बाहुबलीला पुरस्कार आणि काहींची पोटदुखी
मी आजवर बाहुबलीबद्दल लिहायचं मुद्दामच टाळलं होतं. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील या ऐतिहासिक ठरू शकणार्या सिनेमाबद्दल तथाकथित बॉलीवूड आणि स्वघोषित बुद्धिजीवींची काय प्रतिक्रिया येते याची मला उत्सुकता होती. आणि सांगायला अत्यंत आनंद होतो की दोघांनीही मला अजिबात निराश केलं नाही. दोघांनीही 'बाहुबली' सिनेमागृहात चालू असताना व तो उतरल्यावरदेखीलही सतत त्याला अनुल्लेखाने मारण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बाहुबलीला नुकताच जाहीर झालेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
एरवी 'वॉण्टेड' पासून 'रावडी राठोड' पर्यंत, 'सिंघम' पासून 'दृष्यम' पर्यंत साउथच्या सिनेमाची भ्रष्ट नक्कल करण्याइतपत तळ गाठलेल्या बॉलीवूडकर स्टार्सच्या दिवाळखोर बुद्धिला 'बाहुबली'ने न्यूनगंडाचा जबरदस्त झटका दिला होता आणि आहे. बाहुबली व बजरंगी भाईजान हे एकाच वेळी रिलीज झालेले दोन चित्रपट. सुरूवातीला बॉलीवूड व भाईजानच्या काही चमचा वाहिन्यांनी 'भाईजान देगा बाहुबलीसे टक्कर' इ.इ. प्रचार चालवला. पण जसजसा पन्नाशीचा सिंथेटीक भाईजान बॉक्स ऑफिसवर बाहुबलीसमोर धापा टाकू लागला तसे माध्यमांचे प्रायोजित अवसान गळाले. परंतु सर्वसाधारणपणे बॉलीवूड व त्याच्या जीवावर जगणार्या सुमार वृत्तवाहिन्यांनी बाहुबलीची केलेली उपेक्षा ही व्यावसायिक असूयेतून केली हे उघड आहे. पण बुद्धिजीवींचे तसे नसते. त्यांच्या बहिष्कार वा पुरस्कारामागे काही वैचारिक कारणे असतात.
ज्याला पूर्वी आर्ट फिल्म म्हणत तशाच पण जरा अधिक मनोरंजक व सुसह्य सिनेमाला आजकाल महोत्सवी चित्रपट म्हणतात (म्हणजे मी म्हणतो). म्हणजे सिनेमा बनवताना तो सिनेमात बनवण्याचा आपला कंडू शमेल व निर्मात्याची निदान गुंतवणूक तरी निघेल या हेतूने बनवायचा पण ते उघडपणे मान्य करायचं नाही. मग चित्रपट देशोदेशीच्या चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित करायचा. हा जागतिक दौरा आटपून सिनेमाची जरा बरी प्रसिद्धी झाली (त्यातही असा चित्रपट मराठी असेल तर 'मराठमोळ्या' दिग्दर्शकाचा अटकेपार बर्लिन इ.इ. महोत्सवात रीतसर झेंडा वगैरे फडकावून झाला) की मग एखादा व्यावसायिक वितरक शोधायचा आणि सिनेमा गर्दीतील इतरांसारखा प्रवाहात सोडून द्यायचा. मग अशा सिनेमाला जितके महोत्सवी पुरस्कार जास्त आणि जितका बॉक्स ऑफिस जनाधार कमी तितकी संवेदनशील चित्रपटकार म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची, बुद्धिमंतांच्या वर्तुळात मिरवून घ्यायचं. ते एक असो.
बाहुबलीबद्दल बुद्धिमंत टीकाकार लोक सिनेमाचे खेळ ऐन भरात असताना काही विशेष बोलत नव्हते. गर्दीतला अजून एक मसालापट म्हणून त्यांनी काणाडोळा केला असावा असा माझा सुरुवातीला समज होता. परंतु ते तसं नसावं अशी शंका मी स्वत: हिंदीतला 'बाहुबली' (जरा उशीराच) पाहिल्यावर आली. चित्रपट पाहिल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की, किती हिंदू वातावरण दाखवलंय यात. इतकी उर्दुमुक्त हिंदी ऐकायची सवय हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना नाही. त्यातही हिरो सुरूवातीलाच महादेवाची पिंड वगैरे उचलून आणतो म्हणजे फारच झालं. त्यामुळे डाव्या, समाजवादी, सेक्यूलर प्रभावाखाली असलेले बुद्धिमंत या सिनेमाची किमान एक मनोरंजक सिनेमा म्हणूनही त्याची स्तुती तर करणारच नाही पण चर्चाही करणार नाहीत असा मला वाटणारा 'शक' हा नंतर 'यकीन'मध्ये बदलत गेला. आणि जसजशे महिने उलटत गेले तशी त्याने 'हकिकत की शक्ल' घेतली. कारण चर्चा जरी करायची म्हटली तरी त्या विषयाला महत्व दिल्यासारखं होतं. म्हणून मी काय होणार याची वाट पाहात बसलो.
अखेर ती घटिका आलीच. बाहुबलीला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच मग लोकांना बोलणे भागच पडले. बाहुबली हा चित्रपट म्हणून वाईट आहे; त्याची पटकथा ढिसाळ आहे; कथा रामायण-महाभारत किंवा अजून कुठल्या लोककथांवरून उचललेली आहे; संकलन गचाळ आहे; तांत्रिक बाजू कमकुवत आहे; विदेशी सिनेमातील दृष्यांची नक्कल केली आहे; संगीत ओरीजिनल नाही; अभिनय चांगला नाही; वेषभूषा सुसंगत नाही इ.इ. कारणांमुळे 'बाहुबली'ला पुरस्कार द्यायला नको होता असा विरोध कोणी केला असता तर एक वेळ समजू शकतं. परंतु मोदीविरोधक बुद्धिमंत व मिडीयाने इथेही मोदीविरोधाची संधी शोधली. याबाबतीत केजरीवालांना बरीच कठीण स्पर्धा आहे.
तर 'हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आल्यामुळे हिंदू वातावरण असलेल्या, आदर्श पिता, आदर्श माता यासारखी पात्रे असलेल्या 'बाहुबली'ला पुरस्कार मिळाला' असा आरोप पुरोगामी वृत्तपत्रांनी संपादकीय पानांवरून केला. जणू काही सिनेमाकारांनी मे २०१४ नंतर घाईघाईने सिनेमा करायला घेतला आणि आता हे संघी सरकार आपले असेच प्रचारपट आणणार की काय अशीही शंका काहींना आली. पण अशी काही शंका 'नया दौर' सारख्या तद्दन कम्युनिस्ट प्रचारपटांबद्दल घ्यायची नसते हे मला माहीत असल्यामुळे मी काही तसे म्हणत नाही. एकीकडे भारतीय दंतकथा, महाकाव्यात किती नाट्य भरलेय, यावर मुख्य धारेतील लोक चित्रपट काढत नाहीत असा आरोप करायचा मग कोण्या राजामौलीने तसा प्रयत्न केला तर त्यालाच सनातनी ठरवायचं असा हा दुटप्पीपणा आहे. आज बाहुबलीला नाके मुरडणारे उद्या 'द जंगल बुक' प्रदर्शित झाल्यावर त्याचे, त्यातील भारतीय वातावरणाचे कसे गोडवे गातील हे पाहा. कारण उघड आहे, आपला क्लासिक भारतीय न्यूनगंड. जंगल बुकचे लेखक रुडयार्ड किपलिंग होते म्हणजे एक साहेब, कोणी ऐरागैरा राजामौली नव्हे.
काही उपसंपादकांनी आपल्या 'उलट्या चष्म्या'तून बाहुबलीची तुलना 'चांदोबा'शीसुद्धा केली. चांदोबातल्या गोष्टीतील आदर्शवाद, भाबडेपणा यांची थट्टा, आता काय चांदोबालाही साहित्य अकादमी देणार का असे म्हणून करण्यात आली. पण ती करताना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी चित्रपट 'श्यामची आई' ज्यांच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे ते आधुनिक महाराष्ट्रातील आदर्शवाद , भाबडेपणा इ.इ. चे आद्य प्रवर्तक व प्रचारक 'गोड गोष्टी'कार पू. साने गुरूजी काही हिंदुत्ववादी नव्हते तर समाजवादी होते हे मात्र अनेकांच्या विस्मरणात गेलं. आजही त्यांच्या नावाने अनेकांची समाजवादी 'साधना' सुरू असते. ते एक दुसरं असो.
बाहुबलीला द्यायचाच होता तर 'लोकप्रिय' चित्रपट म्हणून पुरस्कार द्यायचा, उत्कृष्ट चित्रपट म्हणून नव्हे; असेही काहींचे म्हणणे आहे. याचा अर्थच मला कळला नाही. म्हणजे लोकप्रिय चित्रपट उत्कृष्ट नसतो किंवा उत्कृष्ट चित्रपट कधीच लोकप्रिय होऊ शकत नाही असा याचा अर्थ घ्यायचा का? उदा. एक रम्य कल्पना(च) करा, 'कोर्ट' या २०१४च्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा तिकीट खिडकीवर धो-धो करून वाहतोय. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव अगदी मराठी सिनेमाला हिडीस-फिडिस करणार्या मल्टीप्लेक्सनी सुद्धा सलमान-अक्षय कुमारचे सिनेमे उतरवून 'कोर्ट' लावलाय. कधी नव्हे ते मराठी सिनेमाची 'ब्लॅक' चालू आहे. एकपडदा सिनेगृहात लोक एकमेकांच्या उरावर चढून, पायर्यांत बसून, जिथे मिळेल तिथून सिनेमा बघण्यासाठी मरमर करताहेत इ.इ. तसाही (ज्यूरींच्या मते) 'कोर्ट' हा उत्कृष्ट सिनेमा आहेच. पण मग अशा रम्य 'लोकप्रिय' परिस्थितीत जर 'कोर्ट'ला उत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला असता तरीही या बुद्धिमंतांनी 'लोकप्रिय' व 'उत्कृष्ट' यात भेद करत, 'कोर्ट' ला लोकप्रिय श्रेणीत हवे तर सन्मानित करा पण उत्कृष्ट नव्हे असंच म्हटलं असतं का? याबाबतचे आपले मत वाचकाने आपल्या रिस्कवर 'कोर्ट' संपूर्ण पाहून मगच घ्यावे ही नम्र सूचना. राजकीय भूमिका एक वेळ बाजूला ठेवली तरी असं निश्चितच झालं नसतं, कारण एकदा का तुम्ही स्वत:ला बुद्धिमंत म्हणवून घेतलं की लोकप्रियतेपासून दूर राहायचं असतं. जी कलाकृती जितकी जास्त दुर्बोध, जितकी अगम्य, जितकी अधिक किचकट, जितकी अधिक रटाळ, जितकी अधिक जन-अप्रिय तितकी तिची बौद्धिक उत्कृष्टता अधिक चांगल्या वाणाची अशी सर्वसाधारण समजून बुद्धिमंतांत आढळते.
महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बाहुबलीवर आज होणारी 'संस्कृती'वादी सिनेमा ही टीका आजच निर्माण झालेली नाही तर ती गेल्या काही काळापासून साचत आलेली आहे. तिची सुरुवात झाली ती 'काकस्पर्श', 'कट्यार काळजात घुसली' , 'नटसम्राट' , 'बाजीराव मस्तानी' यासारख्या चित्रपटांच्या भव्य यशाने. किंवा अजून मागे जायचं झालं तर 'मुंबई-पुणे-मुंबई', 'दुनियादारी' इ.इ. पर्यंत जाता येईल. या सगळ्या कलाकृतीत ठळकपणे जाणवेल असे साम्य म्हणजे अभिजन(वाचा:ब्राह्मण) वातावरण. पुरोगामीपणा, सेक्यूलरिझम, समाजवाद, साम्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आदींचा 'अंतिम पडाव' म्हणजे मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना) विरोध हे सुज्ञ वाचक जाणतातच. त्यामुळेच वरीलप्रकारच्या कलाकृतींच्या यशाने अनेक बुद्धिमंतांच्या पोटात दुखू लागलं आहे. अधिक त्यांचा हरवलेला राजाश्रय हेही एक कारण आहे. बाहुबली हे निमित्त आहे. पण सिनेमाच्या अभिजनीकरणाचा आरोप करताना, शुद्ध व्यावसायिक हेतूने का होईना, 'फॅण्ड्री' सारख्या सिनेमाचा जोरदार प्रचार, वितरण करणार्या एस्सेल व्हीजन/झी टॉकीज ग्रुपमध्येही तथाकथित अभिजनांचा किंवा बहुजनांचं वर्चस्व आहे हे शोधण्यास या बुद्धिमंतांस सांगणे त्यांना सोयीचे नाही. उगाच कोणाला कशाला अडचणीत टाका?
पाकिस्तानी कलाकारांचा प्रश्न आला की कलेमध्ये भारत-पाक, धार्मिक भेदभाव करू नये असे शिकवणारे आमचे बुद्धिमंत बाहुबलीच्या आणि वर उल्लेखलेल्या इतर सिनेमांच्या निमित्ताने आपण स्वत:च कलाविष्कार व कलास्वाद या दोहोतही जातीयवादी विष घोळण्याचा प्रयत्न करत आहेत. रंगभूमी आणि साहित्याचे तर तुकडे पाडून झालेच आहेत. आता निदान सिनेमाकलेचे तरी तुकडे पाडू नका. नाहीतर तसंही ऑस्कर वाइल्डने म्हटले आहेच- ऑल आर्ट इज नॉनसेन्स.
(पूर्वप्रसिद्धी- http://aawaghmare.blogspot.com)
वाघमारे साहेब - एकुणात लेख
वाघमारे साहेब - एकुणात लेख पटला नाही. बाहुबली चे फक्त टेक्निक चांगले होते. ते खूप च चांगले होते. पण कथा, पटकथा, संवाद, लॉजिक, रीझनिंग ह्या बाबतीत तो अगदीच कच्चा होता.
टेक्निकल बाबींच्या बरोबर जर ह्या बाकीच्या गोष्टी ५०% जरी जमुन आल्या असत्या तर तो चांगला सिनेमा बनला असता. मी तर त्यातले फक्त भव्यदिव्य प्रसंग बघितले, बाकी अजिबात बघवले नाही म्हणुन स्कीप केले.
थेट भाषा नसली तरी रोख तिकडेच
थेट भाषा नसली तरी रोख तिकडेच आहे...
उदाहरणार्थ-
http://www.loksatta.com/ulata-chashma-news/bahubali-wins-national-award…
http://blogs.maharashtratimes.indiatimes.com/baki-shunay/bahubali-wins-…
धापा टाकतंय कोण?
>> सुरूवातीला बॉलीवूड व भाईजानच्या काही चमचा वाहिन्यांनी 'भाईजान देगा बाहुबलीसे टक्कर' इ.इ. प्रचार चालवला. पण जसजसा पन्नाशीचा सिंथेटीक भाईजान बॉक्स ऑफिसवर बाहुबलीसमोर धापा टाकू लागला तसे माध्यमांचे प्रायोजित अवसान गळाले. परंतु सर्वसाधारणपणे बॉलीवूड व त्याच्या जीवावर जगणार्या सुमार वृत्तवाहिन्यांनी बाहुबलीची केलेली उपेक्षा ही व्यावसायिक असूयेतून केली हे उघड आहे
'पन्नाशीचा सिंथेटिक भाईजान बॉक्स ऑफिसवर बाहुबलीसमोर धापा टाकू लागला', हे विधान कशावर आधारित आहे? इथून उद्धृत -
-
Both Salman Khan's Bajrangi Bhaijaan and Prabhas' Baahubali have crossed the 500 crore mark at the worldwide box office.
-
Baahubali has been made on a lavish budget of over Rs 250 crore and is possibly the most expensive film ever made in Indian cinema. On the contrary, BB is a moderately budgeted film and cost around Rs 75 crore, which is almost one-third of Baahubali's production cost.
-
Both Baahubali and Bajrangi Bhaijaan had almost the same number of screens, that is, over 5000 screens worldwide.
-
If you consider all its versions, Baahubali has netted something over the Rs 250 crore mark at the Indian box office. Bajrangi Bhaijaan, which released only in Hindi has already shattered all pre-existing records and raced into the Rs 300 crore club effortlessly.
माझा ह्या विषयाचा अभ्यास नाही, पण हा लेख सहज गूगल करता सापडला. ह्यातली आकडेवारी चुकीची आहे असा तुमचा दावा आहे का?
माझा काहीही दावा नाही. कोणी
माझा काहीही दावा नाही. कोणी कितीही कमाई करोत मला एक खडकूही कोणी देणार नाही याची मला कल्पना आहे.
सिनेमांच्या कमाईचे आकडे व्हेरीफाय करणे फार कठीण आहे.वास्तव माहिती मिळणे कठीण आहे.माझा अनुभव असा की आमच्या इथे भाईजानचे खेळ कमी करून बाहुबलीचे खेळ सिनेमागृहांनी वाढवले.
दुसरा मुद्दा असा की बजरंगी हा मूळ हिंदी सिनेमा होता आणि बाहुबली हा तेलगू म्हणजे प्रादेशिक. हिंदी म्हणजे राष्ट्रीय सिनेमाला हिंदी-इंग्रजी-प्रादेशिक माध्यमांतून मिळणारी प्रसिद्धी,सलमानची पॅन-इंडिया स्टार व्ह्यॅलू इ.इ.चा फरक पडतो. करण जोहरने सिनेमा पूर्ण झाल्यानंतर वितरणासाठी घेतला या बातमीनंतर कुठे उत्तरेतील प्रसारमाध्यमांनी (विशेषत: हिंदी वाहिन्या)याची दखल घेतली असे आठवते. इंग्रजी व हिंदी माध्यमे बॉलीवूड्धार्जिणी आहेत हेही विसरता कामा नये(याची माझ्याकडे काही लिंक नाही)
मूळ विधान सिद्ध होत नाही
>> तेलगू म्हणजे प्रादेशिक. हिंदी म्हणजे राष्ट्रीय सिनेमाला हिंदी-इंग्रजी-प्रादेशिक माध्यमांतून मिळणारी प्रसिद्धी,सलमानची पॅन-इंडिया स्टार व्ह्यॅलू इ.इ.चा फरक पडतो.
ह्या प्रतिवादामधून एवढंच लक्षात आलं की दाक्षिणात्य सिनेमाची बाजारपेठ किती प्रचंड आहे आणि ती कशी चालते ह्याची तुम्हाला फारशी कल्पना नसावी, आणि केवळ हिंदी-इंग्रजी-मराठी प्रसारमाध्यमं पाहिली जात असल्यामुळे तुम्हाला हिंदी सिनेमाला मिळणारी प्रसिद्धी अधिक वाटते. असो. माझ्या मूळ प्रतिसादातल्या दाव्यांवर तुमचा काही प्रतिवाद नाही. त्यामुळे 'बाहुबलीपुढे भाईजानला धाप लागली' हे विधान सिद्ध करण्यासारखं नाही हे तुम्हाला मान्य आहे असं मानतो.
गोंधळ
>> काही उपसंपादकांनी आपल्या 'उलट्या चष्म्या'तून बाहुबलीची तुलना 'चांदोबा'शीसुद्धा केली. चांदोबातल्या गोष्टीतील आदर्शवाद, भाबडेपणा यांची थट्टा, आता काय चांदोबालाही साहित्य अकादमी देणार का असे म्हणून करण्यात आली.

इथे आकलनाचा अंमळ घोटाळा झाला असावा असा अंदाज व्यक्त करतो. 'बाहुबली'ची तुलना चांदोबातल्या कथांशी करताना त्यातला आदर्शवाद किंवा भाबडेपणा ह्यांच्या संदर्भापेक्षाही मिथकांवर आधारित चांदोबाकथा, किंवा त्यातलं अद्भुत वातावरण वगैरेंचा संदर्भ त्यामागे असावा. जी ए कुलकर्णींच्या मिथकांसारख्या वातावरणातल्या कथांनाही पूर्वी 'चांदोबा'तल्या कथा म्हणून हिणवलं गेलं होतं. हा संदर्भसुद्धा ह्या तुलनेमागे असावा. 'पाताळ भैरवी'सारखा सिनेमा बनवणारे तेलुगु सिनेमातले बी नागी रेड्डी हे लोकप्रिय निर्माते-दिग्दर्शक 'चांदोबा'चे अध्वर्यू असणं आणि 'बाहुबली'ही तेलुगू असणं हा त्यातला आणखी एक दुवा. असे संदर्भ घेऊन त्या चौकटीत ही तुलना केलेली असावी असा माझा अंदाज आहे.
तेलुगु पाताळ भैरवी चित्रपटाचं पोस्टर :

चांदोबाशी तुलना केली असेल तर
चांदोबाशी तुलना केली असेल तर बाहुबली सिनेमाचे फार कौतुकच केले असे म्हणायला पाहिजे. ३० वर्षापूर्वी तरी लहान मुलांना वाचायला योग्य अश्या मासिकांमधे चांदोबा सर्वोत्कृष्ट होता, सर्वच बाबतीत. चांदोबाशी तुलना होणे ही चांगली गोष्ट आहे.
जंतु साहेबांशी आर्थिक गणितांबाबत पूर्ण सहमत. बजरंग भाईजान हा आर्थिक दृष्ट्या बाहुबली पेक्षा जास्त यशस्वी होता.
चांदोबाशी तुलना केली असेल तर
चांदोबाशी तुलना केली असेल तर बाहुबली सिनेमाचे फार कौतुकच केले असे म्हणायला पाहिजे. ३० वर्षापूर्वी तरी लहान मुलांना वाचायला योग्य अश्या मासिकांमधे चांदोबा सर्वोत्कृष्ट होता, सर्वच बाबतीत. चांदोबाशी तुलना होणे ही चांगली गोष्ट आहे.
अतिशय सहमत. चांदोबा आणि चंपक दोन्ही वाचलेत, पण चांदोबाची सर चंपकला नाही. उगा फालतू अँथ्रॉपोमॉर्फ प्राण्यांच्या पुचाट गोष्टी वाचून बोर व्हायचं. त्याउलट चांदोबामध्ये जी अद्भुतरम्यता होती (त्यातल्या चित्रांचाही यात खूप मोठा वाटा होता) तिच्यात हरवून जायला होत असे. रामायण-महाभारतातले लोक आणि त्यांचे राजवाडे वगैरे अगदी चांदोबातल्यासारखेच असणार अशी पक्की समजूत होती तेव्हा.
(चांदोबाफ्यानुडु) बॅटमॅन.
अबब! हत्ती
अबब हत्तीचं नाव काढलंत! हत्ती माझं प्र चं ड लाडकं मासिक होतं. इतकं की लहानपणी मी अबब हत्तीवर कवितासुद्धा केली होती. ऋतुजाची सुबक चित्रं, शोभा नाखरेंच्या गोडुल्या गोष्टी, रामायण-महाभारत कोडं आणि आणखी मस्त मस्त कोडी, भारत सासण्यांची 'लाँग मार्च अर्थात जंगलातील दूरचा प्रवास' नावाची हप्त्याहप्त्याने प्रसिद्ध होणारी कादंबरी, राजीव तांब्यांच्या गमतीशीर गोष्टी, आरामगप्पाळचे मजेदार लेख, अभ्यास बिभ्यास नावाचं रोचक सदर...अशा बर्याच विंडो एकदम उघडल्या. दुर्दैवाने हत्तीचा एकही अंक माझ्याकडे राहिला नाही.
चित्र तर सॉलिड असायची
चित्र तर सॉलिड असायची चांदोबातली. बॅट्या तू म्हणतोस तसे, एकुणच माणसे, राक्षस, राजवाडे, भूते, जंगल वगैरे गोष्टी ह्या चांदोबा मधल्या सारखीच असतील अशी समजुत होती आणि ती बर्यापैकी बरोबर होती. माणसे, प्राण्यांची चित्रे एकदम अॅप्रोप्रिएट असायची.
रामायण महाभारत , पुराणे आणि पंचतंत्र वगैरे चांदोबातुन च वाचले गेले. कधी वेगळे वाचावे लागलेच नाही.
रामायण महाभारत , पुराणे आणि
रामायण महाभारत , पुराणे आणि पंचतंत्र वगैरे चांदोबातुन च वाचले गेले. कधी वेगळे वाचावे लागलेच नाही.
इंडीड सहमत. महाभारताबद्दल बोलायचं तर घरी विदर्भ मराठवाडा पब्लिशिंग कंपनीने प्रकाशित केलेले महाभारताच्या मराठी भाषांतराचे ११ खंड होते (आहेत) ते अधूनमधून त्यातल्या चित्रांकरिता पाहत असे. एक लहानसे "कथा-महाभारत" नामक पुस्तक होते ते मात्र अतिअतिअतिअतिप्रिय होते. हुडकले पाहिजे. त्यातली चित्रे आणि शब्दयोजना काहीकाही इतक्या मनात ठसल्यात की बासच. विशेषतः बाणयुद्ध हा प्रकार त्या पुस्तकात आणि त्याहीपेक्षा म्हणायचे तर बीआर चोप्राच्या सीर्यलीत पाहून अतिप्रिय झाला होता. त्यामुळे महाभारतावर सीरियल/पिच्चर काढल्यास बाण पाहिजे. त्याशिवाय मजा नाही.
(चुलतभावाबरोबर धनुष्यबाण घेऊन खेळत असताना एकदा त्याने अस्त्र म्हणून छत्रीची काडीच धनुष्यातून सोडली. ती सुदैवाने छातीला लागली म्हणून बरे, नैतर अवघड झालं असतं.)
महाभारत थीम्ड एक अप्रतिम जाहिरात इथे पाहता येईल.
रामायण महाभारत
रामायण -- महाभारत. ८० च्या दशकाच्या अगदि शेवटाचा काळ किम्वा ९०च्या दशकाचा अगदि सुरुवातीचा काळ. टीव्ही घरोघरी नसत. टी व्ही नसलेली बरीच घरं होती. ज्यांच्याकडे टी व्ही असे, तयंच्याकडे आख्खी गल्ली जमून प्रोग्रम बघत बसे. खाजगी चॅनल्स आणि केब्ल हयंचं अस्तित्व आजच्या तुलनेत ना के बराबर होतं. (नंतर झी नं मुसंडी मारलीच). तर एकूणातच संगीत, चित्रपट , सिरियल आजच्या इतके स्वस्त- सर्व्त्र हवे तेव्हा उअपलब्ध नसत. एकदाच लागून जात आटह्वड्यातून. त्यांची वेळ तुमच्यासआथी अब्दलणार नाहे. पुन:प्रक्षेपण होइलच ह्याची खात्री नाही. आटह्वडयतून एकदाच लागणारी सिरियल. एकच एपिसोड. आख्ख्या गल्लीतले लोक उत्साहानं जमत. आणि बघणं ह्यामूळेच अगदि र्पाधान्य क्रमाचं होउन जाइ. ह्याचा पुरावा म्हणजे सगळे रस्ते आणि पेट्रोल पंप इथे शुकशुकाट असे. एरव्ही पंपांवर राम्गा असत. तुमच्या घरी रंगीत टीव्ही असला तर सोने पे सुहागा. धार्मिक सिरियली असल्यानं लोकं अगदि आंघोळ बिंघोळ करुन येत. मित्र मंडळी नातेवाईकात एरव्ही स्वतःला "लै शाणा" समजणारा ...विवेकवादी...किम्वा नास्तिक ...किंवा फारसा भाविक नसलेलाही ह्या सिरियली आवर्जून पाही. श्रद्धा नसली तरी मनोरंजन मूल्य थोडीच कमी होतय ? आम्घोली करुन येणार्या लोकांनी नंतर न्म्तर महाभारत सिरियल मध्ये गीता वगैरे संगण्याचा एपिसोड, विश्वरुप दर्शनाचे एपिसोड्स आल्यावर तर पूजेची ताटं तयार करुन आणली होती. नितीश भारद्वाज म्हंजे कृष्णाच्या दर्शनाला टीव्हीवर फुलं उधलली जात. फुलानं पाणी (!!) शिंपडाअय्चाही प्रयत्न होइ. दूरदर्शन पाहणय्साठी छतावर अॅण्टेना असे. तो बरोब्बर 'सेट' करणे कौशल्याचं काम आणि थोडाफार नशिबाचाही भाग. हर इलाख्यात, हर गल्लीत असं कुणीतरी पोरटं ह्या कामात तरबेज असे. बरोब्बर वर चधून हलवाहलवीए करी. बाकीचे खालूनच "आता अब्रं दिसतय, आता नाही दिसतय" म्हणून सांगत.
उर्वरित आठवणी
बाण आपटण्यात रामायण ही जास्त भारी सिरियल आहे असे मला इयत्ता तिसरी चौथीत वाट्त असे. तिथे रंगीत बाण येत. त्याच्मी रंगीत प्रभावळ येइ. दुसरा बाण येइपर्यंत हे बाण स्वस्थ चित्तानं त्यांची वाट पहात. एकमेकांवर आपटल्यावरही अजिबात तक्रार वगैरे न करता कोणीतरी एक गायब होउन जात. फक्त बॅकग्राउण्ड मध्ये टॅण्ण ठ्ठिश्श भगानाका भगानाका असे संगीत वाजे.हनुमान वगैरे मंडळींच्या चेहर्यावर स्टिरिओटाइप्ड कृत कृत्य भाव असत. मी तिसरी चौथीत असताना दुनियाही तिसरी चौथीतच असावी. त्यांनाही त्याच सिरियली तसल्याच कारणासाठी आवडत. सीता हे क्यारेक्टर तर भलतच लोकप्रिय. तिच्यात तसं फारसं काही वाईट नाही; म्हणूनच ती चांगली आहे ; हा टिपिकल भारतीय चश्मा आम्हाल तिथेच मिळाला.
.
.
पण खूप छान वाटायचं . सगळे सकाळी स्वच्छ होउन नऊ साडेनौअलाच आवऋन बसलेत असं क्वचितच व्हायचं. अंघोळ वगैरे ...तेही अगदि लाइफ बॉय पासून ते ते सिन्थॉल लिरिल अशा पर्यंत विविध साबणांनी कुणीकुणी निथळून आल्यानं त्याचा एक मंद दरवळा वातावरनात असायचा. भरीला वातवरण प्रसन्न करायला कुणीतरी ताजी सुगंधी उदबत्ती लावे कीव्मा घनगंभीर धूपही लावला जाइ (हा गीता सांगणयच्या प्रसंगात जास्त अक्रुन लावला गेलेला )
.
.
खरआट्याचय काड्या आम्ही काढत असू. त्याला धनुष्याकृती वाकवून दोरी बांधत असू. त्याचा तीर-कामठा तयार होइ. म्हणजेच, छोटसं धनुष्यबाण. त्यानच खेळत असू. आणि धार्मिक सिरियलमध्ये रस घेत असल्याचं पाहून ज्येष्ठांनाही आपण चांगलेच संस्कार करत आहोत ह्याबद्दल स्वतःच स्वतःबद्दल कृतकृत्य वाटे.
महाराष्ट्रापुरता विचार
>> महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर बाहुबलीवर आज होणारी 'संस्कृती'वादी सिनेमा ही टीका आजच निर्माण झालेली नाही तर ती गेल्या काही काळापासून साचत आलेली आहे. तिची सुरुवात झाली ती 'काकस्पर्श', 'कट्यार काळजात घुसली' , 'नटसम्राट' , 'बाजीराव मस्तानी' यासारख्या चित्रपटांच्या भव्य यशाने. किंवा अजून मागे जायचं झालं तर 'मुंबई-पुणे-मुंबई', 'दुनियादारी' इ.इ. पर्यंत जाता येईल. या सगळ्या कलाकृतीत ठळकपणे जाणवेल असे साम्य म्हणजे अभिजन(वाचा:ब्राह्मण) वातावरण. पुरोगामीपणा, सेक्यूलरिझम, समाजवाद, साम्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आदींचा 'अंतिम पडाव' म्हणजे मनुवादाला म्हणजेच ब्राह्मणवादाला (आणि दुर्दैवाने म्हणजेच ब्राह्मणांना) विरोध हे सुज्ञ वाचक जाणतातच. त्यामुळेच वरीलप्रकारच्या कलाकृतींच्या यशाने अनेक बुद्धिमंतांच्या पोटात दुखू लागलं आहे. अधिक त्यांचा हरवलेला राजाश्रय हेही एक कारण आहे. बाहुबली हे निमित्त आहे. पण सिनेमाच्या अभिजनीकरणाचा आरोप करताना, शुद्ध व्यावसायिक हेतूने का होईना, 'फॅण्ड्री' सारख्या सिनेमाचा जोरदार प्रचार, वितरण करणार्या एस्सेल व्हीजन/झी टॉकीज ग्रुपमध्येही तथाकथित अभिजनांचा किंवा बहुजनांचं वर्चस्व आहे हे शोधण्यास या बुद्धिमंतांस सांगणे त्यांना सोयीचे नाही. उगाच कोणाला कशाला अडचणीत टाका?
हा दावा गोंधळाचा वाटतो. तो फारसा तर्कालाही टिकणारा नाही. त्याची कारणं अनेक आहेत. खुद्द सरकारच्या वेबसाईटवरून उद्धृत -
National Awards aim at encouraging the production of films of aesthetic and technical excellence and social relevance contributing to the understanding and appreciation of cultures of different regions of the country in cinematic form and thereby also promoting integration and unity of the nation. The awards also aim at encouraging the study and appreciation of cinema as an art form and dissemination of information and critical appreciation of this art form through publication of books, articles, reviews etc.
सिनेमाला एक कलाप्रकार म्हणून प्रतिष्ठा देणं, त्यातल्या कलात्मकतेला राष्ट्रीय पातळीवर दाद देणं, शिवाय सर्वसमावेशकता, संस्कृतीवैविध्य, राष्ट्रीय एकात्मता वगैरे वगैरे घटक पुरस्कारांमागचे अधिकृत उद्देश आहेत. पुरस्कारप्राप्त चित्रपटांची यादी पाहिली तर असं दिसतं की 'श्यामची आई', 'पाथेर पांचाली' किंवा 'दो आँखे बारह हाथ' पासून पुरस्कारप्राप्त चित्रपटांमध्ये त्याचं प्रतिबिंब पडत आलेलं आहे. बहुजन समाजाविषयी संवेदनशीलता दाखवणाऱ्या चित्रपटांना जसे पुरस्कार मिळालेले आहेत त्याप्रमाणे ब्राह्मणी संस्कृती दाखवणाऱ्या चित्रपटांना पुरस्कार मिळाल्याची अनेक उदाहरणं यादीत दिसतात - चेम्मीन, तीसरी कसम, भुवन शोम, संस्कार, स्वयंवरम, निर्माल्यम, घटश्राद्ध... पासून ते 'श्वास' किंवा गेल्या वर्षी पुरस्कार मिळालेला 'कोर्ट'. थोडक्यात काय, तर पुरस्कारांमागची अधिकृत सरकारी भूमिका आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटांची यादी ह्यांत एक सुसंगती दिसते. ती तुमच्या वरच्या दाव्याशी मात्र विसंगत आहे. कारण -
एक तर तुम्ही म्हणता त्या ब्राह्मणी संस्कृतीतल्या चित्रपटांना व्यावसायिक यश मिळत होतं त्याच काळात नटरंग, फॅन्ड्री वगैरे अब्राह्मणी चित्रपटांना यश आणि पुरस्कार मिळत होते. पूर्वी तर तमाशापट आणि दादा कोंडकेंच्या चित्रपटांना मराठीत सर्वाधिक यश मिळत होतं. म्हणजे केवळ ब्राह्मणी संस्कृतीतल्या मराठी चित्रपटांनाच सातत्यानं यश मिळतं ह्या दाव्यात तथ्य नाही. शिवाय, बुद्धिमंतांना केवळ ब्राह्मणविरोधच करायचा असता तर तो 'श्यामची आई'पासून 'श्वास'पर्यंत अनेक चित्रपटांना करता आला असता. त्यामुळे तुमच्या दाव्यांना छेद देणारे घटक गाळून आणि केवळ सोयीस्कर गोष्टी निवडून तुम्ही दावे करत आहात असं वाटतं.
साने गुरुजींना का ह्यात ओढता?
पण ती करताना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला मराठी चित्रपट 'श्यामची आई' ज्यांच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे ते आधुनिक महाराष्ट्रातील आदर्शवाद , भाबडेपणा इ.इ. चे आद्य प्रवर्तक व प्रचारक 'गोड गोष्टी'कार पू. साने गुरूजी काही हिंदुत्ववादी नव्हते तर समाजवादी होते हे मात्र अनेकांच्या विस्मरणात गेलं.>
'बाहुबली'विषयी मला काहीच म्हणायचे नाही. मी तो पाहिलेला नाही आणि वरच्या लेखातून जर माझ्या ध्यानात काही आलेच असेल तर ते इतकेच की मला आवडेल अशा स्वरूपाचा चित्रपट तो नसावा. तेव्हा तो पुढेमागे अगदी यूटयूबवर फुकट आला तरीहि मला बघावासा वाटणार नाही.
साने गुरुजींचा उपहास वाटेल अशा शब्दांमध्ये बोळवण करणार्या वरील वाक्याला माझा आक्षेप आहे. ह्या gratuitous slur ची काय आवश्यकता होती? साने गुरुजी ह्या अतिशय पारदर्शक, प्रामाणिक आणि संवेदनाशील व्यक्तीचे पूर्ण अनुकरण करणे आपल्यापैकी बहुसंख्यांना जमणार नाही आणि परवडणारहि नाही. तरीपण त्यांनी मांडलेली मूल्ये अन्ततो गत्वा - in the ultimate analysis - अनुकरणीय आहेत ह्यामध्ये मला तरी काही शंका नाही. तुम्हाला असेल तर तसे स्पष्ट लिहिण्याचे धैर्य दाखवा, अन्यथा 'आधुनिक महाराष्ट्रातील आदर्शवाद , भाबडेपणा इ.इ. चे आद्य प्रवर्तक व प्रचारक ह्यातील कुचेष्टेचा सूर अविचाराने लिहिण्यामुळे सुचविला गेला अथवा आपण मोठे व्यवहारवादी आहोत असे सुचविण्याच्या मोहामधून व्यक्त झाला असे मान्य करा.
काही चांगले शिकवू पहाणार्या व्यक्तीची खिल्ली उडविणे हे तर न शोभणारे आहेच पण ते चुपचाप बसून पाहणे हे अधिकच न शोभणारे आहे अशा जाणीवेतून हा इतका स्पष्ट निषेध व्यक्त केला आहे.
स्पष्टीकरण
साने गुरूजींबद्दल अनादर दाखवण्याचा माझा हेतू नव्हता आणि नाही. उलट त्यांच्याबद्दल मला आदरच आहे कारण त्यांचेच बालसाहित्य वाचत आम्ही वाढलो आहोत.आताआतापर्यंत माझ्याकडे त्यांच्या बर्याच बालसाहित्याचा संग्रह होता जो मी नंतर एकाला देऊन टाकला.त्यामुळे गैरसमज नसावा.
मुख्य धारेतला लोकप्रिय हिंदी सिनेमाही बहुतकरून भाबडा,आदर्शवादी, चांगल्याचा वाईटावर विजय असाच राहिलेला आहे.पण येवूनजावून तो पडला धंदेवाईक सिनेमा.त्याच्या उदाहरणाचे वजन पडत नाही. त्यामुळे साने गुरूजींचा उल्लेख करण्याचा हेतू एवढाच की बाहुबली सिनेमा हा(भारतीय परंपरेतल्या)आदर्शवाद इ.इ. कृत्रिम कल्पनांचं उदात्तीकरण करतो म्हणून एक कलाकृती म्हणून त्याचा दर्जा कमी आहे असे म्हणणारे विद्वान मराठीलाच साने गुरूजींसारख्यांची थोर व लोकप्रिय परंपरा आहे हे सोयीस्करपणे विसरतात.खेदाने लिहावे लागते की, गुरूजींची जात पाहून त्यांच्यावर काय तुमचे ते बुळबुळीत 'सदाशिवपेठी',भाबडे,आदर्शवादी वगैरे लिहिणारे गुरूजी इ.इ. बोचरी टीका आपल्या कानावर पडली की नाही याची कल्पना नाही. नसेल पडली तर ठीकच आहे.काही बाबतीत अज्ञानच बरे.त्रास कमी होतो.तरीपण त्यांनी मांडलेली मूल्ये अन्ततो गत्वा - in the ultimate analysis - अनुकरणीय आहेत या आपल्या मताशी मी पूर्णत: सहमत आहे.असो.
या लेखात माझी भाषा अधिक हार्श झाली आहे याची मला कल्पना आहे.पण काही वेळेला नियंत्रण राख़णं कठीण होतं. सिनेमा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातही लोक आता जातीवरून हा आमचा सिनेमा-तो तुमचा असं करू लागल्यापासून वाईट वाटतं (यास दोन्ही बाजू जबाबदार आहेत).त्याच उद्वेगातून हे लिहिलं आहे.आपण कट्टयावर, चावडीवर चालणारं हीन स्वरूपाचं राजकारण घरात , स्मार्टफोनमध्ये आणून ठेवलं आहे. मी लेखात समाजमाध्यमांचा उल्लेख केला नाही,पण ककाघु व नटसम्राट इ. नंतर बरीच जातीयवादी टीका माझ्या वाचनात आली.त्यामुळे मी अजूनच अस्वस्थ झालो.आज काय व्हायरल झालं याच्याच बातम्या करण्यात धन्यता मानणारे आपले बातमीदार समाजमाध्यमातील वाढत्या द्वेषपूर्ण वातावरणाची दखल घेताना कमीच दिसतात.असो.तो एक वेगळा विषय.
मी टिव्हीवर कट्यार पाहिलं
मी टिव्हीवर कट्यार पाहिलं होतं. त्यात एक प्रसंग होता. खांसाहेब जेव्हा हवेलीत रहायला येतात तेव्हा तिथे कृष्णाची मूर्ती असते. खासाहेबांचे पुतणे ती काढायला निघतात. तेव्हा खांसाहेब त्यांना म्हणतात "अरे ती मूर्ती राहू द्या. तो आपल्यातला आहे. त्याच्या हातात पहा बासरी आहे".
हा प्रसंग 'पोलिटिकली करेक्ट' प्रकारचा असूनही चित्रपटात तो 'कटाक्षाने टाळला' असावा असे मला वाटले.
काही चांगले शिकवू पहाणार्या
काही चांगले शिकवू पहाणार्या व्यक्तीची खिल्ली उडविणे हे तर न शोभणारे आहेच पण ते चुपचाप बसून पाहणे हे अधिकच न शोभणारे आहे अशा जाणीवेतून हा इतका स्पष्ट निषेध व्यक्त केला आहे.
नुसता निषेध व्यक्त करून काय चांगले शिकवले ते समजणार नाही. तेव्हा त्याबद्दल वेगळा लेख लिहावा ही विनंती
ज्याला पूर्वी आर्ट फिल्म
ज्याला पूर्वी आर्ट फिल्म म्हणत तशाच पण जरा अधिक मनोरंजक व सुसह्य सिनेमाला आजकाल महोत्सवी चित्रपट म्हणतात (म्हणजे मी म्हणतो). म्हणजे सिनेमा बनवताना तो सिनेमात बनवण्याचा आपला कंडू शमेल व निर्मात्याची निदान गुंतवणूक तरी निघेल या हेतूने बनवायचा पण ते उघडपणे मान्य करायचं नाही.
मग अशा सिनेमाला जितके महोत्सवी पुरस्कार जास्त आणि जितका बॉक्स ऑफिस जनाधार कमी तितकी संवेदनशील चित्रपटकार म्हणून आपली पाठ थोपटून घ्यायची, बुद्धिमंतांच्या वर्तुळात मिरवून घ्यायचं.
'तथाकथित विचारवंत हे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी, बुद्धिमान म्हणून मिरवण्यासाठी(च) जे काय करायचं ते करत असतात' हा विचार अनेक वेळा मांडलेला मी पाहिलेला आहे. त्यातून उच्चभ्रू, विचारवंत वगैरे लोकांबद्दल प्रचंड तुच्छता जाणवते. जणू काही महोत्सवी पुरस्कार मिळणं ही शरमेची गोष्ट आहे. आणि समजा मी ईर्ष्येला पेटलो आणि म्हटलं 'स्साला मी असला सिनेमा बनवणार आहे की काह्न मध्ये त्याला सर्वोत्तम चित्रपटाचं बक्षीस मिळेलच मिळेल. पैसे नाही फार मिळाले तरी हरकत नाही. मग बघा कसे सगळे उच्चभ्रू, विचारवंत माझी कशी पाठ थोपटतात ते!' तर त्यात नक्की काय वाईट आहे? व्यावसायिक सिनेमावाले पुरस्कार मिळवण्याऐवजी जनाधार, पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतातच की. प्रत्येकाला हवं त्यासाठी प्रयत्न करावेत.
असो. मी सिनेमा पाहिलेला नाही, त्यामुळे मला लेखाच्या टोनविषय़ीच फक्त चर्चा करता येईल.
कलास्वादकांमध्ये अन कलासाधकांमध्येही वर्णव्यवस्था
त्यातून उच्चभ्रू, विचारवंत वगैरे लोकांबद्दल प्रचंड तुच्छता जाणवते.
हे तर आहेच.परंतु उच्चभ्रू, विचारवंतांत जनप्रिय कलाप्रकाराबद्दलही तुच्छता जाणवते.ती अधिक शोचनीय आहे. उदा.'शी! तुम्ही रहस्यकथा लिहिता. काहीतरी सामाजिक लिहित जा.' असे बोलणारे उच्चभ्रूही मला भेटले आहेत. सामान्यजन विचारवंतांबाबत तुच्छता बाळगून असले तर ते एक वेळ समजण्यासारखे आहे कारण त्यांचा वैचारिक आवाका शेवटी मर्यादितच असणार.ते त्यांच्या मर्यादित बुद्धिप्रमाणे कलेचा आस्वाद घेतात(उदा.मी).पण जे विचारी आहेत त्यांनीही सामान्यांना तुच्छ लेखण्याचे कारण काय? कलास्वादकांमध्ये अन कलासाधकांमध्येही एक वर्णव्यवस्था,कंपूशाही आहे असे मला वाटते.
मीसुद्धा महोत्सवी सिनेमांचा (रजा टाकून जाणारा)प्रेक्षक आहे.एका महोत्सवात एक जण म्हणाला 'असे चित्रपट पाहिल्यावर तुम्ही ते फालतू हिंदी सिनेमे पाहणार नाही'.आता त्याला काय सांगता की पुणे५२ मी एका दिवसात दोन वेळा पाहिल्यावर उतारा म्हणून 'ओम शांती ओम' पाहिला ते!;)
'शी! तुम्ही रहस्यकथा लिहिता.
'शी! तुम्ही रहस्यकथा लिहिता. काहीतरी सामाजिक लिहित जा.' असे बोलणारे उच्चभ्रूही मला भेटले आहेत.
मला वाटतं तुम्ही चुकीच्या लोकांना उच्चभ्रू म्हणत आहात.
असो. तुच्छतेची भूमिका ही दोन्ही बाजूंनी असावी. पारितोषिकं मिळालेल्या अनेक चांगल्या सिनेमांकडे सर्वसामान्य माणूस वळतच नाही. जर पाहिलेच तर 'काय बोअरिंग प्रकार आहे' अशा शिव्या घालतो.
माझ्या एका अमेरिकन मित्राला पंधरा मिनिटं चाललेला ख्याल ऐकवला. त्यावर त्याचं म्हणणं 'यू कॉल धिस म्यूझिक?' आणि तो तुच्छतेने हसला. आता इथे उच्चभ्रू कोण?
कार्यकारणभाव नक्की काय?
तर 'हिंदुत्ववादी सरकार केंद्रात आल्यामुळे हिंदू वातावरण असलेल्या, आदर्श पिता, आदर्श माता यासारखी पात्रे असलेल्या 'बाहुबली'ला पुरस्कार मिळाला' असा आरोप पुरोगामी वृत्तपत्रांनी संपादकीय पानांवरून केला. जणू काही सिनेमाकारांनी मे २०१४ नंतर घाईघाईने सिनेमा करायला घेतला ...
केंद्रात काँग्रेसी सरकार असताना 'हम आप के है कौन', 'विवाह' असे धत्तरपट आले होतेच. त्यातही आदर्श पिता, माता, कन्या असला सुसंस्कृत मालमसाला होताच. 'हम आप के'ला लोकप्रियतेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'बाहुबली'ला लोकप्रियता म्हणून नव्हे, सगळ्यात चांगला चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. असे चित्रपट आधीही बनत होतेच, पण त्यांच्या निर्विवाद थोरवीचं प्रमाणपत्र राष्ट्रीय पुरस्कारांकडून मिळत नव्हतं.
(खरं तर मी चित्रपट बघितलेला नाही. ट्रेलर बघून, जे काही वाचलं आहे त्याचा विचार करता मी हा चित्रपट बघायला जाण्याची शक्यता कमीच.)
दिखाई दिए यूं...
>> खरं तर मी चित्रपट बघितलेला नाही. ट्रेलर बघून, जे काही वाचलं आहे त्याचा विचार करता मी हा चित्रपट बघायला जाण्याची शक्यता कमीच.
असहिष्णु हुच्चभ्रू आहात एक नंबरच्या ;-) बडजात्याछाप गोग्गोड सिनेमांपेक्षा बाहुबली बरा आहे बरं. आणि प्रभाससह इतर दाक्षिणात्य पुरुषांचं उघडंवाघडं दर्शन तुम्हाला आय कॅन्डीदेखील वाटू शकेल.
टाईम इल्ला
अहिष्णुता कसली! वेळ नाही पुरत इथे चांगले म्हणून जमवून ठेवलेले सिनेमे बघायला आणि पुस्तकं वाचायला. उद्या म्हणाल, सहिष्णुता आणि उदारमतवाद म्हणून 'ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर'मधले ठराविक प्रसंग नीट लक्ष देऊन अभ्यासा!
... प्रभाससह इतर दाक्षिणात्य पुरुषांचं उघडंवाघडं दर्शन तुम्हाला आय कॅन्डीदेखील वाटू शकेल.
खांद्याखाली केलेला वार सोडून देत आहे.
चित्रं आणि ट्रेलर बघितले आहेत, नाही आवडला. फार बिनडोक दिसतो. माझा टाईप निराळा आहे. (अॅनी हॉल हल्लीच दुसऱ्यांदा बघितला.) खांद्याखालच्या त्याच-त्या वळ्या किती वेळा बघणार! सिनेमा अगदीच नेटफ्लिक्सवर आला, स्वस्त आणि बिनडोक करमणूक हवी असं एखाद्या दिवशी ट्रेडमिल सुरू करताना वाटलं तर बघेन. नाहीतर काहीही नुकसान होणार नाही याची खात्री आहे. बडजात्यांच्या सिनेमांना हीन लेखू नका, त्या सिनेमांतून बायकांच्या कपड्या-दागिन्यांतले नवीन ट्रेंड्स समजतात. बाहुबलीबद्दल बायका फार बोलत नाहीत, म्हणजे ट्रेंड्स समजणार नाहीत. बडजात्यांचे सिनेमे हे माझं गिल्टी प्लेजर, पॉर्न आहे; बाहुबली म्हणजे नुस्तंच गिल्ट दिसतंय, आनंद नाहीच.
पु०प्र०ता ?
पु०प्र०ता - म्हणजे पुरुषप्रधानता काय?
त्यात काये सेक्सी?
मी ज्यांना मुक्त स्त्रिया समजते त्यांतल्या बहुसंख्यांची एक मोठी तक्रार असते, "पुरुषांना वाटतं, बायकांना काय सेक्सी वाटतं ते बायकांपेक्षा जास्त आपल्याला समजतं." सहज आपलं आठवलं म्हणून केलेली देवाणघेवाण.
हे चित्र बघून हा इसम गे आणि/किंवा टेस्टोस्टिरॉनचा ओव्हरडोस झालेला वाटला.

बायकांना आकर्षिक करण्यासाठी काय दाखवत आहेत, पुरुषाच्या खांद्यावर लिंग! मुक्त स्त्रियांची तक्रार यथार्थ आहे हे आतातरी पटतंय का?
(खरं तर मी चित्रपट बघितलेला
(खरं तर मी चित्रपट बघितलेला नाही. ट्रेलर बघून, जे काही वाचलं आहे त्याचा विचार करता मी हा चित्रपट बघायला जाण्याची शक्यता कमीच.)
असले एकांगी रिव्ह्यूज़ वाचून मत बनवणार्यांनी पिच्चर न बघणेच उत्तम. शिवगामीदेवीचं जे क्यारेक्टर पिच्चरमध्ये दाखवलेलं आहे ते पाहता जर कुणी एमसीपी वगैरे म्हणत असेल तर ते निव्वळ कीवास्पद आहे.
मला तर बाहुबली जाम आवडला.
मला तर बाहुबली जाम आवडला. लेखकाच्या अधिकांश मतांशी मी पूर्णतया सहमत आहे. पूर्वी सामान्य माणसांना न समजणार्या सिनेमांना पुरस्कार मिळत असे. मला आठवते आर्त म्हणून (?) म्हणून शब्बो आंटीचा अंकुर पहिला होता. एका बुद्धिमंद मित्रासोबत. जाम डोके दुखले होते . त्यात शेवटच्या सीन मध्ये एक मुलगा दगड फेकतो असे दाखविले आहे. च्यायला या पेक्षा जंजीरला पुरस्कार मिळाला असता. जास्त आवडले असते.
बाकी दो आंखे बारह हाथ या सिनेमाने हजारो लोकांच्या आयुष्याला नवे वळण लावले. हा सिनेमा बनविणार्याला भारत रत्न का नाही मिळाले. कालच ५० वर्षाहून मोठ्या सहकार्यांना या बाबत विचारले. बहुतेक सर्वांनी दो आंखे बघितला होता. पण 'पथेर पांचाली'(नाव ठीक आहे का) कुणालाच माहित नव्हते.
या सिनेमा पासून प्रेरणा घेऊन
या सिनेमा पासून प्रेरणा घेऊन देश्यात खुल्या जेल बांधण्यात आला. काही दिवस आधी जयपूर इथल्या खुल्या जेल आणि तिथल्या कैद्यांचे अनुभव दूरदर्शन वर बघितले होते. 'त्यात 'दो आंखे बारह हाथ' चा उल्लेख आवर्जून केला होता. (दूरदर्शन वर कधी कधी चांगले कार्यक्रम हि येतात). सिनेमा नसेल पहिला तर त्याची माहिती हिंदीत http://bharatdiscovery.org/india/%E0%A4%A6%E0%A5%8B_%E0%A4%86%E0%A4%81%…
बाहुबली हा सिनेमा उत्कृष्ट
बाहुबली हा सिनेमा उत्कृष्ट आहे,
कथानकाची तुलना चांदोबातल्या गोष्टींशी केली असली तरी फक्त कथानक म्हणजे सिनेमा नव्हे.
कथानक सोडून अशा बर्याच गोष्टी असतात ज्यामुळे सिनेमा खुलतो.
त्यामुळे पुरस्कार मिळण्याची सिनेमाची पात्रता नक्कीच आहे.
बाकि,ट्रेलर पाहून सिनेमाचे परिक्षण करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच.
जळजळ होणार्यांनी वमन करावे.
राष्ट्रीय पुरस्कारांच्या
राष्ट्रीय पुरस्कारांच्या वेबसाईट वर चांगल्या चित्रपटांचे तीन निकष दिले आहेत . It has to be competent , artistic and meaningful . बाहुबली पहिल्या दोन निकषामध्ये बसतो पण तो meaningful आहे का ? पण तो meaningful नाही म्हणजे वाईट आहे अस नाही . वाद बाहुबली च्या दर्जावरून चालू नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे . जे लोक बाहुबली ला सुवर्णकमल मिळाल म्हणून विरोध करत आहेत त्यातले बहुसंख्य पण बाहुबली हा वाईट सिनेमा आहे अस म्हणत नाहीयेत . राष्ट्रीय पुरस्कारांचा जो हेतू आहे त्याला हरताळ फासला जातो आहे हा मुद्दा आहे . बाहुबली ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला असता तर त्याला कुणीच विरोध केला नसता . कारण फिल्मफेयर सारखे अवार्ड चा हेतूच मनोरंजनप्रधान सिनेमाला प्रोत्साहन देण आहे . राष्ट्रीय पुरस्काराचा हेतू आशयघन प्रादेशिक सिनेमाला प्रोत्साहन देणे हा आहे .
अवांतर अवांतर अवांतर
अवांतर : तुच्छता दाखवणे, टर उडवणे, रेवडी उडवणे हे सर्वथा अनिष्ट नाही. ती सुद्धा अभिव्यक्तीच आहे. एखाद्याला/काहींना ते आवडत नसेल तर त्याने/नी आक्षेप व्यक्त करावा, अगदी शिव्या द्याव्यात. व ही सुद्धा अभिव्यक्तीच आहे. आपल्या देशात आदरस्थानांची अति गर्दी झालेली आहे. तेव्हा त्यातल्या काहींची (कालपरत्वे) टर उडवणे, रेवडी उडवणे हे सुद्धा ठीक आहे. मला प्रत्युत्तर म्हणून तुम्ही कोणीही माझ्या आदरस्थानांची टर उडवू शकता. पण टर उडवणे हे सर्वथा अनुचित आहे असं मी बिल्कुल म्हणणार नाही.
अवांतर : तुच्छता दाखवणे, टर
अवांतर : तुच्छता दाखवणे, टर उडवणे, रेवडी उडवणे हे सर्वथा अनिष्ट नाही. ती सुद्धा अभिव्यक्तीच आहे.
"माझी ती अभिव्यक्ती आणि दुसर्याची ती गरळ" हा वाक्प्रचार तू ऐकला नाहीस का गब्बु?
ऐसीवरच सध्याच्या युगातले साने गुरुजी जे की प्रविण दवणे ह्यांच्याबद्दल कीती तुच्छतादर्शक विधाने केली जातात. दवणे जर समाजवादी असते तर ऐसीवर त्यांच्याबद्दल कीती आदर व्यक्त झाला असता.
अगदी. म्हणूनच बरेच पत्रकार
अगदी. म्हणूनच बरेच पत्रकार आणि विचारवंत सोशल मीडीयावर खार खाऊन असतात. लोक यांची यथेच्छ रेवडी उडवत असतात तिथे. म्हणूनच मग इंटरनेट हिंदू वगैरे नाव जनम्ली.
अगदी अगदी. डोळे मिटून मुकाट्याने मेजॉरिटीद्वेष्टा आणि मायनॉरिटीअपीजिंग अजेंडा जे पचवू शकत नाहीत त्यांना इंटरनेट हिंदू वगैरे म्हटल्या जाते.
बर्तर्मग
"आजही त्यांच्या नावाने अनेकांची समाजवादी 'साधना' चालू असते."
मग?
समाजवाद अजूनही अस्तित्वात आहे.
मग?
साधना मासिक सुरू आहे.
तर?
साने गुरुजी हे नुसतेच समाजवादी नव्हते. ते बहुभाषक होते. काही इंग्रजी कादंबर्यांचे मुलांना हातात देण्यास योग्य अशा पद्धतीने त्यांनी रूपान्तर केलेले आहे. इंग्रजी साहित्याचे चिकित्सक वाचक होते. वेद, प्राचीन शास्त्रे, यांचे अभ्यासक होते. पददलितांविषयी कळकळ असलेले होते. नुसतेच वाचिवीर नव्हते, त्या संबंधात कृतिशीलही होते. मुलांच्या विकासाविषयी जागरुक होते. हे तर ऐंशी-नव्वद वर्षांपूर्वी, जेव्हा बालविकास ही संकल्पना सर्वसामान्यांना ठाऊकच नव्हती. श्री. कोल्हटकरांनी सविस्तर लिहिले आहेच. तुच्छतावादाचा धिक्कार आणि उपहास करताना आपणही तोच तुच्छतावादी सूर लावला आहे.
लेखाचा टोन अजिबातच पटला नाही.
साने गुरुजी हे नुसतेच
साने गुरुजी हे नुसतेच समाजवादी नव्हते. ते बहुभाषक होते.
हा वाक्यप्रयोग गंडला आहे. "नुसतेच समाजवादी नव्हते", असे म्हणल्यावर पुढचे वाक्य विचारसरणींच्या बाबतीत पाहिजे होते, पण एकदम "ते बहुभाषक होते" हे वाक्य आले.
गब्बर हा नुसताच मराठी नाहीये. तो भांडवलशाहीवादी आहे. ही वाक्य कशी वाटतात?
खरे आहे.
इथेही घाईच नडली. वाक्यरचना चुकली आहे.
साने गुरुजींची ओळख 'समाजवादी असणे' इतक्यापुरतीच मर्यादित नव्हती, त्यांचे कार्य अनेकांगी होते; हे स्पष्ट करताना शब्दरचना चुकली.
मूळ प्रतिसादात जिचा उल्लेख राहून गेला ती आंतरभारतीची त्यांची संकल्पना हे त्यांचे एक मोठेच योगदान आहे.
ता.क. लन्च टाइम, लन्च टाइम!
अवांतर अवांतर अवांतर : साने
अवांतर अवांतर अवांतर :
साने गुरुजी हे नुसतेच समाजवादी नव्हते. ते बहुभाषक होते.
साने गुरुजी हे समाजवादी होते हे गृहितक आहे, की निष्कर्ष, की आडाखा, की निरिक्षण ?
मी साने गुरुजींचे "भारतीय संस्कृती" हे पुस्तक वाचलेले आहे. (एका पुस्तकावरून ... शितावरून भाताची परिक्षा करायची तर) ते समाजवादी वाटले नाहीत. सर्वखपेश्वरवादी वाटले. समाजवादी मंडळी जनरली वेदांतावर बोलत नाहीत असा माझा आडाखा आहे. आणि "भारतीय संस्कृती" या पुस्तकामधे - "साम्यवाद हा आचरणात आणलेला वेदांत आहे" असं काहीसं वाक्य आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत "या पुस्तकात जड जड संस्कृत श्लोक नाहीत" असे प्रॉमिस आहे पण अॅक्च्युअली पुस्तकात अनेक संस्कृत सुभाषितांचा सढळ वापर केलेला आहे (जो उचित, चपखल, त्या त्या मुद्द्यास समर्पक असू शकतो) पण ... केलेल्या वचनाची थेट प्रतारणा कशी नाही ? गंगाधर गाडगीळांनी (१९८३ च्या आसपास) असं विधान केलं होतं की साने गुरुजींचे लिखाण हे साहित्य मानले का जावे हाच प्रश्न आहे. अर्थात गाडगीळ हे अर्थशास्त्री सुद्धा होते त्याचा परिणाम असावा. माझ्या मते साने गुरुजी हे लहान मुलांसाठी लिहिणारे निरागस लिखाण करणारे चरित्रवान, नीतीवान व्यक्ती होते. मराठीतले दीनदयाळ उपाध्याय म्हणायला हरकत नसावी.
समाजवाद, 'ते' आणि 'आपण'
>> ते समाजवादी वाटले नाहीत. सर्वखपेश्वरवादी वाटले. समाजवादी मंडळी जनरली वेदांतावर बोलत नाहीत असा माझा आडाखा आहे.
मुळात समाजवाद हा एक सर्वसमावेशक होल्डॉल आहे असाच माझा आडाखा आहे. त्यामुळे समाजवादी मंडळी कशावरही बोलू शकतात. आणि कशावरही बोलणारी मंडळी समाजवादी वाटू शकतात. जुन्या पिढीतली (म्हणजे वाजपेयींना ग्रेट मानणारी) संघातली मंडळीसुद्धा त्यांचा मुस्लिमद्वेष वगळून इतर गोष्टींवर जेव्हा बोलतात तेव्हा पुष्कळदा ती समाजवादीच वाटतात. आणि काल पुण्यात योगेंद्र यादव जे बोलले तेसुद्धा समाजवादीच वाटलं.
>> गंगाधर गाडगीळांनी (१९८३ च्या आसपास) असं विधान केलं होतं की साने गुरुजींचे लिखाण हे साहित्य मानले का जावे हाच प्रश्न आहे.
गंगाधर गाडगीळांबद्दलही अगदी असंच म्हणता यावं. पण ते असो.
पण बुद्धिजीवींचे तसे नसते.
पण बुद्धिजीवींचे तसे नसते. त्यांच्या बहिष्कार वा पुरस्कारामागे काही वैचारिक कारणे असतात.
प्रत्येक ठिकाणी काहितरी कॉन्स्पिरसी थिअरीज कशा काय सुचतात बुवा लोकांना ..
एखादी कलाकृती खरचं नाही आवडली आणी त्यावर टीका झाली असा विचार का येत नसेल बरं??
मला व्यक्तिशः बाहुबली टिपिकल दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे बटबटीत, अतिशयोक्तीपूर्ण, बालिश वाटला..
चित्रपट पाहिल्यावर पहिला विचार मनात आला तो हाच की, किती हिंदू वातावरण दाखवलंय यात. इतकी उर्दुमुक्त हिंदी ऐकायची सवय हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना नाही. त्यातही हिरो सुरूवातीलाच महादेवाची पिंड वगैरे उचलून आणतो म्हणजे फारच झालं.
या कारणामुळे तो बुद्धीमंतांना आवडला नाही वगैरे आपले विचार तर बाहुबली चित्रपटापेक्षा बालिश वाटले !!

सिनेमा बनवताना तो सिनेमात
हे वाक्य आवडण्यात आले आहे. आणि गुंतवणुक निघण्यासाठी ह्या सो कॉल्ड कलात्मक दिग्दर्शकांकडे सेक्स हा एकमेव उपाय असतो ( आठवा पुणे-५२ ).