Skip to main content

निमित्त : "ती आणि मी" - श्री. भवरलालजी जैन

"ती आणि मी " या थोर उद्योजक भवरलालजी जैन यांच्या आत्मकथनाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा , रवींद्र नाट्यमंदीर , मुंबई येथे पार पडला होता. त्या मंगलप्रसंगी थोर मराठी निसर्ग कवी श्री ना.धो.महानोर यांनी या निमित्ताने जे भाषण केले होते ते येथे देतांना माझे मन भरुन येत आहे. या लेखाची प्रेरणा मला सचिनजी कुंडलकर यांच्या भाषणावरुन मिळाली हे मी येथे विनम्रपणे नमुद करु इच्चितो. त्याचप्रमाणे ऐसी अक्षरे जसा हा एक चळवळींचा आधारवड आहे त्याचप्रमाणे या सशक्त संस्थळाने एक " अर्काइव्ह ची भुमिका ही फार योग्य रीतीने पार पाडत आहे. हे अनेंकाच्या लक्षातही येत नाही. हा सांस्कृतिक वारसा जतन करणे हे एक सुजाण नागरीक वाचक व रसिक म्हणुन आपले सामाजिक कर्तव्यच आहे . व फुल ना फुलाची पाकळी म्हणुन " अर्काइव्ह" ला हे माझे छोटेसे योगदान देतांना मला आनंद होत आहे. प्रसंगी जे जे जिथुन जिथुन चांगले मिळेल ते ते तिथुन उचलुन आणुन इथे ठेउन जतन करावे ही आज जेव्हा लोक नको तितक्या प्रमाणात पात्रता नसतांना लेख पाडत आहेत स्वतः लिहित आहेत कि ज्याला कुठलेही साधे संपादनही केलेले नसते त्या काळात खरी पात्रता असलेल्यांचे लेख जतन करणे हे प्रगटन करण्यापेक्षा अधिक मौलिक आहे असे मला वाटते. हाच सर्व्हर चा सदुपयोग आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. तर संपुर्ण भाषण हे इथे.....

"ती आणि मी " या पुस्तक प्रकाशनप्रसंगी मला मुख्यतः केशवराव कोठावळेंची आठवण येते. अशा प्रकाशन संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित होतय, याचा जास्त आनंद होत आहे. ही आनंदयात्रा या पुस्तकाच्या निमित्ताने होत आहे. मी बोलायचे नाही असे अशोकभाउलाही सांगितले. जो भारावलेपणा आहे ठीक आहे. आपले वय एवढे झालेले असते. अजुनसुद्धा या पुस्तकाच्या निमित्ताने बाई या वेळेस माझ्या डोळ्यांसमोर आहेत.

भाऊंचा आता परीचय करुन दिला. मी त्यांचा मित्र आहे. लहान भाऊ आहे.त्यांच्या माझ्या-गावाचे अंतर फक्त दोन किलोमीटर म्हणजे दीड मैलाचे आहे. तसे एका गावातले आम्ही. त्यांची आमची ओळख वडीलोपार्जित अशी आहे. अत्यल्प साध्या अशा गरीबीत ते होते. मीही होतो. कष्ट करण्याची तयारी असेल, जिद्द असेल आणि एकलव्य साधना ही साने गुरुजींची गोष्ट माहीत असेल तर माणूस काय वाट्टेल ते होवो, राखेतुन सुद्धा स्वर्ग निर्माण करु शकतो, हे दाखवणारे भाऊ आहेत. ( प्रचंड टाळ्या.... )
त्यांचे कर्तुत्व आणि बाकीच्या गोष्टी आहेतच.

अजिंठ्याच्या पायथ्याशी आम्ही राहतो. चार-पाच किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगरात कोरलेल्या जगविख्यात अजिंठा लेणीच्या कलावंतांची सावली आणि प्रेम आमच्यावर आहे. भाऊंनी एवढे काम केले नसते. एवढ्या एकत्रित कुटुंबामध्ये चिरेबंदीवाडा जो आहे तो जगत असताना तेव्हापासुन ते आतापर्यंत हे सगळे झालेच नसते. फक्त एक आहे की भाऊंच्या बरोबर सुगरणीची लहानशी चोच घेऊन ती घरटे बनवते आणि घर सांभाळते आणि पिलांना मोठे करते, ती सुगरण जर कांताबाई नसती तर हे झालेच नसते ! ( टाळ्या...) काही गोष्टी अशा होत्या ज्यात तुम्ही रॉकेल विकायला निघाले, डबे करायला निघाले, पैसा पैसा पाहता सात हजारचे दहा हजार कसे होइल, कुटुंबाला तर पंचवीस हजार लागतात. इथपासुन तर सबंध फरफ्ट आयुष्याची जी चालत असताना हा माणुस उभा राहीलाय. सगळे मी पाहीलेले आहे आणि सावलीपेक्षा उन्हाचे दिवस खुप पाहीलेले आहेत. त्या वेळेला चुल पेटवलेली असतांना जाळ लवकर व्हावा म्हणुन त्या फुंकणीतुन चुल पेटवताना, तो जाळ निर्माण होत असताना, अन्नाचा घास करताना , आई गौराइ पीठ दळताना त्याची भाकरी तयार करुन सगळ्या घरादाराला काके-मामे-चुलते अशा सगळ्या घरादाराला आणि वडीलोपार्जित सगळी मोठी माणसे जपताना बाई या तशा तेव्हा वयाने लहान होत्या.

काके-पुतणे सगळे असताना अशा वेळी घर सांभाळणे फार कठीण होत असते. त्या वेळी मारवाडी समाजात कर्नाटकातुन एक बाई ग्रॅज्युएट होते. जैन समाजात फार तर मॅट्रीकपर्यंत कुठेतरी सापडायचे. कधीतर तेही नाही. अशा अवस्थेत एक सुशिक्षीत मुलगी तिथुन इथे येते आणि सबंध कुटुंबाच्या घराचे राखण करीत त्यांना मोठे करणे, त्यांना अन्नाचा घास चिल्ली-पिल्ली पाखरासारखा भरवणे, सबंध कुटुंब चालवणे, याची जबाबदारी स्वीकारते. कुटुंबप्रमुख म्हणुन कांताबाई उभ्या राहील्या आणि त्यांनी सगळे सोसले. चुल फुकताना तो अंगार, तो धुर आणि धुराड्यातुन जळणारे सगळे काही मी पाहीलेले आहे. या गोष्टी बाकीच्य सांगण्याचे काही कारण नाही. त्याचा उल्लेख पुस्तकामध्ये कुठेतरी आलेलाच आहे.

भाऊंनी स्वतःचे नाही केले ; पण १९८४ नंतर विघटन झाल्यानंतर प्रत्येकाच्या मागे उभे राहण्याचे काम केले. कांताबाईने तेवढेच काम केले आणि म्हणुन तर आज त्यांच्याइतका आनंद घेणारा दुसरा कोणताही माणुस मी पाहिलेला नाही. एकत्र कुटुंबामध्ये चांगले खुप असते. मी स्वतः एकत्र कुटुंबात वाढलेलो आहे. भाउंच्या साक्षीने सगळे त्यांच्याचसारखे माझेही कुटुंब वाढलेले. मी जेव्हा पाहतो, कि तडा जिथे जातो आणि विद्रोह होतो, तो कोणत्या थराला जातो ? त्या वेळेला सगळे जगणे, सांगणे, बोलणे, अन्न खाणेसुद्ध मुश्किल होते.

कवितेत असेच असते ना.... एक सहा ओळी झाल्या, अंतर तुटले आणि यामध्ये जी कविता असते ना ती रसिकांनी समजुन घ्यायची असते. ती ग्रेट कविता असते. भाऊंना कुठे तोडावे आणि कुठे जोडावे हे चांगले कळते.

कारखानदार खुप आहेत हो ! टाटा बिर्ला पासुन तर भवरलालजींपर्यंत. भाऊंचा पिंड शेतकरयाचा आहे, म्हणुन त्यांचा-माझा स्नेह अधिक राहीला. दोघे काम करीत गेलो. नविन जे-जे काही असेल वॉटरशेड, झाड, फळझाड प्रक्रिया अशी कामे केली. जिथे सिमेंट नाही सोने मिळेल ; पण सिमेंट मिळत नाही, अशा नव्वदच्या काळात एका रात्रीमधुन दहा एकर , पन्नास एकर , दोनशे एकर, भिजवणारी जी हरितक्रांती झाली ती पीव्हीसी पाइपमुळेच. त्याचे जनक अनेक असतील; पण खरा जनक भवरलालजी जैन आहेत (टाळ्या..)

या तंत्रज्ञानामुळे भरड टेकड्यांवर पाषाणातुन पाझर निर्माण करुन कर्नाटकापासुन तर बाकीच्या ठिकाणी जिथे काहीच होत नव्हते, तिथे माळरानावर हिरवाई साकार झाली. शेतीमधुन पळुन जावे आणि शेतीइतके वाईट नाही, असे जेव्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे, त्यावेळेला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही, असे सांगणारे दोन वेडे आहेत. त्यातला एक भाऊ आणि दुसरा मी आहे. ही गोष्ट आहे खरी, कि ओंजळभर पाणी पाहीजे. तीन एकरवाला शेतकरी हा नक्कीच उभा राहु शकतो, हे सांगण्याचे काम ज्यांनी केले ते भवरलाल जैन आहेत. ही गोष्ट जी आहे ती या पुस्तकात फार कमी आलेली आहे. कारण या पुस्तकाचा केंद्रबिंदु आहे ती आणि मी.

जैन उद्योगसमुह १९८४ पासुन तर १९९४ पर्यंत मोठा झाला. नुसता मोठा नाही झाला. अपार कष्टाने न जेवता न भाकर खाता वाट्टेल ते कष्ट घेऊन त्यातुन मोठा झाला. परंतु १९९४ नंतर चढ्-उतारामध्ये संपुर्ण उद्योग मोडकळीस आला. नुसता मोडकळीस आला नाही. फ्रॅक्चर देऊनसुद्धा जमणार नाही अशी परीस्थिती होती. त्या वेळेला भाऊंनी एक जाहीरात दिली होती. निष्पर्ण झाड आहे, त्याला एकच कोवळी फांदी ! संपुर्ण महाराष्ट्र्भर ही जाहीरात दिली. खात्रीपुर्वक सांगतो की माझ्या सभासदांना, माझ्या मित्रांना आणि ब्यानकर्सना , या झाडाला पुन्हा पालवी फुटुन दाखविले आणि पुन्हा फुले-फळे आणुन दाखविले. त्यावर विश्वास ठेवा अशी जाहीरात होती.

बाईंना ही सगळी जाहीरात दाखविली, त्यानंतर बाई आजारी पडल्या, दुर्देवाने नऊ-दहा वर्षात त्या गेल्या. त्या नऊ-दहा वर्षात बाई ज्या आजारामुळे गेल्या, त्याला कोणी काही करु शकत नाही, असा तो आजार होता. शेवटपर्यंत दु:खात उभे राहणारे जे असतात त्याच्यातली कांताबाई एक आहे. तसे माझ्यासारख्या शेकडो-हजारो माणसांना आधार देणारे हे कुटुंब आणि विशेषतः भाऊ तर आहेच; पण त्यांच्यासोबत कांताबाई होत्या. आठ-नऊ वर्षे बाईंना बोलता आले नाही. सगळे आम्ही हावभावाने बोलायचो, लिहुन द्यायचो , डोळ्यातुन अश्रु यायचे , त्या गेल्या हे विधीलिखीत होते. म्हणजे अगदीच सांगायचे म्हणजे नुसते भाऊच नाही, त्यांचे कुटुंब नाही, आम्ही सगळेच पोरके झाल्यासारखे झालो. हा विधीलिखीत भाग असतो. भाऊंच्या घरामध्ये बाईंची आज एक खोली आहे. त्या घरामध्ये सगळ्या आमच्या लेकी-सुना फिरत असतात. बाईंच्या आठवणी असतात; परंतु बाई आणि भाऊ यांच्या आठवणी सदैव असणार्या घरामध्ये मी आहे. त्या घरामध्ये बाई गेल्यानंतर सहज दलुभाऊ मला म्हटले, की आता याचे काय करायचे. बोलणे शक्य नव्हते; पण मी दोन-तीन ओळी ज्या मांडलेल्या होत्या, त्या बाईंच्या खोलीत ठळक मोठ्या अक्षरात दिसतात. " मी निघाले ईश्वराच्या देवळाशी तरीही भाऊ प्राण तुमच्या पावलांशी !"

ना.धो.महानोर
रवींद्र नाट्यमंदीर
मुंबई.

या वरील ग्रंथाविषयी विविध मान्यवरांची जी भाषणे झाली ती इथे दिलेली आहेत. यामध्ये डॉ विजया राज्याध्यक्ष तसेच श्री भालचंद्र नेमाडे इत्यांदीची भाषणे ही यात आहेत. पुढेमागे एक एक करुन ती येथे लिहिण्याचा यथाशक्ति प्रयत्न करतो.

http://www.bhavarlaljain.in/eBook/007_Tee_Ani_Mee_Pratisad/Tee_Ani_Mee_…

त्याचप्रमाणे भाऊंच्या अर्थातच श्री भवरलालजी जैन यांच्या एकुण कर्तुत्वाच्या माहीतीसाठी हा खजिना एकवार जरुर बघावा.
शेवटी साहित्याचा उद्योग हा उद्योजकालाच समर्थपणे करता येतो.

ttp://www.bhavarlaljain.in/books.htm