Skip to main content

संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे

(हा धागा सध्या तरी चर्चेस खुला आहे. चर्चेतून मसुदा अंतिम झाल्यावर त्यावरची चर्चा काढून टाकून कायम स्वरूपात संस्थळावर ठेवला जाईल)
धागा चर्चेसाठी बंद करत आहोत. धोरणांवर चर्चा करण्यासाठी संपादकांना व्यनी करता येईल. ऐसी अक्षरेमधील संभाव्य सुधारणा/मते/मागणी या धाग्यात नोंदवता येईल

भूमिका

कुठचाही नवीन प्रकल्प हाती घेताना आपण नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहोत याची स्पष्ट कल्पना असणे आवश्यक असते. एखादा प्रवास करताना आपण कुठे जात आहोत हे माहीत असणे जसे अनिवार्य असते तसेच. ऐसी अक्षरे डॉट कॉम या संस्थळाची निर्मिती व सदस्यांचा त्यातला सहभाग हा असाच एक प्रवास. त्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपण का चाललोय, कुठे जाणार आहोत, व तिथपर्यंत पोचण्यासाठी कुठचा मार्ग स्वीकारणार आहोत यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा इथे प्रयत्न आहे.

लेखनाला काही हजार वर्षांचा इतिहास आहे. ताम्रपट, शिलालेख, भूर्जपत्रे, छापील कागद अशी वेगवेगळी माध्यमे शतकानुशतके लेखनासाठी वापरली गेली आहेत. त्यामानाने आंतरजाल हे माध्यम अगदी लहानग्या बाळासारखे आहे. उणीपुरी वीस वर्षे जेमतेम. त्यात मराठी लेखनासाठी आंतरजालाचा वापर गेल्या आठ दहा वर्षातला. माध्यम वयाने जसे लहान आहे, तसेच त्याचा वापर करण्याची क्षमता असलेलेही आज त्यामानाने थोडेच आहेत. मराठी लिहू वाचू शकणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत अगदी नगण्य लोक मराठी आंतरजालाचा वाचनासाठी वापर करतात. लेखन करणारे तर अगदीच थोडे. साहजिकच या माध्यमाचे मराठी साहित्यनिर्मितीत योगदान अगदी थोडे आहे.

असे असले तरी या माध्यमाची ताकद प्रचंड आहे. आंतरजालावर एकाच वेळी गप्पाटप्पा, कवितावाचन, चित्रप्रदर्शन, कथाकथन, विचारमंथन, गाण्याच्या भेंड्या अशा अनेक गोष्टी चालू शकतात. माउसच्या क्लिकेबरोबर क्षणात कधी कॉलेजचा कट्टा तर कधी शेरोशायरीची मैफल, तर कधी चित्रांची ग्यालरी, किंवा परिसंवादाचे व्यासपीठ अशा वेगाने बदलू शकते. त्यात सहभागी होणाऱ्यांना एकाच ठिकाणाहून हजारो मैलांवरच्यांशी संपर्क साधता येतो. छापील स्वरूपात येणाऱ्या आपल्या लेखनाविषयी वाचकांना काय वाटते हे कळण्यासाठी अनेक दिवस थांबावे लागत असे. इथे ते काही मिनिटांत होऊ शकते.

अशा या शक्तिशाली माध्यमाच्या बलस्थानांचा वापर योग्य रीतीने करून घेतला तर उत्तम साहित्यनिर्मिती करणे सहज शक्य आहे. त्यासाठी लेखक, रसिक वाचक व समीक्षक यांना परिणामकारकपणे एकत्र आणण्याची गरज आहे. इतर कुठच्याही कलांप्रमाणे लेखन हीदेखील एक कला आहे. ती हळुहळू आत्मसात करावी लागते. त्यासाठी प्रथम उत्तम वाचक व्हावे लागते. इतर वाचकांकडून व जाणकारांकडून आपल्या लेखनात सुधारणा कशी करता येईल हे शिकून घ्यावे लागते. अशा अनेक नवख्या लेखकांनी जमावे, एकमेकांचे लेखन वाचून त्यांना साधकबाधक सल्ला द्यावा, इतर लोक कसे लिहितात हे पहावे आणि सर्वांनीच समृद्ध व्हावे. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ. हा या संस्थळाचा मुख्य उद्देश आहे. हा सुपंथ धरण्यासाठी नुसतेच लिहिणे, शिकणे नाही तर एकत्र येणे देखील महत्त्वाचे आहे. आपण खऱ्या जगात जेव्हा एकत्र येतो तेव्हा गप्पाटप्पा, टिंगलटवाळ्या, चेष्टामस्करी करतो. फिदीफिदी हसतो, तक्रारी करतो, टर उडवतो. या सर्व गोष्टी समृद्ध लेखनाइतक्याच आवश्यक आहेत. कारण नाती निर्माण झाली नाहीत तर एकमेकां साह्य करू ही भावना निर्माण होणार नाही. त्यामुळे एकत्र येऊन धमाल करणे यालाही संस्थळावर अग्रक्रम देण्याचा मनसुबा आहे.

उत्तम साहित्यनिर्मितीचा फायदा वाचकाला होतो. मात्र अशा संस्थळावर आवर्जून वाचावे असे लेखन झाले तरी ते सहज सापडेलच अशी खात्री नसते. कारण उघड आहे, लेखक शिकत असताना प्रायोगिक लेखन मोठ्या प्रमाणावर येणारच. शिवाय टाइमपास करणारे, माहिती देणारे अशा अनेक प्रकारच्या धाग्यांमध्ये वाचकाला हवे तसे दर्जेदार लेखन शोधणे जिकीरीचे होते. संगणकयुगात शब्दांचा शोध घेणे सोपे असले तरी 'चांगले विनोदी काहीतरी वाचायला हवे बुवा' असा शोध घेण्याची सोय नाही. त्यासाठी चोखंदळ वाचकांची मते लक्षात घेऊन आधीच तशी वर्गवारी करण्याची आवश्यकता असते. अशा वर्गवारीचा फायदा अर्थातच लेखकांना सर्वसाधारणपणे चांगले लेखन म्हणजे काय हे समजावून घ्यायलाही मदत होईल.

असे संस्थळ चालवणे म्हणजे मोठी जबाबदारी असते. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी झटणे, तांत्रिक बाजू सांभाळून संस्थळ सदैव जागृत राहील याची खात्री करून घेणे या जबाबदार्‍या तर उघडच आहेत. त्याचबरोबर एक प्रसिद्धी माध्यम असल्यामुळे विविध कायद्यांची बंधने पाळणे हेही महत्त्वाचे ठरते. या कायदेकानूंबरोबर सदस्यांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने, खेळीमेळीने रहावे, एकमेकांना उपद्रव करू नये यासाठीचे काही लिखित व अलिखित नियमदेखील पाळावे लागतात. या बाबतींमध्ये गैर वागणूक होत असेल तर ती दुरुस्त करणे भाग पडते. व्यवस्थापन व सदस्य यांचे नाते हा संस्थळांवरचा एक कळीचा मुद्दा आहे. 'ऐसी अक्षरे डॉट कॉम'वर हे नाते जितके सकारात्मक करता येईल तितके करण्याचा प्रयत्न असेल. व्यवस्थापन व संपादक यांचे काम निव्वळ संस्थळावरचे आक्षेपार्ह साहित्य काढून टाकणे एवढेच असण्याची अपेक्षा नाही. किंबहुना सदस्य इथे काहीतरी आक्षेपार्ह लिहिण्यास टपलेलेच असतात या गृहितकापासून फारकत घेण्याचा प्रयत्न असेल. हे संस्थळ आपल्या सर्वांचे आहे, ही उद्दिष्टे सगळ्यांचीच आहेत, ती गाठण्यासाठी बहुतेक सगळेच सदस्य प्रयत्न करतील, या गृहितकांवर आधारलेले नाते निर्माण करण्याचा प्रयत्न राहील.

या संस्थळावर होणारे लेखन, प्रतिसाद, संपादन व व्यवस्थापन म्हणजे ती उद्दिष्टे गाठण्यासाठीचा एक प्रवास आहे. हा प्रवास योग्य दिशेने व्हावा म्हणून मार्गदर्शक तत्वे बाळगणे नितांत गरजेचे आहे. या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सर्वसामान्य दिशा ठरली तरीही या प्रवासात काही व्यवधाने पाळावी लागतील. त्यांची मांडणी खाली धोरणांच्या स्वरूपात केलेली आहे. उद्दिष्टे व मार्गदर्शक तत्त्वे ही काळ्या दगडावरची रेघ नसून ती काळाप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे बदलू शकतील. असे बदल सुचवण्याची कार्यपद्धती सदस्यांना कळवली जाईल.

ध्येयघोषणा

मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो की निव्वळ मनोरंजनात्मक - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे.

उद्दिष्टे

लेखक-वाचक-संस्थळ यांची समृद्धी साधण्यासाठी काही समांतर उद्दिष्टे ठेवलेली आहेत.

- मराठीत अधिकाधिक दर्जेदार लेखन व काव्यनिर्मिती व्हावी, तसंच नवोदित लेखकांना अभिव्यक्ती, प्रोत्साहन व विकासाची संधी मिळावी.
- सकस चर्चांतून विचारांना चालना मिळावी व कौलांतून मराठी मनाचा वेध घेता यावा.
- समधर्मी लोकांना हितगुज करता यावे, एकमेकांशी मैत्री करता यावी.
- पाककला, चित्रकला, छायाचित्रकला यांचे समृद्ध दालन निर्माण व्हावे.
- खेळ व विरंगुळा यांवरील लेखनातून करमणूक व्हावी.

वरील उद्दिष्टे गाठण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे अंगिकारली जातील. ही तत्त्वे केवळ सदस्यांसाठी किंवा केवळ व्यवस्थापनासाठी नसून आपल्या सर्वांसाठीच आहेत हे ध्यानात ठेवावे.

मार्गदर्शक तत्त्वे

- लेखन करताना दर्जाला व साहित्यमूल्यांना महत्त्व द्यावे. खेळ, करमणूक, गप्पाटप्पा व दंगा यांसाठी स्वतंत्र सदर असल्यामुळे ललित लेखनात व चर्चांमध्ये अवांतर विषय टाळावेत.
- जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही जाती, धर्म, समूह, प्रांत, लिंग किंवा तत्सम समूहाबद्दलच्या द्वेषमूलक/विद्वेषपूर्ण विधानांना (Hate speech) ऐसी अक्षरेवर अभिव्यक्तीस्वातंत्र्य समजलं जात नाही.
- अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.
- प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. अशा टीकेकडे खिलाडू वृत्तीने, तीतून शिकण्याच्या उद्दिष्टाने पाहावे.
- वाचकांनी साईटवरील लेखनाचा दर्जा सुधारण्यास मदत करावी. त्यासाठी दर्जा मोजण्याची सुविधा पुरवण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. हे साध्य करण्यासाठी प्रतिसादांना व लेखनाला श्रेणी देण्याची सुविधा अनेक जुन्याजाणत्या सदस्यांना दिलेली आहे.
- प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.
- सर्वोत्कृष्ट लेखनाची तसेच नियमितपणे उत्तम लेखन करणाऱ्यांची विशेष नोंद घेण्याबाबत व्यवस्थापन प्रयत्नशील राहील.
- चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.
- अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग टाळावेत.
- चर्चाप्रस्तावकावर चर्चा योग्य दिशेने चालवण्याची जबाबदारी असावी. त्यासाठी सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. चर्चेच्या शेवटी प्रस्तावकाने चर्चेचा सारांश वा फलित लिहिणे अपेक्षित आहे.
- समधर्मी लोकांना सुसंवाद साधण्यासाठी खरडवही व व्यक्तिगत निरोपांची सोय व्यवस्थापनाने पुरवलेली आहे. खरडवही जाहीर असल्यामुळे तीतही अपशब्द, असांसदीय भाषा टाळावी. व्यक्तिगत निरोप हे संस्थळावरचा वावर सुकर करण्यासाठी व संस्थळाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आहे. त्यांमधून महत्त्वाची वैयक्तिक माहिती देणे शक्यतो टाळावे.
- उद्दिष्टांशी सुसंगत अशा सांस्कृतिक, वाङमयीन क्षेत्रांतील पाहुण्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी अनौपचारिक भेटी, चर्चा करण्यासाठी सांस्कृतिक कट्टे आयोजित करण्याचा व्यवस्थापन प्रयत्न करेल.
- छापील माध्यमे, त्यांचे लेखक-वाचक व आंतरजालीय लेखक-वाचक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी व्यवस्थापन वेळोवेळी प्रयत्नशील राहील.
- लेखकांच्या विचारांशी, प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी, व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन, मालक, संपादक, मॉडरेटर्स सहमत असतीलच असे नाही.

उद्दिष्टांचा पाठपुरावा मार्गदर्शक तत्त्वांनुसार होतो आहे याची काळजी घेण्यासाठी व्यवस्थापन खालील धोरणांनुसार कार्यवाही करेल.

धोरणे

- उद्दिष्टे व धोरणांमध्ये बदल करण्याचा अंतिम हक्क व्यवस्थापनाकडे आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे बदल सदस्यांना कळवण्याची जबाबदारीदेखील आहे. व्यवस्थापन महत्त्वाच्या बदलांवर सामुदायिक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करेल.
- एका विशिष्ट मर्यादेपेक्षा खालची श्रेणी मिळाली तर ते लेखन अप्रकाशित करण्यासाठी संपादकांच्या विचाराधीन होईल. ही मर्यादा ठरवण्याचा व त्यानुसार कारवाई करून लेखन अप्रकाशित अथवा नष्ट करण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे. असे अप्रकाशित केलेले लेखन पुन्हा आढावा घेऊन पुनर्प्रकाशित करण्याचा अधिकारही त्यात सामावलेला आहे.
- मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत लेखन, प्रतिसाद, चर्चा केल्यास लेखन अप्रकाशित अथवा नष्ट केले जाईल.
- एखाद्या सदस्याकडून असे वर्तन वारंवार होताना दिसले तर सदस्याच्या लेखनाचे अधिकार मर्यादित केले जातील अथवा खाते रद्द केले जाईल.
- अन्य काही कारणांस्तव काही लेखन वाचनमात्र ठेवण्याचा, अप्रकाशित करण्याचा, नष्ट करण्याचा अधिकार संपादक मंडळाला आहे.
- प्रत्येक निर्णयाबाबत खुलासा करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर नाही. मात्र महत्त्वाच्या निर्णयाबाबत असा खुलासा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल.