Skip to main content

El Niño

यक्ष विरहार्त झाले
मेघ संपावर गेले
"संप बेमुदत त्यांचा"
El Niño ने म्हटले

"ज्यांचा टँकरचा धंदा
त्यांचे भाग्य उजळले
दुवा देतील ते मला"
El Niño ने म्हटले

पाणी नभीचे आटले
पाणी डोळ्यात दाटले
"पाणी तोंडचे पळेल"
El Niño ने म्हटले

"पावसाळी कवितांचे
बाण तुझ्या भात्यातले
यंदा गंजणार नक्की"
El Niño ने म्हटले

मारवा Tue, 23/06/2026 - 18:48

एरवी च्या अनंत अवकाशीय सुद्धा आवडतात पण मर्त्य विषयाची मजाच न्यारी.

पाडगावकरीय पार्थिवतेचा प्रेमी
ता.क. शेवटची ओळ भारी शशांक प्रतापवर यांचा ताजा मिम म्हणतो सखी, पैंजण, राधा, पाऊस, गुंतणे,हळवे या शब्दांवर बंदी घातली तर 60 टक्के कवी कमी होतील.
बाकी 40 टक्के कुठल्या शब्दांवर बंदी घातल्यास होतील याचा विचार करू लागलो तर
आई, माय, बंधन, सांज, नभ, पायवाट, रेशीमगाठी, हृदय, स्पंदन, उर, चांदणं, कोवळे इत्यादी आठवले याने 4 ते 5 टक्के कवी तरी अपंग होतील पण हे झाले मुख्य प्रवाहातले
क्रांतिकारी कवी मात्र कदाचित या शब्दांना बंदी घातली तर होतील
मुर्दाड, संस्कृती, क्रांती, व्यवस्था, लाथ, दमन,, तुडवणे,पेटवणे,
अजून शोधता येईल एकदा क्रांतिकारी आणि मुख्य प्रवाह वाचावा लागेल
पण अशी डिक्शनरी बनवली आणि खरच बंदी घातली तर मराठीला नवीन काही कवी सापडतील असे वाटते खरे