माझी शाळा सृजन आनंद -२
लीलाताईंबद्दल मी माग सांगितलं आहेच. लीलाताईंशिवाय गायात्रीताई , विमलताई, सुचिताताई , रोहिणीताई , अरुणाताई, आशाताई, निमाताई , मीनाताई , अलकाताई , संपदाताई , मीनलताई आणि उदयदादा , माधवदादा , शंकरदादा , मधुदादा हे शिकवणारे ताई -दादा होते . ह्यांशिवाय विजयाताई आणि सरस्वती-ताई मदतनीस होत्या .
पुढे त्यांचे उल्लेख येतीलच.
तर आता सृजन मधल्या पद्धतींबद्दल थोडे …
फळा : मी हिरव्या फळ्याबद्दल लिहिले होतेच. हा हिरवा रंग , गर्द हिरवा रंग होता आणि सर्व रंगांचे खडू त्यावर नीट उठून दिसत . (contrast काळ्यापेक्षा अर्थातच कमी .) अजून एक गंमत म्हणजे मी सृजन मध्ये असताना वर्गाच्या तीनही भिंतीना , व्हरांड्याच्या भिंतीना हाच हिरवा रंग अगदी खालच्या लेव्हल ला दिलेला होता . जेणेकरून आम्ही मुलं खाली जमिनीवर बसून ह्या फळ्यांवर रेखाटन करू शकत असू .
मला तरी कोण कुठे लिहिणार ह्यावरून भांडणे झालेली आठवत नाहीत म्हणजे बहुधा ह्या खालच्या लेव्हलच्या फळ्याचे slots ताई -दादांनी ठरवून दिलेले असणार .
बस्कर : बसण्यावरून आठवलं, आम्हाला बसायला बेंचेस नव्हते . सगळी मुलं जमिनीवर छोट्या बस्करांवर मांडी घालून बसत असु . आणि ताई -दादांना बसायला छोट्या उंचीची ( साधारण १ फूट किंवा कमीच) लाकडी स्टुल असत. शाळा तशी गरीब होती . एक तर दहा वर्षच जुनी , त्यातून विना-अनुदानित आणि फी देखील कमी. (बस्कर म्हणजे एकजण बसू शकेल एवढ्या छोट्या छोट्या सतरंज्या . आम्ही बस्कर म्हणायचो पण खूप दिवसात हा शब्द वापरला नाहीये कदाचित दुसरं काही म्हणत असतील . ) शाळा सुटल्यानंतर प्रत्येकाने आपापले बस्कर उचलून घडी करून ठराविक जागी ठेवायचं .
सामुदायिक वाढदिवस : शाळेत प्रत्येकाचे स्वतंत्र वाढदिवस साजरे होत नसत . वाढदिवसादिवशी नवीन कपडे घालून यायला किंवा वर्गात काही वस्तू / चॉकलेट वाटायला मनाई होती. कदाचित सगळ्या स्तरांतील विद्यार्थी असल्याने कोणी काय नवीन घातलं किंवा कोणी काय वस्तू वाटली ह्यावरून discrimination होवू नये म्हणून असेल.
आमच्या संपूर्ण शाळेचा वाढदिवस एकत्र साजरा होत असे, एका दिवशी . हा सामुदायिक वाढदिवस साजरा करण्याची जबाबदारी दर वर्षी तिसरीच्या पालकांची होती . चारही वर्ग, व्हरांडा छान सजवले जायचे , आणि काहीतरी जेवण कम खाऊ असायचा आणि प्रत्येकाला भेटवस्तू मिळायची एवढंच आठवतंय मला तरी .
शांततेची वेळ : सृजन मध्ये दर-रोज दुपारी साधारण छोट्या आणि मोठ्या सुट्टीच्या मधल्या काळात , सरस्वती-ताई एक घंटा ( घड्याळाच्या घंटे प्रमाणे ) वाजवत . ती घंटा वाजली कि चारही वर्गातले विद्यार्थी आणि ताई दादा ( आणि त्यावेळी शाळेत उपस्थित सगळेच जण ) ह्यांचं मौन सुरु होई . मला वाटतं ५ किंवा दहा मिनिटांनंतर सरस्वती ताई पुन्हा तशीच एक घंटा वाजवत. मग मौन सुटे . दररोज ही शांततेची वेळ असत असे आम्ही सगळेजण डोळे मिटून शांत बसायचो. मौनाच्या वेळेत चुळबुळ किंवा खुसूर -फुसुर करणार्यांचा निषेध होत असे आणि सिन्सिअर पणे मौन पाळणार्यांच कौतुक .
मला आठवतं, मंदार एकदा वर्गाबाहेर होता आणि तो वाटेत असताना मौनाची घंटा वाजली मग तो ग्राउंडवरच शांत उभा राहिला आणि मौन संपल्याची घंटा वाजल्यावर आला म्हणून गायत्री-ताईंनी त्याचं सगळ्यांना उदाहरण दिलं होतं . मी स्वत: प्रचंड बडबडी असल्याने तेवढा वेळ शांत बसणं पण जीवावर येत असणार पण त्याच काळात आई-बाबांनी SSY नावाचा कोर्स केलेला आणि ते दोघाही घरात ध्यान वगैरे करायचे . मग मी पण शांततेच्या वेळात डोळे मिटून ध्यान करायचा आव आणायचे !!
निषेध : हा सृजन आनंद मधल्या शिक्षेचा एक प्रकार . कोणी गैरवर्तणूक केली , मारामारी केली कि त्याला शिक्षा म्हणून संपूर्ण वर्गाने दोन्ही हाताच्या तर्जनी एकमेकांवर ठेवून एक क्रॉस करायचा आणि तीन वेळा निषेध -निषेध-निषेध असं एकत्र म्हणायचं . पूर्ण वर्गाकडून असा निषेध मिळणं खूपच मानहानीकारक वाटायचं.
निषेध हा एखाद्या घटनेचाही करत असू . कोल्हापुरात एकदा कसबा बावडा नावाच्या भागात वाघाने ( बिबट्या बहुतेक मला फार फरक कळत नाही ) छोट्या मुलीवर हल्ला केला होता . तेव्हा त्या घटनेचा जाहीर निषेध सकाळी प्रार्थनेच्या वेळी पूर्ण शाळेने केला होता . नंतर ह्या घटनेवर चर्चा पण केली होती कि त्या वाघाचा point of view काय असेल . त्याच्या घरावर (जंगलावर) आपण कब्जा केला म्हणून तर त्याने असं केलं नसेल ना ई. ई.
सृजन मध्ये ठराविक अभ्यासक्रम जरी असला तरी अशा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, प्रसंगानुरूप अनेक चर्चा होत असत. मुलांच्या विचारक्षमतेला वाव देणारे बरेच खेळ वर्गात आणि वर्गाबाहेर खेळले जात . सगळे तास interactive होते. शिक्षक आणि मुलांच्यात केवळ प्रश्नोत्तरे नाही तर चर्चा होत असत . मुलांना काय वाटतंय , ती काय विचार करतायत , कोणत्या दिशेने विचार करतायत हे जाणून घेणे हा ह्या चर्चांचा उद्देश असे .
शिक्षेबद्दल अजून एक म्हणजे, सृजन मध्ये कधीच कोणी मारलं नाही. चूक समजावून दिली जायची आणि आपण जे काही वागलो ते कसं चुकीचं आहे हे समजलं कि अपोआपच सुधारणा होत असे. ५वी नंतरच्या शाळेत काही शिक्षक लाकडी फूटपट्टीने मारायचे. विषयाची वही घरी विसरली किंवा गृहपाठ केला नाही अशा काहीही कारणाने. ते फार अमानुष वाटायचं .
टाळ्या : कोणाचही जाहीर कौतुक टाळ्या वाजवून केलं जात असे. पण सृजन मधल्या टाळ्यांची एक शिस्त होती. एक दोन एक दोन तीन -एक दोन एक दोन तीन -एक दोन एक दोन तीन ह्या लयीतच आम्ही टाळ्या वाजवायचो . हि पद्धत माझ्या नंतरच्या शाळेत जरी नसली तरी माझ्या नवऱ्याच्या पारंपारिक शाळेतही टाळ्यांची एक ठराविक लय ठरलेली होती .
गाणी : सर्वच प्राथमिक शाळांप्रमाणे सृजन मध्ये आम्हाला लहान मुलांची खूप वेगवेगळी गाणी शिकवली होती. बर्याचदा चारही वर्गांना एकत्र जमवून गाण्यांचा तास घेतला जाई .
सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे " गोरी-गोरी पान फुलासारखी छान , दादा मला एक वहिनी आण " ह्याऐवजी " हसणारी खेळणारी गाणारी छान , दादा मला एक वहिनी आण " असं गाणं शिकवलं होतं .
कोणाच्याही रंगावरून किंवा दिसण्यावरून ते माणूस चांगलं ठरत नाही तर गुणांवरून ठरत असं अप्रत्यक्षरित्या आम्हाला शिकवलं जात होतं .
स्नेह-संमेलन : सृजन आनंदमध्ये कोणताही नाच-नाटिका- गाणं असो, ड्रेपरी कागदाची असायची . नेहमीच्या गणवेशावर हि कागदाची ड्रेपरी घालायची आणि कार्यक्रम करायला जायचं स्टेजवर. आमची शाळा लहान मुलांच्या , एक दिवसाच्या स्नेह-संमेलनासाठी त्यांच्या कपडे आणि मेक-अप वर भरमसाठ खर्च करण्याच्या विरुद्ध होती. कागदाची ड्रेपरी बनवण्याची जबाबदारी अर्थातच ज्याच्या त्याच्या पालकांची पण त्यात पाल्याला सहभागी करून घ्या असं आवर्जून सांगितलं जायचं . एका वर्षी मी सूत्र संचालन केलं होतं तेव्हा आईने क्रेपच्या कागदाचा स्कर्ट केलेला आणि त्याला छोट्या छोट्या टिकल्या ठराविक अंतरावर लावायचं काम मला दिलेलं . जाम मजा आलेली. हा आमच्या स्नेह-संमेलनाचा एक फोटो :

सृजनचे पाहुणे : सृजनच्या मुलांची विविध क्षेत्रातल्या व्यक्तींशी , त्यांच्या विचारसरणीशी राहणीमानाशी ओळख व्हावी असं लीलाताई आणि बाकीच्या ताई दादांना वाटत असे. सृजन मध्ये असे पाहुणे यावेत , मुलांनी त्यांच्याशी गप्पा माराव्यात ह्यासाठी सगळेच प्रयत्नशील असत . मी सृजन मध्ये असताना भक्ती बर्वे, अनिल अवचट , यशोदा वाकणकर , राजू तेंडूलकर हे आलेले तर नक्कीच आठवतात . ह्याशिवाय बरेच पालकपण येत असत. कधी त्यांच्या व्यवसायाची तर कधी छंदांविषयी माहिती देत .
राजू तेंडूलकर हे क्रीडा-महोत्सवात आले होते आणि मी कोणत्या तरी ताई -दादा किंवा पालकांच्या चर्चेत ऐकलं होतं कि हे म्हणजे विजय तेंडुलकरांचा मुलगा आणि प्रिया तेंडुलकरांचा भाऊ . विजय तेंडूलकर माहिती असण्याचं वयच नव्हतं. पण टीव्ही वर जाहिरातीत वगैरे प्रिया तेंडुलकर माहिती होत्या . तर असच कोणत्यातरी स्पर्धा background ला चालू असताना ते जिथे उभे होते तिथं जाऊन मी विचारलं ( बुजणे वगैरे प्रकार माहितीच नव्हते !) कि तुम्ही प्रिय तेंडुलकरचे भाऊ का म्हणून . तर ते म्हणाले "नाही. मी राजू तेंडूलकर " ; मला तेव्हा कळलं नाही ते खोटं बोलले कि मी जे ऐकलं ते चुकीचं होतं . पण आता ते असं का म्हणाले ते उमगतय. प्रिय तेंडुलकरांचा भाऊ पेक्षा राजू तेंडूलकर हि ओळख त्यांना हवी असवी.
अशाच एका पाहुण्यांशी गप्पा मारताना आम्ही :

सहली : सहलींविषयी फारसं काही आठवत नाही. माझी पहिली overnight सहल पन्हाळ्याला गेली होती . पहिलीत असताना. कोल्हापूरच्या लोकांना पन्हाळा खूप सवयीचा असतो कारण बाहेर गावाहून कोणीही आलं कि त्यांना घेवून पन्हाळ्याला जाणं होतंच . पण त्या सहलीत आम्ही नेहमीची ठिकाणं पाहिलेली आठवत नाहीत . जंगल-झाडांतून केलेला ट्रेक आठवतोय आणि मोठी जाळीदार पानं गोळा केलेली आठवतायत .
एका वर्षी सहल वीट- भट्टीत नेली होती आणि आम्ही प्रत्येकांनी साचे वापरून विटा बनवलेल्या . साचे व्यवस्थित भरले नाहीत किंवा विटा पुरेशा भाजल्या नाहीत तर काय होतं असं काय काय सांगितलेलं .
अजून एका वर्षी शिरोलीला गेलेली आमची सहल. शिरोली कोल्हापूर जवळच छोटं गाव आहे . तिथले निलेश-शैलेश आमच्या शाळेत होते . शिरोलीच्या सहलीत शेतावर नेलेलं , गुऱ्हाळात गुळ बनवण्याची पूर्ण प्रोसेस दाखवलेली . लुसलुशीत चिक्की गुळ खायला दिलेला. शिरोलीच्या देवळात गेलो होतो आम्ही पण कोणता देव होता ते काही आठवत नाहीये . तिथे मी मोठ्ठा ढोल वाजवलेला ते पक्कं लक्षात आहे .
हा फोटो मी शिरोलीच्या देवळात ढोल वाजवताना :

आता थांबते. थांबताना परत हेच म्हणते कि पुन्हा भेटू.
ताजा कलम : ह्या लेखातील सर्व फोटो सृजन-आनंद विद्यालयाच्या संग्रहातून साभार. माझ्यापर्यंत पोहोचवण्याच श्रेय पुष्कर ह्या मित्राचं !!
-सिद्धी
आहा किती छान. शांततेची वेळ,
आहा किती छान. शांततेची वेळ, निषेध, कागदाची ड्रेपरी, पाहुणे, सहल, गाण्याच्या शब्दातला बदल हे फार आवडलं (म्हणजे जवळजवळ सगळच आवडलं की)
आताच्या पर्यायी शाळेत ही कल्पकता दिसून येत नाही. ध्यान ह्या नावाखाली ठराविक वेळेत मुलांना १५ मि. शांत बसवणे आणि हे पाच मि. कुठेही असताना करायचं ध्यान यात खुप फरक आहे.
बस्कर हा शब्द आम्हीही घरी वापरायचो. पण फारा दिवसांनी ऐकला.
खुप छान होती गं तुझी शाळा; सिद्धी.
असेच म्हणते. तुझी ही लेखमाला
असेच म्हणते. तुझी ही लेखमाला खूप आवडते आहे.
आमच्या पारंपरिक शाळेत पाचवीत श्री. खंडकर म्हणून वर्गशिक्षक होते. ते मुख्यत्वे कलाशिक्षक होते. आम्हांला मराठीही शिकवत असत. ते चांगलेच प्रयोगशील होते. श्रावणात एका शुक्रवारी वर्ग सजवून, नटूनसजून, अल्पोपहार करण्याची पद्धत आमच्या शाळेत होती. त्या वर्षीच्या श्रावणी शुक्रवारी खंडकर सरांनी अनेक अटी घातल्या.
५० पैशांहून जास्त वर्गणी काढायची नाही.
रफ वहीचे किंवा रद्दी वर्तमानपत्राचे कागद वगळता सजावटीला बाकी काहीही वापरायचं नाही.
खाऊ नेहमीच्या ठरीव गोष्टींपेक्षा निराळा असायला हवा.
मग त्यांनीच त्या अटींवर तोडगे काढून दिले. रफ कागदांच्या पट्ट्या फाडून त्याच्या माळा कशा करायच्या ते शिकवलं. ओरिगामीच्या वस्तू करून त्यांनी सजावट करता येईल हे सुचवलं. ६० मुलांनी ५० पैसे वर्गणी काढली, तर ३० रुपये येतील, त्यात काय खाऊ करता येईल त्याचा खल केला. मग बाजारातून पोहे, दही, दूध आणायचं. सरांनी स्वतः फळं आणायचं ठरलं. ज्यांना शक्य होतं, त्यांनी मीठ, साखर, मिरची, कोथिंबीर आणली. आणि आम्ही दहीकाला बनवून खाल्ला. यालाही कमी पडलेले पैसे अर्थात सरांनी पदरचे घातले असणार! आमच्या त्या वर्गाच्या एका खिडकीमागे काहीतरी नवीन बांधकाम केलं होतं. त्यामुळे त्या खिडकीला लागून ती विटांची विद्रूप भिंत येई. वर्गात काळोख. त्यावर उपाय म्हणून त्यांनी त्या खिडकीत ब्राउन पेपर चिकटवून घेतला. वर 'माझी खिडकी' अशी कागदी अक्षरं डकवली. तिथे तयार झालेल्या चौकटीचा वापर त्यांनी आमचीच लक्षणीय चित्रं आणि हस्तव्यवसायातल्या वस्तू लावायला केला. तिथे चित्रं लागलं की धन्य वाटे. आम्हांला बरेच दिवस वाटायचं, सगळ्यांच्याच वर्गात अशी 'माझी खिडकी' असतेच!
कधीतरी वर्गात प्रचंड दंगा केला, तेव्हा 'आम्ही सगळे नर्मदेतली गुळगुळीत गोटे आहोत' असं सामुदायिकरीत्या आम्हांला म्हणायला लावण्याची कल्पक शिक्षा त्यांचीच. नि आम्ही हे गंभीरपणे एका सुरात म्हटल्यावर त्यांनी खेदानं मान हलवलेली आठवते!
पुढे आठवी-नववीत एलिमेंटरी-इंटरमिजिएट परीक्षांसाठी नाव घातलं, तेव्हा शनिवार-रविवार त्यांचे वर्ग चालत. शनिवारी दुपारभर आणि रविवारी सकाळभर आम्ही शाळेतच पडीक. तेव्हा तर सरांशी जामच दोस्ती झाली. 'हां, हात थरथरतोय.... हातावर कमांड हवी.', 'तुझ्यात पेशन्स कसा तो अज्जिबात नाही.', 'रंग कसा लोण्यासारखा कालवायचा...', 'धर चित्र प्रकाशात. हे बघ कसं रंगवलं आहेस. असे फरांटे दिसता नयेत.', 'चित्रभर रंगासोबत नजर फिरली पाहिजे. मधेच रंगांची बेट नकोत.', 'प्रपोर्शन.. प्रपोर्शनचा विचार पहिला.' अशी त्यांची पेटंट वाक्यं अजुनी आठवतात.
शाळेशी निगडित असलेल्या बर्याच आठवणींत सर आहेत. सर अकाली गेल्यावर मला शाळेबद्दल काही वाटेनासं झालं, त्याचं आश्चर्य वाटत नाही. असो, इथे फारच अवांतर झालं.
तुम्हा सगळ्यांना माझी शाळा
तुम्हा सगळ्यांना माझी शाळा आवडतेय हे वाचून मला पण छान वाटतंय. :)
एक-दोन दिवसांत लीलाताईंनी लिहिलेला त्यांची ह्या शाळेमागची भूमिका स्पष्ट करणारा लेख टाकेन.
एक शंका आहे , इथे दिलेले फोटो मला खूपच बेढब आणि गरजेपेक्षा जास्ती आकाराचे वाटतायत. फोटोंचा आकार कमी कसा करायचा ?
admin rights ने कोणी केले तरी चालेल.
फारच गोड. लयदार टाळीवरुन
फारच गोड.
लयदार टाळीवरुन "अभिनंदन टाळी" आठवली.
एक दोन तीन चार पाच - एक दोन तीन- एक दोन तीन चार पाच - एक दोन तीन- एक दोन तीन चार पाच - एक दो..
इथे आणखी कोणाच्या शाळेत होती का?
बाकी निषेध हा प्रकारही आवडला. सूक्ष्म बाब अशी की निषेध सर्वांना कंपल्सरी करावाच लागायचा की ऑप्शनल होता? व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने खुलेपणा ठेवण्याची संधी म्हणून शाळेला ती घेता आली असती. :D
आमच्याकडे -सांगली शिक्षण
आमच्याकडे -सांगली शिक्षण संस्था- अठरा ताली फैल जाव अशी ऑर्डर सुटायची. (आता मलाच हे नक्की कसलं हिंदी आहे हा प्रश्न पडलाय, आणि ऑर्डर्स हिंदीत दिल्याशिवाय हवा तो 'पंच' हा येत नाही हा पाठोपाठ दुसरा प्रश्न). हां, तर ती अठरा ताली- "एकदोनतीनचारपाच, एकदोनतीनचारपाच, एकदोनतीनचारपाच, एक दोन तीन" अशी असायची.
आम्ही ५वी -६वी त शाळेच्या
आम्ही ५वी -६वी त शाळेच्या सहलीत हा खेळ खेळायचो-
एक मुलगी एका विशिष्ठ लयीत्/तालात म्हणणार - "हे लाल लय्यो"
अन्य सर्व मुली अगदी त्याच तालात म्हणणार "अय्यो-अय्यो"
- असा ताल बदलून खेळ चालत असे.
______________
गोव्याला सहल गेली होती. समुद्राकडे पाठ करुन पाण्यात गेल्याबद्दल बापट बाईंनी धपाटा (हलकेच) घातला होता :) मला वाटतं मुली उधळल्या होत्या अन बाईंना टेन्शन आलं होतं :P
_______________
डॉजबॉल मध्ये "कावळ्याचा डोळा" म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे एकीकडे पहात दुसरीला चेंडू फेकून मारायचा =))
_______________
गुलमोहराचे तुरे खाणे, पाकळ्यांच्या अंगठ्या करणे, जंगलजिम वर तर केवढ्या उड्या यायच्या- पोटावरची, पुढची, मागची, लंगडी वाली :)
_______________
झाडांना पाणी घालणे इतकं आवडायचं. महादू माळ्याकडून पाइप घेऊन मीच पाणी घालायचे.
बुचाची फुलं .... आहा! काय सुगंध असतात, किती उंच वृक्ष असतो :). काय मज्जा येते फुले वेचायला. अन मग उधळून द्यायला ही :)
________
एखादा तास ऑफ असला की चारुशीला गोष्ट सांगायची ओह माय गॉड ... किती रंगवून. :) अगदी हरखून अन तन्मयतेने आम्ही ऐकत असू. बानावळकरही सांगायची पण मला चारुशीलाची आवडायची.


आवडला. छान झालाय हा भागही.तो
आवडला. छान झालाय हा भागही.
तो मोर देखील तुम्हीच झाला आहात का? :)
तसाच चेहरा आहे दोन्ही फोटोत.