Skip to main content

नेटिझन्स इतक्या उर्मटपणाने का वागतात?

संगणक (यात संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधांचा समावेश आहे.) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे. तरीसुद्धा नेटवर वावरणाऱ्यांसाठी काही नीती - नियम, आचारसंहिता वा स्वनियंत्रण असे काहीही नसल्यासारखे नेटिझन्सचे वर्तन असते.

नेटवरील माहिती संकलन व होत असलेले विनिमय यांचे विश्लेषण केल्यास 16.8 कोटी डीव्हीडी भरतील एवढ्या माहितीचे देवाण घेवाण एका दिवसात होत आहे. प्रती दिवशी 29400 कोटी ई मेल्स पाठवल्या जात असतात. रोज 20 लाख ब्लॉगपोस्टवर मजकूर चिटकवला जात असतो. या ब्लॉगपोस्टवरील मजकुरांची मुद्रित प्रत काढल्यास 60- 64 पानाच्या साप्ताहिकाला पुढील 770 वर्षे पुरेल एवढा मजकूर उपलब्ध होऊ शकेल. 17.2 कोटी नेटिझन्स फेसबुकला भेट देतात. यासाठी 470 कोटी मिनिटं खर्ची घातल्या जातात. रोज 25 कोटी फोटो अपलोड होतात. या अपलोड झालेल्या फोटोंचे प्रिंट्स काढून एकावर एक ठेवल्यास 80 एफेल टॉवर्स इतकी उंची होईल. नेटवरून रोज 2.2 कोटी तास जुने चित्रपट व सिरियल्स बघण्यासाठी खर्ची घातला जातो. रोज 864000 तासाचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केल्या जातात. एकट्यानेच रोज, 24 तास, हे सर्व बघायचे ठरविल्यास 98 वर्षाचा काळ सहजपणे निघून जाईल. रोज 1.87 कोटी तास संगीत ऐकले जाते. प्रती दिवशी 1288 अप्लिकेशन्स अपलोड होतात व 3.5 कोटी अप्लिकेशन्स डाउनलोड होतात. (संदर्भ १)

इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लॉगोस्फेर व इतर गोष्टी आपल्या जीवनाचा ताबा घेत असल्यामुळे आपण सर्व संगणक, इंटरनेट व इतर माहिती तंत्रज्ञानाच्या सोई - सुविधांची गुलामी करत आहोत की काय असे वाटू लागले आहे. सिटीझन्सचे रूपांतर नेटीझन्समध्ये झपाट्याने होत आहे. यानंतरच्या पुढच्या पिढीच्या दिवसाची विभागणी झोप व ऑनलाइन अशीच करावी लागणार आहे. झोपेतून उठल्या उठल्या मोबाइल कानाशी व लॅपटॉप समोर अशा अवस्थेतून ही पिढी जाणार आहे. गंमत अशी आहे की कुणीही उठावे व लाइक/डिसलाइक वर क्लिक करत रहावे अशी स्थिती आता आहे. विकिपिडियातील पानांचाही यातून सुटका नाही. हातात माउसचे बटन आहे, व नेट कनेक्ट आहे एवढ्याच भांडवलावर या गोष्टी सर्रासपणे होत आहेत. त्याचप्रमाणे सोशल नेटवर्कसुद्धा नेटिझन्सच्या मनमानीपणातून सुटलेले नाही.

ब्लॉग, फोरम, वा फेसबुक वरील प्रतिसाद/प्रतिक्रिया वाचत असताना चर्चेसाठीच्या धाग्याबद्दल (उगीचच्या उगीच) उलट - सुलट, टोकाचे व काही वेळा कुत्सित मत प्रदर्शन करत असल्याचे प्रमाण वाढत आहे. मराठी नेटवर जरी हे काही प्रमाणात कमी वाटत असले तरी इंग्रजीतील - विशेषकरून राजकीय, आर्थिक व सामाजिक विषयावरील - धाग्यांच्या संदर्भात नेटिझन्सचा भावनोद्रेक प्रकर्षाने जाणवतो. आपण केलेली विधाने, आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो. विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो. क्षुल्लक विधानावरून तावातावाने भांडत असल्याचे चित्र बघायला मिळते. काही वेळा शिवराळ भाषा वापरली जाते. काहींना साधे लिहितानाही शिव्याची पेरणी करण्याचा सोस असतो. त्यांना साधे लिहिता येत नाही. साधे व सरळ लिहिल्यास आपल्याकडे कोणाचे लक्ष जाणार नाही, असा त्यांचा समज असतो. व अशा ट्रॉल्सच्या (trolls) संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे
परंतु मानसतज्ञांच्या दृष्टीने नेटिझन्सची ही वर्तणूक सवयीत बदलल्यास सामाजिक व संबंधित व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास इजा पोचू शकते. म्हणूनच वेळीच जागे होऊन अशा गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी काही निर्बंध घालण्याचे आग्रह ते धरू लागले आहेत.

मुळात अशा नेटिझन्सच्या बहुतेक प्रतिक्रिया केवळ आक्रमक या सदरात मोडतात. त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. आपले म्हणणे कुणीच ऐकत (वाचत) नाही म्हणून ते वैतागलेले असतात. मानसतज्ञांच्या मते आपल्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद यात इतकी भावनिक गुंतवणूक करणेसुद्धा हानिकारक ठरणार आहे. गंमत अशी आहे की जेव्हा नेटिझन्स थंड डोक्याने विचार करू लागतात तेव्हा हे सर्व चुकीचे होते हेही त्यांना कळत असते.

तरीसुद्धा ही मंडळी असे का वागतात?
अनेक घटक एकाच ठिकाणी जमत असल्यामुळे उर्मटपणा, उद्धटपणा, आक्रमतकता इत्यादींचा विस्फोट होत असावा असे तज्ञाना वाटत आहे. मुळात प्रतिसाद देणारे व धागाकर्ते बिनचेहऱ्याचे, मुखवटे चढवलेले व एकमेकांना ओळखत नसल्यामुळे चिखलफेक करण्यात कुणालाही संकोच वाटत नाही. संताप व्यक्त करणारे कुठे तरी दूर असण्याची शक्यता असल्यामुळे आपले कुणीही वाकडे करणार नाही, आपल्याला शारीरिक इजा होणार नाही, याची त्यांना खात्री असते. समोरासमोर असल्यास अशा प्रकारची टीका टिप्पणी ते कधीच करणार नाहीत. याशिवाय प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा काही तरी लिहिणे अगदी सोपे असते. मुळात ब्लॉग, फोरम, ई - मेल अकौंट, लॉगइन, पासवर्ड इत्यादीसाठी आर्थिक वा तांत्रिक अशी कुठलिही अडचण नसल्यामुळे जाता जाता पिंक मारणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

प्रतिसाद लिहिणाऱ्यांकडे भरपूर वेळ असणे हेसुद्धा एक कारण असावे. व एका प्रकारे ते त्यांचे स्वगत भाषणच असते. या स्वगत भाषणात कुठलिही टोकाची भूमिका घेतली तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. माणसं प्रत्यक्ष संवाद साधत असताना एकमेकांच्या देहबोलीनुसार आक्रमकता कमी जास्त करतात. कुठे थांबावे, कुठे रेटावे, याची कल्पना दोघांनाही असते. राग आला तरी ते व्यक्त करण्यात थोडीशी सुसंकृतता त्यात असते. त्यामुळे रागाच्या भरात दोन शब्द जास्त उच्चारले तरी काही वेळातच राग शांत होऊन संवाद मूळपदावर येऊ शकतो.

याचबरोबर आपण काही तरी भव्य दिव्य करत आहोत अशा पवित्र्याने नेटवरील प्रतिक्रिया लिहिली जात असते. मुळात हा पवित्रा तद्दन खोटा, अविचारी व अविवेकी असतो. दुसरे म्हणजे सुरक्षित ठिकाणी बसून काहीही खरडायला फार मोठे बुद्धीकौशल्यही लागत नाही. उपदेशाचे डोज पाजणे, सल्ला देत राहणे, प्रसंगाची चिरफाड करणे, मूळ मुद्दा सोडून कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवर भाष्य करणे यातच ते स्वत:ला धन्य समजतात. त्यामुळे धाग्यावरील चर्चा भरकटत जाते व हाती काही लागत नाही.

अजून एका तज्ञांच्या मते नेटिझन्सच्या या उर्मटवृत्तीला काही अंशी इलेक्ट्रॉनिक माध्यम जबाबदार आहे. टीव्हीसारख्या माध्यमावरील चर्चेत भाग घेणाऱ्यासांठी आपण कसे बोलावे, कसे वागावे याबद्दल कुठलिही आचारसंहिता नाही. चर्चेपूर्वी कुणी तरी जबाबदार व्यक्ती काही ब्रीफिंग देत असेल की नाही याची कल्पना नाही. चर्चेच्या दरम्यान टोमणे मारणे, एकमेकाचे उखाळे पाखाळे काढणे, नको त्या गोष्टी उकरून काढणे, विषयाशी धरून न बोलणे इत्यादी गोष्टी न्यूज व इतर चॅनेल्सवर बघून सवय झालेले नेटिझन्स जेव्हा संधी मिळते तेव्हा झोडपून काढण्याच्या पावित्र्यात असतात. माध्यमं जर जबाबदारीने, संयमितपणे चर्चेचे संयोजन करत असते तर कदाचित नेटिझन्स एवढे आक्रमक झाले नसते.

एक मात्र खरे की इतर कुठल्याही माध्यमापेक्षा इंटरनेटचा वापर यानंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे नेटिझन्सच्या विधानांना गंभीरपणे घेण्याकडे कल वाढत जाणार. अशा वेळी काहीतरी पोरकट विधान करून स्वत:चे हसे करून घेण्यात हशील नाही, हे आता नेटिझन्सना कुणी तरी सांगण्याची गरज आहे. नेटवरील चर्चा सुरळितपणे चालावी ही संयोजकांची जबाबदारी असते. चर्चेतून काही तरी निष्पन्न होणे अपेक्षित असते. काही नवीन माहिती, माहितीत भर, नवीन मुद्दे, यामुळे चर्चा रंगू शकते. येथे मात्र त्याचीच उणीव भासत आहे. दुसऱ्या नेटिझन्सचे काहीही ऐकायचे नाही हाच अजेंडा पुढे ठेऊन सर्व जण आक्रमकपणे चर्चेत भाग घेत असतात. आक्रमकतेने एखादा चांगला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केल्यास वाचकांचे लक्ष मुद्याकडे न जाता आक्रमकतेकडेच जास्त जाते. त्यामुळे जे काही पटवून द्यायचे असते ते बाजूला राहते. व चर्चा भलत्याच ठिकाणी वाहवत जाते.

नेटिझन्सनी टीव्हीसारख्या माध्यमाचा कित्ता गिरवला पाहिजे अशी काही अट नाही. संयमितपणे व विचारपूर्वक केलेले भाष्य चर्चा पुढे नेण्यास मदत करत असते. त्यामुळे ब्लॉग्स व फोरमच्या चालकानी वेळीच दखल घेऊन अशा उर्मट नेटिझन्सना दूर ठेवण्यासाठी काही तंत्रज्ञान विकसित करण्याची वा नियमाची चौकट तयार करण्याची गरज भासत आहे.

संदर्भ २

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

राही Mon, 06/07/2015 - 15:36

लेख आवडला. इंग्लिश जालमाध्यमांमध्ये हे जास्त जाणवते. शिवाय इथे बहुतेक लोक खर्‍या नावाने वावरत नाहीत. त्यामुळे गैरवर्तन उघड होण्याचा किंवा खर्‍या आयुष्यात त्याचा काही गैरपरिणाम किंवा नुकसान होण्याची शक्यता नसते. लिहिणारे लोक हे सगळे सर्वसाधारण लोक असतात- 'कॉमन मॅन'. त्यांची कुठल्याही भाषेतली अभिव्यक्ती ही फारशी रीफाइन्ड नसते. आणि हे सगळे प्रतिसाद हे 'तात्काळ' स्वरूपाचे असतात. हा 'इन्स्टन्ट'चा जमाना आहे. थांबून विचार करायला कुणाला वेळ नाही. हा थोडासा टाईम पास असतो. फारसे गंभीरपणे न घेण्याचा.
आणि हे सर्व क्षणिक असते. माध्यमांतली लाट फार काळ टिकत नाही. आज लिहिले, उद्या विसरले. अण्णा हजारे आले, गेले. जस्मिन क्रांति आली, गेली. मूलगामी असा काय फरक घडला?

ऋषिकेश Mon, 06/07/2015 - 16:12

In reply to by राही

शिवाय इथे बहुतेक लोक खर्‍या नावाने वावरत नाहीत. त्यामुळे गैरवर्तन उघड होण्याचा किंवा खर्‍या आयुष्यात त्याचा काही गैरपरिणाम किंवा नुकसान होण्याची शक्यता नसते

सहमत.
आयडी बनवताना त्यामागील व्यक्तीची (ओळखीची खातरजमा करणे शक्य असलेली) माहिती फक्त (आणि फक्त) त्या संस्थळाच्या मालकाला असावी व ती कायदेशीर बाबींप्रतिरिक्त अन्यत्र वापरली जाऊ नये/शेअर केली जाऊ नये असे वाटते.

सध्या ही माहिती कोणालाच नसते/खात्रीलायकरित्या उपलब्ध करणे बंधनकारक नसते.

सुनील Mon, 06/07/2015 - 16:32

In reply to by ऋषिकेश

'मी मराठी' ह्या संस्थळावर, 'सत्यापित सदस्य' नामक क्याटेगरी होती. अर्थात, सत्यापित होणे हे सदस्यांवर बंधनकारक नव्हते.

(मी मराठीवरील सत्यापित सदस्य) सुनील

अनु राव Mon, 06/07/2015 - 17:27

अश्याच धर्तीवर असे ही धागे काढायला पाहिजेत

१. नेटीझन्स दांभिक पणा करतात. नसलेल्या किंवा अन्-टेस्टेड नैतिकतेच्या बाता मारतात.
२. खोटे कौतुक करतात. भिकार आर्टीकल वर "काय भारी आहे" वगैरे प्रतिक्रिया देतात, चांगुलपणा मिळवण्यासाठी.
३. संतुलित किंवा पॉलिटीकल करेक्टनेस चा खोटा अभिनवेश.
४. अभावग्रस्त लोकांबद्दलची दिखाऊ तळमळ आणि सामाजिक जाणीव कीती प्रज्वलित आहे त्याबद्दल लिहीणे
....
...
..
.

ऋता Tue, 07/07/2015 - 15:35

In reply to by अनु राव

४. अभावग्रस्त लोकांबद्दलची दिखाऊ तळमळ आणि सामाजिक जाणीव कीती प्रज्वलित आहे त्याबद्दल लिहीणे

हल्ली कोणीही 'सोशल अ‍ॅक्टिविस्ट' म्हणवतात स्वतःला.

धर्मराजमुटके Mon, 06/07/2015 - 17:37

आपण लिहिलेले लेख लोकांनी जसेच्या तसे स्वीकारावे, त्याचे संदर्भ, अधिक माहिती विचारू नये असा एक नवा प्रवाह दिसतो.

आणि माहिती विचारायची झाल्यास त्या लेखकाला न विचारता, लेखावर चर्चा करणार्‍या इतर प्रतिसादकर्त्यांसच विचारावी असाही एक प्रवाह काही काही जाललेखकांच्या बाबतीत दिसतो.

मुळात अशा नेटिझन्सच्या बहुतेक प्रतिक्रिया केवळ आक्रमक या सदरात मोडतात. त्यातून काहीही अर्थबोध होत नाही. आपले म्हणणे कुणीच ऐकत (वाचत) नाही म्हणून ते वैतागलेले असतात.

आपण लिहिलेले प्रतिसाद कुण्णी म्हणजे कुण्णीच (अगदी लेखक) देखील वाचतो की नाही हे बर्‍याचदा समजत नाही म्हणूनदेखील ते वाचक वैतागू शकतात.

सध्या, खोडसाळ किंवा निरर्थक श्रेणी मिळण्यास इतका प्रतिसाद पुरेसा ठरावा. बाकी प्रतिसाद (जमल्यास) सवडीने.

प्रकाश घाटपांडे Mon, 06/07/2015 - 17:47

प्लिज डू नॉट फीड द ट्रोल्स या राजेश घासकडवींच्या लेखाची आठवण येते.
ऐसी वरील सद्स्यांनी आत्मपरिक्षण केले तरी हा एलिमेंट कमी अधिक प्रमाणात त्यांना जाणवेल. मानवी स्वभाव आहे असे समजून दुर्लक्ष करणे हा उपाय बरेच लोक अवलंबतात.बिपिन कार्यकर्तेंनी आपल्या एका अत्यंत वाचनीय लेखात शिव्यांविषयी लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, सर्वात जहाल शिवी कुठची? तर ती म्हणजे 'दुर्लक्ष'. हा सर्वात उत्तम उपाय आहे.याच्याशी मी अत्यंत सहमत आहे.
http://maazedonpaise.blogspot.in/2010/02/blog-post_25.html इथे बिपिनचा लेख आहे
इतरांना तुच्छ लेखण, त्यांची कीव करणे ही काही लोकांची जगण्याची प्रेरणाच असते.
http://aisiakshare.com/node/2323#comment-38671 या ठिकाणी त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश घाटपांडे Tue, 07/07/2015 - 14:22

In reply to by घाटावरचे भट

प्रस्तुत धागाकर्ते एका अर्थाने त्या प्रकारात मोडतात. फक्त ब्रॉडकास्ट स्वरुपात लेखन करतात. योग्य वाटेल ते घ्यावे. पण ते पळून जात नाहीत. सातत्याने लेखन करतात. त्यांचे लेखन संयत, विवेकी व माहितीपुर्ण असते.

घाटावरचे भट Tue, 07/07/2015 - 16:53

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यांच्या लेखनातील सर्व विधाने सर्व सदस्यांना पटतीलच असे नाही (ज्याबद्दल काही आक्षेप नाही). पण त्या विधानांचा एखाद्या सदस्याने प्रतिवाद केला असता ते त्याला उत्तर देत नाहीत (ज्याबद्दल आक्षेप आहे). यालाच पळून जाणे म्हटले आहे. नाहीतर आयडी असूनही वाचनमात्र राहाणारे सदस्य अनेक असावेत.

प्रकाश घाटपांडे Wed, 08/07/2015 - 08:49

In reply to by घाटावरचे भट

>>एखाद्या सदस्याने प्रतिवाद केला असता ते त्याला उत्तर देत नाहीत (ज्याबद्दल आक्षेप आहे).
माझाही आक्षेप आहेच. पण कदाचित उत्तरे देत बसलो तर चक्रव्यूहात सापडू अशी भीती त्यांना वाटत असावी.त्यामुळे ते लेखनमात्र रहातात.शेवटी हा पिंडाचा भाग आहे.ऐसी वरील लेखन दर्जेदार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही.

अजो१२३ Tue, 07/07/2015 - 17:51

आत्मपरिक्षण केलं असता लेखकाच्या बोलण्यात प्वॉइंट आहे असं वाटतं.
======================================================================
तरीही -
१. संगणकविश्वातले लोक अधिक शिक्षित म्हणून अधिक सभ्य नि अधिक सुसंवादी असावेत अशी अपेक्षा केली जाते. शिक्षण आणि स्वभाव, वर्तन तसे अनरिलेटेड असावेत.
२. लोकांचा या विश्वात काढलेला काळ वाढत आहे. मग स्वतःला उमजून जास्त काल सभ्य राखणे अवघड पडत असावे. थोडक्यापुरती बाजू धरणे त्यामानाने सोपे असते.
३. जाल हे अतिसभ्य का असावं? औपचारिक, शिष्ट, नवख्या, व्यावसायिक, इ इ जागी सभ्य असणं समजता येईल. पण असा संदर्भ नसेल तर?
४. जालावर लिहिणाराचा अविर्भाव, टोन , उद्देश, समज, गैरसमज काय असावा याचे नियम कशाला हवेत?
=====================================================================

विशेषतः जेथे भावनांना हात घातला जातो (ज्योतिष, वैद्यक, अस्मिता, इतिहास) तेथे हा प्रवाह अधिक दिसतो.

पुरोगामी, विज्ञानवादी, विवेकवादी, आधुनिकतावादी इ इ ची भावनिकता नि उमर्टपणा देखिल कमालीचा असतो.

बॅटमॅन Tue, 07/07/2015 - 18:01

In reply to by अजो१२३

पुरोगामी, विज्ञानवादी, विवेकवादी, आधुनिकतावादी इ इ ची भावनिकता नि उमर्टपणा देखिल कमालीचा असतो.

आणि आपण कसे भावनाप्रधानपणे निष्कर्ष काढत नाही हेही उर्मटपणेच सांगितले जाते.

"कोण भोसडीचा/ची/चं शिव्या देतोय/तेय/तंय इथे" छाप मांडणी असते बहुतेकदा.

पिवळा डांबिस Wed, 08/07/2015 - 09:14

जर मूळ लिखाणात दम असेल, काही नवीन कल्पना/विचार मांडला असेल तर त्या लिखाणाला सहसा शिव्या वा उर्मट प्रतिसाद आलेले फारसे पहाण्यात नाहीत.
पण लिखाणात काहीही दम नसता, काहीही स्वानुभूती नसता, इकडतिकडचं काहीबाही वाचून केवळ मी सिनियर आहे, वयस्क आहे असा अविर्भाव घेऊन केलेले भोंगळ, बोअरिंग वा उपदेशात्मक लिखाण इथे वा अन्य संकेतस्थळांवर बरेच पहाण्यात आलेले आहे.
अश्या लिखाणाला चार शिव्यांची फोडणी देऊन आपल्या जागेवर बसवणे हेच सयुक्तिक ठरते असं माझं मत आहे....
संकेतस्थळांवरच्या लिखाणांचे परीक्षण हे त्या त्या लिखाणाच्या क्वालिटीवर केले जावे, ते कुणी लिहिलंय यावर केले जाऊ नये. याचसाठी 'आयडी' ही कन्सेप्ट आहे!!
नाहीतर,
"येवढा वाढला एरंड,
परि होई न त्याचा ईक्षुदंड"
अशीच सभोवार अवस्था आहे.....

.शुचि. Thu, 09/07/2015 - 03:03

मनुष्यस्वभाव - लहानपणी कुणी कधी सायकलच्या टायरची हवा सोडून सुंबाल्या केलाच नसेल का? क्वचित कोणाच्यातरी दाराला कडी घालून अन बेल दाबून पळून जाऊन मज्जा बघितलीच नसेल का. हा नाठाळपणा याच धर्तीवरचा वाटतो मला.
सायबर बुलिंग मध्ये फक्त बुलीज गुन्हेगार असतात असे वाटत नाही, पीडीतही अनावश्यक प्रमाणात इमोशनली इन्वेस्ट होऊन ओढवून घेतातच की.