Skip to main content

तुमच्या विचारजगतातील, भावविश्वातील लक्षणीय व्यक्ती कोण ?

हा धागा तुमच्या विचारांवर विचारपद्धतीवर कोणाचा प्रभाव आहे याबद्दल आहे. यात दोन ढोबळ प्रकार आहेत. पहिला म्हंणजे आप्त / नातेवाईक / स्नेही / मित्र अशी मंडळी. व दुसरा म्हंजे तुम्ही ज्यांना कधी भेटलेला नाही आहात पण त्यांनी लिहिलेले, त्यांच्याबद्दल लिहिलेले, ज्यांची भाषणे ऐकलेली आहेत अशी मंडळी. हा धागा मुख्यत्वे पहिल्या प्रकाराबद्दल आहे. म्हणजे तुमचे आईवडील, काकू/काका, आजी आजोबा, घरी येणारे एखादे नातेवाईक व्/वा कौटुंबिक स्नेही लोक, मित्र अशांबद्दल. आता त्यांचा थेट व पूर्ण प्रभाव असावाच असे नाही. प्रभाव कमी पण लक्षणीय जास्त अशा बाबी सुद्धा लिहा. त्यांनी सांगितलेल्या काही वैचारिक बाबी आवडल्या व तुम्हास विचार करताना उपयोगी, मार्गदर्शक ठरतात त्याबद्दल लिहा. त्यांनी सुचवलेली पण दुर्मिळ पुस्तके तुम्ही कशी मिळवलीत व वाचून काढलीत त्याची कहाणी लिहा. त्यांनी तुम्हास वाचायला किंवा भेट म्हणून दिलेली पुस्तके तुम्हास कशी आवडली, भावली, आवडली नाहीत त्याबद्दल लिहा. त्यांनी एखादे नियतकालिक लावले होते त्याबद्दल लिहा किंवा ते कसे ग्रंथालयात नेमाने जायचे व तिथून कोणती पुस्तके आणायचे त्याबद्दल लिहा. त्यांच्या ग्रंथप्रेमाबद्दल लिहा. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर कोणाचा प्रभाव होता त्याबद्दल लिहा. त्यांची आदरस्थाने, अनादरस्थाने, त्यांना एखाद्या विचारकरण्यायोग्य विषयाबाबत वा व्यक्तीबद्दल पोटतिडीकीने बोलायची सवय असेल त्याबद्दल लिहा. किंवा एखादा विषय ते कटाक्षाने टाळत, किंवा एखाद्या बाबीवर कठोर टीका करत असत - त्याबद्दल लिहा. त्यांच्या एखाद्या लक्षणीय सवयीबद्दल किंवा लकबीबद्दल (की जी तुमच्या विचारांना प्रेरक असेल/नसेल) लिहा. कठोर आशय असलेला मुद्दा हा प्रश्न म्हणून मांडणे किंवा थेट कठोर उत्तर देणे हा देखील एक लकबीचा भाग असू शकतो. त्यांच्या बोलण्यातून - विश्लेषणातून जे समोर येते त्यास निरिक्षणाची जोड देणे किंवा निरिक्षण हे विश्लेषणाशी विसंगत आहे असे काहीसे द्वंद्वात्मक असेल तर ते लिहा. त्यांचे काही बायस असतील तर त्याबद्दल लिहाच पण तुम्ही ते तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत कसे टाळता त्याबद्दल लिहा. त्यांचे विचार व आचार यात तफावत असेल तर ते सुद्धा (तुम्हास योग्य वाटले तर) लिहा. विचार व आचार यात तफावत असणे हे नेहमीच चूक नसते वा नेहमीच बरोबर नसते. तुमच्या संगणकाचा टास्क मॅनेजर असतो तसा तुमच्या मनात एक टास्क मॅनेजर आहे असे समजा. आता त्यात कोणत्या विषयांवर तुम्ही सर्वात जास्त विचार करता व कोणता विषय तुमच्या मनाची सीपीयु सायकल्स जास्त खातो त्याकडे लक्ष द्या. तद्वत ते लोक कोणत्या विषयाबद्दल सर्वात जास्त विचार करायचे, बोलायचे, चर्चा करायचे ते लिहा. अशी एकच एक व्यक्ती असेल असे नाही. तिन चार व्यक्ती असू शकतात. त्याच्याबद्दल सुद्धा अवश्य लिहा. तुम्ही त्यांचे केलेले निरिक्षण किंवा तुम्ही निरिक्षण न करता सुद्धा त्यांच्या लक्षात राहिलेल्या विलक्षण सवयी, लकबी, मान्यता याबद्दल लिहा. तुम्ही, त्या व्यक्ती, व तुमचे त्यांच्याशी असलेले इंटरॅक्शन ह्या तिन्हीबद्दलचा हा धागा आहे.

---

काय् व कसे लिहू नका -

१) एखाद्या विचारवंताबद्दल (ज्याला तुम्ही कधीच भेटलेले नाही आहात किंवा एकदाच भेटलेले आहात) लिहू नका. उदा मी हायेक, फ्रीडमन यांना कधीही भेटलेलो नाही व ते आमच्या पिताश्रींचे मित्र वगैरे नव्हते. त्यामुळे त्यांच्या वैचारिक ग्रेटनेस बद्दल लिहायला हा धागा सुयोग्य नाही.

२) "विचार ? ते काय असते", "आम्ही विचार करण्याच्या भानगडीत पडत नाही", "हे असले विचार व चर्चा करून पोट भरत नसते" - वगैरे सिनिकल काही लिहू नका.

३) ज्या व्यक्तीबद्दल लिहिणार आहात तिचा अवमान होईल असे काही लिहू नका.

४) "ह्या धाग्याचा नेमका उद्देश काय आहे", "हे असे धागे काढून नेमके काय साध्य होते" - असे प्रश्न विचारू नका.

५) हा धागा युक्तीवादप्रधान नाही. त्या विशिष्ठ व्यक्ती, त्यांच्याबद्दलची निरिक्षणे, लक्षणीयता, सवयी, कटाक्ष, प्रेफरन्सेस, छंद, त्यांचा तुमच्यावर असलेला प्रभाव यांबद्दलचा धागा आहे हा.

.
.
.
.

मन Sun, 03/05/2015 - 09:06

१९२० च्या दशकात जन्मलेली माझी आजी.
.
.
https://www.youtube.com/watch?v=0SIOaIbL84E
.
.
हे माझ्या आज्जीचंही हे अत्यंत आवडतं गाणं.
चार पाच वर्षाचा असेन. तिच्या मांडिवर झोपलेला असायचो, तेव्हा ते ऐकायचो.
तिने बहुतेक हा पिच्चर थेट्रात पाहिला होता बाबा पाच सात वर्षाचे असताना.
त्यामुळेच तिला त्या पिच्चरचं जबरदस्त अप्रूप असावं.
(थेट्रात जाउन पिच्चर पाहणं ही क्वचित केली जाणारी गोष्ट असणार.
तो त्यांच्यासाठी एकमेवाद्वितीय अनुभव असल्यानं रसरसून अनुभवला असणार.)
आपल्याला आज एखाद्यानं लॉटरी/स्पर्धेचं बक्षीस म्हणून अंतराळ सफरीस पाठवलं आणि
आपण तितक्या उंचीवरून जी काही पृथ्वी, पृथ्वीबाहेरचं जग उत्सुकतेनं आठवणीत साठवून घेउ;
तसच आज्जीचं पिच्चरबद्दल झालं असावं. ती पिच्चर बद्दल अगदि कौतुकानं बोलत असे.
.
.
.
.
.
तिच्या एकुलत्या एक मुलाचा मी धाकटा मुलगा असल्यानं तिचा माझ्यावर प्रच्चंड जीव होता.
अर्थात ते मला तेव्हा कळत नसे. शेवटी शेवटी मी फार जास्त खोडसाळपणा/टगेगिरी केली;
आपल्याला खूप अक्कल आलेली आहे असं समजून तिच्या आवडीनिवडींची निश्ठूरपणे खिल्ली उडवली.
आज त्याबद्दल आठवलं की अगदि कससच होतं. आपल्याहून साठ सत्तर वर्ष मोठ्या असणार्‍या व्यक्तीचं भावविश्व,श्रद्धा, आवडी
वेगळ्या असणं हे समजायची अक्कलच नव्हती यार मला.
काळाचं चक्र इतकं विचित्र की तिच्या त्यावेळेसच्या खूपशा आवडीनिवडी आज जश्शाला तश्शा माझ्या आहेत.
माझं माझ्या नातवाशी किती पटेल ठाउक नाही; पण माझ्याच पिढीच्या मानानं मला आउटडेटेड असल्यासारख वाटतं.
भाजी भाकरी आवडते. अळूची भाजी आवडते. पिझ्झा बर्गरची विशेष आवड नाही.
त्या-त्या प्रांतातलं स्थानिक जेवण आवडतं. सौथला गेलो तर दिवसेंदिवस रस्सम भात, दहीभात्,बिशिबेळे हाणतो.
उत्तरेत दाल-रोटी.
(अगदि वेळच पडली तर अंडी,मासे, चिकन खाईनही, पण त्याची आवड विशेष अशी नाही.)
अगदिच काहितरी होतो यार मी.
तिला मी जसं असणं आवडलं असतं,पण मी तसा अजिबात होणार नाही; ह्याची ऑल्मोस्ट खात्री होती,
योगायोगानं मी तसाच आहे. आणि हे बघायला ती नाही.
.
.

तिच्या पिढीच्या मानानं ती पुष्कळच पुढारलेली होती.
हिंदी मराठी इंग्लिश चांगल्यापैकी लिहिता वाचता येइ.
संतापली की ती शिव्या फार भन्नाट देइ. अगदि आजचे रस्त्यावरची गुंट-टुकार पोरं द्यायला घाबरतील अशा शिव्या ती सहज देइ.
गंमत म्हणजे असं असूनही तिचा लोकसंग्रह जबरदस्त होता. तिच्या शिव्या,बोलणी लोकं ऐकूनही घेत. तिला घरी 'काकी' म्हणत.
'काकी उगीच कुणाल काही बोलत नैत. काकी मदतीला येतातही वेळेकाळेला'असं सगळीच नातेवाईक वगैरे मंडळी म्हणत.
ती कट्टर कानडी वैष्णव. जातीभेद मानत असे.
पण त्याच वेळी तिच्यात जबरदस्त आस्था,काळजीही होती समस्त मानवप्राण्याबद्दल.
सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी' वाचल्यावर त्यांनी त्यांच्या आईचे जे किस्से सांगितलेत, ते मला माझ्याच आज्जीचे कॉपी केलेत असं आधी वाटलं.
मी मुसलमान, ख्रिश्चन पोरगी आणली असती; तर ती 'आपल्या'तली नाही; म्हणून आजीनं आधी नाक मुरडलं असतं.
चार खणखणीत शिव्या घातल्या असत्या. कदाचित हातातल्या छडीनं फटकेही दिले असते; पण ते सगळं फक्त मलाच. सुनेला नाही.
सुनेचं 'लक्ष्मी आली बाई घरात' म्हणत जबरदस्त कोडकौतुक केलं असतं; ह्याची खात्री आहे. उलट इतर कुणी मधे पडलं असतं लग्नात खोडा घालायला;
तर सर्वात ज्येष्ठ आणि तापट-अधिकारी व्यक्ती म्हणून तिनं इतरांना गप्प बसवलं असतं.ह्याचीही खात्री आहे.
दिलेला शब्द कसा पाळावा, दुसर्‍याचा आदर कसा राखावा, हे ती जाणून होती. वागायला तापट पण नेक.
.
.
आजीची पत्रिका आठवते अंधुकशी. सिंह लग्न, सिंह रास.
आजोबाही सेम. शिवाय त्यांचा तर पत्रिकेतला अजून रवि कडक होता एकदम.
ह्या दोन तापट/रागीट/तत्वनिष्ठ/फटकळ लोकांचं एकमेकांशी मात्र इतकं कसं जमतं ह्याचं लोकांना भलतच आश्चर्य वाटे.
मजबूत,दणकट,जाडजूड बांधा.
"आजी-आजोबा नातवंडाचे नेहमीच लाड करतात " ह्या समजाला एक मोठ्ठं च्यालेंज म्हंजे आमची आजी.
ती चिडली की छडीनं मारत असे. म्हणजे नातवंडांना मारत असेच;
पण रविवार आहे, सुटी आहे; म्हणून वडील जरा सुस्तावलेले असत, ते कधीकधी रविवार सकाळी लोळत पडत उशीरापर्यंत .
ते उठले नाहित, तर ही कडकलक्ष्मी म्हातारी हातात छडी किम्वा लाटणं घेउन बाबांवर चालून जाइ.
ती येते आहे; असं कळताच बाबा ताडकन् उठून कामाला लागत.
आम्हा पोरांना मज्जा वाटे बापाला असं आजीसमोर बिचकलेलं पाहताना.
तिचं सोवळं ओवळं जरा जास्तच होतं.(पण ते तिच्या पिढीतल्या बहुतेक सगळ्याच बायकांचं असणार.)
पण त्याकारणानं घरात जबरदस्त स्वच्छता मेंटेन होइ.
इतर घरात मुलं शुभं करोति म्हणत.
ती आम्हाला शुभं करोति म्हणून झाल्यावर दिडकी, निमकी,पावकी असे पाढे म्हणवून घेत असे.
( दोन ते तीस चे जसे पाढे अस्तात, तसेच पाढे सव्वा,दीड, अडीच ह्या संख्याचेही असतात;
कॅल्युलेटरचा वापर सर्रास नसतानाच्या काळात हिशेब करताना बर्रेच कामाला येतात म्हणून वापरत.)
त्यानंतर फरवरदिन्,ओर्दिवेस, खोरदाद ,तीर ,मोरदाद अशी लांबलचक यादी आम्ही म्हणत असू.
ते पर्शियन महिने होते. मग लगोलग चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ...ह्या मराठी महिन्यांची उजळणी.
मग वसंत्,ग्रीष्म , वर्षा वगैरे भारतीय ऋतुंची जी यादी आहे, त्याची उजळणी.
मग लगोलग महत्वाचे सणवार एका लयीत म्हणत असू.
हे सगळं ताला सुरात म्हणायला मज्जा वाटे.
ती यादी मोठी गमतीशीर होती सणवारांची.
प्रतिपदा ते पौर्णीमा/अमावस्या असे पंधरा दिवस असतात पंधरवड्यात.
त्यातल्या प्रत्येक दिवसाबद्दल एक खास सण भारतीय्/हिंदू संस्कृतीत आहे.
ती तो पाठ करुन घेइ. उदा :-
(
प्रतिपदा --बलिप्रतिपदा
द्वितीया - यमद्वितीया
तृतीया -अक्षय तृतीया
चतुर्थी गणेश चतुर्थी
पंचमी -- नाग पंचमी
ष्ष्ठा -चंपा शश्थी
सप्तमी -- रथ सप्तमी
अष्टमी जन्माश्टमी
नवमी -- रामनवमी
दशमी -- विजयादशमी
एकादशी -- आषाढी कार्तिकी एकादशी
द्वादशी -- विसरलो
त्रयोदशी धन त्रयोदशी
चतुर्दशी -- अनंत चतुर्दशी
पौर्णिमा --कोजागिरी व त्रिपुरारी पौर्णीमा
अमावस्या --लक्ष्मीपूजनाची अमावस्या
.
.
मी शाळेत जायला लागल्यावर बाय डिफॉल्ट हे सगळं सगळ्यांना येतच असं समजत असे,
त्यामुळे जरासा घोळही होइ.
मी काय बोलतो आहे, त्याचे रेफरन्सेस कुणाला लागत नसत.
सवयीनं लोकांना ते लागू लागले.
चार ठिकाणी कौतुकही झालं.
.
.
तिच्यात शारिरीक ताकद प्रच्चंड होती. सत्तरीत पोचल्यावरही ही बाई आरामात सगळं घरदार सांभाळी तिची सून --म्हणजे माझी आई गावाला वगैरे गेल्यावर.
.
.
माझी आजी म्हणजे साक्षात स्त्री जन्म घेतलेले समर्थ रामदास. राजवाड्यांनुसार 'टाळकुटे नसलेले, संसारवादी एकमेव संत'
.
.
पण हे असं खणखणीत व्यक्तिमत्व देव-धर्माच्या बाबतीतच एकदम भोळसट कसं बनतं हे मला तेव्हाही कळत नसे;
आजही धड उमजलं नाही.
घरी कुणीही पीरफकीर किंवा भगव्या कफनीतले लोक आले की ह्या एरव्ही बेधडक,कर्तबगार्,स्वतःचच म्हण्णं चालवणार्‍या बाईंचा सेवाभाव जागृत होइ.
च्यायला, विशी-पंचविशीतले पोरं--नुकतच मिसरुड फुटू लागलेले...
ते असलं कायतरी देवा धर्माचं नाव घेउन भिक्षा वगैरे आरामात उकळत.(प्रामुख्याने धान्य वगैरे घेउन जात पेलाभर वगैरे)
ही बारकी पोरं ह्या बाईला 'ब्येटी तुम चिंता मत करना. सब भला होगा.तुम भगवानकी लाडली ब्येटी है' वगैरे डोस पाजीत.
आशीर्वाद देत. ही बसल्या जागेवरूनच त्यांना नमस्कार करी. ते दारातून हात उंचावून आशीर्वाद देत.
नंतर नंतर ह्या प्रकारावरुन मी तिची चेष्टा सुरु केली.
त्यातून साध्य काहीही झालं नाही. घरात किरकिरी झाल्या.
घरात सगळ्यांचा मनस्ताप वाढला.
असो.

शुचि. Mon, 04/05/2015 - 19:42

In reply to by प्रकाश घाटपांडे

सुरेख भावचित्र उभं केलस मनोबा.
____

माझं माझ्या नातवाशी किती पटेल ठाउक नाही; पण माझ्याच पिढीच्या मानानं मला आउटडेटेड असल्यासारख वाटतं.

हाहाहा. तुझा नातू , तुझ्याइतके प्रश्न विचारणारा निघाला तर तुझी खैर नाही :)

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 21:43

In reply to by मन

खूप सुंदर प्रतिसाद.
=================================

नंतर नंतर ह्या प्रकारावरुन मी तिची चेष्टा सुरु केली.
त्यातून साध्य काहीही झालं नाही. घरात किरकिरी झाल्या.
घरात सगळ्यांचा मनस्ताप वाढला.

जगाला पुरोगामी बनवायची पद्धती व गती यांत सुधारणा आवश्यक आहेत.

पिवळा डांबिस Sun, 03/05/2015 - 09:40

पहिला म्हंणजे आप्त / नातेवाईक / स्नेही / मित्र अशी मंडळी.

कळवण्यास खेद होतो की आमच्या विचारप्रणालीवर ह्या पहिल्या पर्यायातल्या कोणाचाही प्रभाव नाही.
असला असता तर कळवण्यास अभिमान निश्चित वाटला असता, पण ते होणे नाही...
आमच्या विचारप्रणालीवर सर्वाधिक प्रभाव आमच्याच विचारांचा..
जे आमच्या गुरूंकडून आमच्याकडे आले. जे आमच्या वाचनातून आमच्याकडे आले.
आणि विशेषकरून जे आमच्या चिंतनातून जन्मास आले!!!!

ॲमी Sun, 03/05/2015 - 11:22

In reply to by पिवळा डांबिस

कळवण्यास खेद होतो की आमच्या विचारप्रणालीवर ह्या पहिल्या पर्यायातल्या कोणाचाही प्रभाव नाही. >> असेच म्हंते.
किंवा खरंतर "थँक गॉड माझ्या विचारप्रणालीवर त्यापैकी कोणाचाही प्रभाव नाही" असे म्हंते ;-)

--------

दुसरा म्हंजे तुम्ही ज्यांना कधी भेटलेला नाही आहात पण त्यांनी लिहिलेले, त्यांच्याबद्दल लिहिलेले, ज्यांची भाषणे ऐकलेली आहेत अशी मंडळी. >> मला या पर्यायाबद्दल वाचायला जास्त आवडेल.

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 21:59

In reply to by ॲमी

नवा जमाना तुमच्या जन्मापासून चालू झाला आहे काय? म्हणजे जे परिवर्तन गेली २००-३०० वर्षे चालू आहे ते अगदी एक पिढी वर पर्यंत निकामी ठरले आहे म्हणजे काय?
(नक्की काय म्हणत आहे हे कळलं नसेल तर ---- वरच्या पिढीत काहीतरी चांगलं दिसलं असेल. काहीतरी प्रभाव पाडून घेण्यासारखं असेल. )

आणि याच हिशेबाने, लोक लहानपणी पालक वा प्रपालक मेलेले असले तर आनंद मानू लागतील. सुदैवाने वाचलो/वाचले त्यांच्या प्रभावाच्या तडाख्यातून.

आणि ज्या शिक्षकांचा व लेखकांचा प्रभाव तुमच्यावर पडला आहे तेही कोणाचे ना कोणाचे पालक आणि प्रपालक असतीलच.
======================================================================================================
शिक्षक, लेखक इ इ च्या जीवनाचे आपल्यासमोर जे एक्स्पोजर असते ते क्षणिक आणि फॉर्मल असते. पालकांचा रियालिटी सो चालू असतो. वन शुड नॉट बी रूथलेस इन दिअर असेसमेंट.

मन Sun, 03/05/2015 - 12:24

In reply to by पिवळा डांबिस

विचारांवर फार प्रभाव वगैरे नेमका कुणाचा आहे हे नेमकं मला सांगता यायचं नाही.
पण तपशीलात धागाकर्त्यानं 'प्रभाव असणे' ह्याचा उल्लेख केलाय.
माझं तिकडं लक्ष नव्हतं.
मी थेट शीर्षकवाचून लिहीत सुटलो .
"तुमच्या विचारजगतातील, भावविश्वातील लक्षणीय व्यक्ती कोण ?"
.
.
लक्षणीय म्हणजे... ठळक अशी लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा.
तुमचे मिपावरचे 'खानसाहेब' असेच लक्षणीय वाटले होते.
(पण तुम्ही लिहिण्याचा आळस करता आणि पुरेसं लिहीत नाही अजून.)

पिवळा डांबिस Mon, 04/05/2015 - 00:58

In reply to by मन

(पण तुम्ही लिहिण्याचा आळस करता आणि पुरेसं लिहीत नाही अजून.)

गुस्ताखी मुआफ हो हुजुर!
ये हमारा सर रख्खा आपकी तलवारपर, चाहो तो बेशक काट डालो!!!!
मगर ऐसे नाराज ना होना...
:)

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 12:29

विचारांवर प्रभाव टाकणारे कुटुंबीय, मित्र आणि गुरुजन आपल्याकडे ढिगाने मिळतात. अनेकांकडे बघून कसं वागायचं नाही ते मी शिकलो किंवा मानवी स्वभावाची चांगलीच कल्पना आली (स्वभावात अत्यंत कडवटपणा आलेला असला तरी) याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कोण्या एकाचे नाव घेतले तर इतरांवर अन्याय केल्यासारखे होईल.
दुर्मिळ पुस्तके वगैरे सुचवण्याचा भंपकपणा करणारे सुदैवाने कोणीही नव्हते. शाळेची मोठी लायब्ररी होती अनेक लोखंडी कपाटे पुस्तकांनी भरुन रांगेत ठेवलेली असायची. त्या कपाटांची कुलुपे कधी निघालेली पाहिली नाहीत, त्यामुळे सगळीच पुस्तके दुर्मिळ होती. असो.

बॅटमॅन Sun, 03/05/2015 - 12:29

माझ्यासाठी माझे आजोबा. वृत्तबद्ध काव्ये, संस्कृत साहित्य, इ. अनेक गोष्टींची दीक्षा त्यांच्याकडून मिळाली. ग्रंथवेड काय असते ते स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले.

बॅटमॅन Mon, 04/05/2015 - 15:31

In reply to by बॅटमॅन

एक वाचक म्हणून माझी जडणघडण करण्याचे ऑलमोस्ट पूर्ण श्रेय आजोबा व त्यांच्याबरोबरच्या अनेकविध चर्चांना जाते. कुठल्याही विषयचर्चेत कुठल्याही शब्दाबद्दल किंवा मजकुराबद्दल जरा शंका आली की लगेच ग्रंथांचा आधार घेणे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून शिकवले. त्यांना नेपोलियनबद्दल वाचायची आवड होती, त्यामुळे त्यासंबंधी वीसेक पुस्तके खरेदी केली. शिवाय खास वॉटर्लूच्या लढाईवरची दोन पुस्तके इंग्लंडहून मागवलेली. त्याच्याशी संबंधित पुस्तकांत फ्रेंच शब्द येतात ते कळावेत म्हणून फ्रेंच डिक्शनरी घेतलेली. त्याच्या lavallatte नामक एका अधिकार्‍याची स्टोरी त्यांना फार प्रिय होती, तो कुठून कुठे पळाला हे दाखवणारा मार्ग त्यांनी अ‍ॅटलासमध्ये ट्रेस केला होता. संस्कृतची आपटे डिक्शनरी (दोन खंडी) घरी अगोदरपासूनच होती. मोतीलाल बनारसीदास नामक इंडॉलॉजिकल पब्लिशरकडून कुमारसंभवादि काव्ये ते मागवत असत. पुण्याला कोणी जाणार असले की मोतीलाल बनारसीदासचा अपडेटेड क्याटलॉग मागवत आणि ललित मासिकातल्या पुस्तकांपैकी काही घेऊन यावयास सांगत.

आत्मचरित्र हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय होता. घरी त्यामुळे पन्नासेक तरी आत्मचरित्रे आर्रामात असावीत. पुस्तकांना कसे जपावे, प्रत्येक पुस्तकावर तारीख, नाव कसे लिहावे हेही त्यांच्याकडूनच शिकलो. पण एकूणच त्यांना कुठल्याच विषयाचे विशेष वावडे नव्हते- नॉटविथस्टँडिंग हिज़ बायसेस. आवड असेल तर ते बाय डिफॉल्ट सवड काढतच.

एकदा मुक्तछंदात पाडलेल्या काही कविता दाखवल्या तर "कविता वृत्तबद्धच असल्या पाहिजेत" असे म्हणाले, मग वृत्तबद्ध काव्य पाडणे तेव्हापासून सुरू झाले. अनेक संस्कृत सुभाषिते आणि इतर श्लोकही त्यांनीच प्रथम सांगितले. गीतगोविंदापासून पातंजल योगसूत्रापर्यंत सर्वच विषयांत सारखाच रस होता. कामशास्त्रविषयक उल्लेख असलेले नासदीयसूक्तभाष्यही त्यांनीच प्रथम वाचायला दिले.

शुचि. Mon, 04/05/2015 - 15:51

In reply to by बॅटमॅन

छान वाटलं वाचून. त्यांचे तुमच्या हृदयातील (मनातील) स्थान कळते विशेषतः तुमच्या आवडेनिवडी, कल इथे आम्हाला माहीत असल्याने ..
.
बॅटमॅन मला सांगाल का की आत्मचरीत्रात त्यांना काय आवडत असे ते? मला आत्मचरीत्र हा प्रकार खूप आवडेल अशी वारंवार शंका येते अन तरीही, ती किती सचोटीने, प्रांजळपणे लिहीली असतील असा संशय येऊन कधीच वाचलेली नाहीत. आपल्याकडे जर काही सकारात्मक मुद्दे असतील तर सांगावे, मला ऐकायला आवडतील.

बॅटमॅन Mon, 04/05/2015 - 15:53

In reply to by शुचि.

धन्यवाद! :)

आत्मचरित्रांबद्दलची तुम्ही व्यक्त केलेली शंका सुयोग्यच आहे. त्यांना आवडणारा प्रकार म्हणजे वेगवेगळे दृष्टिकोन माहिती होतात, त्या त्या लेखकाच्या प्रभावक्षेत्राप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती होते. नवनवीन गोष्टी कळतात. इ.इ.

अंतराआनंद Sun, 03/05/2015 - 16:29

पहिली आणि कदाचित एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आजी. विचार माहित नाही पण तर साधं रहाणं आणि साधं खाणं ह्या तिने लावलेल्या सवयी आहेत अजुनही.

अनुप ढेरे Sun, 03/05/2015 - 16:30

प्रभाव पडलेल्या व्यक्तिंमध्ये माझ्या पहिल्या नोकरीतला पहिला बॉस/टीम लीडर नक्कीच येइल. जनरल विचार कसा करायचा, एक मोठा प्रॉब्लेम अनेक छोट्या प्रॉब्लेम्समध्ये कसा तोडायचा, कामातला सुटसुटीतपणा वगैरे अनेक गोष्टी शिकता आल्या त्याच्याकडनं. या गोष्टी फार सीम्पल आहेत असं वाटेल पण मला हे सगळ आधी 'कळतं पण वळत नाही' या क्याटेगरीत यायचं. त्याच्याहाताखाली काम केल्यावर हे जमायला लागलं.

शुचि. Mon, 04/05/2015 - 14:52

बाबा-बाबा-बाबा.
.
अर्थात माझे वडील. he is/was a sort of not laid-back but a contented soul. कधीही चिरचिर नाही, त्रागा नाही. लहान लहान गोष्टीत आनन्द शोधण्याची वृत्ती.अनेक छन्द होते त्याना.बागकाम्,वाइन मेकींग्,नाटके लिहीणे.
लहानपणी बाबा दाढी करत असताना मी लोळत टक लावून पहायचे. मग शेवटी थोडा फेस माझ्या गालाला लावाला जायचा.
मी पहीला शब्द वाचला तेव्हा बाबा पेपर वाचत होते अन मी शेजारी लोळत पडले होते.मी वाचल- ज-न-ता..... केवढ अप्रूप वाटल त्यांना. किती कौतुक केलं.
.
.
He always understood when I was not well & everything about my girlhood.नवरा जहाजावर असताना, बाबा माझ्याकडे कंपनी द्यायला ३ वर्षं राहीले. His presence was so unobtrusive & peaceful. ते मला "वीमेन्स डे" ला नेहमी बाहेर जेवायला घेऊन जायचे. ओह माय गॉड!!! इट डिड फील स्पेशल. अन हे काहींना कळूही शकणार नाही. पण he was the first man who treated me like a lady.. हे वाक्य विचित्र वाटत असेल तर सॉरी. But this is a highlight of my feelings for him.
.
त्यांना उर्दू शेरोशायरीची अतिशय आवड होती, संगीत आवडे. ऑफीसमध्ये बाबा किती फॉर्मल अन टापटीप जात. घरात किती नीटनेटके असत. आईला किती किती मदत करत - अगदी धुणे-भांडी-केर सगळ्यात. अन मला त्याचा अभिमान आहे.
.
बाबांच्या डोळ्यात मी एकदाच पाणी पा।ईलं अन खरच हृदयात तुटलं, आतडं पिळवटल्यासारखं झालं.
.
आईबाबांनी अमाप पुस्तके वाचावयास दिली पैकी बाबांनी "जाईची नवलकहाणी" हे अतोनात गोड पुस्तक दिले, "चिट्टी चिट्टी बँग बँग" ही खूप आवडलेले पुस्तक होते. आई खूप कामात असायची, ती फार मिळाली नाही, निदान हवी तितकी तर नाहीच.
.
एकदा पावसाळ्यात खूप पाऊस पडत होता, अन आमच्या गॅलरीत एक नीळे ठीपके असलेले काळे फुलपाखरु येऊन शांत बसले होते. ते बाबांनी दाखविले. गुलमोहराच्या झाडाला आलेली पहीली कळी त्यांनी दाखवली.
.
वैचारीक बोलायचं झालं तर - उर्दू शेरोशायरीची अतोनात आवड लावली. आमच्याकडे उर्दू डिक्शनरी होती. मुलगा-मुलगी हा भेदभाव आमच्या घरात का-डी-चा-ही नव्हता. कळलं नाही तर विचारायचं ही शिकवण होती. आई-बाबा इतके चांगले मित्र होते एकमेकांचे की वैवाहीक नाते मैत्रीपलीकडे किंबहुना मैत्रीशिवायचे असू शकते हेच कधी माझ्या डोक्यात आले नाही. आई-बाबा दोघांचे लग्न = धनु अन माझं मिथुन त्यामुळे घरात गप्पांना , बडबडीला कमीच नव्हती. आता पुरे झोपू यात, म्हणायची वेळ येई. विषय भरभरुन सुचत.
___________
मला माहीत आहे या माझ्या निबंधात ना भव्य-दिव्यत्वाची झाक आहे ना काही मोठे मोठे विचार ऐकायला मिळालेत पण तीच गोम आहे. लहान लहान सुखांना पारखे न होता उलट त्यात गोडी घेण्याची कला बाबांकडून मी शिकले. अजुनही नवरा अन मी उन्हाळ्यात फिरुन येतो (२-३ मैल) रपेट मारुन येतो तेव्हा तो गाणी कानाला लावून असतो तर मी पक्ष्यांची गाणी ऐकत अन झाडांचे आकार , नक्षी पहात फिरत असतो. निसर्गसौंदर्य, उर्दू शेरोशायरीची आवड या बाबांनी दिलेल्या देणग्या आहेत.
___________
अन परत विचार करता हे जाणवलं की आईने वैचारीक प्रभाव खूप टाकला आहे. जरी ती हवी तितकी मिळाली नाही तरी, अन हवी तितकी न मिळण्याचे एक कारण माझी तिच्या सहवासाकरता असलेली - insatiable appetite हे देखील आहे. आईने खरं तर कवितेच्या गोडीचा वारसा दिला, जगातले धोके समजावले. नवश्रीमंतांचे चोचले अन उधळपट्टी यांचे वर टीका केली, सचोटीने , आपण कष्टाने मिळवलेल्या पैशाच्या बचतीचे महत्त्व बिंबवले. हेच सांगीतले की पैशाची गरज पडली तर कोणीही पुढे येऊन पैसे देत नाही. तिने, श्रीराम-हनुमानाच्या चरणी मन लावण्यास शिकवले अर्थात ती संध्याकाळी चपात्या करताना रामरक्षा म्हणत असे. जरी आई-बाबा दोघेही नास्तिक होते तरीही, आई आजोबांमुळे रामरक्षा शिकली होती.
चोरी करु नये (अस्तेय), खोटे बोलू नये हे संस्कार तर दिलेच पण कुटुंबाच्या करता असलेला आदर, सन्मान तिने वागणुकीतून दाखवून दिला.

गब्बर सिंग Mon, 04/05/2015 - 02:55

शुचि मॅडम, मला स्वतःला च आवडलेल्या विषयावर धागा काढून माझं स्वतःचंच तुणतुणं वाजवायचं नव्हतं. इतरत्र अनेकदा माझ्याकडून हे असे होते तेव्हा या धाग्यावर तरी नको म्हणून लिहिलं नाही. धाग्याची प्रेरणा मनोबा व ब्याट्यानेच दिली. या दोघांनी व्यनि मधे अनुक्रमे आजी व आजोबांचे तपशीलवार वर्णन केले. मनोबाने लिहिलेलं तुम्ही वाचलं आहेच. ब्याट्याने तर त्याच्या आजोबांना कशी इतिहासाची आवड होती, आजोबांचे पुस्तकप्रेम वगैरे एखाद्या धबधब्यासारखे लिहिले. व त्यातून मला असं वाटलं की असा धागा काढल्यास इतरेजनांना आपल्या मनातल्या लक्षणीय व्यक्तीबद्दल बोलता येईल. व या विषयाच्या मुळाशी जबाबदारीची जाणीव कमी व "त्या" व्यक्तीत्वाची लक्षणीयता आणि प्रभावाची जाणीव जास्त हे दोन अपेक्षित असल्याने त्यातून सहजपणे जे लिहिले जाईल त्यातून सगळ्यांनाच मस्त किस्से, व्यक्तिचित्रण वाचायला मिळेल अशी हावरट आशा पण होती/आहे.

माझ्या दृष्टीने लक्षणीय दोन तिन जण आहेत. सर्वात लक्षणीय म्हंजे आमचे धाकटे मामाश्री. वकील आहेत, एमेसीबीतून निवृत्त झालेत आता. तळकोकणात राहतात. त्यांचा प्रभाव नाही माझ्यावर पण ते लक्षणीय आहेत. ग्रंथप्रेम, विचार व चर्चा करणे (तावातावाने), कला शाखेचे व वकीलीचे शिक्षण घेतलेले असूनही विद्युत अभियांत्रिकी चे सखोल ज्ञान, अभ्यास करण्याची वृत्ती व क्षमता, अनेक उत्तम उत्तम पुस्तके संग्रही ठेवणारे, अनेक पुस्तकांबद्दल भरभरून बोलणारे, अनेक उत्तमोत्तम लेख एकत्र करून त्यांचे बाईंडिंग करून संग्रह करणारे अशा अनेक लक्षणीय बाबी. राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा करण्यास नेहमीच उत्सुक. त्यांना स्वतःची अशी प्रखर मतं आहेत, ती मतं ते मांडतात सुद्धा, तावातावाने चर्चा करतात तेव्हा मजा येते. सहृदय आहेत, माझ्यासारखे क्रूर नाहीयेत. त्यांच्याकडे असलेली पुस्तके सुमारे दोनशे ते अडीचशे असतील. जोडीला मराठीतले अनेक लेख कात्रणे काढून त्यांचे बाईंडिंग करून आणून ठेवलेले आहेत. मराठीतल्या सुमन कल्याणपूर, लता, आशा या तिघींच्या भावगीतांची lyrics असलेले एक असेच "संकलित व बाईंडिंग" केलेले पुस्तक मी १९९१ मधे त्यांच्याकडून मागून आणले ते आजतागायत त्यांना वापस केलेले नैय्ये.

महाराष्ट्रात लोड शेडिंग जोरात चालू होते (१९९० च्या दशकातली गोष्ट आहे). त्यादरम्यान एक पत्रकार (रिपोर्टर) त्यांना विचारता झाला की तुम्ही एवढी वीज असून सुद्धा ती आम्हाला देत का नाही ? त्याच्याशी तिथे विवाद करून त्यास निरुत्तर करून घरी पाठवून दिले होते. वकीलीचे ट्रेनिंग इथे उपयोगी पडले असावे. जोडीला त्याला - electrical energy transmission and distribution by uppal ह्या पुस्तकाबद्दल सांगून - वाचून एका महिन्यात परत करणार असशील तर देतो - अशी एक सणसणीत शाब्दिक ठेऊन दिली होती. आता उप्पल यांचे हे पुस्तक Electrical Engg मधल्या Generation, Transmission and Distribution विषयातले बायबल मानले जायचे. थेरजा सारखे. मी Electrical Engg मधे डिप्लोमा असूनही मी ते कधी वाचलेले नव्हते पण ह्यांनी ते वाचलेले व त्यातून बोध घेतलेला. AC electricity स्टोअर करून ठेवता येत नाही - हे त्या रिपोर्टरला मामाश्रींनी तिथेच सुनावले होते.

तसं बघितलं तर अनेक विषयांवर माझे त्यांच्याशी पटणे कठिण आहे. मी त्यांच्याशी हिंदुत्ववाद या एका विषयावर कधीही बोलत नाही. यावर त्यांची मते प्रखर आहेत. ते सावरकरभक्त असल्याने अधिकच धारदार बोलतात. ते कामगार चळवळीचे पाईक व मी कामगार चळवळ ही, अ‍ॅज इट एक्झिस्ट्स टुडे, फिजिकली चिरडून मारली पाहिजे असे मानणारा मी - त्यामुळे हा विषयही वर्ज्य. ते मान्य करणार नाहीत पण ते चांगलेच समाजवादी आहेत. त्यांना हे माहीती आहे की भांडवलवादी किंवा तत्सम काहीतरी आहे पण माझ्या भांडवलत्वाचे मी त्यांना विश्वरूपदर्शन दिलेले नाहीये आजपर्यंत. अनेक विषय असे आहेत की ज्यांवर माझ्या व त्यांच्यात होणार्‍या चर्चेचा परिणाम काहीच निघू शकत नाही. त्यातले हे काही विषय. नरहर कुरुंदकर व सावरकर ही त्यांची श्रद्धास्थाने. कुरुंदकरांचे काही साहित्य (उदा. जागर) मी वाचलेले आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही बोलायचो पण फार नाही. शुमॅकर च्या "स्मॉल इज ब्युटिफुल" ह्या पुस्तकाचा सुद्धा ते मोठ्या प्रेमाने जिक्र करतात. शुमॅकर च्या इन्फेक्शन चा परिणाम म्हणा हवंतर पण हे आमचे मामाश्री ग्रामीणत्वाचे चाहते आहेत. शहरांबद्दल फारसे प्रेम नसलेले किंवा एक अढी असलेले म्हणायला हरकत नाही. काही काल ते ग्रामायन चे कार्यकर्ते सुद्धा होते. गं बा सरदार व पु ग सहस्त्रबुद्धे ही दोन नावे त्यांच्याकडूनच ऐकलेली आठवतायत.

आम्ही दोघेही संगीत या विषयावर मात्र एकदम भरभरून, उत्कट, बोलतो. ते स्वतः शास्त्रोक्त चे काही फार भक्त नाहीत परंतु चित्रपट संगीत व भावगीत हे दोन आवडीचे कॉमन विषय. ते मुकेशभक्त आम्ही रफी भक्त. ते दिलीपकुमार भक्त आम्ही देवआनंद व अमिताभ भक्त. त्यामुळे गाणी या विषयावर आमची मस्त चर्चा व मुख्यत्वे एकत्र बसून गाणी ऐकणे हे होते व त्यावेळी मी हवेत तरंगत असतो. त्यांच्या तोंडून - "तलत व सुमन कल्याणपूर ह्यांना न्याय मिळाला नाही" - हे वाक्य ऐकले की "दिल को कितना खूबसूरत गम दिया" असे वाटते. त्यांना मी कधी मेहदी हसन ऐकवलेला नैय्ये. त्यांना आवडेल असे वाटते. काही वर्षांपूर्वी युट्यूब वरून डाऊनलोड करून सुमारे ९०० गाण्यांच्या व्हिडिओ सीडी त्यांना दिल्या होत्या. गाण्यांची लिस्ट त्यांनीच बनवलेली होती ... मी फक्त डाऊनलोड करून सीडी मधे कॉपी करून दिल्या होत्या.

शुचि. Mon, 04/05/2015 - 06:24

In reply to by गब्बर सिंग

प्रतिसाद आवडला. तुमच्याकरता तुमचं ते तुणतुणं असेल पण आमच्याकरता ती उत्सुकता असते. मेकिंग ऑफ गब्बर चे घटक जाणून घायची ;)

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 22:31

In reply to by गब्बर सिंग

आवडले मामाश्री.
-------------------------------------

अनेक विषय असे आहेत की ज्यांवर माझ्या व त्यांच्यात होणार्‍या चर्चेचा परिणाम काहीच निघू शकत नाही.

कल्डीसॅक

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 08:50

माझ्या जवळपासच्या प्रत्येक व्यक्तीने काही ना काही प्रकारचा प्रभाव टाकला आहे. भला-बुरा सर्व प्रकारचा. काहींनी काही नव दिलं तर काहिंनी कसं असु नये - किंबहुना आपल्याला स्वत: कसं असलेलं आवडणार नाही - ते शिकवलं. माझ्यावर अशा अनेकांचा प्रभाव आहे.

तरीही अशी एक/एखाद-दोन व्यक्ती सांगा ज्यांचा सर्वाधिक प्रभाव माझ्यावर पडला असे विचारले तर असे नाव वेचून देता येणार नाही. (या धाग्याच्या निमित्ताने पुन्हा विचार केले पण कोणतेही एक/दोन अशी नावे डोळ्यासमोर येत नाही. मोठ्ठी यादीच येते) फार तर २०-३० नावांची एक यादी द्यावी लागेल पण तो या धाग्याचा उद्देश नाही. तेव्हा क्षमस्व!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 05/05/2015 - 02:31

In reply to by ऋषिकेश

बऱ्याच लोकांकडे घेण्यासारखे काही ना काही गुण असतात. आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे आणि यापुढेही असे लोक भेटत राहतीलच.

अलिकडेच प्रत्यक्षात भेटलेल्या दोन लोकांबद्दल मुद्दाम नोंद करावीशी वाटते. एक फेसबुकामुळे भेटलेली पत्रकार, संपादिका मृण्मयी रानडे. माझ्या एका नातेवाईक बाईंना ती ओळखते. या बाईंबद्दल बहुतेकशा नातेवाईकांचं प्रतिकूल मत आहे, माझंही होतं. गेल्या काही वर्षांमध्ये, त्या बाईंकडे निदान दुर्लक्ष करावं आणि आपला वेळ रागराग करण्यात फुकट घालवू नये इथपर्यंत माझी प्रगती झालेली होती. पण मृण्मयीने वेगळाच विचार दिला. "त्यांच्याकडे नेतृत्त्वगुण आहेत. त्यांना त्यांच्या वयात कधीही, कुठेही त्याचा उपयोग करता आला नाही. बुद्धी कुजून गेली आणि मग नको तिथे, नको तशी वापरली गेली," असं ती म्हणाली. स्त्रीवादाबद्दल पुस्तकं वाचून जे मला समजून घेता येत नव्हतं ती शिकवणी तिने चार वाक्यांत घेऊन टाकली.

दुसरे म्हणजे कथालेखक सतीश तांबे, त्यांना भेटण्याची संधी मिळाली. एखाद्या माणसाकडचा टाकाऊपणा फार दिसत असेल तरीही ती व्यक्ती अशीच का झाली असेल, त्या व्यक्तीकडेही एखादा दुर्मिळ, घेण्यासारखा गुण असेल अशासारख्या गप्पा त्यांच्याशी झाल्या. या ठराविक लोकांबद्दल इतर कोणाशीही गप्पा झाल्या असत्या तर गावगप्पा आणि थिल्लर करमणूक यापलिकडे काही मिळालं नसतं. पण तांब्यांनी त्यापलिकडे बघता येतं याची उदाहरणं दिली. त्यांच्याकडचा हा निर्मळ आणि स्वच्छ दृष्टिकोन उचलण्याइतपत निरागसपणा माझ्याकडे नाही याबद्दल वाईट वाटलं.

आदूबाळ Mon, 04/05/2015 - 15:09

भाग पहिला: आजोबा

आईवडील दोघंही नोकरी करत असत. माझ्या संगोपनाची जबाबदारी संपूर्णपणे आजोबांनी उचलली होती. त्यांच्या सहा नातवंडांत सर्वात जास्त सहवास मला मिळाला, कारण माझा जन्म झाला तेव्हा ते खर्‍या अर्थाने संसारातून, सर्व जबाबदार्‍यांतून मुक्त झाले होते. नातवाला द्यायला त्यांच्याकडे भरपूर वेळ होता.

तीन-चार वर्षांचा असताना त्यांनी मला मराठी अक्षरओळख करवली. वर्तमानपत्रातल्या मथळ्यांची अक्षरं कापून, पुठ्ठ्यावर चिकटवून बाराखडीचे अनेक सेट त्यांनी बनवले आणि अक्षरं, शब्द शिकवले. पुस्तकांचं कपाट खुलं केलं. त्यात माझ्या आत्या, काकांच्या लहानपणापासूनची पुस्तकं होती. दोन आणे किमतीचं "चंद्रावर स्वारी", किशोरचे जुने अंक वगैरे कायकाय. पुस्तकं विकत आणण्यासाठी एक बजेट ठरवून दिलं होतं - त्यात आई, बाबा आणि स्वतः आजोबा वर्गणी देत असत. बजेट संपत आलं की मंडईजवळच्या रद्दीच्या दुकानात नेऊन आणत. तेवढेही उरले नसतील तर नगरवाचनमंदिर किंवा शासकीय विभागीय ग्रंथालय. सायकलच्या दांडीवर टॉवेल टाकून त्यावर मला बसवून सत्तरी ओलांडलेला हा म्हातारा मला गावभर फिरवून आणे.

त्यांचे मित्र (आणि काही मैत्रिणी) गावभर पसरलेले होते. आजोबा अट्टल समाजवादी. एस एम जोशी, शिरुभाऊ लिमये त्यांचे जुने मित्र. शिरुभाऊंचे बंधू माधव लिमये तर आजोबांचे खास दोस्त. (शिरुभाऊंच्या घरी - आज जिथे चाणक्य मंडळ आहे तिथे - आजोबा नेहेमी नेत असत. शिरुभाऊंकडे मोठा उघडणारा अ‍ॅटलास होता, तो मला फार आवडायचा.) समाजवादी मनुष्याचे सगळे गुणदोष त्यांच्यात अगदी पुरेपूर उतरले होते - गबाळसर साधा वेष, कोणावरही कसलीही सक्ती करायला विरोध, वगैरे. बेचाळीसच्या स्वातंत्र्ययुद्धात आजोबांनी आणि त्यांच्या काही मित्रांनी मंडईजवळच्या एका गाळ्यातून गुप्त रेडिओ केंद्र चालवलं होतं. पण त्याविषयी ते फारसं कधी बोलत नसत. किंबहुना जे काही तपशील मिळाले ते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इष्टमित्रांनी सांगितलेल्या आठवणींतून.

आजोबांकडे पहात मी वाढलो. ते माझे पहिले हिरो आणि आयडॉल होते. माझ्या स्वभावातल्या/व्यक्तित्त्वातल्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आजोबांनी आकार दिलेल्या आहेत. (साधं उदाहरण म्हणजे हस्ताक्षर - मला ठरवूनही वाईट अक्षर काढता येत नाही.)

भाग २: डॉ. श्रीकांत पांडुरंग नाडगौडा

धर्मराजमुटके Mon, 04/05/2015 - 15:38

In reply to by आदूबाळ

हस्ताक्षराचा एखादा नमुना डकवता आला तर पहा इथे. म्हणजे आता एवढ्या वर्षात शालेय जीवनात असते अगदी तस्स्चेच वळण नाही असणार पण एक साधारण कल्पना तरी येऊद्या.

बॅटमॅन Mon, 04/05/2015 - 16:07

In reply to by ऋषिकेश

आमच्या तीर्थरूपांचे हस्ताक्षर अगदी मोत्यांसारखे आहे- मराठी आणि इंग्रजी असे दोन्हीही. त्यापुढे आमचे अक्षर म्हणजे कोंबडीचे पाय शाईत बुडवून ती कागदावर चालल्यावर तयार होणारा प्याटर्न आहे.

आदूबाळ Mon, 04/05/2015 - 18:43

भाग २: नाडगौडा सर

कॉमर्सला आलेल्या पोराचं अकाऊंट्स कच्चं असेल तर अगदीच छीथू व्हायची पाळी. वर्गातले जवळजवळ सगळे मोठमोठ्या कारखाना-टाईप क्लासेसना जात असत. आम्हां चार मित्रांना मात्र कोणत्या पुण्यक्षणी नाडगौडा सरांकडे क्लास लावायची बुद्धी झाली कोणास ठाऊक! नाडगौडा सर आमच्याच कॉलेजचे उपमुख्याध्यापक. पैसे मिळवण्याचा हेतू क्लास घेण्यात नसावा, कारण इतर कारखाना-क्लासेसच्या तुलनेत निम्मीच फी होती.

"शिकवण्याची कला" अशी काही गोष्ट असेल तर ती विषयप्रवेशाच्या - बेसिक्स शिकवण्याच्या - काळात सर्वात जास्त प्रमाणात लागत असावी. अकरावीच्या पोरांना डबल एंट्री सिस्टिम आणि जर्नल एंट्र्या वगैरे शिकवणं सीए फायनलला डिफर्ड टॅक्स आणि डेरिव्हेटिव्हज वगैरे शिकवण्यापेक्षा नक्कीच अवघड असावं. ज्ञान अंगी बाणतं, इंटर्नलाईज होतं, आणि आधी शिकलेल्या गोष्टींचा पायर्‍यांसारखा वापर करून पुढचं शिक्षण सोपं पडतं. पण मुळात या पायर्‍या बांधणारे थोरच.

कोणतीही घाई न करता, पर्फॉर्मन्स प्रेशर न टाकता सर धीमे धीमे शिकवत. "थ्री गोल्डन रूल्स" शिकवल्यावर ते म्हणाले, "हे तीन नियम एकदा तुम्हाला समजले की जगातलं कोणतंही अकाऊंटिंग अवघड नाही" - आणि ते खरंच आहे. "व्यवहार ऐकला की डोक्यात जर्नल एंट्री तयार झाली पाहिजे" हे अजूनही डोक्यात वाजतं, आणि प्रथम जर्नल एंट्री डोळ्यांसमोर येते. याचा पुढे खूप फायदा झाला.

बारावीत एकप्रकारची मिडियॉक्रिटी आली होती. आपल्याला काही जमणार नाही, जेमतेम पास होणार, मोठी स्वप्नं कशाला बघायची, वगैरे त्या दिवसांतले विचार. त्याला तडा द्यायचं काम प्रथम सरांनी केलं. "ज्याला फक्त बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार येतो त्यालाही अडुसष्ट मार्क मिळू शकतात. तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळाले पाहिजेत." असं ते सांगत. (क्लासमध्ये पुण्यातल्या एका प्रसिद्ध परिवारातला एक मध्यमवयीन माणूस येत असे. काही केल्या तो अकाऊंट्समध्ये पास होत नव्हता म्हणून त्याने शिक्षण अर्धवट सोडलं होतं. आमच्याबरोबर तोही - बरोब्बर अडुसष्ट मार्क मिळवून - पास झाला. त्याने लाडवाएवढे पेढे वाटले होते!)

बारावीच्या रिझल्टच्या दिवशी या मिडियॉक्रिटी मनोवृत्तीचे बळी आम्ही दोन मित्र स्टेप-इनमध्ये बसलो होतो, आणि शंभर मार्क मिळाल्याची बातमी घेऊन सर इथेतिथे फोन करत आम्हाला शोधत होते!

भाग ३: "वो सब ठीक है, लेकिन ये बता - पैसा आया कि पैसा गया?"

अनु राव Tue, 05/05/2015 - 11:58

नातेवाईक, मित्र, आप्त वगैरे मधल्या काहींकडुन थोडेफार शिकले असेन पण प्रभाव वगैरे नाही कोणाचा.
ह्या शिकण्यात पण काय करु नये अश्या टाईप चे शिकणेच जास्त.

बर्‍यापैकी माहीती ( ज्ञान नाही ), पुस्तके आणि टीव्ही मुळे मिळाली. स्वताच्या मूर्ख पणामुळे शिकायला मिळाले तोच सर्वात मोठा प्रभाव.