सिंदबाद
सिंदबाद...
एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची.
अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं.
हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " म्हणत शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया.
वादळातून नाव काढल्यावर "वाचलो", "सुटलो" असे म्हणण्यापेक्षा "कस्ला थरार होता हा." असे म्हणून रोमांचित होणारा व रूढ जगाच्या दृष्टीने गाढव. कधी गलबत उलटे होउन बुडताना छोटी अरूंद नौका सोबत्यांसाठी ठेवून नजिकच्या बेटापर्यंत पोहत जायची हिम्मत ठेवणारा धाडसी सिंदबाद. ह्या सगळ्या प्रवासात चित्रविचित्र अनुभव घेतलेला, तिलिस्मी तलवार सापडलेला, डाकूंशी आणि चाच्यांशी लढलेला, प्रसंगी घाव झेलून आपल्या सहकार्यांना वाचवणारा हा सिंदबाद.
कधी अद्भुत जादूच्या, मायावी बेटावरून त्या दुष्ट जादूगाराच्या जाळ्यात त्यालाच अडकवत वठणीवर आणणारा चतुर सिंदबाद. कधी अजस्त्र माशांनी किंवा ड्रॅगनसदृश प्राण्यांनी गलबत घेरले गेले असताना गलबत वाचवणारा एक धाडसी, रोमांचवेडा,अल्पकालातच कंटाळणारा सिंदबाद.
प्रत्येक सफरीत आजवर कुणी न घेतलेले असे चित्रविचित्र पण समृद्ध अनुभवविश्व घेउन, जीवाशी खेळ करून शेवटी सिंदबाद घरी येउन पोचतो. ह्या अनुभवानंतर शहाण्याने तर प्रवासाचे पुन्हा नावच काढायला नको.
पण हा मात्र लागलिच "इथे राहून रोजच्या आयुष्यात करायचे काय" असे म्हणत उप्लब्ध असलेल्या चारचौघांसारख्या स्थिर पण चौकटीबद्ध आयुष्याला कंटाळत पुन्हा लागलिच पुढच्या प्रवासाची बांधाबांध करू लागतो.
एकाच सफरित भरपूर धनवान झाल्यानंतर तो घरी थांबू शकला असता,पण "घर" हे ही त्याच्यासाठी "बेट"च होते.
बेटावर फक्त काहीकाळ मुक्काम करायचा असतो; तो केवळ पुढल्या भ्रमणाला निघायला हेच पायाला भिंगरी लावलेल्या अस्सल खलाशाला समजते. तो पुढचीही सफर पूर्ण करून पुन्हा त्या "बेटावर" यायचं ठरवतो आणि तयारीला लागतो.
आपल्या सगळ्यातच हा सिंदबाद असतोच. जितके लहान वय तितका तुमच्यात सिंदबाद जास्त. एकाच ठिकाणच स्थिरत्व त्याला कंटाळवाणं वाटतं,जडात्व वाटतं. नाही ती संकटं अंगावर ओढवून घ्यायची आणि मग स्वतःच लढून ती सोडवायची आणि वर ह्यानं खुश, उत्तेजित, रोमांचित होत पुढल्या संकटात घुसायचं एवढच त्याला समजतं. बालपणी नाही का "बाउ आहे हां तो" म्हटले तरी चटका बसल्याशिवाय बाळाला अक्कल येत नाही, किंवा रोज खरचटून,धडपडून घेतलं तरी खेळायचा उत्साह काही कमी होत नाही तसच.
अशा सिंदबादना सुरक्षित आणि सामान्य प्रवासच मंजूर नसावा. त्यांना हवे ते अंगावर येनारे roller coaster सारखे आयुष्यात येणारे अनुभव.
संथ व शांत आयुष्यात ह्यांची अवस्था एकच....
"`आहे मनोहर तरी गमते उदास"....
आहे ते उत्तम आहे, पण अजून काही तरी हवय. सोबतच्यांना ते "तुम्ही चांगले आहात, पण तुम्ही मला आता हवे आहात तसे नाही आहात" असे म्हणत ते मांडलेला डाव सोडून दुसर्या भिडूशी नव्याने भिडतात. कोण वाइट, कोण चांगले, कोण शहाणे कोण पागल असा विचार "शहाणी" माणसे करतात, करतच राहतात आणि ह्या "वेड्याचे" तेव्हढ्यात सात प्रदीर्घ समुद्रसफरी पूर्ण होतात देखील.
Good bye Cognizant. माझ्यातला सिंदबाद उचकलाय.
सफरीतून जगलो वाचलो तर पुन्हा तुला भेटायला येइनच.
तू छानच आहेस. दोनेक महिन्यात नव्या सफरिला निघतोय, नवीन बेटाच्या ओढीने.
यावरून आठवलेलं
बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यांतली नायिका फरक सांगते –प्रवासाबद्दलच्या धारणेचा.
‘मी इथं आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून नाही’ – आणि मग, टूरिस्ट सहप्रवासी मित्राच्या चेहेर्यावरचे भाव वाचून ती पुढे म्हणते –‘टूरिस्ट म्हणजे जो नव्या देशात येताक्षणी परत जाण्याची तारीख निश्चित करतो आणि ‘ट्रॅव्हलर’ला नव्या देशात आलं की परत जाण्याची आठवणही होत नाही. प्रवास हेच त्याचं सर्वस्व!’
पण आता असे भटके (ट्रॅव्हलर्स) राहिलेत कुठे – टूरिस्ट सारे! प्रवासी कंपन्यांच्या वेगवेगळ्या अवतारांना शरण.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील उतारा या लेखातून : http://dnyanadadeshpande.blogspot.com/2010/10/blog-post_29.html
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चित्रपटामधला संवाद :
Tunner: We're probably the first tourists they've had since the war.
Kit Moresby: Tunner, we're not tourists. We're travelers.
Tunner: Oh. What's the difference?
Port Moresby: A tourist is someone who thinks about going home the moment they arrive, Tunner.
Kit Moresby: Whereas a traveler might not come back at all.
Tunner: You mean I'm a tourist.
Kit Moresby: Yes, Tunner. And I'm half and half.
मुक्तक आवडले. मनोबा, सफरीला
मुक्तक आवडले. मनोबा, सफरीला मनापासून शुभेच्छा.
राजेशने दसर्याच्या सीमोल्लंघनाच्या निमित्ताने लिहीलेला लेख आणि कंफर्ट झोनमधून बाहेर येण्याचा विचार आठवला.
(नाखुषीने सफरी एन्जॉय करणारी) अदिती
मुक्तक अतिशय आवडलं
प्रत्येकात एक सिंदबाद दडलेला असतो हे खरे आहे. रेस्टलेस आणि भटक्या, साहसी तसाच विमुक्त. त्या सिंदबादास नवे नवे प्रांत पादाक्रांत करायची ओढ असते.
++++++++++
माझी अत्यंत आवडीची कविता Sea Fever BY JOHN MASEFIELD चे कडवे खाली देते आहे -
I must go down to the seas again, to the lonely sea and the sky,
And all I ask is a tall ship and a star to steer her by;
And the wheel’s kick and the wind’s song and the white sail’s shaking,
And a grey mist on the sea’s face, and a grey dawn breaking.
कसला आलाय थरार.
कसला आलाय थरार.
मागच्या काही वर्षात बर्याच थपडा खाल्ल्या; गटांगळ्या खाल्ल्या.
पुरता खपलो नाही; कसबासा तगलो हेच नशीब.
आणि तगलो ह्याचं कारणंही फार काही बुद्धीमान कर्तृत्ववान होतो म्हणून नव्हे तर नशीबवान होतो म्हणूनच.
ढकलपत्रातली एक ओळ आठवली :-
if you are running through an area full of landmines; and you are alive at the end; you still a stupid!
पुन्हा कधी म्हणून आवेशपूर्ण बाता मारु नयेत असं वाटतं.
शांत डोक्यानं विचार करुन , सगळ्या बाजू तपासूनच कृती करावी.
थँक्स ...पण....
पण सध्या, ह्या घडिला तरी लिहायला जमेलसं वाटत नाही. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे सगळं खरं जाहिरपणे सांगाण्याबद्दलचा संकोच; दुसरं कारण म्हणजे अजूनही पुरतो सुटलोय अशातला भाग नाही. त्यामुळे परिस्थितीकडे त्रयस्थपणानं नाही पाहता येणार. ( माझ्या बोलण्याचा सूर "मी कसं बरोबरच केलं; पण अमक्या तमक्या बाह्य कारणानं कसा खड्ड्यात गेलो" असाच राहिल. पुरेसा त्रयस्थपणा आला की त्यातल्या त्यात खरोखरची बाह्य कारणं कोणती, मला अजून वेगळं काय आणि किती करता आलं असतं वगैरे लिहिता येइल.) सध्या तरी हे सगळं असं जमणं नाही. शिवाय हे सगळं मला झेपायला जड जात असलं तरी आसपासची सरासरी पाहता हे काही तितकसंही वेगळं नाही.अगदिच सर्वसाधारण असं कारकुनी आयुष्य असणारा माणूस काय सांगणार ?
पण ...हो. जेव्हा ह्यातल्या किमान काही कारणांची तीव्रता कमी होइल; आणि सगळ्याच घटनांकडे स्वतःलाच मिश्किलपणे पाहता येइल; तेव्हा जरुर सांगेन. तेवढाच वाचणार्याला इतर काही नाही तर निदान विरंगुळा तरी होइल.
.
.
.
एक उदाहरण :-
मी कधी कधी विचित्र, पुस्तकी बोलतो.(हे माझ्या खूपच उशीरा लक्षात आलं.) विशेषतः भंजाळल्यावर,बावचळल्यावर एकाच वेळी अनेक माझ्या व्यक्तिमत्वातले अनेक फ्लेवर्स जागे होतात. पहिल्यांदा माझा ब्रेकप झाला तेव्हा फार म्हंजे फारच निराश झालो होतो. ब्रेकपचं कारण कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही इतकं विचित्र्/विनोदी होतं. पण ते कारण राहू देत सध्या.
.... पण तेव्हा समोरुन "आता पुरे करुयात; आणि आपापल्या मार्गाला लागुयात" स्टाइल डायलॉग आला की मी लागलिच "आपण तर सद्गुणी चांगला माणूस, जंटलमन असलच्च पाहिजे" ह्या विचारातून "हरकत नाही. तुझ्या विचारांचा आदर...पुढील मार्गासाठी शुभेच्छा....मित्र राहूतच ह्याची खात्री." वगैरे छाप एक्झिट इंटरव्यूवाली बडबड केली. पण आतून लै म्हंजे लैच रडायला येत होतं.
अचानक त्याचवेळी चिडचिड होत होती. कालपरवापर्यंत बर्राच खर्च झाला होता; थोडं आधी सांगितलं असतं...निदान वीकेंडपूर्वी.... तर जरा पैसे तरी वाचले असते असं वाटून गेलं. "ही गेली तर आपल्याला कोण भाव देणार" असा न्यूनगंडही आला. मग त्याचवेळी "जा फुट ग; तुला काय सोनं लागलय का" असं म्हणून तिला तिथेच बाहेर जीभ काढून वाकडं दाखवावं,वाकुल्या असंही वाटलं! शिवाय "ए नको ना जाउ यार. तुला कै करमणार नैय्ये माझ्याशिवाय ; मलाही ठौके. बस कर आता; फारच चिडली असलिस तर एखादं मस्त आइस्क्रिम खाउ घाल्तो यार. मलाही कै तुझ्याशिवाय करमत नै यार." अस्संही म्हणावसं वाटलं. पण सगळ्याची एकूण टोटल म्हणजे "खूप खूप वाईट वाटत होतं" हे खर्र्च होतं. आणि कसं कुणास ठाउक ; पण नंतर तिनं काही वेळानं भेटून विचारलच; "फार रागावला तर नाहियेस ना ? यार, प्लीझ नाराज वगैरे नको ना राहूस. तुला मिळेल रे कोणीही" वगैरे स्टाइल सम्जूत वगैरे काढली.
मी त्यावेळी गटणेछाप 'सात्त्विक' संतापलो किम्वा वैतागलो होतो. थरथरत्या ओठांनी, लालबुंद चेहर्यानी माझं उत्तर :-
"वाईट म्हंजे काय. भयानकच वाईट वाटतय. इंद्रायणीत तुकोबांची गाथा बुडवल्यावर ते जसे उद्विग्न झाले असतील; तसाच मीही झालोय."
.
.
.
लोल.
अरे प्रसंग काय ? तू बोलतोस काय ?
बाईंना चटकन् तुकोबा कोण आणि त्यांची इंद्रायणी कोण ह्याची काही संगती लागेना.(त्यांना काही असल्या बबतीत अजिबातच रस नव्हता.)
.
.
आता आज हे सगळं विचित्र/मजेशीर वाटतं. पण हे होत होतं तेव्हा माझ्यासाठी मजेशीर नव्हतं. मी खूपच केविलवाणा आणि बर्राचसा सात्विक वगैरे अभिमानानं फुगून वगैरे गेलो होतो.
.
.
एखादा माणूस केळीच्या सालावरुन पाय घसरुन पडतो तेव्हा पब्लिकला हसू येतं; पण पडनार्यासाठी तो ज्योक नसतो. त्याच्यासाठी ती लैच गंभीर गोष्ट असते. विशेषतः तो आपल्या स्पर्धकासमोर (आर्च रायव्हल समोर) किंवा जिच्यावर क्रश आहे अशा व्यक्तीसमोर पडलेला असेल तर.
.
.
आणी तसंही पब्लिकला पुरेशा यशस्वी माणसाची कथा वाचायला जास्त आवडेल ना.
किम्वा अगदिच भयंकर ज्यांची ट्राजेडी आहे त्यांची तरी कथा वाचायला आवडेल.
(काही कलाकार,साहित्यिक वगैरे ह्यात येतात; त्यांच्याकडे तीव्रतेने सांगण्यासारखं खरच "काहीतरी" असतं.
मग कुणी ते सुरातून साम्गतो; कुनी लिखाणातून; आणि कुणी स्टेज-क्यामेर्यासमोर परफॉर्म करतो.)
किरकोळ, सर्वसाधारण प्रोफाइलवाल्याबद्दल कोण कशाला वाचत बसेल ?
बेदर्द जमाना क्या जाने
>> पण अॅक्चुअली पांडू सांगविकरची गोष्ट ट्र्याजेडीच आहे बहुधा.
>> फक्त उघड उघड ट्रॅजेडी नाही. आयमीन शेवटी हालहाल होऊन मरत वगैरे नाही म्हणून 'रूढार्थाने' ट्रॅजेडी नाही असे म्हणालो.
बाकी पाहिले पाहिजे.
ये क्या हो रहा है? बिचारा पांडुरंग सांगवीकर!
- तो मुलीला पटवू शकत नाही.
- त्याची लहान लाडकी बहीण मरते.
- त्याला शिक्षण झेपत नाही.
- त्याचे मित्र दुरावतात.
- त्याचं घरच्यांशी जमत नाही.
- तो गावाकडे येऊन काहीही न करता एकटा आपल्या कोषात आयुष्य कंठू लागतो.
पण तुम्हाला वाटतं की त्यानं हालहाल होऊन मरावं, नाही तर त्याची ट्रॅजेडी उघड नाही? अरे किती छळावं जालीम जमान्यानं एखाद्याला त्याला काही सुमार? मनोबा, तुम्ही अजिबात काही सांगू नका यांना. दे डोन्ट डिझर्व्ह युवर स्टोरीज!
ऐकावे ते नवलच
>> आम्ही पडलो फडतूस मासवाले, हुच्चभूभू क्लासवाल्यांचं काय कळणार आम्हांला.
कोसला उच्चभ्रू क्लाससाठीचीच ट्रॅजेडी? मासेससाठीची नाही? काय सांगता? अहो वर हे चालू होतं ना? उगीच कशाला स्वतःवर ओढवून घेता?
किरकोळ, सर्वसाधारण प्रोफाइलवाल्याबद्दल कोण कशाला वाचत बसेल ?
हॅहॅहॅ, कोसला वाचली नाय काय?
कोण कोणास म्हणाले
>> ट्रॅजेडी कशास म्हणावे अशा जण्रल व्याख्येबद्दल आहे त्याबद्दल बोलतोय.
मीही त्याबद्दलच तर बोलत होतो. पण मग मध्येच हे दिसलं म्हणून प्रश्न पडला -
>> सभ्य शब्दांआड दडून अपमान करण्याची अनेक उदा. समोर दिसताना असताना ट्रॅजेडीची ही व्याख्या अंमळ शाळकरीच झाली, पण हर्कत नाही. आम्ही पडलो फडतूस मासवाले, हुच्चभूभू क्लासवाल्यांचं काय कळणार आम्हांला.
अर्थनिर्णयन
तो म्हणजे साक्षात्कार हो. अपमान करायचा तर मातृस्वसृकुलाधारित शिव्याच घातल्या पाहिजेत असे नाही, अतिशय सभ्य शब्दांतही ते काम साधता येते असे ऐसीवरच काही प्रतिसाद बघून लक्षात आले म्हणून ट्रॅजेडीतही तसे ऑब्व्हियसली मरण वगैरे पाहिजेच असे आवश्यक नाही हे लक्षात आले. हे अगोदर लक्षात न येण्याचं कारण म्हणजे आम्ही फडतूस मासवाले हे होय.
भयंकर सुंदर
मनराव, अतिशय सुंदर लिहिलंय्त हो तुम्ही. तुमची ही मनोगतं तुम्ही लिहून काढायला हवी. रोजच्या रोज. (अभ्भी के अभ्भी). एखाद्या चांगल्या वर्तमानपत्रात सुंदर सदर होईल.
(पहा : मनोमनी, नुसतीच मनी, मनकी बात, मनसे बात, मन की बाताँ, मनाच्या बाता, मनीच्या आणि कसल्या कसल्या गोष्टी वगैरे) :)
पण गंभीरपणे, खरोखर लिखाण छान आहे. निदान ब्लॉग तरी सुरू करा. आणि मोठ्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी वाचून कंटाळा आलाय. त्यामुळे छोट्यांच्या मोठ्या किंवा छोट्याछोट्या गोष्टीच आवडतील लोकांना.
आपल्या घराच्या खिडकीतून इतरांकडे बघायला आवडतंच लोकांना. आणि खिडकीतून बघणं म्हणजे थेट घरात डोकावणं नव्हे ना.
तेंडुलकरांचं 'कोवळी उन्हे' हे असंच एक नितान्तसुंदर सदर होतं, बिनमहत्त्वाच्या गोष्टींचं. येताजातानाच्या गोष्टींचं.
मस्त लिहीले आहेस मनोबा. आणि
मस्त लिहीले आहेस मनोबा. आणि महत्वाचे म्हणजे तूला कधी काय वाटत होते ते तुला व्यवस्थित जाणवत होते, फक्त तुझी रीअॅक्शन्/एक्प्रेशन ( प्रकटीकरण ) वेगळेच झाले आणि त्यातुन तुला काय वाटत होते किंवा म्हणायचे होते ते बरोबर पद्धतीने बाहेर आले नाही.
माझ्या अनुभवाप्रमाणे वाढत्या वयाप्रमाणे आपण आपल्या भावना/विचार हे व्यवस्थित प्रकट करायला शिकतो.
दुर्दैवाने प्रेमात पडायचे वय आपला ईक्यु वाढायच्या किंवा दुसर्याशी कसे वागावे हे कळायच्या आधीच येते.
त्यामुळे पहील्या प्रेमापेक्षा दुसर्या/तिसर्या प्रेमात बराच पीस ऑफ माईंड असतो.
तू कॉग्निझंट बद्दल लिहीले होतेस म्हणुन मला वाटले की तू करीअर बद्दल सांगतो आहेस.
अजून एक उदाहरण
"गलियां तेरी गलियां " ऐकतोय फिमेल व्हर्जन.
तीसुद्धा आत्ता... ह्या घडीला हेच गाणं ऐकत असेल का ?
तिला नेमकं काय वाटत असेल ऐकून ?
मला बोलायचं नाहिये तिच्याशी; तीसुद्धा पुन्हा कधी भेटलिच,बोललीच तर ह्या बद्दल काहीही बोलणार नाहिये.
पण मला माहित करुन घ्यायचय. न बोलता; समोरच्याला नेमकं काय वाटत असेल ते माहित करुन घेता आलं असतं तर किती बरं होतं .
भेटल्यावर पुन्हा ती सगळं सहज नॉर्मल असल्यासारखं बोलणार; मीही गप्पा मारणार.
काही विषयांना शिताफीनं बगल देणार आम्ही दोघंही. आम्ही दोघं मिळून भूतकाळातल्याच आमच्या दोघांचा सामना करणार.
क्वचित उगीचच जरा जास्तच चांगलं वागणार, बोलणार. किंवा काही बाबींचं जरा उगीच कौतुक करणार. "ह्याबद्दल असूया,हेवा वाटत नाही बरं का. उलट मी तर स्वस्थ निवांत मनःस्थितीत आहे. आगदि आहे तसा कम्फर्टेबल आहे." हे स्पष्ट न म्हणता एकमेकांना वागण्यातून पोचवायचा प्रयत्न करणार.
नकोच. त्यापेक्षा हे सगळं कशाला.
प्रत्यक्ष आयुष्यात ह्या सगळ्यानं तसाही काही फरक पडणार नाहिये.
जो पडायचा होता तो पडलाय. आता अधिक काही नाही.
वेळ्/काळ अपरिवर्तनीय गोष्ट. पुन्हा तोच क्षण,तीच वेळ येणे नाही.
समोरचा काहीही म्हटला तरी त्याला ह्या मर्यादांमुळे तसंही काहिच करता येणार नाहिये.
एकमेकांबद्दल आजही कौतुक/अप्रूप/गुडविलही आहे; अगदि आजही आहे.
हे असणं पुरेसं आहे. आपला अजून एक शुभचिंतक आहे. बस्स. एवढी एकच भावना बळ द्यायला पुरेशी आहे.
पुन्हा उत्तरं,प्रत्युत्तरं नको. तिला हे सगळं समजत असेल का ? ठाउक नाही. पण मला समजतय.
दूरवर पोचत पार इलुसा ठिपका बनलेल्या नौकेला आहोत तिथूनच बाय-बाय करावं.
शुभेच्छा द्याव्यात; आपल्या बोटीवरच्या डेकवर उभं राहून.
प्रवासात अजून काय आणि किती मजा/थरार बाकी आहे ते पहावं.
निवांत व्हावं; स्वस्थ व्हावं; अंग सैल सोडून ह्या आहे त्या घडीत सामावून जावं.
जर्नी
'उद्याचा विचार करावा, पण जगावं मात्र आजच्या,आत्ताच्या क्षणात' हे घिसंपिटं असलं तरी खरं आहे.
चालत राहाता राहाता अशी एक वेळ येते की 'राह बनी खुद मंज़िल'.
आणि मग अचानक, आपोआपच 'पीछे रह गयी मुश्किल' हे जाणवलं की प्रवासाचं प्रयोजन, किनारा, काहीच राहात नाही. केवळ फडफडतं शीड उभारलेलं तारू आणि अफाट निळंशार पाणी.
मज्जा.
मी सुद्धा सफरीला शुभेच्छा
मी सुद्धा सफरीला शुभेच्छा देणार होते, प्रतिसाद वाचत गेल्यावर कळलं.
प्रतिसाद आवडले.
मेघना,राही यांच्या सांगण्याला अनुमोदन.
प्रत्येकाच्या कहाण्या त्याच्या त्याच्या पुरत्याच महत्वाच्या असतात पण त्या ज्या प्रकारे लिहील्या जातात त्यावरून त्या इतरांना वाचाव्याश्या वाटतात की नाही हे ठरतं आणि हे इतकं छान लिहीलय की नियमित लिहीण्याचं मनावर घ्या.
मनोबा चांगलं लिहीलयस, फार चान
मनोबा चांगलं लिहीलयस, फार चान फार चान वगैरे वगैरे ..... पण तुझ्या आवडत्या अन सेफ मित्र-मैत्रिणींपाशीच बोलत जा. तू लिहावस असं मला वाटत नाही फ्रॅन्क्ली.
.
तू खूप छान लिहीलयस पण त्यातून कोणाची करमणूक होईल तर तुला आवडेल का?
.
अनु म्हणते तसं मलाही वाटलं काहीतरी करीअरबद्दल आहे. वैयक्तिक आहे हे माहीत नव्हतं.
आँ ?
लोकांना इतकं भावलं? चांगलय राव.
थँक्स रे सगळ्यांना. होय. मी करिअर संदर्भातच लिहिले होते.
.
.
@अनुराव्,अनुप ढेरे,बॅटमॅन,मेघना , राही ,ऋ, अंतराआनंद :-
थँक्स, आभार. आणि सॉरी. एवढ्यात लिहायला जमेलसं वाटत नाही. नेमकं काय लिहावं हे न समजणंही आहे.
आणि होय्;संकोच हे कारण तर आहेच. शिवाय एक प्र्याक्टिकल एक कारण वेळेची अनुपलब्धता हेही आहे.
(मागील आख्ख्या वर्षभरात माझे एकूण प्रतिसाद मी त्यापूर्वी फक्त एखाद्या आठवडाभरात देत असे; त्याहून फारच कमी आहेत. वावर तसाही फारच मंदावलेला आहे.)
.
.
@शुचि,घाटावरचे भट ,
लाख लाख आभार. माझी अडचण तुम्हाला नेमकी समजली आहे असं मला वाटतं.
.
.
आपण सरळ असतो; तितके सगळेच असतात असं नाही. आणि आपल्या जखमा त्यांच्यासाठी मनोरंजन असू शकतं. म्हणजे ते आपल्याकडे एक रोचक केस स्टडी म्हणून पाहतात. एखाद्या शास्त्रज्ञानं झुरळ-अळ्या ह्यांचा अभ्यास करताना ज्या सहजतेनं नॉन-झुरळ, "मानवी", "अभ्यासक" नजरेनं पहावं तसं ते पाहतात.गंमत अशी की हे असं पाहणं त्यांना नॉर्मल वाटतं. तुम्ही स्वतः त्या झुरळाच्या-गिनिपिगच्या भूमिकेत असणं मात्र तुमच्यासाठी अतिशय हिणकस असू शकतं.
मला असा गिनिपिग व्हायला आवडणार नाही.
ह्याशिवायही खाजगी बाबी न मांडणं हे महत्वाचं वाटतं. आणि ते इतकं ओब्व्हिअस आहे की त्याबद्दल खरं तर वेगळं सांगायचीही गरज नाही.
"तू खाजगी बाबी अजून अधिक का लिहित नाहिस जाहिर" असं आता कुणी विचारु नये म्हणजे झालं.
(एक मोठ्ठी गंमत म्हणजे मीसुद्धा नाही नाही म्हणत; नकार देत; शेवटी असलं कैतरी लिहित जातोच; गप्प बसवतच नाही.)
.
.
http://www.aisiakshare.com/node/2722 ह्या धाग्यावर बॅट्यानं बरचसं मला म्हणायचय त्याच्या जवळ जाणारं लिहिलय :-
"The Indian intelligentsia has somewhat mixed attitudes towards the Indian village. While educated Indians are inclined to think or at least speak well of the village, they do not show much inclination for the company of villagers."
.
.
आणि हो; ह्या सगळ्यात "भाव खाउन पहावा जरा" वगैरे काही भूमिका नाहिये; खरच. मला टंकायला टैमही नाही; नेमकं सुचतही नाही; आणि सुचलच तर हिंमत होत नाही अशी गोची आहे हे पुन्हा एकदा सांगतो.
पण सगळ्यांचे खरच खूप आभार. मनापासून आभार.
कसलं आलय "गुडबाय टेक केअर"
http://aisiakshare.com/node/4433 ह्या धाग्यावर बॅटमॅननं विचारलय :-
सदस्य खाते नि:सारित करण्याची प्रक्रिया काय आहे?
म्हणजे त्याला ऐसी सोडून जायचय असं दिसतय. सहसा असं कुणालाही जावसं वातलं तर त्याला जाउ द्यावं असं मला एकीकडून वाटतं.
त्याला जाउ देणं तार्किक वाटतं. त्यामुळे कुणी "चल, निघू का यार आता" असं म्हणालं तर मी त्याला म्हणतो
"ठीकय, अवश्य. भेटत रहा, बोलत रहा. एन्जॉय."
कारण सतत प्रवाही गप्पा चालत राहिल्या असत्या, हसणं खिदळणं सुरु राहिलं असतं, मैफिल रंगात असली असती तर मुळात
"निघू का आता" असं विचारायचं व्यक्तीच्या डोक्यात आलच नसतं. कदाचित मैफल पूर्ण झालेली आहे; आता निघावसं वाटतं आहे.
म्हणजे सर्वाधिक रस घेण्यासारखा भाग संपलेला आहे. मग निघावसं वाटतय त्याने निघालेलच उत्तम, असं मला वाटतं.
.
.
पण हे झालं तर्क-विचार वगैरे ह्याबाजूनं. माणूस फक्त तर्कानं वागत नाही, जगत नाही. त्याला दरवेळी जे वाटत असतं ते तार्किक असतच असं नाही.
त्यामुळे कुणी निघतो म्हटलं की "नको ना जाउस" असंही म्हणावसं वाटतं.(बहुतांश वेळा मी म्हणत नाहिच; तो भाग वेगळा.)
आणि असं वाटण्यामागचं कारण म्हणजे "मी निघतो" असं कुणी म्हटलं की--
.
.
.
.
असो.
शुभेच्छा.
भेटत बोलत राहूच.
हॅप्पी जर्नी.
असं मी उघड म्हणतो; आतून जाणवत असतं --
(हे काळजी घे, भेटत रहू,दोस्त राहणारच आहोत; वगैरे फक्त म्हणायच्या गोष्टी. प्रत्यक्षात एक कॉमन फोरम कमी झाला की बोलण्याचे विषय आणि निमित्तही कमी होतात.) अनोळखी माणसं ओळखीची होणं ही जशी एक प्रोसेस असते, तशीच ओळखीची माणसं अनोळखी होत जाणं हीसुद्धा एक प्रोसेस असते.
ती ह्यामुळे सुरु होते. आपल्या गप्पांच्या संदर्भातले रेफरन्सेस गोठून जातात; थिजतात; कुजतात; नवीन सापडत नाहित.
मैत्री सायनोसायडल वेव्ह सारखी आधी वाढत गेलेली असते; नंतर त्याच वेव्ह सारखी कमी कमी होत जाते.
मन हे चिंतनदेखील फार आवडले.
मन हे चिंतनदेखील फार आवडले.
______
आत्ता लक्षात आलं :( ..... इट्स सॅड!!! वाईट हे वाटतं People burn the bridge when they leave. कशाला काढले त्याने धागे. असते तर परत यायची बुद्धी झाली असती. आता वाटलं तरी नाही येणार तो. :(
____
माझ्या या प्रतिसादास कोणीही उत्तर नाहीदिलं तरी चालेल. उलट नकाच देऊ.
ओळखी-अनोळखी
ओळखीची माणसं अनोळखी होत जाणं हीसुद्धा एक प्रोसेस असते.
अगदी अगदी. भेटींमध्ये अंतर पडत गेलं की मध्ये बरंच पाणी वाहून गेलेलं असत. कधी प्रवाह रोडावलेला तर कधी रोरावणारा झालेला असतो. काही मेळच बसत नाही. कॉमन रेफरन्सेस राहातच नाहीत. मग उगीच तुझी मुलं काय करतात, आई कशी आहे वगैरे संभाषण ओढत बसायचं. कोणाची वाढ कुठल्या बाजूने झाली आहे याचा समोरच्याला अंदाज नसतो आणि मग अंधारात दगड मारत बसायचं कुठला तरी कॉमन टॉपिक सापडेल म्हणून. खरं तर सेपरेशनच्या क्षणालाच सारं थिजलेलं असतं. मला शाळाकॉलेजांच्या रीयुनिअनचे वॉट्सॅपी फोटो वगैरे पाहिले की वाटतं, हे कितपत खरं असेल? म्हणजे फोटो खरेच असतात, रीयुनिअनही खरंच असतं पण काहीतरी निसटलंय यातून असं वाटत राहातं.
माझं उलट झालय. अतिशय आवडता
माझं उलट झालय. अतिशय आवडता एकदम आवडता मित्र फोनवर आला तरी अॅन्क्झायटीमुळे (पर्फॉर्मन्स ;)) बोलायला सुचत नाही. "और बोलो" स्टेज येते.
म्हणजे मी यंव बोलेन ट्यंव बोलीन्/रिलॅक्स होइन हे पार धुळीला मिसळतं. ते यंव ट्यंव २ मिनीटात संपतं.
हा प्रॉब्लेम फार जुना आहे. ;) टीनेज पासून आहे. म्हातारी झाले तरी जाइलसं वाटत नाही. :)
धागा
हा धागा काढला तेव्हा एक कंपनी सोडत होतो; नोटिस पिरियड मध्ये होतो.( नोटिस पिरियड ला मराठीत नेमकं काय म्हणतात ?)
नोटिस पिरियड संपल्यावर नवी कंपनी जॉइन केली. वर्ष दीड वर्षात तीही सोडली आणि पुन्हा नव्या ठिकाणी रुजू झालो.
मागील दोनेक वर्षे त्या ठिकाणी आहे. दोनेक महिन्यात तेही सोडून अजून नव्या ठिकाणी जाइन.
ह्यावेळी स्थिर होता आलं तर बरं असं वाटतं. एकूण अनुभव,कार्यकाल लक्षात घेता; विशेष खास असे स्किल आत्मसात करता आलेले नाहित.
म्हणजे अगदि खासमखास, मार्केटमध्ये चटकन् उठून दिसावेत असे काही. अगदिच सर्वसाधारण प्रोफाइल आहे.
आता दोनेक महिन्यानी जिथे जॉइन होणार आहे; तिथे काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे; ह्याचा आनंद आहे.
बघुया जमतय का.
ह्यावेळी स्थिर होता आलं तर
ह्यावेळी स्थिर होता आलं तर बरं असं वाटतं. एकूण अनुभव,कार्यकाल लक्षात घेता; विशेष खास असे स्किल आत्मसात करता आलेले नाहित.
वाट्टेल ते स्किल आत्मसात करा, हव्या त्या वेळी त्याच कंपन्या येतात ज्यांना तीसरच त्रांगडं हव असतं. आपण जॉइन होतो. पुढे ३ वर्षांनी काही कंपन्यांची परत पहील्या स्किलला मागणी येते तोवर आपलं स्किल आऊटडेटेड झालेलं असतं. - हाच अनुभव आहे.
.
माझी तर कपड्यांमध्येही हीच गत आहे. फॉलमध्ये उन्हाळ्याचे कपडे (स्कर्टस) सापडतात जे की फॉलमधील बेफाम वार्याने उडतात आणि म्हणून घालायचे नसतात, फायनली फॉलचे कपडे (लाइट स्वेटर्स) बस्तानातून बाहेर काढेपर्यंत हिवाळा सुरु झालेला असतो व त्या लाईट स्वेटर्स चा काहीही उपयोग नसतो. इथे हिवाळा मात्र ७-८ महीने टिकतो त्यामुळे, हिवाळ्याचे कपडे व्यवस्थित वापरले जातात.
.
थोडक्यात नोकरीच्या स्किल्सची व कपड्यांच्या फॅशन/उपयुक्ततेची सारखीच गत आहे.

कॉग्निझंट
छान मुक्तक.
तर हा सिंदबाद कॉग्निझंट सोडून अक्सेन्चुअर(किंवा अजुन काही) जॉईन करतोय काय? ;) हे प्रमोशन-सायकल नंतर अनेक सिंदबाद एकदम सफरिला निघतात. ;)