पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का?
गेल्या वर्षीच्या बुकर पारितोषिकावरून उठलेला वाद आणि त्याचा मराठी आंतरजालाच्या संदर्भात लागलेला अर्थ बुकर पारितोषिक, साहित्यिक मूल्य, दर्जा वगैरे या धाग्यात चर्चिला होता. या वर्षीच्या बुकर पारितोषिक निवडसमितीचे प्रमुख सर पीटर स्टॉटहार्ड यांनी ब्लॉगविश्वातल्या साहित्यविषयक मतांबद्दल काही विवादास्पद विधानं केली आहेत. त्यांच्या या विधानांमुळे इंग्रजी साहित्यक्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडली आहे. स्टॉटहार्ड हे इंग्रजी साहित्यविश्वात प्रतिष्ठित असलेल्या 'टाइम्स लिटररी सप्लिमेंट'चे संपादक आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला वजन आहे. ते काय म्हणतात?
It is wonderful that there are so many blogs and websites devoted to books, but to be a critic is to be importantly different than those sharing their own taste… Not everyone's opinion is worth the same.
The rise of blogging has proved particularly worrying. Eventually that will be to the detriment of literature. It will be bad for readers; as much as one would like to think that many bloggers opinions are as good as others. It just ain't so. People will be encouraged to buy and read books that are no good, the good will be overwhelmed, and we'll be worse off.
प्रत्येक माणसाच्या साहित्यविषयक मताला समान वजन नसतं. 'सम आर मोअर इक्वल' अशा धर्तीचं विधान ते करतात. त्यापुढे जाऊन ते असंही म्हणतात की या मतांच्या गलबल्यामुळे वाईट पुस्तकं विकत घ्यायला आणि वाचायला लोकांना प्रोत्साहन मिळेल, आणि (मोजक्या, पण) चांगल्या पुस्तकांना मिळणारा अवकाश अधिक संकोचेल.
दर्जेदार पुस्तकांनी भाषेत नवं चैतन्य भरलं पाहिजे असंही ते म्हणतात. लोकप्रिय लेखकाचं नवं पुस्तक वाचण्यासाठी कुणाला समीक्षकांच्या मताची वाट पाहायला लागत नाही. पण नवी वाट चोखाळणारी पुस्तकं वाचकांसमोर आली पाहिजेत. क्वचित ती वाचायला तेवढी (लोकप्रिय पुस्तक वाचण्याएवढी) मजाही येणार नाही, पण साहित्याचं भविष्य त्यांच्यावर अवलंबून असेल म्हणून ती वाचकांसमोर येणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे.
वर्तमानपत्रांत पुस्तकांसाठी असलेल्या जागेचा संकोच आणि परीक्षणांचा घटता दर्जा याविषयीही ते चिंता व्यक्त करतात. वाद किंवा चर्चेला खुल्या नसलेल्या परीक्षणांमुळे साहित्यविश्वाची हानी होते आहे; 'माझ्या मुलाला हे आवडेल' किंवा 'वाचकांना ह्याविषयी काय वाटेल' असं काहीतरी म्हणणं हे काही परीक्षण नाही असं त्यांचं मत आहे. 'पुस्तकांविषयी इतकी मतं ऑनलाईन उपलब्ध असताना वर्तमानपत्रात परीक्षणं कशाला छापायची?' असं म्हणणारे वृत्तपत्र संपादक आणि इतर लोक यांच्यावर ते टीका करतात.
अनेकांना स्टॉटहार्ड यांची मतं पटली नाहीत. John Self, Max Cairnduff किंवा Stephen Mitchelmore यांच्यासारखे ब्लॉगर्स चांगली समीक्षा लिहीत आहेत; पुस्तकांचा सुकाळ झालेला असताना काय वाचायचं हे ठरवण्यासाठी वाचकांची पसंती हा एक निकष असू शकतो असा प्रतिवाद केला जात आहे. ब्लॉगर्सविषयीचा एक प्रकारचा तुच्छतावाद व्यक्त करण्याची ही एक पुराणमतवादी फॅशन आहे असाही काहींचा आक्षेप आहे. निव्वळ पुष्कळ पुस्तकं वाचून आणि जीवनानुभवातून सुजाण वाचक घडू शकतात आणि त्यांची मतं साक्षेपी असू शकतात असं काहींचं म्हणणं आहे.
मराठी वृत्तपत्रं आणि नियतकालिकं यांत साहित्यविषयक लेख किंवा परीक्षणं यांना दिली जाणारी जागा संकोचते आहे. पण ऑनलाईन विश्वाविषयी काय म्हणता येईल? मराठी ब्लॉगविश्व, संवादस्थळं यांत प्रदर्शित होणारी पुस्तकविषयक मतं-परीक्षणं तुम्हाला कशी वाटतात? स्टॉटहार्ड यांचे आक्षेप तिथे लागू होतात असं वाटतं का? याच ठिकाणी पाहिलं तर असं दिसतं की 'सध्या काय वाचताय?'सारखे धागे लोकप्रिय होतात, पण त्यात व्यक्त झालेल्या मतांहून अधिक दीर्घ काही फारसं लिहिलं जात नाही. इतर काही संवादस्थळांवर पुस्तकांवरच्या चर्चेसाठी स्वतंत्र गट, स्पर्धा वगैरे चालू दिसतात. त्यांतून नव्या वाटा चोखाळणारं साहित्य लोकांसमोर येण्यात कितपत मदत होते असं तुम्हाला वाटतं? साहित्याविषयीचं दर्जेदार लिखाण जिथे सापडतं असे मराठी ब्लॉग्ज तुमच्या मते कोणते? वर उल्लेख केलेल्या इंग्रजी ब्लॉग्जच्या दर्जाचे ते आहेत असं म्हणता येईल का? इथल्या वाचकांची मतं जाणण्यास उत्सुक आहे.
मूळ लिखाणाचे संदर्भ :
'इंडिपेंडंट'मध्ये आलेली स्टॉटहार्ड यांची मुलाखत
गार्डियनमधली याविषयीची बातमी
विरोधातली मतं
स्टॉटहार्ड यांची पुण्याई
पीटर स्टॉटहार्ड यांच्यामागे ट्रिनिटी कॉलेज (केंब्रिज)मधलं शिक्षण, 'न्यू स्टेट्समन', 'टाइम्स लिटररी सप्लिमेंट' अशा अनेक प्रतिष्ठित नियतकालिकांतलं लेखन-संपादन अशी बरीच पुण्याई आहे. इंग्रजी साहित्यविश्वातलं त्यांचं स्थान त्यामुळे तसं सर्वश्रुत आहे. म्हणून त्यांची विधानं गांभीर्यानं घेतली जात आहेत. श्री.पु.भागवतांनी एखाद्या मुलाखतीत एखादं साहित्यविषयक मत मांडलं तर त्यांना 'विदा द्या' म्हणण्यासारखं त्यामुळे हे काहीसं होईल. तसं करू नये असं मी म्हणत नाही आहे; पण इंग्रजी साहित्यविश्वात त्यांच्या मतांचा गांभीर्यानं प्रतिवाद करणारे लोकदेखील 'तुमचा अभ्यास किती? तुम्ही बोलताय किती?' अशा स्वरुपाचे आक्षेप घेत नाही आहेत, तर त्यांच्या मतांचा मुद्देसूद समाचार घेत आहेत इकडे लक्ष वेधण्यापुरताच हा प्रतिसाद आहे.
हं...
हं... मग हरकत नाही. आपण हे विधान 'समाज''शास्त्रा'तील मानूया.
वेल... स्टॉटहार्ड यांच्या पात्रतेविषयी (गुणवत्तेविषयी) काही म्हणणं नाही. त्यांनी केलेल्या विधानांसंदर्भात केवळ संदर्भ म्हणून एका प्रतिसादातील काही मजकूर खाली देतो आहे -
नवीन चांगले लेखक, चांगले अनुवादक व चांगले संपादक यांचा शोध नेटवर देखील घेतला जाऊ शकतो, अशा एकमेव हेतूने मी मिसळपाववर आले आहे. उपक्रमवर मला अशी चांगली मंडळी मिळाली, जी प्रकल्पांमध्ये सहभागी झाली. तिथे आम्ही गांभीर्याने उत्तम चर्चा केल्या.
दुवा दिला आहे तो पुरावा म्हणून. जाहिरातबाजीसाठी नाही बरं... ;-)
पुस्तकांविषयीचे ब्लॉग्ज साहित्यसृष्टीला हानिकारक आहेत का?
उल्लेख केलेला लेख अजुन वाचला नाही आहे.
१) यात नेमकी हानी म्हणजे काय म्हणायचे?
२) मराठीत अनेक लेखक, लेखन हाच तोट्याचा सौदा आहे असेच म्हणतात.
३) टिकाकार बरेच असतात, मतेही सापेक्ष असतात पण शेवटी वाचक कालांतराने टिकेतही दर्जा शोधतो व त्यांना हवे ते सगळे वाचतोच. टिका असो वा पुस्तक. हिंदी सिनेमांना किती नावे ठेवली जातात पण लोक प्रचंड संख्येने बघतातच.
४) ब्लॉग व संवाद स्थळे ही नव्याची नवलाई अजुन संपायची आहे असे म्हणता येईल काय?
५) एकंदर मेडीया ह्या विसंवादाला जास्त पुढे आणतो असे वाटते का? जुने बीबीसी, जुने दूरदर्शन व आजचे चॅनेल बघताना, "नव नवे वाद रंगवा" ही सध्याची फॅशन म्हणता येईल काय?
६) अर्थात 'There's no such thing as bad publicity' याच्या उगमाबद्दल तुम्हीच सांगा.
बाकी एक सोपी पाककृती अशी आहे की चार संस्थळे फिरा , चार हिरे शोधा जसे नंदन, आरागॉर्न, रमताराम, चिंजं. त्यांना चार प्रश्न विचारुन तुमचे मत बनवा.
'पाककृती'विषयी (अवांतर)
बाकी एक सोपी पाककृती अशी आहे की चार संस्थळे फिरा , चार हिरे शोधा जसे नंदन, आरागॉर्न, रमताराम, चिंजं. त्यांना चार प्रश्न विचारुन तुमचे मत बनवा.
नाही बॉ. आमची मते - बरीवाईट कशीही असोत, नि साधार असोत वा निराधार - आम्ही आमची आम्ही बनवतो. नि आमची मते आहेत ही अशी आहेत, नि त्यांना आम्ही सहसा ठाम असतो. सबब, नथिंग अगेन्स्ट द अफोरमेन्शन्ड हिराज़, पण, आमची मते बनवताना उपरोल्लेखित किंवा तत्सम 'हिर्यां'ची मौक्तिके आम्ही सहसा विचारात घेत नाही. किंबहुना, सहसा त्यांकडे ढुंकून पाहतही नाही*.
(*किंवा, आता नावे घेतलीच आहेत, तर या नियमास अपवाद कदाचित आरागॉर्नचा. तेही, आमची मते कित्येकदा त्यांच्या मतांशी मिळतीजुळती किंवा जवळपासची वाटतात - म्हणजे आम्हाला - म्हणून. आणि मिळतीजुळती वाटतात (किंवा आम्हाला त्यात काही रस आहे किंवा गम्य आहे, असे - आम्हालाच - वाटते), तितक्याच अंशी. पटले नाही, किंवा रस वाटला नाही, तर सोडून देतो. पण दहातल्या तीन वेळा तरी आम्हाला आवडण्यासारखे तेथे काही सापडेल, अशी आशा असते. (उरलेल्या सात वेळा ते एक तर आमच्या पार डोक्यावरून तरी जाते, किंवा आमची मते पार वेगळी तरी पडतात - जसे, ए. आर. रेहमान! - हा भाग वेगळा. पण हा त्यांच्या क़ाबिलियतीवर शेरा नव्हे - आमची टेस्ट अशी, त्याला ते काय करणार?) त्यामुळे आम्ही त्यांच्या ब्लॉगवर तेवढे अधूनमधून फिरकतो खरे. पण तेवढाच अपवाद. असो.)
पीटर साहेबांची पुण्याई असो
पीटर साहेबांची पुण्याई असो कितीपण, परंतु त्यांनी व्यक्त केलेली मते एकांगी आणि मानसिक असुरक्षिततेने ग्रस्त वाटली. यद्यपि सम आर मोर ईक्वल हे खरे असले तरी ते "मोर ईक्वल्स" कुठल्या माध्यमात स्वतःला व्यक्त करतात हेदेखील महत्वाचे आहे. एक साधे उदाहरणः मिपा, ऐसी, माबो, इ. ठिकाणी प्रकाशित होणारे काही लेखन हे रेग्युलर प्रिंट मीडियापेक्षा कुठल्याही प्रकारे उणे पडत नाही. असे असता उद्या कोणी साहित्यिक निव्वळ परंपरागत माध्यमांचे श्रेष्ठत्व सांगू पाहात असतील तर मी त्याच्याशी असहमत असेन-मग तो साहित्यिक किती मोठा का असेना. माध्यम आणि तद्द्वारा पब्लिश होणार्या वाङ्मयाचा दर्जा यांचा काही संबंध असतो असे नाही. जो आहे तो निव्वळ आभासी आहे. नेट वैग्रे आत्ता कुठे सुरू झालंय, मॅच्युअर व्हायला लै वेळ आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्लॉग वगैरे इतके खंडीभर झालेत की पीटर साहेबांना वाटते "मतामतांचा गल्बला, कोणी पुसेना कोणाला". जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्लॉग्सचे आणि तत्सदृश नेट वाङ्मयाचे प्रस्थ कमी असते तर साहित्यिक अभिव्यक्ती मूठभर लोकांच्याच हातात राहिली असती. त्याचा काही फायदा झाला असता असे मला आजिबात वाटत नाही. उलट आजच्या काळात कितीतरी लोक स्वतःचे अनुभव ब्लॉग्सच्या माध्यमातून शेअर करतात याचा एक मोठा फायदा म्हणजे समानधर्मे भेटतात आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे साहित्यकृतीच्या आस्वादातील "मधल्या पायर्या" दिसतात. नुसते टीकाकार घेऊन त्यांची मूठभर पुस्तके वाचणे म्हणजे एकवीस अपेक्षित वाचण्यासारखे आहे. त्यात गणितांची रेडीमेड उत्तरे असतात, पण आस्वादाला अत्यावश्यक अशा मधल्या पायर्या फारच उंच तरी असतात किंवा नसतातदेखील. साहित्यिक अभिव्यक्ती काय किंवा शास्त्रीय संशोधन काय, पूर्ण परिकल्पना इंट्यूटिव्हलि (मराठी???) आणि तुमच्याआमच्यासारख्या नॉन-स्पेशॅलिस्टच्या सोप्प्या शब्दांत सांगितल्याने आस्वादात्/कामात कसा लक्षणीय फरक पडतो हे वेगळे सांगणे न लगे.
त्यामुळे पीटर साहेबांच्या विधानांशी मी पूर्ण असहमत आहे. ज्ञानाचे लोकशाहीकरण केले तर तोटा काहीच नाही. उलट जे जे उत्तम, उदात, उन्नत ते ते लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास या नेटरूपी माध्यमाचा प्रचंड फायदा होतो असे माझे निरीक्षण आहे.
प्रतिसाद आवडला. दुसरा
प्रतिसाद आवडला.
दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे साहित्यकृतीच्या आस्वादातील "मधल्या पायर्या" दिसतात.
ज्ञानाचे लोकशाहीकरण केले तर तोटा काहीच नाही. उलट जे जे उत्तम, उदात, उन्नत ते ते लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास या नेटरूपी माध्यमाचा प्रचंड फायदा होतो असे माझे निरीक्षण आहे.
या दोनशी प्रचंड सहमत.
मूळ लेखन वाचायला वेळ मिळालेला नाही, पण वरील बातमीवरून प्रस्थापित माध्यमांमधल्या प्रस्थापित टीकाकारांची मक्तेदारी संपत असल्याची जळजळ पीटर साहेबांकडून व्यक्त झाल्यासारखं वाटतं.
कशाने कोणाच्या झिरमिळ्यांना
कशाने कोणाच्या झिरमिळ्यांना धक्का पोहचेल काहि सांगता येत नाही ;)
काय वाचा काय वाचु नका हे ठरवताना लोक 'त्या' सप्लिमेंटची वाट न पाहता वेगवेगळ्या ब्लॉग्जवरून भुक भागवत आहेत आणि त्यामुळे स्वतःच्या पोटापाण्यावर आलेल्या गदेमुळे ही असुरक्षितता असावी काय असे वाटले
आता माणूस असेल थोर हो.. पण या बाबतीत तरी थोरवी मांडायची कुठल्या खात्यात? ;) -ऋषि बर्वा
'पुस्तकांविषयीचे ब्लॉग' किती
'पुस्तकांविषयीचे ब्लॉग' किती आहेत याची कल्पना नाही. मराठीत काही ब्लॉगवर पुस्तकांच परीक्षण असतं पण ते कितपत नियमित लिहिलं जातं आणि वर्षभरात किती पुस्तकांबाबत त्या ब्लॉगवर लिहिलं जातं याचीही कल्पना नाही. ब्लॉगअड्डा ब्लॉगर्सना पुस्तक परीक्षणासाठी आमंत्रित करतं. पण ती मुख्यत्वे इंग्रजीतली पुस्तकं असतात आणि दुसरं म्हणजे कोणत्या पुस्तकाचं परीक्षण करायचं ते ब्लॉगअड्डा ठरवतं (आणि एक प्रत आपल्याला विनामूल्य घरपोच करतं!). त्यातली परीक्षण चित्रविचित्रही असतात आणि प्रगल्भही असतात. काही ठरवून प्रोत्साहन देणारी परीक्षणं असतात तर काही ठरवून मोडीत काढणारी. वृत्तपत्रांच जग आणि हे जग यात साम्यच जास्त आहे माझ्या मते!
अनेक पुस्तकं प्रकाशित होत असताना त्यातलं प्राधान्यानं नेमकं कोणतं वाचायचं हे ठरवायला कोणी अशा ब्लॉगची मदत घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही. इथल्या 'सध्या काय वाचताय' या धाग्यावरुन मला 'राग दरबारी' घ्यावंस वाटलं आणि ते आवडलं. दुस-या एका ब्लॉगरचे परीक्षण वाचून अरविंद अडिगा यांच 'The White Tiger' विकत घेतलं आणि तेही आवडलं. एखाद्या ब्लॉगरची शिफारस आपल्याला आवडली नाही तर पुढच्यावेळी त्या ब्लॉगरच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यासाठी काही खास कष्ट घ्यावे लागत नाहीत.
साहित्यसृष्टीची हानी म्हणजे नेमकं काय आणि या हानीला कोणकोणते घटक हातभार लावतात असा हा व्यापक विषय आहे. साहित्य असो की ब्लॉग, लोक तरतमभाव वापरुन निवडतात हे आहेच. त्यामुळे तात्कलिक हानी वगैरे होते आहे असं वाटणं ही एक 'प्रतिक्रिया' आहे इतकंच.
मराठीतल्या जालीय लिखाणाविषयी?
स्टॉटहार्ड यांच्यावर टीका वगैरे ठीक आहे, पण त्या संदर्भचौकटीत मराठी आंतरजालाविषयी धाग्यात विचारलेल्या या प्रश्नांची गांभीर्यानं दिलेली आणखी काही ससंदर्भ उत्तरं वाचायला मिळावीत अशी अपेक्षा आहे. ती काय असतील हे जाणून घ्यायला अद्याप उत्सुक आहे -
मराठी ब्लॉगविश्व, संवादस्थळं यांत प्रदर्शित होणारी पुस्तकविषयक मतं-परीक्षणं तुम्हाला कशी वाटतात? स्टॉटहार्ड यांचे आक्षेप तिथे लागू होतात असं वाटतं का?
याच ठिकाणी पाहिलं तर असं दिसतं की 'सध्या काय वाचताय?'सारखे धागे लोकप्रिय होतात, पण त्यात व्यक्त झालेल्या मतांहून अधिक दीर्घ काही फारसं लिहिलं जात नाही. इतर काही संवादस्थळांवर पुस्तकांवरच्या चर्चेसाठी स्वतंत्र गट, स्पर्धा वगैरे चालू दिसतात. त्यांतून नव्या वाटा चोखाळणारं साहित्य लोकांसमोर येण्यात कितपत मदत होते असं तुम्हाला वाटतं?
साहित्याविषयीचं दर्जेदार लिखाण जिथे सापडतं असे मराठी ब्लॉग्ज तुमच्या मते कोणते? वर दर्जेदार म्हणून उल्लेख झालेल्या* इंग्रजी ब्लॉग्जच्या दर्जाचे ते आहेत असं म्हणता येईल का?
* - John Self, Max Cairnduff किंवा Stephen Mitchelmore यांचे ब्लॉग्ज
समिक्षेसाठी कौशल्य लागते
वाड्मयीन समिक्षा करण्यासाठी काहीएक कौशल्य लागते. ते आत्मसात करण्यासाठी सामान्य वाचकापेक्षा अधिक व्यापक-चौकसपणे लेखनाकडे पहावे लागते, हे स्टॉटहार्ड यांचे मत मान्य होण्यासारखे आहे. पण सामान्य वाचकांच्या ब्लॉग्जमुळे कशा प्रकारे नुकसान होते हे त्यांच्या त्रोटक विधानांवरून अजिबातच ध्यानात येत नाही.
एखाद्या निष्णात संशोधकास/कलाकारास त्या संशोधन/कलेविषयी सामान्यांची प्रामाणिक, हूशार किंवा रोचक परंतु लघुप्रगल्भ मते वाचून/ अशा मतांचे माजलेपण पाहून श्री स्टॉटहार्ड यांच्याप्रमाणे उद्वेग जाणवणे फारसे अस्वभाविक नाही. त्यामुळे मला त्यांची मते गर्विष्ठ वगैरे वाटली नाहीत.
सर पीटर स्टॉटहार्ड यांचा दर्जा
एक मान्य करणे फार गरजेचे आहे की सर पीटर स्टॉटहार्ड म्हणजे कुणी 'आल्सो रन...' कॅटेगरीतील साहित्य-समीक्षक नसून 'बुकर' शी निगडीत असलेले एक फार मोठे नाव आहे. ज्या इंडिपेन्डन्टची लिंक इथे देण्यात आली आहे, त्यातील केवळ १/४ भागच 'ब्लॉग रायटिंग' लाटेसंबंधी असून बाकीचा भाग स्टॉटहार्ड आणि एकूणच त्यांचा साहित्य विश्वातील घडामोडीशी असलेला संबंध याच्याशी निगडित आहे. एरव्हीही एक ज्येष्ठ व्यक्ती या नात्याने त्याना अशाप्रकारची मतटिपण्णी तसेच टीका करण्याचा अधिकार आहेच. 'ब्लॉग' वर अवतीर्ण होणार्या समीक्षेमुळे+शिफारशीमुळे, तसेच त्या लिखाणाच्या पातळीमुळे जर सर पीटर व्यथीत होत असतील तर त्यांचे त्याबद्दलचे मत गंभीरतेने घेणे आवश्यक ठरते. मराठीतील श्री.के.क्षीरसागर, दुर्गा भागवत, नरहर कुरुंदकर, रा.भा.पाटणकर, प्रभाकर पाध्ये, विजया राजाध्यक्ष आदी ज्येष्ठांनी अशा 'ब्लॉग संस्कृती' मधील साहित्यसमीक्षेबद्दल प्रतिकूल मते व्यक्त केली असती आणि आजच्या मराठी वाचकांनी त्यांची सारीच्यासारी मते जरी ग्राह्य मानली नसती तरी त्यांच्या मतांना झटकून टाकण्याचे धाडस केले नसते.
१९४० ते १९९० असा पन्नास वर्षाचा मराठी साहित्याच्या प्रवास पाहिल्यास वाचकापर्यंत 'लोकप्रिय आणि सर्वमान्य' लेखकांचे साहित्य जाण्याचा मार्ग होता....'सत्यकथा', 'ललित शिफारस', 'अभिरुची' तसेच दलित साहित्याच्या उगमानंतर 'अस्मितादर्श', 'युगवाणी' आदी नियतकालिके. आमची पिढी या नियतकालिकांच्या शिफारशीवरच त्या त्या लेखकाच्या साहित्याचा मागोवा घेत असे. त्यांचे त्या काळातील लिखाण म्हणजे एक दिशा दिग्दर्शन होतेच. या दिग्गजांची मते आणि सर पीटर स्टॉटहार्ड यांची साहित्यसमीक्षेविषयीची मते यात मला काही मूलभूत फरक वाटत नाही.
वरील धाग्यात सर पीटर यांच्या विधानाचा मराठी मतितार्थ असाही काढलेला दिसतो...."प्रत्येक माणसाच्या साहित्यविषयक मताला समान वजन नसतं. 'सम आर मोअर इक्वल' अशा धर्तीचं विधान ते करतात.".... यात काय गैर आहे ? सर्वश्री धों.वि.देशपांडे आणि माधव आचवल यानी 'जी.ए.कुलकर्णी' या लेखकाविषयी लिहिलेली मते आणि एखाद्या ब्लॉगवाल्याने 'मला जी.ए. अजिबात समजले नाहीत, पेलले नाहीत...' अशा मताला कसे काय एकाच वजनमापाने तोलता येईल ? 'सम आर रीअली मोअर इक्वल'.
"मराठी वृत्तपत्रं आणि नियतकालिकं यांत साहित्यविषयक लेख किंवा परीक्षणं यांना दिली जाणारी जागा संकोचते आहे." ~~ असेलही. त्याला कारण म्हणजे आजच्या घडीच्या जीवनाला आलेला प्रचंड वेग आणि त्या वेगाच्या धुंदीत साहित्याविषयीचे लेखन कुठेतरी अडगळीत....रविवारच्या पुरवणीपुरते....पडत आहे. शिवाय असे साप्ताहिक सदर चालविणारी समीक्षक/शिफारसकर्ती व्यक्तीही वाचकाला भावली पाहिजे, हाही एक विचाराचा मुद्दा होऊ शकतो. उगा कुणी सदू म्हात्रे वा म्हादू कात्रे ने शिफारस केली म्हणून कोण जाईल पुस्तक विकत घ्यायला ?
त्या मानाने 'ऐसी अक्षरे' वरील 'सध्या काय वाचताय' आणि 'पुस्तकविश्व' वरील 'मी विकत घेतलेली पुस्तके....' या दोन सदरांचा मी फार आपुलकीने फॉलोअप करतो, कारण तिथे नित्यनेमाने पुस्तके आणि आपली त्याबाबतची मते प्रकट करण्यार्या सदस्यांच्या साहित्यविषयक आवडीनिवडी मला भावतात, ज्या एखाद्या साप्ताहिकातील लेखनापेक्षाही दर्जेदार असतात.
या व्यतिरिक्त साहित्याच्या चर्चेसाठी किंवा पुस्तक खरेदीसाठी मला 'ललित' आणि 'राजहंस ग्रंथवेध', 'मेहता ग्रंथजगत' या नियतकालिकातील शिफारशी पुरेशा ठरतात. मी मराठी तसेच इंग्रजी ब्लॉग्जच्या वाट्याला जात नसल्याने त्या संदर्भात धाग्यात विचारलेल्या प्रश्नाला माझा पास.
शास्त्रोक्त
शास्त्रोक्तरित्या विचार करायचा झाला तर त्यांनी आपल्या विधानांच्या, किंवा दाव्यांच्या, समर्थनार्थ काही विदा दिला आहे का? मला तरी त्या मुलाखतीत विदा दिसला नाही. तेव्हा ही विधाने अशास्त्रीय आहेत, असे म्हणता येते. ती गांभीर्याने घ्यावीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील माझी धारणा चुकीची असेल तर भाग वेगळा.