दाऊद का मेला?

त्याच्याच एआयनं बनवलेला त्याचा फोटो. ह्या चित्रातल्या व्यावसायिकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.
तो तसा खाऊनपिऊन सुखी होता. पण चतकोरानं त्याला सुख नव्हतं. भव्यदिव्य काही करण्याची त्याची खूप इच्छा होती.
तो त्याच्या आजूबाजूला बघायचा, त्याच्या समाजातलं कुणीही त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आब राखून नव्हते. जे कुणी होते ते इतर समाजांतल्या मुखियांच्या हाताखाली 'चांगला असिस्टंट' म्हणून प्रसिद्ध होते. कुणी काही थोर केलं म्हणून, किंवा कुणी अनैसर्गिकरीत्या मरण पावलं तरीही पेपरातही त्याच्या समाजातल्या लोकांचं नाव छापून यायचं तेही 'राजाचा उजवा हात' किंवा 'दादाचा हस्तक' अशा छापाचं. राजा, दादा किंवा बापूचा कुणी तरी असं. त्यांना स्वतंत्र स्थान नव्हतं. त्यानं लहान वयातच ठरवलं होतं की आपण कुणी तरी बडा आदमी बनायचं. अमिताभ जसा 'फेंकें हुए पैसे' नाही उचलायचा तसा आपणही मरू तेव्हा 'अमक्याचा तमका' नाही असणार, अशी शपथ त्यानं तीनतीनदा घेतली होती.
तो जेव्हा भारत सोडून गेला तेव्हा त्याच्या बरोबर वाढलेले बरेच इतर लोकही भारत सोडून जात होते. पण त्यांची गणना विस्थापित म्हणून होत होती. हा मात्र इमिग्रंट होता. याचा स्वतःचा भारतातही मोठा स्वॅग होता. भारतात त्यानं मोठं नाव कमावलं होतं, आणि तो आता भारताबाहेर निघाला होता. त्यानं तिथे आता अगदी उलट वागायचं ठरवलं. भव्यदिव्य काही करण्याची त्याची इच्छा त्यानं पूर्ण केली होती. पण … अजून मिडलाईफ क्रायसिस – मिलाक्रा – बाकी होता.
तो भारताबाहेर जायला निघाला, आणि अगदी प्रवासाच्या पहिल्या पाच मिनिटांतच त्याला मिलाक्रा आला. मूळचा कोकणी असला तरीही उत्क्रांती, वडलांकडून आलेली बेकिंगची आवड आणि मिलाक्रा यांच्यापुढे कुणाचं काय चाललंय! पूर्ण प्रवासभर त्यानं माणसांशी संपर्क टाळला. एका कोपऱ्यात, अंधारात, डोकं गुडघ्यांत खुपसून त्यानं तडकफडक विचार सुरू केला. आता आयुष्याला काय अर्थ आहे!
पाचच मिनिटांत त्याची पाठ धरली. आजवर संपूर्ण आयुष्य काही भव्यदिव्य करण्याच्या नादात त्यानं शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यानं बॉडी कमावायचं ठरवलं. नवीन घरी पोहोचल्यावर मात्र प्रवासामुळे त्याचं शरीर एवढं आंबलं होतं, की सुरुवातीला काही काळ त्याला घरातच राहावं लागलं. बाहेर जाता येत नसल्यामुळे त्यानं घरीच डंबेलं आणि दोरीच्या उड्या मागवल्या. एकीकडे क्रिकेटची मॅच बघता बघता त्यानं जोरबैठकांपासून सुरुवात केली. आता तो अमेरिकन निंजा वॉरियरमध्ये जाऊन ती स्पर्धा जिंकू शकला असता; पण भव्यदिव्य काही करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यानं आपली बॉडी आणि अमृतावयनींच्या प्लास्टिक सर्जनलाही असूया वाटावी असा चेहरा लपवायचंच ठरवलं.
वर्षभर सतत क्रिकेट सुरू नसतं. उरलेल्या वेळात काय करायचं हा प्रश्न होताच. त्याचा आधी बॉलिवूडशी संपर्क येऊन गेला होता. पण ते त्याला फार भावलं नाही. त्याला जगही जिंकायचं होतं आणि त्याच वेळेस त्याला प्रसिद्धीही नको होती. त्यानं त्याचा विचार आपल्या मुलीला सांगितला. ती म्हणाली, “अब्बा, तू तर श्रोडिंजरी मांजर झालास की! तुला हेही हवं आणि तेही हवं. तुला केक हवाय आणि नकोयही!”
त्याला श्रोडिंजर काय-कोण, त्याची मांजर होणं म्हणजे काय, हे काहीही माहीत नव्हतं. त्याला मिलाक्राचा आणखी एक झटका आला. त्यानं मुलीच्या सल्ल्यानुसार फाईनमनची पुस्तकं मागवली. पाकिस्ताननं क्रिकेटचा वर्ल्ड कप नुकताच जिंकला होता आणि ट्वेंटी-ट्वेंटी सुरू होण्यासाठी आणखी जवळजवळ एक दशक बाकी होतं. मात्र एकीकडे इंटरनेटची सुरुवात झालेली होती. त्याच्याकडे खूप वेळ होता. संपूर्ण फिजिक्स, आणि स्ट्रिंग थिअरी, आणि वेब डेव्हलपमेंट यांकडे लक्ष द्यायचं त्यानं ठरवलं.
असं म्हणतात की स्ट्रिंग थिअरी व्हायरल गेली ती त्याच्यामुळेच. अजूनही इंटरनेट सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नव्हतं; त्यामुळे काहीही व्हायरल जायचं तर आणखी काही वर्षं थांबावं लागणार होतं. तरीही सामान हलवण्यासाठी मदत करणारे अमेरिकी तरुण ते रात्रभर आकाशदर्शनाला जाण्याच्या नावाखाली टेलिस्कोप समोर रांगा लावताना तरुण मुलींकडे चोरूनचोरून बघणारे भारतीय तरुण सगळे स्ट्रिंग थिअरीमागे पागल झाले होते. भौतिकशास्त्र शिकणाऱ्या कुठल्याही मुलीला ‘जेवण झालं का’, या प्रश्नाचा सामना करावा लागत नव्हता. ‘तुला स्ट्रिंग थिअरी आवडते का’, या प्रश्नानं त्या हैराण होत होत्या.
तो आपल्या स्ट्रिंग-थिअरी-व्हायरल-डेव्हलपमेंटमुळे खुश असला तरीही वेब डेव्हलपमेंटवर खुश नव्हता. हे सगळं शिकण्यामागचा त्याचा मुख्य उद्देश होता – इंटलिजंट डिझाईन. नाही, नाही, तो उत्क्रांतीविरोधक नव्हता; त्याला काय हवं आहे, काय बनवायचं आहे याला तेव्हा नाव नव्हतं. जुडेआ पर्लनं त्याची हीच समस्या 'The Book of Why'मध्ये मांडली आहे. पण हे सगळं खूप पुढे घडलं. त्याला जे बनवायचं होतं, त्याला आता आपण जननशील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, Generative AI. तुम्हाला चॅट जीपीटी माहित्ये का, ते याचं एक उदाहरण झालं.
असं काही बनवायचं तर खूप चांगली अल्गोरिदमं हवीत, असा त्याचा सिद्धांत होता. दुसरा कँप होता तो खूप डेटा मिळवणाऱ्यांचा. त्याला त्याच्या एकांतवासातल्या अज्ञातवासात, एकटा बसून या दुसऱ्या कँपमध्ये काय सुरू आहे हे लांबूनच बघता येत होतं. सुरुवातीला त्यानं माणसांची देवभक्ती आणि कोण किती पोचलेले आहेत, याचं भाकीत करण्याचं अल्गोरिदम लिहिलं. याची प्रेरणा त्याला 'पेस्तनकाका' वाचून मिळाल्याचं त्यानं कोडमध्येच लिहून ठेवलं आहे. "हंड्रेड पर्सेंट तुकाराम" हे विष्णुपंत पागनीसांचं वर्णन ऐकून त्याच्या डोळ्यांना पाणी आलं होतं. आता तो पेस्तनकाका, आणि पर्यायानं पु. ल. देशपांड्यांची (कवी)कल्पना प्रत्यक्षात आणत होता. त्याच्या अल्गोरिदमला साधकांच्या अध्यात्मिक कोशंटचं भाकीत अगदी अचूकपणे करता यायला लागलं. व्यक्तीचं वय, लिंग, आणि रामनवमी आणि वसुबारसेच्या दिवशी काढलेले फोटो वापरून हे अल्गोरिदम खूप छान काम करतं. आता हे मॉडेल प्रॉडक्शनमध्ये आहे. काही बटणं दाबली की उत्तर मिळतं. जगाला सॉफ्टवेअर निर्यात करणाऱ्या भारतात वापरलं जाणारं हे प्रॉडक्ट एका कोकणी माणसानं बनवलेलं आहे!
त्याच्या गणिती शिक्षणाचा फायदा झाला. आता त्याला पुढच्या गोष्टी खुणावू लागल्या. तो अज्ञातवासात होता, आणि जगही आता मशीन लर्निंगच्या जगात आलेलं होतं. सोम्यागोम्याच्या तोंडी आता स्ट्रिंग थिअरीच्या जागी डेटा सायन्सचं नाव होतं. जग आता दहशतवादापेक्षाही कृत्रिम बुद्धिमत्तेला, AIला घाबरून होतं. न्यू यॉर्क टाईम्स ते लोकसत्ता, सगळेच कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल लेख लिहीत होते. अल काईदा आणि लष्कर-ए-तैबा ही नावं मागे पडून गूगल, ट्विटर, स्टारलिंक, इलॉनमस्क अशी नावं पेपरांमध्ये चमकत होती.
आणि तो दिवस उजाडला. चॅट जीपीटी आला. 'माझा होमवर्क करून दे' इथपासून 'ब्राह्मण कवी-नाटककारांची नावं सांग' असे कुठलेही प्रश्न चॅट जीपीटी समर्थपणे हाताळू शकत होता. एवढ्यानं त्यांचं पोट भरलं नाही; तर काही महिन्यांत त्यांनी त्यासाठी आणखी पावरबाज मॉडेलही वापरायला सुरुवात केली.
त्यांचं अल्गोरिदम दमदार होतं; पण त्यांची खरी ताकद होती त्यांनी गोळा केलेल्या डेट्यामध्ये. त्याचा सिद्धांत चुकला होता, हे त्याला गूगलच्या यशामधूनच कळून चुकलं होतं. पण आता मान्य करण्यापलीकडे काही इलाजच नव्हता. डेट्याचा रेटाच असा झंझावात बनून आता जगासमोर आला होता. त्याच्या अज्ञातवासामुळे त्याला जगातल्या मोठमोठ्या, बुद्धिमान शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांशी चर्चा करणं शक्य नव्हतं. त्यानं स्वतःवरच तो अज्ञातवास लादलेला असला तरी आता त्यातून बाहेर येणं अशक्य होतं. त्यानं बनवलेली मॉडेलं, आता सज्ञान मुलांसारखी, त्याच्याशिवाय व्यवस्थित चालत होती. नवीन मॉडेलं जन्माला घालायची तर आता तो म्हातारा झाला होता; हरला होता; मुलाबाळांत असूनही त्याचा एकटेपणा आता त्याला खुपायला लागला.
तरीही त्यानं वर्षभर प्रयत्न केला. चॅट जीपीटी बनवणाऱ्या ओपन एआयमध्ये काही बेबनाव झाला. पण मायक्रोसॉफ्टच्या पैसा, सत्ता, तंत्रज्ञान यांच्या रेट्यापुढे कुणाचंही काही चाललं नाही. ओपन एआयमधला बेबनाव क्षणिक ठरला. सॅम आल्टमन परत सीईओ झाला. हे सगळं तो लक्ष्मणरेषेच्या बाहेरूनच बघत होता.
त्याची त्यानं हाय खाल्ली. त्याची जगण्याची इच्छाच संपली. दाऊद इब्राहिम कासकर अज्ञातवासात असतानाच मेला. त्याचं दफन कोकणात होणार नाही.
(प्रेरणा - Carlos (El Guapo) Goffmán, Fact Checker)
उत्तर सोपे आहे!
नीट वाचा, म्हणजे कळेल.
‘उड जायेगा हंस अकेला’ भविष्यकाळ दर्शविते. हंस अद्याप उडालेला नाहीये; पुढेमागे कधीतरी उडण्याचा त्याचा विचार आहे.
उलटपक्षी, ‘जगदर्शन का मेला’ भूतकाळ दर्शविते. जगदर्शन अगोदरच मरून पडलेला आहे; किंबहुना, आतापावेतो त्याचे भूत झालेले आहे. (म्हणून भूतकाळ.)
(जगदर्शन मरून पडल्याकारणाने, एकट्याने कंटाळल्याकारणाने उडून जाण्याचा हंसाचा विचार चालू आहे.)
मला वाटते तुमच्या प्रश्नाचे उत्तर यात उघड आहे. कालक्रम (मराठीत: क्रोनॉलॉजी) लक्षात घेतली असता, जगदर्शनचा मृत्यू हा हंसाच्या (आगामी) उड्डाणाअगोदर आहे.
हं.
हं. क्रोनोलॉजी बघता, जगदर्शन मेल्याने, तो हंस कंटाळून किंवा एकटेपणामुळे व्याकूळ होऊन उडून जाणार आहे हे बरोबर वाटतं.
पण कुणी कुणाची करमणूक करण्यासाठी किंवा त्यांना आयुष्यात रस वाटावा म्हणून जिवंत राहावं ही अवाजवी अपेक्षा आहे.
साहिर म्हणूनच गेला आहे, "कोई न संग मरे!"
...
मध्यंतरी कुणीतरी फेसबुकवर असा प्रश्न उपस्थित केला होता की कुमार गंधर्वांच्या 'उड जायेगा' मध्ये ते एक प्रश्न विचारतात आणि शेवटपर्यंत उत्तर देत नाहीत. जगदर्शन असं भारदस्त नाव असलेला माणूस का मेला ते शेवटपर्यंत कळत नाही.
कुमार गंधर्वांचे 'उड़ जाएगा' पूर्वी कधी ऐकले नव्हते, म्हणून (कुतूहल म्हणून) आज ऐकून पाहिले. खरे आहे; ती 'जगदर्शन का मेला'वाली ओळ कुमार गंधर्व इतक्या आर्ततेने, कळवळ्याने, अगदी काकुळतीला येऊन (आणि पुन्हापुन्हा!) गातात, की त्यातून, जगदर्शन नावाच्या कोण्या मनुष्याच्या मृत्यूबद्दल त्यांना आत्यंतिक दु:ख झाले असून, शोकविह्वल होत्साते ते त्या मृत्यूच्या कारणाबद्दल आंतरिक उमाळ्याने चौकशी करीत आहेत, असेच ऐकणाऱ्यास अभिप्रेत होऊ शकते.
(आणि, भारदस्त नाव कसले डोंबलाचे? त्या सरदारजी मंडळींत नसतात का नावे, जगविंदर, जगप्रीत, जगमीत, असली? त्यांच्यापैकीच असेल हा कोणी जगदर्शन. जगदर्शन सिंह. (याचे आडनाव आहलूवालिया, पसरिचा, किंवा रणधावा, यांपैकी कोठले तरी असावे काय?) सरदारजी लोकांत हे असले नाव भारदस्त वगैरे नसून, अतिसामान्य वगैरे गणले जात असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही.)
(हं, आता, जगदर्शन सिंह रणधावा नावाच्या कोठल्यातरी रँडम सरदारजीच्या मृत्यूचे कुमार गंधर्वांना इतके दु:ख का व्हावे, हा प्रश्न मात्र विचार करावयास लावणारा आहे. यावरून, राजस्थानातील 'रुदाली' नामक प्रथेचे स्मरण झाल्यावाचून राहवत नाही. तेथे म्हणे माणसाच्या मृत्यूनंतर रडावयास किती मंडळी जमली होती (आणि ती किती मोठ्याने, ऊर बडवून वगैरे रडली), यावरून दिवंगताची प्रतिष्ठा ठरते. आणि म्हणून, प्रसंगी पैसे देऊनसुद्धा पूर्णपणे असंबद्ध, धंदेवाईक मंडळी खास रडण्यासाठी, शोक करण्यासाठी म्हणून आमंत्रित केली जातात. तसाच काही प्रकार या ठिकाणी कार्यरत असावा काय? 'आमच्या जगदर्शनच्या रुदालीस कुमार गंधर्व गायले होते!' हा कोणाच्या लेखी अभिमानबिंदू, गर्वाने फुशारकी मारण्याचा टॉकिंग पॉइंट असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. (किंबहुना, स्वयं दिवंगताने (मृत्युपत्रातून वगैरे) तशी इच्छा व्यक्त केली असण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही.) अखेरीस मनुष्यस्वभाव आहे; चालायचेच.)
त्यापेक्षा या महिन्याचे गीत
त्यापेक्षा या महिन्याचे गीत ऐका.
राम रंगी रंगले मन......
https://youtu.be/bKID432rfcA?si=Ds-XnQZoC6ww9DXp
किंवा दे वा घर चे ज्ञा तर कुणा ला........
https://youtu.be/dYXe7jXu40w?si=zLAMXnpy7BwNwcaE
दावूदबद्लची माहिती वाचली होती
दावूदबद्लची माहिती वाचली होती ती गुन्हेगारी संबंधित होती. डोंगरी ते दुबई हे पुस्तकही वाचलं. पण ते निराशा करणारं होतं. वेळोवेळी पेपरात आलेल्या बातम्यांचे संकलन होतं. लेखकाने घेतलेली दावूदची फोनवरची मुलाखत तर (ही पुस्तकाची जाहिरातबाजी) पूर्ण भंपक वाटली. अज्ञात राहून काम करणारा कोणता आरोपी "तुझा अमुक तमुक घटनेत हात होता का?" या प्रश्नांना 'हो' उत्तर देईल? सध्या "all you wanted to know about dawood..." शोधूनही काही सापडलं नाही.
तर डेटा सायन्स, शोधाचे अल्गोरिदम यामागे दावूद होता याविषयी लेखात वाचून उत्सुकता वाढली.
न्यूयॉर्करमधील लेखाच्या लिंकबद्दल धन्यवाद. तो वाचला. मला या पेप्रातले लेख वाचायला आवडतात. (जुन्या विंडोज मध्ये न्यूयॉर्करचे app होते त्यातून पाच लेख फुकट वाचायला मिळत. (पण... हाय माइक्रोसॉफ्टने मोबाईलमधून २०१७ मध्ये अंग काढून घेतलं आणि फोन अनाथ झाला.तर असो.)
फोटोमध्ये 'त्याच्याच एआइने काढलेलं चित्र ' म्हटलं आहे. तर ते एआइ कोणत्या नावाने प्रसिद्ध होतं?
लिखाण l
लिखाण l
लिहावा शब्द | तासावा शब्द । तोलावा शब्द लिहीण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोराl बेतावेत शब्द शास्त्राधारे ||
लिहावे मोजके | नेमके, खमंग, खमके । ठेवावे भान | देश, काळ, पात्राचे || लिहावे बरे । लिहावे खरे । कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||
कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग । जातपात धर्म | काढूच नये || थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे । मुद्देसुद लिहीणे | हि संवाद कला ||
शब्दांमध्ये झळकावी । ज्ञान, कर्म, भक्ती । स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द || शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल । शब्दांचे हे जंगल | जागृत राहावे ||
जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता | पाणी, वाणी, नाणी | नासू नये ||
संत तुकाराम
…………
...
यावरून, तुकारामाच्या काळात पाईप ओढण्याची पद्धत महाराष्ट्रात रूढ झालेली होती, असा निष्कर्ष काढता यावा काय?
(पोर्तुगीजांमार्फत तंबाखू तर आला होताच; पाईपनेच तेवढे काय घोडे मारले होतेनीत्?)
----------
तसेही, विरामचिन्हे (नि बहुधा शुद्धलेखनसुद्धा; चूभूद्याघ्या.) ही इंग्रजांनी मराठीवर लादलेली ओझी आहेत. अन्यथा, गुराढोरांप्रमाणे (नि गाढवांप्रमाणे१) मोकाट सुटणे हाच मराठी भाषेचा (नि मराठी मनांचा२) मूळ स्थायीभाव आहे. (मूळ प्रतिसादिकेचा तथा तुकारामबुवांचा मुद्दा त्यामुळे खारिज होतो, ही बाब अलाहिदा.)
----------
१ या प्राणिमात्राबद्दल मला प्रचंड आदर आहे.१अ
१अ म्हशीसुद्धा उधळतात. म्हशींबद्दलसुद्धा मला प्रचंड आदर आहे.
२ त्यामुळे, कोणी 'हैक' केल्यावरच मराठी मने आटोक्यात येतात, अन्यथा येत नाहीत२अ; फक्त 'हैक' करणाऱ्याचीच काय ती आवश्यकता असते. ('हैक' करणारे हे काही मराठी गोटांतून एवढे प्रचंड लोकप्रिय का, याचा यातून उलगडा व्हावा काय?)
२अ याला अर्थात अपवाद आहेत. आम्हीसुद्धा स्वत:ला मराठीच म्हणवतो. (आणि, आम्हालासुद्धा मन आहे, असा निदान आमचा तरी दावा आहे.) मात्र, 'हैक' करणाऱ्याला सहसा 'तुझ्या बैलाला घो'२अ१ असे (परिस्थितीप्रमाणे उघड किंवा मनातल्या मनात) म्हणून, आम्ही आमचे तेच चालू ठेवतो. ('हैक' करणारे आम्हाला प्रिय नाहीत, हे ओघानेच आले.) असो.
२अ१ गंमत म्हणजे, या वाक्प्रचाराचा अर्थ आम्हांस आजतागायत समजलेला नाही. चालायचेच.
बहुधा नाही
नक्की नियम सांगता येणार नाही, परंतु (संस्कृतात) ते बहुधा नियमांप्रमाणेच असावे (पक्षी: सुसंस्कृत असावे), असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
(मात्र, 'त्या उद्घाटनाची शिला संस्कृतमध्ये आहेत' हे मराठीच्या नियमांप्रमाणे अमराठी समजावे काय?)
----------
(मुळात त्या शिलेवरचे शब्द संस्कृतात असावेत का/का असावेत, हा वादाचा मुद्दा असू शकतो. मात्र, त्यातील संस्कृत हे (निदान वरकरणी तरी) चुकीचे वाटत नाही.)
अवमान हा हेतू नाही.
ऐसीचे ओबिटसम्राट राजन बापट यांचा अवमान करण्याचा हेतू नाही.