दायभाग
आपली थरथरणारी चरीत्रे
फेकून देऊयात या पश्चीमेच्या वार्यात
वाळू वाहते आहे तशी वाहत राहील
आपल्या कस्पटांसह
विरून जातील आपले स्पर्श
या वाळूवर उमटलेले ; एरवी हा इतिहासदेखील
द्खल घेत नाही फारशी कुणाची
घरांचे रस्ते पुन्हा एकदा पडताळून पाहावेत
वाटेवरच्या खुणा पक्क्या करून ठेवाव्यात ;घरे वाट बघत बसलीएत
देवच जाणे कुणाची
भिंतींवर अपेक्षांचे जुनाट रंग थिजून राहिलेले
हे अनुक्रमहीन प्रवास
कुठेतरी संपवले पाहिजेत; उमजू आले पाहिजेत अर्थे
यदृच्छया रुतून बसल्यात
प्रतिक्षा रस्तोरस्ती ;एक तर देऊन झालेत आपापले दायभाग
किंवा हे, की काही नव्हतेच देण्याजोगे...
अनंत ढवळे
प्रतिक्रिया
कविता
कविता आवडली. "दायभाग" म्हणजे नक्की काय ?
थोडा अधिक सविस्तर प्रतिसाद देण्याकरता जागा राखून ठेवत आहे.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
समजली नाही.
बर्याच कवितांच्याबाबतीत जसे होते - जसे की शब्दांचे अर्थ समजतात पण कवितेचा अर्थ काही गवसत नाही - तसेच झाले!
बाकी, दायभाग ह्या शीर्षकावरून कविता उघडली गेली.
"दायभाग" म्हणजे नक्की काय ?
धनंजय यांनी उत्तर दिलेलेच आहे. माझी भर.
हिंदू समाजात वारसा हिशाच्या दोन पद्धती आहेत - मिताक्षर आणि दायभाग.
दायभाग पद्धत ही पूर्व भारतात (ओरीसा, बंगाल, आसाम इ.) प्रचलित आहे तर उर्वरीत भारतात मिताक्षर पद्धती.
ठळक फरक म्हणजे मिताक्षर पद्धतीत विधवांना काही अधिकार उरत नाही याउलट दायभाग पद्धतीत विधवेला तिच्या दीरांच्या बरोबरीने वाटणीचा अधिकार मिळतो. कदाचित म्हणूनच बंगालात सती जाण्याची (की घालवण्याची) पद्धत रूढ होती.
दायभाग="इस्टेटीतला वाटा"
दायभाग="इस्टेटीतला वाटा"
काहीशी समजली
काहीशी समजली.
काहीकाही गोष्टी स्थायी आहेत (घरांचे रंग) आणि काहीकाही गोष्टी क्षणभंगुर आहेत (वाहात्या वाळूतल्या कस्पटांसमान विरून जाणारे आपले स्पर्श).
पण स्थायी गोष्टी सुद्धा अर्थहीन आणि विस्कळित आहेत, म्हणून कदाचित शेवटच्या ओळीत शून्यता आहे.
आवडली
कविता आवडली. मला लागलेला अर्थ असा
प्रवास करत असणाऱ्या काळाच्या वाऱ्यावर चराचराची वाळू उडते आहे. त्यातल्या काही कणांना आपलाही स्पर्श झालेला असतो. आपलं चरित्र, आयुष्य इतर पालापाचोळा-कस्पटांप्रमाणे त्यावर हिंदकळून द्यावं की सोडून. आता काय राहिलंय? वाऱ्यापासून सुरक्षित राहिलेल्या आपल्या घरांत (मनांत) एकावर एक अपेक्षांची पुटं चढली आहेत. एकदा फारतर त्या घरांचा परिसर तपासून बघावा. पण या अपेक्षांचा, वाट बघण्याचा कुठे तरी अंत व्हायला हवा. आपली सगळी देणी तशी चुकवून झालेली आहेत. म्हणजे, मुळात काही देण्यासारखं होतं हे गृहित धरलं तर.
काही विचार
घर आणि वाळू-वारा ही रूपकं तशी एकमेकांशी जुळवून घ्यायला त्रास झाला. घराच्या जागी झाड वापरलेलं मला स्वतःला जास्त आवडलं असतं. मग वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीबरोबर आपल्या शरीराचं पान सोडून देणं कल्पना करता येतं. का दायभागात एका घराच्या वाटण्या होतात यावर भर द्यायचा आहे? नीटसं उमगलेलं नसेल मलाच.
कविता आवडली.
का कोण जाणे पण परदेशी गेलेल्या आणि न परतणार्या मुलांची वाट पाहणार्या वृद्धांची कविता वाटली.
सहमत.
मलाही असेच वाटले होते पण माझी कवितेची समज फारच मर्यादित आहे त्यामुळे म्हणायला कचरले.