चमत्कारांच्या आडची वास्तवं
सणसमारंभसोहळे कसे नात्यागोत्याच्या मित्रपरिवाराच्या गर्दीघोळक्यांनी ओसंडून वाहताना दिसतात. अगदी तिर्हाईतांना हेवा वाटावेत असे. आणि त्यांच्या आत मात्र ठासून भरलेले असतात मानापमान, हेवेदावे, अपेक्षा आणि अपेक्षाभंगाची नाटकं... व्यवहाराचा एक अत्यंत कुरूप आणि सडका चेहरा या उत्सवाच्या मुखवट्यामागे लपलेला...
संकटं आणि अडचणी येतात, तेव्हा हेच सगळे लोक न जाणे कुठे अदृश्य होतात... दिसतच नाही. पूर्ण ग्रहण. आणि मग कधीतरी दिसलेच तर आपल्यावर ओझं पडणार नाही, अशा अवस्थेचे खात्री झाल्यावर उगवलेले दिसतात. सगळं निस्तारल्यावर तर कुणी चमकतातही झकास.
मला पारंपरिक पद्धतीनं असं म्हणायचं नाहीये की, संकट व अडचणीतच खरे मित्र व खरं गणगोत कळतं... आज मी हे समजून घेऊ शकते की एक एखाद्या अडचणीत असतो, तेव्हा दुसराही दुसर्या काही अडचणीत असू शकतो. इच्छा असूनही काही वेळा माणसं एकमेकांसाठी धावून येऊ शकत नाहीत.
पण जेव्हा असं नसतं, तेव्हाही लोक आपले स्वार्थ आणि आपली सोय पाहतात तेव्हा मात्र खिन्नता येते. नुसते गोग्गोड शब्दांनी औपचारिक चौकशा करणारे, स्वतःला कसलीही तोशीस लागू न देणारे, जबाबदार्यांचं ओझं फेकून सुटं चालू इच्छिणारे व्यक्तिकेंद्रित, विभक्त लोक मला फार केविलवाणे वाटतात.
कुटुंबं, गावं, राज्य, देश. विश्व... भाषा, कला, विज्ञान, विचार, तत्त्वज्ञान... सगळीकडेच तुकडा-तुकडा नव्हे, ठिपकाठिपका होत चाललीत माणसं वेगानं. समूहातही एकाकी वाटतं अनेकांना, मग एकटेपणातलं एकाकीपण तर अधिक वेदनादायी असतं.
अशांना सगळ्या सेवा पैशांनी विकत घेता येतात असं वाटतं...
आम्हांला आमचं आयुष्य आहे, तुमची देखरेख आम्ही का करावी असं वाटतं...
ब्लेम करायला कारणं तर शेकडो सापडतात...
माणसं कधी गंभीर आजारी असतात, कधी कुणी कर्जबाजारी होतात, कधी कुणी व्यसनी होतात, कधी कुणी आपली कुटुंबं वा आपली लग्नं टिकवू शकत नाहीत, कधी परीक्षेत नापास वा कामात अयशस्वी होतात... त्यावेळेस समजून घेणं, सोबत देणं, पाठीशी आहोत असं सांगणं, मॉरल सपोर्ट देणं, प्रसंगी जबाबदारी घेणं... या सगळ्यापासून पळ काढणारे कुटुंबीय, गणगोतातले, मित्रपरिवारातले, जातीधर्मातले आणि गावकरी संख्येने एखाद्या किडीसारखे वाढत चालले आहेत.
मी शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करत होते तेव्हा सापडलेल्या अनेक कारणांपैकी हे एक मुख्य कारण आहे, ज्याचा सहसा कुणी उल्लेख केलेला नाहीये. टेकू असणारे खांबच गायब होत चाललेत समाजातले.
कुणाला कुणासाठी वेळ द्यायचा नाहीये, बोलाऐकायला जागा द्यायची नाहीये, बाकी गोष्टी लांबच... आणि अशा गोष्टी वा सोयीसुविधा उपलब्ध करून देणारी व्यावसायिक यंत्रणाही मजबूत नाहीये... अशी कोंडी आहे या देशात.
काहीवेळा माणसं येतात, नाही असं नाही. पण त्या 'शुक्रवारच्या कहाण्या' असतात. तुम्ही काही तरी बनता, तुम्हांला यशस्वी असल्याचं लेबल लागतं, तेव्हा श्रीमंत झालेल्या बहिणीला घरच्या सोहळ्यात जेवायला बोलावणार्या भावासारखे नात्यागोत्याचे व इतरही लोक बोलावतात. दागिण्यांवर घास ठेवावा वाटतो अशावेळी त्या बहिणीसारखाच... की बाई, तुला नव्हे तुझ्या यशाला, प्रतिष्ठेला, नावाला जेवायला बोलावलंय त्यांनी... ज्यांनी दरिद्री म्हणून एकेदिवशी तुला ओळख दाखवली नव्हती, नातं सांगायची लाज वाटली होती त्यांना आणि पंगतीतून उठवलं होतं त्यांनी तुला ताटावरून...
व्रतवैकल्यं, कहाण्या, लोककथा, पुराणं... चमत्कारांच्या आडून किती वास्तवं उभी करतात...
समूहातही एकाकी वाटतं
समूहातही एकाकी वाटतं अनेकांना, मग एकटेपणातलं एकाकीपण तर अधिक वेदनादायी असतं.
असा अनुभव मला कधी आला नसला तरी हे वाक्य एकदम सॉकेट मधे प्लग घातल्यासारखे "लाईट्स ऑन" करून केले.
----
आम्हांला आमचं आयुष्य आहे, तुमची देखरेख आम्ही का करावी असं वाटतं...
आमच्या एका ऑफीस बंधू ना त्यांच्या एका "प्रोफेशनल फ्रेंड" नी हेच वेगळ्या भाषेत - Do I look like the complaints department ? - असे विचारले होते.
तुम्ही म्हणताय ते मान्यच आहे.
तुम्ही म्हणताय ते मान्यच आहे. पण फारसा (खरंतर काहीच) संबंध नसलेली लोक रडगाण गायला किँवा मदत मागायला येतात तेव्हा समोरच्याने नक्की काय कराव अपेक्षा असते त्यांची?
एक उदा सांगते. माझी एक रुममेट होती. ६ महिने एकत्र राहीलेलो, नंतर वेगवेगळ्या जागी शिफ्ट झालो. अधुनमधुन भेट/मेल वगैरे व्हायच. नंतर तेही कमी झाल. तर १० वर्षाँनी अचानक तिच्या नवर्याचा (ज्याला मी कधीच भेटले नाही की बोलले नाही) मला फोन आला की 'माझी बायको पळुन गेलीय. तिला शोधायला मदत कर'. माझा काय संबंध येतो इथे? तो तिचा नवरा आहे हे कळायलाच मला ५ १० मिनीटं लागली. ही असली लोकपण असतात. त्यांना कसला टेकु द्यायचा?
रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला
रस्त्यावरच्या अनोळखी माणसाला देखील आपण शक्य असलेली मदत करतोच. समाजात काही माणसे स्वभावानेच मदतशील असतात. आपला कुणाला तरी उपयोग होतो आहे याचा त्यांना आनंद होतो. आपण केलेल्या मदतीचा आपल्याला (व त्यालाही) त्रास होणार नाही याबाबतच अंदाज घेत लोक मदतीला तयार होतात. कधीकधी समोरच्याने मदत मागितली नाही तरी त्याला मदतीची गरज आहे हे लक्षात येउन स्वतःहून मदत करणारे लोकही असतात. आपण भविष्यात अडचणीत आलो तर आपल्यालाही मदतीची/ सहकार्याची/ आधाराची गरज लागणारच आहे याचे भान त्यांना असते. कधी मदत करण्याची इच्छा असते परंतु व्यावहारिक दृष्ट्या ( यात व्यक्तिमत्वाच्या मर्यादा ही आल्या ) शक्य नसते. अशा वेळी काही लोकांना हळहळ वाटते.
असो... व्यक्ती तितक्या प्रकृती!
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
+१
+१
समूह, समाज म्हणून अशा गोष्टी
समूह, समाज म्हणून अशा गोष्टी दिसतात तेव्हा बहुदा जास्त भयाण वाटतात. पण व्यक्ती असं करते तेव्हा फार काही वाटत नाही, निदान मलातरी वाटत नाही.
माझा एक मित्र, सहज गप्पांमधे म्हणाला, "आपला ही पदवी झाली की आपण कुठेकुठे जाऊ. मग मी तरी काही कोणाशी संबंध राखणार नाही." तेव्हा ते ऐकायला आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटलं. एका घरात राहणाऱ्या लोकांबद्दल अशी भावना! पण पुढे सगळ्यांचंच हेच झालं. याच मित्राची काही वर्षांनंतर पुन्हा भेट झाली तेव्हा मात्र मधली वर्ष घडलीच नाहीत असं वाटलं. तोपर्यंत नवे मित्र, नवा परिवारही मिळाला होता.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कमी पर्याय
होय. बदलांच्या फेजमधल्या मैत्र्या कमी काळापुरत्याच असतात. तिथं शिक्षणासारख्या एकाच विशिष्ट हेतूने तुम्ही एकत्र आलेले असता... त्यात निवड नसते. तरीही एक तात्पुरती आपुलकी वा तात्पुरती वैरं तयार होतातच.
पुढेही ज्यांच्या पायांना भिंगरी असते, त्यांच्याबाबत हेच होत राहतं. मात्र जे स्थिरावलेले असतात, एकच गाव, एकच नोकरी, एकच लग्न, एकच कुटुंब, तोच गोतावळा इत्यादी त्यांना मात्र या मोडतोडीला सामोरं जावं लागतं. तिथं नवी माणसं मिळण्याचे पर्याय व शक्यता खूपच कमी असतात.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
स्वातंत्र्य
ठिपक्याला स्वातंत्र्य असतं जे एकसंध असताना जाणवत नव्हतं, ते स्वातंत्र्य एकटेपणंही देणारचं आणि स्वातंत्र्य हवं असेल तर ते एकटेपण निभावलं पाहिजेच. 'पुर्वीचा काळ बरा होता' छाप मुद्दा ह्या लेखातून जाणवतो आहे.
हे आजचं नाहीये
< 'पुर्वीचा काळ बरा होता' > असं म्हणणार नाही. ते एकांगी होईल.
कारण जे बदल झालेत ते जादूसारखे एकाएकी व आजच झालेत असं नाहीच. आधी तुकडे होण्याची सुरुवात झाली होतीच, आजचे ठिपके त्यातूनच होत गेलेत. एकत्र कुटुंब पद्धतीचे, जात-धर्म पाळत समूहाने जगण्याचे, गावात पंचायती बसण्याचे फायदे जसे होते, तसेच तोटेही होते... तोटे वाढत गेले किंवा आहेत ते तीव्रतेने काही घटकांना जाणवत गेले म्हणून तर मोडतोड सुरू झाली. आणि मोडतोड होताना काही चांगलं ते टिकवणं आणि वाईट तितकंच मोडणं असं तर काही होतच नसतं... सगळंच मोडत जातं.
एकीचे तोटे व्यवस्थितच माहीत असूनही मी हे म्हणते आहे. कारण त्यातले फायदे व्यक्तीपासून ते समूहापर्यंत मोठे होते. एकटेपणातले फायदे तितके मोठे नाहीयेत असं एकुणातच दिसतंय. त्यामुळे माणसं इतर पद्धतींनी समूह कसे बनवता येतील याचा प्रयत्न करताहेत आणि यातल्या काही पद्धतींचा चांगला उपयोग होतोय. बचतगट, विशिष्ट आजार असलेल्यांचे सेल्फ हेल्प ग्रूप्स, ज्यांची मुलं परदेशी आहेत अशा वृद्धांच्या संघटना इत्यादी. हे लहान आहेत किंवा कमी उदाहरणं आहेत असं वाटतं; पण प्रत्यक्ष त्या त्या गटांमध्ये जाऊन पाहिलं की बरीच संख्या आहे हे कळतं. ही संख्या वाढत चालली आहे... तरीही एकूण लोकसंख्येच्या मानाने अपुरी आहेच... आणि विषय मर्यादित असलेली देखील.
काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित
समन्वयवाद
समन्वयवादाने (परंपरा आणि अप्रत्यक्षरीत्या समूह टिकवण्याचे ध्येय उराशी बाळगून) ग्रस्त असलेल्या पिढ्या आपल्याकडे महादेव रानड्यांपासुन सुखाने नांदतायत हा आरोप वैचारीक लोकांनीच तर केला आहे. जुन्या व्यवस्थेला पर्याय म्हणून नविन व्यवस्था सध्यातरी अपुरी वाटते आहे असे म्हणता येईल खरे.
पहिल्यांदा
जुन्या व्यवस्थेला पर्याय म्हणून नविन व्यवस्था सध्यातरी अपुरी वाटते आहे असे म्हणता येईल खरे.
हे आदिम काळापासून माणसास वाटत आले आहे. system is always in a state of disorder.
हे सगळं सध्याच होतय, असं नसावं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
>> एकत्र कुटुंब पद्धतीचे,
>> एकत्र कुटुंब पद्धतीचे, जात-धर्म पाळत समूहाने जगण्याचे, गावात पंचायती बसण्याचे फायदे जसे होते, तसेच तोटेही होते... तोटे वाढत गेले किंवा आहेत ते तीव्रतेने काही घटकांना जाणवत गेले म्हणून तर मोडतोड सुरू झाली. आणि मोडतोड होताना काही चांगलं ते टिकवणं आणि वाईट तितकंच मोडणं असं तर काही होतच नसतं... सगळंच मोडत जातं.
मनुष्यप्राणी कळपात राहतो कारण कळप करून राहिल्याने जीवन सुखकर होते. कळपाचे स्वरूप एकत्र कुटुंबाचे असेल किंवा जातीचे असेल. जोवर त्या कळपात राहण्याचे पर्सीव्ह्ड फायदे (पर्सीव्ह्ड तोट्यांपेक्षा जास्त) आहेत तोवर माणूस त्या कळपात राहील. नाहीतर कळप सोडून देईल. नवा कळप बनवेल.
हे सारे होतच आले आहे आणि होतच राहणार. त्या दृष्टीने एकत्र कुटुंब ही एक "आर्थिक" फायद्याची तडजोड होती. आणि ती शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत फायद्याची (किंवा व्यापारात फायद्याची) होती. म्हणून तिचा प्रसार झाला. जेव्हा मोठ्या प्रमाणात वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले तेव्हा ती मोडायला सुरुवात झाली. आज माझ्या मित्रांपैकी कित्येकांचे पालक त्यांच्याबरोबर एकत्र राहतात. हे पालक त्यांच्या तरुणपणात विभक्तच कुटुंबात रहात होते. आज शहरातल्या जागांच्या किंमतींमुळे ही तडजोड पुन्हा करायला लागत असावी. जितक्या जागांच्या किमती बेफाट वाढतील तितकी शहरात अधिक एकत्र कुटुंबे दिसू लागतील. पॉइंट इज एकत्र कुटुंब* ही फायद्याची 'तडजोडच' असते. ती काही स्टॅण्ड-अलोन चांगली किंवा वाईट नसते.
*कुटुंब म्हणजेच समाज सुद्धा. म्हणूनच आदिवासी वगैरे समाजाच्या परीघावरचे गट समाजव्यवस्थेविरोधात उभे राहतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
नकारात्मक
हे सांगताना 'तडजोडी'त नकारात्मक छटा/सूर जाणवतो, कुटुंबात रहाण्याचा पर्याय हा इतर कुठल्याही पर्यायाप्रमाणेच आहे.
"चमत्कारा शिवाय नमस्कार
"चमत्कारा शिवाय नमस्कार नाही", हे कटु वास्तव आहेच. आणि दुसर्यांनी केलेले चमत्कार (कर्तुत्व अथवा सत्कर्म या अर्थी घ्यावे) स्वतःच्या नावे जमा करून नमस्कार मिळविण्यासाठी आदळाअपट करणारी माणसे त्याहूनही भयाण वाटतात.
एखाद्याच्या वागण्याचे परीक्षण दुसर्याने , तिसर्याने.. इ. करावे हे मला अतिशय अतार्किक आणि संदर्भहीन वाटते. कारण मानवी नातेसंबंध हे एकेरी नसून, किमान दुपेडी/ दुहेरी असतात असे वाटते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे वागणे बोलणे तपासताना, त्यावर टीका टिप्पणी करताना दुसरी बाजू बघणे फार जरूरी आह असे वाटते.
अगदी खरं आणि हे समजून न घेता आल्याने माणसे एकमेकांपासून दुरावू शकातात.
कुणीतरी म्हणलेले मी ऐकले आहे की, काही नातेवाईक फक्तं लग्नं टु लग्नं आणि विघ्नं टु विघ्नं, अशीच भेटतात.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
पर्सनल इज पॉलिटिकल
धागा लेखिकेस हे ठाऊकच असेल.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
चित्र
तुम्ही लिहिलंय इतकं चित्र निराशाजनक वाटत नाही. पण माणसं कम्युनिकेशनमधे कमी पडतात आणि त्यामुळे गैरसमज वाढू शकतात.
समजा, तुम्हाला एखाद्याने मदत मागितली. ती तुम्ही दुसर्या कोणाची ओळख करुन देऊन केली. आता मूळ मदत मागणार्याने जर तुम्हाला त्याबाबत काहीच कळवले नाही, तर ते अनुचित आहे. त्याने ते काम झाले की नाही याबाबत तुम्हाला कळवले पाहिजे. प्रत्यक्षांत बर्याच वेळा असे कळवण्यात आळस केला जातो.
काहीवेळा, तुमच्या मदत करण्याच्या स्वभावाचा गैरफायदाही घेतला जातो. '३६ चौरिंघी लेन' या चित्रपटांत त्याचे चांगले उदाहरण आहे.
काहीवेळा, तुमच्या मदत
काहीवेळा, तुमच्या मदत करण्याच्या स्वभावाचा गैरफायदाही घेतला जातो. '३६ चौरिंघी लेन' या चित्रपटांत त्याचे चांगले उदाहरण आहे.
ह्या वाक्याचा इंतिजार होता.
धागाकर्तीने मॉरल सपोर्ट च्या तुटवड्या बद्दल कैफियत मांडलेली आहेच. पण ... स्टोरी डझ नॉट एंड देअर........
मिसळपाववरचा हा लेख साधारण
मिसळपाववरचा हा लेख साधारण असाच आहे. लोकांचा "त्रास" टाळण्याची वृत्ती सर्वदूर पसरलेली दिसतेय.
कदाचित मदत करायच्या नादात चाकोरी मोडून आपले "बेटर" झालेले लाईफ विस्कटून तर जाणार नाही ना अशी भीती वाटत असते आपल्याला.
कविताजी, याला समाजशास्त्रात
कविताजी,
याला समाजशास्त्रात सोशल कॅपिटल म्हणतात. ती कमी झालीय असं निदान रॉबर्ट पुटनम याने अमेरिकन समाजाबद्दल केलं. त्याचे निष्कर्ष वादाच्या भोवर्यात सापडले काही वेळा. पण बर्याच जणांनी ते उचलुनही धरले. आपण आत्महत्यांचे जे उदाहरण दिले आहे त्यावर प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इमाईल डुर्काईमचे "सुईसाईड" नावाचे क्लासिक गणले गेलेले पुस्तक ही आहे. त्यात त्याने आत्महत्त्यांची काही कारणे दिली आहेत. पैकी एक कारण एकाकीपणा (सामाजिक संदर्भातला)हे हे आहे.
संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?
"हेल इज अदर पीपल"
सार्त्र म्हणतो तसे "हेल इज अदर पीपल".
नो एक्झिट नावाचे सार्त्रचे नाटक. एक पुरूष आणि दोन स्त्रिया मरण पावतात आणि एका ठिकाणी येतात. त्यांना आता नरकात आपले हाल हाल केले जातील असे वाटते. ते वाट बघतात पण हाल करणारे यमदूत येतच नाहीत. शेवटी त्यांना कळते की एकमेकांबरोबर रहायचे हीच त्यांची शिक्षा आहे. तोच नरकवास आहे. "हेल इज अदर पीपल".
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
चांगलं काहीच दिसत नाही का हो?
>>>व्यवहाराचा एक अत्यंत कुरूप आणि सडका चेहरा या उत्सवाच्या मुखवट्यामागे लपलेला...
त्यामागे तुम्हाला फक्त कुरूप आणि सडका चेहराच दिसतो? मजामजा, चेष्टामस्करी, खेळकर संभाषण हे अनेक ठिकाणी चालू असते. ते का नाही दिसत. हे खूप पूर्वीपासून सुरू आहे. जसं कुजकटपणा आहे तसंच समंजसपणे सगळं करणारे आहेत. चांगुलपणा पण आहे समाजात. तो बघा जरा.
>>>संकटं आणि अडचणी येतात, तेव्हा हेच सगळे लोक न जाणे कुठे अदृश्य होतात... दिसतच नाही. पूर्ण ग्रहण. आणि मग कधीतरी दिसलेच तर आपल्यावर ओझं पडणार नाही, अशा अवस्थेचे खात्री झाल्यावर उगवलेले दिसतात
मला उलट सुद्धा दिसलेले आहे. नवरदेवाच्या वडिलांना दोन वर्षांनी हृदयविकाराचा झटका आल्यावर एका तासात धुळ्यातले वीस डॉक्टर गोळा झाले होते. बाकीची गर्दी, आता नका येऊ, गरज लागली तर तुम्हालाच बोलवू असे (प्रत्येकाला) सांगून लोकं घालवावी लागलेली होती. चांगली लोकं पण असतात हो, पण लोकसंग्रह असावा लागतो. कायम तुसडे वागून आणि तुसडे लेख लिहून लोक जमा होत नसतात.
>>>मी शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करत होते तेव्हा सापडलेल्या अनेक कारणांपैकी हे एक मुख्य कारण आहे, ज्याचा सहसा कुणी उल्लेख केलेला नाहीये. टेकू असणारे खांबच गायब होत चाललेत समाजातले.
मान्य हं मान्य. पण वर लग्नाचे उदाहरण आणि खाली शेतकरी आत्महत्या - काय संबंध? की लगे हाथों लग्नातल्या विधी, प्रथा यांना झोडपून घ्यायचं म्हणून काहीही.
इतकं कडवेपणाने नाही, पण
इतकं कडवेपणाने नाही, पण चायवाला यांच्यासारखंच वाटतं.
दोन्ही बाजू असतात, पूर्वीही होत्या. नाहीतर "शुक्रवारची कहाणी" डायरेक्ट २०१४ मध्ये लिहिली गेली असती.
किंबहुना शुक्रवारच्या कहाणीत त्या बहिणीचं तत्त्वकठोर वागणं योग्य होतं का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. यामार्गे तिने भाऊ-बहीण तोडलेच, पण लेखिका म्हणते तसं "ओझं फेकायला" त्यांना प्रोत्साहनच दिलं. "चुकतात माणसं, अजून एक चान्स देऊया" असा विचार ती का करत नाही? याउप्पर जर ती "माझ्या गरजेच्या वेळेला कोणी उभं राहिलं नाही" असा ताठरपणा करणार असेल तर अवघड आहे.
लेखाच्या संदर्भातच फक्त नाही, पण मुळात "सपोर्ट सिस्टिम" हा शब्दच व्यक्तिकेंद्रित आहे. म्हणजे मी केंद्रबिंदूवर, आणि आजूबाजूला मला सपोर्ट देणारी सिस्टिम, असं काहीतरी. ही अपेक्षांची एकेरी वाहातूकच झाली ना?
लेखाचा सूर "इक वो दिन भी थे, इक ये दिन भी है..." असा वाटला. इफ इट इज एनी कन्सोलेशन, "रात ये भी गुजर जाएगी" असं सांगावंसं वाटतं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
पण जेव्हा असं नसतं, तेव्हाही
पण जेव्हा असं नसतं, तेव्हाही लोक आपले स्वार्थ आणि आपली सोय पाहतात तेव्हा मात्र खिन्नता येते. नुसते गोग्गोड शब्दांनी औपचारिक चौकशा करणारे, स्वतःला कसलीही तोशीस लागू न देणारे, जबाबदार्यांचं ओझं फेकून सुटं चालू इच्छिणारे व्यक्तिकेंद्रित, विभक्त लोक मला फार केविलवाणे वाटतात.
कुटुंबं, गावं, राज्य, देश. विश्व... भाषा, कला, विज्ञान, विचार, तत्त्वज्ञान... सगळीकडेच तुकडा-तुकडा नव्हे, ठिपकाठिपका होत चाललीत माणसं वेगानं. समूहातही एकाकी वाटतं अनेकांना, मग एकटेपणातलं एकाकीपण तर अधिक वेदनादायी असतं.
अदीती,
समूह, समाज म्हणून अशा गोष्टी दिसतात तेव्हा बहुदा जास्त भयाण वाटतात.
१०० पैकी १०० गुण. खरचं पटत.
समुहात अॅब्स्ट्रक्शन जेव्हढं वाढत, सगळे प्रोब्लेम्सची उत्तरं लॉजिकली तर्क-विर्तक करुन (बुद्धी प्रज्ञा), पुस्तकं(शुद्घ प्रज्ञा) वाचुन च्या आधारे शोधन शक्य आहे अशी समाजभावना द्रुढ होत जाइल तेव्हा दुरावा, भयाणता वाढतचं जाणारचं. भावनीक प्रज्ञेला फारसा अर्थ उरणार नाही, अॅब्स्ट्रक्ट(अमुर्त) आणी कॉक्रीट(मुर्त) एकच. फक्त अभ्यासाने समज वाढते असे 'समज' वैगेरे.
उदा.
१. मी त्याला सॉरी म्हन्ट्ल होतं म्ह्न्जेच दिलगिरी व्यक्त झाली असा समज. सॉरी हा फक्त भाषेतला शब्द नाही त्यामागे एक थोर वृती/अर्थ लपलेला आहे हे न जाणतां.
२. मी फेसबुक वर अभिनंदन ची कॉमेन्ट टाकली म्हन्जे भावणा पोहोचल्या.
३. एकही दुश्काळ ग्रस्त व्यक्ती नबघता कोरडी मतं नोंदवनं (मतं नोंदवु नये असं नाही)
४. आंतरजालावर कळलेली माणसं प्रत्यक्ष भेटीत फार वेगळी वाटतात्/वागतात
अस्मि,
त्यांना कसला टेकु द्यायचा?
असहमती.
टेकु म्हण्जे काय याचा अर्थ समजावा ? मदत ही क्रुती झाली. मदत केलीच पाहीजे असं नाही. पण जर का empathy, प्रेम सोडाच पण जर नीदान भावना समजुन सहानुभुती जरी दाखवाली तरीही समोर्च्याला थोड बळ येतं.
तोच तोचपणा
हल्ली चर्चांत तोच तोचपणा जाणवतो आहे.
कुणीतरी "हल्ली हे खूप वआधलय" वगैरे म्हणणार. "किम्वा हे असं कसं चाल्तं" वगैरे.
कुणी लागलिच नाण्याची दुसरी बाजू दाखवणार.
सामाजिक विषय आणी "हल्ली" ह्या शब्दानं सुरु होणारा टोन, ह्यामुळे चर्चा एकूणातच संदिग्ध होते.
नंतर न्म्तर जो तो "माझा अनुभव असा आहे की...."
"माझ्या पाहण्यात असं आलं आहे की..." म्हणत वैयक्तिक अनुभवाचे पट उलगडत जातो.
त्याच्या अगदि विरुद्ध, थेट १८० दिग्री कुणाला अनुभव आले असणे शक्य आहे.
मग दोघेही "तुमच्या म्हणण्यात तथ्य असलं तरी...." ह्या क्लॉजने सुरुवात करीत चर्चा करीत किंवा वाद घालित बसतात.
हे का होतं?
आख्ख्या जगात पसरलेल्या मानवजातीतील हरेकाचे हरेक अनुभव एकाच माळेत ओवण्याचा प्रयत्न करणे; ही एक शक्यता.
खरं तर सगळ्यांचेच सगळे अनुभव एकाच माळेत आणणं सोडा; एकाच व्यक्तीचे सारेच अनुभव एकाच माळेत आणता येणं अशक्य आहे. हे सगळं इतकं प्रचंड रँडम आणि संख्येनं प्रचंड मोठं आहे की त्याच्या नादी लागणं व त्यात एक system शोधणं, मोडस ओपरेंडी शोधणं; सगळ्यावर एकत्रितच भाष्य करु पाहणं मला अशक्य व व्यर्थही वाटतं.
उदा :-
"समाजातील चांगुलपणा कमी झालाय हो..." असं म्हणत कुणी धागा काढेल.
"भावाने पाडला भावाचा मुडदा." "सख्ख्या बापाचा केलेला विश्वासघात" वगैरे वगैरे उदाहरणे देणार.
त्याच वेळी समोरचे प्रतिसादक "रिक्षावाल्याने परत केलेल पाच-पन्नास लाख" किम्वा बुडणार्या इवल्या पण अनोळखी जीवाला वाचवायला एखाद्या तरुण किंवा तरुणीनं लावलेली जीवाची बाजी ह्याची उदाहरणं देणार.
दोघेही इथून पुढे पाच हजार वर्शे टंकत बसले तरी ही विरोधाभासी उदाहरणं संपणार नाहितच. उलट त्या टंकनाच्या पाच हजार वर्षात अजून करोडो उदाहरणे दोन्ही बाजूने तयार होत राहणार.
.
.
.
जग, समाज, खुद्द माणूस जबरदस्त रँडम आणि गुंतागुंतीचं प्रकरण आहे. जे जसं आहे ते तसं राहू देउन आपल्याला काय करता येइल इतकाच साधा अल्गोरिदम मी तरी हल्ली वापरु पहात असतो.
तांब्या तांब्या पाणी फेकून समुद्र रिकामा करण्याच्या प्रयत्नासारख्याच चर्चा व्यर्थ वाटतात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
फ्री लोडर्स
बर्याच वेळा फ्री-लोडर्सची कमी नसते, मदत हवी आहे म्हणून रस्त्यावर अनेकजण भेटतात पण बर्याचदा 'नक्की' मदतीची गरज आहे का हे तपासल्यावर 'नाही' हेच उत्तर येतं.
अस्मिने दिलेल्या उदाहरणातला नवरा फ्री-लोडर आहे, त्याला एका संभाषणात मीहि मदत केली नसतीच, त्याला खरेच गरज असल्यास मी मदत करेन ह्याची काळजी तो घेईलच ह्याची मला खात्री असेल, पण त्यापेक्षाही त्याची बायको जी माझी मैत्रीण होती ती संकटात आहे का आणि तिला मदतीची गरज आहे का हे मी नक्की तपासून पाहिन.
भिकार्यांना भिक आणि गरजूंना मदत हा थोड्या मोठ्या चर्चेचा विषय आहे, इथे ते बहुदा अवांतर ठरेल.
पुर्ण प्रतिसादाशी सहमत. तुला
पुर्ण प्रतिसादाशी सहमत. तुला माझा मुद्दा बरोबर कळालाय.
पण त्यापेक्षाही त्याची बायको जी माझी मैत्रीण होती ती संकटात आहे का आणि तिला मदतीची गरज आहे का हे मी नक्की तपासून पाहिन. >> मीदेखील हेच केल.