देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!
'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
मी लग्गेच अमलात आणले ते. सर्व वह्यांवर लिहिले. पेपरात प्रत्येक पानाच्या डोक्यावर लिहायचा विचार होता पण माझा लिखाणाचा वेग इतका सुपरफास्ट असायचा की बरेचदा पेपर लिहून पूर्ण व्हायचा नाही त्यात ही ब्याद कुठे लिहीत बसा. देव बघेल तेव्हा त्याला पहिले पान दिसेलच की. असा सोयीस्कर विचार करून मी हे वाक्य फक्त पहिल्या पानावरच लिहिले.
इयत्ता तिसरीत मला तसेही बरे मार्कच पडायचे, तेवढेच याही परिक्षेत पडले. वाक्य लिहिण्याचा स्पेशल असर काही दिसला नाही. मात्र पेपरात पहिल्या पानावर लिहिलेल्या वाक्यांबद्दल वर्गशिक्षिका बाईंकडून त्यांची आख्खं विश्व इकडचं तिकडे हलेल अश्या पावरची स्पेशल थोबाडित मात्र मिळाली.
तेव्हा शिक्षकांनी थोडेफार फटके हाणले तरी पालक आकांडतांडव करत नसत त्यामुळे घरी येऊन थोबाडितचे सांगितल्यावर 'तू काय केलं होतंस?' हाच प्रश्न पहिला. उत्तरादाखल भारी युक्ती आईला सांगण्यात आली.
आईने डोक्यावर हात मारला, स्वतःच्याच. लिहिलेल्या वाक्याचा अर्थ नीट स्पष्ट करून सांगण्यात आला. अभ्यासाशिवाय, स्वतःच्या प्रयत्नांशिवाय तरणोपाय नाही हे नीटच बसवले डोक्यात. परिक्षेला जाताना देवाला नमस्कार करणे हे फारतर केलेल्या अभ्यासाचा शांतपणे विचार करण्यापुरते उपयोगी पडते. हे पक्कं बसलं डोक्यात. आणि शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमधे अजूनच खोल कोरलं गेलं.
कट टू पाचेक वर्षांपूर्वीची एक घटना.
"आपण या भागात शूट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इथले सगळे रस्ते माहिती हवेत. आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा इथून गेलोय. तेव्हाच तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायचा सांगितलेले आहे. आता ड्रायव्हर वेगळा आहे. त्याला मुंढरपर्यंतचा रस्ता तुम्ही सांगायचा."
दिग्दर्शकाने त्याच्या तीनही एडीजना सांगितले. रत्नागिरी शहरातून राई-भातगाव पुलाच्या मार्गे आम्हाला मुंढर गावात पोचायचे होते. रत्नागिरीत कामे आटपता आटपता संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. मला राई-भातगाव पुलापर्यंतचा रस्ता माहित नव्हता. पुढचा फारच ओळखीचा होता. शहरातून बाहेर पडतानाचा फाटा योग्य तो निवडला आणि मग निघालो. बराच वेळ जात राह्यलो तरी राई-भातगाव पूल येण्याचे चिन्ह दिसेना. डोंगरातला रस्ता, अंधाराची वेळ त्यामुळे रस्ता चुकलोय हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. बर चुकलोय तर नक्की कुठे चुकलोय हे कळायला मार्ग नाही. आता काय करायचे?
एडी १ - अं अं अं
एडी २ - रस्ता चुकलो? रस्ता चुकलो? (खिशातून फोन काढून त्यात कुठल्या तरी गुरूच्या भजनाची ऑडिओ सुरू केली.)
एडी ३ - कुणाला तरी विचारायला पाहिजे.
ड्रायव्हर - आता कसा रस्ता कळणार? ( गाडीत वाजत असलेले किशोरकुमारचे गाणे बंद करून टाकले. खिशातून मोबाइल काढून कुठल्या तरी गुरूच्या फोटोचा वॉलपेपर बघून फोन डोक्याला लावणे सुरू)
दिग्दर्शक, मी आणि एडी ३ यांच्यात अजून थोडी वाक्यांची देवाणघेवाण होऊन आहे त्या रस्त्याने पुढे जाऊया. जे पहिलं गाव लागेल तिथे विचारूया. असे ठरले. गेलो.
वाटेत एक उजवे वळण आमचे सुटले होते त्यामुळे आम्ही पुळ्याच्या दिशेने निघालो होतो. पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.
खाली उतरून किंवा गाडीतच बसून रस्त्याने येणार्या माणसाला थांबवून रस्ता विचारणे वगैरे करायला भाविक मंडळींची हिंमत होत नव्हती. कर्णकटू भजन सतत मोठ्ठ्या आवाजात ऐकणे आणि सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे यापलिकडे त्यांचे प्रयत्न जात नव्हते.
राई-भातगावच्या पुलावर आल्यावर पुढच्या रस्त्याबद्दल कुणालाच प्रश्न नव्हता. त्यामुळे पुलाशी पोचल्यावर 'चला आता प्रश्न नाही!' अशी आमची प्रतिक्रिया तर भाविक मंडळींचे भजन, नमस्कार, जप वगैरे चालूच होते. मुंढरला पोचल्यावर एडी २ म्हणे, 'स्वामींनी वाचवले!'. इतर सर्वांनीच कपालबडवती करून घेतली तिथे.
कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. श्रद्धेचा उपयोग फारतर मार्ग शोधताना डोके शांत ठेवायला होऊ शकतो. तुम्ही मनाने पुरेसे घट्ट असाल तर त्याचीही गरज नाही. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही.
तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...
डिंगडाँग...
- नी
प्रतिक्रिया
ह्या ह्या ह्या
पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.>>
पहिले गाव लागले तेच मुळी बाबांच्या कृपेने; कळलं ? नैतर ते गाव तुम्हाला लागलंच नसतं. भले तुम्ही त्याच रस्त्यावरून गेलात तरी.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(No subject)
- नी
रोम.
किंवा सगळे रस्ते पहिल्या गावाकडेच जातात.
(नंदन, अमुक, रोम, रोमारोमांत ... असली कोटी पाहिजे इथे.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जिथे बाबाभक्त संपतात तिथे
जिथे बाबाभक्त संपतात तिथे आमचे थत्तेचाचा सुरू होतात!!!
इतर सर्वांनीच कपालबडवती करून
हाहाहा
अशावेळी आस्तिकांना ( त्यांची
अशावेळी आस्तिकांना ( त्यांची मेजॅारटी असल्यास )शरण जावून मी झोपतो आता असं म्हटलं असतं.कारण कोणत्याही उकलीवर उत्तर एकच असते हे मला माहित आहे.बाबांना काळजी!
खरंतर या प्रकारांबद्दल आपण
खरंतर या प्रकारांबद्दल आपण 'देवा'चे किंवा देव या संकल्पनेचे आभार मानले पाहिजेत, एवढी करमणूक होते आजूबाजूला बघून ...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काही लोक गोलगोल काय फिरतात
काही लोक गोलगोल काय फिरतात काही फडाफडा (म्हणजे स्वतःला न लागेल इतपत) तोंडात काय मारुन घेतात, कोणी साष्टांग नमस्कार घालतय तर कोण रडतय, सर्व प्रकार पहायला मिळतात देवळांत
परीक्षेत पास होण्याच्या काही
परीक्षेत पास होण्याच्या काही टिप्स 'विशेषकरून १० बोर्डाच्या:
पेपर तपासणे अतिशय जिकरीचे काम. निश्चित टक्का मुले पास झालीच पाहिजे, असा अलिखित नियम आहे.
१. प्रश्नांची उत्तरे येत नसली तरीही पेपर कोरा ठेऊ नका.
२. ज्या प्रश्नांची उत्तरे माहित आहे, डोळे बंद करून ती उत्तरे लिहा.
३. विशेषकरून अन्ग्रेजीच्या पेपर मध्ये जो निबंध पाठ आहे, तो लिहा.
पहिल्यांदा पेपर तपासल्यावर ५० टक्के पेक्षा कमी मुले पास होतात. अन्ग्रेजीच्या पेपरमध्ये तर ३० टक्के हि होत नाही. मग ज्या मुलांनी काही खरडले असेल त्यांना मार्क्स दिले जातात. तुम्ही निबंध लिहिला आहे, याचा अर्थ तुम्हाला काही तरी पाठ आहे. तसेच कुठले तरी उत्तर तुम्ही ठीक लिहिले आहे या साठी हि तुम्हाला मार्क मिळतील. अश्या रीतीने ७०-९० टक्के परिणाम काढल्या जातो.
तुम्ही जर नियमित मंदिरात जात असाल तर नाना प्रांतातल्या व्यक्तींशी तुमचा परिचय होईल. नौकरीच्या शोधात असाल तर निश्चित याचा फायदा होईल. शिवाय तुमच्यावर आस्तिक हा टैग आपसूक लागेल. तुम्ही विश्वसनीय आहात हि खात्री हि लोकांना पटेल. अर्थात तुमचे कार्य सफल होण्याची शक्यता जास्ती.
शिवाय तुमच्यावर आस्तिक हा टैग
याबद्दल मला कुतुहल आहे. आस्तिक म्हणजे विश्वासार्ह ही कल्पना सर्वसामान्यपणे स्वीकृत आहे का? की बहुतेक लोक आस्तिक असतात त्यामुळे त्यांना हा मनुष्य 'आपल्यातला' वाटतो? म्हणजे आस्तिकांची बहुसंख्या असताना आपण आस्तिक असणं फायद्याचं हे तत्त्व पटण्यासारखं आहे, पण अशा पद्धतीने मांडलेलं पहिल्यांदाच बघितलं. (उत्क्रांतीमध्ये इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी नावाची संकल्पना असते, तसंच हिला सोशली स्टेबल स्ट्रॅटेजी म्हणता येईल का?)
घासु गुर्जी, तुमच्यासारखं
घासु गुर्जी, तुमच्यासारखं सायन्टिफिक नाही सांगता येणार.
माझे साबु एखाद्या माणसाबद्दल सांगताना "चांगला माणूस आहे. गावाकडचा आहे. देवभक्त आहे." असे म्हणतात.
पहिले वाक्य त्यांचे मत. दुसरे आणि तिसरे वाक्य त्या मतामागचे कारण. दुसर्यातले गाव हे भारत देशातले कुठलेही गाव आणि तिसर्यातला देव हा प्रचलित देवांच्यातला कुठलाही देव असू शकतो.
गावाकडचा वा देवभक्त असल्याने त्याच्या कुल्यावर सोन्याचा शिक्का मारला जातो का? हा प्रश्न मी अनेकदा गिळलाय. :फिदी:
खेड्यातल्या किंवा छोट्या शहरातल्या माणसांशी(नातेवाइक, कायदेशीर नातेवाइक आणि असेच कामानिमित्ताने भेटणारे लोक) संवाद साधताना आपण देवाला नाकारत नाही आहोत हे समोर पोचल्याने अनेकदा आइसब्रेकिंग पटकन होते. आपण कमी 'ऑड मॅन आऊट' होतो असा अनुभव.
- नी
"चांगला माणूस आहे. गावाकडचा
हे अमेरिकेच्या संस्कृतीतही दिसून येतं. 'गॉडफिअरिंग' हे विशेषण चांगल्या माणसांसाठी, काहीशा कौतुकाने वापरलं जातं; कम्युनिस्टांना हीन लेखताना 'गॉडलेस' हा शब्द तुच्छतेने वापरला जातो (किमान काही दशकांपूर्वी तरी जायचा). अमेरिकनांना विचारलं की तुम्ही कुठच्या धर्मगटांना अधिक जवळचे मानता, कुठच्यांना कमी जवळचे मानता - तर त्याचं उत्तर आत्तापर्यंत 'नास्तिक सर्वात वाईट' असं मिळत असे. आत्ता आत्ता मुस्लिमांबरोबर नास्तिक टाय झालेले आहेत.
यामागची कारणं काय असावीत याबद्दल मला प्रचंड कुतुहल आहे. वर पटाइतांनी म्हटल्याप्रमाणे आस्तिकांची एकमेकांत उठबस असते, धार्मिक प्रसंगांनिमित्ताने भेटीगाठी होतात. त्यामुळे संपर्क अधिक असतो हे एक. पण याहीपलिकडे आस्तिकता ही नोकरी देण्यासाठी पात्रता ठरत असेल का? देवावर विश्वास ठेवणं आणि त्यापुढे नमणं हे कुठच्यातरी वरच्या शक्तीच्या समोर लीन असण्याचं निर्देशक आहे का? कारण माझ्याकडे काम करायला ठेवायचा माणूस हा माझे हुकुम पाळणारा हवा. ते आस्तिकांमध्ये अधिक असतं का? मिलिटरीसारख्या कडक शिस्तीच्या संस्थेशीही आस्तिकांचं जमतं. 'देव, देश अन् धर्मासाठी' जो आपलं सर्वस्व वाहायला तयार असतो तो नोकरीसाठी अधिक लायक ठरतो का? या प्रश्नांची उत्तरं सिद्ध करता येतील की नाही माहीत नाही, पण मला गट फीलिंगनुसार उत्तर होय असं वाटतं.
मग पुढचा विचार असा येतो की यातले किती लोक देखाव्यापुरते आस्तिक असतील?
देवभक्त माणूस देवाच्या भीतीने
देवभक्त माणूस देवाच्या भीतीने का होईना पण प्रामाणिकपणे वागेल हा विचार / ही आशा आस्तिकता हा गुण होण्यामागे असावा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
देवावर विश्वास ठेवणं आणि
मलाही असंच वाटतय पण आस्तिक = कंफॉर्मिस्ट पेक्षा जास्तं अॅक्युरेटली, नास्तिक = बंडखोर असं समीकरण असतं. नोकरीवर ठेवताना उगाच कोण बंडखोर माणसाला ठेवेल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
शिक्षण, पात्रता वगैरे गोष्टी
या हिशोबात, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या लोकांना बऱ्याच नोकऱ्या मिळतात. बहुदा शिक्षण, पात्रता वगैरे गोष्टीही तपासत असतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या हिशोबात, स्वतंत्र बुद्धीने
या नोकर्या इतर नोकर्यांपेक्षा खूप कमी असतील अशी अटकळ आहे. एखादं स्किल असणं आणि स्वतंत्र विचार असणं हे वेगळं. स्किलची डिमांड असते. अजून विचार केला पाहिजे. रोचक विषय आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कौशल्य म्हणजे नक्की काय?
कौशल्य म्हणजे नक्की काय? नेमून दिलेलं काम, दिलेल्या सूचनांबरहुकूम जसंच्या तसं करणं याला कौशल्य म्हणता येईल. संगीताचा नवीन तुकडा तयार करणं ही स्वतंत्र बुद्धी; कोणीतरी सांगितले तसेच्या तसे सूर वाजवले किंवा गळ्यातून काढले हे कौशल्य. गाताना त्यात शब्द असतील तर ते भाव जाणून ते गाण्यात दाखवणं, किंवा एखाद्या ठिकाणी नवी जागा गाणं/वाजवणं ही स्वतंत्र बुद्धीच. स्वतंत्र बुद्धीने करायची कामं रोजच्या रोज करता येत नाहीत; पण काही प्रमाणात कौशल्य असल्याशिवाय स्वतंत्र बुद्धी वापरताही येणार नाही.
भले कोणी नास्तिक असेल तरी जगण्यासाठी आवश्यक कामं डोकं लावून किंवा बिनडोकपणे, केल्याशिवाय व्यवस्थित जगता येणार नाही. पुन्हा, जगण्यासाठी आवश्यक म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी यावरून चर्चा होऊ शकते. पण उदाहरणार्थ, व्यवस्थित जगण्यासाठी नियमितपणे आंघोळ करणं नास्तिकांना सोडता येत नाही; भाविकांनी आंघोळीला कितीही पावित्र्य डकवलं तरीही*. पण रोज पाढे लिहिले म्हणजे गणित जमतं, रोज हाताने काहीतरी लिहिल्यामुळे आकलन वाढतं, हे योग्य आहे का असे प्रश्न उपस्थित होतात.
सध्यातरी नास्तिकांची संख्या/प्रमाण फार नाही. हे सगळे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे आहेत असाही दावा नाही, पण तसं मानलं तरी ४-६-८ टक्के लोकांना आवडतील अशा नोकऱ्या, व्यवसाय करता येणं कठीण नाही.
*यावरून काल वाचलेला वैताग आठवला.
हेमंत कर्णिक म्हणतात, "मला अलिकडे शाहरुख आणि रोहित शेट्टी दोघांचा कंटाळा येऊ लागला होता. पण दिलवाले न बघितल्यास वेडपट धर्मांधांच्यात मोजलं जाण्याच्या भीतीमुळे बघणं भाग झालं आहे. च्यायला कटकट."
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
डोळे बंद करून कसं लिहायचं?
डोळे बंद करून कसं लिहायचं?
ऐसी अक्षरेवर प्रतिसाद
ऐसी अक्षरेवर प्रतिसाद लिहिताना मी नेहमीच डोळे बंद करून टंकन करतो. ९० टक्के मराठी ठीक टंकळ्या जाते. शिवाय डोळे बंद करून टंकताना कल्पना शक्तीला चांगली चालना मिळते.
डोळे नुसते बंद करता, की काही
डोळे नुसते बंद करता, की काही विशिष्ट ब्रँडची झापडे (विमानात मिळतात तशी) देखिल वापरता?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
आधी
आधी उघडे ठेवून नीट टंका. मग बंद करूनचं पाहू,
-Nile
सॉल्लिड!
मी आजपासून तुमचे लेख/प्रतिसाद डोळे बंद करूनच वाचणार आहे
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हा मंत्र आणि सक्षमता याबद्दल
हा मंत्र आणि सक्षमता याबद्दल श्रद्धा असावी परंतू मागे एक घटना घडली त्यात दहावीच्यि मुलीने असाच काही मंत्र लिहिला आणि बोर्डाने नियमाप्रमाणे नापास करून टाकले.असा काही कोडवर्ड लिहिणे अवैध आहे.पेपर तपासणी दोनदा करूनही नापास ठरवल्यावर कोर्टात जाऊन कारण मागवले तर कोर्टाने बोर्डाचे मत ग्राह्य धरले.तेव्हा हा वैधानिक इशारा लेखात द्या.विद्यार्थी ऐसीअक्षरे वाचत नसतील परंतू त्यांचे अतिउत्साही पालक --------!
असा काही कोडवर्ड लिहिणे अवैध
अतिशय रोचक!!