नेटकिड्यानों सावधान ! ! !
नेटकिड्यांसाठी एक बुरी खबर आहे. समाजाला नेटकिड्यांची चिंता लागून राहिलेली आहे. त्यांना हा आपला किडा निष्क्रिय होतोय की काय आणि विकृत माणसांच्या तावडीत सापडतोय की काय याची काळजी लागली आहे. पण आम्ही किती वस्ताद आहोत, हे समाजाला काय ठाऊक ? पण त्यांची चिंता रास्त आहे. आपण त्यांना चिंता करू नका , असे ठणकावून सांगू या! खरं आयुष्य समजावून घेण्यासाठी म्हणे त्याला भिडायला लागतं. कुठल्या पुस्तकातनं किंवा सिनेमा नाटकातनं आयुष्य समजावून घेता येत नाही. अनुभवावं लागतं. पण आपले पुस्तकीकिडे ऐकतील तर शपथ्थ ! आपण त्यांना पुस्तकी विद्या किती निरुपयोगी आहे, असं सांगूनही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. पण आता तीच पुस्तकीकिडे आणि समाज आपल्याला नेटकिडे म्हणून हिणवू लागले आहेत. समाज तर अजून पुस्तकीकिडा परवडला परंतु, हा नव्या प्रकारचा नेटकिडा नको, असे कोकलू लागलाय. आपल्याला कसे आवरायचे असा त्यांना प्रश्न पडला आहे. घरोघरी हीच बोंबाबोंब सुरू झाली आहे. कारण म्हणे या नेटकिडयाने माणूस निष्क्रिय बनतो. येऊन्-जाऊन नेट अशी परिस्थिती झाल्यामुळे माणसाची कृतीशीलता शून्य हो ऊन बसते. एक प्रकारची विकृतीच मनात बसते. असा त्यांचा कांगावा आहे. ( खरं तर समाजाला अक्कल नावाची चीज नाही) नेटवर एकदा माणूस बसू लागला की हळूहळू तो माणसाचा ताबा घेतो. त्यामुळे एकप्रकारची नशाच चढते. ( ती काय दारू आहे?) त्याची सोशल नेट्वर्किंग हा तर आणखी एक प्रकार ( देशी दारू) जो माणसाला वेड लावतो. पाक आडवा करतो. माणसाला एकाही सोशल साईट्चा सदस्य नसल्यास " हाय कंबक्त तुने पीही नहीं" असं वाटायला लागतं म्हणे आणि मग नेट ढोसलंच पाहिजे म्हणून त्यात शिरतो. पण त्यात माणूस अडकून पडतो, असा त्यांचा दावा आहे. ( आम्ही का दूध खुळे आहोत) नेटीझन कुठे ना कुठे गुंततो आणि त्यातून त्याची महिती बाहेर जाते. आणि विकृत मंडळी त्याचा दुरुपयोग करतात. ( आम्ही काय वेड्याच्या इस्पितळातले वेडे आहोत का आमची खरी नावे , पत्ते द्यायला. आडकित्ता, लिंबूटिंबू, चिंजंश्रामी, बंकू कुमार, विसोबा खेचर, मचाककथेतील खाजकुमार,३_१४ विक्षिप्त अदिती,धनाजीराव वाकडे,अर्धवट, घंटासूर, दुष्काळनाम्या ही नावं काय आमची खरी आहेत. वेडेच कुठचे? आम्ही लय भारी हुश्शार आहोत.... समजलं) नेटकिड्यांना अश्लिल मजकुरांची बाधा होत नाही. मानसिक स्वास्थ्य धोक्यात येतं. काही मंडळी विचारस्वातंत्र्याच्या नावाने काही नेटवर टाकतात म्हणे आणि त्याचं समर्थन करतात म्हणे. त्यामुळे माणूस प्राणी धोक्यात आला आहे. ब्लोग, सोशल नेटवर्किंगमध्ये नसते विषय चर्चेला टाकतात आणि त्याचे बिनधास्त चर्वितचर्वण करतात. सभ्यतेची मर्यादा तिथे पाळली जात नाही. लहान्-मोठा असा भेदभाव न करता, मोठ्यांना वाट्टेल तसे बोलले जाते. त्यामुळे संस्कार मातीत चालला आहे, असा त्यांचा समज झाला आहे. ( पण आम्हाला माहित आहे, आम्ही कुठे चाललेलो नाही. आहे तिथे आहे. समाजच मागेमागे चालला आहे. त्याला आपण काय करणार ?) समाजाने या सगळ्या गोष्टींचा धसका घेऊन दिवसातले काही तास आणि आठवड्यातले काही दिवस नेटला हात लावायाचा नाही, असा हुकूम काढण्यासाठी धडपड चालली आहे. ( आपल्याला नाही बुवा, ड्राय डे चालणार , कोण आमच्या आडवे येईल त्यांच्या............. त्यांच्या नावाने शंख मारू)
आडकित्ता
वेड्याच्या इस्पितळाबाहेरचे वेडे नावं अन पत्ते देतात का?
आपला नम्र,
नट क्रॅकर (आडकित्ता)
(आमचे इथे चिकणी, भाजकी, बरडा, साधी, ओली इ. कातरून मिळेल)
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
साफ चूक
सर्वप्रथम चर्चाप्रस्ताव विस्तृतपणे मांडल्याबद्दल अभिनंदन.
नेटकरांवरती टीका करणाऱ्यांना बोल लावण्याच्या मिषाने टीका करण्याचा तिरकसपणाही मस्त.
तुमचं म्हणणं मात्र साफ चूक आहे. नेटकिड्यांवर टीका करणाऱ्यांचं ३१४% बरोबर आहे. ही नेटाची नशा भारी वाईट. नेटवर माणूस बसला की तो दारूच्या गुत्त्यात बसल्यासारखाच. मग घरातच मधुशाला होऊन जाते. नवरा बायको एकमेकांशी भांडण्याऐवजी नेटवर आपले जुने हरवलेले मित्रमंडळी शोधून, किंवा नवीन सापडून आनंदाच्या नशेत जातात. हा आनंद अर्थातच खोटा असतो कारण नेटमुळे जे मित्र होतात ते खरे थोडेच असतात? आणि असले तरी तेसुद्धा नेटची दारू झोकलेले. या नशेत भर पडते ती विकिपीडिया वगैरे सारख्या ज्ञान देणाऱ्या सायटींची. एकंदरीत नेट म्हणजे दारू असेल तर विकिपीडिया म्हणजे गर्द आहे. नवीन माहितीमुळे माणसाचं आयुष्य उजाड होऊन जातं. त्याची कृतीशीलता संपून जाते. त्यापेक्षा टीव्ही बघणं, मित्रांच्या चौकडीबरोबर खऱ्या गुत्त्यात जाऊन दारू पीत गप्पा मारणं याने माणसाचं जीवन किती तरी समृद्ध होतं. आपले आईवडील, आजोबा पणजोबा वगैरे जगलेच ना नेटशिवाय? काय बिघडलं त्यांचं? माझ्या मते ही नेटची नशा इतकी वाईट आहे सरकारने आपल्याकडचे सगळे असतील नसतील तितके बॉंब टाकून हे नेट उध्वस्त करून टाकायला हवं. आणि हो, तसं करताना हे सगळे मोबाईलचे टॉवरदेखील उडवून टाकावेत, कारण ती दुसरी नशा आहे. नेट आणि मोबाईल बंद झालं की बघा कसे लोक एकमेकांशी बोलायला लागतील ते. आणि हवंय कशाला ते अभिव्यक्तीस्वातंत्र्य? चाटायला? पाश्चिमात्त्यांचं अंधानुकरण आहे नुसतं.
या नेटच्या नशेने इतके संसार उध्वस्त झालेले आहेत की लवकरच 'एकच वेबसाईट' नावाचं नाटक येणार बघा.
खरंय
आम्ही तर नवरा-बायकोला नेटावर एकमेकांना पुन्हा नव्याने भेटताना पाह्यलंय, आता बोला!!
(पळ लेकाच्या...)
-Nile
म्हणजे
अगदी 'तू भेटसी नव्याने, बाकी जुनेच आहे...' या गजलेसारखं की काय?
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
हो...
संस्थळ 'तस्लेच' आहे, अन हाच पेच आहे!
किंवा
आयडी तोच आहे, अन हाच पेच आहे!
असंही असेल हो... अनुभव नसल्याने इतर शक्यतानाही जागा खुली ठेवा की.
नेटकिड्यापासून नव्या पिढीचे
नेटकिड्यापासून नव्या पिढीचे रक्षण करावे यासाठी प्रो दवणे यांचे व्याख्यान आयोजित करावे काय
.
Everything in LIMIT!!!सर्व
Everything in LIMIT!!!
सर्व काही मर्यादेपर्यंत शोभून दिसते. नेट्चे देखील तसेच.
पण मी एका लेखात वाचले होते की नेट सर्फींगमुळे (संस्थळे आदि) माणसाचा एकलकोंडेपणा कमी होतो आणि "Belonging" ची खोटी का होईना भावना वृद्धीस लागल्याने मानसिक आरोग्य सुधारते.
असेल बुवा.
ओ काकू!
तूम्ही असले लेख वाचणं बंद करा पाहू आधी! असले लेख वाचल्याने मानसिक आरोग्य बिघडू शकते असे मी एका लेखात वाचले होते!
-Nile
:)