प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल
'ऐसी अक्षरे' व्यवस्थापनाकडून नोंद - सदर लेखात व्यक्त केलेल्या मतांशी व्यवस्थापन सहमत नाही.
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.
आधुनिक काळात भारतात प्राकृतिक चिकित्सा प्रचलित करण्यात महात्मा गांधी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. एडोल्फ जूस्टची पुस्तक रिटर्न टु नेचर या पुस्तकाने महात्मा गांधींना प्रभावित केले. त्यांनी 18 नोव्हेंबर 1945 मध्ये 'ऑल इंडिया नेचर क्योर फाउंडेशन ट्रस्ट' स्थापना केली. आज या जागेत आयुष मंत्रालयच्या अंतर्गत राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आहे. आयुष मंत्रालयाने 2018 मध्ये 18 नोव्हेंबर हा दिवस प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून घोषित केला. आज अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्रात औषधांचा वापर न करता, माती, पाणी, ऊन, वाष्प, योग, आहार नियंत्रण इत्यादि द्वारा रुग्णांचा उपचार केल्या जातो. आयुर्वेदातील पंचकर्म, षटकर्म चिकित्सा ही दिली जाते. भारतातील विद्यमान अधिकान्श प्राकृतिक चिकित्सा केंद्र सामाजिक संस्थांद्वारे चालविले जातात. स्वस्त असूनही ही चिकित्सा पद्धतील लोक मान्यता मिळाली नाही. लोकांचा विश्वास या पद्धतीवर बसत नव्हता. मुख्य कारण, आधुनिक मापदंडवर प्रमाणिकता सिद्ध करण्यासाठी अनुसंधानवर खर्च करणे या संस्थांच्या आवाक्या बाहेर आहे. याशिवाय सरकारची भारतीय चिकित्सा पद्धतींबाबत अनास्था. आयुष मंत्रालयाची स्थापनाच 2014 मध्ये झाली. अल्प बजेट असले तरी थोडे फार अनुसंधान कार्य ही मंत्रालयाने सुरू झाले आहे. भविष्यात बजेट ही वाढेल आणि परिणाम ही उत्तम मिळतील ही अपेक्षा.
करोना काळात आमच्यापाशी औषध नाही. तरीही प्रोटोकॉलानुसार एलोपैथीची रेमडेसिवीर, हायड्रोक्लोरोक्वीन , फेबुफ्लू इत्यादि कोरोंना विषाणू विरुद्ध निरर्थक औषधी दिल्या गेल्या. परिणाम हजारो डॉक्टर सहित लाखो रुग्ण दगावले. करोना आणि औषधींचे साईड इफेक्ट ही मुख्य कारणे. दुसरीकडे प्रकृति प्रदत्त गिलोय, अश्वगंधा इत्यादि औषधी प्रभावी ठरल्या. परिणाम, दिल्लीचेच बघा प्रोटोकॉल मध्ये नसतानाही दिल्लीचे अधिकान्श हॉस्पिटल रुग्णांना काढा देऊ लागले. का? याचे उत्तर मला एक ही डॉक्टर देऊ शकला नाही. दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये कार्य करणारे अधिकान्श कर्मचारी स्वतचा प्राण वाचविण्यासाटी ज्याला आयएमए शिव्या देते त्या रामदेवचे कोरोनील घेऊ लागले. सकाळी उठून योग आणि प्राणायाम करू लागले. अधिकान्श करोना रुग्णांनी एलोपैथी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली, हे सत्य मेडिकल माफियाला पचणे कठीणच. अर्थात खर्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोण असणार्या डॉक्टरांनी कधीच प्रामाणिक आयुर्वेदिक औषधींचा करोना काळात विरोध केला नाही.
पतंजलिने योग आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सेवर अनुसंधानासाठी पतंजलि रिसर्च फाउंडेशन आणि पतंजलि रिसर्च इंस्टीट्यूटची स्थापना केली आहे. करोना काळात रिसर्च आधारित अत्यंत स्वस्त औषधी देऊन भारतात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले. पतंजलिने जगातील सर्वात मोठे प्राकृतिक चिकित्सा केंद्र योगग्रॉमची स्थापना 2009 मध्ये केली होती जिथे 400 निवासी रुग्ण एका वेळी निवासी प्राकृतिक चिकित्सा घेऊ शकत होते. पण 2020 एप्रिल पासून ही क्षमता नवे निर्माण करून अल्पावधीत 1000 पर्यन्त वाढवावी लागली. सीजीएचएस ने ही सरकारी कर्मचार्यांसाठी एप्रिल 2021 पासून काही आयुर्वेदिक आणि प्राकृतिक चिकित्सा केंद्रांना पंचकर्म, षटकर्म सहित प्राकृतिक चिकित्सेसाठी अनुमति दिली. आज अनेक प्राकृतिक चिकित्सा केंद्र ही आपले विज्ञापन, फेसबूक वर का होईना, देऊ लागले आहे. करोना काळात लोकांचे डोळे उघडले. अधिकान्श रोगांत प्राकृतिक उपायच अधिक कारगर आहे, हे कळले. निसर्ग प्रदत्त चिकित्सेचे भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. प्राकृतिक चिकित्सा दिवसाची सर्वांना शुभेच्छा.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
लेखावर पहिला प्रतिसाद लेखकाचाच?
लेख लिहिला याचाच अर्थ तुह्मांस प्रतिक्रिया हव्या आहेत. त्यामुळे लेखाला पहिला प्रतिसाद तुह्मीच देणे निरर्थक आहे. आणि तार्किक प्रतिसाद कोणते, हे ठरवणारे तुह्मी कोण टिक्कोजीराव लागून गेला आहां? ऐसीवरील श्रेणी देण्याची पद्धत हा एक मार्ग आहेच. बाकी तुमच्या लेखावर यावेळी मी तपशिलात जाणार नाहीये. I cannot hear what you say because what you are rings loud in my ears.
दुर्दैवाने, बहुतेक
दुर्दैवाने, बहुतेक (पटाईतकाकांच्या भाषेत “अधिकान्श”) गांधीवाद्यांच्या मते गांधी संपूर्ण बरोबर होते, आणि बहुतेक गांधीविरोधकांच्या मते ते संपूर्ण चुकीचे होते. त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून नेहरू आणि पटेलांनीही त्यांना शेवटी-शेवटी काहीसे गुंडाळूनच ठेवले होते, असा माझा समज आहे. गांधीजींचे आधुनिक दृष्टिकोनातून झालेले वस्तुनिष्ठ मूल्यमापन कुणाच्या वाचनात आहे काय? विशेषत: भारतीय लेखक/लेखिकेने केलेले?
रामचंद्र गुहांचे विश्लेषण मला
रामचंद्र गुहांचे विश्लेषण मला खुपच समतोल साधणारे वाटते. आजिबात भाटगिरी नाही.
सुरेश द्वादशीवारांचे गांधी आणि त्यांचे टिकाकार हे पुस्तक चिकित्सेचा चांगला प्रयत्न करते.
रच्याकने, गांधींच्या विविध काळात लिहिल्या गेलेल्या चरित्रांचा कुणी अभ्यास केला आहे का? मला वाटते १९१६ ला लिहिल्या गेलेल्या पहिल्या चरित्रानंतर हजारो चरित्रे अनेकविध लेखकांनी लिहिली. त्यांतील गंभीर प्रयत्नांचा तौलनिक अभ्यास व्हायला हवा.
A rich American widow goes to France...
"सर्वोच कार्यालयात असताना विदेशी दूतावासातील विदेशी अधिकार्यांसोबत ही हिंदीत बोलायचो. मला कधीच समस्या आली नाही."
ह्यावरून एक गोष्ट आठवली. एक अमेरिकन बडा CEO वारला आणि त्याची काही कोटींची संपत्ति बायकोला मिळाली, अशा अनेक अन्य बायकांप्रमाणेच तीहि प्रवास करायला बाहेर पडली आणि सर्वप्रथम फ्रान्सला जाऊन आली. तिला फ्रेंच बिलकुल येत नव्हते. परत आल्यावर मित्रांनी विचारले की फ्रेंच येत नसल्याने तिची काही अडचण झाली काय? तिने उत्तर दिले: I had no problem because I always spoke in English. But yes, the locals appeared to face a lot of problems!
केवढा हा विनोद!
“विदेशी दूतावासातील विदेशी अधिकार्यांसोबत ही हिंदीत बोलायचो. मला कधीच समस्या आली नाही.”
तुमचे हिंदीतील बोल उपरनिर्दिष्ट अधिकाऱ्यांस त्यांना समजेल अशा भाषेत कोणी दुभाषा सांगत असे काय?
तसे नसल्यास तुमचे ह्मणणे त्यांना कसे कळत असे?
की तुमचे ह्मणणे समजून घेण्याची त्यांना गरज नव्हती? (उदा. ते तुमच्या कचेरीत येत तेंव्हा त्यांना welcome ह्मणण्याऐवजी हात जोडून सुहास्यवदनाने त्यांस “सुस्वागतम” ह्मणणे.)
परराष्ट्रव्यवहारास अत्यावश्यक गोष्टी श्रोत्यांस न कळणाऱ्या भाषेत बोलण्यात कसले शहाणपण आहे? आणि त्यासाठी इंग्रजी वापरण्यात कसला कमीपणा? आणि असा चक्रमपणा तुमचे इतर बाबू भाईबंदही करत असले, तर तुमच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेस माझा खुदा हाफिज!
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय प्रसंगी इंग्रजीत बोलत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ह्मणजे त्यांस देशाभिमान नाही असे तुमचे मत असावे.
…
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय प्रसंगी इंग्रजीत बोलत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ह्मणजे त्यांस देशाभिमान नाही असे तुमचे मत असावे.
त्यांचे इंग्रजीतील भाषण ऐकून, त्यापेक्षा ते हिंदीत का बोलत नाहीत, अशी धारणा अनेकदा होते खरी. (म्हणजे, त्यांचे हिंदीतील भाषण फार सुसह्य असते, अशातला दावा नाही. परंतु, उपदेशांची डोसावली (सर्मनावली) पाजल्याच्या टोनमध्ये बोलून डोके पकवितात, नि लंब्याचौड्या फोका मारतात, एवढ्या दोन इरिटेटिंग गोष्टींकडे जर काणाडोळा केला, तर त्यांचे हिंदीतील भाषण हे हिंदी म्हणून - विशेषेकरून हिंदी उच्चार म्हणून - तितकेसे वाईट नसते. परंतु, मोदींच्या भाषणाच्या दुग्धात जर इंग्रजीची शर्करा जाऊन पडली, तर जी काही म्हणून लज्जत येते, ती बोले तो, रामारामारामा! आणि, सुभानअल्लाह!!!) परंतु, जेथे गरज आहे, तेथे गेला बाजार प्रयत्न तरी करतात, ही गोष्ट, कौतुकास्पद वगैरे म्हणणे अति होईल कदाचित, परंतु वाईट निश्चितच नव्हे; उलट, उचित आहे.
(नाहीतर मग आमचे वाजपेयीजी! मोरारजी सरकारात जेव्हा परराष्ट्रमंत्री होते, तेव्हा संयुक्त राष्ट्रांसमोर जाऊन हिंदीत भाषण केले होते. वास्तविक, वाजपेयीजींचे इंग्रजी तसे वाईट नसावे. परंतु, देशाभिमान! आता, संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजाच्या त्या काळी ज्या पाच अधिकृत भाषा होत्या, त्यांव्यतिरिक्त अन्य कोठल्या भाषेत संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करणे हे नियमांनुसार वर्ज्य अर्थातच नाही. मात्र, त्या परिस्थितीत, अशा भाषणाच्या एका अधिकृत भाषेतील अनुवादाकरिता व्यवस्था पुरविणे तथा अशा व्यवस्थेकरिता लागणारा खर्च उचलणे, याची जबाबदारी संबंधित राष्ट्रावर असते; त्यानंतर मग पुढे त्या अनुवादाच्या उर्वरित अधिकृत भाषांमधील अनुवादांची व्यवस्था तथा त्यांचा खर्च संयुक्त राष्ट्रांकडून उचलला जात असे. कामकाजाच्या अधिकृत भाषांपैकी एका भाषेत भाषण केल्यास, त्याच्या इतर अधिकृत भाषांतील अनुवादाची व्यवस्था तथा तिच्याकरिता लागणारा खर्च या गोष्टी संपूर्णपणे संयुक्त राष्ट्रांकडून हाताळल्या जातात; संबंधित राष्ट्रावर ती जबाबदारी नसते. त्या वेळेस अरबी ही अधिकृत भाषा नव्हती - ती बअसाच नंतर झाली. मात्र, अनेक अरब राष्ट्रांचे प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रांसमोर अरबीतून भाषण करीत, आणि अनुवादाचा खर्चही देत. त्यांना बहुधा ते परवडत असावे. मात्र, भारताची तत्कालीन आर्थिक परिस्थिती ही फ़िज़ूल गोष्टींवर परकीय चलनाची उधळपट्टी करण्यासारखी खचितच नव्हती. वाजपेयीजींच्या राष्ट्राभिमानाचा भुर्दंड अशा रीतीने राष्ट्रास पडला. चालायचेच.)
तार्किक
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो.
हे अपौरुषेय विधान आहे की त्याला काही तार्किक आधार वगैरे आहे?
प्रकृति प्रदत्त गिलोय, अश्वगंधा इत्यादि औषधी प्रभावी ठरल्या.
अरे वा! छानच आहे की. याला काही पुरावा दिलात तर बरं होईल.
लेखकांनी आधीच सांगितलं आहे की
लेखकांनी आधीच सांगितलं आहे की आयुर्वेदिक 'औषधां'चा प्रसार काही गरीब बिचाऱ्या संस्था करतात. त्यांना आधुनिक वैज्ञानिक निकषांवर उतरणं परवडत नाही. त्यामुळे त्यांना कुठचीही विधानं करायला मुभा आहे. तुम्ही 'पुरावे' वगैरे मानून त्या गरीबीच्या जखमेवर मीठ चोळत आहात.
अगदी अगदी स्वर्णिम वाटचाल आहे.
करोना काळात आमच्यापाशी औषध नाही. तरीही प्रोटोकॉलानुसार एलोपैथीची रेमडेसिवीर, हायड्रोक्लोरोक्वीन , फेबुफ्लू इत्यादि कोरोंना विषाणू विरुद्ध निरर्थक औषधी दिल्या गेल्या. . . .
हे एक डोळ्यांत ( रुग्णांच्या नव्हे) अंजन घालणारे आहे.
माझ्यासारख्या सामान्य माणसास बरे करेल ते औषध हेच पटते. कधीकधी मातीही खातो. चणेवाल्यांकडे काही ढेकळं मिळायची पूर्वी. मी हट्ट धरल्यावर चणेवाला म्हणाला "ये तुम्हारे लिए नहीं है।" असो. चालायचंच.
सध्या जगाची वाटचाल सोन्याएवढीच तांबे, लिथिअम, रेअर अर्थस या धातुंकडे आहे. ग्राफाइटही भाव खाऊन आहे.
पंचतत्त्व ही फार अपुरी संकल्पना आहे
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे.>
आधुनिक रसायन शास्त्राचा उदय होण्याआधीची ही संकल्पना आजच्या विज्ञानाच्या संदर्भात नुसती भाबडीच नव्हे तर तद्दन अज्ञानी म्हणायला हवी.
उदाहरणार्थ, वायू तत्वाच्या गटात प्राणवायू, आणि नायट्रोजन दोन्ही येतात. पण एखाद्या रुग्णाला प्राणवायू कमी पडत असताना नायट्रोजन किंवा दुसरा कुठलाही वायू देऊ कराल का?
हीच गोष्ट पृथ्वी तत्वाबाबत होते. जवळ जवळ सर्व मिनरल्स हि पृथ्वी तत्वात मोडतात. त्यांच्या गुणधर्मात इतके टोकाचे फरक आहेत कि उदाहरणे देऊ गेलो तर तुम्हाला टवाळी केल्यासारखे वाटेल आणि तुम्ही रुसून जाल.
नुसत्या ज्ञानेंद्रियांच्या जीवावर केलेली निरिक्षणे वैदिक काळी विज्ञान म्हणून खपून गेली पण आज कालबाह्य झालेल्या या संकल्पनांना केवळ त्या "भारतात" रचल्या गेल्या (अश्या समजुतीतून) म्हणून कवटाळून बसणे तुम्हाला शोभते का?
काँप्लेक्स विषय आहे.
काँप्लेक्स विषय आहे. रेमडेसिविर वगैरेंचा अतिरेक करून सरसकट औषधं दिल्याने लोकांना त्रास झाला -खरं.
ह्यात मेडिकल सायन्सची चूक आहे - खोटं.
पण औषध कंपन्या (पातंजली सुद्धा. फक्त पाश्चात्य नाहीत) झूठे दावे करून मेडिकल सायन्सच्या विरूद्ध जातात - खरं.
लोकांचा गोंधळ होतो - खरं.
पण म्हणून ह्जार वर्षं जुनी अवतार द लाष्ट एअरबेंडर पद्धत वापरून फक्त पृथ्वी-आप-तेज-वायू म्हणून औषधं घेणं - करंटेपणा
बरंच काही टाईप करून शेवटी डोक्यात एवढंच उरलं - "पण लक्षात कोण घेतो?"
तेव्हा असोच.
खरं खोटं करणं संशोधकांसाठी असतं.
रोग बरा होईल का आणि कुठे एवढंच सामान्यांंना हवं असतं.
बाकी मॉडर्न हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी जी काही धावपळ ( अगदी भोंगा वाजवत जाण्यापासून) असते त्याने आपण खूपच योग्य ठिकाणी आलो आहोत असं वाटू लागते.
( तार्किक प्रतिक्रिया नाही, पण अवांंतर. एखादी चालवून घ्या.)
भावना कळली
पण खरे खोटे करणे संशोधकांपुरतेच मर्यादित नसावे. चिकित्सक दृष्टी सामान्य माणसामध्येही यावी. त्यास्तव “वैज्ञानिक दृष्टिकोन” हे ध्येय भारताच्या घटनेतच अंतर्भूत आहे. चारशे वर्षांपूर्वी एक अशिक्षित वाणी ह्मणून गेला : “सत्य असत्यासी मन केले ग्वाही” पण आपण फक्त त्याच्या नावाने टाळ कुटतो!
पारा आणि अर्सेनिक
आयुर्वेदिक अर्क आणि औषधांचे अनेक प्रकार आहेत. पण पुड्यांमधून किंवा वैद्यांनी इन-हाऊस तयार केलेल्या मातकट रंगाच्या गोळ्यांमध्ये अनेकदा शरीरासाठी विषारी ठरतील इतक्या प्रमाणात पारा आणि अर्सेनिक सापडतात. त्यावर असं स्पष्टीकरण दिलं जातं की हा पारा काहीतरी संस्कार झालेला असतो त्यामुळे तो बाधत नाही. अशा गोळ्या घेऊन मर्क्युरी/अर्सेनिक पॉयझनिंग झाल्याची काही उदाहरणं ओळखीतल्या डॉक्टरांनी सांगितली आहेत.
या गोळ्या बनवताना भस्म वगैरे तयार करायच्या पद्धती सगळीकडे सारख्या असतात का आणि त्या जशा लिहिल्या आहेत तशाच सगळीकडे कृतीत आणल्या जातात का यावर कुणाचंतरी नियंत्रण असायला हवं.
माझं मोठ्या फार्मा कंपन्यांबद्दलही फार चांगलं मत नाही. पण निदान तिथे सतत एफडीएची ऑडिट होतात आणि त्यांना एफडीएचा बराच काच असतो हे माहिती असल्यामुळे मी अर्सेनिक किंवा पारा खात नाही एवढीतरी खात्री असते.
बाकी भारतातले अनेक मोठे ब्रँड (डाबर, हिमालया) आयुर्वेदिक 'न्यूट्रास्युटिकल' तयार करतात जी (आपल्या सगळ्यांच्या नशिबाने) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत अशा गोष्टींसाठी तपासली जातात. पण त्यांचा नेमका काय उपयोग होतो हा प्रश्न आहे. अश्वगंधा झोप येण्यासाठी चांगली म्हणतात. मी मध्यंतरी प्रयोग म्हणून ती वापरून बघितली तर मला काहीच म्हणजे काहीच फरक जाणवला नाही. 'इम्युनिटी' वाढते म्हणजे नक्की काय होते आणि त्याचं प्रमाणीकरण कसं करायचं? आणि ते च्यवनप्राश/काढे पिऊनच होतं याचे पुरावे काय असतात?
पुरावा मागताय ?
ही जुर्र्त तुम्ही कशी करू शकता ?
उद्या गोमूत्र पिणे आणि गोमय खाणे हे किफायतमंद असते कशावरून याचाही पुरावा मागाल.
तुम्ही तो MBBS झालेल्या आणि रोज गोमूत्र आणि गोमय प्रश्न करणाऱ्या डॉ मित्तल यांचा व्हिडीओ बघितला नाहीत का ?
पाश्चात्य भोंदू विग्यानाच्या आहारी गेला असावात तुम्ही.
प्राचीन शास्त्रोनमे सर्व लिहिलेलं आहे. तुमचे डोळे लवकर उघडले तर तुम्हाला कळेल सर्व .
हे कशासाठी?
"'ऐसी अक्षरे' व्यवस्थापनाकडून नोंद - सदर लेखात व्यक्त केलेल्या मतांशी व्यवस्थापन सहमत नाही."
ह्या लेखाच्या सुरुवातीसच ही टीप दिसते. सदर लेखात व्यक्त केलेल्या मतांशी मीहि - आणि बहुसंख्य प्रतिसादक - सहमत नाही तरीहि ही टीप मुद्दामहून तेथे देण्याचे कारण काय असावे? अन्य लेखातील सर्व मतांशी व्यवस्थापन सहमत असते काय? नसल्यास अन्य कोठल्याच लेखाच्या प्रारंभी ही टीप का नसते?
समजा माझ्यासारख्या काढेवाल्याने सल्ला दिला . .
आल्याचा रस आणि खडीसाखर खोकल्याला चांगले
आणि कुणी वाचकाने चमचाभर मात्रेऐवजी पेला/कपभर रस तीन दिवस घेतल्यावर तोंड सुजले तर उत्तरदायित्व कुणाकडे हा प्रश्न येऊ शकतो. ऐसीची नोंद यूएसमध्ये असल्यास तिकडचे कायदे लागून केस गुदरल्यास माझे तोंड भाजेल ना. ( तिकडे म्हणे नुकसानभरपाईचे खटले लगेच निकाली लागतात.)
त्यामुळे मी सर्व काढे गुपचूप फुंकून पितो.
औषधं आणि भूमिका
औषधं, खरं तर योग्य औषधांचा अभाव जीवघेणा ठरू शकतो. कोव्हिडबद्दल अजूनही लोकांच्या मनात खूप शंका आहेत - ते अपेक्षितच आहे, कारण अभ्यास पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल. त्यामुळे सामान्य लोकांच्या आणि संशोधकांच्याही शंका जास्त आणि उत्तरं कमी असणार.
मात्र काही बाबतींत अजिबात शंका नाहीत. लशींमुळे रोगाची तीव्रता कमी होण्यासाठी मदत होते; रेमडेसिव्हीर, क्लोरिक्वीन वगैरेंचा फायदा नाही; हे आतापर्यंत आधुनिक वैद्यकानं सिद्ध केलं आहे; वेळोवेळी ऐसीवर त्या संबंधित चर्चा झालेल्या आहेत. लेखात ती वैज्ञानिक पद्धत सोडून बाकी बरंच काही लिहिलेलं आहे. अशा प्रकारानं लोकांची दिशाभूल होणं समाज म्हणून आपल्याला महागात पडू शकतं.
त्यामुळे एरवी अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे सगळं ऐसी व्यवस्थापनाला मान्य असलं तरीही या बाबतीत काहीही औपचारिक भूमिका न घेणं ऐसीला परवडण्यासारखं नाही. किंबहुना, कुठल्याही आब बाळगू पाहणाऱ्या व्यक्ती वा संस्था-आस्थापनांनी अशी 'आपण सहमत नाही हे लोकांना माहीतच असतं', असं गृहितक अजिबात बाळगू नये. विशेषतः अललित लेखनात तर काय गृहितकं धरून हे लिहिलं आहे, हे स्पष्ट केलं तर बहुतेकदा संवाद अधिक सोपा होतो. ऐसीनं विशेषतः ह्या बाबतीत आपल्या वाचकांना गृहीत धरू नये, अशा भूमिकेतून ही टीप मुद्दाम लिहिलेली आहे.
ऐसीच्या बाबतीत, हे आधीच केलं असतं तर बरं झालं असतं. पण निदान आता तरी! ही माझी ऐसीबद्दल व्यक्तिगत भूमिका आहे. ऐसीचे सगळे व्यवस्थापक, हितचिंतक वगैरे मिळून, सगळ्यांशी चर्चा करून हा प्रतिसाद लिहिलेला नाही.
अदिती
+१
“अतार्किक” लेख चालतील, पण वर रेटून खोटे बोलणारे, आणि ज्यांतील सल्ला अंमलात आणल्यास घातक परिणाम होईल, अश्या लेखांवर व्यवस्थापनाने भूमिका घ्यायलाच हवी असे मला वाटते. पटाईत महोदयांचा यापूर्वीचा एक लेख “हेट स्पीच” ह्मणून काढून टाकण्यात आला होता असे स्मरते.
+१
ऐसीच्या बाबतीत, हे आधीच केलं असतं तर बरं झालं असतं. पण निदान आता तरी! ही माझी ऐसीबद्दल व्यक्तिगत भूमिका आहे. ऐसीचे सगळे व्यवस्थापक, हितचिंतक वगैरे मिळून, सगळ्यांशी चर्चा करून हा प्रतिसाद लिहिलेला नाही.
सहमत आहे. That was the barest minimum that could have / should have been done, हे माझे वैयक्तिक मत या निमित्ताने नोंदवू इच्छितो.
अर्थात, या लेखावर हे डिस्क्लेमर दिले याचा अर्थ याव्यतिरिक्त येथे इतर जे जे काही चालते (इन्क्लूडिंग माझा चावटपणा), त्या त्या सर्वास व्यवस्थापनाची संमती/सहमती असते, असा निदान मी तरी घेणार नाही. मात्र, काही मर्यादा (यांची नेमकी व्याख्या – अगदी व्यक्तिसापेक्षसुद्धा! – करणे कठीण आहे!) जेव्हा ओलांडल्या जातात, तेव्हा व्यवस्थापनाने बाकी काही नाही, तरी अशा प्रकारे आपली भूमिका स्पष्ट करणे – गेला बाजार आपली सहमती/संमती नसल्याचे स्पष्ट करणे (‘अंग काढून घेणे’ म्हणा हवे तर!) – हे इष्ट ठरते. (Not that that would stop me from expressing myself howsoever, परंतु तरीही.) अर्थात, हे झाले माझे वैयक्तिक मत.
तसेही, हे खाजगी संकेतस्थळ आहे. कोणाचेही अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी त्यावर नाही. व्यवस्थापन अनेकदा ते जपण्याचा प्रयत्न स्वेच्छेने करते, हे खरे, परंतु तसे ते जपण्यास ते बांधील नाही, हेही तितकेच खरे. किंबहुना, कोणाच्याही कोणत्याही अभिव्यक्तीविरुद्ध, कारणमीमांसेसह वा कोणतेही कारण न देता, पूर्वसूचनेसह वा पूर्वसूचनेविना, योग्य वाटेल ती कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापनास आहेतच, आणि तसे ते असले पाहिजेत. (किंबहुना, अनेकदा, व्यवस्थापन त्या अधिकारांचा पुरेसा वापर प्रसंगी करीत नाही, हीच – असली, तर – तक्रार आहे. अर्थात, हेही झाले माझे वैयक्तिक मत.)
असो. देर आये, लेकिन दुरुस्त आये, हेही खरे.
——————————
(डिस्क्लेमर: प्रस्तुत प्रतिसाद पूर्णपणे कोन्याकच्या तारेत लिहिलेला आहे. मात्र, शुद्धीत असतानाची माझी विचारसरणी तथा मते याहून लक्षणीय रीत्या वेगळी नसतात, हेही या निमित्ताने येथे जाता जाता नमूद करणे इष्ट ठरावे. इत्यलम्।)
बाळकृष्ण आजारी पडले नव्हते.
बाळकृष्ण आजारी पडले नव्हते. फूड poisoning झाली होती. आयुर्वेदावर आज ही अनेक निर्बंध आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर पोटातले विष वाश आऊट करू शकत नाही. कारण त्यांना ती अनुमति नाही. फक्त त्यासाठी त्यांना 24 तास हॉस्पिटल मध्ये राहावे लागले.
आयुर्वेदिक डॉक्टर ऑक्सीजन सुद्धा वापरू शकत नाही. त्यामुळे कोविड उपचार करण्यास आयुर्वेदिक डॉक्टरांना अनुमति नव्हती. महाराष्ट्रात कोविड उपचार करणार्या अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांवर कारवाई ही झाली आहे. भविष्यात चित्र बदलण्याची संभावना आहे.
दिल्लीचे अधिकान्श हॉस्पिटल
दिल्लीचे अधिकान्श हॉस्पिटल रुग्णांना काढा देऊ लागले. का? याचे उत्तर मला एक ही डॉक्टर देऊ शकला नाही.
काढा देणाऱ्या डॉक्टरांना विचारले की नाही ? आणि विचारले असल्यास काढा का देतात याचे साधे उत्तरही देऊ शकले नाहीत ते ?????
आणि फक्त काढा न देणाऱ्या डॉक्टरांना विचारत असल्यास काय उपयोग ?
२१ व्यां शतकात पण माणूस
१) मलेरिया. नी मरतात
२) क्षय. नी मरतात
३) डेंग्यू नी मरतात
४) हार्ट आटॅक कधी पण येतो.
५)कॅन्सर, तर लाज च काढत आहे.
खूप मोठी लिस्ट आहे.
अगदी कंबर दुःखी,गुडघे दुःखी हे पण बरे होत नाहीत.
आणि सर्वात महत्वाचे २१ ब्या शतकात लाखो माणसे corona सारख्या साथी च्या रोगाचे बळी होतात.
ही सर्व उदाहरणे आधुनिक वैद्यक शास्त्र काळाच्या खूप मागे आहे हेच दर्शवत आहे.
विसाव्या शतकात ...
विसाव्या शतकात माणसं अगदी तरुण वयात बाळंतपण, देवी, अनिमिया, गोवर वगैरेंनी मरायची. बायका पोरांची लेंढारं जन्माला घालताना अशक्तपणानं मरायच्या; तरीही एवढी मुलं जन्माला घातली जायची कारण किती मुलं जगतील याची शाश्वती नसायची. आता लशी, योग्य आहार, वगैरेंमुळे मुलं जन्मतात आणि खूप वर्षं जगतात याची खात्री असते. बालमृत्यू हा प्रकार माझ्या वडलांच्या काळात नॉर्मल समजला जायचा. आता त्या आकड्यांकडे खूप लोकांचं लक्ष असतं; तो आकडा कमीत कमी, शून्यवत करण्यासाठी सरकारं धडपडतात.
भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७मध्ये, त्या वर्षी मेलेल्या भारतीय लोकांचं सरासरी वय होतं ३२. हल्ली कुणी त्या वयात गेलं की फार हळहळ वाटते, कारण आपल्या आजूबाजूचे क्वचितच कुणी या वयात मरतात. बहुतेकसे लोक पुरेसे वयस्कर होऊन मरतात. गेल्या वर्षी ते वय ६९च्या आसपास होतं.
लोक आता मोठ्या प्रमाणावर हृदयविकार, कर्करोग, क्षय वगैरे होण्यासाठी जिवंत असतात. हृदयरोग, मधुमेह वगैरे तर आपल्या पूर्वजांना फार नसतीलच; कारण त्यांची जीवनशैली बैठी नव्हती, मोठ्या प्रमाणात कदान्न सहजरीत्या उपलब्ध नव्हतं तसेच ते लोक एवढे मोठे होईस्तोवर जिवंतच राहायचे नाहीत.
वैद्यकशास्त्र मागे आहे का पुढे, हे नंतर बघू. गेल्या शतकात ते जिथे होतं त्याच्या बरंच पुढे गेलं आहे. आयुर्वेद आणि पतंजली वगैरे धंदे आणि भावनिक अपीलं जीव वाचवण्यासाठी उपयुक्त नाहीत. आधुनिक वैद्यकशास्त्रच यात काही ती प्रगती करत आहे; तसा प्रयत्न करत आहे.
आधुनिक वैद्यक शास्त्र ला विरोध करत नाही.
पण मत तर व्यक्त करू शकतो.
20 व्यं शतकात लोकांचे आयुर्मान कमी होते लोक आजाराने लवकर मरायची आणि उपचार नव्हते.
योग्य च आहे मत.
पण त्याची कारणे पण आहेत.
1) अस्वच्छ पाणी, अ स्वच्छता ,गरिबी,पोष्टिक अन्नाचा अभाव .
ही कारणे तर आहेत च .
आणि होणारे आजार पण स्वच्छ ते शीचं संबंधित होते.
१) कॉलरा,
२) हिव ताप.
३) डेंग्यू.
४) हगवण.
५)क्षय .
ह्याच रोगांनी जास्त लोक मरायची त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे .
पण कॅन्सर,मधुमेह,हार्ट अटॅक ह्यांनी मारण्याचे प्रमाण आता
२१ vya शतकात पहिल्या पेक्षा जास्त वाढले आहे.
आधुनिक वैद्यक शास्त्रांनी फक्त कॉलरा, हिवताप,डेंग्यू,क्षय ह्या वर च थोडाफार विजय मिळवला आहे.
बाकी सर्व रोग मोकाट च आहेत.
म्हणजे शास्त्र काळाच्या खूप पाठी आहे ह्या वाक्याला नाकारता येणार नाही.
आधुनिक वैद्यकशास्त्राची देण
पण त्याची कारणे पण आहेत.
1) अस्वच्छ पाणी, अ स्वच्छता ,गरिबी,पोष्टिक अन्नाचा अभाव .
ही कारणे तर आहेत च .
रोगांचा प्रसार जंतूंमुळे होतो आणि हे जंतू अस्वच्छ पाण्यातून, डासांद्वारे वगैरे पसरतात, तद्वत पाणी उकळून प्यावे, डासांचा नायनाट करावा, कुपोषणाने रोगप्रतिकारशक्ती कमी होते, हे ज्ञान आधुनिक वैद्यकशास्त्राने दिले.
ह्याच तत्व नी
आहार विषयी माणसा ला जी माहिती आहे ती आयुर्वेदाची आणि प्राचीन ज्ञाना चीच देणगी आहे.
उत्तम शरीरासाठी योगाचे प्रकार जे शोधले गेले ते प्राचीन ज्ञान च आहे.
व्यायाम करणे जरुरी आहे निरोगी राहण्यासाठी हे प्राचीन ज्ञान च आहे.
कोणत्या वनस्पती ,भाज्या ह्या माणसाच्या आहारात असाव्यात माणसाला खाण्यायोग्य आहेत हे शोध प्राचीन च आहेत.
पृथ्वी असणाऱ्या असंख्य फळा पैकी काहीच फळ मानव खातो ते ज्ञान ंंpरचीन च आहे.
आरोग्य विषयी महत्वाचे ज्ञान तर प्राचीन च आहे.
मग नक्की कशाला आधुनिक म्हणायचे.
सोनोग्राफी,x ray, ही मेडिकल उपकरण आधुनिक आहेत पण त्याचा वैद्यक शास्त्रा शी काही संबंध नाही .
ते फिजिक्स वर आधारित आहेत.
Blood टेस्ट वरून निदान करणे,विषाणू,जिवाणू ची माहिती हे आधुनिक आहे परत हे विषय जीवशास्त्र शी संबंधित आहेत वैद्यक शास्त्र शी नाहीत.
वैधक शास्त्र हे physics,biology, रसायनशास्त्र, असे सर्वांचे योगदान तून यश मिळवत आहे.
आयुर्वेद नी वरील तिन्ही शास्त्रांचा आधार घेतला नाही म्हणून त्याची रोग बरा करण्याची कुवत कमी आहे
म्हणजे काळानुसार भौतिक शास्त्र मध्ये नवं नवीन शोध लागले ,विविध उपकरण तयार झाली.
रसायन शास्त्र मध्ये प्रगती झाली प्रतेक पदार्थाचे रासायनिक वर्गीकरण करून गुणधर्म माहीत होत गेले.
जीव शास्त्र नी अगदी मानवी अवयव चे कार्य कसे चालते इथ पासून प्रतेक पेशीचे कार्य कसे चालते ह्याची माहिती करून दिली..
ह्या सर्वांच्या मदतीने चे आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणून ज्याला म्हणतात ते उदयास आले.
रसायन शास्त्र,भौतिक शास्त्र मध्ये माणसाने प्रगती केली नसती तर आधुनिक वैद्यक शास्त्र पण 100 वर्ष मागे च असते.
रोगाचे निदान करणे पण शक्य झाले नसते.
हे माझे मत आहे.
माझ्या ज्ञान नुसार मांडले आहे.
ते चुकीचे ठरवण्यासाठी जागतिक बुद्धिमान लोकांचा आधार घेवून त्यांची मत देवू नयेत..
भौतिकशास्त्र हे लिटरली
भौतिकशास्त्र हे लिटरली जगातल्या प्रत्येक गोष्टीचे विज्ञान आहे. रसायनशास्त्र सुद्धा भौतिकशास्त्रच (विशिष्ठ गोष्टींचे.)
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या शिवाय काहीतरी दाखवा हि अपेक्षा फार विनोदी आहे.
तरी, -
कांजिण्या, देवी, पोलिओ ह्या रोगांवरच्या लसी, पेसमेकर, चष्मे हि उपकरणे.
गेलाबाजार, सिगारेट फुंकल्यावर कॅन्सर होतो हे आज साधे वाटणारे निरीक्षण सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्राचेच यश आहे.
आयुर्वेदधूम्रछडिकान्याय
गेलाबाजार, सिगारेट फुंकल्यावर कॅन्सर होतो हे आज साधे वाटणारे निरीक्षण सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्राचेच यश आहे.
टू बी फेअर, सिगारेट फुंकल्यावर कॅन्सर होतो हे अनुमान काढणे आयुर्वेदास शक्य नव्हते. सिगारेट (तंबाखू) हा कोलंबियन एक्सचेंजमधून जुन्या जगात आलेला पदार्थ आहे. सबब, आयुर्वेदशास्त्राचे नियम जेव्हा बनविले गेले, तेव्हा तंबाखू नव्हता, तंबाखू नव्हता म्हणून सिगारेट नव्हती, नि सिगारेट नव्हती म्हणून ती फुंकल्यावर कॅन्सर होतो हे निरीक्षण शक्य नव्हते.
दुर्दैवाची गोष्ट अशी, की आयुर्वेदशास्त्राचे नियम एकदा लिहिले गेल्यानंतर पुढे त्यात फारसे संशोधन (पटाइतांच्या भाषेत ‘अनुसन्धान’) झाले नाही. त्यामुळे, सिगारेट फुंकल्यावर कॅन्सर होतो, हे महत्त्वाचे निरीक्षण आयुर्वेदाच्या परिप्रेक्ष्याबाहेर राहिले.
परंतु, चिंतेचे कारण नाही. आता अच्छे दिन येऊ घातले आहेत. ‘पतञ्जलि’ आता हवे तेवढे ‘अनुसन्धान’ करायला सिद्ध आहे. सिगारेट फुंकल्यावर कॅन्सर होतो, हा महत्त्वाचा शोध ते यथावकाश स्वतंत्रपणे लावतीलच. (चाकाच्या शोधासारखा.) सबब, काळजी नसावी.
काडेचिराईत स्पष्टीकरण
गेलाबाजार, सिगारेट फुंकल्यावर कॅन्सर होतो हे आज साधे वाटणारे निरीक्षण सुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्राचेच यश आहे.
हे बेझियन सांख्यिकीचं यश आहे. बेझियन सांख्यिकी आधुनिक वैद्यकाच्या जोडीनं वापरली जाते; आणि आयुर्वेदाला बेझियन (वा क्लासिकल) सांख्यिकीचं वावडं आहे ही बाब निराळी. सांख्यिकी कुठल्याही शास्त्रात/विज्ञानात वा तंत्रज्ञानात वापरता येते.
हा सिग्रेटमुळे कर्करोग होण्याचा कार्यकारणभाव सिद्ध करणं तेव्हा सोपं नव्हतं. त्याचा चमत्कारिक आणि सुरस इतिहास (हौस असल्यास) जुडेआ पर्लच्या 'द बुक ऑफ वाय' ह्या पुस्तकात जरूर वाचा. (जुडेआ पर्ल अंमळ वयस्कर आहे, तेव्हा त्याची थोडी किरकीरही सहन करावी लागेल. पण) विज्ञानाचा इतिहास म्हणून ते वाचायला मला मजा आली.
आकडेवारी आहेमा
नॉन स्मोकर्स पण lungs cancer चे शिकार होतात आणि त्याचे प्रमाण बर्या पैकी जास्त आहे.
ह्याची आकडेवारी Google वर आहे
विनोद नाही केला मी .
खरे आहे ते.
कधीच दारू न पिणाऱ्या लोकांचे लिव्हर खराब होते आणि रोज दारू पिणाऱ्या लोकांचे लिव्हर मस्त असते.
अशी उदाहरणे आहे आणि त्याचे प्रमाण पण बर्या पैकी आहे.
कडीच नॉन वेज न खाणारे,योग्य च आहार घेणारे,कोणतेच व्यसन नसणारे.आर्थिक स्थिती पण योग्य असणारे.रोज व्यायाम करणारे.
फास्ट फूड न खाणारे .वजन जास्त नसणारे.
पण हार्ट अटॅक नी गेलेली उदाहरण माझ्या माहिती मधीलच आठ दहा आहेत.
आधुनिक तेच्या नावाखाली जे दावे केले जातात ते पण खूप लोक चुकीचे ठरवतात.
काहीच उपचार न घेता .hiv व्हायरस पासून मुक्त झालेली उदाहरण पण जगात आहेत.
मास्क पासून कोणतीच काळजी न घेता corona पासून मुक्त राहिलेली लोक पण खूप आहेत.
आणि सर्व नियम तंतोतंत पाळून गंभीर corona झालेली लोक पण खूप आहेत
हे विनोदी नाही .
रिॲलिटी आहे.
THE INSPIRATION (@
THE INSPIRATION (@_theinspiration) Tweeted:
Love this old ad against second hand smoking, featuring the Marlboro Man and his horse. "SECOND HAND SMOKE KILLS" http://t.co/irUhrzWlD7 https://twitter.com/_theinspiration/status/423548006135115776?s=20
सिगारेट न पिणाऱ्यांना सिगारेटचा धूर अधिक घातक आहे. कारण ते धूर पूर्णपणे फुफ्फुसात ओढतात. कसे ते विचारू नका.
आयुर्वेद ही आज आधुनिक निदान
आयुर्वेद ही आज आधुनिक निदान साधने वापरू लागला आहे. पण सरकारी निर्बंध असल्यामुळे ऑक्सीजन, वेंटिलटोर इत्यादि आयुर्वेदिक डॉक्टर वापरू शकत नाही. एवढेच काय तर पोटातले विष ही फ्लॅश करू शकत नाही. शिवाय सरकारी मदत ही नाही. भविष्यात परिस्थिति बदलेल. बहुधा भविष्य integrated चिकित्साप्रणालीचे राहणार अर्थात योग, प्राकृतिक चिकित्सा, एलोपथि, आयुर्वेद, एत्यादी).
आयुर्वेद ही आज आधुनिक निदान
आयुर्वेद ही आज आधुनिक निदान साधने वापरू लागला आहे. पण सरकारी निर्बंध असल्यामुळे ऑक्सीजन, वेंटिलटोर इत्यादि आयुर्वेदिक डॉक्टर वापरू शकत नाही. एवढेच काय तर पोटातले विष ही फ्लॅश करू शकत नाही. शिवाय सरकारी मदत ही नाही. भविष्यात परिस्थिति बदलेल. बहुधा भविष्य integrated चिकित्साप्रणालीचे राहणार अर्थात योग, प्राकृतिक चिकित्सा, एलोपथि, आयुर्वेद, एत्यादी).
+१
‘मार्मिक’ दिली असती, परंतु तूर्तास माझी श्रेणीदानसुविधा काही अज्ञात कारणांस्तव कार्यरत नसल्याकारणाने देऊ शकत नाही, सबब, क्षमस्व.
स्पष्टीकरण अत्यंत समर्पक दिले आहे.
—————
आता लशी, योग्य आहार, वगैरेंमुळे मुलं जन्मतात.
येथे आपल्याला जगतात असे म्हणायचे होते काय? वाक्य आहे तसे वाचल्यास काही चमत्कारिक असा अर्थ प्रतीत होतो. (कृत्रिम गर्भधारणेसंबंधी तंत्रज्ञानाची गरुडझेप?)
भारताला स्वातंत्र्य मिळालं १९४७मध्ये, त्या वर्षी मेलेल्या भारतीय लोकांचं सरासरी वय होतं ३२.
या ३२च्या सरासरीच्या आकड्याचे अधिक स्पष्टीकरण देणे येथे मला वाटते प्राप्त आहे. म्हणजे, सरासरीचा अर्थ तुम्हाला समजतो, याबद्दल माझ्या मनात संदेह नाही. मात्र, यातून तुम्हाला जे सुचवायचे आहे, त्याचे गांभीर्य प्रत्येक वाचकास जसेच्या तसे समजेलच, असे नाही. किंबहुना, हा आकडा जे सुचवितो, ते वरकरणी वाटते तितके गंभीर नसून, वरकरणी वाटते त्याहून कितीतरी अधिक गंभीर आहे, हे स्वयंस्पष्ट नाही.
१९४७ साली (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोठल्याही वर्षी) मेलेल्या भारतीयांचे सरासरी वय ३२ होते, याचा अर्थ, त्या (प्रातिनिधिक) वर्षभरात मेलेले बहुतांश लोक ३२च्या आसपासच्या वयाचे होते, असा नव्हे. दॅट वुड हॅव बीन बॅड इनफ. परंतु, तसे नसावे. किंबहुना, त्या वर्षी मेलेल्या भारतीयांपैकी अनेकांचे मृत्युसमयीचे वय ३२हून कितीतरी अधिक - अगदी ५०, ६०, ७०सुद्धा असणे शक्य आहे. परंतु समजा, त्या वर्षी मेलेल्या एखाद्या मनुष्याचे वय ७० आहे. तर सरासरी (राउंड फिगर म्हणून समजा ३२ऐवजी) ३० आणण्यासाठी त्या वर्षी भविष्यात दहा वर्षांनंतर जन्माला येऊ घातलेल्या एका मनुष्याला आगाऊ मरावे लागले असते. ते अर्थातच शक्य नसल्याने, त्याऐवजी १० वर्षे वयाच्या २ मुलांना (किंवा १५ वर्षांच्या एका मुलाला नि ५ वर्षांच्या दुसऱ्या मुलाला) मरावे लागले असते. नपक्षी, १७ वर्षांच्या २ तरुणांना नि १६ वर्षांच्या एका तरुणाला. किंवा, २० वर्षांच्या ४ तरुणांना. किंवा, २२ वर्षांच्या ५ तरुणांना, वगैरे वगैरे. ( सर्व टर्म्स लिंगनिरपेक्ष आहेत.)
सांगण्याचा मतलब, सरासरी मेंटेन करण्यासाठी, सरासरीहून पुष्कळ अधिक वर्षे जगून मरणाऱ्या प्रत्येक दीर्घायुषी थेरड्याबरोबर:
१. सरासरीहून पुष्कळच कमी वय असलेल्या काही तुरळक बालकांचा बळी द्यावा लागेल, किंवा
२. सरासरीहून थोडेच कमी वय असणाऱ्या अनेक तरुणांचा बळी द्यावा लागेल.
दोहोंपैकी कोठला पर्याय अधिक वाईट आहे, हे सांगणे कठीण आहे. परंतु, सांगण्याचा मतलब, मरण्याचे सरासरी वय जेव्हा कमी असते, तेव्हा, सरासरीहून पुष्कळ अधिक जगून मरणाऱ्या प्रत्येक थेरड्याच्या दीर्घायुष्याचा भुर्दंड हा सरासरीहून कमी वय असलेल्या बालकांस वा तरुणांस आपल्या अकाली मृत्यूच्या रूपाने चुकवावा लागतो. म्हणजेच, ३२ हा मृत्युसमयीच्या सरासरी वयाचा आकडा हा ३२हून कमी वयोगटातील मृत्यूंच्या प्रमाणाकडे अप्रत्यक्ष रीत्या निर्देश करतो. माझ्या मते, ही अधिक गंभीर बाब आहे.
उलटपक्षी, मरण्याचे सरासरी वय जेव्हा पुष्कळ असते, तेव्हा ही अडचण तितकीशी येत नाही. म्हणजे, तेथे अकाली मरणाऱ्या प्रत्येक बालकास सरासरीत बॅलन्सौट करण्याकरता अनेक थेरड्यांस दीर्घायुषी होऊन मरावे लागते. विच इज़ नॉट सच अ बॅड थिंग अॅट ऑल! अर्थात, कोठल्याही समाजाची लोकसंख्या ही कोठल्याही दिलेल्या क्षणी सान्त असल्याकारणाने, मरण्याचे सरासरी वय अधिक आहे ही बाब अप्रत्यक्षपणे अशा समाजात बालमृत्यूंचे प्रमाण अत्यल्प असण्याकडे निर्देश करते.
(तर्कात काही गडबड आढळल्यास कृपया लक्षात आणून द्यावी, तथा यथोचित दुरुस्त करावी. आगाऊ आभार!)
अर्थात, हॅविंग सेड दॅट, १९४७ हे बेंचमार्क वर्ष म्हणून कितपत उपयुक्त ठरावे, याबद्दल साशंक आहे. कारण, त्या वर्षी मिळालेल्या स्वातंत्र्याबरोबरच झालेल्या फाळणीतील हिंसाचारात घडलेल्या मृत्यूंचे पॅटर्न्स हे कदाचित दुसऱ्या एखाद्या सर्वसाधारण वर्षाच्या तुलनेत मृत्युसमयीच्या वयासंबंधीचा डेटा स्क्यू करण्याची, डिस्टॉर्ट करण्याची शक्यता वाटते. (चूभूद्याघ्या.)
लोक आता मोठ्या प्रमाणावर हृदयविकार, कर्करोग, क्षय वगैरे होण्यासाठी जिवंत असतात.
अत्यंत दाहक (परंतु तितकेच सत्य) विधान!
हृदयरोग, मधुमेह वगैरे तर आपल्या पूर्वजांना फार नसतीलच; कारण त्यांची जीवनशैली बैठी नव्हती, मोठ्या प्रमाणात कदान्न सहजरीत्या उपलब्ध नव्हतं तसेच ते लोक एवढे मोठे होईस्तोवर जिवंतच राहायचे नाहीत.
ही सर्व कारणे अर्थात असू शकतीलच. परंतु, त्याव्यतिरिक्त, त्या काळातील वैद्यकीय ज्ञान तथा तंत्रज्ञान यांच्या एकंदर मर्यादा, वैद्यकीय सेवांची तथा सुविधांची उपलब्धता, झालेच तर आत्यंतिक गरज असल्याखेरीज वैद्यकीय सेवांचा लाभ न घेण्याची जनसामान्यांची वृत्ती, आणि या सगळ्यांच्या डोक्यावर वैद्यकीय बाबतींत समाजात असलेले प्रचंड अज्ञान तथा अनास्था, हे सर्व (आणि कदाचित आणखीही) घटक जमेस धरता, बहुतांश वेळी या रोगांचे मुळात निदानच होत नसण्याची, आणि मुळात निदान न झाल्यामुळे हे रोग त्या काळी फारसे कोणाला होत नसत असे (भ्रामक) चित्र उभे राहत असण्याची शक्यता लक्षात घेतली आहेत काय?
(एका बाजूस कदान्न उपलब्ध नव्हते/जीवनशैली बैठी नव्हती, तर उलटपक्षी तेवढे मोठे होईपर्यंत लोक जिवंतच राहत नसत, हे काहीसे विरोधाभासी वाटत नाही काय? कदाचित, यांतील प्रत्येक बाब ही स्वतंत्ररीत्या खरी असली, तरीही?)
बाकी ठीक.
सांख्यिक युक्तिवाद योग्य वाटतो
याचसाठी mean, median आणि mode हे सरासरी समजून घेण्याचे वेगवेगळे मार्ग वापरले जातात.
मरणाऱ्यांच्या वयाचा mean कमी असतां (उदा. ३०) median त्याहीपेक्षा कमी, आणि mean पुष्कळ ज्यास्त असतां median त्याहीपेक्षा ज्यास्त येत असावा, असा माझा अंदाज आहे.
Life expectancy (typically reckoned at birth) हा मात्र पूर्णत: वेगळाच प्रकार आहे.
१९४७ साली वरीलपैकी कोणते मोजमाप ३२ होते, कोण जाणे.
भारतात ज्यांचे वय वाढले आहे
त्यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
त्या वेळी त्यांचा आहार कसा होता?
कोटुंबिक वातावरण कसे होते?.
प्रदूषण किती होते. पाणी आणि हवा?.
शारीरिक हालचाल कोणत्या स्थिती मध्ये होती?
झोप त्यांना किती मिळत होती?
मानसिक त्रास किती होता?
ह्या कारणांचा विचार न करताच फक्त मॉडर्न उपचार मुळे आयुष्य वाढले ?
हा निष्कर्ष कसा काढला!
२०२१ मध्ये ह्यांचा जन्म झाला आहे ती पिढी किती वर्ष जगली पाहिजे?
१५० वर्ष जगलीच पाहिजे
Wait and watch.
१५० ki फक्त ४०. वर्ष.
सर्व तार्किक प्रतिक्रियांचे
सर्व तार्किक प्रतिक्रियांचे स्वागत आहे.