Skip to main content

संस्कार

एका लेखावर शामची आई, आणि तिने शामवर केलेले संस्कार यावर थोडी चर्चा झाली. ती थोडी व्यापक करण्यासाठी हा चर्चाविषय. तुम्ही तुमच्या मुलावर कुठचे संस्कार करण्याचा प्रयत्न केला, करत आहात वा करणार आहात? तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर कोणते संस्कार केले वा करण्याचा प्रयत्न केला? कुठचे संस्कार आजच्या घडीला आवश्यक आहेत? उत्तर देताना शक्यतो त्या गुणाचं वर्णन एका शब्दात लिहून त्यापुढे त्याचं वर्णन लिहा.

मी सुरुवात करतो.

1. आत्मविश्वास - जोपर्यंत स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास असतो तोपर्यंत यशस्वी आणि आनंदी राहाणं शक्य होतं.
2. कष्टाळूपणा - तुम्ही कितीही हुशार असलात तरी कष्टांना पर्याय नाही. शिक्षण, नोकरी, आणि वैयक्तिक नाती सांभाळणं - या सगळ्याचसाठी कष्ट करण्याची गरज असते.
3. मनमिळाऊपणा - लोकांमध्ये सहज मिसळणं, मैत्र्या करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं.
4. कनवाळूपणा - इतरांच्या दुःखाबद्दल जाण असणं, आणि त्यांना समजून घेणं, मदत करणं हा आवश्यक गुण आहे.
5. वैज्ञानिक दृष्टी - जगाकडे बघताना खरं काय खोटं काय हे योग्य काट्यांवर तपासण्याची आणि प्रयोग करून किंवा अनुभवांतून शिकण्याची प्रवृत्ती/क्षमता.

तसंच तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे गुण तुम्ही कुठून शिकलात? कुठचे गुण तुमच्यात लहानपणापासून असते तर बरं झालं असतं असं वाटतं? याविषयीही लिहा

चर्चाविषयाची मांडणी तशी त्रोटकच आहे, पण चर्चा सकस होईल अशी आशा आहे.

मारवा Wed, 14/11/2018 - 22:50

मला असे वाटते की
१- संस्कार मुलांवर वा कोणाही आपल्या अखत्यारीतील दुबळ्यांवर जे सर्वस्वी आपल्यावर अवलंबुन आहेत करणे हेच मुळात चुकीचे व अनैतिक आहे. संस्कार करणे म्हणजे आपली कॉपी बनवण्याचा प्रयत्न करणे. यात आपल्या अपुर्ण राहिलेल्या महत्वाकांक्षा इच्छा इ. मुलांच्या मार्फत पुर्ण करणे म्हणजे संस्कार करणारा आपले विचारसंचिताचे ओझे समोरच्याला निवड स्वातंत्र्य न देता लादतो. असे करणे म्हणजे आपण "लादेन" होणे.
२-तर मग जे काय आपल्याला "चांगले " व "अर्थपुर्ण " गवसलेले आहे ते पुढे पोहोचवुच नये असेही योग्य वाटत नाही. म्हणजे मी माझ्या मुलाला शिकवणे हे लादणे च असेल तर मग काहीही शिकवणे वा संस्कार देणे ( जे मला माझ्या आयुष्यात मोठ्या कष्टाने मिळवलेले समथींग मिनींगफुल वाटते ) त्याचे काय करावे ? हा प्रश्न निर्माण होतो.
३- यावर एकच उपाय मला दिसतो की तीन नियम पाळुन संस्कार करावेत एक म्हणजे मुलभुत कमीत कमी निर्वीवाद मुल्ये बाबी गोष्टी गुणांचा संस्कार करण्याकडे कल ठेवावा उदा. प्रामाणिकपणा हे एक बऱ्यापैकी निर्वीवाद आणि बेसीक् मुल्य असु शकते ज्याचा आपण संस्कार देऊ शकतो म्हणजे डायरेक्ट शेवटचा निर्णायक देणारा म्हणजे धार्मिकतेचा वा अधार्मिकतेचा संस्कार देऊ नये. ते सर्व अंतिम निर्णय त्यालाच घेऊ द्यावेत आपण फक्त प्रिपरेटरी बेसीक मुल्यांचा संस्कार देत रहावा असे संस्कार जे त्याला त्याच्या स्वत:च्या पायावर उभे करतील सक्षम करतील तितपतच त्याच्या पुढच्या निर्णय पायरीवर नको.
उदा. एखादा कट्टर जैन जसे मांसाहार वाईटच असतो असा संस्कार करतो ते चुक त्याला निवड स्वत:ची स्वत:करण्यास मदत व्हावी इतपतच संस्कार असावा
२- संस्कार करतांना डेमॉक्रॅटीक मोकळेपणा असावा भाषा बघ बाबा असे आहे , मी असे केली त्याचा असा अमुक अमुक फायदा तोटा होतो वगैरे वगैरे त्यात अट्टाहास असु नये. जे मुल्य आपण त्याच्या गळी मारु पाहतोय ते आपण कितपत स्वत:त रुजवु उमजु पचवु शकलो त्यात काय गोची होत्या ते ही त्याला
जमेल तितके शेअर क्लीअर करत सांगावा. तसेच आपला मुलगा हा आपली " प्रयोगशाळा" वा गिनिपीग नसावा.
३-आणि सर्वात महत्वाचा आपला संस्कार दिल्यावर त्याने तो घेणे न घेण त्याच्यावरच सोडुन द्यावे. आणि जर त्याने आपल्याला आपला संस्कार किती फोल होता हे जगुन दाखवले तर त्याच्याकडुनही आपण सहर्ष संस्कारीत होउन घ्यावे. संस्कार ही करण्यात जितकी मजा त्यापेक्षा जास्त घेण्यात जास्त मजा आहे

माझ्या व्यक्तीगत अनुभवांतुन मला सर्वाधिक महत्वाचे मुल्य जे वाटते ते म्हणजे स्वत:शी अधिकाधिक प्रामाणिकता बाळगणे. जे मुल्य मला अनेक चांगल्या लोकांकडुन माझ्या बालपणी मिळत गेले. ज्या मुल्याचा मी अजुनही आयुष्यात पुर्णपणे अंअगिकार करु शकलो नाही. पण जितक्या अधिक प्रमाणात मी स्वत: शी प्रामाणिक होऊ शकलो तितका माझ्या जीवनातला अंधार दुर झाला. एक मोठे समाधान एक खोलवरची शांतता मी केवळ या एका मुल्यामुळे अनुभवलेली आहे. आणि अजुनही मी याची प्रॅक्टीस करतो व जमेल त्या लहानग्यांना हा संस्कार देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या आयडीया वापरुन करत असतो.

बिटकॉइनजी बाळा Thu, 15/11/2018 - 08:51

In reply to by मारवा

संस्कार करतांना डेमॉक्रॅटीक मोकळेपणा असावा भाषा बघ बाबा असे आहे , मी असे केली त्याचा असा अमुक अमुक फायदा तोटा होतो वगैरे वगैरे त्यात अट्टाहास असु नये. जे मुल्य आपण त्याच्या गळी मारु पाहतोय ते आपण कितपत स्वत:त रुजवु उमजु पचवु शकलो त्यात काय गोची होत्या ते ही त्याला
जमेल तितके शेअर क्लीअर करत सांगावा. तसेच आपला मुलगा हा आपली " प्रयोगशाळा" वा गिनिपीग नसावा.

ह्याला फक्त थेरॉटिकल अर्थ आहे.
अश्या छापाची चर्चा ज्याला दोन लहान मुलं आहेत अश्या सहकर्मचाऱ्याशी झाली.
हा कर्मचारी उच्चशिक्षित, तुलनेने लिबरल विचारांचा आहे. उत्तम पगार आहेच, तरीही आर्थिकदृष्ट्या पूर्णतः स्वावलंबी आहे. मोकळे बसायचे नाही म्हणून जॉबला येतो. तुम्ही लिहिलं ते स्वातंत्र्य वगैरे त्याने साफ उडवून लावले. केवळ मूल्यात्मक संस्कारच नव्हेत, तर बुद्धीमत्ता आणि भावना ह्या बाबी सुद्धा 'ट्रेनिंग' वर खूप अवलंबून असतात आणि मुलं कोणत्याही पालकांचे कळत-नकळत गिनीपिगच असतात असं त्याने स्पष्टपणे सांगितले. प्रश्न असतो तो मुलांना ते गिनीपिग नाहीत हे किती शिताफीने कळू न देणं हा.
मुलांना सगळं जमेल ते द्यावं मग ते त्यांना आवडेल आणि इंटरेस्टिंग वाटेल ते उचलतील वगैरे हा दांभिकपणा आहे. ज्या पालकांना आपली मुलं अमुक एक व्हावीत असं वाटत असेल तर त्यांना त्या त्या भागात जिनीअस करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे आणि त्यात वावगं असं काहीही नाही. इंटरेस्ट ह्या गोष्टीचा उगम होतो. ती मेंदूत हार्डवायर्ड नसावी असं वाटतं.

अस्वल Sun, 25/11/2018 - 00:17

माझ्या आईवडिलांनी मला कुठली मूल्य दिली? हा प्रश्न रंजक असला तरी त्यातून मला फार काही गवसलं नाहिये. पण माझ्या नंतरच्या पिढीला कुठली मूल्यं देता येतील? हा प्रश्न फार फार कठीण आहे.
मी रूढार्थाने एक हिंदू आहे- म्हणजे धार्मिक असा काही एक ग्रंथ माझ्या मदतीला येऊ शकत नाही. हे सुदैव असलं तरी त्यामुळे कुठली मूल्र्यं महत्त्वाची आहेत हा यक्षप्रश्न सोडवणं तितकंच कठीण होऊन जातं.

मग माझे इनपुट्स कुठले?

१. माझे स्वत:चे काही अनुभव असणार आहेत आणि त्यातून मी काही थोडं संचित वगैरे घेऊ शकतो. मला माझ्या आई-बाबांनी आणि इतरांनी जे काही "महत्त्वाचं" असतं असं सांगितलं ते. पण ह्यात बऱ्यावाईटाची सरमिसळ आहे. उ.दा.
खोटं बोलू नये- हे मला पटतं. say what you mean and mean what you say.
पण-
चारचौघांसारखं वागावं, मिळूनमिसळून रहावं - हे मला पटत नाही. मला चारचौघांसारखं अजिबात वागायचं नसेल आणि उगाच जीए म्हणतात तशी "बुचबुच किड्यांची गर्दी" जे करील ते मेंगळटासारखं हसून सहन करावं हे तिडीक आणणारं आहे.
तेव्हा आई-वडीलांनी दिलेले संस्कार आपल्याला स्वत:ला गाळूनच घ्यावे लागणार.

---
२. माझ्या बुद्धीला जे काही महत्त्वाचं वाटतं ते- हे मी अनुभवलं असेल असं नाही, पण निव्वळ तर्क/संगती लावून मला ते योग्य किंवा अयोग्य असं ठरवावं लागेल.
उदा.

------
३ कालानुसंगत मूल्यं - काल जे योग्य होतं ते आज असणार नाही. उ.दा. समलैंगिकता.

तेव्हा असला सगळा विचार करून मला महत्त्वाची वाटणारी मूल्यं -
१. open-mindedness. जे काही नवे अनुभव,विचार, नाती असतील त्यांना मोकळेपणाने समोर जावं. धबधबा अंगावर येऊ द्यावा आणि मग आवड/नावड ठरवावी.

२. rational thoughts - आपण प्रत्येक गोष्टीला "का?" असं विचारून पुढे जावं.

३. humor - हे सांगणं थोडं कठीण आहे, पण जगाकडे फारसं गंभीर होऊन न पहाणं हे फार छान आहे. रोजचे चिंधी प्रश्न आणि अवाक्याबाहेरच्या चिंता शॉट देणारच, पण त्याला "हट भेंचोद" म्हणून शांतपणे एक कप चहा प्यायला ह्याची फार मदत होते.

सध्या एवढंच.

सामो Mon, 26/11/2018 - 21:51

In reply to by अस्वल

open-mindedness. जे काही नवे अनुभव,विचार, नाती असतील त्यांना मोकळेपणाने समोर जावं. धबधबा अंगावर येऊ द्यावा आणि मग आवड/नावड ठरवावी.

मस्त!!!

नितिन थत्ते Thu, 15/11/2018 - 15:06

छ्या: !! संस्काराच्या तुमच्या व्याख्येत अथर्वशीर्ष आणि गीतेचा पंधरावा अध्याय म्हणता येणे समाविष्ट नाही याबद्दल निषेध !! :)

मी आणि माझ्या पत्नीने मुलीवर जाणीवपूर्वक कुठले संस्कार केले नाहीत. आम्ही कसे वागतो याच्या निरीक्षण आणि अनुकरणातून काही संस्कार तिने घेतले असतील आणि शाळेतून मित्रमैत्रिणींकडून जे संस्कार उचलले तेच संस्कार. तसेच लहानपणी ती माझ्या आईच्या सहवासात बरीच असे तिच्याकडून काही उचलले असेल. सध्यातरी तिची वागणूक सौजन्यपूर्ण वगैरे आहे. यात तिला सांभाळणाऱ्या बाईंशी, सोसायटीतल्या इतर रहिवाशांशी आम्ही कसे वागत होतो त्या निरीक्षणाचा काही वाटा असेल.

>>कुठचे गुण तुमच्यात लहानपणापासून असते तर बरं झालं असतं असं वाटतं? याविषयीही लिहा.

माझ्यात असायला हवे होते अशा गुणांविषयी न सांगता एक जनरल ऑब्झर्वेशन.
म म व संस्कारात आंत्रप्रिन्यूरशिपसदृश संस्कार मुळीच नसतात. विशेषत: नोकरी करण्याचा संस्कार असला तरी त्यात देखील शक्यतो एक नोकरी पकडून त्यातच रिटायर होण्याचे संस्कार होतात. आणि मेहनतीने अधिकाराच्या पदांवर चढत जावे असे संस्कार नसतात. शक्यतो फारशी रिस्क न घेता जेवढी प्रमोशन्स मिळतील तेवढी घेऊन गप्प बसण्याचा संस्कार होतो. म उ व मध्ये असलेल्यांमध्ये तसे संस्कार नकळत होतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/11/2018 - 20:58

In reply to by नितिन थत्ते

म म व संस्कारात आंत्रप्रिन्यूरशिपसदृश संस्कार मुळीच नसतात.

काही महिन्यांपूर्वी एका मीटप - गटगला गेले होते. मशीन लर्निंगसंदर्भात व्याख्यान होतं. तिथे गप्पा सुरू असताना एका मध्यमवयीन, भारतीय वंशाच्या बाईनं म्हटलं की तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. हा माझ्यासाठी धक्का होता. अमेरिकेत असो वा भारतात, भारतीय मध्यमवयीन स्त्रिया घरपोरंसंसारापलीकडे फार बोलत नाहीत याची आता सवय आहे; फारच कहर म्हणजे शाहरुख खानबद्दल चाबरट बोलण्याचा प्रयत्न. मी तिला म्हटलं, "माझ्या डोक्यात फार स्टिरिओटाईप्स आहेत, तू त्यांत अजिबात बसत नाहीस."

तिथे एक तरुण भारतीय वंशाची मुलगी होती, अजूनही पीएचडी पूर्ण करत्ये ती. तिला हा स्टिरीओटाईप ऐकून धक्का बसला. "माझ्या आजूबाजूचे बहुतेक भारतीय विद्यार्थी फारच वेगळ्या विचारांचे आहेत. इथे (अमेरिकेत) शिकायचं, थोडा अनुभव घ्यायचा आणि भारतात जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, अशा विचारांचे आहेत."

नाको Sun, 18/11/2018 - 08:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या मते प्रतेक जन आपल्या आपल्या क्षमते नुसार निवड करतो. व्यवसाय ही २४ तास केलेली नोकरी आहे व नोकरी हा ८ तास केलेला व्यवसाय आहे. त्या मुळे त्यांचे फायदे व तोटे त्याच प्रमाणात आपल्याला भेटतील. पण फक्त द्रवअर्जन करण्याकरीता जर आपण व्यवसाया कडे किंवा नोकरी कडे बघत असाल तर तो फारच छोटा विचार आहे. त्या मुळे ना आपल्या ला नोकरी ची पुर्ण क्षमता कळली ना व्यवसायाची. आणी काळानुसार खाजगी नोकरी व व्यवसाय ह्या मधले अंतर जस जसे कमी होत जाईल तस तस हा व्यवसाय करण्याची व्रत्ती वाढत जाईल अस मला वाटत.

चिमणराव Sun, 18/11/2018 - 14:15

In reply to by नाको

>>आपण व्यवसाया कडे किंवा नोकरी कडे बघत असाल तर तो फारच छोटा विचार आहे. >>
धंधा याविषयी. फक्त जागा आणि पैसा गुंतवणूकसंबंधी. व्यवसाय( प्रफेशन, वकिली,डॅाक्टरी, सीएकाम इत्यादि)वेगळे.

चिमणराव Thu, 15/11/2018 - 12:57

सामाजिक वागणुकीबद्दल संस्कार हे आइवडील कसे वागतात यावरून मुले उचलतात.
व्यापारविषयक आर्थिक चर्चा करून शेवटी निर्णय कसा घेला जातो याचं उदाहरण कमी मराठी मुलांना मिळतं हे थत्ते याचं मत बरोबर.
१) खोटं बोलणे - म्हणजे बोलायचं एक पण करायचं दुसरं याची शिकवण घरीच देतो आपण. आमचं एकदा मुलीची शाळा बुडवून दापोली, महाबळेश्वर जाण्याचं ठरलं. डायरीत लिहून सही आणायला सांगितली. आता नाही सुटूत जा हा निरोप टिचरचा आला. दांडी मारून नंतर आजारी होती असं सांगणे नाही केलं. पुढच्या वेळेस गणपतीत सुटी मागितली गावी जाण्यासाठी. ती मिळाली कारण त्यावेळी एक चाचणी परीक्षा झालेली असते आणि त्या आठवड्यात दोन रजा येतात. मग प्रत्येक भटकंती गणपतीतच केली.
२) आर्थिक निर्णयांचे संस्कार नाही करता आले, आम्हीच त्यात कच्चे.
३)पत्ते खेळणे - खेळून दिले नाहीत. फारतर प्रवासात खेळ म्हटलं.

सामो Thu, 15/11/2018 - 21:10

धागा छान आहे. वाचते आहे.
(१) करावे तसे भरावे - What goes around, comes around
(२) बचतीचे महत्व
(३) कुटुंबाचे महत्व

हे तीन संस्कारच केले. बाकीचे ति तिची ती शिकेल. पण हे ३ मला अति महत्वाचे वाटले. अन्य गदारोळामध्ये हे ३ हरवु नयेत म्हणुन, कधीही मुद्दाम आवर्जुन सांगीतले असतील तर हे तीनच. I chose my battles म्हणा ना.

भटक्या कुत्रा Thu, 15/11/2018 - 21:52

आमच्या मातोश्रीने दिलेलं एक संस्कार किंवा ज्ञान
आपण श्रीमंत आहोत कि गरीब आपल्या खिशात पैसे आहेत कि नाहीत हे कोणालाच समजून द्यायचे नाही.
घरात भांडण झाली तरी कोणाला बाहेर समजून द्यायचं नाही, नाहीतर लोक त्याचा फायदा उठवतात

चिमणराव Fri, 16/11/2018 - 01:10

मला लेखाचं नाव वाचून काही लेक्चर आहे असं वाटलं होतं॥
बघू किती प्रतिसाद/अनुभव येतात.
फेसबुकवर लोक जास्ती उघड होतात का?

धनंजय Fri, 16/11/2018 - 03:17

बरीच काही जडणघडण बाळपणापासून झाली, हे मान्यच आहे. परंतु माझ्या आईवडलांनी आजूबाजूच्या समाजातील आईवडलांपेक्षा सांगण्याइतपत वेगळे (किंवा प्रकर्षाने) असे काय केले, ते नेमके सांगता येत नाही. बराच विचार केला तर काहीतरी सांगता येईल, पण काय ते अंधुकही सांगता येत नाही.

व्यापार किंवा डोकेबाज मध्यस्थी (entrepreneurship) बद्द्ल पुरेशी माहिती, ते कौशल्य वाढवण्याकरिता अवसर मिळाला नाही, ही बाब वर नितिन थत्ते यांनी सांगितली आहे, ते माझ्या कुटुंबाबाबतही म्हणता येईल.

नितिन थत्ते Fri, 16/11/2018 - 09:59

आंत्रप्रिन्यूरशिपचे संस्कार याबाबत थोडं स्पष्टीकरण द्यायचं आहे.....

मी जे म्हणतो आहे ते धंदा व्यवसाय करणे या अंगाने म्हणत नाही. नोकरीच करावी असं म्हटलं तरी त्या नोकरीतसुद्धा (आणि एकंदर आयुष्यात) कशी प्रगती साधावी हे संस्कार होत नाहीत.

मी लहान असताना माझे काही नातेवाईक उच्च मध्यमवर्गीय होते. म्हणजे माझी एक मावशी आणि तिचे यजमान टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सायंटिस्ट होते. एक मामा आयायेमचे ग्रॅज्युएट होते. अजून एक नातेवाईक दीपक फर्टिलायझरमध्ये डायरेक्टर होते. त्यांनी त्यांच्या अपत्यांवर वेगळे संस्कार केले असे मला आता जाणवते. माझा क्लासमेट युनिलिव्हरचा सीईओ वगैरे आहे. त्याच्यात माझ्यापेक्षा जास्त टॅलंट होते यात काही वादच नाही पण त्या टॅलंटला दिशा मिळण्यात त्याचे वडील* आय ए एस अधिकारी असण्याचा थोडा काही वाटा असेल असे वाटते.

*मिळालेला सल्ला आपण कसा घेतो यावरही बरेच काही अवलंबून असते. माझ्या वडिलांचे एक बॉस मी ८४ साली इंजिनिअर झाल्यावर "परदेशात जा" असे मला म्हणाले. मी बाणेदारपणे "मला परदेशात जायचे नाही" असं त्यांना सांगितलं. :) तेव्हा ते मला काही बोलले नाहीत. पण त्यांनी वडिलांजवळ हीच गोष्ट दोन तीनदा बोलून दाखवली. पण मी ती ऐकली नाही. तेव्हा वडिलांनीही मला फार भरीस घातले नाही.

तिरशिंगराव Fri, 16/11/2018 - 10:18

बाकीच्या ममव संस्कारांबद्दल इथे लिहिणार नाही, कारण ते कॉमनच असतात. पण वडिलांकडून एक विशेष गुण शिकलो, तो म्हणजे,

समोरच्याचे म्हणणे शांतपणे पूर्ण ऐकून घेणे! याचा व्यवहारांत फार फायदा होतो. लगेच रिॲक्ट न झाल्यामुळे स्वत:च्या रागावरही संयम रहातो.
तसेच, स्वत:बद्दल कमीतकमी बोलून दुसऱ्याचे बोलणे सहानुभूतीने ऐकणे. कारण बहुतेक माणसे आत्मकेंद्री असतात. त्यांना तुमच्या सुखदु:खांत काही रस नसतो. तसा ज्यांना असेल, त्यांनाच आपले प्रश्न सांगावेत.

शैलेंद्रसिंह Fri, 16/11/2018 - 12:01

माझ्या आईने माझ्यावर रोज संध्याकाळी “शुभंम करोती” करायचा संस्कार केला होता. नाही करत म्हणून अगरबत्तीचा चटकाही दिला होता. मग मी देवापुढे हात जोडून रोज शुभंम करोति करायला लागलो आणि संस्कारी मुलगा म्हणून कॉलनीत फेमस झालो.

साबु Fri, 16/11/2018 - 12:53

मिळालेला सल्ला आपण कसा घेतो यावरही बरेच काही अवलंबून असते->+1 माझ्या वडिलांचे ऑफिस मधले एक स्नेही तसे त्याना बरेच जुनिअर पण आंत्रप्रिन्यूरशिप डोक्यात असलेले. आठवी का नववीच्या सुट्टीत मी गोट्या का पत्ते खेळत असताना मला म्हणाले की जरा कॉम्पुटर चा कोर्से वगैरे कर काही, का उगाच वेळ वाया घालवतो आहेस. तेव्हा काही वाटलं नाही पण आत्ता वाटतेय की ते बरोबर होते.

कासव Fri, 16/11/2018 - 15:55

★ आई-वडिलांच्या भूमिकेत शिरण्याइतपत मी काही प्रौढ नाही. किंबहुना एक बेरोजगार तरुण आहे. त्यामुळं इथं मी मुलाच्या नजरेतून थोडंसं मांडायचा प्रयत्न करतो :

1) बलदंड असणे :- लहानपणापासून एकत्र कुटुंब पद्धती असल्याने आणि मी पुरता कृश असल्याने आईवडिलांसकट परिवारातील सर्व थोरा-मोठ्यांनी बलदंड कसं असलं पाहिजे याचे नको इतके घाव मनावर घातले आहेत. आजही ते कमी झालेले नाहीत. पण तरीही शरीर काही भरून आलेले नाहीच. मात्र घरात कायम, बलदंड असलं तरच जगात कशी किंमत असते वगैरे चर्चा कायम झडत असतात. मला व्यक्तिगत कृश असल्याचा तोटा काही प्रमाणात जाणवतो. पूर्णतः ग्रामीण पार्श्वभूमी असल्याने कुणीही येऊन हेलपाडतं किंवा अधिकार गाजवून जातं आणि वक्तृत्वाला भारदस्त शरीरयष्टी अधिक फायदेशीर ठरते, असंही अनुभवास आलं आहे.

2) विचार लादणे :- घरात धार्मिक विचार दृढ करण्याकडं कल जाणवतो. हिंदू संस्कृतीचे गोडवे जसे गायले गेले आहेत तसे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जास्त बोललंही गेलं आहे. शाहू-फुले-आंबेडकर म्हटलं की घरच्यांच्या पोटात गोळा येत असावा, अशी शंका आहे. ह.भ.प. चारुदत्त आफळ्यांच्या कीर्तनाचा प्रभाव पूर्वीसारखा आता राहिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत विचारांच्या एकाच साच्यातील केंद्रीकरणाबद्दल नवल वाटायला नको. तरीही वाचनातून, इतर अभ्यासातून, वातावरणातून मुलं याविरुद्ध बंड करून ऊठतातच.

3) कामं करण्याबद्दलचा दुराग्रह :- घरची कामं केलीच पाहिजेत नाहीतर शिव्यांची लाखोली वाहिली जाते. उपाशी ठेवण्यासारखे अघोरी कृत्यांच्या शिक्षा घरी निदान बोलून तरी झाल्या आहेत. उत्स्फूर्तपणे कामं करावीशीच वाटत नाहीत, ह्याचं कारण चुकीची मिळत जाणारी वागणुक ह्यातही असू शकतं. आणि जोपर्यंत उत्स्फूर्त वाटत नाही; तोपर्यंत मी माझ्यावरून तरी अशी ‛कामं केली जात नाहीत’, असा मी (माझ्यापुरता तरी) निष्कर्ष काढतो.

4) संवेदनशीलता :- भावनेच्या या टोकावरून त्या टोकावर क्षणार्धात उडी घेत जाणारा वडिलांचा स्वभाव नेहमी पाहण्यात आल्याने नाजूक प्रसंगी गहिवरून रडायला आल्याचे प्रसंग कित्येकवेळा घडतात. संवेदनशीलतेचा एक पदर अनुवंशिकही असावा, असा एक अंदाज(अंदाजच) आहे. तरी संवेदनशीलता शिकण्याचीही अन शिकवण्याचीही बाब आहे, याबद्दल दुमत नाही.

बाकी शाळेतून, बाहेरून होणारे आणि घरी होणारे संस्कार अशी सरमिसळ असल्याने कोणता कौटुंबिक संस्कार जास्त संस्कारित वा फायदेमंद झाला हे ठरवणं खूपच किचकट आहे. त्यात व्यक्तिनिष्ठताही खूपच येऊ शकते. तसेच प्रादेशिक भिन्नतेमुळे काही संस्कार मूल्यही त्या त्या परिस्थतीतीनुसार योग्य-अयोग्य ठरू शकतात.

उज्ज्वला Fri, 16/11/2018 - 17:39

मुलं वाढवणं ही सर्वस्वी माझ्या आईची जबाबदारी होती. ती नोकरीही करायची आणि तिला सुपरवूमन सिंड्रोम होता म्हटलं तरी चालेल. ती फार म्हणजे फारच आदर्श होती. तिच्यासमोर मला मनातून अगदी न्यूनगंड यायचा. मानसशास्त्रातील बालक - पालक - चालक व्यक्तिमत्त्वातील ती चालक होती. मला तिचा सगळ्यात आवडलेला गुण म्हणजे तर्कशुद्ध विचार आणि सातत्य (consistency). तिने कधीही उलटसुलट भूमिका घेतली नाही. रागावली की नंतर आम्हाला आमच्या शब्दांत सांगावं लागायचं आई का रागावली, माझं काय चुकलं आणि का. भरपूर धार्मिक होती पण नेहमी स्वैपाकघरातल्या विज्ञानावर बोलायची. तिने मला आणि भावाला समानतेनेच वाढवले. कधीही भेदभाव केला नाही. माझ्या पिढीत आजूबाजूला मुलामुलींत भेदभाव सर्रास घडताना मी पाहिले आहे.
माझा भाऊ मात्र नव्या पिढीचा, मुलांना वाढवताना सहभाग घेणारा असा आहे. भाऊ-वहिनीची एक पद्धत फार आवडली. त्यांची मुलं लहान असताना रागावायची त्यांची रीत म्हणजे "तुला वा! म्हणून घ्यायचंय का? " असं विचारायचे. अशा त-हेने मुलांचा आत्मसन्मान जपत वळसे देणं फारच भारी.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 19/11/2018 - 03:14

आमच्या घरी जोवर माझ्या मैत्रिणी येत नव्हत्या आणि मी मैत्रिणींच्या घरी जात नव्हते तोवर आई-वडलांनी विशेष काही शिकवलं असं वाटलं नव्हतं.

१. दुसऱ्या व्यक्तीशी, विशेषतः इतर समवयस्क मुलामुलींशी आमची - मी आणि भाऊ - तुलना कधीही केली नाही. कोणी असं केलं तर आवर्जून विरोध केला. विशेषतः मार्कांच्या बाबतीत.
२. आम्हां भावंडांना घरी एकटं राहण्याइतपत अक्कल आल्यावर, स्वतःच्या मित्रमैत्रिणींच्या घरी, नातेवाईकांकडे, कोणत्याही कार्यक्रमाला आमच्या मर्जीविरोधात ओढून नेलं नाही. ते स्वतःही धार्मिक सणाउत्सवांच्या बाबतीत फार उत्साही नव्हतेच; देव-धर्मसुद्धा आमच्यावर लादला नाही. सकाळी लवकर उठायला पाहिजे, वगैरे शिस्तसुद्धा कधीही लावली नाही.
३. नियम क्र. २ला सणसणीत अपवाद, विशेषकरून आईनं केलेला म्हणजे, संध्याकाळी घरी बसणं नामंजूर. बाहेर जाऊन खेळलंच पाहिजे. मी व्यायामप्रेमी वगैरे नाही, मात्र आता त्या सवयीचा फायदा होतो असं वाटतं.
४. मला आठवतंय तेव्हापासून रोज काय खायचं, आम्ही काय कपडे घालायचे, घराच्या भिंतींना कोणता रंग असेल, असले बहुतेकसे निर्णय आम्हाला घ्यायला लावले. जेवायचं काय, याचा निर्णय घेताना अत्यंत चतुराईनं, घरात असलेल्या भाज्यांपैकी "कोणती भाजी करायची" असं आई विचारायची. त्यामुळे भाजी खायला लागायचीच, पण आपण निर्णय घेतलाय असंही वाटायचं.
५. मी मुलगी आहे म्हणून माझ्यावर जास्तीची बंधनं नव्हती. काही मैत्रिणींकडे गेल्यावर हे फारच जाणवायचं. कपडे, घरी येण्याची वेळ, घरकाम, सगळ्या बाबतीत समानता. भावापेक्षा मी अधिक बनेल आणि चाबरट आहे; त्याबद्दल मला कधीही ओरडा मिळाला नाही.
५अ. मासिक पाळी या प्रकाराबद्दल जेवढ्या मोकळेपणानं बोलता येईल, तेवढं बोलण्याचा प्रयत्न आईनं केला. हा काही बाऊ करण्यालायक प्रकार समजला जातो, हे लोकांकडून बऱ्याच उशिरा समजलं.
६. ऐन वेळी दूध, साखर, चहा, असल्या गोष्टी संपल्या तर घराजवळच्या वाण्याकडे, दूधवाल्याकडे आम्ही फार लहान वयापासून जायचो. यात काही नवल असतं, हे मला मोठी झाल्यावर लक्षात आलं. दोन-चारदा माझ्या हातून दुधाचा लोटा पडला आणि लिटरभर दूध सांडलं. त्याबद्दल एका शब्दानं तक्रार न करता, जुन्या भांड्यांमधून कडी असलेलं दुधाचं भांडं काढून दिलं.
७. बऱ्यापैकी अक्कल आल्यावर कधीही 'हे काम कर' असं कोणत्याही घरकामाबद्दल म्हटलं नाही. आई आणि वडील एका अक्षरानं न बोलता कामं, अभ्यास-वाचन करताना बघून (लाज वाटून) आम्ही दोघांनी घरकाम करायला सुरुवात केली.
८. 'वरच्या दादाला बघायला मुलीकडचे आले आहेत', हे वाक्य आईनं सुधारलं नाही. तेव्हा मी पाचवी-सहावीत असेन.
९. कॉलेजात असताना, वडलांनी तीन दिवस माझे चाळे बघून शेवटी चौथ्या दिवशी विचारलं, "तुला स्वयंपाक करायचाय का अभ्यास? अभ्यास करायचा असेल तर स्वयंपाकघरातून बाहेर हो." मी अजूनही आज्ञाधारकपणे स्वयंपाक या गोष्टीला फार भाव देत नाही.
१०. आमचं घर तसं स्वच्छ असलं तरी अतिशय पसरलेलं आणि अस्ताव्यस्त असायचं. त्यात घराला अनेक वर्षं रंग लावलेला नव्हता, फर्निचर जुनाट; घरात पावसाचं पाणी घुसून आणखी दशा झालेली. तळमजल्यावर राहणाऱ्या इतर सगळ्या शेजाऱ्यांपेक्षा आमचं घर वाईट अवस्थेत असायचं. आई-वडलांनी त्याची कधीही लाज बाळगली नाही. 'जागेवर ठेवलेली वस्तू कधीच सापडत नाही', 'पाहुणे आल्यावर बसायला जागा असली की झालं', असल्या गप्पा आम्ही कायम करायचो.

विशेषतः मुद्दा क्र. ५, ८ आणि ९ यांमुळे मला घरात बंडखोरी करता आली नाही; अशी तक्रार मी करते. मात्र बंडखोरी करण्याचं शिक्षणही आई-वडलांकडे बघूनच झालं, असं आता वाटतं.

मनीषा Fri, 23/11/2018 - 16:33

हे जरा अवघड काम आहे. कारण आपण जे सांगतो, शिकवितो ते आपल्या आचरणात आणायला हवे.

आमच्या आईवडिलांनी असे काही ठरवून काही शिकविले नाही. माझ्या वडिलांच्या ओळखी आणि मित्रपरिवार खूप मोठा आहे. तसेच जवळचे, लांबचे, नावापुरते असे असंख्य नातेवाईक. या सर्वांमध्ये वावरताना अनुभवातून आणि निरीक्षणातून बरेच काही कळले. ते सर्व लोक आई- बाबां बरोबर कसे वागतात, बोलतात हे पण पाहिले. काही कडू-गोड आठवणी अजूनही मार्गदर्शक ठरतात. चांगले-वाईट, विश्वासु-लबाड, प्रामाणिक-दांभिक माणसे ओळखायला थोडेफार जमायला लागले.

आई-बाबांनी आम्हा तिघांवर (मी आणि दोघे भाऊ) कसलीच बंधने घातली नाहीत. स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यायची आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी सुद्धा घ्यायची सवय लावली. हे त्यांनी जाणूनबुजुन केले का तीच त्यांच्या वागण्याबोलण्याची पद्धत होती म्हणून -- ते सांगता येणार नाही.

आमच्या पाच जणांच्या कुटुंबामधे मला मी मुलगी म्हणून वेगळी वागणूक दिली नाही.

माझे आईवडिल देव देव करणारे नाहीत, परंतु नास्तिक अथवा अश्रद्ध देखिल नाहीत. त्यामुळे धार्मिक रितीरिवाज, सण समारंभ याचीही माहिती झाली.

घरच्या वातावरणात मनमोकळेपणा होता. त्यांनी कधीही स्वत:च्या वडिलधारेपणाचा धाक घातला नाही.

माझ्या आई बाबांनी अनेकांसाठी, प्रसंगी पदरमोड करून, नुकसान सोसून अथवा कष्ट, त्रास सहन करून अनेक गोष्टी केल्या. त्याबदल्यात कसल्याही मोबदल्याची अथवा कृतद्न्यतेच्या शब्दांची अपेक्षा केली नाही. काही जण स्मरतात, काही जण विसरतात. त्यांचा हा स्वभाव आम्हा तिघांकडे (मी आणि माझे दोघे भाऊ) थोडाफार आला आहे असे वाटते.

सामो Sat, 24/11/2018 - 00:13

आई शिक्षिका होती, आदर्शवादी होती आणि स्त्रीमुक्तीवादी व बुद्धीमान होती. माझ्यात फक्त आदर्शवाद आला हे अलहिदा. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करायचे, आपल्या जीभेने कधी कुणाचं वाईट चिंतायचे (बोलायचे?) नाही आदि संस्कार आईने केले. कोणाकडेही काहीही मागायचे तर नाहीच, पण कोणीही काही भेटवस्तू दिली तरी ती नाकारायची. निस्पृहता, परधनाचा लोभ न बाळगणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे असे काही एक्सेसिव्हली बेसिक नियमही मनावरती बिंबविले. पण शिकविण्यापेक्षा आईचे आचरण पाहून पाहूनच या सर्व गोष्टी अंगवळणी पडल्या म्हणा ना. कवितेच्या ओळी, श्लोक हे ऐकत ऐकत मोठी झाले. शंकराचार्यां चा 'कुमाता न भवती' श्लोक तिच्या आवडीचा होता तसेच 'हिमालयावरील भिल्ल स्त्रिया जळणासाठी चंदन वापरतात - अर्थात अतिपरिचयात अवद्न्या' हा श्लोक्देखिल तिला आवडे. विविधभारतीमुळे एकंदर बाल्पण अत्यंत संगीतमय गेले.
बेला के फूल ऐकूनच मगच झोप लागत असे.

पुंबा Sat, 24/11/2018 - 09:11

आई वडिलांनी खास काही गोष्टी रूजवण्याचा प्रयत्न केला असे आज वाटते.
१. कुणाचाही मिंधेपणा चुकूनही घ्यायचा नाही. स्वाभिमानाला ठेच पोहोचेल असे वागायचे नाही.
२. अनोळखी माणसांशी संभाषण करायला भ्यायचे नाही. सभाधीटपणा हवाच.
३. चूक झाली असेल तर मान्य करायची व माफी मागायची.
४. हट्ट केला म्हणून ती वस्तू मिळाली असे होऊ दिले नाही, त्या वस्तूची गरज किती आहे यावर वाद घडत असे.
५. घरात करडी शिस्त कधीच नव्हती. आई क्वचित माफक मारत असे, वडिल चुकूनही नाही.
६. आपल्या जबाबदाऱ्या जाणिवपुर्वक आणि परफेक्टली पार पाडल्याच पाहिजेत, दुसऱ्यांवर त्या ढकलण्याचा प्रयत्न करायचा नाही.
७. कॉन्टॅक्ट्स वाढवण्याचे महत्व

भांबड Sat, 24/11/2018 - 16:08

प्रत्येकाच्या संस्काराच्या व्याख्या वेगळ्या असतात/असू शकतात

भांबड Sat, 24/11/2018 - 16:08

प्रत्येकाच्या संस्काराच्या व्याख्या वेगळ्या असतात/असू शकतात

अबापट Sat, 24/11/2018 - 16:25

मौजे सदाशिव पेठ , एकोणीसशे साठचे दशक . आई वडिलांनी बरेच प्रयत्न केले असणार आणि माझ्या दोन्ही मोठ्या भावांच्या बाबतीत हे संस्कार मॉडेल यशस्वी झालं आहेच . पण शेवटी कुठलही मॉडेल १०० टक्के यशस्वी होत नाहीच म्हणा तेव्हा ..असोच.

adam Sat, 24/11/2018 - 19:02

आज जरा हास्यास्पद वाटेल. मी संस्कार वर्ग वगैरेला जायचो अधूनमधून. तसे अनेकजण जातात. पण मी त्यातल्या उपदेशाला भलताच गंभीरपणे वगैरे घेइ. त्या संस्कारवर्गाला माझ्याइतक्या गंभीपणे घेणारे नक्की किती असतील ह्याबद्दल शंकाच आहे. शिवाय त्याच्या जोडीला बालपणीची काही विचित्र परिस्थिती होती घरी. आणि ह्या एकत्रित परिस्थितीला माझा बराचसा भाबडा प्रतिसाद होता. नंतर प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा कामधंद्याच्या निमित्तानं पडलो, त्यातही तुलनेनं ठाकठीक ठिकाणी लागूनही नाका तोंडात पाणी जायला लागलं.
"संस्कार" ह्या प्रकाराबद्दल तिशीला पोचल्यावर माझं मत --
http://www.aisiakshare.com/node/1603

अस्वल Sat, 24/11/2018 - 23:57

In reply to by adam

मनोबा, मी थोडं समजू शकतो.
मीही लहानपणी संस्कार वर्गाला गेलो आहे.
तिथे स्तोत्रं/गाणी/श्लोक वगैरे शिकलो आहे - (तेव्हा मला ते आवडायचं. शिवाय तिथे नंतर एक गोष्टही सांगत. चक्क गन्स ऑफ नॅवरोन्सुद्धा. असो).
-----------------------------
विवेकानंद/गीता असली पुस्तकं मला वयाच्या १५व्या वर्षी भेट मिळाली. ज्या वयात खरं तर सुकुमार यौवनाने मुसमुसलेल्या इ.इ. तरूणी वगैरे विषयक साहित्याने समृद्ध होण्याचं वय होतं तेव्हा कर्मसिद्धांत/राजयोग असले मसाले डोळ्यात घालून त्या केवळ वयानेच वाढलेल्या लोकांना काय मिळालं देव जाणे?
पण बहुधा पूर्वी (६०-७०-८०) च्या काळात स्वत:ला प्रचंड सिरिअसली घेणे- हा कदाचित मध्यमवर्गीय सद्गुण असावा अशी शंका येते.
अशावेळी सुदैवाने विवेकानंद ओझरतेच वाचले आणि वाचलो.
सदासर्वकाळ अशक्यप्राय अशा संस्कारांच्या ओझ्याखाली दबून राहिल्याने काय होत असेल त्याची कल्पना करू शकतो.

आनन्दा Mon, 03/12/2018 - 11:25

यानिमित्ताने एक वेगळा प्रश्न मनात आला

की उत्क्रांतीची आदिम प्रेरणा काय आहे? तर ती आहे वंशसातत्य. मग पुढचा प्रश्न असा आला, ही हे सातत्य केवळ जनुकीय पातळीवरच असेल का? जेव्हापासून माणूस *विचार* करायला लागलाय तेव्हा या जनुकीय पातळीवरील वंशसातत्याच्या जागेत हे वैचारिक वंशसातत्य पण घुसखोरी करत आहे की काय? आणि असे असेल, तर आपले संस्कार आपल्या मुलाला देऊन मुलाला आपल्यासारखे बनवण्याचा प्रयत्न म्हणजे एक उंक्रांतीमध्ये आपल्याला मिळालेली आदिम प्रेरणा मानावी का? आणि जर तसे असेल तर मग आपण त्या प्रेरणेला नाकारण्यात काय हशील?

राजेश घासकडवी Mon, 03/12/2018 - 20:43

In reply to by आनन्दा

आपल्या पिल्लांचं संगोपन करणं, आणि त्यांना जगण्यासाठी लागणारी कोशल्यं शिकवणं हे उत्क्रांतीचंच देणं आहे. मांजरी आपल्या पिल्लांना उंदराची शिकार करायला शिकवतात. पक्षी उडायला शिकवतात. माणसाच्या बाबतीत ही शिकवावी लागणारी कौशल्यं प्रचंड प्रमाणात वाढतात. याचं मुख्य कारण म्हणजे माणसाने समाज नावाची एक व्यवस्था तयार केलेली आहे. आणि दुसरं कारण म्हणजे इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा माणसाचं पोर खूप अधिक काळ असहाय/अपरिपक्व असतं. हाही उत्क्रांतीचाच भाग आहे.

पण उत्क्रांतीचं देणं म्हणजे उत्क्रांतीने टाकलेलं ओझं नव्हे. माझं मत 'संस्कार करावेत' असं असलं, तरी केवळ उत्क्रांतीमधून आपल्या व्यक्तिमत्वात काही पैलू आलेले आहेत म्हणून तसं वागण्याची गरज आहे, हे कारण मला पटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 04/12/2018 - 21:33

In reply to by राजेश घासकडवी

मांजरींचा उल्लेख केला आहेतच म्हणून दोन गमतीशीर मांजरगोष्टी -

मांजरींची पिल्लं आईचं दूध पिताना तिच्या पोटावर थोडी कणीक मळल्यासारखं करतात. त्यामुळे दूध सहज, चटकन मिळत असावं. मांजरांची ही सवय मोठ्या झाल्या तरी जात नाही. बहुतेशा मांजरी, तिर्रीसुद्धा (मांजर) कोणताही मऊ पृष्ठभाग मिळाला की (कोपरानं खणण्याऐवजी) पुढच्या पायांनी कणीक मळल्यासारखं करते.

दुसरं, मांजरी आपल्या आईसाठी शिकार घेऊन येतात. पुन्हा, तिर्री (आणि पांढरूसुद्धा) मला आई समजून माझ्यासाठी शिकार परत आणायच्या. आमच्या गॅरेजात उंदीर शिरला तो तिर्रीनं जिवंत पकडून आणला आणि 'ही पाहा शिकार आणली' यासाठी आरोळी मारायचा प्रयत्न केला तेव्हा!

कोणत्याही हलणाऱ्या, बारक्या गोष्टींवर हल्ला करणं ही उपजत मांजरप्रेरणा आहे. मांजरीची पिल्लं आपल्या आईच्या फडफडणाऱ्या शेपटीवरही हल्ला करतात. त्या प्रेरणा जनुकांमधून येतात. अशा प्रेरणा बहुतांश मांजरांमध्ये असतात.

संस्कार निराळे. वर लोकांनी संस्कारांच्या याद्या दिलेल्या आहेत, त्यात अनेक परस्परविरोधी गोष्टी आहेत.

सामो Wed, 05/12/2018 - 06:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसरं, मांजरी आपल्या आईसाठी शिकार घेऊन येतात. पुन्हा, तिर्री (आणि पांढरूसुद्धा) मला आई समजून माझ्यासाठी शिकार परत आणायच्या.

होय हे असे किस्से खूप ऐकुन आहे.खरच कसे हे प्राणी प्रेम करतात.

राजेश घासकडवी Mon, 03/12/2018 - 23:20

लेखावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांनाच धन्यवाद. काही सामायिक मुद्दे उपस्थित झाले त्याबद्दल काही मतं मांडतो.

1. आंतरप्रुनर्शिप - स्वतःचा काहीतरी उद्योग काढून तो भरभराटीला आणण्याची कला किंवा क्षमता. माझ्या मते हा एक गुण नसून अनेक गुणांचा समुच्चय आहे. मराठी मध्यमवर्गात 'कुठेतरी नोकरीला चिकटायचं म्हणजे कटकट नसते, रोज नऊ ते पाच काम केलं की आपोआप पैसे मिळतात' हा संस्कार प्रकर्षाने केला जातो. काहीतरी धोका पत्करून त्या सुरक्षिततेपलिकडे जायचं याला नकार असतो. म्हणूनच मराठी माणूस धंद्यात मागे हे चित्र तयार होताना दिसतं. तेव्हा हा धोका पत्करण्यासाठी जे आवश्यक गुण असतात त्यांचा संस्कार होणं आवश्यक असतं. माझ्या मते त्यासाठीचे गुण हे आत्मविश्वास, आणि कष्टांची तयारी (जे मूळ लेखात आहेत) यापलिकडे आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची हिम्मत यातून येतात. त्यासाठी मुलांची स्वप्नं जीवंत ठेवणं आणि त्यांना खतपाणी घालणं हे आपण पालक म्हणून कर्तव्य ठरतं.

2. संस्कार करावेतच का? असाही प्रश्न उपस्थित झाला. माझ्या मते संस्कार न करणं हा पर्याय उपलब्धच नाही. कारण संस्कारांचा अभाव हाही एक प्रकारचा संस्कारच ठरतो. पालक म्हणून आपण जे काही करतो, किंवा जे काही करत नाही या दोन्हींमुळे मुलांवर वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. त्यामुळे काय करावं किंवा काय करू नये या प्रकारच्या सर्व निर्णयांतून संस्कार होतात. तेव्हा 'संस्कारच करू नयेत' हा निर्णयच बाद ठरतो.

आत्ता इतकंच. अजूनही लिहिण्याची इच्छा आहे...