Skip to main content

मातृभाषेची सेवा

1 minute

आपल्या मातृभाषेचा आदर आणि अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषांचा अपमान आणि द्वेष करावा हे सर्वस्वी चूक आहे. इतर भाषांचा अपमान करून मातृभाषेची सेवा होत नसून मातृभाषेत बोलून, लेखन वाचन करून, लेखकांची पुस्तके विकत घेऊन त्यांना दाद प्रोत्साहन देऊन, इतर भाषेतील उत्कृष्ट साहित्य मातृभाषेत आणून तसेच शब्दकोश सतत वृद्धिंगत करून ती सेवा घडत असते आणि मातृभाषा टिकून राहते. खरा मातृभाषेचा पुरस्कर्ता इतर भाषाही तेवढयाच तन्मयतेने शिकतो, वाचतो, बोलतो, लिहितो. सगळ्या भाषा अापण शिकू शकत नाही पण मातृभाषेव्यतिरिक्त कमीत कमी जागतिक ज्ञानभाषा, जेथे राहतो तेथील राष्ट्रभाषा, ज्या राज्यात आपण राहतो तेथील राज्यभाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे.

Node read time
1 minute

राही Tue, 03/03/2015 - 11:49

या विषयावर बरेच लिहिले गेले आहे. अधिक काही लिहिणे म्हणजे चर्वित चर्वणच. पण इतरत्र दिलेला प्रतिसाद डकवावासा वाटतो.

क्रयशक्ती वाढवा...
एक अगदी पायास्वरूप म्हणजे मुळातले तत्त्व असे की धनिक श्रेष्ठींची चाकरी आणि अनुकरण करण्यात इतर लोक धन्यता मानतात. त्यांची भाषा, वागणे, संस्कृती ही फॅशन म्हणून किंवा सोयीची म्हणून स्वीकारतात. त्यांच्यासाठी आपल्या स्वतःच्या वागण्या-बोलण्यात बदल करतात. ह्याचे ठळक उदाहरण म्हणजे गुजराती भाषा. अगदी विज़ासाठीची मुलाखतही गुजराती लोकांना गुजरातीतून देण्याची सोय आहे. शेअर बाज़ारात सर्वत्र गुजरातीच चालते. वाहिन्यांवर भले इंग्लिशमधून विश्लेषण असो पण सगळे व्यवहार गुजरातीतून होतात.
किंवा, मराठी लोक प्रवासी, टूरिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दुकानदार आणि फेरीवाले मोडक्यातोडक्या मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करतात. हे कश्मीरमध्ये विशेषकरून जाणवले.
तेव्हा आपली क्रयशक्ती महत्त्वाची. नुसते कागदी ठराव करून किंवा भाषादिन साजरे करून किंवा जबरदस्तीने दुकानांच्या पाट्या बदलून किंवा अगदी सरकारी पाठिंब्यानेही भाषेची महती वाढत नसते. मग ती अभिजात ठरो वा न ठरो.
भाषा ही पुस्तकांत न राहाता लोकव्यवहारात उतरली पाहिजे, जशी मराठी भाषा अठराव्या शतकात होती. म्हणजेच लोकव्यवहारांचा वेग आणि परीघ वाढला पाहिजे, लोकांमध्ये उद्यमशीलता, स्थलांतर, देशांतर वाढले पाहिजे. याही बाबतीत गुजरात्यांचे उदाहरण समर्पक ठरेल. त्यांचा डायास्पोरा जबरदस्त आहे. पाचही खंडांत आहे, अमेरिका-आफ्रिकेमध्ये आहेच आहे, अगदी चीनमध्येही आहे. सिंधी लोकांचाही डायस्पोरा आहे पण त्यांचा स्वतःचा असा प्रांतच नसल्यामुळे तो प्रभावशाली वाटत नाही. त्यामुळे त्यांची भाषावृद्धी झाली नाही. पण आता कच्छमध्ये त्यांचे एक सांस्कृतिक केंद्र उभे राहाते आहे. त्याचे उद्दिष्ट जगभरच्या सिंधी बांधवांना एक संस्कृती आणि भाषाकेंद्र निर्माण करणे हे आहे.
माझा मुद्दा हा आहे की अमुक भाषेत किती पुस्तके प्रसिद्ध झाली हा मापदंड नसून त्या भाषेचे प्रभावक्षेत्र किती दूरवर पसरले आहे, इतर भाषक गटांना तिची कितपत ओळख-पहचान-आदर-कुतूहल आहे हा आहे. आणि ही ओळख आणि आदर ही आर्थिक समृद्धीतूनच येऊ शकते. राज्यविस्तारातून येऊ शकत असे, पण सध्याच्या काळात ते शक्य नाही.

वृन्दा Tue, 03/03/2015 - 19:50

In reply to by राही

वा! प्रतिसाद फारच आवडला.
इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य ढळत नसे => अन इंग्रजीची पोच पहा किती दूरवर झाली.
.
तेव्हा आपल्याशी अगदी सहमत आहे.

अरविंद कोल्हटकर Tue, 03/03/2015 - 23:42

In reply to by वृन्दा

हा आणि तुमच्या सहीखालचे अन्य श्लोक तुम्ही कोठून घेता हे जाणण्याची उत्सुकता आहे. वरचा श्लोक मला पूर्ण नवा आहे.

"सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममये ।
मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते
पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते ।
जयजय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि सदा पालय माम् "

हे शुद्ध करून असे पाहिजे:

"सुमनसवन्दितसुन्दरि माधवि चन्द्रसहोदरि हेममये ।
मुनिगणमण्डितमोक्षप्रदायिनि मञ्जुळभाषिणि वेदनुते
पङ्कजवासिनि देवसुपूजितसद्गुणवर्षिणि शान्तियुते ।
जयजय हे मधुसूदनकामिनि आदिलक्ष्मि सदा पालय माम् ||"

शेवटच्या पादामध्ये 'सदा पालय माम्' ह्यामध्ये एक मात्रा जास्ती आहे आणि त्यामुळे वृत्तभंग होत आहे. चालीवर गुणगुणून पहा म्हणजे तुम्हालाच जाणवेल. आत्तापर्यंत टिकून राहिलेल्या आणि अज्ञात कवींनी बांधलेल्या सुभाषितांमध्ये वृत्तभंग जवळजवळ कधीच नसतो

तरीहि ह्या श्लोकाचे वृत्त काहीसे अनियमित आहे असे वाटते. पहिल्या आणि दुसर्‍या पादांमध्ये २३ अक्षरे असून न-ज-ज-ज-ज-ज-ज-ल-ग असे गण आहेत. तिसर्‍यामध्ये २२ अक्षरे असून भ-भ-भ-भ-भ-भ-भ-ग असे गण आहेत. चौथा पाद वृत्तात बसविण्यापुरता 'सत्पालय माम्` असा धरल्यास न-ज-ज-ज-ज-र-भ-ग असा २२ अक्षरांचा होतो आणि तो अन्य तिघांशी पुष्कळसा मिळताजुळता असला तरी अगदी तसा नाही.

मला हे वृत्त - अंशतः वा पूर्ण - कोणते असावे ते सुचेना म्हणून ग्रंथांकडे वळलो. हिंदी छन्दप्रभाकरावरून पहिले दोन पाद `शैलसुता` व्रुत्तामध्ये तर तिसरा `चकोर`वृत्तामध्ये आहे असे कळले. पहिल्या वृत्ताला परशुरामपंत तात्या ’सवाई’ म्हणतात. ’चकोर’चे मात्र अन्य काही नाव ते सुचवीत नाहीत. माधवराव पटवर्धन ’चकोर’ला ’मन्मथसुंदर’ असे ओळखतात (पान ४१९, छन्दोरचना). दोन्ही वृत्ते दुर्मिळ आहेत तरी चालीवर म्हणण्यास मुळीच अवघड नाहीत. चौथ्या पादाचे वृत्त सापडू शकले नाही.

वृन्दा Tue, 03/03/2015 - 23:52

In reply to by अरविंद कोल्हटकर

हा आणि तुमच्या सहीखालचे अन्य श्लोक तुम्ही कोठून घेता हे जाणण्याची उत्सुकता आहे.

कोल्हटकर सर, मी हे सर्व श्लोक http://sanskritdocuments.org/ वरुन म्हणते/घेते. फार सुंदर साईट आहे.
आपल्यासार्ख्या व्यासंगी व्यक्तीने कुतूहल दाखवलत हा आपला मोठेपणा आहे. हे "अष्टलक्ष्मी" स्तोत्र माझ्या आवडीचे आहे. तसेच शंकराचार्यांनी रचलेली अनेक भुजंगस्तोत्रे व अन्य सुप्रभात स्तोत्रे फार फार आवडतात.

आपण दिलेल्या ओळी लिहून, माझी सही सुधारते.

अरविंद कोल्हटकर Wed, 04/03/2015 - 00:32

In reply to by वृन्दा

ही साइट माझ्या चांगल्या परिचयाची आहे. तेथील रघुवंश (सर्व १९ सर्ग) आणि गंगालहरी काव्य ह्यांचे encoding मी केलेले आहे हे तुम्हास तेथेच तळाशी दिसेल.

वृन्दा Thu, 05/03/2015 - 19:26

In reply to by अरविंद कोल्हटकर

कोल्हटकर जी, पूर्वी या ओळी वाचलेल्या अन अर्थही वाचला होता. पण आता अर्थ आठवत नाही नीट.

"त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वशट्‌कारः स्वरात्मिका ।
सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता|
अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषत"

पैकी स्वधा म्हणजे काय अन स्वाहा म्हणजे का? स्वाहा म्हणजे ते तूप वगैरे होमात टाकतात ते का?

अरविंद कोल्हटकर Thu, 05/03/2015 - 19:55

In reply to by वृन्दा

स्वाहा आणि स्वधा ह्यांचा अर्थ एकच आहे -'अर्पण केलेला हवि'. चतुर्थी विभक्तीबरोबर हे शब्द 'अमुक देवाला हा हवि अर्पण' अशा अर्थाने वापरतात. फरक इतकाच की रूढीप्रमाणे स्वाहा देवादिकांना आणि स्वधा पितरांना उद्देशून - विशेषतः श्राद्धामध्ये - वापरतात. अलीकडे बरेच वर्षात हे पाहण्याचा योग आला नाही पण आठवणीप्रमाणे स्वाहाकाराचे उदक हातावरून सरळ बोटांवरून खाली सोडतात तर स्वधाकाराचे बोटे बंद करून आंगठयावरून सोडतात.

राही Wed, 04/03/2015 - 09:38

In reply to by अरविंद कोल्हटकर

शैलसुता हे वृत्तनाम ज्यावरून आले (असावे), ते पुष्कळांना माहीत असलेले श्रीशंकराचार्यविरचित महिषासुरमर्दिनीस्तोत्र असेच नितान्तसुंदर आहे. ते कोमलही आहे आणि रुद्रभीषणही.
"अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते | गिरिवरविन्ध्यशिरो~धिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते || भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूतिकृते| जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते||
किंवा,
अयि शतखण्डविखण्डितरुण्डवितुण्डितशुण्डगजाधिपते| निजभुजदण्डनिपाटितचण्डविपाटितमुण्डभटाधिपते||रिपुगजदण्डविदारणचण्डपराक्रमशौण्डमृगाधिपते| जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते||
मात्र, ह्या स्तोत्राच्या अनुप्रासयुक्त नादमयतेमुळे म्हणा किंवा अन्य कशामुळे, हे स्तोत्र जोरजोरात घणाघाती स्वरूपात (सामूहिक रीत्या) म्हणण्याची प्रथा पडते आहे ज्यामुळे केवळ कर्णकटुकर्कशताच प्रत्ययाला येऊ लागली आहे.

वृन्दा Wed, 04/03/2015 - 20:09

In reply to by राही

अगदी अगदी ते मुळातच थोडे घणाघाती स्वरांचे(अनुप्रास) असल्याने ते शांतरसात गायल्यास थोडे subdue होते. असेच रावणरचित शिवतांडव स्तोत्राचेही आहे.

अस्वल Wed, 04/03/2015 - 22:45

In reply to by वृन्दा

बर्‍याच सौधिंडियन मित्रांच्या घरी हे स्तोत्र अतिशय सौम्यरूपात ऐकलं आहे. चाल सुंदर आहेच. बहुतेक सुब्बुलक्ष्मी ह्यांच्या आवाजात.

बॅटमॅन Wed, 04/03/2015 - 23:55

In reply to by अस्वल

विशिष्ट चाली अन आवाज हे कशालाही शांतरस बनवू शकतात.

याचे अजूनेक उदा. म्ह. कवी भूषणाची "इंद्र जिमि जंभ पर" ही वीररसाने भरलेली रचना. लताबाईंनी अशी काही गायली की इंद्र आणि जंभ दोघेही गळ्यात गळे घालून फिरताहेत असे वाटावे.

सुनील Thu, 05/03/2015 - 08:20

In reply to by बॅटमॅन

विशिष्ट चाली अन आवाज हे कशालाही शांतरस बनवू शकतात

अगदी याच कारणासाठी मला हृदयनाथ मंगेशकरांचे 'शूर अम्ही सरदार अम्हाला, काय कुणाची भिती', हे गाणे फारसे रुचत नाही.

बाह्या सोडाच पण शर्टाची बाहीदेखिल फुरफुरत नाही, ते गाणे ऐकताना!

बॅटमॅन Thu, 05/03/2015 - 14:18

In reply to by सुनील

चाल तेवढी चांगली आहे बाकी. शिवकल्याण राजा ऐकताना तर जराही स्फुरण येत नाही. तुलनेने अमोल कोल्हे यांनी शिवाजीचा रोल केलेली 'राजा शिवछत्रपती' मालिका आहे तिचे टायटल साँग मात्र तुफान वठले आहे.

राही Thu, 05/03/2015 - 15:51

In reply to by बॅटमॅन

रौद्रभीषणतेच्या प्रत्ययासाठी खणखणाटी शब्द आणि दणदणाटी चाल आवश्यक नाही. किंबहुना काही रौद्रभीषण दृश्ये, विशेषत: निसर्गरूपे आपल्याला नि:स्तब्ध करतात. हिमालयातली काही दृश्ये, फेसाळती ब्रह्मपुत्रा, सांधण दरी किंवा 'रारंग ढांग' मधील वर्णने या प्रकारातली आहेत. आपण केवळ स्तिमित होतो.
वीररसाच्या प्रत्ययाने स्फुरण येऊ शकेल.
'इंद्र जिमि' बाबत सहमत.

वृन्दा Wed, 04/03/2015 - 23:02

In reply to by राही

अजुन एक मजेचे स्तोत्र आहे - चंडीपाठ.
या देवी सर्वभूतेषु, XXXXXX रुपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः
आता या XXXXXX च्या जागी - "मातृ, क्षुधा,निद्रा,क्षांती, शांती" वगैरे शब्द घाला.
बरेचदा एक व्यक्ती ते स्तोत्र अन विशिष्ठ शब्द वाचत असते अन बाकीचे कोरसमध्ये तेच तेच पालुपद गात असतात. अन मग ते स्तोत्र संपलं तरी काहीजण त्या टेंपोमध्ये (भरात) या देवी सर्व भुतेषु वगैरे गातात मग वाचन करणारी व्यक्ती हातानेच निर्देश करते - आ-ता थां-बा!!
_________
मला जर कोणत्या स्तोत्राचा कंटाळा येत असेल तर हेच - चंडीपाठ. मग मी म्हणतच नाही. कंटाळ्याने म्हणण्यापेक्षा न म्हणणे उत्तम ;)

अरविंद कोल्हटकर Thu, 05/03/2015 - 20:37

In reply to by वृन्दा

माझ्याजवळ पंडित जसराज ह्यांनी २००२ साली इंडिया गेट येथे झालेल्या स्वर-उत्सव नावाच्या इंडिया टुडेकडून आयोजित कार्यक्रमामध्ये ५३ मिनिटे संस्कृत स्तोत्रगायन केले होते. ते मला बर्‍याच वर्षांपूर्वी rajshri.com येथे मिळाले होते आणि मी ते उतरवूनहि घेतले आहे. आता मात्र मला ते जालावर कोठे दिसत नाही.

ह्य कार्यक्रमात जसराजनी शास्त्रीय हिंदुस्तानी पद्धतीने 'व्रजे वसन्तं नवनीतचोरम्' १६ मि., 'या देवी सर्वभूतेषु' (चन्द्रघण्टास्तोत्र) ३२ मि. आणि एक द्रुत ५ मि. गायलेले आहे. (तिसर्‍याचे पूर्ण शब्द मला कळलेले नाहीत आणि स्तोत्र जालावर सापडतहि नाही, ’दुष्टनिशाचरपापविभञ्जनदुर्गे दुर्गतिनाशिनि देवि’ अशी दुसरी ओळ कळते.) अतिशय सुश्राव्य असे हे गायन आहे. मिळाले तर अवश्य ऐका.

(श्रोत्यांमध्ये अनेक बडे लोक दिसतात. नरसिंह राव आणि लालकृष्ण अडवानी पुढच्या ओळीत आहेत.)

वृन्दा Thu, 05/03/2015 - 20:42

In reply to by अरविंद कोल्हटकर

आहाहा पं जसराज काय अद्भुत गातात.
हे रुद्राष्टक जरुर ऐका कोल्हटकरजी -
http://blog.devonhealthcaregroup.com/2013/05/31/rudrashtakam-pt-jasraj/

अन हे रावणरचित शिवतान्डव स्तोत्र - इतकं घणाघाती स्तोत्रं पण काय शांत वाटतं
https://www.youtube.com/watch?v=LTzef4HqjDI

मी आपण सांगीतलेली स्तोत्रे जरुर शोधेन.
____
https://www.youtube.com/watch?v=zkkutDizSfY - ही सी डी माझ्याकडे होती मी वेड्यासारखी कोणाला तरी दिली.
अर्थात परत घेऊ शकते.

वृन्दा Thu, 05/03/2015 - 20:53

In reply to by वृन्दा

माझ्या शाळेतील अतिशय प्रिय मैत्रिणीने रेखाटलेले हे पं जसराज यांचे व्यक्तीचित्र. पं जसराज यांचा आवाज फक्त देवतुल्य वाटतो मला.

वृन्दा Fri, 06/03/2015 - 19:39

In reply to by अरविंद कोल्हटकर

संपूर्ण कळले नाही पण जे कळले त्याला तोड नाही -

व्रजे प्रसिद्धं नवनीत चौरं | गोपान्गनानां च दुकूल चौरं ||
अनेक जन्मार्जित पाप चौरं | चौराग्रगण्यं पुरुषं नमामि |१|
.
श्री राधिकाय हृदयस्य चौरं | नवाम्बुद श्यामल कान्ति चौरं ||
पदाश्रितानां च समस्त चौरं | चौराग्रगन्यां पुरुषं नमामि |२|
.
अकिन्चनी कृत्य पदाश्रितां यः | करोति भिक्षुं पथि गेह हीनम् ||
केनापिऽहो भीषण चौर इद्र | दृष्टा श्रुतो वा न जगत त्रयेपि |३|
.
यदीय नामापि हरति अशेषं | गिरि प्रसारान अपि पाप राषिन ||
आश्चर्य रूपो ननु चौर इद्र | दृष्टा श्रुतो वा न मया कदापि |४|̣
.
धनं च मानं च तथेन्द्रियाणि | प्राणांश च हृत्वा मम सर्वं एव ||
पलायसे कुत्र धृतोऽदय चौर | त्वं भक्ति दाम्नासि मया निरुद्धः |५|
.
छिनत्सि घोरं यम पाश बन्धं | भिनत्सि भीमं भव पाश बन्धं |
छिनत्सि सर्वस्य समस्त बन्धं | नैवात्मनो भक्त कृतं तु बन्धं |६|
.
मन-मानसे तामस राशि घोरे | कारागृहे दुःख मये निबद्धः ||
लभस्व हे चौर हरे चिराय स्व चौर्य दोशोचितं एव दण्डं |७|
.
कारागृहे वस सदा हृदये मदीये | मद-भक्ति-पाश-दृढ -बन्धन-निश्चलः सन ||
त्वां कृष्ण हे ! प्रलय-कोटि-शतान्तरेऽपि | सर्वस्य चौर हृदयान न हि मोचयामि |८|

प्रथमेश नामजोशी Fri, 06/03/2015 - 16:17

In reply to by अरविंद कोल्हटकर

धाग्यावर अवांतर होतंय, पण या कार्यक्रमाचा उल्लेख झाला म्हणून...

आमोणकरपण गायल्या होत्या तेव्हा. मुख्य ख्यालपेक्षा नंतरची तीन भजनं जास्त छान वाटली मला त्यांची. 'मैं कैसे आऊंगी', 'सहेलीया साजन घर आया हो' आणि 'पग घुंगरु बांध मीरा'.

.शुचि Tue, 11/10/2016 - 19:34

In reply to by अरविंद कोल्हटकर

’दुष्टनिशाचरपापविभञ्जनदुर्गे दुर्गतिनाशिनि देवि’ अशी दुसरी ओळ कळते.) अतिशय सुश्राव्य असे हे गायन आहे. मिळाले तर अवश्य ऐका.

यात आहेत त्या ओळी.

अरविंद कोल्हटकर Tue, 03/03/2015 - 20:26

In reply to by राही

सहमत.

मराठी भाषेला तथाकथित 'अभिजात भाषा' हा दर्जा मिळवून देणे हे काहींना मराठी भाषेची सेवा करण्यासारखे वाटते. ह्याच्या मागचे खरे राजकारण दाखविणारा 'भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ' असा धागा येथे सुरू केला होता. त्याची आठवण करून देतो.

मिसळपाव Tue, 03/03/2015 - 20:03

गेल्या पाच वर्षात बेजिंग, सौदि अरेबियात दोन-दोन वर्ष काढलेल्या आणि सध्या स्पेनमधे मुक्काम असलेल्या माझ्या आतेभावाला तुमचे विचार सांगून फेफरं आणायचा फार मोह होतोय! बाय द वे, दोनच वर्ष राहिलं तर राष्ट्रभाषेच्या / राज्यभाषेच्या अध्ययनात काही सूट घेउन चालेल का? ;-)