-: गांधी, गुर्जर आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य :-

गेले आठवडाभर वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या 'गांधी मला भेटला' या कवितेच्या निमित्ताने साहित्यिक वर्तुळात बरीच खळबळ माजलेली दिसते आहे. "व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्यातून महापुरुषांचा अनादर करणे योग्य नाही" अशी न्यायालयाची भूमिका आहे. तर "कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणा‍ऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे" अशी प्रतिक्रिया गुर्जर यांनी दिली आहे. सुमारे वीस वर्षे चाललेल्या या खटल्याचा एक अध्याय आज संपलेला दिसतो. प्रकाशक नि मुद्रक यातून सुटले असले तरी गुर्जर यांच्यावरील खटला चालूच राहणार आहे.

खटला साहित्याबद्दलचा असल्याने अर्थातच साहित्यिक वर्तुळात त्याचे पडसाद उमटले आहेत. गुर्जर यांच्या समर्थनार्थ जे मुद्दे समोर मांडले जात आहेत त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहण्याची काळजी बहुतेकांनी घेतलेली दिसत नाही. या चर्चे दरम्यान आणि निकालाच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आले आहेत ते सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. पहिले म्हणजे न्यायालयाने गांधीजी हे 'ऐतिहासिक आदरणीय व्यक्ती होते म्हणून' अशी वाक्यरचना केलेली दिसते (निदान वृत्तपत्रांतून तसे छापून आलेले आहे). याचा अर्थ ते अन्य सामान्य व्यक्ती असते तर गुर्जरांनी आपल्या अभिव्यक्तीचे 'डिवाईस' म्हणून त्यांचा वापर केलेला आक्षेपार्ह ठरला नसता असा असे म्हणायचे आहे का? दुसरे एक समर्थन येते ते गुर्जरांची पार्श्वभूमी घोटून घेत अप्रत्यक्ष रित्या 'इतका चांगला माणूस वाईट हेतूने कसा लिहील' हे बिंबवण्याच्या मार्गाने. तिसरे येते ते कवितेचा अन्वयार्थ न समजून घेता टीका केल्याबद्दल. आणि चौथे थेट 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'चा उद्घोष करत कवीचा तो हक्क असल्याचा दावा करणे. या चारही संदर्भात मी थोडे भाष्य करणार आहे. जरी चर्चांमधे अनेक मुद्द्यांची सरमिसळ होत असली तरी इथे मी 'कविता गांधींचा अपमान करणारी आहे का? हा एक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुसरा असे दोन स्वतंत्र मुद्दे तपासणार आहे. तेव्हा या दोन मुद्द्यांना एकच मानण्याची गल्लत कृपया करू नये. या पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर फारच सापेक्ष आहे तेव्हा ते देण्याचा मी प्रयत्नही करणार नाही. मी बोलणार आहे ते ती तशी नाही असे दावा करताना पुढे आलेल्या मुद्द्यांबद्दल आणि खास करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्याबाबत.

माझ्या मते केवळ गांधी हे ऐतिहासिक आदरणीय व्यक्ती आहेत म्हणूनच का बरं, एखाद्या सामान्य माणसालाही तो अधिकार का नसावा? तेव्हा क्षणभर त्या कवितेमधे गांधीऐवजी आजच्या काळातील कोणाही एका सामान्य व्यक्तीचे नाव आहे असे समजून चालू या. अ या लेखकाने ब या हाडामांसाच्या, वर्तमानात अथवा भूतकाळात अस्तित्वात असलेल्या व्यक्तीचा वापर प्रतीक म्हणून करावा का आणि करावा असे म्हणत असू तर त्यात त्या व्यक्तिच्या मूळ व्यक्तिमत्त्वाला बाधा येईल अशा तर्‍हेने लेखन करणे समर्थनीय आहे काय? मुद्दा हा आहे की लेखकाला, कवीला जर स्वातंत्र्य आहे तर ज्या व्यक्तिला तो प्रतीकार्थाने, संकेतार्थाने वापरतो आहे त्याचेही काही अधिकार आपण मानतो की नाही. तो जिवंत असेल तर त्याच अधिकार जास्त नि मृत असेल तर ते कमी वा संपले असे असते का?

मुळात कोणतेही स्वातंत्र्य हे निरपेक्ष मूल्य नव्हेच. ते एका व्यवस्थेच्या संदर्भातच दिले जाते आणि त्या बदल्यात ती व्यवस्था तुम्हाला काही कर्तव्येही आखून देत असते. काही प्रमाणात हा देवाणघेवाणीचाही भाग असतो. माझ्या व्यवस्थेत असलेल्या इतरांनी माझ्या जीवित आणि वित्त संपत्तीवर अतिक्रमण करणार नाही अशी ग्वाही द्यायला हवी असेल तर मी ही ती इतरांना द्यावी लागते. एकतर्फी मामला असून चालत नाही. 'ती पत्रकार घुबडं कुठं गेली?' किंवा 'साहित्यिक म्हणजे निव्वळ बैल आहेत' असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हणताच शोधपत्रकारितेच्या नावाखाली पुराव्याविना एखाद्या नेत्याबाबत बदनामीकारक मजकून छापणारे, त्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावा करणारे पत्रकार किंवा कलावंताचे स्वातंत्र्य घेत ललित साहित्यातून मूळ व्यक्तिमत्त्वाहून वेगळे कदाचित बदनामीकारक व्यक्तिमत्त्व उभे करणारे साहित्यिक जेव्हा त्यांच्या निषेधासाठी सरसावून येतात तेव्हा ते बाळासाहेबांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नाकारत असतात हे मात्र ध्यानात घेत नाहीत. (अर्थात हे दोन्ही प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहेत असे माझे मत नाही. एक स्वीकारले तर दुसरेही स्वीकारावे लागते इतकाच मुद्दा आहे.) तेव्हा व्यवस्था हक्क देते तेव्हाच कर्तव्येही निश्चित करते. कलावंताचे, साहित्यिकाचे स्वातंत्र्य म्हणून वास्तवातील एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा प्रतीकात्मक, संकेताने वापर करायचे 'सामान्य माणसापेक्षा जास्तीचे' असे एक स्वातंत्र्य साहित्यिक घेऊ इच्छितात तेव्हा त्या बदली ते कोणते अधिकचे कर्तव्य मान्य करत असतात? कुठलेच नाही असे जर याचे उत्तर असेल आणि तरीही हे जास्तीचे स्वातंत्र्य आम्हाला हवे असा दावा असेल तर मग हा साहित्यिकांचा 'होलिअर दॅन दाउ' दृष्टीकोन आहे असे खेदाने म्हणावे लागेल.

यातून उद्भवणार्‍या अशा संभाव्य कटकटीतून सुटका करून घेण्यासाठी दृष्य माध्यमांतून आणि काही प्रमाणात ललित लेखनातूनही 'डिस्क्लेमर' टाकण्याचा एक प्रघात पडलेला दिसतो. पण 'जिवंत वा मृत व्यक्तीशी कोणताही संबंध नाही.' असे डिस्क्लेमर कुचकामी असतात हे आपण सारेच जाणतो. चित्रपटाच्या वा ललित साहित्याच्या माध्यमातून आलेले चित्र अधिक रुजते हे अमान्य करता येणार नाही. तुकारामाचा तुकोबा होण्यापूर्वीचे आयुष्य साकार करणारा तुकाराम नावाचा चित्रपट आला त्यातील 'तुकाराम हा तुकाराम वाटलाच नाही.' अशी प्रतिक्रिया बर्‍याच प्रेक्षकांनी दिली. तो तसा वाटण्यासाठी मूळ तुकोबा कसा दिसत होता हे कुणाला ठाऊक होते. तरीही आपल्याला मूळ तुकोबा कसा होता हे ठाऊक आहे असा समज या सार्‍यांचा होता. 'प्रभात'च्या पहिल्या 'तुकाराम' चित्रपटातून दिसलेली विष्णुपंत पागनीस यांची मूर्तीच आमच्या मनात तुकोबाची म्हणून ठसलेली आहे. देशोदेशीच्या धार्मिक संघटना काल्पनिक गोष्टी पुन्हा पुन्हा लिहीत मूळ इतिहास चलाखीने बदलून सोयीचा नवा भाग रुजवत असतातच. लिखित, मुद्रित अथवा दृष्य माध्यमाला जतनमूल्य (archival value) असते आणि म्हणूनच तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जबाबदारीने वापरले गेले पाहिजे. नेमक्या याच कारणासाठी कवितेबाबत खुलासा देण्याचा आदेश न्यायालयाने कवीला दिलेला दिसतो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यापक मुद्दा आहे. हा मुद्दा अगदी र.धों. कर्वेंच्या लैंगिक शिक्षणाबाबतच्या लिखाणासंदर्भात आला होता, बाबासाहेबांच्या 'रिडल्स..'च्या वेळी आला होता, राजवाडेंच्या 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' च्या वेळीही उपस्थित केला गेला होता. इतकेच नव्हे तर अर्वाचीन काळात हा मुद्दा प्रेषित महंमदाचे चित्र छापण्यासंदर्भात समोर आला होता, शिवछत्रपतींच्या जेम्स लेनने लिहिलेल्या चरित्रासंदर्भात पुढे आला होता, आनंद यादव यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराजांच्या जीवनावरील कादंबरीबाबतही! बारकाईने पाहिले तर प्रत्येक वेळी आक्षेपाचे मुद्दे वेगवेगळे आहेत असे दिसून येईल. निव्वळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक म्हणवणारे या सार्‍याच बाबती लेखकाच्या बाजूने असतील का? किंवा विरोधक बंदीच्या वा लेखकाला दंडित करण्याच्या बाजूने असणार आहेत का? या दोन्हीचे उत्तर बहुतेकांच्या बाबत नकारार्थी आहेत. यात मी वैयक्तिक पक्षपाती भूमिकेबद्दल बोलत नाही. अगदी वस्तुनिष्ठ विचार करणारेही नेहेमीच एका बाजूला दिसतील असे नाही. तेव्हा 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' मान्य असेल तर तुम्हाला वसंत गुर्जरांच्या कवितेच्या बाजूने उभे रहावेच लागेल असा एकांगी विचार करता येणार नाही. कुठलेही मूल्य हे निरपेक्ष नसतेच, ते कोणत्या संदर्भात - विशेषतः कोणत्या व्यवस्थे अंतर्गत - उभे आहे हे ही पहावे लागतेच. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यही तसे असू शकत नाही. केवळ हेतू पहा असे म्हणून भागत नाही, परिणामांचा विचारही करावाच लागतो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे आपल्याबरोबरच इतर अनेक धूर्तांच्या, क्षुद्रांच्या, दुरुपयोग करू इच्छिणार्‍यांच्या हाती कोलित देणे आहे. मी अस्सल साहित्यिक म्हणून मला ते हवे नि तो कम-अस्सल वा खोटा साहित्यिक (खरा इतिहासकार नि खोटा इतिहासकार यांच्याबाबतची धुमश्चक्री हा अलिकडे वारंवार अनुभवाला येणारा प्रकार आहे.) म्हणून त्याला ती नको असे म्हणता येत नसते. खरा साहित्यिक नि छद्म साहित्यिक यांच्यात फरक दाखवणारे कोणतेही वस्तुनिष्ठ निकष अस्तित्वात नसतात. तेव्हा आता एकदा त्याची सूट आहे असे म्हटले तर पीत-पत्रकारितेप्रमाणे पीत-साहित्याला उधाण येईल. कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हाडामांसाचं माणूस त्याच्या आयुष्याची मोडतोड करून, त्याच्या तोंडी मला हवे ते बोल घालून प्रतीक म्हणून वापरण्याची परवानगी आहे. फक्त आपला नेहेमीचा '... जिवंत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.' असा डिस्क्लेमर टाकला की लेखक मोकळा. सध्या केवळ इतिहासकारांना हाताशी धरून राजकारण होते आहे. विचार करा हा प्रकार बोकाळला तर चारित्र्यहननाचा एक कायदेशीर नि नैतिक समजला गेलेला मार्गच खुला होऊन जाईल. Beware of what you ask for, you may actually get it! असे इंग्रजीत म्हटले जाते. तुम्ही मागितले ते तुम्हाला मिळेलच पण त्याबरोबर येणारे जे काही आहे ते ही भोगावे लागेल त्याचीही तयारी हवी.

अनेकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलताना हेतू खरोखर स्वातंत्र्य या मूल्याबद्दल, अधिकाराबद्दल असतो की आपल्या भूमिकेला पाठबळ देणार जमाव आपल्या पाठीमागे उभा करण्याचा छुपा हेतू त्यामागे असतो हे ही पहावे लागते. केवळ एका विशिष्ट बाबतीत आपली बाजू अधिक बळकट करण्यासाठी या दोन्हीचे अभिन्नत्व असल्याची मखलाशी अनवधानाने झाली तर चूक आणि आपल्या पाठीमागे असलेल्यांची संख्या वाढावी, पाठिंबा व्यापक व्हावा म्हणून केली तर चलाखीची. पण याचा परिणाम भोगायची तयारी हवी. हे काहीसे एखाद्याने आपला गुन्हा/चूक लपवण्यासाठी, त्याचे समर्थन करण्यासाठी, त्यातून सुटका करून घेण्यासाठी आपल्या बाजूला एका गटाचे लोक वळवण्यासाठी त्याला गाव, जात, धर्म यांचा सदर्भ देऊन दोन गटातील वादाचे स्वरूप द्यावे तसे काहीसे होते. यात आपल्या पाठीमागे एका गटाचा पाठिंबा उभा केल्याचा फायदा मिळत असला तरी विरोधी गटही एकवटत असतो याचे भान विसरायचे नसते.

गुर्जरांच्या कवितेबाबत त्यांचे समर्थक 'तुम्हाला कविता कळलीच नाही म्हणून तुम्हाला त्यात गांधी दिसत आहेत.' अशी मखलाशी करतात तेव्हा ते दोन बाबतीत स्वत:चेच मुद्दे बाधित करत असतात. पहिला म्हणजे कवितेचा अर्थ प्रत्येकाला कसा लागावा हे सापेक्ष आहे असा दावा सतत केला जातो. एखाद्या लेखकाला/कवीला आपण म्हणतो की तुमच्या लेखनावर भाष्य लिहा, ते आम्हाला उलगडून दाखवा. तेव्हा बहुतेक लेखक म्हणतात 'छे: छे: लेखकाने असे आपले लेखन उलगडून दाखवायचे नसते. वाचकाला त्याच्या कुवतीप्रमाणे, रुचीप्रमाणे त्याचा अर्थ लावायची, आस्वाद घेण्याची मुभा असायला हवी.' असे असेल तर मग वाचकांनी लावलेला अर्थ चुकीचा आहे असे म्हणण्याचा अधिकारही तो लेखक गमावतो, कारण बरोबर अर्थ नि चुकीचा अर्थ असे काही नसतेच असा खुद्द लेखकाचाच दावा असतो. तसे असेल तर बहुसंख्य वाचकांना ही कविता गांधींबाबत वाटली असेल तर त्यांचा दोष कसा? कलावंताच्या मनस्वितेचा दाखला देत जर म्हटले की 'असल्या वाचकासाठी नव्हे तर कवी/लेखक आत्मानंदासाठी, व्यक्त होण्यासाठी लिहित असतो' तर मग उलट असे म्हणता येते की तसे असेल तर ते प्रकाशिक करण्याचा हट्ट कशाला. तुमचे उच्च लेखन जर मूठभरांनाच नव्हे तर बोटभरांनाच कळत असेल तर तेवढ्यांपुरते खासगी वितरण करा. दुसरा मुद्दा असा की केवळ चारित्र्यहननाच्या दृष्टीनेच लिहिणारे छद्म लेखकही नेमका असाच दावा करू शकतील नि तुम्ही असा अर्थ लागत नाही म्हणालात तर 'आता काय लेखकाने आपल्या लेखनाचे अर्थ उलगडून दाखवत बसायचे काय?' हा तुमचाच दावा तुमच्याच तोंडावर फेकून मोकळे होतील.

एकुणच हा 'आमचे लेखन तुम्हाला कळंत नाही. आम्ही ते उलगडून सांगणार नाही. तुम्ही ते वाचा आणि आपला अर्थ लावा. पण तो चुकीचा आहे हे मी सांगणार. तेव्हा फक्त 'वा: छान' म्हणा. टीका तर अजिबात करू नका.' हा प्रकारच अनाकलनीय आहे. साहित्यिकांची ही 'होलिअर दॅन दाउ' वृत्ती जर त्यांना वाचकांपासून नि समाजापासून दूर नेत असेल, अशा गदारोळाच्या प्रसंगी समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत नसेल तर दोष समाजाचा की साहित्यिकांचा?

यात शेवटचा मुद्दा आहे तो साहित्यिक बाबतीत न्यायालयाने ढवळाढवळ करावी का? यात अध्याहृत असलेला प्रश्न हा की न्यायालयाला साहित्यातलं काय कळतं? व्यवस्था आली की त्याचे दंडविधान आलेच. दोन व्यक्तिंमधे अथवा संस्थांमधे अधिकाराचा संघर्ष झाला तर तो सोडवण्याचा, निवाडा करण्याचा अधिकार नि कर्तव्य न्यायालयाचेच असायला हवे. शिवाय थोडा विचार केला तर न्यायासनावर बसलेल्यांनी खाणकामाबाबतही अभ्यास केलेला नसतो तरीही ते एखाद्या खाणीतील कामगारांना पुरेशी सुरक्षा, आरोग्य सुविधा मिळतात की नाही या मुद्द्यावरचा खटला चालवतात, निकाल देतात. न्यायाधीशांनी पर्यावरणशास्त्राचा अभ्यास केलेला नसतो, पण पर्यावरणीय निकषांचा अभ्यास केलेले तज्ज्ञ त्यांना त्या विषयातील खटल्यासाठी मदतीला घेता येतात. न्यायासन हे लोकशाही व्यवस्थेत हक्कांच्या संरक्षणाचे कामही करते. 'कलेच्या क्षेत्रात न्यायालयाचे काय काम?' हा अत्यंत धोकादायक प्रश्न आहे. अन्य क्षेत्रातही वेगवेगळ्या संदर्भात ही मागणी होऊ शकते. पुन्हा एकदा 'Beware of what you ask for...'

सर्वात शेवटी माझा दृष्टीकोन स्पष्ट करणे गरजेचे आहे. पहिले म्हणजे इथे गांधीजी आणि गुर्जर या दोनही व्यक्तींना दूर करून मी फक्त अ या कवीने ब या व्यक्तीला प्रतीक वा संदर्भ मानून ही कविता लिहिली आहे अशा दृष्टीने मी तिच्याकडे पाहतो आहे. त्या कवितेचा अर्थ ब या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे का? या प्रश्नाला माझे उत्तर 'हो' असेच आहे. दुसरा प्रश्न 'ही कविता अश्लील किंवा 'ब' या व्यक्तीची बदनामी करणारी आहे का?' याचे उत्तर मी 'नाही' असे देणार आहे. दोन प्रश्नांतला फरक बारकाईने समजून घेतला नाही तर ही दोन उत्तरे परस्परविरोधी भासणार आहेत. (काहींना हा दुटप्पीपणाही वाटेल.) पण या दोन प्रश्नांचे संदर्भ वेगळे आहेत हे समजून घेतले तर तशी ती नाहीत हे ही समजून घेण्यास अवघड जाणार नाही.
---

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.833335
Your rating: None Average: 2.8 (6 votes)

नेमके!
*पण शेवटचा परिच्छेद दोन दोनदा वाचूनही दोन प्रश्नांत विरोधाभास कसा नाही; ते समजले नाही.*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१००० शब्दांचा लेख आणि "नेमका"? :O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला आणि तुमचे ह्या विषयावरील विचार १००% पटलेत. शेवटच्या परिच्छेदात दिलेल्या दोन उत्तरात कसलाच विरोधाभास जाणवला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>या कवितेचा अर्थ ब या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे का? या प्रश्नाला माझे उत्तर 'हो' असेच आहे. दुसरा प्रश्न 'ही कविता अश्लील किंवा 'ब' या व्यक्तीची बदनामी करणारी आहे का?' याचे उत्तर मी 'नाही' असे देणार आहे. दोन प्रश्नांतला फरक बारकाईने समजून घेतला नाही तर ही दोन उत्तरे परस्परविरोधी भासणार आहेत. (काहींना हा दुटप्पीपणाही वाटेल.) पण या दोन प्रश्नांचे संदर्भ वेगळे आहेत हे समजून घेतले तर तशी ती नाहीत हे ही समजून घेण्यास अवघड जाणार नाही.

ब या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण कसे झाले ते कळत नाही. ब ही व्यक्ती हयात नसल्याने तिचा कोणता एन्फोर्सेबल अधिकार डावलला जातोय?

बाकी ब ची बदनामी होत नाही* हे मान्य आहे (अश्लील आहे का हा प्रश्न उद्भवतच नाही). अर्थात ब हे टॉवरिंग व्यक्तिमत्व असल्याने आणि त्याचं आयुष्य बरचसं उघडपणे जगलेलं असल्याने ही बदनामी होत नाही. ब हे तसे व्यक्तिमत्व नसते तर मात्र बदनामी होऊ शकली असती.

*बदनामी होत नाही म्हणूनच कोणता अधिकार डावलला हा प्रश्न आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण कसे झाले ते कळत नाही. ब ही व्यक्ती हयात नसल्याने तिचा कोणता एन्फोर्सेबल अधिकार डावलला जातोय?

अगदी अगदी हाच विचार डोक्यात आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्देसूद, खणखणीत, उत्कृष्ट. ररा, अनेक ठिकाणी आमच्या मनात साचलेलं तुम्ही लिहून मोकळं करता आहात असा फील आला.

साहित्यिकांची ही 'होलिअर दॅन दाउ' वृत्ती जर त्यांना वाचकांपासून नि समाजापासून दूर नेत असेल, अशा गदारोळाच्या प्रसंगी समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत नसेल तर दोष समाजाचा की साहित्यिकांचा?

हे तर लाजवाब..!! वाचकांना आपल्यासोबत न घेता, इनफॅक्ट अजिबात खिजगणतीतही न धरल्याचे दाखवत अनेक लेखक आपले लिखाण प्रकाशित करवून घेत असतात. मागाहून आपल्याला पर्वा नाही असे कितीही दाखवले तरी कान आणि मन प्रतिसादाकडे लागलेलं असतंच.. भले तो प्रतिसाद खपाच्या रुपात असेल किंवा पत्रव्यवहाराच्या किंवा लोकांत चाललेल्या चर्चेच्या किंवा वर्तमानपत्रीय रिव्ह्यूजच्या. मग आडूनआडून रिस्पॉन्स बघायचा आणि मिळाला नाही तर उगीच दुखावले जाऊन उलट तिरस्कार दाखवायचा..

अरे, वाचक हादेखील एक महत्वाचा भाग आहे लेखनप्रक्रियेत हे मान्य करा की.. तेच तर मोटिव्हेशन आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> पहिले म्हणजे न्यायालयाने गांधीजी हे 'ऐतिहासिक आदरणीय व्यक्ती होते म्हणून' अशी वाक्यरचना केलेली दिसते (निदान वृत्तपत्रांतून तसे छापून आलेले आहे). याचा अर्थ ते अन्य सामान्य व्यक्ती असते तर गुर्जरांनी आपल्या अभिव्यक्तीचे 'डिवाईस' म्हणून त्यांचा वापर केलेला आक्षेपार्ह ठरला नसता असा असे म्हणायचे आहे का? <<

>> माझ्या मते केवळ गांधी हे ऐतिहासिक आदरणीय व्यक्ती आहेत म्हणूनच का बरं, एखाद्या सामान्य माणसालाही तो अधिकार का नसावा? <<

>> मुद्दा हा आहे की लेखकाला, कवीला जर स्वातंत्र्य आहे तर ज्या व्यक्तिला तो प्रतीकार्थाने, संकेतार्थाने वापरतो आहे त्याचेही काही अधिकार आपण मानतो की नाही. तो जिवंत असेल तर त्याच अधिकार जास्त नि मृत असेल तर ते कमी वा संपले असे असते का? <<

>> त्या कवितेचा अर्थ ब या व्यक्तीच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे का? या प्रश्नाला माझे उत्तर 'हो' असेच आहे. दुसरा प्रश्न 'ही कविता अश्लील किंवा 'ब' या व्यक्तीची बदनामी करणारी आहे का?' याचे उत्तर मी 'नाही' असे देणार आहे. <<

मला हा मुद्दा नीटसा कळलेला नाही. आपल्या कायद्यात सर्वसामान्य नागरिकासाठीही तशा तरतुदी आहेत आणि माझ्या मते त्या मृत व्यक्तीसंदर्भातही वापरता येतात. त्यामुळे सामान्य माणसाचाही त्याच्या नावासहित एखाद्या साहित्यकृतीत (किंवा इतरत्र) बदनामीकारक उल्लेख झाला असं वाटलं तर त्याविरोधात न्यायालयीन दाद मागता येते. परंतु एखाद्या व्यक्तीचा नुसता उल्लेख झाल्यामुळे तिच्या अधिकारावर अतिक्रमण होतं असं म्हणायचंय का वेगळं काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

का"का नसावा? " हा 'असावा!' हे ऑब्वियस उत्तर असलेला प्रश्न आहे आणि तो साहित्यिकांसाठी आहे. कारण 'ऐतिहासिक आदरणीय' दर्जा खोडून काढला तर अशा व्यक्तीबाबत लिहिलेली कविता आक्षेपार्ह ठरणार नाही अशी पळवाट यातून नकळत निर्माण होते, ती बुजवण्यासाठी खुंटा हलवून बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

ही पळवाट सध्यातरी व्यवस्थेतील उच्चन्यायालयानेच दिलेली दिसते.

We have already opined that freedom of speech and expression as enshrined under Article
19(1)(a) of the Constitution is not absolute in view of Article
19(2) of the Constitution. We reiterate the said right is a right
of great value and transcends and with the passage of time and
growth of culture, it has to pave the path of ascendancy, but it
cannot be put in the compartment of absoluteness. There is
constitutional limitation attached to it. In the context of
obscenity, the provision enshrined under Section 292 IPC has
its room to play. We have already opined that by bringing in a
historically respected personality to the arena of Section 292
IPC, neither a new offence is created nor an ingredient is
interpreted. The judicially evolved test, that is, “contemporary
community standards test” is a parameter for adjudging
obscenity, and in that context, the words used or spoken by a
historically respected personality is a medium of
communication through a poem or write-up or other form of
artistic work gets signification. That makes the test applicable
in a greater degree.
To understand the same, a concrete
example can be given. A playwright conceives a plot where
Mahatma Gandhi, Vishwakavi Rabindra Nath Tagore, Sardar
Vallabh Bhai Patel meet in heaven and they engage themselves
in the discussion of their activities what they had undertaken
when they lived in their human frame. In course of discussion,
their conversation enters into the area of egoism, thereafter
slowly graduates into the sphere of megalomania and
eventually they start abusing each other and in the abuses
they use obscene words. The question would be whether the
dramatist can contend that he has used them as symbolic
voices to echo the idea of human fallacy and it’s a creation of
his imagination; and creativity has no limitation and, therefore,
there is no obscenity. But, there is a pregnant one, the author
has chosen historically respected persons as medium to put
into their mouth obscene words and, ergo, the creativity melts
into insignificance and obscenity merges into surface even if he
had chosen a “target domain”. He in his approach has travelled
into the field of perversity and moved away from the
permissible “target domain”, for in the context the historically
respected personality matters.

मला तुमचा मुद्दा नीट कळला नाही. कोणतेही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व - मग ते आदरणीय अथवा फेमस असो वा नसो, हे ललित लेखनात वापरताना साहित्यिकांवर काही ठराविक निर्बंध असावेत, आणि ते कोर्टाने ठरवावेत, असा आहे का? या निकालात कोर्टाने आदरणीय व्यक्तिमत्त्वाची व्याख्याच कोर्टाने "कम्युनिटी स्टँडर्ड्स" वर ढकलले आहेत, पण भारतात जितक्या कम्युनिट्या, तितके वेगळे स्टँडर्ड्स असल्यामुळे नेमके हिस्टॉरिकल पर्सनेज कोण, आणि ते का रिस्पेक्टेड असावेत वा नसावेत यावर पुन्हा पुन्हा वाद होणार असं दिसतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्लँकेट "आर्टिस्टिक लायसन्स" नसावं पण अन्यथा ते असावंच आणि ब्लॅंकेट लोकांना(मास) काय वाटतं ह्याचा विचारही फारसा करू नये, उद्या लागलंच तर खाली एक डिस्क्लेमर टाकण्याची सोय करुन टाकावी म्हणजे झेंगाट नको, शहाण्यांनी मुळ कविता छापली होती नं? त्यांच्यावर केस कशी नाही झाली ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवमानाबद्दल यानिमित्ताने एक रोचक मुद्दा मांडता येईल. एखाद्या व्यक्तीविषयी / जातपंथाविषयी वगैरे काही "बदनामीकारक" "अपमानास्पद" विधान कोणी केलेलं असेल आणि त्या विधानाचा कोणताही एक अर्थ (नॉट नेसेसरिली ऑब्व्हियस ऑर फर्स्ट मीनिंग) जर सौम्य आणि अवमान न करणारा अथवा निव्वळ तांत्रिकदृष्ट्या दुसरेच काहीतरी सुचवत असला तर तो सौम्य आणि तुलनेत पॉझिटिव्ह अर्थ ग्राह्य धरुन कोर्टाकडून निर्णय घेतला जातो.

ही माहिती ऐकीववाचीव आहे. वकिली पेशातील कोणीतरी कन्फर्म केले तर बरे होईल.

याचे उदा: अमुकतमुक हा नेता क्षक्षपूजा अमुकशहरात पब्लिकली कशी करतो ते आम्ही बघतोच / बघून घेऊ.

याचा अर्थ प्रथमदर्शनी धमकी असा होईल. पण पूजा केल्यास आम्ही ती (डोळ्यांनी) बघू, निरीक्षण करु असा सपाट सरळ अर्थ लावता येत असल्यास आणि तसा असल्याचा दावा केल्यास तो ग्राह्य मानला जातो.

एका केसमधे आरोपीचा उद्देश फिर्यादीला "महा रड्या" असं संबोधण्याचा होता.. म्हणजे ज्या त्या गोष्टीत रडत असतोस (नेहमी नाखूष असतोस).. असा अर्थ लावला जाऊन अपशब्द वापरणार्‍याला फायदा मिळाला होता.

या पार्श्वभूमीवर अवमानकारक शब्दांचा अन्य एखादा बिनाईन अर्थ काढून दाखवता आला तर तो मान्य होत असावा. अर्थात हा तात्विक पराभव आहे हे मान्यच. तरी कायद्याच्या कचाट्यातून लोक सुटका करुन घेत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

हरभजनने सायमंडसला तेरी माँकी म्हटले होते मंकी नाही असा दावा करण्यात आला होता ते आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण त्या दाव्यातही स्किनसेव्हिंग कसे काय झाले? आय मीन हिंदीत का असेना, पण आईवरून शिवी झालीच ना? की फक्त समोरच्याला कळणार्‍या भाषेतली शिवीच ग्राह्य धरली जाते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऑष्ट्रेलियन लोकांनी "सायमंड्स आदिवासी असल्याने त्याला मंकी म्हटले" असा रेसिझमचा दावा लावला होता. तसे म्हटले नाही असे क्लेम झाल्यावर दावा निकाली. तेरी मांकी चा अर्थ काय हे त्यांना कुठे कळते? कळले असते तर "मांकी जय" म्हणणार होतो (आयची जै) असा दावा करून सुटला असता.

शिवाय हल्ली गोरे लोक भारताशी क्रिकेटमध्ये पंगा घेण्यास धजत नाहीत हे तर आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हम्म, राईट. हिंदी समजत असते तर तसाही दावा लावता आला असता पण न आल्याने भज्जी सुटला.

किमान एवढ्यासाठी तरी बेशिक बहुभाषापरिचय आवश्यक असावा. Wink गेलाबाजार गालिकोश तरी बनवल्या जावाच जावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाहेरच्या देशांत लैंगिक शिव्या फारश्या मनावर घेतल्या जात नाहीत.(कारण त्यांच्याकडे त्यांची रेलचेल असते. आपल्याकडच्या आयला, तिच्च्यायला, तेजायला वगैरे जश्या शिव्या राहिलेल्या नाहीत, तसे). पण वांशिक हीनतादर्शक शब्द, हावभाव मात्र सहन केले जात नाहीत. घटनादत्त समानतेची प्रखर जाणीव असल्याने असे होत असावे. त्यामुळे मंकी हा अ‍ॅबॉरिजिन्सशी नाते दाखवणारा शब्द त्यांना 'माँ की....' चा अर्थ कळला असता तरी अधिक अपमानास्पद वाटला असता. पुढे वादच मिटल्यामुळे शब्दाचा कीस काढण्याची वेळ आली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. ज्या संस्कृतीत "स्टेसीची आई" सारखी गाणी पापिलवार आहेत तिथे खास आईवरच्या शिव्यांना तितकि ग्रॅव्हिटी कदाचित नसावी असे वाटते. परदेशात राहणार्‍यांकडून अधिक माहिती मिळावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"मदर-फकर" हा शब्द किती किती तरी रॅप गाण्यात येतो.
वरील चर्चेवरुन हे गाणं आठवलं. यात मॅनिअ‍ॅक अन ऑर्गॅझमिक आवाज आहेत.

https://www.youtube.com/watch?t=18&v=O66L2Pel6x0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायालयांच्या "काही" विधानांचा चूक गोष्टी समर्थिण्यासाठी दाखला दिला जातो, लिहिलेय ते वाईट कशावरून असे म्हटले जाते, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबसॉल्यूट असते हे सांगणे, अभिव्यक्तिच्या अर्थाची जबाबदारी न घेणे, प्रतिकात्मकता नि अस्विकारण यांचा गैरफायदा घेणे हे विषय छान हाताळले आहेत.
=====================================================
लोक विषयाला इतके विचित्र फाटे फोडतात कि नक्की होतंय काय ते कळत नाही. पण इथे काय विचार करावा काय नाही हे फार छान लिहिले आहे. आशा आहे कि न्यायालयाने देखिल असाच नि:संदिग्ध नि सुव्यवस्थित विचार केला असावा.
====================================================================
लेख वाचायला क्लिष्ट वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

न पटलेला मुद्दा१-

तुमचे उच्च लेखन जर मूठभरांनाच नव्हे तर बोटभरांनाच कळत असेल तर तेवढ्यांपुरते खासगी वितरण करा. दुसरा मुद्दा असा की केवळ चारित्र्यहननाच्या दृष्टीनेच लिहिणारे छद्म लेखकही नेमका असाच दावा करू शकतील नि तुम्ही असा अर्थ लागत नाही म्हणालात तर 'आता काय लेखकाने आपल्या लेखनाचे अर्थ उलगडून दाखवत बसायचे काय?' हा तुमचाच दावा तुमच्याच तोंडावर फेकून मोकळे होतील.

केवळ छद्मी = मूठभर्/दुर्जन लोकांच्या कृत्याच्या भीतीने, अन्य लेखकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी का करायची? चारित्र्यहनन केव्हा होणार - (१) प्रत्यक्षात तसे काही घडलेले आहे/होते, अर्थात मुद्द्यात काहीसे तथ्य आहे (२) कधीच घडले नाही पण छद्मी लेखक, तसा पोकळ दावा करत आहेत.
मग केस-बाय-केस लढा देता येईलच की.
.
सुक्याबरोबर ओलंही कशाला जाळायचं? "न्यायदानप्रक्रियेत" तेवढ्या नीर-क्षीर विवेकाची अपेक्षा करणे चूकीचे आहे काय?
.
वरी मुद्द्याच्या खंडनार्थ कोणी म्हणेल, की जनता तेवढी प्रगल्भ नसल्याने दंगे होतील, निष्पापांचे नुकसान होइल. पण जनता प्रगल्भ नाही म्हणून तिला प्रगल्भ व्हायचा हक्कच नाकारायचा? Why not consider this an opportunity for improvement rather than sweeping under the rug?
________________________________
न पटलेला मुद्दा२-

एकुणच हा 'आमचे लेखन तुम्हाला कळंत नाही. आम्ही ते उलगडून सांगणार नाही. तुम्ही ते वाचा आणि आपला अर्थ लावा. पण तो चुकीचा आहे हे मी सांगणार. तेव्हा फक्त 'वा: छान' म्हणा. टीका तर अजिबात करू नका.' हा प्रकारच अनाकलनीय आहे. साहित्यिकांची ही 'होलिअर दॅन दाउ' वृत्ती जर त्यांना वाचकांपासून नि समाजापासून दूर नेत असेल, अशा गदारोळाच्या प्रसंगी समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत नसेल तर दोष समाजाचा की साहित्यिकांचा?

"समाजाने पाठीशी उभे रहावे " अशी काही हिंट गुर्जर यांनी दिलेली आहे का? नाही माहीत नाही म्हणून विचारते आहे. दुवा किंवा तसे भाष्य आहे आपल्यापाशी का ररा की हे गृहीतक आहे??
___________________________________

न पटलेला मुद्दा३ -

कुठलेही मूल्य हे निरपेक्ष नसतेच, ते कोणत्या संदर्भात - विशेषतः कोणत्या व्यवस्थे अंतर्गत - उभे आहे हे ही पहावे लागतेच. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यही तसे असू शकत नाही. केवळ हेतू पहा असे म्हणून भागत नाही, परिणामांचा विचारही करावाच लागतो.

पण मग एखाद्या कलाकृतीवर बंदी आणण्याचा हा परिणाम नाही का की "देश काही वर्षे मागे गेला. एक प्रेसिडन्स पडला." याचा अर्थ व्यापक रीतीने देश मागे पडणे, अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होणे " हा परिणाम अन्य अनिष्ट परिणामांपेक्षा सुसह्य आहे? खरच आहे? की एका निर्णयाचे परिणाम तत्काळ दृगोचर होतात अन दुसर्‍या निर्णयाचे परिणाम ओव्हर द टाइम दिसतात. अन म्हणून तत्काळ दृगोचर होणारे परिणाम अधिक महत्त्वाचे.
___________________________________________________________
*******************************
__________________________________________________________
पटलेला मुद्द१-

'सामान्य माणसापेक्षा जास्तीचे' असे एक स्वातंत्र्य साहित्यिक घेऊ इच्छितात तेव्हा त्या बदली ते कोणते अधिकचे कर्तव्य मान्य करत असतात? कुठलेच नाही असे जर याचे उत्तर असेल आणि तरीही हे जास्तीचे स्वातंत्र्य आम्हाला हवे असा दावा असेल तर मग हा साहित्यिकांचा 'होलिअर दॅन दाउ' दृष्टीकोन आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
.
.
लिखित, मुद्रित अथवा दृष्य माध्यमाला जतनमूल्य (archival value) असते आणि म्हणूनच तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जबाबदारीने वापरले गेले पाहिजे. नेमक्या याच कारणासाठी कवितेबाबत खुलासा देण्याचा आदेश न्यायालयाने कवीला दिलेला दिसतो.

हा कर्तव्याचा मुद्दा एकदम पटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हा लेख नीटसा कळलाच नाहीये, बरीच उभी-आडवी विधाने आहेत - पण नक्की काय म्हणायचंय ते काही झेपत नैय्ये.
नंतर शांतपणे वाचेन. तुर्तास पोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> एकुणच हा 'आमचे लेखन तुम्हाला कळंत नाही. आम्ही ते उलगडून सांगणार नाही. तुम्ही ते वाचा आणि आपला अर्थ लावा. पण तो चुकीचा आहे हे मी सांगणार. तेव्हा फक्त 'वा: छान' म्हणा. टीका तर अजिबात करू नका.' हा प्रकारच अनाकलनीय आहे. साहित्यिकांची ही 'होलिअर दॅन दाउ' वृत्ती जर त्यांना वाचकांपासून नि समाजापासून दूर नेत असेल, अशा गदारोळाच्या प्रसंगी समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत नसेल तर दोष समाजाचा की साहित्यिकांचा? <<

हा मुद्दा इथे का उपस्थित झाला ते समजलं नाही. गुर्जरांवरच्या खटल्याच्या संदर्भात गुर्जर असं काही म्हणाले आहेत का? की खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी त्यांच्या कवितेचं जे साहित्यिक अर्थनिर्णयन व्हायला हवं होतं ते झालं नाही? कारण, माझ्या माहितीनुसार जेव्हा अशा प्रकारची प्रकरणं न्यायालयात गेली (मर्ढेकर, तेंडुलकर, इ.) तेव्हा लेखकाची बाजू मांडण्यासाठी पुरेसे लोक पुढे आले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तेंडुलकर लोकांना समजेल असे आणि फारच खोल लिहायचे. असले निर्र्थक आणी कालबाह्य टुच्च्या विषयांवर नाही लिहायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान ! सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारे लिखाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ आणि ब असा सामान्यनियम वाचून सुचले.

मागे मी माझ्या (तेव्हाच्या) प्रियकराला उद्देशून प्रेम/कलह कविता लिहिली होती. (ते प्रकरण टिकले नाही, त्याचे कारण ही कविता नसावी.)

कवितेत नाव नसले, तरी त्याबाबतच्या ब्लॉग-खुल्या व्यवहारातून आणि सहजशक्य शोधाने कविता कोणाबद्दल आहे, ते कळू शकते.

आता त्या व्यक्तीच्या अधिकारांवर अतिक्रमण करून लिहिलेली ती कविता शोधून खोडून नाहिशी करणे आले. त्रास कि हो! आळस आहे, म्हणून बहुधा तसे काही करणार नाही.

--------------------------------
तरी एका अप्रसिद्ध व्यक्तीची बदनामी करणार्‍या या कवितेचा कडकडीत निषेध करून फूल ना फुलाची पाकळी निर्लज्ज आणि निरपेक्ष अभिव्यक्तीचा धिक्कार गोड मानून घेणे :

चिखलांत बुडाले कल्ले!
त्यां ओढिति चिल्लें-पिल्लें!
खिसमीस खिशांतिल उरलें
कुणी मारि तयावर डल्ला । '(येथे त्या अप्रसिद्ध व्यक्तीचे नाव आहे, ते मी गाळले आहे.)'!

माझ्याकडून नामनिर्देशाने त्या अप्रसिद्ध व्यक्तीच्या अधिकारांवर कुरघोडी होऊ नये. शिवाय कवीने ही कविता लिहिली आहे, ते लिहिल्याचा निषेधरूपी अपमान म्हणून माझ्याकडून त्या कवीच्या अधिकारावर कुरघोडी होऊ नये, म्हणून कवीचा नामोनिर्देश केलेला नाही.
-----------------------------------

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य निरपेक्ष नाही" असे लिहिणारे लोक पुष्कळदा त्या मर्यादा स्पष्ट करत नाहीत. जेव्हा मर्यादा सोदहारण स्पष्ट केल्या जातात, तेव्हा आमच्यासारख्यांची थोडी सोय होते - म्हणजे चेंगराचेंगरी होईल अशा ठिकाणी "आग! आग! पळा" असे ओरडून कलात्मक (फिक्शनल) अभिव्यक्ती करू नये, पण सिनेमातील नटाने सिनेमातील प्रसंगात तशी बोंब ठोकलेली चालते, हा विवेक कसा करावा, वगैरे.

रमताराम यांच्या निबंधाने अशी कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली नाही. त्यामुळे एका प्रकारे त्यांची तात्त्विक मांडणी अनर्थक होते. मनुष्यांबाबत केलेली कुठलीही अभिव्यक्ती बोलणार्‍या-लिहिणार्‍याच्या अनुभवातील माणसांचे मिश्रण असते. शिवाय ललित अनुभवलेखनात मनुष्यांची नावे येतात, ती खरी असतात. ललित-काल्पनिक लेखनात नावे येतात, ती सामान्य असतात, म्हणजे त्या नावाची कोणी अप्रसिद्ध व्यक्ती हयात किंवा मृत असण्याची शक्यता खूपच असते.

आपल्याला अवतीभवतीच्या खर्‍या आणि कल्पित मनुष्यांबाबत बोलणे-लिहिणे नैसर्गिक आहे, हे तर होणारच...
बघा मीपण "व्यक्तिविषक लेखनाची सापेक्षता १००% नसते" असे टोकाचे अतिसत्य वाक्य प्रसवू शकतो - आणि ते वाक्यही "अभिव्यक्ती स्वातंत्र्य निरपेक्ष नाही" वाक्याइतकेच खरे आहे.

परंतु माझा हा लेख नसून केवळ प्रतिसाद आहे. त्यामुळे मी मार्गदर्शक तत्त्वे देण्याची अपेक्षा तितकी मोठी नसावी. त्या छोट्या अपेक्षेस अनुसरून फक्त "चेंगराचेंरी/आगीची बोंब" या तत्त्वाचा उल्लेख केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही भ्रष्टाचार करा, ..... चित्रांना अर्पण करा ...... दोष मुक्त व्हा. गाडी खाली लोकांना चिरडा चित्रांना अर्पण करा, दोषमुक्त व्हा. तुमचा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर विश्वास आहे, ..... चित्रांना अर्पण करण्यावर विश्वास नाही तर...

अभिव्यक्ती
कानात बोलली
छाटून टाकली
जीभ तिची.
.........
http://www.aisiakshare.com/node/3650

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख दोनतीनदा वाचल्यावर हा कळीचा मुद्दा आहे असे वाटले:

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे आपल्याबरोबरच इतर अनेक धूर्तांच्या, क्षुद्रांच्या, दुरुपयोग करू इच्छिणार्‍यांच्या हाती कोलित देणे आहे. मी अस्सल साहित्यिक म्हणून मला ते हवे नि तो कम-अस्सल वा खोटा साहित्यिक (खरा इतिहासकार नि खोटा इतिहासकार यांच्याबाबतची धुमश्चक्री हा अलिकडे वारंवार अनुभवाला येणारा प्रकार आहे.) म्हणून त्याला ती नको असे म्हणता येत नसते. खरा साहित्यिक नि छद्म साहित्यिक यांच्यात फरक दाखवणारे कोणतेही वस्तुनिष्ठ निकष अस्तित्वात नसतात. तेव्हा आता एकदा त्याची सूट आहे असे म्हटले तर पीत-पत्रकारितेप्रमाणे पीत-साहित्याला उधाण येईल. कारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हाडामांसाचं माणूस त्याच्या आयुष्याची मोडतोड करून, त्याच्या तोंडी मला हवे ते बोल घालून प्रतीक म्हणून वापरण्याची परवानगी आहे. फक्त आपला नेहेमीचा '... जिवंत वा मृत व्यक्तीशी संबंध नाही.' असा डिस्क्लेमर टाकला की लेखक मोकळा. सध्या केवळ इतिहासकारांना हाताशी धरून राजकारण होते आहे. विचार करा हा प्रकार बोकाळला तर चारित्र्यहननाचा एक कायदेशीर नि नैतिक समजला गेलेला मार्गच खुला होऊन जाईल. Beware of what you ask for, you may actually get it! असे इंग्रजीत म्हटले जाते. तुम्ही मागितले ते तुम्हाला मिळेलच पण त्याबरोबर येणारे जे काही आहे ते ही भोगावे लागेल त्याचीही तयारी हवी.

पण हा इशारा साहित्यिकांपेक्षा समाजाला विचारणे जास्त इष्ट होईल. कारण आदरणीय/तुच्छ ऐतिहासिक व्यक्ती सारखेच खर्‍या / खोट्या साहित्य/इतिहासाचा प्रश्न, आणि तो मांडणार्‍या व्यक्तींचे समाजातील स्थान, हक्क आणि निर्बंध शेवटी समाजाने ठरवायचे आहे. अर्थातच समाज इथे एककल्ली नाही; तो कुठेही नसतो, आणि सामाजिक तेढातूनच या प्रश्नांची उत्तरे, किंवा जेमतेम कन्सेन्सस, येईल. तो कन्सेन्ससकडे न जाता चिघळतच राहिला, तर खटले सुद्धा त्याच तेढाचे एक प्लॅटफॉर्म म्हणून राहतील - त्यात कोर्टांकडून तटस्थ, नि:पक्ष भूमिकेची अपेक्षा कितपत करता येईल याबद्दल साशंक आहे. साहित्यिकांनी आपला विषय नीट विस्कटून वाचकांपर्यंत पोचवला तर त्याचा कितपत उपयोग होईल? तुमच्या इशार्‍याप्रमाणे त्यांनी नको तिथे जाऊच नये, मग वाचकांशी गुफ्तगू साधण्याचा प्रश्नच येतोच कुठे? समाजाला देखील ती म्हण लागू आहेच: दुखावलेल्या भावना, पोकळ इतिहास आणि गोग्गोड साहित्याचीच फक्त मागणी असली तर ते सर्व तुम्हाला मिळेलच, पण त्याबरोबर येणारे जे काही आहे ते ही भोगावे लागेल त्याचीही तयारी हवी. आज जे काय खर्‍या खोट्या इतिहासावरून, इतिहासकारावरून चाललंय ते काही गुर्जरांसारख्या बेजबाबदार कवींमुळे नाही झालं. त्याला खोल सामाजिक तेढाची राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. कोणा साहित्यिकाला गप्प करून ते तेढ अचानक गायब होतील असे वाटत नाही. उलट तसेच साचेबंद लेखन आणि वाद चालूच राहतील.

सारांश, साहित्यिकांच्या तथाकथित हस्तिदन्ती मनोर्‍यातील अहंकाराची आणि ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहीतानाचा (सामाजिक, राजकीय पातळीवर) बेजबाबदारपणाची इथे उगीच गफलत व्हायला नको. साहित्यिक अहंकारी आणि माणूसघाणे असतीलही, तसेच आजकाल बर्‍यापैकी मंडळी फेसबुकवरून वाचकांशी थेट गप्पा साधत आहेतच. तिथे देखील कंपूबाजी, लायका, कॉमेंटांवरून कुजबुज चालते. साहित्यिक आणि वाचकांच्या संबंधात प्रकाशक, मीडिया, प्रस्थापित मासिकं इत्यादी अनेकांची विशिष्ट भूमिका असते. नवीन सोशल मीडियाच्या वातावरणात हे संबंध बदलत चाललेत, त्यामुळे या संबंधाचे सरसकट वर्णन करणे शक्य नाही. तो मुद्दा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्याला एनीवे गौण आहे.

मी इथे विस्तृत पोस्ट लिहीली होती त्यामुळे अजून लिहीत नाही. आय गेस वी मस्ट अग्री टू डिसग्री. इथे माझे माइनॉरिटी मत आहे हे मान्य करून धाग्याची रजा घेते. विकेंडला इथे फिरकणे बहुतेक जमणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जरांच्या कवितेवरच्या खटल्याच्या निमित्तानं शांता गोखले यांचा लेख -
WORDS FOR GANDHI?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पहिले म्हणजे इथे गांधीजी आणि गुर्जर या दोनही व्यक्तींना दूर करून मी फक्त अ या कवीने ब या व्यक्तीला प्रतीक वा संदर्भ मानून ही कविता लिहिली आहे अशा दृष्टीने मी तिच्याकडे पाहतो आहे.

- असं मला नाही वाटलं. लेखाच्या शीर्षकापासून ते -

"कवीला अपेक्षित असलेला व्यंग्यार्थ, कवितेवर खटला दाखल करणा‍ऱ्यांना कळलाच नाही, ही अभिव्यक्तीची शोकांतिका आहेच, पण त्यांना गांधी कळला नाही, याचेही हे उत्तम उदाहरण आहे" अशी प्रतिक्रिया गुर्जर यांनी दिली आहे

- या गुर्जरांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या प्रतिक्रियेपर्यंत सगळी पार्श्वभूमी 'अ' कोण हे स्पष्ट करणारी ठरतेय, असं वाटलं. नुसता प्रकरणाचा संदर्भच देऊन स्वतंत्रपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा लेख आला असता, तर कदाचित वेगळं झालं असतं, पण इथं तसं नाही वाटलं. इथं 'अ' ही व्यक्ती म्हणजे वसंत गुर्जर आहेत, म्हणून प्रतिक्रिया देणं गरजेचं वाटलं. बाकीच्या मुद्द्यांवर काही बोलण्याएवढं त्यांच्याबद्दलचं माझं आकलन नाही.

गुर्जरांनी एक प्रतिक्रिया मुंबई मिरर या वर्तमानपत्रालाही दिलेय, त्यात ते म्हणतात: ''माझी कविता महात्मा गांधीजींबद्दल नाहीचेय. ती आपल्या समाजाबद्दल आणि गांधीजींच्या मूल्यांचं आपण काय केलंय त्याबद्दल आहे. ती खरं तर न संपणारी कविता आहे, कारण आपण गांधीजींच्या मूल्यांना खलास करणं थांबवलेलं नाहीये... मी ती कविता कधी लिहिली, पाहा. आणीबाणी घोषीत होऊन गेलेली होती, जयप्रकाश नारायणांचं जन आंदोलन झालेलं होतं, जनता सरकार (नागरिकांच्या) अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलं होतं. हे सगळं आणि आणखीही बरंच काही माझ्या कवितेत प्रतिबिंबित झालं.''

वर्तमानपत्रातल्या प्रतिक्रिया छापून येणं वगैरे प्रक्रियेत एक आपसूक सुुसुत्रपणा त्या प्रतिक्रियांमध्ये वाटतोय, पण गुर्जर प्रत्यक्षात कदाचित इतक्या सुसुत्रपणे बोलले नसतीलही. एका ठिकाणी थोड्या अनौपचारिक गप्पांमध्ये गुर्जर या कवितेबद्दल काय म्हणाले ते नोंदवलेलं सापडलं, ते असं आहे: ''आता मी फिरत असतो आणि शेकडो माणसं बघत असतो. काही रस्त्यांवर... संवादसुद्धा ऐकू येतात म्हणजे. एकदा मी इराण्याच्या हॉटेलात चहा पिताना, एक गांधीवादी माणूस दुसऱ्याशी बोलताना ऐकलं. तो स्वातंत्र्यसैनिक वगैरे होता. तो सांगत होता की, 'बघा स. का. पाटील, केशवराव बोरकर, आम्ही सगळे वगैरे एकत्र काम केलंय. आता स. का. पाटील कुठेयत, बोरकर कुठेयत आणि माझी अवस्था काय आहे'. ते एक उदाहरण झालं. आणि लहानपणापासून रेडियोवर मी 'गांधीवंदना' हा कार्यक्रम ऐकतोय. काय होतं, अप्रत्यक्ष असा परिणाम होत असतो. कित्येक वर्षं ती 'गांधीवंदना' ऐकून ‘गांधी मला भेटला’, ती तयार झाली कविता. म्हणजे कित्येक वर्षं मी ते ऐकतोय. समाजात कायकाय बघत असतो वगैरे, म्हणजे माणसं, त्याच्यातून ती कविता स्फुरत जाते... म्हणूनच सांगितलं की, कवी हा मरतच असतो. आता ‘गांधी मला भेटला’मध्ये माझं मानसिक मरणच झालंय. राम पटवर्धन म्हणाले की, ‘या कवितेने माझा गिल्टी कॉन्शन्स जागा झाला.’'

त्यामुळं

१)'सामान्य माणसापेक्षा जास्तीचे' असे एक स्वातंत्र्य साहित्यिक घेऊ इच्छितात... २)'आमचे लेखन तुम्हाला कळंत नाही. आम्ही ते उलगडून सांगणार नाही. तुम्ही ते वाचा आणि आपला अर्थ लावा. पण तो चुकीचा आहे हे मी सांगणार.

ही आपल्या लेखातली वाक्यं गुर्जरांच्या संदर्भात तरी लागू होतील असं वाटत नाही. ही दोनच वाक्यं एवढ्याच साठी नोंदवली, कारण गुर्जरांची कविता (ही माझ्या मते) सामान्यातल्या अतिसामान्य स्थानावरून लिहिलेली आहे. आणि ती घेतलेली पोझ नसून खरोखरच मनापासून तिथून काय दिसतंय ते गुर्जरांनी व्यक्त करायचा प्रयत्न केलाय फक्त (या कवितेत आणि एकूणसुद्धा त्यांच्या कवितांमधून). दुसरं वाक्यही मला तितकंसं कळलं नाही. मुद्दाम गर्विष्ठपणे कोण काय म्हणत असेल, त्यांचं माहीत नाही, पण एखाद्याला स्वतःच्या लेखनाचा अर्थ समजावून सांगणं जमत नसेल, तर तेवढी सूट नाही का त्याला? सर्जनशील लेखनाचा असा अर्थ त्या लेखकालाच सगळा समजलेला असेल असंही नाही. कदाचित दुसऱ्याच कोणाकडून त्याला जास्त काही कळेल त्याच्या लेखनाबद्दल अशीही शक्यता असू शकते. मग त्याला त्याच्या लेखनाबद्दल बोलताच यावं, असं का समजायचं? वृत्तीतही फरक असू शकतो. एखादा लेखक/कवी बोलू शकत असेल नीट स्वतःच्या लेखनाबद्दल, एखाद्याला जमणार नाहीही. हे एक जनरल माणसाचा स्वभाव-वृत्ती एवढंच म्हणून घ्यायला काय हरकत आहे?

गुर्जरांच्या समर्थनार्थ कोण काय बोललं, त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणं मला शक्य नाही. तरी, ''एखादी कविता कळण्यासाठी आय.क्यू, अमुक इतका पाहिजे, किंवा अमुक कविता कळायची असेल तर अमुक तमुक पायजे'' अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी वाचनात आल्या होत्या तेव्हा कंटाळा आला. तुम्हीही बहुधा अशा प्रतिक्रियांबद्दल म्हणत असाल, असं वाटतं. पण तशा प्रतिक्रियांवरून कवीबद्दल काहीच सिद्ध होत नाही. प्रतिक्रिया देणारे स्वतःबद्दल कायतरी सिद्ध करत असतील, त्यांना करू देत ना. आय.क्यू.वरून कविता कळली, तर पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीत मेन्सा क्लबवाले कवितेचा किती महान आस्वाद घेत असतील लोक! तर, या प्रतिक्रिया का दिल्या जातात हे कदाचित माणसाच्या स्वभावाशीच कायतरी संबंधित असेल, पण ते इथं गुर्जरांच्या संदर्भात अंधुकही वापरणं त्यांच्यावर अन्यायकारक आहे, असं वाटतं.

दुसरं, गांधींचं चित्र आपल्या चलनी नोटेवरही असतं, एवढे ते जवळचे, रोजचे, सगळीकडचे झाल्यासारखे वाटतात. ते म्हणजे त्यांची प्रतिमा. मग तिचा वापर तर आणखी कितीतरी पद्धतीनं सर्जनशील साहित्यात होऊ शकेल! चलनी नोट कुठं कुठं जाते, कोण कोण तिला कुठं कुठं कसं हाताळतं, हे सगळं नुसतं पाहिलं, तरी मग गांधींच्या प्रतिमेला सर्जनशील साहित्यात किती किती वापरता येईल! आणि मग त्यांचा इतिहास, आदर याचे अर्थ किती काय काय निघतील! - अशा वेगवेगळ्या अर्थांना जागा देण्याचं काम सर्जनशील साहित्यात होत असेल, असं वाटतं. त्यामुळं साहित्यिकांना काही जादा अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याचा मुद्दा नाही, हे अर्थ निघायला पायजेत किंवा नाही, हे महत्त्वाचं आहे, असं वाटतं. त्यात मग ''क्षुद्र, धूर्त'' अशा कोणाच्या हातात कोलीत मिळेल किंवा काय होईल, ते पुन्हा वरच्या आय.क्यू.सारखंच आहे, बोलणारे तसंच बोलतील, त्यावरून आपण कशाला कवितेबद्दल, किंवा सर्जनशील साहित्याबद्दल मत बनवायचं! मग तसं खोलात गेलं तर भाषा हेच केवढं कोलीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी प्रांजळ आणि नेमकी प्रतिक्रिया आहे. सहमती नोंदवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१००% सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख पुन्हा शांतपणे वाचला. अजूनही नीटसा आकळलेला नाही.

मी 'कविता गांधींचा अपमान करणारी आहे का? हा एक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुसरा असे दोन स्वतंत्र मुद्दे तपासणार आहे. तेव्हा या दोन मुद्द्यांना एकच मानण्याची गल्लत कृपया करू नये. या पैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर फारच सापेक्ष आहे तेव्हा ते देण्याचा मी प्रयत्नही करणार नाही.

दुर्दैवाने हाच मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे आणि या लेखात त्यावर फारसे भाष्य नाही.
पहिला प्रश्न सापेक्ष आहे म्हणूनच मतांतरे आहेत. अश्यावेळी जर वाद कोर्टात गेला तर तर हे केवळ सापेक्ष आहे इतके सांगणे पुरेसे ठरू नये. जर ही कविता गांधींचा अपमान करणारी आहे किंवा नाही असे काहीही म्हटले तर त्यामागचा ठोस तर्क, एखाद्या कलाकृतीला अपमानकारण म्हणण्याचे निकष वगैरेवर बोलणे अगत्याचे ठेरते.

लेखात उपस्थित केलेले विषय या मुळ प्रश्नाचे उपप्रश्न आहे. त्यांच्या उत्तरांनी या प्रश्नाजवळ जाता येते पण मुळ प्रश्नाला हात घातला जात नाही.

त्यामुळे लेख अपूर्ण वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२० वर्षं हा खटला लढवणारे कवितेचे प्रकाशक देवीदास तुळजापूरकर ह्यांचा 'अश्लीलतेची पुन्हा व्याख्या करा!' हा लेख कालच्या म.टा.मध्ये प्रकाशित झाला आहे. प्रत्यक्ष खटल्यात काय युक्तिवाद केले गेले हे त्यात सांगितलं आहे. प्रस्तुत लेखाच्या संदर्भात ते पाहता येईल. उदा. कलाकृतीतली अश्लीलता तपासण्यासाठी सध्याच्या कायद्यान्वये समाजमान्यतेच्या मानदंडाचा (community standard) जो निकष लावला जातो, त्याविषयी त्यात भाष्य आहे -

यासंदर्भात बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी ९ एप्रिल १९६२ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने आयोजित केलेल्या 'अश्लिलता' या विषयावरील परिसंवादात केलेले प्रतिपादन खूप बोलके आहे. ते म्हणतात- '...न्यायाधीश कितीही प्रामाणिक असले, तरी ती माणसेच आहेत. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि मूल्ये कळतनकळत त्यांच्या निर्णयात प्रतिबिंबित होणे स्वाभाविक आहे. सर आयव्हर जेनिंग्जने म्हटल्याप्रमाणे, (A judge's mind is not a legal slot machine) न्यायाधीशाची नोकरीच अशी आहे की त्याला समाजात मोकळेपणाने वावरता येत नाही. लोकांत मिसळून लोकमनाचा अंदाज घेणे त्यांना शक्य नसते. म्हणून समाजापासून सर्वसामान्यतः अलिप्त असणाऱ्या आणि कित्येकदा साहित्याशी सूतराम संबंध नसणाऱ्या न्यायाधीशांवर समाजाने काय वाचावे आणि लेखकांनी काय लिहावे, हे ठरवण्याची जबाबदारी टाकणे अयोग्य आहे. यात लेखनस्वातंत्र्याला तर धोका आहेच, परंतु कायद्याच्या प्रतिष्ठेलाही बाध येण्याचा संभव आहे.'

म्हणजे इथे केवळ साहित्यिक किंवा समाजाला जबाबदार न ठरवता न्यायाधीशांच्या मर्यादांविषयीही काही म्हटलं आहे. इतकंच नाही, तर -

व्यक्तिस्वातंत्र्य आणि लेखनस्वातंत्र्य यांच्या संदर्भातच अश्लीलतेच्या खटल्यांचा निर्णय केला पाहिजे. 'प्रेस ऑब्जेक्शनल अॅक्ट' या कायद्याने आरोपीस दिलेल्या हक्काप्रमाणे अश्लीलतेच्या सर्व खटल्यांत साहित्यिकांचा ज्युरी मागण्याचा हक्क लेखकास मिळाला पाहिजे आणि ज्युरींचा निर्णय न्यायाधीशावर बंधनकारक असला पाहिजे. प्रातिनिधिक साहित्यसंस्थेतर्फे अशी ज्युरींची एक यादी न्यायालयांकडे पाठवावी आणि या यादीतून ज्युरीची निवड व्हावी. म्हणजेच या कायद्यात शाश्वती निर्माण होईल. असे झाले नाही तर डी. एच. लॉरेन्सने म्हटल्याप्रमाणे उद्याचे अभिजात वाङ्मय आज अश्लील ठरवणे एवढेच कायद्याचे कार्य होईल!' या संदर्भासह आज अश्लीलतेची नव्याने व्याख्या होण्याची आवश्यकता आहे.

म्हणजे साहित्यिकांचा अशा खटल्यातला सहभाग आणि त्यांची जबाबदारी आवश्यक आहे असंच त्यात म्हटलं आहे. प्रस्तुत धाग्यातल्या साहित्यिकांच्या 'होलिअर दॅन दाऊ' वगैरे असण्याच्या मुद्द्यासंदर्भात मला हे महत्त्वाचं वाटलं.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे -

अॅड. गोपाल सुब्रमण्यम यांनी आपला युक्तिवाद मांडताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता, तो (Right to Offend) धक्का देण्याच्या स्वातंत्र्याचा. समाज घडला-बदलला तो समाजमनाला दिलेल्या धक्क्यामुळेच. पृथ्वी गोल आहे की चौकोनी, पृथ्वी स्वतःभोवती फिरते की सूर्याभोवती, इथपासून ते ईश्वराच्या अस्तित्वापर्यंत विविध प्रश्नांवर समाजपुरुषांनी तत्कालीन समाजमनाला धक्के दिले आहेत. ज्यासाठी या सर्वच समाजपुरुषांना जबर किंमत मोजावी लागली आहे. तीच आज आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाजातील समाजपुरुषांना मोजावी लागणार का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||