पिढ्यामधल्या धार्मिकतेतील बदल - कौलाचं विश्लेषण
भारतीय समाजाची मनोवृत्ती ही कायमच धार्मिक राहिलेली आहे. निरनिराळ्या रुढी, परंपरा आजही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडल्या जातात. त्यात अनेक कर्मकांडांचा समावेश आहे. सण साजरे करणं, दिवाळीसारख्या उत्सवात जल्लोष करणं, गणपती बसवणं, दुर्गापूजा करणं या अनेक सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना धार्मिक, पौराणिक कथांचा आधार आहे. वैयक्तिक पातळीवरदेखील बारसं, मुंज, लग्न, मरण, तेरावं, श्राद्ध यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीदेखील धार्मिक संस्कार करून त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होतो. यापलिकडे हरताळकेसारखं व्रतं, वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावांनी बोलले जाणारे नवस, चालणारे उपासतापास या सगळ्यांतूनही 'अमुक देवाला साकडं घातलं, तपश्चर्या केली की माझं भलं होईल' असा दृढ विश्वास आणि श्रद्धा दिसून येते. गेली शेकडो वर्षं या ना त्या प्रकाराने हे सर्व कमी अधिक प्रमाणात चालू आहे. या सर्व परंपरा, रुढी हे भारतीय समाजमनाचं एक मोठं अंग आहे.
या सामाजिक रुढीपरंपरांबरोबच वैयक्तिक धार्मिक स्वभाव, श्रद्धा, देवाची उपासना करण्याची मानसिक ओढ किंवा गरज हाही एक सहज न दिसणारा भाग आहे. नियमाने पूजा करणं, देवळात जाणं, मुलांवर विशिष्ट संस्कार करताना देवाचं नाव घेणं या स्वरूपात तो स्वभाव घराघरातून दिसतो. पावित्र्याची कल्पना, पापपुण्याची कल्पना, आपल्याला सद्गती मिळण्याची इच्छा ही त्यामागे असते. तसंच आपल्या हलाखीच्या परिस्थितीपुढे येणारी हतबलता आणि त्यातून देवाला, सर्वोच्च शक्तीला शरण जाऊन 'तूच माझं रक्षण कर रे बाबा' म्हणण्याची गरजही कारणीभूत आहे.
थोडक्यात, आपल्याला दिसणाऱ्या धार्मिकतेची ही दोन अंगं आहेत - एक सामाजिक, सार्वजनिक तर दुसरी वैयक्तिक. वैयक्तिक धार्मिकता जिथे अधिक आहे तिथेच सामाजिक, जाहीर स्वरूपात ती दिसणार हे 'यत्र वह्निस्तत्र धूम्रः' या न्यायाने उघड आहे. मात्र सध्या भारतात सामूहिक धार्मिकतेला उधाण आलेलं दिसतं. शहराशहरांतून प्रत्येक उत्सव धूमधडाक्याने डॉल्बी भिंतींसकट साजरा होतो. गोविंदाच्या हंड्यांसाठीचे थर दरवर्षी वाढताना दिसतात. महाराष्ट्रीय सण कमी पडले की काय म्हणून दांड्यारास, कडवाचौथ वगैरे इतर राज्यांमधले सणही साजरे होताना दिसतात. हे जे चित्र दिसतं त्यामागे नक्की काय कारण आहे? गेल्या वीसपंचवीस वर्षांत अचानक धार्मिक मानसिकता वाढलेली आहे का, की जेणेकरून आग वाढली त्यामुळे आगीतून येणारा धूरही वाढला? की यामागे इतर कारणं आहेत? हे तपासण्यासाठी मी १२ सप्टेंबर २०१५ ला एक सर्वेक्षण घेतलं. त्यात लोकांना विचारलेला प्रश्न असा
"तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते?" ते उत्तर देण्यासाठी १. बरेच धार्मिक २. मध्यम धार्मिक आणि ३. कमी धार्मिक असे तीन गट केले. व स्वतः व आईवडील कुठल्या गटांत बसतात ते सांगायला सांगितलं.
सर्वप्रथम सर्वेक्षणाच्या मर्यादेविषयी. हे सर्वेक्षण मी 'ऐसीअक्षरे.कॉम' आणि 'मिसळपाव.कॉम' या दोन मराठी संस्थळांवर घेतलं होतं. या संस्थळांवर वावरणारे लोक हे संपूर्ण भारतीय समाजाचे प्रतिनिधी नव्हेत. किंबहुना सुशिक्षित/उच्चशिक्षित, खाऊनपिऊन सुखी, कॉंप्युटर व इंटरनेट मध्ये प्रवीण, बुद्धिजीवी असा मर्यादित लोकगट आहे. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, किंवा झोपडपट्टीत राहाणाऱ्या व्यक्ती, अशिक्षित अर्धशिक्षित कामगारवर्ग असा मोठा समूह त्यातून वगळलेला आहे. त्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष त्या गटापुरतेच लागू आहेत. हे जरी खरं असलं तरी या गटातल्या लोकांचं या सर्वेक्षणातून निर्माण होणारं चित्र डोळे उघडणारं आहे.
एकूण ४९ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. 'ऐसीअक्षरे.कॉम' वरून ३८, तर 'मिसळपाव.कॉम' वरून ११. हे आकडे कमी असले तरी दोन वेगवेगळ्या संस्थळांवर मिळणारे निष्कर्ष हे बऱ्यापैकी मिळतेजुळते आहेत. त्यावरून प्राथमिकदृष्ट्या विश्वासार्ह असावेत अशी मला आशा आहे. या एकोणपन्नास लोकांनी 'आईवडील १ मी २' या स्वरूपाची उत्तरं दिली. याचा अर्थ आईवडील बरेच धार्मिक, तर मी मध्यम धार्मिक. पिढीमधला बदल मोजण्यासाठी मी या आकड्यांची वजाबाकी केली. २-१ = १ याचा अर्थ या घरासाठी या पिढीत धार्मिकता थोडी कमी आहे. जर उत्तर 'आईवडील १ मी ३' असं असतं तर ३-१ = २ याचा अर्था घरासाठी या पिढीत धार्मिकता बरीच कमी आहे. जर या वजाबाक्या ऋण असत्या म्हणजे -१ किंवा -२ असत्या तर या पिढीत धार्मिकता थोडी जास्त किंवा बरीच जास्त असं म्हणता येईल. मुख्य हेतू विशिष्ट गटात कुठल्या पिढीत किती लोक आहेत हे तपासण्यापेक्षा प्रत्येक घरात होणारा असा बदल, किती प्रमाणात, किती घरांत दिसतो हे तपासून पाहाण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आलेख खाली दिलेला आहे.
सर्वात प्रथम हे दिसून येतं की 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच कमी धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण सुमारे ७१ टक्के आहे. याउलट 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच अधिक धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण फक्त ६ टक्के आहे. त्यातही ज्यांनी 'आईवडिलांइतकेच धार्मिक' असं म्हटलेलं आहे त्यातल्या सुमारे निम्म्यांनी 'आईवडिल नास्तिक, आम्हीही नास्तिकच' असं म्हटलं आहे. म्हणजे सर्वेक्षणात भाग घेणारे सुमारे ८५% लोक हे स्वतः नास्तिक किंवा आईवडिलांपेक्षा कमी धार्मिक आहेत. हा फारच प्रचंड मोठा आकडा आहे. स्वतःला अत्यंत कमी धार्मिक किंवा नास्तिक म्हणवणारांची संख्याही प्रतिसादांमधून जाणवते - हा आकडा सुमारे ८०% आहे.
कुठल्याही पद्धतीने बघितलं तरी या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष दिसून येतात. सर्वेक्षणात भाग घेणारांमध्ये -
१. बहुतांश नास्तिक किंवा रोजच्या जीवनात धर्माला कमी महत्त्व देणारे आहेत
२. फार मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आईवडलांपेक्षा मुलं कमी धार्मिक आहेत.
३. आईवडलांपेक्षा अधिक धार्मिक असणारांची संख्या नगण्य - सुमारे ६ टक्के आहे.
हे सर्व एकत्रितपणे पाहिलं तर आपल्याला अचंबा वाटणारं चित्र निर्माण झालेलं दिसतं. बाहेर भारतीय समाजात धर्माचे सोहळे वाढलेले दिसतात, मात्र या गटात वैयक्तिक पातळीवर धर्माचं महत्त्व कमी झालेलं आहे. धूर बराच वाढलेला दिसतो, पण जवळ जाऊन बघावं तर काही ठिकाणी तरी आग कमी झालेली, विझत आलेली दिसते. मग या सगळ्याचा अर्थ कसा लावावा? एक शक्यता अशी आहे की या सर्वेक्षणाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे त्याचे निष्कर्ष सरसकटपणे सर्व समाजाला लागू पडत नाहीत. या मर्यादा आपण जरा खोलात जाऊन तपासून पाहू.
१. हे सर्वेक्षण एका अत्यंत लहान गटाचं आहे - ही सर्वात गंभीर मर्यादा आहे आणि सुरूवातीलाच ती मान्य केलेली आहे. मात्र हा गट नक्की किती लहान आहे याचा आपण अंदाज घेऊन पाहू. हा गट आहे सुशिक्षित, इंटरनेटमध्ये प्रवीण, खाऊनपिऊन सुखी, मुख्यत्वे शहरांत राहाणारांचा, आणि मुख्य म्हणजे तरुण म्हणता यावं अशा लोकांचा. आता भारतात सध्या ७५ टक्क्यांच्या आसपास साक्षरता आहे. पण तरुणांमध्ये हे साक्षरतेचं प्रमाण बरंच जास्त आहे - २०१५ सालची आकडेवारी पाहिली तर ९०%. म्हणजे गेली पिढी सुमारे ५०% साक्षर आणि आजची पिढी सुमारे ८५-९०% साक्षर - अशा गोळाबेरजेतून हा आकडा येतो. उच्च शिक्षणाबाबत तर गेल्या पिढीत आणि आजच्या पिढीत फारच तफावत आहे. एकंदरीत भारतात सुमारे २० ते २५% लोक कॉलेज पूर्ण केलेले असावेत. त्यातले बहुतांश आजच्या पिढीत. तेव्हा सुशिक्षितांचा आकडा सुमारे २५%चा येतो. हेच बहुतांशी खाऊनपिऊन सुखी गटात आहेत. आणि यांच लोकांकडे कॉंप्युटर प्रावीण्य आहे. तेव्हा सर्वेक्षणात दिसणारा गट लहान असला तरी तो सुमारे २०% लोकांचा बनलेला आहे. आणि हे सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिकदृष्ट्या वरच्या २० टक्क्यातले आहेत. त्यांचा आदर्श इतर करतात, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आत्ता लहान स्वरूपात दिसणारे परिणाम हे जसजसा काळ जाईल तसतसे मोठ्या मोठ्या गटात दिसून येतील.
२. कदाचित या गटातही धार्मिक लोक असतील, पण त्यांनी मतं नोंदवली नाहीत - हेही शक्य आहे. त्यामुळे दिसणारे आकडे एवढे मोठे राहाणार नाहीत. मात्र असा प्रश्न उद्भवतो, की अशांनी मतं का नोंदवली नाहीत? जाहीर फोरमवर आपण कमी धार्मिक आहोत हे सांगायला लोकांना कमी लाज वाटते, तर अधिक धार्मिक आहोत हे सांगायला लाज वाटते का? तसं असेल तर तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. या सुशिक्षित समाजात राहायचं असलं तर धार्मिकतेचा बडिवार कमी व्हायला हवा अशी सार्वत्रिक अपेक्षा त्यातून दिसून येते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी 'आमच्या घरात पवित्रता जपण्याचे हे धार्मिक नियम आहेत' असं जेवढ्या ठासून सांगितलं जायचं तितकं आज त्या गटात सांगितलं जात नाही. पावित्र्य या कल्पनेची जागा स्वच्छता, सर्वसमावेशकता यांनी हळूहळू घेतली आहे की काय, असा प्रश्न पडतो.
३. सर्वेक्षणात भाग घेणारांची संख्या लहान आहे - जितके जास्त लोक भाग घेतील तितकं स्टॅटिस्टिक्स सुधारतं हे खरं असलं तरी ४९ हा आकडा अगदी लहान नाही. ५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल काय येतील हे ठरवण्यासाठी सुमारे एक लाख लोकांचं सर्वेक्षण घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी फक्त २०० लोक. त्यातही या सर्व्हेचे दोन भाग दोन संस्थळांवर घेतले गेले. त्यांच्यात सर्वसाधारणपणे सारखीच आकडेवारी दिसली. त्यामुळे अशा अनेक संस्थळांवर कौल घेतला तरीही साधारण हीच आकडेवारी मिळेल याची शक्यता जास्त आहे.
यामागची कारणं काय असावीत?
१. शिक्षण - ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना सिव्हिल सर्व्हिससाठी शिक्षण द्यायला सुरूवात केली तेव्हा ते शिक्षण घेणाऱ्या वर्गाला बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळायला लागलं. लोकशाही, स्वायत्तता, नागरिकांचे अधिकार, राज्यपद्धती या गोष्टींबद्दल जागरुकता आली. त्यातून एक वैचारिक उत्थान झालं, आणि स्वातंत्र्यचळवळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तेच काहीसं मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर झालेलं आहे. त्याकाळी साक्षरतेचंच प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास होतं. उच्चशिक्षित मोजकेच. आताच्या पिढीत साक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि उच्चशिक्षितांचं प्रमाणही मोठं आहे. शिक्षणातून विज्ञानाची माहिती होते. पृथ्वी कशी जन्मली, तिचं या विश्वातलं स्थान काय, ती गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती कशी फिरते, या व अशा गोष्टींसाठी सोपी वैज्ञानिक स्पष्टिकरणं मिळतात. मग जगात असलेल्या गूढांची संख्या कमी होते. या गूढांचं उत्तर देण्यासाठी गरज असलेल्या 'अत्त्युच्च शक्ती'चं महत्त्व कमी होतं. शिक्षणामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे धार्मिकतेची गरज, विशेषतः कर्मकांडांची गरज कमी होते. हे भारतातच नाही तर इतरत्रही दिसून आलेलं आहे. गॅलप संस्थेने घेतलेल्या सर्व्हेमध्ये जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं तसतसं देवावरचा विश्वास, धर्माचं महत्त्व आणि धर्मातून जगाच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यावरचा विश्वास कमीकमी होताना दिसतो.
२. आरोग्य - एके काळी भरमसाठ मुलं व्हायची आणि त्यातली बरीच अकाली मरायची. रोगराईच्या साथी यायच्या आणि धट्टीकट्टी कर्तबगार माणसं, हाताशी येणारी तरुण मुलं त्यात जायची. सदासर्वकाळ दुष्काळांतून पिचत पिचत, अर्धपोटी जगणं हे नेहेमीचं होतं. अशा दीन प्रसंगी देवाचा धावा करण्याची गरज न पडली तरच आश्चर्य. मात्र आता हे चित्र थोडं बदललेलं आहे. सहासात मुलं होण्याऐवजी दोनतीनच मुलं होतात. आणि ती जगतात. त्यासाठी तुटपुंज्या का होईना वैद्यकीय सुविधा आहेत. रोगराईच्या साथी म्हणजे देवाचे कोप वगैरे म्हणण्याची सोय नाही, कारण अनेक साथीच्या रोगांवर ताबा मिळालेला आहे. लोकांचं आयुर्मान वाढलेलं आहे. त्यासाठी देवाकडे धावा करणं किंवा पावित्र्य राखण्यापेक्षा स्वच्छता, ठीकठाक अन्न आणि वैद्यकीय मदत यावर अवलंबून राहाण्याकडे लोकांचा कल राहिलेला आहे. आणि या बदलाचे परिणाम दिसताहेत. म्हणून सुधारलेलं सामाजिक आरोग्य हे धार्मिकतेत घट येण्याचं एक अप्रत्यक्ष कारण आहे.
३. सुबत्ता - दरिद्री माणसाच्या आयुष्यात येणारी दुःखं निवारण्यासाठी लागणारा पैसा नसतो. त्यामुळे मुलाचं ऑपरेशन करता येत नाही, धनदांडग्यांची दडपशाही सहन करावी लागते. दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर माणसाला हतबल करतं. आणि अशा गांजलेल्या व्यक्तीला देवाचा सहारा घ्यावासा वाटला तर काय नवल? दुर्दैवाने दारिद्र्य आणि अशिक्षितता हे हातात हात घालून जातं. त्यामुळे हे प्रश्न अधिकच बिकट होतात. गॅलपने घेतलेल्या मोठ्या सर्वेक्षणातही http://www.gallup.com/poll/142727/religiosity-highest-world-poorest-nati... हेच दिसून आलेलं आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या गरीब देशांमध्ये ९० टक्क्यांवर लोक 'धर्म महत्त्वाचा आहे' असं सांगताना दिसतात. याउलट स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, फ्रान्स, जपान वगैरे श्रीमंत देशांत फक्त १७ ते ४० टक्के लोक या प्रश्नाला हो असं उत्तर देतात.
४. जागतिकीकरण - जागतिकीकरणाचा फायदा सुशिक्षित, समृद्ध वर्गाला मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे. भारताबाहेरचं जग प्रत्यक्ष बघून येणं या गटाला परवडू लागलेलं आहे, आणि नवीन संधीही उपलब्ध झालेल्या आहेत. इंटरनेटमुळे सगळं जगच हाताशी आलेलं आहे. यातून काही ना काही प्रमाणात या वर्गाचा परीघ विस्तारलेला आहे. जुनं उगाच जपत बसण्यापलिकडे नवीन, स्वतःला पटेल असं शोधण्याची प्रवृत्ती आणि संधीही वाढलेली आहे. त्यामुळे 'हरतालिका व्रत मी का बरं करावं?' असा प्रश्न विचारण्याची कुवत येते. इतर देशांतल्या तरुणी काही असं व्रत करत नाहीत, पण त्यांचं ठीकठाक चालू आहे की - हे स्वतःच्या डोळ्याने पाहाता येतं. या संस्कृतीच्या सपाटीकरणातून आपल्या वागणुकीतले कंगोरे घासले जातात. हेही एक कारण या वर्गात देवधर्म कमी करण्यामागे आहे.
५. वाढलेल्या संधी - एके काळी जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं, मोबाइल नव्हतं त्यावेळी लोकांकडे मनोरंजनासाठी साधनं कमी होती. त्यावेळी समाजातल्या मंडळींना एकत्र आणणारं धर्म हे एक महत्त्वाचं सोशल नेटवर्क होतं. लग्न, मुंजी, सत्यनारायण यांसाठी लोक हमखास एकत्र यायचे. रोज देवळांत जाणं, तिथे मैत्रिणींना भेटणं हा अनेक स्त्रियांसाठी हक्काचा वेळ असायचा. कारण त्यापलिकडे फारसं काही करण्यासारखंच नव्हतं. आज अशी अनेक सोशल नेटवर्क्स तयार झालेली आहेत, आणि त्यांमध्ये व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या संधी आहेत. त्यातही आपली आवड-निवड जिथे मिळतीजुळती आहे तिथे जाण्याचं आणि इतरत्र न जाण्याचं स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यामुळे मी म्हणू शकतो की मी या फोटोग्राफीच्या ग्रुपवर जाऊन वेळ घालवेन. केवळ लोक भेटण्यासाठी मला भजनी मंडळात मारून मुटकून जाण्याची गरज नाही.
६. राजसत्ता-धर्मसत्ता चढाओढ - गेल्या साठेक वर्षांत जगाने लोकशाहीची प्रचंड वाढ होताना पाहिलेली आहे. त्यात एकाधिकारशाहीचा ऱ्हास होऊन विविध देशांत लोकशाहीची सुरूवात झालेली आहे. लोकशाहीत जनसामान्याला पटेल अशी सेक्युलर विचारसरणी स्वीकारणं आवश्यक ठरतं. त्यामुळे धर्मांतर्गत बाबी वैयक्तिक लोकांच्या हाती असल्या तरी शासकीय पातळीवर बऱ्यापैकी निधर्मी वागणूक दिसते. अभ्यासाची पुस्तकं लोकशाहीने ठरतात. त्यामुळे त्यातून एकाच धर्माचा संदेश देणं कमी होतं. हे कारण त्यामानाने गौण असावं असं वाटतं. मात्र गेल्या अनेक शतकांत धर्मसत्तेचा प्रभाव सर्वत्र जगभर कमी होताना दिसतो आहे हे मात्र खरं आहे.
७. विज्ञान/तंत्रज्ञानाचा प्रसार - गेल्या पिढीने ज्याची कल्पनाही केली नाही अशी इंटरनेट, कॉंप्युटर आणि मोबाइलसारखी यंत्रं आजच्या पिढीला सहज वापरता येतात. माहितीच्या विस्फोटामुळे टेस्ट ट्यूब बेबी, क्लोनिंग वगैरे शोधांची माहिती चटकन कळते, पसरते. जीवनिर्मितीसाठी देवाची गरज नाही यावर अधिक लोकांचा विश्वास बसतो. त्याहीपलिकडे 'आपलं आयुष्य आपल्या हाती आहे, आणि ते हाताळण्यासाठी नवीन आयुधं आहेत' यातून एक जगण्याविषयी आत्मविश्वास येतो. हा आत्मविश्वासही अप्रत्यक्षपणे देवाधर्माचं महत्त्व आयुष्यातून कमी होण्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत असावा.
८. शहरीकरण - विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतात मोठ्या शहरांच्या वाढीमुळे शिवाशीव, अस्पृश्यता हे प्रश्न शहरांपुरते गौण झाले. ट्रेनमध्ये बसताना आपल्या मांडीला मांडी लावून कोण बसला असेल हे सांगता येत नाही. हॉटेलात, रस्त्यावर खाताना ते अन्न कोणी बनवलं आहे याचा हिशोब ठेवता येत नाही. ऑफिसात कोण आपल्याबरोबर काम करतं आहे यावर फार ताबा ठेवता येत नाही. आर्थिक प्रगती साधायची तर ही बंधनं सोडून द्यावी लागली. आणि बहुतांशांनी थोड्या थोड्या तडजोडी करत ती सोडून दिली. याच शहरीकरणातून वैयक्तिक धर्माची उठबस कमी होते. कारण एके काळी प्रत्येक समाज जवळजवळ राहात असे, तसं आता इथे होत नाही. त्यामुळे वैयक्तिक कर्मकांडंही चार भिंतींच्या अजूनच आत गेली.
ही सर्वच कारणं सारखीच महत्त्वाची आहेत असं नाही. मात्र गेल्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक आरोग्यवान, समृद्ध, सुशिक्षित आहे हे नाकारता येत नाही. तिला असलेल्या नेटवर्किंगच्या संधी वाढलेल्या आहेत, जगाची तिला जास्त ओळख आहे. हातात इंटरनेट-मोबाइलसारखी आयुधं आहेत. कुठचीही माहिती मिळवायची असेल तर तिला ती चुटकीसरशी मिळू शकते. त्यामुळे कोणीतरी सांगितलेलं ऐकून घेण्यापेक्षा तिला स्वतः तपासून बघणं अधिक रुचतं. 'बाबावाक्यं प्रमाणं' हे मानायला ती तयार नाही. आणि जर शब्दप्रामाण्यावरचा विश्वास कमी झाला, तर धार्मिकता कमी होणं साहजिकच आहे.
या सर्वामुळे या सर्वेक्षणातून दिसणारे आकडे अचूक नसले तरी चित्र साधारण बरोबर आहे असं म्हणता येतं.
परिणाम
इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात धार्मिकता कमी झालेलीच आहे. अमेरिकेत नव्वदीच्या दशकाआधी फक्त चार टक्के लोक म्हणत 'मी निधर्मी आहे' - आता २३ टक्के लोक ते म्हणतात. इंग्लंडमध्ये चर्चमध्ये जाणारी लोकसंख्या वेगाने कमी होत जाते आहे, आणि तिचं सरासरी वय दरवर्षी वाढतंच आहे. याचा अर्थ चर्चमध्ये जाणारी वयस्क पिढी संपत चाललेली आहे, आणि तरुण लोक तिथे जात नाहीत. वरची कारणं तिथेही लागू आहेत. किंबहुना या प्रगत देशांमध्ये ती आधीपासून लागू आहेत म्हणून तिचा परिणाम आत्ताच दिसायला लागला आहे. भारतात हा परिणाम कधी दिसेल? मुळात दिसेल का? हा परिणाम काही काळाने भारतातही दिसू लागेल याबाबत मला बिलकुल शंका नाही. किंबहुना सुशिक्षित, समृद्ध वर्गात हे स्थित्यंतर दिसायला लागलं आहे हेच या सर्वेक्षणावरून सिद्ध होतं. किती वर्षं लागतील हाच खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देणं सोपं नाही. सर्वसाधारणपणे आपण बऱ्याच बाबतीत अमेरिकेच्या सुमारे पन्नास वर्षं मागे आहोत - तेव्हा अजून सुमारे पन्नास वर्षांनी अगदी स्पष्ट दिसायला लागेल एवढंच भोंगळ उत्तर देता येतं.
पुढच्या पाच ते दहा वर्षांचं काय? इथे खरी रोचक परिस्थिती निर्माण होते. आपण पाहिलं की ३० कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. त्याचा प्रसार अर्थातच वाढत जाणार आहे. चार वर्षांनी आत्ताच्या वयस्क पिढीतले चारेक कोटी लोक या जगात नसतील. हे अर्थातच मोठ्या प्रमाणावर अशिक्षित, गरीब - त्यामुळे जास्त धार्मिक. याउलट त्यांपेक्षा जास्त सुारे आठ ते दहा कोटी तरुण आपली नवी पिढी बनवतील. देशातलं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असेल. गेल्या काही वर्षांप्रमाणेच प्रगती होत राहिली तर समृद्धीचं प्रमाणही वाढलेलं असेल. अर्थातच आपला सध्याच्या सर्वेक्षणाचा जो सुमारे वीस टक्के वर्ग असेल तो वाढून पंचवीसेक टक्के झालेला असेल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर धार्मिक असणारांची मतदारांमधून पाचेक टक्के घट - आणि मोठ्या प्रमाणावर अधार्मिक असणारांची मतदारसंघात दहा टक्के वाढ झालेली असेल. हा सुमारे पंधरा टक्क्यांचा स्विंग असेल.
सध्याचं भाजपाचं सरकार हे धर्म आणि विकास या दोन्ही डगरींवर पाय ठेवून निवडून आलेलं आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नसून मारक आहेत. समृद्धी वाढली की धार्मिकता कमी होते. आणि विकास तर हवाच. आणि त्यासाठी हे सरकार निश्चितच कटिबद्ध राहील याची मला खात्री आहे. तसंही भारताने गेली दहा-पंधरा वर्षं सुमारे ७ टक्के विकासदर ठेवलेला आहे. तो किंचित वाढेल किंवा तेवढातरी निश्चित राहील. तोपर्यंत आपला समृद्ध, सुशिक्षित वर्ग पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढलेला असेल. आणि अशिक्षित धार्मिक वर्ग कमी झालेला असेल. या निवडणुकीत विकासाचं आवाहन आणि धार्मिकतेवरचा भर यांचा जो समतोल साधला होता, त्यापेक्षा अधिक झुकतं पारडं विकासाला पुढच्या निवडणुकीत द्यावं लागेल.
मला वाटतं हे चित्र मला दिसतं त्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने भाजपाला दिसत असावं. 'विज्ञानावर आधारित नसलेल्या हिंदू परंपरा त्यागायला हव्या' या अर्थाचं जे विधान मोहन भागवतांनी केलं त्यामागे हीच जाणीव असावी.
सार्वजनिक धर्मात मेजोरिटेरियन
सार्वजनिक धर्मात मेजोरिटेरियन कम्यूनालिझमचा बराच वाटा आहे.
रस्ते अडवून उत्सव साजरे करण्यास ज्यावेळी विरोध होई तेव्हा महंमद अली रोडवरच्या शुक्रवारच्या नमाजाचा दाखला तोंडावर मारला जाई. ठाण्याच्या टेम्बी नाक्यावर चालणारा नवरात्रोत्सव ही याची निशाणी आहे. बाबरी आंदोलनाच्या आधीच्या काळात हिंदूंनी (सेक्युलर भारतात होणारे) व्हिक्टिमहूड क्लेम करण्यासाठी या शुक्रवारच्या नमाजाचा उपयोग केला. बाबरी काळात त्या व्हिक्टिमहूडचा उपयोग करून शिवसेनेने उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली.
ऐसी किंवा मिपावर दनदणाट करणारे उत्सव हवेत असं म्हणणारे लोक दिसणार नाहीत. ते लोक वेगळे.
सार्वजनिक धर्माशी धार्मिकतेचा काहीही संबंध नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत
सार्वजनिक धर्माशी धार्मिकतेचा काहीही संबंध नाही.
१०० टक्के सहमत.
सार्वजनिक उत्सव साजरे करणारे, धार्मिक असतीलच असे नाही. पैसा गोळा करणे, एरवी दुर्लक्षित समाजाला, या निमित्ताने उच्च समाजावर दादागिरी करता येणे, उर्जेचा निचरा करणे, त्यानिमित्ताने फुकटची दारु पिता येणे, पोरींची छेडछाड करता येणे, वगैरे कारणे या उत्सवी उन्मादामागे असतात.
तरुण पिढीला मोठ्या आवाजाचे इतके आकर्षण का आहे त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण व्हायला हवे.
असे सर्व्ह्रे, जेंव्हा एकूण समाजाच्या ८० टक्के लोक यांत भाग घेतील, तेंव्हाच विश्वसनीय होतील.
अजून पन्नासेक वर्षांनी भारतात
अजून पन्नासेक वर्षांनी भारतात धर्माचं, सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप काय असेल याबद्दल मला कुतूहल आहे.
बऱ्याच लोकांना 'कोणीतरी आहे, काहीतरी अद्भुत ताकद आहे आणि ते माझ्या पाठी आहेत' याची गरज असते. म्हणून नैष्कर्म्य येतं असं नाही पण अशा रूपात देव राहिल असा माझा अंदाज. दुसरं माणसांना ऊर्जेचं दमन करायचं असतं. कोणी मैदानी खेळ खेळतात, कोणी धावायला जातात, कोणी नृत्य करतात किंवा कोणी रस्त्यावर नाच करतात. भारतात सध्या आहे ती परिस्थिती पाहता धावणं, सायकल चालवणं, मैदानी खेळ यांच्यासाठी पन्नास वर्षांनंतरही सगळ्यांना पुरेशी जागा उपलब्ध असेलच असं नक्की म्हणता येत नाही. मग ऊर्जेचं दमन करण्यासाठी 'ही पोली साजुक तुपातली' म्हणत रस्त्यावर नाचणं हा एक पर्याय उपलब्ध आहे. दुसऱ्या बाजूने सार्वजनिक संकोच कमी होत चाललेले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, जगन्नाथाचा रथ ओढणं यांतून हे आधीपासूनच होतं, आता अधिक प्रमाणावर ते दिसतंय. लोक कितीही अधार्मिक किंवा सेक्यूलर किंवा नास्तिक झाले तरी बहुतेकांकडे ही अधिकची ऊर्जा असेलच. त्या ऊर्जेचं स्वरूप पुढे काय असेल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पन्नासेक वर्षांत सार्वजनिक
पन्नासेक वर्षांत सार्वजनिक उत्सवांचं स्वरूप काय असेल याचा अंदाज करण्यासाठी डेमोग्राफिक कसं बदललं असेल याचा अंदाज घ्यायला हवा.
१. आज जी २० टक्के सुशिक्षित, सधन, बुद्धीजीवी पिढी दिसते ती तोपर्यंत ७० टक्क्यांपर्यंत पोचली असेल.
२. भारतात सुमारे साठ टक्के कुटुंबाकडे गाड्या असतील. म्हणजे आत्ताच्या कोंदट शहरांचा कोंदटपणा कमी होऊन अमेरिकेत दिसणारा सबर्बन स्प्रॉल दिसायला लागलेला असेल. आत्ताच मुंबईतल्या चाळी नष्ट होत टॉवर तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे.
३. या ब्लॉक व्यवस्थेमुळे सार्वजनिकपणा कमी होतो, वैयक्तिकपणा वाढतो.
या सगळ्यामुळे मला असं वाटतं की मुंबईत आज जे दिसतं ते बदलून सध्या न्यूयॉर्कमध्ये जे दिसतं तसं दिसायला लागेल. म्हणजे सार्वजनिक उत्सव असतात, परेड्स असतात - पण ते विशिष्ट वेळात, विशिष्ट ठिकाणी आणि नियंत्रित स्वरूपात असतात.
वैयक्तिक उन्मादाचं स्वरूप - समाजाचं मोठ्या प्रमाणावर पांढरपेशीकरण झाल्यावर या सार्वजनिक उन्मादाची गरज कमी होते असं मला वाटतं. ऐसीवरचे किती लोक आपल्या ऊर्जेचं दमन करण्यासाठी गणपतीच्या मिरवणुकीत नाचतात? ज्यांना इच्छा असते ते स्वतःसाठी डान्सचे क्लास, बॉलिवूड एअरोबिक्स करून, जिममध्ये जाऊन ती भूक भागवतात. थोडक्यात रस्त्यांवर तो उन्माद सांडण्याऐवजी नियंत्रित स्वरूपात तो व्यक्त होईल असा माझा अंदाज आहे.
वैयक्तिक उन्मादाचं स्वरूप -
मुंबईत होणारी ही गुढीपाडव्याची बाइक रॅली यात अधिकांश पांढरपेशा वर्गातील च आहेत. या व्यतीरीक्त पुण्यात नव्याने तयार होणारे ढोल ताशांचे पथक ज्यात अनेक सॉफ्टवेअर इंजीनीयर्स इ. उच्च शिक्षीतांचा भरणा आहे. तुम्ही म्हणता तस झालय वा होइल अस तर वाटत नाही.
उलट पांढरपेशा वर्ग ही आता हिरीरीने रस्त्यावर उतरत आहे.
हम्म्म... तुम्ही म्हणता
हम्म्म... तुम्ही म्हणता त्यातही तथ्य आहे. भगव्या रंगाचं प्रदर्शन हे आजच्या राजकीय परिस्थितीचं निदर्शक आहे की त्यामागे काही सखोल धार्मिक उन्मादाची कारणं आहेत हे माहीत नाही मला. कदाचित काळच ठरवेल काय बरोबर ते. पाहू वीसेक वर्षं वाट.
चमकोगिरी
मला वाटतं या पाढरपेशांचं रस्त्यावार उतरणं हे धार्मिकतेपेक्षा चमकोगिरीसाठी जास्त असावं. यातले कितीजण पारायणं करीत असावित? कुळधर्म आचरीत असावित? नित्यनेमाने कुलदैवताला जात असावित? चारधाम करण्याचं स्वप्न उराशी बाळगुन असावित?
~ योगी
अगदी बरोबर बोलताय. ही एक
अगदी बरोबर बोलताय. ही एक फॅशन झालीय. धार्मिक नित्यनियम पाळणारे या असल्या दिखाउ धर्माचरणात कितपत सामिल असतात हा ही शोधाचा विषय आहे. ही माणसं चारधाम करतीलही पण ते ही केलं हे दाखवण्यासाठी. कुलदैवताला जात असतील नियमाने पण त्यात मी देवाच्या पायाशी जात आहे ह्या भावनेपेक्षा मी परंपरा कशी पाळतो/पाळते हे दाखवण्यासाठी.
कुलदैवतेची खरच भीती असते
कुलदैवतेची खरच भीती असते
समहाऊ आपल्या नाड्या तिच्या हातात असतातच + बरेचदा लहान देवांपैकी हे देव असतात (= कोपतात वगैरे)
.
आहे अंधश्रद्धा आहे पण सासू वगैरे कडून एक शिस्त/कर्तव्य म्हणून चालत येते.
आहे अंधश्रद्धा आहे पण सासू
स्वताच्या श्रद्धेला "अंध"श्रद्धा म्हणते आहेस शुचि म्हणजे ग्रेटच, नाहीतर नॉर्मली लोक दुसर्यांच्या श्रद्धांना "अंध"श्रद्धा म्हणतात.
नाही "कोपतात" ही अंधश्रद्धा
नाही "कोपतात" ही अंधश्रद्धा म्ह्हणतेय मी.
धूर
धूर जास्त जाणवण्याचं एक कारण माध्यमं हे असावं. जरी एकूण संख्या कमी झाली असली तर थोडक्यांकडे असलेली साधनं पुष्कळ 'लाऊड' आहेत. हा 'लाऊडनेस' खुपच स्वस्त अन सहज आज जितका उपलब्ध आहे तितका पुर्वी नव्हता. त्यामुळे राजकारण वगैरे फायद्यांकरता हे थोडकेही याचा उपयोग करून धूर भरपूर आहे असा आभास करण्यात यशस्वी झालेले आहेत. आग थंडावत चालली आहे या निष्कर्षाशी सहमत आहे.
-Nile
जरी एकूण संख्या कमी झाली असली
यातला लाउडनेस स्वस्त झाल्याचा मुद्दा पटतो. मात्र संख्या कमी झाल्याचं तितकं खरं नसावं. ७० च्या दशकात आमच्या चाळीत जो उत्सव साजरा व्हायचा तेव्हा गच्चीत प्रचंड आवाज करणारा कर्णा लावून पाच दिवस सकाळ संध्याकाळ गाणी लावण्याची पद्धत होती. तिथे राहाणाऱ्या लोकांची मुलं-नातवंडं आता या आर्थिक-सांस्कृतिक वरच्या २० टक्क्यात पोचलेली आहेत. त्यांना आनंद साजरा करण्यासाठी अनेक वैयक्तिक आउटलेट्स आहेत. त्यामुळे या सार्वजनिक गदारोळाचा आनंदापेक्षा त्रास जास्त होतो. मात्र त्याकाळी ज्या मोठ्या लोकसंख्येला असा उत्सव परवडत नसे, ती आता तो परवडण्याच्या पातळीपर्यंत पोचली आहे. त्यामुळे लाउडनेस वाढण्यामागे ही अधिक मोठी लोकसंख्या हेही कारण असू शकेल. डॉल्बीच्या भिंतींनी हा लाउडनेस एका साध्या कर्ण्यापेक्षा बराच जास्त होतो हेही तितकंच खरं.
संख्या
पुर्वीपासूनच उत्सव साजरा करणारी मंडळी मोठ्या संख्येत होतीच. पण त्यांचा लाऊडनेस मर्यादीत असल्याने त्याची झळ अनेकांना लागली नाही, आणि पर्यायाने ते लाऊड नसावेच असा समज होण्याची शक्यता आहे. एकूण लोकसंख्येच्य टक्केवारीच्या प्रमाणात घट झालेली असावी असे वाटते.
सार्वजनिक मंडळांची संख्या याचा शहरांनुसार अभ्यास करता येईल. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे त्या प्रमाणात सार्वजनिक मंडंळं वाढली आहेत का, हे पाहता येईल? सार्वजनिक मंडळं रजिस्टर्ड असतात असे वाटते (कॉलनी वगैरेचे सोडा), पण ही महिती सहज उपलब्ध आहे का माहित नाही.
-Nile
गणेशोत्सवाची परिस्थिती
गल्लीतलं चार पोरं जमवून चालू केलेलं मंडळ जरी असेल तरी जर रस्त्यावर/इमारतीच्या बाहेर मांडव वगैरे घालायचा असेल तर पोलिसांची, महानगरपालिकेची, एम.एस.ई.बीची, अग्निशमन दलाची वगैरे सुमारे ९-१० परवानग्या आजकाल घ्याव्या लागतात (हा माझा पुण्यातला अनुभव आहे. मुंबई, ठाणे वगैरे आणखी मोठ्या शहरांत काय परिस्थिती आहे माहित नाही). तुमचं मंडळ धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असल्याखेरीज यातली एकही परवानगी मिळत नाही. ही सगळी सव्यापसव्य करण्याकरिता पुणे महानगरपालिकेने पोलिस, विद्युत मंडळ वगैरेंच्या सहकार्याने गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना गेली काही वर्षं राबवलेली आहे. दररोज बीटवरचे मार्शल दिवसांतून ३ वेळा मांडवांत चक्कर मारून जातात आणि मांडवातील पोलिस रजिस्टरवर नोंद करून जातात. मांडवात अग्निशमन, सुरक्षा (२४ तास मंडळाचे १-२ कार्यकर्ते किंवा खाजगी सुरक्षारक्षक मांडवात असणं आवश्यक आहे) इ. विषयी नोंद त्या रजिस्टर मध्ये होते. पोलिसांनी दिलेलं हे रजिस्टर पुढल्या वर्षी (की त्याच वर्षी? आता आठवत नाही) गणेशोत्सवानंतर सबमिट करून काही गडबड नसल्याचे पोलिस प्रमाणपत्र घ्यावे लागते आणि पुढील वर्षी गणेशोत्सवाच्या परवानगीच्या अर्जासोबत जोडावे लागते. न घेतल्यास अथवा मांडवात काही गडबड झाल्यास मंडळाची परवानगी रद्द होऊ शकते. अशी परवानगी रद्द झालेली किमान ४ मंडळं मला माहित आहेत. रस्ते खणून मांडव घालणं बहुतांशी बंद झालेलं आहे, अन्यथा महानगरपालिका मंडळाकडून जबर दंड वसूल करू शकते.
असो. एक खरं की ही व्यवस्था पूर्णपणे काटेकोर नाही. पोलिसांचं लक्ष जास्तकरून सुरक्षा, दहशतवादी घटना टाळणे या दृष्टिकोनातून जास्त असतं. शिवाय काही ठिकाणी राजकीय हस्तक्षेप आहेच. आणिक एक महत्वाचं म्हणजे आवाजाच्या पातळीवर कोणतेही नियंत्रण नाही. १० वाजल्यानंतर पोलिस येऊन लाऊडस्पीकर बंद करून जातात, पण १०च्या आधीचा ढणढणाट सुखनैव चालू असतो.
नाइल जी एक विचारायच होत
तुमच म्हणण माध्यम म्हणजे तुम्हाला प्रचार प्रसार माध्यम असच म्हणायच आहे ना ? म्हणजे टीव्ही वगैरेतले न्युज चॅनेल्स सध्या दहिहंडी आली तर लगेच एक इव्हेंट म्हणुन फुगवतात या अर्थाने च ना ? आणि हे थोड्या लोकांच्या हातात असतात.
खालील घासकडवींच्या प्रतिसादाने तुम्ही फक्त ध्वनीक्षेपक आदि इतक्याच माध्यमां विषयी बोलताय अस वाटलं,
बरोबर
.
-Nile
लेखाची कल्पना आवडली. पण काही
लेखाची कल्पना आवडली. पण काही मर्यादाही उघड जाणवल्या.
- सर्वेक्षण गटाचा आकार. ही मर्यादा तुम्ही लेखात ढळढळीतपणे दोनदा मान्य केली आहे, हे खरंच. पण मान्य केल्यामुळे ती निघून जात नाही. या गटात तुम्ह म्हणता आहात त्याप्रमाणे शेतकरी, अल्पशिक्षित, कनिष्ठ आर्थिक गटातले लोक, खेड्यातले लोक यात नाहीत, हे तर आहेच. शिवाय यात जालावर बहुसंख्य प्रमाणात दिसणारे लोक - बराच पैसा असलेले आणि सोयीपुरता आणि अलीकडे सार्वजनिक आयुष्यात तीव्रतेनं देवधर्म वापरणारे - आलेले नाहीत. हे लोक काहीशा हट्टानं हिंदू धर्माचा ओरडा करायला लागलेले दिसतात. त्यांना धर्माकडून पारंपरिक पद्धतीच्या अपेक्षा नसाव्यात. (मानसिक शांतता, सामाजिक जाळं वगैरे). पण कसलीतरी न्यूनगंडातून येणारी उद्धटपणाची गरज असावी, असं वाटतं. तुमचं हे? तर मग आमचं हे. अशा प्रकारची. हा मोठा गट या सर्वेक्षणातून गायब आहे, असं मला वाटतं. ही मोठीच मर्यादा आहे.
- धर्माची गरज कमी होते आहे हे सत्य आहे. पण ते अर्धसत्य आहे असं दिसतं. बाबा आणि बुवांना असलेली मान्यता, साईबाबा किंवा सिद्धिविनायक यांसारख्या देवळांबाहेरच्या रांगा, उन्मादी-खर्चीक-आवाजी सणांना असलेला जनाधार - आणि हे सगळं तरुण लोकांकडून - याचं चित्र या सर्वेक्षणातून गायब आहे. त्यासाठी निराळ्या प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत असं मला वाटतं. एका प्रकारे धर्माचं फंक्शन बदललं असावं असं दिसतं. नीती-अनीतीची विभागणी जिथे वैयक्तिक आयुष्यातल्या सुखांना जाचक ठरते, तेव्हा लोक ती चौकट बिनदिक्कत उधळताना दिसतात (मध्यमवर्गीय स्त्रियांच्यात उघड उघड वाढलेलं उघडपणे दारू पिण्याचं प्रमाण). पण त्याच वेळी याच वर्गातून मंगळागौरीचे खेळ पुनरुज्जीवित करण्याचा संघटित आणि लोकप्रिय प्रयत्न होताना दिसतो. वटपोर्णिमा फ्याशनीत नसेल. पण मग मराठी बायका सर्रास ’मांग भरताना’ दिसतात, ते कुठल्या अधार्मिकतेत बसतं? ’तुम्ही कोणते सण सार्वजनिक रीत्या साजरे करता?’ हा किंवा अशा प्रकारचा प्रश्न सर्वेक्षणात यायला पाहिजे हे चित्र पकडायचं असेल तर.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हा गट लहान असला तरी या
हा गट लहान असला तरी या वर्गाचं वर्तन आणि विचार अधिकाधिक अधार्मिक होत जातात. एक उदाहरण देतो. शंभरेक वर्षांपूर्वी अनेक आयांचं 'मला काशीयात्रा घडव, मग मी डोळे मिटायला मोकळी' असं मुलाकडे मागणं असे. त्यांच्या नाती/मुली ज्या आज आज्या आया आहेत त्या या वर्गात येऊन पोचलेल्या आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना काशीयात्रा करण्यापेक्षा आपल्या वर्गमित्रांचं कुठल्यातरी रिसॉर्टमध्ये गेटटुगेदर करायला जास्त आवडतं. आजच्या पिढीतल्या किती मुली-बायकांना ही काशीयात्रेची इच्छा असते? आज 'हरताळकेचं व्रत करणं हा मठ्ठपणा आहे' असं फेसबुकवर दिसतं. पन्नास वर्षांपूर्वी ते जाहीरपणे मांडणं, त्याचा प्रसार करणं हे किती व्हायचं? या गटातले लोक आज घरात कोणाला वेडसरपणाची झाक दिसली तर मानसशास्त्रज्ञाकडे नेतात - भूत उतरवायचं म्हणून मांत्रिकाकडे नेत नाहीत.
मुद्दा असा आहे की सर्वेक्षण गटाचा आकार लहान असला तरी भविष्यकाळात तो पसरत जाऊन सर्वव्यापी होणार आहे. इंग्लंड-अमेरिकेत गेली पन्नास शंभर वर्षं ही प्रक्रिया चालू आहे. आता तिचे परिणाम दिसत आहेत. भारतात हे स्पष्टपणे दिसायला अजून चाळीस पन्नास वर्षं जातील.
मला वाटतं धर्माचा कर्मकांडी, बंधनकारक सुंभ जळेल पण सांस्कृतिक देखणा पीळ शिल्लक राहील.
गुरुजी ही प्रक्रिया, धर्माचं
गुरुजी ही प्रक्रिया, धर्माचं प्रस्थ कमी होण्याची, ही कंट्युन्युअस चालू का नसावी. म्हणजे गेल्या ५०-१०० वर्षातच असं का? सुबत्ता हे जर कारण असेल तर १०० वर्षापूर्वीचा काळ हा ५०० वर्षापूर्वीपेक्षा जास्त सुबत्तावाला असेल राइट? म १०० वर्षापूर्वीच धर्माचं प्रस्थ ५०० वर्षापूर्वीच्या तूलनेत कमी असायला हवं ना? म ही प्रक्रिया गेली १०० वर्षच का चालू आहे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
असेलही कदाचित
ही प्रक्रिया कन्टिन्यूअस असेलही कदाचित. आपल्याला माहीत नाही. आपल्याकडे फक्त गेल्या काही दशकांचा विदा आहे त्यावरूनच निरीक्षण आणि निष्कर्ष मांडता येतो. पण महाराष्ट्रापुरता अंदाज करता येईल. १८५३ मध्ये आगगाडी धावू लागली तेव्हा अगदी सुरुवातीला विटाळ-चंडाळ होईल म्हणून लोक त्यातून प्रवासाला उत्सुक नसत. पण उपयुक्तता कळल्यावर आपोआप हे समज गळून पडले. समुद्रपर्यटनाचेही तसेच. सुधारकांच्या रेट्यामुळे आणखीही बदल झाले. धार्मिकतेची (खरे तर बाह्य धर्माचरणाची) त्या काळी असलेली व्याख्या आतापावेतो बदलली असल्याचे आपल्याला तत्कालीन संदर्भांवरून कळू शकते. मुंबईत तर इतर प्रांतांच्या तुलनेत फारच मोकळेपणा होता. म्हणून मुंबईत सबगोलंकार असतो असे म्हणत. मुंबईत समाजाचे नेतृत्व इतर जातींकडे सरकले होते. पाण्याचे हौद वगैरे त्रैवर्णिकांना खुले असत. व्यापार-उदीम बहरू लागला तेव्हा तिथे जास्त वेळ देणे सयुक्तिक होते. साहजिकच कर्मकांडांच्या वाट्याचा वेळ कमी झाला. धार्मिक ग्रंथांची किंवा एकूणच पुस्तकांची छपाई होऊ लागली तेव्हा सनातन्यांनी छपाईच्या शाईवरून, पुस्तकबांधणीसाठी वापरल्या जाणार्या गोंदावरून शंका-आक्षेप घेतले होते. वेद, गीता प्रथम छापताना विरोध झाला होता. ग्रंथांचे पावित्र्य भंगेल, ते कुणाच्याही हाती पडतील, इतकेच नव्हे तर ठोक निर्मितीमुळे ते सत्त्वहीन(पातळ) होतील अशा अनेक शंका होत्या. विसाव्या शतकात त्या राहिल्या नाहीत. नळाने पाणी येऊ लागले तेव्हा त्या पाण्याच्या शुद्धतेवर (पावित्र्यावर) शंका होत्या. अवांतर :- आजही मलबार हिल, खंबाला हिल परिसरात एक दोन विहिरी आहेत, त्यांचेच पाणी तिथले जैन लोक वापरतात. ज्यांना शक्य आहे ते नळाचे पाणी वापरीत नाहीत. दुधाच्या बाबतीतही काही लोक त्यांच्यापैकी एकाच्या तबेल्यातूनच दूध आणतात. तो तबेला दूर वसई-कामणला आहे आणि दुधाची आवक त्यांच्याच गाड्यांतून, त्यांच्याच नोकरांकरवी होते. हे उदाहरण मी हिंदूच्या धर्मसुधारणेच्या पार्श्वभूमीवर दोन धर्मांतल्या सुधारणांची गति कळावी म्हणून दिले आहे. बाह्य कर्मकांडातील बदलांच्या अनेक गोष्टी सांगता येतील.
या आक्षेपाला सर्वसाधारण उत्तर
या आक्षेपाला सर्वसाधारण उत्तर म्हणजे कुठचातरी एक काळ असा असायला हवा जेव्हा धार्मिकतेचा पगडा वाढत गेला. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य टोळ्यांटोळ्यांतून राहात होता तेव्हा असा प्रस्थापित धर्म काही नव्हताच. म्हणजे पैठणची टोळी नियम करते आणि दूर कुठच्या गावातल्या ज्ञानेश्वराला त्याचा बाप सन्यासी असल्यामुळे शिक्षण घेता येत नाही असं काही नव्हतं. तेव्हा 'धर्माचा पगडा' असा आलेख काळानुरुप काढला तर तो शून्यापासून वाढत गेलेला दिसेल - मग अनेक वर्षं तसाच राहिलेला दिसेल. त्यानंतर काही काळाने तो उतरत जाताना दिसेल. माझं म्हणणं एवढंच आहे की गेल्या शंभरेक वर्षांत हा उताराचा दर (स्लोप) जास्त आहे, धडधडीत डोळ्याला दिसेलसा आहे. त्याआधीच्या शंभर वर्षांत कदाचित काही प्रमाणात फरक पडला असेलही पण तो नगण्य आहे.
थोडक्यात हे कंटिन्यूअस फंक्शन असलं तरी कंटिन्यूअसली डिक्रीझिंग नाही.
अडीचशे समजा…
> म १०० वर्षापूर्वीच धर्माचं प्रस्थ ५०० वर्षापूर्वीच्या तूलनेत कमी असायला हवं ना? म ही प्रक्रिया गेली १०० वर्षच का चालू आहे?
> गेल्या शंभरेक वर्षांत हा उताराचा दर (स्लोप) जास्त आहे, धडधडीत डोळ्याला दिसेलसा आहे. त्याआधीच्या शंभर वर्षांत कदाचित काही प्रमाणात फरक पडला असेलही पण तो नगण्य आहे.
युरोपपुरता विचार केला तर हा काळ शंभर वर्षांपेक्षा बराच जास्त आहे. तिथलं धर्माचं प्रस्थ कमी होण्यामागे इतर जी कारणं असायची ती असोत, पण enlightenment या विचारसरणीचा वाटा मोठा आहे. अठराव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे तिचा सुवर्णकाळ असं ढोबळ मानाने म्हणता येईल.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
प्रश्न
हा प्रश्नच अज्ञानातून आल्यासारखा वाटतो. प्रश्न विचारणार्याचा उद्देश प्रामाणिक आहे असे समजून उत्तर देतो. पण जरी प्रामाणिक नसला तरीही याने घासुगुर्जींच्या युक्तिवादाला कोणताही धक्का लागलेला नाही हे सर्वसामान्याला कळावे हा एक हेतू.
समाजाची प्रगती ही 'स्वाभाविक' आहे असा काहीसा गोडगैरसमज प्रश्न विचारण्यार्याचा झालेला दिसतो. गेल्या सुमाची तीनचारशे वर्षांतील झालेली वैज्ञानिक प्रगती, सांस्कृतिक एव्होल्यूशन (खाली जयदीप यांनी एनलायटनमेंटचा उल्लेख केलेला आहेच) वगैरेबद्दल संपूर्ण अज्ञान असल्याशिवाय असा प्रश्न पडणार नाही असे वाटते.
-Nile
मला वाटतं, तुम्ही फार लांबचा
मला वाटतं, तुम्ही फार लांबचा विचार करताहात (आणि खाली ननि म्हण्ताहेत त्याप्रमाणे सुबत्ता वाढतीच असेल, असं तुमचं गृहीतकही आहे). त्यामानानं मी जवळचा विचार करते आहे. म्हणजे ’सगळ्या गोष्टी जशाच्या तशा राहिल्या (सुबत्ता आणि शारीरिक सुखसोयींत वाढ. इ.)’ तर अजून शंभर वर्षांनी तुम्ही म्हणता तसं होईलही.
पण तुलनेनं नजीकच्या भविष्यात - येत्या १०-२० वर्षांत - धर्म नाक हत्याराचा कसकसा वापर होईल? त्याबद्दल तुमचं काही विश्लेषण आहे का? उदाहरणार्थ: अस्मितांच्या राजकारणात, सार्वजनिक शक्तिप्रदर्शनात, सार्वजनिक ऊर्जाविरेचनात, वाढलेल्या वेगाशी-शतखंडितपणाशी-एकटेपणाशी जुळवून घेण्यासाठी थूकपट्टी उपाय म्हणून... इत्यादी गोष्टी आपल्यावर कोणता परिणाम घडवून आणतील. त्यांचा संबंध तीर्थयात्रा वा हरताळकेशी नसेल. पण सार्वजनिक आरत्या-बांगा-डीजे, फ्याशनीत येणारी नवनवीन व्रतं आणि अर्वाचीन रूढी (बूट लपवणे वगैरे), नित्यनूतन बाबा आणि माई या सगळ्यांना धर्माच्या नाहीतर दुसर्या कोणत्या कोष्टकात बसवायचं? त्यांचे परिणाम धर्म नामक गोष्टीला हद्दपार करतील की फक्त निराळं स्वरूप देतील? ते परिणाम धर्म या लेबलाखाली जातील की नाही?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
रूढींमधे २/३ वर्ग केले
धार्मिक रूढींमधे २/३ वर्ग केले पाहीजेत.
१. शारिरीकद्रुष्टया कष्टकारक (e.g. उपास)
२. "Fashionable" (e.g. clothes, home decor)
३. Social gathering related
४. ?
अशा category करून मग त्यातील कोणत्या वर्गाचे प्रमाण कमी जास्त होत आहे असा अभ्यास करता येईल.
मतदानात भाग घेतलाही ( एकाच
मतदानात भाग घेतलाही ( एकाच ठिकाणी) परंतू त्यातून काय आणि कसा निष्कर्ष काढणार हे जरा कोडंच होतं अजूनही आहे.
पुढची पिढी फायद्याचं बघणारी आहे.सामाजिक कार्यही आले त्यात.इकडे तिकडे घाम गाळायचाच आहे अथवा आर्थिक मदत करायचीच आहे तर NGO ,TRUST,TV याची मदत घेणे नवीन आहे.( आर्थिक लाभ/प्रसिद्धी )
धार्मिक आचरणही त्यात आले.
कौल न घेताही मी सांगू शकतो धार्मिकता वाढणार.
कौल न घेताही मी सांगू शकतो
मूळ कौलाच्या धाग्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे आईवडील कसे धार्मिक होते आणि ते त्यामानाने कसे कमी धार्मिक आहेत हे सांगितलेलं आहे. तुमचा या बाबतीत वेगळा विचार दिसतो. मला प्रश्न विचारावासा वाटतो की तुमचं म्हणणं बरोबर की चूक हे ठरवण्यासाठी कुठची निरीक्षणं करायला हवीत? म्हणजे उदाहरणार्थ 'धर्म माझ्या आयुष्यात महत्त्वाचा आहे' असं म्हणणारे भारतात साधारण ९० टक्के लोक आहेत. ही संख्या वाढून ९४% होईल का काही काळाने? जर ती दहा वर्षांनी ८३% झालेली दिसली तर तुमचं भाकित चुकलं असं म्हणाल का?
धार्मिकता व धर्मांधता यात खर
धार्मिकता व धर्मांधता यात खर तर फरक केला पाहिजे. पण कठोर वैज्ञानिक चिकित्सेचे निकष लावले तर धार्मिकता व धर्मांधता यात फरक वाटेनासा होतो. लोकांच्या धार्मिकतेला धर्मांधते कडे वळवण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. धर्मचिकित्सा म्हणजे धर्मबुडवे पणा वा पाखंड असे समीकरण जनसामान्यात रुजवण्यात सनातनी लोक यशस्वी झाले आहेत.याला कट्टर सुधारकांचा हटवादीपणा देखील कारणीभूत आहे.
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
.
.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एक निरीक्षण आहे.... मी शाळेत
एक निरीक्षण आहे....
मी शाळेत होतो तेव्हा वर्गातल्या अनेकांच्या मुंजी होत असत. त्या काळी मुंजीत चकोट न करणार्यांचे प्रमाण लक्षणीय होते. मुलांना चकोट करायला नको असे आणि त्यांचे मागणे त्या काळचे पालक काही प्रमाणात तरी मान्य करत होते.
अलिकडे मी जेवढ्या मुंजी पाहिल्या त्यांत चकोट न करण्याचे प्रमाण शून्यवत आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
याच संदर्भात इथे लिहिले आहे.
याच संदर्भात इथे लिहिले आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
प्रत्येक ठिकाणी सुबत्तेचा
प्रत्येक ठिकाणी सुबत्तेचा आलेख वर-वरच जाणार हे गृहीतक (नजिकच्या भूतकाळावर आधारित) असल्याने त्या अनुषंगाने निष्कर्ष बरोबरच आहेत.
जाहीर फोरमवर आपण कमी धार्मिक
फेसबुकवरील हरताळकेचे व्रत/उपास करणे याला 'मठ्ठ्पणाचे लेबलिंग' मीदेखील वाचले आहे.या अशा डॉमिनेटींग टीकांमुळे लाज वाटत असावी. नक्कीच. अन तरीही गौरी माहेरपणाला बोलवुन, त्यांना नैवेद्य, फराळ दाखवुन कोडकौतुक केलेल्या मैत्रिणीही आहेत फक्त त्यांनी अन्य नास्तिकांविरुद्ध असे डॉमिनेटींग, विखारी शब्द वापरलेले नाहीत हे नीरीक्षण.
_______
मी 'हरताळकेचा उपास" करत नाही ही गोष्ट अलहिदा पण जर करत असते तर ती पोस्ट वाचून माझी तरी छाती झाली नसती मी उपास केला हे सांगण्याची. उपासही मी निव्वळ खादाडपणामुळे टाळते. बाकी पार्वती आवडती देवता असल्या कारणाने (खरं तर सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी, अन्नपूर्णा या सर्वच देवी आवडतात. ते एक असोच) शंकर बिंकर मिळावा असल्या व्यावहारीक इच्छेपोटी नाही तर निव्वळ त्या देवतेवरील आंतरीक प्रेमापोटी उपास मला करावासा वाटतो.
.
ज्यांनी हे मठ्ठ्पणाचं लेबलिंग केलं त्यांनी एक सरळसोट (अ पासून ब पर्यंत रेष असल्यासारखा) विचार केलेला होता की हां बायकांना शंकरासारखा नवराच हवा असणार = काय हा मठ्ठपणा.
एक लक्षात घ्या, शंभर
एक लक्षात घ्या, शंभर वर्षांपूर्वी भारतातल्या बहुतेकांना 'मी धार्मिक रूढी पाळत नाही, कारण माझी मर्जी' असं म्हणण्याची भीती वाटली असती. जातीबाहेर टाकणं, वाळीत टाकणं ही प्रचंड प्रभावी शस्त्रं धार्मिक समाजाकडे होती. जी वापरली जायची. आता जर परिस्थिती विरुद्ध झाली असेल तर त्यातूनही काहीतरी एक विधान होतं आहे असं नाही का वाटत?
होय नक्कीच विधान होते. हा बदल
होय नक्कीच विधान होते. हा बदल स्वागतार्ह आहेच.
.
मला एवढच म्हणायचे होते काही लोक भीतीपेक्षा प्रेमापोटीही देवाचे करतात. अस्वल यांचे म्हणणे - ते नास्तिक असले तरी गणपती हा त्यांचा वीक पॉइन्ट आहे. तसेच काहीसे.
माणसाने देव का बनवला इथून
माणसाने देव का बनवला इथून विचारांना सुरुवात केली, तर
देव "असण्याची", त्या संकल्पनेमुळे रोजच्या जगण्यात पाठबळ मिळण्याची गरज माणसाला नेहेमीच राहीली आहे. (संपूर्ण नास्तिक बनण्यासाठी गट्स लागतात, असे माझे मत आहे.)
त्यापुढे जाऊन मग "आपल्या" देवाची भक्ती करून मग त्यातून तयार होण्यार्या नेटवर्क/समाजामुळे मिळणारे फायदे दिसल्यावर "धर्म" अन त्यातले "कर्मकांड" स्पष्ट व पक्के होत गेले.
यापुढे जाऊन मग आमच्याच देवाची भक्ती करा, तोच तुमचा तारणहार आहे, असे इतर "धर्मियां"वर लादणे, त्याद्वारे आपली "टेरिटरी" व "टेरर" दोन्ही वाढविणे, ही आयडिया समाजातल्या हुशार लोकांना सापडते, अन त्यातून धार्मिकतेचे सार्वजनिक एक्स्प्रेशन येते.
माझा धर्म मोठा, माझा वांशिक गट मोठा, इतरांनी माझ्या धर्माला, माझ्या जाती/वंश गटाला दबून राहिले पाहिजे, या संकल्पनेलाच फॅसिझम असे म्हणत असावेत बहुतेक.
सध्या भारतात वाढलेल्या शिक्षणामुळे धर्मातली जुनी कर्मकांडे रद्दबातल करणार्यांचे प्रमाण वाढले आहे, या अर्थाने धर्माचा प्रभाव कमी होताना दिसत असला, तरी बहुसंख्यांक असूनही "आपल्या धर्माला" दाबून मारण्यात आले आहे, सबब आपण या नावाखाली एकत्र येऊन सत्ता हस्तगत करूया, हा विचार पुढे करून, तो प्रत्यक्षात आणणारेही उच्चशिक्षित व सुशिक्षीतच आहेत. (अर्थात, धर्माचा पगडा वाढविण्यापाठी अभिजनांचा, सुशिक्षितांचाच मोठा सहभाग असतो. समाजातले इतर गट त्यांचे अहमहमिकेने अनुकरण करतात. उदा. सध्या भारतीय मुसलमानांत सर्वत्र सर्रास बोकाळलेली बुरखा पद्धत. कुण्या मुल्लामौलवीने जबरदस्ती केली म्हणून नाही, तर बुरखा फक्त 'गरती बाया' घालतात, म्हणून मीही घातला की माझे सामाजिक स्थान उच्च दिसेल, असे काहीसे विचार अनौपचारिक बोलण्यातून मलातरी सापडले आहेत. संदर्भः व्हिटॅमिन डी, सूर्यप्रकाश, इ. संदर्भातून उन्हात फिरताना कायम अंग न झाकल्यास होणारे फायदे सांगण्याचा प्रयत्न वगैरे.)
"सायन्स" व "ग्लोबलायझेशन"मुळे कर्मकांडांत फरक पडला, तरी समाजात उन्माद निर्माण करणारी नवी कर्मकांडे तयार करून त्यांचा उपयोग सत्ताप्राप्तीसाठी करणारे "हुशार" (नुसते शाळाशिक्षित नव्हे. हे शाळासुशिक्षीत लोक हुशार लोकांच्या लवकर कह्यात येतात, व अनाकलनीय गोष्टी करतात. उदा. उच्चशिक्षित टेररिस्ट्स, अनेक बापू बाबांचे भक्त इ. ) लोक "धर्म" हि संकल्पना जन्माला यायच्या आधीपासून आहेत, व राहतील. जोपर्यंत समाजातील प्रत्येकाचाच आयक्यू सारखाच होत नाही, तोपर्यंत 'देव' असण्याच्या गरजेपाठची आगतीकता एक्स्प्लॉईट करणे सुरूच राहील असे मला तरी वाटते. व्हिजिबल धार्मिकतेत होणारे चढ उतार, हे अॅक्चुअल माणसांच्या मनावरील देवा-धर्माचा पगडा रिफ्लेक्ट करित नाहीत.
धर्म या संकल्पनेतून तयार होणार्या सपोर्ट सिस्टीमला लाथ मारून नवी संकल्पना अंगिकारणे जेव्हा माणसांना जमेल, किंबहुना दुसरी पॅरलल व सशक्त सपोर्टसिस्टीम तयार होईल, तेव्हाच हे प्रकर्ण कमी होईल असे वाटते.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
संपूर्ण नास्तिक बनण्यासाठी
सहमत. ही विचारशक्ती विरुद्ध डीएनए अशी लढाई आहे आणि कलेक्टिव्हली पाहिले तर विचारशक्तीचे बळ अगदीच तोकडे आहे. तोंडाने मोक्षाच्या गप्पा मारणारे लोकही पोरं जन्माला घालतात आणि डीएनएच्या माईंडलेस रेप्लिकेशनला बळी पडतात.
धर्म या संकल्पनेतून तयार
एक्झॅक्टली. शिक्षण, सुबत्ता, आरोग्य, दळणवळण, कम्युनिकेशन, इन्शुरन्स या सगळ्या गोष्टींची जसजशी वाढ होईल तसतसे लाथ मारू शकणारे लोक वाढतील असाच माझा दावा आहे. या कौलातून प्राथमिक चित्र तरी हेच दिसतं. नजीकच्या भविष्यातली दोनतीन दशकं तरी हे सगळं वाढतच जाणार असाही माझा दावा आहे. म्हणूनच आत्ता जे चित्र अमेरिकेत दिसतं आहे (२३ टक्के लोक स्वतःला निधर्मी म्हणवतात) ते हळूहळू भारतातही दिसू लागेल असा माझा निष्कर्ष आहे.
निष्कर्ष कसा असावा असा विचार
निष्कर्ष कसा असावा असा विचार करून प्रश्न काढले होते हा या सर्वेक्षणावरील माझा पहिला आक्षेप आहे.
सर्वेक्षण वस्तुनिष्ठ नव्हते, त्यात येणारी उत्तरे ही सापेक्ष आहेत. त्यामुळे अशा सर्वेक्षणातून समाज कसा आहे यापेक्षा सध्या काही व्यक्ती स्वतःला कशा बघताहेत (पर्सेप्शन) इतकाच विदा मिळतो.
व्यक्तींचे स्वतःबद्दलचे + त्यांच्या आईवडिलांबद्दलचे परसेप्शन व त्याची तुलना सत्य परिस्थितीशी सुसंगत असेलही किंवा नसेलही. यातील निष्कर्ष मुळ परिस्थितीशी मिळतेजुळते आहेत यावर विश्वास ठेवण्यासाठी मुळातील प्रश्न अधिक वस्तुनिष्ठ व अनेक प्रश्नांची यादी अशा स्वरूपाचा हवा होता, त्यामुळे याचा निष्कर्ष प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती दर्शवतो अथवा नाही यावर बोलणे फारच आततायी होईल. म्हणजे माझ्यासाठी माझी धार्मिकता ३ असेल तर दुसर्यासाठी माझी धार्मिकता २ असेल. जोवर १,२,३ म्हणजे काय याची स्केल प्रत्येक सहभागी होणार्यासाठी सारखीच नाही तोवर हे निष्कर्ष फसवे असण्याची शक्यता दाट आहे - किमान माझा अश्या तुटपुंज्या प्रश्नांवरून कोणताही ठाम निष्कर्ष काढायचा धीर होणार नाही
दुसरे असे की हा निष्कर्षाला भौगोलिक मर्यादा आहे.
अ. मराठी समजणार्या व भारतात रहाणार्या किती व्यक्ती या सर्वेक्षणात होत्या? भारताबाहेर रहाणार्या व्यक्ती यात धरून उपयोगाचे नाही तेव्हा ४९ हा आकडाही फसवा आहे
ब. मराठी समाज हा भारतीय समाजाचा प्रतिनिधी असु शकत नाही असे मला वाटते. उत्तरेला व दक्षिणेला धार्मिकतेचा प्रभाव वेगळ्या प्रतींचा आहे.
=====
मला मुळातील सर्वेक्षण खूपच आवडले कारण त्यामुळे वाचकांना स्वतःकडे बघून विचार करायला चालना मिळाली, काही सुंदर प्रतिसाद आले व एक पॉसिटिव्ह चर्चा झाली.
मात्र त्यातील विदा हा सांख्यिकी वापरून फार मोठे निष्कर्ष काढण्यासाठी बर्यापैकी निरूपयोगी आहे असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
त्यामुळे अशा सर्वेक्षणातून
हा फारच सर्वसाधारण आक्षेप झाला - सर्वच सर्वेक्षणांना तो लागू होईल.
हेही सर्वच सर्वेक्षणांना लागू पडतं. पण इथे ते विशेष गैरलागू आहे कारण अॅब्सोल्यूट स्केलपेक्षा रिलेटिव्ह बदलच मोजणं महत्त्वाचं होतं. आणि तसंही मी मांडलेल्या निष्कर्षात १ आणि २ चे फरक एकत्र केलेले आहेत. त्यामुळे फूटपट्ट्या वेगळ्या असल्या तरी मला फक्त पॉझिटिव्ह, निगेटिव्ह की झीरो इतकंच वेगळं करून सांगायचं आहे. हा रिलेटिव्ह बदल मोजला की फूटपट्ट्यांमधला फरक नगण्य ठरतो.
मराठी माणूस हा भारताचा प्रतिनिधी आहे का? मला वाटतं तो नाही कारण महाराष्ट्र किंचित अधिक श्रीमंत, किंचित अधिक सुशिक्षित आहे. म्हणून मराठी की बिनमराठी यापेक्षा आर्थिक-सामाजिक निर्देशांकांनी माणसांचे गठ्ठे करावेत, व त्यांसाठीच हा कौल लागू करावा.
भारतात नसलेले मराठी असले तरी सर्व जण भारतातच वाढलेले आहेत - पहिली वीसपंचवीस वर्षं - त्यामुळे अभारतीयत्वाचा मुद्दा गौण वाटतो.
हा फारच सर्वसाधारण आक्षेप
:O :O :O
असो. एकही आक्षेप अमान्य नाही फक्त तुम्हाला गैरलागू 'वाटतो' म्हटल्यावर बोलणंच खुंटलं!
===
जेव्हा तुम्ही सांख्यिकी देता तेव्हा सआंख्यिकीचे नियम पाळायलाच हवेत. नाहितर तुम्ही काढलेल्या निष्कर्षासाठी इतका व्याप करायची गरज काय? ते तर साधारण निरीक्षणातूनही इतकेच विश्वासर्ह अनुमाने निघतात
तुमच्या या कौलामुळे हा निष्कर्शाच्या विश्वासार्हतेत जराही घट वा वाढ होत नाही (हा कौल बेसिकली काहीही ठामपणे सिद्ध करत नाही) असे म्हणायचे आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एकही आक्षेप अमान्य नाही फक्त
वाटतो हे असं अवतरणात का आलं ते कळलं नाही. कारण मी गैरलागू का आहे ते सांगितलं. असो.
सर्वेक्षणातून घ्यायचा विदा हा बऱ्याच वेळा व्यक्तिसापेक्ष असतो. त्याच्या स्केल्सही वेगवेगळ्या असू शकतात. उदाहरणार्थ 'तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला धर्म महत्त्वाचा वाटतो का?' याला हो किंवा नाही असं उत्तर आहे. यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी स्केल वापरणार. कुठे कटऑफ करायचं आणि कुठे नाही हेही तेच ठरवणार. आणि त्यातून मूठभर व्यक्तींना काय जाणवतं हेच कळणार. म्हणजे तुमचे आक्षेप लागू आहेत की नाहीत? माझ्या उदाहरणात स्केल व्हेरिएशन कमी महत्त्वाचं आहे कारण मी पॉझिटिव्ह, झीरो आणि निगेटिव्ह एवढंच मोजतो आहे. त्यासाठी स्केल पूर्ण उलटी नसली की झालं. वेगळी असल्याने फरक पडत नाही.
आता एवढं लिहूनही बोलणं खुंटवायचं असेल तर काय, बोलणंच खुंटलं!
हो पण वेगळी स्केल असल्यावर
हो पण वेगळी स्केल असल्यावर तुमचा निष्कर्ष योग्य कसा? हा फक्त अंदाज झाला. त्यासाठी अशा प्रकारच्या कौलाने विश्वासार्हतेत नक्की काय वाढ झाली आणि ती कशाच्या आधारावर?
सँपलसेट - अपुरा
सॅम्पलसेटची विविधता - अपुरी
स्केल - सापेक्ष
सँपलसेटचा विस्तार - अपुरा
मात्र निष्कर्ष मात्र विश्वासार्ह मानायचे ते का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मात्र निष्कर्ष मात्र
कारण यापेक्षा जास्त चांगलं दुसरं काही नाही म्हणून हा त्यातल्या त्यात विश्वासार्ह. इंग्लंड अमेरिकेत जे आत्ता होताना दिसतंय त्याचीच बारीकशी सुरूवात झाल्याचं सूतोवाच करतो म्हणून विश्वासार्ह. कारण नुसतंच मतदान केलं नाही, तर परिच्छेदच्या परिच्छेद लिहून लोकांनी आपल्याला काय म्हणायचं ते सांगितलं, आणि ते तुमच्या समोर आहे म्हणून विश्वासार्ह. कारण मी त्यासाठी इतरही युक्तिवाद दिलेले आहेत म्हणून विश्वासार्ह.
सर्व्हेमधली मतं ही कुठल्यातरी गटाची प्रातिनिधिक मतं आहेतच. तो गट किती लहान, किती मोठा हे तुम्ही ठरवा की. माझा अंदाज मी सांगितला, तुमचा अंदाज तुम्ही करा. तुम्हाला निष्कर्ष स्वीकारायचे तर स्वीकारा. नाहीतर नका स्वीकारू. किंवा कसंही.
बाकीच्या आक्षेपांना मी वर उत्तरं दिली आहेतच. ती पटली नाहीत तर ऱ्हायलं. आणखीन काय बोलणार?
च्यायला, ऐसीवर काही विदा सादर करताना मी ग्रॅड्युएट स्टुडंट बनून माझा पीएचडी थीसिस सादर करतो आहे आणि समोर पाचपन्नास प्रोफेसर आठ्या घालून बसले आहेत असा फील येतो नेहमी.
काही विदा सादर करताना मी
विदा देऊन लेखही लिहायचा आणि मग त्यातील दोष दाखवले तर असं बोलायचं!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
१. हे सर्वेक्षण एका अत्यंत
हा गट नुस्ता लहान नाहीये तर खास करुन ऐसीवरचा गट हा बर्यापैकी एकाच विचाराच्या माणसांचा बनलेला आहे. हे सँपल खूपच बायस्ड आहे आणि त्यामुळे कौल ही तसाच आला आहे.
माझ्या निरीक्षणांप्रमाणे, ऐसी वरचे लोक सोडले तर माझ्या आजुबाजुच्या अति-शिक्षीत आणि सुबत्ता असलेल्या लोकांमधे धार्मिकता वाढलेलीच बघितली आहे.
बाबा- मातांचे अनुयायी ह्या अतिशिक्षीत गटातलेच असतात आणि त्यांच्या पालकांनी तसे वागलेले पण नसते.
पूर्वी ज्यांच्या कडे गणपती नव्हते त्यांच्या कडे ते बसायला लागले आहेत, ज्यांच्या कडे गौरी नव्हत्या त्या आता यायला लागल्या आहेत.
आमचे बाबा-बुवा हे चमत्कार करणारे नाहीत तर अध्यात्म शिकवतात असली बेगडी कारणे देवुन नादी लागण्याचे प्रमाण पण वाढले आहे.
ह्या सर्वेत दिसणारा गट २०% चा नाहीतर २ % चा बनलेला आहे. तसेच तुम्ही हे वैचारीकदृष्ट्या वर असणे हा विचार सोडा हो. त्याचा आदर्श इतर करतात हा तर मोठाच गैरसमज आहे. भारतात आजुबाजुला बघा, हे सोकॉल्ड इतर लोक ह्या सो-कॉल्ड वैचारीक लोकांना काडीची किंमत देत नाहीत.
सहमत
+१. माझेही निरीक्षण असेच आहे.
विनोदी धागा
>> हे सँपल खूपच बायस्ड आहे आणि त्यामुळे कौल ही तसाच आला आहे.
विनोदी धागा म्हणून का नाही बघत तुम्ही याच्याकडे?
हा गट नुस्ता लहान नाहीये तर
मिसळपाव.कॉमवरदेखील हेच निष्कर्ष आले. आता तुम्ही जर मिसळपाव आणि ऐसी सारखेच म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं.
वैचारिक हा शब्द वापरून मी प्रचंड चूक केली. कारण विचार करणारे लोक म्हटले की त्यांना विचारजंत म्हणण्याची पद्धत आहे. तेव्हा तिथे शैक्षणिकदृष्ट्या असा शब्द वाचा.
आणि हा २% आकडा कुठून आणलात? मी माझे निकष सांगितले - खाऊनपिऊन सुखी, सुशिक्षित, शहरी, कॉंप्युटर वापरणारे इत्यादी इत्यादी. हे लोक फक्त दोन टक्के आहेत? काय बोलता राव!
हा गट नुस्ता लहान नाहीये तर
+२
हेच दिसून आलेलं आहे. आशिया
युरोप आणि भारतीय लोकांची सायकी पूर्णपणे वेगळी आहे,त्याची तुलना करण्यात काही अर्थ नाही. खरे तर भारतीयलोकांसाठी वेगळी सायकॉलॉजी ची आणी वर्तणुक शास्त्राची पुस्तके लिहावीत इतकी ती वेगळी आहे. त्यांची तुलना करण्यात काही अर्थ नाही.
भारतात ५० वर्षापुर्वी गरीबी जास्त होती ( आजच्या तुलनेत ) तरी ९०% लोक धर्म महत्वाचा आहे असेच सांगत असणार!!
कदाचित साम्यवादाच्या प्रभावामुळे ५० वर्षापूर्वी शहरी भारतात गरीबी जास्त असली तरी धार्मिकता कमी होती.
मध्यमवर्ग/सुबत्ता-धार्मिकता/राष्ट्रवाद पॅरॉडॉक्स
'ऑन ट्रायल' हा ओरहान पामुकचा लेख या संदर्भात एक वेगळा दृष्टिकोन मांडतो. अर्मेनियन जेनोसाईड घडल्याचे मान्य करून पामुकवर देशाची बदनामी केल्याचा खटला जेव्हा दहा वर्षांपूर्वी भरला गेला, तेव्हाचा हा लेख आहे.
त्यातला काही भाग:
This paradox cannot be explained away as simple ignorance, jealousy, or intolerance, and it is not the only paradox. What am I to make of a country that insists that the Turks, unlike their Western neighbors, are a compassionate people, incapable of genocide, while nationalist political groups are pelting me with death threats? What is the logic behind a state that complains that its enemies spread false reports about the Ottoman legacy all over the globe while it prosecutes and imprisons one writer after another, thus propagating the image of the Terrible Turk worldwide? When I think of the professor whom the state asked to give his ideas on Turkey’s minorities, and who, having produced a report that failed to please, was prosecuted, or the news that between the time I began this essay and embarked on the sentence you are now reading five more writers and journalists were charged under Article 301, I imagine that Flaubert and Nerval, the two godfathers of Orientalism, would call these incidents bizarreries, and rightly so.
That said, the drama we see unfolding is not, I think, a grotesque and inscrutable drama peculiar to Turkey; rather, it is an expression of a new global phenomenon that we are only just coming to acknowledge and that we must now begin, however slowly, to address. In recent years, we have witnessed the astounding economic rise of India and China, and in both these countries we have also seen the rapid expansion of the middle class, though I do not think we shall truly understand the people who have been part of this transformation until we have seen their private lives reflected in novels. Whatever you call these new élites—the non-Western bourgeoisie or the enriched bureaucracy—they, like the Westernizing élites in my own country, feel compelled to follow two separate and seemingly incompatible lines of action in order to legitimatize their newly acquired wealth and power. First, they must justify the rapid rise in their fortunes by assuming the idiom and the attitudes of the West; having created a demand for such knowledge, they then take it upon themselves to tutor their countrymen. When the people berate them for ignoring tradition, they respond by brandishing a virulent and intolerant nationalism. The disputes that a Flaubert-like outside observer might call bizarreries may simply be the clashes between these political and economic programs and the cultural aspirations they engender. On the one hand, there is the rush to join the global economy; on the other, the angry nationalism that sees true democracy and freedom of thought as Western inventions.
[हे सरसकटीकरण आहे, अमुक एका देशाला लागू आहे किंवा नाही, यामागे छुपे अजेंडे आहेत इत्यादी गोष्टी काही काळ दूर ठेवून; किमान, एका लेखकाने त्याच्या समाजाच्या संदर्भात मांडलेला एक वेगळा मुद्दा, म्हणून याकडे पहावे.]
मस्त
विवेचन पटले. भौतिक सुख-स्थैर्य मिळवण्याकरिता पाश्चात्य मॉडेलचा आधार सद्यःस्थितीत घेणं बर्यापैकी अनिवार्य असलं तरी सांस्कृतिक ओळखीचा प्रश्न त्यामुळे गडद होतो अन त्यातून असे प्रकार होतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पाश्चात्य मॉडेल नसते तर ज्या
पाश्चात्य मॉडेल नसते तर ज्या धर्मात व जातीत जन्माला आलो त्यातून काय हाल झाले असते याचा विचार करुनही काही लोक कट्टर धर्मद्वेषी व नास्तिक होत असतीलच की.
असतीलही. शिवाय अनैतिहासिकपणे
असतीलही. शिवाय अनैतिहासिकपणे विचार करून भूतकाळास मोनोलिथिकपणे पाहिल्यास धर्मद्वेषी व नास्तिक होणे क्रमप्राप्तच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बरोबर. पण इतिहासाकडे
बरोबर. पण इतिहासाकडे मोनोलिथिकपणे न पाहणे हे वर्तमानासाठी अनिवार्य नाही. ऐतिहासिकपणे विचार करुनही धर्म टिकवण्याचे वर्तमानात कारण सापडत नाही (भविष्यात पाश्चात्य मॉडेलातल्या भौतिक सुखांवर आंच आल्यावर कदाचित पुन्हा एकत्र येण्याची गरज भासल्याने धर्माचा पुनरांगिकार होईलही म्हणा).
इथे पाश्चात्त्य मॉडेल म्हणजे
इथे पाश्चात्त्य मॉडेल म्हणजे पाश्चात्य शोध ( वीज, तेल, गाड्या, इलेक्ट्रोनिक्स, औषध) हे अपेक्षित आहे का लोकशाही, समानता, व्यक्तिस्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच या गोष्टी अपेक्षित आहेत? माझ्यामते मूळ लेखात लॅटरकडे रोख आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मॉस्लोचा पिरॅमिड पाहा. म्हणजे
मॉस्लोचा पिरॅमिड पाहा. म्हणजे लॅटर हे फॉर्मरवर अवलंबून आहे हे लक्षात येईल.
लेख पटला / लेखातल्या आकडेवारितले निश्कर्ष अजिबात नाही पटले
राघा, आधी न पटलेल्या गोष्टिंबद्दल लिहितो.
ज्या ४९ लोकानी सर्व्हे पुरा केला ते २०% शिक्षीत गटातले असले तर त्याचा अर्थ "हा सर्व्हे या २०% लोकांचा प्रातिनिधिक आहे" असा होत नसून "जरी १०००, ५००० कींवा १०,००० मिपा व ऐसीच्या मेंबरानी ह्या सर्व्हेत भाग घेतला असता तरी त्याने फक्त २०% शिक्षीत लोकांच्याच मतांचा अंदाज आला असता" असा होतो.
ईथे परत चुकीचं निदान केलं गेलंय. हा असा निश्कर्ष काढणं म्हणजे - "५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल ठरवण्यासाठी आत्तापर्यंत ५४ मतदारसंघातनं २०० लोकांचं सर्वेक्षण घेतलंय. त्यात अबक पार्टीला बहुमत मिळाल्याचं दिसलं. उरलेल्या मतदारसंघात कौल घेतल्यानंतर तिथेही अबक पार्टीलाच बहुमत मिळेल याची शक्यता जास्त आहे" असं म्हणण्यासारखं आहे.
सर्व्हे ईतक्या तुटपुंज्या गटावर आधारित आहे हे मान्य करूनही पुढचं विश्लेषण करणं हे बरोबर वाटंत नाही. "मी फोटोशॉप जेमतेम अर्धा तासच वापरलंय. पण तरिही मी त्याबद्दल रिव्ह्यू लिहितो. तो अर्थातच अचूक असायची शक्यता फारच कमी आहे पण अर्धा तासतर वापरलाय त्यामुळे लिहितो तरीही" असं केल्यासारखं वाटतंय.
आता मी पुढे जे लिहिणारे, पटलेल्या गोष्टिंबद्दल, त्यामुळे मी नक्की काय पिउन लिहायला बसलोय अशी शंका तुम्हाला येणं साहजिकच आहे - ईतकं सगळं असलं तरी "यामागची कारणं काय असावीत?" या पुढचा सगळा लेख बरोब्बर वाटतो नी पटतो!! कारण मला वाटतं 'यामागची' याचा अर्थ "गेल्या दोन पिढ्यांमधे - विज्ञानाने अनेक घटनांची/परिणामांची/अनुभवांची कारणमिमांसा विशद केल्यामुळे - दैववाद, देव/वाईट शक्तिंमुळे अमुक-तमुक गोष्ट होते अशा कार्यकारणभावावरचा विश्वास, धार्मिक कर्मकांडांचा आधार घेणं अशा गोष्टींमधे झालेली (लक्षणीय) घट".
सर्व्हे घेउन 'साधार' स्पष्टिकरण देण्याचा तुमचा उद्देश असावा असं वाटतं. पण मला वाटतं हि अशी घट झालेली आहे असं सर्व्हे न घेताही म्हणायला प्रत्यवाय नसावा कारण आपण त्याची उदाहरणं आपल्या आसपास बघतो आहोत. गणेशोत्सव वाढले आणि दहिहंड्या जास्त लागतात याचा निश्कर्ष धार्मिकता वाढली असा काढणं चुकीचं ठरेल. गणेशोत्सव वाढले पण सह्स्त्रावर्तनं करणं, २१ गणपती बघून येणं, गणपतीच्या कार्यक्रमात कीर्तन असणं हे झपाट्याने लयाला जातंय / गेलंय, दहिहंड्या जास्त लागतात पण त्यात लाखा-लाखांच्या रोख उत्पन्नाची सोय असते आणि दहिहंडी पथकातल्या कीती जणाना कृष्णजन्माशी देणं-घेणं असतं देव जाणे! उलट एकादष्ण्या, भूत उतरवणं, एका दिवसात गुरूचरित्र वाचणे हे ईतकं ऐकू येत नाही. मी तर म्हणेन दोन नाही, तीन पिढ्यांपासून अशी घट होतेय. कीती वेळा तुम्ही बोडण भरलेलं ऐकलंय, कीती वेळा घागरी फुंकणं नी त्या बाईच्या अंगात येणं हे पाहिलंय, गावात साप/विंचू चावल्यावर देवॠषाकडे / तालुक्याच्या हॉस्पिटलात जाणार्या लोकांचं गुणोत्तर पन्नास वर्षांपूर्वी किती होतं आणि आता किती आहे त्याचा विचार करून बघा. असो.
राघा, पंचवीस वर्षानी हा लेख वाचला जाईल तेव्हा जग कसं असेल याची उत्कंठा आहे.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
"मी फोटोशॉप जेमतेम अर्धा तासच
पण जिथे "मी फोटश़ॉपच्या सॉफ्टवेअरचा बॉक्स उचलून त्यात डिस्क असल्याचं हलवून बघितलंय" "मी त्या बॉक्सला हात लावून बघितलाय" "मी तर पंधरा बॉक्सेसचे रंग बघितले आहेत" असं म्हणून ठाम मतं मांडली जातात, त्यात अर्धा तास वापरणाराचं मत अधिक महत्त्वाचं नाही का? आणि ज्यांनी वर्षभर वापरलंय अशांचे रिव्ह्यू तुम्हाला मिळतात का? संपूर्ण भारतीय समाजाच्या क्रॉससेक्शनचा, डेमोग्राफिकवाइज पद्धतशीर सर्व्हे वाचायला मिळाला तर मी माझा कचऱ्याच्या टोपलीत टाकायला तयार आहे.
याच्यापुढे तुम्ही लिहिलेलं बरोबरच आहे. मात्र तुम्ही जितक्या ठामपणे हे सांगत आहात तितक्याच ठामपणे इतर काहींनी 'असली काही घट-बिट झालेली नाही, आणि होणारही नाही' (कारण मी फोटोशॉपचा बॉक्स व्यवस्थित न्याहाळलाय!) असं म्हटलं आहे. म्हणूनच व्यक्तिगत निष्कर्षापेक्षा लहान का होईना समूहाचा सहभाग महत्त्वाचा होतो.
तुमचे वरचे दोन्ही मुद्दे पटले.
तुमचे वरचे दोन्ही मुद्दे पटले. सर्व्हेतली आकडेवारी देण्यामागे 'साधार स्पष्टिकरण' देण्याचा तुमचा हेतू असावा हा माझा कयास बरोबर आहे तर. पण त्यामुळे मूळ लेखनाला (जे सुसंगत आहे, पटतंय) त्याला बाधा येत्येय असं वाटलं म्हणून प्रतिक्रियेचा खटाटोप केला !
आणि मोठ्ठ्या प्रमाणाचा सर्व्हे जरी असला, मोठ्ठ्या समूहाचा प्रातिनिधिक जरी असला तरी जोपर्यंत Theory of Evolution एव्हढं वाचल्यावर "घ्या. अहो निव्वळ थिअरी आहे ही नुसती. पुरावा कुठाय याचा? कसलं विज्ञान बिज्ञान घेउन बसलात? " इथपासून सुरू करणाते भिडू आहेत तोपर्यंत ५०० प्रतिसादाना मरण नाही !!!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
एक प्रश्न
हे वाचून मला एक वेगळा प्रश्न पडला आहे. कुंभमेळ्यात लाखो लोक गेले आहेत (कदाचित कोटीपेक्षाही जास्त असतील असे आकडे मी कुठे तरी वाचले आहेत, पण आता सापडत नाहीत). आषाढी एकादशीलाही लाखो लोक पंढरपुरात जातात. तिरुपतीला जाणारे लोकही पुष्कळ असतात. हे आकडे वर्षानुवर्षं वाढतच जात आहेत. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात ही वाढ योग्य आहे, की समाजाची धार्मिकता वाढत चालल्याचं ते द्योतक आहे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कुंभमेळ्याचं माहीत नाही,
कुंभमेळ्याचं माहीत नाही, परंतु यावेळी वारीसोबत काही अंतर गेल्यामुळे वारीबद्दल एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कैक दिंड्या नव्याने अॅड झालेल्या आहेत. पालखीच्या पुढे आणि मागे किती नंबरला दिंडी असावी याची ऑर्डर सर्व दिंड्या स्ट्रिक्टलि पाळतात. तर त्यांपैकी काही दिंड्या गेल्या दहापाच वर्षांतल्याही आहेत. त्यामुळे वारीतील दिंडीवाल्यांचे प्रमाण वाढलेले आहे हे तर नक्कीच. हे सांगण्याचे कारण म्हणजे लोकसंख्या वाढली तरी त्याचे रूपांतर दिंडीकरणात होईल याची शक्यता कमी असते कारण विथ दिंडी कम अॅडमिन एक्स्पेन्सेस. नॉनदिंडीवाल्यांचे प्रमाणही वाढलेले आहे असे वाटते, पण विदा इल्ले.
तस्मात धार्मिकता थोडी का होईना वाढली असावी असे कदाचित या मर्यादित विद्यावरून सांगता यावे असे वाटायला हरकत नसावी असा कयास आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
क्वालिटेटिव्ह माहिती
कुंभमेळ्यात काही मजा नाही राहिली. जो-तो उठतो आणि फोटो काढायला कुंभमेळ्यात जातोय. भाविक नाहीतच.
अशा अर्थाचं फेसबुक स्टेटस कुंभमेळा सुरू असताना मी वाचलं होतं. शेअर करणाऱ्या व्यक्तीने काढलेले बरेच चांगले फोटो फेसबुकवर आहेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
जो-तो उठतो आणि फोटो काढायला
म्हणजे ते कोट्यवधी लोक वगैरे फक्त फोटो काढायला जातात ही नवीन माहिती मिळाली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कसं ना! मलापण.
कसं ना! मलापण.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छानच गं, मस्तच गं, कसं गं
छानच गं, मस्तच गं, कसं गं जमतं तुला, इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विश्वरूपदर्शन
कुंभमेळ्यात जाऊन आलेल्या माझ्या नास्तिक मित्राची प्रतिक्रिया -
आपण एका वेगळ्याच विश्वात राहतोय आणि तिथे कुंभमेळ्यात एक वेगळंच विश्व आहे. आपण अत्यंत अल्पसंख्य आहोत ह्याची प्रकर्षानं जाणीव करून घ्यायची असेल, तर कुंभमेळ्यात जावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मेघना ढोकेच्या लेखमालेतून
मेघना ढोकेच्या लेखमालेतून याचा अंदाज यायला लागला होताच.
(तसं कधीतरी वारी आणि कुंभमेळ्यात जावं असं मला वाटतं. पण स्वच्छ-सुंदर संडासांचा विचार डोक्यात आला की सगळं कुतूहल ... down the drain.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पण स्वच्छ-सुंदर संडासांचा
याईक्स!!!!१०
लोकसंख्येच्या वाढीच्या
मी मध्ये कुंभमेळ्याला गेलेल्यांची आकडेवारी काढण्याचा प्रयत्न केला. बातम्यांमध्ये दहा कोटी, बारा कोटी वगैरे आकडे चिल्लर खुर्दा असल्यासारखे फेकले जातात. कुंभमेळ्याच्या व्यवस्थापकांपैकी काहींनी हा आकडा मोजण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा तो अर्थातच खूप कमी आला होता. मुद्दा असा आहे की विश्वासार्ह आकडेवारी कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणाबाहेर वाढ झालेली आहे की नाही हे सांगणं कठीण आहे.
पण घटकाभर धरून चालू, की हे प्रमाण लोकसंख्येपलिकडे वाढलेलं आहे. ते का, याविषय़ी अंदाजच करायचा झाला तर मी म्हणेन की हे उपलब्धता वाढल्यामुळे झालंय. समजा, धार्मिक असणाऱ्यांचा गट समजा ९० टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर आला. पण या ऐशी टक्क्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांच्यापैकी २० टक्क्यांऐवजी ४० टक्क्यांना कुंभमेळ्याला जाणं परवडू शकलं तर ही संख्येत वाढ दिसू शकते. म्हणजे थोडक्यात आज जास्त प्रमाण दिसतंय असं नाही, तर पूर्वी कृत्रिमरीत्या कमी दिसायचं असा काहीसा युक्तिवाद आहे.
म्हणजे नव्वदोत्तरीत मध्यमवर्गाला सूज आली आणि त्याची परिणती झगमगीत मॉल्समध्ये दिसते. तशीच कनिष्ट मध्यमवर्गाला आलेली किंचित काही सूज ही अशा प्रकारे देवासाठी करण्याच्या झगमगाटातून दिसते.
म्हणजे नव्वदोत्तरीत
छानच वाक्य(नीरीक्षण) आहे. विशेषतः पहेला अर्धा भाग मलाही जाणवलेला आहे.
चंगळवाद?
पण नव्वदोत्तरी काळात चंगळवाद वाढला की नाही वाढला? उपलब्धता वाढली, पण मानसिकतेत बदल झाला की नाही झाला?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पण नव्वदोत्तरी काळात चंगळवाद
मानसिकता नक्की कसली? पैसा खर्च करण्याची तयारी वाढली - हा मानसिकतेतला बदल आहे असं म्हणता येईल कदाचित. पण त्याला पैशांची उपलब्धता हेच मुख्य कारण आहे. माझा दावा असा आहे की खर्च करण्याची इच्छा आधीपासूनच होती. तिला मार्ग मिळाला. म्हणजे जर कोणी असं सांगितलं की 'माझ्या आईवडिलांना उंची रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची इच्छाच नव्हती असं नाही. मध्यमवर्गीय उत्पन्नामुळे त्यांना ते परवडत नव्हतं. आता मला ते परवडतं, आणि मी सर्रास जातो. कारण त्यांच्या उत्पन्नाच्या मानाने उडप्याच्या हॉटेलात जाण्यासाठी जितका खर्च व्हायचा तितकाच माझा खर्च माझ्या उत्पन्नाच्या मानाने मला कबाब नेशनमध्ये जाण्यासाठी होतो.' तर महिन्याच्या पगाराच्या दोन टक्के खर्च एका जेवणावर करण्याची तयारी ही मानसिकता तीच राहिली म्हणाल की ती व्यक्ती जास्त उंची ठिकाणी जाते आणि दोन हजार रुपये उधळते याला मानसिकतेतला बदल, चंगळवाद, सूज वगैरे म्हणणार?
गंमत अशी आहे की म्हणून उडप्यांची हाटेलं बंद पडत नाहीयेत. त्या व्यक्तीचे आईवडील ज्या आर्थिक परिस्थितीत होते, त्या परिस्थितीत आता आणखीनच मोठा वर्ग पोचलेला आहे.
हा सिनारियो कसा वाटतो - गावातून एकदोन जण कधीतरी आपापल्या जिवावर पंढरीच्या वारीला जात असत. कारण इतका वेळ पैसा खर्च करणं परवडत नसे. पण वारीला जायचं ही आस पन्नास इतर लोकांच्यात असायची. आता त्या पन्नासापैकी दहाबारा जणांना परवडतं. शिवाय ते सेलफोनवरून शेजारच्या गावातल्या लोकांना एकत्र करतात आणि आपल्या पंचक्रोशीची एक दिंडी काढू म्हणतात. कदाचित आत्ता फक्त चाळीस लोकांनाच जाण्याची इच्छा राहिली असेल आणि त्यातले दहाबारा जाऊ शकतात.
या सिनारियोमध्ये दिंड्या वाढलेल्या दिसतात. पण मानसिकता - वारी करण्याची इच्छा ही वाढली की कमी झाली?
इच्छा तेथे मार्ग
केवळ एवढंच आहे ह्याविषयी मला खात्री नाही. 'साधी राहणी - उच्च विचारसरणी' ह्या मूल्यांना पूर्वी भाव होता, ह्याचं कारण केवळ एवढंच की लोकांना त्यावेळी छानछोकीनं राहणं परवडत नव्हतं, असा मग त्याचा अर्थ होईल. ते फार सिनिकल वाटतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
उत्सव
मी म्हणेन की समाजाची धार्मिकउत्सवप्रियता वाढली आहे.
साईबाबांची वारी, चालत जाणे हेही प्रकार वाढले आहेत.(आमच्या येथे जवळजवळ अठरा-वीस मोठाल्या बसेसभरून फक्त शंभर रुपयांत दोन नाश्ते आणि एका जेवणासह साईवारी घडवतात आणि हा रिपीट पर्फॉर्मन्स असतो.) त्याला धर्म म्हणायचे की श्रद्धा ? मला वाटते पूर्वी गावोगावच्या जत्रा-यात्रांतून लोकांचे एकत्र येणे, उठणे बसणे व्हायचे. आता शहरी स्थलांतरितांना काहीतरी पर्याय हवा असेल समाजाभिमुखतेचा. बंदिस्त कोंदट वातावरणातून अधिकृत आणि मान्यताप्राप्तरीत्या बाहेर पडून अंग झडझडून हलवण्याचा, नाचण्यागाण्याचा, मनमुराद आरोळ्या ठोकण्याचा.
शिवाय खाली घासकडवींनी म्हटल्याप्रमाणे कनिष्ठ मध्यमवर्गाची सूज अशी झगमगाटामधून व्यक्त होत असेल.
खालील मुद्देही विचारात घेता
खालील मुद्देही विचारात घेता येतीलः
१. साईवारी (पायी), हिच्या वाटेत काळासोबत वाढत गेलेल्या सोयी. ठिकठिकाणी निघालेले निवारे, आधी ट्रकने शिधा पोहोचून स्वयंपाक वगैरे तयार करुन ठेवण्याचं प्लॅनिंग आणि सुविधा. मनुष्य अगदीच इमर्जन्सी सिच्युएशनला प्राप्त झाला तर वाहनाने शहरी पोहोचण्याची सोय, वन वे चालत जाऊन परतीला वाहनाने येण्याची अर्धा वेळ वाचवण्याची सोय.
२. वाटेत मोबाईल आणि अन्य साधनांनी घरी / व्यवसायाशी संपर्क ठेवण्याची सोपी सोय.
३. प्रत्यक्ष चालण्याचा रस्ता पूर्वीपेक्षा सुधारलेल्या क्वालिटीचा असणं.
अशा इतरही कारणांनी नव्या काळानुसार अशा पदयात्रांमधे / मेळाव्यांमधे भाग घेणं हे पूर्वीपेक्षा तुलनेत अधिक सुलभ, सोपं, शक्य कोटीतलं व्हायला लागलं आणि जास्त लोकांच्या आवाक्यात आलं.. असंही वाटतं.
शिवाय संपर्कसाधनांच्या वेगवान प्रसारामुळे लोक एकत्र येऊन गट बनणं आणि क्रेझ निर्माण होऊन वाढणं हेही एक कारण यात असेलच. (पहा: एकसारखे टीशर्ट - रिफ्लेक्टर्स, मंडळाचं नाव पाठीवर प्रिंट केलेलं अशा युनिफॉर्ममधल्या गटांची गर्दी हायवेजवर दिसते). पोलिटिकल पार्टीजनी गणपती, दहीहंडीसोबत अशा पदयात्रांना वगैरेही आपल्या छत्रीखाली घ्यायला अधिकाधिक सुरुवात केली आहे हेही लक्षात घेता येईल (झेंडा इफेक्ट, स्पॉन्सर इफेक्ट).
अगदी अगदी
पुलिटिकल पेट्रनेज भलतेच वाढले आहे. किंबहुना उत्सवप्रियता/ धार्मिकता वाढण्या-वाढवण्यामागे राजकीय धूर्तपणा आणि आर्थिक पाठबळ असतेच असते.
कौल आणि कौलाचं उत्तम विश्लेषण !
कौलाच्या धाग्यावर मिपा आणी ऐसी या दोन्ही संस्थळांवर कौल कमी पण त्या अनुषंगाने चर्चा झडझडून झडल्या. हिंदु धर्माचा किल्ला लढविणार्या सभादसदांनी दोन्ही संस्थळांवर कौल देताना हिरहिरीने भाग घेतला नाही (मी देखील घेतला नाही). ते एकतर प्रतिसादापुरते किंवा वाचनमात्र उरले. उदा. बॅटमन, अरुण जोशी (हे रिटायर झाले की त्यांना सीआरएस दिली ? ) वगैरे वगैरे. माझा चुकीचा गैरसमज झाला असेल तर माफ करा. काही हिंदूंनी (गुरुजींच्या भाषेत सांस्कृतिक हिंदू आणि माझ्या भाषेत तळ्यातमळ्यात हिंदू). उदा. सत्यनारायण आवडत नाही पण प्रसाद एकदम यम्मी म्हणून खातो, पुजेला जायला आवडत नाही पण बायकोपुढे काही चालत नाही (सांगताना वाक्यरचना अशी की बायकोचे मन मोडणे अवघड जाते) इ. इ.
आपला धर्म आपल्या घरातच ठेवावा या मताचा मी असल्यामुळे मी या कौलात भाग घेतला नाही पण त्यावरील भाष्यात भाग घेण्यात मला तशी तांत्रिक अडचण जाणवत नाही. हेच मत जर इतर काही सभासदांचे असेल तर त्यांना एक डाव माफी. आता बाकीच्यांसाठी !
धार्मिक व्यक्तींसाठी :
सहसा असले कौल कितीही मोठ्या संस्थेने काढले तरी बर्याचदा ते वांझोटे असतात किंवा आपल्याला (म्हणजे संस्थेला) अपेक्षीत असणारे मुल (येथे रिझल्ट) जन्माला घालणारे असतात. मात्र गुरुजींनी काढलेला कौल खरोखरच निष्पक्ष रितीने काढलेला आहे व त्याचे रिझल्टस छोट्या समुदायावरुन काढलेला असला तरी तो १००% बरोबर आहे व हिंदू धर्माच्या मताला पुष्टी देणारा आहे. (धर्मग्रंथांचे मत असे की कलीयुगात धर्माला ग्लानी येते व बहुसंख्य लोक देवाला नाकारतात) मग ते नरकात जातील किंवा स्वर्गात किंवा ८४ लक्ष योनीत फिरत राहतील (कित्ती मज्जा नाही !!) याची पुष्टी करणे मला अजून जमत नाहीये. असो.
गुरुजींच्या कौलावर आक्षेप घेणार्यांनी असे म्हटले आहे की यात फक्त दोन्ही संस्थळावरील मोजक्याच व्यक्तींनी कौलाला प्रतिसाद दिलेला आहे. आक्षेप बरोबर आहे पण बाकीच्यांना कौल लावायला कुणी अडविले नव्हते किंवा कौलावर काहीही उत्तरे दिली असती तरी त्यांच्या घरावरची कौले उडाली नसती. बाकी जालावर जे उपस्थित नाहीत त्यांना पकडून आणून त्यांची मते आजमावयाची जबाबदारी गुरुजींची कशी ? मतदानासारख्या कर्तव्यावर उदासिनता दाखविणारे लोक्स अशा सर्व्हेवर भाग कशी घेतील ? तुम्हाला तुमची बाजू पक्की करावयाची होती, धार्मिकता वाढली असे दाखवायचे होते तर तुम्ही हिरहिरीने भाग घ्यायचा होतात. की दोन्ही संस्थळांवर नवीन सभासदत्व घेण्यास काही अडचणी येत होत्या ? जुन्या सभासदांना संस्थळांचा सर्वर अनरिचेबल होता ? की एसेमेस स्पर्धा घ्यायची ? की व्हाटसअॅपवर कौल घ्यायचा ?
गुरुजींनी असेही म्हटलेय की इंग्लंड अमेरीकेत जी परिस्थीती आहे ती लवकरच भारतातही पहायला मिळेल. बर्याच जणांनी त्याला विरोध केलायं पण गुरुजींचे निरिक्षण अचूक आहे.
तुम्ही आजुबाजूला पहा, इंग्लंड अमेरीकेतल्या किती प्रथा इथे लोकप्रिय झाल्यात. त्यातील मुळच्या चांगल्या किती, वाईट किती ?
त्याचे भारतीयकरण करुन आपण किती दिवे लावलेत ? क्रिसमसमधे नाताळबोवा बघता ना ? फाटक्या चिंध्यांचे कपडे, हातात दारुची बाटली आणी कंबरडे मोडलेल्या अवस्थेत फाटक्यातुटक्या अवस्थेत तशाच एखाद्या फाटक्यातुटक्या खुर्चीवर बसवणे. येणार्या जाणार्यांकडे भीक मागणे ? अरे गणपती, नवरात्र, दहीहंडी ची वर्गणी कमी पडते काय रे ? परक्यांच्या देवाच्या नावाखाली असली पापे करता ? कुठे फेडाल हे ? अहो दोन /तीन बायका करायला मिळाव्यात किंवा उघडपणे दारु प्यायला मिळावी म्हणून धर्म बदलणारे नग देखील तुम्हाला या देशात सापडतील.
३१ डिसेंबर घ्या. रात्रभर गांड (संत तुकाराम महाराज यांचे विशेष आभार. तुम्ही शब्दांची रत्ने आणि शस्त्रे दोन्ही उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल) हलवत नाचायचे, धिंगाणा करायचा आणी दुसर्यादिवशी तीच वर करुन पडायचे याला नववर्षाचे स्वागत करणे म्हणतात ? धन्य आहे तुमची. १ जानेवारी ला तुम्ही उगवणारा सुर्य पाहिलाय काय हो ?
तर सांगायचा मुद्दा असा की इंग्लंड अमेरीकेत जे झाले ते इकडेही होणार आणि मुळ धर्मातल्यांपेक्षा बाटगे अधीक कट्टर असतात त्याप्रमाणे इकडचे निरीश्वरवादी भविष्यात अधीक कट्टर होणार यात संशय नाही. आता तुमची मेजॉरीटी आहे म्हणून तुमचा आवाज आहे. उद्या त्यांची झाली की त्यांचा आवाज होणार. हा निसर्गनियम आहे. तो तुम्ही आम्ही बदलू शकणार नाही.
तुम्हाला मिरविण्यासाठी, नाचगाण्यासाठी धर्म हवा आहे की मनःशांतीसाठी ते आधी नीट ठरवा आणी मगच तुम्ही धार्मिक आहात की नाही या प्रश्नाचे उत्तर द्या. इथे किंवा इतर कोणत्याही संस्थळावर नाही दिले तरी चालेल पण स्वतःच्या मनाला नक्कीच द्या.
निरिश्वरवादींसाठी :
देव बिव असं काही नसतं. माणसाने देव बनविलाय, देवाची गरज फक्त कमजोर लोकांना पडते असा विचार करणार्यांसाठी.
किंवा
देव माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कोणीही माझा केस सुद्धा वाकडा करु शकत नाही (ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत त्यांनी माझे केस वाकडे करुन दाखव)
किंवा
उसकी मर्जी बिना इक पत्ता हिलता नही (निवडुंगाचं झाड देवाला दाखवून याची पाने हलवून दाखव बरे) अशी चॅलेंजेस तुम्ही भविष्यात देऊ शकता.
तर सांगायचा मुद्दा असा की कमजोर / धार्मिक लोक दु:ख, अपयश आले तर देवाची मर्जी समजून देवावर हवाला ठेऊन पुढची वाटचाल करतो. तुमच्या सुदैवाने तुम्हास त्याची गरज नाही. पण मग तुम्ही तुमच्या दु:खाचे अपयशाचे खापर दुसर्या कोणावर तरी फोडता का ? नसाल फोडत तर उत्तम. फोडत असाल तर तुम्हाला अजून बरीच वाटचाल करायची आहे. कारण तुम्ही अजूनही दुसर्या कोणाचा तरी खांदा वापरताय.
'धार्मिकता दिवसेंदिवस कमी होत जाईल' ह्या डायलॉगचे पेटंट धार्मिक लोकांकडे आहे तेव्हा कृपया तुम्ही याचा वापर करु नका ही मनापासून कळकळीची विनंती. कारण एक सुविचार सांगतो की 'अस्तित्त्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर देव नाही म्हणता तर धार्मिकता कोठून येणार ? आणी जर देव नाहीच तर तो नष्ट कोठून होणार ? अहो, अजून जगातील कैक लोक भुताखेतांवर, जारणमारण, नजर लागणे सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणी त्याही अजून नष्ट होत नाहीत तर देवावरची श्रद्धा कोठून नष्ट होणार ? असो.
वर एक मुद्दा असा आला आहे की धार्मिकता कमी झालेली आहे मग धर्माचे सोहळे वाढतायेत त्याचे काय ? धर्माची गरज अडाणी लोकांना जास्त असते पण सुशीक्षीत तरुणांचे तांडेही यात हिरहिरीने भाग घेतात. हे चित्र नक्की काय दर्शविते ? याचे उत्तर असे आहे की तुमचा निष्कर्ष बरोबरच आहे. हे सर्वेक्षण एका अत्यंत लहान गटाचं आहे त्यामुळे काही विशेष फरक पडलेला नाहिये. जे धर्माचे सोहळे वाढले आहेत ते केवळ दिखाऊ आहेत. भारतातील हिंदू असो, मुसलमान (शब्द बरोबर आहे ना की मुस्लीम असा वाचायला आवडतो तुम्हाला ? ) असो, की बौद्ध असो. सगळ्यांनाच दिखाऊपणाचे प्रचंड वेड आहे. गणपती, देवीच्या मिरवणूका बघा, आंबेडकर जयंती बघा किंवा चाँद रात, ईद च्या मिरवणूका बघा फक्त देव, टोप्या, फेटे आणि टिळ्याचे रंग बदललेले असतात. ह्याबाबतीत मात्र आपण सारे भारतीय एक आहोत. त्यातल्यात्यात थोडासा धार्मिक माणूस बघायचा असेल तर मिरवणूकीच्या गाडीत मुर्तीला धरुन बसलेला, प्रसाद वाटणारा, आरतीचे ताट घेऊन बसणारा बघा. बाकी सगळे चमकोच असतात. काये की सर्वसामान्य माणसाला घरी दारी, ऑफीसमधे नेहमीच अपमान सहन करावा लागत असतो. पैसेवाल्यांच्या, प्रसिद्ध लोकांच्या तुलनेत तो कोणीच नसतो. त्याला एक दिवसाचा तरी हिरो व्हायचं असतं. त्यामुळे तो अशा फंक्शनमधे भाग घेत असतो इतकेच. शिवाय सुशिक्षीत झाले म्हणजे धर्माविषयीच्या ज्ञानात भर पडते असे काही नाही.
सांस्कृतिक हिंदूसाठी :
बाबांनो, तुमच्यासाठी माझ्याकडे लिहिण्यासाठी जास्त काही नाही. एवढेच सांगणे की कोणत्यातरी एका मार्गाने चाला. आयदर राईट ऑर लेफ्ट. मध्यममार्गीयांची काय अवस्था आहे या देशात कल्पना आहे ना ? ना घर का ना घाट का. तेव्हा कोणतीतरी एक बाजू पकडा. असे अधांतरी लटकत राहू नका.
धन्यवाद !
प्रतिसाद आवडला
पण एक किरकोळ मुद्दा.
अस्तित्वात नसलेल्या गोष्टी नष्ट होत नाहीत' हे देवाविषयी म्हणता येईल; पण धर्माविषयी? आपण देव-धर्म असा जोड शब्द वापरतो म्हणून ही गल्लत होते का?
मुळात धार्मिकता म्हणजे काय याविषयीच प्रचंड संदिग्धता आणि मतभेद आहेत. कोणी म्हणतात की रूढी-परंपरापालन हा खरा धर्म नव्हेच. आता 'त्याज्य' रूढीपरंपराभंजन हे पुरोगाम्यांचे आद्य कर्तव्य. पण जर रूढीपरंपरापालन हा खरा धर्मच नसेल तर त्या त्याज्य असोत वा नसोत, पुरोगाम्यांना कशाला झोडपायचे? बरे, हा असा धर्म नसेल तर खरा धर्म दुसरा कोणता? पुन्हा, इतर कोणी धार्मिक आणि आध्यात्मिक : रिलिजिअस-स्पिरिचुअल असा घोळ घालतात. बरे हे दोन्ही गट एक्स्क्लूज़िव नाहीतच. म्हणजे स्पिरिचुअल = मनातून धार्मिक किंवा धार्मिक=मनातून स्पिरिचुअल असाही अर्थ लागत नाही. नीतिमान असणे म्हणजे धार्मिक की आध्यात्मिक? धार्मिक असणे म्हणजे नीतिमान असणे असते का? ह्यावर अनेक वेळा चर्चा झाल्याही असतील, आणि,
कौलाच्या विश्लेषणात्मक धाग्यावर हे खरे तर अवांतर. (पण अवांतराची सवय जात नाही. काय करणार?)
संभ्रम पडला कि कौल घ्यावा
संभ्रम पडला कि कौल घ्यावा लागतो. मग तो देवाचा घ्या नाहीतर माणसांचा घ्या! असो
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
--म्हणजे उदाहरणार्थ 'धर्म
--म्हणजे उदाहरणार्थ 'धर्म माझ्या आयुष्यात महत्त्वाचा आहे' असं म्हणणारे भारतात साधारण ९० टक्के लोक आहेत. ही संख्या वाढून ९४% होईल का काही काळाने? जर ती दहा वर्षांनी ८३% झालेली दिसली तर तुमचं भाकित चुकलं असं म्हणाल का?---
>>>
छोट्याश्या कौलातून ९०% चे ८५% झाले का ९५% झाले हे कळणे अवघड आहे.
सिनेमा/नाटक/खेळ शिवाय निरनिराळे उद्योग जसे पर्यटन/हॅाटेल/खाद्यपदार्थ विक्री/ धार्मिक आचरणाचा पुरेपुर फायदा उठवत आहेत.शिवाय दिवसेंदिवस आर्थिक अस्थिरपणास घाबरणारे लोक वाढत आहेत ते देवधर्माकडेच धावणार.
निर्ढावलेला मनुष्यच नास्तिक राहू शकतो.आणि असे लोक कमी होत चालले आहेत.
एक वैचारिक मुद्दा विरुद्ध संख्याशास्त्र असा हा प्रश्न आहे.संख्याशास्त्रातल्या निर्णय काढण्यातली खोट ( drawback)म्हणजे sample/नमुना खराच प्रातिनिधीक आहे का?वैचारिक मुद्द्यातली खोट म्हणजे एखादा माणूस अ/ब/क विषयी योग्य बोलला म्हणजे 'ड'विषयीही त्याचे मत बरोबरच असेल असे नाही.
स्टॅटिस्टिक्स
वर माझ्या उत्तराला खवचट श्रेणी मिळाली आहे, म्हणून हे उत्तर.
स्टॅटिस्टिक्समध्ये महत्वाचे आहे म्हणजे विदा आणि त्याचे विश्लेषण. The point of statistical analysis is to determine to what degree, if at all, the hypothesis may be said to hold true for a generic class of subjects, when all other possible influencing factors are accounted for or eliminated. This is usually done by taking a large enough number from a sufficiently diverse pool of subjects within the said class.
Statistics published in peer reviewed journals are likely to be better, and are at least open about the methods, but even then there are often arguments about the validity of the analysis used and possible biases in the population.
सर्वात महत्वाचे म्हणजे काढलेला निष्कर्श अचूक आहे, ही बाब पुन्हा-पुन्हा सिद्ध करता आली पाहिजे. (It should be reproducible.) याकरता लॉ ऑफ लार्ज नंबर्स वापरतात.
स्टॅटिस्टिकचा वापर करून आपल्याला पाहिजे तसा निष्कर्श काढता येतो. बर्याचदा आपले मत पुढे करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स वापरले जाते. ते कसे हे पाहू.
१. स्वतःला सोयीस्कर डेटासेट वापरायचा.
समजा तुम्हाला सिद्ध करायचे आहे की हल्लीची मुले/मुली पालकांच्या तुलनेत तंबाखू कमी वापरतात. मग तुम्ही सर्वे घेताना उदगीरच्या कॉलेजात मुलींना प्रश्न विचारायचे पण निष्कर्श काढताना "महाराष्ट्रात तंबाखू वापर कमी झाला" असे म्हणायचे. समजा तुम्हाला सिद्ध करायचे आहे की हल्लीची मुले/मुली पालकांच्या तुलनेत तंबाखू जास्त वापरतात मग तुम्ही आयटीसी कंपनीचा वाढता रेवेन्यू सर्वेसाठी वापरायचा.
२. सोयीस्कर प्रश्न विचारायचे.
बाबरी मशीद पडली किंवा गुजरातमध्ये दंगे झाले, तेव्हा सरकारला दोष द्यायचा असेल तर पुढील प्रश्न विचारायचे.
तुमच्या मते सरकारला अपयश आले का?
a) No, they did everything possible.
b) Yes, security could have been a bit tighter.
c) Yes, the government is hopelessly incompetent.
d) Yes, the government did it on purpose.
e) Not sure.
अर्थात फार कमी लोक a) पर्याय वापरतील, म्हणजे तुमचा मुद्दा सिद्ध झाला.
३. अॅवरेज, मीन, मिडियन हे स्वतःच्या सोयीनुसार वापरायचे.
मी काही विचारवंत नाही, पण पुढील मते पुरेशी बोलकी आहेत.
* There are lies, damned lies and statistics. - Mark Twain
* Statistics are used much like a drunk uses a lamppost: for support, not illumination. - Vin Scully
* There are two ways of lying. One, not telling the truth and the other, making up statistics. - Josefina Vazquez Mota
* It is the mark of a truly intelligent person to be moved by statistics. - George Bernard Shaw
* I can prove anything by statistics except the truth. - George Canning
* Do not put your faith in what statistics say until you have carefully considered what they do not say. - William W. Watt
हे सगळंच मान्य आहे. म्हणूनच
हे सगळंच मान्य आहे. म्हणूनच कौल घेताना त्यामागचं उद्दिष्ट आणि त्यासाठी तयार केलेले प्रश्न हे सगळ्यांसमोर स्वच्छपणे मांडलेले असले पाहिजेत. मला प्रश्न असा पडतो की कौलाबद्दल घेतलेले आक्षेप कौलावरच का नाही नोदंले गेले?
विश्लेषण करताना कौलाच्या मर्यादा स्पष्टपणे मांडल्या असल्या पाहिजेत. इथे त्या केलेल्या आहेत. निष्कर्ष आख्ख्या समाजाला लागू नाहीत तर या कौलाला प्रतिसाद देणाऱ्यांच्या गटाबद्दल बोलतो हेही स्पष्ट म्हटलेलं आहे. असं असताना हे स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर कशासाठी?
इथे प्रश्न असा आहे की या कौलांमध्ये भाग घेणारांचं खरोखर प्रमाण भारतातल्या लोकसंख्येमध्ये किती आहे. माझा अंदाज सांगितला - २० टक्के. तो तितका का असावा याबद्दल काही सपोर्टिंग आकडेवारीही दिलेली आहे. जर हा २० टक्के आकडा मान्य असेल तर त्या २० टक्क्यांसाठी निष्कर्ष लागू आहेत असंच म्हटलं पाहिजे. आणि लेखात तेवढंच म्हटलेलं आहे. तुम्हाला जर हा आकडा कमी असेल असं वाटतं तर त्यासाठी काहीतरी आकडेवारी, कारणपरंपरा द्या. ज्या ४९ लोकांनी उत्तरं दिली ते कुठच्या ना कुठच्या गटाचे प्रतिनिधी आहेतच. तो गट किती मोठा आहे, अथवा लहान आहे यावर वाद होऊ शकतो. कौलच इनव्हॅलिड कसा ठरतो?
२०% बद्दल
२०% बद्दल मी वरती लिहिलेलं परत ईथे उद्धृत करतो कारण तुम्ही माझ्या त्या मुद्द्याबद्दल काहिही लिहिलं नाहीयेत पण ईथे परत तोच निष्कर्श वापरताय;
४९ लोकं = २०% लोकातले हे ठीक आहे. पण ४९ = निदान १% लोकं असं असलं तर या ४९ लोकांचा प्रतिसाद त्या २०% लोकांचा प्रातिनिधिक आहे असं म्हणता येईल. १.२ बिलिअन लोकांच्या देशात ४९ लोकांचे प्रतिसाद २०% लोकांचे प्रातिनिधिक?? पण परत एकदा नोंदवतो की लेख पटलाय, पण कौलाची आकडेवारी अजिबात पटली नाहिये.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
+१
सहमत.
http://www.loksatta.com/aajch
http://www.loksatta.com/aajchepasaydan-news/religiousness-1143891/
या सर्वेच्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचनीय आहे. अगदी हा सर्वे वाचूनच लिहिला आहे असं वाटतं. लेखिकेने काही संशोधनांचे दिलेले दाखले आणि त्यातले निष्कर्ष रोचक आहेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लेख वाचला. किंचित धूसर वाटला.
लेख वाचला. किंचित धूसर वाटला. त्यातले धर्मामुळे चांगल्या गोष्टी होतात याबाबतचे अभ्यास नक्की कुठचे, कोणी केलेले आहेत याबद्दल संदिग्धता आहे. तसंच धार्मिक लोकांची जी उदाहरणं आहेत, तशीच बिनधार्मिक लोकांची नसतात असं अध्याहृत आहे. ते तितकंसं झेपलं नाही.
नक्की कुठचे, कोणी केलेले आहेत
सहमत आहे. नक्की कुठले पेपर ते समजायला हवं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गट ३
एकाच वेळी गट ३ मध्ये ७४ टक्के आणि ३ टक्के निवड कशी शक्य आहे?
टायपो असावा. दोन्ही नाही वाले
टायपो असावा. दोन्ही नाही वाले ३ ट़क्के असावेत.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !