Skip to main content

जगायचीही सक्ती आहे....

जगायचीही सक्ती आहे... या मंगला आठलेकरांच्या पुस्तकात जगण्याचा विचार हा मृत्यू ही संकल्पना मध्यवर्ती धरुन केलेला आहे तसाच मृत्यूचा विचार जगण्याच्या परिप्रेक्षात केलेला आहे. पुस्तकात स्वेच्छामरण,दयामरण या संकल्पनेवर आधारित जगभरातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. लेखिकेच्या भावजयीचा वयाच्या ४२व्या वर्षी कॅन्सरने झालेला मृत्यू हा पुस्तकाच्या जन्माला कारणीभूत ठरला. स्वेच्छामरण हा अचानक मनात येणारा विचार नसून जगण्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन आहे. यासाठी जीवन मृत्युकडे पहाण्याची आपली धारणा बदलण्याची गरज आहे. नैसर्गिक मरण सुद्धा आपल्याला सहजतेने स्वीकारता येणार नसेल तर स्वेच्छामरणाकडे स्वीकारण्याचा नजरेने सोडाच, नुसत मान वर करुन तरी आपल्याला बघता येणार आहे का? असे लेखिकेला वाटते.
आत्महत्या दयामरण आणि स्वेच्छामरण यातील परिस्थितीजन्य फरक आजूबाजूला घडणार्‍या घटनांमधून स्पष्ट केला आहे. आत्महत्या,स्वेच्छामरण, दयामरण व खून ह्या चारही प्रकारचा संबंध माणसाचे अस्तित्व संपण्याशी आहे. पहिल्या दोन प्रकारात माणुस स्वत:चे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो तर दुसर्याव दोन प्रकारात एका माणसाचे आयुष्य संपवण्याचा निर्णय दुसर्या: व्यक्तिने घेतलेला असतो.जगणं नकोसं करणार्याा भ्रष्ट समाजव्यवस्थेमुळे मरणासाठी प्रवृत्त होणे आणि असाध्य आजाराला कंटाळून स्वेच्छामरण/ दयामरण मागणे यात फरक आहे. त्यामुळे आत्महत्या व खूनासाठी असलेले कायदे स्वेच्छामरण व दयामरणाला लागू करणे चुकीचे ठरेल.मरणासन्न रुग्णाचा फक्त श्वास चालू ठेवण्याने कोणत्या कायद्याच रक्षण होणार असत? अशा रुग्णाला मरु देण हा न्याय आहे कि अन्याय? सुखाने व स्वेच्छेने मरण्याचा हक्क त्याला वापरता येणार आहे की नाही?
स्वेच्छामरणाच्या इतिहासात आद्य इच्छामरणी भीष्म यांच्यापासून सुरवात करुन भारतीय परंपरा तसेच जगभरातील या विषयावरील विविध संस्कृतींचा व चळवळींचा इतिहास सुलभपणे मांडला आहे. त्यामुळे स्वेच्छामरणाला हे काय नवीन फॅड असे म्हणता येणार नाही. वैद्यकशास्त्र व कायदा याबाबत काय सांगतो हे एका स्वतंत्र प्रकरणात विशद केले आहे. ख्रिस्तपूर्व ४ थ्या शतकात होउन गेलेल्या हिप्पोक्रेटीस या डॉक्टर ने सांगितलेल्या शपथेत आजही काही बदल नाही. द सोसायटी फॉर दी राईट टू डाय वुइथ डिग्निटी या भारतातील संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री मसानी यांनी ऑस्ट्रेलिया येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात १९८२ साली भारतातील याबाबतच्या कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले. पुस्तकात इच्छामरणाला अनुकूल नसलेल्या मतांचाही परामर्श घेतला आहे. कायद्याचा दुरुपयोग होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते.मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश आर एअ जहागीरदार म्हणतात,” विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यावर मरण पंथाला लागलेल्या माणसाला लावलेले श्वसनयंत्र काढून घेणे, त्याच्यावर चालू असलेले उपचार थांबवणे, त्याला त्याच्या दु:स्थितीतून कायमचे मुक्त करणे.. हे सारे समजण्यासारखे आहे. परंतु अशी परिस्थिती उद्भवणे हे कायम अपवादात्मक असणार आहे. त्यासाठी कायदा कशाला करायचा? कायदा केल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा दुरुपयोग करण्याची संधी मिळू शकेल....”
पुस्तकात कायद्याचा दुरुपयोग होउ नये म्हणून घेतलेली काळजीबाबत विवेचन आहे. जगरभरात अशा कायद्यांबाबत काय परिस्थिती आहे व तिथे त्याची अंमलबजावणी कशी केली जाते याची उदाहरणे दिली आहेत. वाचताना मला बॅंकेतून कर्ज घेउन ते बुडवणार्याे लोकांचे उदाहरण डोळ्यासमोर आले. दोन चार टक्के लोक कर्ज बुडवणारे असले तरी ९८ टक्के लोक कर्ज फेडत असतात. त्यामुळे कर्ज सुविधेचा दुरुपयोग करणार्याो दोन टक्के लोकांसाठी सरकार/बॅंक कर्ज सुविधा बंद करत नाही. शेवटी कुठलाही कायदा फुलप्रुफ असू शकत नाही.
पुस्तकात स्वेच्छामरणातील वैयक्तिक न्याय, समाज आणि धर्म या विषयी विवेचन आहे. जैन धर्मातील संथारा व्रत हे आदर्श व समाधानकारक मरण्याचा मार्ग आहे असे जैनांचे मत आहे. इतर धर्म इतक्या सुस्पष्टपणे अनुकूल नाहीत. लेट मी डाय बिफोर आय वेक नावाच डेरेक हम्फ्री या लेखकाच पुस्तक आहे. त्यात एका तरुण मुलाचे मानसिक द्वंद्व आहे. त्याच्या आईने विकलांग व पराधीन झाल्यावर सरळ गोळ्या घालून ठार मार असे सांगून ठेवले असते.तशी परिस्थिती उदभवल्यावर अखेर इक दिवस ताण असह्य होउन तो आईवर गोळ्या झाडून तिला संपवतो व स्वत: एका मानसोपचार तज्ञाकडे जाउन मला पोलिसांच्या स्वाधीन करा असं सांगतो.
पुस्तकात शेवटी आपण काय करु शकतो? हा प्रश्न वाचकांच्या मनात शिल्लक रहात असल्याने हे प्रकरण घेतले आहे. लिव्हिंग विल व प्रायोपवेशन हे मुद्दे घेतले आहेत. लिव्हिंग विल आपली सदसदविवेकबुद्धी जागी असताना पूर्ण भानानिशी लिहून ठेवावे. प्रायोपवेशनात तर कायद्याचा पाठिंबा नको, ध्रर्माची संमती नको, नैतिकतेचे दडपण नको,सरकार समाजाची पर्वा नको,वाद नको,चर्चा नकोत...... फक्त अन्नपाण्याचा त्याग! तोही घरातल्या घरात. समाजाने शतकानुशतके जोपासलेल्या धारणा पटकन बदलणार नाहीत. कायदा होण्यासाठी वाट पहावी लागणारच आहे. जगण्यासाठी सोडाच पण शांतपणे मृत्यू यावा यासाठीही चळवळ करावी लागणार असेल तर त्यासारखी मानवी जीवनाची दुसरी शोकांतिका नाही.

जगायचीही सक्ती आहे...
लेखिका- मंगला आठलेकर
शब्द पब्लिकेशन
पृष्ठे- 176 मूल्य- 175/-

समीक्षेचा विषय निवडा

तिरशिंगराव Sat, 05/09/2015 - 19:03

स्वेच्छामरणाचा कायदा आपल्या देशांत होणे आवश्यक आहे. त्याचा दुरुपयोग होईल ही भीति निराधार आहे. समजा एखाद्या व्यक्तिला स्वेच्छामरण स्वीकारायचे असेल तर त्याने तसे अ‍ॅफिडेव्हिट कोर्टात करावे. इतक्या उघडपणे कायदा पाळून परवानगी घेतली तर त्याचा दुरुपयोग करता येणे कठीण आहे.
फक्त मरणासन्न वा शेवटच्या आजारातील रुग्णांनाच काय, पण माझ्यासारख्या चांगली तब्येत असणार्‍या पण जगण्यांत आनंद न वाटणार्‍या लोकांनाही अशी परवानगी मिळाली पाहिजे. म्हातारपणी कुठला तरी दुर्धर रोग होण्याची वाट का पहायची ? पेनलेस मरण हक्काने मिळत असेल तर ते का घेऊ नये ?
छान पैकी पार्टी व साधा निरोपसमारंभ करुन सगळ्यांना बाय बाय करायला कित्ती मजा येईल!

नगरीनिरंजन Sat, 05/09/2015 - 19:59

In reply to by तिरशिंगराव

सहमत. वाटल्यास कोणाच्या हातून मरण यावे तेही सांगण्याची सक्ती असेल तर चालेल म्हणजे दुरुपयोगाची शक्यता आणखी कमी होईल. म्हणजे समजा एखाद्याने माझ्या मुलीच्या/मुलाच्या हातून इंजेक्शन दिले जावे असे लिहीले तर त्याचा फायदा घेऊन दुरुपयोग करणारी अशी कितीशी अपत्ये असतील? आणि असतील तर त्यांच्या जन्मदात्यांना जगण्यात कितीसा आनंद असेल?

ऋषिकेश Mon, 07/09/2015 - 12:01

In reply to by नगरीनिरंजन

परवाच्या अंतराआनंद यांच्या प्रतिसादाने या विषयावरच्या प्रतिसादाने मी पुन्हा दोलायमान स्थितीत जाऊ लागलो असलो तरी बर्‍याच विचारानंतर हा अधिकार हवा याच बाजुला मी झुकलेलो आहे.

मात्र,

आणि असतील तर त्यांच्या जन्मदात्यांना जगण्यात कितीसा आनंद असेल?

वगैरे वाक्य फारच रोमँटिक वाटतात. अपत्यां पलिकडेही जग असतं आणि त्याच्यापलिकडेही जगण्याची इच्छा व्हावी - टिकून रहावी व आयुष्यात आनंद वाटावा यासाठी पुरेशी कारणं असतात. उलट हा निर्णय एखाद्या असंबंधित व त्या व्यक्तीच्या असण्या-नसण्याने कोणताही परतवा न मिळू शकणार्‍या डॉक्टरला घेऊ दिला तर जरातरी मेडिकल ग्राउंड्सवर योग्य तो घेतला जाईल अशी शक्यता आहे

नगरीनिरंजन Tue, 08/09/2015 - 04:31

In reply to by ऋषिकेश

प्रतिसाद नीट वाचावा ही विनंती. अपत्यांचं फक्त एक उदाहरण आहे. अपत्यांपलीकडे जग असतं हे मला चांगलंच माहित आहे. धन्यवाद.

मेडिकल ग्राऊंड्सवरच ही सोय हवी आणि धडधाकट पण कंटाळलेल्या लोकांनी ट्रेनखाली किंवा अन्य भयानक मार्गाने जीवन संपवावे ही अपेक्षा का? उद्या कोणी म्हणेल की धडधाकट लोकांनी श्वास घेणे थांबवावे एवढंच असेल तर.
मरण इतकं सहज येत नाही म्हणूनच प्रत्येकाला इच्छामरणाची सोय असायला हवी.

अतिशहाणा Tue, 08/09/2015 - 07:46

In reply to by नगरीनिरंजन

मेडिकल ग्राऊंड्सवरच ही सोय हवी आणि धडधाकट पण कंटाळलेल्या लोकांनी ट्रेनखाली किंवा अन्य भयानक मार्गाने जीवन संपवावे ही अपेक्षा का? उद्या कोणी म्हणेल की धडधाकट लोकांनी श्वास घेणे थांबवावे एवढंच असेल तर.

स्वतःचा श्वास थांबवणे शक्य नाही. प्रयोग करुन पाहा :). पण ट्रेनखाली किंवा उडी मारुन जीवन संपवणे हा मार्ग भयानक का वाटतोय? मेडिकल ग्राऊंडवर म्हणजे इंजेक्शन वगैरे देऊन शांतपणे जीवन संपवण्याची सोय करावी काय? मी तुमचे मत समजावून घेण्यासाठी प्रश्न विचारतोय.

नगरीनिरंजन Thu, 10/09/2015 - 09:48

In reply to by अतिशहाणा

एक्झॅक्टली, स्वतःचा श्वास थांबवून मरता येत नाही. मरण सहज येत नाही. ट्रेन खाली झोपून वा उडी मारून मरायचे म्हटले तरी मरण्याची खात्री नाही. अपंगत्व आले तर आहे त्या आयुष्यापेक्षा भयंकर आयुष्य वाट्याला येणार. प्रत्येक माणसाला मरण्याचा डिग्निफाईड व शुअरशॉट मार्ग उपलब्ध असावा.
बळंच कोणीतरी ठरवलं की माणसं जगणे म्हणजे प्रगती म्हणून जगण्याची सक्ती नको. असा मार्ग देता येत नसेल तर लोकांना (आपोआप मरेपर्यंत) जगवायचा खटाटोप सार्वजनिक संस्थात्मक पातळीवर थांबवावा. ज्यांना जगायचंय ते पैसे भरुन खाजगी मदतीने जगतील.

अतिशहाणा Thu, 10/09/2015 - 18:42

In reply to by नगरीनिरंजन

माणसं जगणे म्हणजे प्रगती - म्हणून माणसं जगवायला पाहिजेत असं माझं मत नाही. वास्तविक मनुष्य म्हणून आपल्या हातात अनेक गोष्टींचं नियंत्रण नाही. कुठल्या गावात-राज्यात-देशात-धर्मात-जातीत जन्माला यायचं, कुणाच्या पोटी जन्माला यायचं, जन्मदात्यांची आर्थिक परिस्थिती काय असावी, कुठल्या शाळेत शिक्षण घ्यायचं, कुणाशी लग्न होणार (ठरवून किंवा प्रेमविवाह कसंही), नंतर जोडीदाराबरोबर पटेल की नाही, मुलंबाळं होणार की नाही, झाली तर किती होणार, कशा स्वभावाची-हुशारीची-प्रवृत्तीची असतील, त्यांच्या शिक्षणाचं काय... या सगळ्या अनियंत्रित गोष्टी आहेत. यावर आपले नियंत्रण आहे हा एक आभास आहे. या अनियंत्रित गोष्टींना अंत नाही.

मुळात आपण जन्माला येतो ते आपल्या इच्छेने की इच्छेविरुद्ध याचाच निवाडा करणे कठीण आहे. मग या सगळ्या नियंत्रण नसलेल्या गोष्टी चालवून घेत असताना, मृत्यूवर नियंत्रण मिळवण्याचा खटाटोप कशासाठी? अशी मागणी करणे हे निसर्गाच्या चक्राविरुद्ध आहे असे माझे मत आहे.

(उडी मारा वगैरे उपरोधाने म्हटले होते. जन्माचा निवाडा करणे जसे आपल्या हातात नाही, तसाच मृत्यूचा निवाडाही हातात असू नये. निदान निरोगी, सुदृढ व्यक्तींसाठी आत्महत्या ही सहजसाध्य गोष्ट असू नये असे माझे मत आहे. दुर्धर आजार, मरणासन्न वगैरे व्यक्तींसाठी दयामरण असावे की नाही हा वेगळा विषय आहे.)

नगरीनिरंजन Fri, 11/09/2015 - 08:27

In reply to by अतिशहाणा

दैववादी लोकांबरोबर वाद घालण्यात अर्थ नसतोच. कशावरच काही नियंत्रण नाही तर दवाखान्यात स्वतःहून जायचं की आपोआप घरंगळत जायची वाट बघायची?
आणि मग दुर्धर आजार ही संकल्पनाच बाद ठरते पण लगेच अशा आजारी लोकांसाठी तरी कशाला नियंत्रण असल्याचा आव आणायचा?
अवांतरः लग्न व मुले होणार की नाही यावर नियंत्रण असते बहुतेकांचे. (भारतीयांमध्ये असे लोक कमी असतील कदाचित).

गवि Fri, 11/09/2015 - 11:07

In reply to by अतिशहाणा

ट्रेनखाली उडी मारणे, उंच इमारतीवरुन उडी मारणे इत्यादि मार्ग खुद्द आत्महत्येच्छुकाला भयानक वाटतील,न वाटतील.. पण त्यातल्या वेदनादायकतेपेक्षाही प्रसंगी खालीलपैकी गोष्टी घडून त्या इतर लोकांना त्रासाच्या ठरु शकतातः

- इंजिन ड्रायव्हरने वाचवण्यासाठी केलेल्या विफल प्रयत्नांत कधीकधी ट्रेन डीरेल होण्याची शक्यता
- इंजिन ड्रायव्हरला कदाचित चौकशीची पीडा / पोलीसकेसमधे काहीही चूक नसताना सहभाग
- ट्रेनमधल्या / बिल्डिंगमधल्या इतर प्रवाश्यांच्या/ रहिवाशांच्या/ लहान मुलांच्या, ट्रॅकच्या आजूबाजूला असलेल्या अन्य नागरिकांच्या नजरेला अत्यंत विचलीत करणारं अप्रिय, बीभत्स इ इ दृश्य पडणं. त्याचा मनस्ताप आणि कदाचित धक्काही टिकून राहणं.

त्यामुळे स्वेच्छामरण या मुद्द्यात जर काळजीपूर्वक ठरवलेली प्रोसेस फॉलो होत असेल तर ते जास्त चांगलं. त्यात पूर्ण शुद्धीत असलेली व्यक्ती असा निर्णय घेत असेल आणि:

१. या यादीत मूळ रजिस्ट्रेशन करणं आणि प्रत्यक्ष इच्छा सबमिट करण्यात मधे किमान अमुक वर्षं कालावधी जायला हवा.
२. हा निर्णय एखाद्या भावनेच्या भरात किंवा कोणाच्या धमकीने बळजबरीने नाही हे बहुतांश केसेसमधे सिद्ध होण्यासाठी एकदा ही इच्छा ऑथॉरिटीजपुढे लेखी नोंदवल्यावर प्रत्यक्ष एक्झेक्यूशनमधे १-३ महिने अंतर ठेवून पुन्हा एकदा ३० दिवसांनी तीच इच्छा त्या व्यक्तीने त्याच ऑथॉरिटीकडे लेखी रिपीट करणं. (मनापासून इच्छा नसलेल्यांना हा मधला एक महिन्याचा कालावधी सेकंड थॉट्स, घाबरणं, मन पालटणं, "अवसान गळणं" यासाठी पुरेसा ठरेल.)
३. एकाहून अधिक स्वतंत्र वैद्यकीय तज्ञांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष प्रक्रिया पार पाडणं आणि तिघांनीही त्या प्रक्रियेच्या जेन्युईन असल्याची खात्री करुन साईन ऑफ करणं. (तीन वेगवेगळ्या व्यक्तींना गैरमार्गासाठी तयार करणं हे एकाला तयार करण्यापेक्षा जास्त कठीण ठरेल आणि मुख्य म्हणजे गुन्हेगारांसाठी "रिस्की" ठरेल.
४. मूळ इच्छेचं सबमिशन आणि प्रत्यक्ष कारवाई ही कोणाच्याही घरी किंवा अन्य खाजगी ठिकाणी न होता या ठराविक हॉस्पिटल्समधे अ‍ॅडमिट होऊनच व्हावी.

अशाच आणखी काही स्टेप्ससहित हे केलं तर चांगलंच आहे. किमान वेदना हा मुख्य भाग आहेच. यासाठी वैद्यकीय व्याख्या कदाचित बदलाव्या लागतील.

अतिशहाणा Fri, 11/09/2015 - 18:47

In reply to by गवि

हे रजिस्ट्रेशन, दर महिन्याची हजेरी, एकाहून अधिक स्वतंत्र वैद्यकीय व्यक्तींची हजेरी, स्पेशल हॉस्पिटल्स यांचा खर्च कसा भागवणार? ट्याक्सपेअरच्या पैशातून नको.

प्रकाश घाटपांडे Sun, 06/09/2015 - 09:23

In reply to by तिरशिंगराव

छान पैकी पार्टी व साधा निरोपसमारंभ करुन सगळ्यांना बाय बाय करायला कित्ती मजा येईल!

अगदी अगदी! मी एकदा दै सकाळ मधे दु:खद निधन ऐवजी अशा आशयाचा मजकूर त्या सदरात दिवंगत माणसाच्या इच्छेनुसार वाचला होता. त्यात त्याने सर्वांना असाच बाय बाय केला होता. जाता जाता आयुष्याविषयी समाधानही व्यक्त केले होते. त्याच कात्रण माझ्याकडून कुठेतरी हरवले.

योगेश्वर Sat, 05/09/2015 - 20:13

सर्वोच्च न्यायालयाने संथारा वर नुकत्याच घातलेल्या बंदीच्या पार्श्वभुमीवर हा लेख योग्य वेळी आलाय. खरंतर संथारा हा ईच्छा मरणाचा सहज सुलभ मार्ग होता, अगदी जैन नसलेल्यांसाठी सुद्धा. पण आता त्यावर पण गदा येतेय असं दिसतंय. एकुणच जैन लाॅबी पहाता ही बंदी ऊठण्याची शक्यताच अधिक वाटतेय.

एक फालतु शंका. मराठी पुस्तकांची किंमत एक रूपया प्रति पान किंवा अधिक अशीच का असते?

मनीषा Sun, 06/09/2015 - 10:13

स्वेच्छा मरणाची संकल्पना मला मान्यं नाही.
सन्मानाने मरण वगैरे बोलायच्या गोष्टी .. पण प्रत्यक्ष ती वेळ येते तेव्हा नातेवाईकच नाही तर पेशंट ही जगण्यासाठी किती आकांताने प्रयत्नं करतात हे पाहिले आहे. आशेचा धागा मोठा चिवट असतो. याही वेदना सरतील आणि आपण आणखी काही काळ आपल्या मुलामाणसात राहू हीच इच्छा असते. आणि त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. काही वेळेला घरच्या लोकांच्या सहनशक्तीचा कस लागतो. पण त्यातून आपलं माणूस जगला वाचला तर होणारा आनंद अवर्णनीय असतो. काही अशुभ घडलेच तर, 'ईश्वरेच्छा बलीयसी'--- म्हणता येते. पण आपण आपल्याच कुणाचा मृत्यु मागुन घेतला याची टोचणी नसते.
तसेच इच्छा मरणाच्या कायद्याचा दुरूपयोग होण्याची शक्यताही वाटते. एकदा आजारपण आले की परावलंबीत्व येते. आणि असे इच्छापत्रं केलेले असेल की संपलेच (अर्थात हे सार्वत्रीक नाही , पण तरीही प्रमाण लक्षणीय असण्याची शक्यता आहे) आणि काळ असा आहे की "काहीही" "मॅनेज" करता येणे शक्यं आहे.

म्हातारपणी कुठला तरी दुर्धर रोग होण्याची वाट का पहायची ? पेनलेस मरण हक्काने मिळत असेल तर ते का घेऊ नये ?
छान पैकी पार्टी व साधा निरोपसमारंभ करुन सगळ्यांना बाय बाय करायला कित्ती मजा येईल!

हा बर्‍यापैकी स्वार्थी विचार वाटत नाही का. कारण माणूस हा एकटा नसतो. तो अनेकजणात गुंतलेला असतो आणि अनेकजण त्या माणसात ..
अशावेळी 'गुंतुनी गुंत्यात सार्‍या -- पाय माझा मोकळा' असे म्हणुन निघून जाणं हा इतरांवर अन्याय नाही का?

मात्रं काही प्रकरणात दया मरणाचा विचार व्हावा (डॉक्टर आणि नातेवाईकांच्या संमतीने) असे वाटते. उदा. अरूणा शानभागच्या बाबतीत जे झाले ते अक्षरशः हृदयद्रावक आहे.

गब्बर सिंग Mon, 07/09/2015 - 02:05

In reply to by मनीषा

हा बर्‍यापैकी स्वार्थी विचार वाटत नाही का. कारण माणूस हा एकटा नसतो. तो अनेकजणात गुंतलेला असतो आणि अनेकजण त्या माणसात ..
अशावेळी 'गुंतुनी गुंत्यात सार्‍या -- पाय माझा मोकळा' असे म्हणुन निघून जाणं हा इतरांवर अन्याय नाही का?

इतरांवर अन्य्याय नाहीच.

न्यायाची व्याख्या जर - Everybody be subject to same rules असेल तर अन्याय अजिबात नाही. जर त्या "इतरांना" सुद्धा हीच संधी व हेच नियम उपलब्ध असतील तर तो अन्याय नाहीच.

त्या इतरांना सुद्धा स्वेच्छामरणाची संधी उपलब्ध असली पाहिजे. कायद्यान्वये यात कोणत्याही व्यक्तीस विशेषाधिकार नसल्यास अन्य्याय नाहीच.

योगेश्वर Mon, 07/09/2015 - 06:58

In reply to by मनीषा

@ मनिषा,मला वाटतंय स्वेच्छा मरण आणि जगण्याची दुर्दम्य ईच्छा या विरूद्ध संकल्पना आहे. जर दुर्धर आजारग्रस्त कोणाला जगवायचे / जगायचे असेल तर कुटुंबियांचा जास्त कस लागतो. याऊलट स्वेच्छा मरण / संथारा पत्करणार्या व्यक्तीचा स्वतःचा कस लागत असावा.
राहीला प्रश्न गुंतण्याचा आणि स्वार्थाचा. तर ते पण काही पटत नाहीये. शेवटी किती आणि कुठवर गुंतणार? नातेवाईकांना कंटाळा येईस्तोवर?
त्यापेक्षा संथारा सारखं वेदनारहीत स्वेच्छा मरण कधीपण ऊत्तम!

मनीषा Mon, 07/09/2015 - 12:29

In reply to by योगेश्वर

नातेवाईकांना कंटाळा आला म्हणून मी माझे आयुष्यं संपवायचे हे कितपत न्याय्यं ?
काहीन्ना कंटाळा आला असे तर काहीन्ना नसेलही.

हिंदू धर्मातली सती प्रथा का बंद झाली . तोही इच्छा मृत्युच होता ना. पण पतीबरोबर सती जाणारी स्त्री , चितेतून बाहेर येऊ नये म्हणून चितेभोवती टोकदार काठ्या घेऊन लोक उभे रहायची. म्हणजे क्षणिक दु:खाच्या भरात आयुष्यं निरर्थक वाटत असलेली स्त्री मृत्यु सामोरा आला की जगायची इच्छा करते हे सत्यं आहे ना?
आणि बर्‍याच प्रकरणात हा इच्छा मृत्यु नक्की कुणाच्या इच्छेखातर दिला जात असे हा प्रश्नं होताच.
राजस्थान मधले रूपकॅवर प्रकरणात , नंतर असे बोलले गेले की .. ती सती जाताना पूर्ण शुद्धीत नव्हतीच .
पण लोकांनी तिला सती मॉ म्हणत तिचे मंदिर बांधले.
कुठल्याही धार्मिक प्रथेबाबत मत देताना फार जपावे लागते.
संथारा व्रत हे साधु मुनीं च्या आदेशानुसार घेतले जाते असे ऐकिवात आहे.
पण हे व्रत खरोखर त्या संबंधित व्यक्तीच्या इच्छेने घेतले जाते किंवा कसे हे बघणे नक्की जरूरीचे वाटते.
आणि तसही .. प्रयोपवेशन करून जाहिररित्या केलेली ही आत्महत्याच ना?

आणि माझं हे वैयक्तीक मत आहे कि, मी कुणाला नविन जीवन देऊ शकत नाही, नविन तयार करू शकत नाही, तर ते संपविण्याचा मला काय अधिकार?
जन्माप्रमाणेच मृत्युवर देखिल माझे नियंत्रण नाही. आणि ते तसेच असणे योग्यं आहे असं मला वाटतं.

गवि Mon, 07/09/2015 - 12:40

In reply to by मनीषा

आणि माझं हे वैयक्तीक मत आहे कि, मी कुणाला नविन जीवन देऊ शकत नाही, नविन तयार करू शकत नाही, तर ते संपविण्याचा मला काय अधिकार?
जन्माप्रमाणेच मृत्युवर देखिल माझे नियंत्रण नाही. आणि ते तसेच असणे योग्यं आहे असं मला वाटतं.

यामुळेच बहुधा अ‍ॅक्टिव्ह मरणदानाऐवजी पॅसिव्ह इच्छामरणाला जास्त सपोर्ट मिळतो. व्हेंटिलेटर आदि उपचार चालू ठेवणं म्हणजेही मृत्यूवर नियंत्रण ठेवू पाहिल्यासारखंच आहे. ते काढून घेणं आणि जे होईल ते होऊ देणं या प्रकारच्या इच्छामरणाबद्दल उपरोक्त मुद्दा स्टँड होऊ शकत नाही. सती हे उदाहरणही फार चपखल नाही कारण तिथे सामाजिक स्थिती आणि दबावाचा संबंध आहे. शारिरीक आजाराचा नव्हे. मानसिक तयारी केली तरी मरण्याचा प्रत्यक्ष प्रसंग आला की जगण्याची इच्छा उसळते या भागापुरतं ते उदाहरण ठीक आहे.

मनीषा Thu, 10/09/2015 - 09:18

In reply to by गवि

.. तुम्ही म्हणता त्या न्यायाने, कुठलाही वैद्यकीय उपचार करणे म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणणेच होईल.
म्हणजे ज्याने आजारपण दिले, त्याची इच्छा असेल तर ते संपेल. नाहीतर हरी हरी.... असंच ना?
मला म्हणायचय, प्रयत्नं करणे... अगदी शेवटपर्यंत , किंवा शक्यं असेल तिथपर्यंत-- आपल्या हाती. आणि यश किंवा अपयश देणे "त्याच्या" हाती.
सती प्रथेचे उदाहरण दिले कारण
१) ती धार्मिक प्रथा आहे , जिचा फोलपणा लक्षात आला म्हणून ती कायद्याने प्रतिबंधीत केली गेली.
२) त्यात असे भासवले जाते की. तो इच्छामृत्यु होता. पण बर्‍याच वेळा वास्तवात तसे नसते. तर तो मृत्यु तिच्यावर लादला गेला असतो.

पण इच्छामृत्यु फक्तं शारिरिक व्याधीने जर्जर व्यक्तीसाठीच आहे का?
इथे काहीनी नातेवाईकांना कंटाळा येईपर्यंत कशाला जगायचे? किंवा परावलंबी आयुष्याचा काय उपयोग वगैरे म्हणले आहे.
तसेच संथारा या धार्मिक प्रथेचापण उल्लेख आला आहे. तो पण एक प्रकारचा दबावच ना?

मारवा Mon, 07/09/2015 - 14:17

In reply to by मनीषा

संथारा काय किंवा संजीवन समाधी काय हे दोन्ही आत्महत्याच आहेत.
याप्रकारच्या चर्चेवर दिलेला मिपावरील प्रतिसाद पुन्हा देतो.
१- ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली.
२- ज्ञानेश्वरांनी आपली जीवनयात्रा संपवली.
३- ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली.

What's in a name? that which we call a rose
By any other name would smell as sweet; - Shakespeare's

वरील विधानात फरक आहे. तिसरे विधान महत्वाचे आहे.
तिसरे विधान थेअरी दर्शविते. आत्महत्या वेगळी आहे हे दाखवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
जोन्सटाउन मध्ये पिपल्स टेम्पल या संप्रदायाच्या लोकांनी जिम्स जोन्स च्या मार्गदर्शनावरुन आत्महत्या केली. त्यामागे एक डिटेल थेअरी होती. त्यांच्या काही कल्पना होत्या. संज्ञा होत्या.
जपानमध्ये हाराकीरी केली जाते त्यामागे ही एक डिटेल थेअरी संज्ञा कल्पना सर्व काही आहे.
स्वामी विज्ञानानंद यांनी जनतेला मनशक्ती ची शिकवण देउन मग उंच इमारतीचा जिना चढण्यास सुरुवात केली. त्यांची तर फार च विस्ताराने मांडलेली थेअरी होती.
तर सामान्य आत्महत्या केली या विधानाला झळाळी मिळते थेअरीने.
थेअरी इज ऑल .
नग्न सत्याला झाकण्यासाठी थेअरीचे शुभ्र महावस्त्र ह्वे. त्या महावस्त्राचा ताणा जस्टीफीकेशन ( जितका ताणाल तितक उत्तम ) ने व बाणा ग्लोरीफीकेशन चा हवा.
मग शेक्सपिअर म्हणतो तसे न होता दुसरे च काहीतरी होते.
भला उसकी थेअरी मेरी थेअरी से सफेद कैसी ?

प्रकाश घाटपांडे Mon, 07/09/2015 - 09:26

In reply to by मनीषा

हा बर्‍यापैकी स्वार्थी विचार वाटत नाही का. कारण माणूस हा एकटा नसतो. तो अनेकजणात गुंतलेला असतो आणि अनेकजण त्या माणसात ..
अशावेळी 'गुंतुनी गुंत्यात सार्‍या -- पाय माझा मोकळा' असे म्हणुन निघून जाणं हा इतरांवर अन्याय नाही का?

हा मुद्दा प्रातिनिधिक असल्याने पुस्तकात घेतला आहे. हा एकप्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग चा प्रकार आहे.पण तो आपल्या संस्कृतीचा अपरिहार्य भाग देखील आहे.

मनीषा Mon, 07/09/2015 - 11:56

In reply to by प्रकाश घाटपांडे

इमोशनल ब्लॅकमेलींग हा फारच कठोर शब्दं वाटतो आहे. विशेषतः ज्या संदर्भात वापरला आहे त्यामुळे जास्तं .

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे..
आत्महत्या आणि इच्छामृत्यु यात फरक कसा करणार.?

तसेच याचा दुरूपयोग होण्याची शक्यता खूप जास्तं दिसते. आजकाल वृद्ध व्यक्तींना त्यांच्या मुले, मुली, सुना यांच्याकडून जी वागणूक मिळताना दिसते --- ती पाहता तर खूपच जास्तं. कारण घराच्या आणि संप्पत्तीच्या वाटणी साठी आपल्याला हवे तसे मृत्युपत्रं करायला लावण्यासाठी लोकं काय काय करतात, हे उघड गुपित आहे.
असही होऊ शकतं , की आधी नको असलेल्यांना जगण अवघड करायचे, आणि मग त्यांना इच्छापत्र करायला लावून राजरोस मृत्यु द्यायचा म्हणजे एक प्रकारे " लायसेन्स टू किल" .. असेच झाले.
अर्थात हे सार्वत्रिक नाही . प्रत्येक घरी असेच असते असं नाही पण प्रमाण खूप जास्तं आहे हे नाकारता येत नाही.
दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांच्या बाबतीत देखिल , जगण्याची इच्छा संपत नसते. कुणी जबरदस्ती न करता देखिल ते शक्यं तितके प्रयत्नं करतात असेच पाहिले आहे.
काही मोजक्या व्यक्ती मृत्यु स्विकारण्याची इच्छा व्यक्तं करत असतीलही . पण त्यांचे प्रमाण अगदीच नगण्यं दिसते. मग असा कायदा किंवा नियम करणे कितपत व्यवहार्यं होईल?
आणि परत तेच लिहीते... आत्महत्या हा गुन्हा आणि इच्छामृत्यु कायदेशीर हा विरोधाभास नाही का?

अनु राव Mon, 07/09/2015 - 11:29

In reply to by मनीषा

स्वेच्छा मरणाची संकल्पना मला मान्यं नाही.

हो पण ज्यांना मान्य आहे ही कल्पना त्यांना तुम्ही का आडवताय?

डॉक्टर आणि नातेवाईकांच्या संमतीने)

माझ्या मरणाच्या निर्णयात नातेवाईकांची संमती कशाला?
खरे तर मला जगायचे असेल तर नातेवाईकांची संमती मॅडेटरी करायला पाहीजे. कारण माझ्या जगण्याचा त्रास त्यांनाच.

ऋषिकेश Mon, 07/09/2015 - 13:39

In reply to by अनु राव

स्वेच्छा मरणाची संकल्पना मला मान्यं नाही.

हो पण ज्यांना मान्य आहे ही कल्पना त्यांना तुम्ही का आडवताय?

हां.. हे बरोबर ए.
सहमत!
असा ऑप्शन असण्यात काय गैर आहे?

अनु राव Mon, 07/09/2015 - 15:08

In reply to by अनु राव

खरे तर मला जगायचे असेल तर नातेवाईकांची संमती मॅडेटरी करायला पाहीजे. कारण माझ्या जगण्याचा त्रास त्यांनाच.

ह्या माझ्या प्रतिसादाला "विनोदी" श्रेणी मिळाली म्हणजे, वरील वाक्य विनोदी वाटलेले दिसते.

ज्यांना वर्षानुवर्ष बेडरीडन, स्क्रीझोफेनिक किंवा फार आजारी नसताना पण घरात हाहा:कार माजवून बाकीच्यांचे जगणे हराम करणारे लोक माहीती नसतील, त्यांना हे विनोदी वाटणे शक्य आहे.

अंतराआनंद Sun, 13/09/2015 - 19:38

In reply to by अनु राव

फार आजारी नसताना पण घरात हाहा:कार माजवून बाकीच्यांचे जगणे हराम करणारे लोक माहीती नसतील,

स्वेच्छामरण कायदासंमत झाले की या लोकांना स्वतःहून मरण्याची इच्छा होईल की काय? का त्यांचा पिच्छा सोडवणे सोपे जाईल?

.शुचि. Sun, 13/09/2015 - 20:03

In reply to by अंतराआनंद

हाच विचार मनात आला होता. पण मग वाटलं कदाचित अनु फक्त "डिफिकल्ट नातेवाई़क" याबद्दल तुकड्याने बोलते आहे. त्याची स्वेच्छामरणाशी सुसंगती न लावता म्हणून काही बोलले नाही.

मनीषा Thu, 10/09/2015 - 08:49

In reply to by अनु राव

मी अडवणारी कोण हो?
मी फक्तं माझं मत सांगीतलं.
आणि भारतात लोकशाही असल्याने, प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहेच.

ज्यावेळी तुम्ही निर्णय घेण्यास सक्षम नसता, तेव्हा जवळच्या, विश्वासु व्यक्तीने ते काम करणे आवश्यक असते.

पिवळा डांबिस Sun, 06/09/2015 - 10:20

अशावेळी 'गुंतुनी गुंत्यात सार्‍या -- पाय माझा मोकळा' असे म्हणुन निघून जाणं हा इतरांवर अन्याय नाही का?

नाही. कारण ते बाकीचे सर्व सर्वार्थाने मरणार्‍या माणसात गुंतलेले नसतात.
त्यांचे इतर व्यवहार सुखनैव चालूच असतात.....

"सखे सोयरे डोळे टिपतील,
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील, बसतील, हसूनि खिदळतील,
मी जाता त्यांचे काय जाय!"

मनीषा Sun, 06/09/2015 - 11:12

In reply to by पिवळा डांबिस

जग काही कुणासाठी थांबत नाही. जगणं चालू राहतच की ..
"राम-कृष्णही आले गेले
त्यांवीण जग का ओसची पडले
कुणी सदोदीत सूतक धरिले?...."
असही म्हणलं आहेच की. पण माणूस गमावल्याचं दु:ख तर कायम राहतच ना?
आणि त्यातही आपण, आपल्यातल्याच कुणालातरी या जगात गुंतवून ठेवण्यात असमर्थ ठरलो--- ही बोच तर कायम सलणारी असेल.
आणि हा सल घेऊन पुढचे आयुष्यं जगायचे .. ही शिक्षाच की-- न केलेल्या गुन्ह्यासाठी झालेली.

गब्बर सिंग Mon, 07/09/2015 - 02:19

In reply to by मनीषा

आणि त्यातही आपण, आपल्यातल्याच कुणालातरी या जगात गुंतवून ठेवण्यात असमर्थ ठरलो--- ही बोच तर कायम सलणारी असेल.
आणि हा सल घेऊन पुढचे आयुष्यं जगायचे .. ही शिक्षाच की-- न केलेल्या गुन्ह्यासाठी झालेली.

ज्याला जगायचं नव्हतं त्याला (तो आपला होता तरीही) बलपूर्वक जगायला लावलं याच दु:ख नसेल का ?

मनीषा Mon, 07/09/2015 - 11:29

In reply to by गब्बर सिंग

बलपूर्वक म्हणजे जबरदस्तीने असं का?

तर मला तसं नाही म्हणायचय .
एखाद्याला जगायला लावायचे नाही .. तर जगण्यासाठी प्रवॄत्त करायचे. त्याच्या मनातले मॄत्युचे विचार बदलून जिवनेच्छा जागृत करायची. यात कुणाला स्वार्थ दिसत असेल तर तो त्यांचा दृष्टीदोष....
एखादा निराश असेल, त्याला जगणे असह्य वाटत असेल. पण ती कदाचित त्यावेळेची मनोवस्था असू शकते.
ती नंतर बदलू शकते.

आणि ज्याला खरोखरीच जायचे आहे, तो आत्महत्या करून मोकळा होतोच की .

गवि Mon, 07/09/2015 - 12:15

In reply to by मनीषा

हेच म्हणतो.

या निमित्ताने मला मेडिकल व्यावसायिकांकडून मत ऐकायची इच्छा आहे की:

- एखादी व्यक्ती आता या अवस्थेतून निश्चित सुधारणार नाही (रिकव्हर होणार नाही) आणि स्थिती अधिकाधिक वाईटच होत जाणार, अशी डॉक्टर सर्वसाधारणपणे किती प्रकारच्या केसेसमधे खात्री देऊ शकतात (टक्केवारी वगैरे काटेकोर विचारणं अयोग्य ठरेल हे माहीत आहे, म्हणून मोघम सवाल)

- या स्थितीतून कदाचित व्यक्ती रिकव्हर झाल्यास नेमकी कोणत्या पातळीपर्यंत क्वालिटी ऑफ लाईफ सुधारेल हे डॉक्टर बर्‍यापैकी अचूक सांगू शकतात का? अजिबात सुधारणार नाही याची खात्री खरोखर असते का ? (निराश लोक केवळ "चालता येणार नाही", किंवा "दृष्टी नाहीशी होईल" या कारणानेही "नको हे लाजिरवाणे / अवलंबित्व येणारे / व्हीलचेअरबाउंड आयुष्य" असंही म्हणतात. पण नंतर व्हीलचेअरवरुनही अनेक गोष्टी करता येऊ शकतात हे लक्षात येतं इत्यादि)
- "उपचार थांबवण्याविषयी निर्णय आता तुम्ही घ्या" असं भरपूर आयसीयू केसेसमधे डॉक्टर्स नातेवाईकांना सांगत असताना खुद्द ऐकलेलं आहे. तर अशा वेळी डॉक्टर्स कोणत्या प्रकारचा सपोर्ट देतात? निर्णयात रेकमेंडेशनरुपात त्यांचा व्यक्तिगत सहभाग असतो का? की तांत्रिक माहिती देऊन नातेवाईकांवर प्रत्यक्ष निर्णयाची पूर्ण जबाबदारी सोडलेली असते? इन सच अ केस, डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी एकमेकांसोबत सल्लामसलतीने घेतलेला निर्णय असं मानता येईल का?

पॅसिव्ह मरण देण्याविषयी बरेचजण सहमत होतात. त्यातही बरेच हाल असतात. आठवडे महिने तळमळणंही होऊ शकतं.

एकदा मरण द्यायचेच तर मग पॅसिव्हमधे काय खास अ‍ॅड्व्हांटेज आहे? यातना थांबवण्याचे वैद्यकीय ऑप्शन्स असतील तर तेही वापरण्याचा ऑप्शन का नाकारला जात असावा? वैद्यकीय नैतिकतेची प्रतिज्ञा पेशंटचा जीव वाचवण्याची असते की त्याचं दु:ख कमी (टाईमस्पॅन आणि तीव्रता) करणं ही असते? ती शब्दशः तशीच्यातशी ठेवून पाळणं कालसुसंगत आहे का?

प्रकाश घाटपांडे Mon, 07/09/2015 - 13:50

In reply to by मनीषा

आणि ज्याला खरोखरीच जायचे आहे, तो आत्महत्या करून मोकळा होतोच की .

आत्महत्येचा प्रयत्न हा कायद्याने गुन्हा आहे.चळवळ सन्मानाने व शांतपणे स्वेच्छेने मृत्युचा अधिकाराशी संबंधी आहे. तसे तर आत्महत्या यशस्वी झालेल्या माणसावर गुन्हा दाखल होत नाही.
. स्वेच्छामणाचा कायदा आला म्हणजे लोक पटापट मरायला सुरवात करतील असेही नाही. जगणे ही नैसर्गिक प्रेरणा आहे. मतदानात नोटा अधिकार आला म्हणजे बहुसंख्यांनी तो वापरला असे झाले नाही. ज्ञानेश्वरांनी समाधि घेणे ही काही त्यांच्यावरची सक्ति नव्हती. सावरकरांनी प्रायोपवेशन केले ही काही सक्ती नव्हती.स्वेच्छेने मरण्याची मुभा असणे म्हणजे तशी सक्ती असणे नव्हे

पिवळा डांबिस Mon, 07/09/2015 - 09:14

In reply to by मनीषा

असही म्हणलं आहेच की. पण माणूस गमावल्याचं दु:ख तर कायम राहतच ना?
आणि त्यातही आपण, आपल्यातल्याच कुणालातरी या जगात गुंतवून ठेवण्यात असमर्थ ठरलो--- ही बोच तर कायम सलणारी असेल.

नक्कीच!
पण गुंतून पडलेल्या आपले दु:ख्ख किंवा बोच कुरवाळण्यासाठी ज्याला इथे रहायचंच नाहिये त्याला जबरदस्तीने टिकवून/गुंतवून ठेवणं हे स्वार्थी नाही काय?

नितिन थत्ते Mon, 07/09/2015 - 13:23

मरण देण्याचा निर्णय घेणार्‍या नातेवाईकांना इतर लोक (जवळचेच नातेवाईक) नंतर जी टोचणी देतील त्याचा विचार करवत नाही.

आमच्या एका मतिमंद नातेवाइकाला तशा मुलांसाठी असलेल्या संस्थेत ठेवले असता नातेवाईक त्याच्या आईला "पोटच्या गोळ्याला असं दूर करवलं कसं?" असे विचारतात. आणि हे जिवंतच ठेवलेल्याच्या बाबत. तर मरण देणार्‍यांचं* लोक काय करतील?

*हे जगाला फाट्यावर मारणार्‍यांबाबत नाहीये. तशा लोकांना या सगळ्या चर्चेची गरजच नाही.

अतिशहाणा Mon, 07/09/2015 - 17:37

In reply to by नितिन थत्ते

सहमत. शिवाय अशी 'सोय' करुन देणे हा स्लिपरी स्लोप आहे. बाकी धडधाकट व्यक्तींसाठी असा स्पेशल कायदा करण्याची गरज नाही. रेल्वेरुळावर उडी मारण्याचा सोपा पर्याय उपलब्ध आहे. जाण्यापूर्वी एखादी चिट्ठी वगैरे लिहून स्वेच्छेने करत आहोत असे लिहायचे. आजकाल फेसबुक-ट्विटरवर स्टेटस अपडेट करुन ठेवणे सर्वात सोपे. कर्जात गळ्यापर्यंत बुडलेले शेतकरीही स्वेच्छामरण स्वीकारताहेतच ना. की इथेही स्वेच्छामरणाची अमुकतमुक पद्धतच (जिवंत समाधी वगैरे) आम्हाला स्वीकारायची आहे हा अहंकार पुढे आणायचा आहे.

ऋषिकेश Tue, 08/09/2015 - 13:12

In reply to by अतिशहाणा

इतरही कारणे असतील. एक सहज आलेला विचार
आत्महत्या केल्यास इन्श्युरन्स वगैरेचे काय होते? मागे राहिलेल्यांना त्याचा लाभ होतो का?
तसे नसल्यास अशी आत्महत्या न करता कायदेशीर मान्यतेची लढाई महत्त्वाची ठरेल

मनीषा Thu, 10/09/2015 - 08:41

In reply to by नितिन थत्ते

खरं आहे. लोकांना बोलायला काहीही कारण पुरतं, किंवा ते नसले तरी चालतं .

आपल्या अशा मुलाला दूर ठेवण्याच्या निर्णयाला येईपर्यंत , ते कुटुंब कुठल्या परिस्थितीतून गेले असेल? त्यांची मनोवस्था नेमकी कशी असेल याचा विचार हे बोलणारे लोक कधीच करत नाहीत.
त्यांना चघळायला एक विषय मिळाल्याशी कारण.

तिरशिंगराव Mon, 07/09/2015 - 17:44

चर्चा उदबोधक होत चालली आहे. निरोगी व्यक्तिने स्वेच्छामरणाची इच्छा ठेवली तर तो स्वार्थीपणा कसा काय होतो ? मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडल्या असतील आणि पत्नीलाही त्यांत ऑब्जेक्शन नसेल तर काय हरकत आहे ? हा निर्णय कुणाला वैतागून नव्हे पण जगण्यातला तोचतोचपणा नकोसा झाला असेल, तर आनंदाने मरणाला कवटाळावे, असे मला वाटते. जन्म आपल्या हातात नसला तरी आपले आपणच 'टर्मिनेटर' होऊ शकतो. स्वेच्छामरण आणि आत्महत्या यांत फरक आहे. तसा कायदा झाला तरच मी हे करेन.

तिरशिंगराव Thu, 10/09/2015 - 10:43

In reply to by पिवळा डांबिस

इथे 'खिक' झालं!!

द्या टाळी. मी जेंव्हा हा विषय तिच्याकडे काढतो तेंव्हा तिलाही 'खिक्क'च होतं. च्यायला, आम्हाला कोणी शिरेसली घेतच नाही बघा!

-तिरशिंग माणसातूनजाणे.

मनीषा Thu, 10/09/2015 - 08:34

In reply to by तिरशिंगराव

सर्वं कर्तव्यं पार पाडली , म्हणून तो माणूस गेला तरी चालेल असं सहसा नसतं.
तुमच्या पत्नीला हरकत नाही , याचा अर्थ मोठ्या आनंदाने तुम्हाला जायची परवानगी देईल, किंवा त्या मुळे त्यांच्या आयुष्यात काही फरकच पडणार नाही असा होत नाही ना. त्यांनी परवानगी दिली ती तुमची इच्छा म्हणून असही असू शकते.

मी इथे स्वार्थ शब्दं वापरला तो बहुदा बर्‍याच जणांना योग्यं वाटला नाही. पण स्वार्थं म्हणजे काही तरी वाईट असे अध्यर्‍हुत नव्हते. तर स्वतःची इच्छा केवळ पूर्णं करणे, अशा अर्थी होता. मला त्या साठी दूसरा योग्यं शब्दं सापडला नाही म्हणून ...

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/09/2015 - 03:46

सर्वसमावेशक कायद्याबद्दल अजूनही काही मत बनत नाही. धर्माच्या नावाखाली किंवा इतर कोणत्याही नावाखाली लोकांवर नैतिक दबाव येण्याबद्दल प्रतिबंधात्मक स्वरूपाचे कायदे असणं योग्य वाटतं.

त्यापेक्षा जवळच्या लोकांशी बोलून ठेवावं, "उपचार थांबवण्याविषयी निर्णय आता तुम्ही घ्या" असं डॉक्टर म्हणाले तर उपचार थांबवण्याचा निर्णय घ्यायला सांगावं, आपल्या हातात असेल तर आपणच अन्न-पाणी सोडून द्यावं* हे सोपं आणि सोयीचं वाटतं. अनेक वृद्ध लोकांच्या मृत्युनंतर "सुटल्या" ("सुटले") असे उद्गार कानावर आले आहेत; मलाही कधीमधी असं वाटलं आहे. अशी वेळ माझ्यावर आलेली मला अजिबातच आवडणार नाही.

तरीही मी म्हातारी होईस्तोवर जगले तर तोवर या प्रकारच्या कायद्यांमध्ये बदल झालेले असतील अशीही आशा आहे.

.शुचि. Wed, 09/09/2015 - 22:49

अंतराचा - पीअर प्रेशर मुद्दा फार आवडला होता.
गविंचे पसिव्ह आणि अ‍ॅक्टिव्ह मरण हे विभाजनही आवडले.
____
बाकी या प्रश्नाच्या डोळ्यात डोळे घालून पहाण्याचे धाडस नाही.

faint-hearted,
शुचि

नितिन थत्ते Sun, 13/09/2015 - 10:51

आणखी एक शंका आहे.

हे जे क्रियाकर्म करायचे आहे ते नेहमीच्या फ्यामिली डॉक्टरने करायचे की त्यासाठी वेगळे जल्लाद डॉक्टर नेमले जावेत?

फ्यामिली डॉक्टरांवर सक्ती असू नये.

प्रकाश घाटपांडे Sun, 13/09/2015 - 12:40

In reply to by नितिन थत्ते

आदुगर मृत्यू मधील वैद्यकीय हस्तक्शेप तर समाजमान्य होउ द्यात. मग स्पेशालिस्ट च पघू!

ऋषिकेश Mon, 14/09/2015 - 17:42

याचर्चेनंतर मी इच्छामरण हवेच या माझ्या बर्‍यापैकी क्रिस्टलाईज झालेल्या मताकडून काहिसा दूर सरून पुन्हा यावर विचार करायला हवा अश्या मताकडे आलो आहे.
थॅंक्स ऐसीकरांनो - विशेष थॅक्स टु अंतराआनंद त्यांच्या प्रतिसादाने एकदम विचारातच पाडले!

प्रकाश घाटपांडे Tue, 31/05/2016 - 13:22

सरकारने आता इच्छामरण या विषयावर नागरिकांची मते मागवली आहेत. http://www.mohfw.nic.in/index1.php?lang=1&level=1&sublinkid=5960&lid=38… इथे बिलाचा मसुदा आहे. नागरिकांनी passiveeuthanasia@gmail.com इथे आपली मते जरुर कळवावीत.