फेसबुक
(गेल्या वर्षी लिहिलेला हा लेख आहे. चर्चेसाठी इथे टाकतेय.)
गेल्या वर्षीची गोष्ट. फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी settings मध्ये काही बदल केला होता, त्याची बातमी रेडिओवर लागली होती. फेसबुक बघितले तर ऑर्कुट, माय स्पेस, ट्विटर सारख्या शेकडो सोशल नेटवर्किंग साईट मधली एक वेबसाईट; त्याच्या एवढ्या छोट्या बदलाची राष्ट्रीय बातमी झालेली पाहून मला आश्चर्य वाटले. म्हटलं बघूया अमेरिकेचं हे नवीन फॅड काय आहे ते!
अकाउंट उघडल्यावर मला एखाद्या नवीन दुनियेत गेल्यासारखे वाटले. धबधब्याखाली उभं राहिल्यावर, चारी बाजूंनी पाण्याचे सपकारे बसावेत; तश्या चहूबाजूंनी मित्र-मैत्रिणींच्या requests आल्या होत्या. मला अगदी ओल्ड फ़ॅशन्ड असल्यासारखे वाटले. आमची एन्ट्री खूपच उशीरा झालेली दिसत होती. मग जुने हायस्कूल, कॉलेज मधले सखे सोबती, त्यांचे एकेकाळी नाक पुसणारे भाऊ बहीण, आयुष्यात कधीही संबंध न ठेवलेले पाहूणे अशा कितीतरी लोकांच्या मैत्रीच्या requests मी स्वीकारल्या. सुरुवात तर चांगली झाली होती. दररोज ऑफिसमध्ये गेल्यावर, प्रथम फेसबुक वर मी हजेरी लावू लागले. माझ्या मैत्रिणींचे 'आज खूप कंटाळा आलाय' किंवा मित्रांचे 'Sixty six चा पार्किंग लॉट झाला होता आज. वाट लागली माझी.' अशासारख्या वाक्यांनी माझी करमणूक झाली. भरपूर लोकांचे फोटो पाहायला मिळाले. माझेही काही जुने शाळेतले, दोन वेण्या घातलेले, बावरलेले फोटो लोकांनी लावले. फोटो एका क्षणात १००-२०० लोकांपर्यंत पोहचत होते मग का नाही लावायचे? यु ट्यूब वरचे share केलेले मजेदार व्हिडीओज पहिले. कोण कशाचा फॅन आहे ते कळलं. दोन तीन महिने खूप मजा आली. पण हळूहळू उत्साह कमी होत गेला. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि पुढे काय असं वाटू लागलं. ट्विटर जेव्हा सुरु झाले होते, तेव्हाही मला हाच प्रश्न पडला होता. १४० शब्दात माणूस, लोकांनी फ़ॉलो करण्यासारखे काय लिहू शकतो? ब्लॉग ला फ़ॉलो करणं मी समजू शकते, पण एखाद्याची दैनंदिनी जाणण्यात काय मजा आहे? कविता वाचून पोट भरणार्या? मला, चारोळीवर पोट भरणे कठीण वाटत होते! असो.
तर फेसबुकची सुरुवात कॉलेजच्या मुलांसाठी झाली. त्यांना फेसबुक वर भरपूर मित्र करता आले, अभ्यासक्रमाची, परीक्षांची महत्वाची माहिती मिळत गेली, नवीन गोष्टी कळत गेल्या. मग युनिव्हर्सिटींनी सुद्धा फेसबुकवर स्वतःची अकाउंट्स उघडली. आणि त्याचा फायदा सगळ्यांनाच झाला. पण कधी नव्हे तो होणारा हिमवर्षाव कौतुकाने पाहायला जावे, आणि पाहता पाहता त्याचे घोंघावणार्याा वादळात रुपांतर व्हावे; तसे काहीसे फेसबुकचे झाले. सगळ्यांनाच फेसबुकवर जायचे होते. हा हा म्हणता ५०० मिलिअन लोकांनी फेसबुकवर अकाउंट्स उघडली. त्यापाठोपाठ जाहिरातदार, नवीन अपायकारक applications, spammers यांनी ही आपलं ठाण मांडलं. लोकंही उभे आडवे कुणालाही मित्र करून घेत होते. एखाद्याचे ३०० मित्र खरंच असू शकतात का? आणि असले तरी, आपल्या मुलाबाळांचे फोटो share करण्याइतपत सगळ्यांशी घनदाट दोस्ती असू शकते का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. ३०० पैकी एक किंवा दोनच लोक वाईट मनोवृत्तीचे असतील तरी त्याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात याची आपण कल्पना करू शकतो. तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमची दैनंदिनी इंटरनेटवर टाकत असाल, तर एखाद्या चोराला तुम्ही सुट्टीवर असताना घर साफ करून जायला किती वेळ लागणार आहे? 'My poor boy is home alone' हे फेसबुकवर टाकलेलं एक वाक्य, तुमची अख्खी गोष्टच लोकांना सांगत नाही का?
तरी बरं, फेसबुकवर काय लिहायचे आणि काय नाही हे आपल्या हातात आहे! पण ज्या गोष्टी आपल्या आवाक्यातच नाहीत त्याबाबत आपण काय करणार? फेसबुकची privacy policy खूप गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. तुम्ही अकाउंट उघडल्यावर एकदम पब्लिक होऊन जाते. नंतर privacy settings सापडेपर्यंत आणि कळेपर्यंत, फेसबुकच्या FarmVille सारख्या App नी तुमची माहिती अगोदरच जाहिरातदारांना विकली नसेल कशावरून? तसा आरोपही त्यांच्यावर झाला होता. आता परवाच फेसबुकने एक वादग्रस्त घोषणा केली. तुम्ही एखाद्या गोष्टीवर लिहिलेला अभिप्राय, तुमचं मत, ते तुमच्या परवानगी शिवाय त्या गोष्टीची जाहिरात म्हणून प्रकाशित करणार आहेत. आता हे किती लोकांना आवडेल कुणास ठाऊक?
समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला, तर फेसबुकमुळे काय बदल झालाय? माणूस हा कळप करून राहणारा प्राणी, मग तो virtual का असेना! काही लोकांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्याचा फायदा झाला असेल; तर त्यामुळे काही माणसे एककल्लीही बनू शकतात. पण त्याच्यामुळे लोकांना एकमेकांना भेटण्याची गरज कमी होईल असे मला तरी वाटत नाही. उलट सध्या जगातल्या घडामोडी पाहता, फेसबुक, ट्विटर या माध्यमातून एक नवीन क्रांती घडून येत आहे. तरुण टुनिशियन, मोहम्मद बौझीझी ने पोलिसांच्या अत्याचाराने वैतागून आत्महत्या केली. त्याच्यामुळे पेटून जाऊन कार्यकर्त्यांनी फेसबुक आणि ट्विटर वरून जनतेला उठावासाठी आवाहन केले आणि त्याचा शेवट टुनिशियाचं सरकार बरखास्त करण्यात झाला. 'The Indispensable Man', होस्नी मुबारक सारख्या इजिप्तच्या 'फेअरो' विरुद्ध लोकांनी फेसबुकद्वारे उठाव करून त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. सोशल नेटवर्किंग साईट्स मध्ये किती ताकद आहे आणि त्याचा उपयोग विधायक कामासाठीही कसा होऊ शकतो हेच त्याद्वारे सिद्ध झाले.
वाईट वृत्तींवर, चांगल्या वृत्तींनी मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी आपण होळी साजरी करतो. टुनिशिया आणि इजिप्त मधली बातमी वाचून मला वाटलं, की फेसबुकनेही नाही का नरसिंहासारखा अवतार घेऊन, पूर्वी कधीही न वापरलेल्या शस्त्राने, युक्तीने, आणि अवताराने वाईट वृत्तींचा नाश करायला मदत केली? जय हो फेसबुक!
प्रतिक्रिया
लेखन कसदार आहे.
सामाजिक जालीय संस्थळाची बलस्थाने व कच्चे दुवे नेमके हेरून त्यावर विश्लेषणात्मक भाष्य करीत मोजक्या शब्दांमध्ये अनेक पैलूंचा परामर्श घेतला आहे. अर्थातच पुन्हा एक सर्वोत्तम पंचतारांकित लेख वाचनास उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. असेच लेखन चालु ठेवा. आपल्या लेखनावरून आपणांस लेखनाचा विपुल अनुभव असल्याचे जाणवते. तरी आपले जालावर इतरत्र काही लेखन प्रसिद्ध झाले असल्यास त्याचा दुवा अवश्य द्यावा.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
लेखन आवडले
लेखन आवडले. फेसबुकच नव्हे तर 'सोशल नेटवर्कींग' मधे हे 'सोशल' आहे यातच बहुदा सारे येते..
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
आता भारतातही फेसबुक फीवर
आता भारतातही फेसबुक फीवर आहेच. फेसबुकावर येणार्या विशिष्ट प्रकारच्या मानहानीकारक मजकूराबाबत काही काळापूर्वी भारत सरकार अधिकच जागरूक झालेलंही होतं. कदाचित माझ्याच यादीत सध्याच्या सरकारचे विरोधक अधिक असतील, पण फेसबुकावर त्याची बरीच टिंगल उडवल्याचं पाहिलं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फेसबुक इ.
शेवटी लिहलेल्या मुद्याबाबत खरं तर विस्ताराने पुष्कळ लिहता येईल. लिहण्याचा विचार आहे अनेक दिवस कधी जमेल ते त्या झुकरबर्गालाच ठावुक.
तुमचा प्रवास आवडला. फेसबुकवर माझा तरी वेळ फार "प्रोडक्टीव्ह" जातो.
(विचारी प्रोडक्ट )
-Nile
आभार
लिखाणाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. हा लेख लिहिताना, एका पानाचं लिमिट होतं आणि मला स्वतःला फेसबुकवर जाऊन माझी दैनंदिनी टाकण्यात काहीही स्वारस्थ्य वाटत नाही, तेव्हा सुरुवातीला लेखाचा शेवट "जसं नव्वदीच्या दशकात सुरु झालेलं चॅटच फॅड, नंतर मावळत गेलं, तसंच काहीसं फेस्बुकचेही होणार आहे." असा काहीतरी होता. नंतर रेडिओवर ही इजिप्त, त्युनिशियाची बातमी ऐकली आणि शेवट बदलावा लागला. माझ्यामते फेसबुक एखाद्या शस्त्रा सारखे आहे, त्याचा उपयोग तुम्ही कसा करता यावर त्याचं महत्व अवलंबून आहे. आता अण्णा हजारेचच बघा ना! फेसबुक आणि या सोशल वेबसाईट मुळेच त्यांना एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला. खर तर मी भ्रष्टाचारा वरही एक लेख लिहिला आहे तो ही तुमच्या माहितीसाठी इथे टाकते. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आवडेल.
प्रतिक्रिया
लिखाण वाचलं होतं. सविस्तर प्रतिक्रिया द्यायला थोडा वेळ लागला.
फेसबुकासारख्या गोष्टींकरता लेखात व्यक्त करण्यात आलेल्या तक्रारी अयोग्य नव्हेत, परंतु मला त्या थोड्या ढोबळ - ऑब्व्हियस - वाटल्या. माणसामाणसांच्या देवाणघेवाणीमधे जो न्याय एकंदर वागण्याबोलण्याच्या रीतीला, सुसंस्कृतपणा आणि तारतम्याच्या निकषांबद्दल लागू आहे तोच कुठल्याही स्वरूपाच्या ऑनलाईन एक्स्चेंज बद्दल आपोआपच लागू होतो. प्रत्यक्ष भेटीगाठींमधे एखादी व्यक्ती उथळ किंवा बटबटीत असली तर ऑनलाईन वावरामधेही त्याचं रूपांतर होणं आश्चर्याचं वाटायला नको. ज्या व्यक्तीची प्रत्यक्ष जीवनामधे वाटचाल ज्ञानविज्ञानादि गोष्टींच्या मार्गावरची असते ती व्यक्ती सर्व ऑनलाईन गोष्टींचा परिणामकारक वापर त्याकरता करून घेईलच. ज्या व्यक्तीला प्रत्यक्ष आयुष्यातल्या गोष्टींमधील व्यवहारामधला सावधपणा , दक्षता, पोलिटिकल करेक्टनेस कळतो त्याच्या हातून "आमच्या घरी कुणीही नाही" या स्वरूपाचं ऑनलाईन स्टॅटस टाकण्याचा प्रकार होण्याची शक्यता कमीच आहे.
मामला फॉरवर्डेड इमेल्सचा असो की चॅट्मधील संवादाचा, फेसबुक/ट्विटर सारख्या माध्यमांचा असो की ऐसीअक्षरे सारख्या संस्थळांचा , ही सर्व जी आहेत ती संप्रेषणाची - म्हणजे कम्युनिकेशनची - निव्वळ साधने आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार नवनवी साधने उपलब्ध होत आहेत; मात्र ती साधने आहेत आणि साध्याबद्दलचे भान विसरायला झाले तर या साधनांचा आपोआपच चुकीचा वापर होऊ लागतो हे वेगळं सांगायची गरज नाही.
फेसबुक हे शीर्षक असलेल्या या लेखामधे फेसबुकावरील प्रवृत्तींबद्दलची काही सहज होणारी निरीक्षणे निश्चितच आहेत आणि तो भाग अस्तिपक्षीचाच. मात्र विविध क्षेत्रांमधली उत्तमोत्तम प्रकाशने , निरनिराळ्या सामाजिक/राजकीय/ज्ञानविज्ञान/कला/क्रीडा यांच्या क्षेत्रांतील नियमितपणे अद्ययावत होत असलेली माहिती, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे/पेपर्सचे/जर्नल्सचे फेसबुकावर येणारे लाईव्ह फीड्स, त्यांच्या नवनव्या कृतींची झलक , यातून आपण ज्या परिसरात, प्रदेशांत, देशात आणि जगात रहातो त्याबद्दल प्रगल्भ होत गेलेलं आपलं भान यावरही प्रकाश टाकायला हरकत नव्हती.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
कबुल
म्हणूनच मी माझ्या वरच्या प्रतिक्रियेत म्हटलं - "माझ्यामते फेसबुक एखाद्या शस्त्रा सारखे आहे, त्याचा उपयोग तुम्ही कसा करता यावर त्याचं महत्व अवलंबून आहे."
शस्त्राने जशी एखाद्याला हानी पोहोचू शकते तसाच एखाद्याचा जीव वाचविण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. मी म्हटल्याप्रमाणे फेसबुक बद्दल माझे आधीचे मत इजिप्त आणि त्युनिशियातील उदाहरणाने बदललेले होते.
<<फेसबुक हे शीर्षक असलेल्या या लेखामधे फेसबुकावरील प्रवृत्तींबद्दलची काही सहज होणारी निरीक्षणे निश्चितच आहेत आणि तो भाग अस्तिपक्षीचाच. मात्र विविध क्षेत्रांमधली उत्तमोत्तम प्रकाशने , निरनिराळ्या सामाजिक/राजकीय/ज्ञानविज्ञान/कला/क्रीडा यांच्या क्षेत्रांतील नियमितपणे अद्ययावत होत असलेली माहिती, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे/पेपर्सचे/जर्नल्सचे फेसबुकावर येणारे लाईव्ह फीड्स, त्यांच्या नवनव्या कृतींची झलक , यातून आपण ज्या परिसरात, प्रदेशांत, देशात आणि जगात रहातो त्याबद्दल प्रगल्भ होत गेलेलं आपलं भान यावरही प्रकाश टाकायला हरकत नव्हती.>>
बरोबर. पण एका पानात जे बसेल ते लिहिलं होतं. पण लेखाच्या पूर्णत्वासाठी त्याचा जरुर फायदा झाला असता. कबुल.
ऑर्कुट
ते ऑर्कुटच काय झाल हो सध्या?
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
"मारुती कांबळेचं काय झालं ?"
हे ऑर्कुट म्हणजे काय मारुती कांबळे आहे का काय !?
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
किंवा
किंवा हल्लीच्या भाषेत मिलान दामजी/अर्नब बागचीही* असेल!
*संदर्भः- विद्या बालनचा कहानी
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars