Skip to main content

निमित्त : ‘तर... अशी सारी गंमत’ - चित्रा पालेकर

‘तर... अशी सारी गंमत’च्या निमित्ताने 

सचिन कुंडलकर

(‘तर... अशी सारी गंमत’ हे चित्रा पालेकर यांचे आत्मचरित्रपर पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाले. प्रभात चित्र मंडळाच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या प्रकाशन समारंभात सचिन कुंडलकर यांनी केलेले हे भाषण.)

एडमंड व्हाईट ह्यांचा ‘इन्साईड अ पर्ल’, आंद्रे असीमन ह्यांचा ‘माय इअर इन रोम’ हे दोन्ही स्मृतिचित्रपर ग्रंथ, डॉक्टर गिव्ह पटेल ह्यांची मनावर कोरून राहिलेली चित्रे, अरविंद गोखले आणि भाऊ पाध्ये ह्यांच्या बांधीव लघुकथा, शांता गोखले ह्यांचे साहित्य आणि ‘एक पाय जमिनीवर’ हे आत्मचरित्र, ह्या सर्वांमध्ये सातत्याने दिसत आणि ऐकू येत राहतात ती त्या कलाकृतींमधील विस्तीर्ण, जिवंत, गजबजलेली आणि माणसांना शोषून घेऊन पचवून त्यांची नवीन स्वरूपे निर्माण करणारी शहरे. तुर्कस्थानातील ओरहान पामुक, अमेरिकेतील बॉब डिलन आणि पॉल ऑस्टर, फ्रान्समधील लुई माल, ओलिव्हिए असायास, जाक ओदियार, भारतातील सुधीर पटवर्धन आणि नारायण सुर्वे, ह्यांच्या ताकदवान कादंबऱ्या, चित्रपट, गाणी, चित्रे आणि कवितांमधूनही नागरी अनुभवदर्शनाचा श्रीमंत असा अनुभव आपल्यापैकी अनेक रसिकांना आला असेल. मला अशाच अनुभवाचा अतिशय बोलका पण दुखरा ठसा चित्रा पालेकर ह्यांच्या आत्मचरित्रामध्ये जाणवला. चित्रासोबत मी अस्तंगत झालेली जुनी मुंबई फिरलो. अनेक माणसांना समोर बसलेली असल्याप्रमाणे भेटलो, नेहमीप्रमाणेच मी शांत आणि चित्रा बोलत होती. एकामागून एक दृश्ये आणि सांस्कृतिक वातावरणाची श्रीमंती सावकाश उलगडत होती. माणसे रस्त्यावरून चालत आपल्या घरातून महाविद्यालयात, कार्यालयात, मित्रांच्या घरी चालत जात त्या काळातील ती मुंबई. चित्राचे हे आत्मचरित्र मी एकदा वाचायला घेतल्यावर खाली ठेवू शकलो नाही.

‘तर... अशी सारी गंमत’

चित्रा, तुझं लिखाण कोणतीही अवास्तव विशेषणे आणि वापरून जुने झालेले भाषेचे अलंकार ह्यांपासून मोकळे आहे आणि त्याचा सर्वात चांगला गुण म्हणावा तो हा की कोणत्याही प्रकारची कटू अनुभवांबद्दल कणव निर्माण होण्याची शक्यता तू त्यात टाळली आहेस. साधेपणाने, मोकळेपणाने आणि दृश्यात्मक ऊर्जेने परिपूर्ण असा तो एक सांस्कृतिक आणि सामाजिक पट आहे. एका अतीव रोमँटिक, पॅशनेट, कार्यरत आणि नवनवीन अनुभवांना आसुसलेल्या मुलीने सहजपणे सांगितलेली ती खरी घडून गेलेली कथा आहे. मुंबईसारखी अवाढव्य शहरे आणि आपण दोघे ज्या क्षेत्रात काम करतो ते चित्रपटक्षेत्र कोणत्याही माणसाविषयी असलेला स्टारडम आपल्या मनातून फार पटकन पुसून टाकतात हे आपले सुदैव. माणसे हाडामांसाची उरतात आणि आपले गुणदोष घेऊन आपल्या आयुष्यात येत जात राहतात. कितीही मोठी आणि नावाजलेली माणसे तू लिहिलेल्या ह्या ग्रंथामध्ये वावरत असली तरी वाचकाला ती निर्मळपणे माणसे म्हणून त्यांच्या गुणदोषांसकट भेटत राहतात. तुझी श्रीमंत विनोदबुद्धी आणि तुझे अफाट वाचन आणि जनसंपर्क तुझ्या ह्या चरित्रात डोकावत राहतो आहे.

माणसांचे मृत्यू होऊन ती नाहीशी होतात अशी जरी आपली समजूत असली तरी माझी त्याविषयीची जाणीव अशी आहे, की एखाद्या व्यक्तीचा शरीराने झालेला मृत्यू हा तिला संपवून टाकत नाही; तर त्या व्यक्तीला आठवणारी शेवटची व्यक्ती ह्या भूतलावरून नाहीशी झाली की मग खऱ्या अर्थाने ती व्यक्ती निसर्गामधून नष्ट होते. चांगले ताकदवान लेखक आपल्या आत्मचरित्रपर लिखाणांमधून अनेक माणसांचा आणि शहरांचा मृत्यू थोपवून धरीत असतात. हे शांत देखणे पुस्तक निर्माण करून चित्रा तू हे काम केले आहेस. तुझे ज्या व्यक्तींवर मनापासून प्रेम होते ते प्रेम आणि मैत्री, तुझ्या मनातील सळसळती ऊर्जा आणि तिला खतपाणी घालणारे तुझे आईवडील, बहिणी, मुलगी आणि तिचे कुटुंब, मित्र, घरे, रस्ते, जुन्या देखण्या इमारती, अनेक लेखक, कवी, चित्रकार आणि संगीतकार ह्यांचा निसर्गसृष्टीतील शेवट तू पुढे ढकलला आहेस. ह्या ग्रंथामधून तुझे विचार, तुझी अव्याहत ऊर्जा आणि सातत्याने पुन्हा उठून उभे राहण्याची तुझी जिद्द अनेक वाचकांना अतिशय प्रकाशमान अनुभव देतील. हा ग्रंथ निर्माण केल्याबद्दल मी तुझे मनापासून अभिनंदन करतो.

आपली पहिली प्रत्यक्ष भेट झाली ती दिल्लीला सिरिफोर्टच्या हिरवळीवर. १९९६ साली. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात. डॉक्टर जब्बार पटेलांनी आपली ओळख करून दिली. मी आणि उमेश कुलकर्णी ‘दोघी’ ह्या आमच्या पहिल्या चित्रपटाच्या तेथील सहभागामुळे दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्यांच्यासोबत आलो होतो. तुझ्या ‘बनगरवाडी’च्या सहभागाचे ते वर्ष. तू हिरवळीवर एकटीच बसून होतीस. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यविद्यालयात शिकणारे महाराष्ट्रातील दोन विद्यार्थी अतुल कुलकर्णी आणि गीतांजली शेरीकर डॉक्टर पटेलांसोबत होते. डॉक्टरांनी अतिशय आपुलकीने सर्वांची ओळख करून दिल्याचे मला आठवते. त्या प्रत्यक्ष भेटीआधी मी तुला भारतातील उत्कृष्ट पटकथाकार म्हणून ओळखत होतो. ‘थोडासा रूमानी हो जाये’ ह्या तुझ्या निर्मितीवर माझे फार मनापासून प्रेम. त्या चित्रपटाचे शीर्षक गीत आणि ‘पाऊलखुणा’चे शीर्षकगीत मला आजही संपूर्ण पाठ आहे. तुला भेटून मला फार आनंद झाला, कारण पुढील सर्व दिवस कुठेही भेटलो की तू आम्हाला कोणते चित्रपट पाहावे, कोणते अजिबात पाहू नये अश्या मोकळ्या सूचना देत होतीस. आम्ही ज्यांची नावेसुद्धा घाबरून घेत असू त्यांना तू अरे-तुरे करून केरसुणीने झाडून काढून टोपात भरून भिरकावून देत होतीस. एकाच वेळी सोळा विषयांवर आणि तेसुद्धा तीव्र इंटेन्सिटीने बोलत होतीस. मी अनेक वर्षांनी ‘जब वी मेट’मधली करीना कपूरने साकारलेली गीत पाहिली तेव्हा मला लक्षात आले की परत कधीही निर्माण न होऊ शकणारा, ज्याची कॉपी होणे कधीच शक्य नाही असा हा ओरिजिनल पीस आपल्या आयुष्यात दिल्लीच्या त्या हिरवळीवर फार पूर्वीच आला आहे. चित्रा तिचे नाव. हा ओरिजिनल पीस निर्माण केल्याबद्दल तुझे बुद्धिमान आणि प्रगतिशील विचारांचे अम्मा आणि अन्नू आणि ह्या समस्त मुंबई शहराचे आपण आभार मानूया.

डॉक्टर लागूंच्या पुण्यातील समारंभांना, मुंबईतील चित्रपटविषयक कार्यक्रमांना, चित्रपट महोत्सवांना तू भेटायचीस तेव्हा मी तुला अहो-जाहो अनेक वर्षे केले. पण समलिंगी मुलामुलींच्या पालकांच्या मनात आपल्या अपत्याच्या भवितव्याविषयी सकारात्मक जाणीव निर्माण करायचे मोठे काम करायला तू सुरुवात केलीस तेव्हा तुझ्यामधील मातृत्वाच्या अपार भावनेने हळवा होऊन बहुधा मी तुला ‘अगं चित्रा’ म्हणू लागलो. ते आपोआप झाले. आईला आपण कुठे अहो-जाहो करतो? तुझा एकेरी उल्लेख मी आंतरिक जिव्हाळ्याने करू लागलो आणि तुझे आत्मचरित्र वाचल्यावर मात्र मला त्या कृत्याचे फार मोठे दडपण आले. आयुष्याचा प्रत्येक क्षण किती रसरसून तू जगली आहेस, किती सारे मोठमोठे सर्जनशील प्रकल्प तू पार पाडले आहेस, किती माध्यमे आत्मसात करून हाताळली आहेस; चित्रपट संकलन, चित्रपट रसग्रहण ह्यांचे शिक्षण घेण्यासाठी तू किती मेहनत केली आहेस हे वाचून माझ्या मनात तुझ्याविषयी असलेला आदर द्विगुणित झाला.

तुझ्या कार्यमग्न आयुष्यात तू अनेक सर्जक माध्यमे शिकलीस, रंगभूमी, टेलिव्हिजन, जाहिरात आणि चित्रपट ह्या सर्व माध्यमांमध्ये उत्कृष्ट काम केलेस आणि आता तू अक्षरवाङ्मयाच्या निर्मितीला सुरुवात केली आहेस. हा मार्ग कुणाच्याही सोबतीशिवाय करण्याचा स्वयंभू मार्ग आहे. त्याला कोणत्याही टीमचीच काय, पण कोणत्याही जोडीदाराची गरज नाही. सातत्याने सामूहिक आयुष्य जगणाऱ्या माणसांना अक्षरवाङ्मय आणि सकस ग्रंथनिर्मितीचा पिळदार अनुभव सहजपणे निर्माण करता येत नाही. एकटेपणाच्या रूपाने निर्माण झालेली एकांताची पोकळी चिंतनपर सकस अक्षरवाङ्मय निर्मितीला अधिकाधिक पोषक ठरत जाते. आत्मचरित्रपर लिखाणाचा हा पहिला ग्रंथ ही तुझी सुरुवात आहे असे मी मानतो. ह्या प्रथम अनुभवापासून आता शक्य तितक्या लवकर वेगळी हो आणि वाचकांच्या प्रतिसादापासून लांब जाऊन उभी राहून शांतपणे मनात नवीन ॲसिड थेंबाथेंबाने निर्माण करीत राहा. तुझ्या आतमध्ये अनेक मोकळे विस्तीर्ण प्रदेश, अनेक राक्षस आणि अप्सरा, अनेक रुचकर पदार्थांनी भरलेले लांबलचक मेज आणि भल्यामोठ्या दालनांमध्ये वाऱ्यावर उडणारे कापूसरेशमाचे, सूर्यप्रकाश न अडवणारे पडदे आहेत. आपल्या आतील हे मोकळे रंगमहाल दिव्यांनी उजळवत ठेवणे माणसाला फार आवश्यक असले तरी ते जमते ते फक्त गुणवंत आणि तालीमसमृद्ध गायकांना आणि अतिशय शिस्तशीर लेखकांना. तुझी ग्रंथनिर्मिती ह्यापुढेही जोमाने चालू राहूदे. किरण नगरकर, विलास सारंग ह्यांनी एकापेक्षा अधिक भाषांमध्ये अक्षरवाङ्मय निर्माण केले. कोंकणी आणि भारतीय इंग्रजी भाषासुद्धा तुझी वाट पाहत आहेत. कोंकणी भाषेत शक्य होणारा मिश्र संस्कृतीचा पैस तुझ्या मनातील कथासूत्रांना फार पोषक आहे. कारण भाषा ही त्या प्रदेशाचे आणि समाजाचे सांस्कृतिक अनुबंध सोबत घेऊन येते. त्यामुळे लिपीची अजिबात काळजी न करता कोंकणी भाषेत तू कल्पक कथासूत्रे रचावीस हे फार आवश्यक आहे. अस्तंगत होत चाललेल्या एका काळातील मिश्र संस्कृतीची तू साक्षीदार आहेस. त्या संस्कृतीची नागरी रूपे, त्या आधुनिक विचारांच्या, शहरांमध्ये मोकळे आयुष्य जगणाऱ्या कोंकणी माणसांच्या कथा तू लिहिल्या नाहीस तर कोण लिहील? ती काळाच्या ओघात विरघळून गेलेली अनेक माणसे तुझ्याकडे आता मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. तुला लिहायला नुसते आवडतच नाही तर तुला लिहिता येते. ते तुझे मूळ काम आहे. त्याचे स्वरूप आता बदलले आहे. पटकथेचे लिखाण आणि शब्दवाङ्मयाने समृद्ध अशी ग्रंथनिर्मिती ही दोन्ही फार स्वतंत्र दालने आहेत. चित्रपटक्षेत्र आपल्यातील इनोसन्स फार क्रूरपणे नष्ट करीत राहते आणि लेखक म्हणून ती कोरडीठाक झालेली मनाची विहीर आपल्याला पुन्हा पुन्हा जलमय करीत ठेवायचे अवघड काम आयुष्यभर एकट्यानेच करीत राहावे लागते. माझा असा आग्रह आहे की तू आता सुरू केलेले ग्रंथनिर्मितीचे काम सातत्याने आणि ठाशीवपणे करीत रहावेस. अनेक आकृतिबंध आणि अनुभवांनी तुला दिलेली श्रीमंती तू दृश्यमय शब्दांत परावर्तित करीत राहावीस. निर्मितीचा वेग आणि कामाची शिस्त कायम ठेवावीस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखननिर्णय आणि प्रकाशननिर्णय हे दोन्ही पूर्ण स्वतंत्र ठेवावेस. आपण लिहिलेले सगळे प्रकाशननिर्णयात परावर्तित करायची काही आवश्यकता नसते. त्याला फार सावकाश वेळ द्यावा लागतो आणि काही वेळा फार मोजके सर्वांसमोर आणावे लागते. पण हात लिहिता असला पाहिजे आणि मनात कायम एका बांधीव ठाशीव पुस्तकाची आकृती आकार घेत राहिली पाहिजे. आता हाती असलेला वेळ आणि सर्व ऊर्जा तू लेखनाकडे वळवत राहा. तू स्वतःच एक अरुण कोलटकरांनी करायची राहून गेलेली कविता आहेस. ती कविता तू आनंदाने जगून पूर्ण कर.

सचिन कुंडलकर

पुंबा Tue, 08/04/2025 - 12:55

ह्या प्रथम अनुभवापासून आता शक्य तितक्या लवकर वेगळी हो आणि वाचकांच्या प्रतिसादापासून लांब जाऊन उभी राहून शांतपणे मनात नवीन ॲसिड थेंबाथेंबाने निर्माण करीत राहा.

'न'वी बाजू Tue, 08/04/2025 - 17:33

In reply to by पुंबा

त्याहीपेक्षा वाईट म्हणजे,

तू स्वतःच एक अरुण कोलटकरांनी करायची राहून गेलेली कविता आहेस.

Is that supposed to be a compliment?

मला जर कोणी अशी compliment दिली असती, तर मी त्या compliment देणाऱ्याच्या कानफटात वाजवली असती! (बोले तो, कोलटकर म्हणजे तोच ना, ‘दिखता नहीं, मादरचोद, दिखता नहीं?’ नाहीतर ‘बळवंतराव भडवा नि त्याच्या रांडांचा तांडा’ असल्या काहीबाही कविता पाडणारा? नाही, म्हणजे, त्या कविता बऱ्यावाईट कशाही  असतील (मी वाचलेल्या नाहीत; असल्या कविता मी सहसा आपण होऊन वाचीत नाही. परंतु, ते असो.); मात्र, ‘तसल्या टाईपची कविता तू आहेस’ ही काय compliment आहे?)

ती कविता तू आनंदाने जगून पूर्ण कर.

हा नक्की आशीर्वाद आहे, की शाप?

असो चालायचेच.

मारवा Mon, 14/04/2025 - 11:52

In reply to by 'न'वी बाजू

वाचून घ्या या काही अरुण कोलटकरच्या कविता. कदाचित त्यांच्या कवितांची नवीन बाजू दिसेल.

वामांगी

देवळात गेलो होतो मधे
तिथ विठ्ठल काही दिसेना
रखमाय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो ऱ्हायल
रखमाय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोक ठेवायच

पायावर ठेवलेल डोक
काढून घेतल
आपल्यालाच पुढ माग
लागेल म्हणून

आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठ गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठ गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाह्यल
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथ
कोणीही नाही

म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूच मला जरा
कमीच दिसत

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकड जरा
होत नाही

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कस कुणी
सांगितल नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आल
अठ्ठावीस युगांच एकटेपण.

श्रीज्ञानेश्वरसमाधीवर्णन

स्वच्छ निळसर रिकामे अंबर
नारद तुंबर अभ्र विरे
कधी केले होते गंधर्वांनी खळे
स्वत:शीच खेळे चंद्रबिंब
पांगले अवघ्या वैष्णवांचे भार
ओसरला ज्वर मृदंगाचा
मंदावली वीणा विसावले टाळ
परतुन गोपाळ घरी गेले
स्थिरावला हार वाळली पाकळी
गुंतली फ़ासळी निर्माल्यात.

The Butterfly

There is no story behind it.
It is split like a second.
It hinges around itself.
It has no future.
It is pinned down to no past.
It’s a pun on the present.
It’s a little yellow butterfly.
It has taken these wretched hills
under its wings.
Just a pinch of yellow,
it opens before it closes
and closes before it o
where is it...........

सुनील. Thu, 10/04/2025 - 12:29

तुला लिहायला नुसते आवडतच नाही तर तुला लिहिता येते.

 

हे ही एपिक आहे. 

मारवा Mon, 14/04/2025 - 12:26

या भाषणा निमित्ताने दुसरे महागुरू महाराष्ट्राला लाभले असे म्हणण्यास वाव आहे.
पहिल्याचा पीळ जरा कुठे सैलावतोय तोच नवीन गावले.
चित्रा !
माझ्या भाषणा पासून कान दूर करून दरी काठी उभी रहा.
काळजी करू नकोस माझी
कारण मीच पडलोय आत्मस्तुतीच्या दरीत खोलवर......
मजपर्यंत तुझी कलाकृती पोहोचणारच नाही...
तशी मला गरजही नाही तुझ्या साहित्याची
कारण ..
मी मज हरवून बसलोय मलाच मिळालेल्या टाळ्यांच्या प्रतिध्वनीमधे... तुला माहितच असेल कदाचित, echo किती घुमतोय ग दऱ्याखोऱ्यांमध्ये !
तू नवीन ॲसिड थेंबा थेंबा ने अशीच बनवत रहा
मी असाच पाणी मारत ते डायल्यूट करत राहतो
मी कोण विचारतेस?
अय्या!
तुझाच
गुलाबजाम
सचिन कुंडलपिळगावकर

पुंबा Wed, 16/04/2025 - 11:54

त्यामुळे लिपीची अजिबात काळजी न करता कोंकणी भाषेत तू कल्पक कथासूत्रे रचावीस हे फार आवश्यक आहे.

लिपीची कशाला काळजी करेल चित्रा? देवनागरीच लिपी ना कोंकणीचीही?

'न'वी बाजू Wed, 16/04/2025 - 15:59

In reply to by पुंबा

बोले तो, देवनागरी ही कोंकणीची अधिकृत लिपी परवापरवा झाली. त्याअगोदर कोंकणीला स्वतःची अशी लिपी नव्हती. ठिकठिकाणचे लोक स्थानिक (किंवा अन्य) लिप्या वापरायचे. (कदाचित अजूनही वापरीत असतील.) जसे: महाराष्ट्रात देवनागरी, गोव्यात (विशेषेकरून किरिस्तांवांमध्ये) रोमी किंवा (हिंदूंमध्ये) देवनागरी, कर्नाटकात (कारवार-मंगळूरच्या बाजूस) कन्नड, वगैरे.

आता, चित्राला (खरे तर, मी काही चित्रा पालेकरांसोबत लहानपणी गोट्या वगैरे (किंवा, लपंडाव, किंवा भातुकलीसुद्धा) खेळलेलो नाही. मात्र, लेखक त्यांचा उल्लेख बिनदिक्कतपणे एकेरी करीत आहे, तर मीच काय ते असे कोठले घोडे मारले आहे, असा आपला एक सामान्य विचार, इतकेच. असो.) यांपैकी कोठल्या लिप्या अवगत असतील, कोण जाणे, असा विचार लेखकाने कदाचित केला असू शकेल. (चित्रासोबत मुंबई हिंडला, याचा अर्थ तिला कोठकोठल्या लिप्या येतात, हे ठाऊक असलेच पाहिजे, असा नव्हे, नाही काय?)

दुसरे म्हणजे, भले चित्राला (कोंकणीसाठी वापरात असलेल्या) सर्व लिप्या अवगत असतील. मात्र, कथाकादंबरी वगैरे लिहिताना त्यांपैकी कोठलीतरी (कोठलीही) एकच लिपी वापरणे प्राप्त आहे, नव्हे काय? (नाहीतर, (किमान) तीनतीन आवृत्त्या काढाव्या लागतील. नि मग, एकही खपणार नाही.) आणि, कोठलीतरी (कोठलीही) एक लिपी जर वापरली, तर मग बाकीच्या लिप्यांची पक्षपाती मंडळी भडकणार. (कोंकणी ही तशी राजकीयदृष्ट्या ज्वालाग्राही भाषा आहे, असे ऐकून आहे.) म्हणजे, ती मंडळी पुस्तक विकत घेणार नाहीत; फार कशाला, त्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. म्हणजे, खप बोंबलला! (किंवा, त्याहूनही वाईट म्हणजे, ती मंडळी पुस्तक विकत घेतील, परंतु ते रस्त्यात जाळण्यासाठी! याने तात्कालिक प्रसिद्धी जरी मिळाली, नि तात्कालिक खप जरी वाढला, तरी खपाच्या दृष्टीने त्याचा दीर्घकालीन फायदा कितपत होईल, याबद्दल साशंक आहे.)

(यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, वरील विवेचनाचा चित्राच्या संभाव्य पुस्तकातील मजकुराच्या बरेवाईटपणाशी यत्किंचितही संबंध नाही. तर ते एक असो.)

तर, कोंकणीत (काहीही) लिहिण्यामागे (लिपीच्या दृष्टीने) या (संभाव्य) अडचणी असाव्यात, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

कदाचित, लेखकाला असे काही अभिप्रेत असू शकेल. (किंवा, नसेलही! ते एक (जाणीत असला, तर) लेखकच जाणे. चालायचेच.)

पुंबा Wed, 16/04/2025 - 23:32

In reply to by 'न'वी बाजू

भांगरभुंय वगैरे पेप्रात देवनागरी कोंकणी असते. कन्नड, रोमन लिपीत लिहिलेले पाहिले नव्हते.
चित्रा, नको करूस गं लिपीची काळजी. म्हणजे, तु काळजी करण्याची शक्यता होती पण सचीन सांगतोय ना, आता नको करूस.

'न'वी बाजू Thu, 17/04/2025 - 00:07

In reply to by पुंबा

भांगरभुंय वगैरे पेप्रात देवनागरी कोंकणी असते. कन्नड, रोमन लिपीत लिहिलेले पाहिले नव्हते.

काय सांगता! Bhagevont Fransisk Xaviera, probhuchea bhoktivont sevoka, वगैरे, झालेच तर, Ogi Ravchem!, वगैरे वाचण्यात आले नाही कधी?


गोव्यातल्या फ्रान्सिस झेवियराच्या चर्चात वाटल्या जाणार्‍या फ्रान्सिस झेवियराच्या छापील कोंकणी प्रार्थनेतून.

गोव्यातल्या फ्रान्सिस झेवियराच्या चर्चामधीलच 'शांत रहा' अशा अर्थाच्या कोंकणी पाटीतून.