Skip to main content

बंदुकीची गोळी आणि ती

4 minutes

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थात केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे. तुम्ही ही बर्याच नक्सलवाद्याना तुम्ही कंठ स्नान घातले असतील. त्यावर मेथ्यु म्हणाला, कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद मिळत नाही. मग तो शत्रू का असेना. 'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही. एका अर्धसैनिक दलाच्या अधिकारीच्या तोंडून हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटले.

माझा मनात चाललेला गोंधळ मेथ्युचा ध्यानी आला. तो म्हणाला साहेब, तीन एक वर्षांपूर्वीची घटना आहे. १५ शिपायांना तुकडी घेऊन गस्त घालायला निघालो. जंगलातून पायवाटेवर चालताना बलवान सिंग आणि मोहन हे दोघे सिपाही पुढे होते. मी, होशियार सिंग थोड्या अंतरावर त्यांच्या मागे. एका वळणावर अनेपक्षित पणे बंदुका घेतलेले सैनिकी वेशात तीन लोक बलवान सिंहला दिसले. तो थोडा गोंधळला, पण ते तिघे नक्षली होते. आपल्या समोर अर्धसैनिक दलाची तुकडी आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एक धक्का देऊन इथून पलायन करणे उचित, त्यांच्या म्होरक्याने निमिषातच निर्णय घेतला. त्यांनी समोर दिसणाऱ्या दोन्ही शिपायांवर आपल्या एके ४७ ने ब्लास्ट (सर्व गोळ्या एकाच वेळी) केला. काही समजण्या आधीच बलवान आणि मोहन जमिनीवर पडले. मी लगेच एका झाडाची आड घेतली आणि आम्ही नक्षलींच्या दिशेने गोळीबार सुरु केला. होशियार सिंगने याने थोड रांगत पुढे जाऊन एक हेंड ग्रेनेड त्यांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड बरोबर त्यांच्या मध्ये जाऊन पडला. काही क्षणांकर्ता नक्षली गोंधळले. त्यांनी आपली पोजिशन सोडली आणि त्याच क्षणी ग्रेनेडचा ही ब्लास्ट झाला. सर्वकाही शांत झालं. माझे दोन शिपाई शहीद झाले होते. बाकी इतर कुणाला ही कुठलीच इजा झाली नव्हती. होशियार सिंहला नक्षली जिवंत आहे कि मेलेले याची खात्री करायला सांगितले. काही वेळाने तो परत आला आणि म्हणाला साहिब एक जिंदा है, क्या करें उसका. मी जवळ गेलो, बघितले जेमतेम १७-१८ मुलगी असेल. दोन्ही पाय ब्लास्ट मुळे जखमी झाले होते. पाठीला गोळी ही लागलेली होती. शरीरातून रक्त वाहत होते. एक शिपाई म्हणाला, साहब इसे तो उठाकर ले जाना पड़ेगा. मी विचार केला. जंगल नक्सलीनी भरलेले आहे. कदाचित या चकमकी बाबत त्यांना कळले ही असेल. आधीच दोन शहीद शिपाई, त्यांची आणि नक्षली त्यांचे शस्त्र. ६-७ शिपाई तर या साठीच लागतील. उरलेल्या ५-६ शिपायांवर सर्वांच्या संरक्षणाची जवाबदारी. निर्णय घेतला. आपल्या जवळ लोक नाही. हिला इथेच सोडावे लागेल, उद्या परत येऊन बघू, काय करायचे ते. साहेब अश्यानी ही इथेच तडफडून मरेल, एक शिपाई म्हणाला. मी म्हणालो, ठीक आहे, मी तिला मुक्त करतो. मी तिच्या जवळ गेलो.एक पाय तिच्या छातीवर ठेवला आणि तिच्या कपाळावर नेम धरला. त्या वेळी तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल. मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत काहीतरी बोलण्याच्या प्रयत्न करत होती. मन घट्ट करून मी गोळी झाडली. त्या क्षणी माझ्या कानात आवाज घुमला 'साहेब मला का मारले, मला जगायंच होत.' मेथ्यु काही क्षणासाठी थांबला.

मेथ्यु पुढे म्हणाला, बलवान सिंहच्या बायकोचे वय फक्त तीस वर्ष होते त्यात तीन मुली. तिला पुढील सर्व आयुष्य तीन मुलीना वाढवत वैधव्यात काढावे लागणार. मोहन तर फक्त २२ वर्षांचा होता. आपल्या आई-बापांचा एकुलता एक. ती मुलगी, दोन वर्षांपूर्वी तिने दहावीचा पेपर दिला होता. तिला डॉक्टर बनायचे होते. तिचा मोठा भाऊ कालेजात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आला होता. त्याच वेळी जवळच्या गावात पोलीस पोस्टवर नक्षली हमला झाला. जवळपासच्या गावातल्या तरुणांना पोलिसांनी उचलले. त्यात तिचा भाऊ ही होता. असे गावकर्यांचे म्हणणे. नंतर कळले पोलीस एन्काऊंटर मध्ये काही नक्षली मारल्या गेले त्यात तिचा भाऊ होता. भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलाचा रस्ता धरला आणि चकमकीत मी तिला मारले. तिच्या वडिलांनाही या घटने नंतर पोलीस उचलून घेऊन गेले. कदाचित अद्यापही ते जेल मध्ये असतील. काही क्षणांच्या चकमकीत अनेकांचे स्वप्न भंगले, काही परिवार उध्वस्त झाले.

बाकी माझे म्हणाल, तर मी झोपेच्या गोळ्या घेतो तरी ही मला झोप लागत नाही. जरा डोळे मिटले कि तिचा चेहरा समोर येतो, एकच आवाज कानात घुमत राहतो. 'साहेब मला का मारले, मला जगायचं होत.' काय उत्तर देणार मी तिला. मला नेहमीच वाटते, ती सतत माझ्या अवती-भोवती असते, कदाचित या क्षणी ही इथेच असेल. जो पर्यंत तिला तिच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही ती जाणार नाही. जन्म भर ती मला अशीच छळत राहणार. मेथ्युची कथा ऐकून मी सुन्न झालो. काहीच बोलू शकलो नाही.

Node read time
4 minutes

अंतराआनंद Sun, 28/12/2014 - 18:36

खरचं सुन्न करणारं लिखाण.

कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद मिळत नाही. मग तो शत्रू का असेना. 'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही.

किती बरोबर आहे. ज्याला हे कळतं त्याला झोप लागत नाही आणि त्याच्या हातातल्या बंदूकांच्या जोरावर आपण स्वस्थ झोपतो आणि तावातावाने यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, त्यांच्याशी युद्ध पुकारलं पाहिजे अश्या गफ्फा हाणतो, हा केवढा विरोधाभास आहे.

नगरीनिरंजन Mon, 29/12/2014 - 05:11

सहमत. यानिमित्ताने सरकारने लवकरात लवकर लष्करात व निमलष्करात सैनिकांऐवजी रिमोर्सलेस रोबॉट्सचा वापर करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करावी अशी मागणी याठिकाणी यामाध्यमातून कर्ण्यात येत आहे.
सामान्य नागरिकांना पेप्सीच्या कॅनसाठी अ‍ॅल्युमिनियम लागतं, कारसाठी लोखंड लागतं आणि घरात टीव्ही पाहण्यासाठी जी वीज असते तिच्यासाठी कोळसा लागतो. सामान्यांच्या या गरजा पूर्ण करणार्‍या खाणींसाठी हसतमुखाने आपापली परंपरागत जमीन व जंगल सोडून देण्याऐवजी हातात शस्त्र घेणार्‍यांना कसलीही दयामाया दाखवता कामा नये. एकतर हे शस्त्र हाती घेणारे आदिवासी नसतातच, त्यांच्या नावाखाली स्वतःचा फायदा करुन घेऊ पाहणारे नराधम असतात आणि दुसरे म्हणजे शस्त्र हाती घ्यायचा व हिंसा करायचा अधिकार फक्त सरकारला आहे.

नितिन थत्ते Mon, 29/12/2014 - 08:19

In reply to by नगरीनिरंजन

>>शस्त्र हाती घ्यायचा व हिंसा करायचा अधिकार फक्त सरकारला आहे.

हो. आपण (कुठल्याही सुसंस्कृत समाजात) तो अधिकार सरकारला डेलिगेट केलेला असतो. सरकार तो गैरप्रकारे वापरत असेल तर पर्यायाने "आपणच" तो गैरप्रकारे वापरत असतो.

नगरीनिरंजन Mon, 29/12/2014 - 16:52

In reply to by नितिन थत्ते

होय आपणच. तसे आपण बर्‍यापैकी रिमोर्सलेस असतो.
पण त्यातही हायरार्कि असते. ज्यांना नफा जास्त त्यांना हिंसेच्या निर्णयात जास्त "से" असतो. बाकीचे एका मताचे मालक.

ऋषिकेश Tue, 30/12/2014 - 09:39

In reply to by नितिन थत्ते

हो. आपण (कुठल्याही सुसंस्कृत समाजात) तो अधिकार सरकारला डेलिगेट केलेला असतो. सरकार तो गैरप्रकारे वापरत असेल तर पर्यायाने "आपणच" तो गैरप्रकारे वापरत असतो.

याच्याशी पूर्णांशाने सहमत नाही.
पोलिस बळ जर गैर गोष्टी करत असेल तर सरकारला व पर्यायाने आपल्याला दोष देता येईल.

अनेक लक्षलवाद्यांचा प्रभाव असणार्‍या भागात आफ्स्पा लागू आहे. तिथे फक्त लष्कराचे राज्य चालते. सरकार व नागरी कायदे यांचे फारसे चालत नाही. थोडक्यात कोणत्याही उत्तरदायित्त्वाशिवाय लष्कराला/अर्धसैनिक बळाला तिथे सत्ता असते.

अश्या ठिकाणी घडणार्‍या भल्या-बुर्‍या घटनेचे श्रेय/अपश्रेय सरकार व पर्यायाने मला घेण्याचे मी अव्हेरतो :(

ऋषिकेश Wed, 31/12/2014 - 08:57

In reply to by नितिन थत्ते

होय तितपत दोष मी सरकारला पक्षी मला घ्यायला तयार आहे. परंतू सगळा दोष माझाच (सरकारचाच) असे कोणी म्हणत असेल तर ते मान्य नाही.
म्हणूनच पूर्ण असहमती दर्शवली नव्हती.

धर्मराजमुटके Mon, 29/12/2014 - 22:54

म्हणूनच सैन्यात सगळ्यांना डोकं चालवायला बंदी असते. डोकं फक्त वरिष्ठ चालविणार. खालच्यांनी फक्त आदेश पाळायचा.
तुम्ही फक्त कार्य करा. त्याच्या परिणामांची चिंता करणारे दुसरीकडे बसलेले असतात.

वामा१००-वाचनमा… Mon, 29/12/2014 - 23:07

In reply to by धर्मराजमुटके

खरं बोललात. मिलिटरी खाक्या!!! म्हणतात त्याला.
"प्रचंड मार्मिक" अशी एक श्रेणी काढा :)
______
या विषयावर "केन्स म्युटिनी" नावाच सुरेख चित्रपट आहे.

नगरीनिरंजन Wed, 31/12/2014 - 09:26

In reply to by धर्मराजमुटके

Blu या आर्टिस्टची वॉल ऑफ ब्रेनलेस सोल्जर्स आठवली.

http://illusion.scene360.com/art/19952/the-controversial-wall-of-brainless-soldiers/

विवेक पटाईत Tue, 30/12/2014 - 20:14

प्रतिसादाबाबत धन्यवाद. या कथेचा संबंध बंदुकीची गोळीच चालण्याचे कारण काही का असेना पण त्याचा परिणाम मानवी जीवनावर काय होतो फक्त या विषयावर केंद्रित आहे.

उदय. Wed, 31/12/2014 - 01:55

In reply to by विवेक पटाईत

केवळ हाच उद्देश असेल तर सहमत. पण तुमच्या लेखात २ वाक्ये हायलाईट केली आहेत, त्याला अनुसरून मी आधीचा प्रतिसाद दिला होता.