Skip to main content

समाजमाध्यांकित विचारवंत होण्याची दशसुत्री

समाजमाध्यांकित विचारवंत होण्याची दशसुत्री

१. सर्वसामान्य जनतेला ठाऊकच नसलेल्या परकीय लेखकांच्या पुस्तकांची यादी तयार करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल माहिती वाचावी
२. ही माहीती मराठीत अशा पद्धतीनं लिहायची की वाचणाऱ्याला मूळ लेखकाचे सगळं प्रकाशित अप्रकाशित साहित्य कोळून प्यायला की काय असं वाटावं! ही लिहिलेली माहिती सोप्या आणि जड भाषेत लिहून समाज माध्यमातून पोहोचवावी. सोपी भाषा सर्वसाधारण वाचक तर जड भाषा प्रगल्भ वाचक.
३. प्रगल्भ वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास असे वाचक कसे फक्त लोकप्रिय आणि रसिकप्रिय लेखकाची पुस्तके वाचतात यावर काथ्याकूट करायचा. अशी मंडळी कशी प्रतिगामी अवैज्ञानिक आणि बुरसटलेल्या मानसिकतेची असतात यावर पोष्टी पाडायच्या.
४. सर्वसाधारण वाचकांचा अपेक्षित प्रतिसाद न आल्यास अशा वाचकांना साहित्यिक जाणच नाही यावर प्रदीर्घ पोस्ट लिहायची. त्यात त्यांच्यावर ब्राह्मणवादी संस्कृती आणि सनातन विचारांचा प्रभाव कीती खोलवर आहे असे टिकात्मक लिखाणातून ठोसपणे लिहायचे.
५. जर दोघांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला तर. तर भांबावून न जाता क्रमांक १,२ आणि ३ ची च्या कृती पुन्हा करायच्या. फक्त प्रगल्भ वाचकांना ठाऊक असलेल्या परकीय लेखकांच्या साहित्याबद्दल सोप्या भाषेत लिहावे सर्वसाधारण वाचकांसाठी. इथे वैचारिक प्रमोशनसाठी आणि आत्मप्रौढी मिरवण्यासाठी नामी संधी मिळते. त्यात सामान्य वाचन करणारे लोक मिळाले तरीही बेहत्तर. अशी सुवर्ण संधी सोडायची नाही. आत्मप्रौढी मिरवताना लिखाणातून सेल्फ ऍपिझमेंट करणं महत्वाचं. मी कशाप्रकारे कसलीही सामाजिक राजकीय आर्थिक आणि परंपरागत पार्श्वभूमी नसताना इथपर्यंत आलो आणि टिकलो हे दाखवून द्यावे. इथे स्वतःच्या सामाजिक, साहित्यिक, वैचारिक आणि पुढारलेल्या मानसिकतेचा अवाका दाखवून देण्यासाठी जगप्रसिद्ध पाश्चिमात्य देशांमधील विचारवंतांची पुस्तकं वाचून स्वतःला बदलत गेलो हे ठशीवपणे लिखाणातून मांडावे.
६. एवढं सगळं कशाचीही अपेक्षा न ठेवता जोपर्यत करावे तोपर्यंत तुमचे समाजमाध्यमात फॉलोअर्स वाढत नाहीत. जर फॉलोअर्स वाढले तर त्यांच्यापैकी आर्थिक क्षेत्रात सधन लोकांच्या सानिध्यात राहून वैचारिक मंथन करावे. फॉलोअर्स पैकी कोणी राजकीयदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने समक्ष असेल तर संमेलने, चर्चासत्र वा साहित्यिक मेळावे यासाठी आग्रही असावे. या सगळ्यात आपण फक्त मार्गदर्शक म्हणून वावरावे. एक्टीव्ह पार्टिसिपेशन टाळावे आणि दिवसभर जरी घरी रिकामे असलो तरी आगामी मोठ्या प्रोजेक्ट्स बद्दल तयारी चालूय म्हणून वायरी सोडाव्यात. त्यात एखादा शिष्यवृत्ती योजना देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मुद्दामहून बहुजन होतकरू लेखकाची नावे पुढे करावीत जेणेकरुन त्यांना वैचारिक व्यासपीठावर फुटेज मिळेल व त्यांच्या लेखी तुम्ही ऋषितुल्य व्हाल.
७. इथपर्यंत जर सगळं सहज शक्य नाही झालं तर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे आपण लिखाणातून अशाप्रकारे अवलोकन आणि सिंहावलोकन करावे की सभोवतालच्या समाजातील लोकांचा आयक्यू हा अश्मयुगीन आहे. आणि जग खूप पुढे गेले तरीही ही मंडळी नॉस्टॅल्जिक चिखलात लोळणारी आहेत असे तिखट शब्दांत सांगावे.
८. जर कोणी तुमची दखल घेतलीच तर आजूबाजूच्या वातावरणात कल्लोळ माजला असून तुम्ही माझ्यासारख्या पामराची दखल घेतल्याने समाजात अजूनही सुधारणा होण्यासाठी खूप वाव आहे असे छातीठोकपणे सांगावे. त्यासाठी स्वखर्चाने छोटेखानी कार्यक्रम आयोजित करावेत.
९. एवढे प्रयत्न करूनही हाती काहीच लागले नाही तरी नकारात्मक आणि नैराश्याच्या वाटेवर जाऊ नये. जर तशीच अवस्था जाणवली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शोषितांच्या, वंचितांच्या, दुर्लक्षित बहुजनांच्या, विस्थापित विस्कटलेल्या जनजाती, आदिवासी लोकांच्या बद्दल तळमळीने लिखाण करावे. त्यांच्यावर सांस्कृतिक दहशतवादाचे सावट आणि आव्हान कसे वाढतेय यावर लिखाण करावे. अशी मंडळीचे ब्राह्मणीकरण होण्यासाठी वर्चस्वतावादी संघटना, नेते कसे कारणीभूत आहेत यावर धाय मोकलून क्रंदन करावे.
१०. ही शेवटची कृती. एवढे सगळे खटाटोप करूनही कोणी म्हणजेच कोणीही तुमची दखल घेतली नाही तर कृती क्रमांक १, २ आणि ३ पुनः एकदा करावी. फरक एकच. आता लोकप्रिय, रसिकप्रिय, सर्वसामान्य लोकांना परिचित असलेल्या लेखकांचं साहित्य उपयोगात आणावे.

® भूषण वर्धेकर
पुणे- ४१२११५
३० सप्टेंबर २०२२
वेळ - वामकुक्षी घेण्यापूर्वी

Rajesh188 Fri, 30/09/2022 - 16:22

जगातील प्रतेक व्यक्ती विचार वंत च असतो.

विचारवंत लेखक ,विचारवंत Etc आणि
सामान्य लोक अस वर्गीकरण करून आपण विचारच चे अनेक प्रकार ला मिस करतो..
चाकोरी नी चालून
चांगले,वाईट,पाप,पुण्य, विचारी,अविचारी . असले नको ते शिक्के आपण मारतो.
समाज माध्यमावर अनेक विचाराची लोक असतात .
त्यांना एक ठराविक विचार पटने कसे शक्य आहे.
ह्या विचाराचा योग्य आणि ह्या विचाराचा अयोग्य असा न्याय करणारे .
सृष्टी निर्माते नाहीत की त्यांचे सर्व विचार योग्य च असतात
समाज माध्यमात व्यक्त होणारे सर्व प्रकारचे विचार मला तरी अयोग्य वाटत नाहीत.

हिंसाचार लं उत्तेजना देणारे सोडून .
..

स्वयंभू Fri, 30/09/2022 - 22:47

प्रत्येक व्यक्तीला आपापली मते असावीतच. ती त्याने मांडली आणि तुम्हाला पटली पाहिजेत असा काही नियम नाही. जो तो ज्याच्या त्याच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे व्यक्त होत असतो. केवळ तो आपल्या विचारांचा नाही म्हणून त्यांच्यावर उगाचंच आसूड ओढण्यात किंवा ट्रोल करण्यात काय अर्थ आहे?

जर तुम्हाला तुमचेच विचार खरेखुरे आणि बाकीच्यांचे भिकारडे वाटत असतील वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. एखाद्याची जडणघडणच तशी झालेली असते.

आजकाल तर फेसबुकवर ढिगभर पोस्टी पसरलेल्या असतात. कोणी कोणाला किती सिरियसली घ्यावं हे समजलं पाहिजे. काही जण नैराश्यातून व्यक्त होत असतात. काही जण फुशारक्या मारण्यासाठी व्यक्त होतात तर काही आपण आपली मते कुठेतरी मांडलीच पाहिजेत याच आविर्भावात मांडतात. (पुणेकरांना हे भारी जमतं.) असो

वरील दशसुत्री अशाच मिरवणाऱ्या मंडळींना समर्पित आहे.

पुंबा Sat, 01/10/2022 - 07:39

सर्वसाधारण जनता भिकार व्हाट्सपी मेसेज सोडून काही वाचत नाही सर. अशावेळी पहिली कृती करणारे श्रेष्ठच म्हणावे. सबंध लेख अँटीइंटिलेक्च्युअलिझमचा चांगला नमुना आहे.

स्वयंभू Sat, 01/10/2022 - 22:05

In reply to by पुंबा

समाज माध्यमातून आता जे थोपवले जातंय तेवढंच वाचून शेखी मिरवणारे वाढलेत.

माहितीचा विस्फोट झाल्यापासून इंटेलिक्चुअल टॉक्स किंवा थॉट्स वगैरे असं काहीही राहीले नाही. सगळं नॅरेटिव्ह सेट करणं किंवा पायंडे पाडणे यात विभागलं गेलं आहे.

वरील वेच्यात ज्या कृती दिल्या आहेत त्या मौजमजा म्हणून दिल्या आहेत.
हल्लीची वैचारिक लेखन प्रसवणारी मंडळी शोबाजी करण्यात फारच माहिर आहे. कुठलीतरी चार आंग्लपुस्तके वाचून तुलनात्मक दृष्टीने आपापल्या मातीतले संदर्भ जोडून आपण कीती मागास किंवा अमुकतमुक कसे पुढारलेले आहेत याबद्दल बौद्धिकं झाडत बसतात. काही तज्ञ तर द्वेष पूर्ण लिखाणातून वैचारिक अरेरावी करणारे. तर काही बहाद्दर कोण भूतकाळात कसा चुकला, काय करायला नको होतं, काय करायला हवं होतं यावर काथ्याकूट करण्यात पटाईत. मग अशी मंडळी आपापल्या फॉलोअर्स चे कंपू तयार करून स्वतःच्या कोशात रमणारी असतात.

या सर्व कल्लोळात जे कोणी विद्वान लेखन वाचन मनन चिंतन आणि सूक्ष्म निरीक्षण करून खरेखुरे इंटेलिक्चुअल्स असतात ते दुर्लक्षित राहतात. याला जबाबदार सामाजिक राजकीय अनास्था जशा आहेत तशाच लोकांच्या वैचारिक अनास्था पण आहेत. लोकांमध्ये जिज्ञासा आणि कुतुहल तयार होणं गरजेचं आहे.

उगाचंच शेकडो लाईक्स मिळतात म्हणून प्रगल्भता आली असा साक्षात्कार झालेली मंडळी ढिगानी सापडतात.

आजकाल तर फेसबुकवर टॉप फॅन नावाची बिरूदावली मिरवणाऱ्या कमेंटकर प्राण्यांचा सुळसुळाट झालाय.

या वरची कडी म्हणजे फेसबुकवर पेड सर्व्हिस घेऊन स्वतः स्वतःच्या पोस्टचे हजारो लाईक्स आणि शेअर वाढवणारे पण तेजीत आहेत.

Rajesh188 Sat, 01/10/2022 - 20:25

आज काल यूट्यूब वर पण अनेक विषय वर व्हिडिओ असतात.
आणि त्या मधील अनेक तर अतिशय बोगस आणि बकवास असतात
आणि ह्या लोकांना कोणताच विषय वर्ज्य नसतो.
अगदी नासा पासून qunatam physics सारख्या अतिशय कठीण विषयावर पण हे व्हिडिओ बनवतात.
कोणतेच ज्ञान नसताना.अवघड विषयावर आत्म विश्वास नी फेकत असतात..आणि असे व्हिडिओ बघणारे प्रेक्षक पण लाखो असतात.

स्वयंभू Sat, 01/10/2022 - 21:47

In reply to by Rajesh188

युट्यूबवर व्ह्युवर्स जेवढे नाहीत तेवढे आजकाल खंडीभर युट्यूबर आजूबाजूला सापडतात. टिकटॉकर पेक्षा कमीच आहेत म्हणा. हे ही नसे थोडके!
इ-कंटेंटच्या नावाखाली काहीही दृकश्राव्य कचरा तयार होतोय दररोज हजारो तासांचा.
काही कंटेंट युट्यूबवर मात्र बघण्यासारखे असतात. पूर्वी फक्त इंग्रजी मधली चॅनेल्स होती ज्ञानवर्धक म्हणावी तशी. आजकाल हिंदी, मराठीत पण फार रिसर्च करून व्हिडिओ तयार केले जातात.

गलिव्हर Wed, 05/10/2022 - 11:08

In reply to by स्वयंभू

हे बघा, तुम्ही तुमच्या लेखात ज्यावर टीका केली तेच केलेत.

"टिकटॉक इत्यादी दृकश्राव्य कचरा असतो" हे सुद्धा स्वतःला अत्यंत कल्चरल उच्भ्रु समजण्याचा प्रकारच आहे हे ध्यानात असू द्या. फक्त कदाचित तुमच्या सर्कलमध्ये "टिकटॉकला कचरा समजणे" हेच स्वाभाविक मानले जाते त्यामुळे तुम्हाला तेच युनिव्हर्सल सत्य आहे असे वाटते.

स्वयंभू Sun, 16/10/2022 - 16:23

In reply to by गलिव्हर

रंगीबेरंगी केसाचे टिकटॉकर आणि त्यांच्या कंटेट ला कचरा म्हणणं योग्य.
तसंही टिकटॉक, रील्स आणि शॉर्टस वगैरे मुळे कंटेंट करणाऱ्यांना आपण बेरोजगार आहोत म्हणून करतोय का किंवा हेच आपल्याला रोजगार उपलब्ध करून देतील की नाही हेच कळत नसावे.

मात्र काही लोकांनी स्वतः ला टिकटॉकस्टार वगैरे मिरवून पैसे कमावल्याचे ऐकले आहे. खरं खोटं माहिती नाही.

विवेक पटाईत Mon, 03/10/2022 - 18:05

लेख आवडला. बुद्धिजीवी आणि विचारवंत बनण्यासाठी ही मार्क्स जिंदाबाद, वायर,ग्लोबल टाइम्स,एनडीटीव्ही इत्यादी विचारांवर सकारात्मक विचार प्रगट करणे. काहीच सुचत नसेल तर मनुस्मृती ते आरएसएस , बाबा रामदेव इत्यादींची निंदा करावी.

स्वयंभू Sun, 16/10/2022 - 16:27

In reply to by विवेक पटाईत

आजकाल फेसबुकवर बरेच लोकांना मी कोण्या एका लेखकाच्या साहित्याची उदाहरणे देऊन आपला देश वगैरे कसा मागे आहे हे वाचले.

आणि गंमत म्हणजे भूतकाळात अमुकतमुक दिवंगत लोकांनी तमुक अमुकच का केले अमुक तमुकच करायला पाहिजे होते वगैरेचे प्रमाण वाढले आहे.

Rajesh188 Mon, 03/10/2022 - 19:50

1) कुटुंब व्यवस्थेचे सर्वांगीण फायदे ह्यांचा अभ्यास न करता.कुटुंब व्यवस्था कशी हक्काचे शरीर सुख आणि स्त्रियांचे शोषण करण्यासाठी निर्माण केली आहे असे तारे तोडणे.
२) नीतिमत्ता, पाप पुण्य ,चांगले कर्म असे काही नसते.
स्त्री आणि पुरुष असे दोन च प्रकार आहेत.
आई,बहिण अशा नात्यात शारीरिक संबंध ठेवणे गैर नाही .
असे पण तारे तोडणारे आहेत.
त्यांना नात्याच महत्व बिलकुल काळत नाही.
शरीर संबंध आले की नाते शिल्लक राहत नाही.
त्या मधला गरिमा राहतं नाही.
इतकी समजण्या इतकी पण अक्कल नसणारे .

प्रकाश घाटपांडे Wed, 05/10/2022 - 09:37

थोडक्यात काय तर
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् |
येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत् || =))

गलिव्हर Wed, 05/10/2022 - 11:04

फुरोगामी, ब्रिगेडी इत्यादी ईमेजरी वापरून कसल्याही जिलब्या पाडता येतात ह्याचे टेम्प्लेट म्हणून हा लेख चालून जाईल.

Rajesh188 Wed, 05/10/2022 - 22:55

ह्या दोन्ही गोष्टी भारतीय लोकात नाहीत.

शिक्षण पद्धती च तशी आहे.
दुसऱ्या कोणत्या तरी प्रसिद्ध महापुरुषाचे धडे आणि ते पाठ करून त्या वर उत्तर.
कोणत्या तरी महान संशोधकांचे प्रयोग आणि प्रमेय ,आणि ते पाठ करून त्याची उत्तर .
ह्या वर भारतात व्यक्ती शिक्षित होतो.
स्वतःची बुद्धी वापरायला लागेल असे शिक्षण
च नाही.
प्रतेक student ल वेगळा प्रश्न हवा आणि त्याचे उत्तर पाठ नाही तर विचार करून देण्याची गरज पडावी अशी शिक्षण व्यवस्था हवी
आता नेता बोलाला डोलवल्या माना.
सायन्स,समाज शास्त्र, सर्व विषयात हीच अवस्था आहे .
स्वतःची मतं च नाहीत.
ही कमजोरी भारतीय लोकांची हुशार लोकांना माहीत आहे ह्या लोकांना कोणी ही मूर्ख बनवू शकते हे पण माहीत आहे.
शिक्षण च हेतू नोकर तयार करने हाच आहे भारतात.
म्हणून अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोक जास्त बेरोजगार आहेत .
अशिक्षित राज्य करते आहेत आणि शिक्षित सरकारी नोकर आहेत
त्या मुळेच
सोशल मीडिया,you tube वर किती ही बकवास विचार व्यक्त करा तो व्यक्ती लोकांना महान वाटतो

'न'वी बाजू Thu, 06/10/2022 - 01:17

In reply to by Rajesh188

म्हणण्याशी बव्हंशी सहमतीकडे कल आहे, परंतु,

स्वतःची बुद्धी आणि स्वतः विचार करायची सवय
ह्या दोन्ही गोष्टी भारतीय लोकात नाहीत.

शिक्षण पद्धती च तशी आहे.

शिक्षणपद्धतीच तशी आहे, की संस्कृतीच तशी आहे (म्हणून शिक्षणपद्धती तशी आहे (म्हणून संस्कृती तशी आहे (म्हणून ...(दुष्टचक्र))))?

प्रतेक student ल वेगळा प्रश्न हवा आणि त्याचे उत्तर पाठ नाही तर विचार करून देण्याची गरज पडावी अशी शिक्षण व्यवस्था हवी

प्रश्नाचे उत्तर विचार करून देण्याची गरज पडावी, हे पटण्यासारखे आहे. परंतु, अधोरेखित भाग व्यवहार्य आहे काय?

सायन्स,समाज शास्त्र, सर्व विषयात हीच अवस्था आहे .
स्वतःची मतं च नाहीत.

समजा, मी पदार्थविज्ञानाचा विद्यार्थी आहे. प्रकाश सरळ रेषेत प्रवास करीत नसून, वाटेत कोलांट्या उड्या मारीत करितो, असे मी माझे स्वत:चे मत बनविले. चालेल काय?

समजा, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. अमेरिकेचा शोध कोलंबसाने (प्रत्यक्ष तेथे जाऊन) लावला नसून , महात्मा गांधींनी (दुर्बिणीच्या सहाय्याने) लावला, असे मी माझे स्वत:चे मत बनविले. चालेल काय?

समजा, मी भूगोलाचा विद्यार्थी आहे. पृथ्वी गोल (अर्थात, पर्यायाने त्रिमितीय) नसून, (सपाट, अर्थात पर्यायाने द्विमितीयसुद्धा नव्हे, परंतु) एकरेषीय (अर्थात एकमितीय) आहे (किंवा, भारताची राजधानी नवी दिल्ली नसून इस्लामाबाद आहे), असे मी माझे स्वत:चे मत बनविले. चालेल काय?

माझी स्वत:ची मते मी काय वाटेल ती बनवू शकतो. परंतु, त्या मतांना काही आधार नको? आणि, तो आधार, तो पाया पक्का असावा, याकरिता योग्य पावले उचलणे एवढी किमान जबाबदारी शिक्षणाची नसावी?

(पुढे जसजशी माहिती वाढत जाते, नवी माहिती प्राप्त होते, अनुभव वाढतात, परिस्थिती बदलते, तसतसे शिक्षणातून बनविलेल्या मतांच्या विपरीत मते बनणे/बनविणे हेदेखील रास्त असू शकते. परंतु, त्यालासुद्धा काही सबळ आधार पाहिजे. उगाच स्वत:चे मत येनकेनप्रकारेण बनवायचेच आहे, म्हणून बनवले जाऊ नये.)

शिक्षण च हेतू नोकर तयार करने हाच आहे भारतात.

तसा तो ब्रिटिशकाळात होता, म्हणतात. आजमितीस तो नक्की काय आहे, हे कदाचित एकटा तो जगन्नियंताच (असलाच, तर, आणि सांगू शकलाच, तर) सांगू शकेल.

म्हणून अशिक्षित लोकांपेक्षा शिक्षित लोक जास्त बेरोजगार आहेत .

हे केवळ तुमचे स्वत:चे मत आहे, की त्याला विद्याचे काही पाठबळसुद्धा आहे?

असो. बाकी चालू द्या.