दोन रंगकर्मी दोन आत्मचरित्रे: १ (आडाडता आयुष्य - गिरीश कार्नाड)
आयुष्यात असा एखादा कालखंड येतो की अचानक बर्याचशा अनपेक्षित पण स्वागतार्ह (खरंतर इथे मला इंग्रजीतल्या welcome - आनंदाने स्वीकाराव्यात अशा - ची छटा अपेक्षित आहे, पण काहीवेळा परभाषेपेक्षाही मातृभाषेत नेमकेपणा आणणे अवघड जाते ते हे असे) अशा बर्याचशा गोष्टी एकापाठोपाठ एक आपल्याकडे चालत येतात. आपल्या जगण्यातला तो एक तुकडा पूर्णपणे एखाद्या आवडत्या गोष्टीच्या नावेच होऊन जातो. गेल्या महिन्याभरात असाच काहीसा अनुभव आला तो नाटकांबाबत. अचानक दोन चार सुरेख नाटके पहायला मिळाली. त्याच वेळी रंगभूमीशी, रंगकर्मींशी संबंधित चार पाच पुस्तके एकदम हाती लागली. हाती घबाड गवसल्याचा किंवा भर उन्हाळ्यात कुणीतरी कलिंगडाच्या गराड्यात नेऊन बसवल्याचीच भावना झाली. सुदैवाने रमतगमत का होईना त्यातल्या दोन पुस्तकांची 'नैया पार' झाली. योगायोग असा की ही दोन्ही आत्मचरित्रे आणि दोनही रंगकर्मींबाबत मला सारखाच आदर. तेव्हा त्या अनुभवातून जाताना जे गवसलं ते इथे थोडक्यात मांडतो आहे.
पहिले हाती लागले ते डॉ. लागूंचे 'लमाण'. खरंतर हे पुस्तक तसे दहा वर्षांपूर्वीचे, पण कोण जाणे कसे राहून गेलेले. अलिकडे 'रूपवेध' आणल्यानंतरच आपण ’लमाण’ वाचले नाही याची जाणीव झाली. त्याच सुमारास कार्नाडांचे 'आडाडता आयुष्य' देखील उमा कुलकर्णीच्या अनुवादाच्या माध्यमातून अतिशय वाजतगाजत अवतीर्ण झाले. तेव्हा ही दोन्ही पुस्तके एकाच वेळी 'गृहप्रवेश' करती झाली. हा योगायोग अतिशय चांगलाच ठरला म्हणावे लागेल. कारण यामुळे ती दोन्ही आगेमागे वाचण्याचा फायदा उठवता आला. पहिल्या भागात लिहितोय ते खरंतर मागाहून वाचलेल्या पुस्तकाबाबत, 'आडाडता...' बाबत, नि पुढच्या भागात लिहिन ते 'लमाण' बाबत. मांडणीच्या दृष्टीने हे अधिक सोयीचे वाटले इतकेच.
गिरीश कार्नाड यांचे 'तुघलक' काही काळापूर्वी माधव वझे यांनी रंगभूमीवर आणलेले पाहिले होते. इतिहासाने 'मूर्ख' अशी संभावना करून सोडून दिलेल्या तुघलकाच्या आयुष्याचा एक वेगळाच अन्वयार्थ लावून कार्नाडांनी समोर ठेवला होता, तो पाहून मी स्तिमित झालो होतो. (अशीच काहीशी अवस्था जीएंनी मांडलेला 'डॉन किहोटे' वाचून झाली होती.) तेव्हाच प्रथम या माणसाच्या लेखनाचा मागोवा घ्यायला हवा अशी खूणगाठ मी बांधून ठेवली होती. पुढे मग 'ययाती'. 'हयवदन', 'नागमंडल' यांच्या मार्फत तो प्रवास पुढे चालू राहिला. मागल्याच वर्षी लागू दांपत्यांतर्फे रंगकर्मींना दिला जाणारा 'तन्वीर सन्मान' जेव्हा कार्नाडांना देण्यात आला तेव्हा या दोन व्यक्तींचा चाहता असल्याने तिथे उपस्थित असणे अनिवार्यच होते. तेव्हा 'आडाडता...' च्या अनुवादाच्या जाहिराती सुरू झाल्या तेव्हापासून माझी उत्सुकता ताणली गेली होती. प्रत्यक्ष पुस्तक हाती लागले नि आधाशासारखे वाचून काढले. थोडक्यात सांगायचे तर या चरित्राने माझी पूर्ण निराशा केली असे खेदाने म्हणावे लागेल.
कार्नाडांनी कौटुंबिक नि वैयक्तिक आयुष्याची बाजू अतिशय तपशीलवार नि प्रांजळपणे मांडलेली आहे. आपल्या जन्मापूर्वी आपले आईवडील 'हे मूल नको' या निर्णयाप्रत येऊन गर्भपाताची तयारी करत होते नि केवळ डॉक्टरीणबाई न आल्याने आपला या जगात प्रवेश झाला हे ऐकून स्वतःला बसलेला धक्का, त्यातून 'हे जग आपल्याविनाही असेच चालू राहिले असते' हा - अस्वस्थ करणारा - झालेला बोध अतिशय प्रत्ययकारी उमटला आहे. (सदर आत्मचरित्र त्या अनुपस्थित राहून आपल्या अस्तित्वाला कारण ठरलेल्या डॉ मधुमालती गुणे यांनाच अर्पण केले आहे.) एकुणच कथनाचा सूर सर्वसाधारण आत्मचरित्रात असतो त्याहून खूपच प्रांजळ नि प्रामाणिकपणाचा. अगदी आपल्या विवाहपूर्व लैंगिक संबंधांबाबत (ते ही भावनिक बाजूचा पूर्ण अभाव असलेले) कोणताही गंड (एका बाजूने अपराधगंड नाही तसेच आपण स्त्रिया कशा 'पटवल्या' वगैरे सांगण्यातला अभिनिवेश वा अहंगंडही) न बाळगता केलेले कथन. भारतीय समाजातच काय अगदी तुलनेने याबाबत अधिक स्वतंत्र विचाराच्या मानल्या जाणार्या कलाक्षेत्रातदेखील हे उदाहरण दुर्मिळ मानावे लागेल. परंतु हे सारे कुठेही त्यांच्या जगण्याशी धागा जुळवून घेत नाही. तात्कालिक मानसिक असमतोलातून सावरण्यापलिकडे त्या संबंधातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर कोणताही प्रभाव त्यातून पडलेला दिसत नाही. त्या अर्थाने त्यांचे चरित्रातील स्थान गौणच मानावे लागेल.
ऑक्सफर्डमधील दिवसांचे वर्णनही असेच खोगीरभरती स्वरूपाचे. एकुणच पुस्तकाचे स्वरूप आठवणींची मोळी बांधल्यासारखे. कथनप्रवाहाच्या अधेमधे वाट वाकडी करून, कालविपर्यास करून एखाद्या व्यक्तिमत्त्वाबाबत, त्याच्या जडणघडणीबाबत काही अधिक तपशील देऊन ती व्यक्ती, ती घटना, तो परिणाम अधिक नेमका वा ठसठशीत करणे हा बव्हंशी प्रस्थापित झालेला कथनप्रकार आहे. परंतु या कथनातील मूळ कालानुक्रमाचा, घटनाक्रमाचा धागाच अधिक ठळक दिसायला हवा, अन्यथा वाचकाचा गोंधळ उडू शकतो. 'आडाडता...' मधे बरेचदा असे घडते आहे. बरे इंग्रजीत ज्याला डीटोऽर (detour) म्हटले जाते तसे हे तात्कालिक वळण मूळ कथनाच्या वाटेवरचे काही धागे ठळक करत असेल तर त्याचे प्रयोजन सफल झाले म्हणावे. उगाचच एखाद्या पात्राची कुटुंबाची माहिती, पूर्वीचे आयुष्य, पुढचे आयुष्य याची भरताड देऊन परत गाडं रुळावर येत असेल तर त्या व्यक्तिमत्त्वाचा एकुण कथनात, चरित्रनायकाच्या वाटचालीमध्ये, जडणघडणीमध्ये कुठे प्रभाव असेल, काही निर्णायक वळणावर त्याचा सहभाग असेल तर हे सारे अपसव्य कामी आले असे म्हणता येईल. 'आडाडता...' मधे अशी भरताड भरपूर असली तरी ती बहुधा पुढे कुठेच न दिसणार्या, परिणाम घडवणार्या पात्रांबाबत अथवा घटनांबाबत आहे.
कार्नाडांच्या वैचारिक जडणघडणीचा प्रवास यात फारसा दिसत नाही. कलाक्षेत्रातील प्रवासात वाटेवर आलेल्या आपल्या अपयशांची, कळत न नकळत आपण केलेल्या अन्यायाची वा चुकांची थेट कबुली त्यांनी प्रांजळपणे दिलेली असली त्याची डॉ. लागूंनी 'लमाण' मधे केली तशी कारणमीमांसा वा चिकित्सा केलेली दिसत नाही. त्यामुळे त्यातून त्यांच्या विचारसरणीवर, पुढील वाटचालीवर झालेला परिणाम त्यांनी स्वतःच न तपासल्याने वाचकाला उपलब्ध होणे दूरच राहिले आहे. गिरीश कार्नाड म्हटले की मिथकांची वर्तमानाशी सांगड घालून उभ्या राहिलेल्या त्यांच्या अजोड नाटकांची आठवण होणारच. यातील 'ययाती' नि 'तुघलक' तर भारतीय नाट्यक्षेत्रात मैलाचे दगड ठरलेली नाटके. कलाक्षेत्रात सर्वात उशीरा दाखल झालेल्या चित्रपटाच्या वावटळीत नाटकांचे स्थान नि वैशिष्ट्ये घट्ट टिकवून ठेवणारी जी मूठभर नाटके होती त्यात या दोन नाटकांचे स्थान फार मोठे आहे. याशिवाय 'हयवदन' सारखे जगण्यातील मूलभूत प्रश्नांना भिडणारे नाटक, 'नागमंडल', 'अग्नि मत्तु मळै' (ज्यावर 'अग्निवर्षा' नावाचा हिंदी चित्रपटही येऊन गेला, त्याची दखलही कुणी घेतली नाही हे अलाहिदा) आणि 'इन्सेस्ट' सारखा नाजूक विषय मांडणारे 'अन्जु मळिगे' सारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर अतिशय सखोल जाणिवेची नाटके लिहिणारे कार्नाड त्या नाटकांच्या निर्मिती प्रक्रियेबाबत बोलतील, त्या वेळच्या आपल्या वैचारिक आंदोलनांची, त्यावर परिणाम घडवणार्या व्यक्तिंची, घटकांची, विचारव्यूहाची मांडणी करतील अशी अपेक्षा होती, ती गैर नसावी. परंतु या बाबत हे आत्मचरित्र पूर्ण निराशा करते. ययाती नि तुघलक चा निर्मितीचा केवळ फक्त कालक्रम सांगून नि त्यातील व्यावहारिक तपशील देऊन इतर नाटकांना तर जवळजवळ पूर्णपणे उपेक्षित ठेवले आहे. केवळ जाताजाता आयुष्यात भेटलेल्या एखाद्या व्यक्तिचे वैशिष्ट्य, त्याच्यासंबंधी घडलेली घटना याचा उपयोग वा परिणाम एखाद्या नाटकाशी असेल तर तेवढा एक दोन वाक्यात नोंदवून ते पुढे जाते. कार्नाड नि नाटक यांचे असलेले अतूट नाते लक्षात घेता हे फारच निराशाजनक ठरते.
अपवाद आहे तो अनंतमूर्तींच्या 'संस्कार' नि 'वंशवृक्ष' या भैरप्पांच्या कादंबरीवरील चित्रपटांवरील प्रकरणाचा. फक्त एवढ्या एकाच ठिकाणी या आत्मचरित्राने माझे थोडेफार समाधान झाले असे म्हणू शकेन. चित्रपटाच्या प्रवासाचे अतिशय विचक्षण भूमिकेतून मूल्यमापन कार्नाडांनी केलेले दिसते. यात प्रत्यक्ष कादंबरीतील पात्रांचा, पार्श्वभूमीचा विचार वगैरे अभ्यासपूर्ण भाग येतो तसेच चित्रपटाशी संबंधित निर्मितीमूल्ये, कलेशी संबंधित विवेचन, चित्रपटाशी संबंधित व्यक्तिंचे मानापमान, त्यातून होणारे संघर्ष नि या खडतर प्रवासातून तयार होऊन सर्वत्र नावाजलेल्या चित्रपटाबाबत सकारण व्यक्त केलेले असमाधान. हे एकच प्रकरण अतिशय भावले असे म्हणावे लागेल.
उमा कुलकर्णींच्या अनुवादाचा दर्जा देखील धक्कादायक रित्या घसरलेला दिसून आला. यापूर्वी त्यांनी केलेल्या भैरप्पांच्या कादंबर्यांचे अनुवाद अतिशय वाचनीय झाले होते. परंतु इथे त्यांच्या भाषेवर व्यवहारात प्रचलित होऊ पाहणार्या काहीशा संकरित भाषेचा प्रभाव पडू लागल्याचे जाणवले. उदाहरणादाखल एक वाक्य असे आहे 'तेव्हा वसंतदादा अविवाहित होता.' तांत्रिकदृष्ट्या हे वाक्य बरोबर असले तरी 'अविवाहित असणे' ही वाक्यरचना बहुधा जन्मभर अविवाहित असणार्यांच्या संदर्भात वापरली जाते, यात ही आजन्म स्थिती अपेक्षित असते. इथे साधारणपणे 'तेव्हा वसंतदादाचे लग्न झालेले नव्हते.' अशी वाक्यरचना केली जाणे - मला तरी - अपेक्षित होते. हे एक किंवा दुसरे एक वाक्य 'माझ्या जीवनातली ही घटना अशा काही मोजक्या घटनांपैकी आहे, ज्यांनी मला वैयक्तिक आनंद दिला.' आधी दिलेल्या वाक्यावर हिंदी वाक्यरचनेचा प्रभाव तर इथे इंग्रजी. इथे साधे सोपे मराठी वाक्य असे काहीसे लिहिता आले असते 'ज्यांनी मला वैयक्तिक आनंद दिला अशा माझ्या जीवनातील काही मोजक्या घटनांपैकी ही एक आहे.' यामुळे जागोजागी वाचताना अडखळत होतो नि वाचनाच्या गतीला खीळ बसत होती.
जिथे अपेक्षा अधिक असतात तिथे अपेक्षाभंगाचे दु:ख अधिक तीव्र असते हे ओघाने आलेच.
प्रतिक्रिया
पुस्तकाची छान ओळख करून दिलीत
>> जिथे अपेक्षा अधिक असतात तिथे अपेक्षाभंगाचे दु:ख अधिक तीव्र असते हे ओघाने आलेच.
रमताराम, तुम्ही पुस्तकाची छान ओळख करून दिली आहे. तुमचा अपेक्षाभंग झाला, तरी माझी मात्र उत्सुकता चाळवली गेली आहे, त्यामुळे मी जमेल तेव्हा नक्कीच हे पुस्तक वाचीन. पुस्तक परिचयाबद्दल आभार.
अवांतरः 'आडाडता' म्हणजे काय, कोणी सांगू शकेल काय?
आडाडता
'आडाडता' म्हणजे 'खेळता खेळता' असे भाषांतर उमा कुलकर्णी यांनी दिले आहे, पुस्तकाचे शीर्षकही तेच आहे. कन्नड कवि द. रा. बेंद्रे यांच्या एका कवितेतून या ओळी घेतल्याचे कार्नाडांनी प्रस्तावनेमधे नमूद केले आहे
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
लागू, कार्नाड आणि मेहता
गिरीश कार्नाडांच्या आत्मचरित्राच्या भाषांतराचा परिचय आणि त्याचे परीक्षण असे दुहेरी कार्य या लेखाने उत्कृष्टपणे साध्य केले आहे. हे आत्मचरित्र मुळातून वाचावे असे वाटले.
समाधानाची बाब ही आहे की भारतीय आर्वाचिन नाट्यजगतात जे जुन्या-नव्या नाट्यपरंपरांमधील सेतू ठरावेत अशा तीन व्यक्तींची आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. त्यातील दोघांचे परिशीलन रमताराम करत आहेत. यातच भर घालून विजयाबाईंचेही आत्मचरित्र (झिम्मा-आठवणींचा गोफ) त्यांनी हाताळावे अशी त्यांना विनंती.
प्रत्येक आत्मचरित्रावर एक असे तीन लेख + त्यांची साहित्यमूल्यांच्या आणि जीवन मूल्यांच्या दृष्टीने तुलना करणारा एक लेख अशी चार लेखांची मालिका त्यांनी लिहावी ही आग्रहाची विनंती.
+१ संपूर्ण सहमती.
+१
संपूर्ण सहमती.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
धन्यवाद विसुनाना
"झिम्मा"ही येऊन पडले आहेच. पंचाईत एवढीच की त्याचे वाचन अजून सुरू झाले नाही. शिवाय सध्या हापिसात कधी नव्हं ते लैच काम असल्याने केव्हा जमेल सांगता येत नाही. पण जेव्हा वाचून पुरे होईल तेव्हा नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
प्रतीक्षेत
प्रतीक्षेत-
अपेक्षित
गिरिश कार्नाड ह्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात एक अढी आहे. तरुणपणी काही चांगली निर्मिती हातून घडून गेली हे खरं, पण नंतरची नाटकं अनेकदा मर्यादित वकुबाची, कृतक आणि काहीशी बालिशदेखील वाटली. त्यात सध्याचं त्यांचं वर्तन आणि वावर काहीसा राजकारण्यासारखा वाटत राहतो. त्यामुळे ही अढी मनात बसली. म्हणून ह्या आत्मचरित्राबद्दल माझ्या फार अपेक्षा नव्हत्या. त्यांच्या मते त्यांनी काय चुका केल्या हे पाहणं त्यातल्या त्यात रोचक वाटेल कदाचित. अर्थात, अधूनमधून त्यांचं बोलणं चांगलं वाटतं हे खरं. उदाहरणार्थ, तन्वीर सन्मानावेळचं त्यांचं स्वतःच्या अपघाती जन्माविषयीचं भाषण.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१
सहमत आहे.
विषेशत: घटना १ आणी घटना २ नंतर. मतस्वातंत्र्याचा आदर असला तरी इथे बळच पिंक (गरळ) टाकल्यासारखे वाटले.
नायपॉल आणि टागोर
कार्नाड राजकारणी वाटत असले तरीही इथे मी एक कबुली मात्र देतो. नायपॉल यांची भारतासंदर्भात अनेक विषयांतली समज अंमळ कमीच वाटते. मला आठवतं, कोणत्या तरी पुस्तकात त्यांनी विजय तेंडुलकरांच्या बाइंडरबद्दल काही तरी लिहिलं होतं. त्यांना बाइंडर समजलेलं नाही हे ते वाचून कळत होतं. आणि टागोरांची नाटकं मलादेखील विशेष महत्त्वाची वाटत नाहीत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१
घटना २ बाबतही मी असहमत आहे. कार्नाड जे काही बोलले ते मी स्वतः समोर बसून ऐकले आहे. प्रथम टागोरांच्या कवितेबद्दल नि त्यांच्या कथांबद्दल कार्नाडांनी भाष्य केले होते नि जाताजाता '...त्या तुलनेत टागोर हे सामान्य नाटककार आहेत.' असे ते विधान होते. तुलनात्मक विधानाचे आपल्या सनसनाटीप्रेमी (याचे आणखी एक उदाहरण नुकतेच सदानंद मेनन यांच्या व्याख्यानाच्या बातमीबाबत पहायल मिळाले, त्याबद्दल इथेच एका प्रतिसादात लिहिले आहे) मीडियाने मोडतोड करून स्वयंसिध्द विधान बनवले नि गदारोळ उडवून दिला. त्या विधानाच्या आधी त्यांनी केलेले भाष्य पूर्ण वगळले होते. टीआरपी मिळवायला हेच करावे लागते असा ठाम विश्वास आता पूर्ण रुजला आहे. तेव्हा असली सनसनाटी विधाने मीडिया छापते तेव्हा तिकडे दुर्लक्ष करणे एवढेच सुज्ञांचा हाती राहते.
मध्यंतरी एलकुंचवारांची एक - भल्ली मोट्ठी एक पानी!- मुलाखत 'पत्र एकदम भित्रं' ने छापली होती. त्यात वट्ट चार प्रश्न त्यांना विचारले होते. त्यातले दोन 'ग्रेस आणि तुमचं शिंचं न्येमकं काय फाटलंय' याचा मागोवा घेणारे होते. त्यातून एखादे सनसनाटी विधान त्यांच्या तोंडून वदवून घेण्याचा, वा निदान आधीच मुलाखत घेणार्याने तयार करून ठेवलेल्या विधानाला निदान पुष्टीकारक होईल असे काही काढून घेण्याचा प्रयत्न असावा. त्यांच्या दुर्दैवाने एककुंचवार सुज्ञ असल्याने हवे ते त्यांना मिळू शकले नव्हते. त्यांच्या विचारधारेबाबत, नाटकांच्या प्रवासाबाबत, गेला बाजार 'मौनराग' या आत्मचरित्रपर पुस्तकाबाबत तपशीलाने विचारण्याची तसदी मुलाखतकार (काय शब्द आहे 'मुलाखत तयार करतो तो') घेऊ इच्छित नसावा. किंवा एकुणच तसे करू शकणारा, तेवढी बौद्धिक कुवत असणारा पत्रकार हल्ली एकतर परवडत नसावा (स्वतंत्र विचाराची व्यक्ती या अर्थाने नि आर्थिक बाजूनेही) किंवा तशी व्यक्ती शोधण्याची कुवत त्या पत्रांच्या मालक-चालकांची नसावी.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
परिचय
आडाडता चा परिचय आवडला. कर्नाडांच्या गाजलेल्या साहित्यकृतींच्या निर्माणाविषयी भाष्य, या पुस्तकात नाही हे वाचून अपेक्षाभंग झाला. तरीही लेखाने उत्सुकता चाळवली गेल्यामुळे, आता पुस्तक वाचणे आवश्यक वाटते.
विसुनानांची सूचना आपण मनावर घ्यावी ही विनंती.
आडाडता आयुष्य
'आडाडता आयुष्य' मी वाचलेले नाही. 'झिम्मा' आणि 'लमाण' मी वाचलेली आहेत. 'लमाण' ची तर पारायणेच केली आहेत.
आत्मचरित्रे या लेखनप्रकाराला काही जबरदस्त मर्यादा आहेत. एखाद्याला आपल्या आयुष्यावर चरचरीत डाग उमटवणारा वाटेल असा एखादा प्रसंग दुसर्या कुणाला अगदी सामान्य, दखल न घेण्यासारखा वाटू शकतो. (उदा. 'माणसे- अरभाट आणि चिल्लर' मधील पायथागोरसचे प्रमेय - 'माणसे' लौकिकार्थाने आत्मचरित्र नसले तरी). लेखकाला जे प्रसंग आपल्या चरित्रात मुद्दाम, जाणीवपूर्वक अधोरेखित करावेसे वाटतील ते वाचकाला अगदी किरकोळ, भरताड वाटणे अगदी शक्य आहे. त्यामुळे आत्मचरित्रे ही संपूर्ण समाधान देणारी असणे अवघडच आहे. आत्मचरित्रातून त्या माणसाची, त्याच्या विचारांची घडण कशी झाली हे कळणे अवघडच आहे. त्यातून प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीने वयाच्या सत्तरीच्या आसपास आत्मचरित्र लिहिलेच पाहिजे असा दंडक असल्यासारखे सध्या झाले आहे. लागू, मेहता आणि कार्नाड हे मुळात रंगकर्मी. कार्नाडांची तशी नाटककार म्हणून मोठी ओळख. लागूंनीही काही अनुवाद केले असले तरी मूळ नट आणि दिग्दर्शक हीच त्यांची खरी ओळख. बाईंचेही तेच. त्यामुळे लेखक म्हणून जे कौशल्य लागते ते त्यांच्यात असावे आणि त्यांची आत्मचरित्रेही त्यांच्या आविष्कारांइतकीच प्रभावी असावीत असे मानणे चूक आहे. त्यातून अनुवाद आला की असा अपेक्षाभंग होण्याची शक्यता अधिकच.
प्रसिद्ध लोकांच्या आत्मचरित्रांवर जनतेच्या उड्या पडण्याचे कारण उघड आहे. लोकांना या प्रसिद्ध लोकांच्या खाजगी आयुष्यातले काही खमंग, चुरचुरीत वाचायला पाहिजे असते. ते मिळाले की पब्लिक खूष. ('आहे मनोहर तरी'. या पुस्तकातला जो भाग सर्वात प्रकर्षाने लोकांच्या पुढे यायला हवा होता तो दुर्लक्षितच राहिला. लोक फक्त 'भाई कसा अव्यवहारी आळशी नवरा आहे' हेच चघळत राहिले! दादा कोंडके, हंसा वाडकर, कांचन घाणेकर यांची चरित्रे- आत्मचरित्रे ही अन्य उदाहरणे). या तीन रंगकर्मींच्या बाबतीत काही वेगळ्या अपेक्षा ठेवून त्यांची पुस्तके वाचली तर अपेक्षाभंगाची शक्यता अधिक. 'झिम्मा' च्या बाबतीत माझे हेच झाले. त्यामानाने मला 'लमाण' अधिक समाधानकारक, पूर्ण वाटले. पण त्याविषयी मी याआधीच लिहिले आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
आपल्यालाही विनंती...
या तीन आत्मचरित्रांचा तौलनिक अभ्यास करणारा एक लेख (कदाचित त्याचे काही पैलू उपरोक्त प्रतिसादात ओझरते आले आहेत) लिहावा अशी सन्जोप राव यांनाही विनंती.
अशा आत्मचरित्रांकडून खर्या चोखंदळ रसिकांच्या काय अपेक्षा असतात/असाव्यात आणि त्या अपेक्षांचा भंग कसा आणि का होतो ते त्यातून स्पष्ट होईल असे वाटते.
रोचक परिक्षण
परिक्षण अत्यंत रोचक आहे, आत्मचरित्र निराशाजनक आहे असे सांगितले तरी वाचण्याची उर्मी फार कमी करत नाही हे वैशिष्ट्य ठरावे.
आत्मचरित्रांची ओळख आवडली
समी़क्षेच्या रूपाने केलेली या दोन आत्मचरित्रांची ओळख आवडली. 'तें दिवस'ही वाचलं असल्यास त्याबद्द्ल वाचायला आवडेल. ते मला खूप आवडलं होतं (अर्थात ते लेखकानेच लिहिलेलं होतं त्यामुळे इथे दिलेल्या आत्मचरित्रांशी त्याची थेट तुलना नाही करता येणार).
रोचक!
अतिशय रोचक! पु.भा.प्र.
लेखात उल्लेखलेली दोन्ही + प्रतिसादातील झिम्मा वाचलेले नसल्याने विसुनानांच्या सुचनेला जोरदार पाठिंबा!
ररा, रावसाहेब: जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लिहा पण नक्की लिहा ही विनंती!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उत्तम मूल्यमापन केले आहे. उमा
उत्तम मूल्यमापन केले आहे. उमा कुलकर्णींच्या अनुवादाबद्दल वाचून थोडे आश्चर्य वाटले. "माझं नाव भैरप्पा" किंवा "पर्व"चा अनुवाद त्यांनी उत्कृष्ट केला होता.
गिरीश कार्नाडांबद्दल फारशी माहिती नाही (हा लेख वाचण्याच्या आधीपर्यंत त्यांचे नाव कर्नाड आहे असे समजत होतो). त्यांची नाटके पाहिलेली नाहीत, फक्त तुघलक वाचलेले आहे.
अवांतरः
कार्नाडांना त्यांच्या अपघाती जन्माबद्दल ऐकून अस्वस्थता आली हे वाचून आश्चर्य वाटले. आपण जन्माला आलो नसतो तर जगाला काही फरक पडला नसता हे किती लोकांना माहित नाहीय? "आम्ही गर्भपात करणार होतो" असे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितले नसते तर कार्नाडांना 'आपण जन्माला आलो नसतो तरी जगाला काही फरक पडला नसता' हे कळले नसते?
बाकीच्यांचं माहित नाही, पण आमच्या जन्मदात्यांनी नगरीनिरंजन असा वाचाळ आयडी घेणारा माणूस जन्माला घालू असे ठरवून आम्हाला जन्म दिला नव्हता. ते नगरमध्ये असताना जो काही मांसाचा गोळा जन्माला आला त्याला त्यांनी निरंजन नाव दिलं आणि त्याचं पुढे असं झालं हे आम्हाला खूप पूर्वीपासून माहिती आहे. आम्ही नसतो तर जगच नसते, त्यामुळे आम्ही आहोत म्हणूनच आमच्या असण्यानसण्याने जगाला फरक पडत नाही.
झिम्मा आणि आडाडता आयुष्य
झिम्मा आणि आडाडता आयुष्य एकापाठोपाठ एक वाचून संपवली...
धागा सुरू करणार्याच्या मताशी ( आठवणींची मोळी !!!) सहमत आहे. भाषा बोचत राहते. कार्नाड हे उत्तम राजकारणी होउ शकले असते असे वाटत राहते. अचानक आत्मचरित्र संपते. ते ७६ सालापर्यंतचेच आहे. आता सीक्वेल येणार असावा.
... झिम्मा वाचून अपेक्षा बर्याच अंशी पूर्ण झाल्या. सुरुवात मात्र " बेबी आली , बेबी मोठी झाली , आता बेबीला विजू म्हणूया" वगैरे वगैरे क्लिशे / स्टायलाईज्ड आत्मचरित्रलेखनपद्धतीकडे दुर्लक्ष करून वाचावी लागली... बाकी लेखन आणि चिंतन आवडले. खूप कमी वाटले, अजून चिंतन / चर्चा आणि घटना वर्णने असायला हवी होती. काही गोष्टी गुंडाळल्यासारख्या वाटल्या.
मास्तर-
इतक्या मोजक्या ओळीत प्रतिसाद संपवलात? यावर थोडे जास्त लिहाल अशी अपेक्षा आहे.