पाळीच्या कपाबद्दल लेखन : बायांच्या हुतात्माषौकाची परमावधी
सदर लेखात मासिक पाळी, रक्त वगैरेंची पुरुषांना किळसवाणी वाटणारी वर्णनं अजिबात नाहीत.
तीन वर्षांपूर्वी गौरीनं 'एकच कप' हा लेख लिहिल्यापासून मी पाळीचा कप वापरत्ये.
बायकांना१ हुतात्मा बनण्याची फार हौस असते. मुळात असते का नाही माहीत नाही. मात्र अगदी लहान वयापासून हेच शिकवलं जातं. सरळ सांगितलं नाही तरी आजूबाजूला आई, काक्वा, मावश्या, आत्या, माम्या, आज्या - हाका मारायच्या आणि खरोखर नातेवाईक - सगळ्या बायकांमध्ये हा हौतात्म्यषौक अगदी ठासून भरलेला असतो. बघून बघून तेच नॉर्मल वाटत जातं.
माझी चाळीशी आता आलीच. माझ्या आजूबाजूच्या बहुतांश स्त्रिया निदान तिशीच्या पुढच्या आहेत. बहुतेकींना वजन आटोक्यात ठेवण्याची आणि व्यायाम करण्याची आत्यंतिक गरज आहे, हे त्यांच्याकडे बघून किंवा रस्ता ओलांडताना धावायची वेळ आली की लगेच दिसतं. मात्र व्यायाम करायला यांना वेळ नसतो; कारण नोकरी, घरदार सांभाळून व्यायाम करणार कधी? घरी जाऊन स्वयंपाक करायचा असतो, घर आवरायचं असतं, विकेण्डच्या पार्टीची तयारी करायची असते, आणि कायकाय! वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तोंडावर ताबा ठेवायची गरज असते. यांतल्या बहुतेक बायका स्वतः स्वयंपाक करतात किंवा स्वयंपाकाचं नियोजन करतात. मग वेडंवाकडं न खाण्याची सोय करणं किती कठीण असेल? मात्र बायकांच्या तक्रारी स्टँडर्ड असतात - सासू-सासऱ्यांना आवडत नाही; नवऱ्याला२ आवडत नाही; मुलांसाठी करावंच लागतं. आणि मग हीच मुलं मोठी होऊन हत्तीच्या आकाराची होतील; अपवादासाठी हत्ती झाले नाहीत तरी वेगवेगळ्या विकारांना बळी पडतील.
मुद्दा हा, की बायांनी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी काही केलं तर जणू जगबुडी येते! आजच दिव्य मराठीतला हा लेख नजरेस पडला. मेन्स्ट्रअल कप: पर्यावरणपूरक पर्याय. या विषयावर सात्त्विक संताप उफाळून येण्यासाठी हे निमित्त झालं. या पुरवणीची संपादिका ओळखीची आहे; म्हणून आणखी संताप३!
बायांनी स्वतःसाठी काही करू नये. स्वतःसाठी काही केलं, काही खाल्लं, ल्यायलं, प्रवास केला तर त्यातून इतर कोणालातरी आनंद होण्याचं बायकांना फेटिश असतं! असा कसा मला एकटीलाच आनंद मिळणार त्यातून! वर पुन्हा 'त्यागमूर्ती' वगैरे शब्द वापरून या षौकाला देव्हाऱ्यात बसवणं अजूनही सुरू असतंच. यात वाचन-लेखन अशा इंटुक गोष्टी मोजू नका; त्यातून आनंद मिळवणाऱ्यांची संख्या मर्यादितच असते आणि त्यांतला आनंद ममव लोकांत शुचिर्भूत समजला जातो.
'पाव नसेल तर केक खा' या न म्हटलेल्या वाक्यासाठी प्रसिद्ध मेरी आंत्वानेत.
मुळात हा जो हौतात्म्यषौक असतो यात जात फार महत्त्वाची नाही. फक्त ममव बायांना हौतात्म्याचा षौक असतो असं अजिबात नाही. मात्र हा कपाचा मुद्दा बहुतेक फक्त ममव बायांपुरता मर्यादित असू शकतो. कप रिकामा करण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाण्याची गरज असते; थोडा टॉयलेट कागद असला तर आणखी उत्तम. म्हणून ममवपणाचा मुद्दा. शिवाय ममव लोकांत पाळी म्हणजे वाईट असं समजण्याचं प्रमाण बरंच कमी आहे. शून्यावर आलंय असं समजू नका; मी बायकांच्या फोरम्सवरही फिरते. पाश्चात्त्य देशांत राहणाऱ्या, इंजिनियर वगैरे झालेल्या, तिशी आलेल्या-ओलांडलेल्या स्त्रियाही "मलाच देवाची पूजा करावीशी वाटत नाही", वगैरे लिहितात तेव्हा मी नैष्ठिक कपाळ बडवत बसलेली असते.
कपाची मुळात किंमत बऱ्यापैकी जास्त असते. भारतातल्या किंमतींची कल्पना नाही. एका कपाच्या किंमतीत अख्ख्या वर्षाचा नॅपकिनचा स्टॉक मिळेल. साधारण एका शर्टाची किंमत तेवढीच असेल. पुन्हा एकदा, ममव लोकांसाठी हे फार पैसे नाहीत. मी गेल्या तीनेक वर्षांच्या वापरात तीनेक कप जाळलेही आहेत. तरीही मला कपाची किंमत रास्त वाटते.
याचं कारण कप वापरून अत्यंत कोरडं आणि पवित्र वाटतं. मध्यंतरी नोकरीसाठी मुलाखतीला गेले होते. ते प्रकरण साडेतीन तास चालणार होतं. मध्येच कप भरला असं वाटलं; तर ब्रेक घेऊन कप रिकामा केला. शांतपणे उरलेली मुलाखत पूर्ण केली. पाणी, साबण आणि थोड्या कागदाची - थोडक्यात व्यवस्थित स्वच्छतेची जिथे सोय आहे तिथे कप व्यवस्थित वापरता येतो. किमान स्वतःच्या घरांत एवढ्या सोयी असतातच.
मी कप वापरून झोपते तेव्हा एकही डाग पडत नाही. दहा तास लोळत पडले तरीही नाही. मोठ्या गादीवर वेडीवाकडी कशीही पसरले तरीही नाही. कप वापरून खेळ, ऑफिस, बागकाम अशा नेहमीच्या आयुष्यातल्या गोष्टी करताना मोठी सोय होते. आता कप रिकामा करण्याची वेळ झाली आहे, हेसुद्धा सहज समजतं. कपामुळे माझ्या आयुष्याची प्रत सुधारली आहे. पाळी सुरू आहे याची जाणीवही होत नाही.
मात्र कपाबद्दल लिहिताना, 'मी कप वापरते' असं म्हणणाऱ्या स्त्रीवादी बायकाही "काय सुख वाटतं हो" अशा छापाचं लिहिणार नाहीत. "पऱ्यावर्यणा४सॅठी कॅप वॅपॅरा" म्हणे! का? बायकांनी स्वतःच्या सुखासाठी केली थोडी उधळपट्टी, वापरला थोडा सेल्यूलोज आणि केला थोडा कचरा तर पृथ्वीचं कितीसं तापमान वाढणार आहे? खरोखरच इतरांचा विचार करायचा असेल तर नॅपकिन्स ड्रेनेजमध्ये गेल्यामुळे ड्रेनेज किती तुंबतं आणि किती कामगारांचे जीव त्यात जातात, याची मोजदाद करा. किंवा कचरा वेचणाऱ्या लोकांच्या आयुष्यांचा थोडा अभ्यास करा आणि त्यांना काय घाणीत काम करावं लागतं याचा विचार करा! ते नाही.
आता मात्र ममवंनाच ढोस. कचरा उचलणारे, तुंबलेलं ड्रेनेजचे पाईप साफ करणारे सफाई कामगार आमच्या परीघात, दृष्टिपथातच नसतात. ते पूर्वास्पृश्य आमच्यासाठी अदृश्यच असतात. त्यांचे प्रश्न आमच्या जगात नसतातच. आमच्या echo chamberमधले लोक फक्त पर्यावरणाबद्दलच बोलतात; म्हणून आम्ही त्याची पोपटपंची करतो. ही पोपटपंची येते पाश्चात्त्य माध्यमांतून. त्यांना सफाई कामगारांचे प्रश्न समजतात; त्यांच्याकडे हे काम करणाऱ्या माणसांसाठी कामासाठी यंत्रं, रोबॉट्स आणि किमान मोठे बूट, ग्लोव्ह्ज वगैरे गोष्टी असतात. ते पर्यावरणाबद्दल बोलणार म्हणून आम्हीही!
बरं, कप वापरला म्हणून सॅनिटरी पॅड्स वापरावी लागत नाहीत असं अजिबात नाही. ज्या दिवशी कपाशिवाय दोन-चार मोठी पॅड्स वापरावी लागली असती, त्याऐवजी एखादं बारकं वापरलं जातं. वॉशर बिघडल्यासारखा नळ गळतो तेव्हा कप वापरायचा तर टायमिंग फार महत्त्वाचं असतं, आणि ते सवयीशिवाय जमणार नाही. या बायका जेव्हा मोठेपण घेऊन गणितं करून दाखवतात 'एक स्त्री महिन्याला २० पॅड्स वापरते' त्यात कप वापरूनही पॅड वापरावं लागतं, याचा विचार करून लिहितात का? बरं, एवढी पॅड्स सगळ्या बायकांनी वापरली तर नक्की त्याचा काय परिणाम होईल; किती जंगलं साफ होतील; कचऱ्याचं काय होईल वगैरे; अशा छापाचं अभ्यासपूर्ण काहीही नसतं त्यात. फक्त 'पाच चोक वीस' इतपत पाढे म्हटले म्हणजे ते गणित होत नाही. ही माहिती अत्यंत प्राथमिक आहे; मूलभूत नाही; मूलगामी तर नाहीच नाही. 'Ya basic' असा अपमान ऐकला आहेत का? नसेल तर आता मी प्रबोधन केलं. तर तो अपमान अशा पाचाचे (किंवा चाराचे) पाढे म्हणणाऱ्यांना उद्देशूनच योजला असावा.
पर्यावरण वगैरे मोठमोठे शब्द योजून, ज्यांना कप वापरणं शक्य नाही अशा स्त्रियांना आपण उगाच अपराधगंड देत असतो, याची जाणीवही हौतात्म्यषौकीनांना नसावी. बऱ्याच स्त्रिया मुंबईसारख्या शहरात फिरतीच्या नोकऱ्या करतात. हे तेच जागतिक दर्जाचं शहर जिथे 'राईट टू पी' नावाचं आंदोलन चालवावं लागतं. मग भविष्यात महासत्ता बनणाऱ्या देशातली दुय्यम दर्जाची शहरं आणि गावखेड्यांतल्या गोष्टी सोडूनच देऊ. जिथे धड मुतायची सोय नाही, तिथे कपाचा हट्ट कुठून धरायचा? मारे पर्यावरणाबद्दल बोलताय, पण शेजारच्या बाईबद्दल सहानुभूती नाही, ना तिच्या व्यावहारिक अडचणींची कल्पना!
वर आणखी रोम्यांटिक कल्पना असतात. बाई म्हणजे आई असते; मग जगाचं भलं बायका करणार नाहीत तर कोण करणार वगैरे! हे प्रकार अजून भारतात, निदान मराठी जनांत, फार बोकाळलेले दिसत नाहीत. पण 'पर्यावरणासाठी कप' हे पाश्चात्त्य खूळ आलं तसा हा रोम्यांटिक स्त्रीवादाचा व्हायरस पसरणार नाही, याची काय खात्री देता येणार?
Ya basic! आवरा आता आणि ठामपणे स्वतःसाठी जगायला शिका; गोष्टी उपभोगायला शिका. मग ढोस पाजा वाटलंच, वेळ मिळालाच तर. त्या ढोसांचा कदाचित सडलेल्या रक्तासारखा दर्प येणार नाही.
'द सेकंड सेक्स' लिहिणाऱ्या सिमोन दी बोव्हारला एका मुलाखतीत विचारलं होतं; तुझं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे असं तुला वाटतं? त्यावर तिनं दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. वेगवेगळ्या प्रसंगांत त्या उत्तराचे निरनिराळे अर्थ मला समजत जातात. ती म्हणाली होती, "माझं आयुष्य हेच माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे."५
१. महिला हा शब्द मला अगदीच घाटी वाटतो. स्त्री, बाई, व्यक्ती, हे शब्द चांगले आहेत. महिला हा शब्द हिंदोद्भवही असू शकतो.
२. बरा अर्धा हे मुळात सामान्य नाम आहे. मात्र माझ्या माहितीत मी एकटीच हा शब्द वापरते. त्यामुळे हे विशेषनामही असू शकतं२अ.
२अ. बऱ्या अर्ध्याला आपण बरा अर्धा आहोत, हे माहीत नाही२आ.
२आ. ते गुपित नाही.
३. लेख प्रकाशित केल्यावर पहिले तिला लिंक पाठवली आहे.
४. मुद्दाम लिहिलंय असं.
५. ह्यावरून 'तुज आहे तुजपाशी'मधले काकाजी आठवले तर त्यास मंडळ जबाबदार नाही.
या लेखावरून मला एक समांतर
या लेखावरून मला एक समांतर उदाहरण आठवलं. 'लोकसंख्या कमी करण्यासाठी गर्भनिरोधक उपाय करा. त्याने देशाचं भलं होईल!' असं म्हणत भारत सरकारने कुटुंबनियोजन योजना राबवली. याउलट र. धों. कर्वेंची मांडणी अशी होती की 'लैंगिक सुखाचा पुरेपूर उपभोग घेता येण्यासाठी त्यातला (विशेषतः स्त्रियांसाठीचा) अपत्यनिर्मितीचा धोका टाळणं आवश्यक आहे. म्हणून गर्भनिरोधाची उपकरणं वापरावीत'.
तिशी आलेल्या-ओलांडलेल्या
मला एक तर स्तोत्र म्हणायला, मूड लागतो तिथे ढोंग नको ;एकदम सचोटी. आणि पाळीच्या काळात आंघोळ करुन मूड आला तर मी म्हणते स्तोत्र. पण आला नाही तर नाही म्हणत. असा नियम नाही.
_____
बाकी हौतात्म्य आणि त्यागाची फेटिश ही खरच असते बायकात
एकट्या असतील तर कसंतरी करुन खातात, नाहीतर करतच नाहीत. अजुन कोणी बरोबरीला असेल तर मात्र निगुतीने स्वयंपाक करतात वगैरे.
एकट्या आणि एकटे
बायका एकट्या असतील तरीही घरी कसातरी का होईना स्वयंपाक करू पाहतात. पुरुष सरळ बाहेर जाऊन गिळतात.
द-र-रो-ज निगुतीनं स्वयंपाक करणं हा प्रकारही ओव्हररेटेड आहे. तरी निदान भांडवलशाहीनं बरीच यंत्रं आणि दळलेली कणीक, तयार पोळ्या वगैरे गोष्टी बाजारात आणून हा प्रकार थोडा सोपा केलाय. रोज निगुतीनं स्वयंपाक करण्यापेक्षा इंटरमिटंट फास्टिंगही बरं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बायका एकट्या असतील तरीही घरी
बायका एकट्या असतील तरीही घरी कसातरी का होईना स्वयंपाक करू पाहतात. पुरुष सरळ बाहेर जाऊन गिळतात.
अगदी अगदी.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
निगुतीनं स्वयंपाक्
ही टर्मच इन इटसेल्फ, डोक्यात तिडीक आणणारी आहे. तेजायला, इतका उत्साह असणार्या बायांना माझा दंडवत. फार उत्तम गुण आहे तो पण दुरुनच सलाम.
त्या परिचित संपादक महोदयांना
त्या परिचित संपादक महोदयांना ऐकवलेत की नाही ?
जाहिरातींप्रमाणे हे असलेही छापण्याचे बंधन असते की काय त्यांच्यावर ?
अवांतर
एकटीसाठी इतक्या कमी प्रमाणात स्वयंपाक करणं जरा अवघडच होतं. मग एकदा करून तीनदा खायची वेळ येते. त्यामुळे सगळं डावं उजवं न करता एकावेळी एक तोंडीलावणं केलं तरच शिळं खावं लागत नाही. यात स्वतःला कमी लेखणं नाही. सोय आहे.
क्वचित एकटं राहावं लागत असलेल्या बायांना एखादा दिवस स्वयंपाकाला जुंपण्यापासून सुटका असंही वाटत असेल, कुणी सांगावं.
शक्य आहे. हे पण असू शकते खरे.
शक्य आहे. हे पण असू शकते खरे.
महिला
महिला हा शब्द उच्चारला की खरंच, डोक्यावरुन पदर वा ओढणी घेतलेली, स्त्रियांच्या प्रसाधनगृहावर जे सरकारी चित्र असते, तशा प्रकारची स्त्री वाटते. म्हणून हा शब्द आवडत नाही.
त्यापेक्षा, दादा कोंडक्यांच्या डेफिनेशन मधला, 'बाबातला बा आणि आईतली ई', ती बाई हा शब्द सरळ भिडणारा वाटतो.
गौरी दाभोळकरांनी लिहीलेला लेख
गौरी दाभोळकरांनी लिहीलेला लेख आठवतोय. परंतु ३ वर्षात त्याचा म्हणावा तितका प्रचार झालेला नाही.
भारतात असे वापरणे अडचणीचे आहे यावर त्या धाग्यावर पुष्कळ चर्चा झालेली आहे. आणि तेच मुद्दे आजही तसेच्या तसे लागू आहेत. पुण्यासारख्या शहरात देखिल अनेकदा पाणी टंचाई असते. प्राथमिक सोयी देखिल उपलब्ध नसतात. लहान गावांतून वगैरे तर काहीच सोय नाही. बाकी जाऊ दे सॅनिटरी पॅडस सुद्धा त्यांना उपलब्ध नसतात, अथवा परवडत नाहीत.
तुम्ही लिहीलेले मुद्दे अगदीच मान्य आहेत. विषेषत: सफाई कामगारांची समस्या, वापरलेली पॅडस योग्यप्रकारे (म्हणजे पर्यावरण पूरक पद्धतीने इ.) नष्ट करणे हे तर फारच महत्वाचे मुद्दे आहेत. पण यासाठी निदान भारतात तरी अजून दूसरा प्रर्याय नाही. यासाठी मुलींना आणि स्त्रियांना माहिती आणि प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आणि तसे नियम करून अंमल बजावणी केली पाहिजे. जसे पुण्यात ओला कचरा आणि कोरडा कचरा वेगळा ठेवणे अनिवार्य केलेले आहे. आणि त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसतायत.
हौतात्म्यषौक हा शब्द फार आवडला. मी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने फार मागासलेली नसले तरीही, मला हा षोक आहे. फार नाही पण थोडाफार .. नाईलाज आहे.
पाश्चात्त्य देशांत राहणाऱ्या, इंजिनियर वगैरे झालेल्या, तिशी आलेल्या-ओलांडलेल्या स्त्रियाही "मलाच देवाची पूजा करावीशी वाटत नाही", वगैरे लिहितात तेव्हा मी नैष्ठिक कपाळ बडवत बसलेली असते.
संस्कार असतात हो ते. असे सहजा सहजी पुसले जात नाहीत. मला माहीती आहे की त्यात अपवित्र असं काही नाही, तरी मी सुद्धा असच म्हणते. देवळात जात नाही.
पण इतर बायकांनी तसच कराव अस मी सांगत नाही. उलट स्त्रियांना अशी वागणूक देणे अन्यायकारक आहे असच म्हणते.
मुद्दा हा, की बायांनी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी काही केलं तर जणू जगबुडी येते!
हे अगदी १००% खरय. भारतात स्त्रियांना अती गृहीत धरले जाते. नोकरी करत असली तरी घरच आणि घरच्यांच सर्व काही निगुतीने करणं अनिवार्य असत.
"माझं आयुष्य हेच माझं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे."
बोव्हार बाईंच उत्तर मार्मिक आहे खरं.
"माझं आयुष्य" याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
स्विगी आणि झोमॅटो
बायका एकट्या असतील तरीही घरी कसातरी का होईना स्वयंपाक करू पाहतात. पुरुष सरळ बाहेर जाऊन गिळतात.
- असहमत. भारतात स्विगी आणि झोमॅटो युग अवतरल्याला बरेच दिवस झाले. माझ्या ओळखीतल्या अनेक बाया ही सुविधा वापरतात आणि मजेत फक्त स्वतःला आवडेल ते मागवतात.
तो डिव्हा कप अजुन वापरलेला
तो डिव्हा कप अजुन वापरलेला नाही.
पण त्याचे कारण इन जनरलच कोणत्याही टेक्निकल अपग्रेडिंगची धास्ती व आत्मविश्वासाची कमी हेसुद्धा आहेच.
परत ते इन्सर्ट करणे वगैरे प्रकार नको वाटतात. यात कोणतेही सनसनाटि अथवा अश्लील विधान करण्याचा हेतू नाही. टॅपुनही त्यामुळेच आवडत नाहीत.
थंड घ्या..
> या विषयावर सात्त्विक संताप उफाळून येण्यासाठी हे निमित्त झालं.
संताप इतका उफाळून येण्यासारखं दिव्य मराठीतल्या त्या लेखात काय आहे हे तो लेख दोनदा वाचूनही कळलं नाही. एकतर त्यात कपाला ‘पर्यावरणपूरक पर्याय’ म्हटलेलं आहे. कप वापरण्याचं ते एकमेव कारण आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. समजा मी म्हटलं की गाजर खाणं आरोग्याला चांगलं असतं, तर गाजर चवीला वाईट असतं असं म्हटल्याचा आरोप तुम्ही माझ्यावर करणार का?
आणि तसं पाहिलं तर ‘कप हा केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचा नसून आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीनेही तुलनेने अधिक योग्य आहे’ हा मुद्दा लेखात आलेला आहे. शिवाय ‘कप सहज हालचाली करण्यासाठी सोयिस्कर आहे’ असंही म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर कप वापरणं हा पर्याय स्त्रियांसाठी आरामाचा आणि सुखाचा आहे हा मुद्दा मूळ लेखात मोघमपणे का होईना पण आलेलाच आहे. मग इतकी तक्रार करायचं काय कारण?
> पर्यावरण वगैरे मोठमोठे शब्द योजून, ज्यांना कप वापरणं शक्य नाही अशा स्त्रियांना आपण उगाच अपराधगंड देत असतो, याची जाणीवही हौतात्म्यषौकीनांना नसावी.
हे काहीच्या काही तर्कट झालं. समजा मी म्हटलं की रोज पायी चालून या, त्यामुळे व्यायाम छान होतो तर माझ्या विधानामुळे विकलांग माणसाला अपराधगंड येतो का?! कोणतीही सर्वसाधारण सूचना करताना, ती सूचना पाळणं ज्यांच्यासाठी व्यवहार्य नाही त्यांनी ती अव्हेरलेली चालेल हे गृहीतच धरलेलं असतं. हे दरवेळी कोण सांगत बसेल? Ya basic. आणि तुमचाच तर्क वापरायचा तर हा धागा मुळात ‘ऐसी अक्षरे’ वर तुम्ही टाकलातच का? ज्याला संगणक परवडत नाही किंवा रानावनात राहात असल्यामुळे ज्याच्याकडे इंटरनेट नाही त्याला यामुळे न्यूनगंड नाही का वाटायचा?
> बायका एकट्या असतील तरीही घरी कसातरी का होईना स्वयंपाक करू पाहतात. पुरुष सरळ बाहेर जाऊन गिळतात.
हे विधान बकवास आहे. एकट्यासाठी स्वयंपाक करणारे आणि तोही चांगला करणारे कित्येक पुरुष मला ठाऊक आहेत.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
पुन्हा प्रयत्न कराच.
व्यायाम स्वतःसाठी असतो, जगाच्या भल्यासाठी नसतो.
तुलना करायची झाली तर रोज चालत/सायकलनं प्रवास करून सोय बघणं किंवा व्यायाम करण्याजागी पर्यावरण वाचवलं असं म्हणणं आणि त्याऐवजी गाडी चालवणं, अशी करता येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हा मुद्दा करेक्ट खोडला आहेस.
हा मुद्दा करेक्ट खोडला आहेस.
पुरुषांसाठी लेख आणि पुरुषांचा प्रतिसाद
लेख वाचताना मला जी पुसट शंका आली होती, ती सिद्ध करणारा प्रतिसाद आहे. पुरुषांसाठी लिहिलेला लेख वाटतो. ज्यांना कप वापरणं किती सोयीचं आहे हे समजू शकतच नाही, त्यांच्यासाठी लिहिलेला. स्त्रीवादी किंवा स्त्रियांच्या सोयीसाठी काही लिहितानाही स्त्रिया पुरुषांच्या चश्म्यातून बघतात, असाही सिद्धांत त्यातून मांडता येईल.
अडीच परिच्छेदभर, ३०+ वाक्यं पर्यावरण सांडलंय आणि दोन वाक्यांत 'सोय होते' असं लिहून वर पुन्हा 'बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स' तोंडाला पुसले आहेतच.
तुम्हाला हा मुद्दा समजलेला नाही, हे व्यायामाच्या उदाहरणावरून स्पष्टच दिसतंय. (व्यायामाचा मुद्दा माझ्या विरोधात वापरू नका, मी स्वतःच लेखाच्या सुरुवातीला व्यायामाच्या बाजूनं लिहिलंय.) मात्र कप वापरल्याशिवाय तो किती उपयुक्त आहे, हे समजणं अशक्य आहे.
असो. पुढच्या वेळेस कपाबद्दल कुठलीही पब्लिक पोस्ट दिसली की इथे आणून डकवणार आहे. म्हणजे बायका कपाबद्दल बोलतात तेव्हा पर्यावरणासाठी कप वापरायचा म्हणून बोलतात का स्वतःसाठी, तेही दिसेल.
अवांतर - शिवाय, 'दिव्य मराठी'तल्या लेखात सिलिकोन-सिलिकॉन घोळ घातलाय; सिलिकोन निराळं, ते रसायन असतं. सिलिकॉन हे मूलद्रव्य असतं. 'टॉक्सिक शॉक सिंड्रोम'बद्दल सरळ फेका मारल्या आहेत; तो होण्यामागचं मुख्य कारण टँपन असतं; तो टँपनही योनीमार्गातच जातो, कपसुद्धा तसाच, तिथेच जातो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
टॉशॉसिंचा मुद्दा तपशिलात गोंधळलेला आहे खरा पण उल्लेख करण्यायोग्य
टँपॉन वि कप यांची तुलना करताना योनीमार्गाच्या आत असल्याचा उल्लेख गोंधळात टाकणारा आहे खरा. त्यावरून टँपॉन योनीमार्गात नसतो की काय असा अलिखित मुद्दा ध्वनित होतो, आणि संभ्रम होतो. म्हणून त्या लेखातली शब्दयोजना चुकलीच होती.
तरी :
टँपॉनच्या तुलनेने कप वापरून 'टॉक्सिक शॉक सिंड्रोम'चा धोका कमी होतो, असे कोणी मला सांगितले तर मला सहज पटेल. काही तास वापरानंतर द्रव स्राव फेकून दिला जात असल्यामुळे बहुधा टॉशॉसिंचे जंतू वाढायला मुभा मिळत नसेल. टँपॉनमध्ये शोषलेल्या स्रावातून पोषण घेऊन टँपॉनच्या शोषक जाळ्यात (नेटवर्क ऑफ सर्फेसेसवरती) टॉशॉसिंचे जंतू वाढायला जास्त जागा मिळत असेल.
जर टॉशॉसिंच्या धोक्याबाबत आत्तअ उपलब्ध असेल, तर त्याचा उल्लेख (लेखातील भ्रामक स्पष्टीकरणाशिवाय) जरूर व्हावा.
अयाचा "विदा" असा अनुवादआ केल्यास अर्थ तोच राहील.
आआंतरराष्ट्रीय एककांमध्ये काहीतरी लिहिल्यानंतर "साम्राज्यिक एककांमध्ये अमुकतमुक संख्या होते" अशी तळटीप वाचकांच्या सोयीसाठी लिहावी लागते, तसेच हे.
+१
सहमत आहे.
कपाच्या चर्चांचा बाबतीत हे आणखी महत्त्वाचं आहे, कारण अनेकींना योनीमार्गात असं काही सारताना भीती वाटते. मग तेव्हा 'टँपन वापरला आहे का', असं मी आपसूक विचारते. कप आणि टँपनमध्ये दोनच फरक आहेत, टॉक्सिक शॉक सिंड्रोमची शक्यता कपामुळे नाही (किंवा फारच कमी असेल) आणि कप काढून, रिकामा करताना किळस वाटू शकते. मलाही सुरुवातीला वाटली होती.
टँपन न वापरणाऱ्या अनेकींना कप एकदातरी वापरून पाहण्यासाठी कसं राजी करणार? तर मग कप सिलिकोनचा असतो, सिलिकोन स्पर्शाला मऊ असतं, टोचत नाही, कप तेवढ्यापुरता सहज घडी करून बारीक गुंडाळता येतो; टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा धोका नाही, वगैरे काही सांगता येतं. भारतात टँपनही किती वापरला जातो, याबद्दल मला शंका आहे. आता कदाचित परिस्थिती बदलली असेल. पण माझ्यासारख्या, जुन्या साड्यांच्या तुकड्यांपासून सुरुवात करणाऱ्या ममव मुलींनाही टँपन फार ओळखीचा वाटत नाही. त्याउलट अनेक परदेशी आस्थापना, संस्थांमध्ये टँपन सहज उपलब्ध असतात; हे पाहता पाश्चात्त्य देशांत टँपन वापरणं सरसकट चालत असावं असं वाटतं.
मूळ लेखात शास्त्रीय म्हणून जी थोडकी माहिती आहे, तीही विश्वासार्ह दिसत नाही. एक स्त्री महिन्याला किती नॅपकिन वापरते, हे नॅपकिन वापरणारीला स्वतःला माहीत असतंच. म्हणजे आपण वर्षाला किती नॅपकिन वापरतो आणि आयुष्यभरात किती वापरू, यासाठी सर्वेक्षणाची गरज अशी नाही. एक स्त्री किती कचरा करणार आणि एका महिन्यात एखाद्या शहरात नॅपकिन्सचा किती कचरा तयार होत असेल, याची order of magnitude जी गणितं असतील ती योग्यच असतील. जिथे गरज नाही तिथे सर्वेक्षणाचा भारदस्तपणा आणि जिथे काटेकोरपणाची गरज आहे तिथे ... ह्यॅह्यॅह्यॅ!
मग ज्या काही रसायनांमुळे प्रदूषण होतं, त्यांच्या नावांबद्दल, ती रसायनं कोणकोणत्या ब्रँडच्या नॅपकिनमध्ये असतात वगैरे शंका मला येतात. तो शंकासुरपणा सोडून देऊ. नॅपकिन्सच्या कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण नक्की का घातक असतं; या रसायनांचा माणसांवर काय परिणाम होतो; पर्यावरणावर काय परिणाम होतो; हे काहीच नाही. रसायन आहे म्हणून वाईट असं सरसकट जनमत दिसतं; म्हटलं तर कपासाठी वापरलं जाणारं सिलिकोन हेही रसायनच आहे. आणि सगळ्यांचं आवडतं डायहायड्रोजन ऑक्साईड हे सुद्धा रसायन आहे, पण ते पुरेसं प्यायलं नाही तर जीव जाईल.
रसायनांचा मुद्दा पाळीच्या बाबतीत आणखी निराळ्या पद्धतीनंही येतो. गर्भनियंत्रणाच्या गोळ्यांबद्दल. ते आणखीनच स्वतंत्र प्रकरण आहे!
मूळ लेखात जी लिहिली आहे ती माहिती काटेकोर नाही. आणि लिहिलेले नाहीत हे मुद्दे विचारात घेण्याएवढी महत्त्वाची गोष्टही वाटत नाही. दोन्ही बाजूंनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची, वस्तुनिष्ठतेची वानवा. मग उगाच 'पर्यावरण वाचवा'ची भावनिक आवाहनं तेवढी उरतात; म्हणून मला रोमँटिक स्त्रीवाद आठवतो; 'आपण बायकांनीच कसं जगाचं भलं केलं पाहिजे' वगैरे! मग व्यापक मुद्दा म्हणून गांधीजींची साधनशुचिताही महत्त्वाची वाटते. वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्यावरण खरोखरच वाचेल का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किॅमत
बऱ्यापैकी कंपनीचा कप भारतात आॅनलाईन १७५ ते ३०० रू त येतो.
चांगल्या दर्जाचे अल्ट्रा स्लिम वगैरे सॅ पॅ ही पाच चोक वीस घेतल्यास त्याच किंमतीला येतात.
बाकी पर्यावरणापेक्षा पॅडचं डिस्पोजल आणि फेकायचं कुठं या एका कारणासाठी मी हल्ली सुरूवातीस आवडत नसूनही कप वापरणं चालू ठेवलंय.
हल्ली आम्ही जंगलात रहातो , तिथे कचरा गाडी वगैरे सुविधा नाहीत.
रिसायकल करता येण्यासारखा प्रत्येक कचरा रिसायकल करून,,उरलेला कंपोस्ट आणि बायोगॅस बनवून,मग काही प्लास्टिक आणि हे उरतंच.
प्लास्टिकभंगार गोळा करणाऱ्या बाय घेऊन जातात, हे मला पिशवीत भरून माझ्या कामाच्या ठिकाणी घेऊन येऊन सार्वचनिक कचराकुंडीत टाकावं लागतं.
सोयीचा मामला म्हणून कप.
बाकी पोहता येतं, ऊड्या मारता येतात (त्या पूर्वीही मारायचे, पण जपून)
दुय्यम समजणं.
आत्ताच एक बाई जवळपास आठ महिन्यानंतर डायबेटिसच्या फाॅलोअपला आली. शुगर इतकी का वाढलीय विचारल्यावर दुसऱ्या गोळ्या घेतल्या म्हणाली.
दुसऱ्या का, तर नवऱ्याचा डोस हिच्यापेक्षा कमी पाॅवरचा म्हणून कमी किंमतीचा , मग ही त्याच्यापेक्षा भारीतल्या गोळ्या कशा घेणार ना, म्हणून नवऱ्याच्याच गोळ्या घेतल्या म्हणे इतके दिवस.
wow!
माझ्या आजूबाजूच्या ममव स्त्रिया असा विचार औषधांच्या बाबतीत करत नसल्यामुळे पुरोगामी म्हणाव्या लागणार!!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ममव!
ही बाई म नाही क होती आणि मव नाही चांगली जमीनदारीण होती.
अवांतर
अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (थोरला) गेल्या आठवड्यात गेला. त्याची बायको याच वर्षी एप्रिलमध्ये गेली. दोघेही वयानं बरेच मोठे होते, ९०+ वगैरे.
त्यावरून गप्पा सुरू झाल्यावर एक मैत्रीण म्हणत होती, "खूप वर्षं लग्न टिकलेल्या लोकांमध्ये पाहा; नवरा आधी गेला तर बायकोला फार अडचण येत नाही. बायको आधी मेली तर मात्र नवरा फार काळ टिकत नाही. Who will bake my pie?" (शेवटचं वाक्य अगदी यूएसच्या दक्षिणी हेलांमध्ये म्हणाली. दक्षिण यूएस बऱ्यापैकी धार्मिक पगडा असलेला, त्यामुळे पारंपरिक धारणा असलेला प्रदेश आहे; असा संदर्भ त्या हेलांमागे होता.)
तर एकटे राहणारे किंवा उत्तमार्धी असलेले पुरुष स्वयंपाक करत नाहीत; किंवा बायका एकट्या
बाहेर जाऊनबाहेरचं खातच नाहीत, असा माझा दावा नाही. मात्र असे विनोद प्रचलित आहेत.---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हिजाब
कोणी हिजाब आवडीखातर वापरतात असे म्हणत असतील, कोणी समाजाच्या नैतिक भल्याकरिता वापरतात म्हणत असतील.
त्यांना-त्यांना त्यांचे-त्यांचे प्राथमिक हेतू काय सांगायचे ते ठरवू द्या की!
आपण स्वत:करिता नव्हे तर कुठल्या उदात्त हेतूकरिता असे वागतो, असे म्हणून छान वाटत असेल. तर त्यांनी ही छानछान भावना मुकावी असा आग्रह जरूर करता येईल, पण छानछान वाटणारी व्यक्ती मानेल अशी अपेक्षा ठोस नाही.
---
"जगासाठी बलिदान करत जगणे हीच बाईच्या जातीची रीत" अशा दिखाऊ वागण्याकरिता एक गमतीदार स्पॅनिश शब्द "मारियानिस्मो" मी ऐकला आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Marianismo
आजच्या व्यक्ती काय
आजच्या व्यक्ती काय सांगितल्याने ऐकतील हा मुद्दा वेगळा. मात्र लेखिकेचं म्हणणं असं - 'सर्वसाधारण उदात्त हेतूंच्या नावे जो अपराधगंड लादला जातो त्याने वैयक्तिक आनंदाची मुस्कटदाबी होते. यासाठी एकंदरीतच 'उदात्त हेतू' हे बलच नाहीसं व्हावं.' या विशिष्ट उदाहरणात, स्त्रियांवर आधीच या अपराधगंडांचं इतकं ओझं आहे तरीही हेच बल का वापरता? असा प्रश्न आहे.
'देव, देश अन् धर्मासाठी प्राण घेतलं हाती' विरुद्ध
'Imagine there's no country, no religion too'
या दोन्ही माणसांना भूल पाडणारी आणि प्रवृत्त करणारी बलं आहेत. पैकी पहिल्याचा अतोनात वापर होतो. इतका, की वैयक्तिक आनंदासाठी एखादी गोष्ट करता येते ही मनोधारणाच शिल्लक राहात नाही.
!!
सर्वसाधारण उदात्त हेतूंच्या नावे जो अपराधगंड लादला जातो त्याने वैयक्तिक आनंदाची मुस्कटदाबी होते. यासाठी एकंदरीतच 'उदात्त हेतू' हे बलच नाहीसं व्हावं.
असं समजा की एक व्यक्ती तिला आवडतं म्हणून गावभर पायी हिंडते. असंही समजा की वैयक्तिक आनंदाचा अगदी कडेलोट म्हणजे चालताचालता ती नाटकातली स्वगतं म्हणते. आणि आता समजा की एका काळ्याकभिन्न सकाळी दिव्य मराठीत लेख आला की लोकहो, पायी चालल्यामुळे वाहनांचं प्रदूषण कमी होतं आणि पर्यावरणाला मदत होते, तेव्हा शक्य तितके पायी चाला. तर आता त्या व्यक्तीला असं वाटणार आहे का की आपल्या वैयक्तिक आनंदाची मुस्कटदाबी होते आहे?! अर्थातच नाही. ती चालायची तशीच चालत राहील. इतकं मृदुकोमल मुस्कट असणारे लोक कोण आणि कुठे असतात? की ‘दिव्य मराठी’ हा शंभर कोटी खपाचा निरंकुश आणि अतिबलशाली पेपर असून गोबेल्स त्याचा संपादक आहे अशी तुमची समजूत आहे?
विषयाचा जीव केवढा आणि त्यासाठी किती टीपेचा सूर लावायचा याचं तारतम्य हरपलेलं आहे. नॅपकिन की कप हा विषय आहे, आणि यापैकी जो पर्याय सर्वसाधारणपणे बरा वाटतो तो तसा का वाटतो (पर्यावरण की वैयक्तिक सोय की दोन्ही थोडंथोडं) इतकी ती किरकोळ बाब आहे. तर आता यात उदात्तपणा, मुस्कटदाबी, त्यागमूर्ती, हौतात्म्य, अपराधगंड वगैरे कंठाळी शब्द आणायलाच हवेत का?! आणायचे तर आणा, पण जेव्हा खरोखरीच आणीबाणीचे विषय उद्भवतील तेव्हा त्यांची चर्चा करण्यासाठी आवाज बसलेला नसेल याची काळजी घ्या मात्र. आधी मी म्हणालो होतो की ‘थंड घ्या’, पण आता म्हणावंसं वाटतं की ‘हळद टाकून गरम दूध घ्या’.
इत्यलम. आता मीच कॉफीचा कप रिकामा करून वर नॅपकिनने तोंड पुसतो. तुमचं चालू द्या.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
विषयाचा जीव केवढा आणि
नेमकं हेच जर दुसऱ्या कुणी म्हटलं असतं तर कशी मज्जा आली असती! तेव्हा चिपलकट्टी साहेबांना धन्यवाद, आत्ता कंठाळी रिप्लाय वाचणे आले.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुन्हा प्रयत्न कराच.
अर्थातच या विषयावर निरनिराळ्या व्यासपीठांवरून स्त्रिया काय बोलतात, याची तुम्हाला कल्पना नाही.
याच दिव्य मराठीत, याच पुरवणीत, याच संपादिकेनं डाॅ. शंतनू अभ्यंकर या स्त्रीरोगतज्ज्ञाकडून उत्तम लेखमाला लिहवून घेतली आहे; तिचं पुस्तक निघालं आहे, ही माहितीही तुम्हाला नसावी.
आजूबाजूला काय सुरू आहे, याची फार माहिती नसताना केलेल्या टीकेकडे किती लक्ष द्यायचं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उंटाच्या पाठीवर शेवटची काडी
उंटाच्या पाठीवर शेवटची काडी पडते, तेव्हा ती विशिष्ट काडी किती हलकी आहे हे मोजून 'इतक्या लहान वजनासाठी उंट पाठ मोडून घेत असेल तर काय म्हणावं?' असा भारदस्त युक्तिवाद करता येतो. तेव्हा त्याऐवजी तक्रार त्या विशष्ट काडीबद्दल नसून काड्या टाकत राहाण्याच्या प्रवृत्तीबद्दल आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं.
>>मात्र तीव्र विरोध करताहेत
>>मात्र तीव्र विरोध करताहेत कोण, ज्यांना कधी पाळी आलेली नाही; ज्यांना कधी डाग पडण्याची भीती समजली नाही; ज्यांना कधी कप वापरताना येणाऱ्या किळसेच्या पुढे बघण्याची गरज समजली नाही; ज्यांना कधी कप न-वापरण्याबद्दल अपराधगंड आला नाही; असे सगळे बाप्ये;
समजलं का चिपलकट्टी साहेब? तर गप्प बसा आणि महिला याबाबत जे म्हणतील त्याला मान डोलवा !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
.
प्रमाणित करण्यात येते की हा प्रतिसाद शिंकेसारखा आला, मग देण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नवीन विषय, मला संदर्भ माहीत नाहीत
कपबाबत मी फक्त मागे गौरी देशपांडे यांच्या लेखात वाचले होते. आणि हा लेख वाचताना दुव्यावरून ऋचा अभ्यंकर यांचा लेख वाचला. याअधिक कपबाबत माझे वाचन नाही. लेखिका अन्यत्र एका प्रतिसादात म्हणतात :
हे वाक्य मला उद्देशून नसले तरी माझ्याबाबत खरे आहे.
केवळ ऋचा अभ्यंकर यांचा लेख वाचून असे जाणवत नाही की त्या (ऋचा अभ्यंकर) स्वतःच्या हेतूबाबत अप्रामाणिक आहेत. किंवा हे जाणवत नाही की ऋचा अभ्यंकर अन्य हेतूंबाबत अपराधगंड लादत आहेत. निरनिराळ्या व्यासपीठांवरून चर्चांचा संदर्भ जोडला, तर बहुधा समजू शकेल, की यातील काही शब्द कोडेड-डॉगव्हिसल* आहेत. आणि त्या ध्वनित अर्थांवरून असे कदाचित म्हणता येईल की ऋचा अभ्यंकर अप्रामाणिक आहेत, त्यांचा ध्वनित अर्थ थेट अर्थापेक्षा वेगळाच, अपराधगंड लादणारा आहे... परंतु विस्तृत संदर्भांशिवाय मला ते जमत नाही.
असे जर जमत नसेल, तर ती ऋचा अभ्यंकर यांची प्रामाणिक अभिव्यक्ती मानणे हे मला क्रमप्राप्त (डीफॉल्ट) आहे. आणि या लेखातील अभिव्यक्ती सुद्धा प्रामाणिक मानणे. प्रत्येक प्रामाणिक अभिव्यक्ती एक-एक आत्त-तपशील म्हणून नोंदवावा, हेच मी करू शकतो.
त्यातही ऋचा अभ्यंकर आणि प्रस्तुत लेख यांची कप-या-वस्तूबाबत धारणा केवळ स्वतंत्र आत्तबिंदू आहेत. वस्तूविषयी धारणा वेगळी-वेगळी असली तरी त्यात परस्परखंडन नाही. त्यावरून "समाजात ज्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य सुयोग्यरीत्या अबाधित आहे, अशा लोकांच्यामध्ये अशा-अशा धारणा आहेत" असे चित्र मनात तयार करू शकतो.
मात्र ऋचा अभ्यंकर यांची प्रस्तुत लेखिका यांच्याबाबत धारणा, प्रस्तुत लेखिका यांची ऋचा अभ्यंकर यांच्याबाबत धारणा स्वतंत्र आत्तबिंदू नव्हेत तर परस्परसंबद्ध तपशील आहेत. जोपर्यंत ऋचा अभ्यंकर आणि प्रस्तुत लेखिका एकमेकांचे स्वस्वीकृत धारणास्वातंत्र्य (टीकेपुरतेसुद्धा) मर्यादित करत नाहीत तोपर्यंत तेही माहिती म्हणून नोंदवणे सोपेच. मात्र जर परस्परखंडन होत असेल, तर त्या खंडनाची सोय माझ्या माहितीगारात लावावी लागते.
ऋचा अभ्यंकर यांच्या लेखात वैयक्तिक सोयीविरुद्ध कुठलाच स्पष्ट विरोध नाही, इतकेच काय दुय्यम समर्थनही आहे. ऋचा अभ्यंकर यांचा लेख व्यक्तिगत सोयीची स्वायत्तता (autonomy) मर्यादित करत नाही.
परंतु प्रस्तुत लेखात एक सुस्पष्ट धागा असा आहे, की ऋचा अभ्यंकर यांची धारणा अयोग्य आहे. तर प्रस्तुत लेख ऋचा अभ्यंकर यांची स्वायत्तता (autonomy) टीकेपुरती अरी मर्यादित करतो.
प्रस्तुत लेखातून मला मुद्दे समजून आले नाहीत की ऋचा अभ्यंकर ध्वनित-गर्भित रूपाने वैयक्तिक सोयीची धारणा असायची स्वायत्तता मर्यादित करत आहेत. (आरोप आहे, पण स्वायत्ततेवर मर्यादा कशी येते, ते स्पष्ट करणारे मुद्दे नाहीत.)
माझ्या प्रतिसादापुरते म्हणावे तर... ऋचा अभ्यंकर यांची डॉगव्हिसल समजून आल्याशिवाय मला ऋचा अभ्यंकर यांच्या स्वायत्ततेत (टीका मान्य करण्यापुरती) बाधा आणणे योग्य वाटत नाही.
---
(*डॉगव्हिसल : शब्दाचा ध्वनित-लाक्षणिक अर्थ विवक्षित उपसमाजात लोकांना स्पष्ट माहीत असतो, परंतु सामान्य प्रचलनातला शब्दार्थ साधा सोपाच असतो.)
प्रतिसाद
फार क्लिष्ट वाटतो. तुमचे प्रतिसाद दुर्मिळ असतात त्यामुळे ते मी आवर्जून वाचतो. पण प्रतिसाद डायरेक 010111 असा बायनरीत लिहिल्याप्रमाणे सपशेल उडून गेला.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
:-)
तुमचे म्हणणे मान्य आहे, पण माझी द्विधा परिस्थिती आहे.
इथे प्रतिसादकांना संताप आलेला आहे (असे लेखनाच्या शैलीत जाणवते), त्यामुळे गैरसमज होणे सहजच.
आणि त्यामुळे heretofore, nevertheless वगैरे सर्व कलमे-उपकलमे टाकून लिहिले आहे.
ती उपकलमे न-लिहिली तर न-लिहिलेले तेच माझे मत असा उपप्रतिसाद येण्याचा धोका. उपकलमे लिहिली तर युक्तिवादाचा धागा तुटून समजणे अशक्य होते.
इथे प्रतिसादकांना संताप आलेला
मला हे कळत नाही जरा कुठे खुट्ट झालं की प्रतिसादकांना संताप येतोच का अरे प्रत्येकाची लेखनाची शैली असते. अदिती मुद्दा ठासुन मांडते, ती एकांगी स्त्रीमुक्तीवादी आहे. पण ती तिची शैली आहे. त्यात इतक्या लोकांना संताप येण्याचे कारणच नाही. पब्लिक फोरम आहे. इथे सर्व प्रकारचे लोक असणार.
.
अदितीच्या जागी पुरुषाने ठासुन मुद्दे मांडले असते तर कोणीही आक्षेप घेतला नसता - असे मला वाटते. या 'जर-तर' च्या उहापोहात काही फायदा नाही हे मी जाणते. आणि तरीही हे मांडावेसे वाटते.
तूच गो, तूच.
याबद्दल तुला पुन्हा एकदा लौव यू, शुचे. तूच माझी खरी मैत्रीण.
'एकांगी स्त्रीमुक्तीवादी' या शब्दांमधल्या भावनेवर माझा आक्षेप नाही; मात्र शब्दांवर आहे. मी व्यक्तिवादी आहे. व्यक्ती असण्यासोबत मी एक स्त्रीसुद्धा आहे; मग स्त्री म्हणून जे फायदे-तोटे, संदर्भचौकटी, जे काही (बॅगेज) यायचं ते येतं.
स्त्रिया व्यक्तिवादी झाल्या तर त्यातून सुबुद्ध पुरुषांचा स्त्रियांएवढाच फायदा होईल, हे सिमोन दी बोव्हारचं मत मला मान्य आहे. हे मत बाळगल्यामुळे बुद्धिमान पुरुष कोण, हे शोधणं फार सोपं होतं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
थोडक्यात
थोडक्यात :
ऋचा अभ्यंकर यांचा मेन्स्ट्रुअल कपबाबत लेख आहे.
अदिती म्हणतात, की ऋचा अभ्यंकरसारखे लोक जे बोलतात त्यांच्यामुळे छुपा परिणाम होतो. फक्त व्यापक भल्यासाठी काही केले तर बाईला करायची मुभा असते. वैयक्तिक सोय बघण्याबाबत बायकांना अपराधी भावना येते.
मी ऋचा अभ्यंकर यांचा लेख वाचला. बाईने वैयक्तिक सोय होते याबाबत त्यांचे दुय्यम समर्थन आहे. समर्थन दुय्यम आहे, म्हणजे विरोधच आहे, हे मला पटले नाही. हा लेख वाचून स्वत:च्या सोयीसाठी कप वापरणाऱ्या बाईला अपराधी भावना येऊ नये.
अदिति वेगळ्या प्रतिसादात म्हणतात की वेगवेगळ्या फोरमवरती चर्चा झाल्या आहेत, त्या माहीत हव्यात. त्या संदर्भाने कळेल की ऋचा अभ्यंकर लिहितात त्यात बाईने सोय बघण्याबाबत अपराधी भावना आहे.
त्या चर्चा मला माहीत नाहीत, याची कबुली मी प्रतिसादाच्या सुरुवातीला दिली आहे. हे संदर्भ दिले असते, आणि त्यानुसार ऋचा अभ्यंकर यांच्या लेखात छुपे अर्थ मोकळे करून सांगितले असते, तर मला समजले असते, अशी कबुली दिलेली आहे.
हे छुपे अर्थ माहीत नसले तर मी काय विचार करणार? ऋचा अभ्यंकर यांनी त्यांना हव्या त्या कारणासाठी कप वापरावा आणि वापराबाबत प्रचार करावा. अदिती यांनी त्यांना हव्या त्या कारणासाठी वापर आणि प्रचार करावा. ही त्यांची-त्यांची स्वायत्तता आहे. एकमेकांवर कुरघोडी केल्याशिवाय दोन्ही प्रकारचे वापर आणि प्रचार होऊ शकतात.
तुम्हाला पाळी येत नसल्याने*
तुम्हाला पाळी येत नसल्याने* तुम्हाला या विषयात मत व्यक्त करण्यास बंदी आहे.
*टु द बेस्ट ऑफ माय नॉलेज & बिलीफ
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
म्हणूनच तर ऋचा अभ्यंकर यांचा सुस्पष्ट उल्लेख
म्हणूनच तर जिथे-जिथे "पाळीचा कप"बाबत मत आहे, तिथे ते मत इथल्या लेखाचे किंवा ऋचा अभ्यंकर यांचे आहे, असा स्पष्ट उल्लेख केला आहे.
पाळीच्या कपाबाबत माझे कुठलेच मत मी दिलेले नाही.
विनोदी पण गंभीर मुद्दा आहे
तुमचा मुद्दा विनोदी पण तसा गंभीरही आहे.
"प्रत्यक्षानुमानोपमानशब्दाः प्रमाणानि" हे न्यायसूत्र मला चांगले सोयीचे वाटते.
तथ्याबाबत ज्ञान मिळवण्याकरिता जी साधने (प्रमाणे) आहेत, त्यांचे चार वर्ग आहेत : प्रत्यक्ष, अनुमान (deductive logic), उपमान (induction or analogy) आणि शब्द (कोणी सांगितलेली विधाने, सांगणाऱ्याचा हेतू-वगैरे संदर्भात ठेवून).
या चार वर्गांतल्या प्रमाणांचे क्रमाने कमी वजन होते. प्रत्यक्ष अनुभव हे प्रमाण म्हणून सर्वाधिक पटणारे असते, हे खरेच आहे.
शक्यतोवर माझ्या युक्तिवादातली विधाने चारपैकी कुठल्या वर्गातली आहेत ते पारदर्शकपणे कळावे, अशी वाक्यरचना मी करायला बघतो. जमतेच असे नाही.
कपाच्या वापराबाबत "प्रत्यक्ष" हे सर्वाधिक वजनाचे प्रमाण वजन मी माझ्या युक्तिवादात वापरलेले नाही. पण अदिति आणि ऋचा दोघांनी त्यांच्या-त्यांच्या लेखांत प्रत्यक्ष प्रमाण वापरलेले आहे -- ते तपशील माझ्याकरिता दोन्ही "शब्द"वर्गातील प्रमाणेच होत, म्हणून तसे-तसे उल्लेख केलेले आहेत.
लौव यू.
धनंजय, लौव यू. त्रिवार लौव यू.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अधिक जवळच्या व्यक्तींवर आणखी टीका.
नाही, नाही... 'तोफे'चा रोख संपादिकेकडे आणि तिच्यासारखी समज असणाऱ्या स्त्रियांकडे आहे. संपादिका खरोखरच जवळची आहे. तिनं डॉ. शंतनू अभ्यंकरांचे लेख छापलेले असल्यामुळे तिच्याकडून अपेक्षा करणं रास्त आहे, असं वाटतं. त्यांत डॉक्टर स्त्रियांचं शरीर, पाळी, स्त्रियांचे रोग-विकार याबद्दल अतिशय स्पष्ट, स्वच्छ आणि अपराधगंड-विरहीत भूमिका घेतात.
अपराधगंड-विरहीत म्हणजे काय? पाळी म्हणजे काही वाईट, अपवित्र असे अनेकींचे समज असतात; किंवा पाळी म्हणजे केवढा उपद्रव अशी बऱ्याच स्त्रियांची भूमिका असते. पाळी नाकारण्याचा पर्याय स्त्रियांना नाही (पाळी आणण्याचा पर्याय पुरुषांना नाही); पाळी नकोच असेल तर जे औषधोपचार, ऑपरेशनं वगैरे असतात ती सरसकट केली जातात असंही नाही. थोडक्यात पाळी ही आयुष्याची अपरिहार्यता, एक भाग आहे; पुरुषांना दाढी-मिशी करावी लागते तशी आपल्याला गळणाऱ्या रक्ताची सोय करावी लागते, माफक त्रास इतपतच, अशा दृष्टिनं बघणारं लेखन स्त्रियांकडून होताना दिसत नाही. डॉ. अभ्यंकरांचे लेख तशा प्रकारचे असतात. हे-असं-आहे; पाळीचा त्रास होतो तसं त्या हॉर्मोन्समुळे शरीराचं रक्षणही होतं; अशा प्रकारचा सूर डॉक्टरांच्या लेखात असतो. शिवाय शास्त्रीय माहिती अगदी साध्या, सोप्या, रसाळ पद्धतीनं या लेखांमध्ये आहे.
भारतात लेडीज पार्लरमध्ये गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला यातली गंमत समजेल; डॉक्टरांच्या लेखांचं प्रकाशित झालेलं पुस्तक संपादिकेनं तिच्या नेहमीच्या पार्लरमध्ये ठेवलं आहे. 'गृहशोभिका' आणि त्यातले सासूला इंप्रेस करण्याचे सल्ले यांच्या जोडीला डॉ. अभ्यंकरांच्या लेखांचं पुस्तक ठेवणाऱ्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून झालेला सात्त्विक संताप म्हणजे हा लेख आहे.
हे लेख जिथे छापले गेले, तिथे अशी अशास्त्रीय माहिती आणि 'पर्यावरणासाठी करा' असा भावनिक संदेश बघून, जिथे फुलं वेचली तिथे गोवऱ्या का वेचायला लावतेस, अशी भावना झाली.
ऋचा अभ्यंकर यांचं इतर काहीही लेखन मी वाचलेलं नाही. माझे इतर संदर्भ आहेत ते स्त्रिया कपाबद्दल काय चर्चा करतात याचे. फक्त स्त्रियांची संस्थळं असोत, फेसबुक समूह असोत वा फेसबुकच्या भिंती. कप फक्त कप म्हणून येत नाही; त्याबरोबर कापडाचे सॅनिटरी नॅपकिन्स येतात; पर्यावरणाची चिंता येते. "कोरड्यात करा मजा" असा कुठलाही सूर या लेखनात दिसत नाही; "पाळी म्हणजे त्रास; पर्यावरणाचा ऱ्हास" (आयला, ही कविताच झाली की. अण्णा बघा!) असं आपणच का म्हणावं? ही आपल्या शरीराची अपरिहार्यता आहे, मग अगदी मजा नाही तर आहे ते किमान सुसह्य करण्याचा प्रयत्न करू, असाही सूर, प्रयत्न स्त्रियांच्या लेखनांतून दिसत नाही.
स्त्रियांच्या एका फोरमवर मी हेच म्हटलं, "बायांनो, जर तुम्हाला माफक कंबरदुखी किंवा नियमित रक्तस्राव वगळता बाकी फार त्रास नसेल तर का एवढी तक्रार करता? पीएमएस हा प्रकार चार दिवस वजन वाढणं आणि मुरमं-पुटकुळ्यांपुरताच असेल तर असू दे बापडा! त्यानं आपल्या रोजच्या जगण्यावर काय मोठासा फरक पडतो?" त्यावर अगदी मर्यादित स्त्रियांनी (म्हणजे एक) या दृष्टिकोनाचं स्वागत केलं आणि बाकी बहुतेकींचा (म्हणजे ४ नंतर मी वाचणं सोडून दिलं) पुन्हा तक्रारीचा पाढा वाचला. ज्यांना मूड स्विंग्जचा, भीषण कंबरदुखीचा किंवा खूप रक्तस्रावाचा त्रास होतो, त्यांनी तक्रार करणं रास्तच आहे. पण सगळ्यांना नाही हो एवढा त्रास होत! मग त्यांचा आवाज कुठेच का नसतो? पाळी म्हणजे सगळ्या बायकांना बळी पडल्याचा गंड देणारा नैसर्गिक कावा नाही. पण ती बळी पडण्याची, आणि फक्त तेवढीच भावना येते; ती स्त्रियांच्या लेखनांतून दिसते.
पर्यावरणाच्या सुराबद्दलही बोलायचं तर, माझ्या परीघातल्या सगळ्या स्त्रियांना हे कारण मान्य आहेच; एकीनंही 'खड्ड्यात गेलं पर्यावरण, मी हौसेहौसेनं रसायनं जमिनीत ओतणार' अशी भूमिका घेतलेली नाही. मात्र दिवसभर चार भिंतींबाहेर असणं, फिरतीच्या नोकऱ्या-व्यवसाय, भारतात प्रसाधनगृहांची वानवा यांमुळे इच्छा असूनही कप वापरणं शक्य होत नाही. याबद्दल स्पष्ट बोलणाऱ्याही पाळी या प्रकाराबद्दल मोठ्यानं तक्रार करणाऱ्यातल्या नाहीत; या स्त्रिया आपण स्त्री असण्याबद्दल तक्रारखोरी करत नाहीत. या स्त्रियांनाही पर्यावरण, घातक रसायनं वगैरे सगळं समजतं. (ते समजतं म्हणूनच अपराधगंडाचा घोळ होतो!) मात्र जिथे सॅनिटरी नॅपकिन धड बदलता येत नाही, तिथे कप कुठून वापरणार? मग कपाचा प्रचार तर करायचा मात्र अपराधगंड येऊ नये, यासाठी आणखी पर्याय काय? 'तुम्हाला सोयीचं असेल तेव्हा वापरा, नसेल सोय तेव्हा पर्यावरणाचं सोडा. आधी स्वतःची सोय पाहा', असं म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.
अर्थात, अपराधगंड घेऊ नका, हे म्हणायला माझ्या बापाचं काय जातं! तसे पुरुषही येऊन परंपरा सांभाळत, आमच्या शरीरांबद्दल "तुम्ही अमक्या प्रकारची साधनं पाळीसाठी का वापरत नाही" म्हणून
टप्पूसल्ले देऊन जातात. मात्र जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. मला अपराधगंड येत नाही, म्हणून इतर कोणालाही येत नाही असं अजिबातच नाही. त्याही अप्रामाणिक नाहीत. मग लिहित्या आणि कप वापरत्या स्त्रियांनीही पुरुषप्रधानतेच्या (काहीही आकलन नसताना सल्ले देण्याच्या) उद्दाम परंपरेचं पालन का करावं; जिथे आपला अधिकार नाही तिथे नाक का खुपसावं?म्हणून कपाच्या बाबतीत वैयक्तिक सोयीचं समर्थन दुय्यम नाही, प्राथमिक पातळीवर असायला पाहिजे. जमलं तर कप वापरा; त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास कमी झाला ही वरकड कमाई. (हे कपाच्याच बाबतीत. समजा कोणी घातक रसायनविरहीत नॅपकिन्स काढले, ते जाळून त्यातून पुन्हा ऊर्जा निर्माण केली किंवा कंपोस्ट तयार केलं तर पुन्हा पर्यावरणाची गणितं आणखी किचकट होतात.)
धनंजय, तूच जो बुरख्याचा मुद्दा मांडलेला आहेस ... मला बुरखा वापरणं व्यक्तिगत पातळीवर मान्य नाही. मात्र दुसऱ्यांनी कसे कपडे वापरायला पाहिजे, हे सांगणारी मी कोण? व्यक्तिगत पातळीवर लोकांना निर्णयस्वातंत्र्य असावं; त्यांचं त्यांनी ठरवावं; व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्द्याला विरोध करणं हे काम फक्त सनातनी लोकांचं असतं. व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच ही धार्मिक आणि पारंपरिक लोकांची मोनॉपोली आहे. जसं तरुण मुलामुलींवर लग्नासाठी दबाव येतो, तसं कपाबद्दल होऊ नये; कपामुळे माझ्या आयुष्याची प्रत सुधारलेली आहे, म्हणून मला कपाबद्दल अधिक प्रेम आहे.
ऋचा अभ्यंकरांबद्दल, बाकी काहीही पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे, फारशी तक्रार नाही. खरं तर तक्रार आहे ती जवळच्या मैत्रिणीबद्दल वाटणाऱ्या आपुलकीमुळे आणि मोठ्या प्रमाणावर दिसणाऱ्या स्त्रियांच्या दृष्टिकोनाबद्दल. ऋचा अभ्यंकरांचा लेख निमित्त आहे.
(धनंजय, तुझ्या वरच्या एका प्रतिसादात गौरी देशपांडे असा उल्लेख आहे. तो गौरी दाभोळकर असा हवा.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चांगले संदर्भ-स्पष्टीकरण
आणि हिजाबच्या उपमेचा अर्थ बरोबर समजल्याबद्दल +२
योगायोग
त्यागी बायकांना लेखामध्ये 'त्यागमूर्ति' असे म्हटले आहे. योगायोगाची गोष्ट अशी की गेली कित्येक दशके मी आमच्या सौ.ना 'के. त्यागमूर्ति' - K for Kolhatkar' असे अभिधान देत आलो आहे!
हा कप पुर्षाने डिझाइन केलाय
हा कप पुर्षाने डिझाइन केलाय का? तसं असेल तर त्याचं डिझाइन नक्कीच चुकलं असणार !!!
-आपला नम्र भुसनळा
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आक्रस्ताळेपणा
मुद्दे असतात पण आक्रस्ताळेपणामुळे
प्रतिसादाची उर्मीच संपते.
असो
तथास्तु.
हे असंच इथल्या बाळबुद्धी आडमाप बाळकांचं होवो आणि त्यांची रडारड बघण्याची वेळ कुण्णा-कुण्णावरही न येवो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
भारतीय पुरुषाचा एक अनुभव...
भारतीय पुरुषाचा एक अनुभव...
Approximately 70% of all
.
.
.
.
बापरे. काय काय केले या व्यक्तीने.
.
परवाच वाचलेलं की 'गुगल' ही कंपनी एका गुणाला सर्वोच्च मान देते, किंमत देते, -
कुतुहल
या माणसाकडे त्या गुणाची खाण आहे.
गंमत
जी शेवटची काडी जिच्यामुळे पडली, त्या मैत्रिणीला हे दाखवलं. दिव्य मराठीच्या मधुरिमाची संपादिका. तिला हे पटलेलं असेल वा नसेल, तिच्याकडून तीव्र प्रतिक्रिया नाही. इथे स्त्री-आयडींच्या तीव्र प्रतिक्रिया नाहीत. फेसबुकवर तीव्र विरोधी प्रतिक्रिया सोडाच, उलट काहींना हे फारच आवडलं.
मात्र तीव्र विरोध करताहेत कोण, ज्यांना कधी पाळी आलेली नाही; ज्यांना कधी डाग पडण्याची भीती समजली नाही; ज्यांना कधी कप वापरताना येणाऱ्या किळसेच्या पुढे बघण्याची गरज समजली नाही; ज्यांना कधी कप न-वापरण्याबद्दल अपराधगंड आला नाही; असे सगळे बाप्ये; ह्या गोष्टी ज्यांच्या आयुष्याचा भाग वगैरे नाहीत. ज्यांना रधों किंवा अरुणाचलम मुरुगनाथमसारखी 'इतरां'ना किंवा 'अन्य' लोकांप्रती तळमळ नाही.
थोडक्यात ज्यांना हा विषय घंटा काही समजत नाही, त्यांतले काही
टणटणाटतीव्र विरोध करत आहेत. हा विषय ज्यांच्या आयुष्याचा भाग आहे, त्या त्याबद्दल चर्चा करत आहेत.पण तरीही, पुरुषांना स्त्रिया काय म्हणत आहेत हे समजत नाही, हेही समजत नाही; असं म्हणायचं नाही हं. तथाकथित स्त्रीवादी गळा काढून रडतील आणि न मागितलेला पाठिंबा काढून घेतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कप हे निमित्त आहे तू जो
कप हे निमित्त आहे तू जो हौतात्म्यषौकाचा मुद्दा मांडला आहेस तो माझ्या लक्षात आलेला नव्हता. तो लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
तूच गं माझी मैत्रीण!
तुला कळला गो, तुला मुद्दा कळला.
निदान स्त्रीवादी बाईनं बायकांना हौतात्म्यासाठी भरीस पाडू नये, इतपत अपेक्षा होती. कप हे निमित्त झालं; कपासाठी हा लेख हे निमित्त झालं. कपाचं निमित्त करणंही सोपं आहे, low hanging fruit, कारण पाणी आणि प्रसाधनगृहं व्यवस्थित असतील तर कप वापरणंही अतिशय सोयीचं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Kimmy Schmidt
Unbreakable Kimmy Schmidt या माझ्या लाडक्या नेटफ्लिक्स मालिकेचा kimmy is a feminist हा भाग आठवला. (S3 E6)
उदे उदे!
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
हाफ सेंचुरीबद्दल अभिनंदन.
हाफ सेंचुरीबद्दल अभिनंदन.
शत्रूला वाचायला देतो लेख. माझा पास.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तू ही रे ...
'शत्रू'गटातल्या लोकांसाठीच लिहिलंय. अ-शत्रू उगाच चेकाळलेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो, शत्रूने ह्या चर्चेतून
हो, शत्रूने ह्या चर्चेतून जाऊन गौरी दाभोळकरांचा लेख वाचला आणि आधीच कप वापरायचा विचार आता बळावला आहे.
---
शत्रूचं वैयक्तिक मत आहे की पॅड्सपेक्षा कप शरीराला जास्त चांगला आहे. डिटेल्स वगैरे मी विचारले नाहीत, भांडी धुताना काय काय करायचं माणसाने?
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हा हा हा
शत्रूला नैतिक पाठिंबा किंवा ट्रिक्स हव्या असतील तर मी एका पायावर तयार आहे.
तू माणूस आहेस का अस्वल?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कप हा पर्यावरण पूरक आहे
कप हा पर्यावरण पूरक आहे म्हणून तो वापरा या म्हणण्यात
१. कपचा पर्याय उपलब्ध नसेल तरीही 'पर्यावरणाला घातक आहे' म्हणून पॅड वापरू नयेत असे दिव्य मराठीवरील लेखात सूचित केले आहे असे वाटते का?
२. कप सोयीचा नसता आणि पॅडपेक्षा वाईट पर्याय असता तरी पर्यावरणाला चांगला म्हणून पॅड ऐवजी सोयीचा नसलेला/त्रासदायक असलेला कपच वापरावा असं त्या लेखिकेने सुचवले असते असे म्हणण्यास काही आधार आहे का?
थोडक्यात
"तुमची सोय/कम्फर्ट महत्त्वाचा नाही; पर्यावरण महत्त्वाचे आहे" असा दिव्य मराठीतील लेखिकेचा दृष्टीकोन आहे असा आरोप करण्यास काय आधार आहे?
कप पर्यावरण पूरक नसता तर कप सोयीचा असूनही तो वापरू नका असा सल्ला दिला असता का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
थत्तेचाचा, तुम्ही आता या
थत्तेचाचा, तुम्ही आता या विषयावर थोडे थांबाच. आपण एक धुवून परत परत वापरण्याचा निरोध शोधून काढू आणि तो सापडल्यास चर्चेस एलिजीबल होऊन परतू. कसें?
निरोध बायोडिग्रेडेबल असतो
निरोध बायोडिग्रेडेबल असतो वाटत नाही. धुवुन परत वापरणारा निरोध नक्की पर्यावरणपूरक असेल.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
घ्या, म्हणजे निरोध
घ्या, म्हणजे निरोध वापरण्याच्या क्षणीही पर्यावरणाचा विचारच केला पाहिजे असंच ना? निव्वळ सुख(की सोय) हे पाप आहे का? छे, कंटाळा येतो असे विचार मांडणारे लोक बघून.
असे विचार मांडणारे लोक (धुवून
असे विचार मांडणारे लोक (धुवून वापरा, त्या वेळीही पर्यावरणाचा विचार करा)हे सर्वसाधारणपणे पर्यावरण प्रेमी नसावेत असा अंदाज. असले विचार मांडून पर्यावरण व पर्यावरणवादी यांची (निरोध न वापरता ) मारता येते.
पण रीसायक्लेबल असेल बहुतेक.
पण रीसायक्लेबल असेल बहुतेक. व्हल्कनाइज करून मोठे फुगे बनवता येतील. गेलाबाजार खोडरबर तरी बनवता येईलच.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अशा खोडरबरांवर रबराच्या
अशा खोडरबरांवर रबराच्या सोर्सबद्दल माहिती छापली तर लोक विकत घेतील का?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
व्हर्जिन रबर विरुद्ध संसारी
व्हर्जिन रबर विरुद्ध संसारी रबर.
चोप्य-पस्ते का लिंकाळ?
वर धनंजयला दिलेले दोन मोठे प्रतिसाद इथे पुन्हा डकवू का त्यांच्या लिंका डकवू, म्हणजे काय तो मान राखला जाईल का कसं, का कसंही?
थोडक्यात, आधी टंकलेलं वाचा. त्यापेक्षा वेगळे, निराळे, स्वतंत्र, स्वायत्त, नवीन, इत्यादी काही प्रश्न असतील तरच त्यासाठी टंकनाचे नव्यानं कष्ट घेईन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उत्तम लेख आणि चर्चा!
उत्तम लेख आणि चर्चा! हुतात्म्यशौका चा मुद्दा तर अगदी पटला!
पाहुणे आले कि टाकाऊ ताटं-पेले वापरतांना, किंवा डब्यासाठी रोज एक झिपलॉक वापरताना, बाहेरून प्लॅस्टिकच्या डब्यातून तयार जेवण आणवतांना ह्यांना पर्यावरण आठवत नाही. तिथे "मी कशी स्वतःची सोय बघते" हे विधान असतं. फक्त नेमकं जिथे पाळीच्या बाबतीत कठीण, तिथे अपराधी वाटून घेण्यात आनंद! ज्या सजग, स्पष्टवक्त्या स्त्रिया इतरवेळी अतिशय ठाम भूमिका घेत असतात, त्यांनी पाळी बद्दल मात्र त्याच प्रतिगामी शैलीने लिहावं, ह्याची चीड येणे स्वाभाविक आहे.
पाळीचा अनुभव, स्त्री असण्याचा अनुभव, ह्या विषयावर https://nyti.ms/2Anorkj इथे चांगलं वाचलं.
पूर्वी मावश्या काकवांच्या गप्पांमध्ये "जास्तीत जास्त त्यागाची" जशी चढाओढ असायची, तशी आता "जास्तीत जास्त सोयी" ची चढाओढ असते. पण मुळात फार कमी बायकांना "बळी" आणि "कानपिळी" ह्या दोनच्या पलीकडे जाणारे तिसरे चौथे पाचवे पर्याय दिसतात.
कॅडॅक
चहा कडक होता. कप डीग्रेडेबल (असावा) आणि वादळ नव्हतंच.
>>>पर्यावरण वगैरे मोठमोठे
>>>पर्यावरण वगैरे मोठमोठे शब्द योजून, ज्यांना कप वापरणं शक्य नाही अशा स्त्रियांना आपण उगाच अपराधगंड देत असतो, याची जाणीवही हौतात्म्यषौकीनांना नसावी. बऱ्याच स्त्रिया मुंबईसारख्या शहरात फिरतीच्या नोकऱ्या करतात. हे तेच जागतिक दर्जाचं शहर जिथे 'राईट टू पी' नावाचं आंदोलन चालवावं लागतं. मग भविष्यात महासत्ता बनणाऱ्या देशातली दुय्यम दर्जाची शहरं आणि गावखेड्यांतल्या गोष्टी सोडूनच देऊ. जिथे धड मुतायची सोय नाही, तिथे कपाचा हट्ट कुठून धरायचा? मारे पर्यावरणाबद्दल बोलताय, पण शेजारच्या बाईबद्दल सहानुभूती नाही, ना तिच्या व्यावहारिक अडचणींची कल्पना! <<<
याबद्दल प्रचंड धन्यवाद. माझा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी मी इतर उपाय वापरीन. इकोफ्रेण्डली सॅनॅच्या संशोधनासाठी देणगी देईन. प्रवास, फिरती असतेच. त्यात आधीच भरपूर त्रास होत असतो. आता तो अजून वाढेल. त्यामुळे उरल्यासुरल्या दोनचार वर्षांसाठी मी तरी कपाकडे जाणार नाही.
तरी कप वापरणे यात जरा काही लॉजिक तरी आहे.
कापडे वापरा म्हणणारे बाप्ये तर मला निव्वळ विनोदीच वाटतात. आपल्या बायडीची, मैत्रिणीची, बहिणीची, मुलीची कापडे धुवायला हे येणार नसतात. तेव्हा पर्यावरणासाठी म्हणून ठणाणा दुखत असतानाही जास्तीचे धुणे धुवा हे थोबाड उचकटून म्हणूच नाही.
- नी
इंपोर्टेड कवतिकं.
कापडं वापरण्याचं कौतुक भारतात इंपोर्टेडच असणार. मला अजिबात हौस नाहीये पुन्हा कापडं वापरत बसण्याची. ज्यांना पर्यावरणाची काळजी आहे त्या बाया-बाप्यांनी संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं किंवा स्वतः करावं; मी अश्मयुगात राहायला जाणार नाही. भारतात पाणी आणि विजेचीही बोंब; त्यामुळे पुन्हा कापडं वापरा आणि ती मशीनमध्ये टाका असा पर्यायही असेलच असं नाही.
नीधप, अपराधगंडाबद्दल विचार करताना तूच सर्वप्रथम माझ्या डोक्यात होतीस. तुझ्यासारख्या व्यक्तीला पर्यावरणस्नेही म्हणायचं नाही तर आणखी काय! पण जर तुलाही कप वापरणं अशक्य वाटत असेल तर याचा अर्थ व्यवस्था पार हुकलेली आहे; त्याचा दोष तुझ्यावर, तुझ्यासारख्या व्यक्तींवर ढकलणं साफ चूक आहे. अशा छापाची फेसबुक पोस्ट्सही बघितलेली आहेत; 'काय तुम्ही कप वापरत नाही, म्हणजे तुम्ही पर्यावरणाची वाट लावता!' असं अगदी थेट लिहीत नाहीत; पण आशय तसाच असतो. तुझ्या बाबतीत विशेषतः 'नदी वाहते' सिनेमाचं ट्रेलर बघूनही तुझे विचार आणि कृती काय आहेत, हे सहज दिसतं.
कपाबद्दल लिहिताना कप वापरणं "कित्ती सोप्पं असतं" वगैरे कवतिकंही का-ही-ही असतात. नॅपकिन वापरण्याएवढं सोपं खरोखरच काही नसतं. १३-१४ वर्षांच्या कोवळ्या मुलीला कप वापरण्याची भीती वाटली तर तिच्या मागे लागू नका, असं मीही म्हणेन. मुद्दाम लहान मुलींना भीती घालू नये, हे ठीक.
पर्यावरणासाठी मी एवढे कष्ट का घ्यायचे, एवढी किळस का वाटून घ्यायची, याची उत्तरं माझ्याकडे नाहीत. मी स्वतःसाठी सहन करेन तो त्रास! पर्यावरण वगैरेंची कवतिकं मला इतरांनी सांगू नयेत.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लौच तुला!!
लौच तुला!!
कप वापरणं सोप्पं असूही शकतं. सगळ्या बेसिक सुविधा उपलब्ध असतील तर कदाचित ते सगळ्यात सोप्पेच असेल. पण तू म्हणालीस तसं, टिनेजर मुलींना कपाचा आग्रह करणं अयोग्यच. तितकेच २५-३० वर्ष सॅनॅ वापरून झाल्यावर प्री/पेरी मेनॉपॉज आणि प्रत्यक्ष मेनॉपॉज यातल्या सगळ्या डोकेदुखी झेलत असताना अजून एक काहीतरी नवीन गोष्ट वापरायचा आग्रह धरणं तो ही पर्यावरणाच्या पायी हे ही अयोग्यच वाटते.
आवश्यक, सेमी-आवश्यक, जास्तीच्या वस्तू, टाळता येण्यासारख्या वस्तू, चैनीच्या वस्तू यात जर आवश्यक वस्तूंना पर्यावरणस्नेही नाहीत म्हणून वापरू नये म्हणणे हे शुद्ध वेडेपणाचे आहे.
बाकी बायकांचे आयुष्य ज्या ज्या गोष्टींमुळे थोडे सुखावह होते त्या सगळ्या गोष्टी एकतर संस्कृती नाहीतर पर्यावरण बुडवणाऱ्या कश्या काय निघतात ही एक गंमतच आहे.
- नी