** "गोल्डमेडल" **
ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची...
तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला,
"तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल. ते उत्तेजन देतात आणि मदत पण करतात".
मला ती कल्पना आवडली आणि आम्ही एका दिवशी दुपारी ४ वाजता प्रा. अभ्यंकरांच्या घरी जाऊन थडकलो. बुट, चपला काढुन दिवाणखान्यात दारावर टक्टक करून पाऊल टाकले तेव्हा एका दिवाणावर बनियन, पायजमा अशा पोषाखात उशीवर हनुवटी टेकवुन पालथे पडलेले प्रा. अभ्यंकर दिसले. आमची चाहुल लागताच, न उठताच त्यानी "या बसा" केले.
मित्राने माझी ओळख करून दिली. प्रा. अभ्यंकरांनी लोळतच प्राथमिक चवकशी सुरु केली...
"काय सध्या वर्गात कोणता टॉपिक चालला आहे?"
"Determinants, Sir" - माझा मित्र उत्तरला...
"काय रे Determinants म्हणजे काय रे"?
आम्ही दोघांनी पाठ केलेल्या व्याख्या घडाघडा म्हणुन दाखवल्या.
मग प्रा. अभ्यंकरांनी आणखी एक प्रश्न विचारला. आमच्याकडुन जसजशी उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नांची पातळी अधिकाधिक अवघड होत गेली. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कागद-पेन वापरायची परवानगी नव्हती. पुस्तके बरोबर नव्हती म्हणुन ती पण बघायचा प्रश्न नव्हता.
प्रश्नांची उत्तरे जेव्हा चुकली तेव्हा प्रा. अभ्यंकरांनी प्रश्नांची फोड केली किंवा पुनर्रचना केली. पण आमच्याकडुन बरोबर उत्तर मिळवायचेच आणि मग पुढचा प्रश्न टाकायचा हा उद्योग चालु ठेवला.
हे सर्व चालु असताना दिवाणावर उशीला कवटाळुन लोळणे चालुच होते. कधी नव्हे एव्हढे माझ्या डोक्याने सलग उत्तरे द्यायचे काम केल्याने डोक्याला मुंग्या यायला सुरुवात झाली आणि मग होता होता रात्रीचे आठ वाजले.
ते दिवस मोबाईलचे नव्हते. घरी आई-वडील वाट बघतील किंवा उशीर झाला म्हणुन रागवतील म्हणुन आम्ही प्रा. अभ्यंकरांना मध्येच थांबवले आणि परत यायची अनुमती मागितली. त्यावर प्रा. अभ्यंकरांनी गृहपाठ म्हणुन आणखी दोन प्रश्नांची उत्तरे शोधुन यायला सांगितले.
आम्ही उठुन बुट-चपला घालायला गेलो तेव्हा प्रा. अभ्यंकर दिवाणावरुन उठले आणि दारापाशी निरोप द्यायला आले आणि म्हणाले,
"तुमच्यापैकी प्युअर मॅथ्स पुढे कोण करणार?"
मी धीर करून म्हणालो,
"सर, प्युअर मॅथ्स करणं हे फक्त गणितात गोल्डमेडल मिळवणार्या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांच काम..."
त्यावर प्रा. अभ्यंकर हसले आणि म्हणाले,
" एक मिनिट, जरा थांब... महाराष्ट्रात किती विद्यापीठे आहेत?"
अचानक वेगळाच प्रश्न आल्याने बुटाच्या नाड्या बांधता-बांधता माझी भंबेरी उडाली.
"पुणे, मुंबई, नागपुर, शिवाजी आणि मराठवाडा... " आम्ही पट्कन हिशेब मांडला.
"...आणि संपूर्ण भारतात अशी किती विद्यापीठे असतील" - प्रा अभ्यंकरांचा पुढचा प्रश्न.
"अंदाजे दीडशे-दोनशे" मी उत्तरलो.
"आता बघ प्रत्येक विद्यापीठात दरवर्षी बीएस्सीला एक आणि एमेस्सीला एक अशी दोन पदके दिली जात असतील. म्हणजे दरवर्षी भारतात साधारणपणे ४०० गोल्डमेडल्स दिली जातात. म्हणजे गेल्या १० वर्षांत एकंदर ४००० हजार गोल्डमेडॅलिस्ट भारतात तयार झाले. हे सगळे कुठे गेले? हे काही करताना दिसत नाहीत?"
मी "हे काही करताना दिसत नाहीत?" हे वाक्य ऐकुन नि:शब्द आणि थक्क झालो आणि त्याक्षणी माझ्या मनातला प्युअर मॅथ्सबद्दल असलेला न्यूनगंड नाहिसा झाला. घरी परत येताना आम्ही त्या प्रश्नोत्तर संवादाची उजळणी केली तेव्हा केवळ तोंडी उत्तरे देतदेत त्या चार तासात जी मजल गाठली त्या जाणीवेने अंगावर मूठभर मांस नक्कीच चढले होते.
विज्ञानप्रचाराच्या नावाखाली स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवुन परीकथा पाडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ वेगळे आणि विचारशक्ती फुलवुन भयगंड घालवणारे प्रा. अभ्यंकर निराळे...
नारळीकरांवर घसरण्याचे कारण
नारळीकरांवर घसरण्याचे कारण काय ते मलाही कळ्ळे नाही. माझ्यालेखी तरी ते अॅस्ट्रॉनॉमीचे बाबासाहेब पुरंदरे आहेत. कितीतरी लोकांना त्यांनी अॅस्ट्रॉनॉमी आणि एकूणच भौतिकशास्त्राची गोडी लावली. स्वतःचे संशोधन समजा फार जबरी नसेल किंवा आता खोडल्या गेले असेल म्हणून त्यांच्या कार्याचे महत्त्व आजिबात कमी होत नाही. आयुकाच्या स्थापनेतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक समय था जब स्टेडी स्टेट थिअरीसुद्धा गरम होती. वर्ल्ड क्लास म्हणतात तसा रिसर्च त्यांनी केला आहेच. तदुपरि बाकीचे नजरअंदाज केले तरी त्यांचे महत्त्व आजिबात कमी होत नाही. नारळीकरांनी भारलेल्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मी इतके तरी नक्कीच सांगू शकतो.
अपेक्षित
मी स्वतः परीक्षेतले गुण हे कुवतीचे नेमके निदर्शक मानत नाही. परंतु तरीही दरवर्षी भारतात साधारणपणे ४०० गोल्डमेडल्स दिली जातात. म्हणजे गेल्या १० वर्षांत एकंदर ४००० हजार गोल्डमेडॅलिस्ट भारतात तयार झाले. हे सगळे कुठे गेले? हे काही करताना दिसत नाहीत?" मी "हे काही करताना दिसत नाहीत?" हे वाक्य ऐकुन नि:शब्द आणि थक्क झालो.>> हे सर्वस्वी presumptuous वाटते. आपण कुठे त्या लोकांना शोधायला जातो. की गोल्ड मेडॅलिस्ट म्हणजे कमीतकमी नोबेल मिळवायला पाहिजे अशी अपेक्षा आहे तुमची? यातले अनेक लोक प्रथितयश संशोधन केंद्रांमधून दर्जेदार संशोधन करत असतीलही, तुम्ही कुठं शोधायला गेला होतात? डॉ. अभ्यंकरांच्या ज्ञानाबद्दल आदर आहेच, परंतु हे विधान आमच्या अंदाजाने गंभीरपणे नव्हे तर केवळ तुमचा न्यूनगंड दूर व्हावा एवढ्याच उद्देशाने केले गेले असावे. ते वास्तविक सत्य - निदान पुरेसा विदा मिळेतो - मानायचे कारण नाही. तसे करणे ही केवळ आत्मश्लाघाच ठरण्याची शक्यता आहे.
लेखाचे शेवटचे विधान हा तर तुमचा यूएसपी आहे. असं जाताजाता कोणाच्या तरी पेकाटात लाथ न घालता तुम्ही लिहिलंत तरच आम्हाला नवल वाटेल.
(साठ टक्केवाला गणिती) रमताराम
+१
नेमके. हरेक वाक्य, हरेक शब्द अचूक बसलाय. ना कम, ना ज्यादा.
यातले अनेक लोक प्रथितयश संशोधन केंद्रांमधून दर्जेदार संशोधन करत असतीलही, तुम्ही कुठं शोधायला गेला होतात? डॉ. अभ्यंकरांच्या ज्ञानाबद्दल आदर आहेच, परंतु हे विधान आमच्या अंदाजाने गंभीरपणे नव्हे तर केवळ तुमचा न्यूनगंड दूर व्हावा एवढ्याच उद्देशाने केले गेले असावे.
एखादा मजकूर "वाचणे" आणि मजकूरातील संदेश समजणे ह्यातला फरक काय असे कुणी विचारल्यास हे एक उत्कृष्ट उदाहरण दाखवता येइल.
!
ते काही करताना "दिसत नाहीत"
या वाक्यामुळे तुम्हाला धीर मिळाला? काहितरी करताना "दिसणं" हे इतकं महत्वाचं आहे?
एखाद्या थियरी वर काम करणे आणि ती नंतर नाकारली जाणे हा वैज्ञानिक पद्धतिचाच एक भाग आहे. क्वासी स्टेडी स्टेट सोडून त्यांचे इतरही बरेच संशोधन आहे (ते ही चूकीचं आहे असं सिद्ध होऊ शकतं). एखादी व्यक्ती कशामुळे प्रसिद्द व्हावी हे फारसं तिच्या हातात नसतं
अवांतरः अभ्यंकर सरांचं विधान हे पोपट घेऊन लकडीपूलावर बसायचं लायसन्स नाही
आपल्या मंगळमोहिमेच्या
आपल्या मंगळमोहिमेच्या निमित्ताने एक आठवण वारंवार होत आहे.
साधारण ३० वर्षांपूर्वी मटाने एक विज्ञान पुरवणी चालु केली होती. त्यात एक व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते आजही स्मरणात आहे. चित्रात एका भारतीय विद्यापीठाच्या जिनेटीक एंजिनिअरींगची प्रयोगशाळा दाखवली होती. तिथे एक पाच-पंचवीस आईन्स्टाईन हातात पाइप धरून येरझारा घालत होते.
बाजुला एक भारतीय प्राध्यापक एका पाहुण्याला सांगतो - "आम्ही गेल्या १० वर्षात जिनेटीक एंजिनिअरींगमध्ये एव्हढी प्रगती केली आहे, की आज आम्ही ४०० आईन्स्टाईन निर्माण केले आहेत. ...पण त्यांनी ४०० वेळा सापेक्षतावाद मांडण्याखेरीज दुसरं काहीच केलं नाही..."
दोन मुद्दे
दोन मुद्दे मांडतो:
१. माझा ढोबळ अंदाज असा की तर्कतीर्थांनी सांगितलेला प्रसंग तीसेक वर्षांपूर्वीचा असावा. त्यावेळी अर्थात भारतामध्ये उच्च गणितात संशोधन होतच असलं तरीदेखील भारतातल्या एकूण पदवीधरांची संख्या पाहता त्याचं प्रमाण खूपच कमी होतं. (माझा मुद्दा पूर्ण संख्याशास्त्रीय (statistical) असल्यामुळे पुण्याला अमूक होते, कलकत्त्याला तमूक होते अशी नावं घेऊन तो खोडला जाणार नाही.) तेव्हा अभ्यंकरांचं विधान अतिशयोक्त असलं तरी त्यात सत्यांश नाही असं नाही. यातदेखील एक गुंतागुंत अशी की भारतात वाढलेल्या पण नंतर भारताबाहेर स्थायिक झालेल्या गणित्यांची संख्या प्रचंड होती आणि आहे. तेव्हा ह्यातले निदान काही गोल्ड-मेडॅलिस्ट पदवीसमारंभानंतर लगोलग पासपोर्ट अॉफिसाकडे गेले असणार.
२. टोकाची विधानं छातीठोकपणे करणं हा अभ्यंकरांच्या स्वभावविशेषाचा भाग होता, आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या बहुतेकांना पुढेमागे त्याची सवय होऊन जात असे. अशा विधानांबद्दल detached amusement यापेक्षा वेगळी भूमिका घेण्यात फारसा अर्थ नसे.
> माझ्यालेखी तरी ते [नारळीकर] अॅस्ट्रॉनॉमीचे बाबासाहेब पुरंदरे आहेत.
लव्हली शॉट! आत्ताच फेडरर जिंकल्यामुळे आणि लगोलग असं वाक्य वाचायला मिळाल्यामुळे दिवस चांगला जाणार यात संशय नाही. ही तुलना पुरंदऱ्यांना आणि नारळीकरांना आवडेल की नाही या विषयात काही अत्यंत व्यामिश्र शक्यता दडलेल्या आहेत. मी तर पुढे जाऊन म्हणेन की इथे एक लघुकथा दडलेली आहे.
छान
छान अनुभव. यात "विज्ञानप्रचाराच्या नावाखाली स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवुन परीकथा पाडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ" यांचा संबंध काय ते कळले नाही.