कथा
मुलगी आहे म्हणुन
============
"ए सागर चल बर पटपट . आधीच उशीर झालाय. आज संजय ने चावी नेली नाही,तो जर आधी पोहचला तर चिडेल माझ्यावर ". असे पुटपुटतच सरिता,सागर चा हात ओढत चालू लागली. तिला नेहमी पेक्षा आज उशीरच झाला होता, ऐनवेळी रूख्माने कामात गडबडी केली अन् तिला NGO मधून निघायला वेळ लागला.
सरिता संजय एक सुखी जोडपे आणि सागर त्यांचा गोंडस पाँच वर्षाचा मुलगा. दोघेही नौकरी करत , त्यामुळे सकाळ संध्याकाळ नेहमीच गडबडीत जात असे . उशीर झालाकी कधी कधी चिडचिड़ होत असे पण ते एक समंजस जोडपे होते.
लगबगीने सरिताने घर गाठले अन् हुश् केले संजय अजून आला नव्हता .तसा तो खूप शांत स्वभावाचा पण चावी नसली की त्याची पंचाइत व्हायची ,कोणाच्या त्याच्या फारशा ओळखीही नव्हत्या .
सरिता घरात आली फ्रेश होऊन चहा ठेवला अन् तिची नजर खिड़कीतून बाहेर गेली ,समोरच्या घराचा दर्शनी भाग दिसत होता . तिला तिथे एक सात आठ वर्षाची एक मुलगी आपलें दोन्ही हात गालावर ठेऊन बसलेली दिसली . बहुतेक कुणाची तरी वाट पाहत असावी . फस् आवाजाने तिची दृष्टि गँस कडे वळली चहाला उकळी फुटन तो ऊतू जात होता . तिने गड़बड़ीने गँस बंद केला अन् कपात चहा ओतुन घेतला व ती हाँल मध्ये आली .
संध्याकाळी काय स्वंयपाक करावा ह्या विचारात ती गढली , तेवढ्यात संजयही आला .गप्पा चहापान ह्यात तिला त्या मुलीचा विसर पडला. ती थोड्यावेळानी स्वंयपाक करण्यासाठी किचन मध्ये आली अन् नकळत तिची नजर खिड़कीतुन बाहेर गेली ,तिला अजूनही ती मुलगी तिथेच दिसली पण आता ती रडवेली झाली होती, हे पाहुन सरिता बेचैन झाली. तिला काही सुचेना. तिने आपलें लक्ष कामात गुंतवण्याचा प्रयत्न केला पण ते तिला शक्य झाले नाही . तिला राहवेनाच म्हणून तिने सागरला आवाज दिला," काय ग आई? "
" काही नाही रे ,इकडे ये. तुला ती मुलगी दिसते का रे? ओळखतोस तिला ?".
" कुठली ग" ?
"अरे ,ती समोर दिसते ती ."
" ती होय,ती ईशा."
" अच्छा म्हणजे तू ओळखतोस तर.तिच्या घरी कोण कोण असतां रे? कधी गेला होतस तिच्याकडे ."
"हो आम्ही नेहमीच जातो. खूप धमाल येते. तिचे बाबा पण साँलिड आहेत आम्हाला खाऊ देतात आमच्या सोबत खेळतात. काकू पण आमच्या सोबत दंगामस्ती करते."
"अरे वा ,म्हणजे तुम्ही फ्रेंड झालात की . बर मला सांग अजून कोण कोण असतं त्यांच्या कडे?"
"मला नाही माहीत", कंटाळलेल्या आवाजात त्याने उत्तर दिले व तो संजय जवळ गेला. सरिताला माहित होते आता विचारून काहीं फायदा नाहीं . तिने त्या मुलीवरून आपलें विचार बाजूला सारले व ती कामाला लागली. होता होता अर्धा तास कसा गेला कळलें पण नाही . ती त्या मुलीला कामाच्या रगाड्यात विसरली होती. सहजच तीने खिडकीतून बाहेर पाहिलें ती मुलगी अजूनही तिथेच पेंगूळलेल्या अवस्थेतेत होती.
तिला त्या मुलीची अवस्था पाहवेना. तिने संजयला बोलावले ,ती मुलगी दाखवली अन् तिच्या बद्दल काळजी दर्शवली. संजयला सरिताची बेचैनी लगेच लक्षात आली,त्याने तिला धीर दिला व तो त्या मुलीची विचारपूस करण्यासाठी गेला. इकडे सरिताची घालमेल वाढली तिला काही सुचेना,एकदम मनात भितीने घर केले,तिला दरदरून घाम फुटला व ती मटकन खाली बसली,क्षणात तिच्या डोळ्यां समोर तिचा भूतकाळ तरवळला.
क्लास सुटला आणि नेहमी प्रमाणे सरिता व मेघा थट्टा मस्करी करत घरी आल्या,दोघी एकाच बिल्डिंग मध्यें पण वेगवेळ्या फ्लोरवर राहत होत्या व लहानपणा पासुन एकाच वर्गात असल्या कारणानें साहजिकच दोघींची चांगली मैत्री होती. त्या दिवसी सरिताच्या घराला कुलूप होते. तिला आश्चर्य वाटले कारण सहसा ती घरी येण्याच्या वेळेस तिची आई दारातच वाट पाहत उभी असे . गेली असेल कुठे जवळपास ,येईल लवकर असा विचार करतच सरिता मेघा कडे गेली.
"अरे वा ! सरिता पण आली वाटते.! ये ये आत ये." मेघाच्या आईने तिचे तोंड भरून स्वागत केले. दोघी घरात आल्या .
"काकू ,आई काहीं सांगून गेली का?" सरिताने विचारले .
"नाही ग. इथेच गेली असेल जवळपास,येईल की इतक्यात. " असे म्हणत त्याच्या खाण्याचे आणन्यासाठी त्या किचन मध्ये गेल्या .
सरिताला माहित होते कि ती कुठे दिसली नाही तर तिची आई मेघाकडेच चौकशी करण्यासाठी येईल म्हणून ती निर्धास्थ होती. मेघा बरोबर खाणे झाले,गप्पा झाल्या,ह्यात एक तास कसा उलटून गेला हे ही समजले नाहीं . मेघाचे बाबा आँफिस मधून आले अन् त्या भानावर आल्या. सरिता मग घरी जाण्यास निघाली. मेघाचे बाबा काही तरी सांगत होते पण उशीर झाल्या मूळें तिचे लक्षच नव्हते. तीने झटकन बँग घेतली व घरी जाण्यास निघाली. कधी नव्हे ते ती इतका वेळ बाहेर राहिली होती. बारावीचे वर्ष म्हणून तिच्या आईचे बारिक लक्ष होते ,ती तिला फालतूचा वेळ वाया घालवू देते नव्हती. हे सगळे सरिताला माहित होते म्हणूनच तिला आश्चर्य वाटते होते.
ती खाली आली पण घराला अजूनही कुलूप वाकूल्या दाखवत लटकते होते. तिला आता घाबरायला होत होते ह्या आधी कधीच तिला न सांगता तिचे आई बाबा बाहेर राहिले नव्हते. तिने त्यांचा फोन ट्राय केला पण out of range हेच प्रत्येक वेळेस उत्तर मिळत होते. ती रंणकुंडीला आली. शेवटीं परत ती मेघा कडे गेली. तिचा चेहरा पाहुनच कळत होते काही तरी गडबड झाली आहे. त्यांनी तिला पिण्यास पाणी दिले व ती शांत झाल्यावर काय झाले ते विचारले . जेव्हां त्यांना खरी परिस्थिति समजली तेव्हां त्यांनी तिला धीर दिला . तिच्या कडून तिच्या नातेवाईक फोन नंबर घेतला ,सगळ्यांना फोन केला . तिच्या आई बाबा ची चौकशी केली.पण कुठूनच काही कळाले नाही . आता मात्र सरिताचे धाबे दणणांले . तिच्याही नकळत अश्रु जमा झाले डोळ्यात. मेघाच्या बाबांनी तिला धीर दिला कपड़े केले व तिला घेऊन ते पोलिस स्टेशन ला गेले.
पोलिस स्टेशन मधले ,ते अर्वाच शिव्या ,लाचार भाव,लोचट नजर, खूनस नजर अन् मारझोड असले वातावरण पाहुन सरिता खूप घाबरली . तिने नकळत काकांचा हात घट्ट पकडला. तिला त्या वातावरणातून कधी एकदा बाहेर पडेल असे झाले होते. तिची मनोवस्था त्यांच्या लक्षात आली,त्यांनी हातावर थोपटत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने complaint लिहून घेणारे खूप सज्जन होते ,२४ तासा नंतरच complaint लिहता येईल तोपर्यत धीराने वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी त्यांना दिला. निराश मनाने ते घरी परतले. ती रात्र कशीबशी काढली व दूसर्या दिवशी परत शोधा शोध सुरू झाली. पोलिसाच्या मददतीने रेल्वे स्टेशन ,बस स्टैन्ड ,दवाखाने इतकेच नाही तर शवाघर ही शोधून झाले पण कुठेच त्यांचा काही ठावठिकान लागत नव्हाता. इतकेच नाही तर पोलिसाच्या उपस्थितीत घराची पण तपासनी केली . दहा हजार रोकड़ रक्कमें शिवाय काहिही हाती लागलें नाही. सरिताची अवस्था तर खूपच बिकट झाली होती. जवळचे नातेवाईक असे कुणी नव्हतेच. एक आत्या होती , पण परदेशी . कुणालाच काय करावे हे लक्षणात येत नव्हते. शेवटीं वाट पाहण्या शिवाय गत्यंतर नाही ह्या निष्कर्षावर ते आले .
काही मदद लागली तर निसंकोच पणे मेघाच्या घरच्याना सांगणार ह्या बोलीवर तिला तिच्या घरी राहण्याची परवांगी तिला त्यांनी दिली. मेघा तिला एकही क्षण एकटी सोडत नव्हती . ती ही कसलाही विरोध न करता सगळे एखाद्या निर्जीव बाहुली सारखं ऐकत व करत होती . होता होता आठ दिवस उलटले पण कुठूनही काही बातमी लागत नव्हती . मेघाच्या व तिच्या घरच्या मडळीच्या समजूतीने ती थोडी सावरली. बारावीची परिक्षा आठ दिवसावरच आल्या कारणान् मेघाने तिला जबरदस्तीने अभ्यासाला बसवले ,पण तिचे अजिबात लक्ष लागत नव्हते ,निव्वळ तिला दुखवायचे नाही म्हणून ती तोंडा समोर पुस्तक घेऊन बसत होती . होता होता परिक्षा पार पडली. आजूनही काहींच माग लागत नव्हता . महिना उलटला जवळचे पैसे ही संपत आसे शिवाय सुट्टीही होती म्हणून तिने पार्ट टाइम जाँब करण्याचे ठरवले. तिला आठ दिवसातच ओळखीने नौकरी मिळाली . दिड- दोन महिण्यात हिच ती काय चांगली घटना घडली होती तिच्या आयुष्यात .
ती थोडी सावरून नौकरीत रूळली . तीचा आठरावा वाढदिवस दोन दिवसावर येऊन ठेपला. ती करणारच नव्हती पण मेघाच्या हट्टा मुळें दोघीच बाहेर जाऊन पाणीपूरी खाणार होत्या. पण नियतीला तेही मंजूर नव्हते बहुतेक म्हणूनच आदल्या संध्याकाजळीं एक जोडपे आले आणि त्यांनी जे सांगीतले ते ऐकून सारं जगच आपल्या भवति फिरतय अस तीला झाले. तिने स्वतःला कसे बसे सावरले व तडक मेघा कडे गेली. जेव्हां तिने मेघाच्या बाबांना सविस्तर सांगीतले तेव्हां त्यांची ही तिच स्थिति झाली जी सरिताची झाली होती. सरिताच्या बाबांनी ते घर त्या गृहस्थाला दिड महिण्या पूर्वीच विकले होते . ते दोघेही लगबगीने आले त्यांनी सर्व कागदपत्र पडताळून पाहिली ,ती सर्व खरी होती .
मेघाच्या बाबांनी त्याना विचारले कि जर हे घर त्यांनी दिडमहिण्या पूर्वी घेतले तर ते तेव्हांच का आले नाही? त्यांनी त्याचे स्पष्टीकरण देताना सांगितले कि काही घरगुती अडचणीमुळें त्यांना बाहेर गांवीं जावे लागलें होते व ते परवाच परत आले शिवाय घराची चावी त्यांना त्याच वेळेस मिळ्याल्या मुळें ते निर्धास्थ होते. ते काल सकाळीच इथे आले पण दरवाजा उघतेवेळी बाजूच्या आजीने त्यांना आटकाव केला व संध्याकाळी भेटावयास येण्यास सांगीतले. त्यांना अश्चर्यच वाटले कारण असे काही घडेल अशी त्यांनी कल्पना केली नव्हती शिवाय तशी कुणी कल्पनाही त्यांना दिली नव्हती.
आई बाबानी असे का केल हे समजायला काहींचि मार्ग नव्हता . तिच्यावर वर तर आभाळच कोसळले ,तरीही ते घर त्यांच्या ताब्यात देण्यावाचुन तिच्या जवळ कुठलाच पर्यायच उरला नव्हता. जेव्हा त्या गृहस्थाला सगळी परिस्थिति समजली तेव्हां त्यांनी आठदिवस तीला तिची अन्यत्र व्यवस्था करण्यास दिले.
ती संज्ञान व नौकरी करत असल्या मुळें तिची working women hostel मध्ये व्यवस्था झाली. नौकरी करत करत तीने शिक्षण घेण्यास सुरवात केली.
होता होता ह्या घटनेला दोन वर्ष झाली पण तिच्या आई बाबाचा काहीही ठावठिकाणा कळला नव्हता . आत्याशी कधीच सलोख्याचे संबंध नव्हतें त्यामुळे तिच्या कडून काही समजेल ही आशा ठेवणे व्यर्थ होते. अशिच ती एकदा मेघा कडे आली असतांना त्यांच्या शेजारचे पण तिच्या लहानपणीच दुसरी कडे शिफ्ट झालेले दामले आजोबा भेटले ,गप्पाच्या ओघात तिचे आई बाबा त्यांच्या कडे दिड दोन वर्षा पुर्वी येऊन गेल्याचे समजले. तिची आशा पल्लवीत झाली तेव्हां त्यांनी जे सांगीतले ते न सांगीतले असतें तर बरे झाले असतें असे सरिताला वाटुन गेले.
त्यांनी तिला सांगीतले की तिच्या आई बाबांना मूल होत नव्हतेंचि त्यामुळे त्यांच्याच ओळखीने त् मुल दत्तक घेतले होते. ते मुलगाच दत्तक घेणार होते पण त्या वेळेस तिथे त्यांना हवा तसा मुलगा मिळाला नाही. सरिताचे गोजिरे रूप व टोपाेरे डोळ्यांची त्यांना भूरळ पडली व ते तिला घेऊन घरी आले . ते तिच्या बाळलिलात रमले पण कुण्या नातेवाईकाने "मुली पेक्षा मुलगाच दत्तक घेतला असता तर बरे झाले असते ,किती जरी झाले तरी मुलगी ही परक्याचे धन" असे म्हणाले की ते अस्वस्थ होत. त्यांना मुलगा मुलगी समांतेवर वांरवार उदा देउन समजावले तेव्हा ते शांत झाले असे वाटले पण.... काही वर्षापूर्वी त्यांची भेट झाली तेव्हा ते थोडे अस्वस्थ वाटले . त्यांच्या मनातुन मुलगा -मुलगी हा भेदभाव काही मिटला नाही . त्यांच्या मतानूसार मुलगी दत्तक घेण्याचा त्यांचा निर्णय चुकलाच कारण त्यांचे म्हणने होते कि मुलगा असतातर त्यांचे नाव जन्मभर त्यांने लावले असतें व त्यांचा लोकलज्जेस्तव का होईना सांभाळ केला असता.पण मुलगी असल्या कारणाने संज्ञान झाल्यावर त्यांच्या संपत्ति वर तिचा हक्क झाला असता व लग्न झाल्यावर सासरच्या दबावाने तिला सर्व द्यावें लागलें असतें व ते देशोधडीला लागलें असते. दामले आजोबांनी अशी संकुचित विचारसरणी सोडून देण्यास परोपरी समजावुन सांगीतले . तिच्या आईला पटल्या सारिखें वाटले पण ह्या घटने वरून तिच्या वडिलाच्य विचारसरणीत काही बदल झाला नाही हेच निष्पण झाले.
हे सर्व ऐकून सरिताच्या पाया खालची जमीनच सरकली तिला आपल्या बाबाच्या ह्या संकुचित विचारसरणीवर हसावे की रडावे हे समजेनासे झाले.
बेलच्या आवाजाने सरिता भूतकाळातुन खाडकन बाहेर आली . तीने लगबगीने दार उघडले दारात संजय हसतमुखाने उभा होता . तिच्या प्रश्नार्थ नजरेचे भाव टिपत त्यांने सांगीतले कि ,इशाचे आई बाबा परत आले .लोकलची ओहरहेड वायर टूटल्याने त्यांना उशीर झाला . हे ऐकल्यावर सरिताच्या जीवात जीव आला . कुणी असे दारात आई बांबाची वाट पाहतांना आढळून आले कि तिचा भूतकाळ तिच्यावर वरचड होतो व ती अस्वस्थ होते हे संजय जाणून होता.
संगीता देशपांडे
प्रतिक्रिया
ऐसीवर स्वागत. तुम्हाला
ऐसीवर स्वागत. तुम्हाला लिखाणाचं तंत्र चांगलं जमलेलं आहे, कथा ओघवती आहे. घटनांची मांडणी उत्तम - बाहेर उभी असलेली मुलगी पाहून फ्लॅशबॅकमध्ये प्रसंग आठवणं हेही छान. मात्र त्यानंतर एक प्रश्न आणि त्याचं एक उत्तर या स्वरूपाची, लवकर आटपल्यासारखी वाटली. केवळ मुलगी आहे म्हणून दत्तक मुलीला इतकी वर्षं वाढवून टाकून देणारे आईवडील चटकन डोळ्यासमोर उभे राहात नाहीत. ते पटण्यासारखे होण्यासाठी आधीच्या आयुष्यातले प्रसंग, ती मुलगी असल्याबद्दलचा दुस्वास, यातून आईवडिलांचं व्यक्तिचित्र उभं करण्याची गरज वाटली.
कथा आवडली.
कथा आवडली.
एक वेडा संशोधक....
बाप रे. कथा आवडली
बाप रे. कथा आवडली