Skip to main content

अवतार कृष्ण हंगल (यांच्या निमिताने)

ज्येष्ठ अभिनेते अवतार कृष्ण हंगल उर्फ ए.के.हंगल यांचे आज निधन झाले. त्यांना आदरांजली...
मृत्यूसमयी हंगल यांचे वय अठ्ठ्याण्णव होते. आपल्या मुलाबरोबर हंगल राहात होते. त्यांचा मुलगाही आता वृद्ध म्हणता येईल इतक्या वयाचा झाला आहे. काही वर्षांपूर्वी हंगल यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांच्यावर औषधोपचारांचा खर्च करणे अवघड झाले आहे असे त्या मुलाने सांगितले होते. मग खडबडून जाग येऊन लोकांनी मदत केली वगैरे.
या निमित्ताने माणसाने किती जगावे हा जुना विचार नव्याने मनात येतो आहे. मरण येत नाही म्हणून जगणे याला काही अर्थ आहे का असा प्रश्न पडतो आहे. सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तर सन्मानाने मरण्याचा का नाही- हेही खरे तर जुनेच वाटणे. पण सगळे आयुष्य म्हणजे एक कविताच असावी असे आयुष्य जगलेल्या लोकांची शेवटची अवस्था अशी गलितगात्र, परावलंबी आणि निरर्थक असावी, हे काही बरे वाटत नाही. (अटलबिहारी वाजपेयींचा अलीकडचा फोटो बघवतही नाही!) 'मरणा, कधी रे येशील तू?' असे कळवळत, खुरडत जगण्यापेक्षा 'मरणा, काय तुझा तेगार!' म्हणत निघून जाणे का शक्य नसावे असे वाटत आहे. ते असो.
हंगल यांना आदरांजली.

शिल्पा बडवे Sun, 26/08/2012 - 11:26

हंगल यांचं काम नेहमीच आवडतं. श्रद्धांजली.

बाकी मरण आपल्या हातात नाही त्यामुळे टंकनश्रम घेण्यात अर्थ नाही. वेळ आली की कोणत्या ना कोणत्या प्रकारे मरण येतंच..काळ वेळ साधली गेली पाहीजे ( यातुन भलते अर्थ काढु नयेत.

आतिवास Sun, 26/08/2012 - 12:11

बहुधा हा प्रतिसाद अवांतर आहे. पण तरीही लिहिते.

जन्म आणि मृत्यू या दोन्ही बाबतीत आपण परावलंबी आहोत. हे परावलंबन स्वीकारणं, कधी कधी जगण्याची निरर्थकता (आपली आणि इतरांचीही) स्वीकारणं - त्याचाही सन्मान करणं हे आवश्यक आहे माझ्या मते. यातून जो काही अहंकार शिल्लक असेल 'मी केलं, मी किती कर्तबगार' असा; त्याला धक्का बसतो - दुस-यांचं परावलंबन पाहूनही बसतो. बसायला हवा! त्यातून जाग यायला हवी.

जोवर मरण लांबवण्याचा अधिकार नाही, तोवर मरण अलिकडे आणण्याचा तारतम्य नसलेला अधिकारही गैर आहे. असा अधिकार परावलंबी आणि निरर्थक जीवन जगणा-या माणसांना मिळणार नाही, तो त्यांच्या वतीने दुसरेच कोणीतरी राबवणार - आणि या दुस-यांचे हेतू नेहमी भले असतील याची सार्वकालिक खात्री आपण देऊ शकत नाही.

ज्यांनी परिस्थिती नियंत्रणाखाली असताना, विचार करण्याची शक्ती शाबूत असताना "अमूक परिस्थिती उद्भवल्यास मला अमुक इतक्या काळानंतर जगवू नये" असे लिहून अथवा चारचौघांना सांगून (लिहिता न येणा-या माणसांची सोय काय असेल हा प्रश्नच आहे) ठेवले असेल आणि त्यांच्या वतीने असा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे हे स्पष्ट केले असेल आणि वैद्यकीय तज्ञांचा पाठिंबा असेल तिथं 'इच्छामरण' असावे असे मला वाटते.

पण चांगले जगत असताना कुणी फारसा मरणाचा विचार करत नाही हेच खरे! - स्वतःच्या मरणाचा!!

प्रकाश घाटपांडे Sun, 26/08/2012 - 19:06

ए के हंगल यांना आदरांजली.
बाकी यानिमित्ताने असलेल्या प्रश्नांवर आंतर जालावर यापुर्वीही चर्चा झालेल्या आहेतच.

............सा… Mon, 27/08/2012 - 06:34

स्वेच्छा मरणाला विरोध आहे. एकदा परवानगी मिळाल्यानंतर पुढील सिनॅरिओ कशावरून होणार नाही? एखादी व्यक्ती अतिशय हलाखीचे जीवन कंठत आहे, अगदी जवळचे नातेवाईक ही कंटाळून गेले आहेत. कशावरून त्या अगोदरच दुर्बळ झालेल्या व्यक्तीवर स्वेच्छामरणाचा दबाव टाकला जाणार नाही? सतत टोमणे मारून, घालूनपाडून बोलून त्या व्यक्तीला अधिक खाईत लोटले जाणार नाही याची शाश्वती काय?

एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यू जवळ करणे हा झाला "हॅपी पाथ" पण इतर वृद्ध किंवा रोगी, दबावाखाली येणार नाही याची शाश्वती काय? जग इतके सरळ आहे काय की एखाद्या सुविधेचा दुरुपयोग होणार नाही?

_______________________

ए के हंगल यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल ची माहीती वाचून कंठ दाटून आला. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/08/2012 - 06:42

हंगलसाहेबांना श्रद्धांजली.

युथनेशियाबद्दल मंगला आठलेकर यांनी 'जगायचीही सक्ती आहे' नामक पुस्तक लिहीलेलं आहे. त्याबद्दल काही चर्चा इथे झाली होती. (दुवा) सख्ख्या नात्यात जवळून काही मृत्यु पाहिले आहेत, त्यातले बरेचसे फार त्रास न होता गेले. एकाला मात्र आठेक महिने कणाकणाने मरताना पाहिलं, तेव्हाही असा विचार करून झाला.