सुजाणांची हताशा ('A Walk in the woods' नाटक समीक्षा )
(नाटक इंग्रजीत आहे . ज्यांना संपूर्ण कोरी पाटी हवी आहे त्यांनी बघितल्यावर वाचावे . )
ली ब्लेस्सिंग च्या 'अ वॉक इन द वुड्स ' याच नावच्या नाटकाचे हे भारतीय रूपांतर आहे . रत्ना पाठकने हे दिग्दर्शित केले आहे . रजित कपूर आणि नसीरुद्दीन शाह हे दोनच कलाकार त्यात आहेत . लेखाचे शीर्षक हीच नाटकाची थीम आहे . या सुजाण पात्रांप्रमाणे प्रेक्षकाला सुद्धा ही हताशा जाणवते . पण तरी एक दर्जेदार कलाकृती पाहिल्याचे समाधान घेऊनच प्रेक्षक घरी परततो .
राम चिनप्पा (रजित कपूर ) हा भारतीय दूत आणि जमालुद्दीन लुफ्तुल्लाह (नासिर) हा पाकिस्तानी दूत जीनीवाला शांतिप्रस्तावावर चर्चा करायला भेटतात. नेहमीप्रमाणे टेबलवर बसून वाटाघाटी करण्यापेक्षा आपण निसर्गाच्या जवळ म्हणजे झाडांमध्ये बसून बोलूया म्हणून जमाल सुचवतो . 'नो नॉनसेन्स' पद्धतीच्या रामला ते अजिबात मान्य नाही . पण हा प्रस्ताव मार्गी लागावा म्हणून तो जमालची अट मान्य करतो . पण तरी जमालला प्रस्तावापेक्षा गप्पा आणि मैत्री यातच जास्त रस असतो . तो प्रस्तावावर चर्चा करायला आणि स्वतच्या वरिष्कठाडे तसेच पंतप्राधांनांकडे घेऊन जायला नाखुशच असतो . त्यापेक्षा त्यांची मैत्री वाढवण्यातच त्याला रस असतो . पण का ? शेवटी राम मैत्री चालू ठेवायची असेल तर हा प्रस्ताव पाकिस्तानी पंतप्रधानांकडे नेऊन दे म्हणून बजावतो. नाइलाजाने तो देतो . प्रस्ताव हा त्यालाही १००% योग्य वाटतो . पण तो मंजूर होणार नाही याची त्याला खात्री असते . त्याच्या अपेक्षेप्रमाणेच तो नामंजूर होतो . त्याचं कारण एवढेच की हा प्रस्ताव भारताने तयार केला आहे . आणि तो जर मंजूर झाला तर भारताला श्रेय मिळेल ! राम हताश होतो . शेवटी तो सुचवतो की आपण व्यक्तिश: दोघे मिळून एक आदर्श प्रस्ताव तयार करूया . तो कुणा एका राष्ट्राचा असणार नाही . जमालही त्याला मान्यता देतो . दोघे विचार करून एक आदर्श प्रस्ताव तयार करतात आणि एकमेकांच्या प्रमुखांना दाखवायला नेतात . आणि ......
युद्ध कोणालंच नको आहे . पण खरच तस आहे का ? वेळोवेळी तर ही युद्धखोरी आणि असहिष्णूता वाढतच चालली आहे . ( हे नाटक आत्ता नाही तर फार पूर्वी लिहिले आहे . आणि ते अमेरिकेत लिहिले आहे . म्हणजे हा प्रॉब्लेम संपूर्ण मानवजातीचा होतो आणि त्यामुळे जास्तच गंभीर होतो.) जर कुणी आपल्यावर हल्ला करत असेल तर आक्रमक होण्यात काही वाईट नाही . पण अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असताना ही युद्धखोरी मुद्दाम जोपासली जात असेल तर ? ज्याने मुख्य प्रश्न बाजूला पडावेत ? प्रेक्षकाला विचार करायला भाग पडतो .
पण तरीही या नाटकाचा विषय हा नाही . दोन संपूर्ण विरुद्ध परिस्थितील व्यक्तींचं एकत्र येणे , आणि एकाच कारणासाठी दु:खी असणं आणि शेवटी एकमेकांचे सांत्वन करण हे खरं महत्वाचं आहे. एका अर्थाने ते एकमेकांमध्ये solace शोधतात. दोन सुजाण व्यक्तींना काही गोष्टी जाणवतात . ते सुधारण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न आहे . पण आजूबाजूची परिस्थितीच त्यांना साथ देत नाही . ते अल्पमतात आहेत हे त्यांना जाणवतं . आणि त्याहीपेक्षा आपल्या कामाला आणि हुद्द्याला काही अर्थ नाही . आपल्याला करण्यासारखं काहीच नाही याने त्यांना वैफल्य येते . आपली कुणाला गरजच नाही ही ती हताशा आहे . राम त्या जागेवर नुकताच आला आहे . कुणाला जमले नाही ते आपण करून दाखवू म्हणून त्याच्यात अमाप आत्मविश्वास आहे . नंतर त्याला त्याची निरर्थकता पटते आणि त्याला नैराश्याचा झटका येतो . तो स्वत:ला जमालच्या साथीने सावरू पाहतो.
जमालला आधीच या सगळ्याची निरर्थकता पटलेली आहे . त्यामुळे हे करण्यात त्याला काहीच रस वाटत नाही . त्यापेक्षा आलो आहोत तर निसर्गाच्या सानिध्यात मन रमवावे , समोरच्या माणसाशी मैत्री करावी , गप्पा माराव्यात (या गप्पांमध्येच दोन्ही देशांच्या मैत्रीची खरी शक्यता आहे असेही सुचवले जाते आणि त्या गप्पा एक प्रतीक बनतात) हे त्याला जास्त बरं वाटतं . ज्यावेळी दोघे मिळून स्वत : चा एक प्रस्ताव बनवतात तेव्हा त्याला पुन्हा एक आशा वाटू लागते . स्पोईलर अलर्ट : पण अहंकारामुळे दोन्ही देशांचे पंतप्रधान हा प्रस्ताव फेटाळतात. स्पोईलर अलर्ट समाप्त. मग जमाल निवृत्ती घेतो आणि नैराश्याचा झटका आलेल्या रामला ही तेच सुचवतो. जर तू ते केलं नाहीस तर तुझ्या संवेदनशील मनामुळे तू विझुन जाशील असे त्याला बजावतो . या सर्व मांडणीत दोघांची व्यक्तिरेखा अत्यंत विचारपूर्वक लिहिली आहे .
नाटकाची नर्म विनोदी हाताळणी त्रासदायक वास्तवाला सुसह्य बनवते पण वास्तवाला ओवरलॅप करत नाही . नाटकात नेपथ्य ही एकच आहे . पण ते आशय मांडायला पुरेसं आहे . अनेक संवाद टाळ्या घेतात. पण ते टाळीबाज नाहीत . ते हुशारीने लिहिल्याचे जाणवते . खर तर वर म्हणल्याप्रमाणे नाटक हे रूपांतरित आहे . पण त्याचे रूपांतरित असणे अजिबात जाणवत नाहीत . इतके संवाद इथल्या वातावरणात मिसळून जातात . जमालचा शेवटचा संवाद : "Look at those beautiful trees , soon they will be cut to make negotiating tables ." अंगावर काटा आणतो . असे अनेक संवाद नाटकात आहेत . च्युइंगगमचा संवाद रामचे नैराश्य आणि त्याला जोडलेली प्रतीके अचूक पकडतो .
रजित कपूर आणि नरीरुद्दीन शाह यांचा अभिनय अप्रतिम आहे . कडक शिस्तीचा आणि नो नॉनसेन्स प्रकारचा राम रजित कपूर अचूक पकडतो . त्याच्या आवाजातला कडकपणा आणि त्याच वेळेला असलेली काळजी आणि इच्छा लाजवाब . नसीरुद्दीन शाहने जमाल सुंदर रंगवला आहे . त्याची हताशा त्याने केवळ नजरेतून सुंदर प्रकट केली आहे . त्याची व्यथा त्याच्या आवजातून येतेच . पण काही अंशी आता त्याचा अभिनय predictable ही वाटतो. विरामाच्या जागांचा अचूक वापर दोघांनीही केला आहे .
रत्ना पाठक ने दिग्दर्शन योग्य रीतीने केले आहे . प्रयोग छान बांधीव झाला आहे . असलेल्या अनेक जागा व्यवस्थित शोधल्या आहेत . प्रकाशयोजना नाटकाला आवश्यक असणारी दिवसातली वेळ आणि त्यापेक्षाही वेगवेगळे मूड्स अचूक पकडते . वेशभूशेचा इथला उपयोग तर फारच जमला आहे . पहिल्यांदा भेटतात तेव्हा दोघांची फॉर्मल वेशभूषा आणि नंतर बदलणारी आणि शेवटी पुर्णपणे होणारी इन्फॉर्मल वेशभूषा त्या दोघांची वाढत जाणारी जवळीक दाखवते .
चूक काढायची म्हणली तेर असं म्हणता येईल की त्या दोघांची मैत्री पुरेसा वेळ न देता लगेच होते . पण मध्ये अनेक महिन्यांचा काळ जात असल्याने ही चूक फार मोठी नाही .
एकंदरीत हे नाटक अजिबात चुकवू नये असे आहे .
प्रतिक्रिया
परीक्षण आवडले. विशेषतः दोन
परीक्षण आवडले. विशेषतः दोन अगदी विरुद्ध विचारांच्य व्यक्तींचे एकत्र येणे वगैरे प्लॉट मस्त आहे, व्यक्तीचित्रणाला खूप स्कोप आहे.
दोघेही खरंतर एकाच विचाराचे
धन्यवाद . पण दोघेही खरंतर एकाच विचाराचे आहेत . पण एकला फोलपणा पटलाय तर दुसर्याला आशा आहे . व्यक्तिचित्रणाला खूप स्कोप आहे हे खरंच ! ते व्यवस्थित केलय सुद्धा .
पण एकला फोलपणा पटलाय तर दुसर्
अगदि खरे हा जो फरक आहे त्या फरकाला काय नाव ते माझ्या लक्शात येइना अन म्हणुन मि "विचारातेल फरक्' म्हटले
. पण आपण ते नक्कि काय ते व्यवस्थित मांडलेले आहेच्.
इंटरेस्टिंग वाटतेय नाटक. मूळ
इंटरेस्टिंग वाटतेय नाटक. मूळ नाटक कुठल्या देशात घडते?
माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com
धन्यवाद
मूळ नाटक अमेरिका आणि रशिया यांच्या परिस्थितीवर घेतलेले आहे . घडतं जीनीवातच .