Skip to main content

** खात्री **

1 minute

सर,

तुम्ही फारच विकलांग झाला आहात!

अलिकडे बर्‍याचदा तुम्ही
या देवळाच्या पायरीवर
नाही तर त्या चौकातल्या बाकावर
कुणाला तरी शोधत असता.

जेव्हा जेव्हा मी तुम्हाला
बघतो तेव्हा अजिबात थांबावसं
वाटतं नाही की
चवकशी कराविशी वाटत नाही.

कारणे अनेक आहेत,
पण तो प्रसंग अजुनही चांगला
लक्षात आहे.

"अरे! तुझी स्वप्नं भंग पावली!"
असं तुम्ही बसमध्ये एकदा
भेट झाली तेव्हा हिणवले होते...

कदाचित
माझ्या स्वप्नांमध्ये
तुम्हाला काही वाटा नव्हता
म्हणुन असेल.

पण असो
काळ असा ना तसा,
आज ना उद्या,
न्याय करतो

तुमची भिरभिरती नजर
बघुन माझी
खात्री पटली आहे.

Node read time
1 minute

अजो१२३ Sun, 24/11/2013 - 20:12

एकाच अल्प आणि अप प्रसंगामुळे जन्मभर लक्षात ठेवलेला माणूस वा प्रदीर्घ परिचयाच्या माणसाचे एकच अपवर्तन - आणि त्यानंतर त्याच्याबद्दल जेव्हा केव्हा आठवणीत येईल तेव्हा, जेव्हा केव्हा पुढे येईल तेव्हा या कवितेतल्या प्रमाणे केलेले खुनशी वर्तन इतके आवश्यक नसावे. अशा आठवणी जपल्या तर जग कसे वाईट आहे असे निराशेच्या क्षणी जास्त प्रकर्षाने वाटते. असो.

............सा… Sun, 24/11/2013 - 21:07

मला तरी माझा सर्वात मोठा विजय हा वाटतो की - शत्रूलाही आपल्या मानस-प्रार्थनेत सामील करुन घेता आले. डूख धरला तर वीष आपल्यामध्येच भिनत रहाते.
अनेक वर्षे फक्त स्वतः व कुटुंबियांकरता प्रार्थना केल्यानंतर एक सुंदर "सरमन" वाचले. त्या सरमनचा मुख्य मुद्दा हाच होता की प्रार्थना एकट्या तुमच्याकरता करु नका. जगाला (आपलं जग केवढसं असतं) सामील करुन घ्या. प्रार्थनेचा हेतूच तो असतो.
तेव्हापासून फलश्रुती वाचताना मनोमनी "आज मला भेटलेले व/अथवा माझ्या विचारपरीघात आलेले सर्व लोक" अशी प्रार्थना घडते.
पैकी जर शत्रूच तुमच्या विचारपरीघात सतत येत असेल तर अर्थ एवढाच की त्या व्यक्तीला सदबुद्धी जास्त निकडीची आहे अन तुमच्या प्रार्थनेतून ती पोचली पाहीजे.
"शुभं करोति" मध्ये देखील शत्रूविनाशाय नसून "शत्रूबुद्धी विनाशाय" अशी वाक्यरचना आहे.

बॅटमॅन Mon, 25/11/2013 - 01:44

शत्रूचे भले चिंतावे की कसे हा वेगळा मुद्दा झाला. नक्की काय केल्यावर लाँग टर्ममध्ये स्वतःच्या डोक्याला त्रास कमी होईल हे पाहिले तर अनुल्लेख हे बेस्ट शस्त्र आहे, विशेषतः जेव्हा आपण त्याला पुरेशी घातक इजा करू शकत नसू तेव्हा.

राजेश घासकडवी Mon, 25/11/2013 - 04:10

कवितेत पकडलेली बदल्याची भावना सार्वत्रिक आहे. तिच्यावर 'हे बरोबर की चूक' अशी चर्चा होणं यालाच कविता यशस्वी झाल्याचं लक्षण म्हणावं का?

जयदीप चिपलकट्टी Mon, 25/11/2013 - 06:03

याच विषयावरची सरांनी केलेली कविता कुठे आहे?

तर्कतीर्थ Mon, 25/11/2013 - 07:14

मला मी बदला घेतोय असं वाटतं नाही. मी त्या व्यक्तीकडे जाऊन हेतुतः विपन्नावस्थेची जाणीव करून दिली तर त्याला बदला म्हणता येईल. आणी ते मी नक्कीच करणार नाही.

पण अलिकडेच प्रा. एम व्ही कामत (आय आय टी पवई ) निवर्तले. तेव्हा ब-याच जणांची मळमळ बाहेर पडली होती. त्याला बदला म्हणता येईल का? मळमळीचा निचरा होणं एकंदर स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यक नसतं का?

उपाशी बोका Mon, 25/11/2013 - 07:35

In reply to by तर्कतीर्थ

>> मला मी बदला घेतोय असं वाटतं नाही.
मळमळीचा निचरा वगैरे कशासाठी म्हणताय.
छे, छे. तुम्ही तर फक्त तुमच्या नियमाप्रमाणे वागताय.
To err is human, to forgive is not my policy.

अरविंद कोल्हटकर Mon, 25/11/2013 - 07:04

एम व्ही कामत ह्या नावाचे बरेच लोक दिसतात. त्यांपैकी हे कोण?

तिरशिंगराव Mon, 25/11/2013 - 09:55

In reply to by अरविंद कोल्हटकर

हे एक रसायनशास्त्रातले थोर प्रोफेसर होऊन गेले. पण ते हट्टी स्वभावाचे आणि कमालीचे स्पष्टवक्ते होते. त्यामुळे,त्यांनी अनेकांना दुखावले असावे. कारण ही मळमळ मीही ऐकली आहे. पण, मला मात्र, त्यांच्या प्रगाढ ज्ञानाबद्दल अतिशय आदर होता आणि राहीलही.