चळवळी यशस्वी का होतात, का फसतात?

चळवळी यशस्वी का होतात, का फसतात?

लेखक - आनंद करंदीकर

२०११ सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ’निर्माण’ चळवळीच्या मुलामु्लींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख तयार केला आहे. कंसांमध्ये श्रोत्यांनी विचारलेले प्रश्न थोडक्यात मांडलेले आहेत. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (त्यामुळे काही ठिकाणी प्रमाणभाषेबाबतच्या संकेतांचे झालेले उल्लंघन नजरेआड करावे - संपादक.)

भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोनतीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले. त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे. आणि नंतर काही महत्त्वाची तत्त्वे आहेत, किंवा त्यांचे आधार आहेत, ते उलगडून दाखवण्यासाठी मी या उदाहरणांचा वापर करणार आहे. सामाजिक बदल हे का घडतात, कशा स्वरूपात सुरू होतात यांच्याबद्दल मी काही सार्वत्रिकीकरण करणार आहे, पाच-सहा सूत्रे मांडणार आहे. त्या केस-स्टडीज्‌ आहेत. त्या मुद्दामहून अशासाठी निवडल्या आहेत की, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि सध्या त्या बदलाच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. मी चार मुख्य चळवळींबद्दल बोलणार आहे; चळवळी म्हणा, रचनात्मक कार्यक्रम म्हणा, सामाजिक बदल म्हणा.

संकरित गाईंचा जो महत्त्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात झाला होता आणि ज्याच्यातून धवलक्रांती भारतात घडली, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. मी लहान असताना आम्हांला रेशनची कार्डे मिळायची आणि ती घेऊन रांगेत उभे राहायला लागायचे, दूध हवे असल्यास. आता विश्वास बसणार नाही पण चांगली पंधरावीस मिनिटे रांगेत थांबले की सकाळचे दूध मिळायचे. मग तसेच रांगेत थांबले की दुपारचे दूध मिळायचे. दसऱ्याला जर आईने असे ठरवले असेल, की श्रीखंड करायचे आहे, तर वीस दिवस आधी अर्ज करायला लागायचा, मग तो अर्ज मंजूर व्हायचा, मग त्या दिवशी जास्तीचे ५ लीटर दूध मिळायचे. आता वाण्याकडे जाऊन दूध मागितले की दूध मिळते, पिशवीत. चोवीस तास दूध मिळेल, वाण्याचे दुकान उघडे असेल. ही वरपांगी दिसणारी क्रांती आहे.

दुसरे, मी स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल बोलणार आहे. पण ती ७० सालच्या नंतरची. या चळवळीत मी पूर्वीपासून होतो. आम्ही जेव्हा चळवळीला सुरुवात केली, तेव्हा पुण्यात जवळपास रोज एक बाई जळून मरायची; लग्न केल्यापासून पुढच्या दोन वर्षांत. आणि हे नोंदलेले भाग होते. वर्षाला ३६० बायका जळून मरायच्या; ससूनमध्ये ’जळिताच्या केसेस’ असे ज्यांना म्हटले जायचे, त्या जवळजवळ दर वर्षी ५००० असायच्या. माहीत नसायचे की त्या जाळून मेल्या की अपघाताने जळून मेल्या. गेल्या तीस वर्षांत हे प्रमाण जवळपास नगण्य झाले आहे. कालच एक दुर्दैवी बातमी आली. एका सुनेने आत्महत्या करून घेतली, सासरच्या जाचाला कंटाळून. आणि पोलिसांनी तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक केली. तीस वर्षांपूर्वी अशी अटक झाल्याची हकीकत माहीत होत नव्हती लोकांना. हा बदल कसा घडला, याबद्दल मी काही वेळ तुमच्याशी बोलणार आहे.

तिसरे, एकूणच अंधश्रद्धा निर्मूलन, लोकविज्ञान चळवळ आणि बुद्धिप्रामाण्यवाद, ह्या एकाच गोष्टीची वेगवेगळी अंगे. ही चळवळ महाराष्ट्रात खूप प्राचीन काळापासून चालू आहे. सत्तर सालानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान चळवळ, बुद्धिप्रामाण्यवादी मंच ह्यांनी ही चळवळ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते फारसा यशस्वी न झालेला हा प्रयत्न आहे, ज्याने समाजात विशेष काही बदल घडलेले दिसत नाहीत. याच्यावर दुमत असू शकेल.

मग पर्यावरण रक्षणाची चळवळ. ही १९८० सालानंतर, ९० सालानंतर आणि आता २००० सालानंतर, अधिकाधिक व्यापक होताना दिसते आणि तिलाही अजिबात यश आलेले नाही, असा माझा समज आहे. तो माझा समज का आहे ते सांगेन तुम्हांला.

हे मी त्या चळवळी चांगल्या की वाईट ह्या अर्थाने बोलत नाही आहे. ह्या सगळ्याच चळवळी करण्यासारख्या आहेत, ह्याच्याबद्दल आपले कोणाचेच दुमत असण्याची शक्यता आहे असे मला वाटत नाही. मी युवक क्रांती दलात होतो. त्याची सुरुवातच मुळी भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याने झाली होती. भ्रष्टाचाराविरुद्धचे लढे असेच त्या कामाचे मुख्यत: स्वरूप होते, मग तो कृषिविद्यापीठातला भ्रष्टाचार असेल, मेडिकल कॉलेजच्या अ‍ॅडमिशनमधला भ्रष्टाचार असेल, काहीही असेल. त्याचे कल्मिनेशन हे जयप्रकाशजींच्या चळवळीत झाले, ज्याने गुजरातमधले सरकार कोसळून पडले, बिहारमधले सरकार कोसळून पडण्यापर्यंत आले. ज्याच्यातून एक नवे नेतृत्व मोठ्या प्रमाणात सत्तेवर आले. तरीसुद्धा आज, त्या वेळी होता त्यापेक्षा कदाचित जास्त भ्रष्टाचार राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात घडताना दिसतो. काही चळवळी यशस्वी झाल्या, निदान त्यांनी काही यश निश्चितपणे प्राप्त केले. काही चळवळींना यश हे लाभलेच नाही. असे का झाले, असा खरा प्रश्न आहे.

तीन थोर लोकांनी तीन विचार मांडले. आणि ते परिवर्तनाच्या आणि बदलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या मांडणीशी मी त्यांचा काही संबंध जोडणार नाही आहे. ही मांडणी त्या व्यापक आणि भव्य पातळीवर करण्याचा माझा हेतू नाही. कार्ल मार्क्सने असे म्हटले होते की, "तत्त्वज्ञ हे जगाचा अर्थ लावत आले. खरा प्रश्न हा जग बदलण्याचा आहे." "Philosophers have interpreted the world. The real task is to change it." आंबेडकरी चळवळीत भीमाच्या गाण्यांची एक प्रचंड परंपरा आहे. त्या गाण्यांमध्ये एक गाणे आहे, "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले आम्हां भीमराव" [शाहीर: अण्णाभाऊ साठे - संपा.]. (जेव्हा सुरुवातीला मी भीमाचे गाणे ऐकले तेव्हा मला वाटले, हे महाभारतातल्या भीमाचे गाणे आहे.) तिसरे गांधीजींचे फार मोठे वाक्य आहे, की, "जगात जे बदल अपेक्षित आहेत त्यांची सुरुवात ही आपल्यातल्या बदलापासून होते". तात्त्वज्ञानिक पातळीवरचे व्यापक विषय आहेत हे. तो आत्ता माझ्या बोलण्याचा भाग नाही. अधिक व्यावहारिक पातळीवर थोडे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.

आता या चळवळींचे स्वरूप आपण थोडक्यात समजावून घेऊ.

गाय ही भारतात दैवत मानली जाते. तिच्या पोटात चाळीस कोटी देव असतात, अशा दैवी अवस्थेला नेऊन बसवलेले ते जनावर आहे. त्याची अनेक आर्थिक कारणे होती. युरोपमध्ये शेती नांगरायला घोडे वापरायचे, त्याच्यामुळे गाईचा किंवा बैलाचा नांगरट करायला कुणाला उपयोग नव्हता. सामान्यत: गायी-बैल किंवा कुठल्याही मॅमलमध्ये नांगरण्याची शक्ती वाढवायचे ठरवले, तर त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते. आणि त्यांची दूध देण्याची क्षमता वाढवली, तर त्यांची नांगरण्याची क्षमता कमी होते, असा निसर्गनियम आहे. युरोपमध्ये घोडे नांगरण्यासाठी वापरल्यामुळे गाई दुधासाठी जोपासणे आणि संकर करणे शक्य झाले. आपल्या इथे बैल हे मुख्यत: नांगरणीसाठी वापरल्यामुळे गाईची दुधाची क्षमता वाढवणे शक्य नव्हते; कारण की दोन्ही एका वेळी अजूनपर्यंत जगात कोणाला करायला जमलेले नाही. दुष्काळ पडला की समोर दिसणारी गाय ही भाकड असते. ती खायला तयार असते, पण ती दूध फार कमी देत असते. अशा वेळी तिला मारून टाकून पोट भरणे हा एक चांगला मार्ग असतो. तुम्ही पर्ल बकची ’गुड अर्थ’ कादंबरी जर कधी वाचली, (वाचा!) तर चीनमध्ये दुष्काळ पडल्यानंतर घरातील गाय मारायचा प्रसंग आला त्या कुटुंबावर, की त्यांची मानसिकता काय होते याचे वर्णन सुरेख आहे. पण अशा गायी मारून टाकल्या तर शेतीची उत्पादने करायला किंवा कामे करायला पुढे बैल कसे निर्माण होणार, हा प्रश्न निर्माण होतो. आणि जर असे बैल निर्माण करू शकला नाहीत तर तुमच्या शेतीचा र्‍हास होतो. म्हणून सगळ्यात फास्ट टर्नओव्हर कम्युनिटीज्, म्हणजे ज्यात गाय, बैल आणि शेती हे एकत्र आहेत आणि जिथे बैलांचा वापर हा शेतीसाठी केला जातो, तिथे गायींच्या रक्षणाची काहीतरी व्यवस्था केली जाते. मग तिला देवता बनवण्यात येते; अमुक, तमुक, तमुक.

हळूहळू शेतीमध्ये यांत्रिकीकरण व्हायला सुरुवात झाली. असे सांगतात, की गांधीजी जेव्हा उरळीकांचनला होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे एक अनुयायी होते मणिभाई देसाई. मणिभाई हे त्या १९४२च्या चळवळीत बाँब बनवणारे क्रांतिकारक होते. पण ते गांधीजींचे अनुयायी बनले आणि गांधीजींनी त्यांना असे सांगितले, "इथे रहा आणि गोसेवा करा". उरळीकांचन हे पुण्याजवळ जे गाव आहे तिथे मणिभाईंनी गोसेवा करण्याचे व्रत घेतले. त्यांच्या असे लक्षात आले की या सर्व भाकड गाई जगवायचा एकच मार्ग आहे. त्यांचे दूध वाढवले पाहिजे. त्या उत्पादक झाल्या पाहिजेत. ढोर जी जनावरे कापायचे, त्यांच्याबरोबर स्वतः बसून गाईंची शवविच्छेदने करून गाय हा प्राणी काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या ऐकीव कथा आहेत. खऱ्या जर असल्या तर त्यातून शिकण्यासारखे बरेच आहे. मग त्यांनी परदेशात एवढ्या गाई कशा काय पाळतात, ह्याचाही अभ्यास केला. आणि असा निष्कर्ष काढला की जास्त दूध देणाऱ्या गाईच्या वंशाचे वीर्य हे आपण जर देशी गाईंना टोचले, त्यांचे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केले, आणि त्यामुळे जर गाई गाभण राहिल्या; तर या ज्या संकरित गाई होतील, त्या कितीतरी जास्त दूध देतील आणि शेतकऱ्यांना ती गाय सांभाळणेही परवडेल. हे तंत्रज्ञान परदेशात होते. ते भारतात आणणे सोपे काम नव्हते. कारण वीर्य लिक्विड नायट्रोजनमध्ये उणे १८० अंश तापमानाला ट्राण्सापोर्ट करावे लागते. ह्या स्वरूपाच्या कोल्ड चेन्स उपलब्ध नव्हत्या. त्या निर्माण करणे हे प्रचंड काम होते. मणिभाईंनी त्या यंत्रणा उभ्या केल्या. त्याला जोडून मग जे जे प्रश्न उद्भवतील त्या त्या प्रश्नांची सार्वत्रिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. १९७० साली पुण्यात येणारे ९०% दूध हे म्हशींचे होते. १९९० साली पुण्यात येणारे ८५% दूध हे गायींचे झाले. दूधासाठी रेशनकार्ड ही इतिहासजमा होष्ट झाली. गावागावांमध्ये दूध-संकलन सुरू झाले ज्याला आपण धवलक्रांती म्हणू, ती प्रत्यक्षात घडली.

मी ज्या सामाजिक बदलाच्या चळवळी सांगणार आहे त्याचा प्रत्येकाचा छोटा इतिहास आधी सांगणार आहे. (प्रश्न: सरकारची काही भूमिका होती का?). हो! सगळीचकडे दुधाच्या विक्रीसाठी सहकारी संस्था निर्माण करणे, त्यांच्या त्यांच्या को-चेन्स निर्माण करणे आणि शहरी भागात नेऊन ते विकणे याच्यासाठी सरकारने दुधाला हमीभाव देण्याची जरूरी आहे, सरकारने असे म्हणणे, की "हे दूध आम्ही या किमतीला निश्चितपणे घेऊ". तसे घेणे हे महाराष्ट्र सरकारने केले, गुजरात सरकारने केले, दिल्लीच्या सरकारने केले. पण हे असे घडणे आवश्यक होते. ही सरकारी योजना आहे, आणि ती सरकारने काही ठिकाणी चांगली राबवली; काही ठिकाणी वाईट राबवली. पण सरकारचा याच्यात नक्की भाग आहे. याच्यात खाजगी उद्योगांचा भाग आहे. उदाहरणार्थ गाईंचे मेजर फंडिंग हे मफतलाल इंडस्ट्रीजने केले. मफतलाल इंडस्ट्रीजने खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने सुरुवातीला मदत केली. त्याच्यात आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा भाग आहे. असे सगळेच आहे.

धवलक्रांती ही आता भारतात सर्वत्र आहे. ज्यावेळी सुरूवात झाली तेव्हा बाईफचे (BAIF, भारत अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज फाउंडेशन) काम महाराष्ट्रात सुरू झाले. पण नंतर दहा वर्षांत यू.पी., बिहार, कर्नाटक, आंध्र, गुजरातमध्ये ती संस्था गेली. नंतर मुख्यतः पंजाब, राजस्थान, दिल्ली. अजूनही पश्चिम बंगाल, ओरिसा, हे जे रेड्यांनी भातशेती करण्याचे प्रांत आहेत, तिथे हा प्रश्न नीटसा सुटलेला नाही.

दुसरा जो भाग आहे तो स्त्री-मुक्ती चळवळीचा. अंदाजे सत्तर सालच्या दशकातली गोष्ट आहे. त्याच्या एकाच अंगाबद्दल बोलणार आहे. कुटुंबांतर्गत स्त्रीवर होणारे अत्याचार. स्त्रीवर कुटुंबांतर्गत अत्याचार हे जगभर होतात. १९७०-८० च्या दशकात हा प्रश्न फार प्रामुख्याने शहरी भागात पुढे आला. त्याला काही त्यावेळची निमित्ते घडली. अत्यंत चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अचानकपणे सुना जळून मरत, मी तुम्हाला सांगितले. १९७४ किंवा ७५ यांपैकी एका वर्षी रोज एक या गतीने दखलपात्र, नक्की अपघात नाही, अशी जाळून मारण्याची केस घडत होती.

दुसऱ्या बाजूला फुले, आंबेडकर, कर्वे या सगळ्यांच्या चळवळीतून निर्माण झालेली महाराष्ट्रातील स्त्रियांची पहिली पिढी होती, की जिला केशवपन करावे लागले नाही. माझे वडील विंदा करंदीकर काव्यवाचन करायचे. ते अलीकडे एक गोष्ट सांगायचे, की “माझी कविता काही वेळा लोकांना कळत नाही, याचा मला आनंद होतो. मला छान वाटते की माझी कविता कळली नाही लोकांना.”. ते उदाहरण काय सांगायचे? तर त्यांची एक 'धोंड्या न्हावी' नावाची कविता आहे. तुम्ही कीर्तन, भजन म्हणत होता, तसे ते कविता वाचन. म्हणजे कीर्तन कसे चालायचे? त्याच्यात लोक रंगून कसे जायचे? पण तरीसुद्धा महार-मांगांना कसे वेगळे बाहेर बसवायचे? असे होत होत कीर्तन रंगते. तशी ही कविता. 'धोंड्या न्हावी' कवितेत अनेक उल्लेखांतला एक उल्लेख असा आहे, की हा धोंड्या न्हावी मागच्या दारी जायचा आणि भलतेच काही करायचा जे आम्हाला कोणी पाहू द्यायचे नाही. हा उल्लेख लोकांना कळत नाही याबद्दल ते आनंद व्यक्त करायचे. कारण की हा धोंड्या न्हावी विधवांचे मुंडन करायचा, मागच्या दारी जाऊन. चाळीस सालची ही कविता आहे. अजून शंभर वर्षेसुद्धा झालेली नाहीत. या सगळ्यातून बाहेर पडणाऱ्या पहिल्या पिढीच्या स्त्रिया आता बऱ्याच अधिकारावर पोचल्या होत्या. सुलभा ब्रम्हे सांगायच्या की, जगातील सर्वात बलशाली आणि स्वतंत्र स्त्रिया आता महाराष्ट्रातल्या ब्राह्मण स्त्रिया आहेत. हे पुण्यातील ब्राह्मण स्त्री म्हणतेय, हे लक्षात घ्या.

तेव्हा स्त्री-मुक्तीचे जे अनेक गट होते, त्यांना हा प्रश्न पडला, की हे काय चालले आहे? मी त्यावेळी जनवादी महिला संघटनेचा कार्यकर्ता होतो. आमच्या अमृता देशमुख नावाच्या लढवय्या नेत्या होत्या. ही एका संघटनेची जबाबदारी नव्हती. जेव्हा असे काही घडेल तेव्हा त्या नवऱ्याला व सासूला आम्ही सोडणार नाही, अशी भुमिका घेऊन अनेक ठिकाणी जेथे जळिताचे प्रसंग घडले, तिथल्या सोसायटीतल्या प्रत्येक कुटुंबात जाऊन 'तुम्ही काय झोपा काढत होता का?' असे विचारणे, पोलीस स्टेशनला घेराव घालणे, वकिलांना घेराव घालणे असे अनेक जहाल, मवाळ प्रचाराचे कार्यक्रम हे ह्या सगळ्या स्त्री संघटनांनी पुण्यात घेतलेले मला माहिती आहेत. असेच भारतभर घडायला लागले.

दुसऱ्या बाजूला काहींनी खूप मोठ्या प्रमाणावर वैचारिक मंथनही सुरू केले की असे का घडते? आणि असे भारतातच का घडते? म्हणजे कौटुंबिक अत्याचार आणि कुटुंबांतर्गत हिंसा हा जरी जागतिक प्रश्न असला तरी सुनेला जाळून मारणे ही काही जागतिक परंपरा नाही. ह्याला टोक आले ते रूपकँवर सती गेली तेव्हा राजस्थानमध्ये. एका गावात एक रूपकँवर नावाची बाई सती गेली. आजही भारतात एखादी स्त्री सती जाते, तिचा सगळा गावातला समाज तिला प्रोत्साहन देतो आणि ती सती गेल्यानंतर तिथे देऊळ उभारले जाते. हा अधिकचा प्रतिकात्मक प्रश्न आहे. ऐतिहासिक आढावे, लिखाण, वाचन आणि मंथन सुरू झाले. सरकारला कायदे करणे भाग पडले.

त्यातले एका कायद्याचे कलम असे आहे, की अशी बाई जळिताबद्दल बोलल्यानंतर तो आधी गुन्हा आहे असे गृहीत धरायचे. नवऱ्याने आणि सासूने असे सिद्ध केले पाहिजे की, आम्ही त्यात गुंतलेलो नव्हतो. खटला भरल्यानंतर स्त्रीसंघटना येतात, आणि त्या खटल्यांतून सहजासहजी सुटका होऊ शकत नाही, हेही सिद्ध झाले. याला कायदेशीर पाठबळ मिळाले. राजनैतिक पक्षांचे पाठबळ मिळाले. स्त्रीसंघटनांनी हा प्रश्न जवळजवळ वीसपंचवीस वर्षे सातत्याने लावून धरला. त्यात अनेक स्वरूपाचे विश्लेषण करण्यात आले. अमृता देशमुख. त्यांच्याबरोबर आम्ही भोंडल्यातल्या गाण्यातला मजकूर काय आहे ते तपासले. तुम्हाला असे दिसेल, की सासरच्या छळाचं वर्णन आहे. ’अस्सं माहेर सुरेख बाई खावया मिळंतं, अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं’. मी चाळीत असताना सर्व लहान मुली ही गाणी गोल फेर धरून आनंदाने गायच्या. अजूनही गातात. 'कोंडूनी मारीतं' हेच वर्णन आहे. आणि सुखाची परिसीमा काय, तर 'खावया मिळतं'. आज परिस्थिती अशी आहे की हा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघालेला आहे. बऱ्यापैकी, ह्याचे कारण कालच दुर्दैवाने पिंपरीमध्ये एका सुनेने सासू आणि नवरा छळ करतात म्हणून आत्महत्या केली. पण त्यांना पुढच्या तीन तासांत अटक झाली. (प्रश्न - ही चळवळ फक्त पुण्यात होती की भारतभर?) ही चळवळ भारतभर झाली. त्याच्या तीव्रता कमी-जास्त होत्या. स्थानिक परिस्थिती वेगळी असेल, प्रश्न वेगळे असतील. महाराष्ट्रात जे कमावता आले, पुण्यात जे कमावता आले, तेच बिहारमध्ये कमावता आले, हेही खरे नाही. सामाजिक प्रगतीसुद्धा कमी-जास्त होती. पण चळवळ ही भारतभरची होती. (प्रश्न - नेतृत्व?) एक नेता असा नव्हता. आमच्या अमृता देशमुख होत्या. विद्या बाळ या एकेकाळी 'स्त्री' मासिकाच्या संपादिका होत्या. 'स्त्री' मासिक किर्लोस्कर समुहाच्या मालकीचे आहे. म्हणजे एका अर्थाने भांडवलशाहीच्या टोटल मालकीचे मासिक आहे ते. पण विद्या बाळ संपादक असताना त्यांनी ते पूर्णतः स्त्री-मुक्ती चळवळीचे व्यासपीठ बनवले. खूपशा अकादमीय लोकांनी, खूप प्राध्यापिका, प्राध्यापक यांनी त्यासाठी कामे केली. त्यात चारपाच नेते नक्की होते. (प्रश्न - ह्या सगळ्या चळवळी जोडल्या जातात की त्या स्वतंत्र असतात?) काही स्त्रियांच्या संघटना ह्या अखिल भारतीय आहेत. त्या राजकीय पक्षांशी जोडलेल्या आहेत. जनवादी महिला संघटना, सी. पी. एम.ची फ्रंट ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे ती भारतभरची संघटना आहे. अशीच भाजपाचीही आहे. अशीच कॉंग्रेसवाल्यांचीही आहे. कमी-जास्त प्रमाणात ह्या चळवळीत ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या स्त्री-संघटनांचे एकमत होते. प्रत्यक्ष कुटुंबांतर्गत अत्याचाराबद्दल आवाज उठवलाच पाहिजे, आणि हे थांबवलेच पाहिजे, ह्याबद्दल सर्व स्त्री-संघटनांत एकमत होते. वैचारिक मतभेद असे असतील की ह्याला हिंदू धर्म किती कारणीभूत आहे, ह्याला पुरुषांचा पुरुषीपणा किती कारणीभूत आहे, ह्याला ढासळणारी कुटुंबव्यवस्था किती कारणीभूत आहे, इत्यादी इत्यादी.

माझ्या मते, ह्या जशा दोन यशस्वी चळवळी आहेत, तशा मी तुम्हाला दोन किंवा तीन (माझ्या मते) अयशस्वी चळवळी, सांगणार आहे. पहिली अंधश्रद्धा-निर्मूलन, लोकविज्ञान आणि ज्याला रॅशनॅलिस्ट किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतात ती. लोकविज्ञान चळवळीत मी अंदाजे आठदहा वर्षे खूप काम केले. आम्ही अनेक प्रदर्शने भरवली, राष्ट्रीय पातळीवर फिल्म्स केल्या. केरळ शासन साहित्य परिषद ही ह्या चळवळीतली सगळ्यांत मोठ्या स्वरूपाची चळवळ जी. परमेश्वरन् नावाचे गृहस्थ चालवत. केरळमध्ये लाखोंनी शाखा उघडल्या, अनेक पुस्तके प्रकाशित केली. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान चळवळ, बुद्धिप्रामाण्यवादी मंच वगैरे चळवळी होत्या.

ह्यांनी काम करायचा खूप प्रयत्न केला. सातत्याने काम केले. एखाद्या देवीला बळी दिले जात होते, ते थांबवणे किंवा देवीला वाहिलेल्या बाईने केस विंचरू नयेत, तर तिला केस विंचरायला लावणे; इथपासून अनेक अंधश्रद्धांचे निर्मूलन झाले. वैज्ञानिक जाणिवांची वाढ करण्यासाठी प्रयोग करायचे कार्यक्रम घ्यायचे. वीस-वीस हजार लोक एकत्र येऊन ते बघत असत. तरीसुद्धा मी अयशस्वी का म्हणतो? त्यांनी एकत्र कामे केली नाहीत, आणि व्यापक परिणामही झाला नाही.

उदाहरणार्थ - मदर टेरेसा ह्या संत होत्या की नाही? संत म्हणून औपचारिकरीत्या मान्य करायचे असले, तर त्या व्यक्तीने चमत्कार केलेले असले पाहिजेत, ही आवश्यक अट आहे. तेव्हा मदर टेरेसांनी असे चमत्कार केले का, हे शोधण्यासाठी कमिटी भारतात आली. त्यांना लोकांनी पुरावे दिले. नरेंद्र दाभोलकरांनी पत्रक काढले, याला विरोध करणारे, की हे काही बरोबर नाही. आणि असे चमत्कार घडू शकतात ही अंधश्रद्धा आहे. पण बाकी सर्व समाजात काहीही हालचाल झाली नाही. तुम्ही-आम्ही सर्वांनी काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ह्या स्वरूपाच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणे, त्या वाढवणे आणि ते फोफावत नेणे, हे उलट जास्त चालू आहे.

आज टीव्हीवर तुमचे मनोरंजन चांगले होते. मनोरंजनाचे माझ्या मताने इंटरनेटवरचे सगळ्यांत मोठे दोन भाग आहेत. एक अश्लील वाङ्मय, साहित्य. ४०% इंटरनेट ट्रॅफिक हा पोर्नोग्राफीवर असतो, असे लोक म्हणतात. त्याच्या खालोखाल धर्मांध प्रचार. एक मुस्लिम होता, त्याची साइट शेवटी बॅन करण्यात आली म्हणे. त्याचे पहिले नाव झकीर. आपण बघणार नाही, कारण आपण मुसलमान नाही. मग आपण काय करतो? आपण हिमांशू महाराज, अजून दुसरे महाराज, तिसरे. पेव फुटले आहे. आणि ह्याला काहीही विरोध होत नाही. मला बऱ्याच वेळा असे वाटते की तीस वर्षांपूर्वीचे बरे होते ह्याबाबतीत. निदान मुख्यमंत्री उघडपणे स्वामी आणि बुवांमागे जायला धजावत नव्हते. वसंतराव नाईक, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात काय फरक आहे? तर एक दखलपात्र फरक असा आहे, की हे उघडच करायला लागले. त्याचा जोड पुढच्या चळवळीशी, म्हणजे भ्रष्टाचार. माझे म्हणणे असे नाही, की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ करू नये. मी परत परत तुम्हाला सांगतो, की चळवळ माझ्या दृष्टीने आवश्यक आहे, योग्य आहे. आणि तरी ती यशस्वी होत नाही. मग का? असा प्रश्न आहे.

बी. टी. रणदिव्यांनी एक लेख लिहिला होता. My party members are communist in public life and Hindu husbands at home. हे त्यांना म्हणावेसे वाटले हे लक्षात घ्या. अंधश्रद्धेने लोक मरत नाहीत हेही खरे नाही! बुवांकडे जाऊन औषधे घेणे. तुम्हाला माहिती आहे का, की ग्रामीण भागात सरासरी दरडोई औषधोपचाराचा खर्च शहरी भागापेक्षा दीडपट होतो. का होतो? नुसते चांगले निदान होत नाही असे नाही. लोक बुवांकडे जातात, ते खोटी औषधे देतात, ती लागू पडत नाहीत, माणसे मरतात.

हाच प्रश्न भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचाही आहे. सुरूवात झाली कृषी-विद्यापीठामध्ये. वशिल्याने अॅडमिशन दिल्या, म्हणून दोन कृषी-विद्यापिठातले हजार विद्यार्थी ७२ साली तुरुंगात गेले. शेतकऱ्यांची मुले कॉंग्रेसच्या सरकारविरुद्ध तुरुंगात जातात म्हणजे काय? जातीय भाषेत बोलायचे तर मराठ्यांची मुले मराठा सत्ताधीशांविरुद्ध तुरुंगात जातात म्हणजे काय? जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीला खरे टोक आले. लाखो तरुण त्यात सामील झाले. गुजरात सरकार भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून खाली ओढण्यात आले. नंतर ह्या चळवळीतून पुढे आलेल्या लोकांच्या हातात सत्ता आली. प्रत्यक्षात भ्रष्टाचाराविरुद्ध काही झाले नाही. दिसते ते असे, की तो वाढतच गेला. विकिलीक्सने बातमी छापली. राडिआ टेप्स बाहेर आल्या. कोणीतरी काहीतरी भ्रष्टाचार केला, हे तुम्हाला आम्हाला कळले. कोणीतरी मंत्री राजीनामा देतात, कोणीतरी अधिकारी सस्पेंड होतो, विषय संपला. बडतर्फसुद्धा होत नाही.

शेवटचा प्रश्न पर्यावरण, पर्यावरणरक्षण. मुळात पृथ्वी गरम होते आहे की गार होते आहे, ह्याच्यावरच दोन मते आहेत. प्रत्येक राष्ट्राने आपण पर्यावरणाचा विनाश किती जास्त करणार, ह्यावर मर्यादा घालून घ्यायची आहे. त्या निमित्ताने जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांनी एक काहीतरी टार्गेट घ्यायचे. आम्हाला कोणीतरी काम दिले, की या सगळ्या कंपन्यांचे रिपोर्ट्स अभ्यासा. जवळ जवळ पंचवीस हजार आहेत. सगळे जण गोलगोल गोलगोल गप्पा मारतात, प्रत्यक्षात काही खरे सांगत नाहीत. आता ह्याला जनरल मोटर्सपासून टाटा मोटर्सपर्यंत कोणाचाही अपवाद नाही. प्रत्यक्षात पर्यावरणाला धोका आहे आणि त्याच्यामुळे लोक मरतात. उदाहरणार्थ - पर्यावरण दूषित झाल्यामुळे लोक कशामुळे मरतात भारतात? डोमेस्टिक स्मोक - स्वयंपाकघरातला धूर. त्याचे आकडे आहेत, बरे! १० लाख बायका मरतात. ग्रामीण भागातल्या स्वयंपाकघरांतल्या धुराने सर्वात जास्त बायका मरतात. कोणाला प्रश्नसुद्धा वाटत नाही. पर्यावरण वगैरे मरू दे. पण स्वयंपाकघरांतल्या धुराने लाखो बायका मरतात याच्याबद्दल पर्यावरणवादी काहीही करत नाहीत.

प्लास्टिकच्या पिशव्या म्हणे मुंबईच्या मिठी नदीतून वाहताना तुंबल्या आणि त्याच्यामुळे मुंबईत एक महापूर आला, म्हणून प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली. म्हणजे पातळ पिशव्या विकायच्या नाहीत. जाड पिशव्या विकल्या तर चालतील. डॉ. मालशेकर म्हणतात, "अहो? काय चाललंय? आम्ही प्लास्टिक अजून पातळ करा, अजून पातळ करा म्हणतो, सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय की ज्याच्यातून एकूण प्लास्टिकची क्वांटिटी कमी लागेल आणि तुम्ही पर्यावरणवादी पातळ पिशवी विकायची नाही म्हणून आग्रह धरून बसता." मला काही कळत नाही. मला कळते ते एवढेच की ना मोठ्या कंपन्या काही करत, ना जगातली सरकारे काही करत. ह्याचा अर्थ पर्यावरणाचे रक्षण करू नये असे नाही. उलट, केले पाहिजे.

भरपूर बदल घडतात रोजच्या जीवनात. हळूहळू हे बदल घडत जातात. माझ्या मताने वरिष्ठ जातीतला शिक्षणाचा प्रसार हा ह्याप्रकारचा आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार थोडाबहुत झाला असता. होणारच होता. कर्मवीर भाऊराव पाटील झाले म्हणून त्याला वेग आला. असे नाही की हे एकमेव नाव आहे. हळूहळू शिक्षणाचे सर्वत्रिकरण होणे, हे अनेकांच्या कार्यवाहीमुळे झाले. स्त्री-मुक्ती चळवळ ही एक अंडरकरंटमधून निर्माण झाली. एका क्षणी निर्माण झाली आणि एका क्षणी काहीतरी क्रांतिकारक बदल झाला, असे घडले नाही.

मूल्याधार

माझ्या दृष्टीने आजचा कळीचा मुद्दा आहे, चळवळी कधी यशस्वी होतात आणि कधी यशस्वी होत नाहीत. माझ्या दृष्टीने ह्याला पाच महत्त्वाची कारणे आहेत. त्यांतले सगळ्यात महत्त्वाचे कारण असे, की ह्या चळवळीला, ह्या बदलाला काही मूल्याधिष्ठान किंवा मूल्याधिकार होता का? काही एक मूल्याधार आहे का? मूल्ये अनेक प्रकारची असतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मला महत्त्वाची मूल्ये वाटतात, आणि हे सांगायला मला काही कमीपणा वाटत नाही. आयन रॅंडचा व्यक्तिवाद हा मला टाकाऊ आहे. ज्या मूल्याला माझा तीव्र विरोध आहे ते आयन रॅंड. तिचे सगळे लिखाण अत्यंत व्यक्तिवादी. मनोरंजन छान होते, पण त्यातून जी मूल्ये ओवण्याचा ती प्रयत्न करते त्या भांडवलशाहीच्या पराकोटीच्या व्यक्तिवादी भावना आहेत. पण तेही एक मूल्य आहे. शौर्य हे बाय इटसेल्फ मूल्य [स्वतोमूल्य - संपा.] असू शकते. मग त्यासाठी युद्ध करावे लागले, तर युद्ध करायचे, हेही मूल्य असू शकते. पण बदल जर व्हायचा असला तर कुठले तरी मूल्य आपण पुढे नेतो.

आणि शक्यतोवर जे शाश्वत मूल्य आहे ते मूल्य आपण पुढे नेतो आहोत, असे घडावे लागते. माझ्या दृष्टीने शोर्य हे शाश्वत मूल्य नाही. व्यक्तिवाद, स्पर्धा ही शाश्वत मूल्ये नाहीत. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही शाश्वत मूल्ये आहेत आणि ही शाश्वत मूल्ये पुढे नेण्यासाठी ही चळवळ बांधील आहे, हे पहिल्यापासून जाणवावे लागते. तो चळवळ पुढे नेणाऱ्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असावा. तो जितका स्पष्ट दिसेल तितकी चळवळ पुढे जायला मदत होते किंवा यशस्वी व्हायला मदत होते. तुम्हा म्हणाल संकरित गाई घ्या. त्यांचा संकर करायचा आणि त्यांचे दूध जास्त निर्माण करायचे, ह्याच्यात शाश्वत मूल्य काय आहे? त्यात एक अहिंसेचे मूल्य आहे, की गाय ही जर चांगल्या प्रकारे जगवली नाही तर ती मारली जाते. ही वस्तुस्थिती होती. गांधीजींच्या मते, मणिभाई देसाईंच्या मते, अहिंसा हे त्यांचे एक शाश्वत मूल्य होते. मणिभाई देसाई अनेक भाषणांतून असे सांगायचे, की भाकड गाय जगवण्यापेक्षा ती मेलेलीच बरी. त्यामुळे जेव्हा साधूंनी गोहत्याबंदीचा मोर्चा काढला तेव्हा त्यांचा विरोध होता. त्यांचे म्हणणे असे होते, की कायद्याने गोहत्या बंदी करून काही होणार नाही. प्रत्यक्ष लोक उपाशी ठेवून मारतील. संकरित गाईंची वासरे अशीच मारली जातात, आजही. म्हणून गोऱ्हा जन्माला आला तर त्याचा उपयोग नसतो. मग त्याला सोडून देतात. मग तो उपाशी राहून मरतो. दुसरे त्याहून जास्त महत्त्वाचे हे गरिबी घालवणे आणि पोटाची भूक भागवणे. हा समतेच्या मूल्याचाच आविष्कार आहे, आणि त्याला ते ठामपणे बांधील होते. असे मला करायचे आहे, असे ते जाहीरपणे सांगायचे.

भारतातील एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे, दुधाची मुबलकता वाढणे, हे समतेच्या दृष्टीने आपण करतो. याच्यात कुठेतरी मूल्यांमध्ये विसंवाद येऊ शकतो का? येतो. त्याबद्दल नेत्यांना भूमिका घ्याव्या लागतात. विनोबा दुसरे गांधीवादी. मणिभाईंना त्यांनी असे सांगितले की हे काम बंद करा. असे मणिभाई सांगतात हं! का? गाईंचा जो नैसर्गिक आनंद आहे, तो तुम्ही हिरावून घेता. गाईला काही एक संभोग आनंद मिळतो, आणि तुम्ही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन केले की हा निसर्गक्रम तुम्ही चक्रमपणे बदलवता. मणिभाईंची याच्याबद्दलची भूमिकाही स्पष्ट होती की मला गाय जगवणे जास्त महत्त्वाचे आहे. मला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे जास्त महत्त्वाचे आहे. मूल्याधार असावा लागतो. हा पहिला मुद्दा आहे.

तुम्ही स्त्री-मुक्तीच्या चळवळीबद्दल बघितले. बाईचा जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, त्याच्यात बंधुता आहे, त्याच्यात प्रेम आहे. पण त्याच्यातला सगळ्यांत महत्त्वाचा अधिकार हा आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्या काळात स्त्री-मुक्ती चळवळीने पुढे पुढे असेही म्हटले, की बाकीची समता नंतर बघू. जगण्याचा अधिकार आहे की नाही? अशा स्वरूपात विचारल्यानंतर निदान जे विरोधक आहेत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, की अरे, मी जगण्याचा अधिकार बाईला नाकारला तर मग मी पुरुष म्हणून जगू शकतो का? कुठेतरी मूल्यविचाराचा आधार असावा लागतो.

अंधश्रद्धा निर्मूलनाचा मूल्याधार काय हो, असा प्रश्न जर विचारला, तर प्रचंड गोंधळ आहे. हे लक्षात घ्या. श्रद्धा कशाला म्हणायचे आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचे इथपासून ती सुरूवात आहे. मदर टेरेसा ही चमत्कार करू शकते की नाही? हा श्रद्धेचा प्रश्न आहे की अंधश्रद्धेचा प्रश्न आहे? विज्ञान कशाला म्हणायचे आणि कशाला म्हणायचे नाही? सावरकर विज्ञाननिष्ठ होते असा एक प्रचंड समज आहे. आसाममध्ये नागांनी बंड सुरू केले. सावरकरांचा उपाय होता, अॅटम बॉंब टाका, अमेरिकेतून आणून. हा माणूस विज्ञाननिष्ठ असू शकतो का? निरीश्वरवाद हे आपले मूल्य आहे का? याच्याबद्दल गोंधळ आहे. भ्रष्टाचाराबद्दल मूल्याधिकार आहे, की समता, स्वातंत्र्य या सगळ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार काम करतो म्हणून तो गेला पाहिजे. पर्यावरणाच्या चळवळीचा मूल्याधार काय, हा परत एक चमत्कारिक प्रश्न आहे. त्याचा प्रचार केला जातो तो ‘आहे-रें’नी ‘नाही-रें’च्या विरोधात करायचा असा प्रचार आहे. सरळ, स्वच्छ मूल्याधिकार आणि मूल्यांचा आधार हा जर चळवळीला नसला, आणि तो जर नेत्यांनी, त्या चळवळीने जाहीरपणे मांडला नाही तर एक अडचण निर्माण होते.

ज्ञानाधार

दुसरा महत्त्वाचा आधार हा त्याच्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. त्याला मी ज्ञानाधार म्हणतो. तंत्रज्ञान हा ज्ञानाचाच एक भाग आहे. सामाजिक परिस्थितीचा केलेला विशिष्ट उलगडा, हा ज्ञानाचा दुसरा भाग आहे. आपण जे करतो आहोत, त्याच्याबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान आहे का, आणि चळवळीतून ते ज्ञान पुढे जाते आहे का, हा प्रश्न आहे. चळवळीला नुसता ज्ञानाचा आधार असून पुरत नाही. चळवळीने संबंधित ज्ञान पुढे न्यावे लागते. असे जर होत नसले तर बऱ्याच वेळा त्या चळवळीत होणारे बदल यशस्वी ठरत नाहीत. ज्ञानाचा अर्थ पुस्तकी ज्ञान असासुद्धा आहे. पुस्तकी ज्ञान म्हणून ते कमी प्रतीचे, असे नाही. अनुभवसिद्ध ज्ञान याचा अर्थ मला अनुभवाला येईल तेवढेच ज्ञान, असे मत कार्यकर्त्यांमध्ये व्हायला नको. मी, माझा निकटचा परिसर आणि त्यातला माझा अनुभव, हाच जणू काही अंतिम ज्ञानाचा निकष आहे, अशी जर गुर्मी कार्यकर्त्यांना यायला लागली, तर प्रश्नच निर्माण होतात. तेव्हा ते पुस्तकी ज्ञान असेल, ते जागतिक ज्ञान असेल, ते अनुभवातून आलेले ज्ञान असेल, ते तांत्रिक ज्ञान असेल, ते फिलॉसॉफिकल ज्ञान असेल, ते समाजशास्त्रीय ज्ञान असेल; या सगळ्या ज्ञानाचा आधार त्या बदलाच्या मागे आहे का? आणि त्या बदलाच्या प्रक्रियेत ज्ञानवृद्धी होते आहे का?

संकरित गाईंच्या संदर्भात असा एक मोठा ज्ञानाधार आधी होता की एकूणच जगभरच्या अर्थशास्त्रज्ञांनी गाईचे अर्थशास्त्र कसे प्रगत होत जाते, गोहत्या बंदी का निर्माण होते, का आवश्यक ठरते, का ठरत नाही, कुठल्या अर्थकारणामध्ये काय स्वरूपात दुधाच्या अर्थशास्त्राचे स्थान आहे, याच्याबद्द्ल प्रचंड अभ्यास केला होता.

तंत्रज्ञान, म्हणजे वीर्य घ्यायचे कसे, ते वीर्य कसे साठवायचे, हे सातत्याने चालू होते. भारतातल्या अर्थशास्त्राचे ज्ञान; की इथून दूध जर मुंबईत नेऊन विकायचे असेल तर काय केले पाहिजे ? अनेक प्रयोग पंचेचाळीस सालापासून चालू राहून त्यांतून अनुभवसिद्ध ज्ञान, की कसे काय वाहून आपण विकू शकतो. हा कार्यक्रम विकसित व्हायला लागला, तश्या चाऱ्याच्या नवनव्या जाती, कुठल्या भागात कुठल्या जाती लावता येतील आणि कशातून चाऱ्याची प्रॉडक्टिव्हिटी खूप वाढेल, याच्यावर खूप संशोधन झाले, ते याच काळात झाले. ते इंडियन कौन्सिल ऑफ अ‍ॅग्रिक्ल्चरल रिसर्चच्या प्रयोजनाने झाले. ते अनेक कृषिविद्द्यापीठांतून झाले. ते बाईफसारख्या संस्थेने स्वत:च्या शेतांवर करून पाहिले. संकरित गाईंचा कार्यक्रम विकसित होत असताना त्याच्यासाठी योग्य असे ज्ञान हे फक्त आधीचे नाही, तर सातत्याने नवे नवे ज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न हा त्या चळवळीने केला. त्यातला काही चांगला झाला. उदाहरणार्थ - सुबाभुळवर अशी टीका आहे की त्याच्यामुळे काही ठिकाणी मोनोकल्चर्स निर्माण झाली. पण त्याच्यात अनेक चाऱ्याच्या नव्या जाती निर्माण झाल्या. गाईच्या कुठल्या प्रती टिकवून ठेवल्या पाहिजेत, हाही याच चळवळीचा भाग होता. हे काही आधी झालेले नव्हते. तेव्हा ज्ञानाचा आधार असणे आणि तो विकसित होत जाणे.

स्त्री-मुक्तीचळवळीबद्द्लही खूप घटना आहेत. स्त्री मुक्ती म्हणजे काय ? स्त्रियांचा संघटनांच्या मागण्या काय आहेत ? त्याबद्दलचे भारतीय इतिहासाचे आकलन, भारतीय समाजशास्त्राचे आकलन, जागतिक पातळीवरती त्याचे असलेले आकलन; हे राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित झाले. याच्यावर खूप चर्चा झाली. मुलीचे संमतीचे वय, (म्हणजे कोणत्या वयात तिच्याशी संभोग केला तर ते बेकायदा मानू नये), हे वाढवावे आणि चौदा करावे असा जेव्हा कायदा येणार होता (सारडा अ‍ॅक्ट), तेव्हा त्या कायद्याला विरोध करणाऱ्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर होते. त्यांनी जाहीरपणे असे सांगितले, की अल्पवयात मुलीशी संभोग केला तर तो तिला दु:खदायक असतो. त्यामुळे तिची कामेच्छा मारली जाते आणि त्यामुळे आमच्या कुटुंबांचे रक्षण होते. हे थोर कवी, राधाकृष्णांची प्रेमकाव्ये लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी सारडा अ‍ॅक्टला विरोध करताना लिहिले होते. हा रवींद्रनाथ टागोरांचा छोटेपणा किंवा मोठेपणा म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. मी तु्म्हाला सांगतो घटनेची, वादाची तीव्रता. त्या काळातले आगरकरांचे लेख वाचले तर अंगावर काटा उभा राहतो. तिथपासून चालत आलेली ही एक ज्ञानाधाराची परंपरा आहे. हे काय होते आहे? कसे घडते आहे? का घडते आहे? ह्याच्याबद्दल प्रचंड चर्चा, प्रचंड वादविवाद, प्रचंड ज्ञाननिर्मिती आणि चळवळींनी ती ज्ञाननिर्मिती पुढे जाणार. आमचा सांस्कृतिक वारसा काय? हा प्रश्न ऐंशी साली सुद्धा रूपकँवरबद्दल विचारला गेला. त्याचे विश्लेषण केले गेले. ससूनमध्ये जाऊन केस हिस्ट्रीज गोळा करून, घरोघर जाऊन तपास करण्याचे काम स्त्री-चळवळींनी केले. त्या एक नवा ज्ञानसाठा बनवत होत्या, की काय आहे. जळिताच्या केसेस, म्हणजे खरेच किती जळिताच्या केसेस नायलॉनच्या साड्या आणि जमिनीवरच्या शेगड्यांतून निर्माण होतात? तेव्हा हा ज्ञानाधार निर्माण होऊन तो वेगाने वाढवावा लागेल.

दुर्दैवाने असे वादविवाद हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, लोकविज्ञानवालेसुद्धा फारसे करत नाहीत. ते एका अंधश्रद्धेबद्दल बोलतात. त्याचा उलगडा करून दाखवतात. ते केलेच पाहिजे. पण त्याच्यापलीकडे जाऊन ह्याच्याबद्दल एकूण ज्ञानप्रसार करणे व्हायला हवे. भ्रष्टाचार का निर्माण होतो? कशातून निर्माण होतो? भ्रष्टाचारी माणूस वाईट, त्याच्यावर खटला भरला पाहिजे, त्याला तुरुंगात टाकले पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे; हे सगळे बरोबर आहे. पण हे कशामुळे होते? का होते? याची मुळे कशात आहेत? याच्यामागे प्रेरक शक्ती कुठल्या आहेत? एकूण समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार का होतो? जयप्रकाशजींनी लिहिलेली ‘लोकतंत्र के नाम चिट्ठी’ तुम्ही वाचली असेल. पुस्तिका चांगली आहे. पण जर तुम्ही असा प्रयत्न केला शोधण्याचा, की भ्रष्टाचार का होतो आणि होऊ नये म्हणून काय करावे, तर याच्याबद्दल तीमध्ये किती आहे हो? फार कमी आहे.

पर्यावरणाच्या चळवळीबद्दलसुद्धा हेच. नेमके आपण काय म्हणतोय, याच्याबद्दल माहिती करून द्यायची नाही. शेरेबाजीच जास्त - ज्या कशाबद्दलच फारसे काही माहिती नाही, त्याच्यात कोणीही आपणहून भाग घेत नाहीत, त्या चर्चेत. माशेलकर जेव्हा म्हणाले, प्लास्टिक पातळ करत नेणे हाच कार्यक्रम आहे, तेव्हा एकानेही माशेलकरांना जाहीरपणे चर्चेचे आवाहन केले नाही. असे करून चालत नाही चळवळीमध्ये. अशी निष्ठा लागते की आम्हीच खरे. आणि आम्ही तुम्हाला पटवून देणार आहोत, की का आम्हीच खरे! त्याला जबरदस्त ज्ञानाधार लागतो. नुसता आरडाओरडा आणि भांडण पुरेसे नाही.

कार्याधार

तिसरा महत्त्वाचा कार्याधार लागतो. बदल यशस्वी व्हायचा असला तर त्याला जीवनदायी कार्यकर्ते लागतात. काम सातत्याने, नेटाने करण्याची आवश्यकता असते. नेतृत्व लागते, पण नेतृत्व हे महत्त्वाचे नसते अनेक वेळा. माफी मागून मी असे म्हणू इच्छितो की महात्मा फुले जरी झाले नसते तरीसुद्धा महाराष्ट्रात स्त्री-शिक्षण झाले असते. सावित्रीबाई फुल्यांना शिव्याशाप खायला लागले. त्यांनी ते खाल्ले आणि तरीही स्त्रियांना शिकवले. अनेक अत्यंत निष्ठावान लोकांनी शिक्षण संस्था सुरू करून त्या अत्यंत निष्ठेने चालवल्या. मी ज्या शाळेत शिकलो ते एक इंग्लिश स्कूल होते. गरीब बिचारी आमची शाळा. तिसऱ्या मजल्यावरचे पाणी तळमजल्यापर्यंत पोचले पावसाळ्यात, की आमची शाळा बंद व्हायची. पण आमच्या हेडमिस्ट्रेसबाई होत्या मनोहर नावाच्या, त्यांनी निष्ठेने ती शाळा चालवली. कारण त्यांचे म्हणणे असे होते, की गुंडांच्या वस्तीत, गुंडांसाठी शाळा हवी. आम्ही गुंडांच्या वस्तीत नव्हतो, पण ती आमच्या घराजवळ होती. असे शाळा चालवणारे निष्ठावान लोक लागतात. त्यांची त्या शिक्षणाला कमिटमेंट लागते. त्यांनी ते आयुष्याचे कार्य म्हणून स्वीकारलेले असावे लागते. त्यासाठी योग्य संस्थांची उभारणी करावी लागते. त्या योग्य संस्थांमध्ये सातत्य राहील आणि सातत्याने नवे लोक येतील याची काळजी घ्यावी लागते. हे जर झाले नाही, तर चळवळी यशस्वी होत नाहीत. नेते जे लोकांत सांगतात ते त्यांनी स्वतःच्या आयुष्यात राबवावे लागते. अशी विसंगती चालत नाही, की मी बाहेर एक बोलतो, घरी दुसरेच करतो. साधा व्यावहारिक मुद्दा आहे. मणिभाईंनी एक संस्थाच निर्माण केली असे नाही तर वारसदार सुद्धा निर्माण केले. गिरीश सोनी एका चर्चासत्राला आले होते. मी म्हटले, “अहो मणिभाई गेले हे कळले. हेगडे गेले कळले. आता तू पण तेच काम करणार?” आणि आता तो म्हणाला, “हो, मी तेच करणार आणि माझ्यानंतर काम करायला लोक या संस्थेत आहेत.” हे सातत्य आहे. नवे नवे कार्यकर्ते येणे आणि त्या संघटनेतसुद्धा एक अंतर्गत डेमोक्रसी असणे, हे सगळे त्या कार्याधाराचेच भाग आहेत.

लोकविज्ञान चळवळीने मार कुठे खाल्ला? आजचे संचालक म्हणतात, "पंचवीस वर्ष मी कॅलेंडर काढत आलो. पण मला एडिटिंग करायलासुद्धा एक माणूस मिळत नाही हो!" लोकविज्ञानचे एक कॅलेंडर काढतात, चांगले काढतात. पाहिले आहे का कुणी? तुमच्याचसाठी निघते आणि तुमच्यापैकी कुणी पाहिलेलेसुद्धा नाही! संचालक म्हणतात, "प्रूफ रीडिंगलासुद्धा माझ्याकडे माणूस नाही." याचा अर्थ काय? तुम्ही संस्थात्मक उभारणी करू शकला नाहीत. आणि सातत्याने नवे नवे लोक त्याच्यात बोलवू शकला नाहीत. अमृता देशमुख सांगायच्या "काही संस्थांमध्ये चौकशी करतात, की तुम्ही का आत येताय? म्हणजे जणू काही लोक तुमची संघटना ताब्यातच घ्यायला आलेत, तुमच्याशी लढाई करायलाच आलेत. असा बाहेरच्या माणसाला आत न येऊ देण्यासाठी केलेला बंदोबस्त. काही संघटनांचे स्वरूप होते की आमचे आम्ही! दुसरा कुणी जर आला तर आम्ही भ्रष्ट होऊ अन् तो येणारा थोडा भ्रष्ट असणार. तुमच्या इथे सगळे शुद्ध असतात, तर प्रश्नच मिटला नं सगळा!" कार्य करण्याची पद्धत अशी, की आम्ही आमच्याभोवती एक कुंपण घालून घेणार. एकेकाळी कम्युनिस्ट पक्षात असायचे, "तुला कार्ड द्यायच्या आधी तपासून बघतो".

हाच प्रकार तुम्हाला पर्यावरणाविषयी दिसेल. ते कोण आपले, नोबेल प्राइज ज्यांच्या संघटनेला मिळाले ते. तपासा, आणि लक्षात येईल, अरे, ते टाटाच्या पेरोलवर आहेत. त्यांनी दिलेले रिपोर्ट्स खोटेच होते. लोकांचे म्हणणे आहे, की हे पर्यावरणवादी नसलेला धोका फार मोठा करून सांगतात. असे जर नेतृत्व असले आणि त्याला जर ज्ञानाधारही नसला आणि कार्याधारही नसला तर चळवळीने बदल होत नाहीत.

जनाधार

ह्या सगळ्यांतून निर्माण होणारा पुढचा भाग हा महत्त्वाचा आहे, जनाधार. आपण हे कोणासाठी करतो? आपली मानसिकता काय आहे? चार लोकांपुरती आपापसातली हौस आहे, की याच्या ज्यांना काहीतरी मिळवायचे आहे आणि ते ज्या मूल्यांवर मिळवायचे आहे, त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे? किती, कोण एकूण याप्रकारे सहभागी आहे; याला जनाधार म्हणता येईल. संकरित गाईंच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातली एक कोटी कुटुंबे सहभागी होती. महाराष्ट्रातल्या जनतेचा अंदाजे वीस टक्के भाग हा याच्यात थेटपणे सहभागी होता. शहरी भागात ज्यांना दूध मिळाल्याने आनंद झाला असे बघितले, तर ती संख्या अजून वाढेल. स्त्री-मुक्तीचा कार्यक्रमही असाच आहे. प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवरसुद्धा हजारो स्त्रिया संबंधित होत्या. भावनिक पातळीवर तर हा प्रत्येक स्त्रीचा प्रश्न होता. आणि हळूहळू तो निम्म्या पुरुषांचा प्रश्न बनला. 'पुरुष उवाच' नावाची स्त्री-मुक्तीला मदत करणाऱ्या पुरुषांची संघटना होती. जनाधार हा ज्या वर्गाचा नेमका फायदा आहे त्याच्या पलिकडच्या वर्गांमध्ये जाऊन पोचतो का?

बऱ्याच वेळा दलित चळवळीवर टीका होते. काही प्रमाणात खरे आहे, की बौद्धांची चळवळ, त्यांच्यात मांग येतो म्हटले, तर नकोसे वाटते. मातंग येतो म्ह्टले तर नकोसे वाटते. गारुडी तर चालतच नाही. गारुड्यांबद्दलही खरे आहे. त्यांनी जातीची संघटना केली की त्यांना इतर कोणी चालत नाही. जनाधाराचा एक अर्थ असा आहे की जे सगळे शंभर टक्के येणार नाहीत, पण ज्याना नजीकचा फायदा आहे, असे सोडून इतर लोक त्यात सामील होतात का?

संकरित गाईंच्या कार्यक्रमात अनेक शेतकरी सामील झाले. काहींनी चारे वाढवले. काहींनी दुधाच्या गाड्या चालवल्या. काही शहरामध्ये आनंदाने दूध प्यायले. ज्यांचा प्रत्यक्ष गाई संकरित करण्याशी काही संबंध नाही असे अनेक जनसमुदाय त्या कार्यक्रमांमध्ये गुंतू लागले. स्त्री-मुक्तीच्या कार्यक्रमात गुंतणारे पुरुष मी स्वतः अनेक पाहिलेले आहेत. काही वेळा असे होते की संकुचित जनाधार अधिक व्यापक होण्याचे प्रयत्न हे फारसे होत नाहीत.

माझा एक अनुभव सांगतो, मी एकेकाळी उद्गीरला युवक क्रांती दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होतो. तिथे एक दुधाची डेअरी होती. त्यांनी सांगितले, आम्हाला शंभर युवकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जो जो पाच हजार रुपये आणून देईल त्याला नोकरी. लोकांनी घरावरचे पत्रेसुद्धा विकले आणि त्याला पाच हजार रुपये नेऊन दिले. शेवटी त्याने वीसच लोकांना नोकऱ्या दिल्या. बाकीचे लोक आमच्याकडे आले. आम्ही मोर्चा काढला. आम्हाला पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकले. आम्ही पंधरा दिवस जेलमध्ये राहिलो. मग सुटून आलो. त्या ऐशीतल्या अजून वीस लोकांना नोकऱ्या मिळाल्या. बाकीच्या लोकांचे काय म्हणणे होते? अरे चोरांनो, तुम्ही आधी पैसे नेऊन दिले होते ना! तेव्हा तुमचा भ्रष्टाचार-विरोध कुठे गेला होता? उद्गीरमधल्या रिक्षा स्टॅंडच्या रिक्षावाल्याला असे वाटले नाही की हा आपला लढा आहे. आमची युनियन त्या रिक्षावाल्यांमध्येसुद्धा होती. उद्गीरमध्ये एक खादी ग्रामोद्योग केंद्र आहे. तिथे चरख्यावर काम करणाऱ्या बायकांमध्ये पण आमची युनियन होती. पण त्या कोणालाही असे वाटले नाही की या पोरांचा लढा आपला आहे. आम्ही काही त्यांना फारसे इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकलो नाही. म्हणजे मूल्याधार जो आपण म्हणतो भ्रष्टाचाराविरुद्धचा, तो खरा आमच्याकडे नव्हता. आमच्याकडे म्हणजे एक आनंद करंदीकर सोडा. आनंद करंदीकरांना नोकरी पण नको होती. लोक म्हणतात, तुम्हाला हौसच आहे तुरुंगात जायची! तेव्हा तुमचे सोडा. बाकीच्यांचे काय? भ्रष्टाचाराचा फायदा झाला तर आम्ही भ्रष्टाचारी; भ्रष्टाचाराचा फायदा नाही झाला तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात. इतके जेव्हा हे संकुचित आहे, तेव्हा तो लढा काही व्यापक जनाधाराचा लढा असू शकत नाही.

कालाधार

शेवटचा महत्त्वाचा भाग की एक कालाधारही लागतो. ती त्या काळाची गरज असावी लागते. हा अधिक व्यापक विषय आहे. कुठलेच समाजातले बदल हे स्वयंपूर्ण, तेवढ्यापुरते घडत नाहीत. त्याचा सगळ्या इतर गोष्टींशी संबंध असतो. वर्तमानपत्रे छापायची असतील तर प्रिंटिंग प्रेसचा शोध लागलेला असावा लागतो. एका बाजूला तंत्रज्ञानाची गरज असावी लागते, दुसऱ्या बाजूला मला लोकांना काहीतरी सांगायचे आहे, अशी निकड वाटावी लागते, कारण तुम्हाला स्वातंत्र्याची चळवळ लढायची आहे. भारतातली वर्तमानपत्रे ब्रिटिशांच्या बोटीतून आलेला कुठला माल विकाऊ आहे हे जनतेला कळावे म्हणून सुरू झाली. ती व्यापारी गरज होती. जाहिराती छापायला वर्तमानपत्राचा तेव्हा मुख्य उपयोग होता. बॉम्बे गॅझेट. मुंबई समाचार नंतर आले.

वर्गीय जाणीव ही काय भानगड असते? आता हा मार्क्सवाद्यांचा शब्द आहे. कामगार वर्गाला असे वाटायला लागले होते, की भांडवलशाहीच्या विरुद्ध मी लढा करणार आहे. ह्याला ते वर्गीय जाणीव म्हणतात. वर्ग वेगवेगळे असू शकतात. शेतकऱ्यांची म्हणून एक वर्गीय जाणीव असू शकते. मजुरांची म्हणून एक वर्गीय जाणीव असू शकते. ह्या जाणिवासुद्धा विकसित व्हायला लागतात. दोनशे वर्षांपूर्वी, तीनशे वर्षांपूर्वी सतीच्या चालीला का विरोध झाला नाही, हा प्रश्न हास्यास्पद आहे. एकूण समाजामधली समतेची भावना, वैयक्तिक स्वातंत्र्याची भावना, जगण्याच्या अधिकाराबद्दलची जाणीव ही विकसित व्हावीच लागते. जशी तंत्रज्ञानामधली प्रगती अपेक्षित असते तशीच समाजातल्या मूल्यसंस्थांतील प्रगतीही आवश्यक आहे. प्रत्येकच पिढी असे म्हणते की आमच्यावेळी बरे होते, आता यांची मूल्यव्यवस्था ढासळली आहे. कोणी गांभीर्याने म्हणत नाही, बरे का! मी तरी म्हणत नाही. तुम्ही जर कालक्रम बघितला तर असे म्हणायला काही जागा नाही. आपण असा नक्कीच आशावाद ठेवू शकतो, की ज्या मूल्यांवर आपण श्रद्धा ठेवतो ती इतिहासाच्या विकासक्रमात घडत आलेली मूल्ये आहेत, आणि ती एकूण पुढेही वाढत जाणार आहेत.

चांगल्या अर्थाने व्यक्तिस्वातंत्र्य (मी कमालीचे एकांगी व्यक्तिस्वातंत्र्य म्हणात नाही), किंवा एकूणच समाजामधले लोकशाहीकरण वाढत चाललेले आहे. बदलाच्या चळवळींच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आपण जे बदल करू इच्छितो त्याला एक कालाधार आहे. जी मूल्ये वर्धिष्णु आहेत; स्वातंंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, अहिंसा असेल, कोणीतरी म्हणाले की प्रेम आहे, आहेच ते. बंधूतामध्ये घालून टाकतो; असा कालाधारही त्या चळवळींना असावा लागतो. कालाधाराचा एक अर्थ असा, की त्या इतर चळवळींशी आणि इतर विचारांशी किती जोडलेल्या आहेत; किती विविध अंगांनी जीवनाच्या किती क्षेत्रांत ती चळवळ जाऊन भिडली आहे?

संकरित गाईंची मूळ ठेवण वीर्य आणायचे, टोचायचे आणि संकरित वासरू निर्माण करायचे अशी असली, तरी दुसऱ्या बाजूला मग अख्खी चाऱ्याची पिके आणि त्यामुळे पूर्ण शेतीचे नियोजन, हाही त्या चळवळीचा भाग बनतो. गाई-म्हशी कश्या संभाळायच्या हे गुजरातमधल्या शेतकऱ्यांना जेव्हा कळायला लागले तेव्हा त्यांना पहिल्याने आपल्या बायकोची काळजी घेणे का महत्त्वाचे आहे हेही कळायला लागले. बाईला दिवस राहिले की तिची काळजी किती नीटपणे घेतली पाहिजे, हे त्याला गर्भार म्हशीची का़ळजी घ्यायला जेव्हा आम्ही शिकवले, तेव्हा नीट कळायला लागले, असे कुरियन म्हणतात. मुद्दा असा की जीवनाच्या विविध क्षेत्रांना ही चळवळ जाऊन भिडली पाहिजे. स्त्री-मुक्तीची चळवळ, त्यात कोअरचा भाग कुटुंबांतर्गत हिंसा थांबवणे असा जरी असला तरी राजकारणामध्ये आम्हाला स्थान काय आहे, पुण्याच्या किती शिक्षण संस्थांच्या प्राचार्य स्त्रिया आहेत ? पंच्याहत्तर साली एवढा शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर त्यांनी असा प्रश्न विचारला, साधा, की एवढी पुण्याला चाळीस कॉलेजेस आहेत, किती कॉलेजेसच्या प्राचार्य स्त्रिया आहेत ? उत्तर होते - शून्य ! लॉ कॉलेजची प्राचार्य पहिल्याने त्या काळात झाली. लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल स्त्री-मुक्ती चळवळीशी संबंधित होते. कालाधार याचा अर्थ, हा प्रश्न कुटुंबातील अत्याचाराशी संबंधित आहे का, की पुण्याच्या किती संस्थांच्या प्रिन्सिपल्स या स्त्रिया आहेत ? वरकरणी नाही. समाजातले एकूण स्त्रियांचे स्थान, सत्तेतील एकूण स्त्रियांचे स्थान याच्याशी तो जरूर संबंधित आहे.

एल. आय. सी.ची जाहिरात होती आत्ता आत्तापर्यंत, की विमा हा मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी. ह्याच्यावर त्या चळवळीने रान उठवले. एल. आय. सी.वाल्यांना या जाहिराती बंद कराव्या लागल्या. याचा प्रत्यक्ष संबंध जळिताच्या केसेसशी आहे का ? म्हटले तर आहे, कारण की हुंडा मिळेल म्हणूनच लग्न करायचे आणि एकीला जाळून परत लग्न केले की परत हुंडा मिळतो. एकाने अभ्यास केला, की अशा आधी ज्या केसेस झाल्या, पुढच्या तीन वर्षांत त्या पुरूषाचे लग्न होते आणि त्याला परत हुंड्यासकट बायको मिळते.
प्रश्नाच्या विविध अंगांना जाऊन भिडावे लागते. आणि असे म्हणावे लागते, की ठीक आहे, हा गाभ्याचा प्रश्न आहे. मगच त्याचा कालाधार आहे की नाही, हे कळते.

दुर्दैवाने "भ्रष्टाचाराचा संबंध भांडवलशाहीशी आहे का हो ?" अशा प्रश्नसुद्धा विचारलेला अनेकांना चालत नाही. पण राजकारणी भ्रष्टाचारी आणि त्यांना पैसे देणारे सगळे कोण ? आत्ता कधी नव्हे ते सीबीआय निदान त्यांचे इन्टरव्ह्यू घ्यायला लागले. एकालाही अजून अटक केलेली नाही. कोण कोण पत्रकार वीर सिंघवी आणि बरखा दत्त, हे त्या नीरा राडियाशी चर्चा करतात, की ह्या मुलाखतीचा अंत कसा व्हायला पाहिजे ? मध्य कसा असला पाहिजे? आम्ही तुमच्यासाठी सगळी मुलाखत कशी डिझाईन करू ? हा सगळा भ्रष्टाचाराचा भाग नाही ? मीडिया दाबून ठेवते, बरोबर आहे. इतर कोण बोलतात ? आयपीएलबद्द्ल! पहिल्या दिवशी बातमी आली, की हे देशपांडे आणि अ‍ॅनालॉग यांनी म्हणे डील केले होते. मग दुसऱ्या दिवशी बातमी आली, की सुप्रिया सुळे म्हणतात, की आमचा त्या कंपनीशी काही संबंध नाही. तिसऱ्या दिवशी बातमी आली, की बोर्डाच्या सभेला आम्ही हजर नव्हतो. चौथ्या दिवसापासून एका शब्दाने एकही बातमी नाही. इतकासुद्धा भ्रष्टाचाराचा संबंध बाजूला काढून इतर कोणाशी जोडायचा नाही, असे जर झाले, तर त्याचा कालाधार उरत नाही. त्याला जनाधारही राहात नाही. दुर्दैवाने भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे हेच आहे. पर्यावरणविरोधी चळवळीचे हेच आहे आणि अंधश्रद्धा आणि लोकविज्ञान चळवळी या इतर कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध जोडायला भांडत नाही.

माझा स्वतःचा अनुभव आहे, की पेटंट कायद्द्याला विरोध करायला पाहिजे, इन्टलेक्चुअल प्रॉपर्टी राइटसला. तशी आम्ही भुमिका घेतली. लोकविज्ञानमधल्या सगळ्यांनी विचारले, की याचा लोकविज्ञानशी काय संबंध आहे. पेटंट अ‍ॅक्टचा आणि बौद्धिक मक्तेदारी असावी का नसावी; परदेशी कंपन्यांचा आणि लोकविज्ञान चळवळीचा काही संबंध नाही. अंधश्रद्धा निर्मूलनचा तर त्याहून नाही. मग आम्ही त्यांना पटवून दिले, की याच्यामुळे औषधे महाग होतात. आणि स्वस्त औषधे असा आपला कार्यक्रम आहे की नाही ? म्हणून आपण इन्टलेक्चुअल दादागिरीला विरोध केला पाहिजे; असा त्यांचा संबंध जोडू शकतो. एकूण शिक्षणातली ब्राम्हणी मक्तेदारी याच्यावर खरे सर्व चळवळींनी बोलले पाहिजे. ते अजिबात बोलणार नाहीत. असे बोलणे त्यांना आवडत नाही. कारण की ते एकजात, मी धरून, सगळे ब्राम्हण आहेत, आणि आपण एका जातीच्या छोट्या कळपात अडकलो आहोत, याचेही भान त्यांना राहात नाही. असे झाले की कालाधारही जातो, जनाधारही जातो.

समारोप

माझ्या दृष्टीने जर चळवळीला मूल्याधार असला, तर तो बरोबर मूल्याधार असावा लागतो. तिने व्यापक ज्ञान आत्मसात केले असले आणि ज्ञानवृद्धीत तिने सातत्याने भर घातली असली तर ज्ञानाधार लाभतो. तिच्यात सातत्याने काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते असले; (नेते आवश्यक असतात, ते निर्माण होतात, पण जे इतरांना आत घ्यायला तयार आहेत, सातत्याने काम करायला तयार आहेत, लोकशाहीने वागायला तयार आहेत, संस्थात्मक उभारणी करायला तयार आहेत आणि आपले वैयक्तिक जीवन आणि आपला सार्वजनिक मुखवटा याच्यात काहीएक कन्सिस्टन्सी बाळगायला तयार आहेत) तर कार्याधार घडतो. जर त्यांचा लगेचचा फायदा आहे असे सोडून इतर लोकांचा सहभाग यायला लागतो, तेव्हा चळवळीचा जनाधार निर्माण होतो. इतर चळवळी, जीवनाची विशिष्ट अंगे, तंत्रज्ञान, इतर ज्ञान, इतर चळवळी ह्यांच्याशी संबंध आहे, की ते फक्त एका संकुचित प्रश्नाबद्द्लच मर्यादित आहे ? त्यांचा टोकाचा प्रश्नही असू शकतो; पण त्या प्रश्नाची नाती ही सार्वत्रिक जोडलेली आहेत का ? आणि त्या त्या कालक्रमाप्रमाणे आहेत का? हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. या सगळ्या प्रश्नांना होकारच मिळेल अशी खात्री नाही. हा होकार करण्याकडे आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यातूनच कालाधार मिळतो. चळवळीचा जनाधार धडवावा लागतो. चळवळीचा कार्याधार घडवावा लागतो. चळवळीचा ज्ञानाधार घडवावा लागतो. चळवळीला मूल्ये स्वीकारावी लागतात. एखादवेळेस मी एक लहान संस्था उभारून तिथे हे काम करत असेन. ती जर बदलाची असेल, तर तीही चळवळच आहे. असे जर झाले तर चळवळी यशस्वी होतात. महाराष्ट्रामध्ये हे झालेले आहे. अशा चळवळी यशस्वी होण्याचीच मुख्य परंपरा आहे. अयशस्वी होण्याची परंपरा आता कमी आहे. हा आपल्या दृष्टीने फार चांगला भाग आहे.

पूर्वप्रकाशन : 'आजचा सुधारक', ऑगस्ट २०१२.

field_vote: 
4.77778
Your rating: None Average: 4.8 (9 votes)

प्रतिक्रिया

लेख/भाषण वाचनीय, मननीय वाटलं.

काही चळवळी का चालतात नि काही का नाही याची केलेली मीमांसा काहीशा प्रमेयासारखी वाटली. माझ्यामते एखाद्या गुंतागुंतीच्या किंवा मूलभूत स्वरूपाच्या गोष्टीचं असं आडाखे बांधून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणं रोचक, काहीसं धाडसी , पण नक्कीच स्पृहणीय.

काही मुद्दे नीटसे स्पष्ट झाले नाहीतसं वाटलं. इथे ते कुणी समजावून दिले तर छानच.

- धवल क्रांतीची जी माहिती आलेली आहे त्याचं स्वरूप "चळवळ" असं असू शकेल का ? कुठल्या अर्थाने ही गोष्ट हुंडाबंदीसारख्या चळवळीसारखी असू शकते ?

- हुंडाबंदीची चळवळ यशस्वी झाली हे सांगताना, पीडित महिलेने तक्रार केली तर दोषी व्यक्तींना शिक्षा होते याची जितीजागती उदाहरणं घडली आणि त्यामुळे ही चळवळ यशस्वी ठरली असा एक सूर आहे (असं मला वाटलं.) तर मग तसं असेल तर आर टी आय् कायद्यामुळे गोष्टी बदलू शकतात अशी उदाहरणं पुढे करता येतील आणि त्यातून भ्रष्टाचार दूरही व्हायला पाहिजे होता. (म्हणजे बर्‍याच अंशी कमी व्हायला हवा होता.) यामागे काही विसंगती आहे काय ?

- वरची प्रमेयं मांडताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे का काय ते नीटसं कळलं नाही. स्वातंत्र्याकरताचा लढा "स्वातंत्र्य" हे ध्येय प्राप्त झाल्यामुळे यशस्वी झाला असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे (महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर) स्वातंत्र्योत्तर काळात यशस्वी ठरली ती चळवळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची. "मुंबईसह सं. म. झालाच पाहिजे" हे ध्येयवाक्य होतं. ते मिळालं. चळवळ यशस्वी झाली. तेच कदाचित गोवा मुक्तीसंग्रामाबद्दल म्हणता येईल. थोडक्यात काहीतरी ठळक, सॉलिड, निश्चित केलं गेलेलं ध्येय असणं आणि ते गाठणं याच्याशी जर का चळवळ बांधली गेली असेल तर यशस्वी ठरू शकेल हा (माझ्यासारख्या साध्या माणसाला सुचलेला ) मुद्दा इथे अनुल्लेखित का आहे ते समजलं नाही.

- अपेशी चळवळींचाच विचार करायचा तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यापेक्षा मला गिरणी कामगारांची दारुण अपयशी ठरलेली चळवळ आधी आठवते. एकतर "भ्रष्टाचार हटाओ" अशी काही एक चळवळ कधी नव्हती. ना देशात ना महाराष्ट्रात. याउलट १९८२ साली जे झालं (आणि काही लाख लोकांना १९८२ पासून जे भोगावं लागलं) ते निश्चितच "गिरणी कामगारांचा संप" या एका निश्चित घटनेखाली येतं. माझ्यामते त्या अपेशाची मीमांसा करणं अधिक अर्थपूर्ण ठरलं असतं.

असो. मी सुरवातीला म्हण्टल्याप्रमाणे, प्रमेय मांडून नवनव्या अंगाने विचार करणं हे स्पृहणीय आहेच. परंतु अशा प्रमेयांनी काही प्रॉमिनंट अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे. असं केलं तर ती प्रमेये चुकली तरी अधिक महत्त्वाची ठरू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>> धवल क्रांतीची जी माहिती आलेली आहे त्याचं स्वरूप "चळवळ" असं असू शकेल का ? कुठल्या अर्थाने ही गोष्ट हुंडाबंदीसारख्या चळवळीसारखी असू शकते ? <<

धवलक्रांती - गायीम्हशींकरवी दुधाचं उत्पादन करणं आणि अतिरिक्त दुधाची विक्री करणं हा अनेक शेतकऱ्यांचा पारंपरिक शिरस्ता होता. पण त्यांना एकत्र आणणं, पद्धतशीरपणे त्यांचं दुग्धोत्पादन वाढवणं, सहकार चळवळीतून त्यांना चांगला भाव देणं आणि ग्राहकांना अधिक दर्जेदार दूध अधिक प्रमाणात पुरवणं हा एक सामाजिक बदल होता. त्यासाठी लोकांना आणि सरकारला एकत्र यावं लागलं. त्याच्या यशस्वितेसाठी अनेक घटक कार्यरत होते. 'मंथन'सारख्या चित्रपटात ह्याचं चांगलं चित्रण आहे. त्यातूनही ही चळवळ कशी होती ते स्पष्ट होतं.

>> काहीतरी ठळक, सॉलिड, निश्चित केलं गेलेलं ध्येय असणं आणि ते गाठणं याच्याशी जर का चळवळ बांधली गेली असेल तर यशस्वी ठरू शकेल हा (माझ्यासारख्या साध्या माणसाला सुचलेला ) मुद्दा इथे अनुल्लेखित का आहे ते समजलं नाही. <<

असं ध्येय असूनही काही चळवळी अयशस्वी होतात; काहींना यश मिळायला उशीर होतो; तर काही अयशस्वी होतात. म्हणजे असं ध्येय असणं ही यशाची गुरुकिल्ली नाही किंवा ते पुरेसं नाही. माझ्या मते यशापयशाची सखोल मीमांसा लेखात आहे. त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची सैद्धांतिक मांडणी त्यात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वॉव.

लेख वाचून मध्यंतरी एका मित्रानं केलेल्या टिप्पणीची आठवण झाली. त्याचा इतिहास या ज्ञानशाखेवर विशेष रोष. त्याच्या मते:-गणित, संगीत, वि़ज्ञान यांसारख्या शाखांमध्ये मूर्ताकडून अमूर्ताकडे, उदाहरणांकडून सूत्रांकडे जाण्याचा प्रयत्न असतो. पण इतिहासात असं काही केल्या करत नाहीत. दर एक उदाहरण घेऊन त्याकडे 'वा! वा! छान!' म्हणून अचंब्यानं / भारावून / चिडून पाहत बसतात. अमुक एका परिस्थितीत, अमुक अमुक घटकांमुळे अमुक गोष्ट होण्याची शक्यता असते, असं काहीतरी निरीक्षण मांडाल की नाही, भाऊ? ते काही नाहीच! अगदीच निरुपयोगी ज्ञानशाखा...

(अवांतरः मग साहित्याबद्दल त्याचं मत काय आहे, हे विचारण्याच्या फंदात मी पडले नाही, हेवेसांनल!)

त्याची तक्रार या लेखामुळे काही प्रमाणात दूर व्हावी, असं मी मनात म्हणत असतानाच वर मुसु यांनी या प्रमेयीकरणाबद्दलच अचंबा व्यक्त केला आहे हे मजेशीर आहे!

चळवळ या गोष्टीच्या विचाराला वेगळ्या कसोट्या मिळाल्या या लेखामुळे. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकुणच चळवळ या विषयाचा इतका सर्वसमावेशक आणि संकीर्ण धांदोळा वाचायला मिळणे हा एक वेगळा आणि अतिशय रोचक अनुभव आहे. वेगवेगळ्या चळवणींबाबत वाचायला सुरूवात करण्यापूर्वी मुळात चळवळ या विषयावरच केलेला उहापोह नुसता वाचनीयच नाही तर माहितीपूर्ण आणि संग्राह्य आहे!

लेख अतिशय आवडला हे वे सां न.

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
उत्तम लेख! अतिशय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
मी प्रिंटआउट काढून भिंतीवर लावणारे. जमलं की वाचत राहणार आहे -- पुन्हा पुन्हा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आजचा सुधारक ऑगस्ट २०१२ मधे हा लेख वाचला होता. विस्कळीत वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विषयाची व्याप्ती एवढी मोठी आहे कि त्याला पुस्तकच न्याय देऊ शकेल त्यामुळे भाषणाच्या मर्यादा लक्षात येतात. चळवळीची चिकित्सा आणि त्यावर लिहिलेला उत्तम लेख. धन्यवाद.

चळवळी यशस्वी होण्यामागे स्पष्ट आकलन होण्याइतपत समस्या मोठी होती असे लेख वाचुन लक्षात येते, समस्येचे स्पष्ट आकलन होण्याची प्रज्ञा असणारी लोकं होती असे मात्र स्पष्ट होत नाही, आजच्या परिस्थितीत असलेल्या समस्यांचे स्पष्ट आकलन नसणे आणि त्यामुळे आजच्या चळवळींमधे असलेली विकलांगता (करंदिकरांना अपेक्षीत) हि समस्या लेखावरुन आणि लेखातल्या 'गुंत्यावरुन' पुरेशी स्पष्ट होते.

दुर्दैवाने असे वादविवाद हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, लोकविज्ञानवालेसुद्धा फारसे करत नाहीत. ते एका अंधश्रद्धेबद्दल बोलतात. त्याचा उलगडा करून दाखवतात. ते केलेच पाहिजे. पण त्याच्यापलीकडे जाऊन ह्याच्याबद्दल एकूण ज्ञानप्रसार करणे व्हायला हवे. भ्रष्टाचार का निर्माण होतो? कशातून निर्माण होतो? भ्रष्टाचारी माणूस वाईट, त्याच्यावर खटला भरला पाहिजे, त्याला तुरुंगात टाकले पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे; हे सगळे बरोबर आहे. पण हे कशामुळे होते? का होते? याची मुळे कशात आहेत? याच्यामागे प्रेरक शक्ती कुठल्या आहेत? एकूण समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार का होतो? जयप्रकाशजींनी लिहिलेली ‘लोकतंत्र के नाम चिट्ठी’ तुम्ही वाचली असेल. पुस्तिका चांगली आहे. पण जर तुम्ही असा प्रयत्न केला शोधण्याचा, की भ्रष्टाचार का होतो आणि होऊ नये म्हणून काय करावे, तर याच्याबद्दल तीमध्ये किती आहे हो? फार कमी आहे.

चळवळींमधे परस्परसंबंध असला पाहिजे असे करंदिकरांना म्हणायचे असावे असे वाटते, पण हे अर्थनिर्णयन वाचकावर किंवा श्रोत्यावर सोडणे म्हणजे गोंधळ माजवणे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> चळवळींमधे परस्परसंबंध असला पाहिजे असे करंदिकरांना म्हणायचे असावे असे वाटते, पण हे अर्थनिर्णयन वाचकावर किंवा श्रोत्यावर सोडणे म्हणजे गोंधळ माजवणे आहे. <<

'ज्ञानाधार' ह्या मुद्द्याअंतर्गत हे आहे. त्यात त्यांनी आधी हेसुद्धा म्हटलेलं आहे -

आपण जे करतो आहोत, त्याच्याबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान आहे का, आणि चळवळीतून ते ज्ञान पुढे जाते आहे का, हा प्रश्न आहे. चळवळीला नुसता ज्ञानाचा आधार असून पुरत नाही. चळवळीने संबंधित ज्ञान पुढे न्यावे लागते.

माझ्या मते ते चळवळींतल्या परस्परसंबंधांबद्दल नाही, तर चळवळींच्या सैद्धांतिक मांडणीविषयी किंवा एपिस्टेमॉलॉजीविषयी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चळवळींच्या सैद्धांतिक मांडणीविषयी किंवा एपिस्टेमॉलॉजीविषयी आहे.

हे महत्त्वाचे आहे, पण 'ह्या' कनेक्टशिवाय त्यांना खालच्या परिच्छेदात तसेच म्हणायचे होते हे सुस्पष्ट होत नाही, हा माझा झालेला गोंधळ माझी आकलन-मर्यादा असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख दोन-तीनदा वाचून आता काहीसा कळतो आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि पाच आधारांची चौकटसुद्धा विचार करण्यालायक आहे.

(भाषण हे माध्यम वक्ता-श्रोता यांच्यामधील देहबोली वगैरेंमुळे बहुआयामी असते. ते निबंधरूपाने पुढे ठेवताना संपादित करून, परिच्छेद मागे-पुढे हलवून घेतले, तर चांगले. विचारांत विस्कळितपणा नाही, हे आता कळते आहे, पण सुरुवातीला लेख विस्कळित वाटला होता, खरा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकांपैकी अनेकांनी हा लेख विस्कळित वाटल्याचं म्हटलं आहे. मला तसा तो अजिबात वाटला नाही. काहीसा मोठा आहे, पण विषयाची व्याप्ती इतकी आहे की त्याला पर्याय नाही. त्यांनी आपले मुद्दे पटवून देण्यासाठी वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या चळवळींमधून उदाहरणं दिलेली आहेत. ते उदाहरण संपवून पुन्हा मूळ मुद्द्यावर गाडी कधी येते हे व्यवस्थित तपासून पाहिलं की या भाषणाची रचना जाणवते.

किंबहुना आपल्या तात्विक मांडणीचं मूल्यमापन चारपाच व्यापक चळवळींच्या आधारे करणं आणि त्या मूल्यमापनाच्या आधारे आपले मुद्दे बळकट त्यांनी केलेले आहेत, हे आवडलं. नाहीतर ती निव्वळ हस्तिदंती मनोऱ्यातून केलेली मांडणी होते.

चळवळ विशेषांक काढताना त्या कुठच्या जमिनीत पोसल्या जातात, कधी जीव धरतात पण पुरेशा वाढत नाहीत, कधी फोफावतात याविषयी काही लिखाण यावं अशी इच्छा होती. आनंद करंदीकरांचा हा लेख ही जागा सुंदर रीतीने भरून काढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह! सहज आठवला म्हणून पुन्हा वाचला. पुन्हा पुन्हा वाचावे असे लेखन.
दरवेळी नवे काहीतरी मिळते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दुव्याबद्दल आभार. उत्तम आणि सकस अंक!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

माझ्या मते चळवळ म्हणजे समाजात झालेला सकारात्मक बदल....
मग तो बदल अनेकदा समाजाला त्या बदलाची वाटत असलेली गरज या एका मापकावरच स्वीकारला जातो..
दुर्दैवाने समाजाला त्याची गरज कळते पण वेगळे पडण्याच्या भितीने अनेकजण तो बदल करण्यास धजावत नाहीत
उदा. स्त्री शिक्षण चळवळ
20 वर्षांपूर्वी ग्रामीण भागात खूप मागे होती पण आता सर्वच मुली शिकतात म्हणून कुणी त्याला विरोध करत नाही पण तीच शिकलेली मुलगी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते यावर तोच समाज विश्वास ठेवत नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..

या संदर्भात, न्यूयॉर्करमधला ताजा लेख वाचनीय आहे.
Is There Any Point to Protesting?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

New Yorker मधील प्रदीर्घ लेख उत्कृष्टच आहे। वाचल्यानंतर एकूणच blacks discrimination च्या विरोधातली चळवळ इतकी सशक्त कशी झाली, ह्याचा छान उलगडा झाला, आणि एकूणच चाळवळकर्त्या पुढारयांच्या इतक्या detailed strategic and tactical planning बद्दल आदर वाटला।
त्या पार्श्वभूमीवर, अण्णा हजारे यांची भ्रष्टयाचारा विरोधी चळवळ, इतक्या मोठ्या प्रमाणांत जनजागृती होऊन देखील, फसली ह्याचे वाईट वाटते।
करंदीकरांचा लेख संग्राह्य आहे, परत परत वाचावा असा आहे।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

>>अण्णा हजारे यांची भ्रष्टयाचारा विरोधी चळवळ, इतक्या मोठ्या प्रमाणांत जनजागृती होऊन देखील, फसली ह्याचे वाईट वाटते।

फसली असे का वाटते? भ्रष्टाचारात बरबटलेल्यांची राजवट उलथून स्वच्छ चारित्र्याच्या लोकांची राजवट आली की. Blum 3
(भ्रष्टाचार नाहीसा होणे हे चळवळीचे उद्दिष्ट* होते- लोकपाल हा सुचवलेला केवळ एक मार्ग होता. लोकपाल आणणे हे चळवळीचे अंतिम साध्य नसावे. त्या दृष्टीने चळवळ यशस्वीच झाली. तीन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही अशी ग्वाहीसुद्धा मिळाली).

*शिवाय भ्रष्टाचार नाहीसा व्हावा हे लोकांचे उद्दिष्ट होते की नाही याबद्दल साशंक आहे. संधी मिळताच लोक भ्र्ष्टाचाऱ्यांना साथ देण्यास एका पायावर तयार असतात असा अनुभव पंतप्रधानांना आलेलाच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फसली असे का वाटते? भ्रष्टाचारात बरबटलेल्यांची राजवट उलथून स्वच्छ चारित्र्याच्या लोकांची राजवट आली की.

मोदिंवर व त्यांच्या बहुतेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते व आहेत. मोदींवर तर गुजरात, भारत केंद्रसरकात व थेट युनो व जागतिक ब्यांकेत सुद्धा अब्जवधी करोड डॉलर्स चा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत. यातले बहुतेक आरोप सिद्ध झालेले आहेत.

म्हंजे मग अण्णांची चळवळ ही फसलीच म्हणायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच्या भ्रष्टाचारात बरबटलेल्या सरकारातील मंत्र्यांवरील बहुतेक आरोप सुद्धा "सिद्धच झालेले होते" Blum 3

शिवाय चळवळ ज्यांनी स्पॉन्सर केली त्यांचा कार्यभाग साधला आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.