Skip to main content

फ्रॅक्चर्ड फ्रीडम आणि काही नोंदी

काही दिवसांपुर्वी मी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे कोबाड गांधी यांचं प्रिझन मेमॉयर/ आत्मकथन वाचलं. त्याबद्दलच्या आणि ते वाचून काय वाटलं त्याच्या या नोंदी.

काहीतरी वाणसामान आणायला किंवा सलूनमध्ये केस कापायला म्हणून तुम्ही घराबाहेर पडून बाजारात गेलात आणि दिवसाढवळ्या साध्या कपड्यात असलेल्या चार पाच हट्ट्या-कट्ट्या माणसांनी तुम्हाला पकडून एका गाडीत कोंबून दूर कुठे तरी नेऊन दोन दिवस अज्ञातवासातच ठेवलं तर? त्या माणसांची भाषा तुम्हाला समजत नसेल आणि तुमची त्यांना... तर तुमच्यासोबत नेमकं काय केलं जाणार आहे, हेही तुम्हाला कळू शकणार नाही, तुम्ही नेमके कुठे आहात, हे लोक कोण आहेत? हेही तुम्हाला कळायला मार्ग नाही, अशा स्थितीत काही तास कंठणं याची केवळ कल्पना करून पहा. त्यातही तुम्ही अगदी ‘हाय प्रोफाईल’ बुद्धीजीवी आहात, म्हणून तुमच्या अशा अचानक गायब होण्यानंतर मीडियात बातम्या येऊ लागल्या, सामाजिक वर्तुळात चर्चा होऊ लागल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला कोर्टासमोर हजर केलं आणि तेव्हा तुम्हाला अमुक एका खटल्यात नुकतीच अटक केलेली आहे, असं कळलं तर? आणि हा अमुक खटला युएपीएचा असला तर?

Kobad Ghandy Image

आता आणखी एक विचार करून पहा. तुम्ही खूप श्रीमंत, नाव असलेले बुद्धीजीवी आहात, म्हणून उशिरा का होईना पण कागदोपत्री तुमची अटक दाखवून तुम्हाला कोर्टासमोर सादर तरी केलं, पण हेच जर तुम्ही अल्पशिक्षित किंवा अशिक्षित, ‘खालच्या’ जात-वर्गातले असतात तर?

...तर कायद्याच्या आधारेच, संविधानिक चौकटीतच पण अनेक फटी शोधून तुम्हाला इथली व्यवस्था वर्षानुवर्ष तुरुंगात डांबून ठेवून शकते. मागील तीन वर्षात एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून या परिषदेशी संबंधित असलेल्या आणि नसलेल्याही भारतातल्या अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांना, बुद्धिजीवींना तुरुंगात डांबलेलं आपण पाहतच आहोत. हे इतकेच कार्यकर्ते नाहीत, तर याआधीही भारतात अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांना नक्षलवादाशी-वाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून तुरूंगात डांबलेलं आहे आणि वर्षानुवर्षाच्या कैदेनंतर पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तही केलेलं आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात स्टेटला वाटणाऱ्या अनेक प्रकारच्या ‘संभाव्य’ भीतींमुळे केल्या जाणाऱ्या अटका-मॅकार्थीझमचं भारतीय वर्जनच म्हणाव्या अशा आहेत.

मॅकार्थीझम या शब्दाचा उगम झाला १९५० च्या दशकात. अमेरिकी सैन्याधिकारी आणि नंतर सिनेटर झालेल्या जोसेफ मॅकार्थी याच्या कार्यपद्धतीवरुन हा शब्द रुढ झाला. दुसऱ्या महायुद्धापासून ते १९५७ मध्ये मॅकार्थीचा मृत्यू होईपर्यंत त्यांने तत्कालीन साम्यवादी, समाजवादी नेते, कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, वकील, कलाकार, विद्यार्थी इतकंच नव्हे तर साम्यवादी, समाजवादी विचारसरणीप्रती आस्था असलेले सामान्य नागरिक या सगळ्यांवर खोटे आरोप ठेवून खटले भरणे, त्यांना तुरुंगात टाकणे, त्यांच्याबद्दल सातत्याने अपप्रचार करणे, हे सारं पद्धतशीरपणे योजना करुन केलं. अमेरिकेतल्या एखाद्या नागरिकाला, सरकारी अधिकाऱ्यांना साम्यवादी विचारसरणीबद्दल सहानुभूती वाटते, याचा केवळ संशय येणंसुद्धा त्यांचं आयुष्य बरबाद करण्यासाठी मॅकार्थीला पुरेसं होतं. मॅकार्थीनं खुलेआम हे षडयंत्र इतक्या मोठ्या प्रमाणात राबवलं की त्याच्या या कार्यपद्धतीवरुन ‘मॅकार्थीझम’ ही संकल्पनाच राजकीय पटलावर उदयास आली.

तर पुस्तकाबाबत…

भारतात अनेक वर्ष विविध आरोपांखाली तुरुंगवास भोगून नंतर निर्दोष मुक्त झालेल्या अनेकांनी तुरुंगातले आपले अनुभव लिहिले आहेत, ते पुस्तकरुपाने प्रसिद्धही झाले आहेत, अशाच प्रकारचं मार्च २०२१ मध्ये प्रकाशित झालेलं कोबाड गांधी यांचं ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे एक पुस्तक. इंग्रजीत अशी अनेक प्रिझन मेमॉयर्स लिहिली जातात, मग या पुस्तकात असं काय वेगळं आहे? की त्याची चर्चा होणं महत्वाचं आहे?

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक छिन्नविछिन्न वर्तमानाची कहाणी आहे. छिन्नविच्छिन्न वर्तमान म्हणजे स्टॅन स्वामी या म्हाताऱ्या आदिवासी कार्यकर्त्याचा ट्रायलही न होता तुरुंगवासातच मृत्यू होणं किंवा मुन्नवर फारुकीसारख्या स्टॅंड अप कमेडियनला - तो करण्याची शक्यता आहे (असं स्टेटला वाटलं) पण न केलेल्या जोकसाठी तुरुंगात टाकणं. किंवा नताशा नरवाल या स्कॉलर, कार्यकर्तीला तुरुंगात डांबून मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांना भेटूही न देणं आणि तत्सम गोष्टी. या यादीत तुम्हाला सिद्दीक कप्पनपासून डॉ. कफील खानपर्यंत अनेक नावं, गोष्टी टाकता येतील.

असाच तुरुंगवास तब्बल दहा वर्ष भोगून मग बहुतांश खटल्यात निर्दोष मुक्त केलेल्या कोबाड गांधींनी आपले अनुभव ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’मध्ये लिहिले आहेत. स्वत:च्या तुरुंगवासाच्या आठवणींपुरतंच मर्यादित नसलेलं हे पुस्तक व्यक्तिकेंद्री अनुभवाचा पैस व्यापक करत एकंदर राज्यव्यवस्था, मानवी हक्क, भारतातल्या तुरुंगातली परिस्थिती, तुरुंग व्यवस्थेतली उतरंड, तुरुंगातलं विविध उदास रंगांनी भरलेलं पण एक अतिशय मानवी जीवन, नोकरशाही, भ्रष्टाचार, पैशाच्या बळावर तुरुंगातही चाललेला बड्या धेंडांचा ऐशोआराम आणि त्याचवेळी कोणतीही संसंधाने नसलेली अगदी खटला लढण्यासाठीही पैसा नसलेली, तुरुंगात खितपत पडलेली हजारो माणसं...हे सारे बिंदू एकमेकांशी जोडून सध्याच्या ‘लोकशाही’चा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतं.

उच्चवर्गीय पारसी कुटूंबात जन्मलेले, डून स्कूलसारख्या बड्या शाळेत शिकून लंडनमध्ये चार्टर्ड अकाउंट बनण्यासाठी गेलेले कोबाड गांधी तिथल्या शिक्षणादरम्यान वंशभेदी घटनांचा अनुभव काय घेतात, उमेदीच्या वयात तिथे तुरुंगात काय जातात, त्यानंतर त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव काय पडतो, सगळी सुखं पायाशी लोळण घालतील, अशी तिथली करिअरची संधी सोडून ते कायमचे भारतात काय येतात, इथं अनुराधा शानभाग या त्यांच्या जोडीदारासोबत समाजासाठी आयुष्य वेचण्याचा निर्णय काय घेतात, आणि स्वत: प्रत्यक्ष दलित वस्तीमध्ये राहतात. दिल्लीत काही काळ वास्तव्याला असताना एक दिवस कॉम्प्युटरसाठी लागणारं सामान खरेदी करायला बाजारात जातात, तेव्हा झालेली अकल्पित अटक आणि त्यानंतर तब्बल दहा वर्षांचा तुरुंगवास भोगून बऱ्याचशा खटल्यांतून निर्दोष मुक्त होऊन तुरुंगातून बाहेर पडतात, हे सगळंच आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं आहे, ते तपशीलवार या पुस्तकात गांधींनी नोंदवलेलं आहेच, पण तरीही हे पारंपरिक आत्मचरित्र किंवा आत्मकथा नाही, आपल्याच आयुष्यातल्या घटनांच्या आधारे राज्यव्यवस्थेचं, समाजव्यवस्थेचं बहुमितीय आकलन मांडण्यांचा प्रयत्न लेखकानं केलाय.

युएपीएच्या खटल्यात देशभरातल्या दहाएक तुरुंगांमध्ये कोबाड गांधींनी कारावास भोगलेला आहे, त्या त्या ठिकाणी तिथल्या कैद्यांशी, तुरुंग प्रशासन अधिकाऱ्यांशी त्यांचा संबंध आला, दहा वर्ष अनेक खटले लढताना न्यायव्यवस्थेशी जवळून संबंध आला. पोलीस, शासनयंत्रणा, न्यायालयीन अधिकारी, कायदे - त्यांचं इंटरप्रिटेशन, न्याय, त्याची अंमलबजावणी या साऱ्याच घटकांचा एकमेकांशी किती बारीक आंतरसंबंध आहे, याचा त्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास केला आहे, एकमेकांशी संलग्न असलेल्या या साऱ्याच घटकांचा त्यांचा अभ्यास, निरीक्षणं या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळतात, राज्यसंस्थेचं स्वरूप वरकरणी दिसतं त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात दडपशाही करणारं आहे, हिंसक आहे, हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवतं राहतं.

अफजल गुरु आणि अनुराधा शानभाग (गांधी) यांच्याबाबत यातल्या काही प्रकरणांत जे लिहिलेलं आहे, ते फारच तरल आहे. अनुराधा तर कोबाड गांधी यांच्या जोडीदार होत्या, त्यामुळे त्यांच्याबाबत तरल, हळवं काही लिहिणं, त्यांच्या सहजीवनाबद्दल, प्रेमकहाणीबद्दल लेखकानं लिहिणं साहजिकच आहे, पण तिहारच्या तुरुंगात असताना सहकैदी अफजल गुरु या काश्मिरी ‘दहशतवाद्या’शी झालेला संवाद, त्या संवादातून गुरुच्या स्वभावाचे कळलेले पैलू इ. अनेक बाबी कोबाड गांधींनी यात लिहिल्या आहेत, त्या वाचून थक्क व्हायला होतं. अफजल गुरु न्यायालयीन प्रक्रियेनुसार गुन्हेगार होता, त्याला फाशीही झाली, त्यादरम्यानचं वातावरण, गुरुबाबात त्यांना जाणवलेल्या गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत, त्या वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. २६-११ नंतर विशेषत: दहशतवादाचे आरोपी असलेल्या मुस्लिमांचं जे राक्षसीकरण सबंध माध्यमांतून केलं गेलं, त्या पार्श्वभूमीवर कोबाड गांधींनी अफजल गुरुबद्दल जे लिहिलंय, ते मुळातून वाचलं पाहिजे. अफजल गुरू आणि तत्सम लोक गुन्हेगार असतील पण इतके काही राक्षस नव्हते, जेवढं आपल्याला मीडियाने दाखवलं..असं वाटल्यावाचून राहणार नाही.

गुरूबद्दल जे चित्रण मीडियानं केलं, त्यापेक्षा तो कितीतरी वेगळा होता, त्याच्या वर्तनातले अनेक मानवी पैलू इ. गोष्टी मला आणखी एका पुस्तकातही वाचायला मिळाले. आणि ही बाजू बहुसंख्यांना पटेल, कारण हे पुस्तक माजी तुरुंगअधिकाऱ्यानं लिहिलं आहे. सुनील गुप्ता १९८४ च्या आसपास तिहार जेलचे अधिकारी होते, त्यांच्या जवळपास तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक हाय प्रोफाईल कैदी पाहिले. निवृत्तीनंतर ‘ब्लॅक वॉरंट- कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं. भारतातली एक अतिउत्तम क्राईम रिपोर्टर सुनेत्रा चौधरी (एनडीटीवी फॅन्सना कुरळ्या केसांची एक अँकर आठवत असेल, तीच ती) जी आता हिंदुस्तान टाईम्सची पोलिटिकल एडीटर आहे, ती गुप्तांसोबत या पुस्तकाची सहलेखक आहे. तर या पुस्तकात गुप्ता यांनीही अफजल गुरुबाबत जे लिहून ठेवलंय, ते कोबाड गांधींच्या म्हणण्याशी बरंच मिळतं-जुळतं आहे. (अन्यथा, कोबाड गांधीवर एक शिक्का बसला असल्याने, त्यांचं म्हणणं तर ‘अस्संच’ असणार नॉ? ‘ह्या’(जमेल तेवढ्या तुच्छतेने वाचा) डाव्या लोकांना तर दहशतवाद्यांबद्दल ममत्वच वाटतं, असं अनेकांना वाटू शकतं.)

जिज्ञासूंनी ‘ब्लॅक वॉरंट- कन्फेशन्स ऑफ अ तिहार जेलर’ हे सुनील गुप्ता नि सुनेत्रा चौधरीचं आणि ‘बिहाइंड बार्स - प्रिझन टेल्स ऑफ इंडियाज मोस्ट फेमस’ हे सुनेत्रा चौधरीचं पुस्तक अशी दोन पुस्तकं आवर्जून वाचावीत.

बॅक टू कोबाड गांधी:

वर म्हणलं तसं गांधींनी केवळ स्वत:चा अनुभव लिहिलेला नाही, त्याअनुषंगे राज्यसंस्था, समाजव्यवस्थेवरचं विश्लेषण केलेलं आहे. हे विश्लेषण ऐतिहासिक भौतिकवादाने (हिस्टॉरिकल मटिअरिलिझम) खूप प्रभावित आहे, किंवा त्या पायावर केलेलं आहे, हे स्पष्ट जाणवतं. एकीकडे हे विश्लेषण आणि दुसरीकडे आपण गर्भश्रीमंत घरातले असून, सगळं काही सुशेगाद असताना डावे कसे होत गेलो, मग नेमकं काय काम करायचं ठरवलं, ते करताना praxis बाबत झालेली वैचारिक घुसळण अशा अनेक गोष्टी त्यांनी तपशीलात लिहिल्या आहेत.

१९७० च्या दशकात मुंबईतल्या विविध गटांशी गांधींनी जोडलं जाणं, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी समजून घेणं, हे कसंकसं घडत गेलं, त्याचे तपशील रंजक आहेत. ७० चं दशकच विविध पातळ्यांवर घुसळण करणारं होतं. मुंबईत लिटिल मॅगेझिनची चळवळ, मागोवा गट, स्त्रीवादी चर्चाविश्वाचा होऊ घातलेला प्रवेश अशा सबंध भारून टाकलेल्या वातावरणात तेव्हाच्या तरुणांवर युटोपियन जगाचं स्वप्नं बघण्याची मोहिनी पडली नसती, तरंच नवल! या साऱ्याबद्दलचे तपशील कुणाही जराशाही सोशल माणसाला आवडू शकतील, असे आहेत.

पुस्तकाचा मुख्य गाभा मात्र अंदाधुंद अटका, व्यापक दडपशाहीची रुपं दाखवत राज्यव्यस्थेची संरचनात्मक टीका करणारा आहे. यातल्या ‘तुरुंगशाही’बद्दल वाचताना मिशेल फुकोचं तुरुंगाबाबतचं प्रतिपादन सारखं आठवतं. “तुरुंग हे आधुनिक सत्ता संबंधांचं केंद्र आहे, त्याचा मानवी स्वातंत्र्यावर, अस्मितेवर परिणाम होतो. त्यामुळे तुरुंग ही एक सुटी गोष्ट नसून त्याबाबतची मांडणी हा समाजशास्त्राचा अभ्यासच आहे.” असं फुको म्हणतो.

असंच काहीसं अँजेला डेवीसही म्हणते. ‘आर प्रिझन्स अबसोल्यूट?’ या पुस्तकातून डेवीस हेच सांगते की, तुरुंगाकडे सुटं सुटं बघून चालणार नाही, त्याकडे बघताना पूर्ण समाजाकडे बघायला लागणं अपरिहार्य आहे, कारण तुरुंग हे समाजाचंच प्रतिबिंब आहे. ती पुढे या आकलनात आणखी भर घालते. तुरुंगांची गरजच असू नये. तुरुंग असल्याने सर्व प्रश्न सुटतील काय? की नवी वेगळी-समांतर अन्यायी व्यवस्था तयार होईल? पण तुरुंगच नसण्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अतिशय रॅडिकल बदल करावे लागतील. अमेरिकेतल्या (आजही केल्या जाणाऱ्या) काळ्या नागरिकांच्या गुन्हेगारीकरणावरून संतप्त झालेल्या अँजेला डेवीसनं तुरुंगांबातचं मांडलेलं चिंतन मूलभूत स्वरुपाचं आहे. फुको आणि डेवीसनं सांगितलेल्या गोष्टी कोबाड गांधींच्या पुस्तकातून अगदी दृश्यरुपात दिसतात, आणि सिद्धांत नि वास्तव यांतले बिंदू जोडणं सोपं होतं. गांधींच्या पुस्तकाचं हे आणखी एक यश.

(रोली बुक्सने प्रकाशित केलेलं ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे इंग्रजी पुस्तक लवकरच लोकवांड्.मयगृहाकडून मराठीत येणार आहे, ही मराठी वाचकांसाठी एक आनंदाची बाब)

……………………………………….

-अरुंधती हैदर

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

माचीवरला बुधा Wed, 22/09/2021 - 23:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छान लेख आहे, उद्धृत केलेली पुस्तके “वाचणे आहे” यादीत टाकली.

१४टॅन Wed, 22/09/2021 - 23:46

(अन्यथा, कोबाड गांधीवर एक शिक्का बसला असल्याने, त्यांचं म्हणणं तर ‘अस्संच’ असणार नॉ? ‘ह्या’(जमेल तेवढ्या तुच्छतेने वाचा) डाव्या लोकांना तर दहशतवाद्यांबद्दल ममत्वच वाटतं, असं अनेकांना वाटू शकतं.)
अगदी. अचूक. मान्य आहे.
बाकी अफझल गुरु(?) ह्या श्वापदाचं अगदी पाव टक्काही उदात्तीकरण केलं गेलं असल्यास मूळ पुस्तकाच्या (मग त्यात तथ्यं असूही देत) हेतूंवर शंका घेतल्यास चुकीचे वाटू नये. त्यामुळे कदाचित, दुर्दैवी घंदी (जनेऊधारी की जओल्डधारी?) आणि स्वामीही त्याच यादीत गेल्याचा दोषही पुस्तकावर येईल.

सई केसकर Thu, 23/09/2021 - 09:23

लेखात ओघाने आलेले इतरही पुस्तकांचे संदर्भ आवडले.
सगळीच वाचनीय वाटताहेत.

विवेक पटाईत Thu, 23/09/2021 - 10:14

लेख एक पक्षीय आणि सत्यापासून दूर एक दुश्प्रचार आहे. अश्या गुन्हेगारांना दंड देणे कठीण असते. निवृत्त झालो असेले तरी सर्वोच्चस्तरावर असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सोबत कार्य केल्यामुळे अधिक लिहत नाही.

चिमणराव Thu, 23/09/2021 - 15:50

म्हणजे त्यात काय आहे हे कळलं.

वाचून बघेन.

---------

तुम्हाला इथली व्यवस्था.......

तुरुंतात गेल्यावर कैदी छान वागत असतील. त्यांच्याबद्दल एका अधिकाऱ्यानेही पुस्तक लिहिलं आहे. त्या वेगळ्या गोष्टी .
पण आरोपी तुरुंगात पाठवण्याचा आदेश निघतो तो कोर्टातून. आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध होतात. पुरावे सापडतात आणि इथल्या कायद्यात मान्य नसलेल्या गोष्टी केल्याने/ न केल्याने आरोपी गुन्हेगार ठरतो.

तर या व्यवस्थेलाच पुन्हा कायदेशीरच लढा देणारी व्यवस्था अपेशी ठरत आहे का??

वामन देशमुख Thu, 23/09/2021 - 15:51

...तर कायद्याच्या आधारेच, संविधानिक चौकटीतच पण अनेक फटी शोधून तुम्हाला इथली व्यवस्था वर्षानुवर्ष तुरुंगात डांबून ठेवून शकते.

कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा

आणि वर्षानुवर्षाच्या कैदेनंतर पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तही केलेलं आहे.

कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा

... तुरुंगात डांबून मृत्यूशय्येवर असलेल्या वडिलांना भेटूही न देणं आणि तत्सम गोष्टी

साध्वी प्रज्ञा

अफजल गुरु बद्धल तरल, हळवं... स्वभावाचे अनेक पैलू... कितीतरी वेगळा... त्याच्या वर्तनातले अनेक "मानवी" पैलू...

"अफ़ज़ल हम शर्मिंदा हैं, तेरे क़ातिल ज़िंदा हैं" आठवलं.

अफजल गुरू आणि तत्सम लोक गुन्हेगार असतील पण इतके काही राक्षस नव्हते

अफजल गुरु न्यायालयीन प्रक्रियेनुसार गुन्हेगार होता, त्याला फाशीही झाली

अफझल वगैरे जणांची पी आर खरंच पॉवरफुल म्हणायची!
---
बाकी ते स्टेट, तुरुंग, पुस्तके वगैरे उपकलाकार जाऊ द्या, शेवटी action points काय आहेत? अफझल गुरु यांची जयंती, पुण्यतिथी त्यांच्या नावाने रुग्णवाहिका, स्मारके, त्यांच्या हळव्या कंगोऱ्याबद्धल चर्चासत्रे वगैरे केंव्हा सुरु करायची आहेत?

Rajesh188 Thu, 23/09/2021 - 17:08

पण जे गरीब ,दुर्बल आहेत ह्यांची अवस्था भारतात खराब आहे.
एक महिना पण शिक्षा होईल असा गुन्हा त्यांच्या हातून घडला असेल किंवा पोलिस नी खोट्या गुन्ह्यात त्यांना आरोपी केले असेल स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तर बिचारे फक्त जमीन देण्यासाठी कोण नसल्या मुळे,आर्थिक क्षमता नसल्या मुळे अगदी किरकोळ आरोप असला तरी दहा दहा वर्ष तुरुंगात काढतात.
खूप वाईट वाटते.
आणि अतिशय गंभीर गुन्हे अगदी खून,बँका लुटणे,जमिनी हडप करणे असे गुन्हे.
असून सुद्धा पैसे आणि भ्रष्टाचार ह्या मुळे हे पक्के गुन्हेगार दुसऱ्या दिवशी तुरुंगाच्या बाहेर असतात.त्यांना कधीच शिक्षा होत नाही...
हा नक्की कोणाचा पराभव आहे घटनाकरांचा की अजुन कोणाचा.

'न'वी बाजू Thu, 23/09/2021 - 23:51

काही दिवसांपुर्वी मी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे कोबाड गांधी यांचं प्रिझन मेमॉयर/ आत्मकथन वाचलं.

पण, Memoirचा उच्चार 'मेम्वार' असा काहीसा होतो ना? (काय जंतू?)

----------

बाकी, प्रस्तुत मोहतरमांची काही तारीफ़? नाही म्हणजे, गुगलून यांच्यावर काही सापडले नाही, आणि, मागच्या लेखावरून फक्त यांना मृत्युलेख लिहिण्याची (यांच्याच भाषेत: भिकार!) सवय आहे, एवढाच अर्थबोध झाला. याउपर यांचा काही क्लेम टू फेम?

नाही म्हणजे, (क्लेम टू फेम) असलाच पाहिजे, असा काही आग्रह नाही, परंतु, एक आपले कुतूहल, इतकेच. नाहीतर, 'ऐसी'वर इतके जण येत असतात (/आणले जात असतात), नि आपापली मते ठोकून जात असतात, त्यात आणखी एकीची भर, इतकेच.

असो चालायचेच.

==========

आम्हीही त्यातलेच!

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 24/09/2021 - 01:22

In reply to by 'न'वी बाजू

अरुंधती हैदर नावानं लिहिणाऱ्या व्यक्तीबद्दल 'न'बांचं कुतूहल चाळवलं आहे. (अन्य काही टोपणनावांनी लिहिणाऱ्या व्यक्तींबद्दल 'न'बांचं कुतूहल चाळवलेलं नाही. ही टोपणनावं पुरुषांची आहेत.)

'न'वी बाजू Fri, 24/09/2021 - 02:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

Don't tell me, की अरुंधती हैदर हे जयदीप चिपलकट्टी आणि/किंवा चिंतातुर जंतू यांचे (किंवा, कदाचित, सामूहिकरीत्या दोघांचेही) टोपणनाव आहे म्हणून!

(हो, आजकाल हेसुद्धा ऐकण्याची अपेक्षा ठेवलेली आहे. कोणाकोणाला कसल्याकसल्या हौशी असतील, काय सांगावे?)

(नाही म्हणायला, यालासुद्धा precedent आहेतच. आरती प्रभू, पुरुषराज अळूरपाण्डे, वगैरे. परंतु, जचि किंवा चिंजं यांपैकी कोणाला - whatever their other faults - मृत्युलेख लिहिण्याची भिकार सवय आहे, हे आजवर जाणवले नव्हते. (Closeted, perhaps?) त्यामुळे, तशी शंका आली नाही.)

Please tell me it is not so!

जयदीप चिपलकट्टी Fri, 24/09/2021 - 00:09

> बाकी, प्रस्तुत मोहतरमांची काही तारीफ़? नाही म्हणजे, गुगलून यांच्यावर काही सापडले नाही, 

आपलं कागदोपत्री नाव जाहीर करा, म्हणजे आम्हीही ते गुगलू शकू. तारीफ करायची की नाही हे त्यानंतर ठरवू. मादी बदकाला जो मसाला चालतो तोच नराला चालतो.

'न'वी बाजू Fri, 24/09/2021 - 01:18

In reply to by जयदीप चिपलकट्टी

प्रस्तुत लेखिकेने (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, येथील कोठल्याच सदस्या/स्येने) आपल्या कागदोपत्री नावाचा ज़िक्र करावा, असा आग्रह आम्ही कधीही केलेला नव्हता, करीतही नाही. त्याबावजूद तिने तो केला - आपल्या व्हॉलिशनने केला - हा सर्वस्वी लेखिकेचा प्रश्न; त्याला आम्ही जबाबदार नाही. त्याउपर, कागदोपत्री नाव जाहीर असताना त्या नावामागील व्यक्तीबद्दलची, पब्लिक डोमेनमधली, उपलब्ध माहिती गुगलून काढण्यात कोणाच्याही प्रायव्हसीच्या अधिकाराचा कोठल्याही प्रकारे भंग होतो, असे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

(कागदोपत्री नावाच्या जागी टोपणनाव घेण्याचा अधिकार लेखिकेस सर्वथा आहेच. अर्थात, तसे ते घ्यावे किंवा न घ्यावे, हा सर्वस्वी लेखिकेचा प्रश्न आहे.)

त्याउपर, Not that I owe the world an explanation, परंतु तरीही, गुगलण्यामागील उद्देश इतकाच, की प्रस्तुत लेख काही माहिती, काही दृष्टिकोन मांडण्याच्या हेतूने, लोकांनी वाचावा म्हणून, to inform the uninformed, आणि त्यातही संबंधित विषयातील/क्षेत्रातील कोणा माहीतगार, चारचौघांत ऊठबस असणाऱ्या, प्रतिष्ठित/प्रस्थापित/cognoscenti-टैप्स/नामवंत व्यक्तीने लिहिला असावा, असा आभास, लेख निदान वरवर चाळून तरी निर्माण झाला, अत एव प्रस्तुत कुतूहल. गूगलशोधनिष्पत्तीतून प्रस्तुत व्यक्तीचा क्लेम-टू-फेम, दृष्टिकोन, विचारसरणीचा कल, अजेंडा, यांबाबत काही आडाखे बांधता आल्यास, लेख कितपत गंभीरपणे घेण्याच्या लायकीचा आहे, याबाबत काही अंदाज येऊ शकतो, एवढाच फायदा. अर्थात, अशी सार्वजनिक माहिती प्रत्येक व्यक्तीबद्दल उपलब्ध असेलच, असे नाही, आणि ती पुरविण्यास कोणीही बांधील नाही, हे आम्हीही जाणतो. परंतु, त्या परिस्थितीत, साधारणत: राजेश१८८ या सदस्याचे लिखाण जितक्या गंभीरपणे आम्ही दुर्लक्षितो, तितक्याच गंभीरपणे हेही लिखाण दुर्लक्षिण्यास आम्हांस मार्ग मोकळा होतो, इतकेच.

मादी बदकाला जो मसाला चालतो तोच नराला चालतो.

१. गूज़ म्हणजे बदक नव्हे. हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नसावी.

२. अर्थात! आमचेही लिखाण आत्यंतिक गंभीरपणे दुर्लक्षिण्यास सर्वांस मुभा आहेच. किंबहुना, त्याकरिता आमच्या परवानगीचीसुद्धा आवश्यकता नाही.

इत्यलम्|

==========

'इन स्पाइट ऑफ दॅट'करिता उचित मराठी पर्याय आठवला नाही. क्षमस्व.

'स्वखुशीने' हा पर्याय तितकासा चपखल वाटला नाही. चूभूद्याघ्या.

'आव' हा शब्द महत्प्रयासाने टाळलेला आहे. आगाऊ धन्यवाद.

माहीतगार, चारचौघात ऊठबस असणारी, प्रतिष्ठित/प्रस्थापित/cognoscenti-टैप्स/नामवंत व्यक्ती असण्याचा आरोप प्रस्तुत लेखिकेवर मी अर्थातच करू इच्छीत नाही; सबब, नसल्यास दिलगीर आहे.

यांचेही कागदोपत्री नाव आम्हांस आजतागायत ठाऊक नाही; जाणून घेण्यात रसही नाही. असो.

गूज़ची - निदान कॅनडा गूजची तरी - पाठ काळी असते; त्यात अधूनमधून गडद हिरव्या छटाही असतात. तुमच्याच कॅनडातून मायग्रेटरी बर्ड्ज म्हणून आमच्या येथे येतात, अशी थियरी आहे, परंतु प्रत्यक्षात आजतागायत निदान मी तरी एकही कॅनडा गूज़ आमच्या येथून निघून गेलेले पाहिलेले नाही. आमच्या येथे सदैव पडीक असतात, घोळक्याने फिरतात, कधीमधी पार्कांतल्या तळ्यांत वगैरे असतात, परंतु बहुतकरून रस्त्यांतून, नाहीतर लोकांच्या अंगणांतून वगैरे फिरतात, सर्वत्र हिरवेगार हगून ठेवतात. उलटपक्षी, बदक पांढरे असते. आमच्या येथे क्वचित पार्कांमधील तळ्यांतून दिसते; अन्यत्र दिसलेले नाही. सांगण्याचा मतलब, गूज़ आणि बदक हे विभिन्न पक्षी आहेत, आणि हे आम्हांससुद्धा ठाऊक आहे. तुमच्याकडून याहून बरी अपेक्षा होती.

माचीवरला बुधा Fri, 24/09/2021 - 01:19

In reply to by 'न'वी बाजू

In spite of that = तरीसुद्धा!

मूळ लेख लिहिणाऱ्या व्यक्तीने टोपण नाव वापरले असावे.

'न'वी बाजू Fri, 24/09/2021 - 01:29

In reply to by माचीवरला बुधा

In spite of that = तरीसुद्धा!

केवळ अर्थांतर म्हणून हे ठीकच आहे, पर्याय म्हणून चालून जाईल, परंतु, in spite ofमधील spiteचा जोर त्यात येत नाही. असो.

मूळ लेख लिहिणाऱ्या व्यक्तीने टोपण नाव वापरले असावे.

हम्म्म्... ही शक्यता अर्थातच नाकारता येत नाही. (आणि, ते ठीकच आहे.)

(उलटपक्षी, केशवसुत किंवा कुसुमाग्रज हीदेखील टोपणनावेच आहेत. मात्र, त्यांना गुगलले असता, ढीगभर शोधनिष्पत्ती होते. (अर्थात, हे केवळ अवांतर निरीक्षण. यातून कोठल्याही निष्कर्षाप्रत उडी मारण्याचा उद्देश नाही.))

असो.

चिंतातुर जंतू Fri, 24/09/2021 - 09:21

In reply to by 'न'वी बाजू

प्रस्तुत लेखिकेने (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, येथील कोठल्याच सदस्या/स्येने) आपल्या कागदोपत्री नावाचा ज़िक्र करावा, असा आग्रह आम्ही कधीही केलेला नव्हता, करीतही नाही. त्याबावजूद तिने तो केला - आपल्या व्हॉलिशनने केला - हा सर्वस्वी लेखिकेचा प्रश्न

बूंद से गयी...

Rajesh188 Fri, 24/09/2021 - 14:52

In reply to by 'न'वी बाजू

मला कोणतेच कडवे विचार आवडत
नाहीत कारण ते एकतर्फी असतात.
कडवे उजवे,कडवे डावे,कडवे communist, कडवे धार्मिक,कडवे जातीय,कडवे प्रांतीय.कडवे देशप्रेमी,कडवे देशद्रोही.
ह्या मधील कोणीच मला आवडत नाही.
मस्तकाची शिर उठते ह्यांचे लिखाण वाचताना.
त्या मुळे माझे लिखाण ना उजव्या ना आवडत
ना डाव्यांना , ना धर्म अभिमानी लोकांना ,ना जातीय वादी लोकांना.
हो आणि कडवे नास्तिक, अस्तिक पण आवडत
नाहीत .
देव नाही ,तुम्हाला पटत नाही तर तुम्ही वागा ना तसे लिखाण करून आस्तिक लोकांच्या भावना कशाला दुखवता .
ब्रह्मांड मध्ये पृथ्वी अतिशय नगण्य आहे दखल घेण्या इतकी पण पृथ्वी ची लायकी नाही.
माणूस तर अती अती नगण्य त्यांनी विश्व समजल्याचा गप्पा मारू नयेत.
ब्रह्मांड मध्ये माणसाच्या विचारला काहीच किंमत नाही.
तरी नस्तिक टणाटण उड्या मारत असतात .आणि आस्तिक आंधळे झालेले असतात.
त्या मुळे तुम्हाला माझे विचार आवडस्त नसतील कारण र तुम्ही वरील कॅटेगरी मध्ये आहात

तुह्मी जिवंत आहात की मृत आहात याबद्दल तुमचा काही एकतर्फी विचार आहे काय?

'न'वी बाजू Fri, 24/09/2021 - 23:09

In reply to by माचीवरला बुधा

त्या मुळे तुम्हाला माझे विचार आवडस्त नसतील

Cogitat ergo est. (गूगल ट्रान्स्लेटवर भरवसा ठेवून.)

QED.

Rajesh188 Sat, 25/09/2021 - 01:37

In reply to by माचीवरला बुधा

जिवंत जिवंत च असतो पण मृत्यू झाला आहे हे दुसरेच ठरवतात ..
हे मृत ठरवणारी लोक मोठी चावट असतात.
मेंदू,हार्ट ,श्वास हा नक्की बंद झाला आहे की नाही हे न तपासता झोपलेल्या माणसाला पण मृत ठरवतात.
असेच हे कडवे असतात.
ह्यांच्या नजरेत अन्यायग्रस्त एक च धर्म,जाती, प्रांत चे
असतात आणि आणि अन्याय करणारे पण कोण आहेत हे ह्यांनी अगोदर च ठरवून ठेवलेले असते..
चिकस्ता,खरे खोटे ह्यांच्या शी ह्यांचे वाकडे असते.
चिकिस्ता दुसऱ्याची झाली पाहिजे,खोटे हे नेहमीच ह्यांच्या नजरेत दुसरे असतात.
ही विचार सरणी.

जयदीप चिपलकट्टी Fri, 24/09/2021 - 01:07

भारतातल्या न्याययंत्रणेत आणि तुरुंगव्यवस्थापनात कित्येक मोठ्ठाल्या त्रुटी आहेत हा मुद्दा उघड आहे. त्यावर वाद नाही.

पण ‘तुरुंगवास हा प्रकार मुळातूनच रद्दबातल करावा’ हा अँजेला डेव्हिस आणि इतर काहींनी केलेला युक्तिवाद मला पूर्णपणे पटलेला नाही. अमेरिकेतल्या तुरुंगांवर त्यांनी केलेली टीका रास्त आहे, आणि त्यांनी सुचवलेले उपाय अंमलात आणले तर तुरुंगांची गरज कमी होईल हेही मान्य आहे. पण ती शून्यावर येईल असं वाटत नाही. किमानपक्षी तुरुंग पूर्णपणे बंद करायचे असतील तर त्यांच्याऐवजी काहीतरी व्यवहार्य पर्याय हवा, आणि तो कुठला हे अजून समोर आलेलं नाही. (असे काही पर्याय prison abolition movement मध्ये सुचवलेले दिसतात, पण ते मला व्यवहार्य वाटत नाहीत.)

मिशेल फूकोच्या लिखाणाबद्दल माझं मत तितकंसं बरं नाही. तो स्पष्ट आणि स्वच्छ विचार करून स्पष्ट आणि स्वच्छ भाषेत लिहितो असं कुणी म्हणणार नाही.

चिमणराव Fri, 24/09/2021 - 02:57

काढणे बाजूला ठेवून - कित्येक जण तुरुंगा खितपत पडतात त्यांना एकट्याला सरकारविरुद्ध लढणे परवडत नसेल तर काही सहकारी पद्वतीने किंवा कॉमन फंडातून व्यवस्था वगैरे?

लेखकांना कुणाबद्दल तेढ / कुणाबद्लल कळवळा असायचाच. तो ऊतू जाऊन पुस्तक बाहेर पडते.

पर्स्पेक्टिव्ह Mon, 27/09/2021 - 22:23

काहीतरी वाणसामान आणायला किंवा सलूनमध्ये केस कापायला म्हणून तुम्ही घराबाहेर पडून बाजारात गेलात आणि दिवसाढवळ्या साध्या कपड्यात असलेल्या चार पाच हट्ट्या-कट्ट्या माणसांनी तुम्हाला पकडून एका गाडीत कोंबून दूर कुठे तरी नेऊन दोन दिवस अज्ञातवासातच ठेवलं तर? त्या माणसांची भाषा तुम्हाला समजत नसेल आणि तुमची त्यांना... तर तुमच्यासोबत नेमकं काय केलं जाणार आहे, हेही तुम्हाला कळू शकणार नाही, तुम्ही नेमके कुठे आहात, हे लोक कोण आहेत? हेही तुम्हाला कळायला मार्ग नाही, अशा स्थितीत काही तास कंठणं याची केवळ कल्पना करून पहा. त्यातही तुम्ही अगदी ‘हाय प्रोफाईल’ बुद्धीजीवी आहात, म्हणून तुमच्या अशा अचानक गायब होण्यानंतर मीडियात बातम्या येऊ लागल्या, सामाजिक वर्तुळात चर्चा होऊ लागल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला कोर्टासमोर हजर केलं आणि तेव्हा तुम्हाला अमुक एका खटल्यात नुकतीच अटक केलेली आहे, असं कळलं तर? आणि हा अमुक खटला युएपीएचा असला तर?

वावावा! मधली काही दशके आपण काय केलं हे कोबाड विसरला की मुद्दाम गाळले? अनुराधाचे तर माओवादी वेशातले हातात बंदूक घेतलेले त्यांच्या मेळाव्यातले फोटोसुद्धा उपलब्ध आहेत. ती कुठल्या दलमची कमांडर होती हे आता हाताशी नाहीये, पण ह्या दांपत्याने माओवादी चळवळीत घेतलेल्या सर्व प्रकारच्या सहभागाचे आणि केलेल्या नेतृत्वाचे पुरावे आहेत. उगीच त्यांचे उदात्तीकरण करू नये. अनुराधाचा मृत्यू मलेरियाने झाला. कोबाडसुद्धा तसा हाती लागला नसता, पण ढासळत्या प्रकृतीवर उपचार घेण्यासाठी त्याला जंगलातून बाहेर यावे लागले. त्याच्या अतिशय विश्वसनीय अंतर्गत वर्तुळात पोलिसांना प्रवेश मिळाला नसता, तर भारतातल्या माओवाद्यांचा हा एकेकाळचा सर्वोच्च नेता त्यांच्या कधीच हाती लागला नसता.

नाही, वंचितांबद्दल कणव जरूर बाळगावी, अन्यायाबद्दल लढावेही, पण त्याच्या आडून माओवाद्यांसारख्या घातक प्रवृत्तीचे समर्थन करू नये. तिकडे ते संघीष्ठ जसे यांच्याउलट जगात भारी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व यांच्या आडून जसा आपला प्रतिगामी अजेंडा रेटत असतात, तसेच हे मार्क्सवादी/लेनिनवादी/माओवादी हे शोषण-अन्याय यांच्या आडून आपलाच स्वार्थ साधत असतात. या दोन्ही विचारधारांबद्दल मला यत्किंचितही आत्मीयता नाही. दोन्हीही विषवल्ली आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/09/2021 - 22:32

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

तुमच्याकडून आत्मीयता मिळवण्यासाठी लेख लिहिला नसावा. शिवाय तुम्ही लेखातला मजकूर गाळून वाचलेला असावा. मूळ लेखातून -

असाच तुरुंगवास तब्बल दहा वर्ष भोगून मग बहुतांश खटल्यात निर्दोष मुक्त केलेल्या कोबाड गांधींनी आपले अनुभव ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’मध्ये लिहिले आहेत.

'न'वी बाजू Tue, 28/09/2021 - 01:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्याकडून आत्मीयता मिळवण्यासाठी लेख लिहिला नसावा.

ते तर उघड आहे. हा लेख काय, किंवा यापूर्वी येथे प्रकाशित झालेला तो 'ब्राह्मणी पितृसत्ताक'वाला लेख काय, असल्या लेखांचे अजेंडे बाकी काहीही असोत, परंतु, (ज्यांना अगोदरच (कर्मधर्मसंयोगाने) आत्मीयता आहे, असे वगळता) येथील कोणाकडूनही आत्मीयता मिळविणे, हा अजेंडा खचितच नसावा. यात नवीन ते काय सांगितलेत?

(फॉर्दॅट्मॅटर, आम्हीदेखील येथे जे काही खरडतो, त्यामागील अजेंडा बाकी काहीही असो, परंतु, (ज्यांना अगोदरच (कर्मधर्मसंयोगाने) आत्मीयता आहे, असे वगळता) येथील कोणाकडूनही आत्मीयता मिळविणे, हा खचितच नसतो. किंबहुना, म्हणून तर आम्हाला हे स्पष्ट लक्षात येते. It takes one to know one! हं, आता, ज्यांचा येथील लिखाणामागे इथल्या वाचकांची आत्मीयता मिळविणे हा अजेंडा असेल, अशांना हे लक्षात येणार नाहीही कदाचित, परंतु तो वेगळा मुद्दा आहे. सारांश इतकाच, की (१) हे आम्हाला बरोब्बर लक्षात येते, आणि, (२) यात काहीही नवीन सांगितले नाहीत.)

असाच तुरुंगवास तब्बल दहा वर्ष भोगून मग बहुतांश खटल्यात निर्दोष मुक्त केलेल्या कोबाड गांधींनी आपले अनुभव ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’मध्ये लिहिले आहेत.

बरे मग? आपले (खरे तर तुमचे) सद्य पंतप्रधान हेदेखील काही गंभीर खटल्यांतून निर्दोष मुक्त ठरलेले आहेत. (इतकेच नव्हे, तर एके काळी यू.एस. व्हिसा मिळण्यावर बंदी असताना, ती बंदी नंतर उठून त्यानंतर तुमच्याच टेक्सासात बिनदिक्कतपणे हिंडलेले आहेत; इतकेच नव्हे, तर तेथे जाहीर सभाही घेतलेल्या आहेत. परंतु, ते एक असो. त्याचा येथे संबंध नाही.)

निर्दोष मुक्तता वगैरेंचा अर्थ इतकाच, की (फौजदारी मामल्यांत) कोर्टात आरोपीचा दोष सिद्ध करण्याची जबाबदारी ही (खटला चालविणाऱ्या) सरकारी पक्षाची असते, ती निभावण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. आणि, अशा परिस्थितीत (बोले तो, गुन्हेगार प्रत्यक्षात दोषी असो वा नसो, विच गॉड (इफ शी एक्झिस्ट्स) अलोन नोज़, परंतु, सरकारी पक्ष तो दोष कोर्टात सिद्ध करू शकलेला सताना), कोर्ट आरोपीस कोणतीही शिक्षा सुनावू शकत नाही; किंबहुना, आरोपीची निर्दोष मुक्तता करणे, हा एकमेव पर्याय कोर्टास प्राप्त राहतो. आणि, कायद्याची ही तरतूद योग्यच आहे. तुम्हांआम्हांवर सरकारने वाटेल तो ठपका ठेवल्यास, किमानपक्षी तो आरोप कोर्टात सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारवर असावी, इतके(च) मर्यादित 'संरक्षण' तुम्हाला देऊ करणे, एवढाच या तरतुदीचा मर्यादित हेतू आहे; तुम्ही, आम्ही, श्री. कोबाड गांधी, अथवा आपले/तुमचे सद्य पंतप्रधान, यांपैकी कोणाचाही, 'दोष नाही', हे (निर्विवादपणे) सिद्ध करणे, हा नव्हे. (तसेही, It is impossible to prove a negative, असे कायसेसे तुमच्यातच म्हणतात ना?)

(श्री. कोबाड गांधी यांची निर्दोष मुक्तता होण्याअगोदर त्यांना दहा वर्षे सजा भोगावी लागली, उलटपक्षी, आपल्या/तुमच्या सद्य पंतप्रधानांना एक तासभरसुद्धा तुरुंगाचे तोंड पाहावे लागले नाही, वगैरे फ़िज़ूलचे मुद्दे कृपया उपस्थित करू नयेत. They are totally not germane to the question at hand, that of whether the accused party was guilty or was innocent.)

मात्र, सरकारी पक्षास दोष सिद्ध करता आला नसता आरोपीस निर्दोष मुक्त करण्याचे बंधन कोर्टावर जरी असले, तरी 'जनता अदालत' नावाचा जो प्रकार असतो, तिच्यावर ते बंधन खचितच नसते. किंबहुना, तिच्यावर कसलेच बंधन नसते. ('जनता अदालत' या प्रकारास नि तिच्या निष्कर्षांस कायदेशीर ग्राह्यता नसते आणि नसावी, हे मला आगाऊ मान्यच आहे. येथे तो मुद्दा नाही.) त्यामुळे, आपले/तुमचे सद्य पंतप्रधान हे कायद्याने निर्दोष ठरविलेले जरी असले, तरी 'ते काही (यात) दूध के धुले नसावेत, बरे का!' असे (आपापसात) म्हणण्याचे तुमचेआमचे स्वातंत्र्य अबाधित राहाते, आणि एकसमयावच्छेदेकरून, आपल्या/तुमच्या सद्य पंतप्रधानांचे जे भक्त आहेत, त्यांचेही, 'त्यांच्याइतका सच्चा मनुष्य त्रिभुवनात सापडणार नाही; ते पूर्णपणे निर्दोष आहेत; होय, तसे कोर्टात सिद्ध झालेले आहे' असे मानायचे स्वातंत्र्य अबाधित राहाते. श्री. कोबाड गांधी यांच्या संदर्भातसुद्धा, कोर्टाचे निष्कर्ष अलाहिदा, 'ते दोषीच असले पाहिजेत' इथपासून ते 'ते पूर्णपणे निर्दोष आहेत' इथवर आणि अधलेमधले काय वाटेल ते निष्कर्ष खाजगीमध्ये काढण्याचे सर्व पक्षांचे अधिकार (आणि ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य) अबाधित राहतेच. त्याला कायदेशीर ग्राह्यता किती, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा.

(त्याउपर, non-self-incriminationचे जे काही तत्त्व भारतीय घटनेत वा भारतातील अन्य कायद्यांत अंतर्भूत असेल, त्यास अनुसरून, आपले/तुमचे सद्य पंतप्रधान काय किंवा श्री. कोबाड गांधी काय, हे समजा अगदी दोषी जरी असले, तरी तसे व्यक्त अथवा कबूल करण्याचे कोणतेही बंधन त्यांच्यावर नसावेच. शिवाय, presumption of innocence until proven guilty आणि मुळात दोष सिद्ध होऊ शकलेला नाही, या दोन बाबींचा छेद जमेस धरता, या दोहोंपैकी (किंवा अन्यही कोणी) कधी आपले मेम्वार वगैरे लिहिण्याचे जर मनावर घेतलेच, आणि त्यात त्यांनी 'आपण निर्दोष होतो/आहोत' असे जरी लिहिले, तर त्यातही काही गैर नसावे. वाचकांनी - असलेच तर - ते मनावर घ्यावे किंवा न घ्यावे, हा अर्थातच सर्वस्वी (असलेल्यानसलेल्या) वाचकांचा प्रश्न. त्याला कायद्याच्या दृष्टीने one way or the other काहीही महत्त्व नाही. परंतु तोही पूर्णपणे वेगळा मुद्दा. जाताजाता: आपले/तुमचे सद्य पंतप्रधान हे मेम्वार वगैरे लिहिण्याचे मनावर घेत नाहीत, हे त्यांचे उपकार थोर आहेत.)

अशा परिस्थितीत, कोणा अगोदरच आत्मीयता नसलेल्याकडून आत्मीयता मिळविण्याच्या उद्देशाने जर हा लेख लिहिलेला नसला, तर मग 'मतामतांच्या गल्बल्यातील आणखी एक मत', याहून अधिक महत्त्व या लेखास उरत नाही. (तेही ठीकच आहे म्हणा. अखेरीस, प्रत्येकास एकएक असतेच. त्यांना आहे, मला आहे, तुम्हालाही आहेच. आणि आपापले(च) लाल, हिरव्या, पिवळ्या - नको, पिवळ्या नको. जांभळ्या - रंगात रंगविण्याचे स्वातंत्र्य त्यांना/मला/तुम्हाला/सर्वांनाच आहे. आणि ते असोच.)

इत्यलम्|

----------

(डिस्क्लेमर: आपले/तुमचे सद्य पंतप्रधान आणि/किंवा श्री. कोबाड गांधी यांपैकी कोणाचाही मी भक्त वा चाहता नाही, तथा, यांपैकी कोणाच्याही वतीने प्रस्तुत प्रतिसाद मी लिहिलेला नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 28/09/2021 - 23:13

In reply to by 'न'वी बाजू

एकंदरच, 'न'बा, दोन वाक्यं स्वतंत्र वाचण्याजागी ती एकाच विचाराचा भाग आहेत, एकाच परिच्छेदाचा भाग आहेत अशा पद्धतीनं वाचायला शिकाच. टंकनकष्ट वाचतील. (ते तुम्हाला वाचवायचे नसतात, हे माहित्ये. पण कधी तरी बोलण्याजागी ऐकून, विचार करून, जरा शांत बसून बघाच. नाही तर गणितं सोडवायला सुरुवात करा... ;-) )

वामन देशमुख Wed, 29/09/2021 - 13:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसादाचे शीर्षक -

प्रतिसाद फारसा वाचला नाही.

प्रतिसादातील वाक्यांश -

वाचायला शिकाच.

हे एकाच ठिकाणी वाचून अंमळ मौज वाटली.

बाकी चालू द्या.

पर्स्पेक्टिव्ह Wed, 29/09/2021 - 23:56

In reply to by वामन देशमुख

एकंदरीतच प्रतिसाद नीट न वाचताच निरर्थक ताशेरे मारण्याची त्यांची जुनी खोड असल्याने त्यांचा प्रतिवाद करण्यात मी आताशा वेळ वाया घालवत नाही.

बाय द वे, धन्यवाद नबा.

Rajesh188 Tue, 28/09/2021 - 15:28

घातक विचार धोकादायक आहेत,वंचित आहेत म्हणजे समाजविघातक नाहीत शोषित आहेत हे साफ चुकीचे आहे कट्टर वाद कोणाचं ही असू ध्या समाजाला धोकादायक च आहे.
वय झालेला माणूस विष पसरवत नाही हे पण चुकीचं आहे वय झालेले सभ्य पणाचे ढोंग घेतलेले पण धोकादायक आहेत.
तीच बाब हिंदुत्व वादी ,उजवे, डावे सर्वांना लागू आहे.
कट्टर वादी मग ते कोणत्या ही विचाराने प्रेरित असू ध्या त्यांना चिरडून टाकणे अमानवीय पद्धतीने हे राज satte चे प्रथम कर्तव्य आहे.

शिवोऽहम् Fri, 01/10/2021 - 23:54

एकांगी लेख.

काहीतरी वाणसामान आणायला किंवा सलूनमध्ये केस कापायला म्हणून तुम्ही घराबाहेर पडून बाजारात गेलात आणि दिवसाढवळ्या साध्या कपड्यात असलेल्या चार पाच हट्ट्या-कट्ट्या माणसांनी तुम्हाला पकडून एका गाडीत कोंबून दूर कुठे तरी नेऊन दोन दिवस अज्ञातवासातच ठेवलं तर? त्या माणसांची भाषा तुम्हाला समजत नसेल आणि तुमची त्यांना... तर तुमच्यासोबत नेमकं काय केलं जाणार आहे, हेही तुम्हाला कळू शकणार नाही, तुम्ही नेमके कुठे आहात, हे लोक कोण आहेत? हेही तुम्हाला कळायला मार्ग नाही, अशा स्थितीत काही तास कंठणं याची केवळ कल्पना करून पहा. त्यातही तुम्ही अगदी ‘हाय प्रोफाईल’ बुद्धीजीवी आहात, म्हणून तुमच्या अशा अचानक गायब होण्यानंतर मीडियात बातम्या येऊ लागल्या, सामाजिक वर्तुळात चर्चा होऊ लागल्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला कोर्टासमोर हजर केलं आणि तेव्हा तुम्हाला अमुक एका खटल्यात नुकतीच अटक केलेली आहे, असं कळलं तर? आणि हा अमुक खटला युएपीएचा असला तर?

हे प्रास्ताविक कोबाड घांडींच्या बाबत असेल तर ते फार विनोदी म्हणावे लागेल.

आता पुढचा एक लेख संत जर्नेलसिंग भिंद्रनवाल्यांवर येऊ द्या. किंवा सय्यद गिलानींवर.