Skip to main content

सामान्यांच्या विचित्र आवडी --१४ टॅन आणि तिमा

फार दिवसापासून जे डोक्यात होतं ते १४ टॅन ह्यांचा http://www.aisiakshare.com/node/6957 हा धागा पाहून वर आलं. आपल्याकडे "लोकप्रिय" , "फेमस" वगैरे आवडी म्हटल्या की त्या आपोआप सामान्य, नॉर्मल समजल्या जातात. मला तरी खूपदा त्याच्याशी जोडून घेणं, आवडून घेणं जमत नाही. आणि "ह्यात आवडण्या सारखं काय आहे?" असा प्रश्न पडतो. काही ठळक उदाहरणं म्हणजे वडापाव, पावभाजी आणि मिसळपाव ह्या पदार्थांचा उदोउदो.

ज्यांची आवड सुमार,भंकस आहे असे जगभरात बरेच लोक आहेत. अगदी भरपूर संख्येनं आहेत. पिझ्झा-बर्गर ही पाश्चात्य जगातल्या लोकांची वडापावची व्हर्जन असावी. हे सारेच दळभद्री भिकार निर्बुद्ध अन्न प्रकार होत. अगदीच काहीच खायला मिळत नसेल तर नाईलाज म्हणून अशा गोष्टी खाणं समजू शकतो. झोपडपट्टी आणि तत्सम ठिकाणच्या लोकांच्या खाण्यात हे खूपदा दिसतं. त्यांच्याबद्दल वाईटही वाटतं. अरे पण दारिद्र्याची आणि नाईलाजाची कौतुकं कसली करता? त्यातून बाहेर पडायची कामना तरी बाळगा. ह्या सगळ्या खरं तर ही acquired taste, "कष्टपूर्वक कमावलेल्या आवडी" आहेत. दारिद्र्य acquire करून ती taste तुम्ही develope करता. ब्लाइंड टेस्ट घेतली तर किती जण कोल्हापूरच्या राजभाऊंची भेळ आणि पुण्यातली कल्याण भेळ(किंवा इतर गावातली हल्दीराम्स भेळ) ह्यातलं फरक ओळखू शकतील? अमुक तमुक ठिकाणचं तमुक तमुक लै फेमस आहे वगैरे म्हणताना बहुतांशी ते भेळ पाणीपुरी रगडा पॅटिस वगैरे त्याच सारख्याच आंबट गोड तिखट चवीचे असतात हे कुणाला कळत नाही अरेरे.

ना चव, ना पोषण. वडापाव म्हणजे पैसे असलेल्यांचं दारिद्र्य. काही विशिष्ट परिस्थितीत, नाइलाज म्हणुन किंवा इतर काही खाणं शक्य नाही म्हणून कुणी खातय तर समजू शकतो. इन फ्याक्ट त्यांनी प्राप्त परिस्थितीत तो तसा उपाय शोधला म्हणून उलट थोडंफार कौतुकही आहे. पण वडापाव आवडीनं खाणं, भरपूर वेळा खाणं, तेही इतर पर्याय उपलब्ध असताना म्हणजे फार वाईट.... स्वत:वर लादलेलं कुपोषण. ना चव, ना पोषण.

शिवाय हल्ली मी कसा बेफिकिर आहे; दीर्घकालीन हीत वगैरे काहीही न पाहता स्वतःच्या तब्येतीची कशी हेळसांड करुन घेतो; वाटेल ते खातो; मरेस्तोवर व्यसनं करतो; इतरांना करायला भरीस पाडतो; वाट्टेल ते वाट्टेल तसे मोडून दाखवतो; बेफाम वेगानं गाडी हाकतो(आपल्याला फारच "पॅशन" आहे ड्रायव्हिंगची; आपण साला तरबेज आहोत ; पाचशेच्या स्पीडनंही झुप्पकन् गाडी हाकायला कमी करणार नैत) हे सांगून कूल पॉइण्ट्स कसे काय मिळवता येताहेत, हेही न कळे. ह्या सगळ्यात एकप्रकारचा समान धागा आहे. घिसाडघाई आणि बटबटीतपणा, हा तो धागा.

शिवाय पोळीसोबत(किम्वा पुरी, भाकरी, ब्रेड वगैरेसोबत) बटाट्याची भाजी खाणं म्हणजे भातामध्ये पोळीचे तुकडे कुसकरुन खाण्यासारखं आहे; आणि ते खाउन झाल्यावर "व्यवस्थित जेवण झालं भातात पोळी कालवून" असं म्हण्ण्यासारखं आहे. म्हंजे... खाल्लंच तर लागलिच बिघडत नै कै लगेच. पण असं कधी खातात का? नियमित खावं का? पोळी- भाजी, पोळी- वरण हे नॉर्मल खाणंय की नै?

आता इथं काही जणांना बाहेरच्या काही देशात प्रचलित असलेल्या " बेरिटो" का कोणत्यातरी पदार्थाचा उल्लेख करावासा वाटेल. पण जरा विचार करा की. नियमित भोजन म्हणून सर्व जेवणात कुणी पोळी+भात कुसकरुन खाल्लं, इतर काही खाल्लं नै, तर कसं व्हायचं. तब्येत चांगली ठेवायची तर पोटात भाज्या, डाळी वगैरे जायला हव्यात ना. बटाटा त्या अर्थानं भाजी नाहिये हो. नका हो खात जाउ.

एकूणात घाणेरड्या जीवनशैलीतच कशी मज्जा आहे, त्याशिवाय जिंदगी कशी अगदीच भिकार नीरस आहे, ह्याचा प्रचार, प्रसार लोक हीरिरीनं करताना आश्चर्य वाटतं. चुकून "आरोग्यपूर्ण खा. आरोग्यपूर्ण जीवनशैली अवलंबा" असं सांगायला गेल्यास "मला अमुक अमुक जमत नाही" असं कुणी म्हटलं स्वत:पुरतं तर समजू शकतो. पण असं होतं का कधी? निदान मराठी आंतरजालावर तरी शहाणपण ही अस्तित्वहीन गोष्ट आहे. कुणी तोंड उघडलं की लागलिच "छे छे असं काही जमूच शकत नै" वगैरे अक्कल शिकवली जाते. (उदाहरण म्हणुन पुन्हा नरेन्द्र गोळेंचे उपक्रमावरचे आणि इतर काहिंचे इतर लोकप्रैय संस्थळावरचे धागे आहेतच) मला तरी कुणी काही नवीन सांगितलं तर मी फार तर "अच्छा, असंही असतं का." एवढी प्रतिक्रिया देतो. कुणाला हतोत्साहित कशाला करायचं? तो आणि त्याचे प्रयत्न/नशीब काय ते बघून घेतील. "छे छे. असं काही जमत नसतं. असं करु नये. हे भलतं विचित्र आहे" वगैरे वगैरे म्हण्णारी मंडळी काही काळानी फेसबुकवर पुन्हा आता कशी जीवनशैली सुधारलिये आणि त्याचा कसा फायदा होतोय वगैरे सांगताना दिसतात. भरपूर चालणं फिरणं धावणं करताना दिसतात. त्यांची तब्येत सुधारल्याचं बघून छान वाटतं. आणि काहिच महिन्यांपूर्वी ह्यांनीच इतर काही होतकरुंना निरुत्साही करुन पिटाळलं होतं हे ही आठवतं. "चांगली जीवनशैली बाळगा." हे डॉक्टरनं तरी सांगायला हवं की नको? आंतरजालावरचे डॉक्टर सांगत नाहीत. उलट तोंड उघडलं की लागलिच "पण गोळ्या घेणं किती सोयीस्कर आहे!" हे सांगू पाहतात. अरे? कोणती बाब सोयीस्कर आहे ते तो रुग्ण बघतोय ना? त्याला बघू देत की. तुम्ही त्या त्या पद्धतीचे फायदे-तोटे सांगा.

इथं कुठलीही बाब दुसऱ्या टोकाला नेउन त्याच्यावर भाषणं ठोकली जातात. विशेषात: चांगली बाब. (जी तसंही फारसं कुणी नेत नाही, नेणं शक्य नसतं व्यवहारात.) कुणी नियमित व्यायाम करण्याबद्दल बोलला तर त्याला "ऑल द बेस्ट " म्हण्णार की "अतिव्यायामानं दरवर्षी अमुक इतके लोक मरण पावतात" हे ऐकवणार? "माझे अमुक इतके मित्र व्यायाम करताना अपघात होउन कायमचे अपंग वगैरे झाले" हे सांगणार? की टोमणे मारणार "काय गरज आहे रे व्यायामाची? आधुनिक युगात मसल्स लागतात की किती? वजनं कितीक वेळेस उचलावी लागतात? त्यापेक्षा पैसे देउन काम करवून घेता येतं ना." असलं कैतरी ऐकवणार? हे चमत्कारिक आहे. अतिरेकी सुस्त झालेल्यांपैकी एखाद्याजरी माणसाला वाटलं की जरा हात पाय हलवून पाहूत तर बाकीचे लागलिच "अर्रर्र . नको. वेडा रे वेडा. अतिश्रमानं जीव जातो रे बाबा." असलं काहीतरी चमत्कारिक बोलताना दिसल्यावर कसं वाटेल ? म्हंजे तांत्रिकदृष्ट्या हे खरय की अतिश्रमानं माणूस मरुही शकतो. पण महात्म्यांनो, तुम्ही अतिसुस्तपणानं मरणार आहात त्याचं काय? आणि जो "थोडेफार हातपाय हलवून पाहूत" असं म्हणतो, त्याला लागलिच हिणकस शेरे मारुन "असलं काय जमत नसतय" म्हणून नक्की काय मिळतं? (विटेकर ह्या आय डी मिपावरचा धागा पहा. चित्रगुप्त ह्या आय डी चा सुद्धा पहा. )
हे इतकं सगळं लिहावं लागतय कारण उदाहरणं अगदी आसपास आहेत तुमच्या आणि माझ्याही. पण बोलायची चोरी आहे. मला माझं जालिय अस्तित्व प्यारं आहे. नैतर नुसत्या दोन लिंका देउन काम झालं असतं.
मुळात वडापाव पावभाजी मिसळपाव ह्या पदार्थांना "मराठी पदार्थ" असं का म्हणतात? आपले वाडवडील काय पूर्वापार हेच अन्न खायचे का? स्थानिक अन्न म्हणजे त्या त्या हवेत सहज उगवून येणारं आणि तरीही पुरेसं पोषण पुरवणारं, शरिरासाठी त्या हवामानास उपयुक्त/अनुकूल असलेलं अन्न ना? मग ह्या सगळ्यात वडापाव पावभाजी मिसळ्पाव कुठं बसतात? भाकरी, पिठलं, झुणका, भरीत आणि तत्सम पदार्थांना मराठी जिन्नस म्हणलं जाणं समजू शकतो. "मराठी लोक म्हणजे केवळ वडापाव पावभाजी मिसळपाव खाणारे लोक" अशी प्रतिमा फार काही थोर नव्व्हे. सांस्कृतिक दारिद्र्य दिसतं हो यातून. मुम्बैत ह्या प्रतिमेनं काय अडचणी येतात ते दिसतच आहे. आणि हे पदार्थ मराठीपनाशी जोडले जाण्यास मुम्बैच कारणीभूत आहे. मराठी संस्कृती इतर कुठल्याही शहराशी जोडली गेली असती, तर कदाचित आपलं प्रातिनिधिक चित्र वेगळं दिसु शकलं असतं.

पुन्हा विषयाच्या सुरुवातीच्या मुद्द्यावर येतो. http://www.aisiakshare.com/node/6957 ह्या धाग्यात १४ टॅन आणि प्रतिसादक तिरशिंगराव ह्यांनी खाण्यातल्या सुमार, अ-कल्पक आवडी कसल्या उचलून धरलेल्या आहेत! हेच १४ टॅन महाशय इतर बाबतीत उच्चभ्रू आवडी मिरवत असतात. वाचन, मालिका, सिनेमेपासून इतर अनेक बाबतीत फार काही जाणकार असल्याचं दाखवतात.
तिरशिंगराव ह्यांनी तर हल्लीच्या सुमार आवडींबाबत नाकं मुरडायला अख्खा स्वतंत्र धागाच लिहिलेला आहे. (http://www.aisiakshare.com/node/6929) पण स्वत:च्या खाण्यातल्या आवडी ह्या हल्लीच्या सुमार सादरीकरणाचंच तार्किक समांतर नातं सांगतात,हे त्यांना सांगितलं गेलं तर बरं होइल. तुमच्या नजरेत करण जोहरच्या सिनेमांनी कधी टचकन भावनिक होणारे कधी उल्हासित होणारे, कधी सास-बहू सिरियली बघून गदगदून जाणाऱ्या लोकांच्या आवडी जितक्या विचित्र आहेत, तितक्याच विचित्र खाण्यापिण्यातल्या आवडींचं मात्र तुम्ही कोडकौतुक करता. ह्यात कन्सिस्टन्सी नाही.
मला मिसळपाव नावाचं संकेतस्थळ ज्याम आवडतं. पण म्हणुन त्या नावाचा पदार्थ आवडून घेणं बंधनकारक आहे का? मिपाचे कधी कट्टे वगैरे होतात(अलिकडच्या काळात मला अशा कट्ट्यांना वगैरे जायला जमलेलं नाही), किंवा नुसते कट्त्यांचे विषयही निघतात तेव्हा मिसळीचा उल्लेख खुपदा होतो. फुड ब्लॉग्जवर अमक्या ठिकाणची तमकी मिसळ फार फार भारी वगैरे उल्लेख असतात. त्यातले सगळ्या नाही, पण अनेक ठिकाणी जाउनही हाताला काही लागलं नाही. ते "फुड फेस्टिवल" वगैरे असतं त्या धर्तीवर पुण्यात कित्येकदा लोक आख्खा "मिसळ फेस्टिवल्" वगैरे करतात. आणि आसपासचा दर दुसरा इसम ह्या प्रकारात रस घेणारा असल्यानं तोंडदेखलं का असेना अशा प्रकारात सामील व्हावं लागतं. नसता ताप डोक्याला.

Node read time
6 minutes

ललित लेखनाचा प्रकार

6 minutes

अबापट Wed, 28/11/2018 - 17:51

सर , बऱ्याच दिवसांनी आये पण दुरुस्त आये .
वडापाव आणि मिसळपाव इतकी मर्यादित मराठी खाण्याची आयडेंटिटी होणे चूक हे पटले.
(पण काय करणार ? आम्हा फडतुसांना असले खाणे आवडते . गोळ्या खायला घालणार नाही ना मग ?)
पण पण आपले बापजादे जे खात होते, जे सहजतेने लोकली उगवतं तेच सगळे बरोबर , न्यूट्रीशस होते हे पटले नाही .
यामुळे कुणी आपणास मनोबा दिवेकर म्हणाले तर राग मानू नये . त्याही असेच काहीसे (आणि चुकीचे) सांगतात .
अवांतर : राजाभाऊंचं भेवडा आणि पुण्यातील कुठलीही भेळ यातील फरक डोळे उघडे/बंद कसेही ठेवून ओळखू शकेन .

१४टॅन Wed, 28/11/2018 - 18:39

धमाल धागा आहे खरा. धाग्यातले विरोधाभास मोजता मोजता थकलो.

टीएलडीआरवाल्यांसाठी: वडापाव, मिसळ, पावभाजी इत्यादी अत्यंत निरुपयोगी, निचभ्रू, वाईटसाईट पदार्थ खाऊन आणि त्यांची स्तुती करुन एरवी उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या १४टॅन (मंजे मी) ज्याम अपराध केलेलाहे.
मजा आणि मेगा-विरोधाभास म्हणजे:
धाग्यातलं शेवटचं वाक्य.

आसपासचा दर दुसरा इसम ह्या प्रकारात रस घेणारा असल्यानं तोंडदेखलं का असेना अशा प्रकारात सामील व्हावं लागतं.

आता मी सुरू करतो.

आपल्याकडे "लोकप्रिय" , "फेमस" वगैरे आवडी म्हटल्या की त्या आपोआप सामान्य, नॉर्मल समजल्या जातात.

एक उदाहरण द्या जिथे हे समीकरण नाही. 'ऐसी' चालणार नाही. आणि, मलाही बऱ्याच लोकप्रिय गोष्टी आवडत नाहीत. मुक्ता बर्वे-स्वप्निल जोशी, चितळ्यांची आंबाबर्फी, तुला पाहते रे, आतिफ अस्लम, 'फ्रेंड्स' मालिका, झाकीर खान इ.

पिझ्झा-बर्गर हे बरेच प्राचीन पदार्थ आहेत, बॅटोबांकडे पास. वडापावने जन्म १९६० च्या सुमारास घेतल्याची नोंद आहे. ती सबळही असावी कारण ह्या सुमारास तीर्थरुप मुंबईच्या अगदी हृदयस्थानीच्या शाळेत शिकले. त्यांना शालेय जीवनात 'वडापाव'ची आठवण नाही. 'च्याऊम्याऊ'नामक प्रकाराची आहे. बर्गर अठराव्या शतकापासून आहे. पिझ्झा दहाव्या.

बरं. ह्या सगळ्या गोष्टी हे दरिद्री लोकांचं खाणं आहे हे मान्य आहे. पण त्यात प्रॉब्लेम आहे कुठे? झुणका-भाकर/चटणी भाकरीच्या आठवणींनी गलबलणारे किती आहेत? हे दरिद्री लोकांचं खाणं नव्हे काय? त्यांनी त्यातून बाहेर पडू नये काय? ते पोषक असतं म्हणून एकाएकी एक्स्क्यूज्ड? बरं, तिथेही येऊच आपण.

ह्या सगळ्या खरं तर ही acquired taste, "कष्टपूर्वक कमावलेल्या आवडी" आहेत. दारिद्र्य acquire करून ती taste तुम्ही develope करता.

आता महत्त्वाचा मुद्दा. मी, गौराक्का, माझ्या मातोश्री, तीर्थरुप हे काही 'जेवण' किंवा 'नाष्ता' म्हणून ह्यातलं काहीही खात नाही. किंबहुना ते आमचं leisure food आहे. कधीतरी चेंज हवासा वाटला की आम्ही रस्ता आणि त्यावरच्या गाड्या गाठतो. वडापाव खावासा वाटला म्हणून एकाएकी सगळे पैसे दान करून दिवाळं काढून वडापावच्या गाडीवर जाऊन उभं राहत नाही. डोम्बलाचं 'दारिद्र्य acquire करून develope केलेली taste'. हे आठवड्यातून एकदा म्हणजे डोक्यावरून पाणी. आणि पुलंचं खाद्यजीवन वाचलंच असावं तुम्ही. त्यात 'शंभर लाडू खाणाऱ्याने स्वत:ला खवैय्या म्हणणे योग्य नव्हे. हे म्हणजे शंभर गाणी गाणाऱ्याने स्वत:ला गवई म्हणवून घेण्यासारखे झाले. अस्सल खवैय्या एक सरंग्याचा तुकडा किंवा 'कुडकी' अख्ख्या जेवणाबरोबर पुरवतो!' इ. लिहीलेलं आहेच. दारिद्र्याचं ग्लोरिफिकेशन कोणालाही चुकत नाही!

बाकी बेफिकीर, व्यसनी आणि त्याद्वारे येणारा कूलपणा हे मान्य. पण खाद्यपदार्थ इझ हार्डली अ व्यसन. त्यातही तुमचा व्यवस्थित व्यायाम होत असेल तर काहीच नाही. आज मी व्यवस्थित पळू शकतो, तीसपस्तीस किलो वजन उचलून चालू/जिने चढू शकतो. खरंतर स्वत:ला होणाऱ्या क्षुल्लक इच्छा दाबून ठेवणं हे जास्त धोकादायक आहे. ह्यानेच व्यसनं वाढतात. ह्या क्षुल्लकतेच्या सीमेभोवतीच सगळा व्यसनांचा बाजार आहे हेही इथे नोंदवतो. ह्याबाबत एकच वाक्य शेवटून दुसऱ्या परिच्छेदात वाचा.

बटाटा ही भाजी नसेल तर त्यासाठी काहीतरी शास्त्रीय कारण द्या. बटाट्याच्या भाजीला शाकाहारी पंक्तीत केव्हापासून मानाचं स्थान आहे. इतिहास प्रकरण परत बॅटोबांकडे वर्ग. तुम्ही जो काही निकष लावला असेल त्याआधारे अजून तीस तरी भाज्या निकाली निघतील असा होरा आहे.

एकूणात घाणेरड्या जीवनशैलीतच कशी मज्जा आहे

ह्यावर मी माझाही वेटलौस ह्या धाग्यात लिहीलेलं आहेच. उगा वडापाव चांगला लागतो म्हणून डाळ-भात-भाज्या-चपात्या-मासे-बकऱ्या-कोंबड्या-अंडी सोडून तोच सकाळ संध्याकाळ खा असा मी काहीतरी उपदेश केलेला आहे अशी तुमची निराधार समजूत आहे. वडापाव हे स्ट्रीटफूड आहे. तळलेले बटाटे, चटपटीत चटण्या इ. जिव्हालौल्य पुरवणाऱ्या गोष्टी त्यात असल्यामुळे तो 'चांगला लागतो'. चांगला लागतो म्हणून मी खातो. तसंच पाणीपुरी. तसंच पावभाजी. तुम्ही चंगळ आणि गरजेत घोळ घातलेला आहे. आता ही चंगळ बरी नाही, त्याऐवजी पौष्टिक खावं ह्याला माझं उत्तर आहे लोकांनी दारू सोडावी, सगळीच व्यसनं सोडावी. त्यांच्यातून तर १ टक्काही पोषणात्मक फायदा नाही. आहे ते नुकसानच.

बाकी मआंजावर तसा मी अजून नवीन आहे. तुमच्या नसत्या एक्स्ट्रापोलेशनवर मत द्यायला मी बांधील नाही. शिवाय. शिवसेनेने केलेले कांगावे मी लिहून दिलेले नाहीत. वडापाव, मिसळपाव इ.ना मी कधीही वर्जिनल मराठी म्हटलेलं नाही. वडापावाचा जन्म मुंबईत झाला आहेच, तरीही तो काही मराठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात पिकणाऱ्या धान्यांनी (संसाधनांनी) बनलेला पदार्थ नाही ह्याची मला जाण आहे. (ह्याला म्हणतात 'शास्त्रीय व्याख्या'!)

"मराठी लोक म्हणजे केवळ वडापाव पावभाजी मिसळपाव खाणारे लोक" अशी प्रतिमा फार काही थोर नव्व्हे.

ही अजिबात आपली प्रतिमा नाही. शिवाय ही प्रतिमा संपूर्णपणे राजकारण, सुमार चित्रपट-मालिका इ.मधून झालेली बावळट निष्पत्ती आहे. आणि तसंही थोर प्रतिमा मिळवून काय साध्य झालंय इतिहासात? अमेरिकेच्या, इंग्लंडच्या प्रतिमाहननाचा परिणाम म्हणजे पाऊण भारतीयांचे डोळे 'अब्रोड सेटल' होण्यावर लागलेले असणे हाच असेल, तर सरळ कचऱ्यात टाकावी प्रतिमा.

सांस्कृतिक दारिद्र्य दिसतं हो यातून.

सांस्कृतिक श्रीमंती (पेशवाई!) दाखवून पुण्याने (बाकी कोणत्याही शहराने) काय उखाडलं हे एकदा विशद करा. मुंबई कोणाचीही नाही. ती कष्टकऱ्यांची आहे. ते ल्यापटाप बडवणारे असोत किंवा ओझी वाहणारे असोत. त्यांची संस्कृती हीच शहराची म्हणून ओळखली जाणं ह्यात काही न्यूनत्व नाही. आणि कुठल्या शहरात आज्जा खायचा तेच नातू खातो? तुम्ही स्वत: दिवसभर बाकरवड्या, आंबाबर्फ्या, पियुष आणि दूऽध (श्रेय: मुंबई-पुणे-मुंबई) चेपून राहता का?

पण स्वत:च्या खाण्यातल्या आवडी ह्या हल्लीच्या सुमार सादरीकरणाचंच तार्किक समांतर नातं सांगतात,हे त्यांना सांगितलं गेलं तर बरं होइल. तुमच्या नजरेत करण जोहरच्या सिनेमांनी कधी टचकन भावनिक होणारे कधी उल्हासित होणारे, कधी सास-बहू सिरियली बघून गदगदून जाणाऱ्या लोकांच्या आवडी जितक्या विचित्र आहेत, तितक्याच विचित्र खाण्यापिण्यातल्या आवडींचं मात्र तुम्ही कोडकौतुक करता. ह्यात कन्सिस्टन्सी नाही.

हाहा! आय स्टॅण्ड गिल्टी. हो. माझ्या खाण्यापिण्याच्या आवडी अत्यंत सुमार आहेत. ॲव्हरेज, नीचभ्रू आहेत. गंमत माहितीये का मनोबा, मला त्याचं काडीचंही वैषम्य नाही. सगळ्याच बाबतीत अतिविचार करून काहीतरी अभिनिवेषपूर्ण व्यक्तित्व मिरवणं मला जमत नाही. मला कपोला, बर्गमन किंवा मजिदीचे सिनेमे आवडतात, बाख, शोपिनचं संगीत आवडतं म्हणजे मी ऑरगॅनिक व्हेगनवालाच असला पाहिजे ही 'कन्सिस्टन्सी' म्हंजे साजूक खुळचटपणा आहे. वडापाव, पावभाजी इ. पदार्थ पौष्टिक नाहीत हे मला कळतं, आणि ते मी अगदी कमी प्रमाणात, म्हणजे सुमारे एकूण आहाराच्या ५% किंवा कमी इतके खातो. माझ्या एकूण आरोग्य आणि पोषणविषयी ज्ञानाच्या आधारे ही सीमा योग्य आहे. गणित, संगीत, थोडीशी कला, साहित्य इ. चा विचार करून खाण्याबद्दलही 'इतका' विचार मला जमत नाही. ही सीमा योग्य नसेल, तर तुम्ही काय ठेवायची ते सांगा आणि त्याबरोबर तुमचं मी का ऐकावं हेही सांगा.

शेवटी,

आसपासचा दर दुसरा इसम ह्या प्रकारात रस घेणारा असल्यानं तोंडदेखलं का असेना अशा प्रकारात सामील व्हावं लागतं.

आणि आपण एकाच ओझ्याचे बैल असल्याकारणाने सवयीमुळे म्हणा किंवा कशानेही, 'ह्या प्रकारांत' रस निर्माण (!) होणं हे नैसर्गिकच नव्हे काय?

अधिक काय लिहीणे? लोभ तर असावाच.

भटक्या कुत्रा Wed, 28/11/2018 - 21:06

In reply to by १४टॅन

मुंबई कोणाचीही नाही. ती कष्टकऱ्यांची आहे. ते ल्यापटाप बडवणारे असोत किंवा ओझी वाहणारे असोत. त्यांची संस्कृती हीच शहराची म्हणून ओळखली जाणं ह्यात काही न्यूनत्व नाही

अगदी सहमत

शिवाय ही प्रतिमा संपूर्णपणे राजकारण, सुमार चित्रपट-मालिका इ.मधून झालेली बावळट निष्पत्ती आहे

यावरून आठवलं आमच्या एका तुळू/कन्नड मित्राला बॉलिवूड चित्रपट पाहून असं वाटायचं कि बंगळुरात जसं avanue street वर पाहिजे ती वह्या-पुस्तके मिळतात तसंच मुंबईत (फक्त)कामठीपुरात पाहिजे तश्या वेश्या मिळतात. आणि पुणे हे शांत सभ्य लोकांच शहर आहे, तिथलं वातावरण एकदम भारी आहे आणि मुंबैवले रिटायर झाल्यावर पुण्याला शांत ठिकाणी राहायला जातात.

सामो Wed, 28/11/2018 - 21:13

In reply to by भटक्या कुत्रा

माझ्या एका ३०-३२ वर्षियतेलुगु मैत्रीणीला मुंबईखेरीज अन्यत्र रेड लाईट एरिया असतो हेच माहीत नव्हते.
तिला हस्तमैथुन म्हणजे काय हे देखिल माहीत नव्हते ती बात अलहिदा.
पण असे चंपक लोक असतात!!!

अबापट Wed, 28/11/2018 - 22:25

In reply to by १४टॅन

साजूक खुळचटपणा या दिलखेचक टर्मिनोलॉजी मुळे तुम्हाला बरेच गुन्हे माफ ( तरीही काही उरलेत ही गोष्ट आहेच) पण तरीपण ...

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/11/2018 - 18:47

ठिकठिकाणचे देशी दारूचे गुत्ते आणि प्रसिद्ध व्यायामशाळा, योगालयं असा धागा काढ बघू, मनोबा.

चिमणराव Wed, 28/11/2018 - 20:36

लेख थोडाफार पटतोय.
वडापाव हे विद्यार्थ्यांचे टैमपास खाणं आहे. सतत तेच खात असतील असं नाही. पाव बटाट्याचा अतिरेक झालाय हे ठीक आहे. स्वस्तात काही अन्न ( तू यास अन्न म्हणणार नाहीस तरीही) मिळण्याचा मार्ग आहे. शुद्ध कार्बोहाइड्रेट आहे. अधिक तेल आणि चणाडाळ पीठ म्हणजे स्निग्ध व नत्र. कोथिंबीर मिरची सी विटमिन आणते. हे सर्व पंधरा रुपयांत शंभरदीडशे ग्राम्स. पावाला गरीब कसे विसरतील?
मुद्दा क्रमांक २) सातत्य
झुणका भाकरचे प्रत्येक बाईच्या हातचे वेगळे प्रकार होतात. जाड रोडगे, कचवट झुणका होतो. अन्नपूर्णाबाई पाक किती बरवा । आतून राहतो हिरवा.।।
३) सायनला शाळेसमोर सिंधि लोकांचा उसळ पाव मिळायचा (६०-).*१ मुगाची उसळ पावात घालून देतात.
४) जेव्हा पोट भरल्याची भावना होते तेव्हा ते पुर्णान्नच असते.
५) व्यायाम - ते एक फॅड आहे. योगासनेही फॅडच आहे. मला पाचवीपासून सर्व आसने येतात पण कधीच केली नाहीत. त्यावर तेव्हापासून विश्वास नाही.
६) प्राणायाम : ट्याह्यापासून रामनामसत्यआहेपर्यंत श्वास चालतच असतो॥ त्यात कसले घंट्याचे आलेय वेरिएशन?
७) सकाळी बागेत/पार्कात म्हातारे सूर्याकडे बघत बसतात. अरे काय आता डोळ्यांची क्यांडलपावर व्हाढणारे? हाय तीच टिकवा.
बाकी लेख एकदम सणसणीत हाँ.
( टानोबा किंवा तिमा काय हे एक प्लेसहोल्डर आहेत. )

पुढच्या कट्ट्याला खारे शेंगदाणे,उडदाचे लाडू आणणारे.

*१ - '६० सालापासून आहे.

anant_yaatree Wed, 28/11/2018 - 20:17

इक्ते हळुवार झोडलेले ! हे ऐसीच वाचतोय ना असा संभ्रम वाटत होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/11/2018 - 20:24

In reply to by anant_yaatree

ऐसीवर यापेक्षा हळूवारपणे इतर अनेक गोष्टींना, व्यक्तींना झोडपलं जातं. तो खवचटपणा पार डोक्यावरून जात असेल काय?

सामो Wed, 28/11/2018 - 21:19

१४टॅन यांचा धागा अतिशय आवडलेला होता.

मला तरी फडतूस आवडीनिवडींच्या गौरवीकरणात विशेष निंदनिय काही वाटत नाही हां दारुचं कौतुक निघालं की मात्र वाईट वाटतं. खरं तर दारुचे व्यसन आरोग्याला जितके घातक तितकेच जंक फुडचे ही आणि तरीसुद्धा जंकफुडपेक्षा दारुवरतीच राग आहे.

घाटकोपरची पाणीपुरी काही वर्षे रोज खाल्लेली आहे. थँक गॉड!! उच्च रक्तदाबाचा विकार अजुन तरी नाही लागलेला :(

१४टॅन यांनी एकाच वाक्यात गौराक्का व स्वत:च्यात्यांच्या आईचे नाव घेतलेले आहे त्यावरुन गौराक्का या कुटुंबातील व्यक्ती असाव्यात असे वाटते.

वडापाव खावासा वाटला म्हणून एकाएकी सगळे पैसे दान करून दिवाळं काढून वडापावच्या गाडीवर जाऊन उभं राहत नाही.

=)) =))

गौराक्का Fri, 30/11/2018 - 19:45

In reply to by सामो

१४टॅन यांनी एकाच वाक्यात गौराक्का व स्वत:च्यात्यांच्या आईचे नाव घेतलेले आहे त्यावरुन गौराक्का या कुटुंबातील व्यक्ती असाव्यात असे वाटते.

व्हय!

पुंबा Wed, 28/11/2018 - 21:02

'तू कितीही काही कर मनोबा, चिंजं काही तुला त्यांच्या गोटात घ्यायचे नाहीत!'
-अनुराव स्वप्नात आल्या(टॅन, जळू नकोस?) आणि म्हणाल्या दे ही प्रतिक्रिया. दिली.

तिरशिंगराव Wed, 28/11/2018 - 22:32

मनोबा तुमचा लेख आवडला. तुम्ही ज्या सात्विक अभिनिवेशाने हे लिहिले आहे त्याची दाद द्यायलाच पाहिजे. टॅनोबांप्रमाणे मी काही , प्रतिवाद करणार नाही. पण तुम्ही लोकांना फार सिरियसली घेता, असं वाटतं! किंवा, तुम्ही ज्या नेटीय लोकांकडे मोठ्या अपेक्षेने बघता, त्यांच्याही जिभा वडापाव, पावभाजी अश्या गलिच्छ खाण्यासाठी वळवळतात, हे लक्षांत आल्यावर तुमचा अपेक्षाभंग होत असावा. पण, जसे काही लेखांमधे, आपण विसंगतीतले विनोद शोधत असतो, तसेच बरीच माणसं, विसंगतीने भरलेली असणारच, हे सत्य स्वीकारायला हवं.
नेटमुळे आणि पुढच्या पिढीमुळे, हेल्दी फूड कुठले असते, हे आता आम्हा वयस्कांनाही माहीत झाले आहे. पण आमच्या जिभांना, ते या वयांत पटणे अवघड आहे. तरीही, एरवी शुद्ध सात्विक आहार आणि एखादेवेळेस जिभेस पूर्ण स्वातंत्र्य, असे धोरण आम्ही अवलंबिले आहे. चमचमीत खाण्यावरचे लेख वाचले की जुन्या आठवणी जाग्या होतात आणि मग उस्फुर्त दाद दिली जाते.
वडापावाबद्दल म्हणाल तर मला ते कॉम्बिनेशन आवडत नाही. लहानपणापासून फक्त वडाच खाल्ला आहे. हल्ली त्या पावात, गनिमीकाव्याने इतकी तिखट ओली चटणी लपवलेली असते की, मी तो प्रकार खाऊच शकत नाही. बाकी भाजीपाव वा पावभाजी, विशिष्ट चव असेल तरच आवडते.
तरी, लोकांना फार सिरियसली घेऊ नका. गेंड्याची कातडी फक्त राजकारणात उपयोगी असते असं नाही, नेटवरही ती उपयोगी पडते.
खाईनात का लोकं काहीही! आग व्हायची तर त्यांची होईल, आपण का ताप करुन घ्यावा ?
अजापुत्रं बलि दद्यात्
देवो दुर्बल घातक:
असं एका सुभाषितात आहे. काही कारणाने, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागले तर, मी त्या अजापुत्रं च्या ऐवजी,
जिव्हालौल्यं बलि दद्यात असे, दु:खाने म्हणतो.कारण,
मी खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी खाणाऱ्यांतला नाही.

बॅटमॅन Wed, 28/11/2018 - 23:39

या लेखातून दिसणारा वैयक्तिक टीकेचा सूर अश्लाघ्य आहे. एरवी मारे वैयक्तिक टीका सीरियसलि घेणाऱ्या लेखकाने इथे १४टॅन आणि तिरशिंगराव यांच्यावर वैयक्तिक टीका केली यात इन्कन्सिस्टन्सी तर आहेच, शिवाय आजिबात समर्थनीय नाही.

मिहिर Thu, 29/11/2018 - 00:04

मनोबाने जुनीच कॅसेट परत टाकलीय म्हटल्यावर माझीही जुनीच प्रतिक्रिया. राजाभाऊची भेळ आणि कल्याण भेळ चवीला सारखीच असं इथे म्हणणारा मनोबा एका ऐसीच्या कट्ट्यानंतर फिरताना मुद्दाम वाट वाकडी करून "इकडे कल्याण भेळ मिळते, चांगली असते." असे सांगून मला आणि बॅटमॅनला ओढून घेऊन गेला होता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/11/2018 - 01:08

In reply to by मिहिर

मिहिर हा डेंजर इसम आहे. कोणे एके काळी, आपल्या एका शाळकरी मित्राबद्दल, 'खोटं बोलू नकोस' असं काहीसं लिहून मिहिर फ्यामस झाला होता.

नंदन Thu, 29/11/2018 - 08:28

In reply to by मिहिर

कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेनंतर आता कल्याणची भेळही त्रिखंडात (पुराव्याने शाबित होऊन) गाजणार तर! ;)

अभ्या.. Thu, 29/11/2018 - 08:47

In reply to by नंदन

अशीच अमुची प्रजा आयटीवाली असती,
आम्हीही पॉलिप्याकात भेळ विकली असती.
वदले (राजाभाऊ) छत्रपती

अस्वल Thu, 29/11/2018 - 01:43

नक्की विषय काय आहे?
फास्ट फूड खाणंपिणं -> व्यायाम->चांगल्या सवयी-> आंजावरचे वैट लोक -> टॅनोबा आणि तिरशिंगरावांची सुमार गुणग्राहकता अशा अनेक स्टॉप्सवर फिरून लेख शेवटी मुद्द्यावर येतो - "नसता ताप डोक्याला"
थोडक्यात लेखकाला नक्की काय अपेक्षित आहे ते न कळल्यामुळे आपला पास.
---------------------

राजेश घासकडवी Thu, 29/11/2018 - 02:41

In reply to by अस्वल

लेखाचा विषय 'मनोबांना लोकांचा त्रास होतो' असा आहे. बाकी भेळ वडापाव हे निमित्तमात्र आहे.

सीरियसली बोलायचं झालं तर, माणसांनी काय खावं याचे सल्ले देणारी मंडळी 'स्साला आयुष्य वाढलं पाहिजे' हा आणि हा एकच निकष घेऊन सल्ले देतात. आणि त्यांनी दिलेले सल्ले इतक्या आत्मविश्वासपूर्वक दिलेले असतात की लोकांना ते खरे वाटतात. म्हणून कुठल्यातरी आनंदला 'बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही!' असं म्हणावं लागतं.

अस्वल Thu, 29/11/2018 - 06:45

In reply to by राजेश घासकडवी

अच्छा, मग ठीके. नो प्रोब्लेमो.
मला धड कळलं नाही की सिरेसली लिहिलंय की उपहासाने, आणि उपहास आहे तर नक्की कसला? आणि नसेल तर मग असं का लिहावं वगैरे.
त्रागा असेल तर त्याला काही नियम नाही. कुणी गंजीफ्रॉक म्हणतं तर कुणी बनियन.
--------
असो, पण म्हणून वडापाव, मिसळ इ.इ. अस्सल भारतीय फास्टफूडाचा केलेला असा उपमर्द बघून मला मनोबाबद्दल छोटीशी करूणा वाटली.
शिवाय १०८ दिवस सात्त्विक आहार खाल्ल्यानंतर एखाद दिवशी काय खावं असं वाटतं मनोबा?

राजेश घासकडवी Thu, 29/11/2018 - 07:58

In reply to by अस्वल

नाही नाही, मनोबाने सीरियलीच लिहिलेलं आहे. मी पहिल्या दोनतीन ओळीत भंकस केली आणि नंतर माझं गंभीर मत मांडलं.

माझ्या मते एक दिवस सात्विक खाल्ल्यावर प्रायश्चित्त म्हणून 108 दिवस भेळवडापावादी पदार्थ खाण्याचं व्रत करावं.

अभ्या.. Thu, 29/11/2018 - 07:26

अवघड आहे रे मनोबा,
कसे व्हायचे आता?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 29/11/2018 - 07:48

मनोबाचा त्रागा अस्सल चुलीवरचा नसेल तर चुलीत घाला की! काय म्हणता?

adam Thu, 29/11/2018 - 09:01

सर्व वाचकांचे आभार. शिव्या घालायला,वेडपट म्हणायला का असेना ज्यांनी धाग्याची दखल घेतली त्यांचेही आभार. धागा उपहासाने लिहिलेला नाही. किंचित आवेशानं लिहिलाही असेल, पण उपहास नाही.(तसंही तो प्रकार हुशार लोकांना जमतो म्हणे. मी काय उपहास करण्याइतका हुशार नाही.) असले धागे चालवून घेतल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार.
.

वडापाव आणि मिसळपाव इतकी मर्यादित मराठी खाण्याची आयडेंटिटी होणे चूक हे पटले.

अल्पाण्शाने का असेना मुद्दा पोचवता आला, हे बरं वाटतंय.

(पण काय करणार ? आम्हा फडतुसांना असले खाणे आवडते . गोळ्या खायला घालणार नाही ना मग ?)

छे छे. गोळीवाले गब्बरशेठ. मी आपला फार फा्र तर ख्रिश्चन मिशनऱ्यासारखा "नका हो असं करु. वाईट असतं हे." असं म्हणत समजावेन.

पण पण आपले बापजादे जे खात होते, जे सहजतेने लोकली उगवतं तेच सगळे बरोबर , न्यूट्रीशस होते हे पटले नाही .

time tested आहे हो पारंपरिक खाणं. तालेब वाचा जरा.

यामुळे कुणी आपणास मनोबा दिवेकर म्हणाले तर राग मानू नये .

दिवेकर काय काय सांगतात नक्की तपशीलवार ठाउक नाही. पण त्या जे खूप काही सांगतात, त्यातला "रिजनल आणि सिझनल खा" हा मुद्दा चूक आहे का? बाकी मुद्द्यांचं माहित नाही.
.

क्रमश:

नितिन थत्ते Thu, 29/11/2018 - 10:42

>>आपले बापजादे जे खात होते, जे सहजतेने लोकली उगवतं तेच सगळे बरोबर , न्यूट्रीशस

आपले बापजादे चारेकशे वर्षांपासून बटाटे खात आहेत. तसेच कोलंबस तिकडे पोचल्यावर तिथून आलेले मिरच्या टोमॅटो वगैरे पदार्थही खात आहेत. ते काही पारंपरिक नाहीत. तसाच वास्को द गामा कालिकतला आला तेव्हापासून पावही खात आहोत. मुद्दा हा की आपले बापजादेही लोकल पदार्थ खात नव्हते.

बाकी बिस्किट वैट आणि शंकरपाळे चांगले हे महान असतंय [कोक वैट आणि उसाचा रस चांगला; चॉकलेट वैट आणि चिक्की चांगली याप्रमाणेच].

टॅनोबा म्हणाले तसे वडापाव मिसळपाव हे पदार्थ कुणी रोज सकाळ संध्याकाळ खात नाहीत.

आणखी महत्त्वाचं म्हणजे भाजीपाव नावाने साठ सत्तरच्या दशकात जे* मिळत असे त्या प्रकारची पावभाजी आज उच्चभ्रू लोक खात नाहीत.

*तेव्हाची भाजी ही थोड्याश्या शिळ्या, खराब होऊ लागलेल्या आणि म्हणून स्वस्त मिळणाऱ्या भाज्या वापरून बनवली जात असेल. त्या तशा आहेत हे समजून येऊ नये म्हणून स्ट्राँग वास देणारे मसाले त्यात वापरत असतील आणि दिसून येऊ नये म्हणून शिजलेल्या भाज्या स्मॅश करून बनवत असतील. असा भाजीपाव हे खालच्या वर्गाचे अन्न असेलही. पण आज आपल्यासारखे लोक जी पावभाजी खातात ती शिळ्या/सडलेल्या भाज्यांपासून** बनवलेली नसते. त्यामुळे ते दारिद्र्याचे डोहाळे आहेत असे म्हणता येणार नाही.
**कित्येक आया याला "त्या निमित्ताने मुलं भाज्या खातात" अशा पॉझिटिव्ह प्रकारे घेतात.

अनुप ढेरे Thu, 29/11/2018 - 10:46

In reply to by नितिन थत्ते

पण आज आपल्यासारखे लोक जी पावभाजी खातात ती शिळ्या/सडलेल्या भाज्यांपासून** बनवलेली नसते.

हाटेलात आजही जी पावभाजी मिळते त्यात फ्रेश, उत्तम दर्जाच्या भाज्या घालत असतील यावर माझा विश्वास नाही. खराब व्हायला आलेला माल भाजीवाले हाटेलांना विकतात स्वस्तात असं ऐकलं आहे. (एका भाजीवाल्याकडुन)

बिटकॉइनजी बाळा Thu, 29/11/2018 - 14:26

In reply to by अनुप ढेरे

कोल्हापूर पुणे प्रवासात लाल डबा एकदा प्रियांका शू मार्ट येथे एका हॉटेलात खाण्या साठी थांबला. एका निर्जन कोपऱ्यात पावभाजीसाठीचा बटाटा उकडून ठेवला होता. प्रत्येक काळसर बटाट्याला इंचभर तरी कोंभ आलेले पाहिले आणि परत पावभाजीला बाहेर तोंड लावायचे धाडस झाले नाही.

अस्वल Fri, 30/11/2018 - 02:03

In reply to by बिटकॉइनजी बाळा

का निर्जन कोपऱ्यात पावभाजीसाठीचा बटाटा उकडून ठेवला होता. प्रत्येक काळसर बटाट्याला इंचभर तरी कोंभ आलेले पाहिले

खतरनाक चित्र उभं राहिलं. अनुराग कश्यपच्या सिनेमातला शीन जणू.

अतिशहाणा Fri, 30/11/2018 - 02:20

In reply to by अस्वल

हॉस्टेलच्या मेसमध्ये उकडलेले बटाटे मोठ्या तोंडाच्या बादलीत किंवा पातेल्यात ठेवून रमेश, आनंद वगैरे कर्मचारी घामेजलेल्या उघड्या (स्वच्छ) पायांनी तुडवत असतं. मात्र आमच्या पावभाजीच्या आवडीत त्याने फरक पडला नाहीत ब्वा.

नितिन थत्ते Sat, 01/12/2018 - 09:13

In reply to by अतिशहाणा

मी सीओईपीच्या हाष्टेलात होतो तेव्हा पावभाजी हा प्रकार पुण्यात जस्ट सुरु झाला होता. त्यामुळे मेसमध्ये पावभाजी बनत नसे.

पुण्यात पावभाजी बहुधा उच्चभ्रू म्हणूनच अवतरली.

अबापट Sat, 01/12/2018 - 13:58

In reply to by नितिन थत्ते

अहो, काय हे ? दिवेकरबाई फेम मोदक वगैरे इकडे उच्चभ्रू असतात. पावभाजी देशी अन्न म्हणून डिक्लेअर करा, मग ते पुणे, दिवेकर बाई आणि मनोबाबा ... सगळीकडे उच्चभ्रू होईल

नितिन थत्ते Mon, 03/12/2018 - 13:15

In reply to by अबापट

तसं नाय वो....

पुण्यातल्या कामगारांना पुण्यातली पावभाजी कधी परवडली नसेल. शिवाय सत्तर ऐशीच्या दशकातले पुण्यातले कामगारही उच्चभ्रूच असावेत.

बिटकॉइनजी बाळा Sat, 01/12/2018 - 22:45

In reply to by अतिशहाणा

असेल बुवा. आम्ही सीईओपी किंवा आयआयटी मध्ये शिकलो नाही तरी आमच्या कॉलेजच्या कँटीनमध्ये इतक्या गोराकुंभारी भक्तीभावाने पावभाजी कुणी बनवली नाही. (त्यामुळे आम्ही पोटभरू नीचभ्रू राहिलो असू)

गवि Thu, 29/11/2018 - 14:35

In reply to by अनुप ढेरे

हाटेलात आजही जी पावभाजी मिळते त्यात फ्रेश, उत्तम दर्जाच्या भाज्या घालत असतील यावर माझा विश्वास नाही. खराब व्हायला आलेला माल भाजीवाले हाटेलांना विकतात स्वस्तात असं ऐकलं आहे. (एका भाजीवाल्याकडुन)

हे पावभाजीलाच फक्त लागू नसावं. म्हणजे व्हेज माखनवाला किंवा व्हेज दिवानी हंडी यात फ्रेश भाज्या आणि पावभाजीत सडक्या असं नसावं. फ्रेशता लोपून जाईल इतका किमान लगदा आणि मसाला एडिशन ज्या प्रकारात होते त्या सर्वांच्यात हे वापरणं कॉमन असावं.

चिमणराव Sat, 01/12/2018 - 11:31

In reply to by गवि

सत्तरच्या दशकात ओपरा हाउस येथे झवेरबाजार भागात खडी पावभाजी सुरू झाली (खडे मसाले छाप - ज्यामध्ये फ्लावर,मटर,गाजर,कोबी इत्यादि बरेचसे अखंड वाफवलेले तुकडे अमुलबटरवर परतून पावात घालत. )तर या प्रकारात भाजीवर अत्याचार होण्याची शक्यता कमीच होती॥ शिवाय गिर्हाइकं हीरा व्यापारी.
पुढे त्या भाजीचे बदल झाले. घाटकोपर,किंग्ज सर्कल गार्डन भागात खडी मिळत असे.
बाकी पुण्यावरचे आरोप फार सिरिअसली घेऊ नका कुणी. चालायचंच शहर म्हटलं की.

अतिशहाणा Thu, 29/11/2018 - 10:48

बाकी बिस्किट वैट आणि शंकरपाळे चांगले हे महान असतंय [कोक वैट आणि उसाचा रस चांगला; चॉकलेट वैट आणि चिक्की चांगली याप्रमाणेच].

घरी बनवलेलं कमी प्रोसेस केलेलं असतं. स्वच्छ चरकात पिळलेला ऊस आणि १७६० रसायने वापरून तयार केलेला कोक यात निवड सोपी आहे. चिक्कीही चांगली.

अनुप ढेरे Thu, 29/11/2018 - 10:52

In reply to by अतिशहाणा

चिक्कीतुन काजु/शेंगदाणे जातात पोटात. गुळाची असल्याने लोहपण. सो चॉकलेट-चिक्की तुलनेत चिक्की उजवी आहे.

नितिन थत्ते Thu, 29/11/2018 - 11:03

In reply to by अतिशहाणा

नुकतेच मी बेक्ड शंकरपाळे नावाचा प्रकार खाल्ला. तो तळलेला नसल्याने हेल्दी होता असा विकत आणणाऱ्याचा समज होता. शंकरपाळ्याच्या आत सुमारे ३० टक्के फॅट असते हे त्याला ठाऊक नसावे.

चिमणराव Thu, 29/11/2018 - 11:21

मनोबा मनात आलं ते बोली भाषेत उतरवतो ते लेखन मला आवडतं. तसं टानोबाही नवा उमेदवार आहे. वयानुरुप लिहितो, कधी गंभीरही. आवडतं.
बोलतात/लिहितात म्हणून कळतात नवीन विचार. लिहा रे रग्गड.

गवि Thu, 29/11/2018 - 11:35

अगदी उपयुक्त आणि उत्स्फूर्त आणि..आणि..

कृपया तिय्या जमवून देणे.

असंच एकदा नव्या पिढीच्या वीर्यनाशाविषयीही चळचळून लिहायला हवंय. लिही रे मनोबा. तूच पेलू शकतोस.

चिमणराव Thu, 29/11/2018 - 14:09

आपापले पौष्टिक पदार्थ कोणते याविषयीही प्रत्येकाने लिहाच.
सुरुवात करतो -
मी आठवड्यातून एकदा केळं,चिकू,खजूर आणि वाळक्या पावाच्या स्लाइसचे तुकडे एकत्र दुधात भिजवून खातो. रोजच्या पंचवीस कप चा'चे न्युट्रलाइजेशन थोडेफार होत असावे.
( कच्छी लोक सकाळी थोडा सुकामेवा आणि दूध घेतात असं ऐकून आहे.)सुकामेवा परवडणार नसल्याने कधीमधी खारीक खोबरं चावत असे.

चिमणराव Thu, 29/11/2018 - 14:21

Rice paper taco याचे मुंबई पुणे वर्शन चालू करायला हरकत नसावी. अंड्याचा नेहमीचा पर्याय पनीर घालून.

-----
निरनिराळ्या पदार्थांस मिशेलिन स्टार्स देतात त्याप्रमाणे मनोबा_तारांकित करण्याची पद्धत सुरू करायला हवी .

बॅटमॅन Thu, 29/11/2018 - 14:27

In reply to by चिमणराव

काय उपयोग नाही. नॉनव्हेज हॉटेले ऑलरेडी कट. शिवाय बाकी व्हेजमध्येही घट्ट वरण सोडून बाकी सगळ्याला भोपळाच मिळेल. =))

गौराक्का Fri, 30/11/2018 - 19:55

एकंदरीतच मनूकाका एक स्वयं कमलाबाई ओगलेंचे पुरुषरुप आणि "खाद्यसंस्क्रुती टिकलीच पाहिजे" चळवळीचे आद्य प्रणेते आहेत असं मला वाटतं...

अस्वल Fri, 30/11/2018 - 23:08

In reply to by गौराक्का

मनूकाका

मनोबा,
प्रमोशनबद्दल हार्दिक अभिनंदन !!!

'न'वी बाजू Sat, 01/12/2018 - 00:11

In reply to by गौराक्का

कमलाबाई ओगलेंचे पुरुषरुप

'चुकून' (सवयीने!) 'कमलाबाई ओगलेंचे परपुरुष' असे वाचले.

चालायचेच!

बॅटमॅन Sat, 01/12/2018 - 11:23

In reply to by गौराक्का

चुकलात. मनूकाका हे बेसिकली आजोबा आहेत. फक्त खाद्यसोन्स्क्रूतीच नव्हे तर बाकी काहीही नवीन नको असा त्यांचा आग्रह असतो. त्याबद्दलची त्यांची मते ते एसी ऑफिसातून तळमळीने कीबोर्ड बडवत पोटतिडीकीने मांडतात.