Skip to main content

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

रूपयाचे चिन्ह अन रूपयाचे अवमुल्यन

जुलै २०१० मध्ये भारतीय रूपया या चलनाचे नविन चिन्ह स्विकारले गेले. दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

मुळात देवनागरी वर्णमालेत रू. हे अक्षर सुटसुटीतपणे लिहीता येत असतांना हे नविन चिन्ह स्पर्धेव्दारे निवड केले जाणे हेच मोठे अतार्तीत होते. जुने रू. चिन्ह रदबदली करून अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत. जेथे जेथे रू. हे चिन्ह वापरत होते तेथे तेथे नविन रूपयाचे चिन्ह वापरावे लागले असेल. टांकसाळीत नविन डाईज, नोटांवर नविन छपाई आदींमध्ये बदल करावे लागले असतील.

त्याचबरोबर संगणकाच्या लिपीमध्येही हे चिन्ह तयार करावे लागले. हा नविन फॉन्ट म्हणजे केवळ इमेज म्हणून वापरला गेल्याने बहूतेक ठिकाणी तो ठिगळासारखा दिसतो हे मान्य करावे लागेल.

नाविन्याचा शोध घ्यायला हरकत नाही पण ज्या गोष्टी प्रचलित आहेत, सोप्या आहेत त्या बदल करून काय मिळते?
या बदलाआधी रूपया हे अक्षरात लिहीता येत होतेच की. आणि केवळ चिन्ह बदल केला म्हणजे फार काही मोठी गोष्ट केली असे होत नाही. चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही.

देवनागरी वर्णमाला रूपया हे अक्षर रू. या चिन्हात लिहीण्यासाठी परिपुर्ण असतांना केवळ काहीतरी वेगळे करायचे हे ठसविण्यासाठी रूपयाचे नविन चिन्ह स्विकारले गेले असे म्हणता येईल.

अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत. भारत सरकारने रू. हे जुनेच चिन्ह कायम करावे कारण तेच जास्त लोक अजुनही वापरतात व त्याद्वारे देवनागरी लिपीची ओळख नष्ट होत नाही.

पाषाणभेद Sun, 18/08/2013 - 06:53

हा लेख लिहील्यानंतर रूपयाच्या नविन चिन्हावर अधिक प्रकाश टाकणारा http://anil.org.in/2010/08/26/new-indian-rupee-symbol-and-the-design-problems/ हा ब्लॉग सापडला.

हे नविन चिन्ह स्विकारतांना भ्रष्टाचार झालेला आहे. याविरूद्ध saveindianrupeesymbol.org ही संघटना कायदेशीर लढाही देत आहे.
कृपया आपण अधिक माहीतीसाठी वरील ब्लॉगवर असलेल्या लेखाखाली असलेल्या कमेंट्स वाचू शकतात. त्यात रोहन या नावाने लिहीलेली कमेंट उल्लेखनीय आहे.

'न'वी बाजू Sun, 18/08/2013 - 19:21

रुपयाचे नवीन चिन्ह अनावश्यक होते, हे म्हणणे कदाचित मान्य करण्यासारखे आहे. (म्हणजे, रुपयाकरिता नवीन चिन्ह बनवू नये, असा दावा नाही, परंतु बनवले नसते, तरी काहीही बिघडले नसते, हे खरेच. किंवा, बनवल्यामुळे काही विशेष फरक पडण्यासारखा होता, अशातलाही भाग नाही.)

मात्र, रुपयाच्या अवमूल्यनाचा रुपयाचे नवे चिन्ह अमलात आणण्याशी संबंध समजला नाही. (समजा, रुपयाचे नवे चिन्ह अमलात आणले नसते, तर रुपयाचे अवमूल्यन झाले नसते, असे कोणास नेमके का वाटावे?)

नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे.

हम्म्म्... ही सूचना मात्र विचारात घेण्यासारखी आहे. म्हणजे, गांधीजींनी तोंड फिरवलेली प्रतिमा अधिक समर्पक ठरावी, हे खरेच.

नितिन थत्ते Sun, 18/08/2013 - 20:09

ऐला ही भारीच न्यूज आहे.

म्हणजे या सगळ्याला (रुपयाचे अवमूल्यन वैग्रेला) सरकार जबाबदार नाही ?

अरविंद कोल्हटकर Sun, 18/08/2013 - 22:26

"दैनिक सामनाच्या या बातमीनुसार अंकशास्त्रतज्ञ तसेच वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांच्या तज्ञांच्या मते हे चिन्ह अशुभ आहे. केवळ या कारणामुळे रूपया या चलनाचे अवमुल्यन अंतरराष्ट्रीय बाजारात होते आहे असेही या तज्ञांना वाटते. हे चिन्ह बदलण्यात यावे व त्याचबरोबर नोटांवर असलेली गांधीजींच्या प्रतिमेचीही दिशा बदलवण्यात यावी असे या तज्ञांनी सुचवलेले आहे."

रुपयाची घसरती किंमत ह्या अर्थशास्त्राशी संबंधित विषयात अंकशास्त्री (Numerologist?), वास्तुशास्त्री, लिपिशास्त्री (हातच्या लिखाणावरून स्वभाव, व्यक्तीचे भविष्य इ. सांगणारे) ह्यांचे मत घ्यायचे असेल तर ज्योतिषी, पोपटाकडून पत्ते उचलणारे, चहाच्या गाळातली पाने वाचणारे, डुकरांच्या आतडयांवरून भविष्यवाणी सांगणारे अशा शास्त्रज्ञांना का वगळावे? त्यांनाहि विचारून पाहू. कदाचित त्यांच्यापाशीहि उत्तरे असतील.

On a more serous note, माझी समजूत अशी आहे की सर्व भाषांमध्ये वापरता येणारी स्वतःची स्वतन्त्र खूण ही केवळ डॉलर्स, पौंड्स, येन, युरो अशा काही महत्त्वाच्या चलनांनाच आहे. भारताने अशीच आपली खूण निर्माण करणे हे आर्थिक क्षेत्रातील भारताच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे आणि आपण पाय न ओढता ह्या कारणासाठी तिचे स्वागत केले पाहिजे. 'नोच्चार्थो विफलोऽपि दूषणपदम्', 'Not failure but low aim is a crime'.

राजेश घासकडवी Mon, 19/08/2013 - 02:24

रुपयाचं अवमूल्यन होण्याचं कारण बहुतेक स्त्रियांच्या कपड्यांमध्ये असावं. अमेरिकेचं स्टॉकमार्केट बायकांच्या स्कर्टच्या लांबीबरोबर खालीवर जातं त्याप्रमाणे.

विसुनाना Mon, 19/08/2013 - 12:09

रुपयाचे चिन्ह गेले उडत!

परदेशस्थ देशप्रेमींना आवाहन / आव्हान ;) :
यूएसए आणि तत्सम देशात रहाणार्‍या सर्व भारतदेशप्रेमींना कळकळीची नम्र विनंती अशी की कृपया आपली (डॉलरमधली)जास्तीत जास्त जमापूंजी भारताच्या स्टॉक मार्केट/बँकांमध्ये (रुपयात) ताबडतोब गुंतवून भारताचे मार्केट आणि चलन या दोन्हींना वर आणण्यासाठी हातभार लावावा.

भारत आर्थिक दृष्टीने प्रगतीपथावर असल्याने त्यांचे मुद्दल भरपूर फायद्यासह काही काळातच परत मिळेल याची त्यांना नव्याने खात्री द्यायला नको.

सहज Mon, 19/08/2013 - 12:33

In reply to by विसुनाना

परदेशस्थ देशप्रेमींना ह्या अत्यंत दुर्मीळ व अल्पसंख्यांक गटालाच आवाहन केल्याबद्दल निषेध. [ स्वगतः विसुनाना काँग्रेसधार्जीणे दिसतायत]

गेल्या एक दोन वर्षापासुन रुपयाची घसरगुंडी चालु आहेच. ७ ऑक्टो २०१२ मधे १ यु एस डॉ = ५१.७३ रु होत. समजा तेव्हा समजा प.दे.[परदेशस्थ देशप्रेमी] नी १ लाख डॉलरा पाठवले असते व समजा बँकेने अगदी १०% व्याजदर दिला असता तरी मिळाले असते ५१.७३ + ५.१७३ = ५६.९०३ लाख. तेव्हा न पाठवता काल पाठवले असते तर साधारण ६२ लाख मिळाले असते. एका भारतीयाचे नुक्सान एक भारतीयच करतो ते असे!! [तसेही म्हणतातच ना काँग्रेस आव आणतो अल्पसंख्यांकांची कळवळ असल्याचा पण ऐनवेळी नुकसान करतो. ;-)] त्यामुळे आवाहनाला लगेच प्रतिसाद देउ नका. थोडे थांबा, भारत अजुनही प्रगतीपथावर आहे, घाई कशाला?

त्या उलट समस्त देशवासीयांनी पाउस पडला म्हणुन लगेच गां$खाली गाडी घेउन आयात केलेले पेट्रोल, डिझेल जाळून गड गड, किल्ले किल्ले हिरवळ हिरवळ छानछौकी टाळावी, चला राया सोनाराकडे हार घेउ चला असली तुणतुणी बंद करावी, खनिज उत्पादन वाढवून, उठसुट नवे इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल, कॅमेरे विकत न घेउन बहुमुल्य परकीय चलन वाचवावे व रुपया प्रगतीपथावर ठेवायला मदत करा. ;-)

नाना आप आगे बढो हम तुम्हारे साथ है!!

विसुनाना Mon, 19/08/2013 - 13:48

In reply to by सहज

न्हाई, पन आमचे अन्ना थकडं ग्येले आणि थतं स्वातंत्र्यदिनाची परेडबी झाली त्ये फटू बघून वाटलं आता काय बिशाद हाये रुपया घसरण्याची? समदे लोकं आता डावलरं वततेत हिकडं!
तसं काय न्हाई व्हय? आर्तिच्या!!

सहज Mon, 19/08/2013 - 13:58

In reply to by विसुनाना

थतं स्वातंत्र्यदिनाची परेडबी झाली. अन त्येबी ३३वी होती अगुदर ३२ वर्श जाल्या नव्हं!!! आता तर आर्बीआयबी रगुराम फ्रॉम हामरिका बघ्तुया... म्या काय म्हन्तो जल्ला मरु दे रुपया, आजपासुन आप्न सम्दी म्हंजी आप्ल सरकारबी डावलर वापराया लागू आक्शी ऑफीशियली.. मग बघु कुठं कोन घसरतयं!!

विसुनाना Mon, 19/08/2013 - 14:38

In reply to by सहज

आप्ल्याकडं डावलरं वापरायची तर मंग ते 'सरदारजी ज्योक' सारकं करूया काय? सरळ अमेरिकेइरुद्द लडाई करायची. आपुन हारलो की तेन्ला म्हनायचं आता आमचं काय करायचं ते तुमीच बगा. ;)

सहज Mon, 19/08/2013 - 15:11

In reply to by विसुनाना

किम जाँग उन म्हणतो, आ देखे जरा, पण करतेय का अमेरिका लढाई?
कॅस्ट्रो, चावेज म्हणायचा आओ बिन्धास्त गेली का अमेरिका?
मंग उगाच का येईल आपल्याकडं?

आपण म्हणूया फूल तेलंगाणा म्हणजे 'तेलच तेल' आहे मग कुठे लक्ष जाईल त्या बयेच आणी येईल..;-)

अरविंद कोल्हटकर Tue, 20/08/2013 - 03:06

एका देशप्रेमी भारतीयानं दोन वर्षांपूर्वी १ कनेडिअयन डॉलर = रु ४६.५० असतांना भारताला मदत म्हणून - आणि ताकाला जायचं तर भांडं कशाला लपवायचं - माफक अवमूल्यन गृहीत धरूनहि कॅनडापेक्षा थोडं अधिक व्याज सुटेल म्हणून १०,००० कनेडिअन डॉलर्स एन.आर.ई खात्यात ठेव म्हणून पाठवले. त्याचे रुपये झाले रु.४६५,०००. त्यावर ९ टक्के चक्रवाढव्याज धरूनहि ती रक्कम आज रु.५५२,४६६ झाली आहे. आज १ कनेडिअन डॉलर रु ६० च्या घरात आहे म्हणजे त्याच्या गुंतवणुकीवर आता त्याला कनेडिअन डॉलर ९,२०७ परत मिळतील - तेहि भारतातील बँकेच्या अधिकार्‍यांचा सतत पाठपुरावा केल्यास आणि भारतात त्याच्या बाजून कोणी भाऊ-मेव्हणा-काका-मामा बँकेत चकरा मारून कंटाळेल तेव्हा.

भारतात असली आतबट्ट्याची आणि (शब्दशः) लाखाचे बारा हजार करणारी गुंतवणूक केल्याबाबत तो आता स्वतःला मूर्ख समजत आहेच पण अन्य कोणी भारतीयांनी देशप्रेमाने प्रेरित होऊन असले काही करू नये म्हणून प्रचार करीत आहे.

येत्या दीडदोन वर्षात तरी ह्यात काही बदल संभवत नाही. ऋषिकेश ह्यांचा संसदेच्या कामकाजाचा धागा चालू आहे त्यावरून असा ग्रह होतो कारण तेथे गोंधळ आणि कामकाजाला तहकुबी ह्याशिवाय दुसरे काही चालतांना दिसत नाही.

१०-१५ वर्षापूर्वी भारत सरकारने एन आर आय डीपॉझिट स्किम काढली होती. भारतातला व्याजाचा दर हा नेहमीच एन आर आय लोकांच्या रुचिचा प्रश्न राहिला आहे. आजमितीला भारतात एन आर आय लोकांची भारतात ३००० ते ३५०० कोटी रु ची डॉलर डीपॉझिट आहेत. ३,००,००० कोटी रुपयामधे आहेत. इतकी गुंतवणूक असण्याचे कारण long-term मधे हा पर्याय इतर पर्यांयांपेक्षा चांगला आहे म्हणूनच आहे, देशप्रेमाने नाही.

आपल्या मित्राने (त्याच्या वाईट नशीबाने) रुपया भयंकर गतीने पडायला चालू होण्यापूर्वी गुंतवणूक केली. Given he is long in CAD, त्याचे नुकसान झाले आहे. गुंतवणूक म्हटले कि असे व्हायची शक्यता असते. रुपयाच्या गडगडाच्या अगदी प्रारंभी ज्या ज्या लोकांनी गुंतवणूक केली ते खरोखरीच दुर्दैवी. पण त्याने भारतीतील निवेशाचे महत्त्व कमी होत नाही.

गुंतवणूकीमधे timing the market हा प्रकार असतो. आता रुपया न भूतो न भविष्यति असा पडला आहे. This is the right time to send money to India. कदाचित रुपया याच पातळीवर टिकून राहिल किंवा वधारेल. ४.५% CAD तूट आहे म्हणजे ती द्यायची राहीली आहे असे होत नाही, ती देऊन झाली आहे म्हणून रुपया पडला आहे असे आहे. डॉलर जेव्हा ५० चा ६० झाला आहे तेव्हा भारतीय निर्यातीचा competitiveness २०% वाढला आहे. (४५ चा ६३ म्हणजे आपणच मोजा). दीर्घकालामधे आता केलेली गुंतवणूक खूप फायदा देऊन जाण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकीची आणि देशप्रेमाची गल्लत करू नये.

पाषाणभेद Tue, 20/08/2013 - 05:23

चर्चेचा उद्देश केवळ एकाचेच मत ग्राह्य न धरता त्या चर्चेच्या अनुषंगाने इतर मुद्यांनाही स्पर्श व्हावा हा असतो. या लेखाद्वारे आपण सर्वांनी रूपयाचे नविन चिन्ह व त्याची घसरण यावरील अनेक मुद्यांना स्पर्श केलात.

मुळात माझा अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र, भविष्य आदिंवर अजिबात विश्वास नाही. भविष्य, बुवाबाजी यांवर काही रचनाही केल्याचे काही वाचकांना स्मरत असेल.
म्हणूनच "अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र काहीही म्हणोत" असले वाक्य माझ्या लेखात मी वापरले आहे. बहूतेक वाचकांना मी अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, लिपीशास्त्र यांचा संबंध रूपयाच्या घसरणीशी आहे याचे समर्थन करतो आहे असे वाटून त्यांनी प्रतिवाद केल्याचे दिसून आले.

दै. सामनामधील प्रस्तूत लेखातील बातमी वाचून त्यावर टिका करण्यासाठी व रूपयाचे नविन चिन्ह कसे गरजेचे नव्हते ते ठसविण्यासाठी हा चर्चेचा धागा मांडला. माझ्या मुळ लेखात केवळ पहिल्या परिच्छेदात मी मुळ बातमीचा संदर्भ घेतला आहे.

संगणकावर तयार केलेल्या अक्षरांच्या लिपीतील वाक्यांमध्ये हे नविन चिन्ह खरोखर धेडगुजरी दिसते. ह्या नविन चिन्हाचे संगणकीय फॉन्ट फॅमेलीज मध्ये रूपांतर अजूनही योग्य पद्धतीने न केल्याने केवळ एकाच फॉन्ट फॅमेलीमधील चिन्हाचा उपयोग संगणकीय वाक्य लिहीतांना होत असल्याने त्या वाक्यात या चिन्हाची सलगता आढळून येत नाही. श्री. अभ्या... यांनी या मुद्याबाबत चांगले विवेचन केले आहे.

दुसरा मुद्दा असा की रूपयाचे नविन चिन्हामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत फार काही क्रांतीकारक बदल घडून येणार नव्हता. अंकशास्त्र किंवा इतर तत्सम शास्त्रांच्या तत्वाचा व नविन चिन्हामुळे अर्थव्यवस्थेच्या घसरणे/ चढणे यांचा काही संबंध नाही ही बाजू मांडण्यासाठी मी "चिन्हात बदल केल्याने ज्या गोष्टी रूपया किंबहूना भारतीय चलनासोबत होत होत्या व भविष्यातही होत राहतील त्यात काही बदल होणार नाही" असे म्हटलेही आहे.

रूपयाचे नविन चिन्ह लागू करण्याआधीपासून देवनागरी वर्णमालेत रूपया हे चिन्ह "रू" अक्षराने आधीच परिपूर्णरित्या लिहीता येत होतेच. हे देवनागरी चिन्ह रूपया हे चलन वापरणार्‍या कोणत्याही देशांत (पाकीस्तान, श्रीलंका व इतर) वापरत नसतांना त्याचे वेगळेपण सिद्ध करीतच होते. त्याचमुळे रूपयाचे अगदीच वेगळे असे धेडगुजरी चिन्ह वापरात आणण्याची काहीच गरज नव्हती.

हे चिन्ह स्पर्धेद्वारे निवडल्या जाणार्‍या प्रक्रियेत असंसदीय पद्धत अवलंबली गेली. काही सामाजीक संघटना याविरूद्ध कायद्याची लढाई देत आहेत. ही बाबदेखील रूपयाच्या नविन चिन्हाकडे दुर्लक्षून चालणार नाही.

राहता राहीला नोटांवर असणार्‍या गांधीजींच्या प्रतिमेचा मुद्दा. भारतात इतरही अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या. त्यांच्या प्रतिमाही नोटांवर छापण्यायोग्य आहेत. जर सरकारला त्यात राजकारण होते आहे असे वाटत असेल तर आपल्याकडे अनेक विषय आहेत जे नोटांवर भारतीय अस्मिता म्हणून छापले जावू शकतात जसे एखादा धबधबा, प्राणी, एखादे उत्कॄष्ट चित्र आदी. आपल्याकडेही जुन्या नोटेवर वाघाचे चित्र, भाक्रा नांगल धरणाचे चित्र होते हे चांगलेच आठवते.

गांधीजींचे चित्र नोटांवर आताच्या नकली नोटांच्या प्रश्नामुळे कसे अयोग्य आहे याबद्दल एक विनोदी विचार माझ्या मनात आहे. गांधीजींच्या डोक्यावर केस कमी होते. त्या डोक्याची प्रतिमा/चित्र नकली नोट बनवणार्‍यांना कमी श्रमात बनवता येणे लवकर शक्य होते. तेच चित्र जर एखाद्या भरघोस नेत्याचे असेल तर संगणकावरही जुळणी करतांना अवघड गोष्ट होते. तसली जुळणी करतांना त्या ऑपरेटरच्या डोक्याचे केस उडून जावू शकतील अशा भरघोस डोक्यावरचे केस असणार्‍या नेत्याचे चित्र नोटांवर असायला हवे. असो.

रूपयाच्या नविन चिन्हामुळे सामान्यमाणसाच्या अन भारताच्या आर्थिक बाबतीत असणारे प्रश्न सुटणार नाहीत तसेच नविन चिन्ह नाकारले जावून इतर चिन्ह स्विकारले जाणे हेही शक्य नाही. भारताचे आर्थिक बाबतीत अनेक प्रश्न विलंबीत असतांना केवळ चिन्ह बदल करणे ही गोष्ट म्हणजे फार काही मोठी गोष्ट करतो आहे हे सिद्ध करण्यासाठी हे नविन चिन्ह स्विकारले गेले अशी माझी भावना आहे.

या चर्चेत भाग घेणार्‍यांचे व सर्व वाचकांचे आभार मानून या चर्चेचा समारोप करतो.