भेटीलागीं पंढरिनाथा
भेटीलागीं पंढरिनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥१॥
कैं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥
सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥२॥
तुका म्हणे भूक । तुझें पाहावया मुख ॥३॥
घरोघरी लावलेले लोणचे जेव्हा तळ गाठते, तेव्हा जीभेला कसली कशाचीही चव लागत नाही आणि लक्षात येते की, अखेर लोणचे पुढील हंगामातच लावले जाणार, तिथवर संयमाची परीक्षा द्यावी लागते.
अहंकाराशिवाय एक श्वास घेता येत नाही आणि कुणाशी भेट होऊ शकली नाही तर आपला श्वास अडकायला लागतो, तिथे तेव्हा आपला अहंकारही खुंटू लागतो. तुकोबारायांइतकं गोड मधुर अभंगातून कोण बरं सांगणार ही भावना, तुझं पहावया मुख लागली रे भूक..
तळमळीची एक गंमत असते, तिला कोण तळमळीने तडफडतो आहे, हे कळत नाही, निष्पक्षपणे ती आनंदाने समोरच्याला तळमळवत असते, कोणत्या क्षणी, कोणत्या परिस्थितीत तिचं आगमन होईल ते सांगता येत नाही. ती क्षणिक असू शकते, पण तुकोबारायांना इथे त्या तळमळीची कायमची व्यथा लागलेली दिसते. ज्या तळमळीने जीव सुखावत राहतो, अशी तळमळ..
पंढरिनाथ! तुकोबांचा प्राण. आणि अहंकार हरवलेला असताना..त्यांचा प्राण असलेला पंढरिनाथ त्यांना शोधता येत नाही, त्यासाठी बळ वापरावं लागतं, अहंकाराशिवाय बळ कुठे ना आणि! तर अखेर तर अहंकारशून्य तुकोबाराय हेच पंढरिनाथ बनतात...ती सीमारेषा ओलांडली की तळमळ समाप्त. पण त्या समाप्त रेषेवरचा विठ्ठल बनण्याची हौस कधी तुकोबारायांसारख्यांना नसते, त्यांचं तसंच निरपेक्ष जीवन चालू रहातं, जोवर त्यात श्वास फुंकले जात असतील, तोवरच!
या सीमेरेषेवर असणार्या तुकोबांचं धावणं दीनपणाचं आहे, असं त्यांचं त्यांना वाटू लागतं.
समुद्र भरून आला की किनारा नाहीसा होतो, तसे तुकोबा पंढरिरायाला आपल्यात भरून घ्यायला बोलावतात, की मी गरिब दीन आहे, कोणतीतरी कृपा कर.. हजरत ख्वाजा गरीब नवाज हो के आजा...
तुकोबांच्या अगदी हृदयातली ओळ, सीणलें माझें मन....फार क्वचितच मन आणि मनात उठणारं काहूर घेऊन येतात तुकोबाराय.. करूणाष्टकांतही सीणत सीणत पोटी, पाहिली वाट तुझी!
तसंच रे डोळ्यांतून तुझी वाट पाहून आता मन शिणून गेले. कुणाच्या डोळ्यांत पहावे, देव दिसून येतो, पुरातन युगांपासूनची आर्जवे दिसून येतात तर कधी मनात चालू असणारी, न संपणारी तगमगही...
भूक तर कधीच इच्छेला ओलांडून गरज बनून जाते, आणि पुढे तिची तृप्ती हेच जीवन बनतं, अशी अधुरी राहणारी भूक जर तुझं मुख असेल तर जीवन हे आटणारच...
तुकोबांचं विठ्ठलाविषयीचं प्रेम हे असं गदगदून होतांना दिसून येतं ...त्यात खरंतर अहंकारशून्यता ही केवळ न् केवळ वरकमाई असते, आणि म्हणून ती तुकोबारायांना नको असते, त्या भावात न विठ्ठल उभा असतो न तुकोबा... तो अगाध कृष्णविवर असतो, सर्वांपलिकडचा.. ना थारा, ना वर्तमान..असा!
प्रतिक्रिया
अगाध आहे बँडविड्थ
तळाला गेलेले लोणचे ते कृष्णविवर.
गैरसमज
इथे 'कृष्णविवर'चा अर्थ तुम्ही समजता तसा नाहीये.
'कृष्ण' बोले तो भगवान श्रीकृष्ण. (तोच तो, लोणी चोरून खाणारा नि १६,१०८ बायकावाला.) आणि, 'विवर' बोले तो... जाऊ द्यात!
तसं नैच.
पंढरीनाथ हा वेगळ्या रूपात आहे.
नटखट माखनचोर एवढा लहानही नाही ,गोपींशी रास खेळणाराही नाही. गुरेराखी देव आहे. रुक्मिणी नाहीच सोबत. वैजयंती माळा,कापडी टोपी, कमरेवर हात त्यात काठी ठेवतात किंवा खांद्यावर आडवी धरतात पुढे इतरांनी अपग्रेड केला. मुकुट,कानी कुंडले,शेला भारी केला.