ध्यान, एक अनुभव -२
ध्यानाच्या पद्धती व अनुषंगिक फायदे याची माहिती घेण्यापूर्वी थोडेसे अवांतर.
श्री. नानावटी यांच्या दोन लेखातील काही मुद्द्यांचे मला उमगलेले निराकरण असे.
लेखातील पहिला मुद्दा लेखकाने सांगितलेल्या ध्यानाच्या दोन पद्धती. या तशा ठीक वाटतात. तथापि ध्यानाच्या पद्धती या हेतूप्रमाणे ठरत असून त्यांचे आणखीही बरेच प्रकार आहेत. सर्वसधारणपणे वैद्यकीय सहाय्यासाठी हरित ध्यान (GREEN COLOR MEDITATION) ही पद्धत जास्त उपयुक्त आहे, असा अनुभव आहे.
दुसरा मुद्दा - ध्यानामधून मनोविकार होतात का ? ...होऊ शकतात. ध्यानाच्या सुरुवातीच्या काळात इंद्रियांची संवेदनक्षमता वाढते असे निरिक्षण आहे. विपश्यनाकाळात बरेच साधक अनावरपणे रडतात/हसतात असे आढळले आहे, ते यामुळेच. चुकीच्या मार्गाने ध्यान गेले तर मानसिक विकार होऊ शकतात. म्हणून ते योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास चांगले.
तिसरा मुद्दा ध्यानाचा हेतू. निर्वाणावस्था किंवा साक्षात्कार हे ध्यानाचे हेतू असू शकतात. अर्थात ज्यांना तिथपर्यंत जायचे आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. मुळात ध्यान हे कोणतेही व्यवहारिक उद्दिष्ट गाठण्याचे साधन नसून स्वत;ची ओळख करून घेण्याचे साधन आहे. ध्यान हे बुद्ध्यांक, धैर्य अथवा इतर कोणतेही विशिष्ट स्पर्धात्मक गुण कोणत्याही व्यक्तीमध्ये रोपित किंवा विकसित करण्याचे हत्यार नसून व्यक्तीच्या स्वाभाविक क्षमता ओळखणे व विकसित करणे याचा एक मार्ग आहे. तूर्त तरी आरोग्यविषयक फायदे इतकाच या चर्चेचा हेतू आहे.
चौथा मुद्दा ताणतणाव. ध्यानधारणेमुळे ताण तणावापासून मुक्ती मिळते याचा इथे अर्थ, ताण तणाव टाळणे अथवा उपस्थितच न होणे असा नाही. तर दैनंदिन जीवनात अपरिहार्य असणाऱ्या ताण तणावाच्या प्रतिकूल परिणामांपासून शरीर व मनाचे रक्षण करणे हा आहे. रबर जसे ताणल्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीला येते तसे ताणलेले मन व शरीर नंतर पुन्हा चटकन सहज स्थितीत यावे, हा ध्यानाचा परिणाम आहे. तसेच ध्यानामुळे मनोधैर्य वाढते यापेक्षा मनाची स्थिरता, लवचिकता व धारणाशक्ती वाढते असे म्हणणे योग्य ठरेल. हा कोणताही दावा नसून फक्त अनुभव आहे.
ध्यानाबाबतीत करण्यात आलेल्या विविध प्रयोगांची माहिती लेखकाने दिली आहे. यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ध्यान करणाऱ्या व्यक्तींना स्वत:ला ध्यान जमले अशी खात्री होती काय ? त्यांच्या मेंदूलहरींचा अभ्यास केला होता काय ? त्यांची ध्यानावस्था परिपूर्ण असल्यची खात्री केली गेली होती काय ?
ध्यानोपासना ही काहीशी अलिप्त साधना आहे. ध्यान हा एक संपूर्ण व्यक्तिगत अनुभव आहे. त्याचे जनरलायझेशन करता येत नाही. समूहावरील परिमाणाचा अभ्यास करून फार तर निष्कर्ष काढता येतील पण कोणत्याही सामुहिक निष्कर्षावरून ध्यान या साधनाचे मूल्यमापन करणे म्हणजे समुद्र त्याच्या सर्व साधनसंपत्तीसह गॅलनमध्ये तोलण्यासारखे होईल. अध्यात्मिक क्षेत्रातल्या डामडौल व प्रसिद्धीचे खऱ्या ध्यानोपासकाना वावडे आहे. ध्यानाचा कथित ‘पुरस्कार’ करताना कोणी आढळत नाही. काहीही सिद्ध करणे हा ध्यानोपासकांचा हेतू नसून काहीतरी शेअर करणे हा आहे. इथेही उद्देश हाच आहे की इतरांनीही या मार्गाचा केवळ अनुभव घ्यावा.
लेखकाने पुष्कळ प्रयोगांचे निष्कर्ष दिले आहेत. परंतु ध्यानाचा अनुभव घेतला आहे किंवा नाही, याचा लेखात कुठे उल्लेख आढळत नाही.
इंद्रियांची आकलनक्षमता हा एक मुद्दा. हा तर अत्यंत गैरलागू मुद्दा. कारण ध्यान म्हणजे इंद्रीयांपासून निवृत्ती. त्यातून इंद्रियांची आकलनक्षमता वाढण्याची अपेक्षा का करावी ? जग ‘उमजणे’ ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. आपल्याला जसे जग दिसते तसे एखाद्या किड्याला दिसत असेलच असे नाही. पण म्हणून किड्याचा अनुभव खोटा अन आपला खरा असे नसून आपला अनुभव हा एका वेगळ्या मितीतला आहे, इतकेच फार तर म्हणता येईल.
ध्यानाने एकाग्रता वाढते हे मात्र निर्विवादपणे सिद्द झाले आहे. एकाग्रता हा कोणत्याही एका इंद्रियाच्या क्षमतेचा अविष्कार नसून ती सर्व इंद्रिये, मन व बुद्धी यांचे को-ऑर्डीनेशन असते. ध्यानामुळे शरीर व मन यांचे तादात्म्य पूर्ण होते, जे की दैंनदिन जीवनात नेहमी अपूर्ण असते, किंवा अलाइन झालेले नसते. इंद्रियांच्या अनुभूती मनाला व मन शरीराला सतत कोणा एका दिशेकडे खेचत असतात. ध्यानामध्ये हे सर्व आपल्या स्वाभाविक स्थितीमध्ये स्थिर होतात. कागदाची विशिष्ट घडी घातली की विमान व्हावे तसे यांचे होते. सुटा कागद हवेत दिशा घेऊ शकत नाही, पण त्याचे विमान विविक्षित दिशेला प्रक्षेपित करता येते. तसे काहीसे एकाग्र मनाचे आहे. पण हा विषय पुन्हा विवेचनाचा नसून अनुभवाचा आहे.
परदेशात ध्यान या गोष्टीचे स्तोम माजवले गेले आहे ही बाब मात्र नि:संशय खरी. आणि त्यात खरे काय नि खोटे किती हे कळणे कठीण. क्रेझ म्हणून ध्यान करणाऱ्यांची संख्याही कमी नसावी. पण जसे जाळीतून आलेला म्हणून सूर्यप्रकाश दूषित ठरवता येत नाही, तद्वत चुकीच्या पद्धतीने ध्यान करणाऱ्यांमुळे ध्यान करणेच वाईट म्हणता येणार नाही.
ध्यानोपासनेतील अनियमितता ही मानसिक अनारोग्याचे लक्षण होय, हे मात्र १०० टक्के खरे आहे. मुळात ध्यानाचे जे काही लाभ आहेत, ते नियमित व दीर्घकाळ ध्यान केल्यानंतरच मिळू शकतात. ध्यान हा मनाचा व्यायाम आहे. कोणताही व्यायाम दीर्घकाळ केल्यानंतरच त्याचे परिणाम दृग्गोचर होतात. अन करण्याचे थांबवल्यावर परिणामही हळू हळू नाहीसे होतात. तसेच ध्यानाचे आहे. सातत्य व नियामितपणा हे ध्यानाचे दोन मूलभूत प्रक्षेपक आहेत.
DHEA त वाढ हा आणखी एक मुद्दा. याबाबत, माझे लेखन हे एका नियतकालिकाच्या संदर्भावर आधारित आहे. तथापि नियतकालिकात लिहिले आहे म्हणून मी तसे म्हटले नसून मला जेव्हा तसा अनुभव आला, तेव्हा त्यामागचे कारण शोधण्यासाठी मी अभ्यास केल्यावर हा संदर्भ मला मिळाला. डॉक्टरांच्या एका मोठ्या समुदायाने ध्यानाच्या आरोग्यविषयक लाभांना मान्यता दिली आहे. तथापि इथे पुन्हा हेच सांगावेसे वाटते, की मान्यवरांनी मान्यता दिली अथवा शिक्कामोर्तब केले म्हणून कुणीही ध्यानपद्धती आचरावी असे नसून स्वत:च्या निकषांवर ती चढवून अन घडवून पहावी ही अपेक्षा आहे.
Deep Meditation state ही मेंदूच्या कोणत्याही एका भौतिक घटकाशी (Neuron) निगडीत नसून ती सर्व भौतिक घटकांची स्वाभाविक स्थिती आहे. ती अभौतिक आहे. तिचे भौतिक औषधात रुपांतर(?) करणे शक्य होईल असे वाटत नाही.
ध्यानोपासक जास्त सुखी असतात हे विधान पायारहित आहे. मुळात सुख हे सापेक्ष आहे. सुख हे अंतिम लक्ष्य नसून ती एक स्थिती आहे याची जाणीव जागृत राहण्याचे कार्य ध्यानात होते, इतकेच म्हणू शकेन.
ध्यान ही स्वतंत्र उपचार नसून इतर कोणत्याही उपचार पद्धतीस ती सहाय्यभूत आहे असे म्हणता येईल. कोणत्याही उपचाराचा पूर्णत्वाने परिणाम सहजस्वाभाविक स्थितीतच त्वरित होणार. यात अनैसर्गिक ते काय ? रक्तप्रवाहच निरुद्ध अवस्थेत असेल तर इंजेक्ट केलेले औषध परिणाम करील काय ? ध्यान शरीराची निरुद्ध अवस्था फक्त शिथिल करते. उपचार औषधच करते.
इतर बऱ्याच मुद्द्यांचे श्री नानावटी यांच्या लेख क्र. दोनच्या प्रतिसादांमध्ये विवरण झाले आहे. त्या सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. पुढील लेखात प्रत्यक्ष ध्यान पद्धतीवर चर्चा करुया.
भीती
दुसरा मुद्दा - ध्यानामधून मनोविकार होतात का ? ...होऊ शकतात. ध्यानाच्या सुरुवातीच्या काळात इंद्रियांची संवेदनक्षमता वाढते असे निरिक्षण आहे. विपश्यनाकाळात बरेच साधक अनावरपणे रडतात/हसतात असे आढळले आहे, ते यामुळेच. चुकीच्या मार्गाने ध्यान गेले तर मानसिक विकार होऊ शकतात. म्हणून ते योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास चांगले.
यात योग्य मार्गदर्शना शिवाय ध्यान केल्यास मनोविकार होउ शकतात असा सूर आहे म्हणा वा भीती घातली आहे म्हणा. ध्यानाशिवाय देखील मनोविकार उदभवू शकतातच की? एखाद्या सिनेमा, सिरियल,नाटक, कथा वगैरे मधे तुम्ही तल्लीन होउन गेलात कि तुम्हा सहसंवेदनेचा अनुभव घेताच की? तेव्हाही तुम्हाला रडू येते, हसू येते. भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या मो़कळ्या करण्यात एक वेगळाच अनुभव असतो. दाबून कोंडुन ठेवल्याने मनावर एक ताण येतो.
बाकी ध्यान हे प्रकरण अनुभूतीचा प्रांत असल्याने त्यावर काय बोलणार? फार तर मला तंद्री लागली की ध्यानाची अनुभूती घेतो असे म्हणतो. :) :-)
धन्यवाद, प्रकाशजी.
सोरी, मला असे म्हणायचे आहे की मार्गदर्शनाखाली ध्यान केल्यास अधिक चांगले. मार्गदर्शनाशिवाय ते वाईट असे नाही. पण अशी अडचण येऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. व आल्यास योग्य सल्ला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये असे सुचवते.
ध्यान हा अनुभूतीचा प्रकार खरंच. मी म्हणते तुम्ही साखरेच्या गोडीची चर्चा करण्यापेक्षा एकदा साखर खाऊनच पहा ना !
यात योग्य मार्गदर्शना शिवाय
यात योग्य मार्गदर्शना शिवाय ध्यान केल्यास मनोविकार होउ शकतात असा सूर आहे म्हणा वा भीती घातली आहे म्हणा.
मला हा घाटपांडे यांचा शेरा रूचला नाही.
ध्यानात मार्गदर्शन लागते कारण ध्यानावस्थेत जे अनुभव येतात त्यात भरकटलेपणा, गोंधळ, नैतिक कल्पनाना धक्का बसणे, खोल रुतलेल्या नकारात्मक भावना उफाळून बाहेर येणे असे अनेक प्रकार असतात (काही जण ओक्साबोक्षी रडतात पण). या अनुभवाना सामोरे जाण्यास प्रत्येकजण पूर्णपणे समर्थ असतोच नाही. हे अनुभव हाताळणे सोपे व्हावे म्हणुन मार्गदर्शकाची गरज असते.
प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डीन ऑर्निशने ध्यानात deep buried anxieties उफाळुन येऊ शकतात असे, निरीक्षण नोंदवले आहे.
या अनुभवांची कारणमीमांसा करताना तज्ज्ञ म्हणतात की सुप्त मनावरील जागृत मनाचे नियंत्रण दूर झाले की सुप्त मनातील भावनिक कचरा बाहेर पडायला लागतो. हे जेव्हा तीव्रतेने घडते तेव्हा कदाचित मनोविकारसदृश अवस्था निर्माण होत असावी.
+/-
पुन्हा वाचला.. काहि आवडले, काही पटले अन् काही खटकलेही.
एकेक उदाहरण देतो:
ध्यान ही स्वतंत्र उपचार नसून इतर कोणत्याही उपचार पद्धतीस ती सहय्यभूत आहे असे म्हणता येईल. कोणत्याही उपचाराचा पूर्णत्वाने परिणाम सहजस्वाभाविक स्थितीतच त्वरित होणार.
ध्यान शरीराची निरुद्ध अवस्था फक्त शिथिल करते. उपचार औषधच करते.
स्पष्टपणा आणि ध्यानाच्या मर्यादांची जाणीव ठेवणे आवडले.
परदेशात ध्यान या गोष्टीचे स्तोम माजवले गेले आहे ही बाब मात्र नि:संशय खरी. आणि त्यात खरे काय नि खोटे किती हे कळणे कठीण. क्रेझ म्हणून ध्यान करणाऱ्यांची संख्याही कमी नसावी.
पटले
पण जसे जाळीतून आलेला म्हणून सूर्यप्रकाश दूषित ठरवता येत नाही, तद्वत चुकीच्या पद्धतीने ध्यान करणाऱ्यांमुळे ध्यान करणेच वाईट म्हणता येणार नाही.
अशी घाऊक वाक्ये खटकली. 'चुकीची पद्धत' म्हणताना, (एक किंवा अनेक पण) ठाम आणि व्यक्तीनिरपेक्ष अशी बरोबर पद्धत/पद्धती असेल/असतील अशी आशा करतो. नाहितर श्री.नानावटी अन्यत्र म्हणतात तसे आमचे सोडून इतर बाबा भोंदु असे व्हायला नको. ;)
अनेक पद्धती योग्य असण्यास
अनेक पद्धती योग्य असण्यास प्रत्यवाय नाही. साधारणतः अश्या वेळी जर फायदा झाला नाही तर तुम्ही "चुकीच्या पद्धतीने ध्यान केलेत" हे उत्तर तेव्हाच पटेल तेव्हा "ही/या पद्धत/पद्धती या या कारणांसाठी हमखास परिणामकारक आहेत" आणि त्या ज्या काही पद्धती असतील त्या व्यक्ती निरपेक्ष असतील.
बाकी, पुढिल प्रतिसाद ध्यानाच्या पद्धती वाचून मगच देईन.. घाई नको :)
?
"हेमा फार नखरेल आहे."
"नाही नाही, पूजा फार टापटीप असते"
"हेमाच्या हाताला चव आहे."
"एवढं तेल आणि मसाला वापरल्यावर कोणाचाही स्वयंपाक चांगलाच लागेल."
"हेमा फार हुशार आहे."
"काय तरीच काय! आयटीमधे आजकाल कोणालाही नोकरी मिळते"
.. असा संवाद मी बराच काळ ऐकते आहे. पण ही हेमा कोण याची मला अजिबात काहीही कल्पना नाही.
आभार! पुन्हा वाचुन समजून
आभार! पुन्हा वाचुन समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.