Skip to main content

सीमोल्लंघन

dasara

गेल्या वर्षी च्या दसऱ्या नंतर whatsappwhatsapp वर आलेले हे चित्र.
मराठी भाषिकांची संख्या बऱ्यापैकी असलेल्या कुठल्याही शहराचे असू शकेल असेल.
सोने लुटण्याची, सीमोल्लंघन करण्याची परंपरा महाराष्ट्रा बाहेर कुठे असल्याचे मी पहिले नाही
खरीप हंगाम कितीही कष्ट करून वर्षभराला पुरेल एवढे काही हाती लागणार नाही अशी अंजन कांचन करवंदीची नापीक जमीन. तेंव्हा पीक हाती येण्याच्या सुमारास सुपीक प्रदेशात लुटालूट करायला जाणे हा बरा धंदा वाटत असावा.
त्यातून गुजरात आणि माळवा जवळच. क्षात्र तेजात कमी पण समृद्धी निर्माण करण्यात कुशल. लुटायला सोयीचा.
बाहुबली warlords नी (गुडांनी) या लुटालूट करण्याचे एक झकास Ritual बनवले.
मध्यभारतात ठगांनी केले तसे धर्माचा भाग बनवून टाकला.
मराठेशाहीतील राज्यकर्त्यांनी (जातीवाचक घेऊ नये त्यात पेशवे सुद्धा आलेच) जेंव्हा मोठी सैन्ये उभारली तेव्हा त्यांचा आवाका पार अटके पर्यंत वाढला. पण प्रेरणा तीच. कष्टा पेक्षा लुट बरी.
भाषावार राज्य रचने मुळे महाराष्ट्रात असलेल्या पण खरोखर “दगडांचा देश” नसलेल्या विदर्भातही अशी परंपरा आहे का?
नागपूरकर भोसले लुटारूपणा बद्दल पार बंगाल पर्यंत प्रसिद्ध होते आणि आहेत. बंगाली लोकगीतांमध्ये अतिशय क्रूर “मराठा दस्यू” चा उल्लेख दिसतो. पण ते पश्चिम महाराष्ट्रातूनच नागपूर ला गेलेले असणार (बहुतेक)

राजेश घासकडवी Mon, 10/10/2016 - 18:12

कृपा करून व्हॉट्सअॅपवर आलेलं काहीतरी इथे डकवून त्याचा धागा करू नये. चर्चेचा प्रस्ताव मांडण्यासाठी ऐसीवरच्या आयडीने किमान मांडणी, मेहेनत करावी अशी अपेक्षा आहे. नुसतीच बातमी दाखवून द्यायची असेल तर 'ही बातमी समजली का' या धाग्यावर प्रतिसाद द्यावा. ऐसीच्या ध्येयधोरणांत चर्चा चालवण्याविषयी मार्गदर्शन आहे.

लवकरच हा 'धागा' 'ही बातमी समजली का' या धाग्यात हलवण्यात येईल.
- संपादक

चिंतातुर जंतू Mon, 10/10/2016 - 18:50

In reply to by Nile

>> मला टिंडरवर आलेल्या मेसेजेसचा धागा काढायचा आहे. चालेल का हो?

'मी आणि माझ्या टिंडरसख्यांमधले नातेसंबंध' असा लेख दिवाळी अंकात लिहा. त्यात हे मेसेजेस आणि काही स्क्रीनशॉट्ससुद्धा टाका ;-)

मूर्तिभंजक Mon, 10/10/2016 - 20:59

WHATSAPP संदेशामधील चित्र केवळ निमित्त म्हणून वापरले होते. WHATSAPP च उल्लेख केला नसता तर कदाचित त्याच्या खालील ओळी वाचायची तसदी कुणी तरी घेतली असती. ही चूक झाली. पुन्हा करणार नाही.

अरविंद कोल्हटकर Tue, 11/10/2016 - 10:02

'मूर्तिभंजक' ह्या आयडी वरून असे वाटते की जुन्या निरर्थक चालींवर आसूड ओढणे हा वरील लेखामागील उद्देश असावा. असा उद्देश असणे चू़क नाही पण ज्या चालीवर आसूड ओढायचा आहे तिची आधी पूर्ण माहिती घेऊनच आसूड ओढला गेला पाहिजे.

मराठा सैन्यांचे दसर्‍याचे सीमोल्लंघन आणि आपट्याची पाने लुटून त्यांचा कचरा सर्वत्र करणे ह्या दोहोंमध्ये काही मोठा अर्थपूर्ण संबंध आहे असे धागाकर्त्याने गृहीत धरले आहे. तसेच मराठ्यांचे सीमोल्लंघन हे पुढच्या महिन्यांतील लुटीची पहिली पायरी असाहि अर्थ धागाकर्त्यास जाणवत आहे असे वाटते. हे दोन्ही कल्पित संबंध पूर्ण चुकीचे आणि इतिहास आणि परंपरेचे गाढ अज्ञान असल्याचे द्योतक आहेत.

सीमोल्लंघनाची प्रथा कशी पडली? अर्जुनाने अज्ञातवासामध्ये आपली शस्त्रे शमीवृक्षावर लपवून ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्याने ती शस्त्रे काढून त्यांना साफसूफ करून ती पुनः धारण केली आणि येणार्‍या संघर्षास सामोरे जायला तो सज्ज झाला. हे अश्विन दशमीस झाले म्हणून त्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते आणि संघर्षाचे पहिले पाऊल म्हणून 'सीमोल्लंघन' केले जाते हा पारंपारिक अर्थ. (अशी शस्त्रपूजा म्हणून आजहि आपापल्या कामाच्या अवजारांची, यंत्रांची पू़जा केली जाते.) दसर्‍याला पावसाळा संपलेला असतो आणि सैन्याला हालचाल करणे ह्यापुढे सोपे होते. (पक्के रस्ते कोठेच नसल्याने पाञ्स असतांना सैन्याची हालचाल करणे अवघड हे एक कारण. दुसरे कारण म्हणजे मराठा सैन्य हे १२ महिने paid standing army अशा प्रकारचे फार थोडे होते. बहुतेक सैनिक पावसाळ्यात आपापल्या शेतीकडॅ लक्ष देण्यासाठी गावी परतत हे दुसरे कारण.) ह्या कारणाने दसर्‍याला सर्व मोहिमांचा लाक्षणिक प्रारंभ होत असे आणि त्याला 'सीमोल्लंघन' असे लाक्षणिक नाव मिळाले. मराठे हे केवळ लुटालूटच करीत असत हाहि एक ऐतिहासिक भ्रमच आहे. मराठे हे त्यांना मोगल बादशहाकडून मिळालेल्या सनदेनुसार चौथाई-सरदेशमुखी वसूल करण्यासाठीहि निघत असत. अनेकदा अशी चौथाई-सरदेशमुखी सैनिकी बळाचा उपयोग करून सक्तीने मिळवावी लागे हेहि सत्य आहे. अशी वसुली करणे हे वसुली ज्यांच्याकडून केली जाई त्यांना लुटालूटच वाटेल. सर्व दृष्टिकोनाचा मामला.

मराठ्यांच्या 'सीमोल्लंघना'चा असा अर्थ सांगितल्यावर 'सोने लुटण्या'कडे वळू. ह्या चालीचा उगम रघुवंशातील रघु-कौत्स कथेमाध्ये आहे. कौत्स हा मुनि आपले शिक्षण गुरुगृही पूर्ण करून परतत आहे पण गुरूने मागितलेली गुरुदक्षिणेची प्रचंड रक्कम - १४ कोटि सुवर्णमुद्रा - देणे त्याच्या शक्तीपलीकडचे आहे. रघु हा दातृत्वासाठी प्रख्यात राजा आपल्याला ही रक्कम देईल अशा अपेक्षेने तो रघूकडे येऊन त्याला ह्या रकमेची याचना करतो. रघूपाशीहि इतकी रक्कम कोषागारात नसते पण याचकास विन्मुख पाठविणेहि त्याला शक्य नसते. म्हणून कौत्साकडून काही मुदत मागून तो कुबेरावर स्वारी करून त्याच्याकडून ही रक्कम जिंकण्याची तयारी सुरू करतो. कुबेरास ह्याची वार्ता कळताच युद्ध टाळण्यासाठी तो रातोरात १४ कोटि मुद्रांहूनहि कितीतरी अधिक धन शमी आणि आपटा ह्या दोन वृक्षांवर ओततो. सकाळी रघूच्या रक्षकांना हे दिसताच ते रघूकडे येऊन ही वार्ता त्याला देतात. आनंदित रघु त्यातील त्याच्या आवश्यकतेचे द्रव्य १४ कोटि इतकेच घेऊन ते कौत्साला अर्पण करतो आणि बाकीचे उचलून नेण्याची आज्ञा प्रजेस करतो आणि आनंदित प्रजाजन ते धन लुटून नेतात. अशी ही कथा आहे. तिचा मूळ स्रोत कोठेतरी महाभारत-पुराण इत्यादींमध्ये असेल तो मला माहीत नाही पण रघुवंशाच्या ५व्या सर्गात कालिदासाने ही कथा पूर्णपणे सांगितली आहे. त्याची आठवण म्हणून दसर्‍याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटले जाते.

आपट्याची पाने 'लुटून' आपट्याची झाडे भुंडी करणे आणि पानांचा गावभर कचरा करणे हे पर्यावरणविघातक आहे म्हणून ह्या चालीचा आता विरोध व्हावा हे पटण्याजोगे आहे. ह्या चालीचा मराठे 'लुटी'साठी दसर्‍याला सीमोल्लंघन करून निघत ह्याच्याशी संबंध जोडणे चूक आहे.

'सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनि आला.
बहीण काशी येउनि दारी ओवाळी त्याला.
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा."

सुधीर Tue, 11/10/2016 - 16:37

In reply to by अरविंद कोल्हटकर

"सोने लुटुनी सायंकाळी मोरू परतुनि आला.
बहीण काशी येउनि दारी ओवाळी त्याला.
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा."

या पंक्ती कोणाच्या? त्यातली फक्त शेवटची ओळ माहीत होती.

'न'वी बाजू Tue, 11/10/2016 - 18:07

In reply to by अरविंद कोल्हटकर

कुबेरास ह्याची वार्ता कळताच युद्ध टाळण्यासाठी तो रातोरात १४ कोटि मुद्रांहूनहि कितीतरी अधिक धन शमी आणि आपटा ह्या दोन वृक्षांवर ओततो. सकाळी रघूच्या रक्षकांना हे दिसताच ते रघूकडे येऊन ही वार्ता त्याला देतात. आनंदित रघु त्यातील त्याच्या आवश्यकतेचे द्रव्य १४ कोटि इतकेच घेऊन ते कौत्साला अर्पण करतो आणि बाकीचे उचलून नेण्याची आज्ञा प्रजेस करतो आणि आनंदित प्रजाजन ते धन लुटून नेतात.

सोने हे मूल्यवान द्रव्य अशा प्रकारे (१) मार्केटात अक्षरश: डंप केल्यावर नि (२) वाटेल त्या फडतूसास अव्हेलेबल फॉर द आस्किंग केल्यावर (अक्षरश: रस्त्यात पडल्यावर नि कोणीही यावे नि रस्त्यातून उचलून जावे असे केल्यावर), त्याची मार्केट व्ह्याल्यू धाड्कन कोसळणार नाही काय?

कुबेरास फेडरल रिझर्वचा अध्यक्ष कोठल्या गाढवाने केले?

.शुचि Tue, 11/10/2016 - 18:08

In reply to by 'न'वी बाजू

कुबेरास फेडरल रिझर्वचा अध्यक्ष कोठल्या गाढवाने केले?

इंद्र ;)
बाय द वे कुबेर हा शंकराचा मित्र आहे असे बर्‍याच स्तोत्रात आढळते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 19:28

In reply to by Nile

मलाही कथा माहीत नव्हती.

बिटकॉइनजी बाळा Tue, 11/10/2016 - 18:50

In reply to by अरविंद कोल्हटकर

वरील कथा कळाली. शमीच्या वृक्षाला अर्जुनाच्या आणि कौत्साच्या दोघांच्याही कथेत गुंफण्यात आले आहे. शस्त्रांच्या पुजेचा माग अर्जुनाच्या कथेत आणि सोने लुटायचा माग कौत्साच्या कथेत असे वेगवेगळे लावून दिले आहेत असंच तुमच्या प्रतिसादातून स्पष्ट होतं.
मऱाठी मुलुखाने रघुवंशातील कथा परंपरा म्हणून स्वीकारणे जरा जड जाते. त्यामुळे तिचा उगम शोधणे रोचक ठरेल.
मराठी मुलुख सोडता आपट्याची पाने सोने म्हणून लुटायची प्रथा संपूर्ण भारतभर हवी होती. किंवा तिचे अंश असायला हवेत. ती तशी आहे का?
पण दसरा म्हणून या दिवसाला संपूर्ण भारतभर खूप महत्त्व आहे हे नक्की.
"अश्विन दशमी" मग देवीच्या नावे कसा जोडला गेला? नेमके देवीने अश्विन दशमी बघून नवरात्र केले का?
महाभारत आणि रामायण यापैकी रामायण जुने म्हणून रामाने केलेला वध म्हणून या दिवसाला महत्त्व आले का? त्यामुळे सैन्यासाठी नव्या मोहिमांचा हा दिवस ठरला का?

की मातृशक्तीची उपासना अधिक प्राचीन म्हणून या दिवसाला महत्व आले का? पण नेमके सांधे जुळेनात.
अधिक कुठे आणि काय वाचावे? मी ढेर्‍यांचे तुळजाभवानीचे पुस्तक ऐकले आहे, त्यामध्ये माहिती सापडेल का?

मूर्तिभंजक Tue, 11/10/2016 - 21:31

In reply to by बिटकॉइनजी बाळा

रामाने रावणाचा, देवीने महिषासुराचा वध करायला, पांडवानी अज्ञातवास संपवायला आणि रघूने कुबेराकडून खंडणीखोरी करायला एकाच दिवस निवडावा हा अफाट योगायोग म्हणावा लागेल.
हा अंदाजपंचे सुगीचे दिवस साजरे करायचा सण असावा. पण तसेही खात्रीने नाही कारण शेती solar calender नुसार होते आणि सण lunar नुसार. शिवाय काही गरवी पिके अजून कापणीला आलेली नसतातच.

मारामाऱ्या आणि लुटालूट करायला पावसाचा जोर कमी झाला असणार एवढेच नक्की म्हणता येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 22:14

In reply to by मूर्तिभंजक

योगायोगाची गरज नाही. लोककथा, दंतकथा कशा बनतात, ह्याचा अभ्यास केला तरीही हे समजेल.

पांडव, महिषासुर, राम-रावण, रघु-कुबेर हे लोक अगदी पौराणिक झाले. त्या हिशोबात तुकाराम अगदी अलीकडचे, १६ व्या शतकातले. तरीही त्यांच्याबद्दल दंतकथा आहेत. सदेह वैकुंठाला जाणं, गाथा इंद्रायणीत तरून वर येणं, हे चमत्कार लोकांनी जोडलेले आहेत. मग पौराणिक काळातल्या कथांना एकच मुहूर्त लावणं किती कठीण आहे!

मूर्तिभंजक Tue, 11/10/2016 - 22:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कहाण्या खरच घडून गेल्यात आणि तेंव्हापासून या प्रथा आहेत असे समजणाऱ्या एसी करांसाठी होते ते.
दंतकथा म्हटले की संपूर्ण पणे काल्पनिक असे गृहीत - हे पटेल का त्यांना?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 22:41

In reply to by मूर्तिभंजक

कोणाला पटेल, हे मी सांगू शकत नाही.

ह्या दंतकथा पूर्णपणे रचलेल्याच असतील, शुद्ध १००% कपोलकल्पितच असतील ह्यावर माझाही पूर्ण विश्वास नाही. स्थानिक पातळीवर अशासारख्या काही घटना घडल्याही असतील. आजूबाजूला घडलेल्या गोष्टींमधून ललितलेखनाची प्रेरणा मिळते. ह्या घटना लिहिताना बढाचढाके लिहिलेल्या असतील. पण उदाहरणार्थ, समाजामध्ये 'देवी' समजलेल्या एखाद्या स्त्रीने एखाद्या 'राक्षस' समजल्या गेलेल्या पुरुषाला मारलं असेल, ही गोष्ट अतार्किक, अशक्य कोटीतली वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 22:58

In reply to by मूर्तिभंजक

बाईने पुरुषाला मारलं, ह्या बातमीपासून देवीने महिषासुराचा वध केला, इथपर्यंत ललित लिहिता येतं. तर त्या बातमीला मुहूर्त देणं कितपत कठीण आहे? आपल्याकडे, १७-१८ व्या शतकातले पेशवे मुहूर्त बघून युद्धाला निघायचे. आणखी शेकडो/हजारो वर्षं आधीचं यथातथा बुककिपींग आणि मुहूर्तप्रेम ह्या दोन्ही गोष्टींची कल्पना करा थोडी.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2016 - 23:59

In reply to by मूर्तिभंजक

पैश्याकडे पैसा जातो आणि मुहूर्ताकडे मुहूर्त. पण हे काही डिरॅक डेल्टा फंक्शन नाही. होळी, नागपंचमी, पांडवपंचमी, कालियामर्दन, नरकचतुर्दशी, महाशिवरात्री, हनुमानजयंती/हनुमानाने सूर्यावर हल्ला केला तो दिवस, वेगवेगळ्या दिवशी येतात. (धार्मिक लोकांकडून अधिक तपशील मिळतीलच.) शिवाय सीतेला त्यागण्याचा दिवस, पांडवांचा, कृष्णाचा मृत्युदिन, ह्यांची नोंदच नाही.

अरविंद कोल्हटकर Wed, 12/10/2016 - 00:18

In reply to by मूर्तिभंजक

आणि मग त्या दसऱ्याचा मुहूर्त बघून घडल्या?

ह्या चार घटना दसर्‍याचाच मुहूर्त बघून का घडल्या हे स्पष्ट करण्याची जबाबदारी आमची नाही कारण ह्या चारांपैकी एकाहि गोष्टीच्या निर्मितीत आमचा हातभार नाही. आम्ही केवळ जे आहे ते तुम्हाला दाखवले. इतउप्पर ह्या सर्व कथा विजयादशमी ह्या एकाच दिवसाभोवती का घुटमळत आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचेच असेल तर तुम्हालाच त्या कथांच्या मुळापर्यंत जाऊन त्या कशा निर्माण झाल्या, मुळात त्या कोणी तयार केल्या इत्यादि गोष्टी शोधाव्या लागतील. ते काम आमच्याकडे आउटसोर्स करू नका.

बिटकॉइनजी बाळा Wed, 12/10/2016 - 00:34

In reply to by अरविंद कोल्हटकर

:) दसऱ्याचाच मुहूर्त आउटसोर्सिंगला चांगला. दसऱ्याच्या दिवशी नाही म्हणू नका!

बिटकॉइनजी बाळा Tue, 11/10/2016 - 22:48

In reply to by मूर्तिभंजक

>>मारामाऱ्या आणि लुटालूट करायला पावसाचा जोर कमी झाला असणार एवढेच नक्की म्हणता येईल.
हीही प्रोसेस मग लुनार कॅलेंडर पाहून साग्रसंगीत करायला आणि त्याला प्रतिष्ठा द्यायला दिड-दोन हजार वर्षे लागलीच की! तुम्ही मध्ययुगीन मराठ्यांच्या बाबतीत बोललात म्हणून म्हणालो.

मूर्तिभंजक Tue, 11/10/2016 - 22:58

In reply to by बिटकॉइनजी बाळा

अगदीच कबूल..
पण दशहरा solar कॅलेंडर चौकटीत कितीही वर खाली झाला तरी retreating मॉन्सून सुरु झाल्यावरच येतो. त्यामुळे सोय एवढेच.

.शुचि Tue, 11/10/2016 - 20:11

In reply to by अरविंद कोल्हटकर

याच नवमीस "खंडेनवमी" म्हणतात असे स्मरते, ज्या दिवशी शस्त्रास्त्रांची पूजा होते. कालनिर्णयमध्ये मात्र महानवमी/एकवीरा नवमी असा उल्लेख आहे.
आज , दसर्‍याला वाहनांची पूजा होते ना?

मूर्तिभंजक Tue, 11/10/2016 - 21:12

In reply to by अरविंद कोल्हटकर

अश्या अनेक कथा ऐकत आपण सर्वच वयाने मोठे झालो. हा काटेकोर इतिहास असू शकत नाही असे जाणवण्याची अक्कलही आली. बहुतेकदा संपूर्ण कापोल्काल्पित असणार हेही दिसत असते.

माझ्या लिहिण्यातला प्रश्न असा होता की लाक्षणिक का होईना, सीमोल्लंघन करून सोने लुटायला जाण्याची प्रथा महाराष्ट्रा बाहेर कुणी पहिली आहे का?

एखादा समाज पुराणातील नेमकी सोयीची कहाणी आपल्या मजबूरी ला justify करायला वापरतो. अपराधीपणाची जाणीव बोथट करायला, सदसदविवेकबुद्धी ची टोचणी चुकवायला?

बॅटमॅन Tue, 11/10/2016 - 12:23

नागपूरकर भोसल्यांचे फाउंडर रघूजी भोसले, ही वॉज़ फ्रॉम सातारा.

आणि मराठ्यांनी बंगालात फार काही लुटालूट केलेली नाही असे सुशील चौधुरी नामक प्रसिद्ध बंगाली इतिहासकारच त्यांच्या "नबाबी आमले मुर्शिदाबाद" अर्थात "नबाबी अंमलातील मुर्शिदाबाद" या पुस्तकात लिहितात.

बिटकॉइनजी बाळा Tue, 11/10/2016 - 18:58

In reply to by बॅटमॅन

+१
त्यावेळच्या राज्यव्यवस्थेचा लूट हा एक भागच होता. मराठे लुटारु म्हणून जितके बदनाम आहेत असं आपल्याला वाटू लागतं तेवढे प्रत्यक्षात नव्हते. यावर "मागोवा" या कुरुंदकरांच्या पुस्तकात त्यांनी शेजवलकरांवरच्या लेखात थोडक्यात स्पष्ट केले आहे. पण त्या लेखातले एक मत मात्र नेमके लक्षात राहिले आहे, की मराठे बंगालात जिथवर गेले तेवढाच बंगाल आज भारतात आहे. किंवा मराठ्यांनी जिथवर सीमा वाढवल्या तेवढाच आज भारत म्हणून शिल्लक आहे.

बिटकॉइनजी बाळा Tue, 11/10/2016 - 20:47

In reply to by नितिन थत्ते

कुणास ठाऊक! वरचं मत इंचाइंचात मोजू नका. शेजवलकर असं म्हणत. मराठ्यांच्या/पेशव्यांच्या एकंदर कारकिर्दीविषयीचं एक मूल्यमापन आहे. सध्या मागोवा माझ्याकडे नाही आहे. मी ते विस्तृतपणे देईन.

बॅटमॅन Fri, 14/10/2016 - 02:12

In reply to by बिटकॉइनजी बाळा

शेजवलकर जरा ओव्हर द टॉप बोलले या केसमध्ये हे खरेय म्हणा....परंतु मराठ्यांमुळे हिंदू धर्माचे अच्छे दिन पुनरेकवार आले हे नाकारता येत नाही. झालंच तर टोपकराने भारत मुघलांपासून घेतलेला नाही, मराठ्यांपासून घेतलेला आहे. (असे खुद्द टोपकरच म्हणतो.) दुर्दैवाने यातील पहिल्याच गोष्टीला आजकाल प्रसिद्धी मिळालीय. दुसरी गोष्ट खरेतर मुख्य असूनही तिला तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही. (आयमीन अगोदर होती आणि आता नाही.)

नितिन थत्ते Fri, 14/10/2016 - 09:55

In reply to by बॅटमॅन

+१.

१७५७ मध्ये प्लासीची लढाई झाली तेव्हा मराठे जाम प्रबळ होते (पानिपतच्या चार वर्ष आधी). तेव्हा मराठ्यांचा (नागपूरकर भोसल्यांचा) इंग्रज वि बंगालचा नबाब या संघर्षात काय व्ह्यू असेल/होता याविषयी काही माहिती मिळेल का?

बॅटमॅन Sun, 16/10/2016 - 13:38

In reply to by नितिन थत्ते

बघितलं पाहिजे, पण १७५२-५३ सालापर्यंत बंगालवरच्या स्वार्‍या थांबल्या होत्या आणि अलीवर्दीखानाशी तह झाला होता, ज्याअन्वये मराठ्यांकडे ओरिसा आणि अलीवर्दीखानाकडे बंगाल हे प्रदेश म्युच्युअली रेकग्नाईझ करण्यात आले. सीमा होती सुवर्णरेखा नदी (जी आजही बंगाल व ओरिसाची बॉर्डर आहे). त्यामुळे याकडे त्यांचा व्ह्यू अंमळ न्यूट्रल असेल असे वाटते खरे. पण पाहिले पाहिजे.