Skip to main content

सुवर्णसिद्ध जल : एक अनुभव

(सूचना: आयुर्वेद, होमिओपथीला सर्पतेल (snake oil) समजणार्‍यांनी हा लेख वाचला नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तरी चालेल.)

आयुर्वेदांत सोन्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. होमिओपथीमध्ये पण ऑरम-मेट हे औषध शुद्ध सोन्यापासून बनवतात. अलिकडे बरेच आयुर्वेदतज्ञ सुवर्णसिद्ध जल लहान मुलाना द्यायला सांगतात. मला याबद्दल कुतुहल निर्माण झाले असता मी नेट वर शोध घेतला. तेव्हा कुणाचे अनुभव वाचायला मिळाले नाहीत. बरीचशी चर्चा वैद्यामध्येच होताना दिसली. बालाजी तांब्यांबद्दल मला फारसे प्रेम नाही, पण त्यांच्या खालील लेखात आयुर्वेदीय दृष्टीकोनातून सोन्याचे महत्त्व थोडेफार समजले (http://epaper.esakal.com/esakal/20091211/4729257057489860031.htm).

पारंपरिक पद्धतीमध्ये सोन्याची वस्तू पाण्यात टाकून ते पाणी बराच वेळ उकळवावे सांगितले आहे. मी ही पद्धत थोडी बदलली कारण माझ्यादृष्टीने इंधन आणि वेळ वाचविणे हे महत्त्वाचे मुद्दे होतेच पण वेळखाऊ पद्धतीमुळे एखाद्या उपचाराकडे लोक पाठ फिरविण्याची शक्यता पण निर्माण होते.

मी केलेल्या बदलानुसार अर्धे फुलपात्र प्यायचे पाणी घेतले आणि सोन्याची अंगठी घेतली (सोन्याची तार असलेली वस्तू घेऊ नये कारण ती तापवल्यावर तुटू शकते. माझी एक साखळी अशी तुटली आहे.)

सोन्याची अंगठी गॅसवर तांबडी भडक (red hot)होई पर्यंत तापवावी. याला दोन ते तिन मि पुरतात. तापलेली अंगठी मी मग फुलपात्रातील पाण्यात टाकतो. पाण्यात ती चुरचुरुन गार होते.

ही प्रक्रिया मी एकंदर तिनदा करतो.

अशा रितीने "सुवर्णसिद्ध जल" तयार होते. हे पाणी प्यायल्यावर (मी हा उद्योग रात्री करतो) मला खालील अनुभव ९५% पेक्षा अधिकवेळा आले आहेत (so in my own case I have experienced beyond placebo effect).

o शारीरिक आणि मानसिक तणाव १५-३० मि मध्ये पूर्ण नाहीसा होतो.
० एखादे बेन्झोडायझेपॅम घेतल्याप्रमाणे गाढ झोप लागते.

सोनं हा रासायनिक दृष्ट्या बर्‍यापैकी स्थिर असल्याने जडधातूचे शरीरात होणारे दुष्परिणाम या प्रयोगामुळे होणार नाहीत असे वाटते. मी हा अनुभव शेअर करण्याचे कारण हा प्रयोग जास्तीतजास्त लोक करू शकले तर जास्तीत जास्त परिणाम कळायला मदत होईल.

ऋषिकेश Thu, 25/04/2013 - 10:16

आपोआपच अतिशय गाढ झोप तीही ८-१० तास येत असल्याने असल्या प्रयोगांची तुर्तास तरी गरज भासत नाही. पुढेही भासू नये ही इच्छा :)
----
मात्र या निमित्ताने सर्दीसाठी मी करत असलेल्या घरगुती प्रयोगाचा आठवण झाली तो देतो.
साधारणतः दर दोन महिन्यांनी हवामानात बदल झाला की मला सर्दी होते. अशावेळी पाणी उकळून एक अष्टमांश करून झोपण्याआधी घेतले तर उत्तम परिणाम होतो व सर्दी बरीच कमी होते. दोन द-तीन दिवसात पूर्ण आराम मिळतो. (मी दोन कप पाणी घेतो व पाव कप होईपर्यंत उकळतो. साधारण वेळ ८-१० मिनिटे)
----
बाकी, आयुर्वेद व होम्योपथीला एका रेषेत का बसवले आहे हे समजले नाही. पण त्यावर चर्चा करण्याबद्दल पहिल्याच वाक्यात ताकिद मिळाल्याने अधिक लिहित नाही.

साबु Thu, 25/04/2013 - 10:17

प्रयत्न करुन बघयला हरकत नाही.
अन्गठी वापरतील घेतलीत कि वेढणी?

बाबा बर्वे Thu, 25/04/2013 - 11:37

सोन्याची अंगठी बनवताना त्यात थोड्याफार प्रमाणात इतर धातु (बहुदा तांबे) मिसळतात (१००% शुद्ध सोन्यापासुन दागिने बनवत नाहीत) असे कुठेतरी वाचले होते. वरील पद्धतीत असे दागिने (अंगठी वगैरे) तापवून वापरताना इतर धातूंचा काही विपरीत परिणाम होणार नाही का ?

तर्कतीर्थ Thu, 25/04/2013 - 11:44

In reply to by बाबा बर्वे

मी गेले ३ वर्षे हा प्रयोग वरचेवर करत आहे (रोज नाही). सध्या तरी काही दुष्परिणाम जाले नाहीत. शिवाय तांब्याची मेंदूला आणि इतर अवयवाना गरज असते. Multivitamin tablet मध्ये CuSo4 तांब्याची गरज भागविण्याकरता असते.

नितिन थत्ते Thu, 25/04/2013 - 14:44

In reply to by तर्कतीर्थ

>>Multivitamin tablet मध्ये CuSo4 तांब्याची गरज भागविण्याकरता असते.

कॉपर सल्फेटविषयी विकीपिडियावर हे वाचले.

Copper sulfate was also used in the past as an emetic*.[16] It is now considered too toxic for this use.

*emetic: Substance that induces vomitting.

Uses
As a herbicide, fungicide and pesticide

Copper sulfate pentahydrate is a fungicide

नितिन थत्ते Thu, 25/04/2013 - 12:10

२४ कॅरट सोन्याची वस्तू घेऊन प्रयोग केला आहे का?

दागिने स्वरूप असलेल्या सोन्यात २/३ कॅरट इतर धातू असतात. अंगठी तापवल्यावर त्या धातूंचे ऑक्सिडेशन होऊन काही अंश पाण्यात उतरत असू शकेल. (+ अंगावर असलेला दागिना असेल तर अंगावरील घाम वगैरेंची त्या धातूंवर प्रक्रिया होऊन जे क्षार तयार होत असतील त्यांचे अंश काही काम करत असतील.

तर्कतीर्थ Thu, 25/04/2013 - 14:13

In reply to by नितिन थत्ते

अंगठीच्या अनुभवात सातत्य असल्याने २४ कॅरट सोने वापरायचा विचार केला नाही. पण तांबे चमक सोन्याला चमक आणायला वापरतात. सोन्या नंतर मी शुद्ध चांदी आणी शुद्ध तांबे पण वापरुन बघितले.

चांदीच्या प्रयोगात "यौवनवर्धनाचा" (उद्दीपनाचा!) ;) अनुभव आला आणी तांब्याच्या प्रयोगात पोटात मळमळुन उलटीची भावना झाली.

@नितीन थत्ते

गॅस्वर अंगठी धरल्यावर घाम जळून जाणार आणि फक्त कार्बन उरेल.

नितिन थत्ते Thu, 25/04/2013 - 14:23

In reply to by तर्कतीर्थ

>>गॅस्वर अंगठी धरल्यावर घाम जळून जाणार आणि फक्त कार्बन उरेल.

जे काय उरेल ते पाण्यात उतरून त्याचा परिणाम होत असेल.

मुद्दा हा की सोने तापवून किंवा तत्सम कृती करून सोन्याचे काहीही पाण्यात उतरणार नाही.

कानस घेऊन सोने घासून त्याचे कण पाण्यात टाकून पाण्याबरोबर पोटात गेल्यास ते दुसर्‍या दिवशी "तसेच्या तसे परत मिळवता" येतील.

राही Thu, 25/04/2013 - 18:01

In reply to by तर्कतीर्थ

चांदी आणि तांबे हवेच्या संपर्कानेही काळवंडते,त्यांची रासायनिक संयुगे तयार होतात. घामामुळे सोन्यावर असे काही सूक्ष्म परिणाम होत असतील का? आणि जर होत असले तर निर्माण झालेली संयुगे विस्तवावर पूर्णतः जळून जाऊन फक्त कार्बन उरेल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/04/2013 - 19:53

In reply to by राही

ही रासायनिक संयुगं म्हणजे ऑक्साईड्स असतात. धातूंचं मंदज्वलन होतं, त्यातून हा थर जमा होतो. सोन्याचांदीवरचा 'गंज'. तांबं हिरवं पडतं ते ही त्यामुळेच. (जुन्या युरोपीय इमारतींचे कळस, अमेरिकन स्वातंत्र्यदेवता हिरवे दिसतात हे त्यामुळेच.) ही संयुगं नक्की कशामुळे मूळ धातून चिकटून बसतात, त्यात कशा प्रकारचं बल काम करतं यावर उष्णतेचा या संयुगांवर काय परिणाम होईल आणि उष्णतेमुळे धातू स्वच्छ होईल का यावर अवलंबून आहे.

प्रकाश घाटपांडे Thu, 25/04/2013 - 12:49

कॅरट म्हणजे नेमके काय? ते कसे मोजतात. शुद्धतेच्या संबंधात काहीतरी भानगड आहे एवढेच माहीती आहे. २४ कॅरट म्हणजे १०० टक्के शुद्ध हे बरोबर आहे का? सोनार सांगेल ते प्रमाण आपल्याला काय कळतय त्यातल?

इरसाल Mon, 29/04/2013 - 16:26

In reply to by प्रकाश घाटपांडे

सोन्याच्या बाबतीत कॅरेट म्हणजे धातुत्/मिश्र धातुत असणारे सोन्याचे प्रमाण.

जसं २४ कॅरेट म्हणजे १०० % सोने (प्रॅक्टिकली १००% शुद्ध सोने हे धातु रुपात अस्तित्वात असु शकत नाही*)
आता २२ कॅरेट म्हणजे ९१.६६% सोने, यात उरलेले ८.३४% हे चांदी, तांबे, लोह व जस्त असु शकते वेगवेगळ्या प्रमाणात.
आणी १८ कॅरेट म्हणजे ७५ % सोने, यात उरलेले २५ % हे चांदी, तांबे, लोह व जस्त असु शकते वेगवेगळ्या प्रमाणात.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 29/04/2013 - 19:33

In reply to by इरसाल

(प्रॅक्टिकली १००% शुद्ध सोने हे धातु रुपात अस्तित्वात असु शकत नाही*)

याचा नक्की अर्थ काय?

एखादं मूलद्रव्य धातू असेल तर त्यातून वीज आणि उष्णता वाहून नेली जाते, तन्यता (ductility and malleability) असते. अपवाद सोडीयम. बहुतेकसे धातू सामान्य तापमान, हवेच्या दाबाला स्थायूरूपात असतात. अपवाद पारा. त्याशिवाय अणूच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत यावरून मूलद्रव्य धातू आहे का नाही हे ठरवतात. किती शुद्ध स्वरूपात पदार्थ उपलब्ध आहे, शुद्ध केलेला आहे यावरून धातू आहे का नाही हे ठरवत नाहीत.

शुद्ध १००% सोनं असेल तर त्याचे दागिने बनवता येत नाहीत. पण शुद्ध सोन्याची वळी, बिस्किटं, नाणी वगैरे मिळतात.

इरसाल Tue, 30/04/2013 - 12:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणताय त्याप्रमाणे जर त्या शुद्ध सोन्याची वळी,बिस्किटं, नाणी पाहिलीत तर त्यावर तुम्हाला ९९.९९९% (फाइव्ह नाइन) किंवा ९९.९९% (फोर नाइन) इतकीच शुद्धता छापलेली दिसेल.उरलेले ०.००१ % वा ०.०१% ही त्यातील अशुद्धता चांदी,तांबे वा इतर धातुच्या रुपात असेलच.

१००% शुद्ध सोने बनवायच्या प्रक्रियेमधील पायर्‍यांनुसार गेले तर १००% हे धातु रुपात न रहाता द्रव किंवा वायु रुपात परिवर्तीत होइल.

पार्‍याव्यतिरिक्त ब्रोमीन हा धातु सुद्धा द्रव रुपातच असतो.

इरसाल Wed, 01/05/2013 - 13:22

In reply to by नितिन थत्ते

१.गोल्ड प्लेटींग केले तरी १००% शुद्ध अशक्य आहे.
२.बरोबर साधारण अतिउच्च दाबावर तो द्र्व रुपातुन धातु रुपात बदलतो.

'न'वी बाजू Tue, 30/04/2013 - 15:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याशिवाय अणूच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत यावरून मूलद्रव्य धातू आहे का नाही हे ठरवतात

?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/05/2013 - 04:30

In reply to by 'न'वी बाजू

या टेबलवरून नीट सांगता येईल.
http://www.ptable.com/

पहिल्या कॉलममधे हायड्रोजन वगळता धातू आहेत. २-१२ कॉलममधे सगळेच धातू. १३-१६ कॉलममधे काही धातू/अधातू.

पहिल्या कॉलममधल्या अणूंच्या बाहेरच्या कक्षेत एक इलेक्ट्रॉन, दुसर्‍या कॉलममधल्या अणूंच्या कक्षेत दोन इलेक्टॉन्स ... ज्या अणूंच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत, कक्षा स्थिर होण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन लागतात तेवढे, असणारे inert (मराठी?) वायू अधातू आहेत. त्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील, पण त्या आकड्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त असतील तर ते सहसा अधातू असतात. यात हायड्रोजन, कार्बन दोन्ही वर्गीकरणांमधे येतात; ते अधातू समजले जातात. ही धातू कोणते याची व्याख्या नाही; हा धातू-अधातूंचा गुणधर्म आहे.

अणूंच्या पातळीवर बोलताना १००% शुद्धतेची हमी देता येते. म्हणून बाहेरच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन आठवले. त्याशिवाय या इलेक्ट्रॉन्समधे असणार्‍या मेटलिक बाँड्समुळेच वीज वाहून नेली जाते. वीज वाहून नेणे हा धातूंचा दुसरा गुणधर्म आहे. धातूंचे ठराविक गुणधर्म, मेटलिक क्लींक सोडीयमला नाही, पारा द्रवावस्थेत असतो तरीही मेटलिक बॉण्ड्समुळे हे धातूच समजले जातात.

तर्कतीर्थ Thu, 25/04/2013 - 15:43

सोन्याचे उच्च तापमानाला एक अनस्टेबल ऑक्साईड तयार होते. त्याचे पाण्यात विघटन होऊन काही सोने पाण्यात उतरत असायची शक्यता वाटते.
http://en.wikipedia.org/wiki/Gold(III)_oxide

तिरशिंगराव Thu, 25/04/2013 - 18:24

मी एक रसायनशास्त्रज्ञ आहे अशी माझी गोड गैरसमजूत होती. पण वरील अनुभव वाचल्यावर मी एक रसायनअज्ञ आहे याची खात्रीच पटली.
आता लोकांना सल्ले देणे बंद केले पाहिजे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/04/2013 - 19:49

काही जेनेरिक प्रश्न आहेतः

१. सोनं गॅसवर दोन-तीन मिनीटांत रेड हॉट होतं तेव्हा त्याचं तापमान साधारण किती असेल? फोडणीच्या तेलाचं तापमान ४०० से च्या जवळपास असतं असं सौर ऊर्जा साठवण्याच्या प्रयोगाबद्दल असणार्‍या लेखात वाचलं होतं.
२. या तापमानाला सोनं आणि पाण्याची काय प्रकारची प्रक्रिया होते?

३. साधं पाणी उकळून ७/८ पाणी जाऊ दिलं तर पाण्यात काय फरक पडतो? एक अंदाज, पाण्यात विरघळलेला क्लोरीन वायू निघून जातो. क्लोरीन उडून जाण्यासाठी ऑप्टीमल तापमान काय?

४. मलाही झोपेचा त्रास आहे. वेळीअवेळी झोप येते. कारमधून जाताना फार ऊन असेल, उकाडा असेल तर झोप अनावर होते. ती झोप उडवण्यासाठी डुलकी काढणं सोडून इतर काही उपाय आहेत का? विशेषतः आपण नकाशा पाहून ड्रायव्हरला रस्ता सांगायचा असतो तेव्हा याचा फायदा होईल.

तर्कतीर्थ Thu, 25/04/2013 - 19:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ती झोप उडवण्यासाठी डुलकी काढणं सोडून इतर काही उपाय आहेत का?

उपाय क्र १ - कॅफीनयुकत पेय पिणे. ब-याचजणांची झोप त्यामूळे उडते. चयापचय वाढतो आणि वजन कमी होतं
उपाय क्र २ - हाय पोटेन्सी बी१२+बी६+ फोलि़क अ‍ॅसिड + अल्फा लिपोईक अ‍ॅसिड घेतल्यास पण झोप उडते.

तिरशिंगराव Thu, 25/04/2013 - 20:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१. शुद्ध सोन्याचे वितळण्याचे तापमान १०६४ सेल्सियस इतके दिले आहे. म्हणजे रेड हॉट अंगठीचे त्यापेक्षा बरेच कमी असावे.

२. माहित नाही.

३. साधे पाणी आटवले तर त्यातल्या क्षारांचे पर्सेंटेज(टक्केवारी) वाढेल.

तर्कतीर्थ Thu, 25/04/2013 - 20:24

तिरशिंगराव,

आमच्या आयआयटीतल्या केमिस्ट्री/केमिकल इंजिनिअरींगच्या एका प्राध्यापकांनी मला खालील प्रतिसाद पाठवला आहे -
"So I am not surprised that by your quenching method you will get nanoparticles of gold in water and hence effects."

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 25/04/2013 - 20:26

In reply to by तर्कतीर्थ

एक वाक्याचं ट्वीट पत्रकारही लिहू शकतात. या प्रक्रियेचं स्पष्टीकरण शिक्षित व्यक्तीकडून अपेक्षित आहे.

अरविंद कोल्हटकर Fri, 26/04/2013 - 00:45

सोन्याच्या सेवनाने झोपेवर काही परिणाम होईल काय ह्यावर तज्ज्ञ चर्चा करीत आहेतच.

इतरेजनांनी सोन्याच्या रोजच्या किंमती नजरेखाली ठेवल्या तर समीकरणाच्या कोठल्या बाजूस वाचक उभा आहे त्यावरून त्याची झोप एकतर साफ उडेल किंवा वो चैनकी नींद सोयेगा!

Nile Fri, 26/04/2013 - 01:47

In reply to by अरविंद कोल्हटकर

इतरेजनांनी सोन्याच्या रोजच्या किंमती नजरेखाली ठेवल्या तर समीकरणाच्या कोठल्या बाजूस वाचक उभा आहे त्यावरून त्याची झोप एकतर साफ उडेल किंवा वो चैनकी नींद सोयेगा!

सोन्याच्या उताराने पण वेगळ्याच कारणानेही झोप उडणारे आहेत...

सन्जोप राव Fri, 26/04/2013 - 05:12

सोने, चांदी, तांबे अशा धातूंचे आयोनायझेशन झाले की एका विशिष्ट प्रमाणात हे धातू जीवाणूंचा नाश करतात. यापलीकडे हे अनुभव म्हणजे प्लासेबो इफेक्ट असण्याची शक्यताच वाटते. नॅनो पार्टिकल्स वगैरेविषयी कल्पना नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 26/04/2013 - 06:38

In reply to by सन्जोप राव

मग आणखी थोडे प्रश्नः

१. जीवाणूंमुळे(ही) निद्रानाश जडतो का?
२. (एवढ्या कमी) तापमानामुळे आयनायझेशन होत नाही असं भौतिकशास्त्र शाळेत शिकवतात.

गवि Fri, 26/04/2013 - 12:20

सर्पतेलात तरी काहीनाकाही बरेवाईट गुण असतील आणि त्याचा फायदा तोटा किंवा काहीतरी परिणाम दिसू शकेल याच्यावर माझा विश्वास आहे, पण होमिओपथीसारख्या काहीच द्रव्य नसलेल्या साखरेच्या गोळ्यांवर काडीमात्र विश्वास नसल्याने पहिल्या वाक्यात दिलेल्या इशार्‍याप्रमाणे मत देणे टाळत आहे.

बाकी आयुर्वेदाला होमिऑपथीच्या सोबत बसवलेलं पाहून मलाही विचित्र वाटलंच.

तर्कतीर्थ Fri, 26/04/2013 - 14:40

In reply to by गवि

गवि,

काही दुराग्रही लोकांचा आधुनिक वैद्यकावर, त्यात वापरण्यात येणार्‍या नियंत्रित आणि अंध चाचण्यांवर फार विश्वास असतो. त्यांना आयुर्वेद आणि होमिओपथी सारख्या व्यक्तीकेंद्रीत चिकित्सा या सर्पतेलासमान वाटतात. आता मुळातच जी चिकित्सापद्धत व्यक्तीकेंद्रित आहे ती नियंत्रित आणि अंध चाचण्या वापरून कशी सिद्ध करता येणार हा मुद्दा हे दुरात्मे कधीही स्वीकारायला तयार होत नाहीत. आणि मग कटुतेला सुरुवात होते. All healing is scientific असा सूर अनेक आधुनिक चिकित्सक आळवतात पण नियंत्रित आणि अंध चाचण्यांचे समर्थक त्याकडे कानाडॊळा करतात.

आता आधुनिक वैद्यक व्यक्तीकेंद्रित मुद्द्यांकडे कसे दुर्लक्ष करते याचा अनुभव सांगतो. मला माझ्या डॉ. नी रक्तदाब नियंत्रित ठेवायला metoprol 25 mg (१-०-१) हे औषध दिले. सुरुवातीला वर्षभर हे व्यवस्थित काम करत होते. नंतर अचानक हे औषध घेतल्यावर रक्तदाब खूप कमी व्हायला लागला म्हणून याच औषधाची extended release आवृत्ती मला घ्यायला सांगितली. ही नवी उपाय योजना मला उपयोगी पडेना आणि माझा रक्तदाब नियंत्रित होईना, तेव्हा मी माझ्या डॉ.ना औषध बदलायचे का विचारले असता त्यानी स्प्ष्टपणे नकार दिला. आणि मी विचित्र कात्रित सापडलो. शेवटी डॉ बदलावे असे मनात येऊ लागले आणि त्याच वेळेला मला एक कल्पना सुचली ती मी डॉ.ना न सांगता करून अमलात आणली. सकाळचा metoprol चा डोस मी immediate release या प्रकारचा चालू ठेवला आणि संध्याकाळचा डोस मात्र extended release स्वरूपातला चालू ठेवला आणी माझा रक्तदाब एकदोन आठवड्यात ठीक झाला. पुढे सहा महिने मी याच प्रकारे डॉ.ना न सांगता घेतले आणि मग हळुच दोन्ही वेळेला extended release प्रकारची गोळी सुरुवात केली.

मला खात्री आहे की कोणत्याही आधुनिक डॉ.ला मी केलेला उद्योग पटणार नाही किंवा आवडणार नाही. पण मला त्यांच्या समजुतीच्या मर्यादा कळत असल्याने मलाच मन मोठे करुन त्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.

नितिन थत्ते Fri, 26/04/2013 - 15:27

In reply to by तर्कतीर्थ

>>त्यांना आयुर्वेद आणि होमिओपथी सारख्या व्यक्तीकेंद्रीत चिकित्सा या सर्पतेलासमान वाटतात. आता मुळातच जी चिकित्सापद्धत व्यक्तीकेंद्रित आहे ती नियंत्रित आणि अंध चाचण्या वापरून कशी सिद्ध करता येणार हा मुद्दा हे दुरात्मे कधीही स्वीकारायला तयार होत नाहीत.

त्या चिकित्सापद्धती व्यक्तिकेंद्रित असतील तरी उपचार पद्धती व्यक्तिकेंद्रित कशा असू शकतील? आणि उपचार पद्धती इतक्या व्यक्तिकेंद्रित असतील तर त्यांचा वापर कसा करता येईल? [ताप आला तर अमुक औषध वापरावे हे कसे म्हणता येईल?]

बाकी आयुर्वेद या उपचार पद्धतीत ट्रायल एररने (भले स्टॅटिस्टिकल पद्धतीने नसोत) सिद्ध झालेली औषधे असू शकतील पण होमिओपाथीबाबत (औषधच नसलेल्या पाथीबाबत) गविंशी सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 27/04/2013 - 06:23

In reply to by तर्कतीर्थ

असं असल्यास त्या एका डॉक्टरला आधुनिक वैद्यक वापरून उपचार कसे करावेत हे समजलं नाही असं मानता येईल; आयुर्वेद किंवा होमिओपॅथीच किंवा त्यांची उपचारपद्धतीच योग्य हे कसं ठरवणार?

होमिओपॅथीच्या बाबतीत गवि आणि नितिन थत्तेंशी सहमत. होमिओपॅथीच्या प्लासिबोचाही माझ्यावर परिणाम होईलसं वाटत नाही.

तर्कतीर्थ Sun, 28/04/2013 - 11:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

होमिओपॅथीच्या बाबतीत गवि आणि नितिन थत्तेंशी सहमत

माझ्या सुवर्णसिद्धजला संबंधात वाचन चालू असताना ही एक केस वाचनात आली. होमिओपथी हे करू शकते याचे आश्चर्य वाटते.http://www.modernhomoeopathy.com/aurum%20mur.htm

तर्कतीर्थ Fri, 26/04/2013 - 14:43

In reply to by गवि

गवि,

काही दुराग्रही लोकांचा आधुनिक वैद्यकावर, त्यात वापरण्यात येणार्‍या नियंत्रित आणि अंध चाचण्यांवर फार विश्वास असतो. त्यांना आयुर्वेद आणि होमिओपथी सारख्या व्यक्तीकेंद्रीत चिकित्सा या सर्पतेलासमान वाटतात. आता मुळातच जी चिकित्सापद्धत व्यक्तीकेंद्रित आहे ती नियंत्रित आणि अंध चाचण्या वापरून कशी सिद्ध करता येणार हा मुद्दा हे दुरात्मे कधीही स्वीकारायला तयार होत नाहीत. आणि मग कटुतेला सुरुवात होते. All healing is scientific असा सूर अनेक आधुनिक चिकित्सक आळवतात पण नियंत्रित आणि अंध चाचण्यांचे समर्थक त्याकडे कानाडॊळा करतात.

आता आधुनिक वैद्यक व्यक्तीकेंद्रित मुद्द्यांकडे कसे दुर्लक्ष करते याचा अनुभव सांगतो. मला माझ्या डॉ. नी रक्तदाब नियंत्रित ठेवायला metoprol 25 mg (१-०-१) हे औषध दिले. सुरुवातीला वर्षभर हे व्यवस्थित काम करत होते. नंतर अचानक हे औषध घेतल्यावर रक्तदाब खूप कमी व्हायला लागला म्हणून याच औषधाची extended release आवृत्ती मला घ्यायला सांगितली. ही नवी उपाय योजना मला उपयोगी पडेना आणि माझा रक्तदाब नियंत्रित होईना, तेव्हा मी माझ्या डॉ.ना औषध बदलायचे का विचारले असता त्यानी स्प्ष्टपणे नकार दिला. आणि मी विचित्र कात्रित सापडलो. शेवटी डॉ बदलावे असे मनात येऊ लागले आणि त्याच वेळेला मला एक कल्पना सुचली ती मी डॉ.ना न सांगता करून अमलात आणली. सकाळचा metoprol चा डोस मी immediate release या प्रकारचा चालू ठेवला आणि संध्याकाळचा डोस मात्र extended release स्वरूपातला चालू ठेवला आणी माझा रक्तदाब एकदोन आठवड्यात ठीक झाला. पुढे सहा महिने मी औषध याच प्रकारे डॉ.ना न सांगता घेतले आणि मग हळुच दोन्ही वेळेला extended release प्रकारची गोळी घ्यायला सुरुवात केली.

मला खात्री आहे की कोणत्याही आधुनिक डॉ.ला मी केलेला उद्योग पटणार नाही किंवा आवडणार नाही. पण मला त्यांच्या समजुतीच्या मर्यादा कळत असल्याने मलाच मन मोठे करुन त्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे.

धनंजय Sat, 27/04/2013 - 21:58

दुराग्रह/ऑल हीलिंग इझ सायंटिफिक वगैरे.

याबाबत माझे मूलभूत धोरण व्यापाराबाबत आहे, सत्य ठरवण्याबाबत नाही.
"ऑल सेल्स ट्रान्झॅक्शन्स शुड हाव इनफ इन्फॉर्मेशन तो च्यूझ बेट्वीन ऑल्टर्नेटिव्झ."

"व्यापारी देवाणघेवाणीत विविध पर्यायी मालांपैकी निर्णय करण्याइतपत माहिती असली पाहिजे."
येथे व्यापारी देवाणघेवाणीच्या विनिमयात फक्त पैशांचाच हिशोब नाही. काळाचा व्यय हासुद्धा खर्च मानला पाहिजे, आणि काळाचा अमुक प्रकारे व्यय झाल्प्रकारेतमुक प्रकारे उपयोग करणे अशक्य होते (ऑपर्च्युनिटी कॉस्ट) याचा हिशोब केला पाहिजे.

चांगली झोप येण्याकरिता कोणी विवक्षित व्यायाम करत असेल, किंवा विवक्षित संगीत ऐकत आसेल (बाखने "गोल्डबर्ग व्हेरिएशन" एका उमरावाच्या झोपेकरिता रचले), किंवा योगवासिष्ट वाचत असेल (पु. ल. देशपांडे यांच्या एका विनोदी लेखातून). अथवा विशिष्ट तर्‍हेने उपस्कृत पाणी पीत असेल. यापैकी प्रत्येक उपचाराचा काहीतरी खर्च असतो : पैशाचा, काळाचा, किंवा ऑपर्च्युनिटी.

उपचारांची तौलनिक चाचणी सचोटीच्या व्यापाराकरिता आवश्यक असते. अर्थात प्रत्येक उपचारातून वेगवेगळ्या लोकांना "झोप"पेक्षा अन्य उपयोगही होत असतील. व्यायामाचा आनंद संगीताचा आनंद, तापलेला धातू रंग बदलण्याचा नाट्यमय अनुभव... लोक स्वतःचे उपाय सोडून माझे ऐकत नाहीत, ते लोकांबाबत चुचकारण्याचा करुणामय आनंद... विवक्षित उपचार "खरेदी" करताना हे सर्व मुद्दे ग्राहक मनात आणतो. परंतु जर त्यांचा हिशोब बाजारपेठेतील किमतीत करायचा असेल, तर त्या गोष्टी स्पष्ट हव्यात.
---

श्री. तर्कतीर्थ यांचा रक्तदाब-उपचार अनुभव वाचून वाईट वाटले. परंतु तौलनिक चाचण्यांच्या विरोधात तो अनुभव कसा जातो, हे स्पष्ट नाही. त्यांचे डॉक्टर कुठल्या प्रकारे तर्क करीत होते? त्या विवक्षित युक्तिवादात चाचण्यांचे निकाल कुठे वापरण्यात आले? ते योग्य रीत्या वापरले की अयोग्यरीत्या?

औषधाची मात्रा प्रत्येक रुग्णाकरिता कमीअधिक करावी लागते, ही बाब डॉक्टराच्या रोजच्या व्यवहारातली असायला पाहिजे. (असते.)

तौलनिक चाचणीमध्ये भाग घेतलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये उपचार वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम करतात. समोरचा रुग्ण त्या मोठ्या परिणाम-अवधीत (रेंज ऑफ इफेक्ट्मध्ये) कुठेही असू शकतो. चाचणीतील मध्यवर्ती परिणाम हा समोरील रुग्णावर उपचार करण्यापूर्वी "सर्वात संभवनीय परिणाम" असतो. (तांत्रिक दृष्ट्या पूर्व-संभवनीयतांची आकडेवारी "प्रायर प्रॉबॅबिलिटी".) आणि हा "संभवनीय परिणाम" उपचारपूर्व निर्णयाकरिता तितका लागू असतो. उपचार केल्यानंतर रुग्णावरील प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो. अपेक्षेपेक्षा कमी/अधिक किंवा दुष्परिणाम झाला, तर ते दिसते. ही नवी माहिती आणि चाचणीतील माहिती एकत्र करून उपचाराची मात्रा कमी करावी, अधिक करावी, किंवा दुष्परिणाम झाल्यामुळे उपचार बंद करावा, हे सर्व निर्णय घेता येतात. (तांत्रिक दृष्ट्या पश्चात्-संभवनीयतेची आकडेवारी "पोस्टेरियर प्रॉबॅबिलिटी"). आजकाल कित्येक दशके चाचण्यांचे निकाल प्रकाशित करताना रेंज आणि दुष्परिणामांची टक्केवारीसुद्धा देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे अगदी नेटके गणित करण्याचे प्रशिक्षण नसले, तरी पश्चात्-संभवनीयता ढोबळमानाने जोखता येण्यासारखी माहिती उपलब्ध असते.

श्री. तर्कतीर्थ यांच्या "मेटोप्रोलॉल" अनुभवात काय झालेले वर्णन आहे? पश्चात्-संभवनीयता वापरून उपचाराची मात्रा नीट न-बदलण्याचे उदाहरण दिसते. पण चाचण्या करून पूर्व-संभवनीयतेचे गणित उपचार/डॉक्टरकीच्या व्यापाराकरिता आवश्यक आहे. ती आवश्यकता जाणवणे, म्हणजे "दुरात्मा होणे" असा निष्कर्ष त्यांनी काढणे अयोग्य वाटते.

तर्कतीर्थ Mon, 29/04/2013 - 17:22

In reply to by धनंजय

ती आवश्यकता जाणवणे, म्हणजे "दुरात्मा होणे"

पूर्व-संभवता सर्वसमावेशक मानणे, वर स्पष्ट उल्लेख केल्याप्रमाणे व्यक्तीगत मुद्द्यांकडे दुर्लक्ष करणे इत्यादि लक्षणे मी दुरात्म्याची लक्षणे मानतो.

त्यांचे डॉक्टर कुठल्या प्रकारे तर्क करीत होते? त्या विवक्षित युक्तिवादात चाचण्यांचे निकाल कुठे वापरण्यात आले? ते योग्य रीत्या वापरले की अयोग्यरीत्या?

याप्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळायला लागतील तेव्हा तो भारतीय वैद्यक व्यवसायामधला सुदिन ठरावा.

औषधाची मात्रा प्रत्येक रुग्णाकरिता कमीअधिक करावी लागते, ही बाब डॉक्टराच्या रोजच्या व्यवहारातली असायला पाहिजे. (असते.)

+१

नितिन थत्ते Tue, 30/04/2013 - 20:47

आयुर्वेदात कफ-वात-पित्त या संकल्पना आहेत. आणि त्यातल्या असंतुलनाने रोग/विकार उद्भवतात असे मानले जाते.

अशा कल्पना वेळोवेळी वेगवेगळ्या ज्ञानशाखांतून होत्या. फ्लॉजिस्टॉन ची कल्पना किंवा पदार्थ विज्ञानातील ईथरची संकल्पना या अशाच संकल्पना पूर्वी अस्तित्वात होत्या (पैकी ईथरची संकल्पना मांडली गेली तेव्हापासूनच तिचे काही खरे नाही असे जाणवत होते).

अशा कल्पना प्लेसहोल्डरचे काम करतात. परंतु त्याहीवेळी त्या ईथरचे भौतिक गुणधर्म काय असतील याचा विचार केला जात होता. पुढे अ‍ॅब्सोल्यूट स्पेस ही कल्पना बाद झाल्यावर ईथरची कल्पना त्यागली गेली. किंवा पदार्थाचे ज्वलन झाल्यावर फ्लॉजिस्टॉन निघून जात नाही असे कळल्यावर तती कल्पना त्यागली गेली.

अशा प्रकारे वात-कफ-पित्त या कल्पना आजच्या ज्ञानानुरूप लागू आहेत की नाही हे पाहिले जात नाही किंवा त्या ऐवजी अधिक चांगल्या कल्पना निर्माण होत नाहीत. हा आयुर्वेदाचा मोठा प्रॉब्लेम आहे. वात वाढला आहे याचे मोजमाप करण्याचे काही मार्ग नाहीत. "रोग्याच्या शरीरात वात वाढला आहे" हे वाक्य "रोग्याच्या शरीरात नितीन वाढला आहे" याइतकेच निरर्थक आहे.

तरीही ट्रायल एररने / पारंपरिक इन्ट्यूटिव्ह ज्ञानाने काही उपयुक्त औषधे आयुर्वेदात शोधली गेली असतील हे मान्य आहे.

नंदन Wed, 01/05/2013 - 14:12

In reply to by नितिन थत्ते

प्रतिसाद. अशाच चार ह्युमर्सची कल्पना ग्रीक-रोमन वैद्यकांतही आढळते. इंग्रजीतले melancholy, sanguine, phlegmatic इ. शब्दांचे मूळही (थोड्या बादरायण संबंधाने बहुधा quintessential शब्दाचे मूळही) याच संकल्पनेवर आधारित. कदाचित कम्पॅरॅटिव्ह मायथॉलॉजीमागे जी समान मानसिकता आहे, तिचा ह्या साधर्म्याशी संबंध असू शकेल.

रवीन्द्र जोशी Wed, 01/05/2013 - 19:19

आयुर्वेदातील मुख्य सन्कल्पना कफ पित्त वात नसून,प्राण (बायो इलेक्ट्रिकल चार्ज) ही आहे.सीस्टमस अप्रोच या तन्त्राने पाहिले तर इलेक्ट्रिकल सीस्टम किन्वा मेकनिकल व्हायब्रेशन सीस्टम आणि आयुर्वेदाधारित ह्युमन बाडी सीस्टम या एकमेकाना आनुषन्गिक आहेत.इलेक्ट्रिकल सीस्टम मधील चार्ज हा आयुर्वेद सीस्टममधील प्राण या सन्कल्पनेशी जोडता येतो.
त्याचप्रमाणे कप्यासिटन्स=कफ,कन्डक्टन्स=पित्त आणि इन्डक्टन्स=वात.
आयुर्वेदाच्या विचाराप्रमाणे प्राण हा सूर्याकडून येतो.त्यामुळे आयुर्वेदाची रचना ही दिवस रात्र आणि सूर्याच्या वर्षभराच्या स्थिती
यावर आधारलेली आहे.याच पद्धतीने सत्त्व,रज आणि तम ह्याचा अनुषन्ग चार्ज्,करन्ट्,पोटेन्शिअल डिफरन्स याच्याशी लावता येतो.परम्परागत वैद्याना इन्टरडिसिप्लिनरी माहित नसल्यामुळेसुद्धा आयुर्वेद योग्य आधुनिक सन्ज्ञावलीत प्रकट करता आला नाही.
नवीन पाश्चात्य विचारान्शी आपल्या विचारान्ची योग्य तुलना करू न शकल्यामुळे गोन्धळ होतो आहे.दम लागला टन्कताना.चुका समजून घ्याल अशी आशा करतो. :s

धनंजय Wed, 01/05/2013 - 20:10

In reply to by रवीन्द्र जोशी

खोकला झालेल्या फुप्फुसात कप्यासिटन्स अधिक असतो? पुरळ आलेल्या त्वचेमध्ये कन्डक्टन्स अधिक असतो? झिणझिण्या येणार्‍या स्नायूमध्ये इन्डक्टन्स अधिक असतो?
दही खाल्ल्यास शरिराचा कप्यासिटन्स वाढतो? (वगैरे.)

हे सर्व प्रश्न सहज मोजमाप करून जोखण्यासारखे आहेत.

गवि Thu, 02/05/2013 - 10:28

In reply to by नंदन

त्याचप्रमाणे कप्यासिटन्स=कफ,कन्डक्टन्स=पित्त आणि इन्डक्टन्स=वात.

:Sp

नाही नाही. ही ऑप्टिकल सिस्टीम आहे. शरीरात ओएफसी नेटवर्क आहे (शिरा, नसा वगैरे). प्रकाशाचा संचार शरीराच्या प्रत्येक भागात आहे.

रिफ्लेक्शन = कफ, रिफ्रॅक्शन = पित्त, डिफ्रॅक्शन = वात.

अतिनील = सत्व, पिवळा= रज, अवरक्त = तम

नवीन अप्रोच आहे हा. सिस्टेमिक ऑप्टिकोहोलिस्टिक मेडिसिन.

आबा Thu, 02/05/2013 - 19:05

In reply to by रवीन्द्र जोशी

चला म्हणजे ,
"आयुर्वेद ही 'व्यक्तिकेंद्रीत' चिकित्सा (की ऊपचार) पद्द्धती आहे"
हे तर्कतिर्थांचं म्हणणं तुम्हाला मान्य नाही म्हणायचं !

"दुराग्रही" ठरता ठरता वाचलो.. थँक्यू