भारत आणि ए०आय०
भारत आणि ए०आय०
===========
--राजीव उपाध्ये
आय०आय०टी० मुंबई चे सध्याचे संचालक प्रा० शिरीष केदारे आणि मी आय० आय० आय० टी० त असताना चांगले "अरे-तुरे"तील मित्र होतो. आम्ही एकाच वयाचे, पण वेगवेगळ्या शाखा आणि हॉस्टेल. संस्कृतप्रेम आणि गिर्यारोहण हा तेव्हा आमच्या मधला समान दुवा होता. आमचे कधी वाद आणि भांडणे झाली नाहीत, तसेच त्यांच्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान पण झालेले नाही. त्यामुळे माझा त्यांच्यावर वैयक्तीक राग पण अजिबात नाही. उलट आपला मित्र आय०आय०टी० सारख्या जगप्रसिद्ध संस्थेचाचा संचालक झाला हे कळले तेव्हा अंगावर मूठभर मांसच चढले होते.
आज अचानक माझ्या या मित्राची एक मुलाखत [१] युट्युबवर बघितली आणि बरीच चिंता, अस्वस्थतता निर्माण झाली. त्यांच्या मुलाखतीमध्ये प्रा० केदारे यांना ए०आय०बद्दल काही प्रश्न विचारले गेले त्यासाठी मुलाखतीचा 25:30 मि० ते 28:00 मि० हा बघावा.
ते म्हणतात -
25:57The real things of AI yet to arrive according to me.
26:47 AI can only tell you about what
26:55 is known in a very systematic, comprehensive way. But it can't tell you
27:01 what the humankind doesn't know. And that is what innovation is, right?
हे ऐकल्यावर मनात प्रश्नांचे आणि विचारांचे मोहोळ उठले आहे. real things of AI म्हणजे प्रा० केदारे यांना काय अपेक्षित आहे? सध्याचा ए०आय० "पुरेसा रिअल" नाही असे सुचवायचे आहे काय?
पुढे ते म्हणतात, "ए०आय० फक्त जे अगोदरच माहित असलेले पद्धतशीर पणे सांगतो. पण तो मानवजातीला माहित नसलेल्या गोष्टी सांगू शकत नाही." पुढे ते आणखी एक धक्कादायक विधान करतात - "हीच कल्पकता (नवनिर्मिती) नव्हे काय?"
या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी तर ए०आय० निर्मित कलेचे उदा० योग्य ठरेल - आज ए०आय० मुळे आकार, रंग, प्रकाश यांच्या एकत्रीकरणामुळे जी अभिव्यक्ती साध्य झाली आहे ती मानवीकल्पनेतून जन्म घ्यायला किती वर्षे वाट बघावी लागली असती, याची कल्पना करता येत नाही. आज ए०आय० ची वेगवेगळ्या क्षेत्रात जी आगेकूच चालू आहे, त्याचा पहिला दणका प्रथम शेअरबाजाराला बसतो. युद्ध, संशोधन, आरोग्यसेवा आणि निदान अशा अनेक क्षेत्रात निर्विवादपणे पाय रोवूनही प्रा० केदारे यांना ए०आय० पुरेसा रिअल वाटत नसेल तर त्यांना अपेक्षित असलेला ए०आय० कोणता हे त्यांनी स्पष्ट करणे आवश्यक होते. शक्यता-शोधनाची ए०आय० ची अचाट क्षमता मानवाला माहित नसलेल्या वास्तवाचे दर्शन घडवते, याकडे प्रा० केदारे दुर्लक्ष का करतात, हे कळायला मार्ग नाही. दुसरी एक न टाळता येणारी गोष्ट ए०आय० तंत्रज्ञानाने चीनमध्ये परमोत्कर्ष गाठला आहे, याकडे पण प्रा० केदारे दुर्लक्ष करतात.
एक गमतीदार आठवण - चॅटजीपीटीने अवतार घेतल्यावर मला ए०आय०ला वेडेवाकडे प्रश्न विचारायची सवय लागली. एकदा मला घरी कुळथाचे पिठले बनवायची अनिवार इच्छा झाली. पण घरातली आमसुले संपल्यामुळे चिंच घालावी का असा विचार मनात डोकावला. पण ए०आय० ही समस्या कशी हाताळतो हे तपासायची इच्छा निर्माण झाली. मग मला चॅटजीपीटीने चिंच घालून कुळथाचे पिठले अत्यंत चविष्ट बनते असे सांगितले, तेव्हा मात्र मला स्वत:ला चिमटा काढावा लागला. कारण कुळथाच्या पिठल्यात चिंच घालतात हा निर्णय चॅटजीपीटीने कसा केला हे कोडे मला अजुनही सुटलेले नाही.
"हीच कल्पकता (नवनिर्मिती) नव्हे काय?" या प्रा० केदारे यांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
भारत ए०आय० तंत्रज्ञानाचा उपभोक्ता म्हणूनही मागे पडेल असे माझे ठाम मत बनले आहे, ते अशाच दृष्टीकोनामुळे...पण माझे ऐकणार कोण?
संदर्भ-
...
'चॅटजीपीटीने (चिंच घातलेले) कुळथाचे पिठले नक्की कधी चाखून बघितले? (की, (चॅटजीपीटीने) (नेहमीप्रमाणेच) दिले ठोकून?)' हा प्रश्न येथे अगदीच अस्थानी ठरावा काय?
(याला एक पळवाट अशी असू शकते, की चॅटजीपीटीला ट्रेनराने जे शिकविले, ते त्याने सांगितले. म्हणजे, या ठिकाणी, हे चॅटजीपीटीचे प्रतिपादन नसून (मानवी) ट्रेनराचे प्रतिपादन होय, नव्हे काय? (चॅटजीपीटीला चिंच घातलेले कुळथाचे पिठले फर्स्टहँड अनुभवण्याचा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याकारणाने? (चूभूद्याघ्या.))
परंतु मग याचाच अर्थ, चॅटजीपीटीच्या प्रस्तुत प्रतिपादनावर भरवसा ठेवून कुळथाचे पिठले चिंच घालून करण्याचा निर्णय (मग त्याचे अंतिम फलित बरेवाईट कसेही निघो, परंतु) 'आपल्या आयुष्याचे नियंत्रण दुसर्या कोणत्या तरी माणसाच्या (या ठिकाणी, चॅटजीपीटीच्या ट्रेनराच्या) हातात देण्या'तलाच प्रकार नव्हे काय?
मग यात आणि 'सनातन धर्मा'त नक्की फरक तो काय राहिला?
पण लक्षात कोण घेतो?)
असो चालायचेच.
चूक!
या संकेतस्थळाचे अद्याप संपूर्ण एआयीकरण झालेले नाही. मात्र, 'जणू काही एआयलाच वाहून घेतलेले संकेतस्थळ आहे, असा भास होतो', अशा अर्थाने, 'एआय-सी अक्षरे' हेच नाव संकेतस्थळाकरिता उचित आहे.
(एका मराठी संकेतस्थळाच्या नामकरणातील हिंदीचा हा प्रभाव चिंताजनक आहे खरा. पण लक्षात कोण घेतो?)
तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त…
तुम्हाला पडलेला प्रश्न रास्त आहे, पण प्रा. केदारे यांचा मुद्दा वेगळ्याच लेव्हलवर आहे.
ते सध्याच्या AI ला कमी लेखत आहेत असं वाटत नाही. त्याचं म्हणणं इतकंच की आजचा AI मुख्यतः आधीपासून उपलब्ध डेटावर आधारित आहे. तो त्या माहितीचं व्यवस्थित रसग्रहण ऊर्फ अर्क साठवणे असे करून पुढील शब्द, अक्षर, पिक्सेल किंवा आकडा, निर्णय प्रेडिक्ट करतो. हे सर्व आगोदर माहीत असलेल्या माहितीवरून काढलेले निष्कर्ष असतात. ती सर्व माहिती तुम्हाला आणि मला किंवा कोण्या एकट्या मनुष्याला एकत्रित माहीत नसल्याने आपल्याला ते निर्णय किंवा आऊटपुट खूपच आकर्षक वाटतात. आणि असतात देखील.
पण अद्याप AI पूर्णपणे नवीन, मानवाला अजिबात माहित नसलेलं ज्ञान स्वतःहून शोधत नाही. प्राध्यापक केदार यांच्या मते खरी नवनिर्मिती (innovation) तिथेच होते.
ए आय निर्मित चित्रं, कविता, गाणी, चॅट.. , मेडिकल फिल्डमधली कर्तबगारी, हे सगळं खूप इंप्रेसिव्ह आहे पण ते “intelligent use of existing knowledge” आहे, “discovery of unknown” नाही.
VL JEPA बद्दल वाचले नसेल तर अवश्य वाचा. व्हिजन लँग्वेज मॉडेल्स ही देखील अजून उपलब्ध माहितीवरच शिकतात पण तो त्या पुढच्या पायरीकडे जाण्याचा प्रयत्न आहे जिथे AI जग समजून घेऊन अंदाज बांधतो. फक्त पुढचे टेक्स्ट प्रेडिक्ट करण्या ऐवजी आऊटकम प्रेडिक्ट करतो.
पण अजूनही पूर्णपणे स्वतंत्र शोध (true discovery) करणारा AI तयार झालेला नाही.
म्हणून त्यांच्या “real AI yet to arrive” या विधानाचा अर्थ असा घेता येईल की हा पुढचा टप्पा अजून बाकी आहे.
कुळथाचे पिठले ..... >>"मला…
कुळथाचे पिठले .....
>>"मला चॅटजीपीटीने चिंच घालून कुळथाचे पिठले अत्यंत चविष्ट बनते असे सांगितले.">>
- बरं.
एआइ अंतिम उत्तर देतो यावर विश्वास ठेवल्यास बरोबर.
बाकी आडात नाही तर पोहऱ्यात कुठून? ही म्हण आठवली.