुद्द पुण्यात आहे! एक लहान अनोळखी मूल आपले नाव सांगते तेव्हा त्याने एकच शब्द सांगीतला तर किती पंचाईत येईल. लहान मुलांची नाव सांगायच्या वयात स्वतःची अशी ओळख नसते. त्यांना पालकांवरूनच ओळखणार हे साहजिकच आहे! कसे कळणार तो/ती कोणाचा/ची आहे? शिवाय आमच्याकडे तर ही शिस्त म्हणून पद्धत फक्त शाळेत असायचे. आमचे नाव मास्तर असणारे पाव्हणेच पूर्ण विचारायचे. इतरांना आमचे नाव असेच माहित असे, वा आई सांगे. मला उभ्या आयुष्यात मास्तरांखेरीज कोणी पूर्ण नाव विचारले नसावे.
आपण सामाजिक अन्याय शोधता ही चांगली गोष्ट आहे. पण विपर्यास करणे योग्य नव्हे. प्रत्येकच गोष्टीत आपण अन्याय, तो ही एका विशिष्ट प्रकारचा पाहायचा प्रयत्न करू लागलात तर तो आपल्याला दिसेलही, पण सत्य तसेच होते असे नाही.
मी साहित्यिक नाही आणि माझ्याकडे म्हणींचे पुस्तक नाही अन्यथा मी बर्याच म्हणी काढून दाखवल्या असत्या ज्यात स्त्रीचे श्रेष्ठत्व आहे.
एक आठवलं-
स्वामी तिन्ही जगाचा...म्हणजे सगळं सोडून पुरुषाने आईला जगवलं पाहिजे.
मुद्दा लक्षात न घेता प्रतिवाद
मुद्दा लक्षात न घेता प्रतिवाद करायचा झाला, तर 'आयजी' नि 'बायजी' ही बायकांचीच नावं कशावरून, 'शिवाजी','संभाजी','रावजी'सारखी पुरुषांची नावं नसतील कशावरून, असा प्रश्न विचारणं कठीण नाही. पण तसं करून वादांतून काहीही निष्पन्न होत नाही.
मुळात कुठल्याही म्हणीचा अर्थ लावताना लक्षणार्थ ध्यानी घ्यावा, हे स्वयंस्पष्ट आहे. त्याबद्दल वाद नाही. पण हा लक्षणार्थ ध्यानी घेऊनही काही म्हणींना वा वाक्प्रयोगांना विरोध होतो, तो का होतो? तर त्याची कारणं अशा सामाजिक प्रक्रियांमधे सापडतात, असं सांगायचं आहे. मुळात म्हणींमधून दिसणारा भूतकालीन सामाजिक अन्याय मला मान्य आहे की नाही, हा प्रश्न नसून - भाषिक शस्त्रांच्या धारेला समाज बिचकून असतो आणि त्यातून असे विरोध होतात असं निरीक्षण आहे. मी अशा विरोधाला पाठिंबा देते की त्याची हेटाळणी करते हा मुद्दा इथे गौण आहे. लोक त्यांना हव्या त्या पद्धतीनं भाषा वाकवून - परजून घेऊ पाहत असतात, ते सत्तेचं एक महत्त्वाचं साधन असतं अशा दृष्टीनं मी या विरोधाकडे (आणि विरोधाला हिरिरीनं होणार्या विरोधाकडे!) पाहते.
बाकी आडनाव हे जात जाणून घेण्यासंदर्भात संपूर्णतः निरुपयोगी आहे, असा तुमचा दावा असेल, तर तुमच्यासारखा भोळा मनुष्य मी दुसरा पाहिलेला नाही. आडनाव, भौगोलिक मुळांबद्दलची आणि नातेसंबंधांची थोडकी माहिती यांच्या जिवावर जातीचा वा निदान तिच्या उच्चनीचत्वाचा छडा लावणारे अनेक तरबेज लोक मी पाहिलेले आहेत. पण तो एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. त्यावरून इथे वाद नको. कारण 'जात ओळखणं कस्सं बाई वाईट' असं म्हणणं हा त्या उदाहरणाचा उद्देशच नाही. भाषा आपल्याला हवी त्या प्रकारे वापरण्यासाठी किती प्रकारच्या छुप्या, सूक्ष्म चकमकी कळत-नकळत खेळल्या जात असतात, त्याचं ते एक उदाहरण आहे. बस.
अरुण जोशी तुमच्या लेखनावरुन
अरुण जोशी तुमच्या लेखनावरुन मला निर्मुलनवाल्यांचे निर्मुलन हा अवधुत परळकरांचा लेख आठवला. तुम्हाला जाम आवडेल.
बदलत्या काळात
श्रद्धा, अंधश्रद्धा, संकेत हे त्या त्या काळाच्या गरजेनुसार निर्माण झाले असावेत. बदलत्या काळात जर त्यांच्यामुळे गैरसोय, अडचण होत असेल तर खुशाल ते अडगळीत काढावेत किंवा आपोआप ते अडगळीत जातील. नवीन संकेतही बहुतांशी आपोआपच रूढ होतात. सरकारी फतवे सोडून. पण त्यातही सरकार बदलल्यावर हे संकेत बदलण्याची/ बदलवण्याची शक्यता/संधी असते. फतवेच नव्हेत तर इतर काही गोष्टीही राज्यकर्ते बदलल्याने बदलू शकतात. काळाच्या ओघात वस्त्रप्रावरणविषयक संकेत बदलतात. उदा. गांधी टोपी, नऊवारी साडी, टाय, पंचा, मुकटा, धाबळी पगडी वगैरे.
असे कॉण म्हण्टॉ?
असे कोण म्हणतो?१
मुळात इथे मूळ मुद्दा असा काही आहे, या गृहीतकाला आधार काय?
===========================================================================
१ यावरून एक विनोद आठवला. बिहारमधली गोष्ट आहे. (किंवा, बिहारच्या नावावर खपवून देऊ या.)
कोर्टात केस चाललेली असते, आणि जज्जमहोदय एका पक्षाच्या वकिलास त्याच्या वागणुकीवरून झापत असतात. "आप हद से गुज़र जा रहे हैं" वगैरे वगैरे.
वकीलमहोदय: "कौन साला ऐसा कहता है?"
जज्जमहोदय रागाने लालबुंद. हा वकील मला "साला" म्हणतो, आणि तेही भर कोर्टात! कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे बोलू लागतात.
वकील: "लेकिन मिलार्ड, मैं ने तो सिर्फ़ इतना पूछा, कि कौनसा ला (= law, मराठीत 'कायदा') ऐसा कहता है?"
असो. मुद्दा लक्षात आला असावा, अशी आशा आहे.
===========================================================================
@सारीका: सॉरी, राहावले नाही. I had to do it. (सासूबै माझ्या नाहीत, यास्तव सूट(/liberty) घेतली. आणि, There's no regret; If I had to do the same again, I would, etc.)
प्रोटोकॉल - संकेत
अगदि तर्क लावूनच विचार केला तर प्रोटोकॉल - संकेत खुळचटपणाचे वाटू शकतात.
खरकट्या हाताने किंवा शेंबड्या हाताने किंवा घाणीने बरबटलेल्या हाताने झेंडा लावू नये हा एखाद्या देशात संकेत असेलही.
"अशा हाताने झेंडा लावाला तरी झाट काही बिघडत नाही देशाचे/समाजचे" असे कुणी तर्कही मांडेल.
पण "खरकट्या हाताने झेंडा लावू नये" ह्या संकेतात अंधश्रद्धा नाही.
"असा झेंडा लावल्याने लागलिच आर्थिक अरिष्ट, वादळे येतील " किंवा "झ्यूस वगैरे देवांची खप्पामर्जी होउन आख्खी देशातील जनता निर्वंश होण्याच्या वाटेला लागेल्.परचक्र येइल.
जनता नागवली जाइल्.तुडवली जाइल." असे मानले तर ती अंधश्रद्धा.
सध्या तरी "झेंडा अमुक तमुक पद्धतीने लावल्याने झेंड्याचा/देशाचा/सरकारचा अपमान होतो" इतकीच मान्यता आहे.
मान्-अपमान ह्या संकल्पना कुणाला खुळचटपणाच्या वाटू शकतील. पण त्या अंधश्रद्धा कुठेत ?
काही गोष्ट केल्याने वादळ येईल
काही गोष्ट केल्याने वादळ येईल ही अंधश्रद्धा आहेच खरी. पण झेंडा ही देखिल अंधश्रद्धा आहे. केजरीवालांवर आणि अण्णांवर (आणि अल्का याज्ञिकवर) रात्री झेंडावंदन केले म्हणून केस टाकण्यात आली होती. रात्री झेंडा लावणे हा गुन्हा आहे आणि असे करणारास जेलमधे घालावे ही देखिल अंधश्रद्धा आहे. संपूर्ण फ्लॅग कोड अंधश्रद्धा आहे.
नो
वेडगळपणा आणि अंधश्रद्धा ह्यात गल्लत होत आहे असे वाटते.
केस टाकणे हे फार तर मूर्खपणाचे म्हणता यावे. "केस टाकली नाही तर आपत्ती ओढावेल. परलय येइल; जजमेंट डे उजाडेल" ही अंधश्रद्धा.
पूर्वी राजे-महाराजांना मुजरा वगैरे करायची पब्लिक.
ग्रीक राजांना सॅल्यूट करण्याचाही विशिष्ट प्रघात असावा.
पण ग्रीक मंडळी जो "देवाचा कौल" वगैरे विनोदी प्रकार करीत त्यास अंधश्रद्धा म्हटले जाते.
सॅल्यूत व प्रोटोकॉल्स ह्यला अंधश्रद्धा म्हटले जाते.
.
.
ह्यावर पुन्हा आपले आर्ग्युमेंट येइलच.
"ते प्रोतोकॉल्सही अंधश्रद्धाच आहे" ह्यवर इतकेच म्हणेन
"अंधश्रद्धा आहेच" किंवा "अंधश्रद्धा नाहिच" असे म्हणण्याऐवजी वाक्याची पुनर्रचना केली तर अधिक योग्य होइल.
"अरुण जोशी ह्याला अंधश्रद्धा मानतात"
व
"उर्वरित जग ह्यास अंधश्रद्धा मानत नाही"
अशी दोन्ही वाक्ये योग्य ठरतील.
श्रद्ध-अंधश्रद्धा ह्या प्रवृत्तीबद्द्लची भाष्य असल्यानं ह्यात सर्वसाधारण वैज्ञानिक सत्यासारखे किम्वा सोप्या गणिती समिकरणासारखे एकाच निष्कर्षावर येणं कठीण.
या धाग्यात दिलेल्या गोष्टीत
या धाग्यात दिलेल्या गोष्टीत अंधश्रद्धा म्हणावे असे फारसे काही दिसले नाही. मात्र या धाग्याच्या मथळ्यामुळे आधुनिक अंधश्रद्धांवर चर्चा होईलसे वाटले होते. माझ्या निरिक्षणांपासून सुरूवात करतो:
-- "शेअर बाजारात पैसे घातले की बुडलेच म्हणून समज" अशी अंधश्रद्धा मी बरेच वर्षे बाळगून होतो.
-- "सोन्यासारखी दुसरी गुंतवणूक नाही" ही अंधश्रद्धा तर अनेकदा अजूनही ऐकू येते. अर्थात माझा यावर कधीच फारसा विश्वास बसला नाही.
-- अमेरिकेहून (कितीही कमी काळात) परतलेल्या प्रत्येक व्यक्तीने किमान कोटी रुपये कमवले असतील अशी अंधश्रद्धा तर असेलच असेल.
-- ए.सी.त राहुन सर्दी होते
-- छ्या! पुण्यात नोव्हेंबर मध्ये पाऊस?!! ग्लोबल वॉर्मिंग हो ग्लोबल वॉर्मिंग! (पुण्यात नोव्हेंबर मध्ये पूर्वेच्या पादळी हव्यांमुळे अनेकदा नोव्हेंबरच काय डिसेंबरातही पाऊस पडतो, पण दरवेळी हे वाक्य म्हटल्याशिवाय आपले निसर्गप्रेमसिद्ध होत नसावे)
-- चला! मुलाला सीबीएससीत घातले आहे, घरी भरपूर खेळणी आहेत, डीव्हीडिप्लेअरपासून Wii पर्यंतच सगळी गॅजेट्स आहेत, महिन्याला किमान एक चित्रपट दाखवतो, आपल्या शहरातील प्रत्येक मॉलमध्ये मुलाला घेऊन गेलो आहे, त्याला मॅक्डॉनल्ड वगैरे सोडाच विविध पास्ताचे प्रकार अगदी तोंडपाठ आहेत, त्याला शिरा-थालिपिठ-उप्पीट म्हटले की यीक्स करतो अन् नाश्त्याला आईसबर्ग लेट्युसच लागतं तेव्हा आपले मुल आनंदात आहे व आपण आदर्श पालक! :)
-- 'व्ह'र्न्याक्युलरमधून शिक्षण घेणे म्हणजे मुलांच्या भवितव्याचा आपणहून नाश करणं ('व्ह'वर विशेष जोर)
-- वेगवेगळे सण, सवयी, संकेत यांना नावे ठेवली की आपण पुरोगामी झालो.
-- ठराविक पक्षाला मत दिले तरच आपण राष्ट्रभक्त. बाकीचे देशद्रोही साले!
अजूनही अंधश्रद्धा आहेत पण तुर्तास इतरांच्याही ऐकतो.
समूह जीवन जगताना काही संकेत,
समूह जीवन जगताना काही संकेत, परंपरा, प्रथा पाळल्या जातात. बर्याचदा त्या कालबाह्य असतात व तर्कसंगत ही नसतात.पण निरुपद्रवी असतात. आपण संवाद साधताना बर्याचदा निरर्थक गोष्टी/शब्द वापरत असतो. संवादातील प्रत्येक शब्द, वाक्य, हेतु अर्थपुर्ण असलाच पाहिजे असे नाही. तसे असेल तर जगण तर्ककर्कश होईल.