रसग्रहण - आज जानेकी जिद ना करो
"वक्त की कैद मे जिंदगी है मगर
चंद घडीयां यहीं है जो आजाद है"
या दोनच ओळींवर लिहीण्यासाठी दर वेळेस पेन उचलते आणि ठेऊन देते. कारण या ओळींमध्ये जी इन्टेन्सिटी आहे ती व्यक्तच करता येत नाही. शब्द हरवितात. सगळ्याच सुचलेल्या ओळी न्याय करणार्या वाटेनाशा होतात.
"फरीदा खानुम" यांची काळजाचा ठाव घेणारी अप्रतिम गझल - आज जानेकी जिद ना करो आणि या गझलेचे हृदय या दोन ओळी. सर्वात सुंदर अशा या २ ओळी.
ही गझल ऐकताना नेहमी विचार थांबतात. या गझलेतील आर्जवाने, मन अवर्णनीय शांतरसाने भरून जाते.इतर अनेक गायिकांनी भले ही गझल गाण्याचा प्रयत्न केला असेल पण "फरीदा खानुम" यांच्या शांत, संयत आवाजाला तोड नाही. "फरीदा खानम" यांच्या आवाजात ती ऐकताना माझ्या डोळ्यासमोर नेहमी प्रौढ, परिपक्व आणि प्रगल्भ प्रेम येते. उथळ खळखळाट संपलेले शांत, खोल आणि परस्परांचा आस्वाद अधिक अर्थपूर्ण रीतीने घेणारे प्रेमिक साकार होतात. याचे श्रेय "खानुम" यांच्या आवाजाला तसेच शांत संगीताला जाते.
"आज जाने की जिद ना करो,
यूं ही पेहेलू में बैठे रहो"
आज नको ना जाऊस. नाही गेलास तर नाही चालणार का? माझ्या पुढ्यात असाच बसून रहा आणि मला डोळे भरून पाहू देत. माझ्या डोळ्यात तुला साठवून घेऊ देत.किती दिवसांनी भेटतो आहोत. मी तुला नीट पाहीलं सुद्धा नाही आणि तू निघून चाललास?
"हाये मर जायेंगे, हम तो लूट जायेंगे,
ऐसी बाते किया ना करो
आज जाने की जिद ना करो"
आताआत्ता तर आलास. अजून मैफीलीला रंग भरण्यास सुरुवातही झाली नाही आणि तू निघण्याच्या गोष्टी करू लागलास? माझा जरा तरी विचार कर. मला माहीत आहे, तू भारी हट्टी आहेस पण आजच्या दिवस सोड ना तुझा हट्ट.
"तुमही सोचो जरा क्यों ना रोके तुम्हे
जान जाती है जब ऊठके जाते हो तुम
तुम को अपनी कसम जाने जां
बात इतनी मेरी मान लो
आज जाने की जिद ना करो
तू गेलास की जग खायला उठतं. मन सैरभैर होतं. तुझ्या विरहात मी कशी व्याकुळ होते त्याची तुला कल्पना असायचं काय कारण म्हणा? जीवाची तगमग होते नुसती. माझी शपथ आहे तुला आज गेलास तर. सोड ना हट्ट तुझा, थांब ना जरा.
"वक्त की कैद मे जिंदगी है मगर
चंद घडीयां यहीं है जो आझाद है
इनको खो कर मेरी जाने जां
उम्रभर ना तरसते रहो"
(माफ करा पण हे आर्जव, हे सौंदर्यस्थळ स्पर्शण्याचे धाडस माझ्यात नाही. स्किपींग धिस पॅरा.)
"कितना मासूम रंगीन है ये समां
हुस्न और इष्क की आज मयराज है
कल की किसको खबर जाने जा
रोक लो आज की रात को"
या बहारदार मौसमात, सौंदर्य आणि प्रेमाची उधळण याव्यतिरीक्त कोणाला काही सुचू तरी कसं शकतं? आणि अशा आल्हाददायक वेळी तू निघण्याची भाषा करतोस? परत उद्यापासून आपले व्याप, संसार मागे आहेतच. त्यात आपण कितीही नाही म्हटलं तरी गुरफटले जाणार आहोतच. पण ही रात्र तर आपली आहे ना! थांबव ना ही रात्र. तू थांबवू शकतोस रे. तुझ्या हातात आहे सारं काही ...... तुझ्या हातात आहे सारं काही....
नज़्म!
सारीका ह्यांच्या म्हणण्या प्रमाणे फ़रीदा खानुम ह्यांचे हे सादरीकरण खरोखरीच काळजाचा ठाव घेणारे व केवळ अद्वितीय असेच आहे.. विशेषतः ह्या ओळी... वक़्त की क़ैद में ज़िन्दगी है मगर चंद घडियाँ यही हैं जो आज़ाद हैं !" एक कलाकार म्हणून मला नहेमी वाटत राहते कि कलेचा अर्थ काय? कलेला अर्थ काय? तर ह्या ओळी काही अंशी त्याचे उत्तर देतात.. "आत्ता आणि इथे ह्या क्षणी, स्वतः ला मोकळे करत नेणे.." हा एक अर्थ/ आशय असू शकतो.. to redeem oneself from all bondage! आणि ते च जमत नाही .. :)
असो.. इथे फक्त तपशीलात एक छोटा बदल सुचवते.. ही रचना ग़ज़ल नसून नज़्म आहे! ग़ज़लचाच चहेरा मोहरा ठेवून सय्यद हाश्मी यांनी ती लिहिली असल्यामुळे ग़ज़लप्रेमींना ती ग़ज़ल आहे असेच वाटते.. परंतु रदीफ़ काफ़िया ह्यांच्या अभावा मुळे ती नज़्म ह्या प्रकारात मोडते..
अजून एक निरीक्षण: पाकिस्तान येथील अधिकतर स्त्री ग़ज़ल गायिका फ़रीदा खानुम, नायरा नूर, इक़्बाल बानू व दस्तूर खुद्द नूरजहाँ ह्या सगळ्या जणी पारंपारिक पद्धतीची ठाय लयीतील ग़ज़ल सादर करतांना दिसतात तर तेथील पुरुष ग़ज़ल गायक पतियाला गायकीने प्रभावित अशी चंचल ग़ज़ल मांडतात.. गुलाम अली खान साहेब, अमानत अली, राहत फतेह अली इत्यादी उदाहरणे देता येतील.. विषयांतर केले त्या बद्दल क्षमस्व पण येथे 'मी' ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे काव्या पेक्षाही गायकी मुळेच ही नज़्म लक्षात राहते एवढे नक्कीच वाटते!
'ऐसी अक्षरे' ह्या मंचावर फ़रीदा खानुम ह्यांना सादर केल्या बद्दल अनेक धन्यवाद सारीका! :)
माझ्यामते
फ़रीदा ख़ानम ह्यांनी गायलेली रचना ही गझल नसून नज़्म आहे हे खरे. फक्त एक दुरुस्ती कवी सय्यद नसून फ़य्याज़ हाश्मी आहे. गायक हबीब वली मोहम्मद ह्यांनी मूळ गाणे बादल और बिजली ह्या पाकिस्तानी चित्रपटासाठी गायले होते. (http://www.youtube.com/watch?v=K8ZyWmEw0PE) पण नंतर हे गाणे फ़रीदा ख़ानमच्या नावे रकम झाले .
त्या ठाय लयीचे माहीत नाही पण बाकी इक़्बाल बानो, नय्यरा नूर आणि फ़रीदा ख़ानम ह्या सगळ्या गायिकांना एकाच बेंचावर बसवता येणार नाही. नूरजहाँने तर अगदी लता मंगेशकरांना प्रभावित केले आहे. वरच्या पट्टीत नूरजहाँ कुणाला किंचित कर्कश वाटू शकते पण एखाद्या शब्दावर जोर देण्याची पद्धत एकदम खासच. उच्चार स्पष्ट आणि ताना करकरीत. एकंदरच धष्टपुष्ट गायनशैली. (उदा. http://www.youtube.com/watch?v=j9tM8Afi21g , नीयते शौक़ भर न जाये कहीँ, कवी-नासिर काज़मी )
इक़्बाल बानो ह्यांचे गायनही असेच सुराचे पक्के आणि जोरकस आहे. (उदा. http://www.youtube.com/watch?v=WIkFWU_pbjk&feature=related , ना उठाओ नावके नीमकश, कवी-फ़ैज़)
नय्यरा नूर ह्या सगळ्या गायिकांपेक्षा वेगळी आहे. तिचा आवाज तसा बारीकच आहे. मास्टर मदन ह्यांच्या गायनशैलीने मला प्रभावित केले आहे असे तिने एका मुलाखतीत म्हटल्याचे आठवते. हिंदी सिनेमांच्या गाण्यांचा असरही तिच्या गाण्यावर आहे. (उदा. http://www.youtube.com/watch?v=5HtDfsqsXRo, कभी हम ख़ूबसूरत थे, हे गाणे अहमद शमीम ह्यांनी धूपकिनारे ह्या पाकिस्तानी मालिकेसाठी लिहिले होते.)
बाकी फ़रीदा ख़ानम ह्यांची संथ वाहणारी गायकी मला अधिक पारंपरिक वाटते.
पंजाबी धाटणीच्या गझलगायनापेक्षा मेहदी हसन ह्यांचे गझलगायन वेगळे आहे. शब्दप्रधान आहे. तसेच ग़ुलाम अली आणि अमानत अली ह्यांना एकाच पारड्यात तोलणे चुकीचे ठरेल. दोघांच्या आवाजाचा पोत, रेंज, शैली वेगळी आहे. राहत फ़तेह अली हा कव्वाल आहे. तो गझलगायक नव्हे. पण तूर्तास एवढेच.चूभूद्याघ्या.
धन्यवाद चित्तरंजन भट.. !!
होय बरोबर फ़य्याज़ हाश्मी च :) चूकदुरुस्ती बद्दल धन्यवाद चित्तरंजन भट.. !!
अगदी बरोबर! एक बेंचावर मुळीच नाही. जसे एकाच घराण्यातील गायकांना देखील आपण एका बेंचा वर बसवत नाही.. अर्थातच ते वेगळे असतात... मुद्दा फक्त स्त्री गायिका आणि पुरुष ह्यांच्या गायन शैलीत लयीचा एक ठळक फरक जाणवतो हा होता परंतु आपण निदर्शनास आणून आलेले मुद्दे अर्थातच महत्वाचे आहेत.. त्या अनुषंगाने नक्कीच मी विचार करेन.. आभार! :)
या ओळींमध्ये जी इन्टेन्सिटी
अगदी हेच. ती आर्तता आणि आर्जव एकाच वेळी आवाजातून व्यक्त करणं तर अगदी अप्रतिम!!! तू म्हणतेस तस्म इतरांच्या आवाजात ती मजा नाही.
"तुम्हांवर केली मी मर्जी बहाल" हे साधारण त्याच स्वरूपाचं असलं तरी 'जिद ना करो'ची जातकुळीच वेगळी!!