Skip to main content

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार

मराठी भाषेतले ज्येष्ठ लेखक श्री. भालचंद्र नेमाडे यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. मराठी वाचक आणि मराठी भाषकांकरता आनंद वाटावा अशी ही घटना आहे. या निमित्ताने नेमाड्यांच्या लिखाणाबद्दल, त्यांच्या साहित्यिक आणि साहित्यबाह्य व्यक्तिमत्त्वावर चर्चा करता यावी म्हणून हा धागा काढत आहे.

श्री. नेमाडे आणि आपण सर्व मराठी वाचक यांचं अभिनंदन.

बातमीचा दुवा : http://www.loksatta.com/desh-videsh-news/jnanpith-award-declared-to-bha…

बातमीचा प्रकार निवडा

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 19:37

नेमाडे यांची पुस्तके व विशेषतः भाषाशैली अत्यंत आवडते. पुरस्कारानिमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन.

Nile Fri, 06/02/2015 - 19:43

हे म्हणजे उदाहरणार्थ थोरच! या निमित्ताने हिंदूवर साचलेली समृद्ध अडगळ दूर करून पुन्हा एकदा वाचायचा प्रयत्न करायला हवा! :-)

राजन बापट Fri, 06/02/2015 - 19:43

नंदन यांचा हा धागा मी अधूनमधून वाचत असतो. माझ्याकरता त्याला संदर्भमूल्य आहे. या धाग्याची या निमित्ताने आठवण झाली म्हणून त्याची लिंक देतो.

http://www.manogat.com/diwali/2008/node/77.html

अस्वल Tue, 10/02/2015 - 00:56

In reply to by राजन बापट

लेख आवडला!
कॅचर.. आणि कोसला दोन्ही पंचविशीच्या आतच वाचल्या. तेव्हा थोडंफार साम्य जाणवलेलं. नंदनसाहेबांनी एकदम छान मांडलं आहे :)

कोसलाच्या उत्तरार्धात मात्र पांडुरंग होल्डनशी अजिबात फारकत घेतो असं वाटतं. होल्डन फिबीततरी का होईना, पण गुंतला आहे. त्याउलट पांडुरग अगदी तटस्थ. घरच्या जवळच्या व्यक्तींशीही त्याची फार काही घट्ट वीण नाही. (मनी एक होती. कदाचित.) मग गावातल्या विक्षिप्त व्यक्तींबरोबरचा त्याचा प्रवास, आणि शेवटाकडे होत जाणारा अस्सल भारतीय आध्यात्मिक संवाद हे पांडुरंगाला अजूनच दूर घेऊन जातात.

चांगदेव आणि खंडेरावही तसेच आहेत का? त्यांनाही अगदी जवळचं असं कुणीच नाही. चांगदेवाचं तर आतड्याचं असं कधीच कुणी नाही असं वाटतं. मित्रांत तो "बिढार"मधे थोडाफार गुंतलेला वाटतो, पण नंतर जाणीवपूर्वक दोर कापून त्याचा प्रवास त्याने केला आहे. त्यामानाने खंडेरावाचा त्याच्या भावात, भाचीत जीव आहे. पण तिन्ही नायकांची साधारण जातकुळी एकच- तटस्थपणे आजूबाजूच्या घटना न्याहाळणारी. कदाचित ते विषयाच्या आवाक्यासाठी असेल.

सॅलिंगरच्या nine stories , Franny and Zooey मधून व्यक्तिचित्रं जास्त खुलतात. अर्थात त्या गोष्टीरूपात असल्याने असेल.पण माणसांच्या चित्रणासाठी सॅलिंगर नक्कीच जास्त आवडला आहे.

अतिशहाणा Fri, 06/02/2015 - 20:09

मला स्वतःला नेमाड्यांची चांगदेव चतुष्टय मालिकेतील पुस्तके सर्वाधिक आवडतात. जरीला, झूल, बिढार, हूल ही चारही पुस्तके मी अनेकदा वाचून काढली आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे यथार्थ वर्णन या पुस्तकांतून वाचायला मिळते. त्यामानाने कोसला थोडी वैयक्तिक स्वरुपाची वाटते.

या निमित्ताने नेमाड्यांची कोणती पुस्तके अधिक आवडतात याविषयी इतरांची मते वाचायला आवडतील.

शहराजाद Fri, 06/02/2015 - 22:01

In reply to by अतिशहाणा

ही पुस्तके आवडली. नेमाड्याचे टीकावाञ्म्य, विशेषतः मुलाखत-वाङमय थोर वाटले नाही. कोसला एकेकाळी आवडली होती, पण ती बहुतांशी वेगळया मांडणीमुळे. आता एवढी खास वाटत नाही. मात्र हिंदू कादंबरी म्हणजे लहान तुकडे छान जमले असले तरी संपूर्ण स्वरूप म्हणजे मोट्टा बकवास बुडबुडा.

राजन बापट Fri, 06/02/2015 - 20:17

नेमाड्यांच्या वर बरीच टीकाही झालेली आहे. काही महिन्यांपूर्वी वाचलेली ही कविता :

कवितेचं शीर्षक : सनी लिओनचा उन्माद आणि नेमाडेचा देशीवाद

ज्या सामंतांनी गाजवली होती सत्ता गावावर
ज्यांना जमीन जायदाद होती पूर्वापार
मान सन्मान होता गावात
जे राहिले असतील उंच उंच गढ्या मध्ये
दहा दहा खनाच्या वाड्या मध्ये
ज्यांनी ठेवले असतील राबायला सालदार
ज्यांच्या खळ्यात पडत असेल उंच उंच रास
अलुत्या बलुत्यांना वाढली असेल शेरपसा धान्याची भिक
आणि पोसला असेल आपला दानताचा अहंकार

ज्यांना जातीने ठरवले नव्हते नीच अमंगळ
ज्यांना फेकल नव्हत गावाने वेशी बाहेर
जे भूमिहीन शेतमजूर नव्हते
जे करत नव्हते पोटासाठी चोर्यामार्या
जे भटकत नव्हते बिर्हाड पाठीवर घेऊन
ज्यांच्या बाया भोगल्या नव्हत्या गावाने
त्या सर्व सर्वांनी गावात परतावे
कृषी संस्कृती पोसावी
साहित्य लिहावे
आणि खुशाल वैश्विक व्हावे
आम्ही होणार नाही
तुमच वैभव हरवल्याच्या दुःखत
सहभागी होणार नाही

तेंव्हाही आम्ही वंचित होतो
आताही वंचित आहोत
सत्ता कुणाचीही असो
आम्ही नागवलेच गेलोत

मान्य आहे कि ,आता आपण सारेच उभे
आहोत शोषितांच्या रांगेत
विध्वंसकाच्या फौजा घालत आहेत धुडगूस
आपण आपल्याच घरात ठरत आहोत परके
आवळला गेलाय फास चोहीकडून
आपली भाषा,साहित्य,संस्कृती
सगळच विरत चाललंय या कोलाहलात
पण,तुमचा प्रतिकाराचा मार्ग
मला मान्य नाही

मला मान्य नाही तुमच्या छळवादी परंपरा
हा विकासाचा अघोरहि मान्य नाही
मला मान्य नाही सांदि कोपर्यात साचलेली अडगळ
ती समृध्द असो कि घाण मला फेकायची आहे
जात उभी असो कि आडवी मला ठेचायची आहे
आणि रचायची आहे नवी दुनिया
कुठलीच उतरंड नसलेली
जे करतील हार्दीक्तेने सोबत
आम्ही त्यांचं स्वागत करू

पण निघाली आहे आंधळ्यानची दिंडी
त्यांना झाला आहे रोग नॉस्तेलजीयाचा
ते ओरडत आहेत परत फिरा परत फिरा म्हणून
म्होरक्या करतो आहे उपदेश प्रेषिताप्रमाणे
पेरतो आहे विचारांचे चकवे
गातो आहे तुक्याचे अभंग
उडवतोय शेर गालिबचे
सनसनाटी विधानांनी खळबळ उडवून देतो
आणि सभा सेमिनार मधून भरघोस टाळ्या मिळवतोय

पढीव विन्मुख म्हणता म्हणता
हा पाप्युलर पोपट झाला
हारतुरे नको म्हणता म्हणता
हाही शेवटी लापट झाला
माहिती नाही का झाला कसा झाला
पण लेखकाचा लेखकराव झाला

हा भयंकर खोडसाळ म्हातारा
काढतो याच्या त्याच्या खोड्या
हा फेमिनिस्तांना डिवचतो
चळवळीचे चिमटे काढतो
एखाद पिल्लू सोडून पळून जातो
लोक करत राहतात तावातावाने चर्चा
आणि हा भल्या थोरल्या मिशांमधून
मिश्किल पणे हसत राहतो

मला सनी लिओनचा उन्माद
आणि नेमाडेचा देशीवाद
यात वाटत नाही कुठलाच फरक
सर्जनाच्या सगळ्याच शक्यता
याने टाकल्या आहेत जिरवून
आणि आणली आहे एक तात्पुरती झिंग
त्याला कुणी क्रांती म्हणो वा परिवर्तन
मी प्रतीक्रांतीच म्हणणार आहे
मी प्रतीपरिवर्तनच म्हणणार आहे
-सुदाम राठोड

शहराजाद Fri, 06/02/2015 - 22:09

In reply to by राजन बापट

नेमाड्यांवर अशी टीका होते, पण काही ते फारशी अंगी लावून घेत नाहीत. त्यांच्या भरीव भासणार्या पण डोलाराच जास्त असणार्या लेखनाला मोठे समजण्याला माझा जास्त आक्षेप असतो.

अस्वल Fri, 06/02/2015 - 22:30

अभिनंदन! नेमाडेंच्या मिशा आता अजूनच खुलतील.
बिढार सर्वात आवडतं पुस्तक आहे. बाकी चांगदेव त्यानंतर.
कोसला वेगळाच प्रकार आहे. पुस्तक वाचावसं वाटतं, पण निव्वळ शैली आणि थोडासा Randomness अनुभवावा म्हणून. भरकटलेल्या पतंगाची मजा आहे पुस्तकाच्या उत्तरार्धाला.
हिंदू अपूर्ण वाटली (आणि तुकड्यांत repeatative)

बाकी देशीवाद हा प्रकार झेपला नाही.

राजन बापट Fri, 06/02/2015 - 22:48

>>या निमित्ताने नेमाड्यांची कोणती पुस्तके अधिक आवडतात याविषयी इतरांची मते वाचायला आवडतील.

नेमाड्यांचं "कोसला" हे पुस्तक सर्वाधिक आवडतं.

"कोसला" आवडण्यामधे त्या कादंबरीचा "वाढत्या वयातल्या कथानायाकाच्या दृष्टीकोनातून लिहिलेली कादंबरी" ( Bildungsroman ) हा जो प्रकार आहे त्याचा महत्त्वाचा भाग आहे (किमान माझ्यापुरता). ती मी कॉलेजात असताना वाचली. म्हणजे अगदी पौगंडावस्था नव्हे तरी विशीच्या आतच. तोवर कोसला कादंबरीचं मराठी साहित्यातलं महत्त्वाचं स्थान प्रस्थापित झालेलं होतंच. त्यातल्या कथानायकाची अस्तित्वविषयक अस्वस्थता , आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीमधल्या विसंगती टिपण्याची वृत्ती आणि अभिव्यक्त होण्याची शैली - त्यातल्या इंडियोसिंक्रसीजमुळे अधिकच - या सगळ्या आकर्षणाच्या महत्त्वाच्या बाबी होत्या. होस्टेल जीवनातले अनुभव, ढोंगीपणावर ओढलेले ताशेरे, बहिणीच्या मृत्युनंतर आलेला कादंबरीतला अविस्मरणीय भाग या सगळ्यांची पारायणे घडली.

आजही कोसलाचं नि पर्यायाने नेमाड्यांचं आकर्षण तरुण मुलांमधे आहे हे (माझ्यामते) नेमाड्यांच्या यशाचं मोठंच रहस्य आहे. चांगदेव पाटलाकडे असलेली सामाजिक उतरंडीबद्दलची जाणीव आणि तीशी-चाळीशीतली कारेपणाची अवस्था किंवा खंडेरावाची सर्व संस्कृतीचीच छाननी करणारी दृष्टी या गोष्टी छान आहेत, परंतु पांडुरंगाची तगमग, त्याचा धारदार विनोद, व्यवस्थेवरची मार्मिक कॉमेंटरी या दोघांमधे कमी आहे. पुढचे दोघे अर्थातच अधिक प्रगल्भ आहेत परंतु नेमाड्यांचे "रॉकस्टार"पण हे कोसलामुळे आहे.

राजन बापट Fri, 06/02/2015 - 22:55

In reply to by राजन बापट

"कोसला" आवडण्यामधे त्या कादंबरीतल्या "सुरेश बापट" नावाच्या पात्राचाही एक भाग आहे असे जाताजाता नमूद करतो ;--)

बॅटमॅन Sat, 07/02/2015 - 00:27

नेमाडेंची कोसलाच फक्त वाचलीये अन ती आवडली होती. बाकी त्यांच्याबद्दल फार ममत्व अथवा तिरस्कार काहीच वाटत नाही. सबब एका मराठी माणसाला ज्ञानपीठ मिळाल्याचा जास्त आनंद आहे.

सन्जोप राव Sat, 07/02/2015 - 04:58

हे उत्तमच झाले. नेमाडे हे कायम एक पवित्रा घेऊन बोलत-वागत असल्यामुळे त्यांच्याविषयी व्यक्ती म्हणून फारसा आदर नाही. पण' रायटिंग, नॉट रायटर' असे आठवून त्यांचे अभिनंदन. बाकी सूर मारुन तळाशी जाण्याची भाषा करणारे मुटका मारुन उठलेले तरंग बघत असतातच.

तिरशिंगराव Fri, 13/02/2015 - 17:35

In reply to by सन्जोप राव

अनेक प्रतिक्रिया वाचत असताना रावांची प्रतिक्रिया माझ्या विचारांशी जुळणारी वाटली. तरुण वयांत 'कोसला' आवडली होती. पण नंतर लेखन आवडले तरी लेखक नावडता झाला.

गब्बर सिंग Sun, 08/02/2015 - 03:32

उदाहरणार्थ नेमाडे

आज नेमाडेंचा ज्ञानपीठाने सन्मान झाला आहे. त्यांच्या चाहत्यांना आणि वैचारिक विरोधकांनाही याने आनंदच झाला असणार. स्वतः नेमाडेंनाही याचा आनंद झाला असणारच. हा आनंद त्यांना दीर्घकाळ पुरो. कारण 'हिंदू'च्या पुढच्या भागांच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा लंगोट कसून आखाड्यात उतरावं लागणार आहे आणि सर्व विरोध अंगावर घ्यावे लागणार आहेत. नेमाडेंच्या वाढत्या वयात हे विरोध अंगावर घेण्याचं बळ त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पुरवील.

नेमाडेंचे वैचारिक विरोधक कोण आहेत नेमके ?

(मागे पंकज कुरुलकर, पत्रकार, यांनी एक लेख लिहिला होता. मटा मधे च. त्यात त्यांनी नेमाडेपंथीय असा शब्दप्रयोग केलेला होता. अर्थात तो नेमाडे यांच्या समर्थकांना उद्देशून होता. पण नेमाडेंचे विरोधक कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे.)

सव्यसाची Sun, 08/02/2015 - 14:10

In reply to by गब्बर सिंग

हा एक वेगळा सूर. विनय हर्डिकर यांचा.
नेमाडेंनी ज्ञानपीठ सन्मान परत करावा..
'नेमाने नेमाडे' हा ब्लॉगही आहे.

अजो१२३ Sun, 08/02/2015 - 14:14

सलमान रश्दी नेमाडेंना बास्टर्ड म्हणाले आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना याचे समर्थन करावे वाटेल काय? शिवाय ट्रोलिंग करून मी जसा लोकांना उचकावतो वैगेरे तसं नेमाडेंनी काही केलं नव्हतं. सभ्य शब्दांत आपले विचार मांडलेले.
http://www.dnaindia.com/lifestyle/report-salman-rushdie-lashes-out-at-j…

Nile Mon, 09/02/2015 - 02:15

In reply to by अजो१२३

अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना याचे समर्थन करावे वाटेल काय?

अभिव्यक्तीस्वातंत्र्य कशाशी खातात याचा किमान थोडा तरी अभ्यास करा हो जरा. किमान दोनशे प्रतिसाद आपण ज्यावर लिहतो त्याविषयी तरी थोडा अभ्यास असावा. मग आपोआपच त्यातील अलिकडे पलिकडे अन मध्ये हे सगळे प्रकार कळतात. अनाहूत सल्ला. अधिक काय लिहणे.

अस्वल Mon, 09/02/2015 - 04:17

In reply to by Nile

सांगवीकर गेलाच.
चांगो, उंच उशीचे मनोरे रचून तू आपला झोपून जा.
बाकीचे उदाहरणार्थ खंडेराव तुम्ही जाणकार आहात, तेव्हा पुढलं लिहीणं वगैरे असोच.

अर्पण पत्रिका:
शंभरांतील नव्व्याण्णवांस

एपिग्राफ/सारांश/संदर्भ:
चांगदेव म्हणजे पहिल्यापासून कोणाशी जुळतं न घेणारा पोरगा होता.

.
.
.
.
.
उपसंहारः
एक समृद्ध अडगळ

:ड
किंवा असंही-
"हे लोक सर्वजण एका ठिकाणी जाऊन मराठीत टंकत. काय टंकत? तर त्याला काही पुरावा म्हणून बर्‍याच गोष्टी आजकालच्या शास्त्रज्ञांनी शोधल्या आहेत.
हे लोक त्याला धागे म्हणत. त्यातले काही भाग वाचून हे धागे कपड्यांचे असते तर बरं असे शास्त्रज्ञ म्हणाले. हे लोक इथे काहीबाही लिहीत आणि मुख्य म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की ते सगळं वाचणारेही बरेच लोक असत. हे लोक एकमेकांना श्रेणी देत. आता तुम्ही श्रेणी म्हणजे काय असं विचाराल. तर एकाने दुसर्‍याच्या ट्ंकलेल्या मजकूराला दिलेली पावती, असा काहीसा तर्क आजचे शास्त्रज्ञ काढत आहेत......"

शिवाय नंतर तो सर्वर डाऊन झाला आणि त्याने एक मोठी खानेसुमारीची फाईलही वाचवली.
हे भलतंच.
-=-=-=-=-=-

राजन बापट Mon, 09/02/2015 - 06:34

In reply to by अस्वल

चंद्रकांत काकोडकरांना ज्ञानपीठ मिळालं तर काकोडकरांच्या ज्ञानपीठ विजेत्या कादंबरीतली सुरवातीची वाक्ये :

"मी जास्वंदाबाई जयसिंगपूरकर. आज उदाहरणार्थ छत्तीस-चोवीस-छत्तीसची आहे. तंतोतंत सांगायचं तर माझी कंचुकी घट्ट होत असताना मी पावसात ओली होत असताना हे लिहीत आहे. हे म्हणजे थोरच."

अवांतर : काकोडकरांना मिळालं तर त्याला "गुप्त ग्यान"पीठ म्हणतील.

अजो१२३ Mon, 09/02/2015 - 11:10

In reply to by Nile

अभिव्यक्तीस्वातंत्र्य कशाशी खातात याचा किमान थोडा तरी अभ्यास करा हो जरा.

संपूर्ण अभ्यासाअंती अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना कशात सौंदर्य दिसेल याचा नेम नाही असे आढळले आहे. लोकभावना, व्यक्तिगत संवेदना त्यांच्या दृष्टीने सेकंडरी आहेत. मग नेमाडे बास्टर्ड ठरायला जे काही व्हावं लागतं त्यातही त्यांना सौंदर्य दिसलं तर आश्चर्य वाटायला नको.

गब्बर सिंग Mon, 09/02/2015 - 06:47

In reply to by अजो१२३

While speaking at his felicitation at the Matrubhasha Samvardhan Sabha, Nemade had also criticised another English literary giant, Sir Naipaul accusing writers like him of 'pandering to the west', say reports.

झालं संपलं. पाश्चात्यांचे अंधानुकरण, पश्चिमेचे तुष्टीकरण, प्रतिच्यार्पण, वेस्टर्नायझेशन हे शब्द वापरल्याशिवाय टीका होऊच शकत नाही का ? रश्दींच्या साहित्यात "लिटररी व्हॅल्यु" का व कशी नाही ते सांगा. ती पूर्वी नव्हती व आजही नाही असे दाखवून द्या.

राजन बापट Mon, 09/02/2015 - 06:49

रश्दी नि नेमाडे यांचं जे काय चाल्लंय ते नळावरची भांडणं जितकी नि जशी मनोरंजक असतात तसं आहे. रश्दींनी शिवीगाळ केला नसता तर बरं झालं असतं (आणि मनोरंजन कमी झालं असतं.)

रुची Mon, 09/02/2015 - 07:08

In reply to by राजन बापट

अगदी-अगदी नळावरचीच भांडणे वाटतायत. हे थोर-मोठे लेखकमहोदय वगैरे असले प्रकार करताना पाहून इतर सामान्य मानवांचे असले अपराध क्षम्य वाटतात. आता या समृद्ध अपमान सूचित अजून एकाची भर घालता येईल पण नेमाडे "जागतिक स्तरावरचे" लेखक नसल्याने ते तिथं घेतलं जाणार नाही आणि त्यांचा देशीवादाचा मुद्दा सिद्ध होईल. :D

अनु राव Mon, 09/02/2015 - 11:00

कोसला नंतर नाविन्य संपले, पुढच्या कादंबर्‍यांमधे तोचतोच पणा होता.
हिंदू तर त्या सर्व कादेंबर्‍यांचे एकत्रीकरण वाटले. स्थळकाळ, पात्रांची नावे वेगळी पण मुद्दलात नविन काही नाही.
१८ ते २० वर्षापर्यंतच्या शहरी मुलांनी/मुलींनी वाचायला पाहीजे त्यांचे साहीत्य, त्यांच्या परीघाबाहेरचे जग माहीती होइल. हा त्या कादंबर्‍यांचा उपयोग.

कोणी वयाच्या पंचवीशी पर्यंत वाचली नसतील तर पुढे ही वाचले नाहीत तरी चालेल.

अनु राव Thu, 12/02/2015 - 18:31

In reply to by जोशीबुवा

शक्ती कपूरनी कादरखान च्या जोडीने मला भरपूर हसवले आहे, त्यामुळे त्याला भारतरत्न दिले तर मला आनंद होइल.

नेमाड्यांच्या लिखाणात मला हसवण्याची, रडवण्याची किंवा काहीच करण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना काळ्यापाण्यावर पाठवले तरी वाईट वाटणार नाही.

अस्वल Thu, 12/02/2015 - 22:42

In reply to by अनु राव

अवांतर आहे-
८०च्या दशकात चित्रपटांच्या कथा आणि संवाद लिहून कादरखान साहेबांनी सिंगल हँडेडली चित्रपटसृष्टीची बरीच वाट लावली होती असं ऐकलं आहे.
खरं खोटं त्यालाच माहीती.
पण शक्ती कपूरला भारतरत्न मिळालंच पाहिजे. रेप/चित्रपट हे गुणोत्तर एका वेगळ्याच पातळीला नेऊन ठेवलंय त्याने.
------------------------
आणि अलका कुबलने प्रचंड रडवल्यामुळे तीसुद्धा भारतरत्नाला पात्र आहे. (हुंदका)

चिंतातुर जंतू Thu, 12/02/2015 - 18:11

नेमाड्यांच्या कवितांबद्दल कुणाला काही म्हणायचं नाही का? मला 'कोसला', चांगदेव त्रिधारा / चतुष्ट्य आणि कविता ह्यांमध्ये वेगवेगळे नेमाडे दिसतात आणि ते सगळे आवडतात. त्यांची समीक्षा शेरेबाज असली तरी कधी कधी त्यात गांभीर्यानं घेण्यासारखं काही दिसतं. पण 'हिंदू'मध्ये मात्र ते प्रतिभा आटल्यासारखे वाटतात. आता त्यांनी फक्त कविताच लिहिल्या, तर मला त्यात प्रचंड उत्सुकता आहे.