Skip to main content

नाना परीच्या निकडी । खेळ मांडियेला ॥

3 minutes

पूर्वप्रकाशित

ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते?

एक मिनिट. या सगळ्या प्रकारात आत्मसमर्थन का काय ते होणार. पण शक्यतोवर ते टाळून थोडं लांब जाऊन पाहायचा प्रयत्न आहे. शक्य तितका प्रामाणिक.

तर, ही जी चिडचिड होते, ती कशामुळे होते? आपल्याला हव्या तशा गोष्टी आजूबाजूला नसल्या की चिडचिड होते. हव्या तशा म्हणजे? हव्या तशा गोष्टी म्हणजे स्पेस. म्हणजे काय? आपल्याला एकट्याला निवांत जागा?

नाही, फक्त तितकंच नव्हे. आपल्याला हवं ते, हवं त्याला, हव्या त्या पद्धतीत, हवं तेव्हा बोलण्याचं - जास्त नेमकेपणानं सांगायचं तर, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. म्हणजे स्पेस. तर ही स्पेस आपल्याला कुणालाच मिळत नाही आहे. आणि हा फक्त जागा - कमी किंवा अधिक जागा - हा प्रश्न नाही. त्याच्यापलीकडचं काहीतरी आहे.

वर्तुळाच्या परीघामधेच दुसर्‍या वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला आणि ते दुसरं वर्तुळ पुरं केलं तर काय होतं? परीघ एकमेकांमधे शिरतात. असं एकदा केलं तर ओव्हरलॅपिंग प्लेन तयार होतं.

पण असंच वारंवार अनेकवार परत परत परत केलं तर? तर केऑस तयार होतो.

सध्या आपण केऑसमधे राहतो आहोत. गोंधळ होणं साहजिक आहे.

कुठलं वर्तुळ आधी काढलेलं, कुठलं नंतर काढलेलं, कुठलं ठळक, कुठलं पुसट, कुठलं मोठं, कुठलं लहान - हे सगळे प्रश्न इथे गैरलागू आहेत. जिवंत गरगरती वर्तुळं आहेत. ओव्हरलॅपिंग आहेत. केऑस आहे. चिडचिड आहे.

या सगळ्याला पर्याय नाही.

तर आपण हे मुकाट स्वीकारू या.

आता हे स्वीकारूया बीकारूया प्रकरण कागदावर ठीक आहे.पण ते जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात नाकापाशी होत असतं, चार-दोन धक्के लागत असतात, पाणी अंगावर उडत असतं - तेव्हा काही झक मारायला स्वीकारूया वगैरे आठवत नाही. देधडक बेधडक पद्धतीनं आपण - म्हणजे मी - तोंड सोडून मोकळे होत असतो. मी तरी असंच डील करत आलेली आहे. कधी मी कुणाच्या अंगावर वसकन ओरडते, कधी समोरचा घुम्म बसून राहतो. चालायचंच. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. एकदा माणूस आपला म्हटला, की असल्या दोन दिल्या-घेतल्याची चिंता करून भागत नाही. त्याच्या - आणि माझ्याही - इमोशनल आउटबर्स्ट्समधे आमची दोघांचीही एनर्जी भरपूर खर्च होत असते. त्यातून डोक्यावर डोकी आपटतात. त्यातून कधीकधी नाही त्या गुंतागुंती होतात, नाही असं नाही. पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.

ही संधी असते. धोकाही. माणूस कायमचा आपला/परका होत जाण्याची/चा. व्हाइस व्हर्सा.

तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच.

नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या.

स्वीकारलं की नीट मनापासून खेळता येईल. एकदा खेळच म्हटला, की शांतता कोर्ट चालू आहे स्टाईलमधे आपलं आयुष्य वेगळं आणि खेळ वेगळा या पद्धतीत नीट एन्जॉय करता येईल. स्पेस मिळेल - न मिळेल - पण तिचा आभास तरी निर्माण होईल. कुठलं तरी वर्तुळ पुसता येईल. कुठलं तरी विस्तारता येईल. आपापल्या सिस्टीममधला केऑस नीट मनासारखा एकमेकांच्या अंगावर सोडता येईल. परिणाम काय व्हायचे ते होवोत. काही बंध घट्ट होतील. काही कापले जातील.

आतून दाटलेले आपण रिते - मुक्त होऊ. कदाचित थोडे थोडे एकमेकांना भरूनही देऊ.

तर निकाल काय असायचा तो असो. खेळणं आवश्यक आहे. हे तरी आपण स्वीकारू या.

स्वीकारू या?

Node read time
3 minutes

मेघना भुस्कुटे Wed, 24/12/2014 - 18:37

In reply to by प्रथमेश नामजोशी

ही दाद आहे की टोमणा?! मला 'बाकी शून्य' हे अजिबात न आवडलेलं पुस्तक आहे, म्हणून विचारतेय!

अंतराआनंद Wed, 24/12/2014 - 05:30

खरयं गं. चिड्चिड होतेच. स्वतःवर सुद्धा. पण ती खेळ म्हणून नाही ब्वा स्वीकारता येत. मी तर चारवेळा गप्प बसते पाचव्यांदा आधीच्ंही राहिलेलं बोलून घेते. समोरचा समंजस असेल तर ठीकाय नाहीतर ...हो! पण जानी दोस्त आणि दुश्मनही याच प्रोसेस मधून मिळतात हे खरय. :)

मेघना भुस्कुटे Wed, 24/12/2014 - 18:39

In reply to by अंतराआनंद

'शांतता कोर्ट चालू आहे स्टाईल' असं जे मी म्हटलं आहे, त्यातून मला खवचटपणे तेच म्हणायचं आहे. कितीही 'खेळ' म्हटलं, तरी त्याचे परिणाम आपल्यावर आणि समोरच्यावर होतच असतात. नि तरीही 'खेळ' असं त्याला संबोधून शक्यतोवर नामानिराळं राहण्याची मुभा म्हटलं तर घेता येतेच.

ऋषिकेश Wed, 24/12/2014 - 09:33

मी काठावरचा आहे असे म्हणता म्हणता कधी रिंगणात येऊन पडलो कळलेही नाही.
हा खेळ जितका थकवणारा आहे, तितकाच त्यातून मिळणारे स्नेही त्याच थकव्यावरचे उत्तरही आहेत.

लेखन आवडले

इरसाल म्हमईकर Wed, 24/12/2014 - 10:49

आम्हा मुंबईकरांना याची रोजची सवय असते. रोज सकाळी ७.११ ची सी.एस.टी. फास्ट पकडली की याची सुरूवात असते. इथे प्रत्येकाचं एक स्वतंत्र वर्तुळ असतं. पण ही वर्तुळ कधी जाणीवपूर्वक तर कधी अपरिहार्यपणे एकमेकाला छेदत राहतात. ती नओ असली तरी टाळता येत नाही. कारण डोळे, कान यांसारखी बाह्य इंद्रिये बंद करता येतात. पण मन... , त्याचं काय?
मग या वर्तुळांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी आपलं स्वत्;चं एक वर्तुळ तयार करायचं. त्यासाठी कधी मग मोबाईलमध्ये असलेला तलत, तर कधी बॅगेतल्या दुर्गाबाईंना कामाला जुंपायचं. बाहेरची वर्तुळे वारंवार येवून आदळत राहतातच , पण त्यांचा प्रभाव मात्र निश्चितच कमी होतो. :)

मेघना भुस्कुटे Wed, 24/12/2014 - 18:42

In reply to by इरसाल म्हमईकर

हं, हे इंट्रेष्टिंग आहे. पण स्वतः तयार केलेल्या वर्तुळातही इतर लोक असतातच की. कधी जगाच्या दुसर्‍या टोकाला असलेला व्हॉट्सअ‍ॅपवर बोलणारा मित्र, कधी गोष्टीतून आपल्याशी बोलणारा लेखक. कधी हे लोक एकतर्फी संवाद साधत असतात, कधी दुहेरी. कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. पण स्वतःखेरीज इतर लोक असतातच. ते ज्ञानोबाला जमलं असेल फार तर, आपल्याला कुठून जमायला?!

इरसाल म्हमईकर Wed, 24/12/2014 - 19:19

In reply to by मेघना भुस्कुटे

अगदी, अगदी ! ती कमलदलाची अलिप्तता कमलदलालाच जमावी. फक्त त्या स्पंदनांचा (ही स्पंदने सनातनवाल्यांची किंवा सहजयोग वाल्यांची नव्हेत बर्का ;) ) प्रभाव जरा कमी होतो एवढे मात्र खरे. :)

वामा१००-वाचनमा… Sun, 04/01/2015 - 23:33

In reply to by इरसाल म्हमईकर

ही पहील्यांदा बहुतेक (नॉट शुअर) ऐसीवरच वाचली. बहुतेक मुसुंनी ही कविता उधृत केली होती.

In the women's compartment of a Bombay local
we seek no personal epiphanies.
Like metal licked by relentless acetylene
we are welded - dreams, disasters, germs destinies,
flesh and organza,odours and ovaries
a thousand-limbed million-tongued,
multi-spousd Kali on wheels.
When I descendI could chooseto dice carrots or a lover
I postpone the latter. - Arundhati Swaminathan

वामा१००-वाचनमा… Sat, 03/01/2015 - 00:21

तर माणसं कितीही बदलली, नवीन असली, तरी या प्रोसेसला काही शॉर्टकट नाही. त्याची काही ग्यारण्टीही नाही. हे असं असं खेळूनच पाहावं लागतं. पाहावंच लागतं. पाहावं लागतंच.
नाहीतर मग बसा मुकाट रिंगणाबाहेर. तर आपण हेही - मुकाट जरी नाही, तरी - स्वीकारू या.

काल याच संदर्भातील एक सुंदर वाक्य वाचनात आलं.

I know thy works & you are neither cold nor hot:I would thou wert cold or hot.So then because yo are lukewarm, and neither cold nor hot, I will spew thee out of my mouth.

अर्थात तू जर उकळती/ता गरम किंवा थंडगार असतीस/असतास तरी मला आवडली/ला असतीस/असतास. पण तू आहेस कोमट अन म्हणून मी तुचा चूळ टाकल्यासारखा त्याग करतो/ते.
____
मेघना, "एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते." हे नक्की केव्हा मिळतात याबद्दल मीही खूप विचार केलेला आहे. कारण अर्थात आत्म्याच्या दोस्तांमध्ये असलेला रस :)

पण काही उदाहरणानंतर मी फक्त या निष्कर्षाप्रत आले आहे की काहीतरी ऋणानुबंध असतील अन हिशेबाची फिट्टंफाट राहीली असेल (चांगल्या अथवा वाईट अर्थाने) तरच असे जानी दोस्त किंवा दुष्मन आयुष्यात येतात. अन आपल्या हातात एवढेच असते की ती फिट्टंफाट पूर्ण होईतो दोस्तांचे सौख्य उपभोगणे किंवा दुष्मनांना सहन करणे :)

पावसानं आपणहून यावं
असं खरं तर काय केलंय आपण?
काही करु शकतो का तरी?
आपण आपले त्याच्या येण्याचे साक्षी...
याहून काहीच नाही हाती.

मेघना भुस्कुटे Mon, 05/01/2015 - 15:32

In reply to by वामा१००-वाचनमा…

काहीतरी ऋणानुबंध असतील अन हिशेबाची फिट्टंफाट राहीली असेल (चांगल्या अथवा वाईट अर्थाने) तरच असे जानी दोस्त किंवा दुष्मन आयुष्यात येतात. अन आपल्या हातात एवढेच असते की ती फिट्टंफाट पूर्ण होईतो दोस्तांचे सौख्य उपभोगणे किंवा दुष्मनांना सहन करणे...

असं नियतीवादी नाही होता येत मला, स्वारी! टू इच हर ओन. :)

राही Mon, 05/01/2015 - 23:30

In reply to by मेघना भुस्कुटे

तर निकाल काय असायचा तो असो. खेळणं आवश्यक आहे. हे तरी आपण स्वीकारू या.

हे तर चक्क 'कर्मण्येवाधिकारस्ते'!

अनु राव Mon, 05/01/2015 - 12:35

आपला म्हटला, की असल्या दोन दिल्या-घेतल्याची चिंता करून भागत नाही. त्याच्या - आणि माझ्याही - इमोशनल आउटबर्स्ट्समधे आमची दोघांचीही एनर्जी भरपूर खर्च होत असते. त्यातून डोक्यावर डोकी आपटतात. त्यातून कधीकधी नाही त्या गुंतागुंती होतात, नाही असं नाही. पण एकदम आत्म्याचे दोस्त का काय म्हणतात ते - किंवा दुश्मनही - असल्याच एन्काउण्टर्समधून मिळण्याच्या शक्यतेची शक्यता असते.

"आपला" म्हणालात पण त्या आपल्याचे वर्तुळ/ स्पेस तुमच्या लक्षात अजुन येत नाहीये? दुसर्‍याची स्पेस स्वीकारली की वर्तुळे पण ओवरलॅप होत नाहीत आणि डोक्यावर डोकी पण आपटत नाहीत.

मेघना भुस्कुटे Mon, 05/01/2015 - 15:31

In reply to by अनु राव

ओव्हरलॅपिंग झाल्याशिवाय दोस्त कुठले नि दुश्मन कुठले? म्हणून तर चिडचिड झाली, तरी ती वर्थ आहे. :)

अजो१२३ Mon, 05/01/2015 - 15:22

परंपरागत मिळालेल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा अव्हेर केला कि सारी समीकरणे नव्याने मांडावी लागतात आणि सोडवावी लागतात. तितकी क्षमता प्रत्येकाची नसते. मग चिडचिड होते. आता परंपरांच्या अगिकाराने मिळणार्‍या सुखापेक्षा प्रश्नांचा झमेला सांभाळणे अधिक सुखकर आहे असे मानणारे अलिकडे जास्त निघत आहेत.

अनुप ढेरे Mon, 05/01/2015 - 15:28

In reply to by अजो१२३

विचार रोचक आहे. कधी फष्ट प्रिंसिपल वापरून चाक पुन्हा शोधायचे आणि कधी दुसर्‍याने सांगितलेल्यावर विश्वास ठेवायचा हा डायलेमा असतो खरा.

वामा१००-वाचनमा… Mon, 05/01/2015 - 20:04

In reply to by अनुप ढेरे

कधी फष्ट प्रिंसिपल वापरून चाक पुन्हा शोधायचे आणि कधी दुसर्‍याने सांगितलेल्यावर विश्वास ठेवायचा हा डायलेमा असतो खरा.

छोड कर वहम ओ गुमां हुस्न-ए-यकीं (विश्वासाचे सौंदर्य) तक पहुंचो,
पर यकीं से भी कभी वहम ओ गुमां तक आओ|

इसी दुनियामे तुम्हे दिखा दे जन्नत की बहार,
शेख जी तुम भी कूं-ए-बुतां (street of idols) तक आओ|

अजो१२३ Mon, 05/01/2015 - 17:21

In reply to by बॅटमॅन

ऐसी आहेच दोन वर्षापासून. एकतर लोकांचं व्यक्तिमत्व किंवा विचारसरणी बदलत नाही आणि इतक्या लवकर बदलत नाही. आपण सर्वांनी सर्व विषयांवर आपापले विचार मांडून झाले आहेत. म्हणून सो प्रेडिक्टेबल सो प्रेडिक्टेबल होणारच.
शिवाय शहरी लोक लै आखडू असतात. आतले रंग ते दाखवत नाहीत. फॉर्मल फोरमवर तर नाहीच नाही. तेव्हा हेच सप्पक वरण गिळत बसायला लागणार.

बॅटमॅन Mon, 05/01/2015 - 17:30

In reply to by अजो१२३

शिवाय शहरी लोक लै आखडू असतात. आतले रंग ते दाखवत नाहीत.

अजो, शहरी लोकांना शिव्या घातल्याशिवाय तुम्हांला सप्पक इ. वरण गिळवत नाही का?

अजो१२३ Mon, 05/01/2015 - 18:23

In reply to by बॅटमॅन

तू एवढा मनाला का लावून घेतो? लोक ग्राम्यतेला कित्ती खालच्या प्रतीची आणि शिव्या घालण्यालायक सर्रास समजतात. मला आणि सार्‍या गावकरी लोकांना असे घालून पाडून बोललेले ऐकायची, हीन मानले जायची, इ इ सवय असताना ती सवय मी चार शहरी लोकांना (योग्य त्या संदर्भात ) लावली तर चूक काय त्यात?

बॅटमॅन Mon, 05/01/2015 - 18:25

In reply to by अजो१२३

चूक बरोबर सोडून द्या हो. प्रश्न तुम्हांला विचारतोय. ते सप्पक इ. वरण शहरी लोकांना चार श्या घातल्याखेरीज गोड लागत नै का ;) नसेल तर नै म्हणून सांगा, शिंपळ!

अजो१२३ Mon, 05/01/2015 - 18:37

In reply to by बॅटमॅन

अर्थातच.
---------------
ग्रामीण लोक जितक्या सन्मानाने शहरी लोकांचा उल्लेख करतात (अनेकदा लायकी नसताना) तस्साच उल्लेख ग्रामीणांचा व्हायला हवा. त्यात उपमर्दाची हवा नेहमी जाणवत राहते म्हणून शहरी लोकांना चार शिव्या घातल्याशिवाय मला करमत नाही.

बॅटमॅन Mon, 05/01/2015 - 18:42

In reply to by अजो१२३

ग्रामीण लोक जितक्या सन्मानाने शहरी लोकांचा उल्लेख करतात

नक्की का? तुमच्या लिखाणातून तरी कधी जाणवत नाही म्हणून विचारले.

अजो१२३ Mon, 05/01/2015 - 18:56

In reply to by बॅटमॅन

इथे ग्रामीण लोक नाहीत. घासकडवी जसे एकटेच "जागतिक सांख्यिकीय चळवळ" चालवत असतात तसा मी बिचारा एकटाच अशा बर्‍याच चळवळी चालवत असतो.

अजो१२३ Mon, 05/01/2015 - 19:03

In reply to by अनुप ढेरे

ग्रामीणता वा नागरता ही एक मानसिकता आहे. प्रत्यक्ष वास्तव्याचा संबंध कमी आहे. पुण्यातून नागपूरला बसने जाताना रस्त्यात तुम्ही ग्रामीण असता का? भारतीय ग्रामीण मानसिकता नावाची एक विशिष्ट मानसिकता आहे आणि मी तिचा प्रचंड फॅन आहे.

अनुप ढेरे Mon, 05/01/2015 - 19:07

In reply to by अजो१२३

भारतीय ग्रामीण मानसिकता नावाची एक विशिष्ट मानसिकता आहे

या मानसिकतेची २-४ उदाहरणं द्या ना. म्हणजे 'शहरी' आणि 'ग्रामीण' यातला फरक समजायला मदत होईल.

बॅटमॅन Tue, 06/01/2015 - 19:42

In reply to by अनुप ढेरे

जन्म पुण्यात झाला आणि अख्खं आयुष्य पुढे वड्डीत काढलं तरी तो माणूस पुणेरीच असे काहीसे लॉजिक यामागे असावे.

जिज्ञासूंसाठी: मिरजेपासून ४-५ किमी अंतरावर वड्डी नामक खेडे आहे.