Skip to main content

माझी शाळा सृजन आनंद -१

4 minutes

ऐसी वर सध्या अपारंपरिक , पर्यायी शाळा वगैरे जी चर्चा चालू आहे ती खरेतर कारणीभूत झाली. अंतरानंद ह्यांच्या धाग्यावर प्रतिसाद देताना जाणवलं कि ह्या प्रकारच्या अपारंपरिक ( मला सेमी पारंपारिक म्हणायला आवडेल ) अशा शाळेत मी १ली ते ४थी शिकले. माझ्याकडे विद्यार्थी point of view ने माझे शाळेतील अनुभव नंतर शाळा बदलल्यावर (नाईलाजाने बदलावी लागली कारण हि शाळा फक्त ४थी पर्यंतच होती ) पारंपारिक शाळेतील अनुभव, (रूळ बदलताना झालेला खडखडाट ) आणि त्याही पलीकडे जाऊन पुढील आयुष्यात जाणवलेला शाळेचा प्रभाव हे खूप काही सांगण्यासारखं आहे.
मला आठवेल तसे आणि माझ्या पात्रतेनुसार लिहितेय तर नेहमी प्रमाणेच ऐसीचे मायबाप आणि दिग्गज प्रोत्साहन देतील ( आणि ट्रोल्स कडे मी दुर्लक्ष करेन ) अशी आशा करून सुरु करते . :)
मी ज्या शाळेबद्दल लिहितेय ती शाळा "सृजन आनंद विद्यालय , कोल्हापूर " (सृ.आ.वि.) प्रा . लीलाताई पाटील ह्यांनी (निवृत्त झाल्यानंतर) १९८५ साली सुरु केली. १९९४ ते १९९८ अशी ४ वर्षे मी ह्या शाळेत होते. माझे शाळेसंबंधिचे ९८% अनुभव हे तेव्हाच्या काळातील असतील .
मी शाळेत असताना लीलाताई पूर्णवेळ शाळेत (शिकवणे आणि व्यवस्थापन ) active होत्या . लीलाताईनी आनंददायी शिक्षण ह्या संकल्पनेचा प्रचार आणि पुरस्कार नेहमीच केला. वेळोवेळी त्यांचे लेख सा . सकाळमध्ये वगैरे प्रकाशित होत असत. त्यांची ह्या विषयावरची पुस्तकेही उपलब्ध आहेत. (ज्यांनी बापलेकी वाचलंय त्यांना कदाचित लीलाताई माहिती असतील ; बापलेकी मधला त्यांचा लेख वाचून मला प्रचंड त्रास झाला होता . आपल्या जवळच्या माणसाला वेदना झाल्या आणि आपण काहीच करू शकलो नाही असं काहीसं impractically असहाय्य वाटलं होतं . असो हे विषयांतर झालं )
लीलाताई आजही मला खूप जवळच्या वाटतात आणि केवळ मलाच नाही तर आमच्या पिढीत सृ.आ.वि. मध्ये शिकलेल्या ९५% विद्यार्थ्यांनाही असेच वाटत असेल.
२० वर्षांपूर्वीच्या कोल्हापुरात सृ.आ.वि. इतर शाळांपेक्षा निश्चितच वेगळी होती .
१. शिक्षकांना madam /बाई /सर ऐवजी ताई आणि दादा म्हणून संबोधलं जात असे. ( कारण - आपलं आपल्या ती दादांशी जसं नातं असतं आपुलकी , जवळीक आणि वडीलधारेपणा तरीही समानता तसं विद्यार्थ्यांचं शिक्षकांशी असावं )
२. फळे (blackboard ) हे काळ्या रंगांचे नसून हिरव्या रंगांचे असत ( कारण - हिरवा रंग हा सर्जनशीलतेचं प्रतीक मानला जातो, डोळ्यांना अधिक शांत आणि शीतल वाटतो )
३. शाळेला गणवेश होता आणि माफक ( महिना ४० रुपये ) फी होती . ( कारण शाळेत सर्व प्रकारच्या आर्थिक सामाजिक स्तरांतून विद्यार्थी होते .)
४. डब्यात रोज पोळी भाजी नेण्याचा नियम असला तरी सक्ती नव्हती . एखाद्याच्या आईला एखादा दिवस जमलं नाही आणि त्यांनी समजा फोडणीचा भात आणला तरी शिक्षा वगैरे होत नसे .
५. मुळात शिक्षा फार कमी वेळा होत असे आणि तिचा प्रकार वेगळा असे .
६. रेग्युलर तिमाही, सहामाही नऊमाही आणि वार्षिक परीक्षा होत असत आणि निकाल १ मे ला असे पण निकालपत्र खूपच पर्सनल असत असे. (माझ्या आईने माझी आठही निकालपत्रक जपून ठेवली आहेत. जमल्यास नमुन्यादाखल एक-दोन मी इथे अपलोड करेन .
७. प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन होते आणि प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत असे .

असं शाळेचं वेगळेपण आठवत बसले तर सुचेना पण माझ्या अनुभवांतून वेळोवेळी ते तुमच्या ध्यानात येईलच .
एका ठराविक वयापर्यंत मुलांच्या आयुष्यातले ( महत्त्वाचे ) निर्णय त्यांच्या आईबाबांना घ्यावे लागतात जसं कि नाव काय ठेवायचं किंवा कोणत्या माध्यमात/ शाळेत घालायचं . मला माझ्या आईबाबांनी घेतलेले हे दोन्ही निर्णय आवडले. माझं नाव "सिद्धी" आणि माझी शाळा सृजन आनंद.
आईबाबांनी मला ह्या शाळेत का घातलं ? बाबा बरेचसे तत्ववादी आहेत. डोनेशन देवून किंवा रात्र रात्र रांगेत उभं राहून प्रवेश घेण्यापेक्षा माझी मुलगी म्युनिसिपालिटीच्या शाळेत घालेन अशा मताचे. आई त्यामानाने प्रयत्नवादी. आमचं घर ज्या भागात आहे (ताराबाई पार्क/ नागाळा पार्क) त्या भागात सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळा आहेत .पण तिला पुढे जाऊन माझ्याकडून 'पंचाव्वन म्हणजे किती?' छाप प्रश्न नको असल्याने मराठी मध्यम हे निश्चित होते. आईच्या एक दोन मित्र मैत्रिणींची मुलं ह्या सृ.आ.वि. मध्ये होती. मुलांना आणि पालकांना शाळा, शाळेचं वेगळेपण आवडत होत म्हणून मग सृ.आ.वि. ठरली .

आज मागं वळून बघताना शाळेतला पहिला दिवस आठवत नाही पण सुरुवातीला कधीतरी आई बाबा शाळेत घेवून गेलेले आठवतात. शाळा म्हणजे आई बाबा ऑफिसला जातात तसं मुलांनी जायचं ठिकाण ह्यापेक्षा काहीच कळत नव्हतं आणि शाळेत जाण्याचं किंबहुना जावं लागण्याचं वाईट वगैरे तर अजिबात वाटत नव्हतं.
पहिलीत असताना शाळा जुन्या इमारतीत होती. कोणाचं तरी घर असावं अशी ती एकमजली शाळा. खोल्याखोल्यातून वर्ग भरत. वर्ग तरी किती ? तर चार आणि प्रत्येक वर्गात सरासरी चाळीस मुलं.
आई ऑफिसला जाताना पाळणाघरात ठेवत असे. पाळणाघर म्हणजे एका काकूंच घर ! तिथे काकू ४-५ मुलांना सांभाळत. सुरुवातीला शाळा म्हणजे एक मोठ्ठ पाळणाघरच वाटे.
पहिल्या दिवशी शाळेत काय झालं हे जरी आठवत नसलं तरी शाळा संपल्यावरच सगळं अगदी लख्ख आठवतंय . सकाळी आईबाबांनी ठरवलेल्या रिक्षा -मामांनी शाळेतून घरी नेलं होतं . घराच्या टेरेस मध्ये आईबाबा वाट पाहत उभे होते . आजचा दिवस त्यांच्यासाठीही महत्वाचा होता. दोघांनीही ऑफिस मधून सुट्टी घेतलेली. जिना चढून घरी पाऊल टाकताच आईने फोटो काढला आणि मग शाळेत जाणं रोजचच झालं.
रोजचं झालं नेहमीचं झालं… कंटाळवाणं कधीच झालं नाही. .
ही माझी पहिली शाळा होती अशातला भाग नाही ह्यापूर्वीही मी वेगळ्या बालवाडीत होते आणि पहिल्या भेटीत जरी जाणवलं नाही तरी ह्या शाळेचं वेगळेपण हळू हळू जाणवत गेलं. जसजशी मोठ्ठी होत गेले तसंतसं ते अजून अजून समजत गेलं. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्याने फील होत गेलं.

****************************************************************************************************************************************
आज इतकं(च ?) पुरे करते . बरच काही आठवतंय आणि आठवणी नीट organize करून लिहायला वेळ लागेल .
पुन्हा भेटू.
-सिद्धि

व्यवस्थापकः चित्र देतेवेळी height="" हा टॅग काढून टाकावा किंवा अवतरणचिन्हात योग्य ती रोमन संख्या लिहावी.

Node read time
4 minutes

अनु राव Tue, 24/03/2015 - 10:43

तुमच्या ७ पाँईंट मधे वेगळे असे काहीच दिसले नाही. आमच्या तद्दन पारंपारीक शाळेत पण हेच होते. ठीक आहे ताई / दादा वगैरे म्हणत नसु किंवा फळे जुने लाकडी काळ्या रंगाचे होते, पण त्यानी काही फरक पडला नाही.
प्रश्न वगैरे विचारायला कधीच आडकाठी नव्हती, उत्तरे पण मिळायची. ( मला वाटते सर्व च शाळांमधे मिळत असावीत ). डब्याबद्दल पण काही नियम वगैरे नव्हते.

गवि Wed, 25/03/2015 - 11:52

In reply to by अनु राव

धागाकर्तीने ट्रोलिंगचा उल्लेख केलाय, पण तसा कोणताही उद्देश नसल्याचे नम्रपणे नमूद करुन आणि पूर्ण लेखमाला वाचण्याचे आश्वासन देऊन केवळ तुम्ही हे सर्वत्रच असल्याचं म्हटलंय त्याला सहमती देत काही गंमतीशीर उल्लेख करतो

२. फळे (blackboard ) हे काळ्या रंगांचे नसून हिरव्या रंगांचे असत ( कारण - हिरवा रंग हा सर्जनशीलतेचं प्रतीक मानला जातो, डोळ्यांना अधिक शांत आणि शीतल वाटतो )

आमच्या शाळेत विविधरंगी फळे असायचे. बर्‍याच ठिकाणी भिंतच जरा राखाडी रंगवून चौकोन केलेला असायचा. हिरवे फळे होतेच. अँड ऑल शेड्स ऑफ ग्रे.

३. शाळेला गणवेश होता आणि माफक ( महिना ४० रुपये ) फी होती . ( कारण शाळेत सर्व प्रकारच्या आर्थिक सामाजिक स्तरांतून विद्यार्थी होते .)

आधी नगरपालिका शाळेत होतो तिथे गणवेश वगैरेचा काही संबंधही नव्हता. नंतरच्या शाळेत गणवेश होता. खाकी चड्डी पांढरा शर्ट यासारखा गणवेश म्हणजे केवळ बावळट दिसण्यासाठीच बनवलेला वाटतो. खाकी चड्डीचा कलर कोड नसल्याने शेवाळी, लष्करी हिरवा, शेण कलर, गडद पिवळा अशी मोठी रेंज खाकी चड्डी म्हणून मान्य होती.

४. डब्यात रोज पोळी भाजी नेण्याचा नियम असला तरी सक्ती नव्हती . एखाद्याच्या आईला एखादा दिवस जमलं नाही आणि त्यांनी समजा फोडणीचा भात आणला तरी शिक्षा वगैरे होत नसे .

पोरांनी डब्यात काय आणलेय हा पुढचा भाग झाला, माझ्या सर्व शाळांमधे पोरांनी डबा मुळात आणलाय किंवा नाही हेही कोणी पाहात नसे. किंबहुना मधली (लग्वीची नव्हे, मोठी) सुट्टी झाली की पोरं जिन्यात, शाळेच्या आवारात, आजुबाजूच्या रहिवाश्यांच्या कंपाउंडांत वगैरे विखुरत असल्याने कोण कुठे गेलाय आणि कुठे बसून काय खातोय हे शिक्षकखोलीत बसलेल्या शिक्षकांना समजण्याची काहीच शक्यना नव्हती. पोरांची दप्तरे ही अत्यंत खाजगी बाब होती. डबा, इतर पदार्थ, स्टिकर, लवचिंबक, बिल्ले, बॉलबेरिंग वगैरे शाळेत नेणे किंवा न नेणे याविषयी नियम अथवा झडती कधीही होत नसे. नववीत एका शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या वह्या उघडून सर्वात मागील पानावर लिहिलेले खाजगी मजकूर (हिंदी गाण्यांच्या ओळी, वासू सपना ४२० वगैरे) वर्गात जाहीर वाचण्याची विकृती होती आणि ती एक विकृत केस म्हणूनच मुलांच्यात समजली जात असे. नॉर्म नव्हे.

५. मुळात शिक्षा फार कमी वेळा होत असे आणि तिचा प्रकार वेगळा असे .

आहाहा.. शिक्षेचा प्रकार वेगळा असण्याविषयी काय बोलावे? आमच्या शाळेत शिक्षेचे प्रकार वेगळेच नव्हे तर विविधतेने नटलेले असत. भारतीय परंपरांतील विविधतेनुसार शिक्षाही वेगवेगळे रुप घेऊन येत. अचानकचांदणे ही एक शिक्षा होती. त्यात अजिबात अपेक्षा नसताना डोळ्यासमोर आधी प्रकाश चमकणे आणि मग कानसुल आणि गाल या जनरल एरियात वेदना जाणवणे असा घटनाक्रम असायचा. प्रकाश हा ध्वनी किंवा जाणिवेपेक्षा जास्त वेगात वाहतो हे शिक्षण त्यावेळी मिळाले. शिवाय बोटांत पेन्सिल ठेवून वरुन पट्टी.. सुभाषितमालेच्या प्रत्येक शब्दावर विद्यार्थ्याचे बोट पकडून ते आपटत आपटत ती वाचून घेणे..शंभरवेळा एकच मजकूर लिहिणे..मित्ररुपी प्रॉक्सीद्वारे सरांचा मार स्वीकारणे.. डस्टर डोक्याजवळून एक इंच सणसणत गेल्याने नंतर पाय ते डोके अशी एक वीज झणझणत जाणे..

६. रेग्युलर तिमाही, सहामाही नऊमाही आणि वार्षिक परीक्षा होत असत आणि निकाल १ मे ला असे पण निकालपत्र खूपच पर्सनल असत असे. (माझ्या आईने माझी आठही निकालपत्रक जपून ठेवली आहेत. जमल्यास नमुन्यादाखल एक-दोन मी इथे अपलोड करेन .

"आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. कृपया पालकांनी समक्ष भेटावे" हा एक अस्सल पर्सनल मजकूर आहे.

....................

लेखमालिका वाचण्यास उत्सुक..शाळेचा वेगळेपणा पुढील लेखांतून जाणवेल असा विश्वास आहेच.

मेघना भुस्कुटे Wed, 25/03/2015 - 11:57

In reply to by गवि

बाकी प्रतिसादाच्या ओघाबद्दल काय बोलावे! पण निदान 'अचानकचांदणे' या शब्दाकरता कुर्निसात कबूल करून घ्यावा...

ऋषिकेश Wed, 25/03/2015 - 12:22

In reply to by गवि

खाकी चड्डी पांढरा शर्ट यासारखा गणवेश म्हणजे केवळ बावळट दिसण्यासाठीच बनवलेला वाटतो

=))
ऐसी नागपूरहूनही उघडतं हो!

अर्थात आता ६६अ रद्द झालंय म्हणा! ;)

अतिशहाणा Wed, 25/03/2015 - 18:32

In reply to by ऋषिकेश

खाकी चड्डी पांढरा शर्ट यासारखा गणवेश म्हणजे केवळ बावळट दिसण्यासाठीच बनवलेला वाटतो

आम्हाला तर यासोबत गांधीटोपीही घालण्याची सक्ती तब्बल नववीपर्यंत होती. त्यातही काही मुले कांजी वगैरे करुन ती टोपी कडक कशी ठेवता येईल याचा प्रयत्न करायचे.

आजकाल 'आप'मुळे गांधीटोपी जरा 'इन' थिंग झाली आहे. शाळेच्या गेटातून आत शिरताना डोक्यावर आणि बाहेर पडताना तंबाखूच्या चंचीसारखी खिशात. हाप चड्डी, चुरगाळलेल्या टोपीचा अगदी रया गेलेला आकार, मळका पांढरा शर्ट यामुळे बहुतेक सर्व मंडळी दादा कोंडके-भगवानदादा यांचेच वंशज वाटत.

वक्तृत्त्वस्पर्धा किंवा तत्सम काही आंतरशालेय खेळांसाठी पुण्यात वगैरे जावे लागले तरी तिथेही टोपी घालून जायची सक्ती असायची. आमच्यासारख्या पौडाच्या पावण्यांना शहरातल्या टापटीप मुलांना निव्वळ बघूनच निम्मा आत्मविश्वास नष्ट होत असे.

गवि अगदी जखमेवरची खपली काढली तुम्ही. ;)

शुचि. Wed, 25/03/2015 - 18:50

In reply to by अतिशहाणा

हाहाहा :)
आमचा गणवेष होता- नीळा स्कर्ट + पांढरे ब्लाऊझ + शाळेचा बॅच(बिल्ला)
समोर सेवासदनवाल्या मुली मात्र - आकाशी सलवार्+पांढरा कुर्ता, आकाशी साडी + पांढरी चोळी (ब्लाऊझ ;)) किंवा स्कर्ट्+ब्लाऊझ मध्ये येत.
आम्हाला का तशी विविधता नाही असे वाटे.

अतिशहाणा Wed, 25/03/2015 - 19:03

In reply to by शुचि.

खरंतर मुलींनाच टोपी चांगली दिसतेय. सन्नीचा वर दिलेला फोटू पाहा. आमच्या वर्गाचे चित्र साधारण खालीलप्रमाणे असे.

नगरीनिरंजन Wed, 25/03/2015 - 17:47

In reply to by गवि

:-)

शिवाय टोणग्यापासून बेवकूफपर्यंत आणि मूर्खा-बावळटापासून ब्लडी इडियटपर्यंत शब्द वापरून मुलांची व्होक्याब्युलरी समृद्ध करण्याची काळजीही घेतली जात असे.
थोड्या मोठ्या वर्गांमध्ये माफक चावटपणाही शिकवत असत. (उदा. अंडरटेकिंग शब्दाचा अर्थ शिकवताना शब्दश: अर्थ घेऊ नका म्हणणे.)
शाळेने काही बाबतींत न्यूनगंड दिला असला तरी जाणही खूप दिली. पुन्हा संधी मिळायची सोय असती तरी आय वुड नाॅट हॅव इट एनी अदर वे.

बॅटमॅन Wed, 25/03/2015 - 17:48

In reply to by गवि

खाकी चड्डीचा कलर कोड नसल्याने शेवाळी, लष्करी हिरवा, शेण कलर, गडद पिवळा अशी मोठी रेंज खाकी चड्डी म्हणून मान्य होती.

ही एवढी मोठी रेंज पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच बरं! स्त्रीप्रधान संस्कृतीत खाकी कलरपेक्षा ०.००००००००००००००१% कमीजास्त फरकही लगेच कळून येऊन घरला पाठवले असते.

बाकी पूर्ण प्रतिसादाशी तहे दिलसे सहमत. नगरपालिका शाळेचा अनुभव नसला तरी कमीअधिक फरकाने अनुभव असेच. फरक असेल तर तो प्रमाणाचा, गुणात्मक नव्हे.

हेमन्त वाघे Thu, 26/03/2015 - 23:40

In reply to by गवि

गवी...........रडवलात तुम्ही ......

तुम्ही शाळेतील एक नालायक करते असणार .........अगदी माझ्यासारखे ..............

"इतर पदार्थ, स्टिकर, लवचिंबक, बिल्ले, बॉलबेरिंग "" वा वा अजून - कॉमिक्स , सिगरेटच्या चांद्या , battery सेल , बंद घड्याळे , रिकामे पैश्याचे पाकीट , कटर चाकू , ब्लेड ,स्प्रीगा ......................

अंतराआनंद Tue, 24/03/2015 - 11:02

अरे वा! मेघना म्हणते तसंच लिहीत रहा.
कदाचित सकाळ मधल्या लेखांतून तुम्ही भेटल्याही असाल मला :D . मला वाटतं मी कॉलेजच्या सुरूवातीच्या दिवसात ती लेख मालिका वाचत असे. खुप छान वाटायचं वाचताना. त्या लीला पाटील या ना.सी. फडकेंच्या कन्या हे नंतर कळल. बापलेकी वाचून त्यांच्या बद्द्लचा आदर दुणावला.

कदाचित चौथीपर्यंतच अश्या शाळा असणे ही गरज आहे. कारण शिकण्याची गंगा नंतर भारतीय शिक्षण पद्धतीच्या समुद्रालाच मिळणार. मलाही वाटतं की मुलांना सुरुवातीलाच प्रायमरी लेव्हललाच अश्या शाळेत घालावं. पुढच्या वर्गात अश्या शाळांची आपल्या शिक्षण पद्धतीशी आणि पालकांशी जमवून घेताना दमछाक होते.

@ अनुराव, जाउदे हो. तुम्हाला कशानेच काहीच फरक पडत नसावा.

ऋषिकेश Tue, 24/03/2015 - 11:06

In reply to by अंतराआनंद

मलाही वाटतं की मुलांना सुरुवातीलाच प्रायमरी लेव्हललाच अश्या शाळेत घालावं.

सहमत आहे.
बाकी, ४थी नंतर इतर शाळेत घालताना काही अडचणी येतात का? याबद्दल कोणाला अनुभव असल्यास तेही सांगावेत

शुचि. Wed, 25/03/2015 - 17:46

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सिद्धी लोभस शैली आहे तुमची. लिहीत रहावे ही विनंती.

सिद्धि Wed, 25/03/2015 - 02:58

अंतराआनंद - हो नक्कीच . लीलाताईनी एक खूप छान कविता पण केलेली मला उद्देशून. मी ऑन-लाईन साप्ताहिक सकाळ चे जुने अंक मिळतायत का बघतीये . नाहीतर आईकडे कात्रण आहे लेखाचं त्याचा फोटो मागवून लावेन इथे .

मेघना, ऋषिकेश, अदिती - धन्यवाद
अनु राव - My bad . पण माझं सगळं लिहून झाल्यानंतर तुम्ही मला सांगा कि माझी शाळा वेगळी होती तुमच्या शाळेपेक्षा कि नाही ते .

अजून एक सर्वांसाठी : मला अहो सिद्धि पेक्षा ए सिद्धि म्हणणार का प्लीज ?

रेड बुल Wed, 25/03/2015 - 11:21

In reply to by सिद्धि

माझ्या मनात हा विचार आधीच येउन गेला होता पण लोकं उगा आचरटपणा म्हणतील म्हणून लिहले न्हवते कारण साधारण १९८९ बॉर्न असलेल्या व्यक्तीला आहो जाओ म्हणने म्हणजे जरा...

अजो१२३ Tue, 31/03/2015 - 17:32

In reply to by रेड बुल

२०१५-१९८९+१
=============================
मी सभ्य आहे म्हणून हे समीकरण सोडवलं नाही, पण जॅकी चॅन साहेब, तुम्ही ना , नेहमी असभ्यतेची कडा का दाखवून आणता?

ॲमी Wed, 25/03/2015 - 17:10

वाचतेय.
बादवे हिरव्या फळ्यावर पांढर्या खडूने लिहीलेल फार ठळक/स्पष्ट दिसत नाही.
आणि हो गविंच्या प्रतिसादात छोट्या सुट्टीचा उल्लेख आला आहे त्यावरून सहज कुतुहल: पर्यायी शाळांत किंवा आजकालच्या भरमसाठ फी घेणार्या पारंपारीक शाळांत स्वच्छ टॉयलेट असतात का?

अंतराआनंद Wed, 25/03/2015 - 23:10

माझ्या ४थी पर्यंतच्या प्रार्थना समाजाच्या शाळेतही आम्ही बाईंना "ताई" म्हणत असू. मंदाताई,लीलाताई,छबूताई आणि आशाताई. कमलताई मुख्याध्यापिका असल्याने फक्त त्यांचच आडनाव माहित होतं.
मंदाताईंची मी एवढी लाडकी होते की एकदा वर्गात गोंधळ चालू होता म्हणून त्या आल्या आणि अख्ख्या वर्गाला बेंचवर उभं रहायला सांगितलं मी सोडून. आणि त्या दिवशी खरंतर मी ही बडबड करत होतेच ते एकाने सांगायचा प्रयत्न केला तर त्यालाच ओरडल्या. =)) =))
किती मस्त आठवणी आहेत या.

शुचि. Wed, 25/03/2015 - 23:26

In reply to by अंतराआनंद

वा!!! आमच्या मॉन्टेसरीचे मुख्याध्यापक होते जांभोरकर सर.
मी शेजारी रहात असल्याने माझी गट्टी होती. ते वर्गात आले की मी "जांभोर काका" म्हणून हाक मारीत असे :)
_______
अन मॉन्टेसरीत, शाळेच्या आवारात तुतीचे झाड होते.शाळा बुडवून मी तुती वेचे मग बाळू शिपाई वर्गात हाकले.

अरविंद कोल्हटकर Thu, 26/03/2015 - 01:15

वरच्या बहुतांशी गोडगोड आठवणी वाचून मला माझ्या प्राथमिक शाळेची आठवण झाली.

सुरुवातीस दोनएक वर्षे मी सातार्‍यात तेव्हा नव्याने सुरू झालेल्या आणि कन्याशाळेच्या आवारात उघडलेल्या मोंटेसोरी शाळेत जात असे. तेथे वातावरण अर्थातच छानछान होते. (तेथेच माझी मादाम मोंटेसोरी - स्वतः, खर्‍याखुर्‍या - ह्यांच्याशी आमनेसामने भेट झाली. कसे ते पूर्वी 'उपक्रम'वर मी लिहिले होते.)

तदनंतर प्राथमिक शाळेचे माझे वय झाले. माझे आजोबा मला घेऊन 'वाडया'पुढच्या कोणत्याशा ऑफिसात गेले आणि तेथील साहेबांनी माझी सोय 'म्युनिसिपल शाळा नंबर १३, फरासखाना' येथे केली. मी एकदम दुसरीत बसलो. हा फरासखाना म्हणजे सातारच्या छत्रपतींच्या काळातील प्रवासांचे आणि छावण्यांचे साहित्य ठेवण्याची मूळची जागा. छत्रपतींचे दिवस बदलले तशी ही जागा मुन्शीपाल्टीकडे आली. तेथे आमची शाळा. सातार्‍यात तेव्हा इंग्रजी माध्यमाचीच काय पण कोठलीच खाजगी शाळाहि नव्हती. प्राथमिकसाठी मुन्शिपाल्टी अणि ५वी नंतर डे.ए. सोसायटीचे न्यू (इंग्लिश) स्कूल ऊर्फ दगडी शाळा अशीच घरोघर पद्धत होती.

मूळचा तो फरासखाना असल्याने जागा भरपूर होती. एक मोठे खुले मैदान आणि त्याच्या दोन वाजूस ओवरीवजा लांबलचक एकमजली दोन इमारती असे तिचे स्वरूप. (ह्या मैदानावरच सध्या सातार्‍याचे 'शाहू रंगमंदिर' उभे आहे. आत वर्ग असे नव्हतेच. एक बाजू संपूर्ण मोकळी आणि दुसर्‍या बाजूस पार्टिशने घालून काढलेल्या खोल्या. आत भरपूर गोंगाट चालू असायचा. एक वर्ग मोठयाने पाढे म्हणतो आहे तर दुसरा वर्ग तारस्वरात 'खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधडया, उडविन राईराई एवढया' ही कविता घोटतो आहे हे सर्व एकसमयावच्छेदेकरून चालत असे. मधल्या सुटीची घंटा झाली की सर्व पोरवडा हो... करून ओरडत मैदानाकडे धावायचा आणि तेथे विटीदांडूपासून एकमेकांच्या उरावर बसण्यापर्यंत सर्व खेळ एकाचवेळी चालायचे. डबा वगैरे कोणी आणत असल्याचे आठवत नाही. कसलाच गणवेशहि नव्हता. आमच्यापैकी बहुतेकांची कपडयांची स्थिति 'एक दांडीवर आणि एक **वर' अशा प्रकारची होती. आज आंघोळीनंतर आम्ही एक अर्धी चड्डी घातली की तीच दुसर्‍या दिवसाच्या आंघोळीपर्यंत अखंड वापरायचो. पुष्कळांच्या पायात चप्पल वा बूट नसायचे. 'नंबर एक' साठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापुढील रस्ता मोकळाच होता. तेथे काही चावट मुले कोणाची धार सर्वात लांब पडते हे पाहण्याच्या स्पर्धा करीत. (मुलींची काय सोय होती कल्पना नाही.) मैदानात अंगचाच entrepreneurial skill set असलेली मुले दोन पेन्सिलींच्या तुकडयांना चिंचेचे बुटुक, चारांना दोन आवळे असले व्यवसाय मधल्या सुटीमध्ये करीत.

आमचे 'अध्यापक' ह्याच आडनावाचे शिक्षक खरोखरच चांगले अध्यापक होते पण ढवळे नावाचे हेडमास्तर बुटके, काळे आणि अतिशय अर्वाच्य शिव्या सदा तोंडावर असलेले होते. आपल्या शिवी संग्रहाचा सढळ मुखाने ते उपयोग करीत असत. त्यांची एक हृद्य आठवण मात्र मनात आहे. मी चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेस बसलो तेव्हा फॉर्मवर सही करण्यासाठी त्यांनी बोलावले. टेबलावरील फॉर्मवर सही करण्यास माझा हात पोहोचेना तेव्हा त्यांनी मला उचलून आपल्या खुर्चीत ठेवले आणि मी माझ्या आयुष्यातली पहिली सही केली. बाहेर पडतांना माझ्या हातावर त्यांनी एक लिमलेटची गोळी ठेवली.

गावात रिक्षाच नव्हत्या तर रिक्षावाले काका कोठून असणार? आमचे आम्हीच रोज शाळेत पायी येजा करीत असू. त्यात काही धोका असा कधीच आम्हाला अथवा आमच्या पालकांना जाणवला नाही.

इतके असूनहि माझ्या शाळेच्या आठवणी सर्वच चांगल्या आहेत. अशा शाळेमुळे आमच्या शिक्षणात काही तूट राहिली असे मला कधीहि वाटलेले नाही.

अरविंद कोल्हटकर Fri, 27/03/2015 - 00:40

शाळेबद्दलच्या माझ्या अजून दोन आठवणी लिहाव्याशा वाटल्या. अशा गोष्टी अलीकडे बहुधा होत नसाव्यात.

स्वातन्त्र्य नुकतेच मिळालेले असल्यामुळे वातावरणात देशाबद्दलचा उत्साह बराच होता. शिक्षणखात्यातील वरिष्ठांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक दर एकदोन महिन्यांनी विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत बोलवायचे आणि त्यांच्या हाती नाना घोषणाफलक देऊन त्यांना गावात प्रभातफेरीने फिरवायचे. घोषणा 'अधिक धान्य पिकवा', 'पूरक अन्न खा' तिरंगी झेंडा कोणाचा - चाळीस कोटी जनतेचा' अशा स्वरूपाच्या असायच्या. हे काम रविवारी वा अन्य सुटीच्या दिवशी होत असे. मधूनमधून 'भारतमाताकी जय', 'महात्मा गांधीकी जय', 'पंडित जवाहरलाल नेहरूकी जय' असेहि नारे दिले जात. बरोबरच्या शिक्षकांनी 'भारतमाताकी' अशी घोषणा द्यायची आणि विद्यार्थ्यांनी 'जय' असे उत्तर द्यायचे. (तेव्हा देशाची लोकसंख्या ४० कोटि होती हे येथे लक्षात यावे! आमच्या सातार्‍यात कसेबसे २५,००० लोक होते.) आमच्या एक उत्साही आणि तरुण शिक्षिका 'जय सुभाष, जय सुभाष, मंत्र हाच आजला, घोष हाच आजला, भारतात दशदिशात नाद हा निनादला| जय हिंद चलो दिल्ली' हे आणि अशीच स्फूर्तिदायक गाणी आमच्याकडून चालता चालता तालावर म्हणवून घेत. त्या दिसायलाहि सुंदर होत्या आणि म्हणूनच की काय विद्यार्थी उत्साहाने त्यांच्याबरोबर ही गाणी म्हणत.

पूरक अन्नावरून सुचले. तेव्हा अन्नधान्याची फार टंचाई होती आणि सर्वाचे रेशनिंग होते. अमेरिकेत डुकरांचे अन्न म्हणून वापरली जाणारी तांबडी ज्वारी, जिला 'मिलो' (मेलो मेलो!) असे नाव होते, ते आमचे प्रमुख रेशन होते. जनतेने नेहमीच्या तांदूळजोंधळ्यापलीकडे अन्य गोष्टी, उदा.बटाटे, रताळी. वरीनाचणी इत्यादि खावे असा प्रचार होत असे. प्राथमिक शाळेतील आमच्या एका शिक्षकांनी एक संवाद लिहिला होता. त्यात पात्रे तीन - भाऊ म्हणजे मी स्वतः, बहीण म्हणजे कमल डांगे नावाची माझी शाळेतील मैत्रीण आणि पाहुणे म्हणजे लिहिणारे शिक्षक. आम्ही बहीणभाऊ घरात बसलेले आहोत आणि पाहुणे आमच्याकडे येतात. मी बहिणीला पाहुण्यांसाठी चहाबिस्किटे आणण्यास सांगतो तेव्हा 'चहाबिस्किटांऐवजी पाहुण्यांचे स्वागत उकडलेले बटाटे, वर्‍याचे तांदूळ देऊन करावे' असे आमचे बौद्धिक पाहुणे घेतात असा तो संवाद आम्ही आमच्या वार्षिक समारंभावेळी करून दाखविला होता.

शुचि. Fri, 27/03/2015 - 01:08

In reply to by अरविंद कोल्हटकर

मी बहिणीला पाहुण्यांसाठी चहाबिस्किटे आणण्यास सांगतो तेव्हा 'चहाबिस्किटांऐवजी पाहुण्यांचे स्वागत उकडलेले बटाटे, वर्‍याचे तांदूळ देऊन करावे' असे आमचे बौद्धिक पाहुणे घेतात असा तो संवाद आम्ही आमच्या वार्षिक समारंभावेळी करून दाखविला होता.

हाहाहा :)