Skip to main content

देवपूजा

देवपूजा ही करावी की करु नये, हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याला कोणी वैज्ञानिक आधार देऊ लागले तर त्याचा प्रतिवाद करण्याची प्रत्येक विज्ञानप्रेमीला मुभा असावी. त्यातही कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता ही चर्चा नक्कीच करता येईल, असे वाटल्याने मी हे आपणासमोर मांडत आहे. मला खालील मेल आल्याबरोबर, सहजपणे जे मनांत आले ते लिहिले आहे. ते अर्थातच मूळ परिच्छेदाच्या खाली आहे.

देवपूजेमागचं शास्त्र

हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व त्याचे वैयक्तिक फायदेही आहेत. देवपूजे दरम्यान करण्यात येणार्‍या प्रत्येक क्रियेमागे शास्त्र असून त्यामुळे आपले शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य चांगले राहते, त्याबद्दल...
खालील लेख म टा च्या २३ मार्च २०१२ अंकात प्रसिद्ध झाला असून थिंक महाराष्ट्र मध्ये वरील लीडसह पुनर्मुद्रित करण्यात आला आहे.
त्यावर काही मल्लीनाथी करण्याची गरज आहे असे वाटत नाही!

http://www.thinkmaharashtra.com/lekhsuchi/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E…

या लेखातील काही खास भाग :

तिलक धारण करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे तो धारण करताना मध्यमेचा उपयोग करावा, असं शास्त्र सांगतं. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदनं प्रत्यक्ष हृदयाला जाऊन भिडतात. यामुळे दिवसभर मनात भक्तिभाव आणि शांती नांदते. यामुळे दिवसभर मनात भक्तिभाव आणि शांती नांदते. तिलक धारण करण्यापूवीर् काही वेळेला सर्वांगास भस्म लावण्याची पद्धत आहे. भस्मामध्ये दुर्गंधनाशक आणि मनाला उत्तेजक अशी संप्रेरक दव्य असतात. नियमित भस्म लेपण केल्यामुळे संधिवातासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्याचबरोबर अंगातील तेज आणि ओज यांचं जतन होतं. देवपूजा करताना पितांबरसारखं वस्त्र नेसण्याचा प्रघात आहे. यामध्ये रेशीम किंवा लोकरीचं वस्त्र अधिक लाभदायी ठरतं. कारण धामिर्क कार्याच्या वेळी मंत्रोच्चारातून निघणारी स्पंदनं आणि विद्युत लहरी त्वरीत अंगभर फिरवण्यासाठी अंगास घर्षण होणारी रेशमी किंवा लोकरी वस्त्रं अधिक उपयोगी पडतात.

ज्या आसनावर बसून माणूस बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास करून घेतो त्याची वैज्ञानिकता पूर्णपणे सिद्ध झालेली आहे. विद्युतप्रवाहाच्या असंक्रामक आणि संक्रामक वस्तंुच्या तत्वावर प्राचीन ऋषीमुनींनी आसनासाठी विविध वस्तंुची योजना करण्यास सांगितलेलं आहे. गायीच्या शेणाने सारवलेली जमीन, कुशासन, मृगाजिन, व्याघ्रजिन, लोकरीचं कापड इत्यादी वस्तू असंक्रामक आहेत. अशा आसनावर बसून देवपूजा अथवा साधना केल्यास पृथ्वीतील विद्युतप्रवाह शरीरावर कोणताही अनिष्ट परिणाम करू शकत नाही. तसंच पाथिर्व विद्युतप्रवाहापासून आपलं संरक्षण होतं. त्याचबरोबर या आसनांच्या विशिष्ट प्रवाहामुळे सत्वगुणाचा विकास होतो. अंगातील तमोगुण वृत्ती आपोआप नष्ट होते. तसंच या आसनांवर दीर्घकाळ साधना करणाऱ्या व्यक्तीला मूळव्याध, भगेन्द इत्यादी प्रकारचे रोग होत नाही. साधना करत असताना अंगात निर्माण होणारी अतिरिक्त उर्जा आणि उष्णता यांचं निचरा होणं आवश्यक आहे. आवश्यक नसलेली पृथ्वीमधली उष्णता आणि उर्जा आपल्या अंगात संक्रमित होऊ न देणं महत्त्वाचं आहे. यासाठी लाकडी पाट वापरणं निषिद्ध ठरतं. कारण लाकूड हे मंदसंक्रामक आहे आणि लाकडी पाट वापरल्यास उजेर्चा निचरा होत नाही. यासाठी लोकरीसारख्या आसनामुळे पृथ्वीची आंतरिक उष्णता, उर्जा यांचा आपल्याला उपदव होत नाही.
दररोजच्या पूजेत आरतीची सुरुवात शंखनादाने अवश्य करावी. शंखनादामुळे आदिभौतिक आणि आदिदैविक पीडा संभवत नाही. कानात दडे बसून बहिरेपण आलेल्या, मानसिक संतुलन बिघडून भ्रमिष्ट झालेल्या, कानात चित्र-विचित्र आवाज होणाऱ्या तसंच विविध बाधा असणाऱ्या व्यक्तींच्या कानात शंखनाद केल्यास त्या व्यक्तीची प्रकृती सुधारत जाते.
घंटानादातून ओंकाराची ध्वनी निमिर्ती होते. ध्वनीवर अलीकडे बरंच संशोधन चालू आहे. ज्या मातेच्या स्तनातून दूध येत नाही ते विशिष्ट परिणामांमुळे येऊ शकतं. जे रोपटं सहा महिन्यात फूल देतं ते रोपटं ध्वनिपरिणामामुळे दोन महिन्यात देऊ शकतं. पालेभाज्या, फळभाज्या यासुद्धा विशेष ध्वनीने प्रभावित होतात. घंटानादातून निर्माण होणाऱ्या ध्वनींमुळे २६ फूट परिघाच्या क्षेत्रात क्षयरोग, प्लेग, पटकी, विषमज्वराचे जंतू नष्ट होतात, असं १९१६ मध्ये जर्मनीतल्या बलिर्न विद्यापीठात संशोधन झालं आहे.

अरेरे, म्हणजे या सगळ्या फायद्यांना आपण विज्ञानप्रेमी, मुकतो आहोत. काही शंका:

तेज आणि ओज यातील फरक काय ?

पृथ्वीवर अशा तर्‍हेने वीज खेळत असली तर मग आपण जे अर्थिंग करतो ते चुकीचेच असले पाहिजे..

असंक्रामक व संक्रामक म्हणजे एसी व डीसी कारे भाऊ?

घंटेमधून मला कधी ओकारांत ध्वनी ऐकू आला नाहीये. ट्ण्ण अथवा टिंग असाच आवाज ऐकू येतो.

शंखाच्या आवाजाने बहिरा बरा होतो हे मस्तच! कारण देवासमोर जास्तीतजास्त आवाज करुन, त्याचे लक्ष आपल्याकडे वळवताना साईड इफेक्ट म्हणून कोंणीही बहिरा होणारच. पण प्रत्येक वेळेला शंख वाजवल्यामुळे तो पुन्हा पहिल्यासारखा होणार!

भस्माची रेसिपी काय? की स्मशानातलेही चालते ?

ज्या व्यक्तीला वश करुन घ्यायचे असेल त्याच्या/तिच्या कपाळावर मध्यमा टेकवली तर हृदयाशी संपर्क करता आल्यामुळे वशीकरण साध्य होते का ?

आवश्यक नसलेली उर्जा पृथ्वीवर संक्रमित करण्यासाठी, झोपून पूजा केली तर जास्त सरफेस एरिया नाही का मिळणार ? जमिनीत मानेपर्यंत गाडून घेतले तर जास्त परिणामकारक ठरेल बहुतेक!

विज्ञान नांवाच्या वांड गाईला, अध्यात्माच्या गोठ्यात बांधायची कल्पना कशी वाटते?

साती Fri, 10/08/2012 - 18:31

In reply to by तिरशिंगराव

हल्ली मी महाराष्ट्रात आल्यावरही मटा वाचत नाही. त्यापेक्षा संध्यानंद बरा. गेला बाजार लोकल रत्नागिरी टाईम्स पण भारी आहे. :)
तुम्ही पण वाचू नका. नेटवर तर अज्जिबातच वाचू नका.

साती Fri, 10/08/2012 - 18:27

श्रामोनी आधीच णंबर लावला! :)
आमीबी तेच लिवणार होतो.
(बाकी तो धागा ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट मेल आय डी होता का हो, एकाही फिमेल आयडीचा प्रतिसाद नव्हता.
आम्ही का दिला नाही विचारू नका , आम्ही बघेपर्यंत धागा गार झाला होता. )

लेखक , तुम्ही सनातन प्रभातच्या सायटीवर जा विज्ञानाच्या गाईंचा डेरी फार्म आहे.

बाकी लोकर नेमकी संवाहक की दुर्वाहक? दोन परिच्छेदात दोन वेगळी मते लिहिलीयत म्हणून कंफ्यूजन.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/08/2012 - 20:56

बाकी लोकर नेमकी संवाहक की दुर्वाहक? दोन परिच्छेदात दोन वेगळी मते लिहिलीयत म्हणून कंफ्यूजन.

लोकर दुर्वाहकच. उष्णता आणि वीज दोन्हीची. (थंड ठिकाणी घरांच्या भिंतींमधे विशिष्ट प्रकारची लोकर वापरतात ती उष्णतेची दुर्वाहक असते म्हणून.)
वीजेची दुर्वाहक असल्यामुळे स्टॅटीक चार्जेस लोकरीत अधिक अडकतात. थंडीच्या काळात, कोरडी हवा असताना लोकरही 'वाजते'. फार थंड आणि कोरड्या भागात जाऊन रहावं लागणं हे दुर्दैव आहे; कुठेही हात लावावं तर शॉक बसतो. कारचं दार बंद करताना स्टॅटीक चार्जेसमुळे शॉक, घराचं दार उघडताना शॉक, पुढची दर्दभरी वर्णनं करत नाही. ;-)
असो. तर त्यामुळे शक्यतोवर सुज्ञ मनुष्याने कोरड्या हवेत लोकर, रेशीम वापरणं टाळावं आणि सुती, होजिअरीचे कपडे वापरावेत. फार थंडी असेल तर आतून असे कपडे घालून वर लोकर, रेशीम वापरलं तर त्रास कमी होतो.

असे लेख वाचायला मला फार्फार आवडतं. मासोकिझम नव्हे, कच्चा माल मिळतो. त्यामुळे तिरशिंगरावांचे आभार.

............सा… Sat, 11/08/2012 - 02:38

तेज म्हणजे "रौनक/चमक" असावा तर ओज म्हणजे वीरश्री/उत्साह असावा. ओजयुक्त अथवा ओजस्वी वाणी असा वाक्प्रचार ऐकीवात आहे.

बाकी लेख भारी आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घालणारा आणि चूकीच्या समजूती पसरविणारा आहे याबद्दल दुमत नाही.

भडकमकर मास्तर Sat, 11/08/2012 - 07:52

लेख वाचला .... इतकं गोलगोल गोल गोल लिहिणं स्किलचं काम आहे....
असे लेखन करणे सोपे करण्यासाठी एखादी टेम्प्लेट बनवावीशी वाटते...

प्रॉब्लेम - अ‍ॅक्शन - फायदा -- कारणमीमांसा
१. दातदुखी --- ( उदाहरणार्थ) शीर्षासन - दातदुखी गायब - पूर्वजांचे रेकमेंडेशन असे आहे कारण शीर्षसनाने रक्ताभिसरण दातांच्या सर्व मुळांकडे होते

... रक्ताभिसरण, ऑक्सिजनचा पुरवठा, फारतर पेशींचे आरोग्य सुधारते,एन्डॉर्फिन- हॉर्मोन्स वगैरे योग्य प्रमाणात शरीरभर पसरतात वगैरे वगैरे

२. हेल्सिन्की विद्यापीठात केलेल्या संशोधनानुसार हातावर मारलेल्या छड्यांमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती सुधारते... आपले पूर्वज किती हुशार होते,रोज विद्यार्थ्यांना छड्या हाणत असत... वगैरे

३.विशिष्ट शेकोटीवर तापवलेल्या पाण्याने आंघोळ केली असता हे हे त्वचारोग बरे होतात, असे स्टॉकहोम विद्यापीठात १९५२ साली केलेल्या संशोधनाने दिसून आलेले आहे..

आता अधिक उदाहरणे घासकडवी देतील

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/08/2012 - 23:51

In reply to by भडकमकर मास्तर

एकूण टेंप्लेट आवडलं पण ...

विशिष्ट शेकोटीवर तापवलेल्या पाण्याने आंघोळ केली असता हे हे त्वचारोग बरे होतात, असे स्टॉकहोम विद्यापीठात १९५२ साली केलेल्या संशोधनाने दिसून आलेले आहे..

हे विशेष आवडलं.

राजेश घासकडवी Sun, 12/08/2012 - 04:51

In reply to by भडकमकर मास्तर

टेंप्लेट लिहायची आयड्या मस्त आहे. भडकमकर मास्तरांचे 'झटपट काय हवं ते बनण्याचे क्लासेस' मध्ये बालाजी तांबे टाइप लेखन कसं करावं याचाही अभ्यासक्रम सुरू करावा ही विनंती.

प्रॉब्लेम - अ‍ॅक्शन - फायदा -- कारणमीमांसा

हे थोडं उफराटं चक्र वाटतं. सुरूवात एखाद्या रूढीपासून करायची. मग तिच्यातून कुठचा प्रॉब्लेम सुटतो याची कारणमीमांसा तयार करायची. त्यासाठी कुठचीही ऐकीवातली माहिती पुरावा म्हणून सादर करायची आणि मग समारोप 'आपल्या पूर्वजांनी कसं सगळं ठाऊक होतं. विज्ञानाला जे आज कळतं आहे ते....' वगैरेवगैरेसारख्या विधानांनी करायची.

त्यात आणखीन काही पाळण्याच्या गोष्टी
- आपली संस्कृती (म्हणजे जे काही आहे ते) हजारो वर्षं जुनी आहे हे ठासून सांगायचं. दोन हजार किंवा तीन हजार म्हटलं तर ते कमी वाटतं. हजारो हा त्याच अर्थाचा शब्द मात्र 'किमान आठ दहा हजार' असं सूचित करतो.
- आपण लेखक म्हणून त्या संस्कृतीच्या वयाचेच असल्यासारखं बोलायचं. म्हणजे शतका दोन शतकांपूर्वीपासूनच्या घटनांना 'आजकाल, आत्ताआत्ता, आताशीच' वगैरे शब्द वापरावे.
- विधानांना पुरावे वगैरे देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. खुशाल विधानं करायची. पुरावे देण्याची वगैरे पद्धत एके काळी होती आपल्याकडे म्हणे, पण गुरू आपली विद्या हात राखून शिष्याला देतो असं होत होत तो भाग केव्हाच गळून गेलेला आहे.

उदाहरणार्थ 'आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून बोटांच्या ठशांवरून राजयोग सांगण्याचा अभ्यास केला होता. मानवातले रजोमय, तेजमय गुण त्याच्या हातच्या कर्तृत्वाचं प्रतीक म्हणूनच त्याच्या हातावर आपला ठसा उमटवतात. सटवाईने लिहिलेल्या कपालरेषेप्रमाणेच हातावरच्या या रेषा मानवाचं भवितव्य अवगुंठित करतात. या ठशांतली गूढ लिपी ओळखण्याचं तंत्र आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वीच विकसित झालेलं होतं. पाश्चात्यांच्यात मात्र या शास्त्राचा विकास विकृतीचा अभ्यास करण्यापुरताच मर्यादित आहे. म्हणूनच आजकाल हाताच्या बोटाच्या ठशांवरून गुन्हेगार ओळखण्याची प्रथा सुरू झाली आहे. कुठे भविष्यातले साधूपुरुष, महात्मे, राजे ओळखणारी आपल्या प्राचीन संस्कृतीची परंपरा; तर कुठे भूतकाळातले क्रूरकर्मा ओळखण्याची कला. इतकं असूनही आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण का करतो हे कळत नाही.'

प्रकाश घाटपांडे Sat, 11/08/2012 - 10:15

चान चान लेख!
एके काळी मी साग्र संगीत पूजा करत असे. माझ्या सोवळ्याच्या चड्डीचा स्थिरविद्युतभाराने टक टक आवाज येत असे. थोडा मोठा झाल्यावर मी कद ही नेसत असे. सहाणेवर गंध उगाळून ते स्वतःस व देवास लावत असे. गंधाचा तो गार गार स्पर्श मला भुभ्यांच्या नाकाच्या गार गार स्पर्शासारखा अथवा बिअरच्या बाटलीच्या गारगार स्पर्शासारखा वाटतो. श्रावणीत मी गोमुत्रप्राशन तसेच पंचगव्य खात असे. बिअरची चव मला सुरुवातीला गोमूत्रासारखीच वाटत असे. असो........

नंदन Sun, 12/08/2012 - 00:38

कानाच्या वरच्या भागात एक 'नस' असते. ती जलनिस्सारणाला मदत करते म्हणून त्यावेळी जानवं कानाला अडकावण्याची परंपरा चालत आलेली आहे; हा 'कान'मंत्र देणार्‍या उज्ज्वल सत्यान्वेषी परंपरेने इतकी प्रगती केलेली पाहून कुठल्याही मध्यमेशिवाय ह्या लेखातली ओजस्वी स्पंदनं हृदयाला जाऊन भिडली.

हे ज्ञान बौद्ध भिख्खूंनी थेट जपानपर्यंत नेले, ह्याचा पुरावा येथे पाहता येईल. आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या ज्ञानाच्या जोरावरच चीन, हाँगकाँग(!), शांघाय(!), जपान, साऊथ कोरिया ह्या देशातील लोकांनी इतकी प्रगती साधली आहे. अमेरिकेतल्या आस्तिन विद्यापीठात अनेक पूर्वाश्रमीचे नास्तिक ह्या तंत्राचा अभ्यास करत आहेत. भारतीयांना ह्या ज्ञानाच्या ठेव्याची महती ज्या दिवशी कळेल, तोच सुदिन! जय बालाजी!!

खवचट खान Sun, 12/08/2012 - 02:21

>>>तिलक धारण करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे तो धारण करताना मध्यमेचा उपयोग करावा, असं शास्त्र सांगतं. मध्यमेचा संबंध हृदयाशी असल्यामुळे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदनं प्रत्यक्ष हृदयाला जाऊन भिडतात. यामुळे दिवसभर मनात भक्तिभाव आणि शांती नांदते.

मध्यमेतून निघणार्‍या विद्युत्प्रवाहात हृदयस्पर्शी सामर्थ्य असते ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, रोज ड्रायव्हिंग करताना, आपल्या पुढेमागे असलेल्या आणि फारच उत्तेजित अवस्थेत वाहनसारथ्य करणारया फारहॉर्नी(१) वाहनचालकांना मध्यमा दाखविल्यास त्यांच्या हृदयात तत्काळ भक्तिभाव आणि शांती यांचा वास होऊन ते निमूटपणे मार्गक्रमणा करू लागतात हा माझा स्वत:चा नित्यानुभव आहे.

(१) - हा शब्द येथून साभार

मेघना भुस्कुटे Fri, 18/07/2014 - 17:28

In reply to by खवचट खान

अजून एक उदाहरण: दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. 'इसी उंगली में अंगूठी क्यूं पेहनी जाती है? 'क्यूं की इस उंगली का तार सीधे दिल तक जाता है|'

यावरूनच आपल्या पूर्वजांची अक्कल सिद्ध होते.

बॅटमॅन Fri, 18/07/2014 - 17:33

In reply to by मेघना भुस्कुटे

हा शोध पाश्चिमात्यांनी लावला असण्याची जास्त शक्यता आहे. तस्मात अक्कल सिद्ध झालीच, तर पाश्चिमात्यांच्या पूर्वजांची होईल. जे जे प्रातीच्य ते ते उत्तम या न्यायाने ते बॉलिवुडी जन्तेने उचलले, तर त्यांच्यापेक्षाही पाश्चिमात्यांस क्रेडिट देणे जास्त महत्त्वाचें आहें, कसें?

मेघना भुस्कुटे Fri, 18/07/2014 - 17:35

In reply to by बॅटमॅन

का? हे बॉलिवुड ही अस्सल देशी कला नाही या बॅटमनच्या औद्धत्यपूर्ण वक्तव्याचा मी एक हिंदी चित्रपटांची चाहती म्हणून निषेध करते.

बॅटमॅन Fri, 18/07/2014 - 17:37

In reply to by मेघना भुस्कुटे

बॉलिवुड ही देशी कला असली तरी इसेन्शिअली प्रातीच्यानुकरणातून बनलेली आहे. तस्मात अनेक प्रातीच्य गोष्टींचे श्रेय देणे आवश्यकच आहे. जरी पुढे त्याचा वटवृक्ष देशी बनला असला तरी.

(जसे: पंचसिद्धांतांत २ परकीय सिद्धांत आहेत- पौलिशसिद्धांत आणि रोमकसिद्धांत-तसेच).

मेघना भुस्कुटे Fri, 18/07/2014 - 17:59

In reply to by बॅटमॅन

बॉलिवुडने केवळ तंत्र प्रातीच्यानुकरणाच्या माध्यमातून उचलले आहे. त्यातून व्यक्त केला जाणारा आशय अस्सल देशी तुपातला आहे (आठवा: राजा हरिश्चंद्र). तदुपरी (येस्स्स!) केवळ तंत्राच्या उसनवारीकरता एका आर्य कलेला परकीयांच्या संस्कृतीच्या दरबारातली बटीक बनविण्याचा हा प्रयत्न रोचक वाटतो.

बॅटमॅन Fri, 18/07/2014 - 18:11

In reply to by मेघना भुस्कुटे

मुळात 'अस्सल देशी तुपातला' या शब्दसमुच्चयात 'अस्सल' हा शब्दच देशी नाही याची आठवण करून देऊ इच्छितो. तद्वतच प्राच्य वाटत असले तरी कैक संकेत आशयानुसारी प्रातीच्यानुकरण केल्यामुळे तिकडचे इकडे आलेले आहेत. तस्मात हा संस्कृतिरक्षकाच्या साच्यातील, तद्दन उजव्या विचारसरणीतून आलेला प्रतिसाद अजूनच रोचक वाटला.

याबद्दलचा विकी दुवा पाहणंही उद्बोधक ठरावं.

http://en.wikipedia.org/wiki/Ring_finger

बॅटमॅन Fri, 18/07/2014 - 19:35

In reply to by मिहिर

पाश्चिमात्य.

प्राच्यवाची प्रतीची च तुर्योदीची तथैव च |
दिशश्चतस्रः प्रमुखा: वन्दन्ते धार्मिका: जना: ||

(संख्या दश निबोधत- इयत्ता दहावी, संस्कृत संपूर्ण.)

प्राची-पूर्व, अवाची-दक्षिण, प्रतीची-पश्चिम, उदीची-उत्तर.

अरविंद कोल्हटकर Fri, 18/07/2014 - 19:12

येथील सर्व विज्ञानान्धांनी अध्यात्म म्हणजे काय ह्याची सम्यक् जाणीव होण्यासाठी http://www.sanatan.org/ हे संस्थळ अवश्य पहावे. तसेच सुयोग्य आणि निकोप समाजधारणेसाठी अपर्णा रामतीर्थकर ह्यांच्या विचारांचे मनन करावे असे मी सुचवितो.

अजो१२३ Mon, 28/07/2014 - 16:25

धर्मामधे काय चूका आहेत ते सांगणे सोपे असते. शिवाय तो प्रत्येकाचा अधिकार असतो.
धर्म म्हणून, त्याच्या नावाने, काय सांगावे हे ही प्रत्येकजण आपलाच अधिकार समजतो.
मग धर्माचे प्रातिनिधिक तत्त्वज्ञान काय हे पाहायचे सोडून कोणीही काहीही म्हणाला कि तोच धर्म मानून धर्मावर टिका करायची.
सांप्रतकालीन व्यवस्थांत एकूण किती मूर्खपणा सामावला आहे नि तुलनेत धर्मास अभिप्रेत असलेला मूर्खपणा किती उपद्रवहिन आहे हे कळायला कोणता दिवस उगवावा लागेल?
-------------------------------
देवपूजेबद्दल सबब महाभागाने जे लिहिले आहे ते तिच्याबद्दलचे पारंपारिक ज्ञान , तत्त्वज्ञान, प्रथा, इ इ मधे येते काय?
हे खेचलेले संबंध सर्वसाधारण लोकांस अभिप्रेत असतात का?
--------------------------------
ईश्वराची पूजा प्रार्थना वेगळी नि या महाशयांनी जोडलेले संबंध वेगळे असे सुचित करणारी एकही प्रतिक्रिया नको?