शनिवारवाड्याची पुनर्बांधणी – एक भ्रामक संकल्पना
कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमधील दुआबाच्या प्रदेशाला दख्खन या नावाने सर्वसाधारणपणे ओळखले जाते. या दख्खनमध्ये इस्लामिक सत्ता प्रथम स्थापन झाली ती 1294 मध्ये, जेंव्हा दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीच्या यादव राजांचा पराभव केला तेंव्हा! या नंतर 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना झाली आणि अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली की दख्खनचे इस्लामीकरण आता पूर्णत्वास जाणार. मात्र याच वेळी सांगमा राजघराण्यातील दोन हिंदू राजे, हरिहर आणि बुक्का यांनी तुंगभद्रा नदीच्या किनार्यावर 1336 मध्ये एका हिंदू राष्ट्राची स्थापना केली आणि पुढची 200 वर्षे तरी दख्खनच्या इस्लामीकरणाची प्रक्रिया थोपवून धरली. यानंतर 5 दखखनी सलतनतीच्या सुलतानांनी मिळून विजयनगरच्या सैन्याचा पराभव केला आणि या भव्य आणि नेत्रदीपक अशा नगराची अक्षरशः राखरांगोळी केली. या नगरीतील एकापेक्षा एक सरस अशा स्थापत्यांच्या जागी फक्त भग्नावशेष आणि दगडांच्या राशी एवढेच उरले. तरी सुद्धा जे काही उरले आहे ते इतके प्रेक्षणीय आणि भव्य आहे की जगभरातले हजारोंनी पर्यटक हंपीला भेट देण्यासाठी रोज येथे येत असतात. या भग्नावशेषांमध्ये असलेल्या प्रसिद्ध बालकृष्ण मंदिराच्या निकट, 2 छोटी मंदिरे आहेत. यापैकी एक मंदीर आहे क्रोधित नृसिंहाचे! या मंदिराचा काही वर्षांपूर्वी पुरातत्त्व विभागाने जीर्णोद्धार केला होता. जुन्या दगडी स्थापत्याला सिमेंट कॉन्क्रीटची मलमपट्टी लावली होती. परंतु नंतर पुरातत्त्व विभागाच्याच हे लक्षात आले की हा जीर्णोद्धार आपल्याच 80 किंवा 90 वर्षांपासून अंमलात असलेल्या धोरणाविरुद्ध केला गेलेला आहे. यानंतर पुरातत्त्व विभागाने केलेली मलमपट्टी चक्क तोडून टाकली व मंदिराचे भग्नावशेष परत गेली 500 वर्षे होते त्याच स्थितीत पुन्हा आणले.
हे सगळे जरा जास्तच बारकाईने मी लिहिले आहे याचे कारण मला वाचकांच्या लक्षात एक महत्त्वाची बाब आणून द्यायची आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने 1920 साली प्रसिद्ध केलेल्या प्राचीन अवशेषांच्या निगराणी बद्दलची एक कार्यपुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेत हे अगदी स्पष्ट केलेले आहे की प्राचीन भग्नावशेषांचा जीर्णोद्धार करणे पुरातत्त्व विभागाला मान्य नाही व या भग्नावशेषांची (मग ते भग्नावशेष असोत किंवा इतस्ततः पडलेले पाषाण असोत) फक्त निगराणी आणि संरक्षण करणे हेच या विभागाचे अधिकृत धोरण आहे. या कार्यपुस्तिकेमध्ये काही बदल नुकतेच करण्यात आले मात्र वर निर्देश केलेले मुलभूत धोरण आहे तसेच ठेवण्यात आलेले आहे.
आता आपण पुण्याकडे वळूया. पुण्यामध्ये ऐतिहासिक कालातील सर्वात महत्त्वाचे आणि अजूनही जमिनीवर उभे असलेले स्थापत्य म्हणजे शनिवारवाड्याची तटबंदी आहे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी बांधून घेतलेले हे स्थापत्य किती भव्य आणि दिमाखदार असले पाहिजे याची थोडीफार झलक आपल्याला या तटबंदीमुळे अजूनही पहायला मिळते हे आपले भाग्यच म्हणता येईल. आपल्या तलवारीच्या जोरावर मध्य आणि उत्तर हिंदुस्थानचा बहुतांशी भाग आपल्या अंमलाखाली आणणार्या या पेशव्याने आपल्या सामर्थ्याला साजेशी अशी आपली राजधानीची जागा असली पाहिजे या विचाराने शनिवार वाड्यात अतिशय सुंदर दिसणारे आणि सागाचे लाकूड वापरून बांधलेले 7 मजली भव्य महाल उभारलेले होते. हे सर्व महाल 1817 मध्ये ब्रिटिशांनी शेवटच्या पेशव्याचा पराभव करून सत्ता काबीज केल्यानंतरची 10 वर्षे पर्यंत तरी शाबूत होते. पण त्या नंतर अचानक आग लागून हे सर्व महाल भस्मसात झाले. त्या नंतर तटबंदीच्या आत उरली आहेत ती फक्त दगडी बांधकाम केलेली इमारतींची जोती. या जोत्यांवरून या महालांच्या आकाराची मात्र कल्पना येऊ शकते.
सर्व मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल की या दुर्घटनेनंतर, पेशव्यांच्या या राजधानीची, इंग्रजांचे प्रतिनिधी म्हणून भेट देणार्या अधिकार्यांनी लिहून ठेवलेली वर्णने सोडली, तर हा वाडा आणि त्यातील महाल कसे होते हे पुढच्या पिढ्यांना कळू शकेल असे कोणतेही चित्र, छायाचित्र किंवा इमारतीचा आराखडा आता कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे तटबंदीच्या आतील महाल, त्यांची स्थापत्य वैशिष्ट्ये आणि त्यांचा दिमाख कसा होता हे कळणे आता अशक्यप्राय आहे. हे महाल कसे दिसत असत? त्यांचे बांधकाम कसे केलेले होते? वगैरे सारखे प्रश्न आता अनुत्तरितच राहणार आहेत.
या अडचणीमुळे जरी या महालांची पुनर्बांधणी करू असे कोणी ठरवले तरी कोणतेच आराखडे, तैलचित्रे किंवा छायाचित्रे उपलब्ध नसल्याने पुनर्बांधणी केलेले महाल जुन्या महालांप्रमाणेच आहेत असे खात्रीलायकपणे कोणालाच सांगणे शक्य होणार नाही. त्याच प्रमाणे पुरातत्त्व विभागाची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार शनिवार वाडा ही महत्त्वाची राष्ट्रीय वारसा वास्तू समजली जात असल्याने हा विभाग अशी काही पुनर्बांधणी शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत करू देईल याची सूतराम शक्यता दिसत नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीने शनिवारवाड्याची पुनर्बांधणी करण्याचा ठराव संमत करणे जरा आश्चर्यजनक वाटते. हा ठराव मांडणार्या आणि मंजूर करून घेणार्या नगरसेवकांना एकतर वस्तुस्थिती काय आहे याची माहिती तरी नसावी किंवा ते एखादी राजकीय खेळी खेळू इच्छित आहेत असे वाटले तर नवल वाटावयास नको. मागे जिजामाता उद्यानातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा जसा हलवला गेला किंवा आता शनिवारवाड्याजवळील बस थांब्याला लाल महाल बस थांबा असे नाव देण्यात यावे अशी काहीतरी गर्भित अर्थ असणारी एक मागणी करण्यात आली आहे असे माझ्या नुकतेच कानावर आले आहे. त्यातलाच काहीतरी हा प्रकार असावा असा संशय मनात येणे स्वाभाविक आहे.
या ठरावानुसार पुनर्बांधणीचे कार्य बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी भव्य दिव्य असे कार्डबोर्डचे सेट उभारणार्या एका प्रसिद्ध कला दिग्दर्शकाला देण्यात यावे असेही या ठरावात नमूद केलेले आहे. हे कला दिग्दर्शक मोठे नामवंत व प्रतिभाशाली आहेत व त्यांनी उभारलेले काही सेट मनाला थक्क करून सोडणारे आहेत याबाबत काही शंका वाटत नाही. परंतु शनिवारवाड्याचे कोणतेही तैलचित्र, छायाचित्र किंवा आराखडा उपलब्ध नसताना या कला दिग्दर्शकांनी उभारलेली कोणतीही वास्तू, मग ती कितीही भव्य किंवा दिव्य असली तरी ती एखाद्या फिल्मसेट सारखी त्यांच्या कल्पनेतीलच फक्त असणार आहे. या वास्तूला कोणतेच ऐतिहासिक महत्त्व असू शकणार नाही.
मला आशा आहे की महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा या कारणांसाठी हा ठराव फेटाळून लावील. अर्थात जरी या सभेने असा काही ठराव संमत केला तरी पुरातत्त्व विभाग शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत अशी काही वास्तूबांधणी करण्यास परवानगी देणे अशक्यच वाटते. त्यामुळे हा पुनर्बांधणी केलेला काल्पनिक शनिवारवाडा तटबंदीच्या बाहेरच साकारू शकतो. त्यामुळे इतिहासाशी संबंध नसलेली एक प्रेक्षणीय वास्तू एवढेच फक्त त्याचे महत्त्व असू शकेल.
28 सप्टेंबर 2013
प्रतिक्रिया
प्रथम restoration च्या गप्पा
प्रथम restoration च्या गप्पा मारायच्या आणि मग तिथे महसूल, देखभाल खर्च वसूल व्हायला हवा म्हणून हॉटेल किंवा मॉल पण येणार बरं का...मग कदाचित मस्तानीचा नाच पण.
माझ्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला इथे अवश्य भेट द्या
पारसनीस
अक्षरधूळ या आपल्या ब्लॉगवर (बरोबर आहे ना?) डी.बी. पारसनीस यांच्या शनवारवाड्यावरील पुस्तकाबद्दल माहिती वाचली होती. ते पुस्तकही जालावरून उतरवले आहे. त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे/गणेश महालाच्या चित्राच्या आधारे बारकाईने अभ्यास करून प्रतिकृती बनवता येईल असे वाटत नाही काय?
वर्णनावरून केलेली प्रतिकृती
अशी प्रतिकृती कदाचित भव्य किंवा प्रेक्षणीय होईलही. परंतु ती मूळ वास्तूंप्रमाणे होणे शक्य नसल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व राहणार नाही. उदाहरणार्थ पेशव्यांची मसनद कशी होती याचे वर्णन ब्रिटिश अधिकार्यांनी लिहून ठेवलेले आहे. त्या पद्धतीचे तीन कक्ष अजूनही बघता येतात. त्यापैकी एक मस्तानी महालाचा आहे जो केळकर संग्रहालयात आहे. दुसरा तसाच कक्ष रास्ते वाडा किंवा नातू वाडा यात आहे. त्यामुळे अशी मसनद आज बांधणे शक्य असले तरी त्याचे ऐतिहासिक महत्त्व शून्यच असणार आहे.
ही बातमी याच संदर्भात-
ही बातमी याच संदर्भात रोचक ठरावी -
http://www.bloomberg.com/news/2013-06-12/berlin-palace-rebuilding-begins...
विशेषतः -
"The plan has its critics, with architects and some politicians arguing that recreating the palace decades after it was demolished is artificial, especially when there is no longer a royal family to live there."
हा भाग.
असा 'जीर्णोद्धार' न होवो हीच
असा 'जीर्णोद्धार' न होवो हीच इच्छा.
जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारात सुद्धा अनेक बदल करतात तेही कितपत योग्य असे नेहमी वाटते. रंगकाम करून मूळ काळ्या दगडातल्या बांधकामांची शोभा घालवण्याचं काम तर खूप ठिकाणी झालं आहे.पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने काही माहिती(पुरावे) सुद्धा यामुळे पुसली गेली असेल. अलिकडेच पाहिलेले गोव्यातील तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर हे आहे त्या स्थितीत जपलेलं वाटलं आणि खूप आवडलं.
आश्चर्य
दादोजी कोंडदेवांचा पुतळा सुद्धा सहन न होणारी मंडळी,चक्क पेशव्यांनी बांधलेल्या वास्तुची पुनर्बांधणी करायचा ठराव करतात हेच आश्चर्यकारक आहे.
त्यातून मिळणार्या मलिद्याकडेच बहुतेक जास्त लक्ष असावे.
शी प्रतिकृती कदाचित भव्य
किती हुबेहुब झाला म्हणजे ऐतिहासिक महत्त्व टिकून राहील? आत्ताच्या अवस्थेत तो मूळ वास्तूप्रमाणे किती हुबेहुब आहे? माझ्या मते प्रामाणिक प्रयत्न केला आणि पुरेसा पैसा खर्च केला तर जी वास्तु तयार होईल ती खरोखरच पेशव्यांच्या वाड्याची शान किती होती याची पर्यटकांना कल्पना देऊ शकेल. आत्ताच्या निव्वळ तटबंदीवरून अर्थातच तोकडी कल्पना येते हे मूळ लेखातच मान्य केलेलं आहे.
विसूनानांनी दिलेल्या उदाहरणावरून आठवलं - ड्रेस्डेन बॉंबिंगमध्ये जळून खाक झालेलं फ्राउनकर्श हे चर्च २००५ च्या सुमाराला पुन्हा बांधून पूर्ण केलं. अर्थातच त्यांच्याकडे मूळ आराखडे होते म्हणून हुबेहुब झालं असावं. पण माझ्यासारख्याला, ज्याने मूळ चर्च पाहिलेलं नाही, त्यासाठी आधीच्या भव्यतेची साक्ष देणारी वास्तू ही शिल्लक राहिलेल्या खंडहरांपेक्षा कितीतरी मूल्यवान ठरते.
अवशेष जपणं एवढंच कदाचित पुरातत्वखात्याचं धोरण असेल. म्हणून ते बदलू नयेच असं नाही. वर दिलेल्या फ्राउनकर्शच्या पुनर्बांधणीत शक्य तितके मूळ दगड योग्य त्या जागी वापरलेले आहेत.
हुबेहुब
पुर्नबांधणी केलेली वास्तू हुबेहुब झाली आहे की नाही? हे ठरवायला मूळ वास्तू कशी दिसत होती हे सांगणारा कोणताच पुरावा उपलब्द्ध नसल्याने ते सांगणे कसे शक्य येईल? असे मला वाटते. त्यामुळे तत्कालीन ब्रिटिश अधिकार्यांनी केलेली वर्णने वाचून समाधान करून घ्यावे लागते. कदाचित केळकर संग्रहालयात या वर्णनावरून एखादी प्रति़कृती तयार करून ठेवता येईल.
पुण्यातील टिळक रोडवर हिराबाग क्लब मध्ये असाच एक कक्ष आहे त्यावरून पेशवेकालीन वास्तूंची अंतर्गत रचना कशी होती त्याची कल्पना येऊ शकते. मात्र या वास्तू बाहेरून कशा दिसत असतील हे सांगणे कोणासच शक्य नाही.
पुर्नबांधणी केलेली वास्तू
हा मुद्दा मान्यच आहे. माझा मुद्दा असा आहे की ती नक्की कशी होती हे कोणालाच माहिती नसल्यास 'साधारण कशी असावी' याची कल्पना करून मनापासून चांगली निर्मिती केली तर त्यातून त्याकाळच्या वैभवाची, वातावरणाची, आणि इतिहासाची जास्त चांगली प्रचिती येऊ शकेल.
पुर्नबांधणी केलेली वास्तू
राजेश यांचा मुद्दा मान्यच आहे. मात्र अशी प्रतिकृती शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत न उभारता केळकर संग्रहालयाच्या आवारात उभारावी असे मला वाटते. विजयवाड्याजवळील सातवाहनकालातील अमरावती स्तूपाची (जो आता अस्तित्वात नाही) अशीच काल्पनिक प्रतिकृती चेन्नाई संग्रहालयात बनवून ठेवलेली आहे.
हा रस्ता सरळ नाही असे वाटते.
पेशवे, शनिवारवाडा असे काही शब्द हल्ली lightening rod सारखे झालेले आहेत. शनिवारवाड्याची पुनर्बांधणी झालीच तर त्या नव्या जागेत कशाचे स्मारक करायचे, तेथे कोणाचे पुतळे उभारायचे, कोठल्या स्मृति जागवायच्या आणि कशा आणि कोठल्यांकडे दुर्लक्ष करायचे असे शेकडो वाद उभे राहू शकतील. Let sleeping dogs lie असे मी म्हणेन.
पुराणवस्तु खात्याचे धोरणहि योग्य दिसते. पुष्कळशा जुन्या वास्तु असेच lightening rods आहेत. त्यांना पुनः उभे करणे म्हणजे अनेक गाडलेल्या भुतांना जागे करण्यासारखे आहे.
पारसनिसांचे Poona in Bygone Days येथे वाचणे/उतरवून घेणे ह्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. त्यात पहिलाच लेख शनिवारवाडयावरती आहे.
उत्तर प्रदेशातील कार्वी येथील पेशवे वंशजांचा वाडा पुष्कळसा शनिवारवाडयाची आठवण करून देणारा होता/आहे असे वाचल्याचे आठवते.
इतिहासाचे अवजड ओझे
'नारायणराव पेशव्यांचा वध' या नाटकाच्या जाहिरातीत म्हणे 'पेशव्यांच्या पोटातून खरा साखरभात काढून दाखवला जाईल' असे लिहिलेले असे! त्याची आठवण झाली....
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
शंका (समांतर अवांतर)
जी.ए. आता इतिहासजमा झाले म्हणावेत काय? नसल्यास, अजून साधारणपणे किती वर्षांनी तसे म्हणता येईल?
काम सुरू झाले आहे?
इथे काही माहिती मिळते आहे -
http://www.behance.net/gallery/Revitalizing-Environs-of-Shaniwarwada-Pune-(COPY)/3564275
म्हणजे वास्तुशिल्पाचे काम सुरू झाले आहे?
पुरातत्व खात्याची परवानगी न
पुरातत्व खात्याची परवानगी न मिळाल्याशिवाय तटबंदीच्या आतच काय, लगतच्या परिसरात सुद्धा अशी पुनर्बांधणी करणं कायदेशीरदृष्ट्या शक्य होणार नाही. मला मूळ बातमी वाचायला मिळाली नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या राजकीय खेळ्याच असणार असा प्रथमदर्शनी कयास आहे. तेव्हा आत्तापासूनच बाजारातल्या तुरींविषयी चिंता करून काही उपयोग नाही.
विसूनानांनी दिलेल्या दुव्यावर कुठेही पुनर्बांधणीचा उल्लेख नाही - ते Revitalizing असा शब्द वापरत आहेत. त्या बातमीचा पूर्ण फोकस हा वारसा संवर्धन हा आहे.
काय फरक पडतो?
लेखन व चर्चा वाचून 'शिप ऑफ थिसीयस' आठवला
शनिवारवाड्याच्या आतील जागेवर गवत व तटबंदीवर उगवलेला पिंपळ असले बघण्यापेक्षा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल असे (काही प्रमाणात काल्पनिक का असेना) भव्य पर्यटन स्थळ उभे राहिल हे मला अधिक महत्त्वाचे व उपयुक्त वाटते. तेव्हा या/अशा प्रकारच्या उपक्रमाचे-संकल्पनेचे- मी स्वागत करतो.
मात्र स्थायी समिती इतक्या मोठ्या कामाचा प्रस्ताव मंजुर करताना, निविदा काढण्याऐवजी थेट एका व्यक्तीच्या नावे प्रस्ताव मंजूर करते, हे त्या इमारती शेकडो वर्षांपूर्वीसारख्या असतील की नाही या आता ठरवता न येणार्या गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाचे (तसेच धक्कादायक) व चिंताग्रस्त करणारे आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जागेवर गवत
शनिवारवाड्याच्या आतील जागेवर गवत व तटबंदीवर उगवलेला पिंपळ असले बघण्यापेक्षा, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल असे (काही प्रमाणात काल्पनिक का असेना) भव्य पर्यटन स्थळ उभे राहिल हे मला अधिक महत्त्वाचे व उपयुक्त वाटते.
फक्त हे दोनच पर्याय उपलबद्ध नसून " तटबंदीच्या आतील जागेची निगराणी आणि साफसफाई चांगल्या पद्धतीने करणे आणि एक काल्पनिक प्रतिकृती दुसरीकडे उभारणे." हाही पर्याय उपलबद्ध आहे.
मान्य
मान्य आहे. तसे काही झाल्यासही स्वागत होईलच - तसे होणे अधिक उचित ठरावे - पण तसेच झाले पाहिजे हा आग्रह का?
जर पुरातत्त्व खात्याने मंजूरी दिली तर त्याच जागी बांधकाम का करू नये?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुरातत्त्व खात्याची मंजुरी
मागच्या आठवड्यात, पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्यांनी अशी मंजुरी देता येणे शक्य नाही असा खुलासा केल्याचे पुण्यातील वृत्तपत्रांतून छापून आलेलेच आहे. त्यामुळे या शक्यतेबद्दल चर्चा करणे निष्फळ आहे.
आभार!
माहितीबद्दल अनेक आभार.
मात्र, तसे असल्यास लेखही आता काही प्रमाणात गैरलागू ठरतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लेख गैरलागू
माझ्या मूळ लेखात मी स्पष्टपणे हे म्हटले आहे की
"त्याच प्रमाणे पुरातत्त्व विभागाची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांनुसार शनिवार वाडा ही महत्त्वाची राष्ट्रीय वारसा वास्तू समजली जात असल्याने हा विभाग अशी काही पुनर्बांधणी शनिवारवाड्याच्या तटबंदीच्या आत करू देईल याची सूतराम शक्यता दिसत नाही."
या विधानाचे कन्फरमेशन आता पुरातत्त्व विभागाकडून झाले आहे. एवढेच!
इन्टॅक जीर्णोद्धार
Intach (Supported by Ministry of Culture, Government of India) नामक संस्थेने केलेल्या काही जीर्णोद्धारांची कामे खालील दुव्यावर पाहता येतील.
http://www.intach.org/divi-archi-heritage.asp
शनिवारवाड्यावर अथवा रायगडावर जर असे सुबुद्ध पुनर्निर्माणाचे संस्कार होणार असतील तर त्याला विरोध व्हायला हवा का?
अनेक ऐतिहासिक वास्तू 'जशा आहेत तशा' राखायच्या नादात नष्ट होताना दिसतात. गर्दुल्ले आणि दारुडे यांचे अड्डे होतात. सगळीकडे 'बंटी लव्हज बबली' असे खरडलेले असते. तिथली भंगलेली शिल्पे आणि गंजलेल्या तोफा/हत्यारे यांची परदेशात तस्करी होते. त्यापेक्षा तिथे पूर्वकालीन वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ जाईल अशी वास्तू उभारली तर कदाचित त्याचे ऐतिहासिक महत्त्व पुनर्स्थापित व्हायला हातभार लागेल. तसेच त्यातून येणार्या उत्पन्नातून तो ठेवा जतन करणार्यांना नोकरीचे अवसरही प्राप्त होतील.
शनिवारवाड्यात तर आज लाईट अॅण्ड म्यूझिक शोही सुरू असतो की नाही ते माहित नाही. पण गोळकोण्ड्यावर निदान तेवढे तरी केले आहे. मग त्यासाठी केलेले सुशोभीकरण/ बागबगीचा/ प्रकाश योजना यांना त्या वास्तूवरचे सद्य संस्कार का म्हणू नये? ते भग्नावशेष 'जसे आहेत तसे' कुठे राखले गेले आहेत?
+१
+१
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"इण्टॅक" नाव बाकी एकदम यथार्थ
"इण्टॅक" नाव बाकी एकदम यथार्थ बघा पेज पाहिले, असे रिस्टोरेशन असेल तर कुणाचे काही दुखायचा सवालच नाही. पण शनिवारवाड्याच्या आतले बांधकाम नक्की कसे होते ते पक्के माहिती नसल्याने ते नको. ज्या भिंती आणि इतर काही वाचलेय त्यांची सुधारणा उपरोल्लेखित पद्धतीने केल्यास स्वागतच आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सहमत आहे
बरोबर.. म्हणूनच सदर काम कोणी करावे याचा उल्लेख स्थायी समितीच्या प्रस्तावात असावा हे अधिक धक्कादायक व चिंता करन्याजोगे असल्याचे म्हटले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!